Saturday, January 28, 2023

जागो विदर्भ और महाराष्ट्रवासियो जागो.

परवा एका हिंदी दैनिकात महाराष्ट्र एक्सप्रेसला मध्य प्रदेशातल्या रीवा पर्यंत वाढवण्याच्या हालचालींबाबत बातमी वाचली. मधल्या काळात ही मागणी थंडावली होती. ही मागणी तशीही अव्यवहार्य आहे. ती कशी ? ते या व्हिडीयो च्या माध्यमातून आपल्यापर्यंत सादर केलेले आहे. 

हा एक (माझ्यासाठी तरी) नवीनच तंत्रज्ञान प्रयोग आपल्यासमोर सादर करतोय. आपल्या प्रतिसादाची आणि सूचनांची वाट बघतोय.


- रेल्वेप्रेमी (सोबत विदर्भप्रेमी आणि महाराष्ट्रप्रेमीही) रामभाऊ.


व्हिडीयो लिंक इथे 



या विषयावरील इतर ब्लॉग लिखाण 

इथे 

इथे 

आणि

इथे 



Friday, January 27, 2023

शिक्षक, गुंडगिरी आणि कृतज्ञता : एक असाही गंमतीशीर अनुभव.

इसवी सन 2000. नवी मुंबईच्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरीला लागून चांगली 5 वर्षे झालेली होती. मुंबईत स्थिरावलो वगैरे होतो. सगळे सुरळीत चाललेले होते. अचानक तुळजापूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापकांच्या भरतीची जाहिरात वर्तमानपत्रात आली. हे महाविद्यालय आमच्या महाविद्यालयासारखे खाजगी होते हे माहिती होते पण त्या जाहिरातीत खाली  जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांची सही होती. तुळजाभवानी मंदीर ट्रस्टने चालविलेले हे महाविद्यालय होते. त्याकाळात त्या ट्रस्टवर  शासनातर्फ़े प्रशासकाची नेमणूक झालेली होती हे माहिती होते. हे महाविद्यालय पण शासनाने ताब्यात घेतले की काय ? अशी शंका मनात आली. शासनाने हे महाविद्यालय ताब्यात घेतले असेल तर महाराष्ट्रातल्या एका शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरी करण्याची संधी कशाला घालवा ? या विचाराने अर्ज केला. वेतन आयोग शासकीय महाविद्यालयात लवकर लागतात. वेतन आयोगाची थकबाकी वगैरे मिळते हा माझा अनुभव होता. म्हणून मग शासकीय महाविद्यालयाचे आकर्षण. जूनमध्ये अर्जाला उत्तर आले. 29 जून रोजी तुळजापूर येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहे असे मुलाखतपत्र सुद्धा माझ्या पवईच्या घरी आले.

28 जून रोजी पवईवरून ठाणे गाठले आणि ठाणे - पुणे (स्टेशन) व तिथून स्वारगेट तिथून सोलापूर आणि रात्री उशीरा तुळजापूर गाठले. ठाण्यावरून तुळजापूरला जाणा-या खाजगी लक्झरी बसेस होत्या. त्याकाळी स्लीपर कोचेसचे एव्हढे पेव फ़ुटलेले नव्हते. बहुतांशी सगळ्या लक्झरी बसेस आसनीच असायच्यात. रात्रभर बसून प्रवास करून पहाटे थेट तुळजापूर गाठणे आणि अर्धवट झालेल्या झोपेने डोळे तारवटून त्याचदिवशी मुलाखतीला हजर राहणे हे मला कधीच रूचले नाही आणि रूचणारही नाही. म्हणून दिवसभर असा टप्प्याटप्प्याचा प्रवास करून मी रात्री तुळजापूरला मुक्काम करणे पसंत केले होते.




