Saturday, July 18, 2026

श्रीमदभागवत चिंतन - १८ प्रह्लाद चरित्र

आपला भाऊ हिरण्याक्ष याची हत्या भगवान विष्णूंनी केल्याचे ऐकताच सूडाने पेटलेला हिरण्यकश्यपू तप करू लागला आणि तपाचे फ़ळ म्हणून ब्रह्मदेवांकडून त्याने अमरत्वाचा वर मागितला. अमरत्व हे पृथ्वीतलावरील कुणालाही देणे अशक्य आहे हे त्याला ब्रह्मदेवांनी समजावून सांगताच त्याने बुद्धीचातुर्याने असा वर मागून घेतला की त्याला मारणे या पृथ्वीवरील कुणालाही अशक्यच व्हावे. आणि जवळपास अमरत्वच प्राप्त झालेला हिरण्यकश्यपू पृथ्वीतलावर धुमाकूळ घालू लागला. दैवी गुणांचा निषेध करून आसुरी गुण लोकांमध्ये रूजवू लागला. चांगल्या गोष्टींकडला सर्व जनतेचा कल हळूहळू कमी होऊ लागला आणि केवळ देह हा एव्हढाच खरा आणि देहाचे सुखे तेच परमसुख ही भावना आपल्या प्रजेमध्ये रूजवण्यात हिरण्यकश्यपू यशस्वी होऊ लागला.


अशावेळी भगवंताला काहीतरी लीला करावी लागते. या जगातले सगळे प्राणीमात्र योग्य जीवनक्रम चालवून, चांगल्या जीवन मार्गावरची श्रद्धा दृढ करून, देहसुख हे खरे सुख न मानता आपल्या देहापलिकडे विचार करून, आपले आत्मस्वरूप जाणण्याचा प्रयत्न करोत आणि ते आत्मस्वरूप जाणल्यावर तो आत्मा आणि परमात्मा यांचे अभेद्य त्यांच्या अनुभवास येवो अशी भगवंताची मनोमन इच्छा असते. त्यामुळे कुणी राजा अशा प्रकारे सृष्टीक्रमाविरूध वागून जर समाजरचना रसातळाला नेत असेल तर भगवंतांना लीला कराव्याच लागतात. त्यांनी हिरण्यकश्यपूच्या गर्भवती पत्नीला उपदेश करण्यासाठी सर्व लोकांमध्ये मुक्त संचार असलेल्या ब्रह्मर्षी नारदांची योजना केली. आणि दैवी आज्ञेने देवर्षींनी हिरण्यकश्यपूच्या पत्नीला सन्मार्गाचा उपदेश केला. अशाप्रकारे अत्यंत पापी, पराक्रमी आणि सूडाने पेटलेल्या अशा पित्याच्या, हिरण्यकश्यपूच्या प्रह्लादाने पोटी जन्म झाला. जन्मापूर्वी आईच्या गर्भात असताना देवर्षि नारदांनी आईला केलेला भगवत्भक्तीचा उपदेश प्रल्हादाने ऐकला आणि तो त्याच्यावर दृढ संस्कार झाला. 


श्रीमदभागवतात देवर्षी नारदांचे ज्या ज्या प्रसंगात प्राकट्य झालेले आहे ते ते सर्व प्रसंग सुखांतिकेत बदललेले आहेत. येनेकेन प्रकारेण प्रसंगांना सुखद वळण देण्याचे आणि भगवंताच्या मनासारखे घडवून आणण्याचे देवर्षींचे कार्य खरोखर नतमस्तक करणारे आहे. आज कलियुगात आपण देवर्षींना न जाणता त्यांना काही शेलक्या विशेषणांनी संबोधतो, ते किती चूक आहे हे आपल्याला कळेल. आणि आपणा सर्व सामान्य माणसांचे आयुष्य़ सुखकर होण्यासाठी जी विभूती कायम झटली तिचा उल्लेख हा कायम आदरार्थीच व्हायला हवा. कमीत कमी आपण भगवत्भक्तांनी तरी तो आदरार्थीच करायला हवा.



देवर्षींचे संस्कार दृढ असल्याने पित्याच्या शत्रूचे गुणगान करणारा प्रल्हाद हा पित्याला सतत खुपू लागला. विविध आमिषे दाखवून, धाकदपटशा करून पित्याने त्याचे मन वळवण्याचा, त्याला भगवत्भक्तीपासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण प्रल्हाद बधला नाही. गुरूवचनांवर दृढ विश्वास ठेवून इतर कुठल्याही भौतिक आमिषांना न बधणारा, किंवा प्राणांतिक प्रसंगांना त्याच दृढ विश्वासाने सामोरे जाणारा प्रल्हाद हा आजच्या तरूणांसाठी आदर्श व्हायला हवा. आपल्या बालपणी आपल्या सगळ्यांवरच खूप चांगले संस्कार झालेले असतात पण मोठे झाल्यावर आपल्याला अकारण त्या संस्कारांची लाज वाटते. किंबहुना चांगल्या संस्कारांची लाज वाटणे म्हणजेच मोठेपण येणे अशी आपण आपली समजूत करून घेतलेली आहे. आपल्या सगळ्यांसाठी गर्भावस्थेतले चांगले संस्कार आयुष्यभर आणि प्राणापेक्षाही जास्त जपणारा हा दैत्यकुळात जन्म झालेला प्रल्हाद आदर्श व्हायला हवाय.


प्रल्हादाचा आणखी एक महत्वाचा गुण म्हणजे अभय. श्रीमदभगवतगीतेत दैवी गुणसंपत्ती वर्णन करताना भगवंतांनी उल्लेख केलेला पहिला दैवी गुण म्हणजे अभय. "अभयम सत्व संशुद्धी:, ज्ञान योग व्यवस्थिती:" यात पहिल्यांदा येणारा गुण अभय. भक्त निर्भय नसेल तर त्याच्यात इतर गुण येणारच नाहीत आणि आलेच तर ते समाजासाठी प्रदर्शित करण्याचे त्याला भय वाटेल. आज आपल्यातल्या किती भगवत्भक्तांना अभय होऊन त्यांचे दैवी गुण समाजासमोर मांडावेसे वाटतात ? की समाजाच्या तामसी रेट्यामुळे आपणच झाकोळले जाऊन आपले चांगले गुण आपण समाजापासून लपवून ठेवतो आहोत ? आणि समाजातल्या नवीन पिढीसमोर चांगले काय आणि वाईट काय ? याचा नीरक्षीरविवेक आपण आपल्या वागणुकीतून ठेवला नाही तर त्यांना, जे आज तामस वातावरण त्यांच्या डोळ्यांसमोर जाणीवपूर्वक ठेवण्यात येतय, तेच आदर्श वाटणार ना ? भगवत्भक्तांनी निर्भय होऊन चांगल्याला चांगले म्हणून प्रसार करणे आणि वाईटाचा विरोध करणे हे आपले आजचे कर्तव्य नाही का ?


