आधीच आपल्याला ऊर्दू मिश्रित हिंदी कळत नाही. "मकसद" हे सिनेमाचे नाव वाचून मराठीत एक "अबकडई" या नावाचे नियतकालिक निघायचे तशातला हा काही प्रकार असेल असे आम्हाला वाटले होते. त्यामुळे "दीदार ए यार", "मुगल ए आजम" वगैरे नावे कळण्याचा प्रश्नच नव्हता. मुळात अशा ऊर्दू नावांचा अर्थच कळण्याची बोंब तर मग टाॅकीजमध्ये जाऊन तो सिनेमा पाहण्याची एवढी तसदी कोण घेणार ?
याच अजाणतेपणाने एकदा घरी "आप जैसा कोई, मेरे जिंदगीमे आएँ, तो बाप बन जाएँ" असे मोठ्याने गाताना "आचरट कार्ट्या" म्हणून थोबाड रंगवून घेतल्याची आठवण अजूनही ताजी आहे. "अहो ते सिनेमावाल्यांनीच ते गाणे तसे लिहिलेय यात माझा काय दोष ?" हा माझा निरागस प्रश्न तेव्हा कुणीही ऐकलेला नव्हता.
९० च्या दशकाच्या उत्तरार्धात हिंदी सिनेमांवर पंजाबी शब्द आणि प्रथांनी आक्रमण केले. त्यामुळे आमच्यासारख्या मराठी मुलांची अधिकच पंचाईत झाली हो.
आता हेच बघा ना, "जब वी मेट" मी टाॅकीजमध्ये बघितला. घरी टी व्ही वर ही अनेकदा बघितलाय. पण अजूनही "नगाडा, नगाडा, नगाडा बजा" यानंतर ती सगळी पंजाबी मंडळी "Aqua Regia, Aqua Regia" असे केमिस्ट्रीतल्या कंपाऊंडचे नाव जोराने का ओरडतात ? हे मला न उलगडलेले कोडे आहे.
- पाचव्या सहाव्या वर्गात केमिस्ट्री शिकवणार्या सरांनी अत्युकृष्ट शिकवल्याचा परिणाम की सोन्याला विरघळवणारे कंपाऊंड "Aqua Regia" ची भुरळ पडल्याचा परिणाम की स्वतःलाच एक "Alchemist" व्हायचे होते की काय ? याचा अजूनही शोध घेत असलेला सर्वसामान्य माणूस, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
No comments:
Post a Comment