Tuesday, July 28, 2026

श्रीमदभागवत चिंतन - २८ पूतनावध

श्रीकृष्ण गोकुळात वाढतो आहे हा वृत्तांत जाणून कंसाने आपले राक्षसी दूत गोकुळात धाडले. त्यातलीच एक मायावी राक्षसी म्हणजे पूतना. तिने अत्यंत सुंदर सुस्वरूप स्त्रीचा वेष धारण केला आणि अंतरात अगदी काळकूट विष घेऊन ती गोकुळात आली आणि जन्मलेल्या नवजात शिशूंचा शोध घेऊ लागली. तिच्या बाह्य वेषामुळे गोकुळातल्या साध्यासुध्या गोपांना आणि गोपींना तिचा अजिबात संशय आला नाही. अशीच ती पूतना मायावीरूपाने नंदबाबांच्या वाड्यावर आली आणि तिच्यावर संशय नसल्याने ती सरळ अंतःपुरात घुसली.



तिथे तिने श्रीकृष्णाला स्तनपान करविण्याची इच्छा दर्शविली. तोपर्यंत सगळ्या गोकुळात नंदबाबांचा हा लोभसवाणा मुलगा इतका लोकप्रिय झालेला होता की त्याला बघण्यासाठी, त्याला स्पर्श करण्यासाठी, त्याचे लाड करण्यासाठी, त्याला स्तनपान करविण्यासाठी गोपी सदैव उत्सुक असत. त्यामुळे नंदबाबांच्या वाड्यात पूतनेला कुणी अटकाव केला नाही.


पूतनेने श्रीकृष्णाला आपल्या स्तनांशी धरले. शास्त्रकार सांगताहेत त्याक्षणी श्रीकृष्णाने आपले डोळे गच्च मिटून घेतले. त्या मायावी रूपाचे दर्शनसुद्धा भगवंताला नको असते. तिने काळकूट विष लावलेल्या आपल्या स्तनाद्वारे श्रीकृष्णाला दूध पाजण्याचा प्रयत्न केल्याबरोबर श्रीकृष्णांनी तिचे स्तन तोंडात आपल्या घेऊन जोरात आकर्षण करायला सुरूवात केली. इतक्या जोरात की ती महाशक्तीशाली पूतना राक्षसी कळवळली. "अरे, सोड, सोड"असा आकांत करू लागली पण भगवंतांनी एकदा ज्याला धरले त्याला ते कधीच सोडत नाहीत हे त्या राक्षसीला माहिती नव्हते. तिने त्या बालकाच्या तावडीतून सुटण्याचा जीवाच्या आकांताने प्रयत्न केला पण शेवटी आपले महाकाय स्वरूप प्रगट करीत ती मृत्यूमुखी पडली. गोकुळातल्या लोकांनी तिच्या रडण्या ओरडण्याचा आवाज ऐकून नंदबाबांच्या वाड्यात धाव घेतली तेव्हा तिथे मरून पडलेली विशालकाय पूतना आणि तिच्या अंगावर निर्भयपणे क्रीडा करणारे नंदबाबांचे हे बालक त्यांना दिसले. 



गोपींनी धावून जात त्या बालकाला पूतनेच्या शरीरावरून उचलले. त्याला न्हाऊ माखू घातले. मोठ्या संकटातून तो वाचला म्हणून बालरक्षा स्त्रोत्र म्हणत त्याची दृष्ट काढली. हे बालरक्षा स्तोत्र सर्व भाविकांनी आपापल्या घरी संग्रही ठेवण्यासारखे आणि आपापल्या मुलांच्या रक्षेसाठी नित्य पठण करण्याजोगे आहे.


इकडे गोपांनी तो पूतनेचा विशाल देह अक्षरशः तुकडे करून वनात नेऊन जाळला. जाळल्यानंतर तो देह जळत असताना त्यातून दिव्य सुगंध बाहेर पडत होता. एका राक्षसीच्या देहातून बाहेर निघणारा हा दिव्य सुगंध अनुभवून सगळ्या गोपांना अतिशय आश्चर्य वाटले. पण शास्त्रकार सांगताहेत की भगवंतांना दुष्ट हेतूने का होईना स्तनपान करवून पूतनेने त्यांच्या मातेचा दर्जा प्राप्त करून घेतला होता. त्यामुळे तिचा देह दिव्य झाला आणि त्यातून सुगंध बाहेर पडत तो देह नष्ट झाला.


भगवंताचा अगदी द्वेषभावनेने ध्यास घेऊन त्याला भजले तरी त्या जीवाला मुक्ती मिळाल्याची अनेक उदाहरणे श्रीमदभागवतात आहेत. मग आपण जर त्याच्यावर प्रेम करून त्याचा ध्यास घेतला तर तो आपल्यासारख्या सर्वसामान्य साधकांना का बरे भेटणार नाही ? आपला का बरे उद्धार करणार नाही ?


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥



- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध चतुर्दशी, शके १९४८ दिनांक  २८ / ७ / २०२६


२८ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 




श्रीमदभागवत चिंतन - २७ श्रीकृष्णजन्मोत्सव

भगवान श्रीकृष्णांचा जन्म ऐन मध्यरात्रीच्या सुमाराला झाला तर भगवान श्रीरामांनी ऐन दुपारी जन्म घेतला. याचे अनेक व्यावहारिक अर्थ आपल्याला अनेक संत मंडळी सांगतात. दुपारच्या वेळी पोटात भुकेचा आगडोंब उसळला असताना त्याच्याकडे दुर्लक्ष करून जो श्रीरामांची वाट बघतो, त्यांची आराधना करतो त्यालाच श्रीराम मिळतात आणि त्याची तहानभूक हरण करतात. तसेच ऐन मध्यरात्री वासनांनी तनात आणि मनात थैमान घातले असताना जो त्यावर विजय मिळवून भगवान श्रीकृष्णाची आराधना करतो त्यालाच श्रीकृष्ण प्राप्त होतात आणि त्याच्या मनातल्या सर्व वासना घालवून त्याचे मन अगदी निर्मळ करतात. 


