Tuesday, July 14, 2026

श्रीमदभागवत चिंतन - १४ पुरंजनोपाख्यान (भाग पहिला)

प्राचीन काळी पुरंजन नावाचा एक अतिशय पराक्रमी राजा होता. स्वतःला राहण्यासाठी आपल्या मनाजोगते नगर शोधत शोधत तो भटकत असताना त्याला नऊ द्वारांचे एक अतिशय सुंदर आणि रमणीय नगर दिसले. त्या नगरात वास करीत असलेली एक अतिशय सुंदर युवती आणि तिच्या सोबत असलेले अनेक नागरिक त्याच्या दृष्टीपथास पडले. त्या नगरीचे संरक्षण एक पाच फ़ण्या असलेल्या नागराज करीत होता. त्या नगरीचे एकूणच स्वरूप आणि रूपयौवनेचे मधुर भाषण याची भुरळ पडून राजा पुरंजन त्या नगरीतच राहू लागला.



राजा त्या नगरीच्या, त्या रूपयौवनेच्या भोगविलासांमध्येच रममाण झाला. दररोज वनात जाऊन मन मानेल तशी मृगया करणे, नगरीत परतल्यानंतर भोजनादि विलासांचे सेवन करणे आणि त्या राणीसोबत रतिक्रिडेत रममाण होणे हाच त्याचा जीवनक्रम बनला. याशिवाय त्याला काही सुचेनासे झाले. आपल्या अंगभूत पराक्रमाचे एकूण फ़लित म्हणजेच हे अनेक प्रकारचे भोगविलास प्राप्ती हे त्याच्या मनाने घेतले. तो या पृथ्वीतलावरील सर्व नवनवीन विलासांमध्ये अक्षरशः आकंठ बुडून त्यांचे सेवन करीत राहिला.

याच कालावधीत राजा पुरंजनाला अनेक कन्या आणि पुत्र प्राप्त झाले. त्यांचे त्याने विवाहादि संस्कार केलेत. आपले पुत्र, सुना, कन्या, जावई यांच्यामध्ये, त्यांच्या संसारांमध्ये, त्यांच्या कन्यापुत्रांच्या लाडाकोडात राजा पुरंजन मग्न झाला. त्याचे अर्धे आयुष्य असेच सरले.

चण्डवेग नावाचा एक गंधर्व आहे. त्याच्या अधीन असलेले ३६० गंधर्व आणि त्यांच्या पत्नी असलेल्या ३६० गंधर्वी आहेत. चण्डवेग गंधर्वराजाच्या आज्ञेनुसार हे गंधर्व आणि गंधर्वी या समस्त सृष्टीत सर्वत्र फ़िरून भोग आणि विलासात मग्न असलेली नगरे लुटण्याचे कार्य निरंतर करीत असता. त्यांना ही राजा पुरंजनाची नगरी दिसली आणि त्यांनी त्या नगरीला लुटण्यास प्रारंभ केला. त्या नगरीच्या रक्षणास असलेल्या सर्पाने तिचे रक्षण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला खरा पण चण्डवेग गंधर्वाच्या पार्षदांपुढे नगररक्षणाचे त्याचे प्रयत्न अपुरे पडत गेले.

याच दरम्यान प्रत्यक्ष काळाची जरा नामक कन्या आपल्या इच्छित वरासाठी सर्वत्र फ़िरत होती. पण तिचा कुणीही स्वीकार करीत नव्हते. प्रत्यक्ष देवर्षी नारदा्ंना सुद्धा तिने तिचा स्वीकार करण्याची गळ घातली पण नारदांनी तिला नकार दिला. तिने संतापून देवर्षी नारदांना एका जागी स्थिर न राहू शकण्याचा शाप दिला. त्यामुळे नारदांना कायम त्रैलोक्यामध्ये भ्रमण करणे आले. मनुष्यमात्रांचे कायम भले इच्छिणा-या देवर्षींनी त्या शापाचा वरासारखा उपयोग करून घेत कायम त्रैलोक्य भ्रमण करीत जागोजागी मनुष्यमात्रांना उपकारक अशा लीला केल्यात. आपल्याला प्राप्त झालेल्या प्रतिकूल परिस्थितीचा ज्ञानी लोक विषाद न मानता त्यातूनही अनुकूलता कशी शोधत त्यावर मात करतात याचे हे एक उदाहरण.



त्या कालकन्येला यवनराजाने असा वर दिला की जे नगर आणि त्यातले नगरवासी निरंतर भोग आणि विलासांमध्ये मग्न राहतील, त्यात तू आणि तुझा बंधू प्रज्वार हे दोघे घुसू शकाल आणि त्या नगरीचा सहज विध्वंस करू शकाल. तुम्ही दोघेहे त्या नगरीवर राज्य कराल आणि ती नगरी आपल्या पित्याला, काळाला, भेट देऊ शकाल. या प्राप्त वरानुसार ती कालकन्या, जरा आणि प्रज्वार नामक तिचा भाऊ हे राजा पुरंजनाच्या नगरीत घुसलेत आणि त्यांनी सर्व नगरीच्या नाशाला प्रारंभ केला. आपल्या डोळ्यासमोर आपल्या सर्व वैभवाचा असा नाश होत असलेला पाहून आधीच हतबल असलेला राजा पुरंजन अतिशय दुःखित झाला, शोकाकूल झाला.

मी, माझी पत्नी, माझी मुलेबाळे यांनाच सर्वस्व मानणारा राजा पुरंजन, त्याची नऊ द्वारे असलेली सुंदर नगरी, त्याचे प्रजाजन, त्याच्यावर जरा नामक कालकन्येचा झालेला हल्ला आणि त्याला प्राप्त होणारा उद्वेग, शोक यांचे आपण आजच्या सर्वसामान्य सांसारिक जनांशी काही नाते आहे का ? याचा आज आपण आपल्या मनात शोध घेऊयात का ? या कथेच्या उत्तरार्धात उद्या या गोष्टींचा उलगडा निश्चित होईल पण या गोष्टींचे प्रत्येक संसारी जीवाने अगदी अंतरातून मनन करणे आणि त्यांना तसे ते मनन घडवणे हेच श्रीमदभागताचे उद्दिष्ट आहे, हीच या कथेची फ़लशृती आहे, हा बोध प्रत्येक जीवाला होणे हाच श्रीमदभागवताचा प्रसाद आहे.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥




- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" ज्येष्ठ अमावास्या शके १९४८ दिनांक  १४ / ७ / २०२६


१४ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


Monday, July 13, 2026

श्रीमदभागवत चिंतन - १३ दक्षप्रजापतींचा यज्ञ आणि सतीचा देहत्याग

ब्रह्माजींचे पुत्र दक्षप्रजापती आणि स्वायम्भुव मनु यांची कन्या प्रसूति यांचा विवाह झाला आणि त्यांना एकूण सोळा कन्यारत्ने प्राप्त झालीत. दक्षप्रजापतीने त्यातल्या तेरा कन्या धर्माला, एक अग्निला, एक पितृगणाला आणि सती नामक एक कन्या या संसाराचा संहार करणा-या आणि समस्त जीवांना जन्म मृत्यूच्या फ़े-यातून मुक्त करणा-या भगवान शंकराला दिली.



