Friday, July 31, 2026

श्रीमदभागवत चिंतन - ३१ धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

भगवान श्रीकृष्ण आणि बलरामदादा हे गोपबालकांसह त्यांच्या गाई गुरांना चरण्यासाठी म्हणून वृंदावनालगतच्या रमणीय हिरवळींवर, उपवनांमध्ये घेऊन जात. वनात दररोज गोपबालकांसह अनेक खेळ होत असत. कुस्त्या होत असत. मोठाच आनंद असे.



वृंदावनाजवळच असलेल्या एका रमणीय वनामध्ये धेनुकासूर नावाचा एक राक्षस राहत असे. तो आणि त्याचे बांधव त्या वनातील मधूर आणि रसाळ फ़ळांचे स्वतःच सेवन करीत असत. त्या फ़ळांच्या वासाने आकर्षित होऊन ती फ़ळे घेण्यासाठी कुठलाही मनुष्य़प्राणी त्या वनात शिरला तर तो धेनुकासूर आणि त्याचे दुष्ट बांधव त्या माणसाला मारून टाकत असत. गोपांनी हे वृत्त कृष्ण आणि बलरामदादांना सांगितले आणि त्यांनी त्या धेनुकासुराचा वध करण्याचे निश्चित केले.


हे दोघेही बंधू त्या वनात शिरले. धेनुकासुराला हे कळताच तो गाढवाच्या रूपाने तिथे आला आणि आपल्या मागील पायांनी बलरामदादांवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न करू लागला. एक दोन वेळा त्याला चपळ हुलकावणी दिल्यानंतर बलरामदादांनी संधी पाहून त्या धेनुकासुराचे मागील दोन्ही पाय घट्ट पकडले आणि प्रचंड बळाने त्याला गरागरा फ़िरवून त्याच वनात फ़ेकून दिले. आपल्या अंगाखाली अनेक उंच उंच वृक्षांचा चुराडा करीत तो धेनुकासूर जमिनीवर पडून अखेरचे क्षण मोजू लागला. त्याची अशी अवस्था पाहून त्याचे इतर बंधू आणि मित्र त्याठिकाणी आलेत आणि कृष्ण बलरामांशी युद्ध करू लागलेत. पण कृष्ण आणि बलरामदादांनी त्या सगळ्यांचा वध केला आणि ते वन सर्वसामान्यांसाठी निर्भय केले. सार्वजनिक संपत्तीला खाजगी मालमत्ता समजून ती इतरांना वापरण्यास मज्जाव करणा-या धेनुकासूर प्रवृत्तीचा श्रीकृष्ण आणि बलरामांनी पाडाव केला.


वृंदावनाजवळून वाहणा-या यमुनेचे पाणी हळूहळू दुषित होत आहे याची जाणीव गोपबालकांना झाली. एकदा तर ते पाणी पिऊन काही गोपबालके मूर्छित पडली होती. भगवान श्रीक्रुष्णांच्या लक्षात यमुनेचे हे प्रदूषण आले. वृंदावनापासून जवळच असलेल्या एका डोहात कालिया नावाच्या अत्यंत विषारी सापाने आश्रय घेतला होता आणि त्याच्यामुळेच यमुनेचे पाणी वृंदावनाजवळ दुषित झाले होते. 



भगवान श्रीकृष्णांनी निर्भयपणे त्या डोहात उडी टाकली आणि कालियाशी भयंकर युद्ध केले. युद्धात अतुलनीय पराक्रम गाजवून त्यांनी कालिया नागाला हैराण केले आणि सरतेशेवटी त्याच्या फ़ण्यांवर भगवान नृत्य करू लागलेत. आता कालिया मरणार हे जाणून कालियाच्या राण्यांनी भगवंतांची स्तुती केली, त्यांची क्षमा मागितली. भगवंतांनीही कालिया तिथे आला ही कथा जाणून घेऊन त्याला तिथून निघून रमणकद्वीपाजवळ गरूडापासून निर्भय असे स्थान दिले. भगवंतांना वंदन करून कालिया सुखाने आपल्या नव्या निवासस्थानी गेला.


