Sunday, February 9, 2025

काहीकाही मंडळी व्यवसाय का करतात हे कोडे

काहीकाही माणसे आपापला व्यवसाय कसा करीत असावीत ? हा प्रश्न मला पडतो. आणि ते जाणून घेतल्यानंतर ती माणसे तो व्यवसाय करीत तरी का असावीत ? हा सुध्दा प्रश्न पडतो.

मागे मी माझ्या अत्यंत आवडत्या अशा नागपूर - चंद्रपूर मार्गावर साधारण १९९२ पासून धावत असणार्या खाजगी गाड्यांविषयी एक सविस्तर लेख लिहीला होता. (लेख इथे)
साधारण १९९२ पासूनच नागपूरच्या R G Gupta यांच्या धनश्री ट्रॅव्हल्सची एक बस या मार्गावर नियमित सेवा देतेय. इतर सगळ्या ट्रॅव्हल्स आपापल्या बसेसच्या या मार्गावर किमान ४ फेर्या (दोन वेळा चंद्रपूर ते नागपूर जाऊन येणे) व्हाव्यात या अट्टाहासात असताना ही ट्रॅव्हल्स मात्र सुरू झाल्यापासून फक्त २ फेर्या करते. सकाळी ९.३० च्या सुमारास नागपूरवरून निघून १२.३० - १२.४५ वाजता चंद्रपूर गाठणे आणि तिथून दुपारी ३.४५ ला परतीचा प्रवास सुरू करून संध्याकाळी ७.०० - ७.१५ पर्यंत नागपुरात परत येणे एवढाच प्रवास ही ट्रॅव्हल्स करीत आलेली आहे. दोन्हीही कडून या वेळा Non Prime अशा वेळा आहेत. या वेळांमध्ये फारसे प्रवासी उपलब्ध नसतात, कुठल्याही मौसमात. या मार्गावरचा prime time म्हणजे सकाळी ६ ते ८ पर्यंत आणि संध्याकाळी ५ ते ८ पर्यंत.
बरे या मार्गावर यांची बसही कायम मिडी बस असते. बाकी ट्रॅव्हल्स चालवतात तसली पूर्ण लांबीची ४५ आसनी बस यांनी कधी चालवलीच नाही. कायम २५ ते ३० आसनी बस हे चालवतात.
बरे पहिल्यापासून इंदूर इथल्या कुठल्यातरी स्थानिक बस बाॅडी बिल्डरकडे बांधलेली बसच हे लोक निवडतात. बाकी ट्रॅव्हल्स आपल्या मिडी बसेस टाटा मार्कोपोलो, भारत बेन्झ सतलज वगैरे आणून चालवत असताना मात्र यांनी इंदूरशी आपली निष्ठा सोडली नाही. कुणाशीही कधीच स्पर्धा न करता आपली सेवा प्रदान करताना यांना किती नफा होत असेल ? किंबहुना काही नफा होतोय की ३० वर्षांपासून ही सेवा तोट्यातच चाललेली आहे ? असे प्रश्न मला पडतात. बरे यांच्या गाडीची ना कधी खूप जाहिरात ना यांच्या गाडीचे काही विशेष आकर्षण (USP).
मग आजच्या या स्पर्धात्मक जगात ही ट्रॅव्हल कंपनी आपला व्यवसाय कसा करतेय ? आणि मुळातच का करतेय ? या व्यवसायात गेल्या ३० - ३३ वर्षात स्वतःच्या बिझिनेस माॅडेलमध्ये यांना काही बदल आणावेसे वाटलेच नाहीत का ? हे प्रश्न मला कायम छळतायत.
नित्य बदलणार्या आजच्या जगात ही अशी न बदलणारी माणसे, कंपन्या आशादायक आहेत असे समजावे ? की ते असा व्यवसाय करीतच का असतील या विचाराने अस्वस्थ व्हावे ?
"एक साधा प्रश्न माझा
लाख येती उत्तरे
हे खरे का ते खरे ?
ते खरे का ते खरे ?"
- बसगाड्यांचा, मनुष्यप्राण्यांचा आणि बिझिनेस माॅडेल्सचा व्यासंगी अभ्यासक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Saturday, February 1, 2025

व्यक्ति तितक्या प्रकृती आणि तितक्याच प्रतिक्रिया

 

या बसकडे बघितल्यावर वेगवेगळ्या व्यक्तींची वेगवेगळ्या प्रकारची प्रतिक्रिया होईल.

