Thursday, July 2, 2026

श्रीमदभागवत चिंतन - २ राजा परिक्षिती आणि परमहंस श्रीशुकदेव

श्रीमद्-भागवतम् पुराणम् अमलम् 

यद् वैष्णवानाम् प्रियम.

यस्मिन् पारमहंस्यम् एकम् अमलं 

ज्ञानं परं गीयते।


श्रीमदभागवतातल्या फ़लश्रृतीतला हा श्लोक. श्रीमदभागवत पुराण हे अत्यंत अ मल आहे, शुद्ध आहे. यात कुठेही मानवी प्रपंचातल्या गोष्टींचा मळ लागलेला नाही. हे पुराण मनुष्यमात्रांनी प्राप्त करून घेणाजोग्या सर्वोत्तम गोष्टीची (परम अर्थ) वैराग्याचीच चर्चा मनुष्यांशी करतेय. हे श्रीमदभागवतपुराण आणि त्यात सांगितलेला जीवन जगण्याचा मार्ग हा भगवान विष्णूंच्या भक्तांना अत्यंत प्रिय आहे.



काय आहे या श्रीमदभागवत पुराणात ? या पुराणात परमहंस स्वरूपाचे, कधीही मलिन न होणारे फ़क्त ज्ञान गायल्या गेलेले आहे.


दूध आणि पाणी एकत्र मिसळून दिले असता एखादा हंस ज्याप्रमाणे आपल्या चोचीने त्यातले फ़क्त दूधच प्राशन करतो आणि पाणी तसेच ठेऊन देतो, तसेच या जगात जीवन जगत असताना व्यक्तीने या जगातल्या विविध विषयांमधून मनुष्य जीवनात शाश्वत काय आणि अशाश्वत काय याचा विवेक जागृत ठेवत अशाश्वत गोष्टींना टाळून फ़क्त शाश्वत गोष्टींचे सदैव सेवन करावे. असा विवेक कायम जागृत असलेल्या व्यक्तींना परमहंस असे म्हणतात. परम = सर्वोच्च दर्जाचा, हंस = ज्या प्राण्याला नीरक्षीर विवेक (पाणी आणि दूध यातला फ़रक) कळतो असा जो तो. आपण आपल्या जीवनात अशा अनेक सत्पुरूषांना बघतो ज्यांना जीवनाचे सत्य आणि असत्य यांचे पुरेपूर ज्ञान झालेले आहे आणि ते त्यांच्या रोजच्या आचरणातून आपल्याला दिसतेय. अशा सत्पुरूषाला आपण परमहंस असे नामाभिधान देतो. श्रीमदभागवत महापुराण सर्व मनुष्यमात्रांना अशा परमहंस स्वरूपाचे ज्ञान देते.



आणि म्हणूनच श्रीमदभागवत महापुराण श्रवण करत असताना त्यातल्या प्रत्येक कथेकडे केवळ कथा, इतिहास म्हणून न बघता, ही कथा, हा इतिहास आपल्याला मानवी जीवनाच्या परमहंस ज्ञानाचा कुठला उपदेश करतेय ? याचा विवेक सर्व श्रोत्यांनी सदैव जागृत ठेवायला हवा. मानवी मनाचा सखोल अभ्यास करून केवळ एका सप्ताहात, सात दिवसात मानवी मन भारून जाईल, त्या मनात खरे वैराग्य भरले जाईल या गोष्टीची तरतूद भगवान श्रीवेदव्यासांनी हे महापुराण रचताना केलेली आहे. आधुनिक मानसशास्त्रज्ञांनी आजच्या युगातील मानसशात्रीय तत्वे लावून त्यादृष्टीने हा ग्रंथ अभ्यासला पाहिजे असे मला कायम वाटत आलेले आहे.


