Monday, March 23, 2026

पाहता पाहता स्वतःतले झालेले बदल. Change and Transition.

फ़ार फ़ार पूर्वी वर्तमानपत्रांमध्ये, मासिकांमध्ये "हे चित्र पहा आणि ते चित्र पहा" अशा आकाराची सदरे असायचीत. आज अचानक हे आठवायचे कारण म्हणजे आपल्याही आयुष्यात अशी आपलीच चित्रे, आपल्याच काहीकाही सवयी पाहता पाहता बदलत जातात पण पाहता पाहता दिसत मात्र नाहीत. त्या सवयी का आणि कशा बदलल्यात ? याचा शोध घेणे आपले आपल्यालाच अवघड जाते.


काल हातरूमालांना इस्त्री करत बसलो होतो. शनिवार - रविवार अशी लागून सुट्टी आली की त्या पंधरवाड्यात धुतल्या गेलेल्या हातरूमालांना घरच्या घरी इस्त्री करून ते पुढल्या पंधरा दिवसांसाठी नीट रचून ठेवायचे हा माझा गेल्या अनेक वर्षांचा शिरस्ता. ते इस्त्री करतानाच त्यावर थोडे यु डी कोलन शिंपडायचे म्हणजे पुढल्या पंधरा वीस दिवसभरात तो हातरूमाल वापरताना त्या मंद सुगंधाने मन उल्हसित आणि प्रसन्न राहते हा माझा अनुभव. घरच्या घरी अशी इस्त्री केल्यामुळे ते हातरूमाल इस्त्री करताना मनाला काहीतरी विधायक आणि प्रसन्न करणारे कार्य केल्याची सुखद भावना जाणवत राहते ती निराळीच.


काल लक्षात आले की माझ्याजवळ सध्या असलेले सगळे हातरूमाल एकजात पांढ-या रंगाचेच आहेत. त्यावर इतर रंगांची हलकी बॉर्डर वगैरे आहे पण रंग पांढराच. एकेकाळी माझ्याकडे निळे, तांबडे, हिरवे हातरूमाल असायचे. फ़ार फ़ार पूर्वी. मी शिकत असताना. आणि ते घेताना पण ते अगदी कॉटनचेच असावेत हा माझा अट्टाहास नसायचा. अगदी टेरीकॉट, टेरेलीनचे रूमाल पण मी वापरले असल्याचे मला स्मरले. त्या काळापासून ते आज फ़क्त कॉटनचेच आणि त्यातही तलम खादीचे आणि फ़क्त पांढ-या रंगांचेच हातरूमाल वापरण्यातला बदल माझ्यात कधी घडला ? हे माझे मलाच उमगेना.



आणखी एक बदल माझ्यात घडल्याचे मला जाणवले. पूर्वी बाहेरून घरी आलो की दिवसभर घातलेली ट्राऊझर मी त्यातल्या हातरूमालासकट खुंटीला टांगून ठेवत असे. दोन तीन दिवसांनी मग दोन तीन ट्राऊझर्स धुण्यासाठी बादलीत सर्फ़चे पाणी करून त्यात बुडवल्या जात असत. खिशातले रूमाल तसेच असत. मग ती ट्राऊझर धुताना त्यातला रूमाल बाजूला काढल्या जात असे आणि तो धुतल्या जात असे. आजकाल गेल्या पंचवीस वर्षात मात्र रोज बाहेरून आलो की पहिल्यांदा ट्राऊझरमधला हातरूमाल बाहेर काढून तो धुण्याच्या कपड्यांच्या बास्केटमध्ये टाकला जातोय. हा बदल माझ्यात कधी आणि केव्हापासून झाला ? हे सुद्धा मला आता आठवेनासे झाले आहे. 


माझे लग्न झाले तेव्हा माझ्या लक्षात आले आणि पाहून अगदी आनंद झाला होता की माझी सौभाग्यवती ही माझ्याइतकीच किंवा माझ्याहून थोडी सरसच नीटनेटकेपणा आणि टापटिपीची होती. वस्तूंचे बोळे करून इकडे तिकडे टाकून देणे, कुठल्या एका वस्तूला किंवा एखाद्या प्रक्रियेला निश्चित अशी SOP नसणे हे तिच्याबाबतीत शक्यच नव्हते. मलासुद्धा तशीच जीवनसाथी हवी होती. मग माझ्या आयुष्यात रूमालांच्या बाबतीतले हे बदल तिने घडवून आणलेत का ?


तशी शक्यता आहे. पण तिच्या मुळातच ऋजू स्वभावाला कुणावर असा अधिकार गाजवणे, हुकूमशाही करणे, दंडेलीने वागणे मान्यच नव्हते. आमच्या मुलीला पण तिने ज्या सवयी लावल्यात त्या अत्यंत गोड बोलून, समजावणीने. आणि एकदम माझ्या लक्षात आले की तिने असेच हळूवारपणे माझ्या व्यक्तीमत्वातही असे अनेक बदल हळूहळू घडवून आणले असतील. त्या हळूवारपणामुळे ते नक्की कधी झालेत हे आठवत नाहीत. पण आता हाडीमासी रूजलेत. 