29 तारीख उजाडली. पहाटे उठून अगदी सकाळी सकाळीच आई भवानीचे दर्शन घेतले. त्याकाळी आज असते एव्हढी गर्दी आणि ती लांबच लांब दर्शनबारी तुळजापूरला नव्हती. थेट दर्शन व्हायचे. उत्सवात वगैरे गर्दी राहत असेलही पण एरव्ही फ़क्त 10 -15 दर्शनार्थींची रांग असायची. कोल्हापूरला सुद्धा आम्ही 1989 ते 1993 पर्यंत अनंत वेळा दर्शन घेतलेले आहे. अजिबात रांग नसायची. 

मुलाखतीसाठी छान तयार होऊन वगैरे गेलो. मंदीर परिसराजवळूनच रिक्षा मिळाली आणि महाविद्यालयात पोहोचलो. खरेतर हे अंतर पायी चालत जाण्याइतके होते पण ही बाब तिथे पोहोचल्यानंतर कळली. मग परतताना पायीच जाण्याचा निश्चय केला. मुलाखतीसाठी साधारण 15 जणांना बोलावलेले होते. सहायक प्राध्यापकांच्या एकूण 3 जागा होत्या. एका जागेला 5 उमेदवार या प्रमाणात उमेदवार बोलावले होते हे सुद्धा चांगल्या व्यवस्थापनाचे लक्षण होते. त्यापूर्वी 1995 मध्ये लोणी इथे विखे पाटलांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात 6 जागांसाठी 125 जणांना बोलावून व्यवस्थापनाने अक्षरशः खेळखंडोबा केलेला स्मरणात होता. त्यामुळे इथल्या व्यवस्थापनाचे कौतुक वाटले.

मुलाखतींना सुरूवात झाली. मुलाखतीच्या पॅनेलमधले उस्मानाबादचे जिल्हाधिकारी अत्यंत कर्तव्यदक्षपणे वेळेवर हजर झालेत. तुळजापूरचे तहसिलदार सुद्धा मुलाखतीच्या पॅनेलमध्ये होते. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. देशपांडे आणि त्याकाळचे एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष श्री सुधाकरपंत परिचारक हे सुद्धा मुलाखतीच्या पॅनेलवर होते.

माझी मुलाखत छान झाली. प्राचार्य श्री देशपांडे सरांनी जे तांत्रिक प्रश्न विचारले त्यांची मी अचूक उत्तरे दिलीत. माझ्या बायो डेटा मधील "एस. टी. आणि रेल्वेची आवड" हे वाचून सुधाकरपंत परिचारकांनी मुलाखतीची पुढील सूत्रे आपल्या हाती घेतलीत आणि एस. टी. या माझ्या फ़ेव्हरीट पीचवर मला एकापाठोपाठ एक प्रश्नांचे फ़ुलटॉस मिळत गेलेत. सगळ्यांना अगदी आत्मविश्वासाने मी सीमेबाहेर तडकावले. एका बसफ़ॅनला भेटून एस. टी. च्या अध्यक्षांना आणि ज्या माणसाला आपण बोलत असलेली एस. टी. विषयीच्या संज्ञा कळतात अशा माणसाला भेटून मलाही खूप आनंद झाला होता. जिल्हाधिका-यांच्या चेहे-यावरचे हास्य आणि समाधान इथे माझी निवड झालीय हा संदेश माझ्यापर्यंत पोहोचवून गेले.

