Sunday, May 24, 2026

जननीजनक माया लेकरू काय जाणे ?

आपल्या बालपणी आपण एखाद्या परिचितांकडे, नातेवाईकांकडे जातो. तिथे गेल्यानंतर आपल्या बालसुलभ मनाला तिथल्या एखाद्या वस्तूची, तिथे आपल्याला मिळालेल्या वागणुकीची किंवा तिथल्या एकूणच वातावरणाची खूप भुरळ पडलेली असते. तिथे पुन्हापुन्हा यावेसे वाटते. तिथून परतताना आपला पाय अगदी निघत नसतो.


काही कालावधीनंतर आपण आपल्या पालकांकडे त्याठिकाणी पुन्हा जाण्याचा प्रस्ताव मांडतो, हट्ट करतो. पण आपली पालकमंडळी आपल्याला काही ना काही कारण सांगून तो प्रस्ताव लांबणीवर टाकतात. त्या ठिकाणच्या वातावरणाची जबर मोहिनी आपल्या मनावर असल्याने आपण पुन्हा काही कालावधीनंतर तोच प्रस्ताव, हट्ट पुन्हा करतो पण आपली पालक मंडळी तो प्रस्ताव पुन्हा लांबणीवर टाकतात, क्वचितप्रसंगी धुडकावून पण लावतात. आपल्याला मनोमन दुःख होते. आपले पालक उगाचच आपल्याला त्या ठिकाणी जायला मनाई करत आहेत, आपण आता त्या ठिकाणी जाऊन मागच्या भेटीत अनुभवलेले वातावरण पुन्हा अनुभवू शकणार नाही याची दुःखद जाणीव आपल्याला अगदी बालवयातही झालेली असते. पण असे का ? याचा उलगडा आपल्याला होत नाही. 


आपले पालकही खरोखर अशा मोठ्या मनाचे आणि थोर असतात की मागील भेटीत त्या ठिकाणी गेलेले असताना त्यांच्या मनावर तिथे गेल्यामुळे काय ओरखडा उमटला आहे, तिथे त्यांचा काय अपमान झाले किंवा काय वेदना झालेल्या आहेत, ह्या बाबी ते आपल्याला कळू देत नाहीत. लहान मुलांना या गोष्टी कशाला कळायला हव्यात ? हा एक दृष्टीकोन किंवा लहान लहान मुलांना या गोष्टी सांगून त्यांच्या बालमनात तिथल्या लोकांविषयी नकारात्मक भावना आपण कशाला निर्माण करायची ? हा आणखी एक दृष्टीकोन त्यांचा असतो.


यथावकाश आपण मोठे होतो. ती घटना, तो हट्ट आणि आपल्या पालकांनी त्यावेळी दिलेला नकार अजूनही आपल्या स्मरणात असतो. त्यामागे असलेल्या कारणांचा आपण धूसर अंदाज घेऊ शकतो. पण आता आपले पालकच अस्तित्वात नसतात. आपले जीवन जगून स्वतःचे अस्तित्व अनंतात विलीन करून ते कधीचेच फ़ोटोंमध्ये जाऊन बसलेले असतात. 


आपण आता पालक झालेले असतो आणि क्वचित असाच प्रसंग आपण व आपल्या पाल्यांबाबत घडतो. अशावेळी आपली मुले आपल्याला अशा घटनेचा जाब, कारणमीमांसा विचारतात. एकेकाळी आपले पालक झाले होते तसेच आपण निरूत्तर होतो, घटना लपवून ठेवतो, त्या अपमानाची, उपेक्षेची झळ आपापल्या पाल्यांना पोहोचू देत नाही.


आणि मग आपल्याला आपले आईबाप आठवतात. त्यांची माया आठवते आणि श्रीसमर्थांची उक्तीही आठवते.


