Tuesday, August 11, 2026

राक्षस, मनुष्य आणि देव

आज सकाळीच कॉलेजला येताना एका कारमागे कुठल्यातरी सदगुरूंचे 

"तुम्ही जगा, दुसर्‍यांना जगवा"

हे बोधवाक्य वाचले,  आणि विचारचक्र सुरू झाले.

"तुम्ही जगा आणि दुसर्‍यांना जगवा." ही संतांची भूमिका झाली.

"तुम्ही जगा आणि इतरांनाही जगू द्या." ही सर्वसामान्य मनुष्यमात्रांची भूमिका झाली.

आपण बघतो की समाजात काही काही व्यक्ती स्वतःही सुखाने जगत नाहीत आणि दुसर्‍यांनाही सुखाने जगू देत नाहीत. अशा व्यक्ती राक्षस असतात.

The Family Man या सिरीजमधले एक वाक्य आठवले. "आदमी जब जानवर बन जाता है तो वह जानवर से बदतर बन जाता है. वो शैतान बन जाता है." 

अगदी खरंय नं. ?

- जगाच्या राक्षसपणाचा, उगाचच केल्या गेलेल्या हेव्यांचा, सदगुणांना दुर्गुण आणि (आपल्या लाडक्यांच्या) दुर्गुणांनाही सदगुण ठरविण्याच्या धडपडीचा एक मूक साक्षीदार

आणि 

या सगळ्या दुनियादारीचा आपल्या (आणि आपल्या कुटुंबियांच्या) व्यक्तिमत्वावर व वागणुकीवर परिणाम होऊ नये म्हणून सतत जपत राहणारा सामान्य मनुष्य, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर

श्रीमदभागवत चिंतन - ४२ सुदामा प्रसंग

भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा हे बालपणापासूनचे मित्र. सांदिपनी ऋषींकडे दोघांनीही ज्ञान आणि विद्या ग्रहण केल्यात. त्यानंतर श्रीकृष्ण राजधर्माचे, क्षत्रियधर्माचे पालन करून आपले जीवन जगू लागलेत तर सुदामा आपल्या ब्राह्मण धर्माचे जीवन जगू लागलेत. ज्ञानदान करणे, समाजाला योग्य मार्गदर्शन करणे ही त्या काळात ब्राह्मणांची मुख्य कर्तव्ये होती. अपरिग्रह, कुठल्याही गोष्टींचा अति संग्रह करणे हे ब्राह्मणधर्माला लांछन होते. घरात तीन दिवसांपेक्षा जास्त दिवसांसाठी अन्नसाठा सुद्धा नको इतकी या अपरिग्रहाची सीमा होती. त्याकाळी समाजातले इतर घटक ब्राह्मणांचा हा अपरिग्रह जाणून त्यांच्या जीवनक्रमाला सुरळितपणे चालू ठेवण्यासाठी ब्राह्मणांना दान आदि करून त्यांचा चरितार्थ चालवित असत.



सुदामा ज्या देशात रहात होते त्या देशात एकूणच दुष्काळी परिस्थिती. समाजातले सगळेच घटक आपला आपला चरितार्थ चालविण्यासाठी धडपड करीत असत त्यामुळे सुदामा हा परिस्थितीने गरीबच होता. फ़ाटके, मलिन कपडे, कुटुंबातल्या सगळ्यांना जेमतेम पुरेल इतकेच अन्न, इतर सुखसुविधांचा अभाव अशा परिस्थितीत सुदामा आणि त्याचे कुटुंब आपला काळ क्रमित होते.


एकेदिवशी या दारिद्राला आणि अत्यंत अभावाच्या जगण्याला कंटाळून सुदामांची पत्नी अत्यंत दीनवाण्या चेहे-याने सुदामांना म्हणाली की द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण तुमचे मित्र आहेत असे तुम्ही कायम सांगता. त्यांच्याकडे जाऊन त्यांना आपली परिस्थिती सांगून काही धन मिळाले तर आपले जगणे थोडेतरी सुसह्य होईल. कृपा करून आपण द्वारकाधीशांकडे जाऊन त्यांची भेट घ्यावी. पत्नीच्या सांगण्यानंतर धन मागण्यासाठी नव्हे तर त्या निमित्ताने आपली आपल्या बालमित्राशी भेट होईल या हेतूने सुदामा द्वारकेस जाण्यास तयार झालेत. द्वारकाधीशाकडे रिकाम्या हाताने कसे जायचे ? म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला द्वारकाधीसाठी काहीतरी भेटवस्तू दे असे सांगितले. तिने शेजारची चार ब्राह्मण घरे भिक्षा मागून मूठभर कोरडे पोहे आणले आणि एका पुरचुंडीत बांधून ती भेटवस्तू सुदामांसोबत द्वारकाधीशांसाठी दिली.


