Saturday, July 11, 2026

श्रीमदभागवत चिंतन - ११ वराह अवतार

भगवान विष्णूंचे द्वारपाल पार्षद जय आणि विजय. भगवंताच्या निकट राहून, अगदी स्वर्गात राहून तिथली सुखे उपभोगताना त्यांनी ब्रह्मकुमारांचा अपमान केला. खरेतर दुःखापेक्षा सुखी अवस्थेतच मनुष्याने आपल्या मनाला जपले पाहिजे. दुःखी मन कालांतराने सावरू शकते पण सुखी अवस्था मनाला उन्मादी स्वरूप देऊ शकते. जय आणि विजय या भगवंतांच्या पार्षदांकडून नेमका हाच अपराध घडला आणि त्याच्या परिणामी त्यांना पृथ्वीतलावर जन्म घेण्याचा आणि स्वर्गसुखांना पारखे होण्याचा शाप मिळाला. साधूंच्या अपमानामुळे तीन जन्म स्वर्गसुखापासून वंचित व्हावे लागले. ते तीन जन्म म्हणजे हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू, रावण आणि कुंभकर्ण व शिशुपाल आणि दंतवक्त्र. या तीनही जन्मात भगवंताने स्वतः अवतार घेऊन आपल्या पार्षदांना मोक्षप्राप्ती करून दिली.



हिरण्याक्ष अवतार या भूतलावर झाला आणि त्याने धुमाकूळ घालायला सुरूवात केली. पृथ्वी अगदी रसातळाला नेली. आपल्या खगोलशास्त्रीय निरीक्षणांनुसार आपल्या पृथ्वीतलावर हायड्रोजन आणि ऑक्सीजन पासून पाण्याची निर्मिती, त्यानंतर पाण्यातील विविध वनस्पती आणि प्राण्यांची निर्मिती, त्याअनुषंगाने जमिनीवर विविध जिवाणू, झाडे आणि त्यानंतर मानवी जीवनाची निर्मिती ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पृथ्वीच्या सूर्यापासून असलेल्या विशिष्ट अंतरामुळे, पृथ्वीच्या एका विशिष्ट अंशात कललेल्या आसामुळे आणि सूर्यमाला निर्माण झाल्यानंतर जे विविध वायूंचे गोळे सूर्याभोवती फ़िरता फ़िरता हळूहळू थंड होत ग्रह बनलेत त्यांच्या विशिष्ट परिवलन गतीमुळे आपल्या पृथ्वीवर मानवी जीवनासकट एकूणच जीवसृष्टीविषयी पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. तसे आपल्या या सूर्यमालेच्या इतर कुठल्याही ग्रहावर निर्माण होऊ शकत नाही. यात थोडाजरी बदल झाला तरी आपल्या पृथ्वीवरील एकूणच जीवसृष्तीच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊन जीवसृष्टी लयाला जाऊ शकते.

हिरण्याक्ष हा अत्यंत बलवान आणि तामसी वृत्तीचा असल्याने त्याने आपल्याला ज्ञात असलेल्या आकाशगंगांच्याही पलिकडे कुठेतरी असलेल्या स्वर्ग नावाच्या निराळ्या प्रतलातून आपल्या सूर्यमालेत प्रवेश करीत हा समतोल बिघडवण्याचा प्रयत्न केला असावा. आपणच निर्माण केलेली ही सृष्टी अशी कुणीतरी तामसी वृत्तीने नाश करीत असेल तर ते सृष्टीनिर्मात्याला अजिबात आवडत नाही. त्यामुळे भगवंतांनी ब्रह्माजींच्या नाकपुड्यांमधून बाहेर येत वराह अवतार धारण केला.



या जीवसृष्टीला आधार ठरणा-या पृथ्वीच्याच गतीत, अक्षाच्या अंशात परिवर्तन करू पाहणा-या आणि इतकी सुंदर निर्मिती नष्ट करू पाहणा-या हिरण्याक्ष राक्षसाशी भगवंतांनी युद्ध केले आणि आपल्या दाढांमध्ये धरून रसातळाला जात असलेली पृथ्वी पुन्हा आपल्या ठिकाणी प्रस्थापित केली. पृथ्वीवरील त्यानंतर जीवन फ़ुलवायला मदत केली.

आपल्या या सृष्टीत सगळ्या जीवांचे काही ना काही महत्व आहे. अगदी लहानतल्या लहान, क्षुद्रातल्या क्षुद्र जीवांचीही या सृष्टीत काही कर्तव्ये आहेत, निश्चित असे प्रयोजन आहे. कुठल्याही जीवाला त्याच्या बाह्य रूपावरून, तो या पृथ्वीतलावर करीत असलेल्या कार्यावरून लहान किंवा मोठे, चांगले किंवा ओंगळ संबोधण्यापूर्वी त्या जीवाचे इथले कार्य आणि तो त्याच्या कार्यामुळे इथे करीत असलेले उपकार आपण सूज्ञजनांनी स्मरून त्याचा आदर करायला हवा हे तत्व आपल्याला शिकवण्यासाठीच भगवान विष्णूंनी आज आपल्याला छोटासा, दुर्लक्षणीय आणि सामान्य वाटत असलेल्या वराहाचा अवतार इथे घेतला.

आज आपल्यापैकी प्रत्येकानेच ही पृथ्वी तिच्यावरील जीवसृष्टीसकट पुन्हा एकदा रसातळाला नेण्याकरिता हिरण्याक्ष अवतार घेण्याचा चंग बांधला आहे की काय अशी अवस्था आहे. आज आपण फ़क्त मनुष्यांचाच, त्यांच्याच सुखांचा, त्यांच्याच सोयीपुरता विचार करतो आहोत. आपल्या कुठल्या कृतीमुळे या सृष्टीला, तिच्यावर आजवर पोसल्या गेलेल्या एकूणच जीवसृष्टीला धोका पोहोचू शकेल, ही पृथ्वी पूर्णपणे नष्ट होऊ शकेल याचा अगदी थोडा विचारही आपल्याला शिवत नाही. आपल्या सगळ्यांच्या जीवनकालात तर यातले काही होणार नाही मग आजच त्याची चिंता का करायची ? आज खाओ, पिओ, ऐश करो हाच चार्वाक विचारसरणीचा विचार आपल्या सगळ्यांना व्यापून उरलेला आहे. यादृष्टीने आपण या हिरण्याक्ष राक्षसाचे आणि भगवंतांनी घेतलेल्या वराह अवताराचे चिंतन करणे व आपल्यामुळे या जीवसृष्टीचा समतोल अजिबात बिघडू नये याची जाणीवपूर्वक काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे. या कथेचे चिंतन नेमके हेच आहे.  


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥





- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" ज्येष्ठ वद्य द्वादशी शके १९४८ दिनांक  ११ / ७ / २०२६


११ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


Friday, July 10, 2026

श्रीमदभागवत चिंतन - १० विदुर मैत्रेय संवाद् (भाग दुसरा)

भगवंतांनी आपल्या केवळ संकल्पमात्रेने या सृष्टीची निर्मिती करायला सुरूवात केली. त्यांनी आकाशाची निर्मिती केली आणि आकाशापासून काळ गणनेची निर्मिती केली. आणि ज्ञानेद्रियांना जाणवणा-या स्पर्श या संवेदनेला अनुकूल अशी वायुची निर्मिती केली.

