Saturday, July 25, 2026

श्रीमदभागवत चिंतन - २५ ययाती देवयानी आख्यान

देवपुत्र कच याने दैत्यगुरू शुक्राचार्यांकडे कपटवेषाने राहून त्यांच्याकडे असलेली संजीवनी विद्या शिकून घेतली. ती संजीवनी विद्या वापरूनच दैत्यगुरू युद्धात मृत झालेल्या दैत्यांना पुनर्जिवीत करीत असत आणि त्यामुळे देवांचा विजय दुरापास्त होत असे. कचाने ती विद्या शिकली आणि आपल्यावर अनुरक्त असलेल्या गुरूभगिनी देवयानीला शिकायला बाध्य केली. संजीवनी मंत्र षटकर्णी झाला. स्वतः दैत्यगुरू शुक्राचार्य, त्यांची कन्या देवयानी आणि कच या तिघांच्या सहा कानांमध्ये मंत्र पोहोचला आणि म्हणून तो मंत्र निष्प्रभ झाला. दैत्यगुरूंना त्याचा उपयोग होईना. इकडे कचाने सुद्धा देवलोकात परतण्याची इच्छा प्रगट केली. तेव्हा देवयानीने त्याच्यासोबत लग्न करण्याची इच्छा प्रगट केली पण कचाने तू गुरूभगिनी आहेस, मला संजीवनी विद्येने मला जिवंत केलेले आहेस त्यामुळे मला जन्म देणारी माता आहेस हा तर्क मांडून तिचाशी लग्न करण्याचे नाकारले. देवयानीने कचाला शिकलेली विद्या विसरण्याचा शाप दिला तर कचानेही देवयानीला कुणाही ब्राह्मण मुलाशी तुझे लग्न होणार नाही असा शाप दिला. व तो देवलोकात परत गेला.


एखादे गुपित दोन माणसांमध्ये मर्यादित राहिले तरच ते गुपित राहू शकते. ते तिस-या माणसापर्यंत गेले तर ते गुपित राहत नाही. इंग्रजीत Two is company, Three is crowd म्हणतात ते याचमुळे. आपल्या संस्कृतीत मंत्र सुद्धा गुरू आणि शिष्य दोन माणसांमध्येच मर्यादित रहावा असे प्रतिपादन केलेले आहे. आपला गुरूमंत्र कुणालाही, अगदी आपल्या आईवडीलांना, जीवनसाथीला सुद्धा सांगू नये तो यासाठीच. किंबहुना आपल्याला आलेले आध्यात्मिक अनुभव सुद्धा आपल्या सदगुरूवाचून कुणालाही सांगू नये. आपल्याला कितीही श्रेष्ठ स्वरूपाचे आध्यात्मिक अनुभव आले असतील, अनेक दर्शने झाली असतील पण ती सगळ्या लोकांना सांगून आपला लौकिक वाढवावा अशी कृती करू नये. आपल्याला आलेले आध्यात्मिक अनुभव, झालेली दर्शने ही आपल्या पूर्वभाग्याने आलेली आहेत आणि आपण आता आध्यात्मिक मार्गावर प्रगती करतो आहोत हे मनोमनी समजावे. या गोष्टी सदगुरूंशिवाय कुणालाही सांगू नयेत.



देवयानीच्या याच उद्दाम स्वभावामुळे तिचे राजकन्या शर्मिष्ठेशी भांडण झाले पण दैत्यगुरूंची लाडकी कन्या असल्याने राजाने आपल्या कन्येला, शर्मिष्ठेला, देवयानीची दासी म्हणून तिची सेवा करण्यास पाठवले. कचाच्या शापामुळे ब्राह्मण कन्या असलेल्या देवयानीचे क्षत्रिय राजा ययातीशी लग्न झाले. ययाती हा अत्यंत सुखलोलूप राजा होता. देवयानीसोबत विवाहानंतर त्याने अनेक प्रकारच्या वैवाहिक सुखांचा अगदी आकंठ उपभोग घेत काळ क्रमण करणे सुरू केले. अतिशय सुंदर आणि सौष्ठवपूर्ण असलेल्या ययाती राजाला आपल्या तारुण्याचा आणि देखणेपणाचा फ़ार अभिमान होता. यथावकाश देवयानी गर्भवती राहिली.


ती गर्भवती असताना तिची दासी म्हणून वावरणा-या राजकन्या शर्मिष्ठेसोबत यया्तीने तिच्याच मागणीनुसार शरीरसंग केला आणि तिला दोन पुत्र प्राप्त झालेत. दैत्यगुरूंना हे कळताच त्यांनी ययातीला वृद्धाप्याचा शाप दिला. इंद्रियसुखे आकंठ भोगण्यात सुख मानणा-या ययातीवर अचानक वृद्धाप्य प्राप्त होणे हा वज्राघातच होता. तो अत्यंत लीन होऊन शुक्राचार्यांच्या चरणावर कोसळला आणि त्याने शुक्राचार्यांना उःशाप मागितला. शुक्राचार्यांनी ययातीला तुझे वार्धक्य जर कोणी तरूणाने घेऊन तुला त्याचे तारूण्य दिले तर तुला तारूण्य कायम प्राप्त होईल असा वर दिला.


ययातीने आपल्या तरूण पुत्रांना त्याचे वार्धक्य घेऊन त्याला त्या पुत्रांचे तारूण्य देण्याबाबत याचना केली. पण हा आतबट्ट्याचा व्यवहार करण्यास कुणीच तयार होईना. ययातीच्या धाकट्या पुत्राला, पुरूला मात्र आपल्या पित्याची दया आली. पुरूने या शरीराचे अनित्यत्व आणि शरीराने प्राप्त होणा-या सुखांच्या मर्यादा त्याच्या तरूणपणीच ओळखल्या होत्या. त्यामुळे पितृआज्ञापालनातून येणारी संतुष्टी ही तारूण्यापेक्षा आणि तारूण्यात प्राप्त होणा-या सुखांपेक्षा जास्त महत्वाची आहे हे तत्व त्याने जाणले आणि ययातीच्या वार्धक्याचा सहर्ष स्वीकार केला. ययाती तरूण झाला तर त्याचा पुत्र पुरू हा वृद्धाचे जीवन जगू लागला.


