Monday, August 10, 2026

श्रीमदभागवत चिंतन - ४१ जरासन्ध आणि शिशुपाल वध

आपले परमभक्त असलेल्या पांडवांचे इंद्रप्रस्थ नगर अवलोकन करण्यासाठी म्हणून भगवंत आपल्या सगळ्या पट्टराण्यांसह द्वारकेवरून इंद्रप्रस्थाला गेलेत. भगवंत आपल्या घरी आलेले पाहून पांडवांना अतिशय आनंद झाला. कुंतीला आपल्या या भाच्याला पाहून प्रेमाचे भरते आले. भगवंतांचे आणि त्यांच्यासह आलेल्या त्यांच्या पट्टराण्यांचे सर्व इंद्रप्रस्थवासियांनी मनापासून स्वागत केले, त्यांचा यथोचित आदरसत्कार केला. भगवंतांनी पांडवांना राजसूय यज्ञ करण्याची आज्ञा दिली.


राजसूय यज्ञासाठी यज्ञाश्व सोडला गेला. आसपासच्या राज्यांमध्ये तो यज्ञाश्व सुखेनैव फ़िरून जयपत्रे घेऊन आला पण मगध देशातून मात्र विजय प्राप्त होईना. मगध देशात भगवंतांनी आत्त्तापर्यंत अठरा वेळा पराजित केलेला जरासन्ध राज्य करीत होता. मधल्या काळात त्याची शक्ती इतकी वाढली होती की त्याला समोरासमोर युद्धात पराजित करणे कठीण होऊन बसले होते. तेव्हा उद्धवाने द्वारकेत भगवंताला सांगितलेली युक्ती त्यांनी जरासंधासोबत वापरण्याचे ठरविले. भगवंत स्वतः अर्जुन आणि भीमाला घेऊन मगध नगरीत ब्राह्मण वेषाने गेलेत. जरासंध दुष्ट असला तरी अतिथीधर्म पालन करीत होता. अतिथी म्हणून त्याच्याकडे जायचे आणि त्याला मल्लयुद्धाचे आव्हान द्यायचे असा श्रीकृष्ण आणि पांडवांचा हेतू होता.



जरासंधाने आपल्या धर्माप्रमाणे या अतिथींचे स्वागत केले आणि त्यांना येण्याचा हेतू विचारला. तेव्हा त्या ब्राह्मण वेषातील अतिथींना आपण क्षत्रिय असून आम्हाला आपल्यासोबत मल्लयुद्ध करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. अतिथींनी आपली खरी रूपेही जरासंधासमोर प्रगट केलीत. हा पांडुपुत्र भीम, हा कुंतीसुत अर्जुन आणि मी तुझा जुना विरोधक कृष्ण असे भगवंतांनी सांगताच जरासंधाला हसू फ़ुटले. तो म्हणाला हे कृष्णा, माझ्यासोबतच्या मागील युद्धात तू मथुरेतून पळून द्वारकेत आश्रय घेतलास त्यामुळे तुझ्याशी मी युद्ध करणार नाही. हा अर्जुन वनवासाच्या काळात बृहन्नडेच्या रूपात राहत होता त्यामुळे त्याच्याशी सुद्धा मला मल्लयुद्ध करता येणार नाही. मी भीमसेनाशी मल्लयुद्ध करेन. सगळ्यांची त्याला सहमती मिळाली आणि भीमसेनाचे व जरासंधाचे मल्लयुद्ध सुरू झाले.


सतत अठ्ठावीस दिवस मल्लयुद्ध चालले तरी जरासंधाचा पराभव होईना. भीमसेन हताश झाला तेव्हा भगवंतांनी जरासंधाच्या जन्माचे रहस्य त्याला सांगितले आणि त्याला मल्लयुद्धातच मधोमध चिरून त्याच्या शरीराचे दोन तुकडे करण्याची आज्ञा दिली. दुस-या दिवशीच्या युद्धातच भीमसेनाने भगवंताची आज्ञा प्रमाण मानून जरासंधाचे बरोबर मधून दोन तुकडे केलेत आणि त्याचा वध केला. जरासंधाला जिंकल्याबरोबर पांडवांचा राजसूय यज्ञ पूर्ण झाला. भगवान श्रीकृष्णांनी जरासंधाने बंदिवान करून ठेवलेल्या अनेक राजांना त्याच्या कैदेतून मुक्त केले आणि त्यांचे गतवैभव त्यांना प्राप्त करून दिले. त्या सर्व राजांनी आपल्या उपकारकर्त्या भगवंताची जी स्तुती गायली आहे ती आपण आजही अत्यंत कृतज्ञतेने म्हणतो.