द्वारकेत सुदामा प्रवेशले आणि आपल्या बालमित्राचे हे सगळे वैभव पाहून अत्यंत हरखून गेलेत. अनेक चौक्या पहारे दूर करीत करीत सुदामा श्रीकृष्णाच्या महालापर्यंत पोहोचलेत. फ़ाटक्या आणि मलिन वस्त्रातला आपला मित्र आपल्या द्वाराशी आला आहे हे वर्तमान श्रीकृष्णांना कळताच ते सुदाम्याच्या स्वागतासाठी महालाबाहेर धावत आले आणि त्यांनी तिथेच सुदाम्याला घट्ट मिठी मारली. ते सुदाम्याला अत्यंत आदरपूर्वक आपल्या महालात घेऊन आलेत आणि त्यांनी सुदाम्याला आपल्या मंचकावर बसविले. त्यांचे पाय धुतलेत, त्यांची सेवा केली, त्यांच्या विश्रांतीसाठी आपला मंचक उपलब्ध करून दिला. याप्रसंगी प्रत्यक्ष लक्ष्मीरूप असलेली रुक्मिणी सुदाम्यांना मंचकावर वारा घालीत होती आणि श्रीक्रुष्ण त्यांचे पाय चेपत होते.


विश्रांतीनंतर श्रीकृष्णांनी सुदामदेवांना आपल्या इतर राण्यांशी, पुत्रांशी ओळख करून दिली आणि ते दोघे मित्र गुरूगृहीच्या आठवणींमध्ये रमलेत. गुरूगृही असताना शिकलेली विद्या, झालेल्या गंमतीजंमती, गुरूंचा उपदेश या आठवणींमध्ये दोघेही रमलेत. भगवंतांना काही मागायचे आहे याचा विसर सुदामदेवांना पडला आणि सुदामदेव आपल्याकडे काहीतरी मागण्यासाठी आलेले आहेत हे भगवंतांनी जाणूनसुद्धा त्याबद्दल अवाक्षर काढले नाही. अचानक भगवंतांनी सुदाम्यांना तू माझ्यासाठी काहीतरी भेटवस्तू आणली आहेस की नाही ? असा प्रश्न केला. आपल्या कनवटीला मलिन वस्त्रांमध्ये बांधून आणलेले ते मूठभर पोहे अशा सर्वधनसंपन्न द्वारकाधीशाला भेटवस्तू म्हणून देण्यास सुदामांना संकोच वाटला. ते तो मुद्दा टाळू लागलेत. पण भगवंतांनीच चपळाईने त्यांचा धांडोळा घेऊन ती पोहे बांधलेली पोटली हस्तगत केली आणि त्यातले मूठभर पोहे आपल्या तोंडात टाकून ते अत्यंत मनापासून त्यांचा आस्वाद घेऊ लागलेत. राजमहालातील इतर सर्वजण, श्रीकृष्णांच्या राण्या एका अत्यंत मलिन, फ़ाटक्या वस्त्रात असलेल्या ब्राह्मणाची ही सरबराई पाहून आश्चर्यचकित होत होते. भगवंतांनी एक मूठ पोहे संपवून दुसरी मूठ घेण्यासाठी त्या पोटलीत हात टाकला तोच त्यांचा तो हात प्रत्यक्ष लक्ष्मीस्वरूप असलेल्या रुक्मिणीने पकडला असे श्रीमदभागवतकार वर्णन करत आहेत. एक मूठ पोह्यांनीच भगवंत सुदामदेवांना काय काय आणि किती किती देणार होते हे माता लक्ष्मीने ओळखले होते. त्यांनी दुसरी मूठ पोहेसुद्धा भक्षण केले असते तर त्रैलोक्याचे राज्य सुद्धा सुदामदेवांना देऊन टाकले असते म्हणून माता लक्ष्मीने भगवंतांना दुसरी मूठ पोहे खाऊ दिले नाही असे भाष्यकारांचे विवेचन आहे.



सुदामदेवांची सेवा, आदरसत्कार, भोजन, गप्पागोष्टी झाल्यानंतर सुदामदेव परत जाण्यास निघालेत तेव्हा त्यांना निरोप द्यायला प्रत्यक्ष द्वारकाधीश सीमेपर्यंत आलेत. सुदामदेवांच्या मनातल्या गोष्टी, याचना इत्यादि बाबी त्यांच्या स्वतःच्या संकोचामुळे सुदामदेवांच्या मनातच राहून गेल्यात. आणि द्वारकाधीश इतके वस्ताद की त्या गोष्टा मनोमन जाणूनही त्यांना ते व्यक्त करण्याची वेळ द्वारकाधीशांनी सुदामदेवांच्या द्वारकेच्या वास्तव्यात येऊ दिली नाही. इकडे आपल्या बालमित्राची भेट झाली म्हणून सुदामदेव परतताना अत्यंत हर्षभरित होते.