आणि प्रल्हादाचा सगळ्यात मोठ्ठा गुण म्हणजे गुरूवचनांवरचा विश्वास. चर आणि अचर सृष्टीतही तोच एक परमात्मा भरून राहिला आहे हा दृढ विश्वास त्याच्या मनात होता आणि त्या विश्वासाच्या योगानेच भगवंताला स्तंभासारख्या जड वस्तूतही स्वतःचे अस्तित्व दाखवावे लागले. श्रीगजानन विजय ग्रंथात संतकवी दासगणू महाराजांनी म्हटल्याप्रमाणे "प्रल्हाद भक्त करण्या खरा, स्तंभी प्रकटलास जगदोद्धारा" असे रूप भक्ताभिमानी भगवंतांनी घेतले खरे पण तत्पूर्वी भगवंतांनी प्रल्हादाची खूप परीक्षा पाहिली. 


"तत्र ज्ञान विराग भक्तिसहितम, नैष्कर्म्यम आविष्कृतम" या श्रीमदभागवताचेच वर्णन केलेल्या गुणांपैकी प्रखर भक्ती हा एक गुण अंगी असलेला भक्त प्रल्हाद. आणि त्याची प्रखर भक्ती इतकी की भगवान नृसिंहाचे प्रगट झालेले उग्र रूप पाहून सगळ्या देवगणांना, इतकेच काय प्रत्यक्ष विष्णुपत्नी असलेल्या लक्ष्मीमातेलाही त्यांच्याजवळ जाण्याचे भय वाटले तेव्हा हा लहानसा बालक प्रल्हादच निर्भयपणे जाऊन त्यांच्या मांडीवर बसला आणि त्याने त्यांची स्तुती गाऊन त्यांना प्रसन्न केले. श्रीमदभागवतात भक्त प्रल्हादाने गायलेली भगवान नृसिंहाची स्तुती मुळातूनच वाचण्यासारखी आहे.



निर्भय होऊन, गुरूवचनांवर दृढ विश्वास ठेऊन केलेल्या साध्यासोप्या भक्तीने भगवंताला प्रगट व्हायला लावणा-या भक्त प्रल्हादाचा आदर्श आज कलियुगातही आपण ठेवायला काय हरकत आहे हो ?  त्याच्यासाठी भगवंत प्रगट झाले, माझ्यासाठीही होतीलच की. फ़क्त कलियुगात त्यांचे चर्मचक्षूंनी दर्शन होईल की अंतःचक्षूंना ते जाणवतील आणि माझे जीवन दैवी करून टाकतील याचा अनुभव प्रत्येकाने आपापल्या साधनेने आणि भक्तीने घ्यायचा आहे.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध पंचमी शके १९४८ दिनांक  १८ / ७ / २०२६


१८ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


Friday, July 17, 2026

गेल्या अर्ध शतकात भारतीय रेल्वेने घेतलेली झेप.

 वर्धा - बल्लारशाह मेमू गाडीचे हे वेळापत्रक बघितले आणि डोळ्यातून टपटप अश्रूच वाहू लागले हो. मोबाईलवरची अक्षरे दिसेनाच. डोळे पुसून पुसून पुन्हा पुन्हा वाचले. अवघ्या २ तास १० मिनीटांत वर्धा ते चंद्रपूर ? कसं शक्य आहे ?



साधारण १९८३ - ८४ चा काळ असावा. चंद्रपूरच्या आजोळहून आम्ही आमच्या एका नातेवाईकांना भेटायला वर्धेला जाणार होतो. संध्याकाळी ६.०० वाजण्याच्या आसपास सुटणारी काजीपेठ - वर्धा पॅसेंजर गाडी. त्याकाळी  स्टेशनवर जा, तिकीटांच्या रांगेत उभे रहा, तिकीटे मिळवा, फलाटावर जा, फलाटावर नीट जागा पकडा असे खूप सव्यापसव्य असायचे. बरे, या प्रवासी मंडळीत माझे आजी, आजोबा ही ज्येष्ठ नागरिक मंडळी, एक तरूण मामा आणि बाकी आम्ही सगळी वय वर्षे १० ते १६ या वयोगटातली ७ - ८ नातवंडे. त्यामुळे सामानाचे डाग भरपूर होते. त्याकाळी वाटेत खाण्यापिण्याची आजच्याइतकी सार्वत्रिक उपलब्धता नव्हती त्यामुळे पाण्याच्या वाॅटरबॅग्ज, खाण्याचा डबा, त्याला लागणार्‍या accessories यामुळे सामानाचे भरपूर डाग झाले होते.

तेव्हाची वडिलधारी मंडळी जरा जास्तच काळजी घेत असत. त्यामुळे संध्याकाळी ६.०० च्या गाडीने जायचे म्हणून आजोळी दुपारी ४.०० वाजताच टांगे उभे राहिलेत.. "नारायणा, सांभाळून ने रे बाबा." किंवा "अंबामाय, पाहून घे गं बाई तूच." असे देवांना साकडे घालून आम्ही दुपारी ४.३० वाजताच चंद्रपूरच्या फलाटावर येऊन अक्षरशः बस्तान ठोकले.

तेव्हा वर्धेनंतर काजीपेठपर्यंत बहुतेक रेल्वेमार्ग एकेरी होता. त्यामुळे पुढून येणार्‍या रेल्वेगाड्यांना जागा देण्यासाठी मधल्या स्टेशनवर थांबून वाट बघणे त्याचबरोबर आपल्याच मार्गाने जाणार्‍या इतर जलद गाड्यांना पुढे जाऊ देण्यासाठी वाट बघत थांबणे या प्रक्रियेत पॅसेंजर गाड्यांचा बँड वाजायचा. आमचीही पॅसेंजर गाडी अर्धा तास उशिरा, एक तास उशिरा अशी घोषणा होत होत तब्बल ४ तास उशीरा रात्री १०.०० वाजता चंद्रपूरला आली.

