Sunday, August 30, 2026

सगुण उपासनेतला साधा सरळ आणि तरीही लोभसवाणा भक्तीभाव

श्रीमदभागवतकारांनी 

"सच्चिदानंदरूपाय, विश्वोत्पत्यादि हेतवे. तापत्रयविनाशाय, श्रीकृष्णाय वयं नुमो." 

असे वर्णन त्या पूर्णब्रम्हाचे केलेले आहे. त्या वर्णनातला 'वयम' हा शब्द श्रीकृष्ण उपासनेचे सामूहिक स्वरूप विशद करतो खरे, पण त्याचबरोबर आपली वैयक्तिक उपासना  आपले त्या परब्रम्हाशी वैयक्तिक नाते दृढ करून भगवंताशी आपले अनुसंधान कायम टिकवायला मदत करील हे नक्की.

आपले आजोबा, पणजोबा नियमितपणे भगवंताची पूजा करीत असत आणि पूजा करताना देवांच्या त्या मूर्तींशी त्यांचा संवादही चालत असे. बर्‍याचदा कृतक कोपाने आपले आजोबा लंगड्या बाळकृष्णाला रागावतही असत. ("राहा न रे सरळ. सारखा गलंडून जातो बेटा" अशी त्या लंगड्या बाळकृष्णाला अभिषेक करता करता तंबी);

किंवा एखाद्या नवसाच्या पूर्ततेसाठी आपली आजी देवाला धमकी देतानाही आपण बघितलेले आहे ("पहा बरं, माझे हे काम झाले नाही ना तर मी उद्यापासून चढत्या उतरत्या वातींचा नेम करणारच नाही" वगैरे)

शांतिब्रम्ह एकनाथ महाराजांच्या "लंगडा ग लंगडा" या गवळणीतही हाच सख्यभाव, देव माझा पुत्र आहे हा भाव जाणवतो.

सगुण उपासनेतून त्या निर्गुण निराकार परब्रम्हाशी अनुसंधान साधणारी ही साधी सरळ  भक्तमंडळी. त्यांचा भक्तीभाव अतिशय लोभसवाणा आणि अनुकरणीय. 



आमच्या गुरूमहाराजांकडे झालेल्या एका श्रीमदभागवतसप्ताहात आम्हा पती पत्नींना "नंदबाबा आणि यशोदामैय्या" होण्याचा योग लाभला. प्रत्यक्ष परब्रम्हाचे मायबाप होण्याचा अतिशय आनंददायक हा प्रसंग.आम्ही खूप मनापासून तो प्रसंग उपभोगला. 

श्री. विवेकजी घळसासींनी आपल्या प्रवचनांमधून सांगितल्याप्रमाणे दररोज सकाळी आपल्या सगळ्यांच्याच घरी (आणि मनातही) असाच नंदोत्सव साजरा व्हावा, दररोज आपण सगळे नंदबाबा, यशोदामैय्या व्हावेत, तो परमात्मा आपल्या घरातील मुलांच्या, नातवंडांच्या रूपाने दररोज आपल्याला भेटावा ही त्याच्या चरणी मनःपूर्वक प्रार्थना.

- आपला नंदबाबा, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


डबल डेकरच्या शेलमध्ये गरीब रथ : एक अभिनव कल्पना

या फोटोत दाखवलेला शेल आहे "डबल डेकर" एक्सप्रेसचा. ही वातानुकुलीत डबल डेकर एक्सप्रेसची संकल्पना भारतीय रेल्वेत फारशी यशस्वी ठरली नाही. भोपाळ - इंदूर, मुंबई - मडगाव, बंगळूर - चेन्नई, दिल्ली - जयपूर या सर्व मार्गांवर या गाडीला थंड प्रतिसाद मिळतोय.


pic courtesy: My railfan friend Mr. Gaurav Virdi

त्याला "उदय" (UDAY: Utkrisht Double decker Airconditioned Yatri Express) या नव्या नावाची फोडणी देऊनही ही शिळी संकल्पना प्रवाशांच्या पचनी पडली नाही.


लालूप्रसाद यादवांनी, त्यांच्या रेल्वेमंत्रीपदाच्या काळात, गरीब रथ ही एक चांगली संकल्पना आणलेली होती. परवडणार्‍या दरात वातानुकुलीत प्रवास सर्वसामान्य जनतेला भावला होता. एखादा अपवाद वगळता सगळ्याच गरीब रथ गाड्या प्रवाशांमधे सुपर हिट ठरल्या होत्या.


