Wednesday, July 17, 2024

चातुर्मास संकल्प : चिंतन २०२४


आज आषाढी एकादशी. आजपासून आपला चातुर्मास सुरू. दिवाळी, दसरा, गणपती, महालक्ष्म्या यासारखे सणवार आणि श्रावण महिन्यासारखा संपूर्ण उत्सवी महिना याच कालावधीत येतो. आपल्यापैकी अनेक जण या कालावधीत काहीतरी संकल्प करीत असतात आणि थेट कार्तिकी एकादशीपर्यंत त्याचे पालन करीत असतात. या चार महिन्यांच्या कालावधीत एखादा पदार्थ जेवणातून पूर्ण वर्ज्य करणे, श्रावण महिन्यात रोज एकवेळेसच जेवणे वगैरे शारिरीक तपाचे संकल्प त्यात असतात तर एखादी पोथी, एखाद्या संताचे चरित्र रोज वाचणे, रोज श्रीविष्णुसहस्रनाम म्हणणे वगैरे अध्यात्मिक तपाचे संकल्पही त्यात असतात. तप म्हणजे तापून निघणे. शरीरासाठी रोजच्यापेक्षा काहीतरी वेगळे करून त्यात शरीर तापवायचे तसेच मनासाठी अशा अध्यात्मिक संकल्पांचे पालन करून त्याला वळण लावणे हा या संकल्पांमागचा हेतू.


परम पूजनीय ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज संकल्पांविषयी म्हणतात "संकल्प छोटा असला तरी चालेल पण तो रोज पाळता येईल असा, शाश्वताचा असावा. सातत्याला इथे फ़ार महत्व आहे." आपले मन हे आजवरच्या आपल्या कर्मांमुळे एखाद्या कठीण दगडासारखे झालेले आहे. त्या दगडावर थेंबथेंबच का होईना पण सातत्याने पाणी पडत गेले तर काही कालावधीत त्या दगडाला वेगळा आकार प्राप्त होईल पण हेच लाखो लिटर पाणी एकदमच त्या दगडावर ओतले तर तो दगड काही काळ ओला होईल पण पाणी वाहून गेल्यानंतर पुन्हा कोरडाच्या कोरडा. म्हणून एखादी गोष्ट सतत करत राहण्याला महत्व.


परम पूजनीय ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज या संकल्पांविषयी पुढे असेही म्हणतात "चातुर्मासात कांदा लसूण खाणार नाही हा शारिरीक तपाचा संकल्प तर महत्वाचा आहेच पण त्याहूनही महत्वाचा संकल्प म्हणजे चातुर्मासात मी कुणाचे मन दुखावणार नाही असा मानसिक तपाचा असू शकतो." हा मानसिक तपाचा संकल्प वरवर पाहता सोपा वाटतो खरा पण तो पालन करण्यास अत्यंत अवघड असा आहे. त्यासाठी संपूर्ण चातुर्मास आपल्याला आपले मन सजग ठेवावे लागेल आणि सतत ते मन विविध कसोट्यांवर घासून बघावे लागेल. या चातुर्मासात देवशयनी एकादशी (आषाढी एकादशी) ला देव झोपी जातात आणि थेट उत्थापिनी एकादशी (कार्तिकी एकादशी) ला देव त्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात अशी मान्यता आहे. अशावेळी आपण मनुष्यमात्रांचे मन कायम जागृत रहायला हवे म्हणून ते मानसिक तपाचे संकल्प.


या संकल्पांमध्ये "मी कुणाचीही निंदा नालस्ती करणार नाही." हा सुद्धा एक चांगला आणि तितकाच पाळायला कठीण असा मानसिक तपाचा संकल्प आहे. रोजच्या आयुष्यात इतरांच्या बद्दल आपण न्यायाधीश होण्याचे इतके प्रसंग येतात की असे एखाद्याबद्दल टीकाटिप्पणी न करता राहू शकणे ही अशक्य गोष्ट वाटते. पण परम पूजनीय ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज महाराज म्हणतात "अशी एखाद्याची निंदा करणे आवडणे म्हणजे शेण खाणे आवडण्यासारखे आहे." निंदानालस्तीचा अध्यात्मिक फ़टका फ़ार जोरदार बसतो आणि मुख्य म्हणजे आपल्याला तो कधीच कळत नाही. 


अशा संकल्पांमध्ये "मी कायिक वाचिक मानसिक हिंसा करणार नाही. समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करेन. त्या व्यक्तीने केलेली एखादी कृती मला कितीही न आवडणारी असली तरी ती त्याने मुद्दाम केलीय की त्याच्याकडून अनवधानाने झाली याचा विचार मी करेन." हा संकल्पसुद्धा जगातला किती ताप, संताप दूर करणारा ठरेल याचा विचार करा. आपण सर्वसामान्य प्रापंचिक माणसे. आपल्या आयुष्यातले जास्तीत जास्त ताप हे आपल्याच विचारांमुळे उत्पन्न होत असतात आणि त्यावरअधिकाधिक प्रतिक्रिया देऊन देऊन आपणच हे खूप मोठे करीत असतो. त्यापेक्षा या सांसारिक तापांवर या छोट्याच मानसिक तपाचा उपचार केला तर आपण सुखी राहू शकू असे नाही का वाटत ?


