खरेतर भगवान श्रीराम हे भारताचे राष्ट्रपुरूष आहेत. त्यांचे चरित्र डोळ्यांसमोर ठेऊनच समस्त भारताच्या चारित्र्याची उभारणी झालेली आहे. ते समस्त भारतवर्षाचे आदर्शपुरूष आहेत. त्यांचे चरित्र माहिती नाही अशी व्यक्ती भारतात तरी विरळा. त्यांच्या चरित्र वर्णनासाठी एक निराळीच लेखमाला लिहावी लागेल इतका त्या चरित्राचा आवाका आणि विस्तार मोठा आहे. पण आपण इथे श्रीमदभागवतग्रंथातल्या नवम स्कंधातल्या दहाव्या आणि अकराव्या अध्यायात वर्णन केलेल्या श्रीरामचरित्राची लेखनमर्यादा आखून त्या चरित्राचे आकलन करून घेऊयात.
राजा दशरथांच्या घरी कौसल्यामातेच्या पोटी जन्म घेतल्यानंतर भगवान श्रीरामांनी बालपणातच आपले क्षात्रतेज आणि पराक्रम दाखवायला सुरूवात केली. ऋषी विश्वामित्रांच्या यज्ञकार्यात अडथळा आणणा-या मारीच, सुबाहू सारख्या मोठ्या मोठ्या राक्षसांचा त्यांनी वध केला. राक्षसी वृत्ती, राक्षसी जीवन यांचा नाश करणे आणि आदर्श जीवन व्यवस्था, आदर्श मूल्यव्यवस्था यांना प्रस्थापित करणे हेच प्रभू श्रीरामांचे जीवनध्येय होते. त्यानंतर त्यांनी जनकराजाच्या सभेत जाऊन भगवान शंकरांचे विशालकाय शिवधनुष्य तोडले आणि जानकीमातेचे पाणीग्रहण केले. भगवान विष्णूंच्या हृदयकमलात सदैव वास करीत असलेल्या लक्ष्मीमातेनेच जनकराजाकडे जानकीच्या रूपाने जन्म घेतला होता. त्यांचे या पृथ्वीतलावर या शिवधनुष्याच्या प्रसंगाने मीलन झाले. पाणीग्रहणावरून परतताना प्रभू श्रीरामांनी परशूरामांचे गर्वहरण केले.
राज्याभिषेकाच्याच दिवशी आपल्या पित्याची आज्ञा प्रमाण मानून प्रभू श्रीरामांनी एखादा जीवनमुक्त योगी आपल्या प्राणांची पर्वा न करता ज्याप्रमाणे प्राणत्याग करतो तशा संतोषात आपल्या राज्याचा त्याग करून वनवास स्वीकारला. केवळ आपल्या पित्याने, राजा दशरथाने दिलेले वचन खोटे ठरू नये म्हणून आपल्या पत्नीसह आणि अनुज लक्ष्मणासह प्रभू श्रीराम वनात चालते झाले. वनात त्यांनी कलुषित बुद्धीच्या आणि अत्यंत कामवासनेने पीडित असलेल्या रावणभगिनी शूर्पणखेला विद्रूप केले आणि तिच्यासोबत असलेल्या खर, दूषण, त्रिशिरा आदि चौदा हजार राक्षसांचा वध केला.
अत्यंत कामासक्त असलेल्या रावणाने सीतामैयाचे हरण केले. त्यासाठी त्याने मायावी मारीचाची मदत घेतली. सीता शोधार्थ प्रभू श्रीराम रानोमाळ भटकू लागलेत. जटायूने प्रभूंना सीतेचे हरण आणि त्यासंबंधी वस्तूस्थिती कथन करून जटायूने देह ठेवला. प्रभूंनी त्याचे और्ध्वदैहिक केले आणि त्याने सांगितलेल्या मार्गाने ते दक्षिण देशाकडे मार्गक्रमण करू लागलेत. वाटेत त्यांनी वानरराज सुग्रीवाशी मैत्री करून वालीसारख्या दुष्ट वानराचा वध केला आणि असंख्य वानरसेना घेऊन प्रभू श्रीराम भारताच्या दक्षिणतटावर आलेत. श्रीमदभागवतकार मोठे आश्चर्य करताहेत की भगवान शंकर, प्रत्यक्ष जगत्पिता ब्रह्माजी ज्यांचे सदैव गुणगान करीत असतात ते प्रभू श्रीराम सामान्य पुरूषांप्रमाणे भारतवर्षात विहार करीत, सर्व जनजातींना आपल्यासोबत सदकार्यात जोडीत भ्रमण करीत होते.
