Tuesday, September 8, 2026

वेदमूर्ती ?

आजकाल स्वतःला "वेदमूर्ती" म्हणवून घेणाचे हे एक नवीनच फ़ॅड गुरूजींमधे सध्या आलेय.

श्रीगणपत्यथर्वशीर्ष, पुरूषसूक्त, श्रीसूक्त, एकादष्णी आणि पवमान येव्हढेच येत असले तरी स्वतःच स्वतःला "वेदमूर्ती" म्हणवून घ्यायचे. एकेका वेदाचे भेद किती आहेत ? शाखा किती आहेत ? याची साधी मोजणी सुध्दा येत नसलेल्या व्यक्ती "वेदमूर्ती" ?

श्रीगुरूचरित्र नियमीतपणे वाचणा-यांनी तरी त्यातल्या सव्विसाव्या अध्यायाचा अन्वयार्थ लक्षात घेऊन स्वतःला वेद कळतात असा दावा करू नये.

- अशावेळी नेमके पुल आठवणारा 

"चड्डी फाटली तर लेकाला टीप मारता येत नाही, नीट. आणि हा ठिगळ्या टेलर स्वतःला "प्रोफेसर" म्हणवून घेतो ? "

पुल भक्त, प्रा वैभवीराम प्रकाश किन्हीकर. 

Monday, September 7, 2026

आनंदाने जगायचं नाकारणं यासारखा दुसरा शाप नाही

पु. ल. देशपांड्यांनी वर्णन केल्याप्रमाणे आम्ही म्हणजे रोज दुपारचा आणि (संध्याकाळचाही) ताकभात उरकून हातावरचे पाणी वाळायच्या आत निद्रादेवीच्या राज्यात सामील होणारे वीर.  पत्रिकेच्या सुखस्थानी गुरू असला की असली सुखे लाभतात असे म्हणतात.  टचवुड. ते जाऊ देत बापडे.


रोज कामधंद्यावर दुपारच्या वामकुक्षीची होणारी पंचाईत सुट्यांच्या दिवशी भरून काढण्याच्या दृष्टीने आमची कायम वाटचाल असते. कधीकधी दुपारी साधारण चांगल्या चार पाच  घटिका वामकुक्षी पार पाडल्यानंतर उठताना घड्याळाकडे बघून क्षणभर अपराधी वाटतही, नाही असे नाही.


पण लगेच पाडगावकरांची "खरं सांगतो यात काही पाप नाही.आनंदाने जगायचं नाकारणं यासारखा दुसरा शाप नाही" या ओळी आठवतात. आणि आपणच आपल्या मनाची समजूत घालतो. आणि या तात्पुरत्या अपराधगंडातून बाहेर येतो.


- खरेतर "आयत्यावेळी आपल्या समर्थनार्थ अगदी convincing अशी योग्य ती वाक्ये, योग्य त्या कवितांच्या ओळी सुचणे यासारखे खरे सुख नाही" असे मानणारा, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर. 

Saturday, September 5, 2026

कालचे पालकत्व आणि आजचे पालकत्व : नक्की काय बरोबर ?

साधं LHS = RHS सांगितल्यावर जणू काही या कार्ट्याने 

e = mc(square) चा शोध लावल्यासारखे अत्यंत लाडात येऊन "ब्रेक ले ले यार पार्टनर" म्हणणारी आई,

आणि 

मुलगी डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या करकरून साधं आपलं डोळ्यांच्या अंतर्रचनेचा अभ्यास करत असताना "ब्रेक ले ले यार पार्टनर" म्हणणारे वडील

आमच्यावेळी का नव्हते हो ? आमच्याकाळी आम्हाला पुस्तकाच्या पहिल्या पानावरील प्रतिज्ञेपासून मधल्या सगळ्या पानांवरील धडे, त्यातल्या solved assignments (आणि त्यातले unsolved questions पण त्यांच्या उत्तरांसकट) ते शेवटल्या पानांवरच्या धड्यांपर्यंत जवळपास पाठ असूनसुध्दा (आणि आपला कार्टा असला एकपाठी आहे हे जन्मदात्यांना माहिती असूनसुध्दा), "मेल्या, परीक्षेआधी असा उंडारण्याऐवजी पुन्हा एकदा सगळे पुस्तकातले धडे वाचून काढलेत तर डोळे फुटणार आहेत का तुझे ?" अशी दटावणी आमच्या जन्मदात्यांकडून मिळायची.

पण त्यामुळेच आम्ही tough झालोत. छोट्याशा स्तुतीने हुरळून स्वतःविषयी अवास्तव कल्पना करून न घेता (आणि त्यामुळेच छोट्याशा अपयशाने खचून जाऊन स्वतःचे devaluation करून न घेता) Right Evaluation करायला शिकलोत.