गाडीतल्या गर्दीत आमचे सगळे वर्‍हाड घुसले आणि आहे तशा परिस्थितीत आम्ही आमच्यापुरती जागा करून घेत इकडेतिकडे विखुरलेले बसलोत. गाडी निघाली. पण पुन्हा तेच पहिले पाढे पंचावन्न. समोर येणार्‍या गाड्यांना साईड द्या, ओव्हरटेक करणार्‍या गाड्यांसाठी थांबून रहा या प्रकरणांमध्ये आम्ही वर्धेला दुसर्‍या दिवशी पहाटे ४.०० वाजता पोहोचलेलो होतो. पेंगुळलेले, झोपाळलेले, अंग आंबलेले अशा अवस्थेत. 

वर्धा ते चंद्रपूर हे अंतर फक्त ११९ किलोमिटर्स आहे हे सत्य आम्हाला फार उशीरा कळले. त्यादिवशी त्या मोठ्ठ्या प्रवासानंतर आमची समजूत म्हणजे वर्धा हे शहर मुंबई किंवा पुण्याच्या दोनतीन तासांवर आहे अशी झाली होती.

आता मला सांगा. जुन्या पॅसेंजरच्याच दर्जाची ही मेमू. मधल्या सगळ्या स्थानकांवर थांबून हाच प्रवास अवघ्या २ तास १० मिनीटांमध्ये करते म्हटल्यावर आम्हाला तो दिवस आठवून भरून येणार नाही तर काय होईल ?

- पॅसेंजर गाड्यांच्या जनरल कोचपासून ते राजधानी एक्सप्रेसच्या प्रथम वर्ग वातानुकूल वर्गातून भारतभर विविध प्रवास केलेला प्रवासी पक्षी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर. 

श्रीमदभागवत चिंतन - १७ अजामिळोपाख्यान

मागे आपण बघितलेल्या जडभरताच्या कथेच्या समांतर किंवा अगदी विरूद्ध जाणारे हे अजामिळोपाख्यान. आयुष्यभर भगवतभक्ती केलेला जीव केवळ आयुष्याच्या अखेरच्या काही क्षणात वात्सल्यबुद्धीने का होईना एका जड जीवाच्या मायेत अडकतो आणि त्यासाठी अगदी हातातोंडाशी आलेला मुक्तीचा घास त्याला दुरावतो. त्यानंतर त्याला या पृथ्वीतलावर दोन अधिक जन्म घ्यावे लागतात ही जडभरताची कथा. पण अजामिळाची कथा याच्या अगदी विरूद्ध जाणारी आहे. तरीही दोन्हीही कथांचा संदेश आणि सारांश एकच आहे. म्हणून विरूद्ध भासणारी तरीही समांतर प्रवास करणारी ही दोन आख्याने.


अजामिळ नावाचा एक ब्राह्मण कुळात जन्माला आलेला जीव होता. ब्राह्मण कुळात जन्मला असला तरी तो शास्त्राने निषिद्ध असे वर्तन करून आपले व कुटूंबाचे पोट भरीत असे. चोरीमारी, जुगार, लूटपाट या त्याचा मुख्य व्यवसाय होता. जगणा-या अनेक जीवांना त्रास देत देत आपले जीवन जगत असताना ८८ वर्षात त्याने असंख्य पापे केलीत.


अजामिळाचे आपल्या धाकट्या पुत्रावर फ़ार प्रेम होते. त्याचे नाव नारायण. त्याच्यावर असलेल्या प्रेमामुळे तो अगदी नारायणमय झालेला होता. त्याच्या मुखात आणि मनात सतत धाकट्या मुलाचे, नारायणाचेच नाव असायचे. अजामिळाच्या मृत्यूसमयी त्याला यमदूतांचे भीषण दर्शन झाले आणि त्याच्या मुखातून जवळच खेळत असलेल्या आपल्या मुलाला "नारायणा" अशी आर्त हाक गेली. प्राणान्ताच्या समयाला अत्यंत आर्त भावनेने प्रभूंचे नाम मुखात आल्यामुळे तिथे विष्णूदूत धावून आलेत आणि अजामिळाला वैकुंठलोकी घेऊन जाण्याचे प्रयत्न करू लागलेत.



त्याला यमलोकी नेऊन त्याच्या जन्मभराच्या पापकर्मांबद्द्ल यमयातना देऊ इच्छिणारे यमदूत आणि त्याला वैकुंठलोकी घेऊन जाणारे विष्णूदूत यांचा बराच वाद त्याठिकाणी झाला. यमदूतांनी पापी जीवांच्या मृत्यूनंतरच्या गतीबाबत विष्णूदूतांना सांगितले. श्रीमदभागवताच्या षष्ठ स्कंधातील पहिल्या आणि दुस-या अध्यायात हा संवाद प्रत्येक जीवाने वाचण्यासारखा, ऐकण्यासारखा आणि मनन करण्यासारखा आहे. यमदूतांचे बोलणे श्रवण करून आपल्यासारख्या संसारलिप्त मनुष्यमात्रांमध्ये मनोमन बोध होऊन आपण आपसूकच पापकर्मे करण्यापासून वंचित राहतो. हा संवाद नुसता श्रवण केला तरी आपल्यासारख्या मनुष्यमात्रांची पापे नष्ट होतात ती अशी.


अंतिमतः विष्णूदूतांनी यमदूतांना उपदेश करून अंतिमसमयी कुठल्या का रूपाने होईना पण ज्या जीवच्या मुखात, स्मरणात भगवंताचे नाम आलेले आहे त्याला वैकुंठप्राप्तीच झाली पाहिजे अशी श्रीविष्णूंची आज्ञा यमदूतांना सांगून अत्यंत पापी असलेल्या अजामिळाला वैकुंठलोकाला नेले. श्रीशुकदेव महाराज राजा परिक्षितीला उपदेश करताना सांगतात की राजा अत्यंत पापी जीव जरी असला तरी त्याला केवळ भगवंताच्या नामाने, स्मरणाने, पश्चात्तापाने, प्रायश्चित्तमुळे, भगवंतावरील निःसीम भक्तीमुळे जेवढा वैकुंठलोक प्राप्त होऊ शकेल तेव्हढा इतर यज्ञ यागादि कर्मांमुळे होऊ शकणार नाही. भगवंताच्या नामाचे प्रेम आणि भक्तीच त्याला त्याच्या पापकर्मांपासून तारून नेईल. मात्र एकदा पश्चात्ताप झाल्यानंतर आणि त्याने भगवंताजवळ आपली पापे कबूल केल्यानंतर पुन्हा त्याने पापमार्गाकडे जाऊन उपयोग होणार नाही.



