Monday, July 6, 2026

श्रीमदभागवत चिंतन - ६ धुंधुकारीची मुक्ती

श्रीमदभागवत या ग्रंथ पठनाने, श्रवणाने किंवा नुसत्या मननानेही सर्व मनुष्य मात्रांना अत्यंत शुद्ध, विमल आणि जीवनाचे सत्य उलगडून सांगणारे ज्ञान प्राप्त होते हे आपण श्रीमदभागवताच्या फ़लश्रृतीत बघितले. केवळ सर्वसामान्य मनुष्यच नाही तर जीवनभर केलेल्या अनेक चुकीच्या कर्मांमुळे मरणानंतर प्रेत योनीसारखी अत्यंत हीन योनी पावलेल्या धुंधुकारी्ला सुद्धा या ग्रंथ श्रवणाने प्राप्त कशी झाली हे आपण थोडक्यात बघू आणि त्याचा आपल्यासाठी काय संदेश आहे यावर आजचे चिंतन करू.



आत्मदेव आणि धुंधुली या दांपत्याला पुत्रप्राप्तीसाठी प्राप्त झालेल्या वराची धुंधुली आपल्या तामसी स्वभावामुळे अवहेलना करते आणि त्यामुळे तिच्या पोटी जन्मणारा अत्यंत सात्विक पुत्र, गोकर्ण, दुस-याच कुणाच्या तरी पोटी जन्म घेतो. इकडे धुंधुली ही आपल्या सख्ख्या बहिणीच्या अत्यंत चुकीच्या कर्मांमधून उत्पन्न झालेल्या पुत्राला, धुंधुकारीला दत्तक घेते.


काळाच्या ओघात आत्मदेव आणि धुंधुली दोघेही देहातून पंचत्व पावतात. अत्यंत तामसी कृत्यातून जन्म झालेला असल्याने धुंधुकारी हा आपल्या बेताल आणि अत्यंत उच्छृंखल वागण्याने जिवंतपणीच आपल्या मायबापांना मरणप्राय वेदना देतो. आणि मायबापांच्या मृत्यूनंतर तर मग त्याला कसलाही धरबंध उरत नाही. खाओ, पियो और ऐश करो याचा तो अगदी अतिरेक करतो. आपली वर्णाश्रमकर्मे, कर्तव्यकर्मे सगळी तो अगदी खुंटीवर टांगून ठेवतो.


त्याच्या या अत्यंत बेबंद, बेताल आणि उच्छृंखल वागण्यामुळे तो सुद्धा अत्यंत वाईट परिस्थितीत पंचत्व पावतो आणि जीवनभर नको नको ती पापकर्मे केल्यामुळे प्रेतयोनीला प्राप्त होतो आणि तिथे गेल्यानंतर मात्र त्याला पश्चाताप होतो. आपण मनुष्य योनीत असताना काय करायला हवे होते आणि काय करायला नको होते याची जाणीव त्याला प्रेत योनीत होते आणि आता आपण यातून बाहेर पडून ईश्वरी रूपाला कसे प्राप्त होऊ याची खरी तळमळ त्या धुंधुकारीला लागते.



याउलट अत्यंत सात्विक प्रसादामुळे जन्म घेतलेला सात्विक वृत्तीचा गोकर्ण आपल्या या अशा दुराचारी आणि त्यामुळे आता प्रेत योनीला प्राप्त झालेल्या भावाचे श्राद्धादि कर्म गयेसारख्या पवित्र ठिकाणी जाऊन करतो पण गावी परतल्यावर त्याला कळते की इअतक्या पवित्र ठिकाणी यथासांग श्राद्धादि कर्मे करूनही आपल्या भावाला प्रेत योनीतून मुक्ती मिळालेली नाही. मग गावातल्या इतर जाणकार लोकांच्या सल्ल्याने, आपल्या वैयक्तिक उपासनेने तो ही समस्या कशी सोडवायची याचे ज्ञान प्राप्त करून घेतो आणि घरी श्रीमदभागवत सप्ताहाला प्रारंभ करतो.


मनुष्यजन्मात असताना केलेल्या आपल्या कर्मांचा पश्चाताप झालेला आणि आता प्रेत योनीतून बाहेर पडण्याची तळमळ असलेला तो धुंधुकारी सुद्धा सप्ताह श्रवण करण्यासाठी सप्ताहस्थळी येतो. प्रेतयोनीत असलेल्या वायुरूप धुंधुकारीला सप्ताहस्थळी इतरत्र कुठेही न बसता आल्याने तो बसण्यासाठी सात गाठी असलेला एक बांबू निवडतो आणि त्याच्या सगळ्यात खालच्या गाठीत प्रवेश करून कार्यक्रमस्थळी सुरू असलेल्या श्रीमदभागवताचे अत्यंत भक्तीभावाने श्रवण करू लागतो. दरदिवशीचे श्रवण संपले की त्या बांबूची एक एक गाठ फ़ूटत जाते आणि श्रीमदभागवत सप्ताहाच्या सातव्या दिवशी सातही गाठी फ़ुटून धुंधुकारी हा प्रेतयोनीतून मुक्त होतो. त्याला विष्णुलोकात नेण्यासाठी श्रीविष्णुंचे दूत येतात आणि तिथे श्रीमदभागवत सप्ताह श्रवण करण्यासाठी असलेल्या इतर जनांना मोठा विस्मय होतो आणि आनंदही होतो. स्वतःच्या जीवनभर केवळ पापकर्मे केलेल्या इतक्या अनाधिकारी आणि आता प्रेतयोनीत असलेल्या जीवाला विष्णुलोक कसा प्राप्त झाला यावर ते सगळे चिंतन करतात आणि त्यांच्या लक्षात येते की धुंधुकारीने जसा श्रीमदभागवत सप्ताह स्वतःची आसनसिद्धी साधून, एकाग्र मनाने आणि ख-या तळमळीने श्रवण केला तसाच आपण सर्वांनी करायला हवा होता.