महाविद्यालय परिसर थोडा उदासच वाटत होता. महाविद्यालयातल्या किंवा कुठल्याही संस्थेतल्या कर्मचारी वर्गाच्या दीर्घकालीन सुखदुःखांचे प्रतिबिंब त्या महाविद्यालयाच्या वातावरणावर पडत असते हा माझा अनुभव आहे. ज्या संस्थेत कर्मचारी वर्गाला सन्मानाने वागवले जाते, त्यांच्या इच्छा आकांक्षांचा आदर होतो तिथले एकूणच वातावरण आल्हाददायक असते. अन्यथा जिथे कर्मचारी वर्गाची मानसिक पिळवणूक होते तिथे पगार वगैरे उत्तम असलेत तरीही कर्मचारी वर्गाच्या मानसिकतेचे प्रतिबिंब त्या इमारतीत पडून ती इमारत कळानष्ट दिसते. तशी त्या महाविद्यालयावर अवकळा पसरलेली मला जाणवली. आई भवानीचे नाव जरी त्या महाविद्यालयाला असले तरी तिची कृपा त्या महाविद्यालयावर नव्हती हे जाणवत होते. अनेक प्रकरणे कोर्टात प्रलंबित होती. महाविद्यालय आणि संस्थानाचाही कारभार ठप्प पडलेला होता. एकटे देशपांडे सरांसारखे अत्यंत प्रतिभावान व्यक्तिमत्व त्या वातावरणात फ़ार काही करू शकणार नव्हते. मुंबईत चांगले स्थिरस्थावर झालेले सोडून इथे यायचे नाही हा माझा निर्धार महाविद्यालय सोडून परत मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतानाच पक्का झाला होता. 


मुलाखत संपवून बाहेर आलो. दुपारचे 4 च वाजले होते. परतताना मी सोलापूरवरून रात्री 8.30 च्या सिद्धेश्वर एक्सप्रेसचे रिझर्वेशन केलेले होते. तुळजापूर ते सोलापूर एक तास प्रवास. सोलापूर बस स्थानक ते सोलापूर रेल्वे स्टेशन अर्धा तास प्रवास गृहीत धरूनही मी तुळजापूरवरून संध्याकाळी 6.30 ला निघालेले चालणार होते. मग मुक्कामाच्या ठिकाणी रमतगमत आलो आणि थोडी विश्रांती घेतली. 

संध्याकाळी 6.15 च्या सुमारास तुळजापूर बस स्थानकावर आलो आणि तुळजापूर - सोलापूर विनावाहक विनाथांबा बसमध्ये तिकीट काढून 1 नंबरच्या आसनावर बसलो. माझ्यासमोरच्या 54 नंबरच्या आसनावर (त्याकाळी ड्रायव्हर केबिनमागे प्रवासाचे उलट्या दिशेला तोंड करून बसण्याचे एक बाकडे असायचे. त्यात आसन क्रमांक 49 ते 54 अशी 6 आसने असायचीत.) माझ्यासोबत मुलाखतीला उपस्थित असलेला एक उमेदवार बसलेला होता. त्याच्या शेजारी 53 नंबरवर बाउन्सर सारखी शरीरयष्टी आणि चेहे-यावर प्रचंड मग्रूरी असणारा त्याचा एक गुंड / पहेलवान छाप मित्र बसलेला होता. माझ्याशी बोलायचे म्हणूनच दोघांनीही मुद्दाम ही जागा निवडली होती हे मला नंतर कळले.

मला वाटलं की ते दोघेही सोलापूरला आणि पुढे त्यांच्या त्यांच्या गावाला निघाले असतील. पण थोड्या वेळातच कळले की ते दोघेही तुळजापूरचेच होते. माझ्याशी बोलायला म्हणून माझ्याबरोबर बसने सोलापूरपर्यंत येणार होते. मघाशी मुलाखतीआधी इतर उमेदवारांशी सहज गप्पा मारताना मी माझा यापुढील परतीच्या प्रवासाचा बेत सांगितलेला असणार. तो नेमका लक्षात ठेऊन तो मुलगा आपल्या मित्रासोबत माझ्यासोबत प्रवासाला निघाला असणार.