"Transition is a gradual Change and Change is a sudden Transition" असे म्हणतात त्याचा असा प्रत्यय आला. चिरकाल टिकणारे बदल असे हळूवारपणे, मनापासून व्हावे लागतात.


- आपल्या जीवनसंगिनीबाबत कायम कृतज्ञ असलेला आणि पुढल्या अनेक जन्मांमध्ये (असलेच तर) हीच जीवनसंगिनी मला मिळावी अशी आर्त प्रार्थना परमेश्वराकडे करणारा एक नीट आणि व्यवस्थित (आजच्या जेन झी च्या भाषेत "Sorted") गृहस्थ, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


Tuesday, March 3, 2026

हेड ऑफ़िसची बस

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मुख्यालय मुंबई सेंट्रल इथे आहे.


मुंबई सेंट्रल डेपोच्या गाडीला आमच्या बसफ़ॅन्समध्ये "हेड ऑफ़िसची गाडी" असे संबोधले जाते.





गणपतीपुळे निम आराम मुंबई


मार्गे रत्नागिरी - चिपळूण - महाड - माणगाव - पेण - पनवेल 


अशोक लेलॅण्ड चित्ता मॉडेल


MH 20 / D 9427


मुं. मुंबई आगार


BS II उत्सर्जन मानकांनुसार बांधलेली निम आराम बस. 


2 बाय 2 आसनव्यवस्था. एकूण 45 आसने.

 

मध्यवर्ती कार्यशाळा चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर येथे बांधलेली बस. MH 20 / D सिरीज ही संपूर्ण महाराष्ट्रात अगदी आगळीवेगळी आहे कारण MH 20 / D 0001 पासून MH 20 / D 9999 पर्यंत सगळ्या गाड्या एस. टी. च्याच मालकीच्या आहेत. ही सिरीज छत्रपती संभाजीनगर च्या आर. टी. ओ. ने इतर कुठल्याही वाहनांना दिली नव्हती.


या D गॅंगच्या गाड्यांच्या दरा-यावर मी यापूर्वी इथे एक लेख लिहीलेला होता.





मुंबई विभागाच्या एस. टी. बसेसवर मराठीतल्या अतिशय सुंदर फ़ॉन्टने मुं. मुंबई किंवा विभागातल्या इतर डेपोंची नावे लिहीली जायचीत. I am simply in love with that font.


गणपतीपुळे बस पार्किंग

20/02/2009



- एस. टी. नामक प्रेयसीच्या प्रेमातच असल्याने तिची कुठलीही अदा सुंदरच वाटणारा एक आशिक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


Sunday, March 1, 2026

चला देवदर्शनाला, पर्यटनाला

पणजी गोवा पूर्णपणे पर्यटनस्थळ आहे. गणपतीपुळे सुद्धा काही मंडळींसाठी पर्यटन स्थळ असेल पण माझ्यासाठी हे एक धार्मिक स्थळ आहे. इथला गणपती लोभसवाणा आहे. अगदी पहिल्या दर्शनात आपलेसे करणारा आहे.


आपली महाराष्ट्र एस. टी. प्रवाशांना देवदर्शनासाठी आणि पर्यटनासाठी नेण्यास कायम सज्ज असते.



पणजी निम आराम गणपतीपुळे

मार्गे म्हापसा - पत्रादेवी - सावंतवाडी - कणकवली - राजापूर

MH - 12 / EF 6344

TATA 1510 Cummins, BS II bus

मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी यांनी बांधलेली निम आराम बस.

सिं. सावंतवाडी आगार.

काहीही म्हणा. या निम आराम गाड्यांची शान काही वेगळीच होती.

सावंतवाडी आगार हे मुख्यतः अशोक लेलॅण्ड गाड्यांचे म्हणून ओळखले जाते. त्यात त्यांच्या ताफ़्यात ही टाटाची सुंदरी फ़ार दुर्मिळ होती. म्हणूनच हे प्रकाशचित्र एक विशेष महत्व राखून आहे. 

गणपतीपुळे बस पार्किंग

20/02/2009


Monday, January 26, 2026

मराठी छापील मिडीया जात्यात मराठी इलेक्ट्रॉनिक मिडीया सुपात

माझ्या मागील एका लेखात मी माझ्या वृत्तपत्रीय जीवनाबद्दल लिहीलेले होते. मी दहाव्या, बाराव्या वर्गात असल्यापासूनच हे वृत्तपत्रीय लेखन करतो आहे. त्याबद्दलचा लेख इथे. हा लेख लिहूनसुद्धा आज तब्बल १० वर्षे झालीत. पण मधल्या काळाचे अवलोकन सूक्ष्म दृष्टीने केल्यास मलाच हा प्रश्न पडला की आजच्या युगात वृत्तपत्रे किंवा एकंदरच छापील मिडीया हा कालबाह्य झालाय का ? आणि याला जबाबदार घटक कोण कोण आहेत ?