बरे आपण अशा मानसिक तपांना, संकल्पांना आजपासून सुरूवात केली तरी मानवी मन इतके विचित्र आहे की या तपाचा प्रभाव तत्काळ दिसावा अशी इच्छा ते करते. रोज रोज त्या तपाचा प्रभाव किती झाली याची परिक्षा घेण्याची आपल्याला इच्छा होते. अशावेळी श्रीदत्तसंप्रदायातील एक सत्पुरूष परम पूजनीय श्रीकृष्णदास आगाशे काका काय म्हणतात हे आपण पक्के ध्यानात ठेवलेच पाहिजे. आगाशे काका म्हणतात "एखादे बी आपण जमिनीत पेरले आणि झाड उगवण्याची वाट बघू लागलो तरी ते बीज फ़ळायला, अंकुरायला त्याला हवा तितका वेळ आपण द्यायलाच हवा. ताबडतोब ते झाड मोठे व्हावे हा अट्टाहास चुकीचा आहे आणि रोज ते झाड किती मोठे झाले हे जर आपण त्या पेरलेल्या जागेवर पुन्हा पुन्हा खणून बघू लागलोत तर ते झाड कधी रूजणारच नाही मग ते मोठे होण्याचा प्रश्नच नाही." तसेच आपल्या संकल्पाचे होईल. म्हणून आपल्या संकल्पाला किती फ़ळ आले याची लगोलग परिक्षा करीत बसून नये. आपण नेमाने ही मानसिक तपे आचरत गेलो तर आपल्या व्यक्तीमत्वातला फ़रक हा आपल्या सहवासातील इतरांना योग्य काळानंतर जाणवेल. तो जाणवून देण्याची घाई नसावी. संकल्पाचा अनुभव घेण्याची घाई नसावी. जगातले ताप संताप भगवंत जेव्हा दूर करतील तेव्हा करू देत पण आज माझ्या आतला ताप संताप माझ्या आतला भगवंत दूर करतोय का  हा अत्यंत गूढ, गुह्य आत्मिक अनुभव माझा मलाच घेणे आवश्यक आहे ही भावना असावी. आणि प्रत्येकाने हा विचार केला तर जगातले सगळे ताप संताप दूर होण्यासाठी भगवंताला अवतार घेण्याचीही गरज नाही.


मग करायची आजपासून ही सुरूवात ? अत्यंत सात्विक भावाने, वृत्तीने, केवळ भगवंतासाठी सोडायचे हे संकल्प ? असे भगवंतासाठी संकल्प सोडलेत तर त्याच्या फ़ळांची आस आपल्याला लागत नाही. घेता देता तोच आहे. त्याच्या मनाला वाटेल आणि माझे पूर्वकर्म जसे असतील त्याप्रमाणे, त्यावेळी तो मला फ़ळ निश्चित देईल. त्यावर माझा अधिकार नाही ही भावना मनात असली की मोकळेपणाने, मुक्त मनाने संकल्प आचरता येतील.


आपणा सर्वांना चातुर्मास संकल्प घेण्यासाठी आणि निष्काम आचरणासाठी अगदी मनापासून शुभेच्छा.


- आपल्या सर्वांच्या कृपेचा अभिलाषी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Saturday, July 13, 2024

बसफ़ॅनिंग: एक वेगळाच सूक्ष्म पैलू

आमचे बसफ़ॅनिंग आमच्या अगदी बालपणी नागपूर ते चंद्रपूर एस टी प्रवासादरम्यान सुरू झाले. अगदी पहिल्या वर्गात अक्षरओळख नुकतीच झालेली असताना आजोळी चंद्रपूरला जातानाच्या प्रवासात माझ्या वडीलांनी एस. टी. च्या बसगाड्यांवर लिहील्या जाणा-या म. का. दा. (मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी), म. का. चि. (मध्यवर्ती कार्यशाळा चिकलठाणा) आणि म. का. ना. (मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर) हे अर्थ उलगडवून दाखवत प्रत्येक बस वेगळी असते ही दृष्टी आम्हाला दिली. मग यवतमाळ विभागातल्या डेपोंच्या बसेसचे फ़िकट निळ्या रंगात रंगवलेले ग्रिल्स, पुढचे बंपर आणि कधीकधी खिडक्यासुद्धा. चंद्रपूर विभागातल्या डेपोंच्या बसेसचे काळपट पिवळ्या ( Yello Ochre) रंगात रंगविलेले ग्रिल्स आणि पुढले बंपर्स, अकोला विभागातल्या डेपोंच्या बसेसना काळ्या ग्रिल्सभोवती दिलेली पांढरी बॉर्डर तर भंडारा विभागासाठी हीच बॉर्डर पिवळ्या रंगात हे बारकावे लक्षात घेऊन त्या त्या विभागाच्या बसेस ओळखणे आणि साधारण वेळ लक्षात घेऊन ती नक्की कुठली बस असेल ? याचा अचूक अंदाज बांधणे यात आम्ही प्रवीण झालो आणि नातेवाईक, मित्रमंडळींमधे भाव खाऊ लागलोत.