काही कवी कल्पना अशा की प्रभू श्रीरामांनी सूर्यवंशात जन्म घेतला आणि भर दुपारी सूर्यनारायणाला प्रथम दर्शन दिले. त्याप्रसंगी श्रीरामांचे मनमोहक बालरूप पाहून सूर्यनारायण आपली चाल चालायचा विसरला आणि एकाच जागी थांबून श्रीरामांचे दर्शन घेत राहिला. त्यामुळे चंद्राला त्यांचे दर्शन उशीरा मिळाले. त्यामुळे चंद्राची दर्शनाची आस पुरविण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी आपला हा अवतार चंद्रवंशीयांमध्ये घेतला आणि चंद्राला आपले प्रथम दर्शन देऊन त्याला पावन केले. कुठल्याही महिन्यातल्या वद्य अष्टमीच्या दिवशीचा चंद्रोदयाची वेळ आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की त्यादिवशी चंद्रोदय हा साधारण मध्यरात्रीच्याच वेळी होत असतो. भक्त आणि भगवंत यांच्यातील नात्याचा, भक्ताच्या मनातील भावना पूर्ण करण्याच्या भगवंताच्या प्रयत्नांचा किती सुंदर आविष्कार !


इकडे वसुदेव कारागृहात परतल्यानंतर गोकुळातून आणलेल्या आदिमायेने मोठा टाहो फ़ोडला. कारागृहात पहारा देत असताना झोपे गेलेले सगळे द्वारपाल जागे झाले आणि त्यांनी कंसाला देवकीच्या पोटी नवीन बालकाचा जन्म झाल्याची वार्ता दिली. कंस लगोलग तिथे आला आणि इतर सहाही जणांप्रमाणे त्याने ही छोटी बालिका देवकीच्या कुशीतून ओढून तिला आपटून ठार मारायला निघाला असतानाच ती त्याच्या हातून निसटली आणि तिने विजेसारखी आकाशात जाऊन आकाशवाणी केली, कंसा, तुझा वैरी, देवकीचा आठवा पुत्र, सखेनैव गोकुळात वाढतो आहे आणि तुझा तो नाश करणार हे अटळ आहे. भगवंताची माया ही भल्याभल्या साधू पुरूषांना चकवून गेलेली आहे तिथे कंसासारख्या दुष्टाच्या हाती ती अशी थोडीच लागणार ?


कंस मनातून भयंकर घाबरला. त्याने वसुदेव आणि देवकीची कारागृहातून सुटका केली. त्यांचा यथोचित आदर करून त्यांना मुक्त केले आणि सतत देवकीच्या आठव्याचा ध्यास धरून बसला.


इकडे गोकुळात नंदबाबा आणि यशोदामैय्यांना खूप काळाने पुत्र झाल्यामुळे सा-या गोकुळवासियांना अगदी आनंद झाला होता. व्रजभूमीतल्या सगळ्या घरात अगदी उत्स्फ़ूर्तपणे साफ़सफ़ाई, झाडझूड सुरू झाली. सर्वत्र गोमयाचे सडे घातले गेलेत, सुंदर रांगोळ्या काढल्या गेल्यात. भगवंताच्या व्रजभूमीतल्या आगमनाने सर्व चर आणि अचर सृष्टीसुद्धा मोहरून गेली होती. व्रजभूमीतल्या वृक्षांमधून वाहून वाहून वारा भगवंताची स्तुतीपर गाणी गात होता. त्याच्या गाण्यांनी पुलकित होत सगळे वृक्ष त्याच तालावर डोलत होते. गाई, वासरे आणि व्रजभूमीतल्या गोपांकडले समस्त गोधन छान शृंगारले गेले. त्या गाई वासरांनाही आपल्यासोबत खेळणा-या नव्या सवंगड्याच्या आगमाची वार्ता कळली होती. त्यांचाही आनंद अनावर होत होता.



गोकुळाचे पालनकर्ते नंदबाबा आणि यशोदामैय्या हे इतके प्रेमळ आणि सगळ्या गोपांमध्ये लाडके होते की नंदबाबांचा पुत्र बघायला सगळे गोप गोपी भल्या पहाटे अनेक भेटवस्तू घेऊन भगवंताच्या दर्शनासाठी नंदबाबांच्या वाड्यावर जमलेत. भगवंतांना बघितल्यावर त्या गोप गोपींचा आनंद मनात मावत नव्हता. त्यांनी अनेकविध रागांमधून आनंदगाणी गाऊन आपला उत्साह व्यक्त केला. आपल्या घरातले दूध, दही, लोणी ते एकमेकांच्या अंगावर उडवू लागलेत, नाचू लागलेत, आनंदोत्सव साजरा करू लागलेत.



नंदबाबांनीही सगळ्या गोपगोपींचा यथोचित सत्कार केला. भगवंताच्या आगमनापाठोपाठ गोकुळात अष्टसिद्धी आणि नवनिधी आपसूकच आल्यात. भगवंताच्या चरणाशिवाय इतरत्र कुठेही न राहणारी महालक्ष्मीसुद्धा त्यांच्या पाठोपाठ गोकुळात येऊन निवास करती झाली. गोकुळाची भरभराट सुरू झाली. 


आपण सर्व भाविक जनांच्या घरी आणि मनात रोजच पहाटे पहाटे असा नंदोत्सव साजरा झाला तर ? भगवंत आपल्या घरी आला आहे, तो इथे खेळणार, बागडणार आहे ही भावना मनात ठेऊन रोजच सकाळी आपण आपल्या मनात असा आनंदोत्सव साजरा केला तर ? त्या सर्वव्यापी भगवंताला आपले मन कळणार नाही असे थोडेच आहे ? रोज रोज आपण असा मनात उत्सव करीत गेलो तर एके दिवशी तो आपल्या मनात प्रगट होईलही. आणि एकदा त्याने एखादी जागा व्यापली की मग तो तिथून काहीही केल्या जात नाही. आपल्या मनात त्याने कायम ठाण मांडावे यापेक्षा आपल्या इथल्या जीवनाचे अधिक दुसरे कुठले उद्दिष्ट असले पाहिजे. तो आला त्याने आपल्या मनाचा ताबा घेतला. झालेच या जन्मोजन्मोंतरीच्या फ़े-याचे काम. त्याच्या चिंतनातच इथले आयुष्य संपले आणि येरझार संपली की.