आज आपल्या नद्यांमध्ये कालियापेक्षाही जहाल विषाचे प्रदूषण दररोज होते आहे. हे विषारी पाणी पिऊन अनेक जीव मृत्यूमुखी पडत आहेत किंवा विविध दुर्धर आजारांना सामोरे जात आहेत. सगळ्या क्षेत्रात इतकी प्रगती आपण केली आणि दूषित पाण्यावर प्रक्रिया करून त्याला पुन्हा पिण्यायोग्य बनविण्याची प्रगती आपण केली नाही असे म्हणणे म्हणजे आत्मवंचना ठरेल. आपण ती सुद्धा प्रगती केली आहे. सिंगापूर या देशाचे उदाहरण आपल्यासमोर आहे. वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा पिण्याजोगे करण्याइतपत त्यांनी सृष्टीची जपणूक केलेली आहे. आपल्याला आज गरज आहे ती प्रबळ इच्छाशक्तीची. नद्यांचे प्रदूषण शक्य तितके टाळण्याची आणि प्रदूषण झाले असेलच तर त्यावर योग्य त्या प्रक्रिया करून ते प्रदूषण हटवून नद्या पुन्हा निर्मळ करण्याची.


आपल्या लाडक्या सृष्टीला जिवापाड जपणा-या भगवंताचे आपण खरे भक्त असू तर ही सृष्टी विनाशाकडे वाटचाल करेल असे एकही पाऊल आपल्याकडून उचलले जायला नको आणि सृष्टीसंवर्धनासाठी आपले संपूर्ण प्रयत्न सतत व्हायला हवेत हाच या कथेचा बोध आणि हाच या कथेचा प्रसाद.   


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण द्वितीया शके १९४८ दिनांक  ३१ / ७ / २०२६


३१ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


Thursday, July 30, 2026

श्रीमदभागवत चिंतन - ३० भगवंताच्या वृंदावनातील लीला आणि अनेक असुरांना दिलेली मुक्ती

भगवान श्रीकृष्णांनी पूतना, शकटासूर, तृणावर्त आणि आता यमलार्जून यांना दिलेली मुक्ती गोकुळातल्या गोप गोपींना मोठी आश्चर्यकारक वाटली होती. कृष्णाला सर्वजण आपल्या पुत्राप्रमाणे समजत असल्याने ही त्याचीच लीला असेल अशी शंकाही त्यांना शिवली नाही. याउलट कृष्णावर गोकुळात फ़ार संकटे येत आहेत असे वाटून त्यांनी कृष्णासाठी आणि स्वतःच्या कुटुंबियांसाठी व गोधनासाठी सुरक्षित जागेचा शोध सुरू केला आणि गोकुळाजवळच असलेल्या वृंदावनात त्यांनी आश्रय घेण्याचे ठरविले. तिथे भरपूर वृक्षसंपदा होती, जनावरांच्या चा-यासाठी छान हिरवीगार कुरणे होती आणि गोपांना तिथे शांतता जाणवली. आपल्या कुटुंबियांसह, गोधनासह सगळे गोप गोपी वृंदावनात वास्तव्य करण्यास निघाले.


वृंदावनात आल्यानंतर सर्वांना विशेष आनंद झाला. गोपांसोबत गुरे चारण्यासाठी म्हणून कृष्ण आणि बलराम वनात जाऊ लागलेत. वनात गेल्यानंतर गुरे चरायला सोडल्यानंतर गोपांसोबत त्यांचे विविध खेळ रंगू लागलेत. रमविणारा राम आणि आकर्षिणारा कृष्ण हे दोघेही सोबत असल्याने गोपबालक त्यांच्या अवतीभोवतीच आपली दिनचर्या आखत असत. गोधन चरत असताना कृष्ण सुंदर मुरली वाजवीत असे. ती मुरली वाजत असताना गाईगुरे आपापला चारा खाणे विसरत असत आणि मुग्ध होऊन तो दिव्य सूर कानात साठवून घेत असत. दुपारच्या वेळी गोप आपली बांधून आणलेली शिदोरी कृष्ण आणि बलरामदादांसोबत खात असत. कृष्ण तेव्हा सगळ्या गोपांच्या शिदोरीतला थोडा थोडा भाग सेवन करीत असे. कधी एखाद्या गोपाने नुसतेच पोहे, नुसतेच लोणचे, नुसतेच दही जेवण्यासाठी आणलेले बघून कृष्ण सगळ्या गोपांना आपापल्या शिदो-या एकत्र करण्यास सांगत असे. सगळ्यांच्या विविध प्रकारच्या शिदो-या एकत्र झाल्यानंतर जो काही विशेष पदार्थ तयार होत असे तो गोपालकाला कृष्ण स्वतः सगळ्या गोपांना आग्रहाने भरवीत असे आणि स्वतःही मोठ्या आनंदाने फ़स्त करीत असे. आजपासून पाच हजार वर्षांपूर्वी दीनदुःखितांचा कैवारी कृष्ण आपल्या सवंगड्यांकडे किती बारकाईने लक्ष देत असे आणि त्यांच्या सामाजिक समरसतेसाठी काय करीत असे हे आपण आजही अनुकरण करण्यासारखे आहे. आपल्यासोबत कार्यरत असलेल्या चमूकडे जातीने लक्ष देणे, त्यांची सुखदुःखे वाटून घेणे आणि सगळ्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे ही आजच्या युगात सुद्धा आचरण करण्याजोगी Leadership Skills आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि आपण भगवंताचे भक्त असू तर तसे जाणीवपूर्वक प्रयत्न आपल्याकडून व्हायला हवेत.



