Wednesday, August 5, 2026

पाचव्या शतकाची कथा, स्टॅटिस्टिक चा खेळ आणि त्याचे आकलन

१८ सामने (18 Matches)

१८ डाव (18 Innings)

एकूण धावा ९९८ (Total runs 998)

सरासरी ५५.४४ (Average : 55.44)

सर्वाधिक धावा १८३ (Maximum 183)

५ शतके, ३ अर्धशतके. (5 Centuries, 3 Half Centuries)


ही कुण्या क्रिकेटरची आकडेवारी नाही. ही आकडेवारी आहे माझ्या १८ वर्षांच्या ब्लॉग प्रवासाची. यावर्षी आजच ब्लॉगपोस्टसचे एका वर्षात गाठलेले पाचवे शतक पूर्ण झाले. अजून वर्षातला जवळपास अर्धा कालावधी बाकी आहे त्यामुळे हे आकडे निश्चितच बदलणार आहेत, यात वाढच होणार आहे. पण शतक झाल्यानंतर नवीन गार्ड घेताना बॅटसमन ज्याप्रमाणे पॅव्हेलियनकडे बॅट उंचावून अभिवादन करतो आणि नवीन गार्ड घेऊन पुढल्या खेळाला सुरूवात करतो त्याप्रमाणे यावर्षीचे हे ब्लॉगपोस्टसचे शतक पूर्ण केल्यावर आपणा सर्वांना अभिवादन करण्याचे मी ठरविले आहे. 


१८ वर्षांपूर्वी डिसेंबरला हा ब्लॉग सुरू करायचे ठरविले तेव्हा माझ्या बस आणि रेल्वे फ़ॅनिंगच्या छंदाबद्दल व्यक्त होण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असावे हा हेतू होता. त्यावेळी मी ऑरकूट या समाजमाध्यमावर होतो. माझ्या अभिव्यक्तीचे एक माध्यम म्हणून मी या समाजमाध्यमांवर असायचो. स्वतःचे विचार मांडणे, त्या धारेशी समविचारी मंडळी गोळा करीत फ़िरणे हा या समाजमाध्यमांवर असण्याचा मुख्य हेतू. नंतर नंतर अनुभव वाढत गेलेत. बस आणि रेल्वे फ़ॅनिंग व्यतिरिक्त इतरही विषयांवर लेखन होत गेले. माझे स्वतःचे क्षितीज विस्तारले. अनुभवांना एक प्रकारचा पोक्तपणा येत गेला, तो अभिव्यक्तीत दिसत गेला. वर्षाला सरासरी ५५ पोस्टस म्हणजे साधारण एका आठवडाभरात एक पोस्ट या स्ट्राईकरेटने मी गेली १८ वर्षे लेखन करत आलेलो आहे.


नंतर फ़ेसबुक आले आणि माझी अभिव्यक्ती तिथे व्यापकपणे प्रगट होऊ लागली. त्याचबरोबर व्हॉटस ॲपमुळे माझा ब्लॉग मी खूप जास्त वाचकांपर्यंत पोहोचवू लागलो. प्रतिसाद मिळत गेला. ब्लॉगची वाचने वाढू लागलीत. लिहीण्याचा हुरूप वाढला. २०२०, २०२१, २०२२ आणि २०२३ या चार वर्षांमध्ये मी माझ्या ब्लॉगपोस्टसची सलग चार शतके ठोकलीत. काही कारणांनी २०२४ आणि २०२५ या मधल्या दोन वर्षांमध्ये ब्लॉगची शतके पूर्ण होऊ शकली नाहीत. पण अर्धशतके मात्र आरामात पूर्ण केलीत.


यावर्षी मात्र अचानकपणे जानेवारी महिन्यापासूनच आमच्या सुरपाखरू गटावरील लिखाणाच्या निमित्ताने लिखाणाची लय लागली आणि भट्टी जमून आली. यावर्षी ऑगस्ट महिन्यातच लिखाणाचे शतक फ़ळ्यावर लागले गेलेत.


यानिमित्त वर्षे आणि त्यात लिहील्या गेलेले ब्लॉग्ज याचा एक ग्राफ़ काढण्याचा प्रयत्न केला. तो खाली दिल्याप्रमाणे.



या ग्राफ़मध्ये चढ उतार दिसताहेत. हो नं ? "जीवनात चढ उतार फ़ार महत्वाचे असतात. मॉनिटरवरची सरळ रेषा हे जीवन संपल्याचे दाखवते." वगैरे मोटिव्हेशनल स्पीचेसमधली वाक्ये स्वतःच स्वतःला ऐकवली पण मनाचे समाधान होईना. मग हेच आकडे वेगळ्या पध्दतीने सादर करण्याचे ठरवले. वर्षे आणि ब्लॉगपोस्टसची एकूण संख्या असा ग्राफ़ मांडला. आता मात्र चढती कमान दिसू लागली. Lies, Damn Lies and Statistics are always in ascending order असे कुणीतरी म्हणतात त्याची प्रचिती आली. आकडेवारी तीच पण तिचे स्वरूप बदलले की ती लोभसवाणी, सादर करण्याजोगी सुदृढ दिसू लागते याचे हे प्रत्यंतर.



असो. अगदी लवकरच आणखी एक मोठा टप्पा माझा ब्लॉग गाठणार आहे. तेव्हा पुन्हा या सगळ्या सादरीकरणासोबत पण वेगळ्या आकडेवारीनिशी भेटूच.