आमचे घर वाचनवेडे. आमच्या वडिलांकडून आम्ही हा उदंड वाचनाचा वारसा घेतला. सकाळी सकाळी पहिल्या चहासोबत त्यांना वर्तमानपत्र वाचायला हवे असायचे. मग जो वृत्तपत्रविक्रेता सकाळी ६ ते ६.१५ च्या आसपास घरी वर्तमानपत्र आणून देईल त्याची निवड व्हायची. एखाद्या दिवशी त्याने थोडा जरी उशीर केला तरी त्याला आमच्या दादांची बोलणी ऐकून घ्यावी लागायची. माझे वडील वर्तमानपत्र संपूर्ण म्हणजे अगदी संपूर्ण वाचायचेत. आणि आम्हालाही त्यांनी तशा सवयी लावल्यात.


बरे घरी त्याकाळी रोजचा तरूण भारत तर यायचाच. सोबत दर रविवारी मुंबई रविवार सकाळ, लोकसत्ता, मटा वगैरे दैनिके सुद्धा यायचीत. अर्थात ही सगळी वृत्तपत्रे त्याकाळी फ़ार दर्जेदार लिखाण घेऊन यायचीत. अतिशय दर्जेदार साहित्यिक संपादकवर्ग या सर्व दैनिकांना लाभलेला होता. यामुळे आमचे वाचन समृद्ध होत गेले.


आम्ही यु पी एस सी चा अभ्यास करीत असताना नागपूरला बर्डीवर खुराणा बुक स्टॉलवरून दररोज संध्याकाळी जाऊन मुंबईवरून गीतांजली एक्सप्रेसने येणारा टाईम्स ऑफ़ इंडिया वाचनासाठी आणत असू. श्री खुराणाजी आम्हाला यु पी एस सी  सिव्हील सर्व्हिसेसचे अभ्यासक विद्यार्थी म्हणून ओळखत आणि आमच्यासाठी खास चेन्नईवरून द हिंदू हे वर्तमानपत्र मागवीत असत. जे एन यू छाप डाव्या विचारवंतांचा यु पी एस सी मध्ये इतका भरणा त्यावेळी होता की पटत नसून सुद्धा रोमिला थापर सारख्यांनी लिहीलेला अजिबात भारतीय नसलेला थापाडा इतिहास आम्हाला भारतीय इतिहास म्हणून अभ्यासावा लागे. द हिंदू या अतिशय हिंदूविरोधी वर्तमानपत्रातली विश्लेषणे टाचण करून ठेवावी लागत कारण यु पी एस सी पास व्हायचे असेल तर याच पद्धतीने व्हावे लागते हे आम्हाला माहिती होते. तिथे थोडेही आपले पांचजन्य चे ज्ञान पाजळले असते तर आम्हाला खड्यासारखे बाजूला केले गेले असते.


जी गत वर्तमानपत्रांची तीच मासिकांची. आमच्याकडे आमच्या बालपणापासून किशोर, अमृत, कुमार ही मासिके यायचीत. सोबतच लोकप्रभा सारखी साप्ताहिके सुद्धा यायचीत. चित्रलेखा आणि सकाळ साप्ताहिके सुद्धा आमच्याकडे दर शनिवारी आमचे दादा आणायचेत. या सर्व साप्ताहिकांचे, नियतकालिकांचे, वर्तमानपत्रांचे दिवाळी अंकही आमच्याकडे आवर्जून यायचेत. आम्हाला ह्या सर्व वाचनात एक विशिष्ट वाचनानंद मिळायचा. मन तृप्त व्हायचे, मेंदू तल्लख व्हायचा. त्याकाळी काही काही मासिके तर घरच्या कुठल्या तरी बजेटमध्ये काटछाट करून दादांना घरी आणावी लागायचीत. पण तरीही एक वाचनाचे समाधान होते.


पण एका विशिष्ट कालावधीनंतर हळूहळू ही वर्तमानपत्रे, नियतकालिके प्रचारकी थाटाची होत गेलीत. तोपर्यंत एलेक्ट्रॉनिक मिडीयाने सुद्धा आपला जम बसवला होता. बातम्या दिवसभर ताज्या आणि "सबसे तेज" कळू लागल्यात, बातम्यांसाठी वृत्तपत्रांची वाट बघणे संपले. तरीही वृत्तपत्रे आपला जम टिकवून होती कारण बातम्या जरी कळल्यात तरी त्यामागील संपादकीय दृष्टीकोन काय आहे ? हे वाचण्याची उत्सुकता असायची. नागपूर तरूण भारत ने आपला हा वाचकवर्ग आजही टिकून ठेवलाय त्याचे एकमात्र कारण हेच आहे. एखाद्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घटनेची फ़ोड कशी करायची याबाबत संपादकीय विद्वत्तेची लोकांना गरज असायची. पण २०१२ च्या आसपास फ़ेसबुक , व्हॉटस ॲप, यू ट्यूब वगैरे समाज माध्यमे वाढलीत आणि त्यावर ही विश्लेषणे अनेक दृष्टीकोनातून प्रसिद्ध होऊ लागलीत. त्यामुळे संपादकीय प्रचारकीपणा, पेड न्यूज वगैरे प्रकार जनतेच्या ध्यानात येऊ लागलेत आणि छापील माध्यमांची विश्वासार्हता धोक्यात येऊ लागली. संपादकीय मतांमागची पक्षीय लबाडी लोकांच्या ध्यानात चटकन येऊ लागली. आज सर्वच वर्तमानपत्रांचा खप कमालीचा खालावलाय. वर्षभर अगदी रद्दीच्या किंमतीत देऊन, सोबत विविध गृहपयोगी वस्तू देऊनही हा खप फ़ारसा वाढत का नाही ? याचे आत्मचिंतन जर या मराठी वृत्तपत्रांनी आणि एकंदरच छापील माध्यमांनी केले तर त्यांना आपली चूक लक्षात येईल पण आता वेळ निघून गेलेली आहे. खूप उशीर झालेला आहे.


