Tuesday, July 21, 2026

श्रीमदभागवत चिंतन - २१ वामनावतार

श्रेष्ठ भगवदभक्त प्रह्लादाचा पुत्र विरोचन आणि त्याचा पुत्र बली हा मोठा पराक्रमी राजा होता. दैत्यकुळात जन्म झाला असला तरी आपल्या आजोबांच्या आणि वडिलांच्या संस्कारांमुळे ब्राह्मणांविषयी, यज्ञसागादि कर्मांविषयी त्याला अतिशय आदर होता. त्याच्या राज्यात तो आपल्या असुर प्रजाजनांसाठी नित्य यज्ञकर्मे, यागादि विधी करीत असे. अशा पद्धतीने जीवन जगता जगता तो इतका शक्तीशाली झाला की त्याने देवांवर स्वारी केली आणि इंद्राचे अमरावती नगर बळकावले. देवांना असुरांनी त्यांच्या स्थानावरून पदच्युत केले आणि ते स्वर्गाचे अनंत भोग उपभोगू लागलेत.


आपल्या पुत्रांना अशा प्रकारे पदच्युत होऊन दारोदार भटकावे लागत असल्याचे पाहून देवमाता अदिति दुःखीकष्टी झाली. तिचे पती कश्यप ऋषी आपल्या साधनेवरून परतल्यानंतर आपल्या पत्नीच्या उदासीचे कारण त्यांनी विचारले आणि अदितिने देवांच्या पराभवाचे व असुरांनी अमरावती बळकावल्याचे वृत्त आपल्या पतीला कळवले. कश्यप मुनींनी अदितिला पयोव्रत या साधनेचा उपदेश केला आणि देवमाता अदितिने मनात कुठलीही शंका न धरता ते व्रत आरंभिले.


पयोव्रताचे फ़ळ म्हणून प्रत्यक्ष भगवान विष्णू अदितिच्या उदरी आपल्या चतुर्भुज स्वरूपात संपूर्ण आयुधांसह प्रगट झाले आणि मातेच्या मनातला असुर पराभवाचा हेतू जाणून त्यांनी वामनाचे बटुरूप घेतले. बलिराजाकडे तेव्हा अनेक यज्ञ सतत सुरू असत. नर्मदेच्या तीरावर सुरू असलेल्या अशाच एका अश्वमेध यज्ञात बटु वामनरूपाने भगवान विष्णू प्रगट झालेत. असुर जरी असला तरी त्याचे सात्विक कर्म जाणून त्याच्या घरी भगवंतांना याचक म्हणून जावे लागते. किती गोड कल्पना !



तेव्हा ते बटुरूप वामन इतके सुंदर, लोभसवाणे आणि तेजस्वी दिसत होते की सगळे याज्ञिक. ऋत्विज आणि तिथे उपस्थित असलेले असुर सगळे अगदी मोहित झालेत. बलिराजाने बटुरूप वामनाचे पूजन केले आणि त्यांना दान देण्याचा संकल्प सोडला. तोपर्यंत दैत्यगुरू शुक्राचार्यांनी वामनरूपातील भगवान विष्णूंना ओळखले आणि आपल्या शिष्याला पदच्युत करण्यासाठी भगवान इथे आलेले आहेत हे जाणून बलिराजाला त्या बटुला दान न देण्याबाबत सांगितले. पण बलिराजाने त्यांना उत्तर दिले की एकदा मी त्या बटुला शब्द दिलाय आता जर मी तो शब्द मागे घेतला तर माझ्या कुळाला बट्टा लागेल. आता माझे जीवित संपले तरी चालेत पण मी त्या बटुला दान देणारच. दैत्यगुरू शुक्राचार्यांनी संतापून बलिराजाला "गुरूंची अवज्ञा केल्याने तुझी सर्व लक्ष्मी नष्ट होईल" असा शाप दिला आणि ते तिथून चालते झाले.


हा संवाद ऐकत असलेले भगवान विष्णू मात्र बलिराजावर, त्याच्या निश्चयीपणावर आणि ब्राह्मण, यज्ञकर्मे याबाबत असलेल्या त्याच्या प्रेमावर प्रसन्न झाले. बलिराजाने त्यांना दान देण्याचा संकल्प सोडल्यानंतर त्यांनी फ़क्त तीन पाऊले भूमीचे दान मागितले. बलिराजाला याचे फ़ार आश्चर्य वाटले. त्याने वामन भगवान यांना आणखीही काही मागण्याची विनंती केली. आपल्या मनात असेल तर मी या पृथ्वीतलावरील एखादे संपूर्ण द्वीप आपल्याला देऊ शकतो. माझे राज्य स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या त्रिखंडात आहे त्यातला एक संपूर्ण खंड तुम्ही मागितला तरी मी देईन अशी तयारी दर्शविली पण वामन भगवान आपल्या तीन पावलांच्या दानावर ठाम राहिलेत. याप्रसंगी बलिराजा आणि वामन भगवान यांचा संवाद श्रीमदभागवताच्या अष्टम स्कंधात मुळातूनच वाचण्यासारखा आहे. वामन भगवान बलिराजाला मनुष्यमात्रांच्या मनातल्या कधीही न संपणा-य़ा तृष्णेचा उपदेश करतात आणि ती तृष्णा ज्याची आहे तो तिन्ही लोकांचा स्वामी जरी बनला तरी आपल्या अंतरात्म्यातल्या तृष्णेमुळे मनातून कधीही सुखी होत नाही. कायम नवनवीन मिळवण्याची त्याची तहान कायम असते. याउलट प्रारब्धवशाने आपल्याला प्राप्त होत असलेल्या वस्तूंमध्ये तृप्त असलेला पुरूष हा जगाला जिंकल्यासारखाच समाधानी असतो हा उपदेश भगवान वामनांनी बलिराजाला केला. बलिराजा मनोमनी समजला. अत्यंत सात्विक बुद्धी जरी असली तरी नवनवीन गोष्टी मिळविण्याची तृष्णा आपल्याला कायम असमाधानी ठेवेल हा आत्मबोध त्याने करून घेतला.


