Wednesday, June 3, 2026

एक असाही आगळा छंद

माझ्यातल्या बसफ़ॅनला माझ्या वडिलांनी खतपाणी घालून वाढविले. अगदी १० - ११ वर्षांचा असताना घरी आलेल्या कुणा पाहुण्याला निरोप द्यायला बसस्थानकावर गेलेलो असताना त्यांनी आपल्या एस. टी. बसवरील म.का.ना., म.का.दा., म.का.चि. वगैरे गोष्टींचा अर्थ मला स्वतःहून समजावून सांगितला होता आणि स्थानकात उभ्या असलेल्या इतर एस. टी. बसेस या तीन ठिकाणांपैकी कुठे बांधल्या गेल्या आहेत हे मला ओळखता येतेय का ? यावर आम्ही एक छोटे प्रात्यक्षिक पण करून बघितले होते. आपल्या महाराष्ट्र एस. टी. च्या नागपूर मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी (पुणे) मध्यवर्ती कार्यशाळा आणि चिकलठाणा (छत्रपती संभाजीनगर) मध्यवर्ती कार्यशाळा आपल्या बसेसची बांधणी करीत असत. बांधणीचे स्पेसिफ़िकेशन्स जरी सारखे असले तरी त्यांच्या बांधणीत थोडा फ़रक असे. तो बसफ़ॅन्सना लगेच ओळखू यायचा. तिथून माझ्यातल्या बसफ़ॅनची सुरूवात झाली.

आजोळी चंद्रपूरला उन्हाळ्याच्या सुटीत, दिवाळीच्या सुटीत कायम मुक्काम असे. त्यानिमित्त चक्क महिना महिना तिथे राहणे व्हायचे. तेव्हा सकाळी उठल्या उठल्या एक चक्कर तिथल्या आमच्या भावंडांसोबत चंद्रपूर बसस्थानकात होतच असे. नवीन आलेल्या बसेस, कुठली बस कुठल्या वेळांवर नागपूर, शेगाव, शिर्डी यामार्गावर दिली आहे ? याची पडताळणी होत असे. आजोळी आलेल्या इतर पाव्हण्या राव्हण्यांना बसस्टॅण्डवर सोडणे ,आणणे या उपदव्यापात आम्ही आघाडीवर असू किंबहुना आमचे हे बसप्रेम माहिती असल्यानेच आमच्या घरातली, आजोळची वडिल मंडळी आम्हाला ही कार्ये सांगत असत आणि आम्हीही अगदी आनंदाने ही सगळी करीत असू. त्यानिमित्त बसस्थानकाची भेट, नवनवीन बसेस, नवनवीन मार्ग बघायला मिळत.

शिवाय चंद्रपूरला किंवा मावशीकडे यवतमाळला जाताना येताना आम्ही कायम चालक केबिनमागच्या आडव्या मोठया उलट्या बाकावर चालकाकडे तोंड आणि प्रवाशांकडे पाय करून तो तीन साडेतीन तासांचा प्रवास अक्षरशः आमच्या गुडघ्यांवर करीत असू. चालकाचे वाहनचालनकौशल्य आणि पुढून येणा-या बसेस या दोन्हीहीमुळे आमचे नेत्र तृप्त आणि प्रवास सफ़ल होत असत. मग पुढून येणारी बस आपल्या बसला कुठे भेटतेय  यावरून ती बस समोरून कधी निघाली असावी याचे अगदी ९९. ९९ टक्के अचूक अंदाज बांधले जात. "आज छे बजे की चंद्रपूर - नागपूर सुपर थोडी लेटच हुई नई." किंवा "बाप्पा रे, MWY 9987 जैसी नयी गाडी आज ५.३० के एक्सप्रेसको मिली और ६.०० का सुपर वही पुराना वाला MTQ 6630 ? क्या चल क्या रहा है चंद्रपूर डेपोमे ?" असे आमचे एस. टी. चालक वाहकांबरोबरचे संवाद आमच्याविषयी त्यांच्या मनात आदर वाढवायला कारणीभूत होत असत. बहुतांशी वेळा मधल्या कुठल्या तरी थांब्यांवर झालेल्या या संवादांनंतर चालकातर्फ़े आम्हाला त्याच्या केबिनमध्ये येऊन गप्पा मारत प्रवास करण्याचे निमंत्रण मिळत असे. मोठाच बहुमान. केबिनमधल्या त्या लाकडी खोक्यावर बसून असा विशेष प्रवास करताना आपण कुणीतरी "Privileged" असल्यासारखे वाटत असे.

मग १९८३ च्या सुमारास शाळा, ट्युशन्स या निमित्ताने रोज नागपूर शहर बसचा प्रवास सुरू झाला. मग रोजची तिकीटे जमवून ठेवण्याचा छंद लागला. बरे नुसती तिकीटे जमवणे नाही तर त्या तिकीटांमागे दिनांक, बस नंबर, आपला प्रवास, बसचा रूट नंबर आणि बसचा रूट, बस टाटाची की लेलॅण्डची, बसचे मॉडेल आणि जमलाच तर बसचा चेसिस नंबर (त्याकाळी सर्व एस. टी. बसेसबाहेर डाव्या बाजूला हा चेसिस नंबर लिहीलेला असायचाच.) हे लिहीणे सुरू झाले. बरे ही तिकीटे फ़ार दीर्घ काळ सांभाळली तरच या छंदाला काही किंमत आहे हे त्याकाळी कळत होते. आणि त्या दीर्घकाळाचे नियोजन म्हणून दर महिनाअखेर ही तिकीटे एका पाकिटात व्यवस्थित रचून ठेवली जात आणि त्या त्या वर्षाअखेर एका मोठ्ठ्या पाकिटात ही सगळी पाकिटे जतन करून ठेवली जात.





{
Month wise: Month wise arrangement of travel tickets in envelopes. These were used and obsolete envelopes recycled. It starts from January 1983. }






१९८९ पासून कराड येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात स्नातक शिक्षण सुरू झाले आणि नागपूर ते कराड हा महाराष्ट्र एक्सप्रेसचा २५ तास घेणारा मोठ्ठा प्रवास सुरू झाला. त्यापूर्वी रेल्वे प्रवास घडले नाहीत असे नाही पण ते अगदी तुरळक असायचेत पण हा प्रवास म्हणजे वर्षातून ८ - ९ वेळा आणि अपरिहार्य. त्यामुळे मग रेल्वेफ़ॅनिंग सुरू झाले. त्यात बसेसप्रमाणे रेल्वे प्रवासाची तिकीटे, रिझर्वेशन्स, आमचे विद्यार्थी सवलतीचे फ़ॉर्म्स आणि तिकीट, सुपरफ़ास्ट दर्जाचे अतिरिक्त भार असलेले तिकीट जमविणे व सांभाळून ठेवणे सुरू होतेच. पण त्यात भर म्हणून आणखी काही गोष्टी आल्यातच.

