Monday, January 26, 2026

मराठी छापील मिडीया जात्यात मराठी इलेक्ट्रॉनिक मिडीया सुपात

माझ्या मागील एका लेखात मी माझ्या वृत्तपत्रीय जीवनाबद्दल लिहीलेले होते. मी दहाव्या, बाराव्या वर्गात असल्यापासूनच हे वृत्तपत्रीय लेखन करतो आहे. त्याबद्दलचा लेख इथे. हा लेख लिहूनसुद्धा आज तब्बल १० वर्षे झालीत. पण मधल्या काळाचे अवलोकन सूक्ष्म दृष्टीने केल्यास मलाच हा प्रश्न पडला की आजच्या युगात वृत्तपत्रे किंवा एकंदरच छापील मिडीया हा कालबाह्य झालाय का ? आणि याला जबाबदार घटक कोण कोण आहेत ?


आमचे घर वाचनवेडे. आमच्या वडिलांकडून आम्ही हा उदंड वाचनाचा वारसा घेतला. सकाळी सकाळी पहिल्या चहासोबत त्यांना वर्तमानपत्र वाचायला हवे असायचे. मग जो वृत्तपत्रविक्रेता सकाळी ६ ते ६.१५ च्या आसपास घरी वर्तमानपत्र आणून देईल त्याची निवड व्हायची. एखाद्या दिवशी त्याने थोडा जरी उशीर केला तरी त्याला आमच्या दादांची बोलणी ऐकून घ्यावी लागायची. माझे वडील वर्तमानपत्र संपूर्ण म्हणजे अगदी संपूर्ण वाचायचेत. आणि आम्हालाही त्यांनी तशा सवयी लावल्यात.


बरे घरी त्याकाळी रोजचा तरूण भारत तर यायचाच. सोबत दर रविवारी मुंबई रविवार सकाळ, लोकसत्ता, मटा वगैरे दैनिके सुद्धा यायचीत. अर्थात ही सगळी वृत्तपत्रे त्याकाळी फ़ार दर्जेदार लिखाण घेऊन यायचीत. अतिशय दर्जेदार साहित्यिक संपादकवर्ग या सर्व दैनिकांना लाभलेला होता. यामुळे आमचे वाचन समृद्ध होत गेले.


आम्ही यु पी एस सी चा अभ्यास करीत असताना नागपूरला बर्डीवर खुराणा बुक स्टॉलवरून दररोज संध्याकाळी जाऊन मुंबईवरून गीतांजली एक्सप्रेसने येणारा टाईम्स ऑफ़ इंडिया वाचनासाठी आणत असू. श्री खुराणाजी आम्हाला यु पी एस सी  सिव्हील सर्व्हिसेसचे अभ्यासक विद्यार्थी म्हणून ओळखत आणि आमच्यासाठी खास चेन्नईवरून द हिंदू हे वर्तमानपत्र मागवीत असत. जे एन यू छाप डाव्या विचारवंतांचा यु पी एस सी मध्ये इतका भरणा त्यावेळी होता की पटत नसून सुद्धा रोमिला थापर सारख्यांनी लिहीलेला अजिबात भारतीय नसलेला थापाडा इतिहास आम्हाला भारतीय इतिहास म्हणून अभ्यासावा लागे. द हिंदू या अतिशय हिंदूविरोधी वर्तमानपत्रातली विश्लेषणे टाचण करून ठेवावी लागत कारण यु पी एस सी पास व्हायचे असेल तर याच पद्धतीने व्हावे लागते हे आम्हाला माहिती होते. तिथे थोडेही आपले पांचजन्य चे ज्ञान पाजळले असते तर आम्हाला खड्यासारखे बाजूला केले गेले असते.


जी गत वर्तमानपत्रांची तीच मासिकांची. आमच्याकडे आमच्या बालपणापासून किशोर, अमृत, कुमार ही मासिके यायचीत. सोबतच लोकप्रभा सारखी साप्ताहिके सुद्धा यायचीत. चित्रलेखा आणि सकाळ साप्ताहिके सुद्धा आमच्याकडे दर शनिवारी आमचे दादा आणायचेत. या सर्व साप्ताहिकांचे, नियतकालिकांचे, वर्तमानपत्रांचे दिवाळी अंकही आमच्याकडे आवर्जून यायचेत. आम्हाला ह्या सर्व वाचनात एक विशिष्ट वाचनानंद मिळायचा. मन तृप्त व्हायचे, मेंदू तल्लख व्हायचा. त्याकाळी काही काही मासिके तर घरच्या कुठल्या तरी बजेटमध्ये काटछाट करून दादांना घरी आणावी लागायचीत. पण तरीही एक वाचनाचे समाधान होते.


पण एका विशिष्ट कालावधीनंतर हळूहळू ही वर्तमानपत्रे, नियतकालिके प्रचारकी थाटाची होत गेलीत. तोपर्यंत एलेक्ट्रॉनिक मिडीयाने सुद्धा आपला जम बसवला होता. बातम्या दिवसभर ताज्या आणि "सबसे तेज" कळू लागल्यात, बातम्यांसाठी वृत्तपत्रांची वाट बघणे संपले. तरीही वृत्तपत्रे आपला जम टिकवून होती कारण बातम्या जरी कळल्यात तरी त्यामागील संपादकीय दृष्टीकोन काय आहे ? हे वाचण्याची उत्सुकता असायची. नागपूर तरूण भारत ने आपला हा वाचकवर्ग आजही टिकून ठेवलाय त्याचे एकमात्र कारण हेच आहे. एखाद्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घटनेची फ़ोड कशी करायची याबाबत संपादकीय विद्वत्तेची लोकांना गरज असायची. पण २०१२ च्या आसपास फ़ेसबुक , व्हॉटस ॲप, यू ट्यूब वगैरे समाज माध्यमे वाढलीत आणि त्यावर ही विश्लेषणे अनेक दृष्टीकोनातून प्रसिद्ध होऊ लागलीत. त्यामुळे संपादकीय प्रचारकीपणा, पेड न्यूज वगैरे प्रकार जनतेच्या ध्यानात येऊ लागलेत आणि छापील माध्यमांची विश्वासार्हता धोक्यात येऊ लागली. संपादकीय मतांमागची पक्षीय लबाडी लोकांच्या ध्यानात चटकन येऊ लागली. आज सर्वच वर्तमानपत्रांचा खप कमालीचा खालावलाय. वर्षभर अगदी रद्दीच्या किंमतीत देऊन, सोबत विविध गृहपयोगी वस्तू देऊनही हा खप फ़ारसा वाढत का नाही ? याचे आत्मचिंतन जर या मराठी वृत्तपत्रांनी आणि एकंदरच छापील माध्यमांनी केले तर त्यांना आपली चूक लक्षात येईल पण आता वेळ निघून गेलेली आहे. खूप उशीर झालेला आहे.


२०१९ च्या निवडणुकांनंतच्या प्रचारकी थाटानंतर मराठी इलेक्ट्रॉनिक मिडीयाची लबाडी सुद्धा लोकांच्या लक्षात येऊ लागली. बातम्या आणि त्यांचे विश्लेषण लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या नावाखाली सर्व मराठी इलेक्ट्रॉनिक मेडीया त्यांचा आपला आपला एक नॅरेटिव्ह आपल्या मनात पसरवतोय हे लोकांना हळूहळू कळायला लागले. त्यासाठी हा मराठी इलेक्ट्रॉनिक मेडीया स्वतः मात्र भरभक्कम पैसे घेतोय हे ही लोकांना कळू लागलेय. बरोबर आहे हो. "ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी" हे त्यांना अगदी बालपणापासून माहिती आहे ना. पण या सगळ्या उपदव्यापात,आपण अव्यापारेषू व्यापार करून ज्या फ़ांदीवर बसलोय तीच तोडतोय हे त्यांच्या ध्यानात आलेच नाही.


काल मराठी छापील मिडीया सुपात होता आज जात्यात आहे पण आजचा मराठी इलेक्ट्रॉनिक मिडीया सुपात आहे हे त्यांच्या अजूनही लक्षात आलेले नाही. आपले निरपेक्षत्व जपले पाहिजे, आपण हा लोकशाहीचे पाचवे स्तंभ आहोत आपण लोकांच्या न्याय्य हक्कांचे रक्षण केले पाहिजे, नुसते ब्रेकिंग न्यूजच्या मागे लागून स्वतःचा नाश करून घेऊ नये हे कळायला या इलेक्ट्रॉनिक मिडीयाची सदसदविवेकबुद्धी तर जागृत हवी ना ? मराठी छापील मिडीया जात्यातून सुपात जायला आणि कालबाह्य व्हायला जवळपास तीस वर्षे लागलीत. मराठी इलेक्ट्रॉनिक मिडीया तर पुढल्या पाचच वर्षात असा जात्यातून सुपात जाईल आणि भरडला जाऊन निःशेष होईल अशी माझी खात्री आहे. 