गरीब रथ गाड्यांमधे एका प्रवासी दालनात(bay मधे) मुख्य ३ + ३ बर्थस आणि साईडला पण ३ बर्थस असे ९ बर्थस असायचे. मुख्य बर्थसचा तर तेवढा प्रश्न नाही पण साईडचे ३ बर्थस, त्यांच्या कमी उंचीमुळे, प्रवाशांना अत्यंत गैरसोयीचे ठरत होते. 

मला वाटत, गरीब रथ साठी रेल्वेने हा डबल डेकरचा, जरा जास्त उंचीचा आणि वरच्या बर्थलाही खिडकी असलेला, शेल वापरावा. जास्त उंचीमुळे प्रत्येक बर्थला जरा चांगली जागा मिळेल. साईड बर्थसला पण उंचीची अडचण येणार नाही. एकूण बर्थस पण ९ x ९ = ८१ बसतात.


संसाधने भरपूर आहेत. प्रवासी हितासाठी ते वापरणारा "योजकस्तत्र दुर्लभः"


- कल्पक रेल्वेफॅन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर 

Sunday, August 23, 2026

नातेवाईक आणि कर्माचा सिद्धांत

"God gave us relatives; Thank God we can choose friends" असे इंग्रजी भाषेत जराश्या वैतागानेच म्हटले जाते. बरोबरच आहे. नातेवाईकांना वैतागलेल्या एखाद्या विचारवंताने हे वाक्य प्रसवले असावे आणि त्या वाक्याच्या सार्वत्रिक समान अनुभवामुळे ते वाक्य जगभरातल्या लोकांना पटले आणि रूढ झाले.


आपल्या भारतीय संस्कृतीतल्या कर्माच्या सिद्धांतानुसार मात्र या वैतागवाण्या वाक्यामागचा नेमका अर्थ लागतो. मुळात या जन्मात आपल्या आयुष्यात येणारी सर्व मंडळी, आपले सर्व नातेवाईक इतकेच काय आपली अपत्ये सुद्धा गत जन्मातले आपले काही ऋण वसूल करायला किंवा फ़ेडायला आलेले असतात. गत जन्मातल्या किंवा गेल्या अनेक जन्मातल्या आपल्या काही कर्मांचा हिशेब त्या जीवांच्या बाबतीत अपुरा राहिलेला असतो तो पूर्ण करण्यासाठी ही सगळी मंडळी आपल्या आयुष्यात येतात. मग या जन्मात या मंडळींकडून आनंददायी अनुभव आलेत, सुख प्राप्त झालेत तर गेल्या काही जन्मांमधले आपल्या कर्माचे चांगले संचित आता  आपल्याला फ़ळ द्यायला आलेय म्हणून ते स्वीकारायचे असते आणि जर त्यांच्याकडून आपल्याला मनस्ताप, उद्वेग, त्रास झाला तर मागल्या काही जन्मात आपण त्यांना अशा प्रकारचा काही त्रास दिला असावा ते कर्म पूर्ण करायला आपल्या आयुष्यात ते आलेले आहेत असे मानून या जन्मात आपण त्रास करून घेऊ नये किंवा त्यांना तशाच प्रकारचा त्रास द्यायला जाऊन या जन्मात नवे कर्म, नवे प्रारब्ध तयार करू नये. 


याउलट गेल्या अनेक जन्मात आपण केलेले कर्म अशा या लोकांकडून आपल्याला त्रास देऊन निःशेष होत असलेले बघून आपल्याला आनंद व्हायला हवा. आपल्या कर्मांचा हिशेब निःशेष झाल्याशिवाय, आपली इथली कर्मांची बॅलन्सशीट टॅली झाल्याशिवाय या जन्ममरणाच्या फ़े-यांमधून आपल्याला सुटका नाही हे कायम लक्षात ठेवावे. आणि या जन्ममरणाच्या फ़े-यातून सुटका हे जर आपले अंतिम ध्येय असेल तर मग या सगळ्या नातेवाईकांना मनोमन धन्यवाद म्हणावे. जर असे आपले अंतिम ध्येय नसेल तर मात्र त्यांच्या कर्मांना प्रत्युत्त्तर देत, त्यावर अधिक कर्मे करीत आपण नवीन कर्मे, प्रेम, वैर इत्यादि भाव निर्माण करावेत आणि ते भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घेत जावे. 