आज आपण विचार केला तर आजच्या युगात आपण सगळेच धुंधुकारी झालेलो आहोत. खा, प्या, मौज करा. उद्या कुणी बघितला ? देव, दानव या सगळ्या कल्पना आहेत. समोर दिसतेय, प्रत्ययाला येतेय तेच विश्व खरे या समजुतीत आपण वावरत आहोत. पाप आणि पुण्याच्या आपल्या कल्पनांना सुद्धा आपण आपल्या सोयीप्रमाणे आपल्याला भावेल ते स्वरूप दिलेय. आपली शास्त्रे, धर्मग्रंथ याबाबतीत काय म्हणताहेत याकडे थोडेसुद्धा लक्ष द्यायला आपल्याला वेळ नाही. रोजचे जीवन जगण्याचा संघर्ष आपण आपलाच फ़ार मोठा आणि अकारण क्लिष्ट करून ठेवलाय. अशात मृत्यूश्चात आपली अवस्था धुंधुकारीसारखीच होणार हे निश्चित आहे. आपल्याला हे कदाचित कळतेय पण त्यावर "शोधू ऐनवेळी उपाय" अशा वृत्तीने आपण आज दुर्लक्ष करतोय.


धुंधुकारीला त्या अवस्थेतून बाहेर काढायला त्याकाळी गोकर्णासारखा अधिकारी, धर्म जाणणारा आणि सात्विक भाऊ होता. त्याने आपल्या भावाच्या मुक्तीसाठी प्रयत्न केलेत. आपल्याला जर अशी प्रेत योनी प्राप्त झाली तर त्यातून आपली सुटका करणारा आजच्या युगात गोकर्ण कुणीही नाही. आपल्या मागेपुढे सगळेच धुंधुकारी. सगळेच त्या प्रेतयोनीत येणार. 


मग मरणोपरांत चांगल्या गतीसाठी, आपल्या मुक्तीसाठी, आपल्यालाही विष्णुलोक प्राप्त करून देण्यासाठी या कलियुगात उत्तम उपाय म्हणजे श्रीमदभागवत कथा. मग ही कथा कशी श्रवण करायची ? ही कथा श्रवण करताना धुंधुकारीसारखी आपली आसनसिद्धी साधल्या गेली पाहिजे. दररोज एका आसनावर, एका विशिष्ट वेळी ही साधना झाली पाहिजे. आजच्या आधुनिक युगात आपले मॅनेजमेंट गुरू मंडळी आपल्याला "Time and Place Habit" सांगतात ती हीच. श्रीमदभागवत श्रवण मननाची विशिष्ट वेळ, विशिष्ट जागा याबाबत आपण आपल्या मनातूनच आग्रही असायला हवे आणि तशी शिस्त लागायला हवी.


धुंधुकारीला त्या प्रेतयोनीतून बाहेर येण्यासाठी जशी तळमळ लागली होती तशी आपल्याला आपल्या सध्याच्या भौतिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्थितीतून बाहेर येण्यासाठी तळमळ लागायला हवी. श्रीमदभागवतात विशद केलेले विशुद्ध ज्ञान जाणून घेण्याची तळमळ लागायला हवी. आणि हेच श्रवण, पठन आणि मनन आपल्याला सध्याच्या स्थितीतून अधिक उन्नत करेल याबाबत मनात अगदी दृढ विश्वास असायला हवा. तरच आपण श्रीमदभागवत सप्ताहाच्या फ़ळांचे अधिकारी बनू.



यात आणखी एक दृष्टीकोन आहे. सध्या पृथीतलावरील ज्या व्यक्तींना त्यांच्या सध्याचा सामाजिक, आर्थिक किंवा मानसिक स्थितीमुळे श्रीमदभागवत श्रवणाचा लाभ मिळत नाही, अशा व्यक्तींना जाणून त्यांना आपण आवर्जून श्रीमदभागवत कथेच्या श्रवणाचा लाभ करून द्यायला हवा. याबाबत आपण धुंधुकारीच्या भावाची, गोकर्णाची भूमिका बजावायला हवी. जी मंडळी सात्विक आचरणाची आहेत ती सगळी तर या श्रीमदभागवत श्रवणाचा, मननाचा आस्वाद घेतीलच पण या जगाच्या बाह्यरूपातच अडकलेल्या अत्यंत अनाधिकारी व्यक्तीने हे श्रीमदभागवत श्रवण करणे खूप आवश्यक आहे हे आपल्यातल्या सगळ्या सज्जन सात्विक गोकर्णांनी जाणले पाहिजे आणि तशी तजवीज केली पाहिजे.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" ज्येष्ठ वद्य षष्ठी शके १९४८ दिनांक ६  / ७ / २०२६


६ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६

Sunday, July 5, 2026

श्रीमदभागवत चिंतन - ५ तक्षकासमान संसारसर्प

कस्मै येन विभासितोऽयमतुलो 

ज्ञानप्रदीपः पुरा

तद्रूपेण च नारदाय मुनये 

कृष्णाय तद्रूपिणा ।


योगीन्द्राय तदात्मनाथ 

भगवद्राताय कारुण्यतत

तत शुद्धं विमलं विशोकम अमृतं 

सत्यं परं धीमहि ॥



श्रीमदभागवताच्या फ़लश्रृतीच्या श्लोकांमध्ये या श्रीमदभागवतरूपी ज्ञानगंगेचा प्रवास कसा झाला याचे वर्णन केलेले आहे. प्रत्यक्ष भगवंता कडून प्रगट झालेल्या या ज्ञानज्योतीने सृष्टीकर्ता ब्रह्माजींच्या हृदयात ज्ञानाचा दीप लावला. ब्रह्माजींनी ते ज्ञान देवर्षी नारदांना दिले त्यांनी ते कृष्ण द्वैपायन महर्षी वेदव्यासांना दिले आणि देवव्यासांनी ते ज्ञान आपला अत्यंत अधिकारी पुत्र असलेल्या श्रीशुकदेवांना दिले. श्रीशुकदेवजी महाराजांनी ते अत्यंत शुद्ध, विमल, शोकाचा नाश करणारे आणि अमृतमय ज्ञान विष्णुराताला (राजा परिक्षितीला) दिले.


राजा परिक्षितीला ’विष्णुरात’ हे नामाभिधान प्राप्त होण्यामागे त्याच्या जन्माची कथा कारणीभूत आहे. अर्जुनपुत्र अभिमन्यू महाभारत युद्धात चक्रव्यूहात मारला गेला तेव्हा त्याच्या पत्नीच्या, उत्तरेच्या गर्भात अभिमन्यूचा वंश वाढत होता. महाभारत युद्धाअखेरी कौरवांच्या पराभवाने संतप्त झालेल्या अश्वत्थाम्याने पांडवकुलाच्या समूळ नाशासाठी अविचाराने ब्रह्मास्त्र सोडले. त्यावेळी उत्तरेच्या गर्भातल्या बाळाला त्या ब्रह्मास्त्रामुळे इजा होऊ नये म्हणून प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने त्या गर्भात सूक्ष्म रूपाने जाऊन त्या बाळाचे रक्षण केले. परिक्षिती राजाला त्याच्या जन्मापूर्वीच प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन झाले होते. तो भगवंत आहे याचे ज्ञान मात्र त्याला तेव्हा नव्हते.