करायचा आपल्या मनांमध्ये रोज असा नंदोत्सव, आनंदोत्सव ? 


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥



- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध त्रयोदशी, शके १९४८ दिनांक  २७ / ७ / २०२६


२७ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


Monday, July 27, 2026

प्रवास: एक अनुभव, एक चिंतन.

जानेवारी २०१३. नागपूरला ३ - ४ दिवस एका समारंभासाठी राहून सांगोला मुक्कामी परतत होतो. नागपूर - अमरावती - कारंजा लाड - मालेगाव जहांगिर - मेहेकर - सिंदखेडराजा - जालना - छत्रपती संभाजीनगर - अहिल्यानगर - करमाळा - टेंभूर्णी - पंढरपूर - सांगोला असा साधारण ८०० किमी प्रवासाचा मार्ग होता. 


भल्या पहाटे ४.३० ला नागपूरवरून प्रस्थान ठेवल्याने व वाटेत चहा, नाश्ता वगैरे गोष्टींसाठी वेळ न दवडता सलग ड्रायव्हिंग केल्याने दुपारी १.०० च्या सुमारास छत्रपती संभाजीनगर ओलांडल्या गेले होते. ४५० किमी ८ तास ३० मिनीटांत. लांबचे प्रवास अंतर कापायचे तर मधले थांबे कमी आणि कमीत कमी वेळाचे घायचेत हा आमचा नेहमीचा दंडक. म्ह्णून मग सकाळी निघतानाच भरपूर चहा पिऊन, थर्मासभरून चहा आणि कागदी कप्स घेऊन, घरीच बनविलेल्या सॅंडविचेस, ब्रेड बटरसारखा कोरडा नाश्ता घेऊन (म्हणजे गाडी चालवताना ड्रायव्हरसाहेबांनाही त्या नाश्त्याचा आनंद घेता येईल असा) गाडीतच चालता चालता चहा नाश्ता उरकून सलग गाडी चालवायची असा शिरस्ता.


छत्रपती संभाजीनगर  झाल्यानंतर मात्र सगळ्यांनाच भुकेची जाणीव झाली होती. आता अहिल्यानगर साधारण ३.०० पर्यंत आणि सांगोला संध्याकाळी ७.३० पर्यंत असे हिशोब डोक्यात आकार घेऊ लागले होते. जेवण्यासाठी एक तास जरी थांबलो तरी सांगोला रात्री ८.३० पर्यंत पोहोचणार होतो. ते चालण्यासारखे होते. अहिल्यानगर सोडल्यानंतर मात्र करमाळा, जेऊर शिवाय थांबून जेवण्यासारखी ठिकाणे नव्हती. करमाळा , जेऊर यायला संध्याकाळच झाली असती. मग अहिल्यानगरच्या आधीच जेवणाचा बेत पक्का झाला.


नेवासे फ़ाटा, घोडेगाव वगैरे गेल्यानंतर हायवेलगतच एक सुंदर ढाबा दिसला. अर्थात शुद्ध शाकाहारी. अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी, सुंदर संकल्पना आणि मस्त ambience चा. 



थांबलो. झाडांच्या सावलीतच मस्त मांडी घालून, बैठक लावून निवांत जेवण केले. बेत साधासाच होता. झुणका - भाकरी, वांग्याचे मस्त भरीत आणि तोंडीलावणे म्हणून लगतच्याच शेतामधून तोडून आणून चुलीवरच भाजलेल्या मिरच्या आणि टोमॅटो. पंचेंद्रियांना तृप्त करणारा अनुभव घेतला. आणि नव्या उर्जेने उरलेला २५० किमीचा सांगोल्याकडचा मार्ग क्रमू लागलो.





पहिल्यापासून नियोजन नसले की कधीकधी अशा अनवट जागा एक वेगळाच अनुभव देऊन जातात, नाही ? या सगळ्या नवनव्या, नित्यनूतन अनुभवांचा स्वतःला शोध लागत जाणे म्हणजेच प्रवासाची खरी मजा. नुसते "क्ष" ठिकाणावरून "य" ठिकाणापर्यंत जाणे म्हणजे प्रवास नाही.


- स्वच्छंद आणि मनमौजी प्रवासी पक्षी, वैभवीवल्लभ राम.

श्रीमदभागवत चिंतन - २६ श्रीकृष्णावतार

श्रीमदभागवताचा दशम स्कंध म्हणजे श्रीमदभागवताचे हृदय समजले जाते. आपल्या सर्वांच्या लाडक्या श्रीकृष्णाचे चरित्र या स्कंधातल्या ९० अध्यायांमध्ये अतिशय विस्ताराने वर्णन केलेले आहे. इतके विस्ताराने की श्रीमदभागवत हा ग्रंथ भगवान श्रीकृष्णाचे वाङ्मयीन स्वरूप समजले जाते. श्रीमदभागवताचा दशम स्कंध श्रीगणेशाला वर्णन करताना महर्षी वेदव्यास आपले देहभान विसरले आणि भावसमाधीत गेले. त्यांच्यात प्रवेश करून प्रत्यक्ष भगवंताने हा दशम स्कंध श्रीगणेशाला कथन केला असे मानले जाते आणि म्हणून दशम स्कंध ही वेदव्यासांची वाणी नसून प्रत्यक्ष भगवंताचे कथन आहे असे म्हणतात.


