Saturday, September 21, 2024

ओलेती सांज धुंद छेडी मारवा

एक काळ होता. संध्याकाळची कातर वेळ खायला उठायची. घरापासून ११०० किलोमीटर दूर राहून शिक्षण घेणारा राम, नागपूरच्या आठवणींनी, घरी असलेल्या आईवडिलांच्या प्रेमळ ओढीने संध्याकाळच्या कातर वेळेस कासाविस व्हायचा. त्याच्यासारखेच त्याचे नाशिकचे, सांगलीचे, कोल्हापूरचे, जळगावचे, अमरावतीचे, अकोल्याचे मित्र सुध्दा तीच अवस्था अनुभवत असतील. कारण बोलून दाखवत नसले तरी ते सगळेच जण हाॅस्टेलच्या रूममध्ये संध्याकाळी रहात नसत. बाहेर पडून कराड शहरात एक फेरफटका मारून ती वेळ टाळण्याचा, मनाची कासाविस अवस्था सुसह्य करण्याचा आम्ही सगळेच प्रयत्न करत असू.

मग अशा कातर वेळी मारव्याचे सूर कानावर पडलेत तर ते नकोसे वाटत असत. आधीच हा राग बिचारा आईबाप नसलेला राग. आरोहात आणि अवरोहातही अत्यंत महत्वाच्याच सुरांचा आधार नसलेला हा राग तसाही मनाला कातर करतो. आईवडिलांपासून खूप दूर राहून शिकणार्या आम्ही, त्या काळच्या संध्याकाळी हा ऐकला असता तरी त्या सुरावटींमुळे आमचे कातर मन अधिकच कातर होऊन आमचे डोळे पाणावलेच असते.
आज आई वडिलांची जीवनातली सावली हरवली. वडिलांची तर माझ्या तारूण्यातच हरवली. त्यानंतर २५ वर्षांनी आईही अनंतात विलीन झाली. जीवन आता आता थोडे कळायला लागलेय असे वाटे वाटे पर्यंत जीवनाने हे धक्के दिलेत. आज गाडीने संध्याकाळी परतत असताना गाडीतल्या स्टिरीयोवर मारवा लागला.
आणि जाणवले की अरे, मारव्या सारखीच तर माझी स्वतःची अवस्था आज झालेली आहे. जीवनातले सगळे महत्वाचे आधार हरवलेले आहेत. स्वतःच्या तुटपुंज्या सुरावटींच्या जोरावरच आता स्वर्ग उभा करायचा आहे. काम कठीण आहे पण नेटाने झुंजून करायचेच आहे. आज मारवा जेवढा मनाला भिडला, समजला आणि आदर्शवत वाटला तेवढा यापूर्वी अनेकदा ऐकूनही वाटला नव्हता हे अंतर्मनाला जाणवले. एखादा राग मनाला भिडतो, भावतो तो असा.
आजकी पूरी शाम, राग मारवा के नाम.
- तानसेन नसलो तरी चांगला कानसेन असलेला आणि रागांपासून प्रेरणा घेणारा, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Saturday, September 14, 2024

ब्युफ़े: माझा कायमचाच एक पंगा

एकेकाळी लग्नात ५०० - ५०० पाहुण्यांच्या पंगती उठताना पाहिल्याने, क्वचित काही पंगतीत वाढायला मिळाल्यानेही आधुनिक प्रणालीतले ब्युफ़े जेवण मला अजिबात आवडत नाही. पंगतींबाबतचे माझे लेख आणि भूमिका या लेखांमध्ये मी यापूर्वीही मांडलेली आहे.


पण आजकाल ब्युफ़े हा प्रकार केवळ लग्न समारंभांपुरता मर्यादित न राहता तो गणपती - महालक्ष्म्यांचे जेवण यातही आलेला आहे. आजकाल तेरवी आणि श्राध्दांचे जेवणही ब्युफ़े व्हायला लागले हे पाहून हसावे की रडावे हेच कळेना. अरे ब्युफ़े म्हणजे स्वरूची भोजन. श्राध्दाचे, तेरवीचे जेवण करण्यात कुणाची बरे रूची असते ? फ़क्त ब्राह्मण - सवाष्ण पंगतीत (काही काही ठिकाणी ह्या पंगतीही खाली मांडी घालून वगैरे न बसवता चक्क डायनिंग टेबल वर बसवतात. खाली मांडी घालून ताटा - पाटावर बसणे केवळ वृद्धांनाच नव्हे तर चाळीशीच्या उंबरठ्यावर असलेल्या तरूणांनाही कठीण होत चालल्याचे पाहून काळजी वाटते. 