पाचव्या वर्गापासून इंग्रजीची तोडओळख झाली आणि मग हळूहळू ज्या बसने जातोय तिचा नंबर, तिचा चेसिस नंबर आदि डिटेल्स जमविण्याचा छंद लागला. मी पाचवीत असताना आम्ही नंदनवन येथे रहायला गेलो आणी महाल विभागात असलेल्या आमच्या  शाळेत जाण्यायेण्यासाठी पाचवीपासून शहर बस सेवेने जाणे येणे होऊ लागले. मग रोजची बसची तिकीटे जमविण्याचा छंद लागला, ती तिकीटेही नुसती जमवायची नाहीत तर तिकीटांच्या मागील मोकळ्या जागेत प्रवासाचा दिनांक, बस नं, प्रवास कुठून कुठे, बस शहर बस सेवेतली कुठल्या नंबरची सेवा होती ? कुठून कुठे जात होती हा सगळा तपशील लिहून ठेवणे सुरू झाले. तदनुषंगाने ही तिकीटे जपून ठेवणे, महिनावार, वर्षवार नीट जतन करून लावून ठेवणे वगैरे कामे आलीच. 






नागपूर आणि परिसरात त्याकाळी टाटा बसेसचेच प्राबल्य होते. शहर बस सेवेतही सगळ्या टाटाच्याच बसेस. त्याकाळी टाटाच्या चेसिस जमशेदपूर आणि पुण्याच्या टेल्को प्लॅंट मध्ये तयार व्हायच्यात. त्या एस. टी. च्या महाराष्ट्रातल्या तीनही कार्यशाळांमध्ये जायच्यात आणि त्यांच्यावर बसबांधणी व्हायची. टेल्कोचा पंतनगरचा प्लॅंट तेव्हा सुरू व्हायचा होता. सगळ्या चेसिस एकतर जमशेदपूर किंवा पुण्यावरून यायच्यात. बाय द वे इतक्या वर्षांनंतरही महाराष्ट्र एस. टी. आपल्या बहुतांशी बसगाड्यांचा ताफ़ा चेसेस मागवूनच आपल्या मध्यवर्ती कार्यशाळांमध्ये बांधून घेते. गोव्यातल्या टाटा ए.सी.जी.एल. किंवा हुबळी इथल्या टाटा मार्कोपोलोने बांधलेल्या तयार बसगाड्या घेत नाही.


बसमध्ये बसल्यावर ड्रायव्हर काकांमागे त्याकाळच्या बसेसमध्ये असलेल्या आडव्या बाकड्यावर उलटे (केबिनमधून बसच्या दिशेकडे तोंड करीत) बसून प्रवास करणे हा तर त्याकाळच्या सगळ्याच बाळगोपाळांचा छंद असायचा. आमचाही होता. आम्ही आमच्या शोधक नजरेने बसच्या केबिनमधली एंजिनवरची "मेकर्स प्लेट" पाहून ती चेसिस जमशेदपूरवरून आलीय की पुण्यावरून आलीय हे शोधण्याचाही छंद आमच्या बसफ़ॅनिंगमध्ये सामील झाला. आत केबिनमध्ये तर मूळ चेसिसवर पोपटी किंवा चटणी रंग असायचा पण खाली उतरून चाकांच्या वर असलेल्या फ़ेंडर्सच्या आत थोडे डोकावत ती चेसिस मूळ केशरी रंगाची आहे की पिवळ्या रंगाची हे पण नोंदणे सुरू झाले. मग त्या प्रवासाच्या तिकीटांवर त्या चेसिसच्या मूळ रंगाची नोंदणीही ओघाओघाने आलीच. 


अजून एक गोष्ट लक्षात आली की केशरी चेसिस सगळ्या जमशेदपूरच्या असतात तर पिवळ्या रंगाच्या चेसिस पुण्याच्या.



आज आमच्या एका बसफ़ॅन ग्रूपवर ह्या केशरी चेसिसचा फ़ोटो दिसला आणि मन एकदम चाळीस वर्षे मागे गेले.


- बस आणि रेल्वेवर मनापासून प्रेम करणारा, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Sunday, June 30, 2024

घर थकलेले संन्यासी, हळूहळू भिंतही खचते

घर थकलेले संन्यासी,  हळूहळू भिंतही खचते. नागपुरातल्या प्रताप नगर, रविंद्र नगर, टेलिकाॅम नगर परिसरातून रोज जाणेयेणे करताना ग्रेसच्या या ओळी मनात येतात. नागपूर म्हणजे तसे ऐसपैस अघळपघळ शहर होते. ४० - ५० वर्षांपूर्वी तत्कालीन नोकरदारांनी थोडे शहराच्या बाहेर मोकळ्या हवेत घर बांधूयात म्हणत दक्षिण, नैऋत्य नागपुरात मौजा जयताळा, मौजा भामटी, मौजा परसोडी शिवारात प्रशस्त प्लाॅटस घेतलेत. त्यावर खूप नियोजन करून सुंदर टुमदार घरे बांधलीत. त्यात आपल्या कुटुंबाचा, मुला नातवंडांचा विचार करून छान ३००० ते ५००० चौरस फुटी प्लाॅटसवर प्रशस्त वास्तू उभारल्यात. तळमजला आणि पहिला मजला.