परिक्षिती राजाने या पृथ्वीतलावर जन्म घेतल्यानंतर अत्यंत उपकारबुद्धीने आपल्या रक्षणकर्त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. जगातल्या प्रत्येक व्यक्तीकडे "हा तर आपला रक्षणकर्ता नव्हता ना ?" असे त्याने परिक्षाबुद्धीने बघायला सुरूवात केली म्हणून त्याचे नाव ’परिक्षिती’ आणि प्रत्यक्ष भगवान विष्णुंनी त्याला रक्षण केलेला, या जगात राखलेला आहे म्हणून तो ’विष्णुरा्ख’ किंवा ’विष्णुरात’.


याआधीच्या लेखात विवेचन केल्याप्रमाणे या ग्रंथांवर, यातला उपदेशांवर आपण अत्यंत प्रगाढ असा दृढ विश्वास ठेवलाच पाहिजे कारण लोकोपकारासाठी, लोकांचे भले व्हावे या एकाच हेतूने या ग्रंथांची रचना आपल्या ऋषीमुनींनी केलेली होती. त्यात त्यांना वित्तेषणा, कामेषणा किंवा लोकेषणा तिळमात्रही नव्हती. हे सगळे आजच्या युगाचे गुणधर्म आहेत. त्यामुळे आपण सर्वसामान्य साधकांनी भाविकांनी अशा प्रकारे भगवंताच्या हृदयातून प्रगट होऊन परिक्षिती राजापर्यंत आलेल्या या ज्ञानगंगेत अक्षरशः बुडून जायला हवे कारण हेच ज्ञान आपल्याला आपल्या जीवनात तारून नेणार आहे याबाबत अजिबात शंका नाही. श्रीमदभागवतरूपी हे सत्य आपण अगदी उत्कटपणे आणि कायम आपल्या ध्येयपथावर मार्गदर्शक म्हणून ठेवावे.



यानंतर भगवंताकडे जी याचना केलेली आहे ती मोठी विलोभनीय आहे. आपल्या सारख्या सर्वसामान्य संसारी जनांनी ही प्रार्थना कायम आणि वारंवार करीत रहायला हवी. 


योगीन्द्राय नमस्तस्मै शुकाय ब्रह्मरूपिणे।

संसारसर्पदष्टं यो विष्णुरातममूमुचत्।।


योगीराज भगवान कृष्णाला आणि प्रत्यक्ष ब्रह्मरूप झालेल्या श्रीशुकदेवांना वंदन करून वेदव्यास प्रार्थना करतात की आपण तक्षकदंश होणा-या विष्णुराताला ज्याप्रमाणे तारले त्याचप्रमाणे या संसाररूपी सर्पाच्या दंशाने वेळोवेळी विव्हळ होणा-या मलासुद्धा तारावे.


काय गंमत आहे पहा. या संसारात आपल्या विषयांच्या तृष्णेमुळे आपल्याला कायम कायिक आणि मानसिक दुःखे भोगावी लागतात. तरीही सवयीने आपल्याला हा संसार हवाहवासा वाटतो. तक्षकाचा दंश राजा परिक्षितीला फ़क्त एकदाच होणार होता पण आपण सर्वांना हा संसारसर्प जवळजवळ रोजच दंश करीत असतो पण तरीही आपल्याला हा संसार हवाहवासा वाटतो, हा संसार सोडताना अपार दुःख होते. श्रीगजाननविजय ग्रंथात संतश्रेष्ठ श्रीगजानन महाराज भक्तांना उपदेश करताना म्हणतात त्याप्रमाणे 


पहा जगाची रीत कैसी । अवघेच इच्छिती संसारासी ।

सच्चिदानंद श्रीहरीसी । पहाण्या न कोणी तयार ॥


सर्वसामान्य सांसारिकांना हा संसारसर्पाचा दंश मोठा गोड आणि विलोभनीय वाटत असतो. पण ज्यांना श्रीमदभागवतातल्या शुद्ध आणि अमृतमय सत्याचा अनुभव घ्यायचा आहे त्यांनी तक्षकदंशासमान असलेल्या या संसारसर्पाच्या दंशापासून रक्षण करण्यासाठी भगवंताची प्रार्थना करावी. 


भगवंत अकारण करूणामयी असल्याने ते आपल्या हृदयातली खरी तळमळ ओळखून आपल्याला सहाय्य करतीलही पण त्यासाठी आपल्या हृदयात अत्यंत तळमळ असणे आवश्यक आहे. ती तळमळ कशी असावी ? याचेही उदाहरण श्रीमदभागवतकारांनी आपल्याला दिलेले आहे. त्याचा विचार आपण पुढील लेखात करू.



॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" ज्येष्ठ वद्य पंचमी शके १९४८ दिनांक ५  / ७ / २०२६


५ जुलै २०२६

#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६

Saturday, July 4, 2026

श्रीमदभागवत चिंतन - ४ नैष्कर्म

श्रीमदभागवताच्या फ़लश्रृतीबाबत चिंतन करताना आपण यापूर्वीच्या लेखात श्रीमदभागवताच्या पठनाने ज्ञान, वैराग्य आणि भक्तीच्या प्राप्तीबाबत सविस्तर बघितले. त्यानंतर भगवान देवव्यासांनी जी फ़लश्रृती याठिकाणी विशद केलेली आहे ती मोठी विलोभनीय आहे. ती म्हणजे "नैष्कर्म"


मागील जन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे आणि या जन्मी जे करावे ते पुढल्या जन्मा उरवावे अशा रितीने प्रत्येक जन्मात अनेक बरी वाईट कर्मे करीत अनेकविध योनींमधून कोटी जन्म घेतल्यानंतर आपल्याला विचारांचा, विवेकाचा विशेषाधिकार असलेला हा मनुष्यदेह प्राप्त झालेला आहे. या देहातच आपण आपल्या कर्मांविषयी चिंतन करू शकतो, कर्मांविषयी जागृत राहून याच जन्मात या जन्ममृत्यूच्या फ़े-यामधून कायमची मुक्ती प्राप्त करून घेऊ शकतो. किंबहुना आपण ही अशी मुक्ती प्राप्त करून घ्यावी म्हणूनच आपल्याला भगवंताने या जन्मात मनुष्यदेह दिलेला आहे.