कृष्णाय वासुदेवाय, हरये परमात्मने

प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः



राजसूय यज्ञाची विधिवत सांगता करण्यासाठी पांडवांनी आपल्या इंद्रप्रस्थ नगरीत सर्व ऋषीमुनी आणि विविध देशींच्या राजांना पाचारण केले. सर्व मंडळी अत्यंत आनंदाने तिथे आलीत. त्याप्रसंगी त्य यज्ञाच्या अग्रपूजेचा मान कुणाला द्यायचा यावरून तिथे चर्चा झाली आणि सर्वानुमते हा मान भगवान श्रीकृष्णासारख्या पुरूषोत्त्तमाला मिळायला हवा असा सूर निघू लागला. पण भगवंताचा जन्मोजन्मीचा शत्रू असल्या शिशुपालाला ते पटले नाही. तो भर सभेत भगवंताची निर्भत्सना करू लागला, भगवंताला दूषणे देऊ लागला. शिशुपालाचे शंभर अपराध भरण्याचीच भगवंत वाट बघत होते. ते तसे भरल्याबरोबर भगवंतांनी त्या भर सभेत आपले सुदर्शनचक्र सोडून शिशुपालाचे मस्तक क्षणार्धात धडावेगळे केले. द्वेषभावनेने का होईना भगवंताचा सतत ध्यास घेतलेला असल्याने शिशुपालाच्या देहातली दिव्य ज्योत भगवंतांच्या हृदयात जाऊन विराजमान झाली. त्याला भगवंताच्या हृदयात अक्षय्य स्थान मिळाले. जय आणि विजय या आपल्या पार्षदांच्या अपराधासाठी त्यांचे तीन असुरजन्म हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, रावण आणि कुंभकर्ण व शिशुपाल आणि दंतवक्त्र या स्वरूपात पूर्ण होऊन ते पार्षद आपल्या मूळ सेवेत रूजू झाले होते. पांडवांचा राजसूय यज्ञ यथासांग पार पाडल्यानंतर भगवंत पुन्हा द्वारकानगरीत आलेत.

॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण द्वादशी / त्रयोदशी शके १९४८ दिनांक  १० / ८ / २०२६


१० ऑगस्ट २०२६ 


श्रीमदभागवत चिंतन - ४० भगवंतावर चोरीचा आळ

भगवान श्रीकृष्णावर त्यांच्या बालपणीच गोपींच्या घरांमधून दही, दूध, लोण्याची चोरी केल्याचे अनेक आळ आलेले होते. त्यामुळे चोरीचे आळ त्यांना नवे नव्हते. पण हे सगळे लाडीक आळ होते. भगवंत नंदबाबांच्या समृद्ध घरातले पुत्र होते आणि आपल्या सवंगड्यांसाठी ते बालपणी या चो-या करायचेत पण भगवंत द्वारकाधीश असताना मात्र त्यांच्यावर चोरीचा आळ आला आणि त्याला भगवंतांनी कसे धीरोदात्त्तपणे तोंड दिले हे अभ्यासण्यासारखे आहे.


सत्राजित नावाचा एक तपस्वी क्षत्रिय होता. त्याने खूप मनापासून सूर्योपासना केली. भगवान सूर्यनारायण त्याच्यावर प्रसन्न झालेत आणि त्याला स्यमंतक नावाचा आपला एक मणि दिला. त्या मण्याचे अंगभूत तेज इतके होते की तो मणि गळ्यात धारण केल्यानंतर सर्व प्रजाजनांना साक्षात सूर्यनारायण आपल्या नगरात प्रगट झाल्यासारखे वाटले. सत्राजिताने तो स्यमंतक मणि आपल्या देवघरात सुपूजित केला आणि त्याची प्रतिष्ठापना केली. रोज तो मणि आपल्या भाराच्या आठपट सोने त्या घरात प्रदान करीत असे आणि तो मणि जिथे राहील तिथे रोग, भय, शत्रू, मानसिक किंवा शारिरीक दोष यांचा लवलेशही राहत नसे. भगवान श्रीकृष्णांनी सत्राजिताला भेटून राज्याच्या व्यापक हितासाठी तो स्यमंतक मणि हा मथुरेचे राजा उग्रसेन यांच्याकडे सुपूर्द करायला सांगितले. पण त्या स्यमंतक मणिप्राप्तीचा इतका अहंकार सत्राजिताला चढला होता की त्याला वाटले की माझ्याकडे मणि आहे हे श्रीकृष्णाला सहन होत नाही म्हणून तो हा सल्ला देतोय. त्याने तो सल्ला धुडकावून लावत मणि स्वतःजवळच ठेवला.


एके दिवशी सत्राजिताचा भाऊ प्रसेनजित हा स्यमंतकमणि गळ्यात परिधान करून घोड्यावर बसून वनात शिकारीसाठी गेला असताना एका सिंहाने त्याला त्याच्या घोड्यासकट मारून टाकले आणि तो मणि घेऊन सिंह जात असताना त्याची जांबुवताशी झटापट झाली. जांबुवंत अत्यंत पराक्रमी होता त्याने त्या सिंहाला मारून तो मणि हस्तगत केला आणि गुहेत राहत असलेल्या आपल्या लहान मुलांना तो मणि खेळायला दिला.