- वपुंच्या "स्टॅटिस्टिक मराठे" सारखा स्टॅटिस्टिक्स वर प्रेम करणारा गणितज्ञ, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


व्रतवैकल्ये आणि मनुष्याचा मूळ पिंड. द्विधा मनःस्थिती

 व्रतवैकल्याने नटलेल्या श्रावणातली कुंद संध्याकाळ. 


आषाढ संपून चांगले ७ - ८ दिवस झालेत तरी पावसाचा जोर कमी झालेला नसतो. "क्षणात फिरूनी ऊन पडे" चा अनुभव फक्त कवितेतच राहिलेला असतो. हवेत सुखद असा गारठा.


घरी कांदा, लसूण आदि पदार्थ तर पार कांदेनवमीपासून म्हणजे महिन्याभरापासून वर्ज्य असतात. गरमगरम वरण भात तूप लोणचे असा सात्विक आहार घेऊन आपण हात धुण्यासाठी परसदारी जातो आणि...


...मागल्या अंगणातल्या घरातून जवसाच्या तेलात घातलेल्या लसणाच्या चुरचुरीत फोडणीचा खमंग वास नाकातून मनात जातो आणि तुडुंब भरलेल्या पोटाची भूक पुन्हा चाळवली जाते.


सात्विक, राजस, तामस अशा तिन्ही भावांची, त्यातल्या परस्परांमधल्या द्वंद्वाची मनात मांडणी होते. परंपरेचे पाईक आपले पापभिरू मन परत स्वयंपाकघरात जाउन 'कालनिर्णय' मधे "चातुर्मास कधी संपतोय ?" ती तारीख पुन्हा पाहून घेतेय आणि त्यादिवसानंतर करावयाच्या बेतांचे मांडे मनातल्या मनात खातेय.


- खादाड, पापभिरू आणि परंपरागत ज्ञानावर (विशेषतः त्यामागील शहाणपणावर) दृढविश्वास असणारा एक सर्वसामान्य सात्विक गृहस्थ, रामभाऊ किन्हीकर.

श्रीमदभागवत चिंतन - ३६ कंसवध

जगातल्या अकारण संतापाचे आणि अहंकारचे नाव कंस. मनाने तो चांगला होता पण मनावर एकदा अहंकाराचे साम्राज्य प्रस्थापित झाले की इतरांनी केलेली कुठलीही कृती ही माझ्याविरूद्धच आहे, माझ्याविरूद्ध कट कारस्थाने रचण्यात येत आहेत अशी मनाची भावना होऊन मनाला अनावर संताप होतो. आणि अशावेळी जर हातात सत्ता असेल तर काय उत्पात होऊ शकतात याचे उदाहरण म्हणजे कंस. श्रीकृष्ण आणि बलराम गोकुळात सुखेनैव वाढताहेत ही आकाशवाणी झाल्यानंतर त्याने वसुदेवांना आणि देवकीला पुन्हा तुरूंगात टाकले होते आणि अक्रूराला या दोन भावंडांना मथुरेत आणण्यासाठी गोकुळात धाडले होते.


अक्रूर या दोन भावंडांना घेऊन गोकुळाहून निघाला. मथुरेच्या बाहेर या सर्वांनी आपला रथ थांबवला. श्रीकृष्ण आणि बलरामदादा मथुरेच्या सुंदर आणि मधूर पाण्यात स्नान करून आपला थकवा दूर करू लागलेत. अक्रूरानेही त्या जलात एक बुडी मारली तर जलात त्याला शेषशायी नारायणाचे दर्शन झाले. प्रत्यक्ष श्रीकृष्ण नारायण म्हणून आपल्या सर्व अलंकारांनिशी आणि गणांनिशी जलात विराजमान होते आणि मंदमंद हसत होते. अक्रूराने पाण्याबाहेर डोके काढले तर त्याला रथावर हे दोन्हीही बंधू दिसेनाता आणि जलात बुडी मारून बघतो तर शेषावतार बलरामदादा आणि नारायणावतार श्रीकृष्ण हे दोघेही त्याला दिसलेत. भगवंतांच्या साक्षात दर्शनाने अक्रूराचे मन अगदी निर्मळ झालेत आणि बाहेर येऊन त्याने भगवंतांची स्तुती आरंभिली. श्रीमदभागवताच्या दशम स्कंधातल्या चाळीसाव्या अध्यायातील ही स्तुती मूळ संस्कृतातूनच वाचण्यासारखी आणि कायम वाचनात ठेवण्यासारखी आहे. अक्रूराला जसे प्रत्यक्ष दर्शन भगवंतांनी दिले तसे ते आपल्यालाही आयुष्यात एकदा तरी व्हावे ही आस आपल्या मनात सदैव जागृत ठेवणारी ही अक्रूरस्तुती आहे.


अक्रूरासोबत ही दोन्हीही भावंडे मथुरेत प्रवेशकर्ती झालीत. भगवंत मथुरेचे वैभव बघतच राहिलेत. अत्यंत सुंदर घरे, गोपुरे, सोन्या, रूप्यांनी मढवलेले घरांचे दरवाजे, कौले, अनेक सुंदर उपवने, प्रशस्त रस्ते यांनी ते नगर अत्यंत सुशोभित झालेले होते. मथुरेवर राज्य करणा-या आजवरच्या अनेक राज्यकर्त्यांच्या नियोजनाचे, दूरदृष्टीचे आणि पुण्याईचे फ़ळ म्हणजे ते सुंदर नगर होते. आपल्या हिंदू संस्कृतीत मथुरेचा उल्लेख आजही मोक्षदायिनी असलेल्या सात नगरींमध्ये केला जातो.