अनेक वर्षे अशा तारूण्याचा आणि सर्व सुखांचा उपभोग घेतल्यानंतर ययातीला स्वतःलाच या सुखोपभोगांमध्ये बुडून राहण्यातला फ़ोलपणा कळला आणि त्याला पश्चात्ताप झाला. आपण केवळ या शरीरापुरताच विचार केला. त्यापलिकडे जाऊन आपण शाश्वत परमेश्वराविषयी कसलेही चिंतन केले नाही. जगातले सगळे धान्याचे कण, सगळे सुवर्ण, सगळ्या स्त्रिया जरी एखाद्या पुरूषाला प्राप्त झाल्यात तरी त्याची इंद्रिय तृप्ती होणार नाही. विषयांच्या आगीत आपण आणखी आणखी विषयांच्या उपभोगाची आहुती टाकत गेलो तर तो विषयाग्नी अधिकाधिक भडकतो आणि त्या विषयाग्नीत मनुष्यजीवनाची राख होऊन जाते याची जाणीव ययातीला झाली आणि तो पश्चात्तापाने पोळून निघाला. त्याने आपल्या पुत्राला, पुरूला आपले तारूण्य परत करून त्याच्याकडील आपले वृद्धाप्य प्रत मागितले आणि उरलेला काळ तो ईश्वरचिंतनात घालवू लागला. ख-या पश्चात्तापामुळे आणि ख-याखु-या क्षमायाचनेमुळे त्याचे चित्त ईश्वरचरणी विलीन झाले आणि त्याने मुक्ती प्राप्त करून घेतली.


इंद्रियसुखांच्या मर्यादा दाखवणारी ही गोष्ट. मनुष्याने या मर्यादा आणि इंद्रियसुखांची सतत वाढती मागणी लक्षात घेऊन त्यांच्या अधीन न होता भगवंताच्या आराधनेत आपले चित्त वळवीत रहावे कारण इंद्रियांची पूर्ण तृप्ती कधीही होत नाही हे साधकांच्या मनावर ठसविणारी ही गोष्ट. मनाला हा बोध होणे हाच या आख्यानाचा प्रसाद.



ययातीच्या पुत्रापासूनच यदुवंशाची उत्पत्ती झाली. यापुढील विवेचनात आपण यदुवंशीय भगवान कृष्ण यांचे गोड चरित्र श्रीमदभागवताचे हृदय समजल्या जाणा-या दशमस्कंधामधून अवलोकन करणार आहोत.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध एकादशी, देवशयनी आषाढी एकादशी, शके १९४८ दिनांक  २५ / ७ / २०२६


२५ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


Friday, July 24, 2026

मागणे लई नाही, लई नाही लई नाही...

नटांनी स्वतःच्या जिवावर उदार होऊन अभिनय वगैरे केलेल्या आणि प्रेक्षकांनी स्वतःच्या कौटुंबिक स्वास्थावर उदार होऊन पाहिलेल्या टुकार मराठी मालिका


 आणि 


मिळेल तिथून सर्वकाही फ़ुकट ओरबाडून घेण्याची वृत्ती. या दोन महत्वाच्या गोष्टींमुळे नव्वदोत्तर मराठी मध्यमवर्गीय समाजाचा र्‍हास झालाय असे माझे निरीक्षण आहे.


१. ज्या घरातील वृद्ध मंडळी बाल गोपाळांना " लवकर निजे, लवकर उठे " चे फ़ायदे सांगण्याऐवजी स्वतःच जर रात्री ११, ११.३० पर्यंत टुकार मालिका (दुपारी रिपीट टेलीकास्ट पुन्हा हं) पहात बसत असतील तर मग नातवंड पब मध्ये जातात म्हणून ओरडण्याचा अधिकार गमा्वून बसणारच. माझे मित्र श्री सचिन मधुकर परांजपे यांच्या प्रमेयाप्रमाणे तद्दन (टाकाऊ) मराठी मालिकांमधील निगेटिव्ह स्पंदनांचा परिणाम घरातील वातावरणावर होतोच. त्यातच ही मंडळी एकच भाग, तो कितीही टुकार का असेना, वारंवार पहातात आणि त्यातल्या आभासी वास्तवालाच खरे मानतात. 


एकाहून एक मूर्ख मराठी निर्माते आणि त्याहून मूर्ख लेखक हिंदी मालिकांची भ्रष्ट नक्कल करत, सॅडिस्ट पद्धतीच्या मालिकांचे प्रमोशन करत असताना त्यांना आपण नुसताच आश्रय देतोय असे नव्हे तर त्या प्रवृत्तींना हळूहळू आपल्या मनात आणि पर्यायाने घरात जागा देऊन आपल विश्व नासवतोय, हे लक्षात येतय का ?

 

मुला नातवंडांकडे लक्ष नाही, कुणाच छान झालेल बघवत नाही या सर्वांना कारण आपण ह्या आभासी जगाला दिलेला आश्रय हे आपल्याला कळतच नाहीये. एव्हढच काय तर कुठे प्रवासात किंवा आपण कुणाकडे बाहेरगावी पाहुणे म्हणून गेल्यावर त्यांच्या सोयी गैरसोयींचा विचार न करता आपण आपले हे घाणेरडे व्यसन जोपासतोय याची शुद्धही आपल्याला नाही. 

या मालिकांतून मानसिक समाधान तरी कुठल्या स्तराच मिळत ? आणि त्या प्रकारच्या वेळ घालवण्यात गंमत तरी काय ? याचा मी खूप गांभीर्याने विचार करत असतो.


ज्या समाजात आजी आजोबांचा मायेचा स्पर्श नसल्याने पाळणाघरं वाढतात, त्याच समाजात वृद्धाश्रम वाढतात हे वास्तव आहे. आम्ही बघितलेले आमचे आजी आजोबा असे नव्हते पण ते सुख आमच्या मुला, नातवंडांना मिळेल याची अजिबात हमी नाही. पूर्णच्या पूर्ण समाजाने आपली विचारशक्ती आणि गती या अती तद्दन गचाळ मालिकांपायी गमावली हे आपण कधी लक्षात घेणार ?


२. आमच्या बालपणी रेशनच्या दुकानांवर (स्वस्त धान्य दुकान) खुल्या बाजारापेक्षा कमी दरात धान्य, खाद्यतेल वगैरे मिळत असे. पण घरची परिस्थिती कितीही निम्न मध्यमवर्गीय का असेना, आपण सहसा रेशनच्या दुकानातून साखर खरेदीच्या पलिकडे खरेदी करत नसू. धान्याचा दर्जा हे एक कारण होतच, पण गोरगरीबांसाठी असलेल्या योजनेतून आपण कसे आणायचे ? ही भावना आणि आपण दोनवेळ का होईना, पोटभर जेवू शकतोय ही भावना ते पदार्थ आणण्यासाठी आड यायची. 