प्रत्यक्ष भगवत्सखा असलेल्या अर्जुनाचा नातू आणि ज्याच्या जन्माच्या आधीपासून प्रत्यक्ष भगवंताने (ज्याचे अगदी त्याच्या मातेच्या गर्भात तो असताना) त्याचे रक्षण केलेले आहे असा राजा परिक्षिती (विष्णुरात) राज्य करीत असताना केवळ एका साधूने राजाकडे अजाणतेपणी, दुर्लक्ष केले म्हणून त्या साधूंचा अपमान करतो. त्या साधूंना तर त्या मानापमानाची पर्वा नसते, ते बिचारे आपल्या साधनेत, समाधीत असतात पण त्यांचा पुत्र शृंगी ऋषी हा आपल्या पित्याचा अपमान लक्षात आल्यानंतर संतप्त होतो आणि राजाला शाप देतो. सात दिवसात तक्षक दंश होऊन राजाचा मृत्यू होईल असा.


राजाला शापवाणीविषयी कळते, मुळातच चांगल्या मनाचा असल्याने आणि क्षणिक क्रोधामुळे आपला संयम गमावून बसलेल्या त्या विष्णुराताला (विष्णूंनी रक्षण केलेला = विष्णुरात) पश्चाताप होतो पण साधूंची शापवाणी खरी होणार असल्याने तो एकूणच आपल्या जीवनाचा साकल्याने विचार करू लागतो. आपल्या आईच्या गर्भात असताना प्रत्यक्ष ब्रह्मास्त्रापासून ज्याचे रक्षण प्रत्यक्ष भगवंतांनी केले तो राजा एका साधूच्या शापाने मृत्यू पावणार आहे या गोष्टीचे मनन आज आपण सगळ्यांनी केले पाहिजे, यातले मर्म आपण समजून घेतले पाहिजे. 


आणि आता मृत्यूपंथावर निश्चितपणे असलेल्या राजाला उपदेश करण्यासाठी परमहंस रूपाचे मूर्तिमंत उदाहरण असलेले भगवान व्यासपुत्र श्रीशुकदेव राजाला ख-या ज्ञानाचा, एकूणच मानवी जीवांचे उद्दिष्ट काय ? जीवनात श्रेयस काय ? आणि प्रेयस काय ? या सगळ्या गोष्टींचा उपदेश करून त्याला मनाने मुक्त करायला या महापुराणाचा पुढले सात दिवस उपदेश करत आहेत. काय आहे या उपदेशरूपी ग्रंथात ?


तत्र ज्ञान-विराग-भक्ति-सहितम् 

नैष्कर्म्यम् आविष्कृतम

तत शृण्वन् सु-पठान् विचारण-परो 

भक्त्या विमुच्येन्नरः॥


फ़लश्रृतीतील या श्लोकाचा अर्थ आपण यापुढील लेखांकात अभ्यासूयात.



- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन"ज्येष्ठ वद्य द्वितीया शके १९४८ दिनांक २  / ७ / २०२६


२ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६

Wednesday, July 1, 2026

श्रीमदभागवत चिंतन - १ फ़लश्रृती आणि Outcomes Based Education

आपल्या भारतीय संस्कृतीतला एक अत्यंत महत्वाचा वारसा म्हणजे आपली पुराणे. त्यातही श्रीमदभागवत महापुराण म्हणजे सर्व भाविकांना अत्यंत प्रिय असणारे. हे नुसते पुराणच नाही तर हा इतिहास आहे. गेल्या ५००० वर्षांपासून हे महापुराण आपल्या भारतवर्षात अगदी रोज शेकडो, हजारो घरांमधून, मंदिरांमधून, मठांमधून वाचले जातेय, परिशीलन केले जातेय. असा ग्रंथ एकूणच या विश्वाच्या इतिहासात विरळा.



भाविक भक्तांना यात भगवंताच्या लीला दिसतात, इतिहास अभ्यासकांना या ग्रंथात तत्कालीन इतिहासाच्या पाऊलखुणा सापडतील, साहित्यिकांना यात संस्कृत साहित्यातली सौंदर्यस्थळे दिसतील, भाषा अभ्यासकांना या ग्रंथामधून एकाच शब्दरचनेतून अर्थाची अनेक वलये निर्माण करणारी भाषा कशी असू शकते याचे प्रत्यंतर येईल तर अध्यात्माच्या साधकांना भगवान महर्षी वेदव्यासांनी ह्या पुराणाची समाधीभाषेत रचना कशी आणि का केली ? हा प्रश्न त्यांच्या अध्यात्माला सहाय्य करेल. असा विविध अंगांनी अभ्यासण्याजोगा, मनन करण्याजोगा, समाजातल्या सर्व प्रकारच्या सुष्ट प्रवृत्तींच्या पिंडाचे पोषण करणारा हा ग्रंथ सर्वांना आवडला नसता तरच नवल.