जननीजनक माया लेकरू काय जाणे

पय न धरत मुखी हाणिता वत्स नेणे


- प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर 

अधिक ज्येष्ठ शके १९४८, 

२४ / ५ / २०२६

 

Thursday, May 21, 2026

भारतीय रेल्वे, पाकिस्तान रेल्वे आणि बांगलादेश रेल्वे

आमच्या रेल्वेफ़ॅनिंग गृपवर पाकिस्तान रेल्वेचे पण व्हिडीओ आणि फ़ोटोज येत असतात. अगदी गेल्या 5 - 6 वर्षांपासून आम्हाला हे फ़ोटोज आणि व्हिडीओज बघायला मिळतात. मी आवर्जून हे व्हिडीओज पाहतो कारण भारतीय रेल्वेतल्या 80 च्या  आणि  90 च्या दशकाच्या अगदी सुरूवातीच्या रेल्वेप्रवासाचा नोस्टॅल्जिया इथे अनुभवायला मिळतो. पाकिस्तान रेल्वेच्या स्टेशनांची स्थिती, ती डिझेल इंजिने, ते कोचेस, एका गावावरून दुस-या गावाला जाताना त्यांच्या रेल्वेमार्गाची स्थिती, जेमतेम 80 ते 90 किमी प्रतितास या वेगाने धावणा-या त्यांच्या एक्सप्रेस गाड्या हे सगळं मला माझ्या बालपणात, तरूणपणात घेऊन जातं.



आपल्यापेक्षा पाकिस्तान रेल्वे किमान 30 ते 35 वर्षे मागास आहे हे पाहून आपल्या भारतवर्षाविषयी आणि इथल्या गेल्या 35 वर्षांमधल्या रेल्वेमंत्र्यांविषयी आदर वाटतो. अपवाद फ़क्त लालू आणि ममताचा. 


लालूने आणलेल्या गरीब रथ रेकची रंगसंगती पाकिस्तान रेल्वेशी तंतोतंत जुळते. इथेही या उपद्रवी माणसाने आपले लांगूलचालन कौशल्य पणाला लावले होते हे जाणवते. हा माणूस आणखी काही काळ रेल्वेमंत्रीपदावर असता तर भारतीय रेल्वेची त्याने अगदी पाकिस्तान रेल्वे करून टाकली असती.


तसेच ममता बॅनर्जी हा हट्टी बाईचे. अजून काही वर्षे ही बाई रेल्वेमंत्री असती तर भारतीय रेल्वेचा सगळा निधी हिने कुठलाही विधीनिषेध न बाळगता बंगालकडे वळवला असता आणि भारतीय रेल्वेची बांगलादेश रेल्वे करून टाकली असती. 


माझ्या मते गेल्या शतकात, पूर्ण बहुमतात सरकार असताना माधवराव शिंदे हे शेवटले "भारतीय" रेल्वेमंत्री ठरावेत. ज्यांनी संपूर्ण भारताचा विचार केला. 1991 नंतर 2014 पर्यंत विविध आघ्याड्यांची सरकारे आलीत आणि "भारतीय" दृष्टीकोन मागे पडला. प्रत्येक रेल्वेमंत्र्याने आपापल्या प्रांताचा विचार करून रेल्वेखाते राबवले. यात वाजपेयी सरकारमधले रामविलास पासवान आणि नितीशबाबूही अपवाद नाहीत. त्यांचे वागणे बोलणे तत्कालीन पंतप्रधानांना पटत असेलच असे नाही, कदाचित नसेलही पण त्यांच्याकडे असलेल्या खासदारांच्या संख्याबळाने त्याकाळातल्या सर्व पंतप्रधानांचे हात बांधल्या गेले होते हे सुद्धा तितकेच सत्य आहे.



वाजपेयी सरकारमध्ये राम नाईक रेल्वे राज्यमंत्री असताना त्यांनी हा भारतीयत्वाचा प्रयोग करून पाहिला. पण राज्यमंत्री म्हणून त्यांचे अधिकार मर्यादित होते. आणि आपल्याच प्रांताविषयी विचार न करता संपूर्ण भारतवर्षाचा विचार करणे ही टिपीकल मराठी माणसाचीच मक्तेदारी आहे हे ही सिद्ध झाले. मधू दंडवते, राम नाईक आणि आता पीयुष गोयल. तिघांनीही फ़क्त महाराष्ट्राचा विचार न करता संपूर्ण देशाचा विचार रेल्वेमंत्री पदावर असताना केला ह्याची नोंद काळाच्या या विशाल कॅनव्हासवर इतिहासाला घ्यावीच लागेल.