या विश्वाच्या सुरूवातीला एका अणुपासून एक मोठा महास्फ़ोट झाला आणि हे प्रचंड विश्व निर्माण झाले हे आधुनिक युगाची "बिग बॅंग थेअरी" आपल्याला सांगते. त्यात हे ग्रह, तारे, वायू, काळगणना कुठल्या क्रमाने झाली असावी याचे तर्क आजची आपले शास्त्रज्ञ मांडत आहेत. मैत्रेय ऋषींनी विदुरजींना भगवंतांच्या असण्याविषयी, त्यांनी निर्माण केलेल्या विश्वाविषयी, मायेविषयी उपदेशात्मक ज्ञान देताना हाच क्रम सांगितला आहे.



अशाप्रकारे निर्माण झालेल्या वायू आणि आकाशाने तेजाची निर्मिती केली आणि तेजाने अनुभवाला येणारे ज्ञान म्हणजे रूप याची निर्मिती केली. विश्वात प्रकाश निर्माण झाला आणि विश्वातल्या वस्तूंचे बाह्य स्वरूप सर्वांच्या प्रत्ययाला येऊ लागले.

त्या प्रकाशावर दृष्टीपडताच परमात्म्याने रसरूप पाण्याची निर्मिती केली. या विश्वात पाणी निर्माण झाले. आपल्या संपूर्ण विश्वात आकाश - काळ - वायू - तेज आणि पाणी अशाच क्रमाने या पंचमहाभूतांची निर्मिती झाली असावी हे आजच्या आधुनिक विज्ञानानेही तर्काद्वारे आणि काही वैज्ञानिक प्रयोगांद्वारे मान्य केले आहे. मैत्रेय ऋषी आपल्याला श्रीमदभागवतात हेच प्रतिपादन करताहेत.

त्यानंतर वायू, तेज आणि पाणी ही तत्वे मिळून विश्वात पृथ्वीचा जन्म झाला. ज्ञानेन्द्रियांना जाणवणारी गन्धशक्ती हा पृथ्वीचा गुण आहे. आजच्या आपल्या मानसपूजेत गंध हा पृथ्वीचे, पुष्प हे आकाशाचे, धूप हे वायूतत्वाचे, दीप हा अग्नीचे आणि अमृत नैवेद्य हे जलतत्वाचे प्रतिनिधी समजले जातात. 

यानंतर महात्मा विदुरांनी मोठ्या जिज्ञासेने मैत्रेयांना अशा विश्वनिर्मात्या भगवंताच्या एकाचवेळी निर्गुण आणि सगुण असण्याबाबत प्रश्न विचारलेत आणि मैत्रेयांनी त्यांना भक्तीयोग, माया आणि ब्रह्माचे निरूपण, मनुष्यमात्रांनी कायम स्वरूपाच्या आनंदासाठी काय करायला हवे याचा उपदेश केला आणि विश्वनिर्मिती केल्यानंतर स्वतःच हे विश्व व्यापून उरलेल्या भगवंताच्या विराट स्वरूपाचे वर्णन केले. आणि या सृष्टीच्या वारंवार होणा-या निर्माण, संचालन आणि संहाराचे ज्ञान दिले.



आजच्या आधुनिक विज्ञानाने या विश्वात सतत घडत असलेल्या अनेक विश्वांच्या निर्मितीची, त्यांच्या स्थितीची आणि क्षणोक्षणी घडत असलेल्या अनेक विश्वांच्या संहाराची पुष्टी केलेली आहे. आधुनिक विज्ञानाला अनेक मर्यादा आहेत पण पिंडी ते ब्रह्मांडी हे तत्व घेऊन त्याकाळी निरीक्षण करून आपले याबाबत आपले अगदी ठोस निष्कर्ष मांडणारे मैत्रेय ऋषी हे महाज्ञानी ठरतात आणि महात्मा विदुरांनी सुद्धा अत्यंत जिज्ञासू बुद्धीने त्यांना प्रश्न विचारून स्वतःच्या मनाची तृप्ती करून घेतलेली दिसते.

विसाव्या शतकातला थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणतो "If there is creation then there must be a creator, which I am not. I am only the observer." मैत्रेय ऋषी आणि महात्मा विदूर यांच्या संवादानंतर महात्मा विदूरांना या विश्वाचे आणि विश्वनिर्मात्या भगवंताचे यथार्थ ज्ञान झाले आणि भगवान श्रीकृष्ण वियोगाने खिन्न झालेले त्यांचे मन तृप्त व शांत झाले. 

आपल्या संस्कृतीतले प्राचीन ऋषीमुनी हे ज्ञानमार्गी होते. ते विविध प्रयोग करून बघणारे आणि आलेले निष्कर्ष प्रत्यक्षात पडताळून बघणारे शास्त्रज्ञ होते. आपल्याला असलेले ज्ञान मौखिक परंपरेने आपल्या योग्य शिष्यांपर्यंत संक्रमित करून ज्ञानपरंपरा अखंडित ठेवण्यासाठी धडपडणारे महात्मा होते. आणि परमेश्वराने निर्माण केलेल्या या समस्त विश्वाविषयी ममता ठेवणारे होते. सृष्टीचा विनाश होईल असे शोध लावणारे नव्हते. निसर्गाला जपणारे होते आणि त्याचबरोबर मानवी मनोव्यापारांबाबत सूक्ष्म अभ्यास असलेले अत्यंत हुशार असे मानसशास्त्रज्ञ होते. त्यांच्या विषयी अपार आदर आणि कृतज्ञता बाळगूयात आणि त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन या सृष्टीसंरक्षणाविषयी, समस्त सृष्टीच्या कल्याणासाठी कार्य करण्यास कटीबद्ध होऊयात.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" ज्येष्ठ वद्य दशमी / एकादशी शके १९४८ दिनांक  १० / ७ / २०२६


१० जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


Thursday, July 9, 2026

श्रीमदभागवत चिंतन - ९ विदुर मैत्रेय संवाद् (भाग पहिला)

कौरवांच्या दरबारात महाभारत युद्ध टाळण्यासाठी आपल्या भावाला, धृतराष्ट्राला आणि आपल्या पुतण्यांना न्याय्य आणि सात्विक बुद्धीने वागण्याचा उपदेश करणारे महात्मा विदुर शेवटी अत्यंत उद्वेगाने आणि निराशेने हस्तिनापुराबाहेर पडले. महात्मा विदुर भगवान श्रीकृष्णांचे चिंतन, मनन करीत विविध तीर्थस्थळी भेटी देत अत्यंत साधेपणाने आपले आयुष्य व्यतीत करू लागलेत.