आम्हा बसफॅन्सना ही बस पाहिल्यावर
"एकाच या जन्मी जणू फिरूनी नवे जन्मेन मी" ही ओळ आठवेल.

कारण ही बस महाराष्ट्र एस टी च्या मध्यवर्ती कार्यशाळा नागपूरने माईल्ड स्टील मध्ये साधी परिवर्तन बस म्हणून बांधण्याआधी पनवेलच्या अॅण्टोनी गॅरेजने बांधलेली निमआराम बस होती. निमआराम म्हणून तिच्या सेवेची वर्षे संपल्यानंतर नागपूर कार्यशाळेने तिला सध्याचे रूप दिले. एकाच जन्मात ती पुन्हा नव्याने जन्मली.
ब्युटी पार्लर मधले बारकावे जाणणार्या भगिनी वर्गाची प्रतिक्रिया
"अग बाई, तिच्या आयब्रोज *eye brows) किती छान कोरल्यात, न !"

अशी असू शकेल.

तर

विदर्भातल्या इच्चक पोट्ट्यांची प्रतिक्रिया
"अबे ते डिझेल भरल्यावर त्याच झाकण त लावत जा बे. पब्लिकचा माल हाये म्हनून सन्यान काई...ई करतेत ह्ये."
अशीही असू शकेल.
MH - 06 / S 8908
मूळ बांधणीः अॅण्टोनी बस बाॅडी बिल्डर्स, पनवेल. निमआराम बस. २ बाय २.
पुनर्बांधणीः एस. टी. ची मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूर. परिवर्तन बस. २ बाय २
अ. रिसोड आगार
रिसोड आगार, अकोला विभाग
शेगाव जलद रिसोड
मार्गेः बाळापूर - अकोला - पातूर - मालेगाव (जहांगीर) - शिरपूर (अंतरिक्ष पारसनाथ)
खरेतर बाळापूर ते पातूर हे सरळ अंतर फक्त ३० - ३५ किलोमीटर्स असताना ही बस अकोला मार्गे जवळपास ५० किलोमीटर्स लांबचा पल्ला घेऊन का जाते ? हे एक कोडेच आहे.
- एकाच वेळी बसफॅन, काकूबाई आणि इच्चक कार्ट्याच्या दृष्टीने विचार करू शकणारा सर्वसामान्य माणूस, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Thursday, January 30, 2025

भारतीय रेल्वे्मधल्या डब्यांची रंगसंगती : एक निराळा विचार

निळ्या रंगातली "राॅयल ब्लू" ही रंगछटा आपल्या नावाप्रमाणेच राजेशाही ऐश्वर्याचे प्रतिक आहे असे मला मनापासून वाटते आणि म्हणूनच भारतीय रेल्वेच्या "राजधानी" दर्जाच्या सुपर डिलक्स गाड्यांना ही राॅयल ब्लू छटा भारतीय रेल्वेने वापरायला हवी होती हे माझे प्रामाणिक मत आहे.



लाल, पिवळा यासारखे उष्ण रंग हे जोश, वेग दर्शवतात. ही लाल + पिवळी रंगसंगती भारतीय रेल्वेने शताब्दी, वंदे भारत सारख्या अतिजलद गाड्यांसाठी वापरायला हवी होती. पण रेल्वेने अगदी उलट केलेय. निळा रंग शताब्दीला ,पांढरा + निळा रंग वंदे भारत एक्सप्रेसला आणि लाल + पिवळा रंग मात्र राजधानीला दिलाय.(राजधानीच्या जुन्या ICF रेक्सना ही लाल + पिवळी / क्रीम रंगसंगती होती. आजकाल सगळ्यांनाच एकसुरी लाल + राखाडी LHB रंगसंगतीचे डबे मिळतात. खरेतर LHB कोचेसचा मूळ रंग निळा + राखाडी असाच होता. मुंबई - गोरखपूर एक्सप्रेसचे १० वर्षांपूर्वीचे LHB डबे याची साक्ष देतील. पण आता सगळे डबे एकजात एकाच रंगातले. )
मध्येच ममताबाईंनी आपल्या विक्षिप्त स्वभावासारखे विक्षिप्त रंगसंगतीतले डबे दुरांतो गाड्यांसाठी आणलेले होते. त्यात सौंदर्यदृष्टी काय होती ? हे कळणार्यांना उद्या "भिंत पिवळी पडली" हे सुध्दा एक सौंदर्यवाचक विधान आहे हे पटेल. (Ref: पु. ल. देशपांडे)
आताही महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या "डेक्कन क्वीन" एक्सप्रेससाठी खूप विचारमंथन करून, प्रवाशांची मते वगैरे मागवून(आणि त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करून) प्रवाशांची आवड जाणून घेऊन (किंवा जाणून घेतल्याचे यशस्वी नाटक करून) एका राष्ट्रीय दर्जाच्या संस्थेकडून भारतीय रेल्वेनी डेक्कन क्वीनची जी हिरवी + लाल + पिवळी रंगसंगती निश्चित केलेली आहे ती सौंदर्यदृष्ट्या किती भयाण आहे हे आपल्याला खालील फोटोवरून कळेलच.