त्या प्लाॅटसवर तेव्हाच्या मालकांनी छान छान झाडे लावलीत. जांभूळ., पेरू,आंब्यासारखी फळझाडे, पारिजातक, सदाफुली, चाफ्यासारखी फुलझाडे, मोगरा, मधुमालती, गुलमोहराचे वेल. आपण लावलेले आंब्याचे झाड आपल्या नातवाला फळे देईल, फुलझाडांची फुले रोज देवपूजेला कामाला येतील, मोकळी हवा मिळेल, मस्त जगू हे साधे सोपे, कुणालाही न दुखावणारे स्वप्न.
सुरूवातीच्या काळात मुख्य शहराबाहेर वाटणारी आणि "कुठच्याकुठे रहायला गेलात हो !" अशी पृच्छा सगळ्यांकडून होणारी ही वस्ती शहर वाढल्याने अगदी शहराचा भाग झाली. सगळ्या सोयीसुविधा इथे मुख्य शहरासारख्याच किंबहुना त्यापेक्षा वरचढ उपलब्ध होऊ लागल्यात. घरमालक सुखावलेत. तोपर्यंत ते त्यांच्या निवृत्तीच्या आसपास पोहोचले होते. मुले हाताशी आलेली होती. मुलींची लग्ने झालेली होती, ठरलेली होती. सगळं छान चित्र.
पण १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात आलेल्या संगणक क्रांतीने जग बदलून गेले मग नागपूर तरी त्याला कसे अपवाद असणार ? संगणक क्रांती नागपूरच्या आधी पुणे, हैद्राबाद, बंगलोर ला आली. होतकरू, हुशार तरूणांचे नोकरीनिमित्त फार मोठे स्थलांतर सुरू झाले. काही काहींचे तर अगदी सातासमुद्रापार अमेरिकेत स्थलांतर झाले.
सुरूवातीला "माझा मुलगा बे एरियात आहे, डाॅलर्समध्ये कमावतोय. गेल्या वर्षी आम्ही दोघेही जाऊन आलो अमेरिकेत. म्हातारा म्हातारीला मुला - सुनेने पूर्ण अमेरिका दाखवून आणली हो. अगदी लास वेगासला नेऊन कॅसिनोत कधी नव्हेतो जुगारही खेळलो." असे कौतुक झाले.
पण नंतर अमेरिकेत गेलेले, पुणे बंगलोरला गेलेले मुलगा - सून नागपूरला परतण्याची चिन्हे दिसेनात. तिथली प्रगती, तिथल्या संधी इथे नव्हत्या. नातवंडांचा जन्म जरी नागपुरात झाला असला तरी त्यांची वाढ, शाळा या सगळ्या घाईगर्दीच्या महानगरांमध्ये झाल्याने त्यांना नागपूर हे संथ शहर वाटू लागले. इथे फक्त आपले आजी - आजोबा राहतात, हे आपले शहर नाही हे त्यांच्या मनात बिंबले गेले. त्यात त्यांचाही काही दोष नव्हता. करियरला संधी, उभारी मिळणारी ठिकाणे कुणालाही आपलीशी वाटणारच. घरमालक आजी आजोबा नागपूरला अगदी एकटे पडलेत. तरूणपणी एकत्र कुटुंबात वाढावे लागल्याने राजाराणीच्या संसारासाठी आसुसलेल्या या पिढीला आता हा राजाराणीचा संसार अक्षरशः बोचू लागला. भरलेले, हसते खेळते असावे म्हणून बांधलेले घर आता फक्त झोपाळ्याच्या करकरणार्या कड्यांच्या आवाजात आणि संध्याकाळी मावळत्या सूर्यासोबत अंगणातल्या झाडांच्या लांब सावल्यांमध्ये बुडून जायला लागले. मुला - नातवंडांच्या संसाराची वाढ लक्षात घेऊन बांधलेले चांगले ८०० - ८५० फुटांचे प्रशस्त स्वयंपाकघर सकाळी साध्या भातासोबत फोडणीचे वरण आणि संध्याकाळी त्याच उरलेल्या भाताला फोडणी दिलेली बघू लागली. स्वयंपाकघरातल्या ताटाळात असलेल्या ३० - ४० ताटांवर धूळ जमू लागली. सकाळ संध्याकाळ एक कुकर, दोनतीन भांडी, एक कढई आणि दोन ताटल्या एवढ्यातच भांड्यांचा संसार आटोपू लागला.
मालकांची मुलेही पुण्यात, बंगलोरला स्थाइक झालीत. ही दुसरी पिढीही आता निवृत्तीच्या आसपास आली होती. त्यांची मुलेही तिथेच रमली होती, पोटापाण्याच्या उद्योगाला लागली होती. नागपूरच्या त्यांच्या फेर्या वर्षातून सणांसाठी एकदोन वेळा किंवा ते ही जमेनासे झाले तर म्हातारा - म्हातारीला पुणे बंगलोरला बोलावून तिथेच महालक्ष्म्या गणपती हे सण साजरे होऊ लागलेत. "आमच्या घरच्या महालक्ष्म्या या वर्षी म्हैसूरला बसल्या होत्या हं" हे अभिमानाने सांगण्यातल्या सुरांत "कधीकाळी महालक्ष्म्यांसाठी लागतील म्हणून खूप फुलझाडे, केळीच्या पानांसाठी केळी नागपूरच्या घरात लावलेली होती त्यांचा या वर्षी उपयोगच झाला नाही. सगळी तशीच सुकून गेलीत." हा सूर मनातल्या मनातच खंतावू लागला.
म्हातारा - म्हातारी आजारी पडू लागलेत. हाॅस्पिटलायझेशन साठी मुले येऊ लागलीत. ती पिढी तर यांच्यापेक्षा जास्त थकलेली. "बाबा / आई, तुम्ही तिकडेच चला ना आमच्यासोबत. सगळ्यांनाच सोईचे होईल." असा व्यावहारिक मार्ग निघू लागला. म्हातारा - म्हातारी सहा महिने, वर्ष आपल्या वास्तूपासून, जीवनस्वप्नापासून दूर राहू लागलेत.
जीवनक्रमात अपरिहार्य म्हणून दोघांपैकी एक देवाघरी गेल्यावर तर राहिलेल्या एकट्यांचे जिणे अधिकच बिकट होऊ लागले. छोटीछोटी दुखणीखुपणी, अपघात अगदीच असह्य होऊ लागले. नागपुरात रूजलेले, वाढलेले हे वृक्ष आपल्या मुळांपासून तुटून दूरवर कुठेतरी रूजण्यासाठी नेल्या जाऊ लागलेत. नाईलाज असला तरी ही मंडळी मुला नातवंडांमध्ये रमू लागलीत. नागपुरातली घरे मात्र यांच्या जाण्याने यांच्यापेक्षा जास्त थकलीत.
अशा विस्तीर्ण प्लाॅटसवर आणि मोक्याच्या जागांवर बिल्डरांचे लक्ष गेले नसते तरच नवल. एवढ्या मोठ्या प्लाॅटवर फक्त २ माणसे राहतात ही बाब त्यांच्या व्यावसायिक दृष्टीकोनाला पटण्यासारखी नव्हती. अशा टुमदार घरांचे करोडोंचे व्यवहार होऊ लागलेत. त्याजागी ५ - ६ मजली लक्झरीयस फ्लॅटस बांधले जाऊ लागलेत. थकलेली घरे जमीनदोस्त झालीत. सोबतच घर मालक मालकिणींची स्वप्नेही नव्या फ्लॅटस्कीमच्या खोल पायव्यात गाडली जाऊ लागलीत. एक दीड कोटी रूपये मिळालेत तरी ते घर, त्याच्याशी निगडीत स्वप्ने, त्याचा टुमदारपणा, ऐसपैसपणा याची किंमत कितीही कोटी रूपयांमध्ये होऊ शकत नाही ही जाणीव आयुष्याच्या संध्याकाळी काळीज पोखरत राहिली.
थकलेल्या संन्यासी घराची भिंत अशीच हळूहळू खचत राहिली.
- नागपुरातल्या घरांची ही स्पंदने अचूक टिपणारा, स्वतः नागपूरबाहेर अनेक वर्षे काढूनही मनाने नागपूरकरच राहिलेला आणि माझ्या वडिलांच्या वयाच्या पिढीची स्पंदने संवेदनशीलपणाने जाणणारा, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Friday, June 28, 2024