आज समाजातल्या उच्च मध्यमवर्गीयात सुद्धा जिथून मिळेल तिथून ओरबाडून घ्यायची वृत्ती वाढीला लागली आहे. मग " सरकार आमच्या जातीला काहीतरी सवलती देतंय का ? मग असल्या योजनांमधून थोडंफ़ार घेतल तर काय बिघडल ?" असली लंगडी सबब पुढे केली जाते. मग मित्र मंडळींमध्ये फ़ुकट पार्टी देणारा लोकप्रिय होतो. त्याने तो पैसा कुठल्या का मार्गाने मिळवला असेना त्याचे सोयर सुतूक आपल्याला नसत. आजकाल फुकट मिळाले तर आपल्याला शेणही चविष्ट वाटेल अशी सामाजिक स्थिती आहे.

बरंच लिहीण्यासारखं आहे पण थांबतो. आपल्या आजूबाजूच्या या परिस्थितीचा नक्की विचार कराल ही अपेक्षा.


या मालिका चार महिने बघायच्या नाहीत असा जरी नेम बापांनो तुम्ही केलात तरी आम्हाला चातुर्मासात घरच्या घरी विठ्ठल भेटेल.


मागणं लई नाही ... लई नाही... लई नाही.


- आपला कृपाभिलाषी, बालके राम. 

श्रीमदभागवत चिंतन - २४ परशूराम अवतार

रेणु ऋषींची कन्या रेणुका हिचा विवाह श्रेष्ठ तपस्वी मुनी जमदग्नी यांच्याशी झाला आणि या पवित्र दंपतींना अनेक पुत्र झालेत त्यातला सगळ्यात कनिष्ठ पुत्र म्हणजे भगवान परशूराम. पृथ्वीतलावरील हैहय नावाच्या क्रूर वंशाचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूंनी स्वतः हा अंशावतार धारण केलेला होता.



समाजात त्यावेळी चातुर्वर्ण व्यवस्था अस्तित्वात होती. समाजाला बौद्धिक दिशा दाखवणा-या व्यक्ती ब्राह्मण नावाने ओळखल्या जायच्यात, समाजचे रक्षण करणा-या व्यक्ती क्षत्रिय नावाने ओळखल्या जायच्यात. व्यापार उदीम करून समाजाच्या आणि राष्ट्राच्या संपत्तीत वाढ करणा-या व्यक्ती या वैश्य म्हणून संबोधल्या जायच्यात तर समाजाची सेवा करणा-या व्यक्ती या शुद्र म्हणून संबोधल्या जायच्यात. आजच्या भाषेत सांगायचे झाले तर आजची service industry. त्या काळी प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्मानुसार हा वर्ण प्राप्त करण्याचा आणि इतर वर्णात जाऊ शकण्याचा अधिकार होता. नंतरच्या काळात ही वर्णव्यवस्था जन्माधारित होत गेली आणि म्हणून टीकेचा विषय झाली.


क्षत्रियांनी राष्ट्राचे, समाजाचे रक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य होते पण हैहय वंशातले क्षत्रिय राजे या कर्तव्याला विसरून विषयलोलूप आणि तमोगुणी झालेले होते. त्यांनी आपल्या माहिष्मती नगरात अगदी हाहाकार उडवून दिलेला होता. त्याच नगरीचा राजा सहस्रार्जून याने भगवान दत्तात्रेयांची अतिशय कठोर उपासना करून त्यांना सहस्रबाहू मागून घेतले होते आणि ते वरदान मिळाल्यानंतर तो अधिकच उद्दामपणे वागू लागला.


एकदा तो सहस्रार्जून राजा जमदग्नी ऋषींच्या आश्रमात काही कारणाने आला. ऋषींनी त्याचे स्वागत केले. आश्रमवासी ऋषींचे ते विलक्षण वैभव पाहून राजा मनात अस्वस्थ झाला. त्याने ऋषींना त्या वैभवाचे रहस्य विचारले तेव्हा ऋषींनी मोठ्या निर्मळ मनाने आपल्या आश्रमात असलेल्या कामधेनूविषयी त्यांना सांगितले. सहस्रार्जुनाने ती कामधेनू जमदग्नींकडे मागितली. तो देवाचा प्रसाद असल्याचे सांगून जमदग्नींनी राजाला कामधेनू देण्यास नकार दिला तेव्हा सहस्रार्जुनाने आपल्या बळाचा वापर करून ती कामधेनू बांधून आपल्या माहिष्मती नगरीत नेली.


परशूराम आश्रमात परतल्यानंतर त्याला हा वृत्तांत समजताच त्याने माहिष्मती नगरीवर चाल करून गेला. याप्रसंगी त्याचे आणि सहस्रार्जुनाचे तुंबळ युद्ध झाले तेव्हा त्याने अतुल पराक्रम गाजवून त्या जुलमी, विषयांध राजाचा वध केला. त्या देवप्रसादरूप असलेल्या कामधेनूला सोडविले व पुन्हा तिला तो जमद्ग्नी ॠषींच्या आश्रमात घेऊन आला.


आश्रमात परतताच आपले पिता जमदग्नी ऋषींना त्याने सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा त्यांनी परशूरामाला ब्राह्मण धर्मातल्या क्षमेविषयी सांगितले. राजाचा वध करणे योग्य नाही आणि त्यामुळे लागलेले पाप दूर करायला परशूरामाला तपश्चर्येला जाण्यास सांगितले. पित्याच्या आज्ञेनुसार परशूराम तपश्चर्येसाठी गेलेत.



इकडे सहस्रार्जुनाच्या युद्धातून पळून गेलेल्या मुलांनी पुन्हा एकदा जमदग्नी ऋषींच्या आश्रमावर हल्ला केला. तपाला बसलेल्या जमदग्नी ॠषींची त्यांनी हत्या केली. परशूरामाची आई रेणुका हिने याप्रसंगी मोठा विलाप केला आणि आर्त स्वराने परशूरामांना पाचारण केले. आईची आर्त हाक ऐकून प्रखर मातृपितृभक्त असलेले परशूराम आश्रमात परतले तेव्हा तिथली परिस्थिती त्यांच्या आईने त्यांना कथन केली. संतापून परशूरामांनी तिथले एक परशू उचलले आणि त्वरित माहिष्मती नगरीत जाऊन सहस्रार्जुनाच्या पुत्रांचा वध केला. त्यांच्या मुंडक्यांची रास त्यांनी रचली आणि आपल्या पित्याच्या हत्येचा बदला घेतला. त्यांचे पिता जमदग्नी ऋषींना  स्मृतीरूप संकल्पाने त्याने पुनर्जीवित केले. याप्रसंगी त्यांचे पिता जमदग्नी ॠषी आणि माता रेणुका यांच्या आशिर्वादाने ते नवीन मन्वंतरात सप्तर्षींमधले एक झालेत आणि त्यांनी सप्त चिरंजीवांपैकी एक होण्याचा वर मिळाला.