आपल्या भारतीय संस्कृतीत यासाठी "ऋणानुबंध" हा मोठा छान शब्द आहे. आपले इतर अनेक जणांशी, अनेक जन्मांचे काहीतरी ऋण असेल आणि त्या अनुबंधामुळे, त्या बंधनांमुळे त्या त्या व्यक्ती आपल्या आयुष्यात या जन्मी आल्या असतील असा त्या शब्दाचा अर्थ. हे ऋण मान्य करून ते कसे आहे याचे कौतुक या जगात बघणे आणि ते ऋण फ़िटत आले म्हणून त्याचा आनंद घेणे हे खरे जीवन.



जगाला कसे वागायचे तसे जग वागो. कदाचित जगात सगळ्यांनाच हा कर्माचा सिद्धांत पटतो, पचतो असे नाही पण मला मात्र या कर्मांच्या फ़े-यातून मुक्त व्हायचे आहे अशी ज्याची इच्छा असेल त्याने मात्र अशा प्रकारे निष्कर्म होण्याचा प्रयत्न करीत असावा आणि त्या प्रयत्नात आपल्याला त्रास देऊन अशा प्रकारे आपल्या कर्मांचे ओझे हलके करणा-या सगळ्यांचे मनोमन ऋणी असावे. सगळ्यांसाठी अगदी मनापासून "जो जे वांछिल तो ते लाहो" ही प्रार्थना करीत असावे. जगातल्या सर्व सुष्ट शक्तींच्या अवलोकनात "जो जे"या प्रार्थनेत आपलाही समावेश होतो हे तर अगदी नक्की समजावे. मग अगदी निर्भय आणि आनंदी होऊन साक्षीभावाने जगावे, जगता यावे.


संत एकनाथ महाराजांच्या "जैशी स्थिती आहे, तैशापरी राहे; कौतुक तू पाहे, संचिताचे" या ओवीचा अर्थ हाच तर आहे. हे करत असताना जगाप्रती आपली चांगली कर्मे मात्र सोडू नयेत. चांगलीच कर्मे करावीत पण त्या चांगल्या कर्माचेही संचित तयार होऊन ते भोगायला आपल्याला पुन्हा जन्म नकोय ही भावना मनात ठेऊन ती सर्व कर्मे भगवंताला, श्रीक्रुष्णाला अर्पण करावीत आणि निःशेष कर्मांच्या आनंदात मस्त जीवन जगावे. 


भाषाप्रभू गदिमांनी तर लिहीलेच आहे ना "जग हे बंदिशाळा, कुणी न येथे भला चांगला, जो तो पथ चुकलेला...... सुटकेलाही मन घाबरते" तसे या जगाची इतकी सवय होऊन हेच जग आवडायला लागणे, इथल्या भातुकलीच्या, लुटुपुटूच्या खेळांमध्ये रमणे आणि त्यामुळे जगाच्या बंदिखान्यातून सुटका व्हायला मन घाबरणे असे होऊ देऊ नये. या जगातून आपली कर्मे निःशेष करून आपल्याला सुटका करण्यासाठी आलेल्यांचे मनोमन आभार मानावे आणि सुटण्यासाठी तयार रहावे. 


- "कर्माचा सिद्धांत हा ग्रंथ अगदी योग्य वेळी वाचनात आलेला आणि त्याचे वाचन झाल्यानंतर त्यातल्या सिद्धांतांचा डोळस अनुभव घेत असणारा मुक्तीच्या मार्गावरील एक साधक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

перестройка and гласность (Perestroika and Glasnost)

Perestroika and Glasnost अर्थात पुनर्रचना आणि मोकळेपणा हे नव्वदीच्या दशकातले अगदी परवलीचे दोन शब्द होते. पूर्वीच्या एकत्रित रशियाचे शेवटले अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी या दोन शब्दांचा वापर करून रशियाच्या पोलादी राजवटीत नवे युग आणले आणि रशियातून अनेक राष्ट्रे स्वतंत्र झालीत. ती गोष्ट चांगली झाली की वाईट ? यावर एका जाडजूड ग्रंथाचे लेखन, त्यावर परिसंवाद वगैरे अनेक गोष्टी होऊ शकतील पण त्यात आपण जायला नको. 


