श्रीमदभागवताच्या फ़लश्रृतीबाबत चिंतन करताना आपण यापूर्वीच्या लेखात श्रीमदभागवताच्या पठनाने ज्ञान, वैराग्य आणि भक्तीच्या प्राप्तीबाबत सविस्तर बघितले. त्यानंतर भगवान देवव्यासांनी जी फ़लश्रृती याठिकाणी विशद केलेली आहे ती मोठी विलोभनीय आहे. ती म्हणजे "नैष्कर्म"
मागील जन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे आणि या जन्मी जे करावे ते पुढल्या जन्मा उरवावे अशा रितीने प्रत्येक जन्मात अनेक बरी वाईट कर्मे करीत अनेकविध योनींमधून कोटी जन्म घेतल्यानंतर आपल्याला विचारांचा, विवेकाचा विशेषाधिकार असलेला हा मनुष्यदेह प्राप्त झालेला आहे. या देहातच आपण आपल्या कर्मांविषयी चिंतन करू शकतो, कर्मांविषयी जागृत राहून याच जन्मात या जन्ममृत्यूच्या फ़े-यामधून कायमची मुक्ती प्राप्त करून घेऊ शकतो. किंबहुना आपण ही अशी मुक्ती प्राप्त करून घ्यावी म्हणूनच आपल्याला भगवंताने या जन्मात मनुष्यदेह दिलेला आहे.
बरे, जन्मापासून आपल्या मृत्यूपर्यंत आपण सतत काही ना काही कर्मे करीतच असतो. जन्मानंतरची काही वर्षे सोडल्यास नंतरचे सगळे जीवन आपण आपली सगळीच कर्मे काही ना काही हेतूने करीतच असतो. कर्म केल्याशिवाय या जगात आपण जगूच शकत नाही.
पण प्रत्येक कर्माचे काही ना काही फ़ळ हे सुद्धा सतत निर्माण होत असते. समाजाला उपकारक चांगल्या कर्मांची चांगली फ़ळे तर स्वतःसकट इतरांना अपकारक, दुखावणा-या कर्मांची वाईट फ़ळे यांचे चक्र सतत सुरूच असते. चांगल्याही कर्माची फ़ळे आपल्याला भोगायची असतात तर वाईटही कर्मांची फ़ळे आपल्याला भोगायचीच असतात. चांगल्या कर्मांची फ़ळे वाईट कर्मांच्या फ़ळांमुळे आपोसाप रद्द होत नाहीत तसेच वाईट कर्मे केल्यानंतर दोन चार चांगली कर्मे करून त्या वाईट कर्मांच्या दुःखदायक फ़ळांपासून मनुष्य सुटका करून घेऊ शकत नाही. ही फ़ळे याच जन्मी भोगावी लागतात आणि या जन्मी जर तशी भोगता आली नाही तर त्यासाठी पुढला जन्म मिळतो त्यात ती भोगावी लागतात.
हे जन्म घेणे, पुढला जन्म कुठल्या योनीत मिळेल याचा निर्णय घेणे हे मात्र मनुष्यांचा अधिकारात नाही. मात्र एकदा मनुष्यजन्म मिळाल्यानंतर त्यात कुठली कर्मे करावीत हा अधिकार मात्र आपल्याला आहे. जाणते अजाणतेपणी आपल्या हातून भली बुरी अशी सर्व प्रकारची कर्मे होत असतातच. आणि त्या कर्मांच्या फ़ळांचे लिंपण आपल्याभोवती सतत होत असते. त्या लिंपणातून बाहेर पडून, या सर्व कर्मफ़ळांचा त्याग करून मूळ, विशुद्ध रूपात आपण सदैव राहून या जन्माच्या शेवटी त्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी हेच मनुष्यज्न्माचे एकमात्र आणि अंतिम ध्येय आहे.
