Tuesday, August 4, 2026

श्रीमदभागवत चिंतन - ३५ अक्रूराचे गोकुळगमन

भगवान श्रीकृष्ण आणि बलरामदादा वृंदावनात, गोकुळात अशा लीला, क्रीडा करीत असताना मथुरेत कंसाला आकाशवाणीद्वारे वार्ता कळली. नंदबाबांच्या घरी वाढणारा श्रीकृष्ण हा वसुदेव आणि देवकीचा आठवा पुत्र आहे आणि रोहिणीमातेच्या उदरी आलेला बलराम हा त्याचाच बंधू आहे. हे दोघेही मिळून तुझ्या रक्षकांचा आणि तुझा वध करणार आहेत. कंस भयभीत झाला. श्रीकृष्ण आणि बलराम मथुरेत आलेच तर त्यांचा प्रतिकार करण्याला त्याने आपले अंगरक्षक तयार ठेवलेत. श्रीकृष्ण आणि बलराम या दोन भावांना मथुरेत बोलविण्यासाठी त्याने मथुरेत एका मोठ्या धनुर्यागाचे आयोजन केले. त्यातच एका आखाड्यात श्रीकृष्ण आणि बलरामाला मल्लयुद्धाचे आव्हान देऊन आपल्या अंगरक्षकांद्वारे त्यांना ठार मारण्याची योजना केली.


श्रीकृष्ण आणि बलरामाला गोकुळाहून निमंत्रण देऊन बोलाविण्यासाठी त्याने अक्रूराला पाचारण केले आणि वृष्णीवंशी व यदुवंशीयांमध्ये सौहार्दाचे संबंध प्रस्थापित व्हावेत या हेतूने श्रीकृष्णासह बलरामाला या धनुर्यागाचे निमंत्रण दे असे सांगून अक्रूराला गोकुळाकडे रवाना केले.


अक्रूर आपल्या रथातून श्रीकृष्ण आणि बलरामांना मथुरेत आणण्यासाठी म्हणून मथुरेहून निघाला. गोकुळ जसेजसे जवळ येऊ लागले तसेतसे त्याला श्रीकृष्णाविषयी प्रेम दाटून येऊ लागले. प्रत्यक्ष जगचालक असलेल्या त्या परब्रह्माला आपण भेटल्यानंतर त्याच्या चरणावर कोसळून आपण त्याच्या चरणांवर अश्रूंचा अभिषेक करू असा त्याचा दृढ संकल्प होत होता.



प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आणि बलराम या मूर्ती पुढ्यात आल्यानंतर अक्रूर अत्यंत भावविभोर झालेत. त्याने श्रीकृष्णांच्या चरणांवर कोसळून आपल्या अश्रूंनी त्यांचे पाय धुतलेत. श्रीकृष्ण आणि बलरामांनी अक्रूरांना उठविले आणि त्यांना दृढ आलिंगन दिले. त्यांचे कुशल विचारून त्यांची सेवा केली. अक्रूरांनी आपला गोकुळ आगमनाचा हेतू या दोघांनाही कथन केला. कंसवधाची वेळ जवळ आली असल्याचे ओळखून श्रीकृष्ण आणि बलराम अक्रूरांबरोबर मथुरेला जायला निघालेत.



अक्रूर येऊन आपल्या लाडक्या श्रीकृष्णाला मथुरेला घेऊन जाणार हे कळल्याबरोबर गोपांना फ़ार दुःख झाले आणि श्रीकृष्ण विरहाच्या कल्पनेत गोपी तर अक्रूराला अक्षरशः शिव्याशाप देऊ लागल्यात. त्यांचा लाडका कान्हा त्यांच्यापासून दूर नेणारा अक्रूर त्यांना अगदी खलनायकासारखाच भासला यात नवल ते काय ? पण सगळ्यांची माया दूर सारून भगवंत बलरामदादांसह मथुरेत जायला निघालेत. जगातल्या दुष्ट प्रवृत्तींचा, अकारण संतापाचा नाश करण्याची वेळ जवळ आली होती.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण षष्ठी शके १९४८ दिनांक  ४ / ८ / २०२६