- मराठी छापील मिडीया आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा परखड विश्लेषक आणि एकेकाळी मास कम्युनिकेशनला प्रवेश घेऊन पत्रकारिता करण्याचे निश्चित केलेला एक होता होता राहिलेला पत्रकार, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


२४ जानेवारी २०२६


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६



Saturday, January 24, 2026

दक्षिण दिग्विजय : ५ सुचिंद्रम आणि मेणपुतळ्यांचे संग्रहालय

 यापूर्वीचे भाग इथे  वाचा

दक्षिण दिग्विजय : भाग १ नागपूर ते चेन्नई

दक्षिण दिग्विजय : २ (चेन्नई ते मदुराई)

दक्षिण दिग्विजय : ३ (मदुराई - रामेश्वरम - मदुराई - कन्याकुमारी.)

रेल्वेच्या एका दुर्मिळ वर्गातून प्रवास.

दक्षिण दिग्विजय : ४ कन्याकुमारी - सूर्योदय


२ / १२ / २००८

ठरविल्याप्रमाणे ते टॅक्सीवाले बंधू सकाळी ८ च्या सुमारास आमच्या हॉटेलसमोर आलेत. मस्त प्रशस्त ॲंबेसेडर टॅक्सीत बसून आमचे कन्याकुमारी दर्शन सुरू झाले. ते बंधू आम्हाला कन्याकुमारीपासून जवळपास १५ किलोमीटर असलेल्या सुचिंद्रम मंदिरात घेऊन गेलेत. दक्षिण भारतातल्या अनेक सुंदर मंदिरांसारखे एक सुंदर, स्वच्छ आणि नेटके मंदिर. मंदिरालगत मोठी पुष्करिणी होती. हनुमंताने लंका जाळून परत भारतभूमीकडे उड्डाण केल्यानंतर आपले जळालेले पुच्छ याच पुष्करिणीत विझवले अशी येथे मान्यता आहे. ज्या ठिकाणी आपण पर्यटनाला जातो तेथील मान्यता समजून घेण्यात, मान्य करण्यात शहाणपणा असतो असे मी कायम मानत आलेलो आहे. त्यामुळे हंपीत गेल्यावर हनुमंताचे जन्मगाव तिथल्याच एखाद्या पर्वतरांगांवर आहे आणि नाशिकजवळील अंजनेरी पर्वतावर पण हनुमंताचे जन्मस्थान आहे या दोन्हीही समजूती मला मान्य असतात. नक्की ठिकाण कुठले ? याच्या वादात पडून आपली प्रखर मते मांडण्यापेक्षा श्रीरामकथेने भारतवर्ष अगदी अयोध्येपासून रामटेक - नाशिक - किष्कींधा (हंपी) - सुचिंद्रम - श्रीलंका कसे बांधले गेलेले आहे, कसे भारले गेलेले आहे हे अनुभवण्यात मला धन्यता असते. या मंदिरात हनुमंताचा विशालकाय असा विग्रह आहे आणि तिथे त्याच्या पुच्छाला भाविकांकडून ज्वलनदाह शांत करण्यासाठी लोणी लावले जात असते. अर्थात तिथे प्रकाशचित्र काढण्यास मनाई असल्याने आम्ही मंदिराच्या आत प्रकाशचित्र काढू शकलो नाही पण तो विशालकाय विग्रह आणि भाविकांचे पाच हजार वर्षांपासूनचे आपल्या भगवंतावरचे प्रेम यापुढे आम्ही नतमस्तक मात्र नक्कीच झालोच.




सुचिंद्रम मंदिराबाहेर दक्षिणेतील इतर सर्व मंदिरांबाहेर असतात तशी हार फ़ुले गज-याची रेलचेल होती. स्वपत्नीसाठी गजरा घेणे झाले. लग्नाचा वाढदिवस होता. मग कन्यारत्नानेही गज-यासाठी हट्ट धरला. तिचाही हट्ट पुरवला गेला. भारतभर आणखी एक साम्य. सर्वत्रच छोट्या छोट्या मुली आपल्या केसांपेक्षा मोठा गजरा माळून त्याला आपल्या केसांपेक्षा चेहे-यावर मिरवण्यात धन्यता मानतात. अगदी बंगाल पासून गुजरात पर्यंत आणि काश्मिर पर्यंत अगदी एकच पॅटर्न. आमचे कन्यारत्न याला अपवाद नव्हते.



बरे ज्या सुचिंद्रम मंदिरात गेलो हे हनुमंताचे मंदिर नाहीच मुळी. ते आहे भगवान शंकराचे मंदिर. भगवान शंकर वर म्हणून प्राप्त व्हावेत हा हट्ट धरून भारताच्या दक्षिण टोकाला तप करीत बसलेली कन्याकुमारी. तिच्या प्रेमासाठी, तिच्यासह विवाहासाठी भगवान शंकर थेट कैलासावरून निघालेत आणि इतक्या जवळ येऊन कुठल्यातरी भक्ताच्या हाकेत, भाकेत गुंतल्यामुळे इथेच स्थायिक झालेत. कन्याकुमारीपर्यंत पोहोचलेच नाहीत. "So near yet so far" अशी अवस्था. ती आजही भारताच्या दक्षिण टोकाला त्यांच्याशी लग्न होईल याची वाट बघत कुमारी आहे. आणि हे सुचिंद्रम भक्तकामकल्पद्रुम बनून इथे आपल्या भक्तांच्या मनोकामना पुरवताहेत. किती रोमॅंटिक कल्पना ! "स्वप्नातल्या कळ्यांनो. उमलू नकाच केव्हा" ह्यातल्या रोमॅंटिसिझम ज्याला कळला त्यालाच हा सुचिंद्रम आणि कन्याकुमारीमधले फ़क्त १५ किलोमीटर अंतरावरचे अपु्रे अव्यक्त प्रेम यातला रोमॅंटिसिझम कळेल.



मनसोक्त दर्शन झाले. भारावलेल्या मनःस्थितीतच आम्ही बाहेर पडलोत. मध्ये एका "सर्वाणा भवन" मध्ये जेवण झाले. अर्थातच दक्षिणी पद्धतीचे, शुद्ध शाकाहारी. जिथे जावे तिथले तिथले स्थानिक पदार्थ खाऊन बघावेत. उगाच दक्षिण भारताच्या प्रवासाला जायचे आणि तिथे आपल्यासारखे पोळ्या आणि पिठले मिळाले नाही म्हणून परतल्यावर मित्र आणि नातेवाईकांमध्ये गळे काढायचे हे मला मान्य नाही. म्हणून "आम्ही काश्मीरला डाल लेकमध्ये पुरणपोळीचे जेवण आमच्या पर्यटकांना दिले" आणि "अहो, कन्याकुमारीला आमच्या पर्यटकांचा श्रीखंड पुरीचा बेत रंगला" अशा जाहिराती करणा-या पर्यटन संस्थेशी आमचे गोत्र जुळतच नाही. अरे लेको. श्रीखंड पुरी, पुरणपोळीच खायची असेल तर ती आपल्या घरीच खा ना. तिरूवनंतपुरमला जाऊन तिथले नारळाच्या तेलातले मलबारी पराठे आणि अमृतसरला जाऊन तिथले सुद्ध देसी घी मधले थबथबलेले अमृतसरी प्राठे खाल्लेच नाहीत तर तो तो प्रांत तुम्ही काय अनुभवला ! एखादा पदार्थ आपल्या सवयीचा नसेल पण तो तिथल्या तिथल्या हवा पाण्यासाठी उत्तम आणि उत्कृष्ट असतो. हे असे पदार्थ तिथल्या तिथल्या वातावरणात खाऊन बघितलेत तर प्रवास संपल्यानंतर पोट बिघडून आजारी पडण्याची वेळ येत नाही.