2014 नंतर मात्र "प्रथम भारतीय"ता सगळ्याच आघाड्यांवर राबवलेली दिसू लागली. ज्यांनी ज्यांनी संकुचित प्रांतवाद केला त्यांना त्यांना केंद्रिय सत्ता आणि भारतीय जनता राजकारणाबाहेर करू लागली. भारतीय रेल्वेची धोरणांची, अंमलबजावणीची गाडी वेगवान रूळांवर सुपरफ़ास्ट धावू लागली.


- भारतीय रेल्वेतले बदल जवळून अनुभवणारा, अभ्यासणारा एक रेल्वेफ़ॅन आणि प्रांतीय विचार करणा-या संकुचित रेल्वेमंत्र्यांबद्दल कमालीची चीड असलेला एक भारतीय नागरिक, प्रा, राम प्रकाश किन्हीकर.


या निमित्ताने आम्ही रेल्वेमंत्री झालोच तर काय करू ? याचे एक स्वप्नरंजन इथे आणि इथे

Wednesday, May 20, 2026

गाणी, सुरावटी आणि टाईम मशीन

काहीकाही गाणी, सुरावटी मनाला टाईम मशीन मध्ये बसवून भूतकाळात आणि भलभलत्या ठिकाणी घेऊन जातात.


आकाशवाणीवर एकेकाळी सादर होणार्‍या "सांजधारा" कार्यक्रमातली मराठी गाणी लागलीत की सी.पी. अॅण्ड बेरार शाळेतून दिवसभराचे काम आटोपून संध्याकाळी निघालेले आणि बुधवार बाजारात उद्यासाठी भाजी आणणारे माझे वडिल दिसतात. बुधवार बाजाराच्या तटबंदीतून मागच्या गल्लीतल्या नरसीकरांच्या वाड्यात जाण्यासाठी एक मोठा दरवाजा होता. तो दरवाजा ओलांडला आणि पायर्‍या उतरल्यात की नरसीकरांचा वाडा. तिथे माझी आत्या रहायची. तिच्याकडे आमचे दादा अत्यंत प्रेमाने जायचेत, एकमेकांची विचारपूस, गुजगोष्टी व्हायच्यात.


विविध भारतीवर दुपारच्या वेळेला जी गाणी लागतात त्या गाण्यांच्या लकेरी, सुरावटी जरी कानी आल्यात तरी मी माझ्या बालपणच्या इतवारीतल्या आमच्या कुहीकर वाड्यात जातो. निवांत दुपार, सकाळची शाळा आटोपून जेवण करून छोटासा राम आईच्या मांडीवर डोके ठेऊन  वामकुक्षी करतोय, जवळच्याच कुठल्या तरी घरातून या गाण्याच्या लकेरी कानावर पडताहेत.


मल्लिकार्जून मन्सूर अण्णांची मुलतानी रागातली "साहेब जमाले" कानावर पडली की आम्ही आमच्या गाडीने केलेले नागपूर ते सांगोला प्रवास आठवतात. ही बंदिश किंवा भीमसेनजींची मुलतानी मधलीच "गोकुल गाँव का छोरा, बरसाने की नार" गाडीत सुरू आहे. पहाटे पहाटे सुरू केलेल्या प्रवासाला आता जवळपास १२ तास उलटून गेलेले आहेत. बार्शी - कुर्डुवाडी रस्त्यावर चहापान आटोपून आपण टेंभूर्णीकडे जातोय. सूर्य अस्ताला जातोय आणि आता अगदी तासाभरात आपण आपल्या घरी, सांगोल्याला असणार आहोत, हीच भावना.


असे सुरावटींमध्ये हरवून भूतकाळात रमणे, हरवणे हे आजच्या दिनांकाला, वर्तमानात गाडी चालवत असताना चांगले नाही हे सुध्दा मला माहिती आहे. पण या सुरावटींमध्ये आपला जीव रमतोय, टाईम मशीन सारखे आपण भूतकाळात जातोय, आता आपल्यात नसलेल्या आपल्या जीवलगांसोबत रमतोय हे मला खूप मोलाचे वाटते.


- जीवनाशी, काळाशी, जीवलगांशी कायम कृतज्ञ असलेला, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर. 

Sunday, May 17, 2026

मध्य रेल्वेचा नागपूर विभाग: एका शोचनीय परिस्थितीचा ए्कूणच आढावा

१६/५/२०२६


चला, नागपूर ते मडगाव धावणारी हॉलिडे स्पेशल रेल्वेगाडी आजपासून नियमित झाली. 