४ ऑगस्ट २०२६ 


श्रीमदभागवत चिंतन - ३४ महारास

वृंदावनातल्या सुंदर आणि रमणीय वनांमध्ये शरद पौर्णिमा आली. शरद पौर्णिमेला चंद्र लालसर, गुलाबी असा दिसत असतो. वातावरणात अत्यंत उल्हास होता. नद्या, वृक्ष, भूमी सगळेच आनंदी आणि सुखी होते. श्रीकृष्णाच्या गोकुळातील लीलांमुळे गोपबालक आणि गोपी अत्यंत आनंदित होत्या. अशा त्या रमणीय रात्री श्रीकृष्णाने वनात आपली दिव्य बासरी वाजवायला सुरूवात केली आणि ते सूर ऐकताच संपूर्ण वृंदावनातली चर आणि अचर सृष्टी अक्षरशः मोहरून गेली. मनुष्य़मात्रांना तर ते सूर कानातून थेट हृदयापर्यंत भिडल्याने त्यांची अवस्था अत्यंत व्याकूळ झालीच होती पण वॄंदावनातले पशुपक्षी, झाडे इतकेच काय आपण ज्या गोष्टींना निर्जीव मानतो ती भूमी, घरे हे सुद्धा त्या बासरीच्या सुरांनी आनंदित झाले, गुरे वासरे आपले दावे तोडून परमेश्वराकडे जायला, त्याच्या कृपाकटाक्षासाठी, आलिंगनासाठी उत्सुक होऊ लागली, तर भूमी आणि घरे वाडे आनंदित होऊन बासरीच्या सुरांवर कंप पावू लागलेत. त्यांना अचर अवस्था प्राप्त होती म्हणून नाहीतर त्यांनीसुद्धा मनुष्य़मात्रांप्रमाणे, गाई वासरांप्रमाणे वनात बासरी वाजवत बसलेल्या त्या परमात्म्याकडे धाव घेतली असती.


ज्या मनुष्य़मात्रांची देहबुद्धी ते दिव्य सूर कानांवर आल्यानंतर सुद्धा जागृत होती, ज्यांचा माझा देह, माझा संसार, माझी बायकामुले हा भ्रम अजून संपूर्णपणे संपला नव्हता त्यांनी मात्र ते दिव्य सूर कानांवर आल्यानंतर सुद्धा वनात धाव घेतली नाही. पण हे दिव्य सूर ऐकून ज्या मनुष्य आणि प्राणीमात्रांची देहबुद्धी पूर्णपणे गळून गेली त्या सर्व आत्म्यांनी त्या परमात्म्याच्या भेटीसाठी, आलिंगनासाठी, त्याच्यासह क्रीडा करण्यासाठी वनात अगदी अनावर होऊन धाव घेतली. अनेक गोप, गोपी, त्यांचे गोधन आणि इतर प्राण्यांसह वृंदावनातल्या त्या रमणीय भूमीवर महारास रंगली. प्रत्येक जीवाला त्या परब्रह्माशी क्रीडा करून त्याच्यात स्वतःला एकरूप व्हायचे होते. यात कुठल्याही प्रकारच्या देहांचे बंधन उरले नाही.आजवर असलेल्या द्वैताकडून अद्वैताकडे जाण्याचा प्रत्येक जीवांचा प्रयत्न होता आणि बासरी वाजवत सगळुया जीवांशी क्रीडा करणारा तो परमात्मा प्रत्येक जीवाच्या त्या संकल्पाच्या पूर्तीकरिता त्यांच्याशी क्रीडा करीत होता.



क्रीडा करीत असताना अचानक काही गोपींचे देहभान जागृत झाले आणि प्रत्यक्ष परमेश्वर आपल्याशी खेळतोय हे लक्षात आल्यानंतर त्यांना सूक्ष्म अहंकार झाला. वास्तविक तो परमात्मा तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांशीच क्रीडा करीत होता, आपल्या नावाला सार्थक असे सगळ्यांनाच आपल्यात आकर्षित करून घेत होता. पण आपली देहबुद्धी जागृत झाली की आपल्याला तो परमात्मा इतरांशी काय करतोय हे दिसत नाही फ़क्त आपल्यापुरता आपण विचार करू लागतो. तो परमात्मा फ़क्त आपल्याशी क्रीडा करतोय हे जाणवल्यानंतर गोपींच्या मनात जो सूक्ष्म अहंकार निर्माण झाला त्या अहंकाराला जाणून श्रीकृष्ण अचानक त्या महारासातून निघून गेला. भानावर आलेल्या गोपींना आजूबाजूला श्रीकृष्ण दिसेना. त्या गोपींना आपल्या अकारण अहंकाराची जाणीव झाली आणि आपण काय गमावले याबद्दल त्या शोक करू लागल्यात.