इकडे प्रसेनजित न परतल्यामुळे सत्राजित शोकाकूल झाला आणि माझ्या भावाचे, प्रसेनजिताचे, स्यमंतक मण्यासाठी अपहरण भगवान श्रीकृष्णानेच केलेले आहे असा आळ त्याने भगवंतावर घेतला. हळूहळू ही वार्ता कर्णोपकर्णी झाली. प्रजाजनांमध्ये कुजबूज सुरू झाली. परिस्थितीजन्य पुरावे भगवंताच्या विरोधातच होते. या खोट्या आळामुळे भगवंत दुःखी झालेत पण डगमगले मात्र नाहीत. त्यांनी त्या मण्याच्या शोधासाठी काही प्रजाजन व सैन्य सोबत घेऊन वनात प्रसेनजिताच्या शोधाची मोहीम काढली.


वनात काही अंतर जाताच सिंहाने मारलेल्या घोड्याचे आणि प्रसेनजिताचे अवशेष सगळ्यांना दिसले. प्रसेनजिताला सिंहानेच मारून खाल्ले यावर सगळ्यांचे एकमत झाले. थोडे पुढे जाताच भगवंत जांबुवंतांच्या गुहेत शिरले आणि तिथे त्या स्यमंतक मण्याशी खेळत असलेली अज्ञान अस्वलबालके त्यांना दिसली. भगवंत तो मणि त्या बालकांकडून हस्तगत करण्यासाठी पुढे जाणार तेव्हढ्यात कुणीतरी पुरूष आपल्या गुहेत येऊन आपल्या बालकांना त्रास देतोय असा ग्रह करून घेत जांबुवंत पुढे सरसावला आणि त्याने श्रीकृष्णांशी मल्लयुद्ध सुरू केले. बराच वेळ कुणीही कुणाला हार जाईना. मग त्या दोघांचे मुष्टियुद्ध सुरू झाले. त्यात जांबुवंतावर अनेक मुष्टिप्रहार करून भगवंतांनी त्याचे बळ अगदी क्षीण करून टाकले. त्या युद्धामध्येच जांबुवंताला आपल्या या प्रतिस्पर्ध्याचे पूर्व अवतारातले श्रीरामांचे स्वरूप आठवले. युद्ध सोडून देऊन तो भगवंतांना शरण आला आणि त्याने भगवंतांची स्तुती आरंभिली. मागील अवतारात मी तुमचा दास होतो आणि म्हणूनच या अवतारात सुद्धा आपण मला दर्शन दिले हे माझे केव्हढे भाग्य अशी त्याने भगवंतांची स्तुती केली आणि स्यमंतक मण्याची कथा ऐकून तो मणि भगवंतांना दिला. सोबतच आपली कन्या जांबवती हिच्याशी भगवंतांचा विवाह करून दिला.


स्यमंतक मणि घेऊन आणि आपली नवपरिणीत वधू घेऊन भगवंत द्वारकानगरीत परतलेत. भगवंतांनी सगळ्या प्रजाजनांना एकत्र सभेत बोलावले आणि स्यमंतक मणि सत्राजिताकडे प्रदान करून स्वतःवरच्या आरोपांचे किटाळ धुवून काढले. सत्राजित मनोमन फ़ारच खजिल झाला. आपण कारण नसताना भगवान श्रीकृष्णाच्या हेतूवर संशय घेऊन फ़ार मोठी चूक केली अशी बोचणी त्याला लागली. त्याने आपली अत्यंत सुशील, सर्वगुणी आणि देखणी कन्या, सत्यभामा ही भगवंतांना दिली. सत्यभामेचा विवाह भगवान श्रीकृष्णांशी झाला.


त्यानंतर भगवंताचे विवाह सूर्यदेवांची कन्या कालिंदी, उज्जैन नगरीची राजकन्या मित्रविन्दा, कौशल देशाचा राजा नग्नजित याची कन्या सत्या उपाख्य नाग्नजिती, कैकय देशातल्या श्रीकृष्णांच्या आत्याची, शृतकिर्तीची, मुलगी भद्रा आणि मद्रदेशाची राजकन्या लक्ष्मणा ह्यांच्याशी झालेत. प्रत्येक विवाहानंतर द्वारकेत अत्यंत विधिवत लग्न झालीत आणि सर्वत्र आनंदी आनंद झाला.



प्रागज्योतिषपूर येथे भौमासूर नावाच्या असुराने अनेक देशातील एकूण १६००० राजकन्यांना बळजबरीने अपहरण करून आपल्या कैदेत ठेवलेले होते. भगवंतांना हे अत्याचारी वृत्त्त कळताच ते सत्यभामेसह गरूडावर स्वार होऊन प्रागज्योतिषपूर येथे गेलेत. तिथे भगवंतांनी सत्यभामेसह अतुलनीय पराक्रम गाजवून भौमासुराचा वध केला. त्याचा पुत्र भगदत्त्त हा भयभीत होऊन भगवंतांना शरण आला त्याला त्यांनी अनुग्रहित केले आणि भौमासुराच्या तावडीतून त्या १६००० राजकन्यांची सुटका केली.