श्रीकृष्ण आणि बलराम मथुरेच्या मार्गांमधून मार्गक्रमण करीत असताना मथुरेतल्या लोकांची त्यांना पाहण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. गोकुळातले श्रीकृष्णाचे पराक्रम माहिती असलेल्या, त्याचे लोभसवाणे रूप ऐकून आसुसलेल्या आणि कंसाच्या अहंकारी आणि संतापी राजवटीला कंटाळलेल्या प्रजाजनांना आपला तारणकर्ता बघण्यासाठी अतिशय उत्कंठा लागणे स्वाभाविक होते. मार्गातून चालत असताना त्यांना एक अतिशय सुंदर मुखाची पण शरीराने तीन जागी वक्र असलेली कुब्जा नावाची कंसाची दासी दिसली. तिच्या हातात नुकतेच उगाळलेले चंदन होते. तिने उगाळलेले चंदन ती रोज कंसाच्या अंगाला लावून द्यायची. ते चंदन कंसाला अतिशय प्रिय होते. श्रीकृष्णांनी कुब्जेला ते चंदन त्यांना आणि बलरामदादांना लावण्याची आज्ञा दिली. कुब्जेने अतिशय आनंदाने श्रीकृष्णाला आणि बलरामदादांना ते चंदन समर्पित केले. भगवंतांना चंदन फ़ार आवडले आणि त्यांनी कुब्जेवर कृपा करण्यासाठी एका हाताने तिचे दोन्हीही पाय दाबून ठेवले आणि दुस-या हाताने तिच्या हनुवटीवर खालून प्रहार केला. त्यासरशी कुब्जेच्या शरीराचा वाकडेपणा दूर झाला आणि मुळातच अतिशय सुंदर असलेली ती आता सुंदर शरीरामुळे अतिशय सुंदर दिसू लागली. मनाचा वाकडेपणा आपल्याला भगवंताच्या निकट जाऊ देत नाही पण बाह्य शरीराचा सरळपणा किंवा वाकडेपणा याची तमा भगवंतांना आणि त्यांच्या भक्तांनाही नसते.


यापुढील मार्गात भगवंतांना कंसाचा सेवक असलेला एक धोबी राजवस्त्रे घेऊन कंसाच्या महालाकडे जाताना दिसला. भगवंतांना  प्रवासातली मलिन वत्रे टाकून प्रसंगाला उचित अशी राजवस्त्रे परिधान करण्याची इच्छा झाली. त्यांनी त्या धोब्याला तशी आज्ञा केली. पण कंसाच्या पाठिंब्यामुळे उद्दाम झालेल्या त्या धोब्याने तसे करण्यास साफ़ नकार दिला. भगवंतांनी त्याला क्षणार्धात ठार केले आणि त्याच्या जवळील वस्त्रांचा गठ्ठा घेऊन, तो उलगडून त्यातली पाहिजे ती वस्त्रे स्वतः परिधान केलीत, बलरामदादांना परिधान करविलीत आणि इतर वस्त्रे तशीच मार्गात टाकून देऊन भगवंत पुढे निघालेत.


कंसाने ज्या धनुर्यज्ञाच्या आयोजनासाठी श्रीकृष्ण आणि बलरामांना बोलाविले होते त्या यज्ञस्थळी हे दोघेही बंधू जाऊन ठाकलेत. तिथे इंद्रधनुष्यासारखे एक प्रचंड आणि सुंदर धनुष्य़ ठेवण्यात आलेले होते. त्यावर अनेक आभुषणे लावून त्याची पूजा करून ते धनुष्य तिथे ठेवलेले होते. त्याच्या रक्षणार्था आजुबाजूला अनेक राक्षस कंसाने उभे केलेले होते. श्रीकृष्ण आणि बलराम हे दोघेही बंधू तिथे पोहोचले आणि त्यांनी क्षणार्धात ते धनुष्य हाताने तोडले. त्या तुटण्यामुळे मथुरेत सर्वत्र भयंकर असा ध्वनी निर्माण झाला आणि कंसाच्या कानी तो ध्वनी गेल्यानंतर त्याला धडकीच भरली. त्या धनुष्याचे रक्षण करण्यासाठी ठेवलेल्या राक्षसांनी श्रीकृष्ण आणि बलरामदादांवर हल्ला केला. पण त्या धनुष्याच्या झालेल्या तुकड्यांचीच शस्त्रे करून त्यांनी त्या सर्व राक्षसंचा वध केला. कंसाच्या कानी हा अतुलनीय पराक्रम जाताच त्याची झोप उडाली. तो मनोमन भयंकर अस्वस्थ झाला, युद्धापूर्वीच मनाने खचला. त्याला स्वतःचा मृत्यू जागेपणीच डोळ्यांसमोर दिसू लागला.