 


{Concession Ticket: This was the concession letter issued by our institute for our travel to and from home to institute. Nagpur to Karad in our case.
Full fare used to be Rs. 110 + 20 (Berth charges for one night travel). We used to pay Rs. 55 (Concessional fare) + 20 (berth charges for one night travel).
Ram Kinhikar
, Pushkaraj Kale, Vinay Thute and Anamol Mudholkar were the passengers on this concession form approved by institute authorities and railway officials.}





{SF Ticket: 2701 NZM - VSG (NZM - MRJ B.G. and MRJ - VSG M.G.) Goa Express was inaugurated on 01/07/1990. Four digit numbering system was also started on IR on the same date.

Decided to travel by this train from STR to BSL as an alternative to Maharashtra Express. Maharashtra Express covered Pune to Manmad in dark while travelling in both directions. First time got the chance to explore DD-MMR section in broad daylight by Goa Express. MRJ departure used to be at 07.00, STR at 09.20, MMR at 17.30 and BSL at 20.40. (Just ahead of Sewagram Express at BSL)
Supplementary charge for Super Fast train. Rs. 2 each for 2 passengers. 14/07/1990. }


त्याकाळी आमचे (आणि तत्कालीन मध्यमवर्गाचे) सगळे प्रवास म्हणजे द्वितीय श्रेणी शयनयान वर्गानेच होत असत. मग एखाद्या शयनयानात त्याच्या वरच्या बर्थवर बसल्यानंतर पुरेशी हेडरूम आणि एखाद्यात थोडे असहज करणारी थोडी कमी हेडरूम का ? याचा शोध त्या २५ तासांच्या प्रवासात सुरू झाला. मग लक्षात आले की चेन्नईला इंटिग्रल कोच फ़ॅक्टरीत बांधलेल्या शयनयान कोचेसची उंची थोडी जास्त असते तर बंगलूरू ला भारत अर्थ मूवर्स लिमीटेड ने बांधलेल्या कोचेसना हेडरूम कमी असते. (ही परंपरा अजूनही सुरू आहे बर का ! बी.इ.एम.एल. बंगलूरू ने बांधलेल्या पहिल्या वहिल्या वंदे भारत स्लीपर रेकची गुणवत्ता तितकी नव्हती म्हणून तो रेक ट्रायल्सनंतर वर्ष दीड वर्ष तसाच ठेऊन देण्यात आला आणि चेन्नई ला आय.सी.एफ़. ने बांधलेला नवा रेक आल्यानंतर कलकत्ता ते गौहत्ती शयनयान वंदे भारतचा शुभारंभ झाला.)  १९९१ - १९९२ च्या आसपास कपूरथळ्याला रेल्वे कोच फ़ॅक्टरी सुरू झाली आणि तिथे बनलेले कोचेस येऊ लागलेत. वरवर बघता हे कोचेस चेन्नईच्या आय.सी.एफ़. शी साधर्म्य साधणारे असले तरी आतली बर्थसची बांधणी, दर्जा मात्र एकदम "चालू" दर्जा असायचा. आजही कुठल्याही वर्गाचे कोच बांधणीच्या दर्जाच्या बाबतीत आय.सी.एफ़. चेन्नई अव्वल क्रमांकावर आहे. 

मग या मोठ्ठ्या रेल्वे प्रवासात आपल्या गाडीला एकूण डबे किती ?, कुठल्या कुठल्या वर्गाचे ?, त्यात कुठल्या कुठल्या स्टेशन्सचा किती किती कोटा असतो ?, गाडीला मधल्या मधल्या स्टेशन्सवर किती किती डब्यांची काढघाल होते ?, गाडी कुठल्या स्टेशनवर किती वेळ थांबते ?, उशीर झालेला असताना किती पळते ? हा सगळा डेटा जमा करणे सुरू झाले. गाडीचा कोच कुठे आणि कधी बांधला गेलाय ? कोचचा डेपो कुठला ? कोचचे मेण्टेनन्स कुठे आणि किती कालावधीने होते ? ही सगळी माहिती सुद्धा जमवणे व नीट लिहून ठेवणे सुरू झाले.

त्याचबरोबर आज आपल्या गाडीला कुठले एंजिन लागले ? त्याचा नंबर किती ? गाडीचे एंजिन कुठे आणि केव्हा तयार झाले ? गाडीला कुठेकुठे एंजिन बदलले ? याचीही माहिती जमविणे आणि योग्य रितीने लिहून ठेवणे सुरू झाले. वर्षाअखेर आपण कुठल्या कुठल्या साधनांनी (बस / रेल्वे / विमान / कार) किती प्रवास केला ? प्रत्येकाची टक्केवारी किती ? याचाही हिशेब मांडणे सुरू झाले. मला आठवतेय मधली काही वर्षे साधारण २७ डिसेंबर ते ३१ डिसेंबर हे चार पाच दिवस माझे वर्षाअखेरच्या हिशेबातच जायचेत. बॅंक वाल्यांना, ऑडिटर्सना जशी इयर एण्डची लगबग आणि धुंदी असते तशी मला दरवर्षी वर्ष संपताना असायची.















साधारण २००६ - २००७ च्या सुमाराला हातात कॅमेरेवाला मोबाईल आला आणि घरी छान कॅमेरा सुद्धा आला. मग रेल्वे फ़ॅनिंग आणि बस फ़ॅनिंगच्या इतर अंगांबरोबर प्रवासाचे, कोचेसचे, एंजिनाचे, स्टेशन्सचे फ़ोटो काढणे सुद्धा सुरू झाले. ते फ़ोटो नीट जपून ठेवणे ही. 

२००९ ला कार घेतली आणि धाडसी प्रवासी असल्याने कारने लांबलांबचे प्रवास सुरू झालेत. साहजिकच बसचे, रेल्वेचे प्रवास कमी झालेत. कार प्रवासासाठी पण किती वाजता निघालो ? कारच्या टॅकोमीटरचे रिडींग किती ? कुठे थांबलोत ? ती वेळ, ते रिडींग ह्या सगळ्या नोंदी सुरू झाल्यात. अगदी एखाद्या शासकीय वाहनात असते तसे लॉगबुक. कार प्रवासांचा अचूक मागोवा घ्यायला.