शौच विसर्जनासाठी असलेली आपली पारंपारिक भारतीय पद्धती सोडून आपण सर्वत्र कमोड पद्धत स्वीकारल्याचे हे परिणाम. आपल्या भारतीय पद्धतीत शौचकुपातल्या, इतर मंडळी वापरत असलेल्या भागाला, आपल्या पावलांसारख्या थोड्या कठीण आणि सहजासहजी इन्फ़ेक्शन न होणा-या भागाचा स्पर्श होत असतो. पण कमोडमध्ये मात्र इतर मंडळींनी वापरलेल्या भागाशी आपल्या मांड्यांचा स्पर्श होत असतो. पावलांपेक्षा मांड्या नाजूक असतात. त्यांच्याद्वारे इतरांचा संसर्ग आपल्याकडे पावलांच्या स्पर्शापेक्षा जास्त जलद व सुलभ पसरू शकतो. मग आरोग्याला चांगले ते काय ? याचा विचार आपण करायलाच पाहिजे. आज पाश्चात्य जगत भारतीय पद्धतीच्या उकीडवे बसून शौचविसर्जन कसे करता येईल याचा विचार गांभीर्याने करत आहे आणि आपण मात्र अंधानुकरण करीत आपली पद्धत त्यागून ती अत्यंत अनारोग्यदायक पद्धत अवलंबिली आहे. या सवयींमुळे तिशी - चाळिशीतल्या आजच्या पिढीला खाली बसले तर सहजासहजी उठता येत नाही आणि उठलेत तर बसता येत नाही असे सत्तरी - ऐंशीतले म्हातारपण आलेले आहे.


हे विषयांतर झाले हे मला मान्य आहे पण विषय पूर्णपणे मांडण्यासाठी हे आनुषंगिक आहे हे सुद्धा तितकेच खरे आहे.


मी माझ्यापुरते तरी ब्युफ़ेत जेवण घेणे सोडलेले आहे. लग्न समारंभात मी फ़क्त अक्षता टाकून निघतो. लग्न समारंभाचे बहुतेक यजमान आपापल्या तालात असतात त्यामुळे तुम्ही जेवले की नाही याची फ़िकीर कुणालाच नसते. त्यातून कुणी यजमान दारावर असलेच आणि आपण बाहेर निघताना त्यांनी "काय जेवलात की नाही व्यवस्थित ?" असा प्रश्न विचारलाच तर "वा, पनीर छान होतं हं तुमच्याकडचं. कोण होतं कॅटरर ?" असा प्रश्न टाकून द्यावा. त्यामुळे यजमान खुश होतातच. महाराष्ट्रीय लग्नांमधे एकवेळ वधू किंवा वर नसला तरी चालेल पण पनीर बटर मसाला (किंवा तत्सम कुठलीही) डिश असलीच पाहिजे हा दंडक कुठल्या पुराणांमधून आलाय याचा मी शोध घेतोय.


लग्न समारंभांचे ठीक आहे पण आजकाल गणपती - महालक्ष्म्यांच्या जेवणातही ब्युफ़ेत जेवण्याची वेळ येते. अशावेळी आपण ब्युफ़ेत न जेवण्याची आपली तत्वे दाखवलीत तर "हा लेकाचा प्रसादाचा इन्कार करून देवाचा अपमान करतोय" अशी भावना यजमानांसकट इतर पाहुणे मंडळींची होते. वास्तविक प्रसादाचे, श्राद्धाचे जेवण असे ब्युफ़ेत मांडून आपण देवाचा, त्या दिवंगत व्यक्तीचा अपमान करतोय हे यजमानांनी लक्षात घेतले पाहिजे आणि प्रसाद असा उभ्या उभ्या, चालता चालता भक्षण करून आपण "उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म" या समर्थ उक्तीचा अवमान करतोय हे पाहुण्यांच्या लक्षात यायला हवे. पण आपल्यापेक्षा समोरचा माणूस जास्त दोषी ठरविण्याच्या आजकालच्या युगाला अनुसरून आपणच दोषी ठरतो.


बरे आपल्यासाठी एखाद्या यजमानांनी त्यांच्या गृहस्वामिनीला पंगतीत पान मांडण्याची विनंती केलीच तर मला एकदम "तुझे आहे तुजपाशी"त आचार्यांच्या तोंडी असलेले मोठ्ठे स्वगत आठवते.


" परवा एका घरी उतरलो असताना त्या घरात आतमध्ये चाललेला नवराबायकोचा संवाद कानी पड्ला. बायको नव-याला म्हणत होती ’त्याला हातसडीचाच तांदूळ खायचा असेल तर स्वतःसोबत बांधून आणत जा म्हणावं’ आजवर आमच्या या व्रतामुळे आम्ही किती मायमाऊल्यांचे शिव्याशाप घेतले असतील कुणास ठाऊक ?" 


आणि मी एकदम सावध होतो. आपल्या आचरणामुळे असा कुणाला त्रास होणार असेल तर नको बाबा, या विचाराने आजकाल मी गणपती महालक्ष्म्यांच्याही प्रसादाला जाणे टाळतो. संतांच्या घरचा प्रसाद अगदी मागून खाल्ला पाहिजे या संतवचनांवर विश्वास ठेऊन गुरूघरी, इतर संतपुरूषांकडे मात्र ब्युफ़े असला तरी प्रसाद आवर्जून घेतो पण सर्वसामान्य प्रापंचिकांच्या घरी मात्र नाही.


तसेही आजकाल "प्रसाद" म्हणावा अशी पाकसिद्धी, त्यामागची शुद्ध भावना आणि त्यासाठी वर्षभर लागणारे धार्मिक आचरण (पूर्वजांची श्राद्धे, पक्ष, पंचमहायज्ञ) सर्वत्रच लोप पावत चालले आहेत. केवळ कुळाचाराचा भंग होऊन देव कोपू नये या भावनेने सगळे धार्मिक कुळाचार केले जात आहेत. (सन्माननीय अपवाद वगळता) प्रेमाने, भावनेने एखादे कृत्य करून देवाचे सान्निध्य मिळवावे ही शुद्ध भावनाच लोप पावलेली आहे. मग अशा ठिकाणी गेले काय किंवा न गेले काय फ़रक पडत नाही ही भावना ठेऊन मी जाणे टाळतो.