ज्ञानमार्गाने जाणा-यांनी केवळ ज्ञानाचीच उपासना करून भागणार नाही तर आपण उपासना करीत असलेले सात्विक आणि विमल ज्ञान रक्षिले जावे म्हणून स्वतः बलाची उपासना करणे आवश्यक आहे हा या कथेचा बोध. "लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या" हा उपदेश स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या कथेलाच आदर्श मानून तर ठेवला नसेल ना ? अतिशय उदात्त, उत्तम असलेया आपल्या संस्कृतीरक्षणासाठी वेळप्रसंगी आपल्याजवळ शापाचे हत्यार पाहिजे पण शराचे (बाणांचे) ही हत्यार सज्ज असले पाहिजे हा संदेश भगवान परशूरामांनी आपल्याला दिला. शापादपि, शरादपि.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध दशमी शके १९४८ दिनांक  २४ / ७ / २०२६


२४ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 



Thursday, July 23, 2026

श्रीमदभागवत चिंतन - २३ श्रीरामचरित्र

खरेतर भगवान श्रीराम हे भारताचे राष्ट्रपुरूष आहेत. त्यांचे चरित्र डोळ्यांसमोर ठेऊनच समस्त भारताच्या चारित्र्याची उभारणी झालेली आहे. ते समस्त भारतवर्षाचे आदर्शपुरूष आहेत. त्यांचे चरित्र माहिती नाही अशी व्यक्ती भारतात तरी विरळा. त्यांच्या चरित्र वर्णनासाठी एक निराळीच लेखमाला लिहावी लागेल इतका त्या चरित्राचा आवाका आणि विस्तार मोठा आहे. पण आपण इथे श्रीमदभागवतग्रंथातल्या नवम स्कंधातल्या दहाव्या आणि अकराव्या अध्यायात वर्णन केलेल्या श्रीरामचरित्राची लेखनमर्यादा आखून त्या चरित्राचे आकलन करून घेऊयात.


राजा दशरथांच्या घरी कौसल्यामातेच्या पोटी जन्म घेतल्यानंतर भगवान श्रीरामांनी बालपणातच आपले क्षात्रतेज आणि पराक्रम दाखवायला सुरूवात केली. ऋषी विश्वामित्रांच्या यज्ञकार्यात अडथळा आणणा-या मारीच, सुबाहू सारख्या मोठ्या मोठ्या राक्षसांचा त्यांनी वध केला. राक्षसी वृत्ती, राक्षसी जीवन यांचा नाश करणे आणि आदर्श जीवन व्यवस्था, आदर्श मूल्यव्यवस्था यांना प्रस्थापित करणे हेच प्रभू श्रीरामांचे जीवनध्येय होते. त्यानंतर त्यांनी जनकराजाच्या सभेत जाऊन भगवान शंकरांचे विशालकाय शिवधनुष्य तोडले आणि जानकीमातेचे पाणीग्रहण केले. भगवान विष्णूंच्या हृदयकमलात सदैव वास करीत असलेल्या लक्ष्मीमातेनेच जनकराजाकडे जानकीच्या रूपाने जन्म घेतला होता. त्यांचे या पृथ्वीतलावर या शिवधनुष्याच्या प्रसंगाने मीलन झाले. पाणीग्रहणावरून परतताना प्रभू श्रीरामांनी परशूरामांचे गर्वहरण केले.



राज्याभिषेकाच्याच दिवशी आपल्या पित्याची आज्ञा प्रमाण मानून प्रभू श्रीरामांनी एखादा जीवनमुक्त योगी आपल्या प्राणांची पर्वा न करता ज्याप्रमाणे प्राणत्याग करतो तशा संतोषात आपल्या राज्याचा त्याग करून वनवास स्वीकारला. केवळ आपल्या पित्याने, राजा दशरथाने दिलेले वचन खोटे ठरू नये म्हणून आपल्या पत्नीसह आणि अनुज लक्ष्मणासह प्रभू श्रीराम वनात चालते झाले. वनात त्यांनी कलुषित बुद्धीच्या आणि अत्यंत कामवासनेने पीडित असलेल्या रावणभगिनी शूर्पणखेला विद्रूप केले आणि तिच्यासोबत असलेल्या खर, दूषण, त्रिशिरा आदि चौदा हजार राक्षसांचा वध केला.


अत्यंत कामासक्त असलेल्या रावणाने सीतामैयाचे हरण केले. त्यासाठी त्याने मायावी मारीचाची मदत घेतली. सीता शोधार्थ प्रभू श्रीराम रानोमाळ भटकू लागलेत. जटायूने प्रभूंना सीतेचे हरण आणि त्यासंबंधी वस्तूस्थिती कथन करून जटायूने देह ठेवला. प्रभूंनी त्याचे और्ध्वदैहिक केले आणि त्याने सांगितलेल्या मार्गाने ते दक्षिण देशाकडे मार्गक्रमण करू लागलेत. वाटेत त्यांनी वानरराज सुग्रीवाशी मैत्री करून वालीसारख्या दुष्ट वानराचा वध केला आणि असंख्य वानरसेना घेऊन प्रभू श्रीराम भारताच्या दक्षिणतटावर आलेत. श्रीमदभागवतकार मोठे आश्चर्य करताहेत की भगवान शंकर, प्रत्यक्ष जगत्पिता ब्रह्माजी ज्यांचे सदैव गुणगान करीत असतात ते प्रभू श्रीराम सामान्य पुरूषांप्रमाणे भारतवर्षात विहार करीत, सर्व जनजातींना आपल्यासोबत सदकार्यात जोडीत भ्रमण करीत होते.


समुद्र उल्लंघून लंकेत जाण्यासाठी त्यांनी सागराची प्रार्थना केली पण प्रार्थनेला सागर बधत नाही असे लक्षात आल्यावर त्यांनी सागरावर शस्त्र उचलले. प्राणभयाने सागर साकार प्रगट झाला आणि त्याने प्रभू श्रीरामांना आपल्या शरीरावरून सेतू रूपाने वाहून नेऊन लंकेत पोहोचवण्याचे वचन दिले. श्रीरामांच्या नेतृत्वात असंख्य वानरांनी सेतू बांधला आणि प्रभू श्रीराम सागरपार असलेल्या लंकेत दाखल झालेत.