आणि त्या सगळ्या कार प्रवासांमध्येही माझ्या बाजूच्या सीटवर बसून हातात कॅमेरा सज्ज ठेवत समोरून येणा-या बसेसचे फ़ोटो काढण्याचे काम माझी सहधर्मचारिणी करायची. ते फ़ोटोजसुद्धा आज माझ्या संग्रही आहेत. बसच्या आणि रेल्वेच्या मी काढलेल्या अशा जवळपास ५०,००० फ़ोटोंचा संग्रह माझ्याकडे आहे. या छंदात अगदी मन रमून जाते.

आता अगदी अत्यंत खाजगी गोष्ट तुम्हाला मी सांगतो. लग्नानंतर मधुचंद्रासाठी आम्ही उभयता गोव्याला गेलेलो होतो. नागपूर ते कोल्हापूर हा जवळपास २८ तासांचा प्रवास महाराष्ट्र एक्सप्रेसच्या द्विस्तरीय वातानुकूल शयनयानातून (सेकंड एसी) केल्यामुळे आम्ही थकलेलो नव्हतो. कोल्हापूरवरून गोव्याला आम्ही त्याच रात्री बसने जाणार होतो. बसस्टॅण्डजवळच एक हॉटेल आम्ही आमच्या तात्पुरत्या मुक्कामाला घेतले आणि २८ तासांच्या प्रवासानंतर आम्ही आंघोळी वगैरे आटोपून हॉटेलबाहेर पडलो ते माझ्या आवडत्या कोल्हापूर बस स्थानकावर गेलो. माझ्या सहधर्मचारिणीला माझ्या बस नामक प्रेयसीची भेट घडवण्याचा तो प्रसंग. त्यापूर्वी तिला या २८ तासांच्या प्रवासात माझ्या रेल्वे नामक प्रेयसीची भेट झालेली होतीच पण नवपरिणित दांपत्याने मधुचंद्राला जाताना सुद्धा बसफ़ॅनिंग करावे ही घटना दुर्मिळ होती. 

गोव्याला पोहोचल्यानंतर सुद्धा त्या संध्याकाळी आम्ही पणजी बस स्थानकावर काही काळ माझ्या बसफ़ॅनिंगमध्ये घालवला हे सुद्धा इथे नमूद केले पाहिजे. बस आणि रेल्वेवरची अव्यभिचारी निष्ठा मी अशी सिद्ध केली होती. मधुचंद्रावरून परतल्यानंतर या सगळ्या बाबींसाठी माझ्या सहधर्मचारिणीने कधी कधी माझी या गोष्टींवरून चेष्टा मस्करी सुद्धा केली होती. पण नंतर सगळ्या प्रवासात हा छंद जोपासायला मला तिची अत्यंत मोलाची मदत झाली होती हे सुद्धा तितकेच महत्वाचे.

आज डेटा सायन्स, डेटा ॲनालिटिक्स शिकल्यानंतर हा इतका सगळा डेटा कसा विश्लेषण करायचा ? त्यातून काय काय आणि कशी कशी माहिती मिळवायची याबाबत माझ्या अभियांत्रिकी डोक्यात चक्रे सुरू झालीत. पण छंद म्हणून जोपासलेल्या या तिकीटांकडे, माहितीकडे बघितल्यानंतर मला मिळणा-या समाधानाची, मी त्यात रमून त्या त्या काळात जाऊन तो काळ जगण्याची अनुभूती कुठलेही डेटा सायन्स किंवा डेटा ॲनालिटिक्स मला देऊ शकणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे.

आवडला माझा अनोखा छंद ? नक्की कळवा.

- बसफ़ॅन आणि रेल्वेफ़ॅन क्लबमध्ये व्हेटेरन होत चाललेला, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

(माझ्या विमान फ़ॅनिंगच्या छंदाविषयी एका वेगळ्या लेखात सविस्तर लिहेन.)



{Bag: Bag full of travel tickets arranged month wise in envelopes. }



{BEST Ticket, H 9047. Anik depot bus. I have a few tickets for MMK and MRL series buses, too. Journey time 1 hour between Mankhurd and Airoli. Ticket Rs. 6. (Rs.5.5 ticket and Rs. 0.5 Toll Tax for Vashi Bridge)}


{Railway Pass. Another integral part of being a Mumbaikar. Having suburban train pass. I had it between Airoli and Mulund since we need to visit Thane and Mulund almost daily for most of our purchases.}



Tuesday, June 2, 2026

सनबर्न : कल्पनेतला आणि खरा सुद्धा.

फ़ेब्रुवारी २०१५, धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर येथे नरसी मोनजी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात विभागप्रमुख म्हणून रुजू झालेलो होतो. अगदी पंचतारांकित, सप्ततारांकित सुविधा आणि तितकी फ़ी देणारे श्रीमंत, अतिश्रीमंत विद्यार्थी असलेल्या आमच्या महाविद्यालयात फ़ेब्रुवारी महिन्यात वार्षिक स्नेहसंमेलनाचे वारे वाहायला सुरूवात झाली होती. सहयोगी प्राध्यापक, सहकारी विभागप्रमुख आणि विद्यार्थ्यांच्या चर्चेमधून आपल्या महाविद्यालयात यावर्षी "सनबर्न" होणार असल्याच्या चर्चा कानांवर पडत होत्या.


आता इथे हे कबूल केलेच पाहिजे की जगाविषयी माहितीचा कण आणि कण आपल्याला ठाऊक असायला हवा ही आमची बालपणापासून वृत्ती असल्याने जगाविषयी बाकी सगळी माहिती असली तरी फ़ॅशन, डी. जे. आणि तत्सम गोष्टींच्या माहितीबाबत कधी मनात उत्सुकता निर्माण झालीच नाही आणि त्या व तत्सम गोष्टींबाबतचे आमचे (अ)ज्ञान अगदी अगाध होते आणि आहे ही. सनबर्न हे नाव ऐकून मला वाटले महाराष्ट्राच्या इतर भागापेक्षा शिरपूर हे थोडे कर्कवृत्ताजवळ आहे त्यामुळे कदाचित २१ मार्चला होणा-या विषुवदिनानिमित्त सूर्यकिरणे अगदी लंब पडत असतील आणि त्यामुळे सूर्यकिरणे अंगावर घेऊन त्यातले जास्तीत जास्त ड जीवनसत्व शोषून घेण्याचा उत्सव "सनबर्न" या नावाने या भागात साजरा होत असेल. आपल्या संस्कृतीतल्या निसर्गाशी जोडल्या गेलेल्या आणि ऋतूमानावर आधारित उत्सवांविषयी मला अपार आदर आहे आणि त्या त्या प्रदेशातल्या अशा अनोख्या उत्सव परंपरांबाबत जाणून घेण्याची मला कायम अपार उत्कंठा असते. म्हणून मी अगदी उत्साहाने "सनबर्न" ची वाट बघत बसलो.