श्रीमदभागवतातील दशम स्कंधातला एकतिसावा अध्याय हा या गोपींच्या पश्चातापाचा आणि आपल्यापासून आपल्या देहबुद्धीमुळे दूर निघून गेलेल्या परमात्म्याला आळवून परत बोलाविण्याच्या गोपीगीताचा आहे. आजही अनेक भाविक घरांमध्ये कोजागरी पौर्णिमेच्या मध्यरात्री हे गोपीगीत गाण्याचा प्रघात आहे. काव्याच्या दृष्टीने तर गोपीगीत खूप सरस आहेच पण ते वाचताना त्यातली भावाभिव्यक्ती लक्षात घेऊन ते गायले तर कलियुगात आजही आपले सगळ्याम्चे जे जीव त्या परमेश्वरापासून दूर झालेले आहेत, त्याचा विरह आपल्याला झालेला आहे, ते दुःख दूर करून जीवाला आंतरिक शांती देणारे हे गोपीगीत आहे. या जगात आलेल्या प्रत्येक जीवाला एकदा त्या परमेश्वराला जाऊन भेटायचे आहे. त्यासाठी फ़ार जास्त देहबुद्धी बाळगून चालणार नाही आणि या सगळ्या प्रक्रियेत मध्येच आपल्याला परमेश्वर भेटला जरी ती विशेष गोष्ट न मानता एक सहज आणि आपल्या एकंदर ध्येयाचा भाग असलेली गोष्ट म्हणूनच ती घटना स्वीकारली गेली पाहिजे. भगवंत फ़क्त मलाच भेटला हा अहंकार झाला की तो आपल्याला त्याच्यापासून दूर करतो हे सगळ्या साधकांनी पक्के लक्षात ठेऊन त्याप्रमाणे आपली आध्यात्मिक साधना आणि आचरण ठेवले पाहिजे.



गोपींचा शोक आणि त्यांची अत्यंत पवित्र भावना लक्षात घेऊन भगवंत पुन्हा प्रगट झालेत आणि वृंदावनात सगळ्या चर आणि अचर सृष्टीसह त्यांची महारास रंगली. कोजागरीच्या मध्यरात्री गोपीगीत त्याच्या अर्थासह वाचले, गायले तर मनातल्या कामवासनांचा नाश होतोच आणि आपली देहबुद्धी क्षीण होत जाते हा अनेक भाविकांचा अनुभव आहे. रूसलेल्या भगवंताला पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी हे गोपीगीत नियमित वाचनात तर ठेवावेच पण कोजागरीच्या रात्री जरूर वाचावे.


आजच्या युगात महारास आपण केवळ आपल्या देहबुद्धीच्या परिप्रेक्ष्यातून बघतो. आजच्या संदर्भातून बघतो. अनेक भोंदू त्या महारास शब्दाचा फ़ायदा घेत स्वतःचे चोचले पुरविण्यासाठी देशाला आणि धर्माला बदनाम करणारी कृत्ये करतात. पण महारास हा फ़ार मोठा आणि जीवनात प्रत्येक जीवाने अंतिमतः प्राप्त करून घेण्याचा अनुभव आहे हे लक्षात ठेवावे. आपल्याही आयुष्यात आपल्याला सरतेशेवटी त्या परमेश्वरात विलीन होऊन तो आणि मी निराळा नाही ही अद्वैतावस्था प्राप्त करून घ्यायचीच आहे. आपल्याशी महारास खेळायला त्याने यावे यासाठी जीवनभर साधना करायची आहे.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण पंचमी शके १९४८ दिनांक  ३ / ८ / २०२६


३ ऑगस्ट २०२६ 


Monday, August 3, 2026

टाटाच्या राज्यात पाहुणी लेलँड

चंद्रपूरला आलो आणि इथल्या बसस्टॅण्डवर गेलो नाही असे क्वचितच घडले असेल.