तीर्थयात्रा करता करता त्यांची भेट प्रभासपट्टण क्षेत्री असलेल्या कृष्णसखा उद्धव यांच्याशी झाली. श्रीमदभागवतात कृष्णसखा उद्धव याचे असे वर्णन आले आहे की उद्धव हे भगवान श्रीकृष्णाचे अत्यंत आत्मिक मित्र होते. इतकी घट्ट मैत्री की उद्धव हे दिसायला सुद्धा हुबेहुब भगवान श्रीकृष्णांसारखेच होते. आजच्या आधुनिक शास्त्रांनी सुद्धा हे सिद्ध केलेले आहे की पती आणि पत्नी जर एक्मताने, एकदिलाने, एकमेकांमध्ये विरघळून जर संसारात मार्गक्रमण करत असतील तर काही वर्षांनी एकमेकांसारखेच दिसायला, वागायला, बोलायला लागतात. उद्धव आणि भगवान श्रीकृष्णांच्या मैत्रीची स्थिती अगदी तशीच अंतरंग आणि आत्मिक होती.



महात्मा विदुरांनी कृष्णसखा उद्धवांना त्यांची ख्यालीखुशाली विचारली आणि विदुरांचे आराध्य दैवत असलेल्या भगवान श्रीकृष्णाबद्दल विचारले. तेव्हा उद्धवांनी अत्यंत व्यथित मनाने यदुवंशामधल्या आपापसातल्या यादवीची, त्यांच्या संहाराची आणि प्रत्यक्ष भगवंतांच्या अवतार समाप्तीची अत्यंत दुःखद वार्ता विदुरांना कळवली. दोघेही महात्मा अत्यंत शोकाकूल झालेत. आता या पृथ्वीतलावर आपल्याला आसरा कोण ? कोण योग्य मार्गदर्शन करणार ? कुणाच्या आधाराने आपण यापुढील आयुष्य व्यतीत करायचे ? असे सगळे प्रश्न महात्मा विदुरांना पडले तेव्हा उद्धवजींनी त्यांना मैत्रेय ऋषींच्या आश्रमात जाऊन मैत्रेय ऋषींचा उपदेश घेण्याची आज्ञा दिली आणि आपल्या पुढील प्रवासाला उद्धवजी रवाना झालेत.

महात्मा विदुर मैत्रेय ऋषींच्या आश्रमात गेले आणि त्यांनी मैत्रेयांना या सृष्टीरचनेविषयी, तिच्या सार आणि असारतेविषयी विविध प्रश्न विचारलेत. मैत्रेयांनी त्याची जी उत्तरे विदुरांना दिलीत ती आज ५ हजार वर्षांनंतर आपल्याला आपल्या आधुनिक ज्ञानाने दिलेल्या उत्तरांशी अत्यंत मिळतीजुळती आहेत. हे स्तिमित करून टाकणारे आहे. 

मैत्रेय ॠषींनी सृष्टीच्या उत्पत्तीबाबत महात्मा विदुरांना सांगितले, 

"सृष्टीच्या प्रारंभी भगवान एकटेच होते. एकच तत्व होते. त्यांना इच्छा झाली "एकोहम. बहुस्याम." मी एकटाच आहे. आता आपली अनेक रूपे निर्माण करावीत. म्हणून त्यांनी

महत तत्वात विकुर्वाणाद अहंतत्वं व्यजायत ।

कार्य कारण कर्त्रात्मा भूत इन्दिय मनोमयः ॥

भगवंतांनी या सृष्टीत कार्य म्हणून अनेक भूत (विविध जीवांची), या कार्याचे कारण म्हणून अनेक इंद्रियांची आणि ही कार्ये करण्यासाठी कर्ता म्हणून मनाची निर्मिती केली. आजही आपण बघतो की कुठलेही कार्य आपण आपल्या इंद्रियांसाठी करतो, त्या कार्याचा मूळ कर्ता हे आपले मन असते आणि आपले शरीर हे ते कार्य प्रगट करण्यापुरते एक साधनच असते.



मैत्रेय पुढे सांगतात की त्यानंतर भगवंतांनी सात्विक, राजस आणि तामस असे तीन अहंकार निर्माण केलेत. सात्विक अहंकारातून या सृष्टीचे यथार्थ स्वरूप जाणणारे ज्ञान निर्माण झाले, राजस अहंकारांनी ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रियांना ज्ञान देण्याची व्यवस्था केली आणि तामस अहंकारातून शब्द निर्माण झाले आणि शब्दरूप आकाश निर्माण निर्माण झालेत.

शब्द आणि आकाश ते तामसी अहंकारांमधून निर्माण झालेले आहेत. आपण वाचतो, ऐकतो किंवा क्वचित अनुभवसुद्धा घेतो. एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीकडे एखादी उत्कट भावना पोहोचवायची असेल, ये हृदयीचे ते हृदयी अशी एखादी गोष्ट आपल्याला संक्रमित करायची असेल तर तिथे शब्द अपुरे ठरतात किंबहुना शब्द उपरे ठरतात. तिथे शब्दांची आवश्यकता उरत नाही. अत्यंत गूढ असलेले संवाद, ज्ञानप्रसार हा शब्दांशिवाय होत असतो. शब्द त्याच  ठिकाणी आवश्यक ठरतात जिथे सात्विकता कमी पडते. 

यानंतर मैत्रेयांनी इतर सर्व सृष्टीच्या क्रमशः निर्मितीविषयी महात्मा विदुरांना जो उपदेश केला तो उपदेश आणि या सृष्टीनिर्मितीबाबत आधुनिक युगात आपल्याला प्राप्त झालेल्या ज्ञानाशी त्याचा निकटचा संबंध याविषयीचे विवेचन आपण पुढील लेखात करूयात.

आपल्या संस्कृतीतले प्राचीन ऋषीमुनी हे ज्ञानमार्गी होते. ते विविध प्रयोग करून बघणारे आणि आलेले निष्कर्ष प्रत्यक्षात पडताळून बघणारे शास्त्रज्ञ होते. आपल्याला असलेले ज्ञान मौखिक परंपरेने आपल्या योग्य शिष्यांपर्यंत संक्रमित करून ज्ञानपरंपरा अखंडित ठेवण्यासाठी धडपडणारे महात्मा होते. आणि परमेश्वराने निर्माण केलेल्या या समस्त विश्वाविषयी ममता ठेवणारे होते. सृष्टीचा विनाश होईल असे शोध लावणारे नव्हते. निसर्गाला जपणारे होते आणि त्याचबरोबर मानवी मनोव्यापारांबाबत सूक्ष्म अभ्यास असलेले अत्यंत हुशार असे मानसशास्त्रज्ञ होते. त्यांच्या विषयी अपार आदर आणि कृतज्ञता बाळगूयात आणि त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन या सृष्टीसंरक्षणाविषयी, समस्त सृष्टीच्या कल्याणासाठी कार्य करण्यास कटीबद्ध होऊयात.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥





- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" ज्येष्ठ वद्य नवमी शके १९४८ दिनांक  ९ / ७ / २०२६


९ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


Wednesday, July 8, 2026

श्रीमदभागवत चिंतन - ८ धृव चरित्र

आपण सर्वांनीच धृव चरित्र हे अगदी बालपणापासूनच ऐकलेले असते. पण श्रीमदभागवताने धृव चरित्राचा थोडा विस्ताराने विचार केलेला आहे.