त्यांनी राक्षसराज रावणाशी भीषण युद्ध करून त्याच्या अनाचारी आणि अत्याचारी बंधू व पुत्रांसमवेत त्याचा वध केला आणि आपल्या पत्नीची त्याच्या कारावासातून सुटका केली. राक्षसकुळात जन्मूनही अत्यंत सदाचारी असलेल्या रावणबंधू बिभीषणाला त्यांनी चिरंजीवित्वाचा वर दिला आणि हनुमान, अंगद, सुग्रीव आणि आपला बंधू लक्ष्मण व पत्नी जानकीसह प्रभू श्रीराम अयोध्येत परतलेत. आता श्रीरामांच्या वनवासाची १४ वर्षे पूर्ण झालेली आहेत. श्रीराम वनवासात गेल्यानंतर अयोध्येचे राज्य ज्या भरताला मिळाले होते त्याने ते राज्य श्रीरामांच्या पादुकांना सिंहासनावर ठेऊन चालविले होते. तो स्वतः नंदीग्रामात असलेल्या वनात प्रभू श्रीरामांप्रमाणेच वनवासात राहून, त्यांच्याप्रमाणेच वल्कले परिधान करून, जटा वाढवून तपस्वी आयुष्य जगत होता. प्रभू आपला वनवास आटोपून परत आलेत म्हटल्यावर भरताने त्यांच्या सुपूजित पादुका त्यांना अर्पण केल्यात. प्रभूंनी मोठ्या प्रेमाने आणि कृतज्ञतेने भरताला आलिंगन दिलेत आणि ते अयोध्या नगरीत प्रवेशकर्ते झालेत. 



प्रभू श्रीराम, जानकी माता, लक्ष्मण, भरत, हनुमंत आदि अयोध्येत परतताच अयोध्येच्या प्रजाजनांतर आनंद झालाच पण समस्त देवांना आणि इथल्या चराचर सृष्टीलाही अतिशय आनंद झाला. सुगंधित वारे वाहू लागलेत, वृक्षांनी पुष्पवृष्टी करायला सुरूवात केली. अयोध्येची सगळी जनता डोळ्यात प्राण आणून प्रभू श्रीराम व जानकीमातेला बघू लागलेत. देव, गंधर्व, यक्ष, किन्नर सारे प्रभूंचे गुणगान गाऊ लागलेत. कौसल्या, सुमित्रा आणि कैकयी मातांनी आपल्या अश्रूभरल्या नेत्रांनी श्रीरामांना ओवाळले व आपापल्या मांडीवर बसवून त्यांना अश्रूंनी अभिषेक घातला.


वसिष्ठ ऋषींनी विधीपूर्वक श्रीरामांच्या जटा उतरवल्या आणि त्यांचा राज्याभिषेक संपन्न झाला. श्रीरामराज्यात त्यांच्या प्रजाजनांना दुःख, शोक, चिंता, वार्धक्य, रोग, भय किंवा थकवा येत नसे. इतकेच काय तर ज्यांना आपले जीवन संपावे असे वाटत नसेल त्यांना मरणही येत नव्हते. अत्यंत पवित्र अशा श्रीरामांची कथा आपल्या समस्त भारतवर्षीयांसाठी कायम आदर्श आहे. असे आदर्श श्रीरामराज्य पृथ्वीतलावर स्थिरस्वरूपी अवतरित व्हावे असे आपण कायम म्हणत आलेलो आहे.

॥ राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की ॥


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध नवमी शके १९४८ दिनांक  २३ / ७ / २०२६


२३ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 



Wednesday, July 22, 2026

श्रीमदभागवत चिंतन - २२ नाभाग, अंबरीष आणि भक्ताभिमानी भगवंत

मनुपुत्र नभग याचा मुलगा नाभाग हा एका दीर्घ तपावरून परतला तेव्हा त्याच्या लक्षात आले की आपल्या सगळ्या मोठ्या भावांनी आपल्या वडिलांच्या संपत्तीचे वाटप आपापसात करून घेतलेले आहे आणि जेव्हा त्याने स्वतःच्या वाट्याबद्दल त्यांना विचारले तेव्हा आपले बाबा आम्ही तुझ्या वाट्याला ठेवलेले आहेत असे त्याला उत्तर मिळाले. ही सर्व कथा नाभागाने आपल्या पित्याला सांगितली.


पित्याने त्याला अत्यंत सात्विक अशा ऋत्विजांच्या यज्ञात जाऊन त्यांना यज्ञकर्मात योग्य ती मदत करण्याबाबत उपदेश केला. पित्याची आज्ञा प्रमाण मानून नाभागाने यज्ञस्थळी जाऊन तो यज्ञ पुरा करण्यासाठी त्या अंगिरस गोत्री ऋत्विजांची मदत केली. ती सर्व मंडळी प्रसन्न झाली आणि यज्ञसमाप्तीनंतर यज्ञातील उरलेले सर्व शेष धन त्या नाभागाला त्यांनी देऊ केले.


पण यज्ञ संपल्यानंतर ते शेष धन घेण्यासाठी एक काळाकभिन्न पुरूष त्या यज्ञस्थळी आला आणि त्या शेषधनावर परंपरागत माझाच अधिकार आहे असे सांगू लागला. नाभागाने याबाबत आपल्या पित्याचा सल्ला घेतला तेव्हा त्याच्या पित्याने तो पुरूष म्हणजे साक्षात रूद्रदेव असून तो तुझी परीक्षा बघण्यासाठी त्या यज्ञस्थळी आलेला आहे असे प्रतिपादन केले.


नाभाग यज्ञस्थळी परत आला आणि त्याने महादेव रूद्राचा त्या यज्ञशेष संपत्तीवरील हक्क मान्य केला व त्यांची स्तुती केली. महादेव प्रसन्न झालेत. त्यांनी त्या शेषयज्ञसंपत्तीचे दान तर नाभागाला केलेच पण तो आणि त्याचा संपूर्ण वंश श्रेष्ठ भगवतभक्त होतील असा त्याला आशिर्वाद दिला.