भाविक श्रोतृवर्गालासुद्धा दशम स्कंध ऐकताना अगदी आपल्या हृदयापासून एक निराळाच आनंद प्राप्त होतो. जसा नंदाघरी रोज सकाळी आनंदोत्सव साजरा होत गेला तसा आपल्या घरीही असा निखळ आनंदोत्सव साजरा होत जावा अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा होत जाते. प्रत्येकाच्या हृदयात शिरून त्यात असलेले मालिन्य नष्ट करून निखळ आनंद प्राप्त करून देणारा हा दशमस्कंध. याचा आनंद आपण पुढले काही दिवस घेऊयात.


मथुरेचा राजा कंस हा एक अत्यंत दुष्ट आणि रागीट राजा होता. त्याच्या दुष्टपणाला आणि अकारण कोपाला कंटाळून त्याच्या राज्यातल्या सुजाण नागरिकांनी त्याकाळच्या अन्य राज्यांचा आश्रय घेतला होता. स्वतःची बहीण देवकीचा विवाह वसुदेवांशी झाल्यानंतर जी आकाशवाणी झाली त्यात कंसाला देवकीचा आठवा पुत्र आपल्या मृत्यूला कारणीभूत होणार असल्याचे कळले. तो संतापाने बेभान झाला आणि त्याने आपल्या बहिणीला व जावयाला तुरूंगात टाकले. देवकीच्या पोटी जन्म झालेल्या सहाही पुत्रांना त्याने अत्यंत क्रूरपणे ठार केले. सातव्या पुत्राची गर्भधारणा देवकीच्या उदरी झाल्याबरोबर तिला या पुत्राची सुद्धा काळजी वाटू लागली. आधीच्या सहा पुत्रांप्रमाणे हा सुद्धा आपल्या भावाच्या हातून जन्मतःच मारला जाणार असे तिला वाटून तिची मुद्रा म्लान झाली.


सर्वशक्तीमान भगवंतांनी आपल्या योगमायेला बोलावून आज्ञा केली की आत्त्ता देवकीच्या उदरी असलेला गर्भ आकर्षण करून गोकुळात नंदबाबांचीच एक पत्नी असलेल्या रोहिणीच्या उदरी तिने प्रस्थापित करावा आणि योगमायेने नंदबाबांची पत्नी यशोदेच्या उदरी जन्म घ्यावा. भगवंत म्हणतात आता ज्ञान आणि बळ धारण करून संपूर्ण पराक्रमाने पृथ्वीतलावर अवतार घेण्याची वेळ आलेली आहे. मी देवकीच्या उदरी तिचा आठवा पुत्र म्हणून जन्म घेणार आहे. भगवंतांनी योगमायेला अनेक आशिर्वाद दिलेत आणि भगवंताचे कार्य करायला योगमाया पृथ्वीवर आली. तिने तुरूंगात असलेल्या देवकीच्या गर्भाचे आकर्षण करून त्याला गोकुळात असलेल्या रोहिणीच्या गर्भात प्रस्थापित केले. भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे हेच ते संकर्षण. गर्भाचे आकर्षण केल्यामुळे त्यांचे नाव संकर्षण पडले. खरे तर हे भगवंताच्या सावलीसारखे राहणारे शेषावतार. गतजन्मी भगवंताच्या बंधूंचा जन्म घेऊन त्यांच्यासोबत सावलीसारखा वनवास भोगलेले लक्ष्मण. भगवंतांना सोडून राहणार नाही ही यांची प्रतिज्ञा. त्यानुसार हे या जन्मात भगवंतांचे मोठे भाऊ म्हणून जन्माला आलेत. या जन्मात हे सर्व लोकांना रमविणारे होते म्हणून यांचे नाव "राम" झाले आणि अत्यंत बलवान होते म्हणून यांचे आणखी एक नाव "बलभद्र" असेही झालेत. श्रावण पौर्णिमेला यांचा जन्म नंदपत्नी रोहिणीच्या पोटी गोकुळात झाला.


इकडे तुरूंगात देवकीचा सातवा गर्भ गळाल्याची बातमी कंसाला कळाली. त्याला आता सतत आठव्याची भिती वाटू लागली. सतत आठव्याचा त्याने जणू ध्यासच घेतला. सतत आठव्याचा आठव तो करू लागला. दुसरा विषयच त्याला सुचेना. नुसत्या आगमनाच्या वार्तेने तो पराक्रमी दुष्ट राजा सैरभैर झाला.


इकडे भगवंतांनी त्यांच्या पूर्ण तेजासह वसुदेवाच्या शरीरात प्रवेश केला आणि स्वतःला देवकीच्या उदरी प्रस्थापित केले. देवकीला आनंद तर झाला होता पण इतर पुत्रांचे आपल्या बंधूने जे जन्मतःच हाल केले ते पाहून तिला या बालकाची काळजी सुद्धा वाटत होती. काय गंमत आहे बघा. जो सगळ्या जगाची काळजी घेतो त्याची काळजी त्याच्या आईवडिलांनाच असते. आपणही भगवंताकडे सदैव मागणे सोडून त्याची त्याच्या आईबापासारखी काळजी केली तर आपण त्याचे मानलेले का होईना आईबाप होऊच ना ? केवळ त्याच्यावर प्रेम आहे म्हणून त्याला आळवून बघूयात का ? त्याच्याकडून अगदी कुठलीही अपेक्षा न करता. यादरम्यान आपल्याला प्राप्त होणारी सुखदुःखे ही त्याचीच देण म्हणून त्या सुखदुःखांकडे त्रयस्थतेने बघूयात. असे देवाचे मायबाप व्हायला किती आनंद मिळेल नाही ?


भगवंताच्या अवताराची वार्ता ऐकल्यानंतर साक्षात ब्रह्माजी आणि शंकरजी त्या कारागारामधल्या खोलीत आलेत आणि त्यांनी भगवंतांची स्तुती केली. विश्वनिर्मात्या ब्रह्माजींनी आणि श्रीशंकरजींनी विश्वपालक भगवान विष्णूंची केलेली ही स्तुती ही श्रीमदभागवतात मुळापासूनच वाचण्यासारखी आहे. ही स्तुती नुसती पठण किंवा श्रवण केल्याने आपल्या मनातले सगळे मालिन्य, किल्मिष नष्ट होते हा अनेक साधकांचा प्रत्यक्षानुभव आहे.  