- हा लेख ब-याच आप्त स्वकीय, सुहृद मंडळींना आवडणार नाही हे माहिती असूनही, "ब्युफ़े सोयीचा पडतो हो, ते वाढण्याचं काम कोण करत बसणार ?" वगैरे युक्तीवाद या लेखावर येणार हे माहिती असूनही 

"सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियेले नाही बहुमता" 

या श्रीतुकोबांच्या उक्तीवर विश्वास ठेऊन, समाज चुकीच्या गोष्टींकडे जात असेल तर त्यावर शाब्दिक का होईना, प्रहार करणारा  आणि असे ब-याच जणांशी पंगे घेणारा प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.




Wednesday, September 11, 2024

शोध सुखाचा

स्वतःच्या सुखाने सुखावण्यापेक्षा, दुसर्याच्या सुखाने आपण दुखावले जायला लागलो की कलियुगाचे विष आपल्यात भिनत चालल्याचा तो पुरावा समजावा व सावध व्हावे.

२१ व्या शतकात सर्व भौतिक सुखसाधने उपलब्ध असताना आपण अशा मानसिक रोगांनी त्रस्त होणार असू तर "२१ व्या शतकात मानसिक आजार हाच सगळ्यात मोठा आजार ठरेल" हे WHO चे भाकित खरे ठरवायला आपण हातभार लावतोय हे लक्षात ठेवा.
सुख हे ज्या त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. "मी सुखी आहे" अशी घट्ट मनोधारणा असणार्या व्यक्तीजवळ सगळी भौतिक सुखे कदाचित नसतीलही, किंबहुना ती तशी नसतातच. तशी भौतिक सुखे त्याच्याजवळ असती तर तो त्या सुखांच्या मागे अधिकाधिक लागला असता आणि खर्या आत्मिक सुखाकडे त्याचे पार दुर्लक्ष झाले असते.
पण माझ्याइतकी भौतिक सुखे त्याच्याजवळ तर नाहीत पण तरीही तो सुखी कसा ? हा प्रश्न जर तुम्हाला दुःखात टाकत असेल तर तुमची असूया ही असूयेच्या पातळीवर न राहता मनोविकृतीच्या पातळीवर चालली आहे हे निश्चित समजा. आणि जमेल तर सुधारण्याचा, त्या विकृतीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करा.
सुख हे बाहेर नसतंच मुळी. आपल्या अंतरंगात ते शोधावं लागतं. त्यासाठी स्वतःचा शोध घ्यावा लागतो. आणि माझ्यातला मी मला सापडला, त्याच्या आवडीनिवडी जाणल्यात, त्याच्याविषयी आपण सजग झालोत की लक्षात येईल की यासारखे दुसरे सुखच नाही. मग इतर जगाच्या सुखाने आपण दुःखी होणार नाही. कलीच्या तडाख्यात सापडणार नाही.
सुखी व्हा रे, सगळे खर्या अर्थाने सुखी व्हा आणि जगाला सुखी करा.
"सर्वेपि सुखिनः सन्तु" ही तर आपल्या संस्कृतीने जगाला दिलेली विश्वप्रार्थनाच आहे. तिचे मनन करा आणि खरोखर सुखी रहा.
- सुखी माणसाचा सदरा घालणारा आणि तो सगळ्यांना घालायला देण्यास तयार असलेला सुखी माणूस, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर. सायंकालिन चिंतन (०९०९२०२४)

Saturday, August 10, 2024

विदर्भातले फ़लाट

विदर्भातल्या काहीकाही फ़लाटांना मात्र वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व आहेत. शेगावचा फ़लाट धार्मिक आहे. संतश्रेष्ठ श्रीगजानन महाराजांच्या पावन पदस्पर्शानेही असेल, पण इथे उतरणा-या प्रत्येकाच्या डोळ्यात एक उत्सुकता आणि आशा असते आणि इथून चढणा-यांच्या डोळ्यांतील तृप्तता आणि धन्यता वाचता येते.




अकोल्याचा फ़लाट हा नागर संस्कृतीत जायला उत्सुक असलेल्या सुशिक्षित अनागर तरूणासारखा भासतो. तर मूर्तिजापूर म्हणजे संत गाडगेबाबांसारखाच भोळा, सरळ पण रोखठोक वाटतो. ’ज्ञानेश्वरी’, ’आझाद हिंद’ ’गीतांजली’ सारख्या सुपर एक्सप्रेस गाड्या तिथे थांबत नाहीत पण त्याचं त्याला सुखदुःख नसतं. न थांबणा-या गाड्यांविषयीची नैसर्गिक असूया इथल्या फ़लाटांमध्ये अजिबात नाही.

बडनेरा स्टेशन मात्र ख-या अमरावतीकरांसारखं आतिथ्यशील आणि अघळपघळ. कधीही "क्या बडे! उतर जा ना! जा ना कल सुबे!" अशी मैत्रीपूर्ण साद देइल असं वाटत.