अजामिळ आणि जडभरत. वरवर अगदी विरूध्द वाटणारी दोन आख्याने. पण दोघांचेही सार एकच. शेवटल्या क्षणी नाम साधल्या गेले पाहिजे. शेवटल्या क्षणी जीव जर संसारातल्या कुठल्याही गोष्टीत अडकून राहील तर जडभरताप्रमाणे अनेक कष्टमय जन्म पुढे घ्यावे लागतील पण जर अजामिळासारखे नाम साधले तर मात्र विनासायास भगवंतप्राप्ती होईल. म्हणून अनेक संतांनी आपल्याला आयुष्यभर नाम साधण्याचा कायमच उपदेश केलेला आहे. तसा साधण्याचा आपण सगळेच प्रयत्न करूयात.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध तृतीया / चतुर्थी शके १९४८ दिनांक  १७ / ७ / २०२६


१७ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


श्रीमदभागवत चिंतन - १६ जडभरताची कथा

आपल्या भारतभूमीवर महाराजा भरत हे अतिशय मोठे सम्राट होऊन गेलेत. त्यांचे जीवन सगळ्यांना अतिशय आदर्श असे जीवन होते. अतिशय न्यायाने आणि भगवंताला स्मरून अनेक वर्षे राज्य केल्यानंतर त्यांनी अत्यंत निवृत्त मनाने वानप्रस्थाश्रम स्वीकारला. आणि आपल्या आयुष्याचा उरलेला कालावधी ते वनात आनंदाने आणि ईश्वरचिंतनात अगदी आदर्श पुरूषाप्रमाणे घालवू लागलेत.

योगायोगाने वनात त्यांना आपल्या आईपासून जन्मतःच दुर्दैवाने दुरावलेले एक हरिण बालक सापडले. राजा भरताच्या मनात त्या बालकाविषयी अपार करूणा उत्पन्न झाली आणि त्या आईविना बालकाचा ते आईच्या ममतेने सांभाळ करू लागले. त्या हरिण बालकाने त्यांना इतका हळूहळू इतका लळा लावला की त्याच्याशिवाय राजा भरतांचे अगदी पान हलेना. त्यांच्या सगळ्या जीवनक्रियांमध्ये ते हरिण बालक एक अविभाज्य घटक म्हणून राहिले. इतके की या पृथ्वीतलावरील हा देह सोडताना महाराजा भरतांना त्या हरिण बालकाचीच अपार चिंता लागून राहिलेली होती. आपल्याशिवाय त्या बालकाचे कसे होईल ? कोणी त्याला खाऊपिऊ तरी घालतील की नाही या अपार चिंतेतच महाराजा भरतांनी इहलोक सोडला.

आयुष्यभर परमेश्वर भक्तीत अत्यंत आदर्शवत जीवन जगणा-या राजा भरताला आपल्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणी त्या हरिणबालकाची चिंता लागून राहिली होती त्यामुळे त्यांना मुक्ती न मिळता पुढला जन्म हा हरिण बालकाचाच मिळाला. पण श्रीमदभगवतगीतेत श्रीभगवंतांनी वर्णन केल्याप्रमाणे "शुचिनाम श्रीमताम गेहे, योगभ्रष्टोभिजायते" या न्यायानुसार त्यांना मागील जन्माच्या आपल्या कर्मांची स्मृती त्या हरिण जन्मातही कायम होती आणि त्या जन्मात महाराजा भरतांना आपल्या अगदी थोडक्यात हुकलेल्या मुक्तीचा खूप पश्चाताप झाला. अगदी हाताशी आलेली मुक्ती केवळ वात्सल्यभावनेने या जगातल्या गोष्टींमध्ये अडकून पडल्यामुळे हुकली याची त्यांना त्या हरिणजन्मातही खूप खंत वाटे. त्या पशू जन्मातही त्यांनी विवेक जागृत ठेऊन या संसारातल्या गोष्टींमधून रूची काढून घेत आपला देह ठेवला. 

राजा भरत महाराजांना पुढला जन्म हा एका अंगिरस गोत्राच्या ब्राह्मणापोटी झाला. या जन्मापासूनच त्यांचा नित्य काय, अनित्य काय, शाश्वत काय अशाश्वत काय हा विवेक जागृत असल्याने ते या पृथ्वीतलावरील कुठल्याही गोष्टींबाबत अजिबात आसक्ती न बाळगता जगाच्या दृष्टीने मंदबुद्धी, पिशाच्चवत आणि जड असे जीवन जगू लागले. जीवनातल्या सगळ्याच कर्मांविषयी त्यांची आसक्ती नष्ट झाली होती म्हणून ते असे पिशासारखे जीवन जगू लागले. त्यात काही कालावधीने त्यांच्या मात्यापित्यांचे निधन झाले आणि त्यांची सावत्र भावंडे त्यांना अत्यंत हेटाळणीपूर्वक वागणूक देऊ लागलीत. एका जमातला हा सार्वभौम सम्राट आता इतरांच्या सांगण्यावरून माती गोटे उचलणे, रथ ओढणे यासारखी कामे करू लागला. अर्थात भरत महाराजांना त्या कर्माचा विषाद किंवा आनंद कधीही झाला नाही. मुक्तीच्या मार्गात गेल्या जन्मात आलेला अगदी थोडासा अडथळा आपल्या या जन्मांना आणि आता प्राप्त कर्मांना कारणीभूत ठरला आहे हे सत्य त्यांनी जाणले होते म्हणून या जडभरताच्या जन्मात ते अत्यंत निर्विकार मनाने आपली इथली कर्मे पार पाडत होते. इतर जनांना ते मूढ आणि जड भासत असले तरी ते अंतरंगी अत्यंत तीव्र वैराग्य साधून मागील जन्मांमध्ये हुकलेला आपला मुक्तीचा क्षण साधण्यासाठी या जगातल्या शाश्वत अशा भगवंताच्या नामाच्या, आराधनेच्या आश्रयाने जगत होते.



असेच जीवन जगत असताना सिंधुसौवीर राज्याच्या राजाची पालखी वाहण्यासाठी त्यांना सगळ्यांनी भोई म्हणून जुंपले. भरत महाराज आपल्या ईश्वरचिंतनात सतत मग्न असल्याने त्यांच्याकडून त्या पालखी संचलनात काही चुका होऊ लागल्यात आणि पालखीवर स्वार राजाचा पारा चढला. तो राजा आपल्या राजमदामध्ये त्यांना टोमणे मारू लागला आणि त्यांचा अपमान करू लागला. तेव्हा त्या जडभरताने त्या राजाला या जगात नित्य काय, अनित्य काय, शाश्वत काय, अशाश्वत काय याचा परमहंस उपदेश केला. राजाला त्या जडभरताचा अधिकार कळला आणि त्याने पालखीतून उतरून त्या जडभरताचे पाय धरलेत. आणि अनेक जन्मांना कारणीभूत होणा-या मायेचा त्याग करून तो रहूगण राजा मोक्षपदापर्यंत गेला. श्रीमदभागवतसंहितेतल्या पंचम स्कंधातले दशम, एकादश, द्वादश आणि त्रयोदश अध्याय हे या दृष्टीने मुळापासूनच वाचण्याजोगे आहेत.