रेल्वेने जबलपूर स्थानकावर एका जुन्या डब्याला उपहारगृहात बदलून ठेवलेले आहे. (हा असा प्रयोग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथेने केलेला आहे पण तिथे मात्र इतकी उठावदार संगसंगती नाही.) जबलपूर इथल्या कोचची रंगसंगती ही "राॅयल ब्लू" आणि त्यावर पिवळे / सोनेरी (Yellow Ochre) पट्टे ही किती डौलदार वाटतेय ते बघा. हीच रंगसंगती डेक्कन क्वीनसाठी किंवा इतर प्रतिष्ठित गाड्यांसाठी वापरायला हवी होती हे माझे प्रामाणिक मत आहे.

- National Institute of Design मध्ये शिकलो नाही तरी ड्राॅइंगच्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा पास केलेला आणि त्यादरम्यान रंगांची ओळख व चांगली / वाईट्ट रंगसंगती मनात पक्की केलेला सौंदर्यद्रष्ट्रा राम प्रकाश किन्हीकर. 

Saturday, January 25, 2025

भारतीय रेल्वेची "नाथाघरची उलटी खूण"

आजकाल एक्सप्रेस गाड्यांना सरसकट WAG 9 एंजिने मिळताहेत.

W - Wide Gauge (Broad Gauge)
A - AC traction
G - Goods train.
मालगाडीसाठी फिट असलेले, महत्तम वेग फक्त १०० किमी प्रतितास गाठू शकणारे हे एंजिन एक्सप्रेस गाड्यांना देऊन भारतीय रेल्वे नक्की काय साध्य करू पाहतेय कोण जाणे ? इकडे रेल्वेमार्ग १३० किमी प्रतितास वेगासाठी सिध्द करायचेत आणि एक्सप्रेस गाड्यांना असे फक्त १०० किमी प्रतितास वेग गाठू शकणारे एंजिन्स द्यायचेत यात काय मजा ?
आणि याउलट गोष्ट परवा बघायला मिळाली. मुंबई - हावडा मुख्यमार्गावर असलेले जलंब हे जंक्शन स्टेशन. इथून रेल्वेचा एक फाटा खामगावकडे जातो. जलंब ते खामगाव फक्त १२ किमी अंतर. खामगावच्या प्रवाशांना मुंबई किंवा हावड्याकडे जाण्यासाठी प्रत्येक महत्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना जोडायला खामगाव - जलंब - खामगाव अशा रेल्वे सेवा चालायच्यात.
एकेकाळी जलंब - खामगाव - जलंब अशी रेल बस सेवा चालायची. एका डब्याची आणि त्यातच ड्रायव्हर कॅब असणारी ही रेल बस साधारण ६० - ६५ प्रवाशांना वाहून नेऊ शकायची. या रेल बसचा फायदा म्हणजे खामगावला आणि जलंबला रेल्वे एंजिन काढून पुन्हा उलट्या बाजूने लावण्याचा सव्यापसव्य यात वाचत होता.