कुठल्याही ग्रंथाची फ़लश्रृती म्हणजे आज आपण ज्याला Outcomes Based Education हा शब्द वापरतो तेच आहे. हा ग्रंथ वाचण्याने मला काय मिळेल ? या प्रश्नाचे उत्तर ही फ़लश्रृती देते. फ़रक इतकाच आहे. आज एखादा विषय सुरू होण्याआधीच आपण त्यातले Outcomes वाचतो तर श्रीमदभागवत रचिल्या गेले त्याकाळी सर्व ग्रंथांची, स्तोत्रांची फ़लश्रृती ही त्या ग्रंथाअंती, स्तोत्राअंती असे. तो ग्रंथ, ते स्तोत्र अगदी मनोभावे वाचल्यानंतर, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा, आजूबाजूच्या परिस्थितीचा अगदी विलय करून त्यात  संपूर्णपणे बुडून गेल्यानंतर ग्रंथाच्या शेवटी ग्रंथकारांनी लिहीलेली फ़लश्रृती वाचकाच्या, साधकाच्या प्रत्यक्ष अनुभवाला यायची. हाच त्या ग्रंथाचा प्रसाद. आपण एखाद्या ग्रंथाला प्रासादिक ग्रंथ म्हणतो ते हे असे. ज्या ग्रंथाची फ़लश्रृती ही त्या ग्रंथ वाचकाच्या प्रत्यक्ष अनुभवाचा भाग ठरायची, त्याच्या विचारांमध्ये आणि एकूणच जीवनामध्ये प्रसा्दरूप व्हायची तो प्रासादिक ग्रंथ.


आजच्या बदलत्या युगात आपल्या Outcomes Based Education प्रथेमध्ये एखादा विषय शिकण्याआधीच आपण त्याचे Outcomes म्हणजे फ़लश्रृती बघतो आणि आपल्याला हा विषय शिकायचाय की नाही ? शिकायचाय तर का शिकायचाय ? या प्रश्नांचा मनोमन धांडोळा घेतो आणि तो विषय अभ्यासतो किंवा अभ्यासत नाही.


श्रीमदभागवताच्या अखेरच्या म्हणजे द्वादश खंडामध्ये या ग्रंथाची फ़लश्रृती सांगितलेली आहे. ती फ़लश्रृती आणि श्रीमदभागवत ग्रंथरचनेमागील घटनांच्या साखळींची पार्श्वभूमी याचा अगदी निकट संबंध आहे. आणि ती फ़लश्रृती सुरूवातीलाच आपण अभ्यासली तर हा ग्रंथ आपण का अभ्यासायचा ? याविषयी आपल्या सर्वांची मनोभूमिका पक्की होत जाईल. म्हणून श्रीमदभागवताची फ़लश्रृतीआपण यापुढील लेखात अभ्यासूयात. आणि त्यानंतर श्रीमदभागवत ग्रंथातल्या काही महत्वाच्या सौंदर्यस्थळांना आपण भे्टी देऊयात. हे कार्य पूर्णत्वास जावे अशी सर्व इष्टदेवता आणि सदगुरूंना दंडवत घालून नम्र विनंती करतो आणि आजपुरता विरमतो.


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन"ज्येष्ठ वद्य प्रतिपदा शके १९४८ दिनांक १ / ७ / २०२६


१ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६

Monday, June 29, 2026

शास्त्रकारांचा कायदा तर संतांचा फ़ायदा

आपल्या परिचयातल्या पती पत्नींची गाठ पडली आणि आपण पहिल्यांदा त्यातल्या पतीची तारीफ़ केली तर पत्नीची कळी खुलते. ती प्रसन्न होते. पण हेच उलट झाले तर ? पतीकडे पूर्ण दुर्लक्ष करून पहिल्यांदा पत्नीची तारीफ़ केली तर त्या पतीला क्रोध येण्याची शक्यता असते. आणि पती नाराज तर पत्नीही नाराज.