भगवान श्रीकृष्ण भौमासुराचा वध करून त्याच्या महालात प्रवेश करताक्षणीच त्या बंदिवान राजकन्यांना त्यांचे रूप आणि पराक्रम दिसला. त्या सगळ्या जणी श्रीकृष्णावर मोहीत झाल्यात आणि त्यांनी त्याला आपला पती मानले व मनोमन वरले. त्यामुळे त्या सगळ्यांशी भगवंतांनी विवाह केलेत. त्यांना भौमासुराच्या नरकातून मुक्त करून त्यांचा उद्धार केला. विवाह करून त्या सगळ्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण एकादशी शके १९४८ दिनांक  ९ / ८ / २०२६


९ ऑगस्ट २०२६ 


Saturday, August 8, 2026

विदर्भ, न्यूयॉर्क, मुंबई आणि पुणे

 मी बघितलेय की विदर्भाच्या बाहेर पायही न ठेवलेली मंडळीच पुण्याला नाके मुरडतात.

असे म्हणतात की न्युयाॅर्कमध्ये जेवढे सिसिलीयन आहेत तेवढे खुद्द रोममध्ये नाहीत.

मुंबईत जेवढे भोजपुरी आहेत तेवढे खुद्द पाटण्यात नाहीत.

आणि

पुण्यात जेवढे वैदर्भिय आहेत तेवढे तर नागपूर आणि अमरावती मिळूनही नाहीत.

उद्या वेगळा विदर्भ झालाच तर कोथरूडला त्या राज्याचा दूरस्थ जिल्हा म्हणून समाविष्ट करावे लागेल, आहात कुठं ?

मला माझ्या नागपूरइतकेच पुण्याचेही कौतुक वाटते. तिथल्या हवेतच काहीतरी वेगळेपणा आणि freshness आहे. पुलंनी कितीही म्हटलं की पुणेकर व्हायला तुम्हाला विशेष मेहेनत करावी लागेल पण माझा अनुभव असा आहे की पुण्यात गेल्यावर पुणे शहर एखाद्याला इतकं स्वतःत सामावून घेतं की ती व्यक्ति पुणेकरच होऊन जाते. 

फक्त हिंजवडी चा उच्चार "हिंजेवाडी" असा करू नये. एकवेळ तुम्ही "अहो, ती पानपतची लढाई म्हणतात ती पुण्यात कुठशी झाली हो ?" हा प्रमाद करू शकता पण "हिंजेवाडी" हा उल्लेख म्हणजे तुम्ही "गंगा किनारेवाले आणि ग्यानगंगा एक्सप्रेसने पुण्यात उतरलेले भैय्या" असेच पुणेकर मानतात आणि ते रास्तही आहे.

- जन्माने नागपूरकर, कर्मभूमीव्दारे मुंबईकर असलेले पण पुणेकरांच्या बुध्दीमत्तेविषयी, वेगळेपणाविषयी अपार आदर असलेले, रामशास्त्री किन्हीकर.

पुणेकरांवर लिहीलेले दोन लेख खालच्या इथे आणि इथे.

श्रीमदभागवत चिंतन - ३९ रुक्मिणीस्वयंवर

विदर्भ देशाचा राजा् भीष्मक याला पाच पुत्र आणि एक अत्यंत सुस्वरूप आणि सुशील कन्या होती. रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, रूक्मकेश आणि रूक्ममाली हे पुत्र आणि रूक्मिणी ही कन्या. त्यात थोरला पुत्र रूक्मी हा अत्यंत पराक्रमी होता आणि ज्येष्ठ युवराज म्हणून वडिलांसोबत राज्याचा कारभार तोच बघत असे.


रूक्मिणी विवाहायोग्य वयाची झाली तेव्हा तिच्यासाठी वरसंशोधन सुरू झाले. रूक्मिणीने नगरातील विद्वान जनांकडून द्वारकाधीश श्रीकृष्णांची ख्याती, त्यांचा अतुलनीय पराक्रम, त्यांचे विलोभनीय रूप यांचे वर्णन फ़ार पूर्वकाळापासून ऐकले होते आणि मनोमन असा निश्चय केला होता की मी विवाह करेन तर श्रीकृष्णांशीच. तिने मनोमन श्रीकृष्णांनाच वरले होते.


इकडे द्वारका नगरीत भगवंतांनी रूक्मिणीचे सौंदर्य, तिची शालीनता, विद्वत्ता यांची किर्ती ऐकली होती आणि साक्षात लक्ष्मीरूप असलेल्या रूक्मिणीशी विवाह करून तिला आपली पट्टराणी करण्याचा विचार त्यांच्या मनात घोळत होताच.


पण रूक्मिणीसाठी जेव्हा वरसंशोधन सुरू झाले तेव्हा तिच्या थोरल्या भावाच्या मनात तिच्यासाठी वर म्हणून त्याचा मित्र असलेल्या शिशुपालाचे नाव आले. शिशुपाल हा एक दुष्ट आणि क्रूर शासक होता. पण रूक्मीला त्याच्यासोबत असलेल्या मैत्रीपुढे त्याचे अवगुण फ़ारसे जाणवत नव्हते. वृद्ध पिता भीष्मक थकल्यामुळे रूक्मी हाच विदर्भ राज्याचा खरा शासक असल्याने त्याच्या मर्जीपुढे त्याच्या इतर भावांचे, रूक्मिणीचे किंवा खुद्द भीष्मक राजाचे काही चालेना. रूक्मीने विवाहाची तारीख निश्चित केली आणि शिशुपालाचे मित्र दंतवक्र, जरासंध इत्यादि राजे विदर्भ नगरीच्या राजधानीत कौंडिण्यपूरला येण्यास निघालेत.


