एकेकाळी सर्व देवांना दानवांनी पराजित आणि हतप्रभ करून टाकलेले होते. देवांचा प्रभाव जनमानसावर पडेना. त्यांची शक्ती अगदी क्षीण करून दानव या जगावर राज्य करू लागले.
देव म्हणजे त्यागी जीवन. दानव म्हणजे भोगी जीवन. देव म्हणजे स्वतःआधी इतरांचा विचार करणारे व्यक्ती. तर दानव म्हणजे फ़क्त स्वतः आणि स्वतःचाच विचार करणारी व्यक्ती. देव म्हणजे समष्टीच्या कल्याणाची इच्छा तर दानव म्हणजे फ़क्त स्वतःच्याच कल्याणाची इच्छा. देव म्हणजे समस्त सृष्टीच्या कल्याणाचा विचार तर दानव म्हणजे "खाओ, पिओ ऐश करो" हा विचार. या दोन विचारसरणींमधला संघर्ष फ़ार जुना आहे. बराच काळ देवांची विचारसरणी मान्य करून त्या पथावर चालणारा समाज असतो तर मधला काही काळ दानवांच्या आकर्षक मांडणीला भुलून, दानवांची विचारसरणी पटून, त्या विचारसरणीचे आकर्षण वाटून त्या मार्गाने जाणारा समाज अस्तित्वात येतो. हा देवांचा पराभव असतो. आणि हे दानवराज्य फ़ार काळासाठी पृथ्वीवर असणे हे समस्त पृथ्वीसाठी अत्यंत धोकादायक असते.
अशावेळी पराभूत झालेल्या देवांनी परमेश्वराची आराधना केली, त्यांची यथार्थ स्तुती केली. देवांचा सदहेतू जाणून प्रत्यक्ष भगवान प्रगट झालेत आणि त्यांनी देवांना कायम अपराजित राहण्यासाठी अमृतप्राशन करण्याचा सल्ला दिला. ते अमृत समुद्रमंथनातून मिळेल असा नुसता आशिर्वाद देऊन भगवान शांत राहिले नाहीत तर समुद्रमंथन करण्याचा सविस्तर विधीसुद्धा त्यांनी कथन केला आणि समुद्रमंथनादरम्यान कासवरूप घेऊन मेरुपर्वत स्वतःच्या पाठीवर तोलून मंथनादरम्यान तो समुद्रात बुडणार नाही याची तजवीज करण्याची ग्वाहीसुद्धा भगवंतांनी देवांना दिली. नियमानुसार वागून सुद्धा जर सुष्ट शक्तींचा पराभवच होणार असेल आणि जग संपणारच असेल तर जगाच्या पालनकर्त्या भगवंताला प्रसंगी त्या नियमांना मुरड घालून थोडा पक्षपात करून ते जग पुनर्स्थापित करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतील त्या कराव्याच लागतात.
प्रसन्न झालेल्या भगवंतांनी या समुद्रमंथनातून अमृत प्रगट होण्यापूर्वी विष प्रगट होईल याचीही पूर्वसूचना सर्व देवांना देऊन ठेवली होती. आणि घडलेही तसेच. अमृतमंथनात विष प्रगट झाले तेव्हा ते प्राशन करायला कुणीही तयार होईना. तेव्हा देवांनी सृष्टीचे आद्य दैवत शंकरांची मनोभावे प्रार्थना केली. हे विष जर मी प्राशन केले नाही तर पृथ्वीवरील सगळ्याच जीवांना अतिशय त्रास होईल या अत्यंत विशाल हेतूने भगवान शंकरांनी ते विष प्राशन केले आणि ते सृष्टीचे कायम उपकारकर्ता असे महा देव झालेत.
सरतेशेवटी ज्या अमृतासाठी हे मंथन सुरू झालेले होते ते अमृत सागरातून प्राप्त झाले. ते वाटण्यासाठी श्रीविष्णूंना मोहिनीरूप घेऊन सगळ्या दैत्यांना भुलवावे लागले. सत्य मार्गाचा कायम अवलंब करीत असलो तरी जर सत्य मार्गात कायमचा अडथळा असा दैत्य राज्याच्या दृष्टीने येणार असेल तर मग थोडे सत्य बाजूला सारून असत्य, कपट याचा वापर करून देवराज्य पृथ्वीवर आणले पाहिजे हा धडा आपल्याला प्रत्यक्ष भगवान श्रीविष्णूंनी दिला. साध्य होते देव राज्य पुन्हा स्थापित करण्याचे. त्या अतिशय उदात्त साध्यासाठी तत्वांना थोडी मुरड घालावी लागली तर तो आपदधर्म म्हणून ती तशी घातली पाहिजे हे "सत्यं परं धीमहि" असे प्रतिपादन करणा-या श्रीविष्णूंनी या प्रसंगाद्वारे सांगितले आहे.
हाच आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यानंतर चार हजार वर्षांनी देवाचे, धर्माच्या मार्गाने चालणारे मराठी राज्य प्रस्थापित केले आणि सकल भारतवर्षावर फ़ार फ़ार उपकार केलेत.
अमृताआधी विष येणार आहे. ते प्राशन करून पचवूनच पुढे गेलोत तर अमृत मिळणार आहे आणि जगाच्या कल्याणाकरिता व्यापक विचार करून, साध्य काय आणि साधन काय याचा विचार सदैव जागृत ठेऊन आपल्याला आपली कृती ठरवायची आहे हेच आपण या समुद्रमंथनातून शिकत जातो.
॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥
- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध सप्तमी शके १९४८ दिनांक २० / ७ / २०२६
२० जुलै २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#जुलै२०२६