मलाबारी जेवण


मलाबारी (Costal Karnaka & Keralam) जेवण मला आवडतं. किंबहुना सह्याद्रीच्या पश्चिमेला असलेल्या आणि पालघर पासून थेट कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या चिंचोळ्या कोकण - मलाबार पट्टीत (शाकाहारीच हं) पाकशास्त्राचे जितके प्रयोग आणि प्रकार आहेत ते सगळे मोहवून टाकणारे आहेत. इथे मुबलक उपलब्ध असलेल्या ओल्या नारळांचा कीस तरी पदार्थांवर असतो नाहीतर त्याच नारळाच्या दुधाच्या रस्स्यात (gravy) हे पदार्थ बनतात. सोबतच कढीपत्त्याची फोडणी आणि मूळ पदार्थांची चव हरवणार नाही इतपतच घातलेले मसाले आणि तिखट. आजकाल विदर्भासकट महाराष्ट्रात सर्वत्रच तिखट आणि तेलकट म्हणजेच चविष्ट अशी समजूत दृढ होताना दिसतेय त्यांनी आवर्जून हे मलाबारी पदार्थ खाऊन बघावेत.






पु ल देशपांडे म्हणतात "आधीच मेल्या कोंबडीला भरमसाठ मसाल्यांखाली गुदमरवून मारण्यात काय हशील आहे ?" शाकाहारी असल्याने मी तसेच म्हणेन की आपण खातोय ती भाजी फुलकोबीची आहे की बटाट्याची आहे की दुधीची आहे ? हे खूप तिखट आणि मसाल्यांमुळे कळतच नसेल तर ती भाजी खायची तरी कशाला ? नुसत्या ग्रेव्हीशी पोळी खावी.
- "अन्न हे पूर्णब्रह्म" मानून अन्नाच्या चवीत फार न अडकणारा पण उत्तम पदार्थांचा मनापासूनचा प्रशंसक आणि याक्षेत्रात उगाच रूढ होऊ पाहणार्या काही रूढींचा विरोधक प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Wednesday, June 26, 2024

राजमलाईः बालपणीच्या हरवलेल्या चवीचा धांडोळा आणि त्याला मिळालेले यश.