म्हणून महालक्ष्मीच्या पूजेआधी भगवान विष्णुंचे स्मरण करावे असे शास्त्रकार सांगतात. श्रीसूक्ताआधी पुरूषसूक्त म्हटले जावे असाही शास्त्रांचा दंडक.

पण या नियमाला अपवाद आहेत. जर ती स्त्री आपली आईच असेल तर तिच्याकडे आधी वशिला लावला म्हणून बाबा रागावणार नाहीत. ब-याचशा गोष्टी बाबांकडे जाण्याआधी आईने मंजूर केल्यात तर बाबांचा होकार ही औपचारिकताच असते, हो ना ? अशीच आपल्या संतांची भावना असते. 

ती जगज्जननी भलेही इतरांसाठी सौख्य संपत्ती आदि भौतिक गोष्टींची दात्री असेल आणि तो भलेही जगन्नियंता वगैरे असेल. पण आपले मायबाप आहेत म्हटल्यावर मग इतर सगळे मुद्दे बा्जूलाच पडतात ना हो.




शास्त्रकारांकडे सर्वत्र कायदाच कायदा असतो आणि संतांच्या सहवासात असा फ़ायदाच फ़ायदा असतो.

- "पंढरपुरी आहे माझा मायबाप" ही आरती मनापासून आवडणारा आणि तशीच भावना असणारा बालक वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Saturday, June 27, 2026

संत समागम, हरी कथा, तुलसी दुर्लभ दोय

संत समागम, हरी कथा, तुलसी दुर्लभ दोय

सुत, दारा और लक्ष्मी, पापी के भी होय.



वृंदावनात एका विश्राम स्थळाजवळ लिहीलेला हा दोहा. मनुष्य जीवनाचा साकल्याने विचार केला तर त्यातल्या उपदेशाचे महत्व पटेल. आपल्या मानवी जीवनात ख-या संतांचा सहवास, त्यांच्या मुखातून आलेली हरी कथा आणि घरी तुळशीची सेवा या दुर्लभतेने प्राप्त होणा-या गोष्टी आहेत. त्यासाठी विशेष पुरूषार्थ गाजवावा लागतो. जाणीवपूर्वक विशेष पुण्य कमवावे लागते.


त्यामानाने पैसा कमावणे, लग्न करणे आणि मुले बाळे होणे यात विशेष पुरूषार्थ असा गाजवावा लागत नाही. या दोन सांसारिक गोष्टींसाठी जाणीवपूर्वक पुण्य कमवावे लागत नाही. सर्वसामान्य माणसांनाही या गोष्टी मिळतात.


आपल्या भारतीय विचारदर्शनात "धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष" असे चार पुरूषार्थ सांगितलेले आहेत. एखाद्या व्यक्तीने जन्माला येऊन विशेषत्वाने प्राप्त करून घेण्याची गोष्ट म्हणजे पुरूषार्थ. यात "पुरूष" हा शब्द लिंगवाचक नसून समस्त मानव जातीच्या सर्वनामासारखा वापरला आहे हे आपण इथे ध्यानात घेतले पाहिजे.


पण आपण सर्वांची गल्लत कुठे होते माहिती आहे ? आपण आपली शक्ती, आपले ध्येय हे अर्थ प्राप्ती साठी आणि काम प्राप्तीसाठी वापरतो. मधले दोन पुरूषार्थ साधण्यासाठी आपण जन्मभर घडपडत राहतो आणि धर्म व मोक्ष हे आपल्या नशीबावर टाकतो. "असेल नशीब तर मिळेल मोक्ष", "रोजच्या कामांमधून वेळ मिळाला तर करू धर्म" अशी आपली मनोवृत्ती बनत जाते. 


याउलट संत मंडळी, या क्षेत्रातली जाणकार मंडळी पहिला आणि अखेरचा पुरूषार्थ हा विशेषत्वाने प्राप्त करून घेण्याची गोष्ट मानतात. म्हणजे धर्म जपण्यासाठी आणि मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न मनुष्याने केल पाहिजेत यावर त्यांचा भर असतो. तर अर्थ आणि काम यांची प्राप्ती ते प्रारब्ध आणि पूर्वकर्मांवर सोडतात. इथेच संतांमधला आणि आपण सर्वसामान्य प्रापंचिकांमधला मनोवृत्तीतला आणि प्राप्त होणा-या फ़ळांमधला फ़रक आपल्या ध्यानात येतो.