बरे, जन्मापासून आपल्या मृत्यूपर्यंत आपण सतत काही ना काही कर्मे करीतच असतो. जन्मानंतरची काही वर्षे सोडल्यास नंतरचे सगळे जीवन आपण आपली सगळीच कर्मे काही ना काही हेतूने करीतच असतो. कर्म केल्याशिवाय या जगात आपण जगूच शकत नाही.


पण प्रत्येक कर्माचे काही ना काही फ़ळ हे सुद्धा सतत निर्माण होत असते. समाजाला उपकारक चांगल्या कर्मांची चांगली फ़ळे तर स्वतःसकट इतरांना अपकारक, दुखावणा-या कर्मांची वाईट फ़ळे यांचे चक्र सतत सुरूच असते. चांगल्याही कर्माची फ़ळे आपल्याला भोगायची असतात तर वाईटही कर्मांची फ़ळे आपल्याला भोगायचीच असतात. चांगल्या कर्मांची फ़ळे वाईट कर्मांच्या फ़ळांमुळे आपोसाप रद्द होत नाहीत तसेच वाईट कर्मे केल्यानंतर दोन चार चांगली कर्मे करून त्या वाईट कर्मांच्या दुःखदायक फ़ळांपासून मनुष्य सुटका करून घेऊ शकत नाही. ही फ़ळे याच जन्मी भोगावी लागतात आणि या जन्मी जर तशी भोगता आली नाही तर त्यासाठी पुढला जन्म मिळतो त्यात ती भोगावी लागतात. 



हे जन्म घेणे, पुढला जन्म कुठल्या योनीत मिळेल याचा निर्णय घेणे हे मात्र मनुष्यांचा अधिकारात नाही. मात्र एकदा मनुष्यजन्म मिळाल्यानंतर त्यात कुठली कर्मे करावीत हा अधिकार मात्र आपल्याला आहे. जाणते अजाणतेपणी आपल्या हातून भली बुरी अशी सर्व प्रकारची कर्मे होत असतातच. आणि त्या कर्मांच्या फ़ळांचे लिंपण आपल्याभोवती सतत होत असते. त्या लिंपणातून बाहेर पडून, या सर्व कर्मफ़ळांचा त्याग करून मूळ, विशुद्ध रूपात आपण सदैव राहून या जन्माच्या शेवटी त्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी हेच मनुष्यज्न्माचे एकमात्र आणि अंतिम ध्येय आहे.


मग अशामध्ये कुणी जीवाने कुठलेही कर्म न करता त्या जीवाचा जन्म होताना त्याच्या कर्माची मूळची कोरी पाटी तशीच ठेऊ म्हटले तरी ते शक्य नाही. आपण या जगात घेत असलेला प्रत्येक श्वास हे सुद्धा एक कर्मच मानले जाईल. मग या जन्मातले आपले कर्म नष्ट कसे करायचे ? हाच विवेकी मनुष्यांपुढला मोठा प्रश्न असतो. श्रीव्यंकटेशस्त्रोत्रात भगवान श्रीव्यंकटेशाची विनवणी करताना स्तोत्र रचयिता संत श्री देवीदास महाराज विनवणी करतात "धाव पाव रे गोविंदा, हाती घेऊनिया गदा, करी माझ्या कर्मांचा चेंदा, सच्चिदानंदा श्रीहरी."ते ह्याच एका गोष्टीसाठी.



आपण मनुष्यमात्रांनी जाणतेपणी वाईट कर्मे तर करू नयेच म्हणजे त्यांची फ़ळे भोगावी लागणार नाही पण अजाणतेपणी सुद्धा अशी कर्मे आपल्याहातून होऊ नयेत यासाठी आपल्या विचारांना कायम जागृत ठेवावे. आणि तरीही अशी काही कर्मे अत्यंत अजाणतेपणी आपल्याकडून घडलीच तर त्यांचे कितीही सौम्य का असेना पण कर्मफ़ळ आनंदाने भोगायला तयार असावे. हे कर्मफ़ळ भोगताना आज आपण आपल्या कर्माच्या बॅलन्सशीटमधील काहीतरी कर्ज उणे केलेय ही भावना मनी असावी. आणि अशावेळी आपले मन त्या परिस्थितीत सुद्धा आनंदित ठेवावे. या जन्मात कुठलेही दुःख भोगत असताना हे या जन्मातले किंवा मागील जन्मातले आपण जाणता अजाणता केलेले पापकर्म आता आपल्याला फ़ळ देतेय ही भावना मनी बाळगावी आणि मनाला सम आणि शांत ठेवावे. ते दुःख भोगताना त्यातून नवा क्षोभ, नवा द्वेष उत्पन्न करून नवीन कर्मांना आणि पर्यायाने त्याच्या फ़ळांना जन्म देऊ नये. 


याचबरोबर समाजोपयोगी, सात्विक प्रवृतीची पोषण करणारी चांगली कर्मे सतत करीत असावे. मग आता प्रश्न पडतो की अत्यंत चांगल्या कर्मांची तितकीच चांगली फ़ळे भोगायला आपल्याला पुढला जन्म तर घ्यावाच लागेल. पुढला जन्म कुठे आणि कसा व्हावा हे आपल्या हातात नाही. मग ही चांगली फ़ळे भोगायला घेतलेल्या आनंदित, सुखी पुढल्या जन्मात पुन्हा आपल्या कडून जाणते अजाणतेपणी काही चांगली वाईट कर्मे घडत गेली तर त्यांची फ़ळे भोगायला पुन्हा पुढचा जन्म. मग आपली कर्माची बॅलन्सशीट टॅली कशी आणि कधी होणार ? या मृत्यू लोकात सगळ्यांना अटळ अशा मृत्यूचे भय आहे पण संतांना पुढल्या जन्माचे भय आहे म्हणून संत प्रार्थना करीत असताना "जनन मरण भय हरण करी परी, चरणी शरण दृढ केशव किंकर"ही प्रार्थना अगदी आळविइन आळवून करत असतात.