उत्तानपाद राज्याच्या दोन राण्या. सुरूची आवडती तर सुनिती नावडती. सुरूचीचा पुत्र उत्तम हा राजाच्या मांडीवर बसून खेळत असताना सुनितीच्या पुत्राला, धृवाला सुद्धा आपल्या वडिलांच्या मांडीवर बसून खेळण्याची इच्छा झाली आणि उत्तमाच्या आईने, राणी सुरूचीने त्याचा तीव्र शब्दांनी अपमान केला. आणि अपमानित झालेला धृव एका दृढ निश्चयाने, वडिलांच्या राज्याचा अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी वनात तपश्चर्येसाठी निघाला.

तपश्चर्येसाठी निघालेल्या धृवबाळाचे वय तेव्हा अवघे ५ वर्षांचे होते. इतक्या लहान वयातल्या बालकाचा हा असा दृढ निश्चय बघून जगकल्याणार्थ सर्वत्र संचार करणारे देवर्षि नारद त्याला भेटलेत आणि त्याला ॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय॥ या द्वादशाक्षरी मंत्राचा त्यांनी उपदेश केला आणि तपश्चर्येबाबत मार्गदर्शन केले. 

धृवबाळाने देवर्षि नारदांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे अतिशय खडतर अशी तपश्चर्या सुरू केली आणि फ़क्त ६ महिन्यांमध्येच भगवान विष्णू त्याला प्रसन्न झालेत. आपल्या अशा अत्यंत दृढनिश्चयी बालक भक्ताला बघायला स्वतः भगवान अत्यंत आतूर झालेले होते. भगवंत प्रगट होताच धृवबाळ सदगदित झाला, त्यांने भगवंतांना दंडवत प्रणाम घातला आणि त्याने भगवंतांची स्तुती केली. ही स्तुती मूळ संस्कृत संहितेतून वाचण्यासारखी आहे आणि आपल्यासारख्या सर्व गृहस्थांनी रोजच्या वाचनात ठेवण्यासारखी आहे.

प्रसन्न झालेल्या भगवंतांनी धृवबाळाला ३६ हजार वर्षे पित्याचे राज्य करण्याचा वर दिला आणि त्यानंतर सप्तर्षीसुद्धा ज्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकले नाहीत त्या ठिकाणी विश्वाच्या अंतापर्यंत दृढ स्थितीत राहण्याचा वर दिला. त्याची सावत्र आई आणि सावत्र बंधू भविष्यात कशा प्रकारची दुःखे भोगत मृत्यूला प्राप्त होतील याचे ज्ञान दिले आणि भगवान अंतर्धान पावले.



प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन झाले, वरप्राप्ती झाली, विश्वात अगदी उच्च स्थान प्राप्त झाले, शत्रूंचा बिमोड झाला पण या वरांमुळे धृव आनंदला नाही. भगवंताच्या दर्शनानंतर अत्यंत निर्मळ झालेल्या त्याच्या चित्तात त्याला जाणवले की भगवंतांनी त्याला जे दिले ते सगळे इहलोकीचे वैभव दिले. भगवंत दर्शनसमयी त्याच्या हृदयात जी मलिनता होती त्यामुळे त्याचे चित्त ओळखून भगवंतांनी त्याला या इहलोकीचे सगळे सुख दिले. धृवाला जाणवले की अनेक योगी, तपस्वी मंडळी हजारो जन्म घेऊन जी तपश्चर्या करतात आणि भगवंताला प्राप्त करून घेतात त्या भगवंताला मी फ़क्त ६ महिन्यांमध्ये प्राप्त करून घेतले होते पण माझ्या चित्तामधल्या मलिनतेमुळे माझा घात झाला. प्रत्यक्ष भगवंताला त्याच्या चरणांशी अक्षय्य वास, जन्मोजन्मांमधून मुक्ती मागून घेण्याऐवजी मी फ़क्त इहलोकीचे अढळपद मागितले. धृवबाळाला हे ज्ञान झाल्यानंतर तो खिन्न झाला. भगवंत प्रसन्न होऊनही जे मिळायचे ते मिळालेच नाही असे त्याला सतत वाटत राहिले.

त्यानंतर धृवबाळाने आपल्या चित्तातल्या मलिनतेचा जाणीवपूर्वक त्याग केला आणि आपल्या सावत्र आईविषयी आणि सावत्र भावाविषयी द्वेषभावना मनातून नष्ट केली. त्याने इहलोकीची सगळी सुखे भोगलीत, पराक्रम गाजवत प्रत्यक्ष कुबेराचा युद्धात पराभव केला आणि कुबेराकडून भगवंताच्या चरणांशी अक्षय्य राहण्याचा वर प्राप्त करून घेतला आणि अंतिमतः आपल्या आईसह, सुनितीसह तो वैकुंठात भगवंताच्या अक्षय्य सानिध्यात गेला.

आपलीही अवस्था त्या धृवबाळासारखीच असते की नाही ? आज या युगात आपली सर्व पूजा, अर्चना, यज्ञयागादि विधी हे इहलोकींच्या अनेक कामनापूर्तीसाठीच असतात. काहीतरी काम्य भावना मनात धरूनच आपण भगवंताला आळवतो. धृवाला सुद्धा ही चूक आहे हे प्रत्यक्ष भगवंताने दर्शन दिल्यानंतर त्याच्या चित्ताचे मालिन्य दूर झाल्यानंतर कळले. आपण हे ज्ञान धृवबाळाच्या चरित्राच्या नुसत्या अवलोकनाने, मननाने मिळवू शकतो. भगवंताची उपासना, भक्ती कशासाठी ? या प्रश्नाचे अत्यंत सात्विक बुद्धीने आपण मनन केले पाहिजे आणि फ़क्त भगवंतावर प्रेम आहे म्हणून त्याची पूजा, अर्चा, भक्ती आदि गोष्टी आपण आचरणात आणल्या पाहिजेत. 

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज एका ठिकाणी म्हणतात की या जगात अमुक एका गोष्टीची प्राप्ती व्हावी म्हणून जर आपण नामस्मरण करत असू तर ते स्वतःच्या आईला विकण्याइतके वाईट आहे. नामस्मरण हे नामस्मरणासाठीच व्हायला हवे. देवाचे मला दर्शन व्हावे हा सुद्धा हेतू त्यात नसावा. इतकी निष्काम भक्ती आपल्या सर्वांकडून व्हावी म्हणून श्रीमदभागवतातले हे धृवचरित्र आहे.

मग करायचा का संकल्प अशा विमल भगवंतभक्तीचा ? संकल्पाला पूर्णत्वदाता स्वतः तो भगवान आहेच. आपला संकल्प मात्र अत्यंत शुद्ध आणि दृढ असायला हवा.



॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" ज्येष्ठ वद्य अष्टमी शके १९४८ दिनांक  ८ / ७ / २०२६


८ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


Tuesday, July 7, 2026

श्रीमदभागवत चिंतन - ७ चतुःश्लोकी भागवत

चतुःश्लोकी भागवत हे श्रीमदभागवताचे बीज समजले जाते. सृष्टीकर्ता ब्रह्माजी जेव्हा आपल्या योगनिद्रेतून जागृत झाले आणि कमळात बसून सर्व जलमय जग अवलोकन करू लागलेत तेव्हा त्यांना वाटले की या जगात मीच एकटा भरून राहिलेलो आहे आणि या जगाचा उत्पत्ती, स्थिती आणि लयकर्ता मीच आहे. तेव्हा ते कमलदल ज्यांच्या नाभीतून उत्पन्न झालेले आहे अशा श्रीविष्णूंनी त्या कमलदलाचा देठ हलवून जाणीव करून दिली की ब्रह्माजी त्यांच्या नाभीकमलातून उत्पन्न झालेले आहेत आणि श्रीविष्णूंनी प्रदान केलेल्या ज्ञानातूनच ब्रह्माजींनी ही सृष्टीरचनेचा संकल्प सोडलेला आहे.


अत्यंत नम्रपणे आणि कृतज्ञतेने ब्रह्माजींनी श्रीविष्णूंची प्रार्थना केली आणि श्रीविष्णूंनी या विश्वाचे कारण असलेले चतुःश्लोकी भागवत ब्रह्माजींना दिले. ब्रह्माजींनी ते देवर्षी नारदांना दिले आणि नारदमुनींनी ते चतुःश्लोकी भागवत वेदव्यास मुनींनी दिले आणि या सृष्टीच्या कल्याणासाठी त्याचा विस्तार करायला सांगितला. श्रीमदभागवताचे १८००० श्लोक म्हणजे या चार श्लोकांचा विस्तारच होय. म्हणून हे चतुःश्लोकी भागवत जरी नुसते समजून म्हटले तरी संपूर्ण श्रीमदभागवत पाठ केल्याचे साफ़ल्य होते असे जाणकार सांगतात. फ़क्त ह्या चार श्लोकांचा भावार्थ आणि गूढार्थ लक्षात घेऊन आपण मनन केले पाहिजे.


भगवान विष्णू ब्रह्मांजींना विशद करत आहेत.  


अहमेवासमेवाग्रे नान्यद् यत् सदसत्परम्।

पश्चादहं यदेतच्च यो वशिष्ट्येत सोऽस्म्यहम्।।


सृष्टीच्या प्रारंभी केवळ मीच होतो. माझ्याव्यतिरिक्त दुसरे कोणतेही स्थूल, सूक्ष्म किंवा त्यापलीकडील कारण नव्हते. आणि या सृष्टीचा प्रलय झाल्यावरही केवळ मीच शिल्लक राहीन आणि आता ही जी सृष्टी दिसत आहे, तिचा मूळ आधारही मीच आहे.

आजच्या युगात शास्त्रज्ञांनी या सृष्टीच्या निर्मितीचे कारण "बिग बॅंग थेअरी" दिलेली आहे. सृष्टीच्या उत्पत्तीप्रसंगी एक खूप मोठा स्फ़ोट झाला त्यातून हे विविध तारे, ग्रहमालिका, आकाशगंगा यांचे अफ़ाट विश्व निर्माण झाले आणि हे विश्व सतत विस्तार पावत आहे. यात मोठमोठी कृष्णविवरे सुद्धा निर्माण झालेली आहेत आहेत हे कायम विस्तार पावणारे विश्व एक दिवस संपूर्ण नष्ट होऊन पुन्हा एका अणूमध्ये सामावणार आहे अशी ती थेअरी आहे. आज आपण आपल्या ज्ञानाने केवळ आपल्या सूर्यमालेच्या शेवटापर्यंत पोहोचू शकलो आहे. आपल्या आकाशगंगेत असलेल्या असंख्य सूर्यमाला आणि अशा असंख्य आकाशगंगा असलेले हे विश्व. याचे उत्पत्तीकारण, स्थितीकारण आणि याच्या लयानंतर होणारी या विश्वाची स्थिती हे सगळे श्रीमदभागवतकारांनी जवळपास पाच हजार वर्षांपूर्वी विशद केलेले आहे.



यानंतर भगवान विष्णू समजावत आहेत.

ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि।

तद्विद्यादात्मनो मायां यथाभासो यथा तमः।। 

आत्मस्वरूपाशिवाय (परमेश्वराशिवाय) जे काही सत्य असल्यासारखे भासते आणि आत्म्यामध्ये जे अस्तित्वात नाही, ती माझी 'माया' आहे. उदाहरणार्थ, जशी एखादी अंधारात दिसणारी सावली किंवा आरशातील प्रतिबिंब सत्य नसून आभासमात्र असते, तशीच ही माया आहे.


आधुनिक विज्ञान सांगते की एकच वस्तू जगातल्या प्रत्येकाला त्याच्या त्याच्या दृष्टीकोनानुसार वेगवेगळी दिसू शकते, वेगवेगळी आभासाला येऊ शकते पण एकदा त्या वस्तूचा अनुभव आला तर मात्र त्या वस्तूचे यथार्थ ज्ञान प्रत्येकाला होऊ शकेल आणि ते मात्र सारखेच असेल. प्रत्येकाला एकच वस्तू वेगवेगळी दिसणे ही माया तर त्याची यथार्थ प्रतिती येणे हे ब्रह्म. श्रीमदभागवत प्रत्येक जीवाला या जगात ज्ञानाची प्रतिती घेण्यास उद्युक्त करतय. नुसते सांगोवांगी ज्ञान नाही, पुस्तकी ज्ञान नाही तर अनुभवातून, प्रयोगाअंती येणारे ज्ञान ही खरी प्रतिती.


आपले अध्यात्म आपल्याला कुठेही आंधळा विश्वास ठेवायला सांगत नाही. प्रयोग करा, प्रतिती घ्या आणि मग मात्र केवळ करंटेपणाने आलेल्या प्रतितीला नाकारू नका. ते खरे ज्ञान स्वीकारा हेच आपल्या सर्व अध्यात्माचे सार आहे.



भगवान विष्णू पुढे सांगतात


यथा महान्ति भूतानि भूतेषूच्चावचेष्वनु। 

प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्।।


ज्याप्रमाणे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत सर्व लहान-मोठ्या वस्तूंमध्ये बाहेरील बाजूस आणि आतील बाजूसही असतात, म्हणजेच ते जगात सर्वत्र व्यापून असतात, तरीही त्यांच्यामध्ये ते मिसळून राहत नाहीत. त्याचप्रमाणे मीही सर्व प्राणिमात्रांमध्ये व जगात असूनही अलिप्त (निर्गुण) राहतो.