रूक्मिणीला ही दुःखद वार्ता कळताच तिने एक युक्ती केली. तिने तिच्या विश्वासातल्या एका ब्राह्मण दूताला बोलावून त्याच्या हाती स्वतः लिहीलेले एक प्रेमपत्र दिले. आणि ते द्वारका नगरीत जाऊन श्रीकृष्णांना देण्यास सांगितले. त्या प्रेमपत्रात तिने श्रीकृष्णांच्या रूपाची, पराक्रमाची स्तुती केलेली होती आणि तिने त्यांनाच मनोमन वरल्याची ग्वाही दिली होती. तिच्या विवाहप्रसंगी तिथल्या परंपरेनुसार जेव्हा ती जगदंबेच्या दर्शनाला जाईल तेव्हा तिथून तिचे हरण करण्याची विनंती तिने श्रीकृष्णाला केलेली होती. शिशुपाल हा वर म्हणून तिला अजिबात पसंत नाही आणि भगवंतांनी येऊन तिचे हरण आणि पाणिग्रहण केले नाही तर ती आपले प्राण त्यागणार असल्याची खात्रीसुद्धा तिने त्या पत्रातून भगवंतांना दिलेली होती. 


श्रीमदभागवताच्या दशम स्कंधातल्या बावन्नाव्या अध्यायातील रूक्मिणीने श्रीकृष्णाला लिहीलेले हे पत्र विविध अंगांनी अभ्यासण्याजोगे आहे. या पत्रातील भाषासौंदर्य, व्याकरण आणि भावनांची नेमकी अभिव्यक्ती हे खरोखर एका अभ्यासाचा विषय आहेत. हे सुंदर पत्र वाचून भगवंतांनी आपला रथ सिद्ध केला आणि ते रूक्मिणीच्या हाकेला ओ देण्यासाठी द्वारकेवरून तातडीने निघालेत. भगवंत तातडीने विदर्भ देशाकडे निघालेत ही बातमी बलरामदादांना कळल्यावर ते सुद्धा आपली पुरेशी सेना घेऊन भगवंतांच्या मागेमागे द्वारकेवरून विदर्भाकडे निघालेत.



लग्नाच्या नियत दिवसाच्या आदल्याच दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि बलरामदादा कौंडिण्यपूरला आलेत. संपूर्ण नगरात लग्नाची घाई गडबड सुरू होती. शिशुपाल, जरासंध इत्यादि अनेक राजे आपल्या सैन्यासह त्या नगरीत येऊन लग्नसमारंभासाठी मुक्काम ठोकून होते. कौंडिण्यपूरच्या सगळ्या प्रजाजनांनी श्रीकृष्णांना बघितल्यावर त्या सगळ्यांनाच त्यांच्या सुंदर रूपाची, तेजाची आणि पराक्रमाची जणू भुरळच पडली आणि त्या सर्वांच्या लाडक्या राजकन्येसाठी, रूक्मिणीसाठी श्रीकृष्ण हाच योग्य वर आहे अशी त्यांच्या मनातून खात्री पटत चालली होती.


आपल्या पत्राचा आदर करून प्रत्यक्ष श्रीकृष्ण नगरीत आलेले आहेत हे ऐकून रूक्मिणी मनोमन आनंदली. तिने लग्नासाठीचा सगळा साजशृंगार अगदी मनापासून करायला सुरूवात केली. ठरल्या वेळेनुसार लग्नापूर्वी ती आपल्या अनेक सख्यांसह आणि सैनिकांच्या पहा-यात कुलदेवी जगदंबेचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेलेली असताना पूर्वसंकेताप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी तिचे हरण केले आणि तिला आपल्या रथावर घेऊन तो रथ भरधाव द्वारकेकडे सोडला. 



या प्रकारामुळे अपमानित होऊन शिशुपालादि राजांनी आपापल्या सैन्यासह श्रीकृष्णांचा पाठलाग सुरू केला. पण बलरामदादांनी त्यांच्या सैन्यासह त्या सर्वांचा प्रतिकार करून तो पाठलाग मध्येच थांबवला. बलरामदादांच्या सैन्याने तिथे असलेल्या सकल राजांच्या सैन्याचा पाडाव केला. हताश झालेला शिशुपाल, जरासंध आदि राजे माघारी परतले. पण रूक्मिणीचा सगळ्यात थोरला बंधू रूक्मी याने श्रीकृष्णांच्या रथाचा पाठलाग प्राणपणाने सुरूच ठेवला. श्रीकृष्णांनी आपला रथ थांबवून त्याच्याशी युद्ध केले. श्रीकृष्णांच्या अतुल पराक्रमापुढे रूक्मीचा पराक्रम अगदी थिटा पडला. तो मरणासन्न अवस्थेत असताना रूक्मिणीने आपल्या बंधूच्या प्राणासाठी श्रीक्रुष्णांसमोर पदर पसरला आणि तिच्या विनवणीवरून श्रीकृष्णांनी रूक्मीला सोडून दिले. निराश, हताश झालेला रूक्मी त्याच्या पूर्वप्रतिज्ञेनुसार पुन्हा कौंडिण्यपूरला कधीही आला नाही. नगराबाहेर भोजकट नावाचे एक नवे नगर वसवून तिथे तो राहू लागला.