असेच २०१२ च्या उन्हाळ्यात आजोळी श्रीनृसिंहजयंती उत्सव साजरा करण्यासाठी जमलो होतो. दुपारी जेवणे वगैरे निवांत आटोपून संध्याकाळी चंद्रपूर बसस्थानकावर आपल्या प्रेयसांना भेटायला गेलो होतो. तेव्हा लक्ष वेधून घेतलेली ही एक वेगळीच आणि सुंदर बस.


आपल्या एस. टी. बसेससाठी विदर्भ प्रदेश हा पारंपारिक रित्या टाटाचा प्रदेश आहे. २०१० - २०१२ या काळात विदर्भातल्या खूपसार्‍या डेपोंना MH 40 / N96XX आणि MH 40 / N 97XX या सिरिजमधल्या नागफूर कार्यशाळेने बांधणी केलेल्या लेलँड बसेस मिळाल्यात.


अगदीच काही काही डेपोंना दापोडी (पुणे) आणि चिकलठाणा (छत्रपती संभाजीनगर) इथे बांधणी केलेल्या लेलँड बसेसही मिळाल्यात. त्यातलीच ही एक बस.


MH 14 / BT 2389


ASHOK LEYLAND CHEETAH model


२ बाय २ परिवर्तन बस


एकूण आसने ४४ + १ वाहक


अम. अमरावती १ आगार


मला वाटत २०१२ च्या उन्हाळी सुट्यांमध्ये विशेष फेरी म्हणून ही बस अमरावती आगाराने पाठविलेली होती.


स्थळः चंद्रपूर बस स्थानक


दिनांक: १/५/२०१२


यावेळी ही बस साधारण वर्षभर तरी जुनी असेल पण तिचा मेण्टेनन्स अगदी टॉप क्लास होता.

श्रीमदभागवत चिंतन - ३३ गोवर्धनधारण

आता श्रीकृष्ण आणि बलरामदादा सगळ्या गोकुळवासियांच्या अत्यंत प्रेमाचे झालेले होते. सगळे गोकुळवासी जरी त्यांना आपल्यासारखेच गोपबाल समजत होते तरी वृंदावनातल्या जाणत्या लोकांना आणि नंदबाबांना श्रीकृष्ण आणि बलरामदादा हे काहीतरी दैवी शक्ती आहेत याबाबत खात्री होती.


एकदा गोकुळात वार्षिक इंद्रपूजेची तयारी सुरू असताना ती लगबग पाहून श्रीकृष्णाने आपल्या नंदबाबांना विचारले की बाबा ही कशाची तयारी ? आपण काय करतोय ? तेव्हा नंदबाबांनी गोपांच्या वार्षिक इंद्रपूजेबाबत त्यांना सविस्तर सांगितले. इंद्र ही पर्जन्याची देवता असल्याने आपण दरवर्षी इंद्रयज्ञ करून इंद्राला संतुष्ट करतो असे प्रतिपादन केले. यावर श्रीकृष्णाने आपल्याला पर्जन्य देणारा हा गोकुळातला गोवर्धन पर्वत आणि याच्यावरील घनदाट वृक्षराजी आहे, आपल्याला समृद्धी देणारे आपले गोधन आहे आणि आपल्याला सदैव आशिर्वाद देणारे हे गोकुळवासी ब्राह्मण आहेत. आपण त्यांच्यासाठी यज्ञ केला पाहिजे, त्यांना आपल्या यज्ञातील हविर्भाग दिला पाहिजे. इंद्राची पूजा,यज्ञ करायला आपल्याकडे राज्य कुठे आहे. आपण सर्वांनी या गोवर्धनाची, गोधनाची आणि ब्राह्मणांची पूजा व प्रदक्षिणा केल्यानेच आपल्याला इंद्रपूजा केल्याचे फ़ळ मिळू शकेल असा आग्रह धरला. नंदबाबांसह सगळ्या जाणत्या गोपांना ते पटले आणि त्यांनी इंद्रयज्ञाऐवजी गोवर्धनाला उद्देशून यज्ञ केला आणि यज्ञाचा हविर्भाग त्यालाच अर्पण केला.