श्रावण वद्य अष्टमीच्या मध्यरात्री भगवान श्रीकृष्णांनी आपल्या चतुर्भुज स्वरूपात संपूर्ण ऐश्वर्यासह देवकीच्या उदरातून जन्म घेतला. त्यांचे ते दिव्य रूप बघून आपल्या पोटी प्रत्यक्ष श्रीविष्णूंनी जन्म घेतलेला आहे याची जाणीव वसुदेवांना आणि देवकीला झाली. त्यांनी भगवंताची स्तुती केली आणि त्यांना सर्व जगताचे कल्याण करण्याची प्रार्थना केली. भगवंतांनी आपल्या आईवडिलांना त्यांच्या यापूर्वीच्या दोन जन्मांचे स्मरण दिले. यापूर्वीच्या दोन्हीही जन्मांमध्ये वसुदेव आणि देवकी यांनी भगवंत आपल्या उदरी यावेत अशी मनापासून कामना करून ते दोघेही अत्यंत सात्विक जीवन जगले होते. त्याचे फ़ळ म्हणून प्रत्यक्ष भगवान विष्णू आपल्या पूर्णांशाने त्यांच्या उदरी आलेले होते.



भगवंतांनी योगमायेला आदेश दिल्याप्रमाणे तिने कंसाच्या तुरूंगाच्या सर्व द्वारपालांना गाढ निद्रेत ठेवले. स्वतः योगमायेने गोकुळात नंदपत्नी यशोदेच्या पोटी जन्म घेतला पण जन्मानंतर भगवंताच्या आज्ञेप्रमाणे यशोदामातेला ग्लानीत ठेवले. आपल्याला मुलगा झालाय की मुलगी झालीय हे न समजण्याइतक्या ग्लानीत. इकडे वसुदेवांनी भगवंताच्या आज्ञेनुसार आपले बालक आणि यशोदेचे बालक यांची अदलाबदल यमुनापार गोकुळात जाऊन केली. यशोदेच्या शेजारी भगवान कृष्ण निजलेत आणि देवकी व वसुदेवाला ठेवलेल्या कोठडीत योगमायेने आकांत मांडला.



भगवंताला बघायला, त्यांचे चरणस्पर्श करून आशिर्वाद घ्यायला प्रत्यक्ष यमुना नदी सुद्धा अत्यंत व्याकूळ झाली होती. वसुदेवांच्या मथुरा ते गोकूळ या प्रवासात तिने भगवंतांना चरणस्पर्श केलाच आणि ती पावन झाली. आपल्या प्रत्येकाघरी भगवंतांच्या जन्माचा असा आनंदोत्सव दररोज पहाटे साजरा व्हावा हीच मनापासून कामना करतो आणि आज इथे विरमतो.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध द्वादशी, शके १९४८ दिनांक  २६ / ७ / २०२६


२६ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 



Saturday, July 25, 2026

श्रीमदभागवत चिंतन - २५ ययाती देवयानी आख्यान

देवपुत्र कच याने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडे कपटवेषाने राहून त्यांच्याकडे असलेली संजीवनी विद्या शिकून घेतली. ती संजीवनी विद्या वापरूनच दैत्यगुरू युद्धात मृत झालेल्या दैत्यांना पुनर्जिवीत करीत असत आणि त्यामुळे देवांचा विजय दुरापास्त होत असे. कचाने ती विद्या शिकली आणि आपल्यावर अनुरक्त असलेल्या गुरूभगिनी देवयानीला शिकायला बाध्य केली. संजीवनी मंत्र षटकर्णी झाला. स्वतः दैत्यगुरू शुक्राचार्य, त्यांची कन्या देवयानी आणि कच या तिघांच्या सहा कानांमध्ये मंत्र पोहोचला आणि म्हणून तो मंत्र निष्प्रभ झाला. दैत्यगुरूंना त्याचा उपयोग होईना. इकडे कचाने सुद्धा देवलोकात परतण्याची इच्छा प्रगट केली. तेव्हा देवयानीने त्याच्यासोबत लग्न करण्याची इच्छा प्रगट केली पण कचाने तू गुरूभगिनी आहेस, मला संजीवनी विद्येने मला जिवंत केलेले आहेस त्यामुळे मला जन्म देणारी माता आहेस हा तर्क मांडून तिचाशी लग्न करण्याचे नाकारले. देवयानीने कचाला शिकलेली विद्या विसरण्याचा शाप दिला तर कचानेही देवयानीला कुणाही ब्राह्मण मुलाशी तुझे लग्न होणार नाही असा शाप दिला. व तो देवलोकात परत गेला.


एखादे गुपित दोन माणसांमध्ये मर्यादित राहिले तरच ते गुपित राहू शकते. ते तिस-या माणसापर्यंत गेले तर ते गुपित राहत नाही. इंग्रजीत Two is company, Three is crowd म्हणतात ते याचमुळे. आपल्या संस्कृतीत मंत्र सुद्धा गुरू आणि शिष्य दोन माणसांमध्येच मर्यादित रहावा असे प्रतिपादन केलेले आहे. आपला गुरूमंत्र कुणालाही, अगदी आपल्या आईवडीलांना, जीवनसाथीला सुद्धा सांगू नये तो यासाठीच. किंबहुना आपल्याला आलेले आध्यात्मिक अनुभव सुद्धा आपल्या सदगुरूवाचून कुणालाही सांगू नये. आपल्याला कितीही श्रेष्ठ स्वरूपाचे आध्यात्मिक अनुभव आले असतील, अनेक दर्शने झाली असतील पण ती सगळ्या लोकांना सांगून आपला लौकिक वाढवावा अशी कृती करू नये. आपल्याला आलेले आध्यात्मिक अनुभव, झालेली दर्शने ही आपल्या पूर्वभाग्याने आलेली आहेत आणि आपण आता आध्यात्मिक मार्गावर प्रगती करतो आहोत हे मनोमनी समजावे. या गोष्टी सदगुरूंशिवाय कुणालाही सांगू नयेत.