पण तसला काही चमत्कार मला बघायला मिळायला नाही. काही दिवसांनी कळले की "सनबर्न" नावाचा एक फ़ार प्रसिद्ध बॅंड आहे म्हणे. ("प्रसिद्ध आहे पण फ़ारसा कुणाला माहिती नाहीये" या paradox सारखाच.) तो बॅंड शिरपूरला येऊन आमच्या वार्षिक स्नेहसंमेलनात त्यावर्षी आपला कार्यक्रम सादर करणार होता. काही कारणास्तव त्या बॅंडचा दौराच रद्द झाला आणि सरतेशेवटी तो कार्यक्रम आमच्या महाविद्यालयात सादर झालाच नाही. मुले हळहळली. मला मात्र काहीच वाटले नाही.


तोपर्यंत माझी समजून म्हणजे बॅंड म्हणजे लग्न मुंजींमध्ये वरातीत वाजणारा वाद्यसमूह. आमच्या बालपणी बडकस चौक ते इतवारी रस्त्यावर अनेक बॅंड पार्टींची ऑफ़िसेस होती. जगदीश बॅंड, चाळीसगाव बॅंड आणि बरेचसे इतर. लग्नसराईचा मौसम नसताना सगळी वादक मंडळी आपापल्या ऑफ़िसेसमधे बसून छानपैकी वादनाची तालीम करीत असत. त्या मौसमात लागलेल्या सिनेमांमधले कुठले गाणे लोकप्रिय झाले आहे याचा अंदाज घेऊन ते वाजवण्याचा सराव करीत असत. त्या धुंदीत आपण लग्नाच्या वरातीत वधू वरांच्या बग्गीसमोर "तू मूह ना मोड वादा न तोड" हे गाणे सुद्धा वाजवतो आहे याचेसुद्धा भान या बॅंडपार्टींना नसे. "हे गीत लोकप्रिय चित्रपटगीत आहे ना मग वाजवा" असा यांचा खाक्या असे. पण बॅंड म्हणजे असे लाखो रूपये घेऊन एखाद्या समूहासमोर आपले गायन वादन कौशल्य सादर करण्याचा प्रकार असतो हे मला शिरपूरला त्या "सनबर्न"मुळे कळले. नंतर वर्षा दोन वर्षांनंतर हाच बॅंड काहीतरी चुकीच्या गोष्टींसाठी गोवा पोलिसांनी कारवाई केली म्हणून पुन्हा एकदा (चुकीच्या कारणांसाठी) प्रकाशझोतात आला होता. त्यानंतर त्याचे नाव आजतागायत ऐकले नाही.


आज या "सनबर्न" ची आठवण येण्याचे कारण म्हणजे परवा रविवारी नागपूरच्या या भर उन्हात काही कारणांसाठी भर दुपारी बराच वेळ बाहेर पडणे झाले. त्यादिवशी चारचाकी न काढता दुचाकीवरून भ्रमण झाले. बर्डी, इतवारीच्या गर्दीत चारचाकी नेणे म्हणजे आतल्या एसी मधे बसून घाम फ़ुटण्याचा अनुभव घेणे. म्हणून तास दीड तासांसाठी दुचाकीवरून भर दुपारी उन्हात भ्रमण झाले. बरे सकाळी निघालो तेव्हा हवेचे तापमान जरा आल्हाददायक होते. ते तसेच राहील या आशेने निघालो पण नंतर नागपुरी उन्हाळ्याने आपला उखडेल खाक्या दाखवायला सुरूवात केली ती केलीच. बरे नेमके त्यादिवशी हाफ़ शर्ट घालून मस्त मोकळा गेलेलो होतो. ऊन भाजतेय, आपल्याला "सनबर्न" होतय हे जाणवेपर्यंत उशीर झाला होता. कसाबसा घरी परतलो.


शर्ट काढला तो काय ! हात अगदी दोन भागात विभागला गेला होता. युरोप आणि आफ़्रिका. मध्ये जिब्राल्टरची सामुद्रधुनी आणि तो भूमध्यसमुद्र तेव्हढा नव्हता. मग काय घरी लेकीने चांगलीच हजेरी घेतली. कसली कसली लोशन्स वगैरे लावून दिलीत पण हे सगळे वरातीमागून घोडे होते. हातांचा मूळ रंग प्राप्त व्हायला अजून महिनाभर तरी लागणार हे नक्की होते.




गेल्या ११ वर्षांमध्ये आलेले "सनबर्न" हे दोन अगदी निराळे अनुभव माझ्या एका लेखाचा विषय होऊन गेलेत.


- आजवरच्या आयुष्यात कधीही "वर्णद्वेष" न मानणारा पण सनबर्न मुळे हात अक्षरशः भाजून निघाल्यानंतर होणा-या वेदना सोसताना नको हा रंग म्हणून आजकाल त्या काळ्या रंगाकडे तिरस्काराने बघणारा प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.  

Monday, June 1, 2026

आठवणीतल्या एस. टी. - एक साधीशीच आपली एस. टी.

आजवर मी इथे आणि अनेक समाजमाध्यमांवर माझ्या लाडक्या एस. टी. बसेसचे अनेक वैशिष्ट्यपूर्ण फ़ोटो टाकलेत. पण ह्या एका साध्या एस. टी. बसचा फ़ोटो फ़क्त एकदाच आणि एकाच समाज माध्यमावर टाकला. मला एकदम पुलंच्या असा मी असामी मधले त्या बेंबट्या जोश्याचे दिगंबर काकाच आठवले.


"की राजहंसाचे चालणे, जगी झालीया शहाणे

म्हणूनी काय कवणे, चालूची नये ?"


ही ज्ञानदेवांची ओवी आपल्या कीर्तनात सांगणारे ते दिगंबर काका. त्याच धर्तीवर मला आज जाणवले की खूप सुंदर सुंदर आणि एकेक वैशिष्ट्यपूर्ण बसेसचे फ़ोटो मी आजवर टाकले हे जरी खरे असले तरी कधीकधी एखाद्या साध्याच बसचा फ़ोटो सुद्धा टाकला पाहिजे आणि तिच्यावर काही लिहीले गेले पाहिजे.



आणि २००८ साली काढलेल्या या फ़ोटोला आज अगदी ॲंटिक व्हॅल्यु आहे. साधारण १९९३ - १९९४ च्या आसपास आपल्या एस. टी. चे प्रवासी चढ उतार करण्याचे दार एस. टी. च्या मागल्या बाजूकडून पुढल्या बाजूला आले. आणि मला आठवतय़ आपल्या एस. टी. च्या मध्यवर्ती कार्यशाळा नागपूरने बांधलेल्या MH -31 / W 9251 या बसपासून बसच्या खिडक्यांचाही पॅटर्न बदलला. त्यापूर्वी जवळपास ४० वर्षांपासून चालत आलेला वरखाली होणारा खिडक्यांचा पॅटर्न जाऊन आता पुढे मागे होणा-या सरकत्या खिडक्यांचा पॅटर्न आलेला होता. 