कन्याकुमारी देवीचे दर्शन आणि स्वामी विवेकानंद स्मारक शिळेवर नावेने जाऊन दर्शन हे आमच्या उद्याच्या कार्यक्रमात होते. आज ते बंधू आम्हाला तिथल्या मेणपुतळ्यांच्या संग्रहालयात घेऊन गेलेत. कन्याकुमारीत अरबी समुद्र किना-यावर पश्चिमेला असलेले हे ठिकाण (तेव्हा तरी) फ़ारसे प्रसिद्ध नव्हते. गर्दी अजिबात नव्हती. पुतळ्यांचा दर्जा आणि स्वरूपता अगदी वाखाणण्याजोगी होती. आम्ही तिथे भरपूर प्रकाशचित्रे घेतलीत. काही छान काही थोडी आगाऊसुद्धा. मजा मजा करायची हे धोरण होतेच.









सकाळी आम्ही आमच्या हॉटेलच्या खोलीतून बंगालच्या उपसागरावरून होणारा अविस्मरणीय सूर्योदय बघितला होता. संध्याकाळी तोच सूर्य अरबी समुद्रात बुडताना बघण्यासाठी आम्ही पश्चिम किना-यावर गेलोत. एकाच गावात एका समुद्रातून सूर्योदय आणि दुस-या समुद्रात सूर्यास्त बघायला मिळणे हे अगदी दुर्मिळ असते. ती दूर्मिळ पर्वणी आम्ही साधली.








आजचा दिवस अगदी अविस्मरणीय. ज्या आपल्या कुटुंबियांना आनंदी ठेवण्यासाठी मनुष्य आयुष्यभर झटत असतो, त्यांच्या चेहे-यावरचा आनंद बघणे ही एखाद्या गृहस्थासाठी सर्वोच्च समाधानाची परमावधी असते. तो आनंद, ते समाधान कुठेही विकत घेता येऊ शकत नाही आणि कितीही पैशांच्या राशी ओतल्यात ते विकत मिळत नाही. 





- सर्वोच्च समाधानी गृहस्थ, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


२३ जानेवारी २०२६ 


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६


Friday, January 23, 2026

दक्षिण दिग्विजय : ४ कन्याकुमारी - सूर्योदय

 यापूर्वीचे भाग इथे  वाचा.

दक्षिण दिग्विजय : भाग १ नागपूर ते चेन्नई

दक्षिण दिग्विजय : २ (चेन्नई ते मदुराई)




२ डिसेंबर २००८


पहाटे ४ : ३० ला म्हणजे नियोजित वेळेआधी तब्बल १ तास आम्ही कन्याकुमारीजवळील नागरकोईल नावाच्या स्टेशनवर सहकुटुंब उतरलो. नियोजन केल्याप्रमाणे रेल्वेच्या प्रथम वर्गात निवांत झोप झालेली होती आणि पॅसेंजर गाडीचा प्रथम वर्ग असल्याने खिशाला भुर्दंड पण फ़ारसा बसलेला नव्हता. अनोळखी प्रदेश, अनोळखी गाव. हिवाळा ऋतू त्यामुळे सूर्यदर्शन अंमळ उशीरा होणार त्यामुळे इथून आता कन्याकुमारी कसे गाठायचे ? हा एक प्रश्न होता.


आम्हाला इथपर्यंत आणणारी गाडी आता दिशा बदलून क्विलोन च्या दिशेने रवाना झालेली होती. आमच्यासोबत ७ वर्षाची आमची लेक आता पेंगुळत होती. मी स्टेशनच्या बाहेर गेलो आणि एक भला टॅक्सीवाला मला भेटला. त्याने नागरकोईल स्टेशन ते कन्याकुमारी आम्हाला नेण्याचे कबूल केले. भाडेही अगदी वाजवी घेत होता. आम्ही त्याच्या टॅक्सीने जाण्याचा निर्णय घेतला.


पहाटेच्या सुखद गारव्यात आमची टॅक्सी नागरकोईल ते कन्याकुमारी हा प्रवास करायला लागलोत. मस्त आणि प्रशस्त ॲंबेसेडर टॅक्सी होती. या गाडीत फ़ार बालपणी आम्ही आमच्या आजोळी भरपूर प्रवास केलेला होता पण जाणते झाल्यावर आणि गाड्यांमधली लेगरूम, हेडरूम, सस्पेन्शन्स या संज्ञा कळायला लागल्यानंतरचा हा पहिलाच प्रवास. अगदी राजेशाही थाटाने प्रवास करतोय हे जाणवत होते.


डिसेंबर महिना असूनही हा परिसर समुद्राला जवळ असल्याने गारठा नव्हता. सुखद, गुलाबी थंडी मात्र होती. साधारण अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आम्ही कन्याकुमारी शहरात दाखल झालो. गाडीनेच आम्ही थोडी हॉटेल्स शोधलीत आणि त्यातल्याच एका ठिकाणी ठिय्या ठोकण्याचा निर्णय घेतला. त्या टॅक्सीवाल्यालाच दिवसभरच्या कन्याकुमारी दर्शनसाठी विचारले तो सुद्धा अगदी रास्त भावात आम्हाला कन्याकुमारी दाखविण्यासाठी तयार झाला.


हॉटेलमध्ये जाऊन थोडी विश्रांती घेतली. आमचे कन्यारत्न तर पेंगुळले होतेच पण आम्ही दोघांनीही आमच्या हॉटेलरूमच्या समुद्राकडल्या खिडकीतून त्या दिवशीचा सूर्योदय बघितला. अगदी मंत्रमुग्ध होऊन आम्ही दोघेही ते दृश्य बघत होतो. "डोळ्यांचे पारणे फ़िटणे" या वाक्प्रचाराची अनुभूती येण्याचा तो क्षण. कॅमे-यानेही तो क्षण टिपला पण डोळ्यांनी जे बघितले त्याची अनुभूती कॅमे-याला कशी येणार ? काही मिनीटे निःशब्द होऊन, हातात हात गुंफ़ून आम्ही तो क्षण बघत होतो. आज आमच्या लग्नाचा ८ वा वाढदिवस होता. तो दिवस अशा एका अदभूत क्षणाने सुरू होऊन साजरा होणार होता याची कल्पना आम्हा दोघांनाही नव्हती.






- स्वपत्नीत, तिच्या आनंदात, तिच्या सुखदुःखात फ़ार म्हणजे फ़ारच गुंतलेला वैभवीरमणा गोविंदा, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


२२ जानेवारी २०२६

 

#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६


Wednesday, January 21, 2026

भाषाशुद्धी : एक विचार

 पु.लं. नी लिहीलय की, " "नव्हत" जर शुद्ध,  तर "व्हत" अशुद्ध कसे ?" 


तसाच अनुभव आज मला आला. मी संगणकावर मराठी वापरताना "बरहा" वापरून टाईप करतो. यात "देईल" टाईप करताना जर दे आणि ईल या दोन शब्दांमध्ये स्पेस बार न दाबता सलग टाईप केले तर "दील" असच टाईप होत. तशीच बाब येईल ची. त्याचे "यील" असे टाईप होते. उच्चाराप्रमाणे (फ़ोनेटीक पद्धतीप्रमाणे) "दील", "यील" हेच शब्द शुद्ध ठरलेत की नाही मग. तसेच "होऊ"हा शब्द सलग टाईप करताना "हू"असेच टाईप होते. मग "हुशील" हेच शुद्ध झाले की नाही ? "होशील" हे शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे शुद्ध असेलही पण मौखिक ज्ञानग्रहणची आपली प्राचीन परंपरा खरी मानली तर "हुशील" हे सुद्धा अशुद्ध नाही हे आपल्या लक्षात येईल. 


मग तसा निष्कर्ष काढला तर आपल्या ग्रामीण भागात राहणारे आपले बांधवच खरी भाषा बोलताहेत की. आपण ग्रामीण भागातल्या कुणी असे बोलले तर ते अशुद्ध म्हणून धरतो. पण कदाचित पारंपारिकतेने चालत आलेल्या मौखिक ज्ञानग्रहण परंपरेत त्यांच्या कानांवर पडणा-या भाषेचे ग्रहण त्यांनी अशाच प्रकारे केले असेल आणि भाषा ते अशीच शिकली असतील तर ती अशुध्द आहे हे म्हणण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला ?

 

मला तरी वाटते की आपण उगाचच शुध्दलेखनाने कृत्रिम रिफाईंड केलेली भाषा वापरतोय. खरी शुध्द भाषा हीच मंडळी वापरताहेत. त्यांची हेटाळणी उपयोगाची नाही. "दील, यील " सारख्या अनेक शब्दांचे एक प्रकारचे कृत्रिम रूपांतरण "देईल, येईल" असे नंतरच्या काळात मराठीत झाले असण्याची शक्यता आहे.


