देवपुत्र कच याने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडे कपटवेषाने राहून त्यांच्याकडे असलेली संजीवनी विद्या शिकून घेतली. ती संजीवनी विद्या वापरूनच दैत्यगुरू युद्धात मृत झालेल्या दैत्यांना पुनर्जिवीत करीत असत आणि त्यामुळे देवांचा विजय दुरापास्त होत असे. कचाने ती विद्या शिकली आणि आपल्यावर अनुरक्त असलेल्या गुरूभगिनी देवयानीला शिकायला बाध्य केली. संजीवनी मंत्र षटकर्णी झाला. स्वतः दैत्यगुरू शुक्राचार्य, त्यांची कन्या देवयानी आणि कच या तिघांच्या सहा कानांमध्ये मंत्र पोहोचला आणि म्हणून तो मंत्र निष्प्रभ झाला. दैत्यगुरूंना त्याचा उपयोग होईना. इकडे कचाने सुद्धा देवलोकात परतण्याची इच्छा प्रगट केली. तेव्हा देवयानीने त्याच्यासोबत लग्न करण्याची इच्छा प्रगट केली पण कचाने तू गुरूभगिनी आहेस, मला संजीवनी विद्येने मला जिवंत केलेले आहेस त्यामुळे मला जन्म देणारी माता आहेस हा तर्क मांडून तिचाशी लग्न करण्याचे नाकारले. देवयानीने कचाला शिकलेली विद्या विसरण्याचा शाप दिला तर कचानेही देवयानीला कुणाही ब्राह्मण मुलाशी तुझे लग्न होणार नाही असा शाप दिला. व तो देवलोकात परत गेला.
एखादे गुपित दोन माणसांमध्ये मर्यादित राहिले तरच ते गुपित राहू शकते. ते तिस-या माणसापर्यंत गेले तर ते गुपित राहत नाही. इंग्रजीत Two is company, Three is crowd म्हणतात ते याचमुळे. आपल्या संस्कृतीत मंत्र सुद्धा गुरू आणि शिष्य दोन माणसांमध्येच मर्यादित रहावा असे प्रतिपादन केलेले आहे. आपला गुरूमंत्र कुणालाही, अगदी आपल्या आईवडीलांना, जीवनसाथीला सुद्धा सांगू नये तो यासाठीच. किंबहुना आपल्याला आलेले आध्यात्मिक अनुभव सुद्धा आपल्या सदगुरूवाचून कुणालाही सांगू नये. आपल्याला कितीही श्रेष्ठ स्वरूपाचे आध्यात्मिक अनुभव आले असतील, अनेक दर्शने झाली असतील पण ती सगळ्या लोकांना सांगून आपला लौकिक वाढवावा अशी कृती करू नये. आपल्याला आलेले आध्यात्मिक अनुभव, झालेली दर्शने ही आपल्या पूर्वभाग्याने आलेली आहेत आणि आपण आता आध्यात्मिक मार्गावर प्रगती करतो आहोत हे मनोमनी समजावे. या गोष्टी सदगुरूंशिवाय कुणालाही सांगू नयेत.
देवयानीच्या याच उद्दाम स्वभावामुळे तिचे राजकन्या शर्मिष्ठेशी भांडण झाले पण दैत्यगुरूंची लाडकी कन्या असल्याने राजाने आपल्या कन्येला, शर्मिष्ठेला, देवयानीची दासी म्हणून तिची सेवा करण्यास पाठवले. कचाच्या शापामुळे ब्राह्मण कन्या असलेल्या देवयानीचे क्षत्रिय राजा ययातीशी लग्न झाले. ययाती हा अत्यंत सुखलोलूप राजा होता. देवयानीसोबत विवाहानंतर त्याने अनेक प्रकारच्या वैवाहिक सुखांचा अगदी आकंठ उपभोग घेत काळ क्रमण करणे सुरू केले. अतिशय सुंदर आणि सौष्ठवपूर्ण असलेल्या ययाती राजाला आपल्या तारुण्याचा आणि देखणेपणाचा फ़ार अभिमान होता. यथावकाश देवयानी गर्भवती राहिली.