या लीला करीत असतानाच वृंदावनात आलेल्या आणि अजगराचे रूप धारण करून गोपबालकांना इजा पोहोचवू इच्छिणा-या अघासुराचा भगवंतांनी वध केला. दुष्टबुद्धीने भगवंताला मारण्यासाठी विशालकाय बगळ्याचे रूप घेणा-या बकासुराचा वध करून त्याला मुक्ती दिली. अशाच लीला वृंदावनात करीत असताना सृष्टीकर्ता ब्रह्मदेवांना भगवंतांची परिक्षा बघण्याची इच्छा झाली. भगवंत वनात असताना थोडेसे इतर कामात गुंतलेले पाहून त्यांनी सगळ्या गोप सवंगड्यांना त्यांच्या गोधनासकट वेगळ्या लोकात नेऊन ठेवले. भगवंत परतून बघतात तो सगळे गोप आणि सगळे गोधन अचानक नाहीसे झालेले होते. त्यांनी यामागील ब्रह्माजींची शक्ती ओळखली आणि स्वतःच्या रूपातूनच सगळे गोप बालक आणि त्यांची गोधने निर्माण केलीत. आणि कुठलेही काम न अडता ती सर्व मंडळी त्यादिवशी आपापल्या घरी गेलीत. गोपांनी आपल्या बालकांना हृदयाशी घेतले, गाईंनी त्यांच्या वासरांना पाजायला सुरूवात केली. भगवंतासोबत राहून प्रत्यक्ष भगवंतच आपल्या बालकांच्या रूपाने आपल्याजवळ आलेले आहेत हे त्या कुणालाच कळले नाही. फ़क्त त्यादिवशी आणि त्यानंतर त्या सगळ्या गोपांना आणि बछड्यांना एक विशेष आनंद मिळतो आहे याची जाणीव मात्र सदैव होत होती.



ब्रह्मदेवांनी वर्षभरानंतर हे सगळे अवलोकन केले आणि त्यांना भगवंताची लीला कळली. भगवंत प्रतिसृष्टी निर्माण करू शकतात हे ब्रह्मदेवांच्या लक्षात आले आणि त्यांनी भगवंताची स्तुती केली आणि सगळी गोपबालके आणि गोधन पुन्हा पूर्ववत वृंदावनात आणून दिले. या सगळ्या गोपबालकांना आणि गोधनाला गेल्या वर्षभरात काय झाले याची खबरच नव्हती. त्यांनी वर्षभरापूर्वी कृष्णाने मारलेल्या अघासुराची कथा जणूकाय आजच घडली आहे अशा स्वरूपात आपल्या घरी सांगायला सुरूवात केली आणि सगळ्या गोपांना खूप आश्चर्य वाटले. सृष्टीपालनकर्ता भगवंत कधी गरज पडली तर प्रतिसृष्टीची निर्मिती सुद्धा करू शकतो हेच भगवंतांनी या कथेतून सर्वांना दाखवून दिले. वृंदावनात दिवसेंदिवस सर्वत्र आनंदीआनंद पसरत होता.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण प्रतिपदा शके १९४८ दिनांक  ३० / ७ / २०२६


३० जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


श्रीमदभागवत चिंतन - २९ भगवंतांचे नामकरण आणि यमलार्जून उद्धार

यदुवंशीयांचे आचार्य गर्ग्यमुनी वसुदेवांच्या आज्ञेवरून एकेदिवशी गोकुळात आलेत. नंदबाबांनी त्यांचे यथोचित स्वागत केले आणि त्यांची स्तुती केली. आचार्यांनी आपला गोकुळात येण्याचा हेतू नंदबाबांना सांगितला. नंदाघरी वाढत असलेल्या वसुदेवांच्या दोन्हीही पुत्रांचे नामकरण. पण जर तो नामकरण विधी मोठ्या थाटामाटात आणि वाजत गाजत केला असता तर कंसाच्या गोकुळातील दूतांनी ही बातमी नक्की कंसापर्यंत पोहोचविली असती. कंस मोठ्या अस्वस्थतेने देवकीच्या आठव्या पुत्राचा ठावठिकाणा शोधत होता. त्याला ही वार्ता कळताच त्याने गर्ग्यमुनींद्वारे नामकरण संस्कार झालेले वसुदेवांचे पुत्र सहज ओळखून त्यांना हानी पोहोचविली असती.