२०१९ च्या निवडणुकांनंतच्या प्रचारकी थाटानंतर मराठी इलेक्ट्रॉनिक मिडीयाची लबाडी सुद्धा लोकांच्या लक्षात येऊ लागली. बातम्या आणि त्यांचे विश्लेषण लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या नावाखाली सर्व मराठी इलेक्ट्रॉनिक मेडीया त्यांचा आपला आपला एक नॅरेटिव्ह आपल्या मनात पसरवतोय हे लोकांना हळूहळू कळायला लागले. त्यासाठी हा मराठी इलेक्ट्रॉनिक मेडीया स्वतः मात्र भरभक्कम पैसे घेतोय हे ही लोकांना कळू लागलेय. बरोबर आहे हो. "ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी" हे त्यांना अगदी बालपणापासून माहिती आहे ना. पण या सगळ्या उपदव्यापात,आपण अव्यापारेषू व्यापार करून ज्या फ़ांदीवर बसलोय तीच तोडतोय हे त्यांच्या ध्यानात आलेच नाही.


काल मराठी छापील मिडीया सुपात होता आज जात्यात आहे पण आजचा मराठी इलेक्ट्रॉनिक मिडीया सुपात आहे हे त्यांच्या अजूनही लक्षात आलेले नाही. आपले निरपेक्षत्व जपले पाहिजे, आपण हा लोकशाहीचे पाचवे स्तंभ आहोत आपण लोकांच्या न्याय्य हक्कांचे रक्षण केले पाहिजे, नुसते ब्रेकिंग न्यूजच्या मागे लागून स्वतःचा नाश करून घेऊ नये हे कळायला या इलेक्ट्रॉनिक मिडीयाची सदसदविवेकबुद्धी तर जागृत हवी ना ? मराठी छापील मिडीया जात्यातून सुपात जायला आणि कालबाह्य व्हायला जवळपास तीस वर्षे लागलीत. मराठी इलेक्ट्रॉनिक मिडीया तर पुढल्या पाचच वर्षात असा जात्यातून सुपात जाईल आणि भरडला जाऊन निःशेष होईल अशी माझी खात्री आहे. 


- मराठी छापील मिडीया आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा परखड विश्लेषक आणि एकेकाळी मास कम्युनिकेशनला प्रवेश घेऊन पत्रकारिता करण्याचे निश्चित केलेला एक होता होता राहिलेला पत्रकार, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


२४ जानेवारी २०२६


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६



Saturday, January 24, 2026

दक्षिण दिग्विजय : ५ सुचिंद्रम आणि मेणपुतळ्यांचे संग्रहालय

 यापूर्वीचे भाग इथे  वाचा

दक्षिण दिग्विजय : भाग १ नागपूर ते चेन्नई

दक्षिण दिग्विजय : २ (चेन्नई ते मदुराई)

दक्षिण दिग्विजय : ३ (मदुराई - रामेश्वरम - मदुराई - कन्याकुमारी.)

रेल्वेच्या एका दुर्मिळ वर्गातून प्रवास.