तशीच ही आपली एक साधी बस. नागपूर जलद हिंगणघाट. बसच्या मार्गफ़लकावर फ़क्त "हिंगणघाट" असेच जरी लिहीलेले असले तरी ती नागपूर जलद हिंगणघाट बस आहे हे आम्हा बसप्रेमी मंडळींना चांगलेच ठाऊक असायचे. काहीकाही डेपो मॅनेजर्स लोकांना असा मार्गफ़लकाचा पॅटर्न मध्येच बदलावा वाटे आणि तसा ते बदलत असत. पूर्ण मार्गफ़लक लिहीण्यापेक्षा फ़क्त गंतव्यस्थानाचाच उल्लेख त्या मार्गफ़लकावर मोठ्या अक्षरांमध्ये केलेला असे. त्यातलाच हा मार्गफ़लक.


वर्धा विभागातल्या हिंगणघाट डेपोची ही बस. वर्धा विभागाचे तत्कालीन व्यवच्छेदक लक्षण म्हणजे बसच्या काळ्या ग्रीलला पिवळी बॉर्डर. भंडारा विभागातल्या बसेसना ही बॉर्डर पांढ-या रंगातली असायची. चंद्रपूर विभागातल्या बसेसचे हे ग्रील्स हिरव्या रंगातले असायचेत तर यवतमाळ विभाग हे ग्रील्स आकाशी निळ्या रंगाने रंगवायचा. दूरवरूनच बस ओळखू यायची.


या बसचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चालक केबिनवर असलेल्या टपाला लावलेला प्रेशर हॉर्नचा भोपू. त्याकाळी टाटा किंवा लेलॅण्ड कंपन्यांनी त्यांच्या बसेससोबत दिलेले मूळ हॉर्नस थोड्याच दिवसात निकामी व्हायचेत. (किंवा केले जायचेत) मग त्यांना सगळ्यांना ते साधे पोंगे मिळत असत. फ़ार थोड्या आणि अगदी स्पेशल बसेसना प्रेशर हॉर्नस असायचेत. किंबहुना प्रेशर हॉर्न बसला असणे हे म्हणजे ती बस त्या डेपोची अगदी लाडकी बस असल्याचे लक्षण होते. 


ही बस सुद्धा सुरूवातीला हिंगणघाट डेपोत आली तेव्हा पहिले काही महिने त्या डेपोच्या प्रतिष्ठित मार्गावर (हिंगणघाट जलद शेगाव) धावली असेल. म्हणून तिला असा प्रेशर हॉर्न मिळाला असेल. काहीकाही डेपोंची आपल्या डेपोंना आलेल्या नव्या गाड्या एका विशिष्ट मार्गावरच पाठवण्याची रीत असते. चंद्रपूर डेपोच्या नवीन बसेस कायम चंद्रपूर जलद शिर्डी, चंद्रपूर सुपर नागपूर किंवा चंद्रपूर जलद शेगाव मार्गावर पाठवल्या जायच्यात. सावनेर, चांदूरबाजार, परतवाडा, मोर्शी या आणि अशा अनेक डेपोंची ही अशीच त-हा. तुमच्या आसपास असलेल्या डेपोंची अशी काही व्यवस्था असेल तर नक्की कळवा.


तर अशी ही त्याकाळी अगदी साधी आणि आता एक ॲंटिक व्हॅल्यु प्राप्त झालेली साधीसुधी बस.


MH - 31 / AP 9687 (चार सलग अंक उलटसुलट क्रमाने या आकड्यात आहेत. हे या बसचे आणखी एक वैशिष्ट्य.)


TATA 1512 Cummins


मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर ने बांधलेली साधी बस.


3 x 2 आसनव्यवस्था. एकूण ५४ आसने. 


नागपूर जलद हिंगणघाट (मार्गे बुटीबोरी - जांब)


हिंगणघाट आगार, वर्धा विभाग.


एकूण अंतर ७५ किलोमीटर्स.



@ जांब बस स्थानक


१८ / ५ / २००८. सकाळी ९.३० वाजता.


Friday, May 29, 2026

आठवणीतल्या एस. टी. - परभणी डेपोची लालपरी: एका राहून गेलेल्या प्रवासाची खंत.

खरेतर नागपूर - परभणी हा मार्ग आम्ही आमच्या बालपणापासून बघत आलेलो आहोत. परभणी ते नागपूर असा दिवसभर प्रवास करून रात्री नागपूर बसस्थानकावर आराम करणारी ही बस. सकाळी पुन्हा ८.१५ ला नागपूरवरून परतीसाठी निघते. हा मार्ग आणि तिचे हे वेळापत्रक फ़ार जुने आहे. 


नागपूर आणि पुणे विभाग हे टाटा बसेसचे माहेरघर तर कोकण, खान्देश आणि मराठवाडा विभाग हे लेलॅण्ड बसेसचे माहेर हे समीकरण फ़ार जुने आहे. टाटा बसेस या मैदानी प्रदेशात पळायला उत्तम असतात तर लेलॅण्ड बसेस म्हणजे घाटांच्या राण्या अशी समजूत होती. त्याकाळी या कंपन्यांच्या वेगवेगळ्या एंजिनांची ताकद, त्यांच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे कदाचित हे समीकरण बरोबर असेलही. पण आता गेल्या काही वर्षात समान उत्सर्जन मानके (Uniform Emission Standards) आणि एकूणच जागतिकीकरणाच्या रेट्यात टाटा आणि अशोक लेलॅण्ड या दोन्हीही गाड्या जवळपास सारख्याच ताकदीच्या आणि दर्जाच्या झालेल्या आहेत त्यामुळे आता आता हे गृहीतक थोडे विस्कटलेले आहे. अशोक लेलॅण्ड ने विजयवाडा येथे बांधलेल्या नवीन "लालपरी" बसेस आता महाराष्ट्राच्या सर्वच विभागात दिसतात. तसेच टाटा बसेस सुद्धा मराठवाड्यात आणि कोकणात सर्वच डेपोंमध्ये यायला लागलेल्या आहेत. 