एकदा दक्षप्रजापतींनी एक यज्ञ केला. त्यात यजमान म्हणून ते स्वतः यज्ञस्थळी आल्यानंतर त्याठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व देव देवतांनी त्यांना आपापल्या आसनांवरून उठून आदराने वंदन केले.भगवान शंकर मात्र आत्मस्वरूपात मग्न असल्याने त्यांनी मात्र दक्षप्रजापतींना उठून वंदन केले जाही. ते आपल्या आसनावरच बसून राहिले. ते पाहून दक्षप्रजापतींचा क्रोध अनावर झाला. महादेव शंकरांनी से कृत्य मुद्दामच केले असा त्यांनी ग्रह करून घेतला आणि जमलेल्या सभेला उद्देशून ते महादेवांविषयी, त्यांच्या गणांविषयी वाईट साईट बोललेत. आत्मचिंतनात मग्न असल्याने महादेव शंकरांवर त्यांच्या बोलण्याचा काहीही परिणाम झाला नाही, किंबहुना त्यांनी आपल्या सासरेबुवांनी काढलेले अनुदार उदगार ऐकलेच नाहीत. ते आत्मानंदात मग्न होते.

हे बघितल्यानंतर दक्षप्रजापतींच्या रागाचा पारा अधिकच चढला. त्यांनी महादेवांना यज्ञाचे कुठलेच फ़ळ, कुठलाही हविर्भाग कधीच प्राप्त होऊ नये असा शाप दिला. वास्तविक सभेत जमलेली इतर थोर मंडळी दक्षप्रजापतींना असे न करण्याबाबत सांगत होती पण क्रोधात पूर्णपणे बुडाल्याने त्यांनी इतर जनांचे न ऐकता महादेवांना आणि त्यांच्या इतर गणांना हा शाप दिलाच.

शिवगणांमधल्या नंदिकेश्वराला हा महादेवांचा अपमान सहन झाला नाही. त्याने दक्षप्रजापती आणि त्यांना अनुमोदन देणा-या सभेतल्या इतरांना उलट शाप दिला. प्रत्यक्ष जन्म आणि मृत्यूच्या फ़े-यातून सर्व जगताला मुक्त करणा-या महादेव शंकरांचा देहापलिकड्ला विचार ज्या जनांना समजत नाही ते जन देहातच अडकून बसोत, कर्मकांडांमध्येच त्यांचा जीव सदैव अडकला राहो. महादेव शंकरांचा मुक्तीचा त्यांना लाभ न होवो असा शाप नंदिकेश्वराने दक्षप्रजापतींना आणि त्यांना साथ देणा-या सभाजनांना दिला.

यावर भृगूंनी पुन्हा महादेव शंकरांना आणि त्यांच्या समस्त गणांना सदैव पाखंड मार्गाने जाण्याचा आणि नियत कर्म न करता अशौच अपवित्र मार्गातच सदैव राहण्याचा शाप दिला. यावेळेपर्यंत महादेव आपल्या भानावर आलेले होते. झालेला प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते खिन्न झालेत आणि आपल्या गणांसह ते यज्ञस्थळ सोडून आपल्या निवासस्थानी परतलेत.

आपल्याही आयुष्यात असे काही प्रसंग येतात. कधीकधी कुणाकडून तरी त्याच्याही नकळत एखादी चूक घडलेली असते पण त्याची मनोवस्था जाणून न घेता, त्या व्यक्तीने ती चूक जाणीवपूर्वक केलेली आहे असा आपला ग्रह होतो आणि आपण त्या व्यक्तीविषयी ग्रह करून घेतो, क्वचित त्याचा अपमानही करतो. शब्दाने शब्द, मुद्याने मुद्दा वाढत जातो आणि अगदी अकारण आत्मीय संबंध दुरावतात. आपल्याबरोबर झालेल्या वादविवादांमध्ये खरेच मुद्दे किती आणि आपल्या अहंकारांमुळे आपल्याला न कळलेली सत्यस्थिती किती याचे विश्लेषण आपण जर आपल्या मनाशी केले तर आपल्याला आपल्या अनेक भांडणामधला, वादांमधला फ़ोलपणा कळून येईल. आपले मन शुद्ध होईल, निर्मळ होईल. ही कथा ऐकण्याचा, मनन करण्याचा हाच प्रसाद आहे. तो आपल्या मनाला मिळतो.

त्या यज्ञानंतर ब्रह्माजींनी दक्षप्रजापतींना अधिक उच्चपद दिले आणि त्यांचा अहंकार वाढला. त्यांनी आणखीही दोन महायज्ञांचे आयोजन केले आणि महादेवांचा जाणीवपूर्वक अपमान करण्यासाठी फ़क्त त्यांना निमंत्रण न देता आपल्या इष्ट मित्रांना, सगळ्या देवांना आणि आपल्या इतर कन्या, जावयांना यज्ञासाठी बोलाविले. त्या यज्ञांची वार्ता ऐकून महादेवपत्नी सती आपल्या आईला, वडिलांना, इतर बहिणींना भेटण्यासाठी, त्यांचे कुशलवृत्त विचारण्यासाठी उत्सुक झाली आणि यज्ञाला उपस्थित राहण्यासाठी आपल्या पतींची, महादेवांची परवानगी मागू लागली. 

महादेव शंकरांनी आपल्या पत्नीची समजूत काढली. अगदी आप्त स्वकीय असले कुठली घरे जाण्यासाठी वर्ज्य करावीत यावर महादेव शंकरांचा आपल्या पत्नीला केलेला श्रीमदभागवतातील चतुर्थ स्कंधातला हा उपदेश समस्त दांपत्यांनी मुळापासून वाचण्यासारखा आणि कायम लक्षात ठेवण्यासारखा आहे. पण पतीच्या विवेक विचारपेक्षा त्याक्षणी सतीच्या मनातली आपल्या आईला, बहिणींना इतर आप्तजनांना भेटण्याची इच्छा प्रबल ठरली आणि ती आपल्या पित्याने आयोजित केलेल्या यज्ञस्थळी रवाना झाली. यावेळी अत्यंत नाईलाजाने महादेवांनी तिला परवानगी दिली. 

