आपण सर्वांनीच धृव चरित्र हे अगदी बालपणापासूनच ऐकलेले असते. पण श्रीमदभागवताने धृव चरित्राचा थोडा विस्ताराने विचार केलेला आहे.
उत्तानपाद राज्याच्या दोन राण्या. सुरूची आवडती तर सुनिती नावडती. सुरूचीचा पुत्र उत्तम हा राजाच्या मांडीवर बसून खेळत असताना सुनितीच्या पुत्राला, धृवाला सुद्धा आपल्या वडिलांच्या मांडीवर बसून खेळण्याची इच्छा झाली आणि उत्तमाच्या आईने, राणी सुरूचीने त्याचा तीव्र शब्दांनी अपमान केला. आणि अपमानित झालेला धृव एका दृढ निश्चयाने, वडिलांच्या राज्याचा अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी वनात तपश्चर्येसाठी निघाला.
तपश्चर्येसाठी निघालेल्या धृवबाळाचे वय तेव्हा अवघे ५ वर्षांचे होते. इतक्या लहान वयातल्या बालकाचा हा असा दृढ निश्चय बघून जगकल्याणार्थ सर्वत्र संचार करणारे देवर्षि नारद त्याला भेटलेत आणि त्याला ॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय॥ या द्वादशाक्षरी मंत्राचा त्यांनी उपदेश केला आणि तपश्चर्येबाबत मार्गदर्शन केले.
धृवबाळाने देवर्षि नारदांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे अतिशय खडतर अशी तपश्चर्या सुरू केली आणि फ़क्त ६ महिन्यांमध्येच भगवान विष्णू त्याला प्रसन्न झालेत. आपल्या अशा अत्यंत दृढनिश्चयी बालक भक्ताला बघायला स्वतः भगवान अत्यंत आतूर झालेले होते. भगवंत प्रगट होताच धृवबाळ सदगदित झाला, त्यांने भगवंतांना दंडवत प्रणाम घातला आणि त्याने भगवंतांची स्तुती केली. ही स्तुती मूळ संस्कृत संहितेतून वाचण्यासारखी आहे आणि आपल्यासारख्या सर्व गृहस्थांनी रोजच्या वाचनात ठेवण्यासारखी आहे.
प्रसन्न झालेल्या भगवंतांनी धृवबाळाला ३६ हजार वर्षे पित्याचे राज्य करण्याचा वर दिला आणि त्यानंतर सप्तर्षीसुद्धा ज्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकले नाहीत त्या ठिकाणी विश्वाच्या अंतापर्यंत दृढ स्थितीत राहण्याचा वर दिला. त्याची सावत्र आई आणि सावत्र बंधू भविष्यात कशा प्रकारची दुःखे भोगत मृत्यूला प्राप्त होतील याचे ज्ञान दिले आणि भगवान अंतर्धान पावले.
प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन झाले, वरप्राप्ती झाली, विश्वात अगदी उच्च स्थान प्राप्त झाले, शत्रूंचा बिमोड झाला पण या वरांमुळे धृव आनंदला नाही. भगवंताच्या दर्शनानंतर अत्यंत निर्मळ झालेल्या त्याच्या चित्तात त्याला जाणवले की भगवंतांनी त्याला जे दिले ते सगळे इहलोकीचे वैभव दिले. भगवंत दर्शनसमयी त्याच्या हृदयात जी मलिनता होती त्यामुळे त्याचे चित्त ओळखून भगवंतांनी त्याला या इहलोकीचे सगळे सुख दिले. धृवाला जाणवले की अनेक योगी, तपस्वी मंडळी हजारो जन्म घेऊन जी तपश्चर्या करतात आणि भगवंताला प्राप्त करून घेतात त्या भगवंताला मी फ़क्त ६ महिन्यांमध्ये प्राप्त करून घेतले होते पण माझ्या चित्तामधल्या मलिनतेमुळे माझा घात झाला. प्रत्यक्ष भगवंताला त्याच्या चरणांशी अक्षय्य वास, जन्मोजन्मांमधून मुक्ती मागून घेण्याऐवजी मी फ़क्त इहलोकीचे अढळपद मागितले. धृवबाळाला हे ज्ञान झाल्यानंतर तो खिन्न झाला. भगवंत प्रसन्न होऊनही जे मिळायचे ते मिळालेच नाही असे त्याला सतत वाटत राहिले.
त्यानंतर धृवबाळाने आपल्या चित्तातल्या मलिनतेचा जाणीवपूर्वक त्याग केला आणि आपल्या सावत्र आईविषयी आणि सावत्र भावाविषयी द्वेषभावना मनातून नष्ट केली. त्याने इहलोकीची सगळी सुखे भोगलीत, पराक्रम गाजवत प्रत्यक्ष कुबेराचा युद्धात पराभव केला आणि कुबेराकडून भगवंताच्या चरणांशी अक्षय्य राहण्याचा वर प्राप्त करून घेतला आणि अंतिमतः आपल्या आईसह, सुनितीसह तो वैकुंठात भगवंताच्या अक्षय्य सानिध्यात गेला.
आपलीही अवस्था त्या धृवबाळासारखीच असते की नाही ? आज या युगात आपली सर्व पूजा, अर्चना, यज्ञयागादि विधी हे इहलोकींच्या अनेक कामनापूर्तीसाठीच असतात. काहीतरी काम्य भावना मनात धरूनच आपण भगवंताला आळवतो. धृवाला सुद्धा ही चूक आहे हे प्रत्यक्ष भगवंताने दर्शन दिल्यानंतर त्याच्या चित्ताचे मालिन्य दूर झाल्यानंतर कळले. आपण हे ज्ञान धृवबाळाच्या चरित्राच्या नुसत्या अवलोकनाने, मननाने मिळवू शकतो. भगवंताची उपासना, भक्ती कशासाठी ? या प्रश्नाचे अत्यंत सात्विक बुद्धीने आपण मनन केले पाहिजे आणि फ़क्त भगवंतावर प्रेम आहे म्हणून त्याची पूजा, अर्चा, भक्ती आदि गोष्टी आपण आचरणात आणल्या पाहिजेत.
ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज एका ठिकाणी म्हणतात की या जगात अमुक एका गोष्टीची प्राप्ती व्हावी म्हणून जर आपण नामस्मरण करत असू तर ते स्वतःच्या आईला विकण्याइतके वाईट आहे. नामस्मरण हे नामस्मरणासाठीच व्हायला हवे. देवाचे मला दर्शन व्हावे हा सुद्धा हेतू त्यात नसावा. इतकी निष्काम भक्ती आपल्या सर्वांकडून व्हावी म्हणून श्रीमदभागवतातले हे धृवचरित्र आहे.
मग करायचा का संकल्प अशा विमल भगवंतभक्तीचा ? संकल्पाला पूर्णत्वदाता स्वतः तो भगवान आहेच. आपला संकल्प मात्र अत्यंत शुद्ध आणि दृढ असायला हवा.
॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥
- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" ज्येष्ठ वद्य अष्टमी शके १९४८ दिनांक ८ / ७ / २०२६
८ जुलै २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#जुलै२०२६