दक्षिण दिग्विजय : ४ कन्याकुमारी - सूर्योदय


२ / १२ / २००८

ठरविल्याप्रमाणे ते टॅक्सीवाले बंधू सकाळी ८ च्या सुमारास आमच्या हॉटेलसमोर आलेत. मस्त प्रशस्त ॲंबेसेडर टॅक्सीत बसून आमचे कन्याकुमारी दर्शन सुरू झाले. ते बंधू आम्हाला कन्याकुमारीपासून जवळपास १५ किलोमीटर असलेल्या सुचिंद्रम मंदिरात घेऊन गेलेत. दक्षिण भारतातल्या अनेक सुंदर मंदिरांसारखे एक सुंदर, स्वच्छ आणि नेटके मंदिर. मंदिरालगत मोठी पुष्करिणी होती. हनुमंताने लंका जाळून परत भारतभूमीकडे उड्डाण केल्यानंतर आपले जळालेले पुच्छ याच पुष्करिणीत विझवले अशी येथे मान्यता आहे. ज्या ठिकाणी आपण पर्यटनाला जातो तेथील मान्यता समजून घेण्यात, मान्य करण्यात शहाणपणा असतो असे मी कायम मानत आलेलो आहे. त्यामुळे हंपीत गेल्यावर हनुमंताचे जन्मगाव तिथल्याच एखाद्या पर्वतरांगांवर आहे आणि नाशिकजवळील अंजनेरी पर्वतावर पण हनुमंताचे जन्मस्थान आहे या दोन्हीही समजूती मला मान्य असतात. नक्की ठिकाण कुठले ? याच्या वादात पडून आपली प्रखर मते मांडण्यापेक्षा श्रीरामकथेने भारतवर्ष अगदी अयोध्येपासून रामटेक - नाशिक - किष्कींधा (हंपी) - सुचिंद्रम - श्रीलंका कसे बांधले गेलेले आहे, कसे भारले गेलेले आहे हे अनुभवण्यात मला धन्यता असते. या मंदिरात हनुमंताचा विशालकाय असा विग्रह आहे आणि तिथे त्याच्या पुच्छाला भाविकांकडून ज्वलनदाह शांत करण्यासाठी लोणी लावले जात असते. अर्थात तिथे प्रकाशचित्र काढण्यास मनाई असल्याने आम्ही मंदिराच्या आत प्रकाशचित्र काढू शकलो नाही पण तो विशालकाय विग्रह आणि भाविकांचे पाच हजार वर्षांपासूनचे आपल्या भगवंतावरचे प्रेम यापुढे आम्ही नतमस्तक मात्र नक्कीच झालोच.




सुचिंद्रम मंदिराबाहेर दक्षिणेतील इतर सर्व मंदिरांबाहेर असतात तशी हार फ़ुले गज-याची रेलचेल होती. स्वपत्नीसाठी गजरा घेणे झाले. लग्नाचा वाढदिवस होता. मग कन्यारत्नानेही गज-यासाठी हट्ट धरला. तिचाही हट्ट पुरवला गेला. भारतभर आणखी एक साम्य. सर्वत्रच छोट्या छोट्या मुली आपल्या केसांपेक्षा मोठा गजरा माळून त्याला आपल्या केसांपेक्षा चेहे-यावर मिरवण्यात धन्यता मानतात. अगदी बंगाल पासून गुजरात पर्यंत आणि काश्मिर पर्यंत अगदी एकच पॅटर्न. आमचे कन्यारत्न याला अपवाद नव्हते.



बरे ज्या सुचिंद्रम मंदिरात गेलो हे हनुमंताचे मंदिर नाहीच मुळी. ते आहे भगवान शंकराचे मंदिर. भगवान शंकर वर म्हणून प्राप्त व्हावेत हा हट्ट धरून भारताच्या दक्षिण टोकाला तप करीत बसलेली कन्याकुमारी. तिच्या प्रेमासाठी, तिच्यासह विवाहासाठी भगवान शंकर थेट कैलासावरून निघालेत आणि इतक्या जवळ येऊन कुठल्यातरी भक्ताच्या हाकेत, भाकेत गुंतल्यामुळे इथेच स्थायिक झालेत. कन्याकुमारीपर्यंत पोहोचलेच नाहीत. "So near yet so far" अशी अवस्था. ती आजही भारताच्या दक्षिण टोकाला त्यांच्याशी लग्न होईल याची वाट बघत कुमारी आहे. आणि हे सुचिंद्रम भक्तकामकल्पद्रुम बनून इथे आपल्या भक्तांच्या मनोकामना पुरवताहेत. किती रोमॅंटिक कल्पना ! "स्वप्नातल्या कळ्यांनो. उमलू नकाच केव्हा" ह्यातल्या रोमॅंटिसिझम ज्याला कळला त्यालाच हा सुचिंद्रम आणि कन्याकुमारीमधले फ़क्त १५ किलोमीटर अंतरावरचे अपु्रे अव्यक्त प्रेम यातला रोमॅंटिसिझम कळेल.



मनसोक्त दर्शन झाले. भारावलेल्या मनःस्थितीतच आम्ही बाहेर पडलोत. मध्ये एका "सर्वाणा भवन" मध्ये जेवण झाले. अर्थातच दक्षिणी पद्धतीचे, शुद्ध शाकाहारी. जिथे जावे तिथले तिथले स्थानिक पदार्थ खाऊन बघावेत. उगाच दक्षिण भारताच्या प्रवासाला जायचे आणि तिथे आपल्यासारखे पोळ्या आणि पिठले मिळाले नाही म्हणून परतल्यावर मित्र आणि नातेवाईकांमध्ये गळे काढायचे हे मला मान्य नाही. म्हणून "आम्ही काश्मीरला डाल लेकमध्ये पुरणपोळीचे जेवण आमच्या पर्यटकांना दिले" आणि "अहो, कन्याकुमारीला आमच्या पर्यटकांचा श्रीखंड पुरीचा बेत रंगला" अशा जाहिराती करणा-या पर्यटन संस्थेशी आमचे गोत्र जुळतच नाही. अरे लेको. श्रीखंड पुरी, पुरणपोळीच खायची असेल तर ती आपल्या घरीच खा ना. तिरूवनंतपुरमला जाऊन तिथले नारळाच्या तेलातले मलबारी पराठे आणि अमृतसरला जाऊन तिथले सुद्ध देसी घी मधले थबथबलेले अमृतसरी प्राठे खाल्लेच नाहीत तर तो तो प्रांत तुम्ही काय अनुभवला ! एखादा पदार्थ आपल्या सवयीचा नसेल पण तो तिथल्या तिथल्या हवा पाण्यासाठी उत्तम आणि उत्कृष्ट असतो. हे असे पदार्थ तिथल्या तिथल्या वातावरणात खाऊन बघितलेत तर प्रवास संपल्यानंतर पोट बिघडून आजारी पडण्याची वेळ येत नाही.