आपल्या सर्वांच्या आयुष्यातही हे दोन शब्द किती महत्वाचे आहेत याचा आपण विचार केला असता आपल्या लक्षात येईल की आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर Perestroika अर्थात पुनर्रचना अत्यंत महत्वाची आहे. नवे विचार स्वीकारणे, नव्या लोकांना स्वीकारणे त्याचबरोबर स्वतःच्या आयुष्याची, विचारांची, संकल्पनांची, आपण पालन करीत असलेल्या सिद्धांताचीही एकदा मनाशी विचार करून, त्यांची पुनर्रचना करून नव्याने मांडणी केल्याने आपल्या आयुष्यातला प्रवाहीपणा कायम राहतो. जगण्याची तत्वे जरी ठाम असलीत तरी नव्या युगात, नव्या परिभाषांमध्ये त्या तत्वांना जोखून ती तत्वे जगण्याचे, नव्या पिढीत रूजविण्याचे नवे मार्ग अस्तित्वात आणायचे असतील तर Perestroika फ़ार आवश्यक आहे. साचलेपण हे फ़ार घातक आहे. विचारांचे आणि आयुष्याचेही. 


पण ही पुनर्रचना करण्यासाठी आपला स्वतःशी आणि इतरांशीही Glasnost अर्थात मोकळेपणा हा आवश्यक आहे. हे वागण्याबोलण्यात, विचारांमध्ये मोकळेपण नसेल, तुमचेच जीवन जर पारदर्शी नसेल तर मग तुमच्या अत्यंत प्रामाणिक हेतूंबाबतही शंका उपस्थित होऊ शकतात. त्यासाठी मुळात आपण जे नाही ते दाखविण्याचा आपला अट्टाहास संपायला हवा. आपण जसे आहोत, ज्या पद्धतीचे मनुष्य आहोत ते जगापासून लपवायचे कशाला ? आपले गुणदोष जसेच्या तसे जगासमोर आलेत म्हणून घाबरायचे कशाला ? आपण जे नाही ते सतत जगासमोर दाखवत राहणे म्हणजे आपला आपल्याच जीवन जगण्याच्या पद्धतीवर, सिद्धांतांवर विश्वास नाही असे होते. तुमच्या जीवन पद्धतीला, जीवन जगण्याच्या सिद्धांतांना हे जग, हा समाज कदाचित मानणार नाही, याबाबत इतर जगाची वेगळी मते असू शकतात हा मोकळेपणा आपल्या विचारात असला की जगाच्या सिद्धांताशी. मतांशी आपली मते पडताळून बघत त्यात तथ्य असेल तर ती स्वीकारणे आणि त्यात काही तथ्य नसेल तर ती न स्वीकारता आपली मते जगाला पटवणे यासाठी सुद्धा मोकळेपणा आवश्यक असतो. आणि सरतेशेवटी आपला आपल्याच मतांवर ठाम विश्वास असला की जगाला पटो न पटो, मी माझ्या सिद्धांतांवर जगत राहणार, जगाने त्यांच्या त्यांच्या सिद्धांतांवर जगावे हा स्वीकार मनात येण्यासाठीसुद्धा मनाचा मोकळेपणा आवश्यक असतो.


काय म्हणताय मंडळी ? पटतय का ?


- Perestroika and Glasnost च्या काळात युवावस्थेत पदार्पण करीत असलेला आणि त्या शब्दांचा प्रचंड प्रभाव पडलेला एक गृहस्थ प्रा. वैभवीरामाईल किन्हीचोव्ह.


 

Saturday, August 22, 2026

जग जहां चले उफ़राट झूठ को साहब कैसा भेटे ?

जग जहां चले उफ़राट

झूठ को साहब कैसा भेटे ? II धृ II


पथर को तो सिंदुर चढावे

सब कहे देव मोटे

रावण के तो बंदीखान मे

खाये कमरमे सोटे II धृ II


(रावणाने सर्व देवांना बंदी करून ठेवले होते त्याचा हा संदर्भ)


लडके खातर नवस बोले

देवको नारळ फ़ुटे

देवके आगे धरी नरोटी

आपन खा गये टोटे II धृ II


निर्जीव देवके सामने

सजीव बकरा काटे

मिल गये आदम

खा गये बकरा

देव के आगे भाटे II धृ II


देनेवाला वो है न्यारा

तुम कौन देव के बेटे

कहत कबीर सुनो भाइ साधो

राम नाम धन लूटे II धृ II


या भजनात आपणा सर्व प्रापंचिकांची देवाप्रती असलेली वागणूक यातून मांडलेली आहे. आपण प्रपंचात तर खोटेपणा करतोच पण त्या सर्वसाक्षी परमेश्वरापाशीसुद्धा खोटेपणा करायला गेलोत तर तो कसा आपल्याला भेटेल हा संदेश यातून नानांनी दिलेला आहे. सगळ्याच संत मंडळींनी आपल्याला परमार्थात खोटेपणा टाळून सच्च्या हृदयाने परमेश्वरापर्यंत जाण्याचीच आपल्याला शिकवण दिलेली आहे.