परम पूजनीय ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकरांचा एक दृष्टांत आहे. एक गृहस्थ गावातून लगबगीने स्टेशनकडे निघाले होते. त्यांना रेल्वेत बसून दुस-या मुक्कामाला जायचे होते. वाटेत एका गृहस्थाशी त्यांचे भांडण झाले आणि भांडणात वाद करीत बसल्याने त्यांची त्यादिेवशीची गाडी सुटली. दुस-या दिवशी पुन्हा ते गृहस्थ त्याच वेळेवरची गाडी पकडायला निघाले. आज त्यांना त्यांचा एक जिवलग मित्र रस्त्यात भेटला. त्याच्यासोबत हास्यविनोदात ते रमलेत आणि पुन्हा त्यांची गाडी सुटली. महाराज म्हणतात, भांडण झाल्यामुळे गाडी सुटली काय किंवा हास्यविनोदात रमल्यामुळे गाडी सुटली काय ? परिणाम एकच झाला. गाडी सुटली. त्याप्रमाणेच आपल्या पापकर्मांमुळे ही जन्ममृत्यूच्या फ़े-यातून मुक्त होण्याची गाडी चुकली काय किंवा आपल्या अत्यंत चांगल्या कर्मांमुळे ही गाडी चुकली काय ? परिणाम एकच. मुक्ती चुकली.


या विषयावर भगवंतांनी अर्जुनाला श्रीमदभवतगीतेत उपदेश करताना एकच सांगितले आहे. हे अर्जुना, तू तुझी सगळी कर्मे मला अर्पण कर. तू त्या कर्मांची मालकी स्वतःकडे घेऊ नकोस. तू फ़क्त माझे साधन म्हणून ती कर्मे करत आहेस ही भावना मनात ठेव. मी देह नाही. मी आत्मस्वरूप आहे. मी त्या परमात्म्याचाच एक अंश आहे. मी कर्ता नाही मी फ़क्त त्या परमात्माच्या कर्तृत्वशक्तीचे एक साधन आहे या भावनेने चांगली कर्मे सतत करीत राहिलोत तर त्या कर्मांची फ़ळे आपल्याला चिकटणार नाहीत. कर्मे केल्याशिवाय तर या जगात आपण जगू शकणार नाहीच पण अशा पद्धतीने वर्तन आणि विचार ठेवलेत तर मात्र त्या कर्मांच्या फ़ळांपासून आणि पर्यायाने जन्म मरणाच्या या अनंत फ़े-यापासून आपण याच जन्मात मुक्त होऊ शकू आणि परमात्मस्वरूपात कायमचे विलीन होऊ शकू. हेच ते नैष्कर्म. 


श्रीमदभागवतात वैराग्याची मूर्ती असलेल्या श्रीशुकदेवांनी परिक्षितीराजाला जो उपदेश केलेला आहे तो या नैष्कर्माचे आविष्करण करणारा आहे. या महापुरानाच्या केवळ पठनाने, त्याचे विचारपूर्वक श्रवण केल्याने मनुष्याच्या मनात भगवंताविषयी भक्ती उत्पन्न होऊन तो मनुष्य जा जन्म मरणाच्या फ़े-यतून मुक्त होईल याची ग्वाही भगवान श्रीवेदव्यासांनी आपल्याला दिलेली आहे.


तत्र ज्ञान-विराग-भक्ति-सहितम् 

नैष्कर्म्यम् आविष्कृतम

तत शृण्वन् सु-पठान् विचारण-परो 

भक्त्या विमुच्येन्नरः॥


ही अशी ग्वाही जेव्हा ही थोर मंडळी आपल्याला देतात त्यावर पूर्णतः विश्वास आपल्याला ठेवायचाच असतो. त्या मंडळींनी हे ग्रंथ रचताना आजच्या युगासारखे, त्यांचा खप झाला पाहिजे, त्यांना कुणीतरी साहित्यिक म्हटले पाहिजे, ते लोकप्रिय झाले पाहिजेत म्हणून लोकानुनयासाठी ही शब्दरचना केलेली नाही. तर ग्रंथाच्य वाचकाला मुक्ती मिळवून देण्याची ही त्यांची तळमळ आहे आणि ही त्यांची खरी आध्यात्मिक शक्ती आहे. त्यामुळे श्रीमदभावताच्या श्रवणाने, पठनाने आणि त्यावर मनन केल्याने आपणही याच जन्मात त्याच्य फ़लश्रृतीत वर्णन केलेले नैष्कर्म प्राप्त करून घेऊ यावर दृढ विश्वास ठेवूयात आणि आपल्या जीवनाची त्या ध्येयाने वाटचाल करूयात.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" ज्येष्ठ वद्य चतुर्थी शके १९४८ दिनांक ४  / ७ / २०२६


४ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६

Friday, July 3, 2026

श्रीमदभागवत चिंतन - ३ ज्ञान, वैराग्य आणि भक्ती

तत्र ज्ञान-विराग-भक्ति-सहितम् 

नैष्कर्म्यम् आविष्कृतम

तत शृण्वन् सु-पठान् विचारण-परो 

भक्त्या विमुच्येन्नरः॥


श्रीशुकदेवजी महाराजांनी राजा परिक्षितीला त्याच्या मृत्यूपूर्वी सलग ७ दिवस केलेला उपदेश आणि त्यामिषाने गायलेल्या भगवंतांच्या अवतार लीला म्हणजेच श्रीमदभागवत महापुराण. मनुष्यजन्म हीच मुळात भ्रांती आहे, आपण आपल्या कर्मांकडे डोळस लक्ष दिले नाही तर जन्म आणि मृत्यूचा हा फ़ेरा आपल्याला वारंवार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे सात दिवसांनी येऊन तुला दंश करणारा तक्षक हा केवळ निमित्तमात्र आहे. हा श्रीशुकदेवांच्या उपदेशातला मुख्य गाभा आहे.



संतकवी दासगणूंनी श्रीगजाननविजय ग्रंथात परम पूजनीय गजानन महाराजांच्या मुखातून त्यांचे पट्टशिष्य बाळाभाऊंना "जन्मे न कोणी, मरे न कोणी, हे जाणावयालागोनी, परमार्थाचा उपाय जाणी, शात्रकारे कथन केला. आणि प्रत्येक मनुष्यमात्राने हे ध्यानात ठेऊन जर आपले जीवन आखले आणि त्यातले प्राधान्यक्रम ठरवलेत तर त्या मनुष्याची खरोखरच आध्यात्मिक उन्नती होईल यात तिळमात्र शंका नाही.