जीवनाचा साकल्याने आणि समग्रपणे विचार केला तर आपल्या लक्षात येईल की या मर्त्य लोकात कितीही अर्थ आणि काम प्राप्ती आपल्याला झाली तरी हा मर्त्य लोक सोडताना त्यातले काहीही आपल्या सोबत येत नाही. उलट यांची प्राप्ती करताना आपण विशेषत्वाने काही वाईट कर्मे केली असतील तर ते ओझे आपल्याला पुढचे अनेक जन्म सोबत घेऊन वावरावे लागते किंबहुना ते ओझे उतरवण्यासाठी पुढले अनेक जन्म घ्यावे लागतात.


याउलट धर्म आणि मोक्ष या दोन पुरूषार्थांच्या प्राप्तीसाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केलेत तर हे पुरूषार्थ आपल्या या जन्म आणि मृत्यूच्या फ़े-यातून कायम मोकळे करण्यासाठी साह्यभूत ठरतात. आता धर्म आणि मोक्ष हे पुरूषार्थ प्राप्त करताना जर अर्थ आणि काम या दोन पुरूषार्थांकडे दुर्लक्ष झालेच तर त्या व्यक्तीला या भौतिक जगातल्या तथाकथित सफ़ल व्यक्तींकडून अपमान आणि उपेक्षा सहन कराव्या लागतीलही बहुतेक पण एकदा धर्म म्हणजे काय़ ? आणि मोक्ष मिळाल्यानंतर मी नक्की काय सुख प्राप्त करून घेणार ? याविषयी मनाची पक्की बैठक झाली की त्या व्यक्तीची मनोवृत्ती "कहा काज संसारसे, मुझे धनी से काम" अशी होऊन जाते. 


अशा परिपक्व विचाराच्या व्यक्ती या जगातला आपला वावर म्हणजे एका मोठ्ठ्या नाटकातमध्ये आपण भूमिका करतोय, विंगेतल्या अंधारातून आलोय आणि नाटकातली आपली भूमिका संपल्यानंतर पुन्हा विंगेतच जायचय. मग या घटकाभराच्या नाटकात आपल्याला राजाची भूमिका मिळाली काय किंवा भिका-याची भूमिका मिळाली काय ? सगळे सारखेच. इथला राजाही घडीभराचाच आणि भिकारीही घडीभराचाच. फ़क्त आपण आपली भूमिका किती ताकदीने सादर करतोय त्यावर आपले इथल्या असण्याचे मूल्यमापन होणार आहे हे ती परिपक्व व्यक्ती पक्की ओळखून असते. म्हणून मिळालेली भूमिका कुठलीही असो त्या सर्वशक्तीमान दिग्दर्शकावार विश्वास ठेऊन ती भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत असते. 


मग बदलायची आपण आपली याबाबतीतली मनोभूमिका ? एका दिवसात हा बदल नक्कीच होणार नाही पण सातत्यपूर्ण प्रयत्नांनी, दृढ विश्वासाने हा बदल एक दिवस आपल्या आयुष्यात नक्कीच येईल. याबाबत अनेक संतांनी आपल्याला ग्वाही दिलेली आहे.


करायची मग सुरूवात, अगदी आज, आत्त्ता ?


- धर्म आणि अध्यात्म मार्गावरचा एक मुमुक्षू, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Wednesday, June 24, 2026

लग्नाचे फ़ोटो की फ़ोटोसाठी लग्न ?

आजकाल लग्नाचे फोटो काढण्यापेक्षा विविध फोटोंसाठी लग्न करतात की काय ? अशी शंका मला यायला लागली आहे.

अरे, तो दिवस, ते क्षण नवरा नवरीच्या आयुष्यातले अत्यंत अलवार असतात रे. त्या चोरट्या नजरा, चोरटे कटाक्ष, एकमेकांचे हळुवार, अल्लाद स्पर्श, त्यातून मनांचे शहारणे, हरखणे. असे ते सगळे क्षण संपूच नयेत असे मनोमन वाटत असते. 