सांगोला येथील आमच्या मुक्कामी अशीच गोड भाषा कानांवर पडायची. मला आठवते कराड अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असताना माझे काही सोलापूर जिल्ह्यातले मित्र अशी हेल काढून भाषा बोलायचेत. "ए..... किन्हीक....र. ये की लेका. ये ना बे कडू." तेव्हा तरूण वयात त्यांचा तो हेल आणि ती लकब मला थोडी अपमानास्पद वाटायची. आपण कुठलीही एखादी नवीन गोष्ट त्यांच्या ग्रूपमध्ये मांडायला सुरूवात केली की त्यांची पहिली प्रतिक्रिया असायची. "खरं...?" ह्याचा पण मला तेव्हा फ़ार राग यायचा. "अरे, खरं नाही तर खोटं सांगतोय का मी ?" अशी स्वाभाविक प्रतिक्रिया मनात उमटायची. जशी महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातल्या एका प्रहसनात अरूण कदमांनी "अच्च लिहीलय ?" असे विचारल्याबरोबर पृथ्वीक प्रताप भडकतात तसे मला माझ्या त्या मित्रांवर भडकावेसेही वाटायचे. अर्थात सार्वजनिक जीवनात, उपक्रमात आपण काम करीत असताना आपल्या भावभावना थोड्या नियंत्रणात ठेवाव्या लागतात. माणसे जोडायची असली तर ब-याचदा आपल्या मनाला, मतांना मुरड घालावी लागते हे तत्व मला माहिती होते म्हणून ही मनातली नाराजी मी चेहे-यावर किंवा वर्तनात दिसू देत नसे पण माझ्या मित्रांचा तो हेल खटकायचा हे नक्की.


पण सोलापूर जिल्ह्यात नोकरीला गेलो. तोपर्यंत फ़ार जास्त काळ इतर जगाचा भलाबुरा अनुभव येऊन गेलेला होता त्यामुळे यावेळी त्या हेलामागची, त्या लकबीमागची त्या भागातल्या भाषेची आत्मीयता कळली आणि तो हेल चक्क आवडायला लागला. मनातल्या मनात मी महाविद्यालयात शिकत असताना ज्या ज्या मित्रांचा मला त्या भाषेबद्दल राग आला होता त्या सर्वांची मी मनातल्या मनात माफ़ीही मागून घेतली. यावेळी मुलीच्या मैत्रिणींकडून आणखी एक हेल कळला. ती तिच्या छोट्या मैत्रिणींना काही काही शहरी गोष्टी सांगायला जायची. तोपर्यंत शहरी जीवनाशी फ़ारसा संबंध नसलेल्या आणि सोलापूर म्हणजेच एक मोठ्ठे शहर असे जग बघितलेल्या तिच्या छोट्या मैत्रिणी तिच्या वर्णनाची थोडी अविश्वासात्मक संभावना "हुई, हुई, असं कुटं असतय व्हई ?" अशी करायच्यात. सुरूवातीला माझ्या लेकीला त्या तिच्या मैत्रिणी काय बोलतायत हे कळतच नसे. मग मी तिला त्या बोलीभाषेतल्या खाचाखोचा समजावून सांगायला लागलो आणि तिला त्यांच्यातला तिच्या कथनावरचा अविश्वास कळल्यानंतर, मी माझ्या महाविद्यालयीन जीवनात या बोलीभाषेविषयी जो गैरसमज करून घेतला होता तो तिचा होऊ नये म्हणून तिचे समुपदेशन करायला लागलो.


मला वाटते आज मराठी भाषा टिकून आहे ती महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात बोलल्या जाणा-या असंख्य बोलीभाषांमुळे. शहरी भागात आपण मराठीवर इंग्रजीचे आणि हिंदीचे इतके अतिक्रमण करून घेतले आहे की आपली मराठी शुद्ध आणि प्रमाणभाषा आहे हे आपण म्हणूच शकत नाही. याचे अत्यंत चपलख उदाहरण म्हणजे आपण जेव्हा गॅसचा नंबर लावतो तेव्हा आपल्या गॅसचा नंबर लागलाय हे सांगताना ती फ़ोनवरची बाई / मुलगी आपल्या गॅसचा नंबर जो सांगते त्याला मराठी किंवा इंग्रजी अशा कुठल्याही भाषेत बसवता येत नाही. "सहा - टू - एक - पाच - फ़ोर - शून्य" असे दरवेळी ऐकायला मिळते. गेली ५ - ६ वर्षे हा प्रकार सुरू असूनही त्याबद्दल अजूनपर्यंत राज ठाकरेंकडे कुणी तक्रार कशी केली नाही याचेच मला आश्चर्य वाटते.


असो. तर आपण महाराष्ट्रात फ़िरत असताना तिथल्या तिथल्या बोलीभाषा समजून घेऊयात, त्यांच्यातला गोडवा आस्वादूयात आणि आपली मराठी अनेक शतके टिकवल्याबद्दल त्या सर्व बांधवांचे मनापासून आभार मानूयात. दुस्वास, दुराभिमान वगैरे गोष्टी जरा दूरच ठेवूयात. काय म्हणताय मग ?


- गडचिरोली पासून थेट कसालपर्यंत आणि अक्कलकुव्यापासून थेट मांजरसुंब्यापर्यंत सगळा महाराष्ट्र डोळसपणे फ़िरलेला आणि तिथल्या तिथल्या बोलीभाषा ऐकून त्या समजून घेण्याचा प्रयत्न करणारा, त्या भाषांवर प्रेम करणारा आपला एक छोटा भाषाशास्त्रज्ञ रामशास्त्री.


२१ जानेवारी २०२६ 

 

#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६


Tuesday, January 20, 2026

मेथड इन मॅडनेस

जानेवारी १९९०, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड येथील आमचे दुसरे सत्र नुकतेच सुरू झालेले होते. पहिल्या सत्राचा नुकताच निकाल लागलेला होता. मी अनपेक्षितपणे चांगले गुण मिळवून पास झालेलो होतो. त्याबद्दलची गंमतजंमत इथे. जानेवारीत आमच्या महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे वारे वाहायला सुरूवात झाली होती. त्यानिमित्त विविध स्पर्धा, खेळ यांचा महाविद्यालयात मस्त माहौल तयार झाला होता.


आमच्याच वर्गात मेकॅनिकल अभियांत्रिकीत नागपूरचाच शशांक चिंचोळकर म्हणून एक मुलगा होता. अतिशय हुशार, कराडच्या आमच्या हॉस्टेलच्या भाषेत "एकदम तोडू" मुलगा. त्याने पहिल्याच सत्राच्या परिक्षेत विद्यापीठात पहिल्या तिघांत येऊन आपल्या हुशारीची चुणूक दाखविलेली होती. अर्थात महाविद्यालयातली त्यानंतरची सगळी सत्रे शशांक कायम पहिल्या तीन मध्ये असायचा. त्याच्याकडे बघितल्यानंतर अभ्यास करणे ही जगातली सगळ्यात सोपी गोष्ट वाटत असे. महाविद्यालयाच्या दुस-या आणि तिस-या वर्षाला असताना आम्ही दोघे रूम पार्टनर्स होतो याचा मला आजही अगदी अभिमान वाटतो. 


पण प्रथम वर्षाला असताना आम्हा दोघांची केवळ थोडीशीच ओळख होती. फ़ार घसट अशी नव्हती. त्यावर्षी आमच्या फ़्रेशर्स पार्टीला मी नकला, गाणी असे विविध गुणदर्शन केलेले असल्याने मी त्याला माहिती असणार असे मला वाटते. आमच्या महाविद्यालयात स्नेहसंमेलनानिमित्त प्रश्नमंजुषेची (क्विझची) घोषणा झाली आणि त्यातल्या चमूत भाग घेण्यासाठी शशांकने मला विचारले. दोन जणांची चमू असणार होती. मला त्याने त्याच्या सोबत चमूत भाग घेणार का ? असे विचारल्यानंतर मला थोडे आश्चर्यच वाटले. त्यापूर्वी जरी अशा प्रश्नमंजुषांचे अनेक कार्यक्रम मी दूरदर्शनवर बघितलेले असले तरी अशा प्रश्नमंजुषेत स्पर्धक म्हणून मी पहिल्यांदाच उतरणार होतो. मी अगदी आनंदाने होकार दिला.


