भगवान श्रीकृष्ण आणि बलरामदादा हे गोपबालकांसह त्यांच्या गाई गुरांना चरण्यासाठी म्हणून वृंदावनालगतच्या रमणीय हिरवळींवर, उपवनांमध्ये घेऊन जात. वनात दररोज गोपबालकांसह अनेक खेळ होत असत. कुस्त्या होत असत. मोठाच आनंद असे.
वृंदावनाजवळच असलेल्या एका रमणीय वनामध्ये धेनुकासूर नावाचा एक राक्षस राहत असे. तो आणि त्याचे बांधव त्या वनातील मधूर आणि रसाळ फ़ळांचे स्वतःच सेवन करीत असत. त्या फ़ळांच्या वासाने आकर्षित होऊन ती फ़ळे घेण्यासाठी कुठलाही मनुष्य़प्राणी त्या वनात शिरला तर तो धेनुकासूर आणि त्याचे दुष्ट बांधव त्या माणसाला मारून टाकत असत. गोपांनी हे वृत्त कृष्ण आणि बलरामदादांना सांगितले आणि त्यांनी त्या धेनुकासुराचा वध करण्याचे निश्चित केले.
हे दोघेही बंधू त्या वनात शिरले. धेनुकासुराला हे कळताच तो गाढवाच्या रूपाने तिथे आला आणि आपल्या मागील पायांनी बलरामदादांवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न करू लागला. एक दोन वेळा त्याला चपळ हुलकावणी दिल्यानंतर बलरामदादांनी संधी पाहून त्या धेनुकासुराचे मागील दोन्ही पाय घट्ट पकडले आणि प्रचंड बळाने त्याला गरागरा फ़िरवून त्याच वनात फ़ेकून दिले. आपल्या अंगाखाली अनेक उंच उंच वृक्षांचा चुराडा करीत तो धेनुकासूर जमिनीवर पडून अखेरचे क्षण मोजू लागला. त्याची अशी अवस्था पाहून त्याचे इतर बंधू आणि मित्र त्याठिकाणी आलेत आणि कृष्ण बलरामांशी युद्ध करू लागलेत. पण कृष्ण आणि बलरामदादांनी त्या सगळ्यांचा वध केला आणि ते वन सर्वसामान्यांसाठी निर्भय केले. सार्वजनिक संपत्तीला खाजगी मालमत्ता समजून ती इतरांना वापरण्यास मज्जाव करणा-या धेनुकासूर प्रवृत्तीचा श्रीकृष्ण आणि बलरामांनी पाडाव केला.
वृंदावनाजवळून वाहणा-या यमुनेचे पाणी हळूहळू दुषित होत आहे याची जाणीव गोपबालकांना झाली. एकदा तर ते पाणी पिऊन काही गोपबालके मूर्छित पडली होती. भगवान श्रीक्रुष्णांच्या लक्षात यमुनेचे हे प्रदूषण आले. वृंदावनापासून जवळच असलेल्या एका डोहात कालिया नावाच्या अत्यंत विषारी सापाने आश्रय घेतला होता आणि त्याच्यामुळेच यमुनेचे पाणी वृंदावनाजवळ दुषित झाले होते.
भगवान श्रीकृष्णांनी निर्भयपणे त्या डोहात उडी टाकली आणि कालियाशी भयंकर युद्ध केले. युद्धात अतुलनीय पराक्रम गाजवून त्यांनी कालिया नागाला हैराण केले आणि सरतेशेवटी त्याच्या फ़ण्यांवर भगवान नृत्य करू लागलेत. आता कालिया मरणार हे जाणून कालियाच्या राण्यांनी भगवंतांची स्तुती केली, त्यांची क्षमा मागितली. भगवंतांनीही कालिया तिथे आला ही कथा जाणून घेऊन त्याला तिथून निघून रमणकद्वीपाजवळ गरूडापासून निर्भय असे स्थान दिले. भगवंतांना वंदन करून कालिया सुखाने आपल्या नव्या निवासस्थानी गेला.
आज आपल्या नद्यांमध्ये कालियापेक्षाही जहाल विषाचे प्रदूषण दररोज होते आहे. हे विषारी पाणी पिऊन अनेक जीव मृत्यूमुखी पडत आहेत किंवा विविध दुर्धर आजारांना सामोरे जात आहेत. सगळ्या क्षेत्रात इतकी प्रगती आपण केली आणि दूषित पाण्यावर प्रक्रिया करून त्याला पुन्हा पिण्यायोग्य बनविण्याची प्रगती आपण केली नाही असे म्हणणे म्हणजे आत्मवंचना ठरेल. आपण ती सुद्धा प्रगती केली आहे. सिंगापूर या देशाचे उदाहरण आपल्यासमोर आहे. वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा पिण्याजोगे करण्याइतपत त्यांनी सृष्टीची जपणूक केलेली आहे. आपल्याला आज गरज आहे ती प्रबळ इच्छाशक्तीची. नद्यांचे प्रदूषण शक्य तितके टाळण्याची आणि प्रदूषण झाले असेलच तर त्यावर योग्य त्या प्रक्रिया करून ते प्रदूषण हटवून नद्या पुन्हा निर्मळ करण्याची.
आपल्या लाडक्या सृष्टीला जिवापाड जपणा-या भगवंताचे आपण खरे भक्त असू तर ही सृष्टी विनाशाकडे वाटचाल करेल असे एकही पाऊल आपल्याकडून उचलले जायला नको आणि सृष्टीसंवर्धनासाठी आपले संपूर्ण प्रयत्न सतत व्हायला हवेत हाच या कथेचा बोध आणि हाच या कथेचा प्रसाद.
॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥
- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण द्वितीया शके १९४८ दिनांक ३१ / ७ / २०२६
३१ जुलै २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#जुलै२०२६


.jpg)