गर्ग्य मुनींनी आणि नंदबाबांनी संगनमताने नंदबाबांच्या वाड्यातच एका गोठ्यात जाऊन या दोन्हीही पुत्रांचे नामकरण केले. रोहिणीच्या पुत्राचे नाव रौहिणेय ठेवले. तो आपल्या आसपासच्या सवंगड्यांना आणि सोबत्यांना या जगात रमवेल अशी भविष्यवाणी करून त्याचे दुसरे नाव राम ठेवण्यात आले. तो अत्यंत बलशाली असल्याने त्याला बल असेही नामाभिधान झाले. तो सर्व लोकांमध्ये समबुद्धीने बघेल आणि लोकांमध्ये फ़ूट पडलीच तर तो त्यांचा मिलाप घडवून आणेल म्हणून त्याचे आणखी एक नाव संकर्षण सुद्धा ठेवण्यात आले.


दुस-या पुत्राबाबत गर्ग्यमुनी म्हणालेत की या पुत्राने यापूर्वींच्या जन्मात श्वेत (पांढरा), रक्त (लालवर्णी) आणि पीत (पिवळा) अशी रूपे धारण केलेली आहेत. या जन्मात हा काळा रंग याने धारण केला आहे म्हणून याचे नाव कृष्ण असे ठेवण्यात यावे. वसुदेवांचा पुत्र असल्याने लोक याला वासुदेव म्हणूनही ओळखतील. गर्ग्यमुनी पुढे म्हणाले की या पुत्राची हजार नावे आहेत. प्रत्येक नावाला न्याय देण्यासाठी हा पुत्र ते ते गुण धारण करील. हा प्रत्यक्ष नारायणाचाच अवतार आहे. हा तुमच्या सगळ्यांवर आपली कृपादृष्टी ठेवेल. याचे सान्निध्य, नामस्मरण कुठल्याहे लौकिक किंवा पारलौकिक शत्रूला तुमच्यावर विजय मिळवू देणार नाही.


अशाप्रकारे गुप्ततेत नामकरण विधी आटोपल्यानंतर गर्ग्यमुनी निघून गेलेत. इकडे गोकुळात या दोन्हीही बालकांच्या बाललीला सुरू झाल्यात. छोट्याछोट्या पाऊलांनी रांगताना ते दोघेही घरभर फ़िरत असत. त्यांच्यामागे फ़िरताना, त्यांच्या बाललीला अवलोकन करताना त्यांची जननी आणि समस्त गोपींना मनापासून आनंद होत असे. त्यांचे बोबडे बोबडे बोल ऐकण्यासाठी समस्त गोकूळ अत्यंत व्याकूळ होत असे. थोडेच दिवसांमध्ये ही बालकी मोठी झाली आणि गोकूळातल्या गोपी यांची लाडिक तक्रार घेऊन यधोदामैय्याकडे येऊ लागल्यात.



एकदा यशोदामैय्या आपल्या दैनंदिन कामात मग्न असताना कृष्ण तिच्याकडे आला आणि दूध पिण्याचा हट्ट करू लागला. यधोदामैय्याने त्याला मांडीवर घेतले आणि हातात घेतलेले काम करीतच त्याला दूध पाजण्यास सुरूवात केली. यशोदामैय्या आपल्या दैनंदिन कामात जरा जास्तच मग्न आहे आणि तिचे माझ्याकडे लक्ष नाही हे पाहून भगवंतांनी जवळच असलेला एक लोटा लोण्याच्या घड्याला फ़ेकून मारला आणि तो घडा फ़ोडला. इतक्या मेहेनतीने काढलेले लोणी अशा प्रकारे मातीमोल केल्याचे पाहून यशोदामैय्याला कृष्णाचा राग आला आणि तिने त्याला बांधून ठेवण्याचे ठरविले. त्याला पकडण्यासाठी ती धावली तेव्हा तो जवळच असलेल्या उखळात लपून बसला. तिने हीच संधी साधली आणि त्याला उखळाला बांधण्याचे ठरविले.