इतकी वर्षे ही गाडी (11039 / 11040) हॉलिडे स्पेशल च्या नावाखाली प्रवाशांकडून तिकीटांसाठी जादा अधिभार घेऊन चालवल्या जात होती.  ही गाडी आता नियमित रेल्वेगाडी (11203 / 11204)  झाल्यामुळे प्रवाशांची ही लूट थांबेल.


ही गाडी आल्यापासून आपल्या लेटलतिफीसाठी आणि कूर्मगतीने चालण्यासाठी (इथे "धावणे" हा शब्दप्रयोग सुध्दा मला करवत नाही.) एकेकाळी आमच्या "महाराष्ट्र एक्सप्रेसला मिळणारी दूषणे हल्ली या गाडीकडे निर्देशित झाली आहेत. ही गाडी दोन्हीहीकडे कायम किमान ३ तास उशीरा पोहोचते. बरे, या गाडीची नागपूर आणि गोव्यालाही  पोहोचण्याची वेळ संध्याकाळची पण कायमच्या लेटलतिफीमुळे ही गाडी कायम मध्यरात्री  सिनेमाचे सेकंड शो सुटण्याच्या वेळेत पोहोचते.


आमच्या तरूणपणी सेकंड शो पाहून सायकलने परतताना आम्ही कायम आपल्या शर्टच्या खिशात त्या थिएटरच्या  डोअरकीपरने फाडून  हातात दिलेले अर्धे तिकीट आहे की नाही ? हे वारंवार चाचपून बघत असू. न जाणो परतीच्या प्रवासात वाटेत रात्री गस्तीवरच्या पोलिसांनी पकडलेच तर आपले निरपराधित्व सिध्द करायला ते तिकीट उपयोगी पडायचे याची आठवण झाली.

तसेच भारतीय रेल्वेने या गाडीच्या तिकीटावर "अपने गंतव्य स्थानपर पहुचने के बाद रातमे आप आगे की यात्रा करना चाहते है तो यह तिकीट संभालकर रखिये. यह आपकी बेगुनाही का सबूत साबीत हो सकता है." असे आवर्जून लिहावे. नागपूर आणि विदर्भातून गोव्याला जाणारी मंडळी या गाडीच्या अशा अपरात्री पोहोचण्याने ती रात्र करमाळी किंवा मडगाव स्टेशनवरच काढतात आणि गोवा ट्रीपच्या पहिल्याच घासाला खडा चावून घेतात.


या गाडीचे वेळापत्रक बनविणार्‍या रेल्वे कर्मचार्‍याने त्याच्या तरूणपणी  छकडा, रेंगी, बैलबंडी याशिवाय इतर साधनांनी प्रवासच केला नसावा अशी घनदाट शंका मला आहे. या गाडीच्या वेळापत्रकात रेल्वेच्या भाषेत भरपूर "स्लॅक टाईम" दिलेला आहे. तो वेळ वजा केला तर ही गाडी नागपूर ते मडगाव हा आपला प्रवास १९ तासात पूर्ण करू शकते. नागपूर ते कल्याण ११ तास आणि कल्याण ते मडगाव ८ तास. फक्त मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी या गाडीला चांगली वागणूक देण्याचे मनावर घेतले पाहिजे.

कुठलीही नवी गाडी सुरू करताना त्या गाडीला नवे एंजिन  नवे डबे द्यायला हवे हा नियम नसला तरी एक संकेत आहे. पण मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात हा संकेत कधीही पाळला जात नाही. विदर्भ एक्सप्रेस पहिल्यांदा सुरू झाली तेव्हाचा ब्लॉग इथे. त्यानंतर १९९१ मध्ये सुरू झालेल्या गोंडवाना एक्सप्रेस, त्यानंतरची नागपूर - पुणे एक्सप्रेस यांनाही तशीच वागणूक मिळाली होती.

 

आज या गाडीला WAP 7 या एंजिनासारखे जरा बरे असलेले मिळाले असले तरी ते एंजिन या गाडीला संपूर्ण मडगावपर्यंत मिळाले असेल की नाही? याबद्दल मी साशंक आहे. फारफार तर  भुसावळपर्यंत हे एंजिन जोडून नंतर तिथून या गाडीला हिचे नेहमीचे WAG 9, ज्या एंजिनाची महत्तम वेगक्षमता १०० किमीप्रतितास इतकीच आहे, मिळाले असण्याची शक्यता जास्त आहे. "अहो काय करायचेय या आरामात जाणार्‍या गाडीला वेगवान एंजिने देऊन ?"  ही टिपीकल मध्य रेल्वेची मनोवृत्ती.