आमच्या बालपणी आमच्या मावशीच्या गावी, यवतमाळला, उन्हाळ्याच्या सुटीत, दिवाळीच्या सुटीत जायचे असले की आम्हाला या लेलॅण्ड बसेसने जावेसे वाटे. नागपूर बस स्थानकावर लेलॅण्ड बसेस दिसण्याचे प्रसंग विरळा. छत्रपती संभाजीनगर आगाराची आणि  छत्रपती संभाजीनगर वरून आलेली छत्रपती संभाजीनगर - नागपूर ही निम आराम (एशियाड) बस फ़ार थोडा वेळ नागपूर बस स्थानकावर दिसत असे. कारण सकाळी ९.०० च्या सुमारास नागपूरला आलेली ही बस फ़ार वेळ इथे न रमता लगेच सकाळी ९.३० वाजता आपल्या परतीच्या प्रवासाला निघत असे. हिचे दर्शन नागपूरला फ़क्त अर्धा ते पाऊण तास होत असे.


नागपूरला त्याकाळी दिसणारी दुसरी लेलॅण्ड गाडी म्हणजे किनवट आगाराची किनवट - नागपूर ही बस. ही बस दुपारी १ ते  १.३० च्या सुमाराला नागपूरला येत असे आणि दुपारची वामकुक्षी आटोपून संध्याकाळी ४.३० ला आपल्या परतीच्या प्रवासाला निघत असे. आज जवळपास ४० - ४५ वर्षांनी सुद्धा या बसचे हेच वेळापत्रक कायम आहे. वर्धा - यवतमाळ - आर्णी - माहूर मार्गे जाणा-या या बसने आम्ही फ़क्त एकदाच नागपूर ते यवतमाळ हा प्रवास केलेला होता. या गंमतीदार कौटुंबिक प्रवासाची चित्तरकथा मी लवकरच इथे लिहीन. पण लेलॅण्डच्या बसेसने प्रवास करण्याचे प्रसंग आम्हा वैदर्भिय मुलांच्या आयुष्यात एकूण विरळा. 



परभणी आगाराचा क्रू ही बस घेऊन नागपूरला येतो. रात्री ही बस आणि तिच्यासोबत आलेला क्रू नागपूरला मुक्काम करतो. क्रू बहुधा बसमध्येच पथारी टाकून झोपलेला आम्ही बघितलेला आहे. चालक केबिनच्या मागे प्रवासाच्या विरूद्ध दिशेला तोंड असलेला जो लांब बाक असायचा त्याला एक साखळी असायची. रेल्वेतल्या मिडल बर्थसारखी ती साखळी ओढून पाठ टेकवण्याचे कुशन बर्थसारखे खिडकीला बांधता येत असे. हा एक बर्थ आणि प्रवासी बसायला असलेला लांबलचक पण एक फ़िक्स्ड बर्थ. म्हणजे चालक आणि वाहक यांच्यासाठी बसमध्ये झोपायला दोन बर्थस तयार होत असत. अशा प्रकारे लांब पल्ल्याच्या गाड्यांसोबत गेलेला क्रू आपला आराम बसमध्येच करताना आम्ही ब-याच उदाहरणांमधून बघितलेले आहे. गोंदिया सुपर चंद्रपूर गाडीचा गोंदिया डेपोचा क्रू संध्याकाळी चंद्रपूरला पोहोचल्यानंतर दुस-या दिवशी सकाळी ८.१५ पर्यंत अशाच पद्धतीने बसमध्ये आराम करताना चंद्रपूर बसस्थानकावर आम्ही नेहेमीच बघत असू.


या बसने नागपूर ते यवतमाळ प्रवास करण्याचे आमचे स्वप्न अजूनही स्वप्नच राहिलेले आहे. आज मावशी आणि तिचे यजमान यवतमाळला नाहीत, त्यांचे घरही नाही, किंबहुना मावशी आणि तिचे यजमान आज या जगातच नाहीत. मग यवतमाळला त्या बालपणच्या ओढीने कुणाकडे जाणार ? या बसने आमचा प्रवास हुकला तो हुकलाच. 


पण आजही ही बस याच वेळाप्रत्रकावर नागपूर ते परभणी हा प्रवास करते आहे हे मला माझ्या घर ते महाविद्यालय या रोजच्या प्रवासात दिसते. परभणी डेपो गेली १० वर्षे तरी या मार्गावर आपली भंगार बस पाठवतो आहे ही माझी या डेपोकडे तक्रार आहे. अरे इतक्या दूरच्या पल्ल्यावर आपली चांगली बस द्यायची ना ! हे प्रकाशचित्र काढले तेव्हा ही बस त्याकाळी ब-यापैकी नवी म्हणूनच गणली जायची. 



MH - 20 / D गॅंगमधला हा आणखी एक मेंबर. आपल्या महाराष्ट्र एस. टी. त MH - 20 / D गॅंग प्रसिद्ध आहे. कारण MH - 20 / D 0001 ते MH - 20 / D 9999 पर्यंत सगळे नंबर्स फ़क्त आपल्या महाराष्ट्र एस. टी. लाच मिळालेले आहेत. असे उदाहरण कुठेही नाही. 


परभणी विभागाची एकदम साधी अशी स्टाईल. ग्रीलला कुठलाही विशेष रंग नाही, समोरच्या बंपरला, खिडक्यांना विशेष असा कुठलाही रंग नाही. साधी सरळ "ठेविले अनंते तैसेची रहावे" ही वृत्ती. त्यामुळे चिकलठाणा कार्यशाळेने ज्या अवस्थेत बस दिली त्याच अवस्थेतली ही बस. याच्या बाजूला उभी असलेली टाटा बस म्हणजे त्याकाळी झालेल्या नाशिक कुंभमेळ्यासाठी आपल्या दापोडी कार्यशाळेने बांधलेली विशेष कुंभमेळा रंगसंगतीची (पांढरा आणि आकाशी) बस.


नागपूर बस स्थानक


१८ / ५ / २००८. सकाळी ८.०० वाजता.


Tuesday, May 26, 2026

आठवणीतल्या एस. टी. - कोच शेअरींग करणारी बस.

एक एस. टी. प्रेमी म्हणून बसेसवर माझे नितांत प्रेम आहे, अगदी बालपणापासूनच. त्यामानाने हातात कॅमेरा आयुष्यात बराच उशीरा आला. पण आल्यानंतर माझ्या लाडक्या एस. टी. ची जी जी प्रकाशचित्रे मी काढून ठेवलेली आहेत ती इतक्या वर्षांनंतर आज एक अनमोल ठेवा बनून राहिलेली आहेत.