श्रीमदभागवतकार वर्णन करताहेत की ज्या परमात्म्याला आजवर कुणीही काळाच्या आवाक्यात, शत्रूंच्या तडाख्यात, षडरिपूंच्या तावडीत, ब्रह्मांडात बांधू शकले नाही त्याला त्याची आई तरी कशी बांधेल ? यशोदामैय्याने कृष्णाला बांधायला जावे आणि दरवेळी ती दोरी दोन बोटे कमी पडावी असा खेळ व्हायचा. बरे, तिला जोड म्हणून दुसरी दोरी आणली तर ती सुद्धा अंती दोन बोटे कमीच पडायची. शेवटी यशोदामैया वैतागली आणि तिने कृष्णालाच "कृष्णा, बांधू दे न रे." अशी विनंती केली आणि कृष्ण बांधल्या गेला. श्रीमदभागवतकार सांगताहेत की जो ब्रह्मांडात कुणाच्याही तावडीत कधीच सापडत नाही, हजारो वर्षे तप, ध्यान करून जो अनेक योग्यांना गवसत नाही तो भगवंत भक्तीमुळे, प्रेमामुळे, अकृत्रिम प्रेमामुळे सहज वश होतो आणि भक्ताच्या हृदयात बांधल्या जातो. भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्तीमार्गाचे श्रेष्ठत्वच या घटनेवरून अधोरेखित झालेले आहे. 



भगवंत उखळाला बांधलेल्या अवस्थेतच नंदबाबांच्या अंगणात गेलेत आणि तिथे असलेल्या एका अशोकवृक्षांच्या जोडीमधून बाहेर निसटण्याची लीला करू लागलेत. त्यावेळी त्यांच्या कमरेला बांधलेले उखळ नेमके आडवे झाले आणि त्यांनी त्या वृक्षांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताच ते वृक्ष मुळापासून उन्मळून पडलेत. आणि त्यातून दिव्य शरीर धारण केलेले दोन सुंदर कुबेरपुत्र प्रगट झालेत. मागील जन्मात देवर्षि नारदांच्या शापामुळे या दोन कुबेरपुत्रांना हा वृक्षाचा जडदेह प्राप्त झाला होता पण देवर्षि नारदांनीच दिलेल्या उःशापामुळे आज भगवंताच्या हातून त्यांना या जडदेहातून मुक्ती प्राप्त होऊन पुनश्च दिव्यदेह प्राप्त झाला होता. दोघांनीही आपल्या मुक्तीदाता कृष्णाला वंदन केले, त्याची स्तुती गायली आणि ते आपल्या कुबेरलोकात रवाना झालेत.


आपण मनुष्य सुद्धा या जडदेहात आहोत. आसपासच्या अत्यंत भौतिकवादी जगात आपले जगणे, वागणे आणि आपली बुद्धीसुद्धा भौतिकवादी झालेली आहे. यातून सुटण्यासाठी आणि शाश्वत अशाश्वताचा विवेक मनात सदैव जागृत रहावा यासाठी आपल्या मनात भगवंताविषयी भक्तीचे बीज रोवले जाऊन कायमस्वरूपी तिची प्रस्थापना होणे अत्यंत आवश्यक आहे. श्रीमदभाववताचा हा बोध आहे आणि तोच या कथेचा प्रसाद आहे.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढी पौर्णिमा, व्यासपौर्णिमा, गुरूपौर्णिमा शके १९४८ दिनांक  २९ / ७ / २०२६


२९ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


Wednesday, July 29, 2026

प्रवासी पक्षाचा एक अत्यंत सुंदर प्रवास

बरोबर १२ वर्षांपूर्वीचा प्रवास.


काही कामांनिमित्त दोन दिवस नागपूरला घालवून सांगोल्याला परत निघालो होतो.


आदल्या दिवशी प्रवासाचे नियोजन करताना ६६० किमी साठी १४ तास ४५ मिनीटांचे नियोजन केले होते. 



पण नागपूरवरून निघायलाच जवळपास अर्धा तास उशीर झाला.


खडकीला हनुमंताचे आणि कळंबला चिंतामणीचे दर्शन घेऊन निघालो तेव्हा गाडीतले दोन्ही पॅसेंजर्स (सौ. वैभवी आणि चि. मृण्मयी) गाढ झोपी गेले होते. गेले दोन दिवस नागपुरात भरपूर भेटीगाठी, भटकंती आणि अपुरी झोप झाल्याचे परिणाम.

आर्णीला गाडीत पेट्रोल भरायला थांबलो तेव्हाही गाडीतल्या प्रवाशांची झोपमोड झाली नाही. मग मुद्दाम नाश्ता, चहासाठी थांबून या दोघींची झोपमोड करण्याचे माझ्या जिवावर आले.


सोबतीला कारच्या स्टिरीओवर भीमसेनजी, मालिनीताई, अभिषेकीबुवा, राशिद खानसाहेब सकाळचे राग गायला होतेच. एकेक बडा ख्याल आणि छोटा ख्याल एकेक तास चालणारा. मग काय ? त्याच सुरांवर तरंगत नाॅनस्टाॅप निघालो. मधे उमरखेड, हदगाव, नांदेड ही गावे कधी लागलीत ? आणि कधी मागे गेलीत ? कुणालाच कळले नाही.


दुपारी साधारण २ च्या सुमारास सौ. वैभवीची झोप उघडली. 