त्यानंतर भगवान विष्णूंनी वामनरूपातून विराटरूप धारण करून एका पाऊलाने सगळी पृथ्वी, तर दुस-या पाऊलाने सगळे आकाश व्यापले. तिसरे पाऊल ठेवायला त्यांना जागाच मिळेना तेव्हा बलिराजाने आपले मस्तक त्यांच्यापुढे केले. बलिराजाचा हा दृढसंकल्प आणि सात्विकता पाहून भगवान प्रसन्न झालेत आणि त्यांनी बलिराजाला पाताळाचे राज्य दिले. या मन्वतरानंतर बलिराजा हाच जगाचा राजा म्हणून राज्य करणार असल्याचे वरदान सुद्धा बलिराजाला त्याने न मागता दिले.



वामनावतारात भगवंतांनी एका अतिशय सात्विक, शुद्ध राजाच्या मनातल्या तृष्णेची आणि त्यापासून कायम मिळत राहणा-या मनातल्या असंतोषाची त्याला जाणीव करून दिली आणि सरतेशेवटी त्याच्या मनात कायम संतोष राहील असा आशिर्वाद दिला. हा या कथेचा आपण सर्वांना आत्मबोध. आपण सात्विक बुद्धीचे आहोत पण आपल्या मनात अशी तृष्णा आहे का ? याचा विचार आपला आपण करायचा आहे आणि भगवान वामनांच्या उपदेशाप्रमाणे आपल्या मनाला बोध करून घ्यायचा आहे हाच या कथेचा प्रसाद.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध अष्टमी शके १९४८ दिनांक  २१ / ७ / २०२६


२१ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 




Monday, July 20, 2026

श्रीमदभागवत चिंतन - २० समुद्रमंथन

एकेकाळी सर्व देवांना दानवांनी पराजित आणि हतप्रभ करून टाकलेले होते. देवांचा प्रभाव जनमानसावर पडेना. त्यांची शक्ती अगदी क्षीण करून दानव या जगावर राज्य करू लागले.


देव म्हणजे त्यागी जीवन. दानव म्हणजे भोगी जीवन. देव म्हणजे स्वतःआधी इतरांचा विचार करणारे व्यक्ती. तर दानव म्हणजे फ़क्त स्वतः आणि स्वतःचाच विचार करणारी व्यक्ती. देव म्हणजे समष्टीच्या कल्याणाची इच्छा तर दानव म्हणजे फ़क्त स्वतःच्याच कल्याणाची इच्छा. देव म्हणजे समस्त सृष्टीच्या कल्याणाचा विचार तर दानव म्हणजे "खाओ, पिओ ऐश करो" हा विचार. या दोन विचारसरणींमधला संघर्ष फ़ार जुना आहे. बराच काळ देवांची विचारसरणी मान्य करून त्या पथावर चालणारा समाज असतो तर मधला काही काळ दानवांच्या आकर्षक मांडणीला भुलून, दानवांची विचारसरणी पटून, त्या विचारसरणीचे आकर्षण वाटून त्या मार्गाने जाणारा समाज अस्तित्वात येतो. हा देवांचा पराभव असतो. आणि हे दानवराज्य फ़ार काळासाठी पृथ्वीवर असणे हे समस्त पृथ्वीसाठी अत्यंत धोकादायक असते.


अशावेळी पराभूत झालेल्या देवांनी परमेश्वराची आराधना केली, त्यांची यथार्थ स्तुती केली. देवांचा सदहेतू जाणून प्रत्यक्ष भगवान प्रगट झालेत आणि त्यांनी देवांना कायम अपराजित राहण्यासाठी अमृतप्राशन करण्याचा सल्ला दिला. ते अमृत समुद्रमंथनातून मिळेल असा नुसता आशिर्वाद देऊन भगवान शांत राहिले नाहीत तर समुद्रमंथन करण्याचा सविस्तर विधीसुद्धा त्यांनी कथन केला आणि समुद्रमंथनादरम्यान कासवरूप घेऊन मेरुपर्वत स्वतःच्या पाठीवर तोलून मंथनादरम्यान तो समुद्रात बुडणार नाही याची तजवीज करण्याची ग्वाहीसुद्धा भगवंतांनी देवांना दिली. नियमानुसार वागून सुद्धा जर सुष्ट शक्तींचा पराभवच होणार असेल आणि जग संपणारच असेल तर जगाच्या पालनकर्त्या भगवंताला प्रसंगी त्या नियमांना मुरड घालून थोडा पक्षपात करून ते जग पुनर्स्थापित करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतील त्या कराव्याच लागतात.



प्रसन्न झालेल्या भगवंतांनी या समुद्रमंथनातून अमृत प्रगट होण्यापूर्वी विष प्रगट होईल याचीही पूर्वसूचना सर्व देवांना देऊन ठेवली होती. आणि घडलेही तसेच. अमृतमंथनात विष प्रगट झाले तेव्हा ते प्राशन करायला कुणीही तयार होईना. तेव्हा देवांनी सृष्टीचे आद्य दैवत शंकरांची मनोभावे प्रार्थना केली. हे विष जर मी प्राशन केले नाही तर पृथ्वीवरील सगळ्याच जीवांना अतिशय त्रास होईल या अत्यंत विशाल हेतूने भगवान शंकरांनी ते विष प्राशन केले आणि ते सृष्टीचे कायम उपकारकर्ता असे महा देव झालेत.


सरतेशेवटी ज्या अमृतासाठी हे मंथन सुरू झालेले होते ते अमृत सागरातून प्राप्त झाले. ते वाटण्यासाठी श्रीविष्णूंना मोहिनीरूप घेऊन सगळ्या दैत्यांना भुलवावे लागले. सत्य मार्गाचा कायम अवलंब करीत असलो तरी जर सत्य मार्गात कायमचा अडथळा असा दैत्य राज्याच्या दृष्टीने येणार असेल तर मग थोडे सत्य बाजूला सारून असत्य, कपट याचा वापर करून देवराज्य पृथ्वीवर आणले पाहिजे हा धडा आपल्याला प्रत्यक्ष भगवान श्रीविष्णूंनी दिला. साध्य होते देव राज्य पुन्हा स्थापित करण्याचे. त्या अतिशय उदात्त साध्यासाठी तत्वांना थोडी मुरड घालावी लागली तर तो आपदधर्म म्हणून ती तशी घातली पाहिजे हे "सत्यं परं धीमहि" असे प्रतिपादन करणा-या श्रीविष्णूंनी या प्रसंगाद्वारे सांगितले आहे.