अशीच एक एस. टी. आपल्या भारतीय रेल्वेत रेक शेअरींग हा प्रकार प्रचलित आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस, महालक्ष्मी एक्सप्रेस, सह्याद्री एक्सप्रेस आणि सेवाग्राम एक्सप्रेस या एकमेकींचे रेक्स वापरायच्यात. तसेच गोवा एक्सप्रेस आणि दक्षिण एक्सप्रेस या सुद्धा एकमेकींचे रेक्स वापरायच्यात. तसाच बसचे कोच शेअरींगचा प्रयोग आपल्या महाराष्ट्र एस. टी. ने साधारण २००६ ते २००८ मध्ये केल्याचे स्मरते.



लातूर विभागातल्या औसा डेपोची गाडी नागपूर - चंद्रपूर - एटापल्ली मार्गावर ? आश्चर्य वाटले ना ? लातूर ते नागपूर ही रातराणी सकाळी सकाळी नागपूरला पोहोचल्यानंतर दिवसभर नागपूर बस स्थानकात पडून असायची आणि रात्री पुन्हा नागपूर ते लातूर ही रातराणी सेवा म्हणून परत जायची. तसेच लातूर ते अहेरी या रातराणी सेवेचे व्हायचे. लातूरवरून अहेरीला आलेली बस दिवसभर अहेरी बसस्थानकात नुसती पडून रहायची.


म्हणून आपल्या एस. टी. ने संसाधनांचे, कोचेसचे योग्य ते व्यवस्थापन करण्यासाठी आणि त्याद्वारे आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सकाळी नागपूरला आलेल्या एस. टी. च्या या कोचला नागपूर ते एटापल्ली (पुढे अहेरी) आणि सकाळी अहेरीला आलेल्या कोचला अहेरी ते नागपूर अशी एक फ़ेरी करायला सुरूवात केली. जी चालक वाहक जोडी ही गाडी घेऊन नागपूरला / अहेरीला आलेले आहेत त्यांचा दिवसभर आराम व्हायचा आणि मधल्या या नागपूर ते एटापल्ली व अहेरी ते नागपूर ही फ़े-यांचे संचालन अहेरी डेपोच्या चालक वाहक जोडी्कडे असे.


म्हणजे लातूर ते नागपूर-- नागपूर ते एटापल्ली-- एटापल्ली ते अहेरी-- अहेरी ते लातूर आणि उलट बाजूने लातूर ते अहेरी-- अहेरी ते नागपूर-- नागपूर ते लातूर असा दोन रात्रींचा आणि एका दिवसाचा प्रवास करून त्या त्या बसेस परत आपल्या मूळ डेपोत परतत असत. संसाधनांचा महत्तम वापर होत असे.


या बसचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चिकलठाणा (छत्रपती संभाजीनगर) मध्यवर्ती कार्यशाळेने बांधलेल्या फ़ार कमी टाटा बसेसपैकी एक बस. या मार्गावर औसा डेपोची लेलॅण्ड बसपण आम्ही बघितलेली आहे. पण हे प्रकाशचित्र काढले त्यादिवशी औसा डेपोने आपली टाटा बस या मार्गावर धाडली होती.


MH - 20 / D गॅंगमधला हा आणखी एक मेंबर. आपल्या महाराष्ट्र एस. टी. त MH - 20 / D गॅंग प्रसिद्ध आहे. कारण MH - 20 / D 0001 ते MH - 20 / D 9999 पर्यंत सगळे नंबर्स फ़क्त आपल्या महाराष्ट्र एस. टी. लाच मिळालेले आहेत. असे उदाहरण कुठेही नाही. 


लातूर डेपोची निळ्या रंगाने बसेसची ग्रील रंगवण्याची टिपीकल पद्धत आणि नागपूर सुपर चंद्रपूर - एटापल्ली हा बसवरचा वैशिष्ट्यपूर्ण मार्गफ़लक. आजकाल "सुपर" हा शब्द आपल्या एस. टी. च्या शब्दकोशातून जणू नाहीसाच झालेला आहे. सगळ्या बसेस फ़क्त जलद असतात. अति जलद (सुपर) शब्द आता अतिशय दुर्मिळ झालात.


नागपूर बस स्थानक

१८ / ५ / २००८. सकाळी ८.०० वाजता. 


Sunday, May 24, 2026

जननीजनक माया लेकरू काय जाणे ?

आपल्या बालपणी आपण एखाद्या परिचितांकडे, नातेवाईकांकडे जातो. तिथे गेल्यानंतर आपल्या बालसुलभ मनाला तिथल्या एखाद्या वस्तूची, तिथे आपल्याला मिळालेल्या वागणुकीची किंवा तिथल्या एकूणच वातावरणाची खूप भुरळ पडलेली असते. तिथे पुन्हापुन्हा यावेसे वाटते. तिथून परतताना आपला पाय अगदी निघत नसतो.


काही कालावधीनंतर आपण आपल्या पालकांकडे त्याठिकाणी पुन्हा जाण्याचा प्रस्ताव मांडतो, हट्ट करतो. पण आपली पालकमंडळी आपल्याला काही ना काही कारण सांगून तो प्रस्ताव लांबणीवर टाकतात. त्या ठिकाणच्या वातावरणाची जबर मोहिनी आपल्या मनावर असल्याने आपण पुन्हा काही कालावधीनंतर तोच प्रस्ताव, हट्ट पुन्हा करतो पण आपली पालक मंडळी तो प्रस्ताव पुन्हा लांबणीवर टाकतात, क्वचितप्रसंगी धुडकावून पण लावतात. आपल्याला मनोमन दुःख होते. आपले पालक उगाचच आपल्याला त्या ठिकाणी जायला मनाई करत आहेत, आपण आता त्या ठिकाणी जाऊन मागच्या भेटीत अनुभवलेले वातावरण पुन्हा अनुभवू शकणार नाही याची दुःखद जाणीव आपल्याला अगदी बालवयातही झालेली असते. पण असे का ? याचा उलगडा आपल्याला होत नाही. 


आपले पालकही खरोखर अशा मोठ्या मनाचे आणि थोर असतात की मागील भेटीत त्या ठिकाणी गेलेले असताना त्यांच्या मनावर तिथे गेल्यामुळे काय ओरखडा उमटला आहे, तिथे त्यांचा काय अपमान झाले किंवा काय वेदना झालेल्या आहेत, ह्या बाबी ते आपल्याला कळू देत नाहीत. लहान मुलांना या गोष्टी कशाला कळायला हव्यात ? हा एक दृष्टीकोन किंवा लहान लहान मुलांना या गोष्टी सांगून त्यांच्या बालमनात तिथल्या लोकांविषयी नकारात्मक भावना आपण कशाला निर्माण करायची ? हा आणखी एक दृष्टीकोन त्यांचा असतो.