परमेश्वर या जगाचे, सृष्टीचे कारण आहे पण तो म्हणजे ही सृष्टी नाही. ही संपूर्ण सृष्टी केवळ त्यानेच जरी व्यापलेली असली तरी परमेश्वर म्हणजे ही केवळ ही सृष्टीच नाही. या सृष्टीवरील पंचमहाभूते ही त्याचीच निर्मिती आणि रूपे असली तरी परमेश्वर या पंचमहाभूतांपेक्षा जास्त व्यापक आहे. आपल्या सूर्यमालेतल्या प्रत्येक ग्रहावर वेगवेगळे गुरूत्वाकर्षण आहे. जरी ते गुरूत्वाकर्षण त्या ग्रहावर आपल्याला आतून आणि बाहेरूनही प्रत्ययाला येत असले तरी पण तो संपूर्ण ग्रह म्हणजे फ़क्त ते गुरूत्वाकर्षण नव्हे. ते गुरूत्वाकर्षण त्या ग्रहाच्या गुणांचा एक भाग आहे. त्याप्रमाणेच या समस्त सृष्टीकर्त्या परमेश्वराची स्थिती आहे. त्याचे अनंत गुणांनी आपण वर्णन करू शकत असलो तरी ते गुण म्हणजेच तो नव्हे. तो त्या गुणांपेक्षासुद्धा खूप काही निराळा, गुणातीत आहे. त्या परमेश्वराच्या रूपाचे वर्णन करताना सर्व वेदांची, शृतींची, उपनिषदांची अवस्था "नेति नेति" (न इति, न इति = हा नव्हे, हा नव्हे) अशी झाली तिथे त्याचे यथार्थ स्वरूप जाणून घेण्यास माझ्यासकट सर्व मानव, दानव, देव, शास्त्रे, पुराणे, तर्क, न्याय, मीमांसा अपु-या ठरतात.


आणि या चौथ्या श्लोकात भगवान समजवतात

एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः।

अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा।। 


आत्मतत्त्व जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या साधकाने केवळ एवढेच जाणून घेतले पाहिजे की, जे सर्वकाळ (सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयामध्ये) आणि सर्वत्र अन्वय (सगळीकडे असणारे) आणि व्यतिरेक (सगळ्यांपेक्षा वेगळे) रूपाने उपस्थित असते, तेच अंतिम सत्य आहे. 

आपण आपल्या आधुनिक विज्ञानामध्ये एखाद्या गोष्टीचा शोध लावण्यासाठी, एखादे प्रमेय सिद्ध करण्यासाठी ज्याप्रमाणे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष तर्क लावून, प्रयोग करून त्या गोष्टीचा शोध लावण्याचा, ते प्रमेय जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तसेच परमेश्वर प्राप्तीसाठी, त्याचे खरे स्वरूप जाणून घेण्यासाठी मनुष्यमात्रांनी त्याच्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष अनुभूतीचा ध्यास घ्यायला हवा. आपल्या आयुष्यात केवळ परमेश्वर प्राप्तीसाठी विविध प्रयोग करून बघायला हवेत.



आज आपली धाव इंद्रियांना माहिती होणा-या, इंद्रियांद्वारे घेता येणा-या सुखांसाठी, त्यांच्या प्राप्तीसाठी असते. आपले अवघे आयुष्य अशा सुखांच्या शोधात खर्च होते आणि आयुष्याच्या अखेरी आपल्याला कळते की ज्याप्रमाणे ही सगळी इंद्रिये क्षणभंगूर आहेत तशी त्यापासून प्राप्त होणारी सुखे सुद्धा क्षनभंगूर आहेत. त्या इंद्रियांना प्राप्त होणा-या सुखापलिकडे जे शाश्वत सुख आहे ते म्हणजे परमेश्वरी रूपाची, त्याच्या प्राप्तीच्या शोधाची अनुभूती. त्या शोधात तो मिळेल, न मिळेल पण तो शोध, ते शोध घेण्याचे सुख हे इंद्रियगोचर सुखांपेक्षा खूप निराळे आहे आणि त्या परमेश्वरासारखेच अविनाशी व चिरकाल टिकणारे आहे. हे कळणे म्हणजेच श्रीमदभागवतातल्या या चतुःश्लोकी भागवताची अनुभूती येण्यासारखे आहे.



॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" ज्येष्ठ वद्य सप्तमी / कालाष्टमी शके १९४८ दिनांक ७  / ७ / २०२६


७ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


Monday, July 6, 2026

श्रीमदभागवत चिंतन - ६ धुंधुकारीची मुक्ती

श्रीमदभागवत या ग्रंथ पठनाने, श्रवणाने किंवा नुसत्या मननानेही सर्व मनुष्य मात्रांना अत्यंत शुद्ध, विमल आणि जीवनाचे सत्य उलगडून सांगणारे ज्ञान प्राप्त होते हे आपण श्रीमदभागवताच्या फ़लश्रृतीत बघितले. केवळ सर्वसामान्य मनुष्यच नाही तर जीवनभर केलेल्या अनेक चुकीच्या कर्मांमुळे मरणानंतर प्रेत योनीसारखी अत्यंत हीन योनी पावलेल्या धुंधुकारी्ला सुद्धा या ग्रंथ श्रवणाने प्राप्त कशी झाली हे आपण थोडक्यात बघू आणि त्याचा आपल्यासाठी काय संदेश आहे यावर आजचे चिंतन करू.



आत्मदेव आणि धुंधुली या दांपत्याला पुत्रप्राप्तीसाठी प्राप्त झालेल्या वराची धुंधुली आपल्या तामसी स्वभावामुळे अवहेलना करते आणि त्यामुळे तिच्या पोटी जन्मणारा अत्यंत सात्विक पुत्र, गोकर्ण, दुस-याच कुणाच्या तरी पोटी जन्म घेतो. इकडे धुंधुली ही आपल्या सख्ख्या बहिणीच्या अत्यंत चुकीच्या कर्मांमधून उत्पन्न झालेल्या पुत्राला, धुंधुकारीला दत्तक घेते.


काळाच्या ओघात आत्मदेव आणि धुंधुली दोघेही देहातून पंचत्व पावतात. अत्यंत तामसी कृत्यातून जन्म झालेला असल्याने धुंधुकारी हा आपल्या बेताल आणि अत्यंत उच्छृंखल वागण्याने जिवंतपणीच आपल्या मायबापांना मरणप्राय वेदना देतो. आणि मायबापांच्या मृत्यूनंतर तर मग त्याला कसलाही धरबंध उरत नाही. खाओ, पियो और ऐश करो याचा तो अगदी अतिरेक करतो. आपली वर्णाश्रमकर्मे, कर्तव्यकर्मे सगळी तो अगदी खुंटीवर टांगून ठेवतो.


त्याच्या या अत्यंत बेबंद, बेताल आणि उच्छृंखल वागण्यामुळे तो सुद्धा अत्यंत वाईट परिस्थितीत पंचत्व पावतो आणि जीवनभर नको नको ती पापकर्मे केल्यामुळे प्रेतयोनीला प्राप्त होतो आणि तिथे गेल्यानंतर मात्र त्याला पश्चाताप होतो. आपण मनुष्य योनीत असताना काय करायला हवे होते आणि काय करायला नको होते याची जाणीव त्याला प्रेत योनीत होते आणि आता आपण यातून बाहेर पडून ईश्वरी रूपाला कसे प्राप्त होऊ याची खरी तळमळ त्या धुंधुकारीला लागते.



याउलट अत्यंत सात्विक प्रसादामुळे जन्म घेतलेला सात्विक वृत्तीचा गोकर्ण आपल्या या अशा दुराचारी आणि त्यामुळे आता प्रेत योनीला प्राप्त झालेल्या भावाचे श्राद्धादि कर्म गयेसारख्या पवित्र ठिकाणी जाऊन करतो पण गावी परतल्यावर त्याला कळते की इअतक्या पवित्र ठिकाणी यथासांग श्राद्धादि कर्मे करूनही आपल्या भावाला प्रेत योनीतून मुक्ती मिळालेली नाही. मग गावातल्या इतर जाणकार लोकांच्या सल्ल्याने, आपल्या वैयक्तिक उपासनेने तो ही समस्या कशी सोडवायची याचे ज्ञान प्राप्त करून घेतो आणि घरी श्रीमदभागवत सप्ताहाला प्रारंभ करतो.