"कुठपर्यंत आलोय ?

नाश्त्याला उमरखेडला थांबायचे ना ?"

अशी पृच्छा झाली.


"बाईसाहेब, नाश्ता विसरा. आता थेट २० किमी नंतर लातूरला जेवायलाच थांबू." माझे विजयी उत्तर.


थांबे घेतघेत गेलो की भरपूर वेळ जातो. तेच थांबे टाळून सर्वसामान्य वेगात जरी गेलो तरी भरभर अंतर कापले जाते याचा वस्तूपाठ देणारा हा प्रवास.


१४ तास ४५ मिनीटांऐवजी १४ तास ९  मिनीटांतच ६५७ किमी सुरक्षितरीत्या गाठल्याची कृतार्थता एका ड्रायव्हर लाच समजू शकेल.



- "मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक" या वचनावर विश्वास असलेला, लांब पल्याचा सुरक्षित ड्रायव्हर रामराव गाडीवाले. 

कृतज्ञता

परवाच व्हॉटसऍपवर एक लेख वाचला. त्यात आपण सगळ्यांविषयी कृतज्ञ रहायला हवे असा सूर होता. मला ती कल्पना आवडली. जानेवारी २०१२ मध्ये लोकसत्तेत प्रशांत दीक्षितांचा एक लेख आला होता. त्यात प्रसन्न बुद्धीसाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी कृतज्ञता वाटण्याजोग्या ५ घटना आठवून लिहून काढायला सांगितलेल्या होत्या. 


या कृतज्ञ शब्दाचा शोध घेत आणखी मागे गेलो तर श्री. विवेकजी घळसासींची २०१० मधली रामकथा आठवली. त्यात त्यांनी वाल्मिकी रामायणाच्या सुरूवातीला नारदांनी महर्षी वाल्मिकींना विचारलेल्या प्रश्नांपासून सुरूवात केली होती. ते प्रश्न साधारणतः असे, 

"॥ को न्वस्मिन् साम्प्रतं लोके गुणवान् कश्च वीर्यवान् ? धर्मज्ञस्य कृतज्ञस्य सत्यवाक्यो दृढव्रतः ॥ 

चारित्रेण च को युक्तः सर्वभूतेषु को हितः ? विद्वान् कः कः समर्थश्च कश्चैकप्रियदर्शनः ? ॥ 

आत्मवान् को जितक्रोधो मतिमान् कोऽनसूयकः ? कस्य बिभ्यति देवाश्च जातरोषस्य संयुगे ? ॥ 


(सांप्रत या पृथ्वीलोकावर सध्या कोण गुणवान, वीर आहे ? कोण धर्मज्ञ आणि कृतज्ञ असा आहे ? सर्वभूतांचे हित करणारा आणि चारित्र्यवान असा कोण आहे ? इत्यादी..इत्यादी) आणि त्याला महर्षी वाल्मिकींनी उत्तर दिले होते की "दशरथाचा पुत्र राम".

म्हणजे धर्मज्ञ आणि कृतज्ञ असणे हे सुद्धा प्रभू रामचंद्रांच व्यवच्छेदक लक्षण होत तर. प्रभू रामचंद्रांच्या व्यक्तीमत्वाकडे आपल्याला मानवी गुणसमुच्चयाचा सर्वोत्तम आविष्कार म्हणूनच बघाव लागेल.



कृतज्ञ या शब्दाविषयी चिंतन केल तर लक्षात आल की आपण कृतज्ञ म्हणजे "केलेले उपकार स्मरणारा" एव्हढाच मर्यादित अर्थ घेतोय. त्या शब्दाची एक वेगळी छटा आपण लक्षातच घेतलेली नाहीये. कृतज्ञ शब्दाचा शब्दशः अर्थ "केलेले ज्ञात असणारा / री". ते केलेले कर्म उपकारच असायला हवे असे नाही. कुठलेही केलेले कर्म त्यात येईल. 


आज आपल्या कार्यालयात आपल्या हाताखालील कर्मचा-याने स्वप्रेरणेने कार्यालयासाठी एखादे चांगले कर्म केले तर ते कर्म जर माझ्या लक्षात एक अधिकारी म्हणून राहिले तर मी कृतज्ञ. भलेही ते कर्म हे त्या कर्मचा-याने त्याच्या नियत कर्माचा भाग म्हणून केले असू देत. ते त्याने एक उत्तम केले याबद्दल माझ्या मनात एक अधिकारी म्हणून नोंद घेतल्या गेली की मी कृतज्ञ. तसेच एखादा मुद्दाम आपल्या वाईटावर टपून आपले वाईट योजण्यासाठी काही कर्म करीत असेल तरीही ते कर्म मला ज्ञात असायला हवे आणि मी सावध असायला हवे. तरीही मी "कृतज्ञ" च ठरेन. नाही का ?