प्रश्नमंजुषा चांगलीच दर्जेदार होती. आमच्या महाविद्यालयाचा प्रश्नमंजुषाकार (क्वीझ मास्टर) संकेत आंबेरकर म्हणून आमचा सिनीयर होता. तो अगदी व्यावसायिक पद्धतीने प्रश्नमंजुषेचे संचालन करायचा. पहिल्याच राऊंडमध्ये शशांक चिंचोळकर आणि राम किन्हीकर या जोडीची एकदम हवा झाली. इतर स्पर्धकांपेक्षा खूप मोठ्ठ्याफ़रकाने आम्ही तो राऊंड जिंकलो. शशांक म्हणजे चालताबोलता ज्ञानकोश होता. जगभरातल्या देशांच्या राजधान्या, त्यांच्या भाषा, चलन, भारतातल्या राज्यांच्या राजधान्या, महत्वाच्या नद्या, त्यांची लांबीरूंदी, लोकसंख्येचे प्रमाण वगैरे गोष्टी त्याला अगदी तोंडपाठ होत्या. दरवर्षी प्रसिद्ध होणारे मनोरमा इयर बुक तो पहिल्याच दिवशी विकत घ्यायचा आणि ते त्याला जवळपास तोंडपाठ असायचे. त्यामुळे प्रश्नमंजुषेची पहिली फ़ेरी आम्ही अगदी आरामात जिंकल्यावर आमच्याविषयी इतर फ़ेरींमधून पुढल्या फ़ेरीत आलेल्या स्पर्धाकांच्या चमूंमध्ये आदरयुक्त भिती पसरली असल्याचे वर्तमान आम्हाला आमच्या हॉस्टेलला कळले होते.


दुस-या फ़ेरीतही आम्ही इतर स्पर्धक चमूंना अत्यंत मोठ्या फ़रकाने हरविल्यानंतर आम्ही अंतिम फ़ेरीत प्रवेश केला. अंतिम फ़ेरी आमच्या स्नेहसंमेलनाच्याच पहिल्या दिवशी अगदी महाविद्यालयाच्या स्टेजवर होणार होती. खूप झगमगाटात आणि जवळजवळ आमच्या सगळ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या, प्राचार्यांच्या उपस्थितीत. त्यामुळे त्याविषयी आम्हाला पण खूप उत्सुकता होती. आम्ही आमची तयारी वाढविली.


स्नेहसंमेलनाचा दिवस उजाडला. सुंदर स्टेजवर चार चमू हजर झाल्यात. सुटाबुटातला क्वीझ मास्टर संकेत आंबेरकर मोठ्या झोकात संचलन करायला लागला. स्टेजच्या समोरचे आमच्या महाविद्यालयाचे पटांगण तुडुंब भरलेले होते. आता आमच्या स्पर्धकांमध्ये होते ते म्हणजे आमच्यासारखेच या स्पर्धेच्या दोन फ़े-या जिंकून अंतिम फ़ेरीत आलेले इतर तीन चमू, सहा स्पर्धक. त्या स्पर्धकांमध्ये आम्हाला दोन वर्षे सिनीयर असलेले आणि आजवर ज्यांनी महाविद्यालय आणि विद्यापीठातल्या सगळ्या प्रश्नमंजुषा जिंकलेल्या होत्या असे पराग लपालीकर आणि अभिनव बर्वे नावाचे अत्यंत हुशार, गुणी विद्यार्थी होते. आमची खरी स्पर्धा त्यांच्या चमूशी होणार हे आम्हाला कळत होते.


अंतिम स्पर्धा सुरू झाली. आणि अपेक्षेप्रमाणे आमच्या आणि पराग + अभिनव या चमूमध्येच अगदी काटेंकी टक्कर होऊ लागली. प्रेक्षकांमधून थर्ड इयरची मुले पराग आणि अभिनव या चमूला आणि फ़र्स्ट इयरची मूले आम्हाला प्रोत्साहन देत होती. आमच्या प्रत्येक बरोबर उत्तरावर आमच्याबाजूने आरोळ्या वाढत होत्या आणि हेच जर पराग + अभिनव यांच्या चमूच्या बाबतीत घडले तर त्यांची मित्रमंडळी, वर्गमित्र आरोळ्या ठोकत होते. अगदी माहौल तयार झाला होता.


त्या स्टेजवर अंतिम फ़ेरीत एक क्षण असा आला की आमच्या क्वीझचे सगळे राऊंडस संपले होते आणि आमची चमू आणि पराग व अभिनवची चमू टायब्रेकर मध्ये आली. आता संकेत एकच प्रश्न विचारणार होता. सगळ्यात पहिल्यांदा समोरचा बझर दाबून त्या प्रश्नाचे बरोबर उत्तर  देणारी चमू त्यावर्षीची विजेती चमू ठरणार होती.


संकेतने प्रश्न विचारायला सुरूवात केली. स्टेजवर आनंद सिनेमातले "मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने" हे गाणे वाजले. संकेतचा प्रश्न होता "या गीताचे संगीतकार ओळखा." मी एका इम्पल्सने पटकन बझर दाबला आणि उत्तर दिले "सलील चौधरी". अगदी खरे सांगतो. त्याक्षणी हे उत्तर माझ्या डोक्यात कसे आले ? हे मलाही कळले नाही. मी इतका पटकन बझर दाबून खूप जलद उत्तर दिलेले होते. उत्तर अर्थातच बरोबर होते. आमची जोडी पहिल्याच वर्षी ही स्पर्धा जिंकलेली होती. दिग्गज खेळाडूंना हरवून. आमच्या बाजूने जल्लोष सुरू झाला होता. पराग आणि अभिनवने अत्यंत खिलाडू वृत्तीने स्टेजवरच आमचे अगदी मनापासून अभिनंदन केले. परागने तर मला उचलूनच घेतले होते. सर्वत्र अगदी आनंदीआनंद होता.


आज मी त्या क्षणाच्या माझ्या मॅडनेस मागची मेथड शोधतो तेव्हा माझे मलाच अनेक दुवे जुळून आलेले दिसतात. त्या मॅडनेस मागची मेथड मला आज दिसू लागते. नागपूरला टेलीव्हिजन आल्यानंतर त्यावर आलेला पहिला बॉलीवुड चित्रपट म्हणजे "आनंद". आमच्या वडिलांच्या एका स्नेह्याच्या घरी रविवारी संध्याकाळी जाऊन आम्ही हा चित्रपट बघितलेला होता. तो चित्रपट तेव्हा मला फ़ारसा आवडला नव्हता. एकतर अमिताभ बच्चन असणार म्हणजे चित्रपटात छान फ़ायटिंग वगैरे असणार या बालसुलभ अपेक्षेने आम्ही हा चित्रपट बघायला गेलो होतो. पण यात अजिबात फ़ायटिंग नाही. त्यात अमिताभ हा साईड हिरो आणि मुख्य हिरो म्हणजे रडका राजेश खन्ना. त्यातही या चित्रपटाची कथा शोकांत, रडकी. हा चित्रपट आम्हा लहान मुलांना आवडण्याजोगे असे त्यात काहीही नव्हते. 


बरे त्याकाळी संगीत वगैरे अजिबातच कळत नव्हते. आजसारखा इंटरनेटचा प्रसार नव्हता त्यामुळे एखाद्या चित्रपटाचे गीतकार - संगीतकार हे बिनाका गीतमाला वगैरे रेडियोंच्या कार्यक्रमांमधून किंवा छायागीत , चित्रहार, रंगोली या दूरदर्शनवरी; कार्यक्रमांमधूनच कळायचेत. तेव्हाही हे गीत यातला कुठल्याही कार्यक्रमांमध्ये बघितल्याचे, ऐकल्याचे मला अजिबात आठवत नव्हते. घरी रेकॉर्ड प्लेयर किंवा रेडियो किंवा टेप रेकॉर्डर असण्याची सुबत्ता नव्हतीच. त्यामुळे या चित्रपटाच्या रेकॉर्ड्स कॅसेस वगैरेंशी संबंध आलेला नव्हता. फ़क्त हा चित्रपट एका बंगाली माणसावर आधारित आहे हे धूसरसे आठवत होते. आणि बंगाली जनतेमध्ये चौधुरी हे आडनाव असते हे सामान्य ज्ञान पक्के होते. तसे चौधरी हे नाव महाराष्ट्रात, मध्य प्रदेशात आणि उत्तर प्रदेशात असते हे माहिती होते पण सलील हे नाव फ़क्त मराठी आणि बंगाली लोकांमध्ये ऐकले होते. म्हणून लगेच "सलील चौधरी" हे उत्तर माझ्या तोंडातून बाहेर पडले. आणि आम्ही टायब्रेकर जिंकून क्वीझ जिंकलेलो होतो.