आपल्यापैकी खूप जणांचेही असे होते, नाही का ? आयुष्यभर अगदी आदर्श असे वर्तन, भगवंताच्या भक्तीत जीवन जगत असताना आयुष्याच्या शेवटी प्राणांताच्या समयाला एखाद्या कुठल्या तरी अत्यंत साधारण गोष्टीत आपला जीव अडकतो आणि ते कर्म पुरे करण्यासाठी जन्म मरणाच्या फ़े-यातून कायमच्या मुक्तीऐवजी पुन्हा पृथ्वीतलावर आपण जन्म घेतो. त्यातल्या काही भाग्यवान मनुष्यमात्रांनाच पूर्वजन्मीचे, त्यात घडलेल्या चुकांचे स्मरण उरते आणि त्या चुका ते नवीन जन्मात सुधारण्याचा प्रयत्न करीत असतात पण बहुतांशी मंडळी मुक्तीच्या अगदी जवळ असताना पुन्हा या जन्ममरणाच्या फ़े-यात सापडून पुढले अनेक जन्म या जन्म आणि मृत्यूच्या भोव-यात गटांगळ्या खात बसतात. संतांना मृत्यूच्या भयापेक्षा या जन्माचे अधिक भय असते म्हणून त्यांचे या पृथ्वीतलावरील जगणे अगदी आदर्श असते.

परमपूजनीय ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर आपल्या सर्वांना नामात इतके राहण्याचा उपदेश करतात की अंतकाळी सगळ्यात शेवटी आपल्यातून सुटणारी गोष्ट म्हणजे नाम असली पाहिजे असे ते अगदी कळकळीने प्रतिपादन करतात. शेवटल्या क्षणाला भगवंताचे नाम साधल्या गेले तर जन्मभर केलेल्या कर्मांचा नाश होऊन भगवत्प्राप्ती होते हे आपल्या संतांनी शात्रांनी आपल्याला सांगून ठेवलेले आहे. पण शेवटल्या क्षणाला नाम साधायचे असेल तर आयुष्यभर त्या नामाचा अभ्यास आणि ध्यास असला पाहिजे. आयुष्यभर आपल्या जीवनात फ़क्त नाम आणि नामच भरून रहायला मात्र हवे.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध द्वितीया शके १९४८ दिनांक  १६ / ७ / २०२६


१६ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


Wednesday, July 15, 2026

श्रीमदभागवत चिंतन - १५ पुरंजनोपाख्यान (भाग दुसरा)

मागील भागात आपण चिंतन केल्याप्रमाणे मी, माझी पत्नी, माझी मुलेबाळे यांनाच सर्वस्व मानणारा राजा पुरंजन, त्याची नऊ द्वारे असलेली सुंदर नगरी, त्याचे प्रजाजन, त्याच्यावर जरा नामक कालकन्येचा झालेला हल्ला आणि त्याला प्राप्त होणारा उद्वेग, शोक यांचे आपण आजच्या सर्वसामान्य सांसारिक जनांशी काही नाते आहे का ? याचा आज आपण आपल्या मनात शोध घेऊयात.

कालकन्या जरा आणि तिच्यासोबतचे ३६० गंधर्व व ३६० गंधर्वी ह्यांनी राजाच्या नगरीच्या नऊही द्वारांमधून केलेल्या हल्ल्याने राजा हतबल झाला. अत्यंत विषयासक्त असल्याने तो या हल्ल्यांचा प्रतिकार करू शकला नाही. तो हतप्रभ झालेला पाहून प्रजाजनांमध्ये त्याच्याविषयी अनादर वाढला. एव्हढेच नाही तर तर ज्या कन्या, पुत्र, पत्नींसाठी त्याने जीवनभर आटाआटी केली यांनाही तो नकोसा झाला. हे पाहून त्याला मनोमन अतीव दुःख झाले. अशातच त्याला मृत्यू आला. पण पत्नीकडून इतका अपमान, इतका अपेक्षाभंग  होऊनही मृत्यूसमयी त्याला "आता माझ्यानंतर माझ्या पत्नीचे कसे होईल ?" याचीच चिंता लागून राहिली होती. त्यामुळे यमपुरीतले विविध भोग भोगून झाल्यानंतर त्याला पुढला जन्म हा विदर्भराजाच्या सुंदर राजकन्येचा मिळाला.



यथावकाश त्या वैदर्भीचा मलयराज नावाच्या अत्यंत पराक्रमी तितक्याच सात्विक राजाशी विवाह झाला. त्या दंपतींना अनेक पराक्रमी कन्या आणि पुत्र प्राप्त झाले. एका कालावधीनंतर राजा अत्यंत संन्यस्त जीवन जगू लागला आणि त्याची पत्नी वैदर्भी त्याच्या सेवेत मग्न होऊन आपल्या कर्तव्यात आनंद मानू लागली. अशा प्रकारे वानप्रस्थाश्रमात जीवन व्यतीत करीत असताना राजा मलयध्वज हा कालवश झाला. राजपत्नी वैदर्भीने त्याच्या परलोकगमनाचा खूप शोक केला आणि त्याकाळच्या प्रथेप्रमाणे त्याच्या चितेसोबत ती सती जायला तयार झाली.


तिची शोकाकूल अवस्था पाहून त्याठिकाणी एक ब्राह्मण आला आणि तिला उपदेश करू लागला. त्या ब्राह्मणाने वैदर्भीला तिचा मागील जन्म स्मरण करून दिला. एका हंसासारख्या विमल जीवाने नऊ द्वारे असलेल्या नगरीत कसा प्रवेश केला, तो त्या नगरीलाच आत्मस्वरूप समजून तो हंस कसा त्यात रमत गेला, त्यानंतर त्याच्यावर जरा नामक कालकन्येचा कसा हल्ला झाला आणि त्यात त्याचे नगर कसे भस्मसात झाले याचे स्मरण त्या ब्राह्मणाने वैदर्भीला दिले.