जाहिरातवाले काय हो ? काय वाट्टेल ते सांगतात. पण नुसते LHS = RHS सांगितल्यावर गणितातली मोठ्ठी theory मांडल्याच्या पराक्रमाचे कौतुक करून तुम्ही पाल्याचे over evaluation करुन त्याच्याच पुढल्या आयुष्यात प्रश्न निर्माण करू शकता हे सुजाण पालकांना कळायला हवे.

- "जुने ते सोने" मानणारा आणि तरीही आधुनिक शिक्षणपध्दतीतून उत्तम गोष्टी घेऊन त्यांचे कसोशीने अवलंबन करत असणारा, आपला right evaluator, पंतोजी, रामशास्त्री किन्हीकर. 

Thursday, September 3, 2026

जन्मस्थानं न खलु विमलम

चंद्रपूर माझे जन्मस्थान. आजोळ चंद्रपूर. बालपणापासून माझ्या प्रेमाची सगळी माणसे चंद्रपुरात. परम पूजनीय बापुराव महाराजांच्या परिवारात सामील झाल्यावर परम पूजनीय मायबाई महाराजांच्या मुखातून परम पूजनीय महाराजांचे चंद्रपुरातले वास्तव्य आणि त्यांना चंद्रपूर विषयी वाटणारी आत्मीयता धन्य कानांनी ऐकली होती. 


"चंद्रपूर म्हणजे सत्पुरूषांचे माहेरघर" ही महाराजांची उक्ती मनोमन पटलीही होती.


कृष्णस्वरूप श्री हयग्रीव महाराज.


प.पू. हयग्रीव महाराज समाधी

योगायोगाने पत्नीही चंद्रपूरचीच लाभली. त्यामुळे चंद्रपूरच्या फ़ेर्‍या नियमीत व्हायला लागल्यात. 


चंद्रपूरची भेट म्हणजे ग्रामदैवत महाकाली, जागृत आणि उपेक्षित असलेले तीर्थक्षेत्र अंचलेश्वर, महाराजांचे कुलदैवत असलेली एकवीरा जगदंबा, कृष्णस्वरूप असलेले योगी परम पूजनीय हयग्रीव महाराज, परम पूजनीय निकालस महाराज आणि ज्यामुळे आमचा धार्मिक पिंड घडला ते आजोळी असलेले श्रीलक्ष्मीनृसिंहाचे जागृत देवस्थान यांचे दर्शन अत्यावश्यकच. या सगळ्या ठिकाणांना भेटी देऊन मनाला परम समाधान लाभते. 


चंद्रपुरात घडून येत असलेले बदल पाहून मन सुखावले. या शहराची स्वच्छतेकडे होणारी वाटचाल स्पृहणीय. त्याचबरोबर अंचलेश्वर देवस्थानाकडे होणारे दुर्लक्ष आणि परम पूजनीय हयग्रीव महाराजांच्या समाधीची उपेक्षित अवस्था पाहून मन खिन्न होत असते. भाविकांनी या ठिकाणांकडे आस्थेने लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे.




श्रीक्षेत्र अंचलेश्वर तटबंदी.



श्रीक्षेत्र अंचलेश्वर मंदीर परिसरातली पुरातन बावडी.






आई महाकाली जगदंबा भवानी

Wednesday, September 2, 2026

दहिहंडीचे बदलते स्वरूप आणि आपल्या सगळ्यांचीच परिस्थितीशरणता

पुण्यातल्या गणेशोत्सवातल्या ध्वनीप्रदूषणाबद्दल आणि त्या उत्सवाच्या एकंदरच बदलत चाललेल्या स्वरूपाबद्दल समस्त पुणेकरांनी आवाज उठवायला सुरूवात केलेली ही एक अतिशय चांगली बाब गेल्या आठवड्यात घडलेली आहे. मला वाटतं, सगळ्या मराठी माणसांनी दहिहंडीच्या बदलत चाललेल्या स्वरूपाबद्दल सुद्धा असाच आवाज उठवायला हवा. पण अनेक वर्षांपासून आपण दहिहंडीचे सध्याचे स्वरूप पाहत आल्याने आपण सर्वांनी हेच स्वरूप वास्तव म्हणून स्वीकारलेय की काय ? अशी शंका मला येते. किंवा सध्याचे दहिहंडीचे स्वरूप बरोबर नाही पण आपण काहीही करू शकत नाही अशी परिस्थितीशरणता आपल्यात आलेली आहे की काय ? अशीही शंका माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात येते.