सुदामदेव त्यांच्या नगरीजवळ आले तेव्हा त्यांना त्या नगरीचा संपूर्ण कायापालट झालेला दिसला. जुने दारिद्र्य जाऊन तिथे आता सर्वत्र वैभवसंपन्नता दिसू लागली होती. सुदामदेवांचे घर आणि कुटुंबियसुद्धा सर्व प्रकारच्या लौकिक ऐश्वर्याने समृद्ध झालेले होते. सगळे लौकिकरित्या संपन्न झालेले होते. सुदामदेवांना हे कृत्य कुणाचे आहे ते कळले आणि मनातून ते अधिकच विरक्त झालेत. यानंतरचे जीवन त्यांनी सुखसमृद्धीत राहूनही भगवंतावरच्या आपल्या मनातील प्रेमात दिवसेंदिवस वाढ करीत घालवलेत. त्या वैभवाने ते भुलले नाहीत. त्या लौकिक वैभवापेक्षा आपल्या मित्राची द्वारकेत झालेली भेट, त्याने दिलेला सन्मान हे त्यांच्या मनात जास्त ठसले होते. लौकिक वैभवापेक्षा प्रत्यक्ष भगवंताची झालेली भेट ही जास्त मौल्यवान असते हे शाश्वत सत्य सुदामदेवांनी जाणले म्हणून ते मुक्तीच्या मार्गाला गेलेत.


पंतकाव्यात या प्रसंगाचे अत्यंत सुंदर वर्णन एका आर्येत केल्या गेलेले आहे.


ऋणतरी मूठभर पोहे, ज्याच्या व्याजात हेम नगरी ही

मुद्दलात मुक्ती देणे, ही कोण्या साहुकारीची रिती ?


मूठभर पोह्यांच्या ऋणात व्याज म्हणून सुदामदेवांना सर्व लौकिक ऐश्वर्य भगवंतांनी दिले, आणि ते मुद्दल चुकवायचे म्हणून त्यांना मुक्ती प्राप्त करून दिली. इतक्या छोट्याशा ऋणाची इतकी परतफ़ेड जगातला कुठला सावकार करीत असतो ? फ़क्त भगवंताच्या दरबारी हा प्रेमाचा, भक्तीचा हिशेब आहे. 


आपण सर्व भाविकही आपल्या नेहेमीच्या लौकिक मागण्या बाजूला ठेऊन भगवंतावर आपला मित्र म्हणून प्रेम करून बघूयात का ? तो अशा प्रेमाचा फ़ार भुकेला आहे. त्याला हे असे निर्व्याज प्रेम अगदी मनापासून आणि फ़ार फ़ार आवडते.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण चतुर्दशी शके १९४८ दिनांक  ११ / ८ / २०२६


११ ऑगस्ट २०२६ 



Monday, August 10, 2026

चितार ओळः नागपूरचा एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा.

आमचे बालपण इतवारीतल्या पोथी गल्लीत गेले. 


शाळाः सी.पी.ॲण्ड बेरार, महाल. 


रोजचा शाळेचा प्रवास चितार ओळीतूनच व्हायचा. त्या काळी बसने फक्त बाहेरगावी किंवा शहरात लांबच्या ठिकाणी (अभ्यंकर नगर, जयप्रकाश नगर वगैरे ठिकाणे शहराबाहेर गणली जायचीत.) जाता यायच हो. "स्कूल बस" हे लाड नव्हते हो. घराजवळ एक दीड किमी अंतरावर शाळा असली की कशाला बस ? आपली ११ नंबरची "विनोबा ट्रॅव्हल्स"च खरी आणि बरी.


आज बर्‍याच वर्षांनी गणपतीच्या मूर्तीचे advanced booking करायला चितार ओळीत गेलो. बालपण पुन्हा जगलो. एक पिढी पूर्ण बदलली. मेट्रो अगदी जवळून चाललीय पण चितार ओळ अजूनही बदलली नाही हे बघून खूप छान वाटल. सोबत असलेल्या कन्यारत्नाला माझ्या बालपणात घेऊन जाताना टिपलेली क्षणचित्रे. बालपणी कॅमेरा ही अतीव चैनीची गोष्ट होती. असता तर त्याकाळची क्षणचित्रे आणि आजच्या क्षणचित्रांमध्ये कणभरही फरक नसल्याच दाखवून देता आल असत.










श्रीमदभागवत चिंतन - ४१ जरासन्ध आणि शिशुपाल वध

आपले परमभक्त असलेल्या पांडवांचे इंद्रप्रस्थ नगर अवलोकन करण्यासाठी म्हणून भगवंत आपल्या सगळ्या पट्टराण्यांसह द्वारकेवरून इंद्रप्रस्थाला गेलेत. भगवंत आपल्या घरी आलेले पाहून पांडवांना अतिशय आनंद झाला. कुंतीला आपल्या या भाच्याला पाहून प्रेमाचे भरते आले. भगवंतांचे आणि त्यांच्यासह आलेल्या त्यांच्या पट्टराण्यांचे सर्व इंद्रप्रस्थवासियांनी मनापासून स्वागत केले, त्यांचा यथोचित आदरसत्कार केला. भगवंतांनी पांडवांना राजसूय यज्ञ करण्याची आज्ञा दिली.