बस सुरू होण्याआधीपासूनच त्या समोरच्या मुलाने, (तसा तो माझ्यापेक्षा 4 - 5 वर्षांनी मोठा होता.) प्रस्तावना सुरू केली. तो त्याच महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी विभागात गेली 3 वर्षे कंत्राटी प्राध्यापक (अस्थायी) म्हणून काम करत होता. तिथलाच रहिवाशी असल्याने ते महाविद्यालय त्याला नोकरी करायला सोयीचे होते. आज ना उद्या या महाविद्यालयात कायमस्वरूपी जागा निघतील आणि तिथे आपण कायम होऊ या अपेक्षेने तो तिथे दरवर्षी 11 महिन्यांच्या कंत्राटावर काम करीत होता. 2000 मध्ये कायमस्वरूपी जागा निघाल्या पण यावेळी तिथे माझी आणि इतर 3 जणांची निवड झाली होती. त्या मुलाचा प्रतिक्षा यादीत पहिलाच क्रमांक होता. मी जर ही नोकरी विशिष्ट कालावधीत नाकारली तर त्याला ही नोकरी मिळाली असती. या नोकरीत कायम होऊ या आशेवर त्याने लग्न वगैरे केलेले होते आणि मुल वगैरे जन्माला घालून आपला कुटुंबविस्तार केला होता. आता जर या जागेवर त्याला नोकरी मिळाली नाही तर आजवरच्या त्याच्या आयु्ष्याचे नियोजन साफ़ कोलमडणार होते. मी तसे पत्र द्यावे म्हणून विनवणी करण्यासाठी आणि सामोपचाराने मी ऐकलेच नाही तर दंडमार्ग अवलंबता येईल या हेतूने त्याने आपल्या त्या गुंड मित्राला दबावासाठी सोबत घेतले होते.

मी त्याला स्पष्ट सांगितले की बाबारे, मुंबईची इतकी चांगली नोकरी सोडून मी इथे तसाही येणार नाही. तू निश्चिंत अस. आणि मी मुंबईला गेल्यागेल्या महाविद्यालयाला ही नोकरी नाकारल्याचे पत्र पाठवीन. मला पहिल्यांदा निवड झाल्याचे पत्र तर येऊ देत. त्याला मी बरोबर आणि नियत अवधीत उत्तर पाठवीन. त्याचा इतक्या चांगुलपणावर विश्वास बसेना. त्याला वाटले की सोबतच्या गुंडाला घाबरून मी तोंडावर असे बोलतोय. तो पुन्हा म्हणाला की बघ हा, जर तू इथे आलास तर इथे तुझे जगणे नकोसे करणारे असे अनेक गुंड माझे मित्र आहेत. तू इथे राहू शकणारच नाहीस. मी त्याला पुन्हा पुन्हा सांगत होतो की असा प्रश्नच उदभवत नाही. मी इथे नोकरीला येणारच नाही. मला वाटले की हे महाविद्यालय शासकीय होतेय की काय ? म्हणून मी इथे अर्ज केलेला होता. इथली परिस्थिती मला कळल्यावर स्वतःचा सुखाचा जीव दुःखात टाकायला मी इथे कशाला येऊ ?

सोलापूर येईपर्यंत आमचा हाच संवाद चालू होता. माझ्या बोलण्यावर त्या मुलाचा विश्वास बसत नव्हता पण त्याला माझा इलाज नव्हता. साध्या सरळ हेतूला पुन्हा कसे पटवून द्यावे हा कायम माझ्यापुढचा प्रश्न राहिला आहे. लोक स्वतःवरून जगाची पारख करीत असतात त्यामुळे कुणी इतका प्रांजळ, प्रामाणिक कसे काय असू शकते ? असा त्यांना कायम प्रश्न पडतो आणि इथे माझा प्रामाणिकपणा, प्रांजळ हेतू मांडायला मी कमी पडतो. जवळपास 20 वर्षांनी आमच्या सध्याच्या महाविद्यालयात आमच्या डायरेक्टर सरांचे एक बौद्धिक ऐकले तेव्हा समाधान झाले. ते म्हणाले होते, "Honest intentions should not need clarifications." मग माझे समाधान झाले होते. पण तेव्हा माझी बाजू त्याला पटत नव्हती हे त्याच्या वारंवार विनवण्यावरून आणि मधेमधे देत असलेल्या धमक्यांवरून उघड होते.