चांदूरचा फ़लाट अगदी आत्ताआत्तापर्यंत चिमुकला होता. २४ डब्यांची गाडी थांबली पाहिजे म्हणून एव्हढ्यातच त्याची वाढ झालीय. मोठ्या माणसांचे मोठ्ठे बूट घालून घरातला लहान मुलगा ऐटीत मिरवतो तसा हा फ़लाट वाटतो.

धामणगावचा फ़लाट हा माझा मित्रच आहे. नोकरीनिमित्त एक वर्षासाठी तेथे असताना रोज त्याची भेट व्हायचीच. रात्री फ़लाटावरच जमवलेला आम्हा नाट्यकर्मींचा गप्पांचा फ़ड आमच्या नाट्यविषयक जाणिवा फ़ार समृध्द करून जायचा. नाटकाचा रंगमंचीय प्रयोग सादर होण्यापूर्वी त्यावर करून पाहण्याच्या निरनिराळ्या ’प्रयोगां’ची संहिता याच फ़लाटावर तयार झालेली आहे.

वर्धा स्टेशन मात्र जुन्या गांधीवाद्याप्रमाणे तत्वनिष्ठ वाटतं. ३१ जानेवारी १९४८ ला गांधीजी प्रदीर्घ मुक्कामासाठी वर्धेला येणार होते हा फ़लाटावरचा उल्लेख वाचला की मन गलबलून येतं. पण त्या फ़लाटावरचा सर्वोदयी साहित्याशेजारचा फ़िल्मी मासिकांचा स्टॊल विचित्र वाटतो. तसा फ़िल्मी मासिकांचा स्टॊल फ़लाटाला निषिध्द नाही, पण ’स्टारडस्ट’,’फ़िल्मफ़ेअर’ हे नेमके ’महर्षी अरविंदकी वचनें’ च्या मांडीला मांडी लावून बसलेली बघायला अस्वस्थ होतं खरं.

यवतमाळ ला रेल्वे येते हे आता खुद्द यवतमाळवासियांच्या स्मृतीतून नाहीसे झालेले आहे. आता भरपूर उपलब्ध असलेल्या एसटी बसेसमधून भर्रकन दारव्हा, कारंजा , मूर्तिजापूरला जाता येत असताना त्या शकुंतला "एक्सप्रेस"ची वाट पाहून कोण डुगडुगत जाईल ? आता वर्धा - नांदेड या नव्या मार्गाचे काम सुरू झाल्यानंतर यवतमाळ बायपास वर शहराच्या बाहेर यवतमाळचे नवे रेल्वेस्थानक आकार घेते आहे. आणि हे काम पूर्ण होईस्तोवर यवतमाळ शहरात असलेले जुने रेल्वेस्थानक सगळ्यांच्या विस्मृतीत नक्की जाणार.

यवतमाळ वरून अकोल्याला रस्तामार्गे जाताना दारव्हा, मोतीबाग, कारंजा, कारंजा टाऊन वगैरे नॅरो गेज वरील स्टेशन्स आता केवीलवाणी वाटतात. पण विदर्भाच्या एकेकाळी समृद्ध कापूसपट्ट्यातल्या या भागातल्या एस टी चे थोडेसे भाडेही न भरू शकणा-या गोरगरीब शेतक-यांसाठी, शेतमजुरांसाठी, कष्टक-यांसाठी ही शकुंतला एक्सप्रेस एकेकाळी प्रवासाचे एकमेव साधन होती.

या मार्गावर स्वातंत्र्यापूर्वी दारव्हा मोतीबाग हे एक जंक्शन होते. इथून दारव्हा - पुसद हा नॅरो गेज रेल्वे मार्ग होता. दुस-या महायुद्धात राजस्थानातील पोखरण वरून "डी" या आद्याक्षराच्या कुठल्या तरी स्टेशनापर्यंत जाणारा "डी - पी" रेल्वेमार्ग उखडा ही सूचना रेल्वेविभागाला प्राप्त झाली आणि "डी - पी" म्हणजे दारव्हा - पुसद असे समजून हा नॅरो गेज रेल्वेमार्ग दुस-या महायुद्धापूर्वी उखाडला गेला अशी वंदता आहे. आजही दारव्ह्यावरून पुसदला रस्ता मार्गे जाताना या जुन्या रेल्वेमार्गाचे अवशेष अनेक ठिकाणी भरावाच्या रूपाने आपल्याला दिसतात. खरेतर आज भरावाचे काम झालेले आहे. वर्धा - नांदेड या ब्रॉडगेज रेल्वेमार्गाला यवतमाळ ते मूर्तिजापूर हा फ़ाटा ब्रॉडगेजरूपात जोडला जाऊ शकतो. आणि दारव्हा ते पुसद मार्गावर असलेल्या भरावावर पुन्हा ब्रॉडगेज मार्गाचे काम करून हा मार्ग शेंबाळपिंप्री - हिंगोली असा अकोला - पूर्णा या सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वेमार्गाला जोडल्या जाऊ शकतो. ब्रिटिशांची चूक आपण भारतीय सुधारू शकतो.