कंसाने दुस-या दिवशी सकाळी मल्लोत्सवाचे आयोजन केले होते. तिथे कंसाचे अंगरक्षक असलेले चाणूर आणि मुष्टिकासारखे अनेक मल्ल असणार होते. दुस-या दिवशी सकाळी उठून भगवान श्रीकृष्ण आणि बलरामदादा त्या मल्लोत्सवाच्या स्थळी जाण्यास निघाले. वाटेत कंसाच्या कुवलयापीड हत्तीने त्यांना अडविले. या दोन बंधूंनी माहुताला त्या हत्तीला मार्गातून हटविण्याची आज्ञा केली पण माहूताने ते ऐकले नाही उलट त्या हत्तीलाच या दोन बंधूंना चिरडून टाकण्यासाठी यांच्या अंगावर सोडले. आता मात्र श्रीकृष्ण संतापले. त्यांनी अत्यंत चपळाईने त्या हत्तीची युद्ध केले आणि दोन्हीही बंधूंनी त्या हत्तीचे दोन्हीही दात उपटून त्याला धराशायी केले त्या दातांनीच त्या हत्तीचा आणि माहूताचा वध करून हे दोघेही बंधू त्या मल्लोत्सवाच्या ठिकाणी प्रवेशकर्ते झालेत.


मल्लोत्सवानिमित्त मोठ्या पटांगणात एका आखाड्यात अनेक मल्ल आलेले होते. त्या पटांगणाभोवती अनेक राजांची आणि प्रजाजनांचीही बसण्याची व मल्लयुद्ध अवलोकन करण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. तिथे कंसासोबत अनेक राजे महाराजे आणि मथुरेतील मंडळी बसलेली होती. खांद्यावर नुकतेच उपटलेले रक्तबंबाळ हस्तीदंत घेऊन श्रीकृष्ण आणि बलराम त्या मल्लोत्सवाच्या ठिकाणी आलेत. त्यांना तिथे आलेले बघितल्यानंतर पहेलवानांना दोन वज्रकठोर शरीरे दिसलीत, सर्वसामान्य प्रजाजनांना दोन नररत्ने दिसलीत, मथुरेतील स्त्रियांना मूर्तिमंत कामदेव दिसलेत, गोपांना आपले स्वजन दिसलेत, तिथे असलेल्या दुष्ट राजांना ते क्रूर शासक दिसलेत, वयोवृद्ध नागरिकांना हे दोन अत्यंत गोड असे शिशू दिसलेत तर कंसाला हे दोघे प्रत्यक्ष मृत्यू दिसू लागलेत. जसा ज्याचा भाव तसा तसा त्या जीवाला भगवंत दिसत असतो. सर्व जीवांना आपापल्या मनातल्या भावानुरूप नवरसांचा साक्षात्कार या दोन भावांच्या दर्शनाने झाला होता.


कंसाच्या दुष्ट योजनेजुसार मुष्टिक आणि चाणूरांनी या भावांना मल्लयुद्धासाठी ललकारले. श्रीकृष्णासोबत चाणूर आणि बलरामदादांसोबत मुष्टिक मल्लयुद्ध खेळू लागलेत. दैवी शक्तीसमोर त्यांच्या आसुरी शक्तीचा अजिबात पाड लागला नाही. दोन्हीही बंधूंनी कंसाच्या या दुष्ट मल्लांचा पाडाव केला. आपले अंगरक्षक मल्ल असे मारले गेलेले पाहिल्यावर आता मात्र कंस बावचळला, वेड्यासारखा बडबडू लागला, आपला पिता उग्रसेन आणि वसुदेव देवकी यांना ठार मारण्याची आज्ञा देऊ लागला. श्रीकृष्णाने आखाड्यातून थेट कंसासमोर उडी मारली. कंसाने श्रीकृष्णाला मारण्यासाठी आपली तलवार उपसली आणि त्याच्यावर वार करू लागला. श्रीकृष्णाने मोठ्या चपळाईने तो वार चुकवला आणि कंसावर हवेतून उडीच मारली. ती उडी अंगावर पडताक्षणी कंसाने आपले प्राण सोडले. पृथ्वीचा रागाचा आणि दुष्टपणाचा भार हलका झाला. "परित्राणाय साधुनाम, विनाशायच दुष्कृताम" हे वचन भगवंतांनी खरे केले.



श्रीकृष्ण जन्माच्या आधीपासूनच द्वेषभावनेने का होईना पण सतत त्याचाच ध्यास घेतल्याने कंसाच्या शरीरातून त्याच्या मृत्यूपश्चात एक दिव्य ज्योत निघाली आणि ती भगवंतांच्या हृदयात जाऊन स्थिरावली. कुठल्याही भावनेने का होईना पण सतत आपला ध्यास घेतलेल्या एका दुष्टालाही भगवंतांनी मुक्ती दिली.


भगवंताचे सतत अनुसंधान ठेवा, त्याचे सतत स्मरण करीत रहा, त्याच्याशी कुठले ना कुठले नाते सतत जोडून ठेवा, त्याचा सदैव आठव करीत रहा असे अनेक संतमंडळी आपल्याला सांगत असतात ते याचसाठी. अहो, त्याने सतत ध्यास घेणा-या शत्रूला आपल्यापासून अंतिम समयी दूर केले नाही मग आपल्या भक्तांना तो त्यांच्या अंतिम समयी कसा बरे सोडेल ? आपणा सर्व भक्तमंडळींच्या अंतिम समयी आपली जीवनज्योत त्या भगवंताच्या चरणी विलीन होऊन आपल्या आजवरच्या अनेक जन्मांचे सार्थक व्हावे हीच प्रार्थना आज त्या भगवंताच्या चरणी करतो आणि विरमतो.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण सप्तमी शके १९४८ दिनांक  ५ / ८ / २०२६