तो, त्याचा तो गुंड मित्र आणि मी आम्ही तिघांनीही मिळून एकाच रिक्षाने सोलापूर बस स्टॅण्ड ते सोलापूर रेल्वे स्थानक प्रवास केला. गाडी फ़लाटाला लागली. मी माझ्या आसनावर बसलो. गाडी हलेपर्यंत तो मुलगा खिडकीबाहेर थांबून विनवणी करीत होताच. मी त्याला माझ्यापरीने समजावत होतो.




मुंबईला आलो. दोन तीन दिवसांनी तुळजापूरच्या महाविद्यालयाकडून निवड झाल्याचे पत्र मिळाले. त्यातल्या अटींप्रमाणे मी ती नोकरी नाकारल्याचे पत्र नियत कालावधीत मिळावे म्हणून स्पीड पोस्टाने पाठवले. मला तशीही त्या नोकरीची गरज नव्हतीच पण तरीही कुणाच्या तरी तोंडचा घास आपण हिरावला नाही याचे समाधान माझ्या मनात होतेच.

साधारण महिनाभराने माझा मुंबईतला पत्ता मिळवून तो मुलगा माझ्या पवईच्या घरी आला. यावेळी तो एकटाच आलेला होता. सोबत तो गुंड मित्र नव्हता. येताना आई तुळजाभवानीची एक मोठ्ठी आणि अतिशय सुंदर अशी फ़्रेम त्याने भेट म्हणून माझ्यासाठी त्याने तुळजापुरावरून आणलेली होती. मी वेळेत नोकरी नाकारल्याने त्याला ती जागा मिळाली होती, त्याचे जीवन मार्गी लागलेले होते म्हणून कृतज्ञता म्हणून त्याने तुळजापूर ते मूंबई हा प्रवास केलेला होता आणि ही भेट आणली होती. उशीरा का होईना पण  त्याचा माझ्या चांगुलपणावर विश्वास बसला होता.

आज ही घटना आठवली की हसूही येते आणि मन विषण्णही होते. शिक्षकी पेशातल्या एका माणसाला आपल्या अनिश्चिततेपासून बाहेर पडण्यासाठी एका गुंडाची मदत घ्यावी लागली होती. या सगळ्या परिस्थितीसाठी जबाबदार कोण ? याचा मी गेले 22 वर्षे विचार करतो आहे पण एकंदर परिस्थिती इतकी गुंतागुंतीची आहे की कुणा एकावर जबाबदारी निश्चित करता येत नाही. यावर माझ्या हयातीत तरी मार्ग निघेल अशी आशा मी मात्र कायमच बाळगलेली आहे.

- माऊलीच्या "दुरिताचे तिमीर जावो" या स्वप्नावर दृढ विश्वास ठेवणारा, भाबडा, साधा, सरळ आणि प्रांजळ प्राध्यापक, वैभवीराम.

      

Monday, January 23, 2023

एका लग्नाच्या जमण्याची पुढची गोष्ट.

उपवर मुलीला एक स्थळ सुचवल्या गेले. मुलाचे कुटुंब  परगावाचे  आणि मुलगा महानगरीत काम करणारा. मुलगा फेब्रूवारीत अमूक एका तारखेला येणार असल्याचे वर्तमान मुलाची आई, मुलीच्या आईला कळवते. मुलगा आणि मुलगी दोघांनाही पितृवियोग झालेला आहे. मुलगाही आता उपवधू झालाय. त्याच्यासाठीही मुलींचा शोध सुरू आहेच. फेब्रूवारीत सुटी  घेऊन घरी आला की दोन तीन वधूपरीक्षांचा कार्यक्रम एकत्र ठरवता येईल असा मुलाच्या आईचा बेत.

