Saturday, June 27, 2026

संत समागम, हरी कथा, तुलसी दुर्लभ दोय

संत समागम, हरी कथा, तुलसी दुर्लभ दोय

सुत, दारा और लक्ष्मी, पापी के भी होय.



वृंदावनात एका विश्राम स्थळाजवळ लिहीलेला हा दोहा. मनुष्य जीवनाचा साकल्याने विचार केला तर त्यातल्या उपदेशाचे महत्व पटेल. आपल्या मानवी जीवनात ख-या संतांचा सहवास, त्यांच्या मुखातून आलेली हरी कथा आणि घरी तुळशीची सेवा या दुर्लभतेने प्राप्त होणा-या गोष्टी आहेत. त्यासाठी विशेष पुरूषार्थ गाजवावा लागतो. जाणीवपूर्वक विशेष पुण्य कमवावे लागते.


त्यामानाने पैसा कमावणे, लग्न करणे आणि मुले बाळे होणे यात विशेष पुरूषार्थ असा गाजवावा लागत नाही. या दोन सांसारिक गोष्टींसाठी जाणीवपूर्वक पुण्य कमवावे लागत नाही. सर्वसामान्य माणसांनाही या गोष्टी मिळतात.


आपल्या भारतीय विचारदर्शनात "धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष" असे चार पुरूषार्थ सांगितलेले आहेत. एखाद्या व्यक्तीने जन्माला येऊन विशेषत्वाने प्राप्त करून घेण्याची गोष्ट म्हणजे पुरूषार्थ. यात "पुरूष" हा शब्द लिंगवाचक नसून समस्त मानव जातीच्या सर्वनामासारखा वापरला आहे हे आपण इथे ध्यानात घेतले पाहिजे.


पण आपण सर्वांची गल्लत कुठे होते माहिती आहे ? आपण आपली शक्ती, आपले ध्येय हे अर्थ प्राप्ती साठी आणि काम प्राप्तीसाठी वापरतो. मधले दोन पुरूषार्थ साधण्यासाठी आपण जन्मभर घडपडत राहतो आणि धर्म व मोक्ष हे आपल्या नशीबावर टाकतो. "असेल नशीब तर मिळेल मोक्ष", "रोजच्या कामांमधून वेळ मिळाला तर करू धर्म" अशी आपली मनोवृत्ती बनत जाते. 


याउलट संत मंडळी, या क्षेत्रातली जाणकार मंडळी पहिला आणि अखेरचा पुरूषार्थ हा विशेषत्वाने प्राप्त करून घेण्याची गोष्ट मानतात. म्हणजे धर्म जपण्यासाठी आणि मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न मनुष्याने केल पाहिजेत यावर त्यांचा भर असतो. तर अर्थ आणि काम यांची प्राप्ती ते प्रारब्ध आणि पूर्वकर्मांवर सोडतात. इथेच संतांमधला आणि आपण सर्वसामान्य प्रापंचिकांमधला मनोवृत्तीतला आणि प्राप्त होणा-या फ़ळांमधला फ़रक आपल्या ध्यानात येतो.


जीवनाचा साकल्याने आणि समग्रपणे विचार केला तर आपल्या लक्षात येईल की या मर्त्य लोकात कितीही अर्थ आणि काम प्राप्ती आपल्याला झाली तरी हा मर्त्य लोक सोडताना त्यातले काहीही आपल्या सोबत येत नाही. उलट यांची प्राप्ती करताना आपण विशेषत्वाने काही वाईट कर्मे केली असतील तर ते ओझे आपल्याला पुढचे अनेक जन्म सोबत घेऊन वावरावे लागते किंबहुना ते ओझे उतरवण्यासाठी पुढले अनेक जन्म घ्यावे लागतात.