या श्रीमदभागवत ग्रंथाच्या फ़लशृतीत नेमके हेच सांगितले आहे. या ग्रंथात ज्ञान, वैराग्य आणि भक्ती आहे. हाच क्रम का ? कारण आपल्या लक्षात येईल की सर्वप्रथम आपल्याला हा जगाच्या क्षणभंगूरतेविषयी, आपण इथे घेत आलेल्या आणि पुढेही घेत असणा-या जन्म मृत्यूंच्या अनंत फ़े-यांविषयी आणि त्यातल्या धोक्यांविषयी सर्वप्रथम ज्ञान झाले पाहिजे. जन्म आणि मृत्यूचे असे अनंत फ़ेरे घेत राहिल्याने आपले नक्की काय नुकसान होणार आहे याविषयी फ़क्त मनुष्यमात्रच विचार करू शकतात आणि त्यावर योग्य तो उपाय याच जन्मात करून त्या फ़े-यांमधून कायमचे बाहेर होऊ शकतात याचे ज्ञान जर आपल्याला नसेल तर मग पुढले सगळेच व्यर्थ ठरते. मग मनुष्यमात्रांना विचार करण्याचा जो विशेषाधिकार प्राप्त झालेला आहे त्याचा आपण काहीच उपयोग न करता केवळ "आहार - निद्रा - भय - मैथुनंच" अशा प्रकारचे इतर प्राणीमात्रांसारखे जीवन जगत राहू. म्हणून अध्यात्माचे ज्ञान आपल्याला सर्वप्रथम झाले पाहिजे.




नुसते एखाद्या गोष्टीचे ज्ञान होऊन उपयोग नाही तर त्या ज्ञानानंतर आपल्या मनात वैराग्य उत्पन्न व्यायला हवे. या जगातल्या गोष्टींविषयी हवे आणि नको याचा परीघ कमीत कमी करीत नेणे आणि एका क्षणी हे हवे नकोचे वर्तुळ शून्य करणे हे वैराग्य. मग हे वैराग्य प्राप्त करण्यासाठी कुठे संसारत्याग करून जंगलात, हिमालयात जायला नको. कारण हा मनाचा विचार आहे. आणि सर्वसामान्य मनुष्यांसाठी विवेक, विचार सतत जागृत ठेऊन हळूहळू प्राप्त करून घेण्याचा विषय आहे. ज्या काही योगी पुरूषांची गतजन्मीची साधना थोडीशीच अपूर्ण राहिल्यामुळे त्यांनी तिच्या पूर्ततेसाठी हा जन्म घेतलाय त्यांना कदाचित हे वैराग्य पटकन साधेलही पण सर्वसामान्य सांसारिक मनुष्यमात्रांनाही सततच्या प्रयत्नांने ही साधना साधू शकेल, किंबहुना ती साधण्यासाठी मनुष्यमात्रांनी या जगात विशेष प्रयत्न करायचे आहेत. ही साधना कठीण असली तरी अशक्य निश्चितच नाही.


आणि यात सगळ्यात शेवटी भक्ती. या संसाराचे यथार्थ ज्ञान झाले, त्यावर विवेक विचारांनी चिंतन करून मनात या संसाराविषयी वैराग्य सुद्धा उत्पन्न झाले तरीही मनात भक्ती उत्पन्न झाल्याशिवाय मनुष्यमात्रांचे सार्थक नाही. श्रीमदभागवतात अशी बरीच उदाहरणे विशद केलेली आहेत. मनुष्यांनी ज्ञान आणि वैराग्य प्राप्त करून घेतले आणि त्यानंतर एक क्षण असा येतो की आपल्या, आपल्या जीवनाविषयीच्या, विचारांविषयीच्या मर्यादा मनुष्यमात्रांच्या लक्षात येतात आणि हे सगळे मला प्राप्त होण्यामागे माझा काय अधिकार आहे ? याविषयी मानवी मन विचार करू लागते.


आपण बघतो की एखादा असाध्य रोग जडल्यानंतर किंवा जीवनात एखादी दुःखद घटना घडल्यानंतर आपण सगळेच "मीच का ? ही घटना माझ्यासोबतच का व्हावी ?" हा विचार करायला लागतो तसेच आपल्याला खरे ज्ञान आणि वैराग्य प्राप्त झाल्यावर साधकांच्या मनात "मीच का ? हे ज्ञान आणि वैराग्य मला प्राप्त होण्यामागे माझा असा काय विशेषाधिकार आहे ?" हे विचार यायला लागतात. आणि नंतर साधकाच्या लक्षात येते की हे होण्यामागे तो सर्वशक्तीमान परमेश्वर आहे. त्याच्या मनात इच्छा उत्पन्न झाली की या गोष्टी मला मिळाव्यात म्हणून त्याने या जगात स्वतःची प्रतिरूपे असलेले सदगुरू, हे वाटाडे म्हणून उभे केलेत. त्यांनी आपल्याला हा विमल अध्यात्माचा मार्ग दाखवला आणि म्हणून आपण ज्ञान आणि वैराग्याचे जाणकार झालोत.


ही भावना, कृतज्ञता दाटून येणे आणि स्वकर्माचा अहंकार नष्ट होऊन आपल्या या विशेष प्राप्तीमागील कारण समजणे ही भक्तीची पहिली पायरी. श्रीमदभागवत आपल्याला हे असे संसाराच्या सार असारतेविषयी ज्ञान, त्यातून मनात उत्पन्न होणारे वैराग्य आणि हे सगळे आपल्यासोबतच का झाले ? हा प्रश्न उपस्थित करून सदगुरूंविषयी, भगवंताविषयी भक्ती उत्पन्न करून देणार असल्याची ग्वाही देते.



त्यासोबतच या श्लोकाच्या पुढल्या ओळीत नैष्कर्म हा शब्द भगवान श्रीवेदव्यासांनी लिहीलेला आहे. भगवंतांने अर्जुनाला श्रीमदभगवतगीता सांगताना पूर्ण १८ अध्यायांचा सार म्हणजे नैष्कर्म हा शब्द. याविषयीचे चिंतन आपण यापुढील लेखात करूयात.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन"ज्येष्ठ वद्य तृतीया / चतुर्थी शके १९४८ दिनांक ३  / ७ / २०२६


३ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६

Thursday, July 2, 2026

श्रीमदभागवत चिंतन - २ राजा परिक्षिती आणि परमहंस श्रीशुकदेव

श्रीमद्-भागवतम् पुराणम् अमलम् 

यद् वैष्णवानाम् प्रियम.

यस्मिन् पारमहंस्यम् एकम् अमलं 

ज्ञानं परं गीयते।


श्रीमदभागवतातल्या फ़लश्रृतीतला हा श्लोक. श्रीमदभागवत पुराण हे अत्यंत अ मल आहे, शुद्ध आहे. यात कुठेही मानवी प्रपंचातल्या गोष्टींचा मळ लागलेला नाही. हे पुराण मनुष्यमात्रांनी प्राप्त करून घेणाजोग्या सर्वोत्तम गोष्टीची (परम अर्थ) वैराग्याचीच चर्चा मनुष्यांशी करतेय. हे श्रीमदभागवतपुराण आणि त्यात सांगितलेला जीवन जगण्याचा मार्ग हा भगवान विष्णूंच्या भक्तांना अत्यंत प्रिय आहे.