पण आजच्या उदघाटन प्रसंगी गडकरी साहेबांसारखा राष्ट्रीय पातळीवरचा केंद्रीय मंत्री उपस्थित असतानाही मध्य रेल्वेने आपला कद्रूपणा दाखवलाच. नेहेमीचेच जुनाट डबे या गाडीला दिलेत. कदाचित आजच्या उदघाटन प्रसंगासाठी हे डबे बर्‍याच कालावधीनंतर धुतले असतील, एव्हढेच.


बाय द वे. आता ही गाडी नियमित गाडी म्हणून सुरू झालीय. नागपूरच्या रेल्वे प्रवासी मंडळातल्या बहुतांशी अमराठी मंडळींनी ही गाडी नैनपूर - छिंदवाडा मार्गे किंवा गोंदिया - बालाघाट मार्गे जबलपूरपर्यंत वाढविण्याची मागणी पुढे रेटा बघू. नवीन गाडी सुरू झाली रे झाली की तिच्या देखभालीचा, वेळोवेळी रंगरंगोटी करण्याचा किती नसता त्रास आपल्या मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातल्या कर्मचार्‍यांना होत असतो हे तुम्हाला कळायला हवे. बिचारे दुरंतो आणि सेवाग्राम एक्सप्रेसचे रेक्स मेण्टेन करताकरताच किती मेटाकुटीला येतात! त्यात आता पुणे वंदे भारतची नवी भर पडलीय.


आणखी एक दुःखद निरीक्षण. देशभरात नवीन मार्गावर वंदे भारत गाड्या सुरू करताना सर्वत्र त्यांना नवाकोरा रेक मिळालाय. अपवाद फक्त नागपूर - पुणे वंदे भारतचा. या गाडीच्या उदघाटनाला सुध्दा हिला वर्षभर जुना असलेला दुसर्‍या कुठल्यातरी मार्गावरच्या वंदे भारतचा रेक दिला गेलेला होता. फुलांच्या माळांनी झाकला तरी रेकवरचे नंबर्स सगळी हकीकत सांगून जातात ना हो. असो. म. रे. चा आणि त्यातल्या त्यात तिच्या नागपूर विभागाचा कोळसा उगाळावा तेव्हढा काळाच.


- स्वतः रेल्वेमंत्री झाल्यानंतर ताबडतोब भुसावळ, नांदेड, नागपूर मध्य, नागपूर दपूम आणि इटारसी हे विभाग एकत्र जोडून नागपूरला "मध्यवर्ती मध्य" (C. C. "Centrally Central")  हा नवीन विभागच तयार करण्याची जबर मनिषा मनात बाळगून तसे मांडे खाणारा (इतकी वर्षे नुसते असे मांडे खाऊनच पोट भरलय राव) एक सामान्य रेल्वेफॅन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Saturday, May 16, 2026

हॉल्टिंग बस.

दुपारी उशीरा माहूरहून निघून रात्री ९ - १० वाजेपर्यंत शेगावला पोहोचेल.


शेगावमध्ये रात्रभर मुक्काम.


दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर शेगावहून निघून दुपारी १२ वाजेपर्यंत माहूरला आपल्या डेपोत परत.


कंडक्टर दादा स्वतःसाठी आणि ड्रायव्हर दादांसाठी रात्रीच्या मुक्कामात लागणारे स्वच्छ आणि थंड पाणी भरून घेताना. त्यांना तशी तजवीज करून ठेवावी लागतच असणार.


माहूर गावाच्या पायथ्याशी, अरूणावती नदीच्या पूर्व तीरावर एक रमणीय मठ आहे. तिथे हे शुध्द आणि थंड पाणी सगळ्यांसाठी उपलब्ध असते. बहुतांशी एस. टी. बसेस आणि ट्रक्ससुध्दा इथून स्वतःसाठी शुध्द आणि थंड पाण्याची तजवीज करताना दिसलेत.



MH 20 / BL 3720


Ashok Leyland Cheetah model.


