श्रीमदभागवत या ग्रंथ पठनाने, श्रवणाने किंवा नुसत्या मननानेही सर्व मनुष्य मात्रांना अत्यंत शुद्ध, विमल आणि जीवनाचे सत्य उलगडून सांगणारे ज्ञान प्राप्त होते हे आपण श्रीमदभागवताच्या फ़लश्रृतीत बघितले. केवळ सर्वसामान्य मनुष्यच नाही तर जीवनभर केलेल्या अनेक चुकीच्या कर्मांमुळे मरणानंतर प्रेत योनीसारखी अत्यंत हीन योनी पावलेल्या धुंधुकारी्ला सुद्धा या ग्रंथ श्रवणाने प्राप्त कशी झाली हे आपण थोडक्यात बघू आणि त्याचा आपल्यासाठी काय संदेश आहे यावर आजचे चिंतन करू.
आत्मदेव आणि धुंधुली या दांपत्याला पुत्रप्राप्तीसाठी प्राप्त झालेल्या वराची धुंधुली आपल्या तामसी स्वभावामुळे अवहेलना करते आणि त्यामुळे तिच्या पोटी जन्मणारा अत्यंत सात्विक पुत्र, गोकर्ण, दुस-याच कुणाच्या तरी पोटी जन्म घेतो. इकडे धुंधुली ही आपल्या सख्ख्या बहिणीच्या अत्यंत चुकीच्या कर्मांमधून उत्पन्न झालेल्या पुत्राला, धुंधुकारीला दत्तक घेते.
काळाच्या ओघात आत्मदेव आणि धुंधुली दोघेही देहातून पंचत्व पावतात. अत्यंत तामसी कृत्यातून जन्म झालेला असल्याने धुंधुकारी हा आपल्या बेताल आणि अत्यंत उच्छृंखल वागण्याने जिवंतपणीच आपल्या मायबापांना मरणप्राय वेदना देतो. आणि मायबापांच्या मृत्यूनंतर तर मग त्याला कसलाही धरबंध उरत नाही. खाओ, पियो और ऐश करो याचा तो अगदी अतिरेक करतो. आपली वर्णाश्रमकर्मे, कर्तव्यकर्मे सगळी तो अगदी खुंटीवर टांगून ठेवतो.
त्याच्या या अत्यंत बेबंद, बेताल आणि उच्छृंखल वागण्यामुळे तो सुद्धा अत्यंत वाईट परिस्थितीत पंचत्व पावतो आणि जीवनभर नको नको ती पापकर्मे केल्यामुळे प्रेतयोनीला प्राप्त होतो आणि तिथे गेल्यानंतर मात्र त्याला पश्चाताप होतो. आपण मनुष्य योनीत असताना काय करायला हवे होते आणि काय करायला नको होते याची जाणीव त्याला प्रेत योनीत होते आणि आता आपण यातून बाहेर पडून ईश्वरी रूपाला कसे प्राप्त होऊ याची खरी तळमळ त्या धुंधुकारीला लागते.
याउलट अत्यंत सात्विक प्रसादामुळे जन्म घेतलेला सात्विक वृत्तीचा गोकर्ण आपल्या या अशा दुराचारी आणि त्यामुळे आता प्रेत योनीला प्राप्त झालेल्या भावाचे श्राद्धादि कर्म गयेसारख्या पवित्र ठिकाणी जाऊन करतो पण गावी परतल्यावर त्याला कळते की इअतक्या पवित्र ठिकाणी यथासांग श्राद्धादि कर्मे करूनही आपल्या भावाला प्रेत योनीतून मुक्ती मिळालेली नाही. मग गावातल्या इतर जाणकार लोकांच्या सल्ल्याने, आपल्या वैयक्तिक उपासनेने तो ही समस्या कशी सोडवायची याचे ज्ञान प्राप्त करून घेतो आणि घरी श्रीमदभागवत सप्ताहाला प्रारंभ करतो.
मनुष्यजन्मात असताना केलेल्या आपल्या कर्मांचा पश्चाताप झालेला आणि आता प्रेत योनीतून बाहेर पडण्याची तळमळ असलेला तो धुंधुकारी सुद्धा सप्ताह श्रवण करण्यासाठी सप्ताहस्थळी येतो. प्रेतयोनीत असलेल्या वायुरूप धुंधुकारीला सप्ताहस्थळी इतरत्र कुठेही न बसता आल्याने तो बसण्यासाठी सात गाठी असलेला एक बांबू निवडतो आणि त्याच्या सगळ्यात खालच्या गाठीत प्रवेश करून कार्यक्रमस्थळी सुरू असलेल्या श्रीमदभागवताचे अत्यंत भक्तीभावाने श्रवण करू लागतो. दरदिवशीचे श्रवण संपले की त्या बांबूची एक एक गाठ फ़ूटत जाते आणि श्रीमदभागवत सप्ताहाच्या सातव्या दिवशी सातही गाठी फ़ुटून धुंधुकारी हा प्रेतयोनीतून मुक्त होतो. त्याला विष्णुलोकात नेण्यासाठी श्रीविष्णुंचे दूत येतात आणि तिथे श्रीमदभागवत सप्ताह श्रवण करण्यासाठी असलेल्या इतर जनांना मोठा विस्मय होतो आणि आनंदही होतो. स्वतःच्या जीवनभर केवळ पापकर्मे केलेल्या इतक्या अनाधिकारी आणि आता प्रेतयोनीत असलेल्या जीवाला विष्णुलोक कसा प्राप्त झाला यावर ते सगळे चिंतन करतात आणि त्यांच्या लक्षात येते की धुंधुकारीने जसा श्रीमदभागवत सप्ताह स्वतःची आसनसिद्धी साधून, एकाग्र मनाने आणि ख-या तळमळीने श्रवण केला तसाच आपण सर्वांनी करायला हवा होता.