कालांतराने प्रवासी संख्येत वाढ झाली असावी. त्यामुळे रेल बस जाऊन तीन डब्यांची एक छोटीशी गाडी आली. या गाडीला सुरूवातीच्या काळात WAM 4 एंजिन लागायचे.
W - Wide Gauge (Broad Gauge)
A - AC traction
M - Mixed Traffic (Passenger as well as Goods train.)
WAM 4 एंजिनांचे आयुष्य संपल्यानंतर या गाडीला एसी आणि डीसी या दोन्हीही वीजप्रवाहावर चालू शकणारे असे कल्याण शेडचे WCAM 3 एंजिन मिळायला लागले. या प्रकारच्या एंजिनांची महत्तम वेगधारण क्षमता १०५ किमी प्रतितास होती. अर्थात अवघ्या १२ किमी प्रवासासाठी एंजिनाची महत्तम वेग धारणक्षमता १०० किमी प्रतितास असली काय ? किंवा १३० किमी प्रतितास असली काय ? काही फरक पडत नव्हता.
W - Wide Gauge (Broad Gauge)
C - DC traction
A - AC traction
M - Mixed Traffic
(Passenger as well as Goods train.)
परवा संध्याकाळी शेगाव वरून खामगावला गेलो. आमचे सदगुरू परम पूजनीय कृष्णदास माऊली आगाशे काका यांच्या समाधीस्थानाचे दर्शन घेतले. तिथून बाहेर निघतो न निघतो तोच रेल्वेगाडीचा हाॅर्न ऐकू आला. त्यांच्या समाधीस्थानालगतच हा जलंब - खामगाव रेल्वेमार्ग गेलेला आहे.
बघतो तो काय ? ही तीनच डब्यांची रेल्वे भुसावळ शेडच्या WAP 4 या एंजिनमागे अक्षरशः धडधडत येत होती.



W - Wide Gauge (Broad Gauge)
A - AC traction
P - Passenger Train Traffic
या प्रकारचा एंजिनांची महत्तम वेग धारणक्षमता १३० किमी प्रतितास असते. त्या अर्थाने या तीन डब्यांसाठी एंजिनाची ही शक्ती खूप जास्त होती. आम्हा रेल्वेफॅन्सच्या भाषेत "The train was overpowered."
दुःख या गाडीला WAP 4 मिळाल्याचे नाहीच. या मार्गावर धावणार्या ११०३९ / ११०४० महाराष्ट्र एक्सप्रेस, १८०२९ / १८०३० शालीमार - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस या गाड्यांना WAP 4 आवश्यक असताना त्यांना सातत्याने WAG 9 देणार्या आणि या गाडीला कुठलेही एंजिन चालू शकत असताना हिला इतका जास्तीचा पाॅवर असलेले एंजिन देणार्या नियोजनशून्यतेचे दुःख आहे.
- व्यक्तिगत असो वा सार्वजनिक, काटेकोर नियोजनाबद्दल आग्रही असलेला रेल्वेफॅन, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Friday, January 24, 2025

प्राणी, पक्षीसृष्टी आणि अध्यात्मिक अनुभूती

ती प्रभातीची होती वेळा ।

प्राची प्रांत ताम्र झाला ।

पक्षी किलकिलाटाला ।

करू लागले वृक्षावर ।।
श्रीगजाननविजय ग्रंथात केलेले हे वर्णन अनुभवण्याचा प्रसंग आला तो खुद्द श्रीगजानन महाराजांच्या शेगावातच, त्यांच्याच कृपाछत्राखाली उभ्या झालेल्या संस्थानाच्या भक्तनिवासाच्या आवारात.




आजकाल ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, मोबाईल टाॅवर्स रेडिएशनचे प्रदूषण अशा अनंत कारणांमुळे पक्षी मानवी सहवासापासून दूर जायला बघतात. पण इथे जवळपास दहा हजार लोकांचा नित्य राबता असूनही असे असंख्य पक्षी निर्भयपणे वावरताना, विहरताना आणि किलकलाट करताना दिसतात. या जागेतली अध्यात्मिक स्पंदने त्या मुक्या जीवांना जाणवलीत, भावलीत आणि म्हणूनच ते इथे रमलेत.
- अध्यात्मिक स्पंदने मानवांपेक्षाही अधिक तरलपणे जाणू शकणार्या प्राणी, पक्षी सृष्टीत रमणारा एक क्षुद्र मानवप्राणी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Friday, January 17, 2025

सायंकालिन उपासनेतले तात्विक विचार

दुकानातून अगदी पारखून, खूप सुवासिक म्हणून आणलेल्या, उदबत्तीचा सुवास आपल्याला फक्त त्या फोडलेल्या पुड्यातून लावलेल्या पहिल्या उदबत्तीपुरताच येतो. त्या पुड्यातल्या नंतरच्या उदबत्त्यांचाही तसाच सुवास येत असावा. पण आपले नाक त्या वासाला सरावल्याने आपल्याला जाणवत नाही.