रूक्मिणीला सोबत घेऊन भगवान श्रीकृष्ण द्वारका नगरीत आलेत. बलरामदादांनी द्वारकेत मोठा लग्नसमारंभ आयोजित केला होता. प्रत्यक्ष लक्ष्मीप्रमाणे सुंदर असलेल्या आणि आपल्या राजाला प्रिय असलेल्या द्वारकेच्या राणीला, रूक्मिणीला बघून द्वारकेतील सगळे प्रजाजन अगदी आनंदून गेलेत. श्रीकृष्णांचा पहिला विवाह अशा प्रकारे साजरा झाला. 


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण दशमी शके १९४८ दिनांक  ८ / ८ / २०२६


८ ऑगस्ट २०२६ 


Friday, August 7, 2026

मैत्रीदिनानिमित्त

आज काय तो जागतिक मैत्री दिवस का काय आहे म्हणे. गेल्या 15 वर्षांमध्ये याचं प्रस्थ वाढलय हे खरय़.


पूर्वी काय आणि आत्ता काय. मैत्री म्हणजे काय ? याची व्याख्या करणे कुणालाही जमले नाही. पुलंच्याच म्हणण्यानुसार "कुठल्या माणसाशी आपले ऋणानुबंध किती आणि कसे जुळावेत याला काही नियम नाही. काही माणसे वर्षानुवर्षे आपल्या संपर्कात असतात पण शिष्टाचाराची घडी मोडण्याइतकेही आपले संबंध त्यांच्याशी जुळत नाहीत. याउलट काही माणसे पहिल्या भेटीतच जन्मोजन्मांतरीची ओळख असल्यासारखी मनात बसून राहतात."


तसेच मैत्रीचे आहे. मैत्री ही नात्यांपलिकडे जाऊन जपली जाते. बहुतांशी वेळा नात्यांपेक्षा जास्त घट्ट जपली जाते. मैत्री कुणाशी व्हावी याचे नियम नाहीत त्यामुळे मैत्री ही नातेसंबंधांमध्येही होऊन जाते. पण मैत्रीचा विरह हा मैत्रीच्या मृत्यूपेक्षाही जास्त दुःखदायक, दाहक असतो. 


फ़ार वर्षांपूर्वी कराड रेल्वे स्टेशनवर मैत्रीचे पाहिलेले एक दृश्य आणि त्यानुषंगाने माझ्या मनात स्फ़ुरलेल्या या ओळींचे पुनः सादरीकरण या लेखातून झालेले आहे. तो लेख पुन्हा आपल्या अवलोकनार्थ.

Achievement Unlocked. 1000 Blog posts ब्लॉग पोस्टस चे सहस्रक

१७ वर्षे, ७ महिने आणि १० दिवसांपूर्वी, म्हणजे अचूकपणे ६४३२ दिवसांपूर्वी लिहायला सुरू केलेल्या ब्लॉगपोस्टसचे आज सहस्रक (१००० ब्लॉगपोस्टस) साजरे करताना मला विशेष आनंद होतो आहे. ब्लॉग लिहीताना सुरूवात केली तेव्हा आपल्या ब्लॉगला एकूण १००० वाचनसंख्या लाभली तरी खूप असे वाटत होते. पण लिहीत गेलो. विविध अनुभवांवर, माझ्या छंदांवर, मला दिसलेल्या, जाणवलेल्या जगावर लिहीत गेलो आणि तुम्ही सर्वांनी अगत्याने वाचन करून माझा हुरूप वाढवत नेला. आज ब्लॉगपोस्टसची एकूण वाचनसंख्या ५ लाखांवर गेली आहे त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचा अक्षरशः ऋणी आहे.



६४३२ दिवसांमध्ये १००० ब्लॉगपोस्टस. म्हणजे साधारण दर आठवड्याला १ या सरासरीने हे माझे लेखन झालेले आहे. सुरूवातीच्या काळात फ़ार लिखाण झाले नाही पण गेल्या ७ - ८ वर्षांमध्ये भरपूर आणि सातत्याने लिखाण झाले. त्यामुळेच आज सरासरी एका ब्लॉगला ५२० वाचनसंख्या लाभली. 


सातत्यपूर्ण लिखाणाचा आणखीही एक फ़ायदा. नुकताच ४ जून २०२६ रोजी माझ्या ब्लॉगने ४ लाखांची वाचनसंख्या गाठली होती. तेव्हा प्रत्येक ब्लॉगपोस्टला सरासरी ४२५ वाचनसंख्या लाभलेली होती. आणि गेल्या दोन महिन्यात ही सरासरी जवळपास शंभरने वाढली. सातत्यपूर्ण लिहीत गेलोत तर कुठल्याही समाजमाध्यमाचे अल्गोरिदम ते लिखाण अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवते आणि सरसरी वाचकसंख्या झरझर वाढते हे गृहीतक आता पक्के करायला हरकत नाही.


