तत्र ज्ञान-विराग-भक्ति-सहितम्
नैष्कर्म्यम् आविष्कृतम
तत शृण्वन् सु-पठान् विचारण-परो
भक्त्या विमुच्येन्नरः॥
श्रीशुकदेवजी महाराजांनी राजा परिक्षितीला त्याच्या मृत्यूपूर्वी सलग ७ दिवस केलेला उपदेश आणि त्यामिषाने गायलेल्या भगवंतांच्या अवतार लीला म्हणजेच श्रीमदभागवत महापुराण. मनुष्यजन्म हीच मुळात भ्रांती आहे, आपण आपल्या कर्मांकडे डोळस लक्ष दिले नाही तर जन्म आणि मृत्यूचा हा फ़ेरा आपल्याला वारंवार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे सात दिवसांनी येऊन तुला दंश करणारा तक्षक हा केवळ निमित्तमात्र आहे. हा श्रीशुकदेवांच्या उपदेशातला मुख्य गाभा आहे.
संतकवी दासगणूंनी श्रीगजाननविजय ग्रंथात परम पूजनीय गजानन महाराजांच्या मुखातून त्यांचे पट्टशिष्य बाळाभाऊंना "जन्मे न कोणी, मरे न कोणी, हे जाणावयालागोनी, परमार्थाचा उपाय जाणी, शात्रकारे कथन केला. आणि प्रत्येक मनुष्यमात्राने हे ध्यानात ठेऊन जर आपले जीवन आखले आणि त्यातले प्राधान्यक्रम ठरवलेत तर त्या मनुष्याची खरोखरच आध्यात्मिक उन्नती होईल यात तिळमात्र शंका नाही.
या श्रीमदभागवत ग्रंथाच्या फ़लशृतीत नेमके हेच सांगितले आहे. या ग्रंथात ज्ञान, वैराग्य आणि भक्ती आहे. हाच क्रम का ? कारण आपल्या लक्षात येईल की सर्वप्रथम आपल्याला हा जगाच्या क्षणभंगूरतेविषयी, आपण इथे घेत आलेल्या आणि पुढेही घेत असणा-या जन्म मृत्यूंच्या अनंत फ़े-यांविषयी आणि त्यातल्या धोक्यांविषयी सर्वप्रथम ज्ञान झाले पाहिजे. जन्म आणि मृत्यूचे असे अनंत फ़ेरे घेत राहिल्याने आपले नक्की काय नुकसान होणार आहे याविषयी फ़क्त मनुष्यमात्रच विचार करू शकतात आणि त्यावर योग्य तो उपाय याच जन्मात करून त्या फ़े-यांमधून कायमचे बाहेर होऊ शकतात याचे ज्ञान जर आपल्याला नसेल तर मग पुढले सगळेच व्यर्थ ठरते. मग मनुष्यमात्रांना विचार करण्याचा जो विशेषाधिकार प्राप्त झालेला आहे त्याचा आपण काहीच उपयोग न करता केवळ "आहार - निद्रा - भय - मैथुनंच" अशा प्रकारचे इतर प्राणीमात्रांसारखे जीवन जगत राहू. म्हणून अध्यात्माचे ज्ञान आपल्याला सर्वप्रथम झाले पाहिजे.
नुसते एखाद्या गोष्टीचे ज्ञान होऊन उपयोग नाही तर त्या ज्ञानानंतर आपल्या मनात वैराग्य उत्पन्न व्यायला हवे. या जगातल्या गोष्टींविषयी हवे आणि नको याचा परीघ कमीत कमी करीत नेणे आणि एका क्षणी हे हवे नकोचे वर्तुळ शून्य करणे हे वैराग्य. मग हे वैराग्य प्राप्त करण्यासाठी कुठे संसारत्याग करून जंगलात, हिमालयात जायला नको. कारण हा मनाचा विचार आहे. आणि सर्वसामान्य मनुष्यांसाठी विवेक, विचार सतत जागृत ठेऊन हळूहळू प्राप्त करून घेण्याचा विषय आहे. ज्या काही योगी पुरूषांची गतजन्मीची साधना थोडीशीच अपूर्ण राहिल्यामुळे त्यांनी तिच्या पूर्ततेसाठी हा जन्म घेतलाय त्यांना कदाचित हे वैराग्य पटकन साधेलही पण सर्वसामान्य सांसारिक मनुष्यमात्रांनाही सततच्या प्रयत्नांने ही साधना साधू शकेल, किंबहुना ती साधण्यासाठी मनुष्यमात्रांनी या जगात विशेष प्रयत्न करायचे आहेत. ही साधना कठीण असली तरी अशक्य निश्चितच नाही.