आमच्या बालपणी तत्कालीन मध्यमवर्गीय कुटुंबातल्या शाळकरी मुलांसाठी खाऊसाठी खालीलप्रमाणे पर्याय होते.

१. पारले किस्मीचे छोटे चाॅकलेटस (मला वाटतं १० पैशांना एक असे ते मिळायचेत). ते छोटे चाॅकलेटस आणि त्यावरील लाल काळे रॅपर्स इतक्या वर्षांनंतर अजूनही तसेच आहेत.
२. १० पैशांना १० या दराने मिळणार्या, काचेच्या बरणीत भरलेल्या गोडमिट्ट गोळ्या. यांना "दुधाच्या गोळ्या" असे नाव का पडले ? हा आजतागायत मला पडलेला प्रश्न आहे. या प्युअर साखरेच्याच गोळ्या असायच्यात. त्यांचा रंग दुधासारखा असायचा म्हणून दुधाच्या गोळ्या म्हणण्याची पध्दत पडली असावी. त्यांच्या काही बहिणीही हिरवा, निळा, पिवळा, तांबडा रंग लेवून त्यांच्या आजुबाजूच्या बरण्यांमध्ये असायच्यात. पण त्या सुध्दा "दुधाच्याच गोळ्या"च. "ओ काका, ती निळी दुधाची गोळी द्या" असे आम्ही आणि आमचे टिंगेटांगे मित्र पायाच्या टाचा उंचावून दुकानाच्या काऊंटरपर्यंत कसेबसे पोहोचून त्या दुकानदार काकांना सांगत असल्याचे चित्र आत्ताही डोळ्यासमोर तरळतेय.
३. १० पैशांना ५ या दराने वगैरे मिळणार्या संत्र्याच्या फोडीच्या आकाराच्या, थोड्या भडक केशरी रंगाच्या आणि संत्र्याच्याच चवीच्या संत्रागोळ्या. या गोळ्या जास्त करून प्रवासी मंडळींमध्ये लोकप्रिय होत्या. बिस्लेरी, पाणी पाऊच वगैरेंचा शोध लागण्यापूर्वीचा तो काळ. प्रवासातली तहान या संत्रा गोळ्या चघळल्याने भागत असते. मध्येच कुठे स्थानकावर बस, रेल्वे वगैरे थांबली तर खाली उतरून आपापल्या फिरकीच्या तांब्यात, वाॅटरबॅगमध्ये नळावरचे पाणी भरून घ्यायचे किंवा तिथल्या नळाला ओंजळ लावून तसेच पाणी पिऊन घ्यायचे. स्टँडवर हे संत्रागोळीवाले भरपूर जण यायचेत.
४. ऐंशीच्या दशकात कॅडबरीच्या फाइव्ह स्टार चाॅकलेटचे दर्शन टी व्ही वरल्या जाहिरातींमुळे झाले होते खरे. पण टी व्ही वर ते माॅडेल हे चाॅकलेट त्यातले ते तार तार ओढून खाताना बघितले की घरच्या मोठ्यांच्या तोंडून "छी बाबा, काय तार तार घाणेरडे खातात !" असे निषेधात्मक उदगार दरवेळी निघायचे. आमच्या मनात "आम्हाला तुम्ही हे चाॅकलेट घेऊन तर द्या आधी. आम्ही तसे तार तार न ओढता गुपचुप तोंड मिटून खाऊन टाकू. त्याची चव तर कळू द्या आधी." असे विचार यायचेही. पण हे विचार प्रगट करण्याची आमच्यापैकी कुणाचीच प्राज्ञा, बिशाद नव्हती. हे मनातले मांडे (फाइव्ह स्टार) आम्ही मनातच खाल्लेत. तत्कालीन मध्यमवर्गीय घरे, घरातल्या स्वतःच्या आणि इतर आसपास असणार्या मुलांची संख्या आणि केवळ "मी माझा" करण्याची नसलेली वृत्ती यामुळे हे फाइव्ह स्टार चाॅकलेट मध्यमवर्गीयांसाठी न परवडणारी चैन होती.
जागतिकीकरण बरेच स्थिरावल्यानंतर बर्याच उशीरा हे फाइव्ह स्टार स्वकमाईने खाल्ले. पण तोवर कॅडबरीच्यच डेअरी मिल्क ची चव तोंडात बसलेली असल्याने फाइव्ह स्टार ची चव तितकिशी भावली नाही. लहानपणी आपल्याला हे चाॅकलेट न देऊन परिस्थितीने आपल्यावर फार मोठा अन्याय केला होता ही भावना मनात येण्यापूर्वीच विरून गेली.