गेल्या दोन वर्षांमध्ये मला लिहीते करणा-या श्री तुषारजी जोशी यांचा मी शतशः ऋणी आहे. त्यांनी ’सुरपाखरू’ या आपल्या अभिनव उपक्रमाद्वारे माझ्यासारख्या ब-याच हंगामी आणि मूडी लेखकांना नियमितपणे लिखाणाची सवय लावली आणि त्यामुळेच हे टप्पे मी गाठू शकलो ही माझी प्रामाणिक भावना आहे.


असो. लवकरात लवकर आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे, आशिर्वादामुळे माझ्या ब्लॉग चे नवनवे टप्पे गाठले जावोत ही प्रार्थना करतो आणि विरमतो.


पुनश्च एकवार मनापासून धन्यवाद.


- कृतज्ञ असलेला प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


६४३२ दिवसांपूर्वी लिहीलेली पहिली ब्लॉगपोस्ट इथे.


श्रीमदभागवत चिंतन - ३८ जरासंधाचा पराभव आणि कालयवनाचा वध

भगवान श्रीकृष्णांनी कंसाचा वध केल्यानंतर कंसाच्या दोन्हीही पत्नी, अस्ति आणि प्राप्ती, सूडाने पेटून आपल्या पित्याकडे मगध राज्यात निघून गेल्यात. त्यांनी आपल्या पित्याला, जरासंधाला, श्रीकृष्णाचा प्रतिशोध घेण्याची विनंती केली. सूडाने पेटलेल्या जरासंधाने तेवीस अक्षोहिणी सेना गोळा केली आणि मथुरेवर तो चाल करून आला. मथुरेच्या बाहेर आलेली त्याची सेना म्हणजे एखाद्या समुद्राला उधाण आल्यासारखी मथुरेतल्या सगळ्यांना भासू लागली.


श्रीकृष्णांनी विचार केला. एकट्या जरासंधाला मारून टाकून काय फ़ायदा आहे. जगात इतरत्र सुद्ध आपल्या दैवी संस्कृतीचे शत्रू टपून बसलेले आहेत. त्या सगळ्यांनाच मला नष्ट करायचे आहे. त्या सगळ्यांना नष्ट करण्यासाठी त्यांचा शोध मला घ्यावा लागेल आणि त्यात माझी पुष्कळच शक्ती खर्च होईल. त्यापेक्षा जरासंधाच्या सैन्याचा नाश करावा आणि त्याला जिवंत सोडून द्यावा. म्हणजे सूडाने पेटलेला तो पुढच्या वेळी अधिकाधिक सैन्य गोळा करेल आणि पुन्हा युद्धासाठी माझ्यासमोर येईल. दरवेळी त्याचे सैन्य नष्ट करत गेलोत तर या भूमीवरील दुष्टांचा भार कमी होईल. जरासंध आपल्याला हा दुष्टांचा भार कमी करण्यासाठी दरवेळी मदतच करेल.


हा सुप्त हेतू मनात ठेऊन श्रीकृष्ण आणि बलरामांनी जरासंधाच्या सगळ्या सेनेचा नाश केला आणि विकल अवस्थेतल्या त्याला परत मगध देशात जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला. सूडाने पेटलेल्या जरासंधाने पुन्हा एकदा दुष्टांची सेना गोळा केली आणि पुन्हा मथुरेवर स्वारी केली. यावेळीही श्रीकृष्ण आणि बलरामांनी त्याची सगळी सेना नष्ट करून पृथ्वीवरील दुष्टांचा भार आणखी थोडा हलका केला आणि जरासंधाला अपमानित करून हाकलून दिले. असे सतरा वेळेला घडले.



अठराव्या वेळी जरासंध पुन्हा चाल करून येणार असल्याची वार्ता कळताच श्रीकृष्ण आणि बलराम युद्धाला तयार झाले तेव्हढ्य़ात कालयवन नावाचा म्लेंछ राक्षस आपल्या तीन कोटी सैन्यासह मथुरेला वेढा घालणार असल्याची वार्ता श्रीकृष्णाला कळली. एकाच वेळी जरासंध आणि कालयवन यांच्याशी लढण्यात आपली भरपूर शक्ती खर्च होईल आणि मथुरेची बरीच हानी होईल हे त्याने ओळखले. आणि पश्चिम समुद्रात एका तटबंदीच्या आत एक नवीन अभेद्य नगरी वसविण्य़ाचे ठरविले. त्या कार्यात श्रीकृष्णाला स्वर्गातल्या देवादिकांचे खूप सहाय्य झाले. समुद्राकाठी भगवंताची अप्रतिम सुंदर आणि नगररचनेचा अत्यद्भूत आविष्कार असलेली द्वारका नगरी उभी राहिली. आपल्या कुटुंबियांना आणि काही नगरवासियांना द्वारकेला वसवून भगवान श्रीकृष्ण कालयवनाच्या वेढ्यातून मथुरेतून मागील द्वाराने हातात शस्त्र न घेता बाहेर पडले. मथुरेतल्या प्रजाजनांसाठी त्यांनी मथुरेत बलरामदादांना त्यांच्या रक्षणासाठी ठेवले.