मग अशामध्ये कुणी जीवाने कुठलेही कर्म न करता त्या जीवाचा जन्म होताना त्याच्या कर्माची मूळची कोरी पाटी तशीच ठेऊ म्हटले तरी ते शक्य नाही. आपण या जगात घेत असलेला प्रत्येक श्वास हे सुद्धा एक कर्मच मानले जाईल. मग या जन्मातले आपले कर्म नष्ट कसे करायचे ? हाच विवेकी मनुष्यांपुढला मोठा प्रश्न असतो. श्रीव्यंकटेशस्त्रोत्रात भगवान श्रीव्यंकटेशाची विनवणी करताना स्तोत्र रचयिता संत श्री देवीदास महाराज विनवणी करतात "धाव पाव रे गोविंदा, हाती घेऊनिया गदा, करी माझ्या कर्मांचा चेंदा, सच्चिदानंदा श्रीहरी."ते ह्याच एका गोष्टीसाठी.
आपण मनुष्यमात्रांनी जाणतेपणी वाईट कर्मे तर करू नयेच म्हणजे त्यांची फ़ळे भोगावी लागणार नाही पण अजाणतेपणी सुद्धा अशी कर्मे आपल्याहातून होऊ नयेत यासाठी आपल्या विचारांना कायम जागृत ठेवावे. आणि तरीही अशी काही कर्मे अत्यंत अजाणतेपणी आपल्याकडून घडलीच तर त्यांचे कितीही सौम्य का असेना पण कर्मफ़ळ आनंदाने भोगायला तयार असावे. हे कर्मफ़ळ भोगताना आज आपण आपल्या कर्माच्या बॅलन्सशीटमधील काहीतरी कर्ज उणे केलेय ही भावना मनी असावी. आणि अशावेळी आपले मन त्या परिस्थितीत सुद्धा आनंदित ठेवावे. या जन्मात कुठलेही दुःख भोगत असताना हे या जन्मातले किंवा मागील जन्मातले आपण जाणता अजाणता केलेले पापकर्म आता आपल्याला फ़ळ देतेय ही भावना मनी बाळगावी आणि मनाला सम आणि शांत ठेवावे. ते दुःख भोगताना त्यातून नवा क्षोभ, नवा द्वेष उत्पन्न करून नवीन कर्मांना आणि पर्यायाने त्याच्या फ़ळांना जन्म देऊ नये.
याचबरोबर समाजोपयोगी, सात्विक प्रवृतीची पोषण करणारी चांगली कर्मे सतत करीत असावे. मग आता प्रश्न पडतो की अत्यंत चांगल्या कर्मांची तितकीच चांगली फ़ळे भोगायला आपल्याला पुढला जन्म तर घ्यावाच लागेल. पुढला जन्म कुठे आणि कसा व्हावा हे आपल्या हातात नाही. मग ही चांगली फ़ळे भोगायला घेतलेल्या आनंदित, सुखी पुढल्या जन्मात पुन्हा आपल्या कडून जाणते अजाणतेपणी काही चांगली वाईट कर्मे घडत गेली तर त्यांची फ़ळे भोगायला पुन्हा पुढचा जन्म. मग आपली कर्माची बॅलन्सशीट टॅली कशी आणि कधी होणार ? या मृत्यू लोकात सगळ्यांना अटळ अशा मृत्यूचे भय आहे पण संतांना पुढल्या जन्माचे भय आहे म्हणून संत प्रार्थना करीत असताना "जनन मरण भय हरण करी परी, चरणी शरण दृढ केशव किंकर"ही प्रार्थना अगदी आळविइन आळवून करत असतात.
परम पूजनीय ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकरांचा एक दृष्टांत आहे. एक गृहस्थ गावातून लगबगीने स्टेशनकडे निघाले होते. त्यांना रेल्वेत बसून दुस-या मुक्कामाला जायचे होते. वाटेत एका गृहस्थाशी त्यांचे भांडण झाले आणि भांडणात वाद करीत बसल्याने त्यांची त्यादिेवशीची गाडी सुटली. दुस-या दिवशी पुन्हा ते गृहस्थ त्याच वेळेवरची गाडी पकडायला निघाले. आज त्यांना त्यांचा एक जिवलग मित्र रस्त्यात भेटला. त्याच्यासोबत हास्यविनोदात ते रमलेत आणि पुन्हा त्यांची गाडी सुटली. महाराज म्हणतात, भांडण झाल्यामुळे गाडी सुटली काय किंवा हास्यविनोदात रमल्यामुळे गाडी सुटली काय ? परिणाम एकच झाला. गाडी सुटली. त्याप्रमाणेच आपल्या पापकर्मांमुळे ही जन्ममृत्यूच्या फ़े-यातून मुक्त होण्याची गाडी चुकली काय किंवा आपल्या अत्यंत चांगल्या कर्मांमुळे ही गाडी चुकली काय ? परिणाम एकच. मुक्ती चुकली.
