सध्या, माझा आवडता ऋतू, पावसाळा सुरू आहे. रात्रभर झोपेनंतर सकाळी उठल्यावर जर सूर्य उगवल्यानंतरही अंधारलेल्या वातावरणात, पावसाची रिपरिप कानी येत असली की
"पाऊस कधीचा पडतो
झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली
दुःखाच्या मंद सुरांने"
ही ग्रेसची कविता आठवते.
बदल असलाच तर फक्त ग्रेसच्या "दुःखाच्या मंद सुरांने" ऐवजी "सुखाच्या मंद सुरांने" ही भावना असते. खरोखर असे झोपेतून जागे होताना पाऊसाची रिमझिम कानी पडणे यासारखे सुख नाही. सर्द, गार वातावरणात कामाचाही उत्साह वाढतो हा माझा अनुभव. दिवसाची अशा प्रकारे छान सुरूवात होते.
आजवर अगदी बालपणचे ३-४ सोडलेत तर चांगले ४० - ४५ पावसाळे नुसते बघितलेच नाहीत तर सजगतेने अनुभवलेले आहेत. प्रत्येक पावसाळा खूप छान. पण एकदोन भितीदायक पण अनुभव आहेत.
२६ जुलै २००५ च्या मुंबईच्या ढगफुटी पावसात (१००० + मिमी पाऊस आणि तो सुध्दा एका दिवसात) सापडल्याचा अनुभव सव्वा तपानंतर आजही काटा आणतो.
असाच एक चित्रमय अनुभव.
१८/०७/२०१३ : सांगोल्यावरून काॅलेजनंतर संध्याकाळी ५ वाजता आम्ही निघालोत. नागपूरला गुरूमहाराजांकडे श्रीगुरूपौर्णिमा उत्सवासाठी मी, सौ. वैभवी आणि चि. मृण्मयी आमच्या गाडीने निघालो. तत्पूर्वी गाडीने सांगोला ते नागपूर हा ७५० किमी प्रवास दोनवेळा केलेला असल्याने त्या आघाडीवर निर्धास्त होतो.
रात्री ९ वाजता लातूर गाठले. ४ तासात २२० किमी. लातूरला एक मोटेल शोधले. विश्रांती घ्यायला लागलो.
१९/०७/२०१३ : पहाटे ५ ला उठून पटकन आवरून ५.३० ला प्रस्थान ठेवले. वाटेत हायवेवरच अहमदपूरच्या एका छोट्याशा हाॅटेलमधे सकाळी ७.०० वाजता गरमागरम इडली सांबार आणि चहा घेतला. इतकी अप्रतिम इडली आणि चविष्ट सांबार अख्या दक्षिण भारताच्या प्रवासातही कुठेच चाखायला मिळाला नव्हता. आजही ती चव अगदी जिभेवर आहे.
पाऊस तसा सोबत होताच पण रिमझिम. दुपारी ११.३० च्या आसपास नांदेड जिल्हा सोडून विदर्भात प्रवेश केला तेव्हा विदर्भातल्या पावसाचे वैदर्भीय माणसासारखेच उखडेल आणि रौद्रभीषण स्वरूप दिसायला सुरूवात झाली.
"हा इदर्भाचा मानूस का नाय, सरका रायला त सरका रायते बाप्पू. आन येकडाव का याच टायक सरकल का नाय त मंग पुरती आत्तरपित्तर काढून ठ्येवते त्यो." हे वैदर्भीय माणसाचे आणि पावसाचेही स्वभाववर्णन.
वाटेत धनोडावरून जाताना श्रीक्षेत्र माहूरला जाऊन अर्ध्या तासात कुलदेवतेचे, रेणुकामायेचे, दर्शन घेऊयात ही कल्पना आली. गाडी त्यादिशेने घेतली.
वाटेत विदर्भ मराठवाड्याला विभागणार्या अरूणावती नदीवरील पूल लागला. इतकी दुथडी भरून वाहणारी नदी मी आजवर कधीच पाहिली नव्हती. माहूरवरून दर्शन घेऊन परतेपर्यंत तरी पुराचे पाणी पुलावर येऊ नये अशी प्रार्थना करीतच माहूरला गेलो. दर्शन घेतले. साधारण तासाभरातच त्याच रस्त्याने परतलो. सुदैवाने पूर पुलापर्यंत पोहोचला नव्हता.