आपल्या वेढ्यातून श्रीकृष्ण बाहेर पडून पळताहेत म्हटल्यावर कालयवनाला फ़ार राग आला. त्याने श्रीकृष्णाचा पाठलाग सुरू केला. त्यांना असे पळून जाण्याबद्दल तो वेडेवाकडे बोलू लागला. पण भगवंतांनी त्याच्याशी वाद घालण्यात वेळ न घालवता त्याने दिलेली "रणछोड्" ही पदवी बिरूदासारखी मिरवली. पळता पळता श्रीकृष्ण एका गुहेत शिरले. त्या अत्यंत प्राचीन गुहेत एक व्यक्ती फ़ार तपांपासून निद्रा घेत होती. श्रीकृष्णांनी आपला शेला त्या व्यक्तीच्या अंगावर पांघरूण म्हणून घातला आणि स्वतः आणखी खोल गुहेत लपलेत.


श्रीकृष्णांचा पाठलाग करीत आलेला कालयवन सुद्धा त्या गुहेत शिरला आणि श्रीकृष्णांचा शेला पांघरून निजलेली ती व्यक्ती पाहताच तो श्रीकृष्णच असला पाहिजे असा निश्चय करू कालयवनाने त्या व्यक्तीवर लत्त्ताप्रहार केला आणि त्या व्यक्तीला तिच्या अनंत वर्षांच्या निद्रेतून उठविले.


त्या व्यक्तीने आपल्या अनंत वर्षांच्या निद्रेतून अकारण जागे करणा-या त्या कालयवनाकडे बघितले आणि तिच्या दृष्टीक्षेपानेच कालयवन भस्म होऊन गेला. ती व्यक्ती म्हणजे मुचकुंद राजा होते. देवांचे सेनापती म्हणून बरीच वर्षे दानवांशी युद्धे लढल्यानंतर जेव्हा कार्तिकेयस्वामी देवांचे सेनापती बनलेत तेव्हा सर्व देवगणांनी मुचकुंदाचे आभार मानलेत आणि त्यांना वर मागायला सांगितले. तेव्हा मुचकुंदाने बराच काळ युद्ध करून फ़ार थकल्यामुळे निवांत विश्रांतीसाठी वर मागितला आणि या निद्रेतून जो कुणी मला जागे करेल त्याला एका दृष्टीक्षेपातच त्वरित भस्म करण्याची सिद्धी मागितली. त्या युद्धानंतर मुचकुंद गहन निद्रेत असताना कालयवनाने त्यांना जागे केले आणि तो भस्म झाला.


मुचकुंदाने गुहेत लपलेल्या भगवान श्रीकृष्णांना पाहिले. त्यांच्य अदभूत रूप बघितल्यानंतर तो अचंभित झाला आणि त्याने भगवंतांना त्यांचा परिचय विचारला. भगवान श्रीकृष्णांनी त्याला आपला परिचय दिल्यानंतर त्याने भगवंतांची स्तुती केली आणि आपले पूर्वजन्मीचे कर्म आठवलेत. भगवान श्रीकृष्णांनी त्याला वारंवार वर मागण्यास सांगूनही त्याने फ़क्त भगवंतांच्या चरणांचा कायम आश्रय आपल्याला मिळावा हीच इच्छा त्यांच्यापुढे प्रगट केली. भगवंत त्याच्या ख-या भक्तीवर प्रसन्न झालेत आणि त्याला इच्छित वर त्यांनी दिला.



एकाचवेळी अनेक संकटे आलीत तर व्यापक प्रजाहिताचा विचार करून वरवर बघता माघार घेणे पण अंतिम विजयाचीच तयारी करणे हे या कथेतून भगवंतांनी आपल्याला शिकविले आहे. कालयवनाचा समोरासमोर कुणीही पराभव करू शकत नव्हते. त्याला युक्तीप्रयुक्तीने मारण्यासाठी स्वतः "रणछोड" हे लांछन सुद्धा भगवंतांनी बिरूदासारखे मिरविले. कालयवनासोबत वादविवाद घालत बसता, त्याला प्रत्युत्त्तरे देत न बसता बरोबर त्याचा वध केला आणि आपले कार्य साध्य केले. Goal Oriented Strategy म्हणजे आणखी काय असते ? हीच उदाहरणे, हाच आदर्श त्यानंतर ४५०० वर्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी आणि संताजी घोरपडे, धनाजी जाधवांसारख्या समस्त मराठी सेनानींनी बलाढ्य शत्रूशी लढताना गनिमी काव्याच्या रूपात वापरलेला आपल्याला आढळतो. म्हणूनच यासाठी आपले धर्मग्रंथ, आपली संस्कृती अभ्यासायचे असतात, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आजच्या काळात मी त्यांच्यापासून काय काय कालसुसंगत असे शिकू शकतो याचा विचार करायचा असतो.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण नवमी शके १९४८ दिनांक  ७ / ८ / २०२६


७ ऑगस्ट २०२६