याउलट धर्म आणि मोक्ष या दोन पुरूषार्थांच्या प्राप्तीसाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केलेत तर हे पुरूषार्थ आपल्या या जन्म आणि मृत्यूच्या फ़े-यातून कायम मोकळे करण्यासाठी साह्यभूत ठरतात. आता धर्म आणि मोक्ष हे पुरूषार्थ प्राप्त करताना जर अर्थ आणि काम या दोन पुरूषार्थांकडे दुर्लक्ष झालेच तर त्या व्यक्तीला या भौतिक जगातल्या तथाकथित सफ़ल व्यक्तींकडून अपमान आणि उपेक्षा सहन कराव्या लागतीलही बहुतेक पण एकदा धर्म म्हणजे काय़ ? आणि मोक्ष मिळाल्यानंतर मी नक्की काय सुख प्राप्त करून घेणार ? याविषयी मनाची पक्की बैठक झाली की त्या व्यक्तीची मनोवृत्ती "कहा काज संसारसे, मुझे धनी से काम" अशी होऊन जाते. 


अशा परिपक्व विचाराच्या व्यक्ती या जगातला आपला वावर म्हणजे एका मोठ्ठ्या नाटकातमध्ये आपण भूमिका करतोय, विंगेतल्या अंधारातून आलोय आणि नाटकातली आपली भूमिका संपल्यानंतर पुन्हा विंगेतच जायचय. मग या घटकाभराच्या नाटकात आपल्याला राजाची भूमिका मिळाली काय किंवा भिका-याची भूमिका मिळाली काय ? सगळे सारखेच. इथला राजाही घडीभराचाच आणि भिकारीही घडीभराचाच. फ़क्त आपण आपली भूमिका किती ताकदीने सादर करतोय त्यावर आपले इथल्या असण्याचे मूल्यमापन होणार आहे हे ती परिपक्व व्यक्ती पक्की ओळखून असते. म्हणून मिळालेली भूमिका कुठलीही असो त्या सर्वशक्तीमान दिग्दर्शकावार विश्वास ठेऊन ती भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत असते. 


मग बदलायची आपण आपली याबाबतीतली मनोभूमिका ? एका दिवसात हा बदल नक्कीच होणार नाही पण सातत्यपूर्ण प्रयत्नांनी, दृढ विश्वासाने हा बदल एक दिवस आपल्या आयुष्यात नक्कीच येईल. याबाबत अनेक संतांनी आपल्याला ग्वाही दिलेली आहे.


करायची मग सुरूवात, अगदी आज, आत्त्ता ?


- धर्म आणि अध्यात्म मार्गावरचा एक मुमुक्षू, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Wednesday, June 24, 2026

लग्नाचे फ़ोटो की फ़ोटोसाठी लग्न ?

आजकाल लग्नाचे फोटो काढण्यापेक्षा विविध फोटोंसाठी लग्न करतात की काय ? अशी शंका मला यायला लागली आहे.

अरे, तो दिवस, ते क्षण नवरा नवरीच्या आयुष्यातले अत्यंत अलवार असतात रे. त्या चोरट्या नजरा, चोरटे कटाक्ष, एकमेकांचे हळुवार, अल्लाद स्पर्श, त्यातून मनांचे शहारणे, हरखणे. असे ते सगळे क्षण संपूच नयेत असे मनोमन वाटत असते. 

पण आजकाल फोटोग्राफर म्हणतोय म्हणून एकमेकांकडे बघा, स्मितहास्य करा, आनंदी दिसा. अरे आहे ते आनंदी क्षण कॅमेर्‍यात पकडा नं. ते पकडण्याची कला तुमच्यात नाही म्हणून वधूवरांना कृत्रिम आनंदाच्या पोझेस द्यायला सांगताय का ? अतिशय कृत्रिम व अनैसर्गिक दिसतं ते.

आपण सगळ्यांनीच आजकाल घरातले लग्न समारंभ हे लोकांना दाखवण्यासाठी, लोकांच्या अभिप्रायासाठी करणे थांबवले तर कदाचित हे थांबेल. हा त्या नवरा नवरीच्या आणि दोन्हीही कुटुंबांच्या आयुष्यातला परमोच्च आनंद सोहळा असतो. तो आनंद आपल्या आयुष्यभर मनात जपूयात, फोटोग्राफर ला जमले तर काही आनंदी क्षण फोटोत सुध्दा कैद करून ठेवूयात. फोटोग्राफर साठी, त्या फोटोपुरते आनंदी होणे हे काही खरे नव्हे.