५. साधारणतः १९७९ - ८० च्या सुमारास नागपुरातल्या महाल भागात असलेल्या मेसर्स गोविंद दिनकर गोखले अॅण्ड सन्स या किराणा दुकानात "राजमलाई" चे आगमन झाले. आमचे दादा खूप हौशी होते. त्यामुळे आम्ही न मागता सुध्दा आमच्याकडे "राजमलाई" आली आणि तिच्या चवीमुळे त्याकाळच्या नागपूर आणि विदर्भातल्या सगळ्या लहान मुलांच्या मनात तिने आपले सर्वोच्च आणि अढळ स्थान निर्माण केले. वर्धेजवळील दहेगाव इथे असलेल्या "केळकर गृह उद्योगा"चे उत्पादन असलेली, खव्याच्या - दुधाच्या मिश्र चवीची राजमलाई त्याकाळच्या अनेकांच्या हृदयात, मनात आणि जिभेवर जाऊन बसली. तिने आपल्या चवीचे प्रिंट त्याकाळच्या प्रत्येक लहान मुलाच्या मेंदूवर छापले. खूप उत्तम चवीचा अमीट ठसा राजमलाईने नागपूर आणि विदर्भात उमटवला.
राजमलाईचे यश पाहून केळकरांनी मधल्या काळात "काजूमलाई" पण आणली होती. पण थोरलीची सर धाकलीला कधी आलीच नाही.
केळकर गृह उद्योग विस्तारू लागला. केळकरांची बोरकूट (अजूनही नागपूरवरून मुंबईला रेल्वेन निघालो की वर्धा स्टेशन सोडल्यानंतर माझी नजर डावीकडल्या खिडकीतून दहेगावकडे झेपावत असते, दहेगाव स्टेशनला लागूनच असलेला केळकर गृह उद्योग, त्यांच्या बोरकूट वाळवणासाठीच्या विशाल टाक्या, त्यात वाळत असलेला टनभर बोरकूट पाहून मन आजही आनंदून जाते, मी बालपण पुन्हा जगतो.) विविध लोणची वगैरे अनेक उत्पादने येऊ लागलीत. मधल्या काळात आम्हीही शिक्षणासाठी, नोकरीसाठी नागपूर सोडले. राजमलाई इतरत्र कुठेच मिळाली नाही.
जवळपास एक दीड तपाने नागपुरात परतलो. राजमलाइचा अनेकवेळा शोध घेतला. बर्याचदा राजमलाई मिळाली सुध्दा. पण बालपणीची चव हरवली होती. आज केळकरांकडला त्या चवीचा फाॅर्म्युलाच हरवला होता की आमच्या जिभेवरच्या टेस्टबडसची संरचना बदलली होती हे ठरवणे अवघड झाले होते. खूप शोध घ्यायचो. दरवेळी राजमलाई मिळाली की आवर्जून घ्यायचो आणि खालल्यानंतर मूळ चवीच्या अभावाने निराश व्हायचो.
ती परिसाच्या शोधात असलेल्या माणसाची गोष्ट नाही का ? एका हातात लोखंडी कांब घेऊन जंगलातला प्रत्येक दगड त्या लोखंडाला लावत तो बघत असतो. ज्या दगडाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने झाले तो परिस. आणि तो परिस आपण आपल्याकडे जपून ठेवायचा असे तो ठरवतो. पण हजारो लाखो दगड हातातल्या लोखंडाला लावूनही लोखंड जसेच्या तसेच असलेले पाहून तो निराश होतो. तसे आम्ही या राजमलाईच्या मूळ चवीच्या शोधात निराश झालो होतो.
पण परवा मात्र कमालच झाली. आमच्या कुंडलीत काही ग्रह अचानक उच्चीचे झाले म्हणा, अचानक चांगल्या स्थानांच्या, उत्तम ग्रहांच्या लाभी महादशा सुरू झाल्या म्हणा. आम्हाला आमच्या घराजवळच्या दुकानात ही राजमलाई दिसली. थोड्या निराशेनेच खरेदी करून घरी आणली आणि एक तुकडा तोडून तोंडात टाकला आणि...
मेंदूतले ४४ वर्षांपूर्वीचे टेस्टबडस न्युराॅन्स सक्रिय झालेत. मेंदूत नोंदल्या गेलेल्या चवीने "तीच ही चव. अगदी तीच." असे व्हेरीफीकेशन दिले आणि प्रा. राम प्रकाश किन्हीकर इयत्ता चौथीतले कुमार राम प्रकाश किन्हीकर झालेत.
गेलेल्या बालपणाशी, तारूण्याशी जोडून ठेवणारे मनावर कोरून ठेवलेले हे दुवे. कितीही विसरतो म्हटलं तरी आपल्याला विसरू थोडीच देणार आहेत ? आपल्या या भूतलावरच्या अस्तित्वाबरोबरच आपल्या आतले यांचे अस्तित्व संपणार, खरंय ना ?
- या जगातल्या भरपूर लौकिक गोष्टींमध्ये न रमलेला पण काहीकाही गोष्टीत प्राचार्य राम शेवाळकरांच्या कवितेप्रमाणे "येथल्या खेळात पाची प्राण माझे गुंतलेले" या भावनेने खूप अटॅच्ड असलेला एक मनस्वी मनुष्य, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.