अनेक वर्षांपासून मुंबई ठाण्यात चाललेल्या या अतिशय फालतू चालिरीतीचे खूळ हळूहळू, गेल्या दहा पंधरा वर्षात चाणाक्ष आणि संतुलित समजल्या जाणार्‍या वैदर्भिय जनतेच्या मनात भरवून देण्याची टूम इथल्याही काही काही दिखाऊ, शोबाज राजकारण्यांमधे येत चाललेली पाहून मी अस्वस्थ झालो होतो. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे सुद्धा न ऐकता, "तो एक खेळ आहे" वगैरे भंकस युक्तिवाद करत, सोयीस्कर पळवाट काढून, सर्वपक्षीय राजकारण्यांनी ती दहिहंडी आपल्या बोकांडी मारलेलीच आहे. 


ती जास्तीत जास्त थरांची जीवघेणी स्पर्धा, त्यात ही असली जत्रा भरवून, आपला मोठेपणा दाखवण्यासाठी, भव्य मंच वगैरे उभारून, आपलीच तरूण मतदार मंडळी जखमी होताना, मरताना निर्विकारपणे पाहणारे, मध्ययुगीन राजे सरदारांच्या मानसिकतेचे आपले राजकारणी आणि कोट्यावधी रूपयांच्या लालसेला भुलून आपला आणि आपल्या सहकार्‍यांचा जीव पणाला लावणारी ती भुरटी दहीहंडी मंडळे. हे लोण विदर्भात कधीही नकोय.



विदर्भात गोकुळाष्टमी म्हणजे घरोघरी कान्होबाची मूर्ती आणून अष्टमीच्या रात्री तिची पूजा, रात्री भजन, मध्यरात्री श्रीकृष्णजन्माचा आनंदोत्सव आणि दुस-या दिवशी घरच्या आणि आसपासच्या बाळगोपाळांसाठी छोटीशी दहीहंडी असे स्वरूप असते. दुस-या दिवशी इष्टमित्र, सोयरे धायरे यांच्यासह भोजन करणे असा आनंदी उत्सव असतो.



दहीहंडी उत्सवाचा आत्मा हा असा फार निराळा आहे रे. हे बाजारू स्वरूप म्हणजे दहीहंडी नाही. श्रीमदभागवतात भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सामान्य कुटुंबातील सोबत्यांना, सवंगड्यांना दूध दुभत्याचा लाभ व्हावा, त्यांचीही शरीरे पुष्ट व्हावीत, त्यांना पुरेसे पोषण मिळावे म्हणून दहीदुभत्याच्या हंड्या फ़ोडल्या होत्या. आणि त्यातल्या मेव्याचे वाटप सगळ्यांना केले होते. वनात गुरे राखयाला जाताना श्रीमंत गरीब सगळ्यांनी एकत्र शिदोरी खाताना कुठलीही उच्च नीच भावना मनात सवंगड्यांपैकी कुणाच्याही मनात राहू नये, गरीबाला आपली शिदोरी सगळ्यांसोबत वाटून खाल्ल्याचे समाधान मिळावे म्हणून सगळ्यांच्या शिदोरीचा एकत्र गोपालकाला करून खाल्ला होता. ती भावना आजसुद्धा आपण रोजच्या व्यवहारात जोपासली तर आपल्या आपल्या सामाजिक वर्तुळात नकळतपणे किती समरसता आपोआप साधली जाईल याचा विचार आपण करायला हवा. तो खरा गोपालकाला, तो त्या श्रीकृष्णाचा संदेश. आज दहीहंडी साजरी करताना, गोपालकाला खाताना किती जणांना हे आठवते ?


बाय द वे, उंची वाढवण्यासाठी म्हणून ती क्रेनला बांधलेली दहीहंडी पाहून सूटबूट, गॉगल आणि मोजे घालून देवपूजेला बसणार्‍या बावळट माणसाला पाहिल्यासारख वाटत.

 

काहीही थेरं!


- दरवर्षी उत्सवात दहीहंडी फोडल्यावर त्या हंडीच्या आतले अस्सल सायीचे गोड दही मटकावणारा आणि दोन्ही मुठी भरून गोपालकाला खाणारा, पुराणकालीन कृष्णसखा, पैंदाराम.


Sunday, August 30, 2026

सगुण उपासनेतला साधा सरळ आणि तरीही लोभसवाणा भक्तीभाव

श्रीमदभागवतकारांनी 

"सच्चिदानंदरूपाय, विश्वोत्पत्यादि हेतवे. तापत्रयविनाशाय, श्रीकृष्णाय वयं नुमो." 

असे वर्णन त्या पूर्णब्रम्हाचे केलेले आहे. त्या वर्णनातला 'वयम' हा शब्द श्रीकृष्ण उपासनेचे सामूहिक स्वरूप विशद करतो खरे, पण त्याचबरोबर आपली वैयक्तिक उपासना  आपले त्या परब्रम्हाशी वैयक्तिक नाते दृढ करून भगवंताशी आपले अनुसंधान कायम टिकवायला मदत करील हे नक्की.