- बूर्झ्वा, प्रतिगामी पण खरा आनंद आणि कृत्रिम आनंद यातला फरक कळणारा प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर. 

Tuesday, June 23, 2026

आठवणीतल्या एस. टी. - साधी दिसली तरी अगदी स्पेशल असणारी आपली एस. टी.

१९७० च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत आपल्या महाराष्ट्र एस. टी. ला लाल रंगासोबत पिवळ्या रंगाचा असा गोलाकार वाढत जाणारा आणि बसच्या चाकांवर संपणारा पट्टा असायचा. या प्रकाशचित्रातला बसला जसा पांढरा पट्टा आहे ना तसाच पण पिवळ्या रंगातला. १९९० च्या दशकात आपल्या एस. टी. ने पुन्हा आपल्या काही बसेसवर तसाच प्रयोग करून बघितला होता पण तो अल्पजिवी ठरला होता.






या बसचे वैशिष्ट्य म्हणजे ही बस १९७० च्या दशकातली आहे. खरेतर हे प्रकाशचित्र घेतले तेव्हा या बसचे वय ४६ वर्षे होते. आणि इतकी वर्षे एखादी बस सेवेत ठेवत नाहीत. पण ह्या बसमध्ये वेळोवेळी बदल करून करून तिच्या एंजिनामध्ये वारंवार मॉडिफ़िकेशन करून ही बस आपल्या एस. टी. ने वापरात ठेवलेली आहे. खरेतर ही बस TATA 1210 D मॉडेलची. या मॉडेलचे समोरचे काऊल असे असायचे. 

टाटा 1210 D मॉडेलचे समोरचे काऊल

मूळ  टाटा 1210 D मॉडेलला टाटा 1210 E मॉडेलचे काऊल लावलेली बस.


पण एस. टी. ने त्या काऊलमध्ये बदल करून तिला TATA 1210 E मॉडेलचे काऊल बसविलेले होते. ड्रायव्हर साहेबांसमोरची विंडशिल्ड सुद्धा बदलून नव्या प्रकारची लावलेली होती. 


आधुनिक बांधणीच्या बसेसनुसार एस. टी. ने या बसला टपावर दोन्ही बाजूला छोटे लाईटस दिलेले होते. अर्थात मूळ गाडीला असे लाईटस असणे शक्यच नव्हते. तेव्हा ती पद्धतच नव्हती. 


पण या गाडीचे मूळ टेल लाईटस मात्र तसेच्या तसेच ठेवलेले होते. इतक्या बदलांमध्ये तेव्हढीच आपली मूळ गाडीची आठवण कारण TATA 1210 D  आणि सुरूवातीच्या काळातल्या TATA 1210 E मॉडेल्सना छोटेसेच टेल लाईटस असायचेत.









मोठ्ठे, धब्बाडे टेल लाईटस साधारण १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात बसेसमध्ये आलेत. तोवर असे छोटेसेच टेल लाईटस. त्या जुन्या टेल लाईटसमध्ये टेल लाईट, ब्रेक लाईट आणि इंडिकेटर लाईट असायचेत. आजच्यासारखे रिव्हर्स मूव्हमेंट लाईटस नसायचेत. तितकी वाहतूक नव्हती त्यामुळे तशी तितकीशी गरज भासत नसेल. यातल्या इंडिकेटर लाईटसचा तरी किती वापर त्याकाळी होत असेल याबद्दल मला शंकाच आहे. वळायचे असले तर ड्रायव्हर साहेब आपला हात खिडकीबाहेर काढून तसा इशारा करायचेत किंवा त्यांच्या बाजूला एक लोखंडी इंडिकेटर आर्म असायचा. तो तसा इंडिकेटर आर्म मी १९९० च्या दशकात मुंबईत बेस्ट बसेसमध्ये बघितलेला आहे.