यज्ञस्थळी आल्यानंतर महादेवपत्नी, दक्षकन्या सतीने आपल्या आईची, बहिणींची प्रेमपूर्वक भेट घेतली. इथे त्या सगळ्यांना खरोखर खूप आनंद झाला होता पण पित्याने आयोजित केलेल्या यज्ञात आपल्या पतीच्या परोक्ष त्याचा जाणीवपूर्वक अपमान करीत हे कार्य संपन्न होत असल्याचे तिच्या लक्षात आले. किंबहुना आपल्या पतीचा जाणीवपूर्वक अपमान करण्यासाठीच या कार्याचे आयोजन करण्यात आल्याचेही तिच्या लक्षात आले. आपले पती महादेवांनी वारंवार न जाण्याविषयी विनंते करूनही आपण आपल्या पित्याकडील कार्यात आलोय या गोष्टीचा तिला पश्चात्ताप झाला आणि महातेजस्वी महासतीने त्या यज्ञस्थळीच आपल्या पित्याची व महादेवांच्या अपमानात त्यांना साथ देणा-या इतरांची अत्यंत कडक शब्दात निर्भत्सना केली. आपल्या पतीच्या सर्वसंसारातल्या समस्त जीवांच्या कल्याणाच्या रूपाची प्रशंसा केली आणि त्या पश्चात्तापातच आपला देहत्याग केला.

महासतीच्या देहत्यागानंतर सर्व घटनाक्रम जाणून महादेव शंकर अतिशय क्रुद्ध झालेत. त्यांचा पार्षद असलेल्या वीरभद्राकडून त्यांनी दक्षयज्ञाचा विध्वंस आरंभला आणि आपल्या पत्नीच्या वियोगात शोकसागरात बुडून गेलेत. त्यावेळी त्यांचा क्रोध शांत करण्यासाठी ब्रह्माजींनी आणि भगवान महाविष्णूंनी त्यांची, त्यांच्या कार्याची यथार्थ स्तुती केली आणि त्यांचे तांडव थांबवले. अन्यथा महादेव आपल्या क्रोधाग्नीत ही समस्त सृष्टी विनाशाकडे नेणार होते. तसे झाले नाही.

कर्ममार्गाने विधिवत आचरण करून,व्यवस्थितपणा ठेऊन भगवंतांची आराधना करणा-यांने केवळ बाह्य रूपाने एखाद्याला जोखू नये. बाह्यरूपाने एखाद्या वेळेला शास्त्र असंमत, मलिन असलेल्या एखाद्याच्या अंतरात मात्र अत्यंत शुद्ध भावना, पावित्र्य असू शकते याचा विचार करून, त्या व्यक्तीचा विश्वकल्याणाचा, भगवंताला प्राप्त करून घेण्याचा मार्ग मार्ग निराळा असला तरी तो समजून त्याचा आदर करीत आपण परस्परसंबंध जपले पाहिजेत हाच या कथेचा अन्वयार्थ. श्रीमदभागवत हे भगवान विष्णूंच्या लीलांचे वर्णन असले तरी समस्त शिवभक्तांसाठी अतिशय पूजनीय असा हा चतुर्थ खंड आणि त्यातले हे पहिले सात अध्याय. 



॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" ज्येष्ठ वद्य चतुर्दशी शके १९४८ दिनांक  १३ / ७ / २०२६


१३ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


Sunday, July 12, 2026

श्रीमदभागवत चिंतन - १२ कपिल गीता

प्रत्यक्ष भगवंतांच्या आज्ञेने स्वायम्भुव मनूची अत्यंत तेजस्वी आणि ज्ञानी कन्या, देवहुति हिचा विवाह कर्दम ऋषींशी झाला. कर्दम ऋषीही अत्यंत आदर्श जीवन जगत भगवंतांच्या चरणाचा कायम आश्रय इच्छिणारे होते. कर्दम ऋषी आणि देवहुति यांच्या दांपत्य जीवनाचे फ़ार सुंदर वर्णन श्रीमदभागवतात आलेले आहे. महादेव शंकरांची ज्याप्रमाणे मनोभावे सेवा पार्वतीने केली त्याप्रमाणे मनुकन्या देवहुति ने आपल्या पतिदेवांची सेवा केली. 

श्रीमदभागवत वर्णन करतय

विश्रम्भेण, आत्मशौचेन, गौरवेन, दमेन च

शुश्रूषया, सौहृदेन, वाचा मधुरयां च भोः ।

विसृज्य कामं दम्भं च द्वेषम, लोभम, अघम, मदम

अप्रमत्तोद्यता नित्यम तेजीयाम समतोषयत ॥

देवहुति ने कामवासना, लोभ, दंभ, द्वेष, पाप, मद इत्यादि गोष्टींना कटाक्षाने दूर ठेऊन पातिव्रत्य, गौरव, प्रेम, मधुरभाषण करून अत्यंत आत्मीयतेने आपल्या अत्यंत तेजस्वी जीवन जगत असलेल्या पतीदेवांची मनोभावे सेवा केली आणि त्यांच्याकडून नऊ कन्या प्राप्त करून घेतल्या. भगवंतांच्या आशिर्वादाने योग्यवेळी त्या कन्यांचे विवाह पृथ्वीसंचलन आणि नियमन करू शकण्याची शक्ती असलेल्या अत्यंत तेजस्वी अशा नऊ मुनीजनांशी झालेत.



यानंतर देवहुतिच्या सेवा आणि पातिव्रत्यावर प्रसन्न झालेल्या कर्दम ऋषींनी ति्च्या उदरी प्रत्यक्ष भगवंत कपिल रूपाने जन्म घेणार असल्याचा आशिर्वाद देवहुतिला दिला आणि अशा अत्यंत पवित्र, आदर्श दांपत्य जीवन जगणा-या दंपतींपोटी भगवान कपिल अवतीर्ण झालेत.

भगवंत आपल्या पत्नीच्या उदरी प्रगट झाले्ले आहेत हे कर्दम ऋषींनी जाणल्यानंतर त्यांनी त्या बालकाचे भगवंत स्वरूप जाणून त्यांची स्तुती केली आणि जन्म मृत्यूच्या फ़े-यातून कायम मुक्ती मिळण्याची भगवंतांना प्रार्थना केली. भगवान कपिलांनी त्यांची शुद्ध बुद्धीने आणि कर्माने केलेली प्रार्थना पाहून आपल्या पित्याला इच्छित वर प्रदान केला आणि त्यांना त्यांच्या सर्व कर्मबंधनांमधून मुक्ती देऊन जन्म मृत्यूच्या फ़े-यातून मुक्त केले.



माता देवहुतिने भगवान कपिलांचे विष्णुस्वरूप जाणून त्यांना प्रश्न केलेत. भगवान, मी म्हणजे शरीर या भावनेपासून मनुष्यमात्रांना मुक्ती कधी आणि कशी मिळेल ? हा देह धारण केल्यानंतर हा देह आणि त्याच्या अनेक लीला यापासून मी, आत्मा म्हणून वेगळा आहे हे ज्ञान मनुष्यमात्रांना कसे प्राप्त होईल ?