हाच आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यानंतर चार हजार वर्षांनी देवाचे, धर्माच्या मार्गाने चालणारे मराठी राज्य प्रस्थापित केले आणि सकल भारतवर्षावर फ़ार फ़ार उपकार केलेत.


अमृताआधी विष येणार आहे. ते प्राशन करून पचवूनच पुढे गेलोत तर अमृत मिळणार आहे आणि जगाच्या कल्याणाकरिता व्यापक विचार करून, साध्य काय आणि साधन काय याचा विचार सदैव जागृत ठेऊन आपल्याला आपली कृती ठरवायची आहे हेच आपण या समुद्रमंथनातून शिकत जातो.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध सप्तमी शके १९४८ दिनांक  २० / ७ / २०२६


२० जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 



श्रीमदभागवत चिंतन - १९ गजेन्द्रमोक्ष आख्यान

सुंदर वृक्ष असलेली वने, फ़ळांची, फ़ुलांची सुंदर आणि सुवासिक झाडे असलेली आणि मनमोहक सरोवरे असलेली उपवने असलेले एक ठिकाण एका पर्वत पायथ्याशी होते. त्या वनात एक अत्यंत पराक्रमी आणि सुंदर असणारा हत्ती एखाद्या राजाप्रमाणे राज्य करीत होता. त्याला अनेक राण्या आणि पुत्र होते. तो हत्ती इतका पराक्रमी होता की नुसत्या त्याच्या चाहुलीनेच वनातल्या इतर क्रूर प्राण्यांची बोबडी वळायची आणि या क्रूर प्राण्यांचे भक्ष्य असलेले इतर प्राणी आपल्या कैवा-याच्या अशा वावरामुळे मनातून आनंदून जायचे. एकंदर मोठ्या मजेत आणि आनंदात तो गजेंद्र वनात राहत होता.


एकदा असाच तो गजेंद्र वनात आपल्या राण्यांसह विहार करीत असताना त्याला आणि त्याच्या कळपातल्या पिल्लांना आणि त्याच्या राण्यांना तहान लागली. तो गजेंद्र आपल्या राण्यांसह पाणी पिण्यासाठी एका छान सरोवरात उतरला. पाणी पिऊन झाल्यानंतर त्यांनी एकमेकांवर आपापल्या सोंडेनी पाणी उडवत जलक्रीडा करीत होते. तेव्हढ्यात पाण्यातल्या एका मगरीने त्याला पाण्यात त्रास झाल्यामुळे क्रोधित होऊन त्या जलक्रीडेच्या ठिकाणी येत त्या गजेंद्राचा पाय आपल्या जबड्यात पकडला.



सुरूवातीला गजेन्द्राने स्वतःचे संपूर्ण बळ एकवटून त्या मगरीच्या तावडीतून आपला पाय सोडविण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे पाण्यातले बळ त्या मगरीपेक्षा कमी पडत होते. त्याच्या कुटुंबियांनीही त्याला सोडविण्यासाठी आक्रोश सुरू केला पण काही केल्या त्याची त्या मगरीच्या जबड्यातून त्याची मुक्तता होईना. अखेर एक एक करून त्याचे कुटुंबिय त्याला सोडून पाण्याबाहेर जाऊन वनात परतू लागलेत आणि आता मात्र तो गजेंद्र एकटा पडला.


स्वतःच्या शरीरातली क्षीण होत चाललेली शक्ती, कुटुंबिय आणि मित्रांनी कठीण काळी सोडलेली साथ यामुळे मगरीच्या जबड्यात पाय सापडलेला तो गजेंद्र व्याकूळ होऊन भगवान श्रीहरींना आळवू लागला. त्यांची स्तुती करू लागला. संसारात वावरताना "जन सुखाचे सोबती, निर्वाणीचा श्रीपती" या उक्तीचे त्याला स्मरण झाले आणि त्याने भगवंतांची व्याकूळ आराधना सुरू केली.


भक्ताच्या अत्यंत व्याकूळ हाकेला ओ देणे हे तर भगवंताचे प्रमुख कार्य आहे. भगवान विष्णू त्यांच्या गरूडासह त्या सरोवराकाठी प्रगट झालेत आणि त्यांनी त्या मगरीचा जबडा फ़ाडून गजेंद्राची मुक्तता केली. याप्रसंगी आपल्याही आयुष्यातले आपले अनुभव आपण सर्वसामान्य जनांनी इथे लक्षात घ्यावेत. जीवन अतिशय उत्तम सुरू असताना आपल्याला भगवंताचे स्मरण होत नाही. आपण आपल्या कर्तृत्वाच्या अहंकारात, मित्रमंडळी, कुटुंबियांच्या भरोशावर जीवन पार पाडू हा विश्वास आपल्याला असतो. जेव्हा ही सगळी साधने अपुरी आहेत हे आपल्या ध्यानात येते तेव्हा निर्वाणीच्या क्षणी आपल्याला भगवंत आठवतो. पण तो इतका दयाळू की तो आपल्या सहाय्याला धावून येतोच.



द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळीसुद्धा तिने श्रीकृष्णाला त्याने तिच्या सहाय्याला यायला इतका उशीर का केल्याबद्दल विचारले तेव्हा श्रीकृष्णाने तिला हेच सांगितले. द्रौपदी, तू पहिल्यांदा आपल्या नव-यांना विनवणी केली आणि नंतर सभेमधल्या उपस्थित जाणत्या मंडळींना विनंती केली. सगळ्यात शेवटी तू मला विनवणी केलीस. तू विनवणी केल्यानंतर मी लगेच आलो. उशीर तुझ्याबाजूने झालाय. 