राजसूय यज्ञासाठी यज्ञाश्व सोडला गेला. आसपासच्या राज्यांमध्ये तो यज्ञाश्व सुखेनैव फ़िरून जयपत्रे घेऊन आला पण मगध देशातून मात्र विजय प्राप्त होईना. मगध देशात भगवंतांनी आत्त्तापर्यंत अठरा वेळा पराजित केलेला जरासन्ध राज्य करीत होता. मधल्या काळात त्याची शक्ती इतकी वाढली होती की त्याला समोरासमोर युद्धात पराजित करणे कठीण होऊन बसले होते. तेव्हा उद्धवाने द्वारकेत भगवंताला सांगितलेली युक्ती त्यांनी जरासंधासोबत वापरण्याचे ठरविले. भगवंत स्वतः अर्जुन आणि भीमाला घेऊन मगध नगरीत ब्राह्मण वेषाने गेलेत. जरासंध दुष्ट असला तरी अतिथीधर्म पालन करीत होता. अतिथी म्हणून त्याच्याकडे जायचे आणि त्याला मल्लयुद्धाचे आव्हान द्यायचे असा श्रीकृष्ण आणि पांडवांचा हेतू होता.



जरासंधाने आपल्या धर्माप्रमाणे या अतिथींचे स्वागत केले आणि त्यांना येण्याचा हेतू विचारला. तेव्हा त्या ब्राह्मण वेषातील अतिथींना आपण क्षत्रिय असून आम्हाला आपल्यासोबत मल्लयुद्ध करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. अतिथींनी आपली खरी रूपेही जरासंधासमोर प्रगट केलीत. हा पांडुपुत्र भीम, हा कुंतीसुत अर्जुन आणि मी तुझा जुना विरोधक कृष्ण असे भगवंतांनी सांगताच जरासंधाला हसू फ़ुटले. तो म्हणाला हे कृष्णा, माझ्यासोबतच्या मागील युद्धात तू मथुरेतून पळून द्वारकेत आश्रय घेतलास त्यामुळे तुझ्याशी मी युद्ध करणार नाही. हा अर्जुन वनवासाच्या काळात बृहन्नडेच्या रूपात राहत होता त्यामुळे त्याच्याशी सुद्धा मला मल्लयुद्ध करता येणार नाही. मी भीमसेनाशी मल्लयुद्ध करेन. सगळ्यांची त्याला सहमती मिळाली आणि भीमसेनाचे व जरासंधाचे मल्लयुद्ध सुरू झाले.


सतत अठ्ठावीस दिवस मल्लयुद्ध चालले तरी जरासंधाचा पराभव होईना. भीमसेन हताश झाला तेव्हा भगवंतांनी जरासंधाच्या जन्माचे रहस्य त्याला सांगितले आणि त्याला मल्लयुद्धातच मधोमध चिरून त्याच्या शरीराचे दोन तुकडे करण्याची आज्ञा दिली. दुस-या दिवशीच्या युद्धातच भीमसेनाने भगवंताची आज्ञा प्रमाण मानून जरासंधाचे बरोबर मधून दोन तुकडे केलेत आणि त्याचा वध केला. जरासंधाला जिंकल्याबरोबर पांडवांचा राजसूय यज्ञ पूर्ण झाला. भगवान श्रीकृष्णांनी जरासंधाने बंदिवान करून ठेवलेल्या अनेक राजांना त्याच्या कैदेतून मुक्त केले आणि त्यांचे गतवैभव त्यांना प्राप्त करून दिले. त्या सर्व राजांनी आपल्या उपकारकर्त्या भगवंताची जी स्तुती गायली आहे ती आपण आजही अत्यंत कृतज्ञतेने म्हणतो.


कृष्णाय वासुदेवाय, हरये परमात्मने

प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः



राजसूय यज्ञाची विधिवत सांगता करण्यासाठी पांडवांनी आपल्या इंद्रप्रस्थ नगरीत सर्व ऋषीमुनी आणि विविध देशींच्या राजांना पाचारण केले. सर्व मंडळी अत्यंत आनंदाने तिथे आलीत. त्याप्रसंगी त्य यज्ञाच्या अग्रपूजेचा मान कुणाला द्यायचा यावरून तिथे चर्चा झाली आणि सर्वानुमते हा मान भगवान श्रीकृष्णासारख्या पुरूषोत्त्तमाला मिळायला हवा असा सूर निघू लागला. पण भगवंताचा जन्मोजन्मीचा शत्रू असल्या शिशुपालाला ते पटले नाही. तो भर सभेत भगवंताची निर्भत्सना करू लागला, भगवंताला दूषणे देऊ लागला. शिशुपालाचे शंभर अपराध भरण्याचीच भगवंत वाट बघत होते. ते तसे भरल्याबरोबर भगवंतांनी त्या भर सभेत आपले सुदर्शनचक्र सोडून शिशुपालाचे मस्तक क्षणार्धात धडावेगळे केले. द्वेषभावनेने का होईना भगवंताचा सतत ध्यास घेतलेला असल्याने शिशुपालाच्या देहातली दिव्य ज्योत भगवंतांच्या हृदयात जाऊन विराजमान झाली. त्याला भगवंताच्या हृदयात अक्षय्य स्थान मिळाले. जय आणि विजय या आपल्या पार्षदांच्या अपराधासाठी त्यांचे तीन असुरजन्म हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, रावण आणि कुंभकर्ण व शिशुपाल आणि दंतवक्त्र या स्वरूपात पूर्ण होऊन ते पार्षद आपल्या मूळ सेवेत रूजू झाले होते. पांडवांचा राजसूय यज्ञ यथासांग पार पाडल्यानंतर भगवंत पुन्हा द्वारकानगरीत आलेत.

॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण द्वादशी / त्रयोदशी शके १९४८ दिनांक  १० / ८ / २०२६


१० ऑगस्ट २०२६ 


श्रीमदभागवत चिंतन - ४० भगवंतावर चोरीचा आळ

भगवान श्रीकृष्णावर त्यांच्या बालपणीच गोपींच्या घरांमधून दही, दूध, लोण्याची चोरी केल्याचे अनेक आळ आलेले होते. त्यामुळे चोरीचे आळ त्यांना नवे नव्हते. पण हे सगळे लाडीक आळ होते. भगवंत नंदबाबांच्या समृद्ध घरातले पुत्र होते आणि आपल्या सवंगड्यांसाठी ते बालपणी या चो-या करायचेत पण भगवंत द्वारकाधीश असताना मात्र त्यांच्यावर चोरीचा आळ आला आणि त्याला भगवंतांनी कसे धीरोदात्त्तपणे तोंड दिले हे अभ्यासण्यासारखे आहे.


सत्राजित नावाचा एक तपस्वी क्षत्रिय होता. त्याने खूप मनापासून सूर्योपासना केली. भगवान सूर्यनारायण त्याच्यावर प्रसन्न झालेत आणि त्याला स्यमंतक नावाचा आपला एक मणि दिला. त्या मण्याचे अंगभूत तेज इतके होते की तो मणि गळ्यात धारण केल्यानंतर सर्व प्रजाजनांना साक्षात सूर्यनारायण आपल्या नगरात प्रगट झाल्यासारखे वाटले. सत्राजिताने तो स्यमंतक मणि आपल्या देवघरात सुपूजित केला आणि त्याची प्रतिष्ठापना केली. रोज तो मणि आपल्या भाराच्या आठपट सोने त्या घरात प्रदान करीत असे आणि तो मणि जिथे राहील तिथे रोग, भय, शत्रू, मानसिक किंवा शारिरीक दोष यांचा लवलेशही राहत नसे. भगवान श्रीकृष्णांनी सत्राजिताला भेटून राज्याच्या व्यापक हितासाठी तो स्यमंतक मणि हा मथुरेचे राजा उग्रसेन यांच्याकडे सुपूर्द करायला सांगितले. पण त्या स्यमंतक मणिप्राप्तीचा इतका अहंकार सत्राजिताला चढला होता की त्याला वाटले की माझ्याकडे मणि आहे हे श्रीकृष्णाला सहन होत नाही म्हणून तो हा सल्ला देतोय. त्याने तो सल्ला धुडकावून लावत मणि स्वतःजवळच ठेवला.


एके दिवशी सत्राजिताचा भाऊ प्रसेनजित हा स्यमंतकमणि गळ्यात परिधान करून घोड्यावर बसून वनात शिकारीसाठी गेला असताना एका सिंहाने त्याला त्याच्या घोड्यासकट मारून टाकले आणि तो मणि घेऊन सिंह जात असताना त्याची जांबुवताशी झटापट झाली. जांबुवंत अत्यंत पराक्रमी होता त्याने त्या सिंहाला मारून तो मणि हस्तगत केला आणि गुहेत राहत असलेल्या आपल्या लहान मुलांना तो मणि खेळायला दिला.



इकडे प्रसेनजित न परतल्यामुळे सत्राजित शोकाकूल झाला आणि माझ्या भावाचे, प्रसेनजिताचे, स्यमंतक मण्यासाठी अपहरण भगवान श्रीकृष्णानेच केलेले आहे असा आळ त्याने भगवंतावर घेतला. हळूहळू ही वार्ता कर्णोपकर्णी झाली. प्रजाजनांमध्ये कुजबूज सुरू झाली. परिस्थितीजन्य पुरावे भगवंताच्या विरोधातच होते. या खोट्या आळामुळे भगवंत दुःखी झालेत पण डगमगले मात्र नाहीत. त्यांनी त्या मण्याच्या शोधासाठी काही प्रजाजन व सैन्य सोबत घेऊन वनात प्रसेनजिताच्या शोधाची मोहीम काढली.