यानंतर भगवान कपिलांनी आपल्या मातेला जो उपदेश केलेला आहे तो कपिलगीता म्हणून ओळखला जातो. भगवान कपिल आपल्या आईला सांगताहेत, "आई, मनुष्यांचे मनच त्यांच्या बंधनाला आणि मोक्षालाही कारण होत असते. मनुष्यांच्या मनांनी मी आणि माझा देह एव्हढ्या्पुरताच विचार केला तर त्यांचे मन काम क्रोध मद इत्यादि गोष्टींकडे जाऊन या सृष्टीवर बांधल्या जाते. त्यांना जन्म आणि मृत्यूच्या फ़े-यात हे मनच अडकवून ठेवते. तेच मन जर मनुष्य़मात्रांनी भगवंत, संत महापुरूष यांच्या शिकवणुकीत, त्यांच्या निरंतर सेवेत लावले तर ते या पृथ्वीतलावर सर्व कर्मबंधनांपासून त्या मनुष्याला मुक्ती प्राप्त करून देणारे ठरते."

"शांत, सरळ मनाचे, दयाळू, कुणालाही ताप न देणारे, सत्पुरूषांचा सन्मान करणारे माझे भक्त माझ्या चरित्राचे श्रवण आणि कीर्तन करीत राहिलेत तर त्यांना या संसारातला कुठलाही प्रसंग ताप किंवा दुःख देत नाही. अशा साधूपुरूषांचा संग जर इतरांनी केला तर त्यांच्याही मनांमध्ये त्या साधूपुरूषांची विरक्ति संक्रमित होईल आणि त्यांचीही मने हळूहळू मुक्त होऊ लागतील."

भगवान कपिल आपल्या आईला उपदेश करताना पुढे असे सांगतात, " आई, माझी खरी भक्ती करणारे सत्पुरूष केवळ माझ्यावरील प्रेमामुळे माझी भक्ती करीत असतात. आपण करीत असलेल्या भक्तीचे फ़ळ म्हणून आपल्याला मुक्ती मिळेल, भगवंताचे दर्शन मिळेल या अत्यंत सात्विक याचना सुद्धा त्यांचा मनाला शिवत नाहीत. अत्यंत निष्काम भक्ती ते करीत असतात आणि त्यामुळेच ते मला प्राप्त करून घेतात. एकदा मी त्या सत्पुरूषांना प्राप्त झालो की त्यांनी कधीही याचना न केलेली सगळी मुक्ती आदि सुखे मी त्यांना आपोआपच प्रदान करीत असतो. पण त्या सत्पुरूषांची त्याचावरही आसक्ती नसते."



आणि यानंतर भगवान कपिल यांनी आपल्या मातेला उपदेश करताना या संसारात असलेल्या मनुष्यमात्रांनी नक्की काय करावे आणि काय करू नये, आपल्या मनावर संयम ठेऊन भगवत्प्राप्तीकरिता नेमके काय करावे ? याचा अगदी व्यावहारिक उपदेश केलेला आहे. जो आज कलियुगात सुद्धा आपणा सर्वांना अत्यंत उदबोधक आहे आणि प्रत्यक्ष आचरणात आणण्याजोगा आहे. त्याप्रमाणे वर्तन ठेवल्यानंतर मनुष्यमात्रांना एका दिवसात या जन्म मृत्यूच्या फ़े-यातून मुक्ती मिळेल असे आश्वासन भगवान कपिल आपल्याला देत नाहीत. त्यांनी या अध्यायात सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करून आपल्या मनाला वळण लावल्यानंतर हळूहळू आपल्या मनात, वर्तनात बदल होऊन एकदिवस आपल्याला त्या सच्चिदानंदस्वरूप भगवंताची प्राप्ती नक्की होईल अशी ग्वाही मात्र भगवान कपिल देत आहेत. या जगातून. जन्म मरणांच्या अनंत फ़े-यांमधून मुक्ती मिळवू इच्छिणा-या आपल्यासारख्या समस्त सांसारिक जनांनी श्रीमदभागवताच्या तृतीय स्कंधातील अठ्ठाविसावा अध्याय हा मुळापासूनच वाचण्याजोगा आहे. तो अध्याय कायम वाचनात ठेऊन त्यात दिलेल्या मार्गाचे पालन सातत्याने करीत राहणे हीच कपिल गीतेची फ़लशृती आहे.

त्यानंतरच्या एकोणतीस, तीस, एकतीस आणि बत्तीसाव्या अध्यायात भगवान कपिलांनी मनुष्यमात्र त्यांच्या गर्भावस्थेपासून ते मृत्यूपश्चात आपल्या कर्मबंधनांमुळे कशा प्रकारची दुःखे भोगतात याचे भयंकर चित्र आपल्या आईला उपदेश करण्याच्या मिषाने आपल्या सर्वांसमोर ठेवलेले आहे. अगदी याच प्रकारचे वर्णन श्रीगुरूचरित्रातल्या एका अध्यायाय आलेले आहे. ते वर्णन नुसते ऐकले जरी तरी या संसाराच्या आणि त्यात वारंवार जन्म मृत्यूचे फ़ेरे घेण्यामुळे निर्माण होणा-या भयावह स्थितीची जाणीव मनाला होते आणि मनात वैराग्य उत्पन्न होते.

तृतीय स्कंधाच्या तेहेतीसाव्या अध्यायात आपण सर्व जीवांच्या वतीने माता देवहुतिने भगवान कपिलांचे आभार मानलेले आहेत, त्यांची स्तुती केलेली आहे.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥




- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" ज्येष्ठ वद्य त्रयोदशी शके १९४८ दिनांक  १२ / ७ / २०२६


१२ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


Saturday, July 11, 2026

श्रीमदभागवत चिंतन - ११ वराह अवतार

भगवान विष्णूंचे द्वारपाल पार्षद जय आणि विजय. भगवंताच्या निकट राहून, अगदी स्वर्गात राहून तिथली सुखे उपभोगताना त्यांनी ब्रह्मकुमारांचा अपमान केला. खरेतर दुःखापेक्षा सुखी अवस्थेतच मनुष्याने आपल्या मनाला जपले पाहिजे. दुःखी मन कालांतराने सावरू शकते पण सुखी अवस्था मनाला उन्मादी स्वरूप देऊ शकते. जय आणि विजय या भगवंतांच्या पार्षदांकडून नेमका हाच अपराध घडला आणि त्याच्या परिणामी त्यांना पृथ्वीतलावर जन्म घेण्याचा आणि स्वर्गसुखांना पारखे होण्याचा शाप मिळाला. साधूंच्या अपमानामुळे तीन जन्म स्वर्गसुखापासून वंचित व्हावे लागले. ते तीन जन्म म्हणजे हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू, रावण आणि कुंभकर्ण व शिशुपाल आणि दंतवक्त्र. या तीनही जन्मात भगवंताने स्वतः अवतार घेऊन आपल्या पार्षदांना मोक्षप्राप्ती करून दिली.