गोस्वामी तुलसीदासांनी सुद्धा आपल्या दोह्यात हेच प्रतिपादन केलेले आहे. 


दुखमे सुमिरन सब करें, 

सुखमें करे न कोई, 

सुखमे जो सुमिरन करे, 

दुख काहे को होई ?


तसे आपण सर्व संसारी मंडळी सुखाच्या क्षणांमध्येही भगवंताला न विसरता त्याचे नित्य स्मरण करीत राहिलो तर आपल्या या पृथ्वीतलावरच्या आयुष्यात दुःखाचे संकटांचे प्रसंग येणारच नाहीत. आणि आपल्या पूर्वकर्मामुळे असे प्रसंग जरी आलेच, तरी त्यात तो श्रीहरी आपल्या सोबत सदैव आहे ही आपली जाणीव जागृत राहून आपण धैर्याने त्या प्रसंगाला सामोरे जाऊ शकू.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध षष्ठी शके १९४८ दिनांक  १९ / ७ / २०२६


१९ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 



Sunday, July 19, 2026

मुसळधार पावसाच्या काही थरारक आठवणी

सध्या, माझा आवडता ऋतू, पावसाळा सुरू आहे. रात्रभर झोपेनंतर सकाळी उठल्यावर जर सूर्य उगवल्यानंतरही अंधारलेल्या वातावरणात, पावसाची रिपरिप कानी येत असली की 


"पाऊस कधीचा पडतो

झाडांची हलती पाने

हलकेच जाग मज आली

दुःखाच्या मंद सुरांने" 

ही ग्रेसची कविता आठवते.

 

बदल असलाच तर फक्त ग्रेसच्या "दुःखाच्या मंद सुरांने" ऐवजी "सुखाच्या मंद सुरांने" ही भावना असते. खरोखर असे झोपेतून जागे होताना पाऊसाची रिमझिम कानी पडणे यासारखे सुख नाही. सर्द, गार वातावरणात कामाचाही उत्साह वाढतो हा माझा अनुभव. दिवसाची अशा प्रकारे छान सुरूवात होते.


आजवर अगदी बालपणचे ३-४ सोडलेत तर चांगले ४० - ४५ पावसाळे नुसते बघितलेच नाहीत तर सजगतेने अनुभवलेले आहेत. प्रत्येक पावसाळा खूप छान. पण एकदोन भितीदायक पण अनुभव आहेत.

२६ जुलै २००५ च्या मुंबईच्या ढगफुटी पावसात (१००० + मिमी  पाऊस आणि तो सुध्दा एका दिवसात) सापडल्याचा अनुभव सव्वा तपानंतर आजही काटा आणतो. 


असाच एक चित्रमय अनुभव.


१८/०७/२०१३ : सांगोल्यावरून काॅलेजनंतर संध्याकाळी ५ वाजता आम्ही निघालोत. नागपूरला गुरूमहाराजांकडे श्रीगुरूपौर्णिमा उत्सवासाठी मी, सौ. वैभवी आणि चि. मृण्मयी आमच्या गाडीने निघालो. तत्पूर्वी गाडीने सांगोला ते नागपूर हा ७५० किमी प्रवास दोनवेळा केलेला असल्याने त्या आघाडीवर निर्धास्त होतो.


रात्री ९ वाजता लातूर गाठले. ४ तासात २२० किमी. लातूरला एक मोटेल शोधले. विश्रांती घ्यायला लागलो.


१९/०७/२०१३ : पहाटे ५ ला उठून पटकन आवरून ५.३० ला प्रस्थान ठेवले. वाटेत हायवेवरच अहमदपूरच्या एका छोट्याशा हाॅटेलमधे सकाळी ७.०० वाजता गरमागरम इडली सांबार आणि चहा घेतला. इतकी अप्रतिम इडली आणि चविष्ट सांबार अख्या दक्षिण भारताच्या प्रवासातही कुठेच चाखायला मिळाला नव्हता. आजही ती चव अगदी जिभेवर आहे.


पाऊस तसा सोबत होताच पण रिमझिम. दुपारी ११.३० च्या आसपास नांदेड जिल्हा सोडून विदर्भात प्रवेश केला तेव्हा विदर्भातल्या पावसाचे वैदर्भीय माणसासारखेच उखडेल आणि रौद्रभीषण स्वरूप दिसायला सुरूवात झाली.




"हा इदर्भाचा मानूस का नाय, सरका रायला त सरका रायते बाप्पू. आन येकडाव का याच टायक सरकल का नाय त मंग पुरती आत्तरपित्तर काढून ठ्येवते त्यो." हे वैदर्भीय माणसाचे आणि पावसाचेही स्वभाववर्णन.


वाटेत धनोडावरून जाताना श्रीक्षेत्र माहूरला जाऊन अर्ध्या तासात कुलदेवतेचे, रेणुकामायेचे, दर्शन घेऊयात ही कल्पना आली. गाडी त्यादिशेने घेतली.




वाटेत विदर्भ मराठवाड्याला विभागणार्‍या अरूणावती नदीवरील पूल लागला. इतकी दुथडी भरून वाहणारी नदी मी आजवर कधीच पाहिली नव्हती. माहूरवरून दर्शन घेऊन परतेपर्यंत तरी पुराचे पाणी पुलावर येऊ नये अशी प्रार्थना करीतच माहूरला गेलो. दर्शन घेतले. साधारण तासाभरातच त्याच रस्त्याने परतलो. सुदैवाने पूर पुलापर्यंत पोहोचला नव्हता.



त्या जोरदार मार्‍यातच, नागपूरच्या, घराच्या ओढीने सावधानतेने गाडी चालवत वर्धा गाठले. आता काय ? शेवटचा ७० - ७५ किमीचाच पल्ला. थोडे सैलावलो. पण खरी कसोटी इथेच होणार होती.


वर्धा - नागपूर रस्त्याने केळझर सोडले आणि खडकी सेलडोह परिसरात इतका पाऊस लागला की गाडीतल्या गाडीत आम्हाला एकमेकांशी ओरडून बोलावे लागत होते. गाडीवर पावसाच्या मार्‍याचा अतीप्रचंड आवाज, हमरस्त्यावर पाटासारखे, प्रचंड वेगाने इतस्ततः वाहणारे पाणी काळजाची धडकी भरवणारे होते. 