तशीच एखाद्या खूप चविष्ट पदार्थाची चव पहिल्या घासापुरतीच. नंतरचे घास म्हणजे केवळ उदरम भरणम.
- सायंकालीन उपासनेत अनेक तात्विक विचार सुचणारे रामबुवा वेदांती.

बेळगाव: एक अनामिक ओढ असलेले गाव

 

"जिन लाहौर नही वेख्या वो जनम्याई नई" (ज्याने लाहोर बघितले नाही तो जन्मलाच नाही) असे म्हणतात खरे. स्वातंत्र्यपूर्वकाळात जन्मलेल्या पिढीला लाहोर शहराचे असे आकर्षण होते हे नक्की.
प्रभू श्रीरामपुत्र लव याच्या नावावरून लाहोर शहराचे नाव ठेवलेले आहे हे ऐकून तर या शहराविषयी एक निराळीच आत्मीयता निर्माण झाली. श्रीरामपुत्र कुशाच्या नावावरून आपल्या उत्तर प्रदेशातले कुशीनगर आहे. लक्ष्मणाचे (उत्तरेतला उल्लेख "लखन") लखनवा उर्फ लखनऊ ही शहरेही मनात विशेष स्थान निर्माण करून आहेत.
पण मला मात्र आस आहे ती बेळगाव बघण्याची. तिथली माती, तिथली थंड आल्हाददायक हवा, तिथले लोणी, तिथला गोड कुंदा आणि त्याहून गोड स्वभावाची तिथली माणसे हे सगळे याची देही याची डोळा मला अनुभवायचे आहे.
तसे २०१२ ला सांगलीवरून गोव्याला जाताना राजू शेट्टींच्या रस्ता रोकोच्या, जाळपोळीच्या (अव) कृपेमुळे आम्हाला मिरज - चिक्कोडी - निपाणी - बेळगाव मार्गाने गोव्यात प्रवेश घ्यावा लागला होता. तेव्हा रात्री ८ च्या सुमारास प्रवासात बेळगाव लागले खरे पण गोव्यात पोहोचण्याची त्वरा असल्याने बेळगाव "घडले" मात्र नाही.
फेसबुक, यू ट्यूब वर येणार्या ज्या ज्या व्हिडीओज, रील्समध्ये बेळगाव दाखवले आहे ते सगळे मी एका अनामिक आकर्षणापायी बघतो आणि ते शहर कसे असेल याचा मनातल्या मनात आराखडा तयार करतो. त्याला मनातल्या मनात अनुभवतो.
बेळगावात जाऊन तिथल्या अत्यंत थोर विभूती, गुरूमाय श्रीकलावतीदेवी यांच्या मठातही नतमस्तक होणे, जमल्यास तिथे वास्तव्य करणे हे ही माझ्या बकेट लिस्ट मध्ये आहेच.
पुलंच्या अंतु बर्व्याने जरी नातेवाईकांना "कोहीनूर" हिर्याबद्दल सांगून ठेवले होते तसे मी माझ्या मुलीला आणि नातेवाईकांना सांगून ठेवणार आहे.
"मी गेल्यानंतर पिंडाला कावळा नाही शिवला, तर "बेळगाव, बेळगाव" म्हणा. नक्की शिवेल." इतका माझा जीव अकारणच या शहरावर आहे.
- पुलंच्या रावसाहेबांसारखाच मराठी - कानडी असा अजिबात वाद न करता बेळगाव शहरावर आपल्या एखाद्या प्रेयसीवर करावे तसे मनोमन अव्यक्त प्रेम करणारा, एक अस्सल वैदर्भिय, नागपूरकर प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
बाय द वे, पुल ज्या काॅलेजात शिकवायचे ते काॅलेज, ठळकवाडीचे त्यांचे घर आणि रावसाहेब हरिहरांचे "रिटझ" थिएटर अजूनही आहे का हो बेळगावात ?
त्ये त्येवडं सांगून सोडा की वो. काय त ते हाय काय ब्याळगावात ? (शेवटला "त" संपूर्ण उच्चारायचा हं. हलन्त नाही)