बाकी विदर्भातल्या सगळ्या दुर्लक्षित रेल्वे मार्गांचे नाव "शकुंतला" च का असावे ? हा मला पडलेला फ़ार जुना प्रश्न आहे. माजरी - वणी - पिंपळखुटी या एकेकाळी असलेल्या दुर्लक्षित मार्गाचे नाव "शकुंतला", यवतमाळ - मूर्तिजापूर हा मार्ग पण शकुंतला आणि अचलपूर - मूर्तिजापूर पण शकुंतलाच. दुष्यंताने झिडकारलेल्या शकुंतलेसारखी अवस्था भारतीय रेल्वेने या रेल्वेमार्गांना झिडकारून केलेली आहे म्हणून शकुंतलेच्या नशिबी जशी उपेक्षा आली तशी या मार्गांच्या नशीबी आलीय की काय ? असे वाटून जाते. पण शकुंतलेच्या पोटी जन्मलेल्या भरताने अपार पराक्रम केला आणि आपल्या मातेला पुनश्च सन्मान प्राप्त करून दिला तसा एखादा भूमिपुत्र या मातीत उपजावा आणि विदर्भाची रेल्वेबाबत उपेक्षा संपवावी याची ही भूमी खूप वर्षांपासून वाट बघते आहे.

त्यातल्या त्यात माजरी - वणी - पिंपळखुटी मार्गाचे भाग्य उजळले म्हणायचे. हा मार्ग पिंपळखुटी - आदिलाबाद - मुदखेड मार्गे हैदराबादशी, नांदेडशी जोडला गेलाय. पण हे भाग्य अजूनही अकोला - अकोट - वान रोड - तुकईथड - खांडवा मार्गाला लाभलेले नाही. वन खात्याच्या नसलेल्या तरतुदी काढून विदर्भाचा विकास होऊ नये असे वाटणा-या, पर्यावरणाचे खोटे उमाळे येणा-या, विदर्भद्वेषी, जुन्या नाकर्त्या राज्यकर्त्यांनी हा मार्ग उगाचच अडवून धरलेला होता. आता महाराष्ट्रात आलेल्या नव्या सरकारकडून या मार्गाला योग्य ही गती मिळण्याची अपेक्षा आहे. 

परवा माहूरवरून शेगावला जाताना रस्त्यात वाशिम स्टेशन लागले. पण वैदर्भिय असूनही त्याने मला फ़ारशी ओळख दाखविली नाही. "आपण बरे की आपले काम बरे". "ना कुणाच्या अध्यात ना मध्यात" अशा खाक्याच्या मराठवाड्यातल्या एखाद्या तरूणाने विदर्भात नोकरीनिमित्ताने स्थायिक व्हावे आणि अलिप्तपणाने रहावे असा तो वाशिमचा फ़लाट मला अलिप्त वाटला.

आणखी असाच एक अलिप्त वाटलेला फ़लाट म्हणजे चंद्रपूरचा "चांदा फ़ोर्ट" स्टेशनचा फ़लाट. वास्तविक माझा जन्म चंद्रपूरचा, बालपणी शाळांच्या सुटीत, महिनोनमहिने आमचा मुक्काम आजोळी, चंद्रपूरला असायचा. पण चंद्रपूर मुख्य रेल्वे स्थानकाच्या फ़लाटाइतकी आपुलकी या फ़लाटाने मला कधीच दाखविली नाही. बंगाल - नागपूर रेल्वे (सध्याचे दक्षिण - पूर्व रेल्वे) नॅरो गेज मधून ब्रॉड गेज मध्ये गेल्यावर देखील हे स्टेशन चंद्रपूर शहरात आपले स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व दाखवतच राहिले. मुख्य धारेशी जुळवून घेण्याचे नाकारतच राहिले. याचे व्यक्तित्व विदर्भातल्या शहरांमध्ये राहूनही छत्तीसगढ, बिहार, ओरिसा इथल्या आपल्या मूळस्थानांशी जोडलेले राहून विदर्भातल्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचे नाकारणा-या छत्तीसगढी मजुरासारखेच हे चांदा फ़ोर्ट स्टेशन मला वाटत राहिले.

भंडारा रोड (वरठी) स्टेशन हे तसे मुख्य रेल्वे मार्गावर आहे खरे पण इथून कुणी रेल्वेमार्गाने नागपूरला जात असेल असे मला वाटत नाही. भंडारा शहरातून या स्टेशनवर पोहोचून तिकीट काढून गाडी येण्याची वाट बघेपर्यंत रस्तामार्गे आपण नागपूरला पोहोचलेलो असतो. हो पण दूरवर हावडा, मुंबई किंवा पुण्याला वगैरे जायचे असेल तर मात्र या स्टेशनशिवाय पर्याय नाही. आपण स्लो गाडीत असलो आणि गाडी या स्टेशनवर थांबली की फ़ारसे कुणी पॅसेंजर न चढणा-या, उतरणा-या या स्टेशनचा राग येतो आणि आपण सुपरफ़ास्ट गाडीत असलो की या स्टेशनची कीव येते. मनुष्यस्वभाव, दुसरे काय ?

- विदर्भातल्या रेल्वे मार्गांविषयी कळकळ बाळगणारा रेल्वेप्रेमी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.



Friday, August 9, 2024

Enjoy journey more than enjoyment of reaching destination

 २६ / १२ / २०२१: चंद्रपूरला श्वशुरगृही नाताळची सुटी घालवून आम्ही कुटुंबिय नागपूरला परतत होतो. आजवर गेल्या ५० वर्षांमध्ये आम्ही नागपूर - चंद्रपूर - नागपूर हा प्रवास केलेला आहे. पण तो नेहमीच्या धोपटमार्गाने. नागपूर - बुटीबोरी - जांब - वरोडा - भांदक - चंद्रपूर असा.