मग प्रभू रामचंद्रांमध्ये हे सगळे गुण समुच्चयाने होते का ? अलबत होतेच. त्याशिवाय शत्रूंविषयी पूर्ण माहिती असणारे "रणकर्कश राम" होऊ शकणार नाहीत. तसेच कृतज्ञ राम असल्याशिवाय निषादाधिपती, सुग्रीव, बिभीषण यांचे मित्र आणि शबरीचे प्रभू होऊ शकणार नाहीत.


रामकथा ऐकण्याची फ़लश्रॄती तेव्हाच होईल जेव्हा आपण प्रभूंचा एकेक गुण हळूहळू अंगी बाणवण्यासाठी प्रयत्न करू. या जन्मात सगळे गुण अंगी बाणले गेले नाहीत तरी जन्मोजन्मीच्या साधनेने प्रभू कृपा करतीलच आणि आपणही मानवी गुणसमुच्चयाच्या सर्वोत्तम आविष्काराकडे पायरी पायरीने का होईना, पोहोचूच.


चढायची मग पहिली पायरी या वर्षी ? करायची कृतज्ञ होण्याकडे सुरूवात ? 


- प्रभूंचेच नाम या देहाला असल्याने त्यांच्याविषयी अपार कुतुहल असणारा, प्रकाशात्मज, वैभवीरमण, श्रद्धाळू राम

Generation Gap Analysis

परवा असाच कशावरून तरी विषय निघाला तेव्हा लेक पटकन म्हणाली "बाबा, तू भोळा आहेस.  लोक तुझ्याशी काही काळापूर्वी कसे वागलेत ? हे तू विसरून जातोस आणि भाबडेपणाने त्याच लोकांवर पुन्हा विश्वास ठेवतोस."

तिला मी समजवण्याचा प्रयत्न केला. "स्वतः पाॅझिटिव्ह राहून अशा लोकांना अदखल करून आपली प्रगती साधता आली पाहिजे" वगैरे तिला समजावून सांगण्याचाही प्रयत्न केला.


आणि मला मी २४ वर्षांचा असतानाचे माझे आणि माझ्या तीर्थरूपांचे अगदी असेच झालेले संभाषण आठवले. मी सुध्दा आमच्या दादांना असेच म्हणायचो. "दादा, तुम्ही भोळे आहात. लोक तुम्हाला फसवतात, तुमच्या साध्या सरळ स्वभावाचा गैरफायदा घेतात. पण तरीही तुम्ही त्या सगळ्यांना सोबत घेऊन का चालता ?" वगैरे वगैरे.


मला खात्री आहे की आमच्या तीर्थरूपांचा आणि पितामहांचा सुध्दा असाच संवाद आमच्या तीर्थरूपांच्या पंचविशीत झालेला असेल. आम्हा मुलांसमोर कधी असा संवाद झाला नाही तरी आमचे दादा आमच्या पितामहांविषयी आमच्या काका मंडळींशी बोलताना जे बोलत त्यावरून असाच संवाद त्यांच्या तरूणपणीही झाला असेल याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.

प्रत्येक जुनी पिढी ही अनुभवाने समृध्द असते, जगाचे टक्केटोणपे खाऊन त्यांनी आपापल्या जगण्याची पध्दती शोधली असते, विकसित केलेली असते.


तर प्रत्येक नवी पिढी ही त्या त्या काळाशी खूप सुसंगत असते. सतत बदलणारे जग या नव्या पिढीच्या कायम प्रत्ययाला येत असते. त्यानुसार त्या त्या नवोन्मेषाने जगण्याचा ही प्रत्येक नवी पिढी प्रयत्न करीत असते. या भिन्न विचारी पिढ्यांच्या एकमेकांबद्दल या भावना असणारच. जगण्याची मूळ मूल्ये सारखीच असलीत तरी काही बाबतीत Generation Gap साहजिकच आहे.


- "दोन पिढ्यांमधल्या सुप्त संघर्षाचा मनोवैज्ञानिक, सामाजिक आणि कोटुंबिक  दृष्टीकोनातून घेतलेला एक सम्यक आढावा" या शोधग्रंथाचे लेखक आणि GGA (Generation Gap Analysis) या नव्या संज्ञेचे जनक  प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Tuesday, July 28, 2026

श्रीमदभागवत चिंतन - २८ पूतनावध

श्रीकृष्ण गोकुळात वाढतो आहे हा वृत्तांत जाणून कंसाने आपले राक्षसी दूत गोकुळात धाडले. त्यातलीच एक मायावी राक्षसी म्हणजे पूतना. तिने अत्यंत सुंदर सुस्वरूप स्त्रीचा वेष धारण केला आणि अंतरात अगदी काळकूट विष घेऊन ती गोकुळात आली आणि जन्मलेल्या नवजात शिशूंचा शोध घेऊ लागली. तिच्या बाह्य वेषामुळे गोकुळातल्या साध्यासुध्या गोपांना आणि गोपींना तिचा अजिबात संशय आला नाही. अशीच ती पूतना मायावीरूपाने नंदबाबांच्या वाड्यावर आली आणि तिच्यावर संशय नसल्याने ती सरळ अंतःपुरात घुसली.