ठरल्याप्रमाणे सुटी घेऊन मुलगा शनिवारी सकाळी मुंबईवरून नागपूरला येतोय. पुढल्याच आठवड्यात दोन दिवसांनंतर (सोमवारी) मुलाच्या गुरूघरी नाथाबीजेचा उत्सव आहे त्यानिमित्तानेही आणि वधूसंशोधनासाठीही त्याने दोन दिवस (सोमवार आणि मंगळवार) सुटी  घेतलीय. घरी आल्याआल्या त्याची आई त्याला आलेली स्थळे, त्यांचे तपशील दाखवते. पहिल्या मुलीकडचे काही नातेवाईकही या गुरूघराण्याशी संबंधित असल्याने ते पण उत्सवाला येणार असतीलच म्हणून मग  उत्सवाच्यादिवशीच ही मुलगी बघू असा बेत ठरतो. त्यादरम्यान दुसरे आणखीही एक स्थळ आलेले असते. त्यांना मग मंगळवारी बोलावू असा विचार पक्का होतो.

शनिवार नेहमीच्या घाईत जातो. रविवार पण संध्याकाळ पर्यंत नेहमीच्या कामाकामांमध्येच दिवस जातो. मुलीच्या घरी चंद्रपूरला मुलाकडून येणाऱ्या फोनची आतुरतेने वाट पाहणे सुरू असते. मुलगा नागपूरला आला की नागपूरवरून तसा फोन येईल अशी मुलीकडच्यांची समजूत. तर मुलगा शनिवारी येणार आहे हे मुलीकडल्यांना नक्की कळवलेले आहे त्यामुळे मुलीकडली मंडळी सोमवारी नक्की येणार आहेत ही मुलाच्या आईची समजूत. त्यात दस्तुरखुद्द नवऱ्या मुलाला ह्यातले काहीही माहिती नसल्याने तो अनभिज्ञ. असा मोठाच मजेशीर गोंधळ.


रविवारी संध्याकाळी ७. ७. ३० झालेत तशी मुलीच्या घरच्यांची चलबिचल सुरू झाली. साहजिकच आहे हो. उद्याच्या कार्यक्रमाविषयी (त्यांच्या दृष्टीने) अनिश्चितता असताना उद्या सकाळी नागपूरसाठी निघायचे की नाही ? इतर तयारी वगैरे प्रश्न त्यांच्यासमोर पडलेले होते. "मुलगा आलाय की नाही ? आम्ही उद्या कधी येऊ ?" वगैरे प्रश्नांच्या उत्तरासाठी नागपूरला फोन करायला मुलीची आई जवळच्या पी सी ओ  कडे जायला निघाली खरी पण "आई, तूच कशाला फोन करतेयस गं ? गरज काय फक्त आपल्यालाच आहे का ? त्यांच्याकडच्यांचे काहीच कर्तव्य नाही का कळवण्याचे ?" असा दस्तुरखुद्द नवऱ्या मुलीचा प्रश्न तिला बिचारीला ऐकून घ्यावा लागला होता.


पण त्या शुभक्षणी त्यांना हा फोन करण्याचा विचार सुचला हे बरे झाले कारण फोनवरून एकमेकांचे गैरसमज दूर  झालेत.  नागपूरकडची मंडळी आपण येणार हे गृहीत धरूनच बसलेली होती हे चंद्रपूरकरांना कळले आणि चंद्रपूरकर आपल्या फोनची वाट बघत होते हे नागपूरकरांनाही कळले. चंद्रपूरकरांनी दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता निघणाऱ्या बसचे नागपूरचे रिझर्वेशन केले.


मुलगी, तिची आई आणि तिची एक धाकटी बहीण सकाळी नागपूरला आले आणि गुरूघरच्या उत्सवासाठी थेट गुरूघरी पोहोचले. त्यांनी अशा वधूपरीक्षा प्रसंगी परिधान करण्याचा रिवाज असलेली साडी वगैरे जामानिमा मुलीसाठी आणला होता खरा पण उत्सव, त्याला जमलेली भक्तमंडळी या गडबडीत मुलीने तिच्या पोशाखात बदल केलेलाच नव्हता. ती आपली निळ्या रंगाच्या सलवार सुटावरच होती. ना कपडे वगैरे बदलण्यासाठी वेळ ना मेकअप वगैरेंसाठी वेळ.