Bus built by MSRTC's Central Workshop Chikalthana Chatrapati Sambhajinagar.


2 x 2 seating.


Total seats 44 + 1 conductor.


नांदे. माहूर आगार.


नांदेड विभागाची टिपीकल पिवळी ग्रील. 


आता आपल्या महाराष्ट्र एस टी बसचे अशा अॅल्युमिनियम बांधणीचे माॅडेल बनणे संपलेय. आता सगळ्या पोलादी बांधणीतल्या एम. एस. पर्‍या.


#msrtc

#mahur

#shegaon

#busfan 

Sunday, May 10, 2026

ताडोबा भटकंती, नर्मदा परिक्रमा आणि चारधाम यात्रा

प्रकाश आमटेंनी त्यांच्या वाॅलवर टाकलेला चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या मागे,  जीपमधून खाली उड्या टाकून मोबाईल घेऊन फोटो आणि व्हिडीओजसाठी धावणार्‍या अति मूर्ख माणसांचा एक व्हिडीओ बघितला. तो वाघ बिचारा या कोलाहलात घाबरून पळून गेला म्हणून. जर त्याने बिथरून त्या भेकड जमावावर हल्ला केला असता तर, सगळ्यांच्या धोतरांचे पितांबर झाले असते.


चैत्रात नर्मदेची उत्तरवाहिनी परिक्रमा केल्याचे अनेकांचे अनुभव वाचलेत, परवापासून इथल्या एका ताईंच्या परिक्रमेचा रोजचा अहवाल वाचतोय. "आज सकाळी मैय्यात अंघोळ केली, पूजा करून निघालो, सकाळी या आश्रमात हा नाश्ता, दुपारी त्या आश्रमात अमुक अमुक पदार्थांचे जेवण, माझ्या मनात आज पुरणपोळी खायचे होते तिथे नेमकी पुरणपोळीच वाढत होते, बघा मैय्या आपल्या भक्तांची इच्छा किती आणि कशी पुरवतेय ते !, संध्याकाळी अमक्यातमक्या आश्रमात आसन लावले, चहा बिस्कीटे आणि रात्री आलु पुरीचा बेत होता." वगैरे वगैरे. हे सगळे भोग तर आपण घरीही छान घेऊ शकतो की. मैय्याच्या परिक्रमेत किती अंतर्मुख झालो, किती तिचे मानसिक सान्निध्य अनुभवले, किती तिथल्या निसर्गातल्या खूप सकारात्मक विचारांशी आपण जोडले जातोय, किती त्या वातावरणाचा भाग होऊन आपण स्वतःच मैय्यारूप, शिवरूप होतोय या प्रश्नाचे उत्तर नाहीच.


त्यात तर एका ट्रॅव्हल कंपनीने ओंकारेश्वर ते ओंकारेश्वर अशी आठवडाभराची मैय्या परिक्रमा "आरामदेह एसी स्लीपर कोच"ने व राहण्याची, भोजनाची फाईव्ह स्टार व्यवस्था अशी जाहिरात वाचली...


केदारनाथच्या दर्शनरांगेत मुंबईच्या लोकलशी स्पर्धा करणारी गर्दी पाहिली आणि...


एकच विचार मनात तरळून गेला की निसर्गाचे संवर्धन व्हावे, माणसांचा निसर्गाला त्रास कमी व्हावा आणि सगळ्या सृष्टीचा दुवा घ्यावा असे सरकारला वाटत असेल तर किमान किमान किमानताडोबा जंगल सफारी चारधाम यात्रा आणि नर्मदा परिक्रमा यावर पुढली काही वर्षे संपूर्ण बंदी घालावी.


चारधाम आणि ताडोब्यातल्या ज्या मंडळींच्या उपजिवीका या पर्यटनावर अवलंबून आहेत, (परिक्रमेत तिथल्या स्थानिकांची उपजिवीका परिक्रमावासियांमुळे चालत नाही. उलट हे असे माजोरी आणि पर्यटक परिक्रमावासी तिथल्या स्थानिकांवर बोझ बनून राहतात. ते मैय्याकाठचे कायम निवासी असल्याने सात्विक रूजुतेने ते बोलत नाहीत तरी त्यांच्या सहनशक्तीचा कडेलोट आपण होऊ द्यायला नको.), त्यांना सरकारने पर्यायी उपजिवीका उपलब्ध करून द्यावी किंवा लाडक्या बहिणींसारखे अक्षरशः दरमहा चांगली रक्कम देऊन त्यांना सावरून धरावे.बस करा रे आता हा माजोरेपणा, निसर्गात ढवळाढवळ करून आनंद घेण्याचा पुण्य कमावण्याचा मूर्खपणा. Enough is really enough.