माझ्या माहितीप्रमाणे ही बस मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी इथे बांधल्या गेलेली होती. हिची प्रवासी सेवा वर्षे संपल्यानंतर  मग मध्यवर्ती कार्यशाळा नागपूरने या बसमध्ये बरेच बदल केलेत. दापोडीवाले आपल्या बसेसना पुढच्या बाजूला एक वैशिष्ट्यपूर्ण गोलाकार असा डोम द्यायचेत. त्या डोममध्ये बसचा मार्गफ़लक असायचा. चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर कार्यशाळा ही दापोडीनंतर सुरू झाली पण त्यांनी दापोडीवाल्यांच्या डोम आकाराऐवजी समोर चपटा आकार द्यायला सुरूवात केली आणि नागपूरच्या कार्यशाळेने दापोडीचा कित्ता गिरवण्याऐवजी चिकलठाणा वाल्यांचाच कित्ता गिरवीत चपट्या आकाराचे दर्शनी भाग आपापल्या गाड्यांना द्यायला सुरूवात केली होती.


ही बस एस. टी. ने आपल्या विभागीय कार्यांसाठी विशेष तयार करून जपलेली होती. आणि म्हणूनच साधी दिसत असली तरी ही बस अगदी खास, अगदी विशेष होती. 

 


MHO 5483 


TATA 1210 D


मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी ने बांधलेली साधी बस. मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर येथे पुनर्बांधणी झालेली बस.


नागपूर विभागीय कार्यशाळेच्या तैनातीत असलेली मालवाहक बस.


@ खडकी हनुमान मंदीर


११/ ६ / २०१६. 


Sunday, June 21, 2026

ब्लॉगच्या वाचकसंख्येचा आणि अगदी अनपेक्षित ठिकाणांहून मिळालेल्या वाचकांचा आनंदोत्सव.

गेल्या काही दिवसात वाचकांच्या प्रेमामुळे आणि परमेश्वरी कृपेमुळे ब्लॉगच्या वाचकसंख्येत भरघोस वाढ झालेली आहे हे लक्षात आले. आज सहज त्या वाचकसंख्येच्या विश्लेषणात जरा खोलवर गेलो आणि अचंबा वाटला.



भारतात, सिंगापूरमध्ये, जपानमध्ये, नेदरलॅंडस मध्ये, अमेरिकेमध्ये नातेवाईक, मित्र, परिचित आहेत म्हणून तिथून माझ्या ब्लॉगला वाचक मिळतात हे मी समजू शकतो. पण भारतापेक्षा किंवा उपरोल्लिखित ठिकाणांपेक्षाही फ़ार जास्त वाचनसंख्या ही ब्राझिल आणि व्हिएतनाममधून आहे हे बघून मला आश्चर्य वाटले. हे देश, जगाचा हा भाग माझे लिखाण वाचत असेल अशी मी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती.


अर्थात या ठिकाणी जाऊन तिथे स्वतःला सुस्थापित करून माझा ब्लॉग वाचणा-या मराठी वाचक जनांचा मी मनःपूर्वक आभारी आहे. असाच लोभ असू द्यात मंडळी.


- आवड, छंद आणि अभिव्यक्त व्हायचं म्हणून ब्लॉग सुरू केलेला आणि अत्यंत निष्काम वृत्तीने लेखन करीत गेलेला एक सर्वसामान्य साहित्य, संगीत कलाप्रेमी प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Saturday, June 20, 2026

एका व्यक्तिमत्वाचा प्रवास: काही चिंतनक्षण

"राखावी बहुतांची अंतरे" या नीतीने नेमस्तपणे पापभीरू जीवन जगत आल्यानंतर

सज्जन माणसाच्या आयुष्यात एकवेळ अशी येते


की आता कुणालाही कसलेही explaination द्यावेसे वाटत नाही.