नवरा मुलगा तर त्यादिवशी  उत्सवाच्या तयारीत आणि व्यवस्थापनात असल्याने अशा प्रसंगी तो कायम परिधान करीत असलेल्या धोतर - झबा अशा मंगलवेशात. त्याने शर्ट पॅन्ट असा पोशाख करावा हा त्याच्या आईचा आग्रह त्याने न जुमानलेला. उत्सवाच्या भोजनाच्या पंक्ती सुरू असतानाच शेजारच्याच घरी (नवऱ्या  मुलाच्या) मुलगी दाखवण्याचा पारंपारिक कार्यक्रम अत्यंत साधेपणाने पार पडला. नवरी मुलगी साडी ऐवजी पंजाबी सुटावर तर नवरा मुलगा शर्ट पॅन्ट ऐवजी धोतर - झबा या पोशाखात.



तिचा साधेपणा, सोज्वळपणा आणि निरागसता नवऱ्या  मुलाला फारच भावली आणि दोन्हीकडच्या घरी परवानगी घेऊन त्याच दिवशी तासाभराने दोघे अगदी जवळच असलेल्या एका उपाहारगृहात भेटलेत. आज हा शिरस्ता झालेला असेल पण २३ वर्षांपूर्वी नागपुरात हे एक धाडस होते. पण दोन्ही घरच्यांनी कोतेपणा न दाखवता परवानगी दिली हे महत्वाचे. तास दीडतासापूर्वीच गुरूघरी प्रसाद घेतलेला असल्याने दोघांनाही भुका तशा नव्हत्या. एक शीतपेय मागवून दोघेही बोलत बसलेत. मुलाने कसलाही आडपडदा ना ठेवता त्याचा (तत्कालीन ) तुटपुंजा पगार, इतर सांपत्तिक परिस्थिती (नागपूर आणि मुंबई दोन्हीकडे स्वतःचे घर नसणे वगैरे) मुलीला सांगितली. तिनेही तिच्या घराच्या मंडळींविषयी, तिच्या जबाबदाऱ्या याविषयी नवऱ्या  मुलाला प्रांजळपणे सांगितले. दोघेही पुन्हा गुरूघरी परतलेत.




साधारण अर्ध्या तासाने मुलीची आई मुलीला मुलगा पसंत असल्याची शुभवार्ता घेऊन मुलाकडे आली. मुलाकडून तर होकार होताच. लगेच लग्न निश्चिती झाली. संध्याकाळी गुरूघरीच उत्सवात मुलीला श्रीफळ व खण देऊन आणि मुलाला श्रीफळ व दक्षिणा देऊन सदगुरूंसमोर लग्न पक्के करायचे ठरले. त्याप्रमाणे त्याच संध्याकाळी लग्न ठरले. त्याचदिवशी संध्याकाळी नवऱ्या मुलाचे गुरूघरीच उत्सवानिमित्त प्रवचन होते. त्या प्रवचनासाठी मात्र मुलगी साडी वगैरे नेसून आणि मुलगा नवे धोतर वगैरे घालून आलेले होते. लग्न ठरल्या दिवशीच  होणाऱ्या नवऱ्याचे "प्रवचन" वगैरे ऐकावे लागण्याचा प्रसंग हा भारतीय विवाहसंस्थेच्या इतिहासात अत्यंत विरळा असेल.