५ ऑगस्ट २०२६ 


Tuesday, August 4, 2026

श्रीमदभागवत चिंतन - ३५ अक्रूराचे गोकुळगमन

भगवान श्रीकृष्ण आणि बलरामदादा वृंदावनात, गोकुळात अशा लीला, क्रीडा करीत असताना मथुरेत कंसाला आकाशवाणीद्वारे वार्ता कळली. नंदबाबांच्या घरी वाढणारा श्रीकृष्ण हा वसुदेव आणि देवकीचा आठवा पुत्र आहे आणि रोहिणीमातेच्या उदरी आलेला बलराम हा त्याचाच बंधू आहे. हे दोघेही मिळून तुझ्या रक्षकांचा आणि तुझा वध करणार आहेत. कंस भयभीत झाला. श्रीकृष्ण आणि बलराम मथुरेत आलेच तर त्यांचा प्रतिकार करण्याला त्याने आपले अंगरक्षक तयार ठेवलेत. श्रीकृष्ण आणि बलराम या दोन भावांना मथुरेत बोलविण्यासाठी त्याने मथुरेत एका मोठ्या धनुर्यागाचे आयोजन केले. त्यातच एका आखाड्यात श्रीकृष्ण आणि बलरामाला मल्लयुद्धाचे आव्हान देऊन आपल्या अंगरक्षकांद्वारे त्यांना ठार मारण्याची योजना केली.


श्रीकृष्ण आणि बलरामाला गोकुळाहून निमंत्रण देऊन बोलाविण्यासाठी त्याने अक्रूराला पाचारण केले आणि वृष्णीवंशी व यदुवंशीयांमध्ये सौहार्दाचे संबंध प्रस्थापित व्हावेत या हेतूने श्रीकृष्णासह बलरामाला या धनुर्यागाचे निमंत्रण दे असे सांगून अक्रूराला गोकुळाकडे रवाना केले.


अक्रूर आपल्या रथातून श्रीकृष्ण आणि बलरामांना मथुरेत आणण्यासाठी म्हणून मथुरेहून निघाला. गोकुळ जसेजसे जवळ येऊ लागले तसेतसे त्याला श्रीकृष्णाविषयी प्रेम दाटून येऊ लागले. प्रत्यक्ष जगचालक असलेल्या त्या परब्रह्माला आपण भेटल्यानंतर त्याच्या चरणावर कोसळून आपण त्याच्या चरणांवर अश्रूंचा अभिषेक करू असा त्याचा दृढ संकल्प होत होता.



प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आणि बलराम या मूर्ती पुढ्यात आल्यानंतर अक्रूर अत्यंत भावविभोर झालेत. त्याने श्रीकृष्णांच्या चरणांवर कोसळून आपल्या अश्रूंनी त्यांचे पाय धुतलेत. श्रीकृष्ण आणि बलरामांनी अक्रूरांना उठविले आणि त्यांना दृढ आलिंगन दिले. त्यांचे कुशल विचारून त्यांची सेवा केली. अक्रूरांनी आपला गोकुळ आगमनाचा हेतू या दोघांनाही कथन केला. कंसवधाची वेळ जवळ आली असल्याचे ओळखून श्रीकृष्ण आणि बलराम अक्रूरांबरोबर मथुरेला जायला निघालेत.



अक्रूर येऊन आपल्या लाडक्या श्रीकृष्णाला मथुरेला घेऊन जाणार हे कळल्याबरोबर गोपांना फ़ार दुःख झाले आणि श्रीकृष्ण विरहाच्या कल्पनेत गोपी तर अक्रूराला अक्षरशः शिव्याशाप देऊ लागल्यात. त्यांचा लाडका कान्हा त्यांच्यापासून दूर नेणारा अक्रूर त्यांना अगदी खलनायकासारखाच भासला यात नवल ते काय ? पण सगळ्यांची माया दूर सारून भगवंत बलरामदादांसह मथुरेत जायला निघालेत. जगातल्या दुष्ट प्रवृत्तींचा, अकारण संतापाचा नाश करण्याची वेळ जवळ आली होती.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण षष्ठी शके १९४८ दिनांक  ४ / ८ / २०२६


४ ऑगस्ट २०२६ 


श्रीमदभागवत चिंतन - ३४ महारास

वृंदावनातल्या सुंदर आणि रमणीय वनांमध्ये शरद पौर्णिमा आली. शरद पौर्णिमेला चंद्र लालसर, गुलाबी असा दिसत असतो. वातावरणात अत्यंत उल्हास होता. नद्या, वृक्ष, भूमी सगळेच आनंदी आणि सुखी होते. श्रीकृष्णाच्या गोकुळातील लीलांमुळे गोपबालक आणि गोपी अत्यंत आनंदित होत्या. अशा त्या रमणीय रात्री श्रीकृष्णाने वनात आपली दिव्य बासरी वाजवायला सुरूवात केली आणि ते सूर ऐकताच संपूर्ण वृंदावनातली चर आणि अचर सृष्टी अक्षरशः मोहरून गेली. मनुष्य़मात्रांना तर ते सूर कानातून थेट हृदयापर्यंत भिडल्याने त्यांची अवस्था अत्यंत व्याकूळ झालीच होती पण वॄंदावनातले पशुपक्षी, झाडे इतकेच काय आपण ज्या गोष्टींना निर्जीव मानतो ती भूमी, घरे हे सुद्धा त्या बासरीच्या सुरांनी आनंदित झाले, गुरे वासरे आपले दावे तोडून परमेश्वराकडे जायला, त्याच्या कृपाकटाक्षासाठी, आलिंगनासाठी उत्सुक होऊ लागली, तर भूमी आणि घरे वाडे आनंदित होऊन बासरीच्या सुरांवर कंप पावू लागलेत. त्यांना अचर अवस्था प्राप्त होती म्हणून नाहीतर त्यांनीसुद्धा मनुष्य़मात्रांप्रमाणे, गाई वासरांप्रमाणे वनात बासरी वाजवत बसलेल्या त्या परमात्म्याकडे धाव घेतली असती.