तो ब्राह्मण तिला म्हणाला "तू स्त्री नाहीस आणि गेल्याजन्मी होतास तसा पुरूषही नाही. आपण दोघेही हंस आहोत. मी ईश्वर आहे आणि तू जीवात्मा आहे. या जगात "मी स्त्री आहे, मी पुरूष आहे" असा भ्रम या परमहंस स्वरूप असलेल्या जीवाला केवळ ईश्वराच्या मायेने प्राप्त होतो. जो त्या मायेला भुलतो त्याला हा नऊ छिद्रे असलेला देह म्हणजेच स्वतःचे सर्वस्व वाटते. त्यात उपलब्ध असलेले सुखोपभोग घेणे हेच त्या जीवाला त्याचे परमकर्तव्य वाटते. त्या जीवावर वर्षातले ३६० गंधर्वरूपी दिवस आणि ३६० गंधर्वीरूपी रात्री निरंतर हल्ला करीत असतात. काळाची कन्या असलेल्या जरा म्हणजे म्हातारपण त्या जिवावर जबरदस्ती आक्रमण करीत असते. वास्तविक त्या जरेशी कुणीही स्वतःहून लग्न करायला बघत नाही, म्हातारपण कुणालाही आवडीने नको असते पण ती योग्य वेळी हल्ला करून त्या शरीराचा नाश करतेच. म्हणून आत्म्याने "मी म्हणजे शरीर" हा भ्रम सोडून देऊन स्वतःचे हंसस्वरूप जाणून या जगात वावरायला हवे."



त्या ब्राह्मणरूप परमात्म्याचा उपदेश ऐकून तो वैदर्भी नामक शोकाकूल जीव शांत झाला आणि परत त्या हंसरूपाला प्राप्त होऊन त्या ब्रह्मरूप हंसासोबत जीवरूप हंसरूपाने पुन्हा मानससरोवरात विहार करू लागला. जीव आणि ब्रह्म, जीवाचे देहाचे मायेत फ़सत जाणे आणि विचारहीन होऊन देहालाच आत्मस्वरूप समजणे यावर हे पुरंजनोपाख्यान आहे.



अगदी पहिल्याच लेखात चिंतन केल्याप्रमाणे प्रत्येक जीवाला त्याचे खरे परमात्मस्वरूप दाखवणे हे श्रीमदभागवताचे उद्दिष्ट आहे. राजा परिक्षितीला केलेला उपदेश हा तुमच्या माझ्यासारख्या संसारात, देहात बांधल्या गेलेल्या आणि देहालाच सर्वस्व मानणा-या सर्वसामान्य सांसारिकांसाठी आहे. याचे आपण सतत मनन करीत गेलोत तर या जीवनाशेवटी आपणही त्या निर्मळ हंसरूपाला प्राप्त होऊ ही श्रीमदभागवताची आपल्याला दिलेली ग्वाही आहे.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥




- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध प्रतिपदा शके १९४८ दिनांक  १५ / ७ / २०२६


१५ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


Tuesday, July 14, 2026

श्रीमदभागवत चिंतन - १४ पुरंजनोपाख्यान (भाग पहिला)

प्राचीन काळी पुरंजन नावाचा एक अतिशय पराक्रमी राजा होता. स्वतःला राहण्यासाठी आपल्या मनाजोगते नगर शोधत शोधत तो भटकत असताना त्याला नऊ द्वारांचे एक अतिशय सुंदर आणि रमणीय नगर दिसले. त्या नगरात वास करीत असलेली एक अतिशय सुंदर युवती आणि तिच्या सोबत असलेले अनेक नागरिक त्याच्या दृष्टीपथास पडले. त्या नगरीचे संरक्षण एक पाच फ़ण्या असलेल्या नागराज करीत होता. त्या नगरीचे एकूणच स्वरूप आणि रूपयौवनेचे मधुर भाषण याची भुरळ पडून राजा पुरंजन त्या नगरीतच राहू लागला.



राजा त्या नगरीच्या, त्या रूपयौवनेच्या भोगविलासांमध्येच रममाण झाला. दररोज वनात जाऊन मन मानेल तशी मृगया करणे, नगरीत परतल्यानंतर भोजनादि विलासांचे सेवन करणे आणि त्या राणीसोबत रतिक्रिडेत रममाण होणे हाच त्याचा जीवनक्रम बनला. याशिवाय त्याला काही सुचेनासे झाले. आपल्या अंगभूत पराक्रमाचे एकूण फ़लित म्हणजेच हे अनेक प्रकारचे भोगविलास प्राप्ती हे त्याच्या मनाने घेतले. तो या पृथ्वीतलावरील सर्व नवनवीन विलासांमध्ये अक्षरशः आकंठ बुडून त्यांचे सेवन करीत राहिला.

याच कालावधीत राजा पुरंजनाला अनेक कन्या आणि पुत्र प्राप्त झाले. त्यांचे त्याने विवाहादि संस्कार केलेत. आपले पुत्र, सुना, कन्या, जावई यांच्यामध्ये, त्यांच्या संसारांमध्ये, त्यांच्या कन्यापुत्रांच्या लाडाकोडात राजा पुरंजन मग्न झाला. त्याचे अर्धे आयुष्य असेच सरले.

चण्डवेग नावाचा एक गंधर्व आहे. त्याच्या अधीन असलेले ३६० गंधर्व आणि त्यांच्या पत्नी असलेल्या ३६० गंधर्वी आहेत. चण्डवेग गंधर्वराजाच्या आज्ञेनुसार हे गंधर्व आणि गंधर्वी या समस्त सृष्टीत सर्वत्र फ़िरून भोग आणि विलासात मग्न असलेली नगरे लुटण्याचे कार्य निरंतर करीत असता. त्यांना ही राजा पुरंजनाची नगरी दिसली आणि त्यांनी त्या नगरीला लुटण्यास प्रारंभ केला. त्या नगरीच्या रक्षणास असलेल्या सर्पाने तिचे रक्षण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला खरा पण चण्डवेग गंधर्वाच्या पार्षदांपुढे नगररक्षणाचे त्याचे प्रयत्न अपुरे पडत गेले.