इंद्राला यज्ञ न केल्याबद्दल आणि यज्ञातला हविर्भाग न मिळाल्याबद्द्ल फ़ार राग आला. त्याने या गोकुळवासियांना धडा शिकविण्यासाठी आपल्या अधीन असलेल्या सांवर्तक नावांच्या मेघसमूहाला बोलावून गोकुळात अतिवृष्टीकरण्याचा आदेश दिला. या अतिवृष्टीमुळे या गोकुळवासियांना इंद्राचा अधिकार कळून ते क्षमायाचना करीत इंद्राला शरण येतील असा त्याचा होरा होता. सांवर्तक मेघांनी गोकुळावर अतिवृष्टी करण्यास सुरूवात केली. या अकाली पावसाने आणि पावसासोबत वाहत असलेल्या अतिथंड वा-यांमुळे सगळे गोकुळवासी भयभीत झाली. या प्रचंड थंडी आणि अविरत पावसापासून आपापल्या लेकरांना वाचवण्यासाठी आपल्या शरीराखाली घेत ती सगळी गोपमंडळी आपल्या गोधनासह श्रीकृष्णाच्या आश्रयाला आलीत आणि यावर उपाय शोध म्हणून विनवू लागलीत.


भगवान श्रीकृष्णाने इंद्राचा अहंकार ओळखला आणि सगळ्या गोपबालकांना प्रथम निर्भय केले. त्याने सहज लीलेने शेजारचा गोवर्धन पर्वत उचलला आणि सर्व गोकुळवासियांना त्यांच्या मुलाबाळांसह आणि गोधनासह त्या विशाल स्वरूपाच्या गोवर्धन पर्वताखाली आश्रय घेण्यास सांगितला. श्रीकृष्ण वचनांवर विश्वास ठेऊन सगळ्या गोपबालकांनी तसे केले आणि सतत सात दिवस गोकुळात पाऊस पडूनही कुणाही गोप बालकाला किंवा त्यांच्या गोधनाला काहीही झाले नाही.



भगवान श्रीकृष्ण आपल्या अचाट लीलेने गोकुळाचे रक्षण करतो आहे हे बघितल्यानंतर इंद्राचे गर्वहरण झाले. त्याने ती अतिवृष्टी थांबविली. श्रीकृष्णाने त्या गोवर्धन पर्वताच्या आश्रयाला आलेल्या सगळ्या गोपांना आपल्या गोधनासह पुन्हा गोकुळात निर्भयपणे परतण्याची आज्ञा केली आणि गोवर्धन पर्वताची पुनर्स्थापना त्याच्या जागी केली. 


आज आपण सर्वत्र यात्रा करत सुटतो. आज या ठिकाणी जा, उद्या त्या ठिकाणी जा. आज इथे नवस बोल, उद्या तिथे नवस बोल. यात्रा करणे, भगवंताच्या विविध ठिकाणांची शोभा पाहणे, त्यानिमित्ताने भारतभ्रमण करून या विशाल देशातील सगळ्या संस्कृती, परंपरा यांचे अवलोकन करणे यात वाईट काहीच नाही. पण आपण फ़क्त २००० किलोमीटर दूरचा अमुक एक देव लवकर पावतो हा स्वार्थी हेतूने तिथे जाऊन गर्दी करतो, तिथल्या पर्यावरणाला इतकी गर्दी सोसणार आहे की नाही याचा विचार न करता तिथल्या व्यवस्थेवर ताण उत्पन्न करतो हे ठीक नाही. यात भारतभ्रमण, तिथल्या रूढी परंपरा यांचे डोळस अवलोकन, त्या रूढींचे आपल्या रूढीपरंपरांशी साम्य किंवा विरोधाभास आणि त्यातून या भारतवर्षाविषयीचे एक साकल्य आकलन हे कुठेच होत नाही. आपण प्रवासी म्हणून जातो. विमानाने, हेलीकॉप्टरने भराभरा जाऊन तरातरा येतो. यात पर्यटनाच्या मूळ हेतूला आपण आपल्या स्वार्थी हेतूने नख लावतोय हे आपल्या लक्षातच येत नाही. यात भगवंताच्या दर्शनाचा आनंद तो किती आणि आपल्याकडील धनाचे, संपत्तीचे प्रदर्शन करून स्थानिक भाविकांवर मात करून परतल्याचे सुख ते किती याचा विचार सर्वांनीच करण्याची आज गरज आहे.


भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला स्थानदेवता, वास्तूदेवता, ग्रामदेवता आणि कुलदेवता यांना ओळखून, त्यांची आपल्यावरील कृपा ओळखून त्यांची पूजा प्रथम करण्याचा उपदेश या उदाहरणाद्वारे केलेला आहे. त्यानंतर ५००० वर्षांनी समर्थांनी सुद्धा आपल्याला "उगेच भ्रमू नये भ्रमे" हा तसाच उपदेश आपल्या दासबोधातून केलेला आहे. तो लक्षात घ्यावा हाच या कथेचा बोध आणि प्रसाद सुद्धा आहे.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण चतुर्थी शके १९४८ दिनांक  २ / ८ / २०२६







Sunday, August 2, 2026

नवीकोरी लेलँड.

 शाळेच्या मुलांच्या मजेमजेच्या सहलीसाठी महड येथील वरदविनायकाच्या दारी आलेली नवीकोरी लेलँड.



शालेय सहल म्हणजे शाळेच्या मुलांच्या आनंदाचा गाभा असतो. ती त्यांच्या अगदी मर्मबंधातली ठेव असते.



हा अनुभव अधिक मजेशीर आणि आरामदायक बनविण्यासाठी मालवण डेपोने त्यांची नवीकोरी बस शालेय सहलीवर धाडलेली होती. चाकांना पांढर्‍या डिस्कस लावून, पताका तोरणांची सजावट केलेली नवीकोरी बस.




MH 14 / BT 3063


ASHOK LEYLAND CHEETAH model


२ बाय २ परिवर्तन बस


एकूण आसने ४४ + १ वाहक आसन


मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी बांधणी.

 

सिं. मालवण आगार.


स्थळः महड गणपती मंदिराचे पार्किंग.

दिनांकः २५/१२/२०१२



मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी, नवीन लेलॅण्ड

२०१२ - २०१३ या वर्षात बांधलेली ३८७ वी लेलॅण्ड गाडी


Saturday, August 1, 2026

श्रीमदभागवत चिंतन - ३२ ब्राह्मणपत्नींवर श्रीकृष्णांची कृपा

एकदा भगवान श्रीकृष्ण बलरामदादा आणि आपल्या गोप सवंगड्यांसह मथुरेतील लोकांची स्थिती अवलोकन करण्यासाठी म्हणून वृंदावनातून मथुरेजवळ आलेत आणि त्यांनी मथुरेबाहेर असलेल्या एका उपवनात आपला मुक्काम केला. तेव्हा मथुरेत अनेक याज्ञिक ब्राह्मण मंडळी मोठमोठे यज्ञ संपन्न करीत होते. श्रीकृष्ण आणि बलरामदादांना भूक लागली. त्यांनी त्या गोपबालकांना यज्ञस्थळी जाऊन तेथील अन्नप्रसाद स्वतःसाठी मागून आणण्यास सांगितले.


त्याप्रमाणे गोपबालके यज्ञ्स्थळी गेलीत आणि तिथल्या ब्राह्मणांना यज्ञाचा प्रसाद श्रीकृष्ण आणि बलरामदादांच्या भक्षणाकरिता मागू लागलीत. ब्राह्मणांनी त्यांच्याकडे लक्षच दिले नाही. ते आपल्या यज्ञकर्मात फ़ार गुरफ़टले होते. निराश होत ती गोपबालके मथुरेबाहेर श्रीकृष्ण आणि बलरामदादांच्या निवासस्थानाकडे आलीत आणि त्यांनी सगळी कथा त्या दोघांना ऐकवली.


श्रीकृष्ण हसलेत आणि म्हणालेत की अरे, असे पहिल्याच प्रयत्नात यश न मिळाल्याने निराश होऊ नका. पुन्हा मथुरेत जा आणि त्या यज्ञ करणा-या ब्राह्मणांच्या पत्नींना या यज्ञप्रसाद मागा. त्या मृदू हृदयाच्या आहेत. त्यामुळे तुम्हाला तिथे यश मिळेल.


श्रीकृष्णांच्या वचनांवर विश्वास असलेली गोपबालके पुन्हा मथुरेत आलीत आणि त्यांनी यज्ञ करीत असलेल्या ब्राह्मणांच्या पत्नींकडे श्रीकृष्ण आणि बलरामदादांना प्रसाद हवा म्हणून मागणी केली. त्या स्त्रियांनी रामकृष्णांची गोकुळातली कीर्ती ऐकलेली होती आणि त्यांना त्या दोघांच्याही दर्शनाची ओढ लागलेली होती. त्यांनी लगेच सगळ्या स्वयंपाकातले उत्तमोत्तम पदार्थ भांड्यांमध्ये घेतलेत आणि गोपबालकांसोबत त्या सुद्धा मथुरेच्या बाहेरील उपवनात रामकृष्णांच्या दर्शनासाठी असोशीने निघाल्यात.