- "सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियेले नाही बहुमता" या श्रीतुकोबांच्या उक्तीशी आणि"सांभाळ ही तुझी लेकरे, पुण्य समजतील पापाला" या संत गाडगेबाबांच्या उक्तीशी प्रामाणिक असलेला सर्व संतांच्या पायीचा एक यःकश्चित कण, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


Monday, May 4, 2026

रसवंतीः एक लोप पावलेली संस्कृती (विदर्भात तरी)

लेखाच्या सुरूवातीलाच एक disclaimer देतोय की हा लेख महाराष्ट्रातल्या अनंत एस. टी. स्टॅण्डसवर असलेल्या रसवंत्यांविषयी नाही. किंवा रस्त्याच्या कडेला जे हातठेले उभे राहून रसविक्री करतात त्यांच्यावर नाही.


उन्हाळ्याची चाहूल लागली की साधारण मार्च महिन्याच्या मध्यात शहरातल्या थोड्या मोकळ्या जागांवर मांडव लागायचे. शंभर एक पान जेवून उठेल अशा विस्ताराचा मांडव. त्यातल्या एका कोपर्‍यात उसाचा रस काढणारे ते एवंगुणविशिष्ट मशिन स्थापले जायचे. त्याबाजूला एक गल्ला गोळा करणारे व ग्राहकांना हाफ ग्लास, फुल ग्लास रस  असे वेगवेगळ्या रंगातले प्लॅस्टिकचे बिल्ले देणारे टेबल टाकले जायचे. 


इतर परिसरात ग्राहकांना बसण्यासाठी प्लॅस्टिकच्या टेबल खुर्च्यांची रचना व्हायची. गल्ल्याजवळच एक मोठा टकारा टेप आणि त्याची गाणी ग्राहकांच्या कानावर नीट आदळावीत म्हणून मांडवाच्या सगळ्या कोपर्‍यात भले मोठे स्पिकर्स लावले जात. रसवंतीवर ते गाणे वाजतेय, गाजतेय म्हटल्यावर ते गाणे सुपरहिटच असले पाहिजे हा अंदाज जाणकारांना येई. "क्या करते थे साजना तुम हमसे दूर रहके" किंवा "हवा हवा ऐ हवा"  ही गाणी आम्ही प्रथम रसवंतीमधेच आपल्या कर्णरंध्रांमध्ये साठवून घेतली होती.


मार्च महिन्यात जरी अशी रसवंती स्थापन झाली तरी त्यांची खरी गिर्‍हाईकी सुरू होई ती मुलांच्या परिक्षा संपल्यानंतर. साधारण एप्रिल मध्यात. परिक्षा सुरू असेपर्यंत रसवंतीत जाऊन तिथला बर्फ घातलेला थंडगार रस प्यायला बहुतेक पालकांचा कडाडून विरोध असे. एप्रिल मध्यात परिक्षा संपून शाळांना सुट्या लागल्यात की मग मुलांना थोडे स्वातंत्र्य मिळत असे. एका वर्षाची परिक्षा संपल्यानंतर लगेच पुढचा उन्हाळाभर पुढल्या वर्गाचे क्लासेस सुरू करून विदर्भातल्या भर एप्रिलच्या उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना शाळा करावी लागण्याचा सीबीएसई नामक दळभद्रीपणा तेव्हा इथे रूजलेलाच नव्हता ही किती आनंदाची गोष्ट !


मग अशाच एखाद्या संध्याकाळी बाळगोपाळ मंडळी आपापल्या मित्रांसह किंवा वयाने थोड्या मोठ्या असलेल्या भावा (आणि/ किंवा)  बहिणींसह रसवंतीत दाखल होत असत. एखाद्या संध्याकाळी त्यांचे पालकसुध्दा तिथे त्यांच्यासोबत येत असत . दुपारी खेळल्या गेलेल्या पत्त्यांच्या डावात सत्तीलावणी किंवा नाठ्याठोम खेळात हरलेल्या भिडूवर सगळ्यांच्या रसाचा खर्च करण्याची जबाबदारी असे. बाळगोपाळांच्या मनात दुपारचा खेळ आपण जिंकून काहीतरी मोठ्ठी कामगिरी केलीय असा भाव असे. त्या विजयाचे सेलिब्रेशन असे रसवंतीवर होत असे.