याच दरम्यान प्रत्यक्ष काळाची जरा नामक कन्या आपल्या इच्छित वरासाठी सर्वत्र फ़िरत होती. पण तिचा कुणीही स्वीकार करीत नव्हते. प्रत्यक्ष देवर्षी नारदा्ंना सुद्धा तिने तिचा स्वीकार करण्याची गळ घातली पण नारदांनी तिला नकार दिला. तिने संतापून देवर्षी नारदांना एका जागी स्थिर न राहू शकण्याचा शाप दिला. त्यामुळे नारदांना कायम त्रैलोक्यामध्ये भ्रमण करणे आले. मनुष्यमात्रांचे कायम भले इच्छिणा-या देवर्षींनी त्या शापाचा वरासारखा उपयोग करून घेत कायम त्रैलोक्य भ्रमण करीत जागोजागी मनुष्यमात्रांना उपकारक अशा लीला केल्यात. आपल्याला प्राप्त झालेल्या प्रतिकूल परिस्थितीचा ज्ञानी लोक विषाद न मानता त्यातूनही अनुकूलता कशी शोधत त्यावर मात करतात याचे हे एक उदाहरण.



त्या कालकन्येला यवनराजाने असा वर दिला की जे नगर आणि त्यातले नगरवासी निरंतर भोग आणि विलासांमध्ये मग्न राहतील, त्यात तू आणि तुझा बंधू प्रज्वार हे दोघे घुसू शकाल आणि त्या नगरीचा सहज विध्वंस करू शकाल. तुम्ही दोघेहे त्या नगरीवर राज्य कराल आणि ती नगरी आपल्या पित्याला, काळाला, भेट देऊ शकाल. या प्राप्त वरानुसार ती कालकन्या, जरा आणि प्रज्वार नामक तिचा भाऊ हे राजा पुरंजनाच्या नगरीत घुसलेत आणि त्यांनी सर्व नगरीच्या नाशाला प्रारंभ केला. आपल्या डोळ्यासमोर आपल्या सर्व वैभवाचा असा नाश होत असलेला पाहून आधीच हतबल असलेला राजा पुरंजन अतिशय दुःखित झाला, शोकाकूल झाला.

मी, माझी पत्नी, माझी मुलेबाळे यांनाच सर्वस्व मानणारा राजा पुरंजन, त्याची नऊ द्वारे असलेली सुंदर नगरी, त्याचे प्रजाजन, त्याच्यावर जरा नामक कालकन्येचा झालेला हल्ला आणि त्याला प्राप्त होणारा उद्वेग, शोक यांचे आपण आजच्या सर्वसामान्य सांसारिक जनांशी काही नाते आहे का ? याचा आज आपण आपल्या मनात शोध घेऊयात का ? या कथेच्या उत्तरार्धात उद्या या गोष्टींचा उलगडा निश्चित होईल पण या गोष्टींचे प्रत्येक संसारी जीवाने अगदी अंतरातून मनन करणे आणि त्यांना तसे ते मनन घडवणे हेच श्रीमदभागताचे उद्दिष्ट आहे, हीच या कथेची फ़लशृती आहे, हा बोध प्रत्येक जीवाला होणे हाच श्रीमदभागवताचा प्रसाद आहे.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥




- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" ज्येष्ठ अमावास्या शके १९४८ दिनांक  १४ / ७ / २०२६


१४ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


Monday, July 13, 2026

श्रीमदभागवत चिंतन - १३ दक्षप्रजापतींचा यज्ञ आणि सतीचा देहत्याग

ब्रह्माजींचे पुत्र दक्षप्रजापती आणि स्वायम्भुव मनु यांची कन्या प्रसूति यांचा विवाह झाला आणि त्यांना एकूण सोळा कन्यारत्ने प्राप्त झालीत. दक्षप्रजापतीने त्यातल्या तेरा कन्या धर्माला, एक अग्निला, एक पितृगणाला आणि सती नामक एक कन्या या संसाराचा संहार करणा-या आणि समस्त जीवांना जन्म मृत्यूच्या फ़े-यातून मुक्त करणा-या भगवान शंकराला दिली.



एकदा दक्षप्रजापतींनी एक यज्ञ केला. त्यात यजमान म्हणून ते स्वतः यज्ञस्थळी आल्यानंतर त्याठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व देव देवतांनी त्यांना आपापल्या आसनांवरून उठून आदराने वंदन केले.भगवान शंकर मात्र आत्मस्वरूपात मग्न असल्याने त्यांनी मात्र दक्षप्रजापतींना उठून वंदन केले जाही. ते आपल्या आसनावरच बसून राहिले. ते पाहून दक्षप्रजापतींचा क्रोध अनावर झाला. महादेव शंकरांनी से कृत्य मुद्दामच केले असा त्यांनी ग्रह करून घेतला आणि जमलेल्या सभेला उद्देशून ते महादेवांविषयी, त्यांच्या गणांविषयी वाईट साईट बोललेत. आत्मचिंतनात मग्न असल्याने महादेव शंकरांवर त्यांच्या बोलण्याचा काहीही परिणाम झाला नाही, किंबहुना त्यांनी आपल्या सासरेबुवांनी काढलेले अनुदार उदगार ऐकलेच नाहीत. ते आत्मानंदात मग्न होते.

हे बघितल्यानंतर दक्षप्रजापतींच्या रागाचा पारा अधिकच चढला. त्यांनी महादेवांना यज्ञाचे कुठलेच फ़ळ, कुठलाही हविर्भाग कधीच प्राप्त होऊ नये असा शाप दिला. वास्तविक सभेत जमलेली इतर थोर मंडळी दक्षप्रजापतींना असे न करण्याबाबत सांगत होती पण क्रोधात पूर्णपणे बुडाल्याने त्यांनी इतर जनांचे न ऐकता महादेवांना आणि त्यांच्या इतर गणांना हा शाप दिलाच.

शिवगणांमधल्या नंदिकेश्वराला हा महादेवांचा अपमान सहन झाला नाही. त्याने दक्षप्रजापती आणि त्यांना अनुमोदन देणा-या सभेतल्या इतरांना उलट शाप दिला. प्रत्यक्ष जन्म आणि मृत्यूच्या फ़े-यातून सर्व जगताला मुक्त करणा-या महादेव शंकरांचा देहापलिकड्ला विचार ज्या जनांना समजत नाही ते जन देहातच अडकून बसोत, कर्मकांडांमध्येच त्यांचा जीव सदैव अडकला राहो. महादेव शंकरांचा मुक्तीचा त्यांना लाभ न होवो असा शाप नंदिकेश्वराने दक्षप्रजापतींना आणि त्यांना साथ देणा-या सभाजनांना दिला.

यावर भृगूंनी पुन्हा महादेव शंकरांना आणि त्यांच्या समस्त गणांना सदैव पाखंड मार्गाने जाण्याचा आणि नियत कर्म न करता अशौच अपवित्र मार्गातच सदैव राहण्याचा शाप दिला. यावेळेपर्यंत महादेव आपल्या भानावर आलेले होते. झालेला प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते खिन्न झालेत आणि आपल्या गणांसह ते यज्ञस्थळ सोडून आपल्या निवासस्थानी परतलेत.