तिथे तिने श्रीकृष्णाला स्तनपान करविण्याची इच्छा दर्शविली. तोपर्यंत सगळ्या गोकुळात नंदबाबांचा हा लोभसवाणा मुलगा इतका लोकप्रिय झालेला होता की त्याला बघण्यासाठी, त्याला स्पर्श करण्यासाठी, त्याचे लाड करण्यासाठी, त्याला स्तनपान करविण्यासाठी गोपी सदैव उत्सुक असत. त्यामुळे नंदबाबांच्या वाड्यात पूतनेला कुणी अटकाव केला नाही.


पूतनेने श्रीकृष्णाला आपल्या स्तनांशी धरले. शास्त्रकार सांगताहेत त्याक्षणी श्रीकृष्णाने आपले डोळे गच्च मिटून घेतले. त्या मायावी रूपाचे दर्शनसुद्धा भगवंताला नको असते. तिने काळकूट विष लावलेल्या आपल्या स्तनाद्वारे श्रीकृष्णाला दूध पाजण्याचा प्रयत्न केल्याबरोबर श्रीकृष्णांनी तिचे स्तन तोंडात आपल्या घेऊन जोरात आकर्षण करायला सुरूवात केली. इतक्या जोरात की ती महाशक्तीशाली पूतना राक्षसी कळवळली. "अरे, सोड, सोड"असा आकांत करू लागली पण भगवंतांनी एकदा ज्याला धरले त्याला ते कधीच सोडत नाहीत हे त्या राक्षसीला माहिती नव्हते. तिने त्या बालकाच्या तावडीतून सुटण्याचा जीवाच्या आकांताने प्रयत्न केला पण शेवटी आपले महाकाय स्वरूप प्रगट करीत ती मृत्यूमुखी पडली. गोकुळातल्या लोकांनी तिच्या रडण्या ओरडण्याचा आवाज ऐकून नंदबाबांच्या वाड्यात धाव घेतली तेव्हा तिथे मरून पडलेली विशालकाय पूतना आणि तिच्या अंगावर निर्भयपणे क्रीडा करणारे नंदबाबांचे हे बालक त्यांना दिसले. 



गोपींनी धावून जात त्या बालकाला पूतनेच्या शरीरावरून उचलले. त्याला न्हाऊ माखू घातले. मोठ्या संकटातून तो वाचला म्हणून बालरक्षा स्त्रोत्र म्हणत त्याची दृष्ट काढली. हे बालरक्षा स्तोत्र सर्व भाविकांनी आपापल्या घरी संग्रही ठेवण्यासारखे आणि आपापल्या मुलांच्या रक्षेसाठी नित्य पठण करण्याजोगे आहे.


इकडे गोपांनी तो पूतनेचा विशाल देह अक्षरशः तुकडे करून वनात नेऊन जाळला. जाळल्यानंतर तो देह जळत असताना त्यातून दिव्य सुगंध बाहेर पडत होता. एका राक्षसीच्या देहातून बाहेर निघणारा हा दिव्य सुगंध अनुभवून सगळ्या गोपांना अतिशय आश्चर्य वाटले. पण शास्त्रकार सांगताहेत की भगवंतांना दुष्ट हेतूने का होईना स्तनपान करवून पूतनेने त्यांच्या मातेचा दर्जा प्राप्त करून घेतला होता. त्यामुळे तिचा देह दिव्य झाला आणि त्यातून सुगंध बाहेर पडत तो देह नष्ट झाला.


भगवंताचा अगदी द्वेषभावनेने ध्यास घेऊन त्याला भजले तरी त्या जीवाला मुक्ती मिळाल्याची अनेक उदाहरणे श्रीमदभागवतात आहेत. मग आपण जर त्याच्यावर प्रेम करून त्याचा ध्यास घेतला तर तो आपल्यासारख्या सर्वसामान्य साधकांना का बरे भेटणार नाही ? आपला का बरे उद्धार करणार नाही ?


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥



- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध चतुर्दशी, शके १९४८ दिनांक  २८ / ७ / २०२६


२८ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६