वनात काही अंतर जाताच सिंहाने मारलेल्या घोड्याचे आणि प्रसेनजिताचे अवशेष सगळ्यांना दिसले. प्रसेनजिताला सिंहानेच मारून खाल्ले यावर सगळ्यांचे एकमत झाले. थोडे पुढे जाताच भगवंत जांबुवंतांच्या गुहेत शिरले आणि तिथे त्या स्यमंतक मण्याशी खेळत असलेली अज्ञान अस्वलबालके त्यांना दिसली. भगवंत तो मणि त्या बालकांकडून हस्तगत करण्यासाठी पुढे जाणार तेव्हढ्यात कुणीतरी पुरूष आपल्या गुहेत येऊन आपल्या बालकांना त्रास देतोय असा ग्रह करून घेत जांबुवंत पुढे सरसावला आणि त्याने श्रीकृष्णांशी मल्लयुद्ध सुरू केले. बराच वेळ कुणीही कुणाला हार जाईना. मग त्या दोघांचे मुष्टियुद्ध सुरू झाले. त्यात जांबुवंतावर अनेक मुष्टिप्रहार करून भगवंतांनी त्याचे बळ अगदी क्षीण करून टाकले. त्या युद्धामध्येच जांबुवंताला आपल्या या प्रतिस्पर्ध्याचे पूर्व अवतारातले श्रीरामांचे स्वरूप आठवले. युद्ध सोडून देऊन तो भगवंतांना शरण आला आणि त्याने भगवंतांची स्तुती आरंभिली. मागील अवतारात मी तुमचा दास होतो आणि म्हणूनच या अवतारात सुद्धा आपण मला दर्शन दिले हे माझे केव्हढे भाग्य अशी त्याने भगवंतांची स्तुती केली आणि स्यमंतक मण्याची कथा ऐकून तो मणि भगवंतांना दिला. सोबतच आपली कन्या जांबवती हिच्याशी भगवंतांचा विवाह करून दिला.


स्यमंतक मणि घेऊन आणि आपली नवपरिणीत वधू घेऊन भगवंत द्वारकानगरीत परतलेत. भगवंतांनी सगळ्या प्रजाजनांना एकत्र सभेत बोलावले आणि स्यमंतक मणि सत्राजिताकडे प्रदान करून स्वतःवरच्या आरोपांचे किटाळ धुवून काढले. सत्राजित मनोमन फ़ारच खजिल झाला. आपण कारण नसताना भगवान श्रीकृष्णाच्या हेतूवर संशय घेऊन फ़ार मोठी चूक केली अशी बोचणी त्याला लागली. त्याने आपली अत्यंत सुशील, सर्वगुणी आणि देखणी कन्या, सत्यभामा ही भगवंतांना दिली. सत्यभामेचा विवाह भगवान श्रीकृष्णांशी झाला.


त्यानंतर भगवंताचे विवाह सूर्यदेवांची कन्या कालिंदी, उज्जैन नगरीची राजकन्या मित्रविन्दा, कौशल देशाचा राजा नग्नजित याची कन्या सत्या उपाख्य नाग्नजिती, कैकय देशातल्या श्रीकृष्णांच्या आत्याची, शृतकिर्तीची, मुलगी भद्रा आणि मद्रदेशाची राजकन्या लक्ष्मणा ह्यांच्याशी झालेत. प्रत्येक विवाहानंतर द्वारकेत अत्यंत विधिवत लग्न झालीत आणि सर्वत्र आनंदी आनंद झाला.



प्रागज्योतिषपूर येथे भौमासूर नावाच्या असुराने अनेक देशातील एकूण १६००० राजकन्यांना बळजबरीने अपहरण करून आपल्या कैदेत ठेवलेले होते. भगवंतांना हे अत्याचारी वृत्त्त कळताच ते सत्यभामेसह गरूडावर स्वार होऊन प्रागज्योतिषपूर येथे गेलेत. तिथे भगवंतांनी सत्यभामेसह अतुलनीय पराक्रम गाजवून भौमासुराचा वध केला. त्याचा पुत्र भगदत्त्त हा भयभीत होऊन भगवंतांना शरण आला त्याला त्यांनी अनुग्रहित केले आणि भौमासुराच्या तावडीतून त्या १६००० राजकन्यांची सुटका केली.


भगवान श्रीकृष्ण भौमासुराचा वध करून त्याच्या महालात प्रवेश करताक्षणीच त्या बंदिवान राजकन्यांना त्यांचे रूप आणि पराक्रम दिसला. त्या सगळ्या जणी श्रीकृष्णावर मोहीत झाल्यात आणि त्यांनी त्याला आपला पती मानले व मनोमन वरले. त्यामुळे त्या सगळ्यांशी भगवंतांनी विवाह केलेत. त्यांना भौमासुराच्या नरकातून मुक्त करून त्यांचा उद्धार केला. विवाह करून त्या सगळ्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण एकादशी शके १९४८ दिनांक  ९ / ८ / २०२६


९ ऑगस्ट २०२६ 


Saturday, August 8, 2026

विदर्भ, न्यूयॉर्क, मुंबई आणि पुणे

 मी बघितलेय की विदर्भाच्या बाहेर पायही न ठेवलेली मंडळीच पुण्याला नाके मुरडतात.

असे म्हणतात की न्युयाॅर्कमध्ये जेवढे सिसिलीयन आहेत तेवढे खुद्द रोममध्ये नाहीत.

मुंबईत जेवढे भोजपुरी आहेत तेवढे खुद्द पाटण्यात नाहीत.

आणि

पुण्यात जेवढे वैदर्भिय आहेत तेवढे तर नागपूर आणि अमरावती मिळूनही नाहीत.

उद्या वेगळा विदर्भ झालाच तर कोथरूडला त्या राज्याचा दूरस्थ जिल्हा म्हणून समाविष्ट करावे लागेल, आहात कुठं ?