अशा नाभागाचा मुलगा अंबरीष. हा सुद्धा अत्यंत पराक्रमी आणि तेव्हढाच धर्मनिष्ठ होता. याला श्रीहरींचे अत्यंत प्रेम होते. त्याच्या हृदयात श्रीहरींविषयी अतिशय विमल भक्ती कायम वास करीत असे. भगवान श्रीहरी त्याच्या निर्मळ आणि निष्काम भक्तीवर कायम प्रसन्न होते. त्याच्या राज्यात साधुसंतांचे कायम पूजन होत असे. एके वेळी असेच अंबरीष राजाच्या एकादशी व्रताचे पारणे संपन्न होत असताना तिथे दुर्वास ऋषी आलेत. अंबरीष राजाने दुर्वासांने यथासांग पूजन केले आणि त्यांना व्रताच्या पारण्यात भोजनाचे निमंत्रण दिले. दुर्वास ऋषींनी ते निमंत्रण स्वीकारले आणि स्नान करण्यासाठी म्हणून ते जवळच असलेल्या नदीवर गेलेत. तिथे स्नान करताना त्यांना अंमळ जास्तच वेळ लागला.


तोवर इकडे अंबरीष राजाच्या व्रतस्थळी द्वादशी तिथी संपायला अगदी थोडा वेळ उरला होता. दुर्वास ऋषींना भोजनासाठी आमंत्रण दिलेले असल्याने ते व्रतस्थळी आल्याशिवाय भोजन करू शकत नाही आणि एकादशी व्रताचे पारणे द्वादशी तिथी संपण्याआधी केले नाही तर ते व्रत भंग झाल्याचा दोष लागतो अशा कात्रीत अंबरीष राजा सापडला. तेव्हा तिथल्या जाणत्या ब्राह्मणांनी त्याला तुलसीजल पिऊन उपवास सोडण्याचा सल्ला दिला. तुलसीदल प्राशन केल्यामुळे एकादशी उपवास सुटेल आणि भोजन न केल्यामुळे दुर्वासांच्या आधी भोजन करून त्यांचा अपमान केला असे होणार नाही. हा तोडगा अंबरीष राजाला मानवला. त्याने तसे करून एकादशी उपवासाचे पारणे केले व तो दुर्वास ऋषींची वाट बघत बसला.


स्नानादि कर्मे आटोपून दुर्वास ॠषी जेव्हा व्रतस्थळी आलेत तेव्हा राजाचे तेजःपुंज मुख पाहून त्यांनी जाणले की राजाने व्रताचे पारणे केलेले आहे. वस्तूस्थिती न जाणून घेता ते क्रोधित झालेत आणि त्यांनी अंबरीष राजाची निर्भत्सना केली आणि त्यावर शाप म्हणून आपल्या जटेतून उत्पन्न झालेली एक कृत्या अंबरीष राजाच्या संहारासाठी सोडली. हातात तलवार घेऊन ती कृत्या अंबरीष राजाला मारण्यासाठी पुढे येऊ लागली पण अंबरीष राजा आपल्या भगवत्भक्तीत मग्न होता. सदैव आपले आराध्य दैवत श्रीहरींचे चिंतन आणि स्मरण करीत बसला होता.


ती कृत्या आपल्या भक्ताचे अहित करण्यासाठी येते आहे हे बघून भक्ताभिमानी भगवंतांनी आपले सुदर्शन चक्र भक्त रक्षणासाठी सोडले. ते सुदर्शन चक्र प्रथम त्या कृत्येला निष्प्रभ करून मग दुर्वासांच्या मागे लागले. त्या सुदर्शनचक्राच्या भयाने दुर्वासांसारखे थोर ऋषी त्रिखंडात पळू लागलेत पण सुदर्शन चक्र त्यांचा पिच्छा सोडेना. ते ब्रह्मदेवांकडे आश्रयाला गेले पण ब्रह्मदेवांनी त्यांना सुदर्शनचक्राच्या प्रभावापासून वाचविण्यात आपली असमर्थता दर्शविली. ते कैलासावर महादेव शंकरांकडे गेले. त्यांनीसुद्धा या सुदर्शनचक्रापासून दुर्वासांना वाचविण्यात आपली असमर्थता दर्शविली आणि दुर्वासांना वैकुंठात जाऊन भगवान श्रीहरींच्या चरणकमलांचा आश्रय घेण्याचा उपदेश केला.


त्याप्रमाणे दुर्वास ऋषी वैकुंठात जाऊन भगवान श्रीहरींच्या चरणकमलांवर कोसळले आणि त्यांनी त्या दुःसह सुदर्शचक्रापासून मुक्तीची मागणी केली. त्याप्रसंगी भगवान विष्णूंनी त्यांना सांगितले की कायम ख-या भक्तांच्या हृदयात वास करीत असतात. ख-या भक्तीचे ते इतके भुकेले आहेत की अशा ख-या भक्तांसाठी, भक्तांच्या कामांसाठी ते वैकुंठलोकाचा आणि प्रत्यक्ष लक्ष्मीचा सुद्धा त्याग करू शकतात. दुर्वासांनी त्यांच्या एका भक्ताला अकारण दुखावले आहे तेव्हा या सुदर्शनचक्रापासून मुक्ती मिळवायची असेल तर दुर्वासांना त्या भक्तालाच शरण जावे लागेल.


दुर्वास ॠषी मनोमन खजिल झालेत आणि परत व्रतस्थळी येऊन श्रेष्ठ भागवत असलेल्या अंबरीष राजाची क्षमायाचना करू लागलेत. मूळचा सज्जन आणि मृदू हृदयी असलेल्या अंबरीष राजाने त्यांना लगेच क्षमा केली आणि दुर्वास ॠषींच्या मागे लागलेले सुदर्शन चक्र पुन्हा भगवान श्रीहरींकडे जाऊन त्यांच्या करकमलांमध्ये विराजमान झालेत.



ख-या भगवत्भक्ताने निर्मळ, निष्काम भक्ती करीत असताना या संसारात येणा-या संकटांची तमा बाळगू नये. त्या संकटांचे निवारण आपले रक्षणकर्ता सदैव करतील असा दृढ विश्वास बाळगून आपल्या नियत कर्मांपासून च्युत न होता ती करीत रहावीत हा या कथेचा बोध आणि प्रसाद.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥



- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध नवमी शके १९४८ दिनांक  २२ / ७ / २०२६


२२ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 



Tuesday, July 21, 2026

श्रीमदभागवत चिंतन - २१ वामनावतार

श्रेष्ठ भगवदभक्त प्रह्लादाचा पुत्र विरोचन आणि त्याचा पुत्र बली हा मोठा पराक्रमी राजा होता. दैत्यकुळात जन्म झाला असला तरी आपल्या आजोबांच्या आणि वडिलांच्या संस्कारांमुळे ब्राह्मणांविषयी, यज्ञसागादि कर्मांविषयी त्याला अतिशय आदर होता. त्याच्या राज्यात तो आपल्या असुर प्रजाजनांसाठी नित्य यज्ञकर्मे, यागादि विधी करीत असे. अशा पद्धतीने जीवन जगता जगता तो इतका शक्तीशाली झाला की त्याने देवांवर स्वारी केली आणि इंद्राचे अमरावती नगर बळकावले. देवांना असुरांनी त्यांच्या स्थानावरून पदच्युत केले आणि ते स्वर्गाचे अनंत भोग उपभोगू लागलेत.