ती गर्भवती असताना तिची दासी म्हणून वावरणा-या राजकन्या शर्मिष्ठेसोबत यया्तीने तिच्याच मागणीनुसार शरीरसंग केला आणि तिला दोन पुत्र प्राप्त झालेत. दैत्यगुरूंना हे कळताच त्यांनी ययातीला वृद्धाप्याचा शाप दिला. इंद्रियसुखे आकंठ भोगण्यात सुख मानणा-या ययातीवर अचानक वृद्धाप्य प्राप्त होणे हा वज्राघातच होता. तो अत्यंत लीन होऊन शुक्राचार्यांच्या चरणावर कोसळला आणि त्याने शुक्राचार्यांना उःशाप मागितला. शुक्राचार्यांनी ययातीला तुझे वार्धक्य जर कोणी तरूणाने घेऊन तुला त्याचे तारूण्य दिले तर तुला तारूण्य कायम प्राप्त होईल असा वर दिला.
ययातीने आपल्या तरूण पुत्रांना त्याचे वार्धक्य घेऊन त्याला त्या पुत्रांचे तारूण्य देण्याबाबत याचना केली. पण हा आतबट्ट्याचा व्यवहार करण्यास कुणीच तयार होईना. ययातीच्या धाकट्या पुत्राला, पुरूला मात्र आपल्या पित्याची दया आली. पुरूने या शरीराचे अनित्यत्व आणि शरीराने प्राप्त होणा-या सुखांच्या मर्यादा त्याच्या तरूणपणीच ओळखल्या होत्या. त्यामुळे पितृआज्ञापालनातून येणारी संतुष्टी ही तारूण्यापेक्षा आणि तारूण्यात प्राप्त होणा-या सुखांपेक्षा जास्त महत्वाची आहे हे तत्व त्याने जाणले आणि ययातीच्या वार्धक्याचा सहर्ष स्वीकार केला. ययाती तरूण झाला तर त्याचा पुत्र पुरू हा वृद्धाचे जीवन जगू लागला.
अनेक वर्षे अशा तारूण्याचा आणि सर्व सुखांचा उपभोग घेतल्यानंतर ययातीला स्वतःलाच या सुखोपभोगांमध्ये बुडून राहण्यातला फ़ोलपणा कळला आणि त्याला पश्चात्ताप झाला. आपण केवळ या शरीरापुरताच विचार केला. त्यापलिकडे जाऊन आपण शाश्वत परमेश्वराविषयी कसलेही चिंतन केले नाही. जगातले सगळे धान्याचे कण, सगळे सुवर्ण, सगळ्या स्त्रिया जरी एखाद्या पुरूषाला प्राप्त झाल्यात तरी त्याची इंद्रिय तृप्ती होणार नाही. विषयांच्या आगीत आपण आणखी आणखी विषयांच्या उपभोगाची आहुती टाकत गेलो तर तो विषयाग्नी अधिकाधिक भडकतो आणि त्या विषयाग्नीत मनुष्यजीवनाची राख होऊन जाते याची जाणीव ययातीला झाली आणि तो पश्चात्तापाने पोळून निघाला. त्याने आपल्या पुत्राला, पुरूला आपले तारूण्य परत करून त्याच्याकडील आपले वृद्धाप्य प्रत मागितले आणि उरलेला काळ तो ईश्वरचिंतनात घालवू लागला. ख-या पश्चात्तापामुळे आणि ख-याखु-या क्षमायाचनेमुळे त्याचे चित्त ईश्वरचरणी विलीन झाले आणि त्याने मुक्ती प्राप्त करून घेतली.
इंद्रियसुखांच्या मर्यादा दाखवणारी ही गोष्ट. मनुष्याने या मर्यादा आणि इंद्रियसुखांची सतत वाढती मागणी लक्षात घेऊन त्यांच्या अधीन न होता भगवंताच्या आराधनेत आपले चित्त वळवीत रहावे कारण इंद्रियांची पूर्ण तृप्ती कधीही होत नाही हे साधकांच्या मनावर ठसविणारी ही गोष्ट. मनाला हा बोध होणे हाच या आख्यानाचा प्रसाद.
ययातीच्या पुत्रापासूनच यदुवंशाची उत्पत्ती झाली. यापुढील विवेचनात आपण यदुवंशीय भगवान कृष्ण यांचे गोड चरित्र श्रीमदभागवताचे हृदय समजल्या जाणा-या दशमस्कंधामधून अवलोकन करणार आहोत.
॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥
- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध एकादशी, देवशयनी आषाढी एकादशी, शके १९४८ दिनांक २५ / ७ / २०२६
२५ जुलै २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#जुलै२०२६
.jpg)
.jpeg)