आणि यात सगळ्यात शेवटी भक्ती. या संसाराचे यथार्थ ज्ञान झाले, त्यावर विवेक विचारांनी चिंतन करून मनात या संसाराविषयी वैराग्य सुद्धा उत्पन्न झाले तरीही मनात भक्ती उत्पन्न झाल्याशिवाय मनुष्यमात्रांचे सार्थक नाही. श्रीमदभागवतात अशी बरीच उदाहरणे विशद केलेली आहेत. मनुष्यांनी ज्ञान आणि वैराग्य प्राप्त करून घेतले आणि त्यानंतर एक क्षण असा येतो की आपल्या, आपल्या जीवनाविषयीच्या, विचारांविषयीच्या मर्यादा मनुष्यमात्रांच्या लक्षात येतात आणि हे सगळे मला प्राप्त होण्यामागे माझा काय अधिकार आहे ? याविषयी मानवी मन विचार करू लागते.
आपण बघतो की एखादा असाध्य रोग जडल्यानंतर किंवा जीवनात एखादी दुःखद घटना घडल्यानंतर आपण सगळेच "मीच का ? ही घटना माझ्यासोबतच का व्हावी ?" हा विचार करायला लागतो तसेच आपल्याला खरे ज्ञान आणि वैराग्य प्राप्त झाल्यावर साधकांच्या मनात "मीच का ? हे ज्ञान आणि वैराग्य मला प्राप्त होण्यामागे माझा असा काय विशेषाधिकार आहे ?" हे विचार यायला लागतात. आणि नंतर साधकाच्या लक्षात येते की हे होण्यामागे तो सर्वशक्तीमान परमेश्वर आहे. त्याच्या मनात इच्छा उत्पन्न झाली की या गोष्टी मला मिळाव्यात म्हणून त्याने या जगात स्वतःची प्रतिरूपे असलेले सदगुरू, हे वाटाडे म्हणून उभे केलेत. त्यांनी आपल्याला हा विमल अध्यात्माचा मार्ग दाखवला आणि म्हणून आपण ज्ञान आणि वैराग्याचे जाणकार झालोत.
ही भावना, कृतज्ञता दाटून येणे आणि स्वकर्माचा अहंकार नष्ट होऊन आपल्या या विशेष प्राप्तीमागील कारण समजणे ही भक्तीची पहिली पायरी. श्रीमदभागवत आपल्याला हे असे संसाराच्या सार असारतेविषयी ज्ञान, त्यातून मनात उत्पन्न होणारे वैराग्य आणि हे सगळे आपल्यासोबतच का झाले ? हा प्रश्न उपस्थित करून सदगुरूंविषयी, भगवंताविषयी भक्ती उत्पन्न करून देणार असल्याची ग्वाही देते.
त्यासोबतच या श्लोकाच्या पुढल्या ओळीत नैष्कर्म हा शब्द भगवान श्रीवेदव्यासांनी लिहीलेला आहे. भगवंतांने अर्जुनाला श्रीमदभगवतगीता सांगताना पूर्ण १८ अध्यायांचा सार म्हणजे नैष्कर्म हा शब्द. याविषयीचे चिंतन आपण यापुढील लेखात करूयात.
॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥
- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन"ज्येष्ठ वद्य तृतीया / चतुर्थी शके १९४८ दिनांक ३ / ७ / २०२६
३ जुलै २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#जुलै२०२६