आपल्या पुत्रांना अशा प्रकारे पदच्युत होऊन दारोदार भटकावे लागत असल्याचे पाहून देवमाता अदिति दुःखीकष्टी झाली. तिचे पती कश्यप ऋषी आपल्या साधनेवरून परतल्यानंतर आपल्या पत्नीच्या उदासीचे कारण त्यांनी विचारले आणि अदितिने देवांच्या पराभवाचे व असुरांनी अमरावती बळकावल्याचे वृत्त आपल्या पतीला कळवले. कश्यप मुनींनी अदितिला पयोव्रत या साधनेचा उपदेश केला आणि देवमाता अदितिने मनात कुठलीही शंका न धरता ते व्रत आरंभिले.


पयोव्रताचे फ़ळ म्हणून प्रत्यक्ष भगवान विष्णू अदितिच्या उदरी आपल्या चतुर्भुज स्वरूपात संपूर्ण आयुधांसह प्रगट झाले आणि मातेच्या मनातला असुर पराभवाचा हेतू जाणून त्यांनी वामनाचे बटुरूप घेतले. बलिराजाकडे तेव्हा अनेक यज्ञ सतत सुरू असत. नर्मदेच्या तीरावर सुरू असलेल्या अशाच एका अश्वमेध यज्ञात बटु वामनरूपाने भगवान विष्णू प्रगट झालेत. असुर जरी असला तरी त्याचे सात्विक कर्म जाणून त्याच्या घरी भगवंतांना याचक म्हणून जावे लागते. किती गोड कल्पना !



तेव्हा ते बटुरूप वामन इतके सुंदर, लोभसवाणे आणि तेजस्वी दिसत होते की सगळे याज्ञिक. ऋत्विज आणि तिथे उपस्थित असलेले असुर सगळे अगदी मोहित झालेत. बलिराजाने बटुरूप वामनाचे पूजन केले आणि त्यांना दान देण्याचा संकल्प सोडला. तोपर्यंत दैत्यगुरू शुक्राचार्यांनी वामनरूपातील भगवान विष्णूंना ओळखले आणि आपल्या शिष्याला पदच्युत करण्यासाठी भगवान इथे आलेले आहेत हे जाणून बलिराजाला त्या बटुला दान न देण्याबाबत सांगितले. पण बलिराजाने त्यांना उत्तर दिले की एकदा मी त्या बटुला शब्द दिलाय आता जर मी तो शब्द मागे घेतला तर माझ्या कुळाला बट्टा लागेल. आता माझे जीवित संपले तरी चालेत पण मी त्या बटुला दान देणारच. दैत्यगुरू शुक्राचार्यांनी संतापून बलिराजाला "गुरूंची अवज्ञा केल्याने तुझी सर्व लक्ष्मी नष्ट होईल" असा शाप दिला आणि ते तिथून चालते झाले.


हा संवाद ऐकत असलेले भगवान विष्णू मात्र बलिराजावर, त्याच्या निश्चयीपणावर आणि ब्राह्मण, यज्ञकर्मे याबाबत असलेल्या त्याच्या प्रेमावर प्रसन्न झाले. बलिराजाने त्यांना दान देण्याचा संकल्प सोडल्यानंतर त्यांनी फ़क्त तीन पाऊले भूमीचे दान मागितले. बलिराजाला याचे फ़ार आश्चर्य वाटले. त्याने वामन भगवान यांना आणखीही काही मागण्याची विनंती केली. आपल्या मनात असेल तर मी या पृथ्वीतलावरील एखादे संपूर्ण द्वीप आपल्याला देऊ शकतो. माझे राज्य स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या त्रिखंडात आहे त्यातला एक संपूर्ण खंड तुम्ही मागितला तरी मी देईन अशी तयारी दर्शविली पण वामन भगवान आपल्या तीन पावलांच्या दानावर ठाम राहिलेत. याप्रसंगी बलिराजा आणि वामन भगवान यांचा संवाद श्रीमदभागवताच्या अष्टम स्कंधात मुळातूनच वाचण्यासारखा आहे. वामन भगवान बलिराजाला मनुष्यमात्रांच्या मनातल्या कधीही न संपणा-य़ा तृष्णेचा उपदेश करतात आणि ती तृष्णा ज्याची आहे तो तिन्ही लोकांचा स्वामी जरी बनला तरी आपल्या अंतरात्म्यातल्या तृष्णेमुळे मनातून कधीही सुखी होत नाही. कायम नवनवीन मिळवण्याची त्याची तहान कायम असते. याउलट प्रारब्धवशाने आपल्याला प्राप्त होत असलेल्या वस्तूंमध्ये तृप्त असलेला पुरूष हा जगाला जिंकल्यासारखाच समाधानी असतो हा उपदेश भगवान वामनांनी बलिराजाला केला. बलिराजा मनोमनी समजला. अत्यंत सात्विक बुद्धी जरी असली तरी नवनवीन गोष्टी मिळविण्याची तृष्णा आपल्याला कायम असमाधानी ठेवेल हा आत्मबोध त्याने करून घेतला.


त्यानंतर भगवान विष्णूंनी वामनरूपातून विराटरूप धारण करून एका पाऊलाने सगळी पृथ्वी, तर दुस-या पाऊलाने सगळे आकाश व्यापले. तिसरे पाऊल ठेवायला त्यांना जागाच मिळेना तेव्हा बलिराजाने आपले मस्तक त्यांच्यापुढे केले. बलिराजाचा हा दृढसंकल्प आणि सात्विकता पाहून भगवान प्रसन्न झालेत आणि त्यांनी बलिराजाला पाताळाचे राज्य दिले. या मन्वतरानंतर बलिराजा हाच जगाचा राजा म्हणून राज्य करणार असल्याचे वरदान सुद्धा बलिराजाला त्याने न मागता दिले.