आज आम्ही दुपारीच निघालो होतो. नागपूरला पोचण्याची तशी घाई नव्हती. चंद्रपूरला पाण्याच्या टाकीपाशी येईपर्यंत यावेळेस नागपूरला जाताना थोड्या वेगळ्या मार्गाने जाऊयात का ? हा विचार माझ्या आणि माझ्या सुपत्नीच्या मनात एकाचवेळी आला. चंद्रपूर - मूल - सिंदेवाही - नागभीड - भिवापूर - उमरेड हा जवळपास २०० किलोमीटर अंतराचा (जांब मार्गे हेच अंतर १५३ किलोमीटर आहे.) पण ताडोबा जंगलाच्या सीमेवरून जाणारा रमणीय रस्ता आम्ही निवडला. 

मग काय ? सुंदर जंगल रस्त्यातून सुंदर प्रवास करीत, नवा अनुभव घेत आम्ही नागपूर गाठले. 

Sometimes we need to enjoy journey towards destination more than enjoyment of reaching destination. या वाक्याचा प्रत्यय घेतला.

- एकांतात रमणारा, प्रवासात रमणारा तरी माणूसवेडा प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

व्हिडीयो एडिटिंग : चि. मृण्मयी राम किन्हीकर.



Wednesday, July 17, 2024

चातुर्मास संकल्प : चिंतन २०२४


आज आषाढी एकादशी. आजपासून आपला चातुर्मास सुरू. दिवाळी, दसरा, गणपती, महालक्ष्म्या यासारखे सणवार आणि श्रावण महिन्यासारखा संपूर्ण उत्सवी महिना याच कालावधीत येतो. आपल्यापैकी अनेक जण या कालावधीत काहीतरी संकल्प करीत असतात आणि थेट कार्तिकी एकादशीपर्यंत त्याचे पालन करीत असतात. या चार महिन्यांच्या कालावधीत एखादा पदार्थ जेवणातून पूर्ण वर्ज्य करणे, श्रावण महिन्यात रोज एकवेळेसच जेवणे वगैरे शारिरीक तपाचे संकल्प त्यात असतात तर एखादी पोथी, एखाद्या संताचे चरित्र रोज वाचणे, रोज श्रीविष्णुसहस्रनाम म्हणणे वगैरे अध्यात्मिक तपाचे संकल्पही त्यात असतात. तप म्हणजे तापून निघणे. शरीरासाठी रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळे करून त्यात शरीर तापवायचे तसेच मनासाठी अशा अध्यात्मिक संकल्पांचे पालन करून त्याला वळण लावणे हा या संकल्पांमागचा हेतू.


परम पूजनीय ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज संकल्पांविषयी म्हणतात "संकल्प छोटा असला तरी चालेल पण तो रोज पाळता येईल असा, शाश्वताचा असावा. सातत्याला इथे फ़ार महत्व आहे." आपले मन हे आजवरच्या आपल्या कर्मांमुळे एखाद्या कठीण दगडासारखे झालेले आहे. त्या दगडावर थेंबथेंबच का होईना पण सातत्याने पाणी पडत गेले तर काही कालावधीत त्या दगडाला वेगळा आकार प्राप्त होईल पण हेच लाखो लिटर पाणी एकदमच त्या दगडावर ओतले तर तो दगड काही काळ ओला होईल पण पाणी वाहून गेल्यानंतर पुन्हा कोरडाच्या कोरडा. म्हणून एखादी गोष्ट सतत करत राहण्याला महत्व.


परम पूजनीय ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज या संकल्पांविषयी पुढे असेही म्हणतात "चातुर्मासात कांदा लसूण खाणार नाही हा शारिरीक तपाचा संकल्प तर महत्वाचा आहेच पण त्याहूनही महत्वाचा संकल्प म्हणजे चातुर्मासात मी कुणाचे मन दुखावणार नाही असा मानसिक तपाचा असू शकतो." हा मानसिक तपाचा संकल्प वरवर पाहता सोपा वाटतो खरा पण तो पालन करण्यास अत्यंत अवघड असा आहे. त्यासाठी संपूर्ण चातुर्मास आपल्याला आपले मन सजग ठेवावे लागेल आणि सतत ते मन विविध कसोट्यांवर घासून बघावे लागेल. या चातुर्मासात देवशयनी एकादशी (आषाढी एकादशी) ला देव झोपी जातात आणि थेट उत्थापिनी एकादशी (कार्तिकी एकादशी) ला देव त्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात अशी मान्यता आहे. अशावेळी आपण मनुष्यमात्रांचे मन कायम जागृत रहायला हवे म्हणून ते मानसिक तपाचे संकल्प.