आपले आजोबा, पणजोबा नियमितपणे भगवंताची पूजा करीत असत आणि पूजा करताना देवांच्या त्या मूर्तींशी त्यांचा संवादही चालत असे. बर्‍याचदा कृतक कोपाने आपले आजोबा लंगड्या बाळकृष्णाला रागावतही असत. ("राहा न रे सरळ. सारखा गलंडून जातो बेटा" अशी त्या लंगड्या बाळकृष्णाला अभिषेक करता करता तंबी);

किंवा एखाद्या नवसाच्या पूर्ततेसाठी आपली आजी देवाला धमकी देतानाही आपण बघितलेले आहे ("पहा बरं, माझे हे काम झाले नाही ना तर मी उद्यापासून चढत्या उतरत्या वातींचा नेम करणारच नाही" वगैरे)

शांतिब्रम्ह एकनाथ महाराजांच्या "लंगडा ग लंगडा" या गवळणीतही हाच सख्यभाव, देव माझा पुत्र आहे हा भाव जाणवतो.

सगुण उपासनेतून त्या निर्गुण निराकार परब्रम्हाशी अनुसंधान साधणारी ही साधी सरळ  भक्तमंडळी. त्यांचा भक्तीभाव अतिशय लोभसवाणा आणि अनुकरणीय. 



आमच्या गुरूमहाराजांकडे झालेल्या एका श्रीमदभागवतसप्ताहात आम्हा पती पत्नींना "नंदबाबा आणि यशोदामैय्या" होण्याचा योग लाभला. प्रत्यक्ष परब्रम्हाचे मायबाप होण्याचा अतिशय आनंददायक हा प्रसंग.आम्ही खूप मनापासून तो प्रसंग उपभोगला. 

श्री. विवेकजी घळसासींनी आपल्या प्रवचनांमधून सांगितल्याप्रमाणे दररोज सकाळी आपल्या सगळ्यांच्याच घरी (आणि मनातही) असाच नंदोत्सव साजरा व्हावा, दररोज आपण सगळे नंदबाबा, यशोदामैय्या व्हावेत, तो परमात्मा आपल्या घरातील मुलांच्या, नातवंडांच्या रूपाने दररोज आपल्याला भेटावा ही त्याच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना.

- आपला नंदबाबा, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


डबल डेकरच्या शेलमध्ये गरीब रथ : एक अभिनव कल्पना

या फोटोत दाखवलेला शेल आहे "डबल डेकर" एक्सप्रेसचा. ही वातानुकुलीत डबल डेकर एक्सप्रेसची संकल्पना भारतीय रेल्वेत फारशी यशस्वी ठरली नाही. भोपाळ - इंदूर, मुंबई - मडगाव, बंगळूर - चेन्नई, दिल्ली - जयपूर या सर्व मार्गांवर या गाडीला थंड प्रतिसाद मिळतोय.


pic courtesy: My railfan friend Mr. Gaurav Virdi

त्याला "उदय" (UDAY: Utkrisht Double decker Airconditioned Yatri Express) या नव्या नावाची फोडणी देऊनही ही शिळी संकल्पना प्रवाशांच्या पचनी पडली नाही.


लालूप्रसाद यादवांनी, त्यांच्या रेल्वेमंत्रीपदाच्या काळात, गरीब रथ ही एक चांगली संकल्पना आणलेली होती. परवडणार्‍या दरात वातानुकुलीत प्रवास सर्वसामान्य जनतेला भावला होता. एखादा अपवाद वगळता सगळ्याच गरीब रथ गाड्या प्रवाशांमधे सुपर हिट ठरल्या होत्या.


गरीब रथ गाड्यांमधे एका प्रवासी दालनात(bay मधे) मुख्य ३ + ३ बर्थस आणि साईडला पण ३ बर्थस असे ९ बर्थस असायचे. मुख्य बर्थसचा तर तेवढा प्रश्न नाही पण साईडचे ३ बर्थस, त्यांच्या कमी उंचीमुळे, प्रवाशांना अत्यंत गैरसोयीचे ठरत होते. 

मला वाटत, गरीब रथ साठी रेल्वेने हा डबल डेकरचा, जरा जास्त उंचीचा आणि वरच्या बर्थलाही खिडकी असलेला, शेल वापरावा. जास्त उंचीमुळे प्रत्येक बर्थला जरा चांगली जागा मिळेल. साईड बर्थसला पण उंचीची अडचण येणार नाही. एकूण बर्थस पण ९ x ९ = ८१ बसतात.


संसाधने भरपूर आहेत. प्रवासी हितासाठी ते वापरणारा "योजकस्तत्र दुर्लभः"


- कल्पक रेल्वेफॅन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर