आपले परमभक्त असलेल्या पांडवांचे इंद्रप्रस्थ नगर अवलोकन करण्यासाठी म्हणून भगवंत आपल्या सगळ्या पट्टराण्यांसह द्वारकेवरून इंद्रप्रस्थाला गेलेत. भगवंत आपल्या घरी आलेले पाहून पांडवांना अतिशय आनंद झाला. कुंतीला आपल्या या भाच्याला पाहून प्रेमाचे भरते आले. भगवंतांचे आणि त्यांच्यासह आलेल्या त्यांच्या पट्टराण्यांचे सर्व इंद्रप्रस्थवासियांनी मनापासून स्वागत केले, त्यांचा यथोचित आदरसत्कार केला. भगवंतांनी पांडवांना राजसूय यज्ञ करण्याची आज्ञा दिली.
राजसूय यज्ञासाठी यज्ञाश्व सोडला गेला. आसपासच्या राज्यांमध्ये तो यज्ञाश्व सुखेनैव फ़िरून जयपत्रे घेऊन आला पण मगध देशातून मात्र विजय प्राप्त होईना. मगध देशात भगवंतांनी आत्त्तापर्यंत अठरा वेळा पराजित केलेला जरासन्ध राज्य करीत होता. मधल्या काळात त्याची शक्ती इतकी वाढली होती की त्याला समोरासमोर युद्धात पराजित करणे कठीण होऊन बसले होते. तेव्हा उद्धवाने द्वारकेत भगवंताला सांगितलेली युक्ती त्यांनी जरासंधासोबत वापरण्याचे ठरविले. भगवंत स्वतः अर्जुन आणि भीमाला घेऊन मगध नगरीत ब्राह्मण वेषाने गेलेत. जरासंध दुष्ट असला तरी अतिथीधर्म पालन करीत होता. अतिथी म्हणून त्याच्याकडे जायचे आणि त्याला मल्लयुद्धाचे आव्हान द्यायचे असा श्रीकृष्ण आणि पांडवांचा हेतू होता.
जरासंधाने आपल्या धर्माप्रमाणे या अतिथींचे स्वागत केले आणि त्यांना येण्याचा हेतू विचारला. तेव्हा त्या ब्राह्मण वेषातील अतिथींना आपण क्षत्रिय असून आम्हाला आपल्यासोबत मल्लयुद्ध करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. अतिथींनी आपली खरी रूपेही जरासंधासमोर प्रगट केलीत. हा पांडुपुत्र भीम, हा कुंतीसुत अर्जुन आणि मी तुझा जुना विरोधक कृष्ण असे भगवंतांनी सांगताच जरासंधाला हसू फ़ुटले. तो म्हणाला हे कृष्णा, माझ्यासोबतच्या मागील युद्धात तू मथुरेतून पळून द्वारकेत आश्रय घेतलास त्यामुळे तुझ्याशी मी युद्ध करणार नाही. हा अर्जुन वनवासाच्या काळात बृहन्नडेच्या रूपात राहत होता त्यामुळे त्याच्याशी सुद्धा मला मल्लयुद्ध करता येणार नाही. मी भीमसेनाशी मल्लयुद्ध करेन. सगळ्यांची त्याला सहमती मिळाली आणि भीमसेनाचे व जरासंधाचे मल्लयुद्ध सुरू झाले.
सतत अठ्ठावीस दिवस मल्लयुद्ध चालले तरी जरासंधाचा पराभव होईना. भीमसेन हताश झाला तेव्हा भगवंतांनी जरासंधाच्या जन्माचे रहस्य त्याला सांगितले आणि त्याला मल्लयुद्धातच मधोमध चिरून त्याच्या शरीराचे दोन तुकडे करण्याची आज्ञा दिली. दुस-या दिवशीच्या युद्धातच भीमसेनाने भगवंताची आज्ञा प्रमाण मानून जरासंधाचे बरोबर मधून दोन तुकडे केलेत आणि त्याचा वध केला. जरासंधाला जिंकल्याबरोबर पांडवांचा राजसूय यज्ञ पूर्ण झाला. भगवान श्रीकृष्णांनी जरासंधाने बंदिवान करून ठेवलेल्या अनेक राजांना त्याच्या कैदेतून मुक्त केले आणि त्यांचे गतवैभव त्यांना प्राप्त करून दिले. त्या सर्व राजांनी आपल्या उपकारकर्त्या भगवंताची जी स्तुती गायली आहे ती आपण आजही अत्यंत कृतज्ञतेने म्हणतो.
कृष्णाय वासुदेवाय, हरये परमात्मने
प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः
राजसूय यज्ञाची विधिवत सांगता करण्यासाठी पांडवांनी आपल्या इंद्रप्रस्थ नगरीत सर्व ऋषीमुनी आणि विविध देशींच्या राजांना पाचारण केले. सर्व मंडळी अत्यंत आनंदाने तिथे आलीत. त्याप्रसंगी त्य यज्ञाच्या अग्रपूजेचा मान कुणाला द्यायचा यावरून तिथे चर्चा झाली आणि सर्वानुमते हा मान भगवान श्रीकृष्णासारख्या पुरूषोत्त्तमाला मिळायला हवा असा सूर निघू लागला. पण भगवंताचा जन्मोजन्मीचा शत्रू असल्या शिशुपालाला ते पटले नाही. तो भर सभेत भगवंताची निर्भत्सना करू लागला, भगवंताला दूषणे देऊ लागला. शिशुपालाचे शंभर अपराध भरण्याचीच भगवंत वाट बघत होते. ते तसे भरल्याबरोबर भगवंतांनी त्या भर सभेत आपले सुदर्शनचक्र सोडून शिशुपालाचे मस्तक क्षणार्धात धडावेगळे केले. द्वेषभावनेने का होईना भगवंताचा सतत ध्यास घेतलेला असल्याने शिशुपालाच्या देहातली दिव्य ज्योत भगवंतांच्या हृदयात जाऊन विराजमान झाली. त्याला भगवंताच्या हृदयात अक्षय्य स्थान मिळाले. जय आणि विजय या आपल्या पार्षदांच्या अपराधासाठी त्यांचे तीन असुरजन्म हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, रावण आणि कुंभकर्ण व शिशुपाल आणि दंतवक्त्र या स्वरूपात पूर्ण होऊन ते पार्षद आपल्या मूळ सेवेत रूजू झाले होते. पांडवांचा राजसूय यज्ञ यथासांग पार पाडल्यानंतर भगवंत पुन्हा द्वारकानगरीत आलेत.
॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥
- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण द्वादशी / त्रयोदशी शके १९४८ दिनांक १० / ८ / २०२६
१० ऑगस्ट २०२६
