संत समागम, हरी कथा, तुलसी दुर्लभ दोय
सुत, दारा और लक्ष्मी, पापी के भी होय.
वृंदावनात एका विश्राम स्थळाजवळ लिहीलेला हा दोहा. मनुष्य जीवनाचा साकल्याने विचार केला तर त्यातल्या उपदेशाचे महत्व पटेल. आपल्या मानवी जीवनात ख-या संतांचा सहवास, त्यांच्या मुखातून आलेली हरी कथा आणि घरी तुळशीची सेवा या दुर्लभतेने प्राप्त होणा-या गोष्टी आहेत. त्यासाठी विशेष पुरूषार्थ गाजवावा लागतो. जाणीवपूर्वक विशेष पुण्य कमवावे लागते.
त्यामानाने पैसा कमावणे, लग्न करणे आणि मुले बाळे होणे यात विशेष पुरूषार्थ असा गाजवावा लागत नाही. या दोन सांसारिक गोष्टींसाठी जाणीवपूर्वक पुण्य कमवावे लागत नाही. सर्वसामान्य माणसांनाही या गोष्टी मिळतात.
आपल्या भारतीय विचारदर्शनात "धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष" असे चार पुरूषार्थ सांगितलेले आहेत. एखाद्या व्यक्तीने जन्माला येऊन विशेषत्वाने प्राप्त करून घेण्याची गोष्ट म्हणजे पुरूषार्थ. यात "पुरूष" हा शब्द लिंगवाचक नसून समस्त मानव जातीच्या सर्वनामासारखा वापरला आहे हे आपण इथे ध्यानात घेतले पाहिजे.
पण आपण सर्वांची गल्लत कुठे होते माहिती आहे ? आपण आपली शक्ती, आपले ध्येय हे अर्थ प्राप्ती साठी आणि काम प्राप्तीसाठी वापरतो. मधले दोन पुरूषार्थ साधण्यासाठी आपण जन्मभर घडपडत राहतो आणि धर्म व मोक्ष हे आपल्या नशीबावर टाकतो. "असेल नशीब तर मिळेल मोक्ष", "रोजच्या कामांमधून वेळ मिळाला तर करू धर्म" अशी आपली मनोवृत्ती बनत जाते.
याउलट संत मंडळी, या क्षेत्रातली जाणकार मंडळी पहिला आणि अखेरचा पुरूषार्थ हा विशेषत्वाने प्राप्त करून घेण्याची गोष्ट मानतात. म्हणजे धर्म जपण्यासाठी आणि मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न मनुष्याने केल पाहिजेत यावर त्यांचा भर असतो. तर अर्थ आणि काम यांची प्राप्ती ते प्रारब्ध आणि पूर्वकर्मांवर सोडतात. इथेच संतांमधला आणि आपण सर्वसामान्य प्रापंचिकांमधला मनोवृत्तीतला आणि प्राप्त होणा-या फ़ळांमधला फ़रक आपल्या ध्यानात येतो.
जीवनाचा साकल्याने आणि समग्रपणे विचार केला तर आपल्या लक्षात येईल की या मर्त्य लोकात कितीही अर्थ आणि काम प्राप्ती आपल्याला झाली तरी हा मर्त्य लोक सोडताना त्यातले काहीही आपल्या सोबत येत नाही. उलट यांची प्राप्ती करताना आपण विशेषत्वाने काही वाईट कर्मे केली असतील तर ते ओझे आपल्याला पुढचे अनेक जन्म सोबत घेऊन वावरावे लागते किंबहुना ते ओझे उतरवण्यासाठी पुढले अनेक जन्म घ्यावे लागतात.
याउलट धर्म आणि मोक्ष या दोन पुरूषार्थांच्या प्राप्तीसाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केलेत तर हे पुरूषार्थ आपल्या या जन्म आणि मृत्यूच्या फ़े-यातून कायम मोकळे करण्यासाठी साह्यभूत ठरतात. आता धर्म आणि मोक्ष हे पुरूषार्थ प्राप्त करताना जर अर्थ आणि काम या दोन पुरूषार्थांकडे दुर्लक्ष झालेच तर त्या व्यक्तीला या भौतिक जगातल्या तथाकथित सफ़ल व्यक्तींकडून अपमान आणि उपेक्षा सहन कराव्या लागतीलही बहुतेक पण एकदा धर्म म्हणजे काय़ ? आणि मोक्ष मिळाल्यानंतर मी नक्की काय सुख प्राप्त करून घेणार ? याविषयी मनाची पक्की बैठक झाली की त्या व्यक्तीची मनोवृत्ती "कहा काज संसारसे, मुझे धनी से काम" अशी होऊन जाते.
अशा परिपक्व विचाराच्या व्यक्ती या जगातला आपला वावर म्हणजे एका मोठ्ठ्या नाटकातमध्ये आपण भूमिका करतोय, विंगेतल्या अंधारातून आलोय आणि नाटकातली आपली भूमिका संपल्यानंतर पुन्हा विंगेतच जायचय. मग या घटकाभराच्या नाटकात आपल्याला राजाची भूमिका मिळाली काय किंवा भिका-याची भूमिका मिळाली काय ? सगळे सारखेच. इथला राजाही घडीभराचाच आणि भिकारीही घडीभराचाच. फ़क्त आपण आपली भूमिका किती ताकदीने सादर करतोय त्यावर आपले इथल्या असण्याचे मूल्यमापन होणार आहे हे ती परिपक्व व्यक्ती पक्की ओळखून असते. म्हणून मिळालेली भूमिका कुठलीही असो त्या सर्वशक्तीमान दिग्दर्शकावार विश्वास ठेऊन ती भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत असते.
मग बदलायची आपण आपली याबाबतीतली मनोभूमिका ? एका दिवसात हा बदल नक्कीच होणार नाही पण सातत्यपूर्ण प्रयत्नांनी, दृढ विश्वासाने हा बदल एक दिवस आपल्या आयुष्यात नक्कीच येईल. याबाबत अनेक संतांनी आपल्याला ग्वाही दिलेली आहे.
करायची मग सुरूवात, अगदी आज, आत्त्ता ?
- धर्म आणि अध्यात्म मार्गावरचा एक मुमुक्षू, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.