हिरण्याक्ष अवतार या भूतलावर झाला आणि त्याने धुमाकूळ घालायला सुरूवात केली. पृथ्वी अगदी रसातळाला नेली. आपल्या खगोलशास्त्रीय निरीक्षणांनुसार आपल्या पृथ्वीतलावर हायड्रोजन आणि ऑक्सीजन पासून पाण्याची निर्मिती, त्यानंतर पाण्यातील विविध वनस्पती आणि प्राण्यांची निर्मिती, त्याअनुषंगाने जमिनीवर विविध जिवाणू, झाडे आणि त्यानंतर मानवी जीवनाची निर्मिती ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पृथ्वीच्या सूर्यापासून असलेल्या विशिष्ट अंतरामुळे, पृथ्वीच्या एका विशिष्ट अंशात कललेल्या आसामुळे आणि सूर्यमाला निर्माण झाल्यानंतर जे विविध वायूंचे गोळे सूर्याभोवती फ़िरता फ़िरता हळूहळू थंड होत ग्रह बनलेत त्यांच्या विशिष्ट परिवलन गतीमुळे आपल्या पृथ्वीवर मानवी जीवनासकट एकूणच जीवसृष्टीविषयी पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. तसे आपल्या या सूर्यमालेच्या इतर कुठल्याही ग्रहावर निर्माण होऊ शकत नाही. यात थोडाजरी बदल झाला तरी आपल्या पृथ्वीवरील एकूणच जीवसृष्तीच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊन जीवसृष्टी लयाला जाऊ शकते.

हिरण्याक्ष हा अत्यंत बलवान आणि तामसी वृत्तीचा असल्याने त्याने आपल्याला ज्ञात असलेल्या आकाशगंगांच्याही पलिकडे कुठेतरी असलेल्या स्वर्ग नावाच्या निराळ्या प्रतलातून आपल्या सूर्यमालेत प्रवेश करीत हा समतोल बिघडवण्याचा प्रयत्न केला असावा. आपणच निर्माण केलेली ही सृष्टी अशी कुणीतरी तामसी वृत्तीने नाश करीत असेल तर ते सृष्टीनिर्मात्याला अजिबात आवडत नाही. त्यामुळे भगवंतांनी ब्रह्माजींच्या नाकपुड्यांमधून बाहेर येत वराह अवतार धारण केला.



या जीवसृष्टीला आधार ठरणा-या पृथ्वीच्याच गतीत, अक्षाच्या अंशात परिवर्तन करू पाहणा-या आणि इतकी सुंदर निर्मिती नष्ट करू पाहणा-या हिरण्याक्ष राक्षसाशी भगवंतांनी युद्ध केले आणि आपल्या दाढांमध्ये धरून रसातळाला जात असलेली पृथ्वी पुन्हा आपल्या ठिकाणी प्रस्थापित केली. पृथ्वीवरील त्यानंतर जीवन फ़ुलवायला मदत केली.

आपल्या या सृष्टीत सगळ्या जीवांचे काही ना काही महत्व आहे. अगदी लहानतल्या लहान, क्षुद्रातल्या क्षुद्र जीवांचीही या सृष्टीत काही कर्तव्ये आहेत, निश्चित असे प्रयोजन आहे. कुठल्याही जीवाला त्याच्या बाह्य रूपावरून, तो या पृथ्वीतलावर करीत असलेल्या कार्यावरून लहान किंवा मोठे, चांगले किंवा ओंगळ संबोधण्यापूर्वी त्या जीवाचे इथले कार्य आणि तो त्याच्या कार्यामुळे इथे करीत असलेले उपकार आपण सूज्ञजनांनी स्मरून त्याचा आदर करायला हवा हे तत्व आपल्याला शिकवण्यासाठीच भगवान विष्णूंनी आज आपल्याला छोटासा, दुर्लक्षणीय आणि सामान्य वाटत असलेल्या वराहाचा अवतार इथे घेतला.

आज आपल्यापैकी प्रत्येकानेच ही पृथ्वी तिच्यावरील जीवसृष्टीसकट पुन्हा एकदा रसातळाला नेण्याकरिता हिरण्याक्ष अवतार घेण्याचा चंग बांधला आहे की काय अशी अवस्था आहे. आज आपण फ़क्त मनुष्यांचाच, त्यांच्याच सुखांचा, त्यांच्याच सोयीपुरता विचार करतो आहोत. आपल्या कुठल्या कृतीमुळे या सृष्टीला, तिच्यावर आजवर पोसल्या गेलेल्या एकूणच जीवसृष्टीला धोका पोहोचू शकेल, ही पृथ्वी पूर्णपणे नष्ट होऊ शकेल याचा अगदी थोडा विचारही आपल्याला शिवत नाही. आपल्या सगळ्यांच्या जीवनकालात तर यातले काही होणार नाही मग आजच त्याची चिंता का करायची ? आज खाओ, पिओ, ऐश करो हाच चार्वाक विचारसरणीचा विचार आपल्या सगळ्यांना व्यापून उरलेला आहे. यादृष्टीने आपण या हिरण्याक्ष राक्षसाचे आणि भगवंतांनी घेतलेल्या वराह अवताराचे चिंतन करणे व आपल्यामुळे या जीवसृष्टीचा समतोल अजिबात बिघडू नये याची जाणीवपूर्वक काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे. या कथेचे चिंतन नेमके हेच आहे.  


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥





- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" ज्येष्ठ वद्य द्वादशी शके १९४८ दिनांक  ११ / ७ / २०२६


११ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


Friday, July 10, 2026

श्रीमदभागवत चिंतन - १० विदुर मैत्रेय संवाद् (भाग दुसरा)

भगवंतांनी आपल्या केवळ संकल्पमात्रेने या सृष्टीची निर्मिती करायला सुरूवात केली. त्यांनी आकाशाची निर्मिती केली आणि आकाशापासून काळ गणनेची निर्मिती केली. आणि ज्ञानेद्रियांना जाणवणा-या स्पर्श या संवेदनेला अनुकूल अशी वायुची निर्मिती केली.

या विश्वाच्या सुरूवातीला एका अणुपासून एक मोठा महास्फ़ोट झाला आणि हे प्रचंड विश्व निर्माण झाले हे आधुनिक युगाची "बिग बॅंग थेअरी" आपल्याला सांगते. त्यात हे ग्रह, तारे, वायू, काळगणना कुठल्या क्रमाने झाली असावी याचे तर्क आजची आपले शास्त्रज्ञ मांडत आहेत. मैत्रेय ऋषींनी विदुरजींना भगवंतांच्या असण्याविषयी, त्यांनी निर्माण केलेल्या विश्वाविषयी, मायेविषयी उपदेशात्मक ज्ञान देताना हाच क्रम सांगितला आहे.



अशाप्रकारे निर्माण झालेल्या वायू आणि आकाशाने तेजाची निर्मिती केली आणि तेजाने अनुभवाला येणारे ज्ञान म्हणजे रूप याची निर्मिती केली. विश्वात प्रकाश निर्माण झाला आणि विश्वातल्या वस्तूंचे बाह्य स्वरूप सर्वांच्या प्रत्ययाला येऊ लागले.

त्या प्रकाशावर दृष्टीपडताच परमात्म्याने रसरूप पाण्याची निर्मिती केली. या विश्वात पाणी निर्माण झाले. आपल्या संपूर्ण विश्वात आकाश - काळ - वायू - तेज आणि पाणी अशाच क्रमाने या पंचमहाभूतांची निर्मिती झाली असावी हे आजच्या आधुनिक विज्ञानानेही तर्काद्वारे आणि काही वैज्ञानिक प्रयोगांद्वारे मान्य केले आहे. मैत्रेय ऋषी आपल्याला श्रीमदभागवतात हेच प्रतिपादन करताहेत.

त्यानंतर वायू, तेज आणि पाणी ही तत्वे मिळून विश्वात पृथ्वीचा जन्म झाला. ज्ञानेन्द्रियांना जाणवणारी गन्धशक्ती हा पृथ्वीचा गुण आहे. आजच्या आपल्या मानसपूजेत गंध हा पृथ्वीचे, पुष्प हे आकाशाचे, धूप हे वायूतत्वाचे, दीप हा अग्नीचे आणि अमृत नैवेद्य हे जलतत्वाचे प्रतिनिधी समजले जातात. 

यानंतर महात्मा विदुरांनी मोठ्या जिज्ञासेने मैत्रेयांना अशा विश्वनिर्मात्या भगवंताच्या एकाचवेळी निर्गुण आणि सगुण असण्याबाबत प्रश्न विचारलेत आणि मैत्रेयांनी त्यांना भक्तीयोग, माया आणि ब्रह्माचे निरूपण, मनुष्यमात्रांनी कायम स्वरूपाच्या आनंदासाठी काय करायला हवे याचा उपदेश केला आणि विश्वनिर्मिती केल्यानंतर स्वतःच हे विश्व व्यापून उरलेल्या भगवंताच्या विराट स्वरूपाचे वर्णन केले. आणि या सृष्टीच्या वारंवार होणा-या निर्माण, संचालन आणि संहाराचे ज्ञान दिले.



आजच्या आधुनिक विज्ञानाने या विश्वात सतत घडत असलेल्या अनेक विश्वांच्या निर्मितीची, त्यांच्या स्थितीची आणि क्षणोक्षणी घडत असलेल्या अनेक विश्वांच्या संहाराची पुष्टी केलेली आहे. आधुनिक विज्ञानाला अनेक मर्यादा आहेत पण पिंडी ते ब्रह्मांडी हे तत्व घेऊन त्याकाळी निरीक्षण करून आपले याबाबत आपले अगदी ठोस निष्कर्ष मांडणारे मैत्रेय ऋषी हे महाज्ञानी ठरतात आणि महात्मा विदुरांनी सुद्धा अत्यंत जिज्ञासू बुद्धीने त्यांना प्रश्न विचारून स्वतःच्या मनाची तृप्ती करून घेतलेली दिसते.

विसाव्या शतकातला थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणतो "If there is creation then there must be a creator, which I am not. I am only the observer." मैत्रेय ऋषी आणि महात्मा विदूर यांच्या संवादानंतर महात्मा विदूरांना या विश्वाचे आणि विश्वनिर्मात्या भगवंताचे यथार्थ ज्ञान झाले आणि भगवान श्रीकृष्ण वियोगाने खिन्न झालेले त्यांचे मन तृप्त व शांत झाले. 

आपल्या संस्कृतीतले प्राचीन ऋषीमुनी हे ज्ञानमार्गी होते. ते विविध प्रयोग करून बघणारे आणि आलेले निष्कर्ष प्रत्यक्षात पडताळून बघणारे शास्त्रज्ञ होते. आपल्याला असलेले ज्ञान मौखिक परंपरेने आपल्या योग्य शिष्यांपर्यंत संक्रमित करून ज्ञानपरंपरा अखंडित ठेवण्यासाठी धडपडणारे महात्मा होते. आणि परमेश्वराने निर्माण केलेल्या या समस्त विश्वाविषयी ममता ठेवणारे होते. सृष्टीचा विनाश होईल असे शोध लावणारे नव्हते. निसर्गाला जपणारे होते आणि त्याचबरोबर मानवी मनोव्यापारांबाबत सूक्ष्म अभ्यास असलेले अत्यंत हुशार असे मानसशास्त्रज्ञ होते. त्यांच्या विषयी अपार आदर आणि कृतज्ञता बाळगूयात आणि त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन या सृष्टीसंरक्षणाविषयी, समस्त सृष्टीच्या कल्याणासाठी कार्य करण्यास कटीबद्ध होऊयात.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" ज्येष्ठ वद्य दशमी / एकादशी शके १९४८ दिनांक  १० / ७ / २०२६


१० जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


Thursday, July 9, 2026

श्रीमदभागवत चिंतन - ९ विदुर मैत्रेय संवाद् (भाग पहिला)

कौरवांच्या दरबारात महाभारत युद्ध टाळण्यासाठी आपल्या भावाला, धृतराष्ट्राला आणि आपल्या पुतण्यांना न्याय्य आणि सात्विक बुद्धीने वागण्याचा उपदेश करणारे महात्मा विदुर शेवटी अत्यंत उद्वेगाने आणि निराशेने हस्तिनापुराबाहेर पडले. महात्मा विदुर भगवान श्रीकृष्णांचे चिंतन, मनन करीत विविध तीर्थस्थळी भेटी देत अत्यंत साधेपणाने आपले आयुष्य व्यतीत करू लागलेत.

तीर्थयात्रा करता करता त्यांची भेट प्रभासपट्टण क्षेत्री असलेल्या कृष्णसखा उद्धव यांच्याशी झाली. श्रीमदभागवतात कृष्णसखा उद्धव याचे असे वर्णन आले आहे की उद्धव हे भगवान श्रीकृष्णाचे अत्यंत आत्मिक मित्र होते. इतकी घट्ट मैत्री की उद्धव हे दिसायला सुद्धा हुबेहुब भगवान श्रीकृष्णांसारखेच होते. आजच्या आधुनिक शास्त्रांनी सुद्धा हे सिद्ध केलेले आहे की पती आणि पत्नी जर एक्मताने, एकदिलाने, एकमेकांमध्ये विरघळून जर संसारात मार्गक्रमण करत असतील तर काही वर्षांनी एकमेकांसारखेच दिसायला, वागायला, बोलायला लागतात. उद्धव आणि भगवान श्रीकृष्णांच्या मैत्रीची स्थिती अगदी तशीच अंतरंग आणि आत्मिक होती.