देवयानीच्या याच उद्दाम स्वभावामुळे तिचे राजकन्या शर्मिष्ठेशी भांडण झाले पण दैत्यगुरूंची लाडकी कन्या असल्याने राजाने आपल्या कन्येला, शर्मिष्ठेला, देवयानीची दासी म्हणून तिची सेवा करण्यास पाठवले. कचाच्या शापामुळे ब्राह्मण कन्या असलेल्या देवयानीचे क्षत्रिय राजा ययातीशी लग्न झाले. ययाती हा अत्यंत सुखलोलूप राजा होता. देवयानीसोबत विवाहानंतर त्याने अनेक प्रकारच्या वैवाहिक सुखांचा अगदी आकंठ उपभोग घेत काळ क्रमण करणे सुरू केले. अतिशय सुंदर आणि सौष्ठवपूर्ण असलेल्या ययाती राजाला आपल्या तारुण्याचा आणि देखणेपणाचा फ़ार अभिमान होता. यथावकाश देवयानी गर्भवती राहिली.


ती गर्भवती असताना तिची दासी म्हणून वावरणा-या राजकन्या शर्मिष्ठेसोबत यया्तीने तिच्याच मागणीनुसार शरीरसंग केला आणि तिला दोन पुत्र प्राप्त झालेत. दैत्यगुरूंना हे कळताच त्यांनी ययातीला वृद्धाप्याचा शाप दिला. इंद्रियसुखे आकंठ भोगण्यात सुख मानणा-या ययातीवर अचानक वृद्धाप्य प्राप्त होणे हा वज्राघातच होता. तो अत्यंत लीन होऊन शुक्राचार्यांच्या चरणावर कोसळला आणि त्याने शुक्राचार्यांना उःशाप मागितला. शुक्राचार्यांनी ययातीला तुझे वार्धक्य जर कोणी तरूणाने घेऊन तुला त्याचे तारूण्य दिले तर तुला तारूण्य कायम प्राप्त होईल असा वर दिला.


ययातीने आपल्या तरूण पुत्रांना त्याचे वार्धक्य घेऊन त्याला त्या पुत्रांचे तारूण्य देण्याबाबत याचना केली. पण हा आतबट्ट्याचा व्यवहार करण्यास कुणीच तयार होईना. ययातीच्या धाकट्या पुत्राला, पुरूला मात्र आपल्या पित्याची दया आली. पुरूने या शरीराचे अनित्यत्व आणि शरीराने प्राप्त होणा-या सुखांच्या मर्यादा त्याच्या तरूणपणीच ओळखल्या होत्या. त्यामुळे पितृआज्ञापालनातून येणारी संतुष्टी ही तारूण्यापेक्षा आणि तारूण्यात प्राप्त होणा-या सुखांपेक्षा जास्त महत्वाची आहे हे तत्व त्याने जाणले आणि ययातीच्या वार्धक्याचा सहर्ष स्वीकार केला. ययाती तरूण झाला तर त्याचा पुत्र पुरू हा वृद्धाचे जीवन जगू लागला.


अनेक वर्षे अशा तारूण्याचा आणि सर्व सुखांचा उपभोग घेतल्यानंतर ययातीला स्वतःलाच या सुखोपभोगांमध्ये बुडून राहण्यातला फ़ोलपणा कळला आणि त्याला पश्चात्ताप झाला. आपण केवळ या शरीरापुरताच विचार केला. त्यापलिकडे जाऊन आपण शाश्वत परमेश्वराविषयी कसलेही चिंतन केले नाही. जगातले सगळे धान्याचे कण, सगळे सुवर्ण, सगळ्या स्त्रिया जरी एखाद्या पुरूषाला प्राप्त झाल्यात तरी त्याची इंद्रिय तृप्ती होणार नाही. विषयांच्या आगीत आपण आणखी आणखी विषयांच्या उपभोगाची आहुती टाकत गेलो तर तो विषयाग्नी अधिकाधिक भडकतो आणि त्या विषयाग्नीत मनुष्यजीवनाची राख होऊन जाते याची जाणीव ययातीला झाली आणि तो पश्चात्तापाने पोळून निघाला. त्याने आपल्या पुत्राला, पुरूला आपले तारूण्य परत करून त्याच्याकडील आपले वृद्धाप्य प्रत मागितले आणि उरलेला काळ तो ईश्वरचिंतनात घालवू लागला. ख-या पश्चात्तापामुळे आणि ख-याखु-या क्षमायाचनेमुळे त्याचे चित्त ईश्वरचरणी विलीन झाले आणि त्याने मुक्ती प्राप्त करून घेतली.


इंद्रियसुखांच्या मर्यादा दाखवणारी ही गोष्ट. मनुष्याने या मर्यादा आणि इंद्रियसुखांची सतत वाढती मागणी लक्षात घेऊन त्यांच्या अधीन न होता भगवंताच्या आराधनेत आपले चित्त वळवीत रहावे कारण इंद्रियांची पूर्ण तृप्ती कधीही होत नाही हे साधकांच्या मनावर ठसविणारी ही गोष्ट. मनाला हा बोध होणे हाच या आख्यानाचा प्रसाद.



ययातीच्या पुत्रापासूनच यदुवंशाची उत्पत्ती झाली. यापुढील विवेचनात आपण यदुवंशीय भगवान कृष्ण यांचे गोड चरित्र श्रीमदभागवताचे हृदय समजल्या जाणा-या दशमस्कंधामधून अवलोकन करणार आहोत.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध एकादशी, देवशयनी आषाढी एकादशी, शके १९४८ दिनांक  २५ / ७ / २०२६


२५ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


Friday, July 24, 2026

मागणे लई नाही, लई नाही लई नाही...

नटांनी स्वतःच्या जिवावर उदार होऊन अभिनय वगैरे केलेल्या आणि प्रेक्षकांनी स्वतःच्या कौटुंबिक स्वास्थावर उदार होऊन पाहिलेल्या टुकार मराठी मालिका


 आणि 


मिळेल तिथून सर्वकाही फ़ुकट ओरबाडून घेण्याची वृत्ती. या दोन महत्वाच्या गोष्टींमुळे नव्वदोत्तर मराठी मध्यमवर्गीय समाजाचा र्‍हास झालाय असे माझे निरीक्षण आहे.


१. ज्या घरातील वृद्ध मंडळी बाल गोपाळांना " लवकर निजे, लवकर उठे " चे फ़ायदे सांगण्याऐवजी स्वतःच जर रात्री ११, ११.३० पर्यंत टुकार मालिका (दुपारी रिपीट टेलीकास्ट पुन्हा हं) पहात बसत असतील तर मग नातवंड पब मध्ये जातात म्हणून ओरडण्याचा अधिकार गमा्वून बसणारच. माझे मित्र श्री सचिन मधुकर परांजपे यांच्या प्रमेयाप्रमाणे तद्दन (टाकाऊ) मराठी मालिकांमधील निगेटिव्ह स्पंदनांचा परिणाम घरातील वातावरणावर होतोच. त्यातच ही मंडळी एकच भाग, तो कितीही टुकार का असेना, वारंवार पहातात आणि त्यातल्या आभासी वास्तवालाच खरे मानतात. 


एकाहून एक मूर्ख मराठी निर्माते आणि त्याहून मूर्ख लेखक हिंदी मालिकांची भ्रष्ट नक्कल करत, सॅडिस्ट पद्धतीच्या मालिकांचे प्रमोशन करत असताना त्यांना आपण नुसताच आश्रय देतोय असे नव्हे तर त्या प्रवृत्तींना हळूहळू आपल्या मनात आणि पर्यायाने घरात जागा देऊन आपल विश्व नासवतोय, हे लक्षात येतय का ?

 

मुला नातवंडांकडे लक्ष नाही, कुणाच छान झालेल बघवत नाही या सर्वांना कारण आपण ह्या आभासी जगाला दिलेला आश्रय हे आपल्याला कळतच नाहीये. एव्हढच काय तर कुठे प्रवासात किंवा आपण कुणाकडे बाहेरगावी पाहुणे म्हणून गेल्यावर त्यांच्या सोयी गैरसोयींचा विचार न करता आपण आपले हे घाणेरडे व्यसन जोपासतोय याची शुद्धही आपल्याला नाही. 

या मालिकांतून मानसिक समाधान तरी कुठल्या स्तराच मिळत ? आणि त्या प्रकारच्या वेळ घालवण्यात गंमत तरी काय ? याचा मी खूप गांभीर्याने विचार करत असतो.


ज्या समाजात आजी आजोबांचा मायेचा स्पर्श नसल्याने पाळणाघरं वाढतात, त्याच समाजात वृद्धाश्रम वाढतात हे वास्तव आहे. आम्ही बघितलेले आमचे आजी आजोबा असे नव्हते पण ते सुख आमच्या मुला, नातवंडांना मिळेल याची अजिबात हमी नाही. पूर्णच्या पूर्ण समाजाने आपली विचारशक्ती आणि गती या अती तद्दन गचाळ मालिकांपायी गमावली हे आपण कधी लक्षात घेणार ?


२. आमच्या बालपणी रेशनच्या दुकानांवर (स्वस्त धान्य दुकान) खुल्या बाजारापेक्षा कमी दरात धान्य, खाद्यतेल वगैरे मिळत असे. पण घरची परिस्थिती कितीही निम्न मध्यमवर्गीय का असेना, आपण सहसा रेशनच्या दुकानातून साखर खरेदीच्या पलिकडे खरेदी करत नसू. धान्याचा दर्जा हे एक कारण होतच, पण गोरगरीबांसाठी असलेल्या योजनेतून आपण कसे आणायचे ? ही भावना आणि आपण दोनवेळ का होईना, पोटभर जेवू शकतोय ही भावना ते पदार्थ आणण्यासाठी आड यायची. 


आज समाजातल्या उच्च मध्यमवर्गीयात सुद्धा जिथून मिळेल तिथून ओरबाडून घ्यायची वृत्ती वाढीला लागली आहे. मग " सरकार आमच्या जातीला काहीतरी सवलती देतंय का ? मग असल्या योजनांमधून थोडंफ़ार घेतल तर काय बिघडल ?" असली लंगडी सबब पुढे केली जाते. मग मित्र मंडळींमध्ये फ़ुकट पार्टी देणारा लोकप्रिय होतो. त्याने तो पैसा कुठल्या का मार्गाने मिळवला असेना त्याचे सोयर सुतूक आपल्याला नसत. आजकाल फुकट मिळाले तर आपल्याला शेणही चविष्ट वाटेल अशी सामाजिक स्थिती आहे.

बरंच लिहीण्यासारखं आहे पण थांबतो. आपल्या आजूबाजूच्या या परिस्थितीचा नक्की विचार कराल ही अपेक्षा.


या मालिका चार महिने बघायच्या नाहीत असा जरी नेम बापांनो तुम्ही केलात तरी आम्हाला चातुर्मासात घरच्या घरी विठ्ठल भेटेल.


मागणं लई नाही ... लई नाही... लई नाही.


- आपला कृपाभिलाषी, बालके राम. 

श्रीमदभागवत चिंतन - २४ परशूराम अवतार

रेणु ऋषींची कन्या रेणुका हिचा विवाह श्रेष्ठ तपस्वी मुनी जमदग्नी यांच्याशी झाला आणि या पवित्र दंपतींना अनेक पुत्र झालेत त्यातला सगळ्यात कनिष्ठ पुत्र म्हणजे भगवान परशूराम. पृथ्वीतलावरील हैहय नावाच्या क्रूर वंशाचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूंनी स्वतः हा अंशावतार धारण केलेला होता.