त्या जोरदार मार्यातच, नागपूरच्या, घराच्या ओढीने सावधानतेने गाडी चालवत वर्धा गाठले. आता काय ? शेवटचा ७० - ७५ किमीचाच पल्ला. थोडे सैलावलो. पण खरी कसोटी इथेच होणार होती.
वर्धा - नागपूर रस्त्याने केळझर सोडले आणि खडकी सेलडोह परिसरात इतका पाऊस लागला की गाडीतल्या गाडीत आम्हाला एकमेकांशी ओरडून बोलावे लागत होते. गाडीवर पावसाच्या मार्याचा अतीप्रचंड आवाज, हमरस्त्यावर पाटासारखे, प्रचंड वेगाने इतस्ततः वाहणारे पाणी काळजाची धडकी भरवणारे होते.
इंग्रजीत खूप बदाबदा पावसाला "It is raining Cats and Dogs" असा वाक्प्रचार आहे पण हा पाऊस म्हणजे "It was raining Elephants and Rhinos" या वर्णनाचा होता. मार्गात आसर्याला थांबण्यालायक जागा नव्हती आणि गाडी एका जागी स्थिर थांबली असती याची खात्री नव्हती. पाण्याच्या प्रवाहात गाडी वाहत जाण्याची दाट शक्यता आम्हाला कुठे थांबू देत नव्हती.
हळूहळू आणि ड्रायव्हिंगचे सगळे कौशल्य पणाला लावून वर्धा ते नागपूर अंतर दोन तासात कापून घरी आलो. सुटकेचा निःश्वास सोडला. अत्यंत भीतीदायक आणि विचित्र पाऊस.
दुसर्या दिवशी (२०/०७/२०१३) सकाळी वर्तमानपत्र उघडले आणि सिंदीजवळ आदल्या दिवशी संध्याकाळी झालेल्या पावसाच्या मार्यात रेल्वेमार्गाचा भरावच वाहून गेल्याची बातमी वाचली आणि पुन्हा एकदा काळजाचा थरकाप उडाला.
काल आम्ही याच वेळेस त्याच जबरदस्त पावसाच्या पट्ट्यात सापडलो होतो. थांबलो असतो तर काय झाले असते ही कल्पनाही करवत नव्हती. गुरूमाऊलीचे, परमेश्वराचे आभार मानले.
गुरूपौर्णिमा उत्सव आटोपून परतताना मात्र एक वेगळीच मजा झाली. परतताना नागपूर - अमरावती - कारंजा (लाड) - मालेगाव (जहांगिर) - मेहेकर - देऊळगावराजा - जालना - अंबड - गेवराई - बीड - चौसाळा - मांजरसुंबा - कुंथलगिरी - येरमाळा - बार्शी - कुर्डुवाडी - पंढरपूर - सांगोला असा ८०० किमीचा मार्ग निवडला होता. एका दिवसात अंतर कापले गेले पाहिजे म्हणून नागपूरवरून पहाटे ४.३० ला च निघालो. वाटेत सतत पाऊस. सारखी आपली रिपरिप, रिपरिप. दिवसभर गाडीचे वायपर्स सुरू ठेवल्यामुळे तो आवाज संध्याकाळपर्यंत नकोसा वाटायला लागला होता. बरे, पाऊसही असा खट्याळ की वायपर्स बंद केलेत की असा वाढायचा की समोरचे दिसेनासे होईल. आणि वायपर्स सुरू केलेत की आपला रिमझिम, रिमझिम. वायपर्सची गरज नाही असे वाटणारा.
संध्याकाळी ७ च्या सुमारास जवळपास ७८० किमी अंतर कापून पंढरपूर - सांगोला रस्त्यावरील खर्डी गावी पोहोचलोत तर काय आश्चर्य ! सगळा परिसर कोरडाठाक. गेले वर्षभर इथे पाऊस नसल्यासारखा. खर्डी पासून सांगोल्यापर्यंत, २० किमीच्या पट्ट्यात, पाण्याचा टिपुस नाही आणि गेल्या दोन तीन दिवसात पडल्याचा मागमूस नाही.
संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस दमदार हजेरी लावत असताना हा भाग कोरडाच्या कोरडा. "पर्जन्यछायेचा प्रदेश" हे भुगोलाच्या पुस्तकात केवळ शिकलो होतो, त्यादिवशी अनुभवले.
- अनेक विद्यार्थ्यांचा गुरूजी असलो तरी सतत कसली ना कसली शिकवण देणा-या जीवनाला एक गुरू मानणारा वैभवीराम मास्तर.