इंग्रजीत खूप बदाबदा पावसाला "It is raining Cats and Dogs" असा वाक्प्रचार आहे पण हा पाऊस म्हणजे "It was raining Elephants and Rhinos" या वर्णनाचा होता. मार्गात आसर्‍याला थांबण्यालायक जागा नव्हती आणि गाडी एका जागी स्थिर थांबली असती याची खात्री नव्हती. पाण्याच्या प्रवाहात गाडी वाहत जाण्याची दाट शक्यता आम्हाला कुठे थांबू देत नव्हती.


हळूहळू आणि ड्रायव्हिंगचे सगळे कौशल्य पणाला लावून वर्धा ते नागपूर अंतर दोन तासात कापून घरी आलो. सुटकेचा निःश्वास सोडला. अत्यंत भीतीदायक आणि विचित्र पाऊस.



दुसर्‍या दिवशी (२०/०७/२०१३) सकाळी वर्तमानपत्र उघडले आणि सिंदीजवळ आदल्या दिवशी संध्याकाळी झालेल्या पावसाच्या मार्‍यात रेल्वेमार्गाचा भरावच वाहून गेल्याची बातमी वाचली आणि पुन्हा एकदा काळजाचा थरकाप उडाला.

काल आम्ही याच वेळेस त्याच जबरदस्त पावसाच्या पट्ट्यात सापडलो होतो. थांबलो असतो तर काय झाले असते ही कल्पनाही करवत नव्हती. गुरूमाऊलीचे, परमेश्वराचे आभार मानले.


गुरूपौर्णिमा उत्सव आटोपून परतताना मात्र एक वेगळीच मजा झाली. परतताना नागपूर - अमरावती - कारंजा (लाड) - मालेगाव (जहांगिर) - मेहेकर - देऊळगावराजा - जालना - अंबड - गेवराई - बीड - चौसाळा - मांजरसुंबा - कुंथलगिरी - येरमाळा - बार्शी - कुर्डुवाडी - पंढरपूर - सांगोला असा ८०० किमीचा मार्ग निवडला होता. एका दिवसात अंतर कापले गेले पाहिजे म्हणून नागपूरवरून पहाटे ४.३० ला च निघालो. वाटेत सतत पाऊस. सारखी आपली रिपरिप, रिपरिप. दिवसभर गाडीचे वायपर्स सुरू ठेवल्यामुळे तो आवाज संध्याकाळपर्यंत नकोसा वाटायला लागला होता. बरे, पाऊसही असा खट्याळ की वायपर्स बंद केलेत की असा वाढायचा की समोरचे दिसेनासे होईल. आणि वायपर्स सुरू केलेत की आपला रिमझिम, रिमझिम. वायपर्सची गरज नाही असे वाटणारा.


संध्याकाळी ७ च्या सुमारास जवळपास ७८० किमी अंतर कापून पंढरपूर - सांगोला रस्त्यावरील खर्डी गावी पोहोचलोत तर काय आश्चर्य ! सगळा परिसर कोरडाठाक. गेले वर्षभर इथे पाऊस नसल्यासारखा. खर्डी पासून सांगोल्यापर्यंत, २० किमीच्या पट्ट्यात,  पाण्याचा टिपुस नाही आणि गेल्या दोन तीन दिवसात पडल्याचा मागमूस नाही. 

संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस दमदार हजेरी लावत असताना हा भाग कोरडाच्या कोरडा. "पर्जन्यछायेचा प्रदेश" हे भुगोलाच्या पुस्तकात केवळ शिकलो होतो, त्यादिवशी अनुभवले.


- अनेक विद्यार्थ्यांचा गुरूजी असलो तरी सतत कसली ना कसली शिकवण देणा-या जीवनाला एक गुरू मानणारा वैभवीराम मास्तर.

Saturday, July 18, 2026

श्रीमदभागवत चिंतन - १८ प्रह्लाद चरित्र

आपला भाऊ हिरण्याक्ष याची हत्या भगवान विष्णूंनी केल्याचे ऐकताच सूडाने पेटलेला हिरण्यकश्यपू तप करू लागला आणि तपाचे फ़ळ म्हणून ब्रह्मदेवांकडून त्याने अमरत्वाचा वर मागितला. अमरत्व हे पृथ्वीतलावरील कुणालाही देणे अशक्य आहे हे त्याला ब्रह्मदेवांनी समजावून सांगताच त्याने बुद्धीचातुर्याने असा वर मागून घेतला की त्याला मारणे या पृथ्वीवरील कुणालाही अशक्यच व्हावे. आणि जवळपास अमरत्वच प्राप्त झालेला हिरण्यकश्यपू पृथ्वीतलावर धुमाकूळ घालू लागला. दैवी गुणांचा निषेध करून आसुरी गुण लोकांमध्ये रूजवू लागला. चांगल्या गोष्टींकडला सर्व जनतेचा कल हळूहळू कमी होऊ लागला आणि केवळ देह हा एव्हढाच खरा आणि देहाचे सुखे तेच परमसुख ही भावना आपल्या प्रजेमध्ये रूजवण्यात हिरण्यकश्यपू यशस्वी होऊ लागला.