महात्मा विदुरांनी कृष्णसखा उद्धवांना त्यांची ख्यालीखुशाली विचारली आणि विदुरांचे आराध्य दैवत असलेल्या भगवान श्रीकृष्णाबद्दल विचारले. तेव्हा उद्धवांनी अत्यंत व्यथित मनाने यदुवंशामधल्या आपापसातल्या यादवीची, त्यांच्या संहाराची आणि प्रत्यक्ष भगवंतांच्या अवतार समाप्तीची अत्यंत दुःखद वार्ता विदुरांना कळवली. दोघेही महात्मा अत्यंत शोकाकूल झालेत. आता या पृथ्वीतलावर आपल्याला आसरा कोण ? कोण योग्य मार्गदर्शन करणार ? कुणाच्या आधाराने आपण यापुढील आयुष्य व्यतीत करायचे ? असे सगळे प्रश्न महात्मा विदुरांना पडले तेव्हा उद्धवजींनी त्यांना मैत्रेय ऋषींच्या आश्रमात जाऊन मैत्रेय ऋषींचा उपदेश घेण्याची आज्ञा दिली आणि आपल्या पुढील प्रवासाला उद्धवजी रवाना झालेत.

महात्मा विदुर मैत्रेय ऋषींच्या आश्रमात गेले आणि त्यांनी मैत्रेयांना या सृष्टीरचनेविषयी, तिच्या सार आणि असारतेविषयी विविध प्रश्न विचारलेत. मैत्रेयांनी त्याची जी उत्तरे विदुरांना दिलीत ती आज ५ हजार वर्षांनंतर आपल्याला आपल्या आधुनिक ज्ञानाने दिलेल्या उत्तरांशी अत्यंत मिळतीजुळती आहेत. हे स्तिमित करून टाकणारे आहे. 

मैत्रेय ॠषींनी सृष्टीच्या उत्पत्तीबाबत महात्मा विदुरांना सांगितले, 

"सृष्टीच्या प्रारंभी भगवान एकटेच होते. एकच तत्व होते. त्यांना इच्छा झाली "एकोहम. बहुस्याम." मी एकटाच आहे. आता आपली अनेक रूपे निर्माण करावीत. म्हणून त्यांनी

महत तत्वात विकुर्वाणाद अहंतत्वं व्यजायत ।

कार्य कारण कर्त्रात्मा भूत इन्दिय मनोमयः ॥

भगवंतांनी या सृष्टीत कार्य म्हणून अनेक भूत (विविध जीवांची), या कार्याचे कारण म्हणून अनेक इंद्रियांची आणि ही कार्ये करण्यासाठी कर्ता म्हणून मनाची निर्मिती केली. आजही आपण बघतो की कुठलेही कार्य आपण आपल्या इंद्रियांसाठी करतो, त्या कार्याचा मूळ कर्ता हे आपले मन असते आणि आपले शरीर हे ते कार्य प्रगट करण्यापुरते एक साधनच असते.



मैत्रेय पुढे सांगतात की त्यानंतर भगवंतांनी सात्विक, राजस आणि तामस असे तीन अहंकार निर्माण केलेत. सात्विक अहंकारातून या सृष्टीचे यथार्थ स्वरूप जाणणारे ज्ञान निर्माण झाले, राजस अहंकारांनी ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रियांना ज्ञान देण्याची व्यवस्था केली आणि तामस अहंकारातून शब्द निर्माण झाले आणि शब्दरूप आकाश निर्माण निर्माण झालेत.

शब्द आणि आकाश ते तामसी अहंकारांमधून निर्माण झालेले आहेत. आपण वाचतो, ऐकतो किंवा क्वचित अनुभवसुद्धा घेतो. एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीकडे एखादी उत्कट भावना पोहोचवायची असेल, ये हृदयीचे ते हृदयी अशी एखादी गोष्ट आपल्याला संक्रमित करायची असेल तर तिथे शब्द अपुरे ठरतात किंबहुना शब्द उपरे ठरतात. तिथे शब्दांची आवश्यकता उरत नाही. अत्यंत गूढ असलेले संवाद, ज्ञानप्रसार हा शब्दांशिवाय होत असतो. शब्द त्याच  ठिकाणी आवश्यक ठरतात जिथे सात्विकता कमी पडते. 

यानंतर मैत्रेयांनी इतर सर्व सृष्टीच्या क्रमशः निर्मितीविषयी महात्मा विदुरांना जो उपदेश केला तो उपदेश आणि या सृष्टीनिर्मितीबाबत आधुनिक युगात आपल्याला प्राप्त झालेल्या ज्ञानाशी त्याचा निकटचा संबंध याविषयीचे विवेचन आपण पुढील लेखात करूयात.

आपल्या संस्कृतीतले प्राचीन ऋषीमुनी हे ज्ञानमार्गी होते. ते विविध प्रयोग करून बघणारे आणि आलेले निष्कर्ष प्रत्यक्षात पडताळून बघणारे शास्त्रज्ञ होते. आपल्याला असलेले ज्ञान मौखिक परंपरेने आपल्या योग्य शिष्यांपर्यंत संक्रमित करून ज्ञानपरंपरा अखंडित ठेवण्यासाठी धडपडणारे महात्मा होते. आणि परमेश्वराने निर्माण केलेल्या या समस्त विश्वाविषयी ममता ठेवणारे होते. सृष्टीचा विनाश होईल असे शोध लावणारे नव्हते. निसर्गाला जपणारे होते आणि त्याचबरोबर मानवी मनोव्यापारांबाबत सूक्ष्म अभ्यास असलेले अत्यंत हुशार असे मानसशास्त्रज्ञ होते. त्यांच्या विषयी अपार आदर आणि कृतज्ञता बाळगूयात आणि त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन या सृष्टीसंरक्षणाविषयी, समस्त सृष्टीच्या कल्याणासाठी कार्य करण्यास कटीबद्ध होऊयात.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥





- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" ज्येष्ठ वद्य नवमी शके १९४८ दिनांक  ९ / ७ / २०२६


९ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


Wednesday, July 8, 2026

श्रीमदभागवत चिंतन - ८ धृव चरित्र

आपण सर्वांनीच धृव चरित्र हे अगदी बालपणापासूनच ऐकलेले असते. पण श्रीमदभागवताने धृव चरित्राचा थोडा विस्ताराने विचार केलेला आहे.