कन्याकुमारी देवीचे दर्शन आणि स्वामी विवेकानंद स्मारक शिळेवर नावेने जाऊन दर्शन हे आमच्या उद्याच्या कार्यक्रमात होते. आज ते बंधू आम्हाला तिथल्या मेणपुतळ्यांच्या संग्रहालयात घेऊन गेलेत. कन्याकुमारीत अरबी समुद्र किना-यावर पश्चिमेला असलेले हे ठिकाण (तेव्हा तरी) फ़ारसे प्रसिद्ध नव्हते. गर्दी अजिबात नव्हती. पुतळ्यांचा दर्जा आणि स्वरूपता अगदी वाखाणण्याजोगी होती. आम्ही तिथे भरपूर प्रकाशचित्रे घेतलीत. काही छान काही थोडी आगाऊसुद्धा. मजा मजा करायची हे धोरण होतेच.









सकाळी आम्ही आमच्या हॉटेलच्या खोलीतून बंगालच्या उपसागरावरून होणारा अविस्मरणीय सूर्योदय बघितला होता. संध्याकाळी तोच सूर्य अरबी समुद्रात बुडताना बघण्यासाठी आम्ही पश्चिम किना-यावर गेलोत. एकाच गावात एका समुद्रातून सूर्योदय आणि दुस-या समुद्रात सूर्यास्त बघायला मिळणे हे अगदी दुर्मिळ असते. ती दूर्मिळ पर्वणी आम्ही साधली.








आजचा दिवस अगदी अविस्मरणीय. ज्या आपल्या कुटुंबियांना आनंदी ठेवण्यासाठी मनुष्य आयुष्यभर झटत असतो, त्यांच्या चेहे-यावरचा आनंद बघणे ही एखाद्या गृहस्थासाठी सर्वोच्च समाधानाची परमावधी असते. तो आनंद, ते समाधान कुठेही विकत घेता येऊ शकत नाही आणि कितीही पैशांच्या राशी ओतल्यात ते विकत मिळत नाही. 





- सर्वोच्च समाधानी गृहस्थ, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


२३ जानेवारी २०२६ 


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६


Friday, January 23, 2026

दक्षिण दिग्विजय : ४ कन्याकुमारी - सूर्योदय

 यापूर्वीचे भाग इथे  वाचा.

दक्षिण दिग्विजय : भाग १ नागपूर ते चेन्नई

दक्षिण दिग्विजय : २ (चेन्नई ते मदुराई)




२ डिसेंबर २००८


पहाटे ४ : ३० ला म्हणजे नियोजित वेळेआधी तब्बल १ तास आम्ही कन्याकुमारीजवळील नागरकोईल नावाच्या स्टेशनवर सहकुटुंब उतरलो. नियोजन केल्याप्रमाणे रेल्वेच्या प्रथम वर्गात निवांत झोप झालेली होती आणि पॅसेंजर गाडीचा प्रथम वर्ग असल्याने खिशाला भुर्दंड पण फ़ारसा बसलेला नव्हता. अनोळखी प्रदेश, अनोळखी गाव. हिवाळा ऋतू त्यामुळे सूर्यदर्शन अंमळ उशीरा होणार त्यामुळे इथून आता कन्याकुमारी कसे गाठायचे ? हा एक प्रश्न होता.


आम्हाला इथपर्यंत आणणारी गाडी आता दिशा बदलून क्विलोन च्या दिशेने रवाना झालेली होती. आमच्यासोबत ७ वर्षाची आमची लेक आता पेंगुळत होती. मी स्टेशनच्या बाहेर गेलो आणि एक भला टॅक्सीवाला मला भेटला. त्याने नागरकोईल स्टेशन ते कन्याकुमारी आम्हाला नेण्याचे कबूल केले. भाडेही अगदी वाजवी घेत होता. आम्ही त्याच्या टॅक्सीने जाण्याचा निर्णय घेतला.


पहाटेच्या सुखद गारव्यात आमची टॅक्सी नागरकोईल ते कन्याकुमारी हा प्रवास करायला लागलोत. मस्त आणि प्रशस्त ॲंबेसेडर टॅक्सी होती. या गाडीत फ़ार बालपणी आम्ही आमच्या आजोळी भरपूर प्रवास केलेला होता पण जाणते झाल्यावर आणि गाड्यांमधली लेगरूम, हेडरूम, सस्पेन्शन्स या संज्ञा कळायला लागल्यानंतरचा हा पहिलाच प्रवास. अगदी राजेशाही थाटाने प्रवास करतोय हे जाणवत होते.