समुद्र उल्लंघून लंकेत जाण्यासाठी त्यांनी सागराची प्रार्थना केली पण प्रार्थनेला सागर बधत नाही असे लक्षात आल्यावर त्यांनी सागरावर शस्त्र उचलले. प्राणभयाने सागर साकार प्रगट झाला आणि त्याने प्रभू श्रीरामांना आपल्या शरीरावरून सेतू रूपाने वाहून नेऊन लंकेत पोहोचवण्याचे वचन दिले. श्रीरामांच्या नेतृत्वात असंख्य वानरांनी सेतू बांधला आणि प्रभू श्रीराम सागरपार असलेल्या लंकेत दाखल झालेत.
त्यांनी राक्षसराज रावणाशी भीषण युद्ध करून त्याच्या अनाचारी आणि अत्याचारी बंधू व पुत्रांसमवेत त्याचा वध केला आणि आपल्या पत्नीची त्याच्या कारावासातून सुटका केली. राक्षसकुळात जन्मूनही अत्यंत सदाचारी असलेल्या रावणबंधू बिभीषणाला त्यांनी चिरंजीवित्वाचा वर दिला आणि हनुमान, अंगद, सुग्रीव आणि आपला बंधू लक्ष्मण व पत्नी जानकीसह प्रभू श्रीराम अयोध्येत परतलेत. आता श्रीरामांच्या वनवासाची १४ वर्षे पूर्ण झालेली आहेत. श्रीराम वनवासात गेल्यानंतर अयोध्येचे राज्य ज्या भरताला मिळाले होते त्याने ते राज्य श्रीरामांच्या पादुकांना सिंहासनावर ठेऊन चालविले होते. तो स्वतः नंदीग्रामात असलेल्या वनात प्रभू श्रीरामांप्रमाणेच वनवासात राहून, त्यांच्याप्रमाणेच वल्कले परिधान करून, जटा वाढवून तपस्वी आयुष्य जगत होता. प्रभू आपला वनवास आटोपून परत आलेत म्हटल्यावर भरताने त्यांच्या सुपूजित पादुका त्यांना अर्पण केल्यात. प्रभूंनी मोठ्या प्रेमाने आणि कृतज्ञतेने भरताला आलिंगन दिलेत आणि ते अयोध्या नगरीत प्रवेशकर्ते झालेत.
प्रभू श्रीराम, जानकी माता, लक्ष्मण, भरत, हनुमंत आदि अयोध्येत परतताच अयोध्येच्या प्रजाजनांतर आनंद झालाच पण समस्त देवांना आणि इथल्या चराचर सृष्टीलाही अतिशय आनंद झाला. सुगंधित वारे वाहू लागलेत, वृक्षांनी पुष्पवृष्टी करायला सुरूवात केली. अयोध्येची सगळी जनता डोळ्यात प्राण आणून प्रभू श्रीराम व जानकीमातेला बघू लागलेत. देव, गंधर्व, यक्ष, किन्नर सारे प्रभूंचे गुणगान गाऊ लागलेत. कौसल्या, सुमित्रा आणि कैकयी मातांनी आपल्या अश्रूभरल्या नेत्रांनी श्रीरामांना ओवाळले व आपापल्या मांडीवर बसवून त्यांना अश्रूंनी अभिषेक घातला.
वसिष्ठ ऋषींनी विधीपूर्वक श्रीरामांच्या जटा उतरवल्या आणि त्यांचा राज्याभिषेक संपन्न झाला. श्रीरामराज्यात त्यांच्या प्रजाजनांना दुःख, शोक, चिंता, वार्धक्य, रोग, भय किंवा थकवा येत नसे. इतकेच काय तर ज्यांना आपले जीवन संपावे असे वाटत नसेल त्यांना मरणही येत नव्हते. अत्यंत पवित्र अशा श्रीरामांची कथा आपल्या समस्त भारतवर्षीयांसाठी कायम आदर्श आहे. असे आदर्श श्रीरामराज्य पृथ्वीतलावर स्थिरस्वरूपी अवतरित व्हावे असे आपण कायम म्हणत आलेलो आहे.
॥ राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की ॥
॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥
- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध नवमी शके १९४८ दिनांक २३ / ७ / २०२६
२३ जुलै २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#जुलै२०२६
.jpg)
.jpeg)