पण आजकाल फोटोग्राफर म्हणतोय म्हणून एकमेकांकडे बघा, स्मितहास्य करा, आनंदी दिसा. अरे आहे ते आनंदी क्षण कॅमेर्‍यात पकडा नं. ते पकडण्याची कला तुमच्यात नाही म्हणून वधूवरांना कृत्रिम आनंदाच्या पोझेस द्यायला सांगताय का ? अतिशय कृत्रिम व अनैसर्गिक दिसतं ते.

आपण सगळ्यांनीच आजकाल घरातले लग्न समारंभ हे लोकांना दाखवण्यासाठी, लोकांच्या अभिप्रायासाठी करणे थांबवले तर कदाचित हे थांबेल. हा त्या नवरा नवरीच्या आणि दोन्हीही कुटुंबांच्या आयुष्यातला परमोच्च आनंद सोहळा असतो. तो आनंद आपल्या आयुष्यभर मनात जपूयात, फोटोग्राफर ला जमले तर काही आनंदी क्षण फोटोत सुध्दा कैद करून ठेवूयात. फोटोग्राफर साठी, त्या फोटोपुरते आनंदी होणे हे काही खरे नव्हे.

- बूर्झ्वा, प्रतिगामी पण खरा आनंद आणि कृत्रिम आनंद यातला फरक कळणारा प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर. 

Tuesday, June 23, 2026

आठवणीतल्या एस. टी. - साधी दिसली तरी अगदी स्पेशल असणारी आपली एस. टी.

१९७० च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत आपल्या महाराष्ट्र एस. टी. ला लाल रंगासोबत पिवळ्या रंगाचा असा गोलाकार वाढत जाणारा आणि बसच्या चाकांवर संपणारा पट्टा असायचा. या प्रकाशचित्रातला बसला जसा पांढरा पट्टा आहे ना तसाच पण पिवळ्या रंगातला. १९९० च्या दशकात आपल्या एस. टी. ने पुन्हा आपल्या काही बसेसवर तसाच प्रयोग करून बघितला होता पण तो अल्पजिवी ठरला होता.






या बसचे वैशिष्ट्य म्हणजे ही बस १९७० च्या दशकातली आहे. खरेतर हे प्रकाशचित्र घेतले तेव्हा या बसचे वय ४६ वर्षे होते. आणि इतकी वर्षे एखादी बस सेवेत ठेवत नाहीत. पण ह्या बसमध्ये वेळोवेळी बदल करून करून तिच्या एंजिनामध्ये वारंवार मॉडिफ़िकेशन करून ही बस आपल्या एस. टी. ने वापरात ठेवलेली आहे. खरेतर ही बस TATA 1210 D मॉडेलची. या मॉडेलचे समोरचे काऊल असे असायचे. 

टाटा 1210 D मॉडेलचे समोरचे काऊल

मूळ  टाटा 1210 D मॉडेलला टाटा 1210 E मॉडेलचे काऊल लावलेली बस.


पण एस. टी. ने त्या काऊलमध्ये बदल करून तिला TATA 1210 E मॉडेलचे काऊल बसविलेले होते. ड्रायव्हर साहेबांसमोरची विंडशिल्ड सुद्धा बदलून नव्या प्रकारची लावलेली होती. 


आधुनिक बांधणीच्या बसेसनुसार एस. टी. ने या बसला टपावर दोन्ही बाजूला छोटे लाईटस दिलेले होते. अर्थात मूळ गाडीला असे लाईटस असणे शक्यच नव्हते. तेव्हा ती पद्धतच नव्हती. 


पण या गाडीचे मूळ टेल लाईटस मात्र तसेच्या तसेच ठेवलेले होते. इतक्या बदलांमध्ये तेव्हढीच आपली मूळ गाडीची आठवण कारण TATA 1210 D  आणि सुरूवातीच्या काळातल्या TATA 1210 E मॉडेल्सना छोटेसेच टेल लाईटस असायचेत.









