भगवंतांनी आपल्या केवळ संकल्पमात्रेने या सृष्टीची निर्मिती करायला सुरूवात केली. त्यांनी आकाशाची निर्मिती केली आणि आकाशापासून काळ गणनेची निर्मिती केली. आणि ज्ञानेद्रियांना जाणवणा-या स्पर्श या संवेदनेला अनुकूल अशी वायुची निर्मिती केली.
या विश्वाच्या सुरूवातीला एका अणुपासून एक मोठा महास्फ़ोट झाला आणि हे प्रचंड विश्व निर्माण झाले हे आधुनिक युगाची "बिग बॅंग थेअरी" आपल्याला सांगते. त्यात हे ग्रह, तारे, वायू, काळगणना कुठल्या क्रमाने झाली असावी याचे तर्क आजची आपले शास्त्रज्ञ मांडत आहेत. मैत्रेय ऋषींनी विदुरजींना भगवंतांच्या असण्याविषयी, त्यांनी निर्माण केलेल्या विश्वाविषयी, मायेविषयी उपदेशात्मक ज्ञान देताना हाच क्रम सांगितला आहे.
अशाप्रकारे निर्माण झालेल्या वायू आणि आकाशाने तेजाची निर्मिती केली आणि तेजाने अनुभवाला येणारे ज्ञान म्हणजे रूप याची निर्मिती केली. विश्वात प्रकाश निर्माण झाला आणि विश्वातल्या वस्तूंचे बाह्य स्वरूप सर्वांच्या प्रत्ययाला येऊ लागले.
त्या प्रकाशावर दृष्टीपडताच परमात्म्याने रसरूप पाण्याची निर्मिती केली. या विश्वात पाणी निर्माण झाले. आपल्या संपूर्ण विश्वात आकाश - काळ - वायू - तेज आणि पाणी अशाच क्रमाने या पंचमहाभूतांची निर्मिती झाली असावी हे आजच्या आधुनिक विज्ञानानेही तर्काद्वारे आणि काही वैज्ञानिक प्रयोगांद्वारे मान्य केले आहे. मैत्रेय ऋषी आपल्याला श्रीमदभागवतात हेच प्रतिपादन करताहेत.
त्यानंतर वायू, तेज आणि पाणी ही तत्वे मिळून विश्वात पृथ्वीचा जन्म झाला. ज्ञानेन्द्रियांना जाणवणारी गन्धशक्ती हा पृथ्वीचा गुण आहे. आजच्या आपल्या मानसपूजेत गंध हा पृथ्वीचे, पुष्प हे आकाशाचे, धूप हे वायूतत्वाचे, दीप हा अग्नीचे आणि अमृत नैवेद्य हे जलतत्वाचे प्रतिनिधी समजले जातात.
यानंतर महात्मा विदुरांनी मोठ्या जिज्ञासेने मैत्रेयांना अशा विश्वनिर्मात्या भगवंताच्या एकाचवेळी निर्गुण आणि सगुण असण्याबाबत प्रश्न विचारलेत आणि मैत्रेयांनी त्यांना भक्तीयोग, माया आणि ब्रह्माचे निरूपण, मनुष्यमात्रांनी कायम स्वरूपाच्या आनंदासाठी काय करायला हवे याचा उपदेश केला आणि विश्वनिर्मिती केल्यानंतर स्वतःच हे विश्व व्यापून उरलेल्या भगवंताच्या विराट स्वरूपाचे वर्णन केले. आणि या सृष्टीच्या वारंवार होणा-या निर्माण, संचालन आणि संहाराचे ज्ञान दिले.
आजच्या आधुनिक विज्ञानाने या विश्वात सतत घडत असलेल्या अनेक विश्वांच्या निर्मितीची, त्यांच्या स्थितीची आणि क्षणोक्षणी घडत असलेल्या अनेक विश्वांच्या संहाराची पुष्टी केलेली आहे. आधुनिक विज्ञानाला अनेक मर्यादा आहेत पण पिंडी ते ब्रह्मांडी हे तत्व घेऊन त्याकाळी निरीक्षण करून आपले याबाबत आपले अगदी ठोस निष्कर्ष मांडणारे मैत्रेय ऋषी हे महाज्ञानी ठरतात आणि महात्मा विदुरांनी सुद्धा अत्यंत जिज्ञासू बुद्धीने त्यांना प्रश्न विचारून स्वतःच्या मनाची तृप्ती करून घेतलेली दिसते.
विसाव्या शतकातला थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणतो "If there is creation then there must be a creator, which I am not. I am only the observer." मैत्रेय ऋषी आणि महात्मा विदूर यांच्या संवादानंतर महात्मा विदूरांना या विश्वाचे आणि विश्वनिर्मात्या भगवंताचे यथार्थ ज्ञान झाले आणि भगवान श्रीकृष्ण वियोगाने खिन्न झालेले त्यांचे मन तृप्त व शांत झाले.
आपल्या संस्कृतीतले प्राचीन ऋषीमुनी हे ज्ञानमार्गी होते. ते विविध प्रयोग करून बघणारे आणि आलेले निष्कर्ष प्रत्यक्षात पडताळून बघणारे शास्त्रज्ञ होते. आपल्याला असलेले ज्ञान मौखिक परंपरेने आपल्या योग्य शिष्यांपर्यंत संक्रमित करून ज्ञानपरंपरा अखंडित ठेवण्यासाठी धडपडणारे महात्मा होते. आणि परमेश्वराने निर्माण केलेल्या या समस्त विश्वाविषयी ममता ठेवणारे होते. सृष्टीचा विनाश होईल असे शोध लावणारे नव्हते. निसर्गाला जपणारे होते आणि त्याचबरोबर मानवी मनोव्यापारांबाबत सूक्ष्म अभ्यास असलेले अत्यंत हुशार असे मानसशास्त्रज्ञ होते. त्यांच्या विषयी अपार आदर आणि कृतज्ञता बाळगूयात आणि त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन या सृष्टीसंरक्षणाविषयी, समस्त सृष्टीच्या कल्याणासाठी कार्य करण्यास कटीबद्ध होऊयात.
॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥
- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" ज्येष्ठ वद्य दशमी / एकादशी शके १९४८ दिनांक १० / ७ / २०२६
१० जुलै २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#जुलै२०२६