Thursday, May 30, 2024

भारतीय रेल्वेच्या एसी कोचेसमधील सेवेचा घसरता दर्जा

१९९५ - ९६ ते २००१ - ०२ पर्यंत रेल्वेच्या त्रिस्तरीय वातानुकूल शयनयान (थर्ड एसी) वर्गात प्रवासातली अंथरूणे पांघरूणे कोच मधला मदतनीस (अटेंडंट) प्रत्येक प्रवाशाला तो तो ज्या ज्या स्टेशनवरून चढणार असेल, तिथून चढल्यानंतर रात्री बेरात्री त्याच्या त्याच्या जाग्यावर आणून द्यायचा. गाडीच्या टीटीईसोबत त्याच्याकडेही एक रिझर्वेशन चार्ट असायचा त्यातून त्याला प्रत्येक प्रवाशाची चढण्या उतरण्याच्या स्टेशन्सची माहिती मिळत असे.


प्रतिष्ठित गाड्यांमध्ये ही अंथरूणे पांघरूणे पॅकबंद पाकीटांमध्ये असत. दोन पांढर्‍याशुभ्र धुतलेल्या, इस्त्री केलेल्या दोन चादरी, एक पांढराशुभ्र उशीचा अभ्रा आणि एक पांढरा हँड नॅपकिन हे त्या कागदी पॅकमध्ये सीलबंद असायचे. एक ब्लँकेट आणि अभ्र्याशिवाय असलेली उशी हे मात्र पॅकबंद नसायचे. इतका सगळा जामानिमा तो मदतनीस प्रवास सुरू झाल्यावर प्रत्येक प्रवाशाला बर्थवर आणून देत असे आणि प्रवास संपण्याआधी त्याच्याकडून गोळा करीत असे.


आजकाल हँड नॅपकिन तर त्रिस्तरीय वातानुकूल शयनयानात देतच नाहीत. हे नॅपकिन्स स्टँडर्ड सेटचा भाग असल्याचा रेल्वेचा नियम असल्याचे आपण त्या मदतनीसाला खूप खनपटीला बसून सांगितले तर नाईलाज झाल्यासारखा आणि कसातरी कळकट नॅपकिन तो आपल्याला देतो.


त्याहीपेक्षा भयानक म्हणजे आजकाल ही अंथरूणे पांघरूणे त्या त्या बर्थसच्या बे मध्ये एकावर एक रचून ठेवलेली असतात. "तुम्हाला हवी ती घ्या नाहीतर गेले उडत" असा आविर्भाव त्यात असतो. यात सुरूवातीच्या स्थानकावरून बसण्याच्या ठिकाणावरून बसणारी प्रवासी मंडळी त्या बे मध्ये असलेल्या पांघरूणांमधून त्यातल्या त्यात चांगली पांघरूणे, थोड्या जाड उशा निवडून स्वतःकडे घेतात आणि उरलेली निम्न दर्जाची पांघरूणे मधल्या स्थानकांवरून चढणार्‍या प्रवाशांच्या नशिबी येतात.



आजकाल तर द्विस्तरीय शयनयान (सेकंड एसी) आणि प्रथम वर्ग शयनयान (फर्स्ट एसी) वर्गातही ही पांघरूणे पहिल्या स्थानकापासूनच त्या त्या बर्थसवर ठेऊन देतात असा अनुभव येतोय. त्यातला प्रथम वर्ग वातानुकूल सोडला तर द्विस्तरीय वातानुकूल वर्गातही हा नॅपकिन वेगळा मागावा लागतो हा अनुभव आहे.


नवनवीन सोयीसुविधा प्रवाशांना देताना जुन्या सोयीसुविधा प्रवाशांना नियमपुस्तकाप्रमाणे मिळतायत की नाही ? हे बघणे रेल्वेची जबाबदारी आहे हे रेल्वे विसरत चाललीय का ?


दक्षिण रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे आणि दक्षिण पश्चिम रेल्वेमध्ये ब-यापैकी हे नियम पाळले जातात हा माझा अनुभव आहे. अशाच एका अनुभवाचे कथन इथे.




- रेल्वेच्या जनरल डब्यापासून ते फर्स्ट एसी पर्यंत सर्वच डब्यांमधून भरपूर प्रवास केलेला


आणि


प्रवासात अंथरूणे पांघरूणे अगदी घरच्यासारखी विना सुरकुती अंथरणारा व प्रवास संपल्यानंतर अंथरूण पांघरूणांची घरच्यासारखीच व्यवस्थित घडी घालून रेल्वेला परत करणारा नेटका प्रवासी पक्षी,


प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


मन हा मोगरा

 श्रीतुकोबांनी "मन हा मोगरा, अर्पूनी ईश्वरा" असे का म्हटले असेल याची प्रचिती आली.

बाजारात काल मोगरा छान आणि स्वस्त मिळाला म्हणून आणला आणि देवाला अर्पण केला. आज सकाळी देवघरात गेल्यानंतर बघितले की मोग-याची फ़ुले निर्माल्य झालेली आहेत, सुकून गेलेली आहेत पण त्यांचा सुवास कालइतकाच किंबहुना कालपेक्षाही जास्त दरवळतो आहे.



आपले मन इतके छान असावे की ते शिळे झाले, कुणी त्याला चुरगाळले, त्याचे निर्माल्य झाले तरी त्यातून अधिकाधिक सुगंधच बाहेर पडावा. जगाला त्याने आनंदच द्यावा. जग आपल्याशी कसे वागतेय याचा परिणाम आपला जगाशी वागण्यावर न व्हावा ही श्रीतुकोबांची इच्छा आहे.

- प्रा. वैभवीराम किन्हीकर, प्रभातचिंतन २७ मे २०२४.