या संकल्पांमध्ये "मी कुणाचीही निंदा नालस्ती करणार नाही." हा सुद्धा एक चांगला आणि तितकाच पाळायला कठीण असा मानसिक तपाचा संकल्प आहे. रोजच्या आयुष्यात इतरांच्या बद्दल आपण न्यायाधीश होण्याचे इतके प्रसंग येतात की असे एखाद्याबद्दल टीकाटिप्पणी न करता राहू शकणे ही अशक्य गोष्ट वाटते. पण परम पूजनीय ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज महाराज म्हणतात "अशी एखाद्याची निंदा करणे आवडणे म्हणजे शेण खाणे आवडण्यासारखे आहे." निंदानालस्तीचा अध्यात्मिक फ़टका फ़ार जोरदार बसतो आणि मुख्य म्हणजे आपल्याला तो कधीच कळत नाही. 


अशा संकल्पांमध्ये "मी कायिक वाचिक मानसिक हिंसा करणार नाही. समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करेन. त्या व्यक्तीने केलेली एखादी कृती मला कितीही न आवडणारी असली तरी ती त्याने मुद्दाम केलीय की त्याच्याकडून अनवधानाने झाली याचा विचार मी करेन." हा संकल्पसुद्धा जगातला किती ताप, संताप दूर करणारा ठरेल याचा विचार करा. आपण सर्वसामान्य प्रापंचिक माणसे. आपल्या आयुष्यातले जास्तीत जास्त ताप हे आपल्याच विचारांमुळे उत्पन्न होत असतात आणि त्यावरअधिकाधिक प्रतिक्रिया देऊन देऊन आपणच हे खूप मोठे करीत असतो. त्यापेक्षा या सांसारिक तापांवर या छोट्याच मानसिक तपाचा उपचार केला तर आपण सुखी राहू शकू असे नाही का वाटत ?


बरे आपण अशा मानसिक तपांना, संकल्पांना आजपासून सुरूवात केली तरी मानवी मन इतके विचित्र आहे की या तपाचा प्रभाव तत्काळ दिसावा अशी इच्छा ते करते. रोज रोज त्या तपाचा प्रभाव किती झाली याची परिक्षा घेण्याची आपल्याला इच्छा होते. अशावेळी श्रीदत्तसंप्रदायातील एक सत्पुरूष परम पूजनीय श्रीकृष्णदास आगाशे काका काय म्हणतात हे आपण पक्के ध्यानात ठेवलेच पाहिजे. आगाशे काका म्हणतात "एखादे बी आपण जमिनीत पेरले आणि झाड उगवण्याची वाट बघू लागलो तरी ते बीज फ़ळायला, अंकुरायला त्याला हवा तितका वेळ आपण द्यायलाच हवा. ताबडतोब ते झाड मोठे व्हावे हा अट्टाहास चुकीचा आहे आणि रोज ते झाड किती मोठे झाले हे जर आपण त्या पेरलेल्या जागेवर पुन्हा पुन्हा खणून बघू लागलोत तर ते झाड कधी रूजणारच नाही मग ते मोठे होण्याचा प्रश्नच नाही." तसेच आपल्या संकल्पाचे होईल. म्हणून आपल्या संकल्पाला किती फ़ळ आले याची लगोलग परिक्षा करीत बसून नये. आपण नेमाने ही मानसिक तपे आचरत गेलो तर आपल्या व्यक्तीमत्वातला फ़रक हा आपल्या सहवासातील इतरांना योग्य काळानंतर जाणवेल. तो जाणवून देण्याची घाई नसावी. संकल्पाचा अनुभव घेण्याची घाई नसावी. जगातले ताप संताप भगवंत जेव्हा दूर करतील तेव्हा करू देत पण आज माझ्या आतला ताप संताप माझ्या आतला भगवंत दूर करतोय का  हा अत्यंत गूढ, गुह्य आत्मिक अनुभव माझा मलाच घेणे आवश्यक आहे ही भावना असावी. आणि प्रत्येकाने हा विचार केला तर जगातले सगळे ताप संताप दूर होण्यासाठी भगवंताला अवतार घेण्याचीही गरज नाही.


मग करायची आजपासून ही सुरूवात ? अत्यंत सात्विक भावाने, वृत्तीने, केवळ भगवंतासाठी सोडायचे हे संकल्प ? असे भगवंतासाठी संकल्प सोडलेत तर त्याच्या फ़ळांची आस आपल्याला लागत नाही. घेता देता तोच आहे. त्याच्या मनाला वाटेल आणि माझे पूर्वकर्म जसे असतील त्याप्रमाणे, त्यावेळी तो मला फ़ळ निश्चित देईल. त्यावर माझा अधिकार नाही ही भावना मनात असली की मोकळेपणाने, मुक्त मनाने संकल्प आचरता येतील.


आपणा सर्वांना चातुर्मास संकल्प घेण्यासाठी आणि निष्काम आचरणासाठी अगदी मनापासून शुभेच्छा.


