श्रेष्ठ भगवदभक्त प्रह्लादाचा पुत्र विरोचन आणि त्याचा पुत्र बली हा मोठा पराक्रमी राजा होता. दैत्यकुळात जन्म झाला असला तरी आपल्या आजोबांच्या आणि वडिलांच्या संस्कारांमुळे ब्राह्मणांविषयी, यज्ञसागादि कर्मांविषयी त्याला अतिशय आदर होता. त्याच्या राज्यात तो आपल्या असुर प्रजाजनांसाठी नित्य यज्ञकर्मे, यागादि विधी करीत असे. अशा पद्धतीने जीवन जगता जगता तो इतका शक्तीशाली झाला की त्याने देवांवर स्वारी केली आणि इंद्राचे अमरावती नगर बळकावले. देवांना असुरांनी त्यांच्या स्थानावरून पदच्युत केले आणि ते स्वर्गाचे अनंत भोग उपभोगू लागलेत.
आपल्या पुत्रांना अशा प्रकारे पदच्युत होऊन दारोदार भटकावे लागत असल्याचे पाहून देवमाता अदिति दुःखीकष्टी झाली. तिचे पती कश्यप ऋषी आपल्या साधनेवरून परतल्यानंतर आपल्या पत्नीच्या उदासीचे कारण त्यांनी विचारले आणि अदितिने देवांच्या पराभवाचे व असुरांनी अमरावती बळकावल्याचे वृत्त आपल्या पतीला कळवले. कश्यप मुनींनी अदितिला पयोव्रत या साधनेचा उपदेश केला आणि देवमाता अदितिने मनात कुठलीही शंका न धरता ते व्रत आरंभिले.
पयोव्रताचे फ़ळ म्हणून प्रत्यक्ष भगवान विष्णू अदितिच्या उदरी आपल्या चतुर्भुज स्वरूपात संपूर्ण आयुधांसह प्रगट झाले आणि मातेच्या मनातला असुर पराभवाचा हेतू जाणून त्यांनी वामनाचे बटुरूप घेतले. बलिराजाकडे तेव्हा अनेक यज्ञ सतत सुरू असत. नर्मदेच्या तीरावर सुरू असलेल्या अशाच एका अश्वमेध यज्ञात बटु वामनरूपाने भगवान विष्णू प्रगट झालेत. असुर जरी असला तरी त्याचे सात्विक कर्म जाणून त्याच्या घरी भगवंतांना याचक म्हणून जावे लागते. किती गोड कल्पना !
तेव्हा ते बटुरूप वामन इतके सुंदर, लोभसवाणे आणि तेजस्वी दिसत होते की सगळे याज्ञिक. ऋत्विज आणि तिथे उपस्थित असलेले असुर सगळे अगदी मोहित झालेत. बलिराजाने बटुरूप वामनाचे पूजन केले आणि त्यांना दान देण्याचा संकल्प सोडला. तोपर्यंत दैत्यगुरू शुक्राचार्यांनी वामनरूपातील भगवान विष्णूंना ओळखले आणि आपल्या शिष्याला पदच्युत करण्यासाठी भगवान इथे आलेले आहेत हे जाणून बलिराजाला त्या बटुला दान न देण्याबाबत सांगितले. पण बलिराजाने त्यांना उत्तर दिले की एकदा मी त्या बटुला शब्द दिलाय आता जर मी तो शब्द मागे घेतला तर माझ्या कुळाला बट्टा लागेल. आता माझे जीवित संपले तरी चालेत पण मी त्या बटुला दान देणारच. दैत्यगुरू शुक्राचार्यांनी संतापून बलिराजाला "गुरूंची अवज्ञा केल्याने तुझी सर्व लक्ष्मी नष्ट होईल" असा शाप दिला आणि ते तिथून चालते झाले.
हा संवाद ऐकत असलेले भगवान विष्णू मात्र बलिराजावर, त्याच्या निश्चयीपणावर आणि ब्राह्मण, यज्ञकर्मे याबाबत असलेल्या त्याच्या प्रेमावर प्रसन्न झाले. बलिराजाने त्यांना दान देण्याचा संकल्प सोडल्यानंतर त्यांनी फ़क्त तीन पाऊले भूमीचे दान मागितले. बलिराजाला याचे फ़ार आश्चर्य वाटले. त्याने वामन भगवान यांना आणखीही काही मागण्याची विनंती केली. आपल्या मनात असेल तर मी या पृथ्वीतलावरील एखादे संपूर्ण द्वीप आपल्याला देऊ शकतो. माझे राज्य स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या त्रिखंडात आहे त्यातला एक संपूर्ण खंड तुम्ही मागितला तरी मी देईन अशी तयारी दर्शविली पण वामन भगवान आपल्या तीन पावलांच्या दानावर ठाम राहिलेत. याप्रसंगी बलिराजा आणि वामन भगवान यांचा संवाद श्रीमदभागवताच्या अष्टम स्कंधात मुळातूनच वाचण्यासारखा आहे. वामन भगवान बलिराजाला मनुष्यमात्रांच्या मनातल्या कधीही न संपणा-य़ा तृष्णेचा उपदेश करतात आणि ती तृष्णा ज्याची आहे तो तिन्ही लोकांचा स्वामी जरी बनला तरी आपल्या अंतरात्म्यातल्या तृष्णेमुळे मनातून कधीही सुखी होत नाही. कायम नवनवीन मिळवण्याची त्याची तहान कायम असते. याउलट प्रारब्धवशाने आपल्याला प्राप्त होत असलेल्या वस्तूंमध्ये तृप्त असलेला पुरूष हा जगाला जिंकल्यासारखाच समाधानी असतो हा उपदेश भगवान वामनांनी बलिराजाला केला. बलिराजा मनोमनी समजला. अत्यंत सात्विक बुद्धी जरी असली तरी नवनवीन गोष्टी मिळविण्याची तृष्णा आपल्याला कायम असमाधानी ठेवेल हा आत्मबोध त्याने करून घेतला.
त्यानंतर भगवान विष्णूंनी वामनरूपातून विराटरूप धारण करून एका पाऊलाने सगळी पृथ्वी, तर दुस-या पाऊलाने सगळे आकाश व्यापले. तिसरे पाऊल ठेवायला त्यांना जागाच मिळेना तेव्हा बलिराजाने आपले मस्तक त्यांच्यापुढे केले. बलिराजाचा हा दृढसंकल्प आणि सात्विकता पाहून भगवान प्रसन्न झालेत आणि त्यांनी बलिराजाला पाताळाचे राज्य दिले. या मन्वतरानंतर बलिराजा हाच जगाचा राजा म्हणून राज्य करणार असल्याचे वरदान सुद्धा बलिराजाला त्याने न मागता दिले.
वामनावतारात भगवंतांनी एका अतिशय सात्विक, शुद्ध राजाच्या मनातल्या तृष्णेची आणि त्यापासून कायम मिळत राहणा-या मनातल्या असंतोषाची त्याला जाणीव करून दिली आणि सरतेशेवटी त्याच्या मनात कायम संतोष राहील असा आशिर्वाद दिला. हा या कथेचा आपण सर्वांना आत्मबोध. आपण सात्विक बुद्धीचे आहोत पण आपल्या मनात अशी तृष्णा आहे का ? याचा विचार आपला आपण करायचा आहे आणि भगवान वामनांच्या उपदेशाप्रमाणे आपल्या मनाला बोध करून घ्यायचा आहे हाच या कथेचा प्रसाद.
॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥
- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध अष्टमी शके १९४८ दिनांक २१ / ७ / २०२६
२१ जुलै २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#जुलै२०२६