मला माझ्या नागपूरइतकेच पुण्याचेही कौतुक वाटते. तिथल्या हवेतच काहीतरी वेगळेपणा आणि freshness आहे. पुलंनी कितीही म्हटलं की पुणेकर व्हायला तुम्हाला विशेष मेहेनत करावी लागेल पण माझा अनुभव असा आहे की पुण्यात गेल्यावर पुणे शहर एखाद्याला इतकं स्वतःत सामावून घेतं की ती व्यक्ति पुणेकरच होऊन जाते. 

फक्त हिंजवडी चा उच्चार "हिंजेवाडी" असा करू नये. एकवेळ तुम्ही "अहो, ती पानपतची लढाई म्हणतात ती पुण्यात कुठशी झाली हो ?" हा प्रमाद करू शकता पण "हिंजेवाडी" हा उल्लेख म्हणजे तुम्ही "गंगा किनारेवाले आणि ग्यानगंगा एक्सप्रेसने पुण्यात उतरलेले भैय्या" असेच पुणेकर मानतात आणि ते रास्तही आहे.

- जन्माने नागपूरकर, कर्मभूमीव्दारे मुंबईकर असलेले पण पुणेकरांच्या बुध्दीमत्तेविषयी, वेगळेपणाविषयी अपार आदर असलेले, रामशास्त्री किन्हीकर.

पुणेकरांवर लिहीलेले दोन लेख खालच्या इथे आणि इथे.

श्रीमदभागवत चिंतन - ३९ रुक्मिणीस्वयंवर

विदर्भ देशाचा राजा् भीष्मक याला पाच पुत्र आणि एक अत्यंत सुस्वरूप आणि सुशील कन्या होती. रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, रूक्मकेश आणि रूक्ममाली हे पुत्र आणि रूक्मिणी ही कन्या. त्यात थोरला पुत्र रूक्मी हा अत्यंत पराक्रमी होता आणि ज्येष्ठ युवराज म्हणून वडिलांसोबत राज्याचा कारभार तोच बघत असे.


रूक्मिणी विवाहायोग्य वयाची झाली तेव्हा तिच्यासाठी वरसंशोधन सुरू झाले. रूक्मिणीने नगरातील विद्वान जनांकडून द्वारकाधीश श्रीकृष्णांची ख्याती, त्यांचा अतुलनीय पराक्रम, त्यांचे विलोभनीय रूप यांचे वर्णन फ़ार पूर्वकाळापासून ऐकले होते आणि मनोमन असा निश्चय केला होता की मी विवाह करेन तर श्रीकृष्णांशीच. तिने मनोमन श्रीकृष्णांनाच वरले होते.


इकडे द्वारका नगरीत भगवंतांनी रूक्मिणीचे सौंदर्य, तिची शालीनता, विद्वत्ता यांची किर्ती ऐकली होती आणि साक्षात लक्ष्मीरूप असलेल्या रूक्मिणीशी विवाह करून तिला आपली पट्टराणी करण्याचा विचार त्यांच्या मनात घोळत होताच.


पण रूक्मिणीसाठी जेव्हा वरसंशोधन सुरू झाले तेव्हा तिच्या थोरल्या भावाच्या मनात तिच्यासाठी वर म्हणून त्याचा मित्र असलेल्या शिशुपालाचे नाव आले. शिशुपाल हा एक दुष्ट आणि क्रूर शासक होता. पण रूक्मीला त्याच्यासोबत असलेल्या मैत्रीपुढे त्याचे अवगुण फ़ारसे जाणवत नव्हते. वृद्ध पिता भीष्मक थकल्यामुळे रूक्मी हाच विदर्भ राज्याचा खरा शासक असल्याने त्याच्या मर्जीपुढे त्याच्या इतर भावांचे, रूक्मिणीचे किंवा खुद्द भीष्मक राजाचे काही चालेना. रूक्मीने विवाहाची तारीख निश्चित केली आणि शिशुपालाचे मित्र दंतवक्र, जरासंध इत्यादि राजे विदर्भ नगरीच्या राजधानीत कौंडिण्यपूरला येण्यास निघालेत.


रूक्मिणीला ही दुःखद वार्ता कळताच तिने एक युक्ती केली. तिने तिच्या विश्वासातल्या एका ब्राह्मण दूताला बोलावून त्याच्या हाती स्वतः लिहीलेले एक प्रेमपत्र दिले. आणि ते द्वारका नगरीत जाऊन श्रीकृष्णांना देण्यास सांगितले. त्या प्रेमपत्रात तिने श्रीकृष्णांच्या रूपाची, पराक्रमाची स्तुती केलेली होती आणि तिने त्यांनाच मनोमन वरल्याची ग्वाही दिली होती. तिच्या विवाहप्रसंगी तिथल्या परंपरेनुसार जेव्हा ती जगदंबेच्या दर्शनाला जाईल तेव्हा तिथून तिचे हरण करण्याची विनंती तिने श्रीकृष्णाला केलेली होती. शिशुपाल हा वर म्हणून तिला अजिबात पसंत नाही आणि भगवंतांनी येऊन तिचे हरण आणि पाणिग्रहण केले नाही तर ती आपले प्राण त्यागणार असल्याची खात्रीसुद्धा तिने त्या पत्रातून भगवंतांना दिलेली होती. 