उत्तानपाद राज्याच्या दोन राण्या. सुरूची आवडती तर सुनिती नावडती. सुरूचीचा पुत्र उत्तम हा राजाच्या मांडीवर बसून खेळत असताना सुनितीच्या पुत्राला, धृवाला सुद्धा आपल्या वडिलांच्या मांडीवर बसून खेळण्याची इच्छा झाली आणि उत्तमाच्या आईने, राणी सुरूचीने त्याचा तीव्र शब्दांनी अपमान केला. आणि अपमानित झालेला धृव एका दृढ निश्चयाने, वडिलांच्या राज्याचा अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी वनात तपश्चर्येसाठी निघाला.

तपश्चर्येसाठी निघालेल्या धृवबाळाचे वय तेव्हा अवघे ५ वर्षांचे होते. इतक्या लहान वयातल्या बालकाचा हा असा दृढ निश्चय बघून जगकल्याणार्थ सर्वत्र संचार करणारे देवर्षि नारद त्याला भेटलेत आणि त्याला ॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय॥ या द्वादशाक्षरी मंत्राचा त्यांनी उपदेश केला आणि तपश्चर्येबाबत मार्गदर्शन केले. 

धृवबाळाने देवर्षि नारदांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे अतिशय खडतर अशी तपश्चर्या सुरू केली आणि फ़क्त ६ महिन्यांमध्येच भगवान विष्णू त्याला प्रसन्न झालेत. आपल्या अशा अत्यंत दृढनिश्चयी बालक भक्ताला बघायला स्वतः भगवान अत्यंत आतूर झालेले होते. भगवंत प्रगट होताच धृवबाळ सदगदित झाला, त्यांने भगवंतांना दंडवत प्रणाम घातला आणि त्याने भगवंतांची स्तुती केली. ही स्तुती मूळ संस्कृत संहितेतून वाचण्यासारखी आहे आणि आपल्यासारख्या सर्व गृहस्थांनी रोजच्या वाचनात ठेवण्यासारखी आहे.

प्रसन्न झालेल्या भगवंतांनी धृवबाळाला ३६ हजार वर्षे पित्याचे राज्य करण्याचा वर दिला आणि त्यानंतर सप्तर्षीसुद्धा ज्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकले नाहीत त्या ठिकाणी विश्वाच्या अंतापर्यंत दृढ स्थितीत राहण्याचा वर दिला. त्याची सावत्र आई आणि सावत्र बंधू भविष्यात कशा प्रकारची दुःखे भोगत मृत्यूला प्राप्त होतील याचे ज्ञान दिले आणि भगवान अंतर्धान पावले.



प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन झाले, वरप्राप्ती झाली, विश्वात अगदी उच्च स्थान प्राप्त झाले, शत्रूंचा बिमोड झाला पण या वरांमुळे धृव आनंदला नाही. भगवंताच्या दर्शनानंतर अत्यंत निर्मळ झालेल्या त्याच्या चित्तात त्याला जाणवले की भगवंतांनी त्याला जे दिले ते सगळे इहलोकीचे वैभव दिले. भगवंत दर्शनसमयी त्याच्या हृदयात जी मलिनता होती त्यामुळे त्याचे चित्त ओळखून भगवंतांनी त्याला या इहलोकीचे सगळे सुख दिले. धृवाला जाणवले की अनेक योगी, तपस्वी मंडळी हजारो जन्म घेऊन जी तपश्चर्या करतात आणि भगवंताला प्राप्त करून घेतात त्या भगवंताला मी फ़क्त ६ महिन्यांमध्ये प्राप्त करून घेतले होते पण माझ्या चित्तामधल्या मलिनतेमुळे माझा घात झाला. प्रत्यक्ष भगवंताला त्याच्या चरणांशी अक्षय्य वास, जन्मोजन्मांमधून मुक्ती मागून घेण्याऐवजी मी फ़क्त इहलोकीचे अढळपद मागितले. धृवबाळाला हे ज्ञान झाल्यानंतर तो खिन्न झाला. भगवंत प्रसन्न होऊनही जे मिळायचे ते मिळालेच नाही असे त्याला सतत वाटत राहिले.

त्यानंतर धृवबाळाने आपल्या चित्तातल्या मलिनतेचा जाणीवपूर्वक त्याग केला आणि आपल्या सावत्र आईविषयी आणि सावत्र भावाविषयी द्वेषभावना मनातून नष्ट केली. त्याने इहलोकीची सगळी सुखे भोगलीत, पराक्रम गाजवत प्रत्यक्ष कुबेराचा युद्धात पराभव केला आणि कुबेराकडून भगवंताच्या चरणांशी अक्षय्य राहण्याचा वर प्राप्त करून घेतला आणि अंतिमतः आपल्या आईसह, सुनितीसह तो वैकुंठात भगवंताच्या अक्षय्य सानिध्यात गेला.

आपलीही अवस्था त्या धृवबाळासारखीच असते की नाही ? आज या युगात आपली सर्व पूजा, अर्चना, यज्ञयागादि विधी हे इहलोकींच्या अनेक कामनापूर्तीसाठीच असतात. काहीतरी काम्य भावना मनात धरूनच आपण भगवंताला आळवतो. धृवाला सुद्धा ही चूक आहे हे प्रत्यक्ष भगवंताने दर्शन दिल्यानंतर त्याच्या चित्ताचे मालिन्य दूर झाल्यानंतर कळले. आपण हे ज्ञान धृवबाळाच्या चरित्राच्या नुसत्या अवलोकनाने, मननाने मिळवू शकतो. भगवंताची उपासना, भक्ती कशासाठी ? या प्रश्नाचे अत्यंत सात्विक बुद्धीने आपण मनन केले पाहिजे आणि फ़क्त भगवंतावर प्रेम आहे म्हणून त्याची पूजा, अर्चा, भक्ती आदि गोष्टी आपण आचरणात आणल्या पाहिजेत. 

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज एका ठिकाणी म्हणतात की या जगात अमुक एका गोष्टीची प्राप्ती व्हावी म्हणून जर आपण नामस्मरण करत असू तर ते स्वतःच्या आईला विकण्याइतके वाईट आहे. नामस्मरण हे नामस्मरणासाठीच व्हायला हवे. देवाचे मला दर्शन व्हावे हा सुद्धा हेतू त्यात नसावा. इतकी निष्काम भक्ती आपल्या सर्वांकडून व्हावी म्हणून श्रीमदभागवतातले हे धृवचरित्र आहे.

मग करायचा का संकल्प अशा विमल भगवंतभक्तीचा ? संकल्पाला पूर्णत्वदाता स्वतः तो भगवान आहेच. आपला संकल्प मात्र अत्यंत शुद्ध आणि दृढ असायला हवा.



॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" ज्येष्ठ वद्य अष्टमी शके १९४८ दिनांक  ८ / ७ / २०२६


८ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६