त्या माणसाविषयी कसलेही गैरसमज बाहेर पसरले असोत तो माणूस त्या गैरसमजाबाबत अत्यंत उदासीन असतो. एकेकाळी आपल्याबाबत गैरसमज होऊच नयेत म्हणून कायम धडपडणारा तो माणूस, कायम स्वतःचे मन मोडून जगणारा तो माणूस आता स्वतःविषयीच्या वंदता, गैरसमज कानावर आलेत तरीही कसलीच पर्वा करीत नाही.

 

कुणालाही कसलेही स्पष्टीकरण द्यायला आपण बांधील नाही इतका तो मुक्त होतो.


त्याचे असे हे मुक्त होणे त्याच्या स्वतःसाठी चांगले असले तरी आसपासच्या वावरणा-यांचे यात नुकसान होते. ते तसे होऊ नये म्हणून त्या सज्जन व्यक्तीने आजवर प्रयत्न केलेले असतात पण नंतर त्याचाही नाईलाज होतो. आणि गंमत म्हणजे हे असे नुकसान होतेय हे ज्यांचे नुकसान होतेय त्यांनाही कळत नसते किंवा कळले तरी वळून घ्यायचे नसते.


स्वतः स्वतःच्याच आयुष्यात जबाबदारीने वागलो, स्वतः स्वतःलाच उत्तरदायी असलो की तेवढे पुरेसे आहे. आपण चुकीचे कधीच वागलेलो नाही आणि आजवरच्या जीवनाचा विचार केला तर कधी वागणारही नाही एवढा विश्वास स्वतःचा स्वतःवर असला की पुरे. इतके स्व स्वातंत्र्य मनातून मिळवले की झाले.


आता या वृत्तीला कुणी उच्छृंखल म्हणोत, कुणी बेफाम म्हणोत, कुणी स्वार्थी म्हणोत पण ...

त्यावरचे उत्तर वाचायला पुन्हा पहिल्या ओळीपासून वाचा.

- "की फर्क पैंदा" या अत्यंत स्वातंत्र्य उदगाराचा मनापासून आनंद घेणारा मुक्त आणि मस्त प्रवासी पक्षी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Wednesday, June 17, 2026

"त्रिज" बस.

दोनवेळा जन्म झालेल्या माणसाला "द्विज" असे म्हणतात. मौंजीबंधनाचा संस्कार एखाद्या बालकावर झाल्यानंतर तो पूर्वीचे अवखळ बाल्य त्यागून विद्यार्थीदशेतल्या गांभीर्यपूर्ण आणि विद्वत्तेच्या जगात नवा जन्म घेतो म्हणून मौंजीबंधनानंतर तो "द्विज."

आजकालच्या युगात ही संज्ञा लागू नाही. मौंजीबंधनानंतर गायत्रीची धड एक माळसुध्दा न करणार्‍यांना "द्विज" म्हणून संबोधायला जीभ रेटत नाही. मुळात मौंजीबंधन हा एक "संस्कार" आहे हेच आपण विसरलोय. आपण सार्‍यांनीच तो एक समारंभ करून टाकलाय.


याला काही सन्माननीय अपवाद आहेत. बहुतांशी महाराष्ट्राबाहेरच. इंदूरला याच महिन्यात दरवर्षी एक अत्यंत आगळावेगळा आणि अत्यंत समाजोपयोगी असा साधा आणि नेटका समारंभ तिथली मराठी मंडळी करीत असतात, महाराष्ट्रात असे एकटे दुकटे प्रयत्न होत असतात. पण आजकालच्या जगात एकूणच "द्विज" विरळा.

मुद्दा तो नाहीच. दोनवेळा जन्म झालेला "द्विज" मग तीनवेळा जन्म झालेल्या आमच्या या एस टी ला "त्रिज" का म्हणू नये ? हा सवाल आहे

.


साधारण १२ - १३ वर्षांपूर्वी आपल्या एस टी ने आपल्या ताफ्यातल्या निम आराम "हिरकणी" बसेस बाहेरून रेडिमेड बांधून घेण्याचा निर्णय घेतला होता. गोव्याचे ए.सी.जी.एल. (Automobile Corporation of Goa Limited) आणि पनवेलच्या अॅण्टोनी गॅरेज इथे या निम आराम बसेस बांधल्या गेल्यात.