श्रीमदभागवताच्या दशम स्कंधातल्या बावन्नाव्या अध्यायातील रूक्मिणीने श्रीकृष्णाला लिहीलेले हे पत्र विविध अंगांनी अभ्यासण्याजोगे आहे. या पत्रातील भाषासौंदर्य, व्याकरण आणि भावनांची नेमकी अभिव्यक्ती हे खरोखर एका अभ्यासाचा विषय आहेत. हे सुंदर पत्र वाचून भगवंतांनी आपला रथ सिद्ध केला आणि ते रूक्मिणीच्या हाकेला ओ देण्यासाठी द्वारकेवरून तातडीने निघालेत. भगवंत तातडीने विदर्भ देशाकडे निघालेत ही बातमी बलरामदादांना कळल्यावर ते सुद्धा आपली पुरेशी सेना घेऊन भगवंतांच्या मागेमागे द्वारकेवरून विदर्भाकडे निघालेत.



लग्नाच्या नियत दिवसाच्या आदल्याच दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि बलरामदादा कौंडिण्यपूरला आलेत. संपूर्ण नगरात लग्नाची घाई गडबड सुरू होती. शिशुपाल, जरासंध इत्यादि अनेक राजे आपल्या सैन्यासह त्या नगरीत येऊन लग्नसमारंभासाठी मुक्काम ठोकून होते. कौंडिण्यपूरच्या सगळ्या प्रजाजनांनी श्रीकृष्णांना बघितल्यावर त्या सगळ्यांनाच त्यांच्या सुंदर रूपाची, तेजाची आणि पराक्रमाची जणू भुरळच पडली आणि त्या सर्वांच्या लाडक्या राजकन्येसाठी, रूक्मिणीसाठी श्रीकृष्ण हाच योग्य वर आहे अशी त्यांच्या मनातून खात्री पटत चालली होती.


आपल्या पत्राचा आदर करून प्रत्यक्ष श्रीकृष्ण नगरीत आलेले आहेत हे ऐकून रूक्मिणी मनोमन आनंदली. तिने लग्नासाठीचा सगळा साजशृंगार अगदी मनापासून करायला सुरूवात केली. ठरल्या वेळेनुसार लग्नापूर्वी ती आपल्या अनेक सख्यांसह आणि सैनिकांच्या पहा-यात कुलदेवी जगदंबेचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेलेली असताना पूर्वसंकेताप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी तिचे हरण केले आणि तिला आपल्या रथावर घेऊन तो रथ भरधाव द्वारकेकडे सोडला. 



या प्रकारामुळे अपमानित होऊन शिशुपालादि राजांनी आपापल्या सैन्यासह श्रीकृष्णांचा पाठलाग सुरू केला. पण बलरामदादांनी त्यांच्या सैन्यासह त्या सर्वांचा प्रतिकार करून तो पाठलाग मध्येच थांबवला. बलरामदादांच्या सैन्याने तिथे असलेल्या सकल राजांच्या सैन्याचा पाडाव केला. हताश झालेला शिशुपाल, जरासंध आदि राजे माघारी परतले. पण रूक्मिणीचा सगळ्यात थोरला बंधू रूक्मी याने श्रीकृष्णांच्या रथाचा पाठलाग प्राणपणाने सुरूच ठेवला. श्रीकृष्णांनी आपला रथ थांबवून त्याच्याशी युद्ध केले. श्रीकृष्णांच्या अतुल पराक्रमापुढे रूक्मीचा पराक्रम अगदी थिटा पडला. तो मरणासन्न अवस्थेत असताना रूक्मिणीने आपल्या बंधूच्या प्राणासाठी श्रीक्रुष्णांसमोर पदर पसरला आणि तिच्या विनवणीवरून श्रीकृष्णांनी रूक्मीला सोडून दिले. निराश, हताश झालेला रूक्मी त्याच्या पूर्वप्रतिज्ञेनुसार पुन्हा कौंडिण्यपूरला कधीही आला नाही. नगराबाहेर भोजकट नावाचे एक नवे नगर वसवून तिथे तो राहू लागला.


रूक्मिणीला सोबत घेऊन भगवान श्रीकृष्ण द्वारका नगरीत आलेत. बलरामदादांनी द्वारकेत मोठा लग्नसमारंभ आयोजित केला होता. प्रत्यक्ष लक्ष्मीप्रमाणे सुंदर असलेल्या आणि आपल्या राजाला प्रिय असलेल्या द्वारकेच्या राणीला, रूक्मिणीला बघून द्वारकेतील सगळे प्रजाजन अगदी आनंदून गेलेत. श्रीकृष्णांचा पहिला विवाह अशा प्रकारे साजरा झाला. 


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण दशमी शके १९४८ दिनांक  ८ / ८ / २०२६


८ ऑगस्ट २०२६