मनुष्यजन्मात असताना केलेल्या आपल्या कर्मांचा पश्चाताप झालेला आणि आता प्रेत योनीतून बाहेर पडण्याची तळमळ असलेला तो धुंधुकारी सुद्धा सप्ताह श्रवण करण्यासाठी सप्ताहस्थळी येतो. प्रेतयोनीत असलेल्या वायुरूप धुंधुकारीला सप्ताहस्थळी इतरत्र कुठेही न बसता आल्याने तो बसण्यासाठी सात गाठी असलेला एक बांबू निवडतो आणि त्याच्या सगळ्यात खालच्या गाठीत प्रवेश करून कार्यक्रमस्थळी सुरू असलेल्या श्रीमदभागवताचे अत्यंत भक्तीभावाने श्रवण करू लागतो. दरदिवशीचे श्रवण संपले की त्या बांबूची एक एक गाठ फ़ूटत जाते आणि श्रीमदभागवत सप्ताहाच्या सातव्या दिवशी सातही गाठी फ़ुटून धुंधुकारी हा प्रेतयोनीतून मुक्त होतो. त्याला विष्णुलोकात नेण्यासाठी श्रीविष्णुंचे दूत येतात आणि तिथे श्रीमदभागवत सप्ताह श्रवण करण्यासाठी असलेल्या इतर जनांना मोठा विस्मय होतो आणि आनंदही होतो. स्वतःच्या जीवनभर केवळ पापकर्मे केलेल्या इतक्या अनाधिकारी आणि आता प्रेतयोनीत असलेल्या जीवाला विष्णुलोक कसा प्राप्त झाला यावर ते सगळे चिंतन करतात आणि त्यांच्या लक्षात येते की धुंधुकारीने जसा श्रीमदभागवत सप्ताह स्वतःची आसनसिद्धी साधून, एकाग्र मनाने आणि ख-या तळमळीने श्रवण केला तसाच आपण सर्वांनी करायला हवा होता.


आज आपण विचार केला तर आजच्या युगात आपण सगळेच धुंधुकारी झालेलो आहोत. खा, प्या, मौज करा. उद्या कुणी बघितला ? देव, दानव या सगळ्या कल्पना आहेत. समोर दिसतेय, प्रत्ययाला येतेय तेच विश्व खरे या समजुतीत आपण वावरत आहोत. पाप आणि पुण्याच्या आपल्या कल्पनांना सुद्धा आपण आपल्या सोयीप्रमाणे आपल्याला भावेल ते स्वरूप दिलेय. आपली शास्त्रे, धर्मग्रंथ याबाबतीत काय म्हणताहेत याकडे थोडेसुद्धा लक्ष द्यायला आपल्याला वेळ नाही. रोजचे जीवन जगण्याचा संघर्ष आपण आपलाच फ़ार मोठा आणि अकारण क्लिष्ट करून ठेवलाय. अशात मृत्यूश्चात आपली अवस्था धुंधुकारीसारखीच होणार हे निश्चित आहे. आपल्याला हे कदाचित कळतेय पण त्यावर "शोधू ऐनवेळी उपाय" अशा वृत्तीने आपण आज दुर्लक्ष करतोय.


धुंधुकारीला त्या अवस्थेतून बाहेर काढायला त्याकाळी गोकर्णासारखा अधिकारी, धर्म जाणणारा आणि सात्विक भाऊ होता. त्याने आपल्या भावाच्या मुक्तीसाठी प्रयत्न केलेत. आपल्याला जर अशी प्रेत योनी प्राप्त झाली तर त्यातून आपली सुटका करणारा आजच्या युगात गोकर्ण कुणीही नाही. आपल्या मागेपुढे सगळेच धुंधुकारी. सगळेच त्या प्रेतयोनीत येणार. 


मग मरणोपरांत चांगल्या गतीसाठी, आपल्या मुक्तीसाठी, आपल्यालाही विष्णुलोक प्राप्त करून देण्यासाठी या कलियुगात उत्तम उपाय म्हणजे श्रीमदभागवत कथा. मग ही कथा कशी श्रवण करायची ? ही कथा श्रवण करताना धुंधुकारीसारखी आपली आसनसिद्धी साधल्या गेली पाहिजे. दररोज एका आसनावर, एका विशिष्ट वेळी ही साधना झाली पाहिजे. आजच्या आधुनिक युगात आपले मॅनेजमेंट गुरू मंडळी आपल्याला "Time and Place Habit" सांगतात ती हीच. श्रीमदभागवत श्रवण मननाची विशिष्ट वेळ, विशिष्ट जागा याबाबत आपण आपल्या मनातूनच आग्रही असायला हवे आणि तशी शिस्त लागायला हवी.


धुंधुकारीला त्या प्रेतयोनीतून बाहेर येण्यासाठी जशी तळमळ लागली होती तशी आपल्याला आपल्या सध्याच्या भौतिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्थितीतून बाहेर येण्यासाठी तळमळ लागायला हवी. श्रीमदभागवतात विशद केलेले विशुद्ध ज्ञान जाणून घेण्याची तळमळ लागायला हवी. आणि हेच श्रवण, पठन आणि मनन आपल्याला सध्याच्या स्थितीतून अधिक उन्नत करेल याबाबत मनात अगदी दृढ विश्वास असायला हवा. तरच आपण श्रीमदभागवत सप्ताहाच्या फ़ळांचे अधिकारी बनू.



यात आणखी एक दृष्टीकोन आहे. सध्या पृथीतलावरील ज्या व्यक्तींना त्यांच्या सध्याचा सामाजिक, आर्थिक किंवा मानसिक स्थितीमुळे श्रीमदभागवत श्रवणाचा लाभ मिळत नाही, अशा व्यक्तींना जाणून त्यांना आपण आवर्जून श्रीमदभागवत कथेच्या श्रवणाचा लाभ करून द्यायला हवा. याबाबत आपण धुंधुकारीच्या भावाची, गोकर्णाची भूमिका बजावायला हवी. जी मंडळी सात्विक आचरणाची आहेत ती सगळी तर या श्रीमदभागवत श्रवणाचा, मननाचा आस्वाद घेतीलच पण या जगाच्या बाह्यरूपातच अडकलेल्या अत्यंत अनाधिकारी व्यक्तीने हे श्रीमदभागवत श्रवण करणे खूप आवश्यक आहे हे आपल्यातल्या सगळ्या सज्जन सात्विक गोकर्णांनी जाणले पाहिजे आणि तशी तजवीज केली पाहिजे.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" ज्येष्ठ वद्य षष्ठी शके १९४८ दिनांक ६  / ७ / २०२६


६ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६

Sunday, July 5, 2026

श्रीमदभागवत चिंतन - ५ तक्षकासमान संसारसर्प

कस्मै येन विभासितोऽयमतुलो 

ज्ञानप्रदीपः पुरा

तद्रूपेण च नारदाय मुनये 

कृष्णाय तद्रूपिणा ।


योगीन्द्राय तदात्मनाथ 

भगवद्राताय कारुण्यतत

तत शुद्धं विमलं विशोकम अमृतं 

सत्यं परं धीमहि ॥



श्रीमदभागवताच्या फ़लश्रृतीच्या श्लोकांमध्ये या श्रीमदभागवतरूपी ज्ञानगंगेचा प्रवास कसा झाला याचे वर्णन केलेले आहे. प्रत्यक्ष भगवंता कडून प्रगट झालेल्या या ज्ञानज्योतीने सृष्टीकर्ता ब्रह्माजींच्या हृदयात ज्ञानाचा दीप लावला. ब्रह्माजींनी ते ज्ञान देवर्षी नारदांना दिले त्यांनी ते कृष्ण द्वैपायन महर्षी वेदव्यासांना दिले आणि देवव्यासांनी ते ज्ञान आपला अत्यंत अधिकारी पुत्र असलेल्या श्रीशुकदेवांना दिले. श्रीशुकदेवजी महाराजांनी ते अत्यंत शुद्ध, विमल, शोकाचा नाश करणारे आणि अमृतमय ज्ञान विष्णुराताला (राजा परिक्षितीला) दिले.


राजा परिक्षितीला ’विष्णुरात’ हे नामाभिधान प्राप्त होण्यामागे त्याच्या जन्माची कथा कारणीभूत आहे. अर्जुनपुत्र अभिमन्यू महाभारत युद्धात चक्रव्यूहात मारला गेला तेव्हा त्याच्या पत्नीच्या, उत्तरेच्या गर्भात अभिमन्यूचा वंश वाढत होता. महाभारत युद्धाअखेरी कौरवांच्या पराभवाने संतप्त झालेल्या अश्वत्थाम्याने पांडवकुलाच्या समूळ नाशासाठी अविचाराने ब्रह्मास्त्र सोडले. त्यावेळी उत्तरेच्या गर्भातल्या बाळाला त्या ब्रह्मास्त्रामुळे इजा होऊ नये म्हणून प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने त्या गर्भात सूक्ष्म रूपाने जाऊन त्या बाळाचे रक्षण केले. परिक्षिती राजाला त्याच्या जन्मापूर्वीच प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन झाले होते. तो भगवंत आहे याचे ज्ञान मात्र त्याला तेव्हा नव्हते.



परिक्षिती राजाने या पृथ्वीतलावर जन्म घेतल्यानंतर अत्यंत उपकारबुद्धीने आपल्या रक्षणकर्त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. जगातल्या प्रत्येक व्यक्तीकडे "हा तर आपला रक्षणकर्ता नव्हता ना ?" असे त्याने परिक्षाबुद्धीने बघायला सुरूवात केली म्हणून त्याचे नाव ’परिक्षिती’ आणि प्रत्यक्ष भगवान विष्णुंनी त्याला रक्षण केलेला, या जगात राखलेला आहे म्हणून तो ’विष्णुरा्ख’ किंवा ’विष्णुरात’.


याआधीच्या लेखात विवेचन केल्याप्रमाणे या ग्रंथांवर, यातला उपदेशांवर आपण अत्यंत प्रगाढ असा दृढ विश्वास ठेवलाच पाहिजे कारण लोकोपकारासाठी, लोकांचे भले व्हावे या एकाच हेतूने या ग्रंथांची रचना आपल्या ऋषीमुनींनी केलेली होती. त्यात त्यांना वित्तेषणा, कामेषणा किंवा लोकेषणा तिळमात्रही नव्हती. हे सगळे आजच्या युगाचे गुणधर्म आहेत. त्यामुळे आपण सर्वसामान्य साधकांनी भाविकांनी अशा प्रकारे भगवंताच्या हृदयातून प्रगट होऊन परिक्षिती राजापर्यंत आलेल्या या ज्ञानगंगेत अक्षरशः बुडून जायला हवे कारण हेच ज्ञान आपल्याला आपल्या जीवनात तारून नेणार आहे याबाबत अजिबात शंका नाही. श्रीमदभागवतरूपी हे सत्य आपण अगदी उत्कटपणे आणि कायम आपल्या ध्येयपथावर मार्गदर्शक म्हणून ठेवावे.



यानंतर भगवंताकडे जी याचना केलेली आहे ती मोठी विलोभनीय आहे. आपल्या सारख्या सर्वसामान्य संसारी जनांनी ही प्रार्थना कायम आणि वारंवार करीत रहायला हवी. 


योगीन्द्राय नमस्तस्मै शुकाय ब्रह्मरूपिणे।

संसारसर्पदष्टं यो विष्णुरातममूमुचत्।।


योगीराज भगवान कृष्णाला आणि प्रत्यक्ष ब्रह्मरूप झालेल्या श्रीशुकदेवांना वंदन करून वेदव्यास प्रार्थना करतात की आपण तक्षकदंश होणा-या विष्णुराताला ज्याप्रमाणे तारले त्याचप्रमाणे या संसाररूपी सर्पाच्या दंशाने वेळोवेळी विव्हळ होणा-या मलासुद्धा तारावे.


काय गंमत आहे पहा. या संसारात आपल्या विषयांच्या तृष्णेमुळे आपल्याला कायम कायिक आणि मानसिक दुःखे भोगावी लागतात. तरीही सवयीने आपल्याला हा संसार हवाहवासा वाटतो. तक्षकाचा दंश राजा परिक्षितीला फ़क्त एकदाच होणार होता पण आपण सर्वांना हा संसारसर्प जवळजवळ रोजच दंश करीत असतो पण तरीही आपल्याला हा संसार हवाहवासा वाटतो, हा संसार सोडताना अपार दुःख होते. श्रीगजाननविजय ग्रंथात संतश्रेष्ठ श्रीगजानन महाराज भक्तांना उपदेश करताना म्हणतात त्याप्रमाणे 


पहा जगाची रीत कैसी । अवघेच इच्छिती संसारासी ।

सच्चिदानंद श्रीहरीसी । पहाण्या न कोणी तयार ॥


सर्वसामान्य सांसारिकांना हा संसारसर्पाचा दंश मोठा गोड आणि विलोभनीय वाटत असतो. पण ज्यांना श्रीमदभागवतातल्या शुद्ध आणि अमृतमय सत्याचा अनुभव घ्यायचा आहे त्यांनी तक्षकदंशासमान असलेल्या या संसारसर्पाच्या दंशापासून रक्षण करण्यासाठी भगवंताची प्रार्थना करावी. 


भगवंत अकारण करूणामयी असल्याने ते आपल्या हृदयातली खरी तळमळ ओळखून आपल्याला सहाय्य करतीलही पण त्यासाठी आपल्या हृदयात अत्यंत तळमळ असणे आवश्यक आहे. ती तळमळ कशी असावी ? याचेही उदाहरण श्रीमदभागवतकारांनी आपल्याला दिलेले आहे. त्याचा विचार आपण पुढील लेखात करू.



॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" ज्येष्ठ वद्य पंचमी शके १९४८ दिनांक ५  / ७ / २०२६


५ जुलै २०२६

#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६