काय आहे या श्रीमदभागवत पुराणात ? या पुराणात परमहंस स्वरूपाचे, कधीही मलिन न होणारे फ़क्त ज्ञान गायल्या गेलेले आहे.


दूध आणि पाणी एकत्र मिसळून दिले असता एखादा हंस ज्याप्रमाणे आपल्या चोचीने त्यातले फ़क्त दूधच प्राशन करतो आणि पाणी तसेच ठेऊन देतो, तसेच या जगात जीवन जगत असताना व्यक्तीने या जगातल्या विविध विषयांमधून मनुष्य जीवनात शाश्वत काय आणि अशाश्वत काय याचा विवेक जागृत ठेवत अशाश्वत गोष्टींना टाळून फ़क्त शाश्वत गोष्टींचे सदैव सेवन करावे. असा विवेक कायम जागृत असलेल्या व्यक्तींना परमहंस असे म्हणतात. परम = सर्वोच्च दर्जाचा, हंस = ज्या प्राण्याला नीरक्षीर विवेक (पाणी आणि दूध यातला फ़रक) कळतो असा जो तो. आपण आपल्या जीवनात अशा अनेक सत्पुरूषांना बघतो ज्यांना जीवनाचे सत्य आणि असत्य यांचे पुरेपूर ज्ञान झालेले आहे आणि ते त्यांच्या रोजच्या आचरणातून आपल्याला दिसतेय. अशा सत्पुरूषाला आपण परमहंस असे नामाभिधान देतो. श्रीमदभागवत महापुराण सर्व मनुष्यमात्रांना अशा परमहंस स्वरूपाचे ज्ञान देते.



आणि म्हणूनच श्रीमदभागवत महापुराण श्रवण करत असताना त्यातल्या प्रत्येक कथेकडे केवळ कथा, इतिहास म्हणून न बघता, ही कथा, हा इतिहास आपल्याला मानवी जीवनाच्या परमहंस ज्ञानाचा कुठला उपदेश करतेय ? याचा विवेक सर्व श्रोत्यांनी सदैव जागृत ठेवायला हवा. मानवी मनाचा सखोल अभ्यास करून केवळ एका सप्ताहात, सात दिवसात मानवी मन भारून जाईल, त्या मनात खरे वैराग्य भरले जाईल या गोष्टीची तरतूद भगवान श्रीवेदव्यासांनी हे महापुराण रचताना केलेली आहे. आधुनिक मानसशास्त्रज्ञांनी आजच्या युगातील मानसशात्रीय तत्वे लावून त्यादृष्टीने हा ग्रंथ अभ्यासला पाहिजे असे मला कायम वाटत आलेले आहे.


प्रत्यक्ष भगवत्सखा असलेल्या अर्जुनाचा नातू आणि ज्याच्या जन्माच्या आधीपासून प्रत्यक्ष भगवंताने (ज्याचे अगदी त्याच्या मातेच्या गर्भात तो असताना) त्याचे रक्षण केलेले आहे असा राजा परिक्षिती (विष्णुरात) राज्य करीत असताना केवळ एका साधूने राजाकडे अजाणतेपणी, दुर्लक्ष केले म्हणून त्या साधूंचा अपमान करतो. त्या साधूंना तर त्या मानापमानाची पर्वा नसते, ते बिचारे आपल्या साधनेत, समाधीत असतात पण त्यांचा पुत्र शृंगी ऋषी हा आपल्या पित्याचा अपमान लक्षात आल्यानंतर संतप्त होतो आणि राजाला शाप देतो. सात दिवसात तक्षक दंश होऊन राजाचा मृत्यू होईल असा.


राजाला शापवाणीविषयी कळते, मुळातच चांगल्या मनाचा असल्याने आणि क्षणिक क्रोधामुळे आपला संयम गमावून बसलेल्या त्या विष्णुराताला (विष्णूंनी रक्षण केलेला = विष्णुरात) पश्चाताप होतो पण साधूंची शापवाणी खरी होणार असल्याने तो एकूणच आपल्या जीवनाचा साकल्याने विचार करू लागतो. आपल्या आईच्या गर्भात असताना प्रत्यक्ष ब्रह्मास्त्रापासून ज्याचे रक्षण प्रत्यक्ष भगवंतांनी केले तो राजा एका साधूच्या शापाने मृत्यू पावणार आहे या गोष्टीचे मनन आज आपण सगळ्यांनी केले पाहिजे, यातले मर्म आपण समजून घेतले पाहिजे. 


आणि आता मृत्यूपंथावर निश्चितपणे असलेल्या राजाला उपदेश करण्यासाठी परमहंस रूपाचे मूर्तिमंत उदाहरण असलेले भगवान व्यासपुत्र श्रीशुकदेव राजाला ख-या ज्ञानाचा, एकूणच मानवी जीवांचे उद्दिष्ट काय ? जीवनात श्रेयस काय ? आणि प्रेयस काय ? या सगळ्या गोष्टींचा उपदेश करून त्याला मनाने मुक्त करायला या महापुराणाचा पुढले सात दिवस उपदेश करत आहेत. काय आहे या उपदेशरूपी ग्रंथात ?


तत्र ज्ञान-विराग-भक्ति-सहितम् 

नैष्कर्म्यम् आविष्कृतम

तत शृण्वन् सु-पठान् विचारण-परो 

भक्त्या विमुच्येन्नरः॥


फ़लश्रृतीतील या श्लोकाचा अर्थ आपण यापुढील लेखांकात अभ्यासूयात.



- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन"ज्येष्ठ वद्य द्वितीया शके १९४८ दिनांक २  / ७ / २०२६


२ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६

Wednesday, July 1, 2026

श्रीमदभागवत चिंतन - १ फ़लश्रृती आणि Outcomes Based Education

आपल्या भारतीय संस्कृतीतला एक अत्यंत महत्वाचा वारसा म्हणजे आपली पुराणे. त्यातही श्रीमदभागवत महापुराण म्हणजे सर्व भाविकांना अत्यंत प्रिय असणारे. हे नुसते पुराणच नाही तर हा इतिहास आहे. गेल्या ५००० वर्षांपासून हे महापुराण आपल्या भारतवर्षात अगदी रोज शेकडो, हजारो घरांमधून, मंदिरांमधून, मठांमधून वाचले जातेय, परिशीलन केले जातेय. असा ग्रंथ एकूणच या विश्वाच्या इतिहासात विरळा.