ज्या मनुष्य़मात्रांची देहबुद्धी ते दिव्य सूर कानांवर आल्यानंतर सुद्धा जागृत होती, ज्यांचा माझा देह, माझा संसार, माझी बायकामुले हा भ्रम अजून संपूर्णपणे संपला नव्हता त्यांनी मात्र ते दिव्य सूर कानांवर आल्यानंतर सुद्धा वनात धाव घेतली नाही. पण हे दिव्य सूर ऐकून ज्या मनुष्य आणि प्राणीमात्रांची देहबुद्धी पूर्णपणे गळून गेली त्या सर्व आत्म्यांनी त्या परमात्म्याच्या भेटीसाठी, आलिंगनासाठी, त्याच्यासह क्रीडा करण्यासाठी वनात अगदी अनावर होऊन धाव घेतली. अनेक गोप, गोपी, त्यांचे गोधन आणि इतर प्राण्यांसह वृंदावनातल्या त्या रमणीय भूमीवर महारास रंगली. प्रत्येक जीवाला त्या परब्रह्माशी क्रीडा करून त्याच्यात स्वतःला एकरूप व्हायचे होते. यात कुठल्याही प्रकारच्या देहांचे बंधन उरले नाही.आजवर असलेल्या द्वैताकडून अद्वैताकडे जाण्याचा प्रत्येक जीवांचा प्रयत्न होता आणि बासरी वाजवत सगळुया जीवांशी क्रीडा करणारा तो परमात्मा प्रत्येक जीवाच्या त्या संकल्पाच्या पूर्तीकरिता त्यांच्याशी क्रीडा करीत होता.



क्रीडा करीत असताना अचानक काही गोपींचे देहभान जागृत झाले आणि प्रत्यक्ष परमेश्वर आपल्याशी खेळतोय हे लक्षात आल्यानंतर त्यांना सूक्ष्म अहंकार झाला. वास्तविक तो परमात्मा तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांशीच क्रीडा करीत होता, आपल्या नावाला सार्थक असे सगळ्यांनाच आपल्यात आकर्षित करून घेत होता. पण आपली देहबुद्धी जागृत झाली की आपल्याला तो परमात्मा इतरांशी काय करतोय हे दिसत नाही फ़क्त आपल्यापुरता आपण विचार करू लागतो. तो परमात्मा फ़क्त आपल्याशी क्रीडा करतोय हे जाणवल्यानंतर गोपींच्या मनात जो सूक्ष्म अहंकार निर्माण झाला त्या अहंकाराला जाणून श्रीकृष्ण अचानक त्या महारासातून निघून गेला. भानावर आलेल्या गोपींना आजूबाजूला श्रीकृष्ण दिसेना. त्या गोपींना आपल्या अकारण अहंकाराची जाणीव झाली आणि आपण काय गमावले याबद्दल त्या शोक करू लागल्यात.


श्रीमदभागवतातील दशम स्कंधातला एकतिसावा अध्याय हा या गोपींच्या पश्चातापाचा आणि आपल्यापासून आपल्या देहबुद्धीमुळे दूर निघून गेलेल्या परमात्म्याला आळवून परत बोलाविण्याच्या गोपीगीताचा आहे. आजही अनेक भाविक घरांमध्ये कोजागरी पौर्णिमेच्या मध्यरात्री हे गोपीगीत गाण्याचा प्रघात आहे. काव्याच्या दृष्टीने तर गोपीगीत खूप सरस आहेच पण ते वाचताना त्यातली भावाभिव्यक्ती लक्षात घेऊन ते गायले तर कलियुगात आजही आपले सगळ्याम्चे जे जीव त्या परमेश्वरापासून दूर झालेले आहेत, त्याचा विरह आपल्याला झालेला आहे, ते दुःख दूर करून जीवाला आंतरिक शांती देणारे हे गोपीगीत आहे. या जगात आलेल्या प्रत्येक जीवाला एकदा त्या परमेश्वराला जाऊन भेटायचे आहे. त्यासाठी फ़ार जास्त देहबुद्धी बाळगून चालणार नाही आणि या सगळ्या प्रक्रियेत मध्येच आपल्याला परमेश्वर भेटला जरी ती विशेष गोष्ट न मानता एक सहज आणि आपल्या एकंदर ध्येयाचा भाग असलेली गोष्ट म्हणूनच ती घटना स्वीकारली गेली पाहिजे. भगवंत फ़क्त मलाच भेटला हा अहंकार झाला की तो आपल्याला त्याच्यापासून दूर करतो हे सगळ्या साधकांनी पक्के लक्षात ठेऊन त्याप्रमाणे आपली आध्यात्मिक साधना आणि आचरण ठेवले पाहिजे.