रामकृष्णांची भेट झाल्यानंतर त्या स्त्रियांचा आनंद त्यांच्या डोळ्यांमधून ओसंडत होता. त्यांनी मोठ्या प्रेमाने त्या दोघा भावंडांना आणि सोबतच्या गोपबाळांना भोजन करविले. रामकृष्णांची त्यांनी स्तुती केली. भगवान श्रीकृष्ण त्यांच्या सहज भक्तीवर आणि अकृत्रिम प्रेमभावावर प्रसन्न झालेत. भगवंतांनी त्यांना आशिर्वाद दिलेत. पती आज्ञेवाचून तुम्ही आम्हाला भोजन देऊन आपापल्या पतींची अवज्ञा केली असली तरी त्याबद्दल तुमचे पती तुम्हाला दोष देणार नाहीत असे वचन दिले.


ब्राह्मणपत्नी मथुरेत परतल्यात. यज्ञकर्त्या ब्राह्मणांना ही वार्ता कळताच त्यांना राग न येता स्वतःचेच वाईट वाटले. ज्या साध्यासाठी आपण साधन म्हणून यज्ञ करतो आहोत तोच यज्ञनारायण प्रत्यक्ष प्रगट होऊन आपल्याकडे आहुती मागत होता पण आपण आपल्या कर्मांमध्ये इतके अडकून राहिलो होतो की आपल्याला साध्य काय आणि साधन काय याचाच विसर पडला आणि आपल्या हातून मोठीच चूक झाली याची त्या ब्राह्मणांना जाणीव झाली. या कृत्याचा त्यांना पश्चाताप झाला आणि आपल्या पत्नींचा त्यांना फ़ार अभिमान वाटला. ब्राह्मणांनी रामकृष्णांची स्तुती करून त्यांच्याकडे मनःपूर्वक आणि मनानेच क्षमायाचना केली. मृदूहृदयी भगवंतांनी त्यांना क्षमा केली.



भगवंतासाठी जरी कर्म करतोय तरी आपण आपल्याला नक्की काय साध्य करायचय आणि त्यासाठी नेमके साधन कुठले याचा साध्यसाधन विवेक सदैव जागृत ठेवायला हवा हा या कथेचा बोध आणि हाच या कथेचा प्रसाद सुद्धा.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण तृतीया शके १९४८ दिनांक  १ / ८ / २०२६


१ ऑगस्ट २०२६


Friday, July 31, 2026

श्रीमदभागवत चिंतन - ३१ धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

भगवान श्रीकृष्ण आणि बलरामदादा हे गोपबालकांसह त्यांच्या गाई गुरांना चरण्यासाठी म्हणून वृंदावनालगतच्या रमणीय हिरवळींवर, उपवनांमध्ये घेऊन जात. वनात दररोज गोपबालकांसह अनेक खेळ होत असत. कुस्त्या होत असत. मोठाच आनंद असे.



वृंदावनाजवळच असलेल्या एका रमणीय वनामध्ये धेनुकासूर नावाचा एक राक्षस राहत असे. तो आणि त्याचे बांधव त्या वनातील मधूर आणि रसाळ फ़ळांचे स्वतःच सेवन करीत असत. त्या फ़ळांच्या वासाने आकर्षित होऊन ती फ़ळे घेण्यासाठी कुठलाही मनुष्य़प्राणी त्या वनात शिरला तर तो धेनुकासूर आणि त्याचे दुष्ट बांधव त्या माणसाला मारून टाकत असत. गोपांनी हे वृत्त कृष्ण आणि बलरामदादांना सांगितले आणि त्यांनी त्या धेनुकासुराचा वध करण्याचे निश्चित केले.