- आपल्या सर्वांच्या कृपेचा अभिलाषी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Saturday, July 13, 2024

बसफ़ॅनिंग: एक वेगळाच सूक्ष्म पैलू

आमचे बसफ़ॅनिंग आमच्या अगदी बालपणी नागपूर ते चंद्रपूर एस टी प्रवासादरम्यान सुरू झाले. अगदी पहिल्या वर्गात अक्षरओळख नुकतीच झालेली असताना आजोळी चंद्रपूरला जातानाच्या प्रवासात माझ्या वडीलांनी एस. टी. च्या बसगाड्यांवर लिहील्या जाणा-या म. का. दा. (मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी), म. का. चि. (मध्यवर्ती कार्यशाळा चिकलठाणा) आणि म. का. ना. (मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर) हे अर्थ उलगडवून दाखवत प्रत्येक बस वेगळी असते ही दृष्टी आम्हाला दिली. मग यवतमाळ विभागातल्या डेपोंच्या बसेसचे फ़िकट निळ्या रंगात रंगवलेले ग्रिल्स, पुढचे बंपर आणि कधीकधी खिडक्यासुद्धा. चंद्रपूर विभागातल्या डेपोंच्या बसेसचे काळपट पिवळ्या ( Yello Ochre) रंगात रंगविलेले ग्रिल्स आणि पुढले बंपर्स, अकोला विभागातल्या डेपोंच्या बसेसना काळ्या ग्रिल्सभोवती दिलेली पांढरी बॉर्डर तर भंडारा विभागासाठी हीच बॉर्डर पिवळ्या रंगात हे बारकावे लक्षात घेऊन त्या त्या विभागाच्या बसेस ओळखणे आणि साधारण वेळ लक्षात घेऊन ती नक्की कुठली बस असेल ? याचा अचूक अंदाज बांधणे यात आम्ही प्रवीण झालो आणि नातेवाईक, मित्रमंडळींमधे भाव खाऊ लागलोत.


पाचव्या वर्गापासून इंग्रजीची तोडओळख झाली आणि मग हळूहळू ज्या बसने जातोय तिचा नंबर, तिचा चेसिस नंबर आदि डिटेल्स जमविण्याचा छंद लागला. मी पाचवीत असताना आम्ही नंदनवन येथे रहायला गेलो आणी महाल विभागात असलेल्या आमच्या  शाळेत जाण्यायेण्यासाठी पाचवीपासून शहर बस सेवेने जाणे येणे होऊ लागले. मग रोजची बसची तिकीटे जमविण्याचा छंद लागला, ती तिकीटेही नुसती जमवायची नाहीत तर तिकीटांच्या मागील मोकळ्या जागेत प्रवासाचा दिनांक, बस नं, प्रवास कुठून कुठे, बस शहर बस सेवेतली कुठल्या नंबरची सेवा होती ? कुठून कुठे जात होती हा सगळा तपशील लिहून ठेवणे सुरू झाले. तदनुषंगाने ही तिकीटे जपून ठेवणे, महिनावार, वर्षवार नीट जतन करून लावून ठेवणे वगैरे कामे आलीच. 






नागपूर आणि परिसरात त्याकाळी टाटा बसेसचेच प्राबल्य होते. शहर बस सेवेतही सगळ्या टाटाच्याच बसेस. त्याकाळी टाटाच्या चेसिस जमशेदपूर आणि पुण्याच्या टेल्को प्लॅंट मध्ये तयार व्हायच्यात. त्या एस. टी. च्या महाराष्ट्रातल्या तीनही कार्यशाळांमध्ये जायच्यात आणि त्यांच्यावर बसबांधणी व्हायची. टेल्कोचा पंतनगरचा प्लॅंट तेव्हा सुरू व्हायचा होता. सगळ्या चेसिस एकतर जमशेदपूर किंवा पुण्यावरून यायच्यात. बाय द वे इतक्या वर्षांनंतरही महाराष्ट्र एस. टी. आपल्या बहुतांशी बसगाड्यांचा ताफ़ा चेसेस मागवूनच आपल्या मध्यवर्ती कार्यशाळांमध्ये बांधून घेते. गोव्यातल्या टाटा ए.सी.जी.एल. किंवा हुबळी इथल्या टाटा मार्कोपोलोने बांधलेल्या तयार बसगाड्या घेत नाही.


बसमध्ये बसल्यावर ड्रायव्हर काकांमागे त्याकाळच्या बसेसमध्ये असलेल्या आडव्या बाकड्यावर उलटे (केबिनमधून बसच्या दिशेकडे तोंड करीत) बसून प्रवास करणे हा तर त्याकाळच्या सगळ्याच बाळगोपाळांचा छंद असायचा. आमचाही होता. आम्ही आमच्या शोधक नजरेने बसच्या केबिनमधली एंजिनवरची "मेकर्स प्लेट" पाहून ती चेसिस जमशेदपूरवरून आलीय की पुण्यावरून आलीय हे शोधण्याचाही छंद आमच्या बसफ़ॅनिंगमध्ये सामील झाला. आत केबिनमध्ये तर मूळ चेसिसवर पोपटी किंवा चटणी रंग असायचा पण खाली उतरून चाकांच्या वर असलेल्या फ़ेंडर्सच्या आत थोडे डोकावत ती चेसिस मूळ केशरी रंगाची आहे की पिवळ्या रंगाची हे पण नोंदणे सुरू झाले. मग त्या प्रवासाच्या तिकीटांवर त्या चेसिसच्या मूळ रंगाची नोंदणीही ओघाओघाने आलीच. 


अजून एक गोष्ट लक्षात आली की केशरी चेसिस सगळ्या जमशेदपूरच्या असतात तर पिवळ्या रंगाच्या चेसिस पुण्याच्या.



आज आमच्या एका बसफ़ॅन ग्रूपवर ह्या केशरी चेसिसचा फ़ोटो दिसला आणि मन एकदम चाळीस वर्षे मागे गेले.


- बस आणि रेल्वेवर मनापासून प्रेम करणारा, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.