प.पू. नानांच्या (माझे सदगुरू) सहज आणि विनोदी शैलीतले हे भजन.

Friday, August 21, 2026

गेल्या दोन अडीच दशकात आपल्यात, आपल्या समाजरचनेत झालेले बदल

आजकाल आपण आपापल्या व्यापांमध्ये फार व्यस्त झालोय ? की व्यस्ततेचा हा व्याप आपण अकारणच आपल्यामागे लावून घेतलाय ?

वपु काळे म्हणतात की "नाटकाच्या १५ व्या रांगेतली तिकीटे काढलेल्या दोन माणसांनी एकमेकांना किती बिचकायचे ? एकमेकांपासून किती अंतर ठेऊन रहायचे ?" 

मला वाटते हा तर्क कुठल्याही दोन व्यक्तींसाठी लागू होईल. नाटकाच्या पहिल्या रांगेतल्या दोन व्यक्तीही त्या तीन तासांसाठी एकाच सामाजिक आणि आर्थिक पातळीवर असतील ना ? त्यांनी उगाच एकमेकांशी "शिष्टपणा" करीत वागण्याचे काहीच कारण नाही.

पूर्वी प्रवासादरम्यान एकमेकांशी बोलणे व्हायचे. शिदोर्‍यांच्या गाठी सुटायच्यात तशा मनांच्याही गाठी एकमेकांसोबत सुटायच्यात. सुखदुःखांची देवाणघेवाण व्हायची. माझ्यासारखाच दुसरा कुणीतरी या जगात आहे या भावनेने मनाला आधार मिळायचा. आपल्यापेक्षा हुशार व्यक्ति भेटल्यानंतर त्या व्यक्तिचा आदर्श ठेवला जायचा. तो एक बेंचमार्क  म्हणून बघितला जायचा. त्यामुळे आपलीही वाटचाल प्रगतीपथावर होत असे.

आज आपण अकारण "शिष्टपणा" करायला लागलोय हे माझे निरीक्षण आहे. प्रवासातल्या शेजारच्या माणसाचे तर सोडाच आपल्याला आपल्या शेजार्‍यांविषयी, सहकर्मचार्‍यांविषयीही फारशी माहिती नसते. एकमेकांना उगाच बुजून आपण संबंध फारसे वाढवीत नाही. वास्तविक समानशील व्यक्ती असतात, चांगली मैत्री होण्यासाठी वाव असतो, पण दोन्ही बाजूंकडला अकारण बुजरेपणा आड येतो.

अगदी रक्तातल्या नात्यातल्या नातेवाईकांबाबतही आपण असेच वागतो. कौटुंबिक व्हॉटस ॲप  ग्रुपवर एकमेकांच्या प्रत्येक पोस्टसना थंब्सप (तिथेही आपली कंजुसी असतेच. वास्तविक एखादी गोष्ट आवडली तर मनमोकळेपणे काॅमेंट लिहून दाद द्या ना. पण तिथेही आपला शिष्टपणाच आड येतो.) देणारी दोन मंडळी एकमेकांच्या घरी (जर वर्षा दोन वर्षांनी वेळ आलीच तर...) फोन करून, व्यवस्थित अपॉइंटमेंट वगैरे घेऊनच जातात. वास्तविक ज्याच्याकडे जायचय तो मनुष्य त्या सुटीच्या दिवशी बर्म्युडा घालून लोळत लोळत व्हॉटस ॲप बघत बसलेला असतो पण त्याची "अपॉइंटमेंट" वगैरे घ्यावी लागते.