मांडवात असलेली, संध्याकाळी त्याच रसवंतीवर असलेल्या एखाद्या कामगाराने जमिनीवर सुरेख सडा शिंपडून मस्त गारवा आणलेली आणि ओल्या मातीचा धुंद करणारा सुगंध येणारी रसवंती. आत साध्या ट्युबलाईटसचाच पण देखणा प्रकाश देणारी प्रकाशयोजना असे. बहुतांशी ट्यूबलाईटसना हिरवे, निळे, तांबडे पारदर्शक कागद लावून त्या त्या रंगाचा प्रकाश निर्माण केला जात असे. हे अगदी विलोभनीय दृश्यमिश्रण असे.


मग दादा / ताई कुणीतरी जाऊन रसाची आॅर्डर देऊन येत. गप्पा, गंमती करीत चेष्टामस्करी सुरू असतानाच काचेच्या ग्लासांध्ये बर्फ घातलेला थंडगार रस घेऊन तिथला एखादा कर्मचारी  येत असे. रस पिताना गप्पा बंद पडत असत पण मग कानांचे काम सुरू असे. त्या त्या वर्षातली trending गाणी कानांवर पडत असत, त्यात रूची निर्माण होत असे. घरोघरी टेप किंवा म्युझिक सिस्टीमचा अभाव असण्याचे ते दिवस होते.


रस पिऊन संपल्यावर ग्लासात खाली उरलेला गाळ कम फेस पिण्याचा प्रयत्न बाळगोपाळांकडून होत असे. मोठ्यांना त्याबद्दल क्वचित रागवावे सुध्दा लागे.


अशा प्रकारे थोड्या तृप्त बर्‍याचशा अतृप्त मनाने बाळगोपाळ मंडळी घरी परतत असत. "आपण मोठे होऊन कमवायला लागलो ना की एकदम तीन तीन ग्लास उसाचा रस एकट्यासाठीच आॅर्डर करूयात आणि मनसोक्त पिऊयात ही मनिषा अनेकांच्या मनात असे.


या रसवंत्या आता कुठेच दिसत नाही. त्या नाहीशा होताना त्यांच्याबरोबर किती मोठी संस्कृती, किती भावभावनांची वादळे लयाला गेली याची जाणीव आज फार कमी लोकांच्या मनात उरलेली आहे.


कोल्हापूर, सांगली सारख्या ऊससमृध्द भागांमध्ये ह्या रसवंत्यांची एक वेगळीच तर्‍हा मला बघायला मिळाली होती. तिथे रस असा ग्लासावर नाही तर तांब्यावर किंवा पाण्याच्या जगावर (डोलची) मिळत असे. बर्फ वेगळ्या ताटलीत आणून ठेवला जाई. ज्याला लिंबू पिळून रस प्यायचाय त्याच्यासाठी लिंबाच्या फोडी आणि मीठ वेगळे दिले जाई. विना बर्फ टाकलेला तांब्याभर रस रिचवायचा म्हणजे भल्याभल्यांच्या कोठ्याची परिक्षा असे.


आजकाल मात्र रसवंत्या ह्या केवळ एस टी स्टॅण्डसच्याच आश्रयाला उरल्यात. तिथे वेळेला पांस्थतांची क्षुधा शमत असेलही बापडी पण एखाद्या उन्हाळ्याच्या संध्याकाळी रसवंतीत जाऊन तिथला  रस पिण्याची, थोडी हुरहुर लावणारी, थोडी सुखावणारी आमच्या बालपणची संस्कृती मात्र नक्की हरवलीय.


- अजूनही कुठल्या गावात अशी उपरोल्लिखीत रसवंती संस्कृती असेल तर नक्की काॅमेंटसमध्ये कळवा. मी स्वखर्चाने तिथे येऊन माझे बालपण पुन्हा जगेन ही आस बाळगणारा, बालक वैभवीराम प्रकाश किन्हीकर