समाजात त्यावेळी चातुर्वर्ण व्यवस्था अस्तित्वात होती. समाजाला बौद्धिक दिशा दाखवणा-या व्यक्ती ब्राह्मण नावाने ओळखल्या जायच्यात, समाजचे रक्षण करणा-या व्यक्ती क्षत्रिय नावाने ओळखल्या जायच्यात. व्यापार उदीम करून समाजाच्या आणि राष्ट्राच्या संपत्तीत वाढ करणा-या व्यक्ती या वैश्य म्हणून संबोधल्या जायच्यात तर समाजाची सेवा करणा-या व्यक्ती या शुद्र म्हणून संबोधल्या जायच्यात. आजच्या भाषेत सांगायचे झाले तर आजची service industry. त्या काळी प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्मानुसार हा वर्ण प्राप्त करण्याचा आणि इतर वर्णात जाऊ शकण्याचा अधिकार होता. नंतरच्या काळात ही वर्णव्यवस्था जन्माधारित होत गेली आणि म्हणून टीकेचा विषय झाली.


क्षत्रियांनी राष्ट्राचे, समाजाचे रक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य होते पण हैहय वंशातले क्षत्रिय राजे या कर्तव्याला विसरून विषयलोलूप आणि तमोगुणी झालेले होते. त्यांनी आपल्या माहिष्मती नगरात अगदी हाहाकार उडवून दिलेला होता. त्याच नगरीचा राजा सहस्रार्जून याने भगवान दत्तात्रेयांची अतिशय कठोर उपासना करून त्यांना सहस्रबाहू मागून घेतले होते आणि ते वरदान मिळाल्यानंतर तो अधिकच उद्दामपणे वागू लागला.


एकदा तो सहस्रार्जून राजा जमदग्नी ऋषींच्या आश्रमात काही कारणाने आला. ऋषींनी त्याचे स्वागत केले. आश्रमवासी ऋषींचे ते विलक्षण वैभव पाहून राजा मनात अस्वस्थ झाला. त्याने ऋषींना त्या वैभवाचे रहस्य विचारले तेव्हा ऋषींनी मोठ्या निर्मळ मनाने आपल्या आश्रमात असलेल्या कामधेनूविषयी त्यांना सांगितले. सहस्रार्जुनाने ती कामधेनू जमदग्नींकडे मागितली. तो देवाचा प्रसाद असल्याचे सांगून जमदग्नींनी राजाला कामधेनू देण्यास नकार दिला तेव्हा सहस्रार्जुनाने आपल्या बळाचा वापर करून ती कामधेनू बांधून आपल्या माहिष्मती नगरीत नेली.


परशूराम आश्रमात परतल्यानंतर त्याला हा वृत्तांत समजताच त्याने माहिष्मती नगरीवर चाल करून गेला. याप्रसंगी त्याचे आणि सहस्रार्जुनाचे तुंबळ युद्ध झाले तेव्हा त्याने अतुल पराक्रम गाजवून त्या जुलमी, विषयांध राजाचा वध केला. त्या देवप्रसादरूप असलेल्या कामधेनूला सोडविले व पुन्हा तिला तो जमद्ग्नी ॠषींच्या आश्रमात घेऊन आला.


आश्रमात परतताच आपले पिता जमदग्नी ऋषींना त्याने सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा त्यांनी परशूरामाला ब्राह्मण धर्मातल्या क्षमेविषयी सांगितले. राजाचा वध करणे योग्य नाही आणि त्यामुळे लागलेले पाप दूर करायला परशूरामाला तपश्चर्येला जाण्यास सांगितले. पित्याच्या आज्ञेनुसार परशूराम तपश्चर्येसाठी गेलेत.



इकडे सहस्रार्जुनाच्या युद्धातून पळून गेलेल्या मुलांनी पुन्हा एकदा जमदग्नी ऋषींच्या आश्रमावर हल्ला केला. तपाला बसलेल्या जमदग्नी ॠषींची त्यांनी हत्या केली. परशूरामाची आई रेणुका हिने याप्रसंगी मोठा विलाप केला आणि आर्त स्वराने परशूरामांना पाचारण केले. आईची आर्त हाक ऐकून प्रखर मातृपितृभक्त असलेले परशूराम आश्रमात परतले तेव्हा तिथली परिस्थिती त्यांच्या आईने त्यांना कथन केली. संतापून परशूरामांनी तिथले एक परशू उचलले आणि त्वरित माहिष्मती नगरीत जाऊन सहस्रार्जुनाच्या पुत्रांचा वध केला. त्यांच्या मुंडक्यांची रास त्यांनी रचली आणि आपल्या पित्याच्या हत्येचा बदला घेतला. त्यांचे पिता जमदग्नी ऋषींना  स्मृतीरूप संकल्पाने त्याने पुनर्जीवित केले. याप्रसंगी त्यांचे पिता जमदग्नी ॠषी आणि माता रेणुका यांच्या आशिर्वादाने ते नवीन मन्वंतरात सप्तर्षींमधले एक झालेत आणि त्यांनी सप्त चिरंजीवांपैकी एक होण्याचा वर मिळाला.


ज्ञानमार्गाने जाणा-यांनी केवळ ज्ञानाचीच उपासना करून भागणार नाही तर आपण उपासना करीत असलेले सात्विक आणि विमल ज्ञान रक्षिले जावे म्हणून स्वतः बलाची उपासना करणे आवश्यक आहे हा या कथेचा बोध. "लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या" हा उपदेश स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या कथेलाच आदर्श मानून तर ठेवला नसेल ना ? अतिशय उदात्त, उत्तम असलेया आपल्या संस्कृतीरक्षणासाठी वेळप्रसंगी आपल्याजवळ शापाचे हत्यार पाहिजे पण शराचे (बाणांचे) ही हत्यार सज्ज असले पाहिजे हा संदेश भगवान परशूरामांनी आपल्याला दिला. शापादपि, शरादपि.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध दशमी शके १९४८ दिनांक  २४ / ७ / २०२६


२४ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६