मोठ्ठे, धब्बाडे टेल लाईटस साधारण १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात बसेसमध्ये आलेत. तोवर असे छोटेसेच टेल लाईटस. त्या जुन्या टेल लाईटसमध्ये टेल लाईट, ब्रेक लाईट आणि इंडिकेटर लाईट असायचेत. आजच्यासारखे रिव्हर्स मूव्हमेंट लाईटस नसायचेत. तितकी वाहतूक नव्हती त्यामुळे तशी तितकीशी गरज भासत नसेल. यातल्या इंडिकेटर लाईटसचा तरी किती वापर त्याकाळी होत असेल याबद्दल मला शंकाच आहे. वळायचे असले तर ड्रायव्हर साहेब आपला हात खिडकीबाहेर काढून तसा इशारा करायचेत किंवा त्यांच्या बाजूला एक लोखंडी इंडिकेटर आर्म असायचा. तो तसा इंडिकेटर आर्म मी १९९० च्या दशकात मुंबईत बेस्ट बसेसमध्ये बघितलेला आहे.


माझ्या माहितीप्रमाणे ही बस मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी इथे बांधल्या गेलेली होती. हिची प्रवासी सेवा वर्षे संपल्यानंतर  मग मध्यवर्ती कार्यशाळा नागपूरने या बसमध्ये बरेच बदल केलेत. दापोडीवाले आपल्या बसेसना पुढच्या बाजूला एक वैशिष्ट्यपूर्ण गोलाकार असा डोम द्यायचेत. त्या डोममध्ये बसचा मार्गफ़लक असायचा. चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर कार्यशाळा ही दापोडीनंतर सुरू झाली पण त्यांनी दापोडीवाल्यांच्या डोम आकाराऐवजी समोर चपटा आकार द्यायला सुरूवात केली आणि नागपूरच्या कार्यशाळेने दापोडीचा कित्ता गिरवण्याऐवजी चिकलठाणा वाल्यांचाच कित्ता गिरवीत चपट्या आकाराचे दर्शनी भाग आपापल्या गाड्यांना द्यायला सुरूवात केली होती.


ही बस एस. टी. ने आपल्या विभागीय कार्यांसाठी विशेष तयार करून जपलेली होती. आणि म्हणूनच साधी दिसत असली तरी ही बस अगदी खास, अगदी विशेष होती. 

 


MHO 5483 


TATA 1210 D


मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी ने बांधलेली साधी बस. मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर येथे पुनर्बांधणी झालेली बस.


नागपूर विभागीय कार्यशाळेच्या तैनातीत असलेली मालवाहक बस.


@ खडकी हनुमान मंदीर


११/ ६ / २०१६. 


Sunday, June 21, 2026

ब्लॉगच्या वाचकसंख्येचा आणि अगदी अनपेक्षित ठिकाणांहून मिळालेल्या वाचकांचा आनंदोत्सव.

गेल्या काही दिवसात वाचकांच्या प्रेमामुळे आणि परमेश्वरी कृपेमुळे ब्लॉगच्या वाचकसंख्येत भरघोस वाढ झालेली आहे हे लक्षात आले. आज सहज त्या वाचकसंख्येच्या विश्लेषणात जरा खोलवर गेलो आणि अचंबा वाटला.



भारतात, सिंगापूरमध्ये, जपानमध्ये, नेदरलॅंडस मध्ये, अमेरिकेमध्ये नातेवाईक, मित्र, परिचित आहेत म्हणून तिथून माझ्या ब्लॉगला वाचक मिळतात हे मी समजू शकतो. पण भारतापेक्षा किंवा उपरोल्लिखित ठिकाणांपेक्षाही फ़ार जास्त वाचनसंख्या ही ब्राझिल आणि व्हिएतनाममधून आहे हे बघून मला आश्चर्य वाटले. हे देश, जगाचा हा भाग माझे लिखाण वाचत असेल अशी मी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती.


अर्थात या ठिकाणी जाऊन तिथे स्वतःला सुस्थापित करून माझा ब्लॉग वाचणा-या मराठी वाचक जनांचा मी मनःपूर्वक आभारी आहे. असाच लोभ असू द्यात मंडळी.


- आवड, छंद आणि अभिव्यक्त व्हायचं म्हणून ब्लॉग सुरू केलेला आणि अत्यंत निष्काम वृत्तीने लेखन करीत गेलेला एक सर्वसामान्य साहित्य, संगीत कलाप्रेमी प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.