आज हे लिहायला, वाचायला जेव्हढा वेळ लागतोय त्यापेक्षा एक शतांश वेळात ही प्रक्रिया माझ्या मेंदूत पूर्ण झालेली होती. वरवर बघता तो मॅडनेस, इम्पल्सिव्ह डिसीजन वाटले होते तरी त्यामागे एक निश्चित मेथड होती हे आज जाणवतेय. स्वतःचा स्वतःच्या निर्णयक्षमतेचा असा स्वतःलाच शोध लागला की मनाला एक वेगळेच समाधान मिळते, हो, नं ?


- स्वतःचाच निरंतर शोध घेणारा, प्रत्येक मॅडनेसमध्ये मेथड शोधणारा प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


२० जानेवारी २०२६ 


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६


Monday, January 19, 2026

परिक्षा पद्धतीतले कालसुसंगत बदल

प्राध्यापकी पेशात एखाद्या हाडाच्या शिक्षकाला विद्यार्थ्यांना शिकवणे, विद्यार्थ्यांमध्ये रमणे जेव्हढे आवडते तेव्हढेच त्या शिक्षकाला दोन गोष्टी अत्यंत टाळाव्याशा वाटतात. पण गंमत अशी आहे की टाळाव्याशा वाटणा-या या दोन्हीही गोष्टी त्याच्या पेशाचा अविभाज्य अंग असल्याने त्याने कितीही टाळाव्या म्हटल्यात तरी तो टाळू शकत नाही. त्या दोन गोष्टी म्हणजे

अ) परिक्षांदरम्यान पर्यवेक्षण करणे (Invigilation Duty)

आ) परिक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणे


माझ्या माझ्या बाबतीत मी या दोन्हीहीवर उतारा काढलाय. पर्यवेक्षण सुरू असताना जे आवश्यक काम आहे (परिक्षार्थींच्या उत्तरपत्रिकांवर सह्या, बारकोडस चिटकवणे, परिक्षाविषयक इतर नोंदी करणे वगैरे) ते साधारण अर्ध्या तासात संपवून उरलेला दीड. अडीच तास हा अगदी आपला आपला वेळ असतो. या वेळात मी माझ्या लिखाणासंबंधी चिंतन करतो. एखादे टिपण घ्यावेसे वाटले तर जवळच्या छोट्या डायरीत टिपून घेतो. मनात खूप दिवसांपासून घोळत असलेल्या एखाद्या कल्पनेचा विस्तार करायचा असेल तर या वेळासारखा दुसरा वेळ नाही. हा वेळ मी असा सत्कारणी लावतो.


आणि परिक्षा झाल्याझाल्या पेपर्स तपासून घेतले म्हणजे मग पेपर तपासणीचे कामसुद्धा कंटाळवाणे होत नाही हा माझा अनुभव आहे. अशा प्रकारे शिक्षकी पेशातल्या या टाळाव्याशा वाटणा-या पण टाळता न येणा-या बाबींवर मी माझा माझा तोडगा काढलेला आहे.


या पर्यवेक्षणादरम्यान माझ्या मनात या परिक्षा पद्धतींबाबत कायमच एक प्रश्नचिन्ह तयार होत असते. आजची आपली पारंपारिक परिक्षा पद्धती ही कालबाह्य होतेय का ? आणि होत असली तर सर्वांनाच हे पटूनही त्यावर उपाययोजना का होत नाही ? हा मला पडलेला मोठ्ठा प्रश्न आहे.


पाठांतरावर आधारित परिक्षापद्धतीला माझा विरोध नाही. ज्या ज्या देशांनी, संस्कृतींनी पाठांतरावर आधारित परिक्षापद्धतीला पहिल्यापासून झुगारून दिलेले आहे त्यांच्या शिक्षणपद्धतीचे काय हाल झालेत ? ते आपण आज बघतोय. पाठांतरावर आधारित परिक्षा पद्धती हवीच पण ती पदवीला प्रवेश घेईपर्यंत. तोपर्यंत विद्यार्थ्यांचा मेंदू पाठांतरावर छान तयार व्हायला हवा. 


पदवी परिक्षेत मात्र पाठांतरावर भर नकोय. पदवीच्या अगदी पहिल्या वर्षापासूनच. पदवी मिळवतोय म्हणजे जो विषय आपण पदवीसाठी निवडलाय त्यात मला कौशल्य प्राप्त करायचेय. मग त्यात आपली पारंपारिक परिक्षा पद्धती थिटी पडतेय असे मला ठामपणे वाटत आलेले आहे. या सर्व परिक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या पाठांतर परिक्षे ऐवजी त्यांनी त्या विषयातले किती कौशल्य अर्जित केले याचे मूल्यमापन व्हावे असे मला वाटते. आणि आजचा काळ हा सर्वार्थाने या सर्व बदलांसाठी अनुकूल असताना तर हे करणे अत्यंत सोपी आहे. फ़क्त कुणीतरी तसा ठाम निर्णय घेऊन तसे पाठबळ या नवविचारांना द्यायला हवे.


कोरोना काळात घरी बसल्या बसल्या, महाविद्यालयात रोजचे जाण्यायेण्याचे तास वाचल्याने, फ़क्त थेअरी लेक्चर्स घ्यायचे असल्याने प्रात्यक्षिकांचे तास वाचल्याने उरलेल्या वेळात आपल्यापैकी ब-याच जणांनी Coursera सारख्या ऑनलाईन माध्यमावर अनेक विषय शिकले. मी पण त्यातलाच एक होतो. माझ्या विषयाव्यतिरिक्त मी अनेक नवीन तंत्रज्ञान त्या माध्यमातून शिकलो. त्या अभ्यासक्रमात अनेक तज्ञांची व्हिडीयो लेक्चर्स असतात, त्यांच्या नोटस दिलेल्या असतात. आपण ते बघायचे आणि आपल्याला कळलेय की नाही हे बघायला त्यांच्या परिक्षा द्यायच्यात. परिक्षा पण ऑनलाईनच. परिक्षेदरम्यान त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना आपण त्यांचे व्हिडीयो बघू शकतो, नोटस वाचू शकतो. कारण शेवटी ही परिक्षा आपल्या आकलनाची असते आपल्या पाठांतराची नव्हे. आणि परिक्षेतले प्रश्न सुद्धा नोटस वाचून, व्हिडीयोज पाहून त्यातून थेट उत्तरे देण्यासारखे नसतात. परिक्षेतले प्रश्न सुद्धा आपल्या आकलनावर आधारित असतात आणि ब-याचशा विषयांमध्ये पास होण्यासाठी चक्क ८० टक्के गुण मिळवायचे असतात. समजा एखाद्या दिवशी आपण त्या परिक्षेत तेव्हढे गुण प्राप्त करू शकलो नाही तर पुन्हा २४ तासांनीच ती परिक्षा पुन्हा द्यायला मिळते तोपर्यंत तो पेपर आपल्या कॉम्प्युटरवर पुन्हा उघडत नाही. २४ तासात पुन्हा तेव्हढे ज्ञान प्राप्त करायचे, तेव्हढे आकलन प्राप्त करायचे आणि मग परिक्षा द्यायची. मला ही पद्धत फ़ार आवडली.


आज मी संगणक अभियांत्रिकी, डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धीमत्ता वगैरे क्षेत्रातले विद्यार्थी आजच्या पारंपारिक परिक्षा पद्धतीत प्रोग्रॅमिंगचे पेपर्स लिहीताना बघितले की त्यांची, त्यांचे पेपर्स तपासणा-यांची आणि या एकूणच परिक्षा पद्धतीची कीव येते. एखादा कॉम्प्युटर प्रोग्राम कागदावर लिहीताना तो नीट चालतोय की नाही हे त्या विद्यार्थ्याला कसे कळणार ? तो प्रोग्राम बरोबर लिहीलाय की नाही हे त्या पेपर तपासणा-याला तरी कसे कळणार ? हे माझ्यापुढ्चे गहन प्रश्न आहेत. त्यापेक्षा त्यांची अशी Coursera पद्धतीची परिक्षा झाली असती तर तो प्रोग्राम चालतोय की नाही हे त्यांचे त्यांनाच कळले असते. त्यातल्या चुका कशा काढायच्या याचे कौशल्य त्यांचे त्यांनीच मिळवले असते. यात परिक्षकाची भूमिका फ़क्त तसा पेपर देण्याची आणि अशा ऑनलाईन माध्यमात जर व्यवस्थित नियोजन केले तर प्रत्येक विद्यार्थ्याला एकाच काठिण्यपातळीचे पण वेगवेगळे प्रोग्राम्स लिहायला सांगता येऊ शकेल त्यामुळे एकमेकांचे बघून लिहीणे वगैरे प्रकार टळू शकतील.