वामनावतारात भगवंतांनी एका अतिशय सात्विक, शुद्ध राजाच्या मनातल्या तृष्णेची आणि त्यापासून कायम मिळत राहणा-या मनातल्या असंतोषाची त्याला जाणीव करून दिली आणि सरतेशेवटी त्याच्या मनात कायम संतोष राहील असा आशिर्वाद दिला. हा या कथेचा आपण सर्वांना आत्मबोध. आपण सात्विक बुद्धीचे आहोत पण आपल्या मनात अशी तृष्णा आहे का ? याचा विचार आपला आपण करायचा आहे आणि भगवान वामनांच्या उपदेशाप्रमाणे आपल्या मनाला बोध करून घ्यायचा आहे हाच या कथेचा प्रसाद.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध अष्टमी शके १९४८ दिनांक  २१ / ७ / २०२६


२१ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 




Monday, July 20, 2026

श्रीमदभागवत चिंतन - २० समुद्रमंथन

एकेकाळी सर्व देवांना दानवांनी पराजित आणि हतप्रभ करून टाकलेले होते. देवांचा प्रभाव जनमानसावर पडेना. त्यांची शक्ती अगदी क्षीण करून दानव या जगावर राज्य करू लागले.


देव म्हणजे त्यागी जीवन. दानव म्हणजे भोगी जीवन. देव म्हणजे स्वतःआधी इतरांचा विचार करणारे व्यक्ती. तर दानव म्हणजे फ़क्त स्वतः आणि स्वतःचाच विचार करणारी व्यक्ती. देव म्हणजे समष्टीच्या कल्याणाची इच्छा तर दानव म्हणजे फ़क्त स्वतःच्याच कल्याणाची इच्छा. देव म्हणजे समस्त सृष्टीच्या कल्याणाचा विचार तर दानव म्हणजे "खाओ, पिओ ऐश करो" हा विचार. या दोन विचारसरणींमधला संघर्ष फ़ार जुना आहे. बराच काळ देवांची विचारसरणी मान्य करून त्या पथावर चालणारा समाज असतो तर मधला काही काळ दानवांच्या आकर्षक मांडणीला भुलून, दानवांची विचारसरणी पटून, त्या विचारसरणीचे आकर्षण वाटून त्या मार्गाने जाणारा समाज अस्तित्वात येतो. हा देवांचा पराभव असतो. आणि हे दानवराज्य फ़ार काळासाठी पृथ्वीवर असणे हे समस्त पृथ्वीसाठी अत्यंत धोकादायक असते.


अशावेळी पराभूत झालेल्या देवांनी परमेश्वराची आराधना केली, त्यांची यथार्थ स्तुती केली. देवांचा सदहेतू जाणून प्रत्यक्ष भगवान प्रगट झालेत आणि त्यांनी देवांना कायम अपराजित राहण्यासाठी अमृतप्राशन करण्याचा सल्ला दिला. ते अमृत समुद्रमंथनातून मिळेल असा नुसता आशिर्वाद देऊन भगवान शांत राहिले नाहीत तर समुद्रमंथन करण्याचा सविस्तर विधीसुद्धा त्यांनी कथन केला आणि समुद्रमंथनादरम्यान कासवरूप घेऊन मेरुपर्वत स्वतःच्या पाठीवर तोलून मंथनादरम्यान तो समुद्रात बुडणार नाही याची तजवीज करण्याची ग्वाहीसुद्धा भगवंतांनी देवांना दिली. नियमानुसार वागून सुद्धा जर सुष्ट शक्तींचा पराभवच होणार असेल आणि जग संपणारच असेल तर जगाच्या पालनकर्त्या भगवंताला प्रसंगी त्या नियमांना मुरड घालून थोडा पक्षपात करून ते जग पुनर्स्थापित करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतील त्या कराव्याच लागतात.



प्रसन्न झालेल्या भगवंतांनी या समुद्रमंथनातून अमृत प्रगट होण्यापूर्वी विष प्रगट होईल याचीही पूर्वसूचना सर्व देवांना देऊन ठेवली होती. आणि घडलेही तसेच. अमृतमंथनात विष प्रगट झाले तेव्हा ते प्राशन करायला कुणीही तयार होईना. तेव्हा देवांनी सृष्टीचे आद्य दैवत शंकरांची मनोभावे प्रार्थना केली. हे विष जर मी प्राशन केले नाही तर पृथ्वीवरील सगळ्याच जीवांना अतिशय त्रास होईल या अत्यंत विशाल हेतूने भगवान शंकरांनी ते विष प्राशन केले आणि ते सृष्टीचे कायम उपकारकर्ता असे महा देव झालेत.


सरतेशेवटी ज्या अमृतासाठी हे मंथन सुरू झालेले होते ते अमृत सागरातून प्राप्त झाले. ते वाटण्यासाठी श्रीविष्णूंना मोहिनीरूप घेऊन सगळ्या दैत्यांना भुलवावे लागले. सत्य मार्गाचा कायम अवलंब करीत असलो तरी जर सत्य मार्गात कायमचा अडथळा असा दैत्य राज्याच्या दृष्टीने येणार असेल तर मग थोडे सत्य बाजूला सारून असत्य, कपट याचा वापर करून देवराज्य पृथ्वीवर आणले पाहिजे हा धडा आपल्याला प्रत्यक्ष भगवान श्रीविष्णूंनी दिला. साध्य होते देव राज्य पुन्हा स्थापित करण्याचे. त्या अतिशय उदात्त साध्यासाठी तत्वांना थोडी मुरड घालावी लागली तर तो आपदधर्म म्हणून ती तशी घातली पाहिजे हे "सत्यं परं धीमहि" असे प्रतिपादन करणा-या श्रीविष्णूंनी या प्रसंगाद्वारे सांगितले आहे.



हाच आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यानंतर चार हजार वर्षांनी देवाचे, धर्माच्या मार्गाने चालणारे मराठी राज्य प्रस्थापित केले आणि सकल भारतवर्षावर फ़ार फ़ार उपकार केलेत.


अमृताआधी विष येणार आहे. ते प्राशन करून पचवूनच पुढे गेलोत तर अमृत मिळणार आहे आणि जगाच्या कल्याणाकरिता व्यापक विचार करून, साध्य काय आणि साधन काय याचा विचार सदैव जागृत ठेऊन आपल्याला आपली कृती ठरवायची आहे हेच आपण या समुद्रमंथनातून शिकत जातो.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध सप्तमी शके १९४८ दिनांक  २० / ७ / २०२६


२० जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६