गोपींचा शोक आणि त्यांची अत्यंत पवित्र भावना लक्षात घेऊन भगवंत पुन्हा प्रगट झालेत आणि वृंदावनात सगळ्या चर आणि अचर सृष्टीसह त्यांची महारास रंगली. कोजागरीच्या मध्यरात्री गोपीगीत त्याच्या अर्थासह वाचले, गायले तर मनातल्या कामवासनांचा नाश होतोच आणि आपली देहबुद्धी क्षीण होत जाते हा अनेक भाविकांचा अनुभव आहे. रूसलेल्या भगवंताला पुन्हा प्राप्त करून घेण्यासाठी हे गोपीगीत नियमित वाचनात तर ठेवावेच पण कोजागरीच्या रात्री जरूर वाचावे.


आजच्या युगात महारास आपण केवळ आपल्या देहबुद्धीच्या परिप्रेक्ष्यातून बघतो. आजच्या संदर्भातून बघतो. अनेक भोंदू त्या महारास शब्दाचा फ़ायदा घेत स्वतःचे चोचले पुरविण्यासाठी देशाला आणि धर्माला बदनाम करणारी कृत्ये करतात. पण महारास हा फ़ार मोठा आणि जीवनात प्रत्येक जीवाने अंतिमतः प्राप्त करून घेण्याचा अनुभव आहे हे लक्षात ठेवावे. आपल्याही आयुष्यात आपल्याला सरतेशेवटी त्या परमेश्वरात विलीन होऊन तो आणि मी निराळा नाही ही अद्वैतावस्था प्राप्त करून घ्यायचीच आहे. आपल्याशी महारास खेळायला त्याने यावे यासाठी जीवनभर साधना करायची आहे.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण पंचमी शके १९४८ दिनांक  ३ / ८ / २०२६


३ ऑगस्ट २०२६ 


Monday, August 3, 2026

टाटाच्या राज्यात पाहुणी लेलँड

चंद्रपूरला आलो आणि इथल्या बसस्टॅण्डवर गेलो नाही असे क्वचितच घडले असेल.


असेच २०१२ च्या उन्हाळ्यात आजोळी श्रीनृसिंहजयंती उत्सव साजरा करण्यासाठी जमलो होतो. दुपारी जेवणे वगैरे निवांत आटोपून संध्याकाळी चंद्रपूर बसस्थानकावर आपल्या प्रेयसांना भेटायला गेलो होतो. तेव्हा लक्ष वेधून घेतलेली ही एक वेगळीच आणि सुंदर बस.


आपल्या एस. टी. बसेससाठी विदर्भ प्रदेश हा पारंपारिक रित्या टाटाचा प्रदेश आहे. २०१० - २०१२ या काळात विदर्भातल्या खूपसार्‍या डेपोंना MH 40 / N96XX आणि MH 40 / N 97XX या सिरिजमधल्या नागफूर कार्यशाळेने बांधणी केलेल्या लेलँड बसेस मिळाल्यात.


अगदीच काही काही डेपोंना दापोडी (पुणे) आणि चिकलठाणा (छत्रपती संभाजीनगर) इथे बांधणी केलेल्या लेलँड बसेसही मिळाल्यात. त्यातलीच ही एक बस.


MH 14 / BT 2389


ASHOK LEYLAND CHEETAH model


२ बाय २ परिवर्तन बस


एकूण आसने ४४ + १ वाहक


अम. अमरावती १ आगार


मला वाटत २०१२ च्या उन्हाळी सुट्यांमध्ये विशेष फेरी म्हणून ही बस अमरावती आगाराने पाठविलेली होती.


स्थळः चंद्रपूर बस स्थानक


दिनांक: १/५/२०१२


यावेळी ही बस साधारण वर्षभर तरी जुनी असेल पण तिचा मेण्टेनन्स अगदी टॉप क्लास होता.

श्रीमदभागवत चिंतन - ३३ गोवर्धनधारण

आता श्रीकृष्ण आणि बलरामदादा सगळ्या गोकुळवासियांच्या अत्यंत प्रेमाचे झालेले होते. सगळे गोकुळवासी जरी त्यांना आपल्यासारखेच गोपबाल समजत होते तरी वृंदावनातल्या जाणत्या लोकांना आणि नंदबाबांना श्रीकृष्ण आणि बलरामदादा हे काहीतरी दैवी शक्ती आहेत याबाबत खात्री होती.


एकदा गोकुळात वार्षिक इंद्रपूजेची तयारी सुरू असताना ती लगबग पाहून श्रीकृष्णाने आपल्या नंदबाबांना विचारले की बाबा ही कशाची तयारी ? आपण काय करतोय ? तेव्हा नंदबाबांनी गोपांच्या वार्षिक इंद्रपूजेबाबत त्यांना सविस्तर सांगितले. इंद्र ही पर्जन्याची देवता असल्याने आपण दरवर्षी इंद्रयज्ञ करून इंद्राला संतुष्ट करतो असे प्रतिपादन केले. यावर श्रीकृष्णाने आपल्याला पर्जन्य देणारा हा गोकुळातला गोवर्धन पर्वत आणि याच्यावरील घनदाट वृक्षराजी आहे, आपल्याला समृद्धी देणारे आपले गोधन आहे आणि आपल्याला सदैव आशिर्वाद देणारे हे गोकुळवासी ब्राह्मण आहेत. आपण त्यांच्यासाठी यज्ञ केला पाहिजे, त्यांना आपल्या यज्ञातील हविर्भाग दिला पाहिजे. इंद्राची पूजा,यज्ञ करायला आपल्याकडे राज्य कुठे आहे. आपण सर्वांनी या गोवर्धनाची, गोधनाची आणि ब्राह्मणांची पूजा व प्रदक्षिणा केल्यानेच आपल्याला इंद्रपूजा केल्याचे फ़ळ मिळू शकेल असा आग्रह धरला. नंदबाबांसह सगळ्या जाणत्या गोपांना ते पटले आणि त्यांनी इंद्रयज्ञाऐवजी गोवर्धनाला उद्देशून यज्ञ केला आणि यज्ञाचा हविर्भाग त्यालाच अर्पण केला.