डिसेंबर महिना असूनही हा परिसर समुद्राला जवळ असल्याने गारठा नव्हता. सुखद, गुलाबी थंडी मात्र होती. साधारण अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आम्ही कन्याकुमारी शहरात दाखल झालो. गाडीनेच आम्ही थोडी हॉटेल्स शोधलीत आणि त्यातल्याच एका ठिकाणी ठिय्या ठोकण्याचा निर्णय घेतला. त्या टॅक्सीवाल्यालाच दिवसभरच्या कन्याकुमारी दर्शनसाठी विचारले तो सुद्धा अगदी रास्त भावात आम्हाला कन्याकुमारी दाखविण्यासाठी तयार झाला.


हॉटेलमध्ये जाऊन थोडी विश्रांती घेतली. आमचे कन्यारत्न तर पेंगुळले होतेच पण आम्ही दोघांनीही आमच्या हॉटेलरूमच्या समुद्राकडल्या खिडकीतून त्या दिवशीचा सूर्योदय बघितला. अगदी मंत्रमुग्ध होऊन आम्ही दोघेही ते दृश्य बघत होतो. "डोळ्यांचे पारणे फ़िटणे" या वाक्प्रचाराची अनुभूती येण्याचा तो क्षण. कॅमे-यानेही तो क्षण टिपला पण डोळ्यांनी जे बघितले त्याची अनुभूती कॅमे-याला कशी येणार ? काही मिनीटे निःशब्द होऊन, हातात हात गुंफ़ून आम्ही तो क्षण बघत होतो. आज आमच्या लग्नाचा ८ वा वाढदिवस होता. तो दिवस अशा एका अदभूत क्षणाने सुरू होऊन साजरा होणार होता याची कल्पना आम्हा दोघांनाही नव्हती.






- स्वपत्नीत, तिच्या आनंदात, तिच्या सुखदुःखात फ़ार म्हणजे फ़ारच गुंतलेला वैभवीरमणा गोविंदा, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


२२ जानेवारी २०२६

 

#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६


Wednesday, January 21, 2026

भाषाशुद्धी : एक विचार

 पु.लं. नी लिहीलय की, " "नव्हत" जर शुद्ध,  तर "व्हत" अशुद्ध कसे ?" 


तसाच अनुभव आज मला आला. मी संगणकावर मराठी वापरताना "बरहा" वापरून टाईप करतो. यात "देईल" टाईप करताना जर दे आणि ईल या दोन शब्दांमध्ये स्पेस बार न दाबता सलग टाईप केले तर "दील" असच टाईप होत. तशीच बाब येईल ची. त्याचे "यील" असे टाईप होते. उच्चाराप्रमाणे (फ़ोनेटीक पद्धतीप्रमाणे) "दील", "यील" हेच शब्द शुद्ध ठरलेत की नाही मग. तसेच "होऊ"हा शब्द सलग टाईप करताना "हू"असेच टाईप होते. मग "हुशील" हेच शुद्ध झाले की नाही ? "होशील" हे शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे शुद्ध असेलही पण मौखिक ज्ञानग्रहणची आपली प्राचीन परंपरा खरी मानली तर "हुशील" हे सुद्धा अशुद्ध नाही हे आपल्या लक्षात येईल. 


मग तसा निष्कर्ष काढला तर आपल्या ग्रामीण भागात राहणारे आपले बांधवच खरी भाषा बोलताहेत की. आपण ग्रामीण भागातल्या कुणी असे बोलले तर ते अशुद्ध म्हणून धरतो. पण कदाचित पारंपारिकतेने चालत आलेल्या मौखिक ज्ञानग्रहण परंपरेत त्यांच्या कानांवर पडणा-या भाषेचे ग्रहण त्यांनी अशाच प्रकारे केले असेल आणि भाषा ते अशीच शिकली असतील तर ती अशुध्द आहे हे म्हणण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला ?

 

मला तरी वाटते की आपण उगाचच शुध्दलेखनाने कृत्रिम रिफाईंड केलेली भाषा वापरतोय. खरी शुध्द भाषा हीच मंडळी वापरताहेत. त्यांची हेटाळणी उपयोगाची नाही. "दील, यील " सारख्या अनेक शब्दांचे एक प्रकारचे कृत्रिम रूपांतरण "देईल, येईल" असे नंतरच्या काळात मराठीत झाले असण्याची शक्यता आहे.