आज आपण विचार केला तर आजच्या युगात आपण सगळेच धुंधुकारी झालेलो आहोत. खा, प्या, मौज करा. उद्या कुणी बघितला ? देव, दानव या सगळ्या कल्पना आहेत. समोर दिसतेय, प्रत्ययाला येतेय तेच विश्व खरे या समजुतीत आपण वावरत आहोत. पाप आणि पुण्याच्या आपल्या कल्पनांना सुद्धा आपण आपल्या सोयीप्रमाणे आपल्याला भावेल ते स्वरूप दिलेय. आपली शास्त्रे, धर्मग्रंथ याबाबतीत काय म्हणताहेत याकडे थोडेसुद्धा लक्ष द्यायला आपल्याला वेळ नाही. रोजचे जीवन जगण्याचा संघर्ष आपण आपलाच फ़ार मोठा आणि अकारण क्लिष्ट करून ठेवलाय. अशात मृत्यूश्चात आपली अवस्था धुंधुकारीसारखीच होणार हे निश्चित आहे. आपल्याला हे कदाचित कळतेय पण त्यावर "शोधू ऐनवेळी उपाय" अशा वृत्तीने आपण आज दुर्लक्ष करतोय.
धुंधुकारीला त्या अवस्थेतून बाहेर काढायला त्याकाळी गोकर्णासारखा अधिकारी, धर्म जाणणारा आणि सात्विक भाऊ होता. त्याने आपल्या भावाच्या मुक्तीसाठी प्रयत्न केलेत. आपल्याला जर अशी प्रेत योनी प्राप्त झाली तर त्यातून आपली सुटका करणारा आजच्या युगात गोकर्ण कुणीही नाही. आपल्या मागेपुढे सगळेच धुंधुकारी. सगळेच त्या प्रेतयोनीत येणार.
मग मरणोपरांत चांगल्या गतीसाठी, आपल्या मुक्तीसाठी, आपल्यालाही विष्णुलोक प्राप्त करून देण्यासाठी या कलियुगात उत्तम उपाय म्हणजे श्रीमदभागवत कथा. मग ही कथा कशी श्रवण करायची ? ही कथा श्रवण करताना धुंधुकारीसारखी आपली आसनसिद्धी साधल्या गेली पाहिजे. दररोज एका आसनावर, एका विशिष्ट वेळी ही साधना झाली पाहिजे. आजच्या आधुनिक युगात आपले मॅनेजमेंट गुरू मंडळी आपल्याला "Time and Place Habit" सांगतात ती हीच. श्रीमदभागवत श्रवण मननाची विशिष्ट वेळ, विशिष्ट जागा याबाबत आपण आपल्या मनातूनच आग्रही असायला हवे आणि तशी शिस्त लागायला हवी.
धुंधुकारीला त्या प्रेतयोनीतून बाहेर येण्यासाठी जशी तळमळ लागली होती तशी आपल्याला आपल्या सध्याच्या भौतिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्थितीतून बाहेर येण्यासाठी तळमळ लागायला हवी. श्रीमदभागवतात विशद केलेले विशुद्ध ज्ञान जाणून घेण्याची तळमळ लागायला हवी. आणि हेच श्रवण, पठन आणि मनन आपल्याला सध्याच्या स्थितीतून अधिक उन्नत करेल याबाबत मनात अगदी दृढ विश्वास असायला हवा. तरच आपण श्रीमदभागवत सप्ताहाच्या फ़ळांचे अधिकारी बनू.
यात आणखी एक दृष्टीकोन आहे. सध्या पृथीतलावरील ज्या व्यक्तींना त्यांच्या सध्याचा सामाजिक, आर्थिक किंवा मानसिक स्थितीमुळे श्रीमदभागवत श्रवणाचा लाभ मिळत नाही, अशा व्यक्तींना जाणून त्यांना आपण आवर्जून श्रीमदभागवत कथेच्या श्रवणाचा लाभ करून द्यायला हवा. याबाबत आपण धुंधुकारीच्या भावाची, गोकर्णाची भूमिका बजावायला हवी. जी मंडळी सात्विक आचरणाची आहेत ती सगळी तर या श्रीमदभागवत श्रवणाचा, मननाचा आस्वाद घेतीलच पण या जगाच्या बाह्यरूपातच अडकलेल्या अत्यंत अनाधिकारी व्यक्तीने हे श्रीमदभागवत श्रवण करणे खूप आवश्यक आहे हे आपल्यातल्या सगळ्या सज्जन सात्विक गोकर्णांनी जाणले पाहिजे आणि तशी तजवीज केली पाहिजे.
॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥
- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" ज्येष्ठ वद्य षष्ठी शके १९४८ दिनांक ६ / ७ / २०२६
६ जुलै २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#जुलै२०२६