भाविक भक्तांना यात भगवंताच्या लीला दिसतात, इतिहास अभ्यासकांना या ग्रंथात तत्कालीन इतिहासाच्या पाऊलखुणा सापडतील, साहित्यिकांना यात संस्कृत साहित्यातली सौंदर्यस्थळे दिसतील, भाषा अभ्यासकांना या ग्रंथामधून एकाच शब्दरचनेतून अर्थाची अनेक वलये निर्माण करणारी भाषा कशी असू शकते याचे प्रत्यंतर येईल तर अध्यात्माच्या साधकांना भगवान महर्षी वेदव्यासांनी ह्या पुराणाची समाधीभाषेत रचना कशी आणि का केली ? हा प्रश्न त्यांच्या अध्यात्माला सहाय्य करेल. असा विविध अंगांनी अभ्यासण्याजोगा, मनन करण्याजोगा, समाजातल्या सर्व प्रकारच्या सुष्ट प्रवृत्तींच्या पिंडाचे पोषण करणारा हा ग्रंथ सर्वांना आवडला नसता तरच नवल.



कुठल्याही ग्रंथाची फ़लश्रृती म्हणजे आज आपण ज्याला Outcomes Based Education हा शब्द वापरतो तेच आहे. हा ग्रंथ वाचण्याने मला काय मिळेल ? या प्रश्नाचे उत्तर ही फ़लश्रृती देते. फ़रक इतकाच आहे. आज एखादा विषय सुरू होण्याआधीच आपण त्यातले Outcomes वाचतो तर श्रीमदभागवत रचिल्या गेले त्याकाळी सर्व ग्रंथांची, स्तोत्रांची फ़लश्रृती ही त्या ग्रंथाअंती, स्तोत्राअंती असे. तो ग्रंथ, ते स्तोत्र अगदी मनोभावे वाचल्यानंतर, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा, आजूबाजूच्या परिस्थितीचा अगदी विलय करून त्यात  संपूर्णपणे बुडून गेल्यानंतर ग्रंथाच्या शेवटी ग्रंथकारांनी लिहीलेली फ़लश्रृती वाचकाच्या, साधकाच्या प्रत्यक्ष अनुभवाला यायची. हाच त्या ग्रंथाचा प्रसाद. आपण एखाद्या ग्रंथाला प्रासादिक ग्रंथ म्हणतो ते हे असे. ज्या ग्रंथाची फ़लश्रृती ही त्या ग्रंथ वाचकाच्या प्रत्यक्ष अनुभवाचा भाग ठरायची, त्याच्या विचारांमध्ये आणि एकूणच जीवनामध्ये प्रसा्दरूप व्हायची तो प्रासादिक ग्रंथ.


आजच्या बदलत्या युगात आपल्या Outcomes Based Education प्रथेमध्ये एखादा विषय शिकण्याआधीच आपण त्याचे Outcomes म्हणजे फ़लश्रृती बघतो आणि आपल्याला हा विषय शिकायचाय की नाही ? शिकायचाय तर का शिकायचाय ? या प्रश्नांचा मनोमन धांडोळा घेतो आणि तो विषय अभ्यासतो किंवा अभ्यासत नाही.


श्रीमदभागवताच्या अखेरच्या म्हणजे द्वादश खंडामध्ये या ग्रंथाची फ़लश्रृती सांगितलेली आहे. ती फ़लश्रृती आणि श्रीमदभागवत ग्रंथरचनेमागील घटनांच्या साखळींची पार्श्वभूमी याचा अगदी निकट संबंध आहे. आणि ती फ़लश्रृती सुरूवातीलाच आपण अभ्यासली तर हा ग्रंथ आपण का अभ्यासायचा ? याविषयी आपल्या सर्वांची मनोभूमिका पक्की होत जाईल. म्हणून श्रीमदभागवताची फ़लश्रृतीआपण यापुढील लेखात अभ्यासूयात. आणि त्यानंतर श्रीमदभागवत ग्रंथातल्या काही महत्वाच्या सौंदर्यस्थळांना आपण भे्टी देऊयात. हे कार्य पूर्णत्वास जावे अशी सर्व इष्टदेवता आणि सदगुरूंना दंडवत घालून नम्र विनंती करतो आणि आजपुरता विरमतो.


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन"ज्येष्ठ वद्य प्रतिपदा शके १९४८ दिनांक १ / ७ / २०२६


१ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६

Monday, June 29, 2026

शास्त्रकारांचा कायदा तर संतांचा फ़ायदा

आपल्या परिचयातल्या पती पत्नींची गाठ पडली आणि आपण पहिल्यांदा त्यातल्या पतीची तारीफ़ केली तर पत्नीची कळी खुलते. ती प्रसन्न होते. पण हेच उलट झाले तर ? पतीकडे पूर्ण दुर्लक्ष करून पहिल्यांदा पत्नीची तारीफ़ केली तर त्या पतीला क्रोध येण्याची शक्यता असते. आणि पती नाराज तर पत्नीही नाराज.

म्हणून महालक्ष्मीच्या पूजेआधी भगवान विष्णुंचे स्मरण करावे असे शास्त्रकार सांगतात. श्रीसूक्ताआधी पुरूषसूक्त म्हटले जावे असाही शास्त्रांचा दंडक.

पण या नियमाला अपवाद आहेत. जर ती स्त्री आपली आईच असेल तर तिच्याकडे आधी वशिला लावला म्हणून बाबा रागावणार नाहीत. ब-याचशा गोष्टी बाबांकडे जाण्याआधी आईने मंजूर केल्यात तर बाबांचा होकार ही औपचारिकताच असते, हो ना ? अशीच आपल्या संतांची भावना असते. 

ती जगज्जननी भलेही इतरांसाठी सौख्य संपत्ती आदि भौतिक गोष्टींची दात्री असेल आणि तो भलेही जगन्नियंता वगैरे असेल. पण आपले मायबाप आहेत म्हटल्यावर मग इतर सगळे मुद्दे बा्जूलाच पडतात ना हो.




शास्त्रकारांकडे सर्वत्र कायदाच कायदा असतो आणि संतांच्या सहवासात असा फ़ायदाच फ़ायदा असतो.

- "पंढरपुरी आहे माझा मायबाप" ही आरती मनापासून आवडणारा आणि तशीच भावना असणारा बालक वैभवीराम प्रकाश किन्हीकर.