सांगोला येथील आमच्या मुक्कामी अशीच गोड भाषा कानांवर पडायची. मला आठवते कराड अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असताना माझे काही सोलापूर जिल्ह्यातले मित्र अशी हेल काढून भाषा बोलायचेत. "ए..... किन्हीक....र. ये की लेका. ये ना बे कडू." तेव्हा तरूण वयात त्यांचा तो हेल आणि ती लकब मला थोडी अपमानास्पद वाटायची. आपण कुठलीही एखादी नवीन गोष्ट त्यांच्या ग्रूपमध्ये मांडायला सुरूवात केली की त्यांची पहिली प्रतिक्रिया असायची. "खरं...?" ह्याचा पण मला तेव्हा फ़ार राग यायचा. "अरे, खरं नाही तर खोटं सांगतोय का मी ?" अशी स्वाभाविक प्रतिक्रिया मनात उमटायची. जशी महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातल्या एका प्रहसनात अरूण कदमांनी "अच्च लिहीलय ?" असे विचारल्याबरोबर पृथ्वीक प्रताप भडकतात तसे मला माझ्या त्या मित्रांवर भडकावेसेही वाटायचे. अर्थात सार्वजनिक जीवनात, उपक्रमात आपण काम करीत असताना आपल्या भावभावना थोड्या नियंत्रणात ठेवाव्या लागतात. माणसे जोडायची असली तर ब-याचदा आपल्या मनाला, मतांना मुरड घालावी लागते हे तत्व मला माहिती होते म्हणून ही मनातली नाराजी मी चेहे-यावर किंवा वर्तनात दिसू देत नसे पण माझ्या मित्रांचा तो हेल खटकायचा हे नक्की.


पण सोलापूर जिल्ह्यात नोकरीला गेलो. तोपर्यंत फ़ार जास्त काळ इतर जगाचा भलाबुरा अनुभव येऊन गेलेला होता त्यामुळे यावेळी त्या हेलामागची, त्या लकबीमागची त्या भागातल्या भाषेची आत्मीयता कळली आणि तो हेल चक्क आवडायला लागला. मनातल्या मनात मी महाविद्यालयात शिकत असताना ज्या ज्या मित्रांचा मला त्या भाषेबद्दल राग आला होता त्या सर्वांची मी मनातल्या मनात माफ़ीही मागून घेतली. यावेळी मुलीच्या मैत्रिणींकडून आणखी एक हेल कळला. ती तिच्या छोट्या मैत्रिणींना काही काही शहरी गोष्टी सांगायला जायची. तोपर्यंत शहरी जीवनाशी फ़ारसा संबंध नसलेल्या आणि सोलापूर म्हणजेच एक मोठ्ठे शहर असे जग बघितलेल्या तिच्या छोट्या मैत्रिणी तिच्या वर्णनाची थोडी अविश्वासात्मक संभावना "हुई, हुई, असं कुटं असतय व्हई ?" अशी करायच्यात. सुरूवातीला माझ्या लेकीला त्या तिच्या मैत्रिणी काय बोलतायत हे कळतच नसे. मग मी तिला त्या बोलीभाषेतल्या खाचाखोचा समजावून सांगायला लागलो आणि तिला त्यांच्यातला तिच्या कथनावरचा अविश्वास कळल्यानंतर, मी माझ्या महाविद्यालयीन जीवनात या बोलीभाषेविषयी जो गैरसमज करून घेतला होता तो तिचा होऊ नये म्हणून तिचे समुपदेशन करायला लागलो.


मला वाटते आज मराठी भाषा टिकून आहे ती महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात बोलल्या जाणा-या असंख्य बोलीभाषांमुळे. शहरी भागात आपण मराठीवर इंग्रजीचे आणि हिंदीचे इतके अतिक्रमण करून घेतले आहे की आपली मराठी शुद्ध आणि प्रमाणभाषा आहे हे आपण म्हणूच शकत नाही. याचे अत्यंत चपलख उदाहरण म्हणजे आपण जेव्हा गॅसचा नंबर लावतो तेव्हा आपल्या गॅसचा नंबर लागलाय हे सांगताना ती फ़ोनवरची बाई / मुलगी आपल्या गॅसचा नंबर जो सांगते त्याला मराठी किंवा इंग्रजी अशा कुठल्याही भाषेत बसवता येत नाही. "सहा - टू - एक - पाच - फ़ोर - शून्य" असे दरवेळी ऐकायला मिळते. गेली ५ - ६ वर्षे हा प्रकार सुरू असूनही त्याबद्दल अजूनपर्यंत राज ठाकरेंकडे कुणी तक्रार कशी केली नाही याचेच मला आश्चर्य वाटते.


असो. तर आपण महाराष्ट्रात फ़िरत असताना तिथल्या तिथल्या बोलीभाषा समजून घेऊयात, त्यांच्यातला गोडवा आस्वादूयात आणि आपली मराठी अनेक शतके टिकवल्याबद्दल त्या सर्व बांधवांचे मनापासून आभार मानूयात. दुस्वास, दुराभिमान वगैरे गोष्टी जरा दूरच ठेवूयात. काय म्हणताय मग ?


- गडचिरोली पासून थेट कसालपर्यंत आणि अक्कलकुव्यापासून थेट मांजरसुंब्यापर्यंत सगळा महाराष्ट्र डोळसपणे फ़िरलेला आणि तिथल्या तिथल्या बोलीभाषा ऐकून त्या समजून घेण्याचा प्रयत्न करणारा, त्या भाषांवर प्रेम करणारा आपला एक छोटा भाषाशास्त्रज्ञ रामशास्त्री.


२१ जानेवारी २०२६ 

 

#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६