आपल्याही आयुष्यात असे काही प्रसंग येतात. कधीकधी कुणाकडून तरी त्याच्याही नकळत एखादी चूक घडलेली असते पण त्याची मनोवस्था जाणून न घेता, त्या व्यक्तीने ती चूक जाणीवपूर्वक केलेली आहे असा आपला ग्रह होतो आणि आपण त्या व्यक्तीविषयी ग्रह करून घेतो, क्वचित त्याचा अपमानही करतो. शब्दाने शब्द, मुद्याने मुद्दा वाढत जातो आणि अगदी अकारण आत्मीय संबंध दुरावतात. आपल्याबरोबर झालेल्या वादविवादांमध्ये खरेच मुद्दे किती आणि आपल्या अहंकारांमुळे आपल्याला न कळलेली सत्यस्थिती किती याचे विश्लेषण आपण जर आपल्या मनाशी केले तर आपल्याला आपल्या अनेक भांडणामधला, वादांमधला फ़ोलपणा कळून येईल. आपले मन शुद्ध होईल, निर्मळ होईल. ही कथा ऐकण्याचा, मनन करण्याचा हाच प्रसाद आहे. तो आपल्या मनाला मिळतो.

त्या यज्ञानंतर ब्रह्माजींनी दक्षप्रजापतींना अधिक उच्चपद दिले आणि त्यांचा अहंकार वाढला. त्यांनी आणखीही दोन महायज्ञांचे आयोजन केले आणि महादेवांचा जाणीवपूर्वक अपमान करण्यासाठी फ़क्त त्यांना निमंत्रण न देता आपल्या इष्ट मित्रांना, सगळ्या देवांना आणि आपल्या इतर कन्या, जावयांना यज्ञासाठी बोलाविले. त्या यज्ञांची वार्ता ऐकून महादेवपत्नी सती आपल्या आईला, वडिलांना, इतर बहिणींना भेटण्यासाठी, त्यांचे कुशलवृत्त विचारण्यासाठी उत्सुक झाली आणि यज्ञाला उपस्थित राहण्यासाठी आपल्या पतींची, महादेवांची परवानगी मागू लागली. 

महादेव शंकरांनी आपल्या पत्नीची समजूत काढली. अगदी आप्त स्वकीय असले कुठली घरे जाण्यासाठी वर्ज्य करावीत यावर महादेव शंकरांचा आपल्या पत्नीला केलेला श्रीमदभागवतातील चतुर्थ स्कंधातला हा उपदेश समस्त दांपत्यांनी मुळापासून वाचण्यासारखा आणि कायम लक्षात ठेवण्यासारखा आहे. पण पतीच्या विवेक विचारपेक्षा त्याक्षणी सतीच्या मनातली आपल्या आईला, बहिणींना इतर आप्तजनांना भेटण्याची इच्छा प्रबल ठरली आणि ती आपल्या पित्याने आयोजित केलेल्या यज्ञस्थळी रवाना झाली. यावेळी अत्यंत नाईलाजाने महादेवांनी तिला परवानगी दिली. 

यज्ञस्थळी आल्यानंतर महादेवपत्नी, दक्षकन्या सतीने आपल्या आईची, बहिणींची प्रेमपूर्वक भेट घेतली. इथे त्या सगळ्यांना खरोखर खूप आनंद झाला होता पण पित्याने आयोजित केलेल्या यज्ञात आपल्या पतीच्या परोक्ष त्याचा जाणीवपूर्वक अपमान करीत हे कार्य संपन्न होत असल्याचे तिच्या लक्षात आले. किंबहुना आपल्या पतीचा जाणीवपूर्वक अपमान करण्यासाठीच या कार्याचे आयोजन करण्यात आल्याचेही तिच्या लक्षात आले. आपले पती महादेवांनी वारंवार न जाण्याविषयी विनंते करूनही आपण आपल्या पित्याकडील कार्यात आलोय या गोष्टीचा तिला पश्चात्ताप झाला आणि महातेजस्वी महासतीने त्या यज्ञस्थळीच आपल्या पित्याची व महादेवांच्या अपमानात त्यांना साथ देणा-या इतरांची अत्यंत कडक शब्दात निर्भत्सना केली. आपल्या पतीच्या सर्वसंसारातल्या समस्त जीवांच्या कल्याणाच्या रूपाची प्रशंसा केली आणि त्या पश्चात्तापातच आपला देहत्याग केला.

महासतीच्या देहत्यागानंतर सर्व घटनाक्रम जाणून महादेव शंकर अतिशय क्रुद्ध झालेत. त्यांचा पार्षद असलेल्या वीरभद्राकडून त्यांनी दक्षयज्ञाचा विध्वंस आरंभला आणि आपल्या पत्नीच्या वियोगात शोकसागरात बुडून गेलेत. त्यावेळी त्यांचा क्रोध शांत करण्यासाठी ब्रह्माजींनी आणि भगवान महाविष्णूंनी त्यांची, त्यांच्या कार्याची यथार्थ स्तुती केली आणि त्यांचे तांडव थांबवले. अन्यथा महादेव आपल्या क्रोधाग्नीत ही समस्त सृष्टी विनाशाकडे नेणार होते. तसे झाले नाही.

कर्ममार्गाने विधिवत आचरण करून,व्यवस्थितपणा ठेऊन भगवंतांची आराधना करणा-यांने केवळ बाह्य रूपाने एखाद्याला जोखू नये. बाह्यरूपाने एखाद्या वेळेला शास्त्र असंमत, मलिन असलेल्या एखाद्याच्या अंतरात मात्र अत्यंत शुद्ध भावना, पावित्र्य असू शकते याचा विचार करून, त्या व्यक्तीचा विश्वकल्याणाचा, भगवंताला प्राप्त करून घेण्याचा मार्ग मार्ग निराळा असला तरी तो समजून त्याचा आदर करीत आपण परस्परसंबंध जपले पाहिजेत हाच या कथेचा अन्वयार्थ. श्रीमदभागवत हे भगवान विष्णूंच्या लीलांचे वर्णन असले तरी समस्त शिवभक्तांसाठी अतिशय पूजनीय असा हा चतुर्थ खंड आणि त्यातले हे पहिले सात अध्याय. 



॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" ज्येष्ठ वद्य चतुर्दशी शके १९४८ दिनांक  १३ / ७ / २०२६


१३ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६