यथावकाश आपण मोठे होतो. ती घटना, तो हट्ट आणि आपल्या पालकांनी त्यावेळी दिलेला नकार अजूनही आपल्या स्मरणात असतो. त्यामागे असलेल्या कारणांचा आपण धूसर अंदाज घेऊ शकतो. पण आता आपले पालकच अस्तित्वात नसतात. आपले जीवन जगून स्वतःचे अस्तित्व अनंतात विलीन करून ते कधीचेच फ़ोटोंमध्ये जाऊन बसलेले असतात. 


आपण आता पालक झालेले असतो आणि क्वचित असाच प्रसंग आपण व आपल्या पाल्यांबाबत घडतो. अशावेळी आपली मुले आपल्याला अशा घटनेचा जाब, कारणमीमांसा विचारतात. एकेकाळी आपले पालक झाले होते तसेच आपण निरूत्तर होतो, घटना लपवून ठेवतो, त्या अपमानाची, उपेक्षेची झळ आपापल्या पाल्यांना पोहोचू देत नाही.


आणि मग आपल्याला आपले आईबाप आठवतात. त्यांची माया आठवते आणि श्रीसमर्थांची उक्तीही आठवते.


जननीजनक माया लेकरू काय जाणे

पय न धरत मुखी हाणिता वत्स नेणे


- प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर 

अधिक ज्येष्ठ शके १९४८, 

२४ / ५ / २०२६

 

Thursday, May 21, 2026

भारतीय रेल्वे, पाकिस्तान रेल्वे आणि बांगलादेश रेल्वे

आमच्या रेल्वेफ़ॅनिंग गृपवर पाकिस्तान रेल्वेचे पण व्हिडीओ आणि फ़ोटोज येत असतात. अगदी गेल्या 5 - 6 वर्षांपासून आम्हाला हे फ़ोटोज आणि व्हिडीओज बघायला मिळतात. मी आवर्जून हे व्हिडीओज पाहतो कारण भारतीय रेल्वेतल्या 80 च्या  आणि  90 च्या दशकाच्या अगदी सुरूवातीच्या रेल्वेप्रवासाचा नोस्टॅल्जिया इथे अनुभवायला मिळतो. पाकिस्तान रेल्वेच्या स्टेशनांची स्थिती, ती डिझेल इंजिने, ते कोचेस, एका गावावरून दुस-या गावाला जाताना त्यांच्या रेल्वेमार्गाची स्थिती, जेमतेम 80 ते 90 किमी प्रतितास या वेगाने धावणा-या त्यांच्या एक्सप्रेस गाड्या हे सगळं मला माझ्या बालपणात, तरूणपणात घेऊन जातं.



आपल्यापेक्षा पाकिस्तान रेल्वे किमान 30 ते 35 वर्षे मागास आहे हे पाहून आपल्या भारतवर्षाविषयी आणि इथल्या गेल्या 35 वर्षांमधल्या रेल्वेमंत्र्यांविषयी आदर वाटतो. अपवाद फ़क्त लालू आणि ममताचा. 


लालूने आणलेल्या गरीब रथ रेकची रंगसंगती पाकिस्तान रेल्वेशी तंतोतंत जुळते. इथेही या उपद्रवी माणसाने आपले लांगूलचालन कौशल्य पणाला लावले होते हे जाणवते. हा माणूस आणखी काही काळ रेल्वेमंत्रीपदावर असता तर भारतीय रेल्वेची त्याने अगदी पाकिस्तान रेल्वे करून टाकली असती.


तसेच ममता बॅनर्जी हा हट्टी बाईचे. अजून काही वर्षे ही बाई रेल्वेमंत्री असती तर भारतीय रेल्वेचा सगळा निधी हिने कुठलाही विधीनिषेध न बाळगता बंगालकडे वळवला असता आणि भारतीय रेल्वेची बांगलादेश रेल्वे करून टाकली असती. 


माझ्या मते गेल्या शतकात, पूर्ण बहुमतात सरकार असताना माधवराव शिंदे हे शेवटले "भारतीय" रेल्वेमंत्री ठरावेत. ज्यांनी संपूर्ण भारताचा विचार केला. 1991 नंतर 2014 पर्यंत विविध आघ्याड्यांची सरकारे आलीत आणि "भारतीय" दृष्टीकोन मागे पडला. प्रत्येक रेल्वेमंत्र्याने आपापल्या प्रांताचा विचार करून रेल्वेखाते राबवले. यात वाजपेयी सरकारमधले रामविलास पासवान आणि नितीशबाबूही अपवाद नाहीत. त्यांचे वागणे बोलणे तत्कालीन पंतप्रधानांना पटत असेलच असे नाही, कदाचित नसेलही पण त्यांच्याकडे असलेल्या खासदारांच्या संख्याबळाने त्याकाळातल्या सर्व पंतप्रधानांचे हात बांधल्या गेले होते हे सुद्धा तितकेच सत्य आहे.



वाजपेयी सरकारमध्ये राम नाईक रेल्वे राज्यमंत्री असताना त्यांनी हा भारतीयत्वाचा प्रयोग करून पाहिला. पण राज्यमंत्री म्हणून त्यांचे अधिकार मर्यादित होते. आणि आपल्याच प्रांताविषयी विचार न करता संपूर्ण भारतवर्षाचा विचार करणे ही टिपीकल मराठी माणसाचीच मक्तेदारी आहे हे ही सिद्ध झाले. मधू दंडवते, राम नाईक आणि आता पीयुष गोयल. तिघांनीही फ़क्त महाराष्ट्राचा विचार न करता संपूर्ण देशाचा विचार रेल्वेमंत्री पदावर असताना केला ह्याची नोंद काळाच्या या विशाल कॅनव्हासवर इतिहासाला घ्यावीच लागेल.


2014 नंतर मात्र "प्रथम भारतीय"ता सगळ्याच आघाड्यांवर राबवलेली दिसू लागली. ज्यांनी ज्यांनी संकुचित प्रांतवाद केला त्यांना त्यांना केंद्रिय सत्ता आणि भारतीय जनता राजकारणाबाहेर करू लागली. भारतीय रेल्वेची धोरणांची, अंमलबजावणीची गाडी वेगवान रूळांवर सुपरफ़ास्ट धावू लागली.


- भारतीय रेल्वेतले बदल जवळून अनुभवणारा, अभ्यासणारा एक रेल्वेफ़ॅन आणि प्रांतीय विचार करणा-या संकुचित रेल्वेमंत्र्यांबद्दल कमालीची चीड असलेला एक भारतीय नागरिक, प्रा, राम प्रकाश किन्हीकर.


या निमित्ताने आम्ही रेल्वेमंत्री झालोच तर काय करू ? याचे एक स्वप्नरंजन इथे आणि इथे