इंद्राला यज्ञ न केल्याबद्दल आणि यज्ञातला हविर्भाग न मिळाल्याबद्द्ल फ़ार राग आला. त्याने या गोकुळवासियांना धडा शिकविण्यासाठी आपल्या अधीन असलेल्या सांवर्तक नावांच्या मेघसमूहाला बोलावून गोकुळात अतिवृष्टीकरण्याचा आदेश दिला. या अतिवृष्टीमुळे या गोकुळवासियांना इंद्राचा अधिकार कळून ते क्षमायाचना करीत इंद्राला शरण येतील असा त्याचा होरा होता. सांवर्तक मेघांनी गोकुळावर अतिवृष्टी करण्यास सुरूवात केली. या अकाली पावसाने आणि पावसासोबत वाहत असलेल्या अतिथंड वा-यांमुळे सगळे गोकुळवासी भयभीत झाली. या प्रचंड थंडी आणि अविरत पावसापासून आपापल्या लेकरांना वाचवण्यासाठी आपल्या शरीराखाली घेत ती सगळी गोपमंडळी आपल्या गोधनासह श्रीकृष्णाच्या आश्रयाला आलीत आणि यावर उपाय शोध म्हणून विनवू लागलीत.


भगवान श्रीकृष्णाने इंद्राचा अहंकार ओळखला आणि सगळ्या गोपबालकांना प्रथम निर्भय केले. त्याने सहज लीलेने शेजारचा गोवर्धन पर्वत उचलला आणि सर्व गोकुळवासियांना त्यांच्या मुलाबाळांसह आणि गोधनासह त्या विशाल स्वरूपाच्या गोवर्धन पर्वताखाली आश्रय घेण्यास सांगितला. श्रीकृष्ण वचनांवर विश्वास ठेऊन सगळ्या गोपबालकांनी तसे केले आणि सतत सात दिवस गोकुळात पाऊस पडूनही कुणाही गोप बालकाला किंवा त्यांच्या गोधनाला काहीही झाले नाही.



भगवान श्रीकृष्ण आपल्या अचाट लीलेने गोकुळाचे रक्षण करतो आहे हे बघितल्यानंतर इंद्राचे गर्वहरण झाले. त्याने ती अतिवृष्टी थांबविली. श्रीकृष्णाने त्या गोवर्धन पर्वताच्या आश्रयाला आलेल्या सगळ्या गोपांना आपल्या गोधनासह पुन्हा गोकुळात निर्भयपणे परतण्याची आज्ञा केली आणि गोवर्धन पर्वताची पुनर्स्थापना त्याच्या जागी केली. 


आज आपण सर्वत्र यात्रा करत सुटतो. आज या ठिकाणी जा, उद्या त्या ठिकाणी जा. आज इथे नवस बोल, उद्या तिथे नवस बोल. यात्रा करणे, भगवंताच्या विविध ठिकाणांची शोभा पाहणे, त्यानिमित्ताने भारतभ्रमण करून या विशाल देशातील सगळ्या संस्कृती, परंपरा यांचे अवलोकन करणे यात वाईट काहीच नाही. पण आपण फ़क्त २००० किलोमीटर दूरचा अमुक एक देव लवकर पावतो हा स्वार्थी हेतूने तिथे जाऊन गर्दी करतो, तिथल्या पर्यावरणाला इतकी गर्दी सोसणार आहे की नाही याचा विचार न करता तिथल्या व्यवस्थेवर ताण उत्पन्न करतो हे ठीक नाही. यात भारतभ्रमण, तिथल्या रूढी परंपरा यांचे डोळस अवलोकन, त्या रूढींचे आपल्या रूढीपरंपरांशी साम्य किंवा विरोधाभास आणि त्यातून या भारतवर्षाविषयीचे एक साकल्य आकलन हे कुठेच होत नाही. आपण प्रवासी म्हणून जातो. विमानाने, हेलीकॉप्टरने भराभरा जाऊन तरातरा येतो. यात पर्यटनाच्या मूळ हेतूला आपण आपल्या स्वार्थी हेतूने नख लावतोय हे आपल्या लक्षातच येत नाही. यात भगवंताच्या दर्शनाचा आनंद तो किती आणि आपल्याकडील धनाचे, संपत्तीचे प्रदर्शन करून स्थानिक भाविकांवर मात करून परतल्याचे सुख ते किती याचा विचार सर्वांनीच करण्याची आज गरज आहे.


भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला स्थानदेवता, वास्तूदेवता, ग्रामदेवता आणि कुलदेवता यांना ओळखून, त्यांची आपल्यावरील कृपा ओळखून त्यांची पूजा प्रथम करण्याचा उपदेश या उदाहरणाद्वारे केलेला आहे. त्यानंतर ५००० वर्षांनी समर्थांनी सुद्धा आपल्याला "उगेच भ्रमू नये भ्रमे" हा तसाच उपदेश आपल्या दासबोधातून केलेला आहे. तो लक्षात घ्यावा हाच या कथेचा बोध आणि प्रसाद सुद्धा आहे.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण चतुर्थी शके १९४८ दिनांक  २ / ८ / २०२६