याचा परिणाम असा झालाय की या personal space वगैरे पाश्चात्य कल्पनांना कवटाळण्यांच्या नादात आपण प्रत्येकजण एकटेपणाकडे वाटचाल करतो आहे. देश म्हणून, समाज म्हणून एवढेच काय कुटुंब म्हणूनही आपण विसविशीत होत चाललोय. नात्यांची घट्ट वीण हळूहळू का होईना उसवत चाललीय. एकमेकांचा आधार सुटत चालल्याचा भास होतोय. खरेतर थोडा मोकळेपणाने संवाद झाला आणि लक्षात आले की पुढली व्यक्ति सुध्दा आपल्यासारखीच मानवी सहचर्याला आसुसलेली आहे तर दोन व्यक्तिंमध्ये नवा पूल बांधला जाईल. विचारांचे दळणवळण सुकर होईल, आधार वाढेल, व्यक्ति, समाज आणि पर्यायाने राष्ट्र सुदृढ आधाराने उभे राहतील.

पुढल्या काही दशकांमध्ये मानसिक रोग हाच जगातला सगळ्यात मोठा आजार असेल असे तज्ञ भाकित करतात हे याच आधारावर. चला, अकारण शिष्टपणा टाळूयात, नैसर्गिक प्रेरणेने (अर्थात समाजव्यवस्थेचे सगळे नियम पाळतच) जगूयात, जे आपण नाहीत ते दाखवण्याचा, तसे जगण्याचा अट्टाहास आवरूयात.

"सर्वे भद्राणि पश्यन्तु" कडे सगळेच एकसाथ वाटचाल करूयात.

- अनोळखी व्यक्तिंशीही गप्पांमध्ये रमणारा, अघळपघळ नागपूरकर, रामभाऊ.

Monday, August 17, 2026

तानसेन कानसेन आणि कानांना बोचणारे शब्द

परमेश्वराने तानसेनाचा गळा जरी आम्हाला दिला नसला तरी कानसेनाचे कान मात्र भरभरून दिलेत. पुलंच्या भाषेत सांगायच तर एखाद्यासारख गाता येत नसेल पण त्याच्या गायनात एखाद्या रागाचा काष्टा सुटल्याच किंवा एखाद्या रागिणीचा पदर ढळल्याच चटकन लक्षात येत.

पण तरीही आज लक्षात आल की आपल प्रेम गाण्यातल्या सुरांपेक्षा काकणभर अधिक त्यातल्या शब्दांवर आहे.

झाल ते अस. शनिवार संध्याकाळ. ढग जमून आलेले. मस्त मूड लागला. यूट्यूब उघडल आणि त्याला म्हटल, "बेटा, आज बिलासखानी तोडी सुनेंगे."

सुंदर गाण्यांची लड सुरू झाली पण दोन नवोदित गायिकांचे शब्द साखरभातातल्या (परवाच घरी बेत झाल्याने ताजी ताजी उपमा) खड्यांसारखे बोचलेत.

" "झूटे तेरे नैन" नाही रे बाळांनो. "जुठे तेरे नैन" अशी भावना आणि शब्द आहेत ते." असे त्या नवोदित गायिकांना कळवळून सांगावेसे वाटले. आजकाल गाण्यातला भाव समजून न घेता गाता येणे या गोष्टीला भलताच भाव आला आहे हे लक्षात घेऊन गप्प बसलो.

प्रियकर आदल्या रात्री सवतीबरोबर होता आणि त्यामुळे त्याचे डोळे (तिच्याकडे प्रेमाने, आसक्तीने बघत राहिल्याने) उष्टे झाले आहेत ही त्या प्रेयसीची भावना. पण न समजता गायल्याने ते "झुटे" झालेत.

असच कानाला पसायदानातले "येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो" खटकते. विश्व + ईश + रावो = विश्वेशरावो असा संधी झालाय रे तो.  ज्ञानदेवांच्या या विश्वात्मक देवाला आपण अगदी काशीचा विश्वेश्वर करून टाकलय हे कुठेतरी कानाला खटकत. कार्यक्रम कितीही देखणा झाला तरी आयोजकांची एकंदर तयारी कितपत होती ? हे मी तरी पसायदानाच्या अचूक उच्चारणावरून ठरवतो.

असो, बाकी "आता अध्यक्ष आणि इतर मान्यवरांनी "मंचकावर" (अचूक शब्द "मंचावर") विराजमान व्हावे"

किंवा 

"महाराष्ट्राचे "तथाकथित" (अचूक शब्द "तत्कालीन") राज्यपाल" 

वगैरे मी ऐकलेल्या मराठीच्या जाहीर धिंडवड्यांबद्दल बोलायलाच नको.

— आपला छिद्रान्वेषी, मराठीप्रेमी  रामचंद्रपंत (अमात्य)