या विषयावर भगवंतांनी अर्जुनाला श्रीमदभवतगीतेत उपदेश करताना एकच सांगितले आहे. हे अर्जुना, तू तुझी सगळी कर्मे मला अर्पण कर. तू त्या कर्मांची मालकी स्वतःकडे घेऊ नकोस. तू फ़क्त माझे साधन म्हणून ती कर्मे करत आहेस ही भावना मनात ठेव. मी देह नाही. मी आत्मस्वरूप आहे. मी त्या परमात्म्याचाच एक अंश आहे. मी कर्ता नाही मी फ़क्त त्या परमात्माच्या कर्तृत्वशक्तीचे एक साधन आहे या भावनेने चांगली कर्मे सतत करीत राहिलोत तर त्या कर्मांची फ़ळे आपल्याला चिकटणार नाहीत. कर्मे केल्याशिवाय तर या जगात आपण जगू शकणार नाहीच पण अशा पद्धतीने वर्तन आणि विचार ठेवलेत तर मात्र त्या कर्मांच्या फ़ळांपासून आणि पर्यायाने जन्म मरणाच्या या अनंत फ़े-यापासून आपण याच जन्मात मुक्त होऊ शकू आणि परमात्मस्वरूपात कायमचे विलीन होऊ शकू. हेच ते नैष्कर्म.
श्रीमदभागवतात वैराग्याची मूर्ती असलेल्या श्रीशुकदेवांनी परिक्षितीराजाला जो उपदेश केलेला आहे तो या नैष्कर्माचे आविष्करण करणारा आहे. या महापुरानाच्या केवळ पठनाने, त्याचे विचारपूर्वक श्रवण केल्याने मनुष्याच्या मनात भगवंताविषयी भक्ती उत्पन्न होऊन तो मनुष्य जा जन्म मरणाच्या फ़े-यतून मुक्त होईल याची ग्वाही भगवान श्रीवेदव्यासांनी आपल्याला दिलेली आहे.
तत्र ज्ञान-विराग-भक्ति-सहितम्
नैष्कर्म्यम् आविष्कृतम
तत शृण्वन् सु-पठान् विचारण-परो
भक्त्या विमुच्येन्नरः॥
ही अशी ग्वाही जेव्हा ही थोर मंडळी आपल्याला देतात त्यावर पूर्णतः विश्वास आपल्याला ठेवायचाच असतो. त्या मंडळींनी हे ग्रंथ रचताना आजच्या युगासारखे, त्यांचा खप झाला पाहिजे, त्यांना कुणीतरी साहित्यिक म्हटले पाहिजे, ते लोकप्रिय झाले पाहिजेत म्हणून लोकानुनयासाठी ही शब्दरचना केलेली नाही. तर ग्रंथाच्य वाचकाला मुक्ती मिळवून देण्याची ही त्यांची तळमळ आहे आणि ही त्यांची खरी आध्यात्मिक शक्ती आहे. त्यामुळे श्रीमदभावताच्या श्रवणाने, पठनाने आणि त्यावर मनन केल्याने आपणही याच जन्मात त्याच्य फ़लश्रृतीत वर्णन केलेले नैष्कर्म प्राप्त करून घेऊ यावर दृढ विश्वास ठेवूयात आणि आपल्या जीवनाची त्या ध्येयाने वाटचाल करूयात.
॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥
- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" ज्येष्ठ वद्य चतुर्थी शके १९४८ दिनांक ४ / ७ / २०२६
४ जुलै २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#जुलै२०२६