गोव्यात बांधलेल्या बसेस आपल्या एस टी ने सिंधुदुर्ग विभागात (MH -07/ C 7XXX आणि MH 07 / C 9XXX) अशा सिरिजमध्ये पासिंग केल्यात तर अॅण्टोनी गॅरेजमध्ये बांधलेल्या बसेस रायगडच्या (MH 06 / S 8XXX) सिरीजमध्ये पासिंग केल्यात.


हा या बसचा पहिला जन्म.

  

निम आराम म्हणून ५ - ६ वर्षे सेवा दिल्यानंतर एस टी च्या नियमानुसार या बसचे रूपांतर साध्या परिवर्तन बसमध्ये झाले. एस टी च्या विभागीय कार्यशाळांनी किंवा क्वचितप्रसंगी मध्यवर्ती कार्यशाळांनी या निम आराम बसचे रूपांतर साध्या परिवर्तन बसमध्ये केले. हा या बसचा दुसरा जन्म.


मधल्या काळात एस टी ने आपला सगळा ताफा अॅल्युमिनीयम मध्ये न बांधता पोलादामध्ये (Mild Steel) बांधण्याचे ठरवले, तेव्हा मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूर ने या बसचे रूपांतर पोलादी बसमध्ये केले. हा या बसचा तिसरा जन्म.

म्हणून ही बस "त्रिज" झाली की नाही ? बिचारी आता आपल्या आयुष्याचे अखेरचे उरलेले काही महिने मोजतेय आणि अजूनही प्रवाशांच्या सेवेत तत्पर आहे.


MH 06 / S 8085

TATA 1510 Cummins.

BS III

Originally built by Antony Garage Panvel.

Re body built by मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूर.

समुद्रपूर साधारण सेवा वर्धा.

 (मार्गे तरोडा - सेवाग्राम)

२ X २ परिवर्तन बस.

एकूण आसने ४४.

व. वर्धा आगार

वर्धा आगार, वर्धा विभाग


- बसेसना माणसांसारखेच समजून त्यांच्याबाबत व्युत्पत्ती सुचणारा एक बसप्रेमी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर

Sunday, June 14, 2026

स्वतःवरील एका प्रयोगाविषयी

यावर्षी जानेवारी महिन्याच्या लिखाणात नवीन वर्षात करायचे संकल्प आणि प्रेरणा याविषयी मी सविस्तर लेखन केले होते. जेम्स क्लियर च्या ॲटोमिक हॅबिटस या पुस्तकात दिल्याप्रमाणे आपण आपल्या स्वतःमध्येच रोज जर फ़क्त १ % ची भर घातली तर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व किती उन्नत होईल याविषयी विवेचन केलेले होते. आदर्शवाद बाळगून आपण जर रोज अशी भर आपल्या व्यक्तिमत्वात घालत गेलोत तर. पण रोजच्या कामाच्या धबडग्यात आणि मनुष्य मात्रांना प्राप्त झालेल्या आळस, क्रोध, मत्सर इत्यादि षडरिपुंचा सामना करत करत आपण किती निष्ठेने हा आदर्शवाद सांभाळू शकतो ? याविषयी शंका सुद्धा उपस्थित केलेली होती. आणि नुसती शंकाच नाही तर त्यावर मात करून किती सकारात्मक विचाराने पुढे जावे याचेही मार्गदर्शन मी या लेखात केलेले होते.


पण मनात विचार आला की नुसता उपदेश कशाला ? आपणच या सकारात्मकतेने स्वतः आधी जगून बघूयात. आणि सुरूवात झाली आपलाच उपदेश जगून बघण्याची.


एका एक्सेल शीटवर तारखा लिहील्यात. रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण दिवसभराचा आढावा घ्यायचा. संपूर्ण दिवसभरात जर आपण आपल्या वागण्यात, मनोवृत्तीत, जगण्यात कालपेक्षा आज काही प्रगती केली असेल तर त्या दिवसाला तो जेम्स क्लियरचा फ़ॉर्म्युला वापरून आपले मूल्यांकन करायचे. 1.01x. 