अशावेळी भगवंताला काहीतरी लीला करावी लागते. या जगातले सगळे प्राणीमात्र योग्य जीवनक्रम चालवून, चांगल्या जीवन मार्गावरची श्रद्धा दृढ करून, देहसुख हे खरे सुख न मानता आपल्या देहापलिकडे विचार करून, आपले आत्मस्वरूप जाणण्याचा प्रयत्न करोत आणि ते आत्मस्वरूप जाणल्यावर तो आत्मा आणि परमात्मा यांचे अभेद्य त्यांच्या अनुभवास येवो अशी भगवंताची मनोमन इच्छा असते. त्यामुळे कुणी राजा अशा प्रकारे सृष्टीक्रमाविरूध वागून जर समाजरचना रसातळाला नेत असेल तर भगवंतांना लीला कराव्याच लागतात. त्यांनी हिरण्यकश्यपूच्या गर्भवती पत्नीला उपदेश करण्यासाठी सर्व लोकांमध्ये मुक्त संचार असलेल्या ब्रह्मर्षी नारदांची योजना केली. आणि दैवी आज्ञेने देवर्षींनी हिरण्यकश्यपूच्या पत्नीला सन्मार्गाचा उपदेश केला. अशाप्रकारे अत्यंत पापी, पराक्रमी आणि सूडाने पेटलेल्या अशा पित्याच्या, हिरण्यकश्यपूच्या प्रह्लादाने पोटी जन्म झाला. जन्मापूर्वी आईच्या गर्भात असताना देवर्षि नारदांनी आईला केलेला भगवत्भक्तीचा उपदेश प्रल्हादाने ऐकला आणि तो त्याच्यावर दृढ संस्कार झाला. 


श्रीमदभागवतात देवर्षी नारदांचे ज्या ज्या प्रसंगात प्राकट्य झालेले आहे ते ते सर्व प्रसंग सुखांतिकेत बदललेले आहेत. येनेकेन प्रकारेण प्रसंगांना सुखद वळण देण्याचे आणि भगवंताच्या मनासारखे घडवून आणण्याचे देवर्षींचे कार्य खरोखर नतमस्तक करणारे आहे. आज कलियुगात आपण देवर्षींना न जाणता त्यांना काही शेलक्या विशेषणांनी संबोधतो, ते किती चूक आहे हे आपल्याला कळेल. आणि आपणा सर्व सामान्य माणसांचे आयुष्य़ सुखकर होण्यासाठी जी विभूती कायम झटली तिचा उल्लेख हा कायम आदरार्थीच व्हायला हवा. कमीत कमी आपण भगवत्भक्तांनी तरी तो आदरार्थीच करायला हवा.



देवर्षींचे संस्कार दृढ असल्याने पित्याच्या शत्रूचे गुणगान करणारा प्रल्हाद हा पित्याला सतत खुपू लागला. विविध आमिषे दाखवून, धाकदपटशा करून पित्याने त्याचे मन वळवण्याचा, त्याला भगवत्भक्तीपासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण प्रल्हाद बधला नाही. गुरूवचनांवर दृढ विश्वास ठेवून इतर कुठल्याही भौतिक आमिषांना न बधणारा, किंवा प्राणांतिक प्रसंगांना त्याच दृढ विश्वासाने सामोरे जाणारा प्रल्हाद हा आजच्या तरूणांसाठी आदर्श व्हायला हवा. आपल्या बालपणी आपल्या सगळ्यांवरच खूप चांगले संस्कार झालेले असतात पण मोठे झाल्यावर आपल्याला अकारण त्या संस्कारांची लाज वाटते. किंबहुना चांगल्या संस्कारांची लाज वाटणे म्हणजेच मोठेपण येणे अशी आपण आपली समजूत करून घेतलेली आहे. आपल्या सगळ्यांसाठी गर्भावस्थेतले चांगले संस्कार आयुष्यभर आणि प्राणापेक्षाही जास्त जपणारा हा दैत्यकुळात जन्म झालेला प्रल्हाद आदर्श व्हायला हवाय.


प्रल्हादाचा आणखी एक महत्वाचा गुण म्हणजे अभय. श्रीमदभगवतगीतेत दैवी गुणसंपत्ती वर्णन करताना भगवंतांनी उल्लेख केलेला पहिला दैवी गुण म्हणजे अभय. "अभयम सत्व संशुद्धी:, ज्ञान योग व्यवस्थिती:" यात पहिल्यांदा येणारा गुण अभय. भक्त निर्भय नसेल तर त्याच्यात इतर गुण येणारच नाहीत आणि आलेच तर ते समाजासाठी प्रदर्शित करण्याचे त्याला भय वाटेल. आज आपल्यातल्या किती भगवत्भक्तांना अभय होऊन त्यांचे दैवी गुण समाजासमोर मांडावेसे वाटतात ? की समाजाच्या तामसी रेट्यामुळे आपणच झाकोळले जाऊन आपले चांगले गुण आपण समाजापासून लपवून ठेवतो आहोत ? आणि समाजातल्या नवीन पिढीसमोर चांगले काय आणि वाईट काय ? याचा नीरक्षीरविवेक आपण आपल्या वागणुकीतून ठेवला नाही तर त्यांना, जे आज तामस वातावरण त्यांच्या डोळ्यांसमोर जाणीवपूर्वक ठेवण्यात येतय, तेच आदर्श वाटणार ना ? भगवत्भक्तांनी निर्भय होऊन चांगल्याला चांगले म्हणून प्रसार करणे आणि वाईटाचा विरोध करणे हे आपले आजचे कर्तव्य नाही का ?


आणि प्रल्हादाचा सगळ्यात मोठ्ठा गुण म्हणजे गुरूवचनांवरचा विश्वास. चर आणि अचर सृष्टीतही तोच एक परमात्मा भरून राहिला आहे हा दृढ विश्वास त्याच्या मनात होता आणि त्या विश्वासाच्या योगानेच भगवंताला स्तंभासारख्या जड वस्तूतही स्वतःचे अस्तित्व दाखवावे लागले. श्रीगजानन विजय ग्रंथात संतकवी दासगणू महाराजांनी म्हटल्याप्रमाणे "प्रल्हाद भक्त करण्या खरा, स्तंभी प्रकटलास जगदोद्धारा" असे रूप भक्ताभिमानी भगवंतांनी घेतले खरे पण तत्पूर्वी भगवंतांनी प्रल्हादाची खूप परीक्षा पाहिली. 