आजकाल तर कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान वापरून अनेक सॉफ़्टवेअर कंपन्या विद्यार्थ्यांची घरबसल्या परिक्षा घेत असतात. एकाच वेळी अक्षरशः हजारो विद्यार्थ्यांची. त्यात त्या विद्यार्थ्याने परिक्षेच्या विंडो व्यतिरिक्त दुसरी विंडो (गूगल, चॅट जीपीटी वगैरेला विचारण्यासाठी) नुसती उघडली तरी त्या विद्यार्थ्याची परिक्षाच रद्द होते. त्या विद्यार्थ्याच्या लॅपटॉप / डेस्कटॉपचा कॅमेरा त्या विद्यार्थ्याच्या सगळ्या  हालचाली टिपत असतो. थोडीही संशयास्पद हालचाल, बोलणे त्यात दिसले की एक वॉर्निंग येते आणि त्या वॉर्निंगला भीक न घालता आपण आपले चुकीचे काम सुरूच ठेवले तर त्या विद्यार्थ्याची ती परिक्षा रद्द होते. 


हे आधुनिक तंत्रज्ञान आता सर्वत्र उपलब्ध आहे आणि सर्व विद्यापीठांना शैक्षणिक संस्थांना अगदी परवडण्यासारखे आहे. मग आजकालच्या युगातल्या परिक्षा अशा स्मार्ट पद्धतीने का होऊ नयेत ?


नरसी मोनजी विद्यापीठात अध्यापन करीत असताना माझे मार्गदर्शक आणि विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. शरद म्हैसकर आमच्या स्थापत्य अभियांत्रिकीतला एक अत्यंत कठीण विषय शिकवीत असत. भूतंत्रज्ञान अभियांत्रिकी (Geotechnical Engineering). पारंपारिक परिक्षा पद्धतीत या विषयासाठी खूप फ़ॉर्म्युले, खूप डेरिव्हेशन्स, खूप संकल्पना लक्षात ठेवाव्या लागतात आणि म्हणून हा विषय बहुतेक विद्यार्थ्यांना डोकेदुखी वाटतो. नरसी मोनजी विद्यापीठात या विषयाची "ओपन बुक" परिक्षा व्हायची. त्या पेपरमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तके, नोट्स वापरण्याची मुभा असायची आणि पेपरमध्ये नुसते फ़ॉर्म्युले, डेरिव्हेशन्स न विचारता (नाहीतर विद्यार्थ्यांनी ते सगळे सरळ पुस्तकांमधून पाहून लिहून टाकले असते.) एखाद्या फ़ाऊंडेशनचे डिझाईन करायला विचारले जात असे. विद्यार्थ्यांनी पुस्तकांमधून, आय एस कोडमधून त्या डिझाईनची प्रक्रिया बघून दिलेल्या डेटावरून डिझाईन करायचे असायचे. ते विद्यार्थी पदवी घेऊन आपापल्या क्षेत्रात गेल्यानंतर जर त्यांना एखादे फ़ाऊंडेशन डिझाईन करायचे असले तर त्यांच्याकडे संदर्भासाठी पुस्तके, आय एस कोडस असतीलच. फ़क्त त्यांचा वापर करून डिझाईन कसे करायचे ? हे कौशल्य त्यांना त्या अभ्यासक्रमात शिकवायचे आहे. आणि म्हणूनच त्यांची तशी परिक्षा घ्यायची आहे हे माझ्या मार्गदर्शकांनी मला सांगितले होते. किती अभिनव कल्पना ! अभियांत्रिकीसोबतच इतरही सगळ्याच पदवी परिक्षांसाठी या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांना शिकवले गेले आणि तशा पद्धतीने त्यांच्या परिक्षा घेतल्या गेल्यात तर विद्यार्थ्यांचा किती कौशल्यविकास होईल, नाही ? नुसते फ़ॉर्म्युले, डेरिव्हेशन्स ही थेअरी लक्षात ठेऊन जर एखाद्या विद्यार्थ्याला ते कुठे आणि कसे वापरायचे हे कौशल्य मिळत नसेल तर परिक्षेत चांगले गुण मिळवूनसुद्धा त्याचा उपयोग कुठल्याही क्षेत्रात त्याला आणि समाजालाही होणार नाही.


आणखी एक मुद्दा. वर्षभर शिकवून वर्षाअखेर एका तीन तासांच्या परिक्षेत त्या विद्यार्थ्याचे ज्ञान जोखण्याची जुनी पद्धती कशाला ? वर्षभर त्या विद्यार्थ्याने महाविद्यालयात किती प्रोजेक्टस केलेत, किती संशोधन केले, किती विविध कौशल्ये आत्मसात केलीत, त्याची आकलन क्षमता किती आहे ? ह्याचे गुणांकन त्या त्या वेळी त्या त्या शिक्षकाने केले तर शेवटी ही परिक्षा घेणे हेच कालबाह्य ठरेल. हे त्या त्या शिक्षकांना हे जोखू द्यात ना. अंतिम तीन तासाच्या परिक्षेचा आणि त्या विद्यार्थ्याने वर्षभर केलेल्या मेहेनतीचा संबंध आपल्याला तोडता येणार नाही का ?


बरे या अंतर्गत मूल्यमापनात हे शिक्षक जर भेदभावपूर्वक वागणूक करीत असतील तर त्यावरही अंकुश ठेवण्याची यंत्रणा अगदी सहज उभारता येऊ शकते. असलेल्या कौशल्यापेक्षा जास्त मूल्यमापन करण्याचे एखाद्या संस्थेने ठरविले आणि त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्यांचे ओव्हरव्हॅल्युएशन केले तर ती एक केवळ कागदी सूज ठरेल. कारण असे ओव्हरव्हॅल्युड विद्यार्थी जेव्हा नोकरीसाठी त्या त्या कंपन्यांमध्ये, आस्थापनांमध्ये जातील तेव्हा त्यांच्या या फ़ुगवलेल्या गुणांचे पितळ उघडे पडेल आणि त्या त्या महाविद्यालयाची, विद्यापीठाची विश्वासार्हता धोक्यात येईल. याउलट आकसापोटी जाणूनबुजून एखाद्या विद्यार्थ्याला कमी गुण प्रदान करणा-यांवरही महाविद्यालयांतर्गत, विद्यापीठांतर्गत कठोर अंकुश ठेवण्याची यंत्रणा राबवता येईल.


थोडक्यात काय ? आजची लक्षात ठेवण्याची क्षमता तपासणारी पारंपारिक परिक्षा पध्दती आपल्याला विद्यापीठातल्या पदवी स्तरापासून पुढे नक्की टाळता येऊ शकते. त्याऐवजी विद्यार्थ्यांची कौशल्ये तपासण्याची पद्धती आणायला आजच्या युगात फ़ार श्रम पडणार नाहीत. गरज आहे ती शिक्षणतज्ञांच्या जबरदस्त इच्छाशक्तीची आणि त्यांना सरकारमधल्या, विद्यापीठामधल्या, समाजातल्या सर्वच घटकांकडून मिळणा-या अगदी सकारात्मक सहकार्याची. 


जायचेय मग पुढे ? करायचीय नव्या युगाला सुरूवात.


आपल्या अनेकविध मतांचे स्वागत.


- गेली अडीच तपे अध्यापन क्षेत्रात असलेला आणि या क्षेत्रात नवे बदल घडवून आणण्यास इच्छूक असलेला प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


१९ जानेवारी २०२६  


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६


Sunday, January 18, 2026

नागपुरातली नाटके

"आठवणी नागपूरच्या" या फ़ेसबुक गटात मध्यंतरी एका सदगृहस्थांची सुरेश भट सभागृहातील त्यांनी बघितलेल्या एका नाटकाबद्दल पोस्ट वाचली. सुरेश भट सभागृह हे नाट्यसंस्कृतीला कसे योग्य नाही आणि आयोजकांचा एकूणच गलथानपणा यावर त्यांनी कोरडे ओढलेले होते. मला स्वतःला आजवर सुरेश भट सभागृहात जाण्याचा कधी योगच आलेला नाही त्यामुळे त्यावर तर मी भाष्य करणारच नाही पण नागपुरातल्या नाट्य संस्कृतीविषयी मला वाटलेले प्रांजळ चिंतन मी याठिकाणी प्रकट करू इच्छितो.