आणि जर कालपेक्षा आज आपली काहीच प्रगती झालेली नसेल किंबहुना थोडी अधोगतीही झाली असेल, आपण कुठेतरी चिडलो, रागावलो असू, अकारण वाद केलेला असेल, कुणाला काही लागेल असे बोललो असेल तर आपल्याला त्या जेम्स क्लियरच्या फ़ॉर्म्युलाप्रमाणेच 0.99‌x . स्वतःशी अत्यंत प्रामाणिक राहून हे मूल्यमापन करायचे. आदर्श जगणे हे सगळ्यांनाच शक्य नसते तरीही त्या मार्गावरचा प्रवास सर्वथा टाळायचा नसतो, या शहाणपणाच्या विचाराने मी हा प्रयोग सुरू केला.




आज जवळपास अर्धे वर्ष उलटत आलेले आहे. मी थोडा संख्याशास्त्रामध्ये रमणारा माणूस असल्याने आज मी सहज गेल्या १६४ दिवसांमध्ये मी जेम्स क्लियर ने सुचवलेल्या आदर्श मार्गावर जर चाललो असतो तर आज कुठे असतो आणि रोजच्या माझ्या मूल्यमापनानंतर आज कुठे आहे ? याचा तौलनिक अभ्यास केला. तसे ग्राफ़्स काढलेत.



मग लक्षात आले की आदर्शवादाला अगदी चिकटून आपण जरी प्रगती करू शकलो नाही आणि कभी खुशी, कभी गम अशा रोजच्या वास्तविक जीवनात आपण जगलोत तरी आपला फ़ारसा तोटा झालेला नाही. अगदी उणे बाजूला तो ग्राफ़ गेलेला नाही. उलट आदर्शापेक्षा थोडी कमी का होईना, आपली प्रगतीच झालेली आहे. आणि आता तो ग्राफ़ पण अगदी एक्स्पोनेन्शियल पद्धतीने वर वर जातोय. यात गेल्या १६४ दिवसांमध्ये एखाद्या दिवशी अगदी आदर्श जीवन जगता आले नाही तरी उद्या तसे जगण्याचा आपला आग्रह मुख्यतः कारणीभूत आहे असे लक्षात आले. एखाद्या वाईट दिवसाच्या अनुभवानंतर चांगल्या दिवसाची वाट बघणेच आपण विसरायला नको हा अट्टाहास, हा सकारात्मक दृष्टीकोन कारणीभूत आहे हे लक्षात आले.


मग रहायचे असे सकारात्मक ? उद्यापासून आपल्या वर्षात बरोबर २०१ दिवस राहिलेत. आजवर १६४ दिवसांमध्ये जे झाले नाही ते उरलेल्या २०१ दिवसांमध्ये करायचा संकल्प करायचा ? मध्ये मध्ये अडथळे येतील, अगदी आदर्श जीवन एखाद्या दिवशी जगू शकणार नाही हे सुद्धा खरे. अशावेळी आपणच आपल्याला माफ़ करीत उद्याचा दिवस तरी आजच्यापेक्षा छान जाईल या दुर्दम्य आशावादाने जगले पाहिजे. जगता आले पाहिजे. हीच खरी जीवनातली प्रगती.


प्रगती म्हणजे सगळ्या गोष्टी अगदी आदर्शवत असणे नव्हे तर अनेकदा आदर्शांमध्ये अडथळे येऊनही त्यावर मात करू शकतो, आज नाही तर उद्या आदर्श जगू शकतो ही आशावादी मनोवृत्ती सतत बाळगणे.


काय म्हणताय या माझ्या प्रयोगाविषयी ?


- विनोबांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःच्या जीवनावर अनेक प्रगतीशील, आशावादी प्रयोग करून बघणारा धडपड्या आणि आनंदी मनुक्ष, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.