"तत्र ज्ञान विराग भक्तिसहितम, नैष्कर्म्यम आविष्कृतम" या श्रीमदभागवताचेच वर्णन केलेल्या गुणांपैकी प्रखर भक्ती हा एक गुण अंगी असलेला भक्त प्रल्हाद. आणि त्याची प्रखर भक्ती इतकी की भगवान नृसिंहाचे प्रगट झालेले उग्र रूप पाहून सगळ्या देवगणांना, इतकेच काय प्रत्यक्ष विष्णुपत्नी असलेल्या लक्ष्मीमातेलाही त्यांच्याजवळ जाण्याचे भय वाटले तेव्हा हा लहानसा बालक प्रल्हादच निर्भयपणे जाऊन त्यांच्या मांडीवर बसला आणि त्याने त्यांची स्तुती गाऊन त्यांना प्रसन्न केले. श्रीमदभागवतात भक्त प्रल्हादाने गायलेली भगवान नृसिंहाची स्तुती मुळातूनच वाचण्यासारखी आहे.



निर्भय होऊन, गुरूवचनांवर दृढ विश्वास ठेऊन केलेल्या साध्यासोप्या भक्तीने भगवंताला प्रगट व्हायला लावणा-या भक्त प्रल्हादाचा आदर्श आज कलियुगातही आपण ठेवायला काय हरकत आहे हो ?  त्याच्यासाठी भगवंत प्रगट झाले, माझ्यासाठीही होतीलच की. फ़क्त कलियुगात त्यांचे चर्मचक्षूंनी दर्शन होईल की अंतःचक्षूंना ते जाणवतील आणि माझे जीवन दैवी करून टाकतील याचा अनुभव प्रत्येकाने आपापल्या साधनेने आणि भक्तीने घ्यायचा आहे.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध पंचमी शके १९४८ दिनांक  १८ / ७ / २०२६


१८ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


Friday, July 17, 2026

गेल्या अर्ध शतकात भारतीय रेल्वेने घेतलेली झेप.

 वर्धा - बल्लारशाह मेमू गाडीचे हे वेळापत्रक बघितले आणि डोळ्यातून टपटप अश्रूच वाहू लागले हो. मोबाईलवरची अक्षरे दिसेनाच. डोळे पुसून पुसून पुन्हा पुन्हा वाचले. अवघ्या २ तास १० मिनीटांत वर्धा ते चंद्रपूर ? कसं शक्य आहे ?



साधारण १९८३ - ८४ चा काळ असावा. चंद्रपूरच्या आजोळहून आम्ही आमच्या एका नातेवाईकांना भेटायला वर्धेला जाणार होतो. संध्याकाळी ६.०० वाजण्याच्या आसपास सुटणारी काजीपेठ - वर्धा पॅसेंजर गाडी. त्याकाळी  स्टेशनवर जा, तिकीटांच्या रांगेत उभे रहा, तिकीटे मिळवा, फलाटावर जा, फलाटावर नीट जागा पकडा असे खूप सव्यापसव्य असायचे. बरे, या प्रवासी मंडळीत माझे आजी, आजोबा ही ज्येष्ठ नागरिक मंडळी, एक तरूण मामा आणि बाकी आम्ही सगळी वय वर्षे १० ते १६ या वयोगटातली ७ - ८ नातवंडे. त्यामुळे सामानाचे डाग भरपूर होते. त्याकाळी वाटेत खाण्यापिण्याची आजच्याइतकी सार्वत्रिक उपलब्धता नव्हती त्यामुळे पाण्याच्या वाॅटरबॅग्ज, खाण्याचा डबा, त्याला लागणार्‍या accessories यामुळे सामानाचे भरपूर डाग झाले होते.

तेव्हाची वडिलधारी मंडळी जरा जास्तच काळजी घेत असत. त्यामुळे संध्याकाळी ६.०० च्या गाडीने जायचे म्हणून आजोळी दुपारी ४.०० वाजताच टांगे उभे राहिलेत.. "नारायणा, सांभाळून ने रे बाबा." किंवा "अंबामाय, पाहून घे गं बाई तूच." असे देवांना साकडे घालून आम्ही दुपारी ४.३० वाजताच चंद्रपूरच्या फलाटावर येऊन अक्षरशः बस्तान ठोकले.

तेव्हा वर्धेनंतर काजीपेठपर्यंत बहुतेक रेल्वेमार्ग एकेरी होता. त्यामुळे पुढून येणार्‍या रेल्वेगाड्यांना जागा देण्यासाठी मधल्या स्टेशनवर थांबून वाट बघणे त्याचबरोबर आपल्याच मार्गाने जाणार्‍या इतर जलद गाड्यांना पुढे जाऊ देण्यासाठी वाट बघत थांबणे या प्रक्रियेत पॅसेंजर गाड्यांचा बँड वाजायचा. आमचीही पॅसेंजर गाडी अर्धा तास उशिरा, एक तास उशिरा अशी घोषणा होत होत तब्बल ४ तास उशीरा रात्री १०.०० वाजता चंद्रपूरला आली.

गाडीतल्या गर्दीत आमचे सगळे वर्‍हाड घुसले आणि आहे तशा परिस्थितीत आम्ही आमच्यापुरती जागा करून घेत इकडेतिकडे विखुरलेले बसलोत. गाडी निघाली. पण पुन्हा तेच पहिले पाढे पंचावन्न. समोर येणार्‍या गाड्यांना साईड द्या, ओव्हरटेक करणार्‍या गाड्यांसाठी थांबून रहा या प्रकरणांमध्ये आम्ही वर्धेला दुसर्‍या दिवशी पहाटे ४.०० वाजता पोहोचलेलो होतो. पेंगुळलेले, झोपाळलेले, अंग आंबलेले अशा अवस्थेत. 

वर्धा ते चंद्रपूर हे अंतर फक्त ११९ किलोमिटर्स आहे हे सत्य आम्हाला फार उशीरा कळले. त्यादिवशी त्या मोठ्ठ्या प्रवासानंतर आमची समजूत म्हणजे वर्धा हे शहर मुंबई किंवा पुण्याच्या दोनतीन तासांवर आहे अशी झाली होती.

आता मला सांगा. जुन्या पॅसेंजरच्याच दर्जाची ही मेमू. मधल्या सगळ्या स्थानकांवर थांबून हाच प्रवास अवघ्या २ तास १० मिनीटांमध्ये करते म्हटल्यावर आम्हाला तो दिवस आठवून भरून येणार नाही तर काय होईल ?

- पॅसेंजर गाड्यांच्या जनरल कोचपासून ते राजधानी एक्सप्रेसच्या प्रथम वर्ग वातानुकूल वर्गातून भारतभर विविध प्रवास केलेला प्रवासी पक्षी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर. 

श्रीमदभागवत चिंतन - १७ अजामिळोपाख्यान

मागे आपण बघितलेल्या जडभरताच्या कथेच्या समांतर किंवा अगदी विरूद्ध जाणारे हे अजामिळोपाख्यान. आयुष्यभर भगवतभक्ती केलेला जीव केवळ आयुष्याच्या अखेरच्या काही क्षणात वात्सल्यबुद्धीने का होईना एका जड जीवाच्या मायेत अडकतो आणि त्यासाठी अगदी हातातोंडाशी आलेला मुक्तीचा घास त्याला दुरावतो. त्यानंतर त्याला या पृथ्वीतलावर दोन अधिक जन्म घ्यावे लागतात ही जडभरताची कथा. पण अजामिळाची कथा याच्या अगदी विरूद्ध जाणारी आहे. तरीही दोन्हीही कथांचा संदेश आणि सारांश एकच आहे. म्हणून विरूद्ध भासणारी तरीही समांतर प्रवास करणारी ही दोन आख्याने.


अजामिळ नावाचा एक ब्राह्मण कुळात जन्माला आलेला जीव होता. ब्राह्मण कुळात जन्मला असला तरी तो शास्त्राने निषिद्ध असे वर्तन करून आपले व कुटूंबाचे पोट भरीत असे. चोरीमारी, जुगार, लूटपाट या त्याचा मुख्य व्यवसाय होता. जगणा-या अनेक जीवांना त्रास देत देत आपले जीवन जगत असताना ८८ वर्षात त्याने असंख्य पापे केलीत.


अजामिळाचे आपल्या धाकट्या पुत्रावर फ़ार प्रेम होते. त्याचे नाव नारायण. त्याच्यावर असलेल्या प्रेमामुळे तो अगदी नारायणमय झालेला होता. त्याच्या मुखात आणि मनात सतत धाकट्या मुलाचे, नारायणाचेच नाव असायचे. अजामिळाच्या मृत्यूसमयी त्याला यमदूतांचे भीषण दर्शन झाले आणि त्याच्या मुखातून जवळच खेळत असलेल्या आपल्या मुलाला "नारायणा" अशी आर्त हाक गेली. प्राणान्ताच्या समयाला अत्यंत आर्त भावनेने प्रभूंचे नाम मुखात आल्यामुळे तिथे विष्णूदूत धावून आलेत आणि अजामिळाला वैकुंठलोकी घेऊन जाण्याचे प्रयत्न करू लागलेत.



त्याला यमलोकी नेऊन त्याच्या जन्मभराच्या पापकर्मांबद्द्ल यमयातना देऊ इच्छिणारे यमदूत आणि त्याला वैकुंठलोकी घेऊन जाणारे विष्णूदूत यांचा बराच वाद त्याठिकाणी झाला. यमदूतांनी पापी जीवांच्या मृत्यूनंतरच्या गतीबाबत विष्णूदूतांना सांगितले. श्रीमदभागवताच्या षष्ठ स्कंधातील पहिल्या आणि दुस-या अध्यायात हा संवाद प्रत्येक जीवाने वाचण्यासारखा, ऐकण्यासारखा आणि मनन करण्यासारखा आहे. यमदूतांचे बोलणे श्रवण करून आपल्यासारख्या संसारलिप्त मनुष्यमात्रांमध्ये मनोमन बोध होऊन आपण आपसूकच पापकर्मे करण्यापासून वंचित राहतो. हा संवाद नुसता श्रवण केला तरी आपल्यासारख्या मनुष्यमात्रांची पापे नष्ट होतात ती अशी.


अंतिमतः विष्णूदूतांनी यमदूतांना उपदेश करून अंतिमसमयी कुठल्या का रूपाने होईना पण ज्या जीवच्या मुखात, स्मरणात भगवंताचे नाम आलेले आहे त्याला वैकुंठप्राप्तीच झाली पाहिजे अशी श्रीविष्णूंची आज्ञा यमदूतांना सांगून अत्यंत पापी असलेल्या अजामिळाला वैकुंठलोकाला नेले. श्रीशुकदेव महाराज राजा परिक्षितीला उपदेश करताना सांगतात की राजा अत्यंत पापी जीव जरी असला तरी त्याला केवळ भगवंताच्या नामाने, स्मरणाने, पश्चात्तापाने, प्रायश्चित्तमुळे, भगवंतावरील निःसीम भक्तीमुळे जेवढा वैकुंठलोक प्राप्त होऊ शकेल तेव्हढा इतर यज्ञ यागादि कर्मांमुळे होऊ शकणार नाही. भगवंताच्या नामाचे प्रेम आणि भक्तीच त्याला त्याच्या पापकर्मांपासून तारून नेईल. मात्र एकदा पश्चात्ताप झाल्यानंतर आणि त्याने भगवंताजवळ आपली पापे कबूल केल्यानंतर पुन्हा त्याने पापमार्गाकडे जाऊन उपयोग होणार नाही.



अजामिळ आणि जडभरत. वरवर अगदी विरूध्द वाटणारी दोन आख्याने. पण दोघांचेही सार एकच. शेवटल्या क्षणी नाम साधल्या गेले पाहिजे. शेवटल्या क्षणी जीव जर संसारातल्या कुठल्याही गोष्टीत अडकून राहील तर जडभरताप्रमाणे अनेक कष्टमय जन्म पुढे घ्यावे लागतील पण जर अजामिळासारखे नाम साधले तर मात्र विनासायास भगवंतप्राप्ती होईल. म्हणून अनेक संतांनी आपल्याला आयुष्यभर नाम साधण्याचा कायमच उपदेश केलेला आहे. तसा साधण्याचा आपण सगळेच प्रयत्न करूयात.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध तृतीया / चतुर्थी शके १९४८ दिनांक  १७ / ७ / २०२६


१७ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६