महाराष्ट्रातल्या इतर शहरांइतकेच नागपूर हे नाट्यप्रेमी शहर आहे. नागपूरने मराठी नाट्यभूमीला अनेक उत्तम नट, दिग्दर्शक, लेखक आणि इतर नाट्यकर्मी दिलेले आहेत. नाट्य वर्तुळातील रूसवेफ़ुगवे, हेवेदावे, एकमेकांची कापाकापी या सगळ्या गोष्टीही नागपूरमध्ये इतर शहरांसारख्याच, त्याच प्रमाणात होत असता. पण मुंबई शहराच्या विशालतेमुळे आणि त्यामुळे साहजिकच तिथल्या फ़ार संख्येने असलेल्या मराठी नाट्यरसिकांमुळे मुंबईत व्यावसायिक रंगभूमी बहरली तितकी ती नागपुरात बहरू शकली नाही. पुणे आणि नाशिक ही शहरे सुद्धा मुंबईवरून एका दिवसात जाऊन प्रयोग करून परतण्यासारखी असल्यामुळे तिथेही नागपूरच्या तुलनेत जास्त नाट्यप्रयोग होत असतात. मुंबईत यशस्वी ठरलेल्या व्यावसायिक रंगभूमीवरील नाटकाचा प्रयोग नागपूरला होण्याचा योग वर्ष सहा महिन्यातून एकदाच होत असतो. त्या नाट्य संस्थेचा विदर्भ दौरा निघाला की मग अमरावती - नागपूर - चंद्रपूर असे प्रयोग करून ती नाट्यसंस्था परत मुंबईत जाते. या प्रवासासाठी एकूणच खर्च जास्त येत असतो आणि त्यामुळे त्या नाट्यसंस्थेचे व्यावसायिक गणित जुळावे म्हणून स्वाभाविकच इथल्या प्रयोगांची तिकीटे तुलनेने महाग असतात.


नागपूरकर नाट्यरसिक अशी वर्षातून सठीसामासी होणारी व्यावसायिक नाटके बघण्यासाठी हा जादा तिकीटांचा भार पण सहन करायला तयार असतो. "आपल्याला कुठे पुण्या मुंबईसारखी दर महिन्याला नाटके बघायला मिळतायत ? एखाद्या वेळेला जास्त तिकीट भरावे लागले तर भरू." हा त्याचा विशाल वैदर्भीय दृष्टीकोन असतो. पण इथे खरी गंमत सुरू होते.


नागपुरातल्या ज्या संस्थेने मुंबईतल्या नाट्य संस्थेशी संपर्क साधून या नाटकांचे आयोजन नागपुरात केलेले असते ती नाट्यसंस्था स्वतःसाठी पहिल्या ४ - ५ रांगांमधली तिकीटे राखून ठेवते. म्हणजे अगदी ५०० ते १००० रूपयांचे तिकीट काढून अशी चांगली नाटके बघायला जाणा-या नाट्यरसिकांना प्रिमीयम रांगांमध्ये बसून नाटक अनुभवण्याचा योग येत नाही. कुठेतरी आपण डावलले गेल्याची भावना मनात निर्माण होते. नागपुरातल्या दर्दी आणि स्वतःच्या खिशाला खार लावून नाट्यानुभव घेऊ इच्छिणा-या रसिकांवर हा अन्याय का ? हा मला न उलगडलेला प्रश्न आहे.


बरे या नाटकांचे आयोजक असलेली नागपुरातली नाट्यसंस्था ही प्रिमीयम तिकीटे आपल्याच सग्यासोय-यांना, दोस्तमित्रांना देत असते. त्या सगळ्यांनाच नाट्याविषयी आवड आणि तशी दृष्टी असेलच असे नाही. त्यामुळे हे नाट्यनिमंत्रण त्यातल्या अशा न नाट्य रसिकांना केवळ स्वतःचे स्टेटस, स्वतःची प्रौढी मिरवण्याची संधी वाटते आणि नाटक सुरू असताना पाळावयाचे अगदी साधे नियम या रसिकांनी न पाळल्यामुळे नाट्यसरिकांचा आणि नाट्य कलावंतांचाही अगदी रसभंग होतो. 


मध्यंतरी काही वर्षांपूर्वी प्रशांत दामलेंचे एक विक्रमी नाटक असेच नागपूरला आलेले होते. वसंतराव देशपांडे सभागृहातच नाटक होते. बुकिंग सुरू झाल्याच्या अगदी पहिल्या दिवशी पहिल्या काही मिनीटांमध्ये तिकीट काढूनही आयोजक नाट्य संस्थेने पहिल्या ५ रांगा स्वतःकडे राखून ठेवल्याने चक्क ६ व्या रांगेतून सगळ्यात महाग तिकीटे काढून नाटक बघण्याच्या योगाला आम्ही सामोरे गेलो. ठीक आहे. हरकत नाही म्हणत आम्ही सकस नाट्यानुभवासाठी आणि आनंदासाठी सभागृहात प्रवेशकर्ते झालो.


त्या नाटकात पहिल्या अंकाच्या सुरूवातीला त्या नाटकाच्या नायिका कविता लाड - मेढेकर यांचे एक मोठ्ठे स्वगत आहे. रंगमंचावर नाटक सुरू न होता हे नाटक प्रेक्षागृहातच सुरू होते. प्रेक्षकांशी संवाद साधता साधता कविता लाड - मेढेकर या प्रेक्षकांमधूनच रंगमंचावर जातात आणि मग रंगमंचावर नाटक रंगते. त्या नाटकादरम्यान पहिल्या पाच रांगांमधल्या अशाच एका फ़ुकट पासावरच्या निमंत्रित न नाट्य रसिकाने आपले मूल तिथे आणले होते. आजकाल सार्वजनिक वावराची मुलांना शिस्त लावणे हे आईवडिलांचे कर्तव्य उरलेले नसल्याने ते मूल प्रेक्षागृहात उंडारतच होते. पण कविता लाड - मेढेकरांचा हा महत्वाचा प्रवेश सुरू झाल्यावर तर ते मूल थेट त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या अंगाला हात लाव, स्वतःकडे त्यांचे लक्ष वेधून घे असले प्रकार करू लागलेत. कविता लाड - मेढेकरांच्या चेहे-यावर "एक लगावून द्यावे कार्ट्याला" असे वाटत असल्याचे भाव होते. पण रंगमंचावरील कलावंतांच्या मर्यादा सांभाळत त्यांनी ते स्वगत आपले बेअरींग न घालवता पूर्ण केले. त्यादिवशी त्यांच्याविषयी, त्यांच्या अभिनयाविषयीचा आदर द्विगुणित झाला. पण नाट्यरसिकांना रसभंग झाला तो झालाच. त्या प्रसंगानंतरही त्या निमंत्रितांच्या रांगेतून रसभंग होईल असे अनेक प्रसंग घडलेत. प्रेक्षागृहात इतर प्रेक्षकांमधून असे रसभंग होणे आणि अगदी समोरच्या ५ रांगांमधून असे प्रकार होणे यात त्या रंगमंचावरच्या कलावंतांची काय परिस्थिती होते ? हे एक नाट्यकर्मी, नट म्हणून मी स्वतः अनुभवलेले आहे. "नागपूरकर रसिकांना नाटकाची आवडच, चवच नाही." हे मत घेऊन मुंबई - पुण्याची मंडळी आपापल्या गावात जातात हे नागपूरसाठी खरोखर लांछनास्पद आहे.


नागपूरकर नाट्यरसिक आणि नाट्यसंस्थांनी यावर सखोल विचार करावा ही अपेक्षा.


- नागपूर आणि वैदर्भिय नाट्य सृष्टीत नट, संगीत नियोजक, रंगमंचामागील कामगार, वृत्तपत्रातील नाट्यसमिक्षक आणि मुंबईत बारा वर्षे घालवून अनेक उत्तमोत्तम नाटके कुटुंबिय आणि मित्रमंडळींसह पहिल्या दोन रांगांमधून बघितलेला एक नाट्यरसिक, नाट्यकर्मी प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर. 


१८ जानेवारी २०२६


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६