हे दोघेही बंधू त्या वनात शिरले. धेनुकासुराला हे कळताच तो गाढवाच्या रूपाने तिथे आला आणि आपल्या मागील पायांनी बलरामदादांवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न करू लागला. एक दोन वेळा त्याला चपळ हुलकावणी दिल्यानंतर बलरामदादांनी संधी पाहून त्या धेनुकासुराचे मागील दोन्ही पाय घट्ट पकडले आणि प्रचंड बळाने त्याला गरागरा फ़िरवून त्याच वनात फ़ेकून दिले. आपल्या अंगाखाली अनेक उंच उंच वृक्षांचा चुराडा करीत तो धेनुकासूर जमिनीवर पडून अखेरचे क्षण मोजू लागला. त्याची अशी अवस्था पाहून त्याचे इतर बंधू आणि मित्र त्याठिकाणी आलेत आणि कृष्ण बलरामांशी युद्ध करू लागलेत. पण कृष्ण आणि बलरामदादांनी त्या सगळ्यांचा वध केला आणि ते वन सर्वसामान्यांसाठी निर्भय केले. सार्वजनिक संपत्तीला खाजगी मालमत्ता समजून ती इतरांना वापरण्यास मज्जाव करणा-या धेनुकासूर प्रवृत्तीचा श्रीकृष्ण आणि बलरामांनी पाडाव केला.


वृंदावनाजवळून वाहणा-या यमुनेचे पाणी हळूहळू दुषित होत आहे याची जाणीव गोपबालकांना झाली. एकदा तर ते पाणी पिऊन काही गोपबालके मूर्छित पडली होती. भगवान श्रीक्रुष्णांच्या लक्षात यमुनेचे हे प्रदूषण आले. वृंदावनापासून जवळच असलेल्या एका डोहात कालिया नावाच्या अत्यंत विषारी सापाने आश्रय घेतला होता आणि त्याच्यामुळेच यमुनेचे पाणी वृंदावनाजवळ दुषित झाले होते. 



भगवान श्रीकृष्णांनी निर्भयपणे त्या डोहात उडी टाकली आणि कालियाशी भयंकर युद्ध केले. युद्धात अतुलनीय पराक्रम गाजवून त्यांनी कालिया नागाला हैराण केले आणि सरतेशेवटी त्याच्या फ़ण्यांवर भगवान नृत्य करू लागलेत. आता कालिया मरणार हे जाणून कालियाच्या राण्यांनी भगवंतांची स्तुती केली, त्यांची क्षमा मागितली. भगवंतांनीही कालिया तिथे आला ही कथा जाणून घेऊन त्याला तिथून निघून रमणकद्वीपाजवळ गरूडापासून निर्भय असे स्थान दिले. भगवंतांना वंदन करून कालिया सुखाने आपल्या नव्या निवासस्थानी गेला.


आज आपल्या नद्यांमध्ये कालियापेक्षाही जहाल विषाचे प्रदूषण दररोज होते आहे. हे विषारी पाणी पिऊन अनेक जीव मृत्यूमुखी पडत आहेत किंवा विविध दुर्धर आजारांना सामोरे जात आहेत. सगळ्या क्षेत्रात इतकी प्रगती आपण केली आणि दूषित पाण्यावर प्रक्रिया करून त्याला पुन्हा पिण्यायोग्य बनविण्याची प्रगती आपण केली नाही असे म्हणणे म्हणजे आत्मवंचना ठरेल. आपण ती सुद्धा प्रगती केली आहे. सिंगापूर या देशाचे उदाहरण आपल्यासमोर आहे. वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा पिण्याजोगे करण्याइतपत त्यांनी सृष्टीची जपणूक केलेली आहे. आपल्याला आज गरज आहे ती प्रबळ इच्छाशक्तीची. नद्यांचे प्रदूषण शक्य तितके टाळण्याची आणि प्रदूषण झाले असेलच तर त्यावर योग्य त्या प्रक्रिया करून ते प्रदूषण हटवून नद्या पुन्हा निर्मळ करण्याची.


आपल्या लाडक्या सृष्टीला जिवापाड जपणा-या भगवंताचे आपण खरे भक्त असू तर ही सृष्टी विनाशाकडे वाटचाल करेल असे एकही पाऊल आपल्याकडून उचलले जायला नको आणि सृष्टीसंवर्धनासाठी आपले संपूर्ण प्रयत्न सतत व्हायला हवेत हाच या कथेचा बोध आणि हाच या कथेचा प्रसाद.   


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण द्वितीया शके १९४८ दिनांक  ३१ / ७ / २०२६


३१ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६