२३ वर्षांपूर्वीच्या नाथबीजेचा हा ऐतिहासिक प्रसंग. लग्नानंतर त्याने तिला अनेकदा विचारले "त्यादिवशी नेमके काय पाहून तू मला होकार दिलासा ग ?" तिने त्याचे उत्तर देणे कायमच  टाळले. दोघांचे अत्यंत अद्वैत स्वरूपाचे अंतरंग संबंध असतानाही  काहीतरी गंमतीशीर बोलून, थातूरमातूर बोलून ती तो प्रश्न टाळायची. आज ती नवरीच काळाच्या पडद्याआड गेलीय त्यामुळे याचे  उत्तर कधीही मिळणार नाही. आणि तो नवरा मुलगा तिच्या आठवणीत लेख लिहीत बसलाय.



- २२ वर्षात वैभवीशी पुरता एकरूप झालेला तरूण, वैभवीराम.

Saturday, January 21, 2023

Google Cloud

आमच्या कन्यारत्नाशी आमची तिच्या बालपणापासून अभ्यासाच्या बाबतीत स्पर्धा असते. बालपणी अगदी पहिल्या दुस-या वर्गात असताना तिच्या आईनी तिच्या परिक्षेआधी तिच्यासाठी सराव प्रश्नपत्रिका काढली की "तशीच एक प्रश्नपत्रिका तू बाबासाठीही काढ." असा तिचा आग्रह असायचा. मग ती आणि मी आम्ही दोघेही ती सराव प्रश्नपत्रिका वेगवेगळी सोडवायचो. ती प्रश्नपत्रिका तपासतानाही "आई, बाबाला माझ्यापेक्षा एक मार्क कमी मिळाला पाहिजे." हा तिचा आग्रह असायचा.

गेल्या वर्षभरात तिने Cloud Computing चा अगदी ध्यास घेतला आणि Google Cloud च्या Arcade Games मधली खूप Challenges सतत पूर्ण केलीत. त्यासाठी प्रोत्साहन म्हणून Google Cloud ने तिला विविध बक्षिसे (एक कॉलेज बॅग, कॉफ़ी मग, टी शर्ट) पण दिलीत. मग मी पण तिच्याशी असलेल्या शैक्षणिक स्पर्धेतून हा प्रकार नक्की काय आहे ? आणि आपल्याला जमतोय का बघू म्हणून ही Challenges पूर्ण करायची ठरवलीत.




तिच्याएव्हढा वेळ, तिच्याइतके या विषयात समर्पण मी देऊ शकलो नाही हे खरे पण तरीही मी सवड मिळेल तशी एकूण 4 Challenges पूर्ण केलीत. त्यानिमित्त Google Cloud आणि Qwiklabs ने मलाही काही काही भेटवस्तू पाठवल्यात. आणि संगणक क्षेत्रातल्या एका मोठ्या कंपनीने आपल्या या छोट्याशा मुशाफ़िरीची दखल घेतली म्हणून एक स्थापत्य अभियंता हरखून गेला.

(व्हिडीयोची लिंक इथे.)

Friday, January 20, 2023

दुर्मिळ ते काही - ५

 यापूर्वीचे याच मालिकेतील लेख.

दुर्मिळ ते काही - १

दुर्मिळ ते काही - २

दुर्मिळ ते काही - ३

दुर्मिळ ते काही - ४


भारतीय रेल्वेत साधारण WDM 2, WDM 3A, WDM 3D किंवा WDG 3 या प्रकारची जी डिझेल एंजिने असतात त्यात लोको पायलट एंजिनाच्या एका बाजूकडेच असतात. लोको पायलट केबिन पासून एंजिनांची एक बाजू जास्त लांबीची तर एक बाजू थोडी कमी लांबीची असते. आम्ही रेल्वे फ़ॅन्स त्यांना अनुक्रमे Long Hood व  Short Hood म्हणून ओळखतो.



                      This is the Loco with  Short Hood Front (SHF mode). 


This is the Loco with  Long Hood Front (LHF mode).

साधारण 1978- 1979 च्या आसपास डिझेल लोकोमोटिव्ह कारखाना, वाराणसी येथून विशिष्ट प्रकारचे Short Hood असलेली फ़क्त काही एंजिने बाहेर पडलीत. लोको पायलट ची दृश्यमानता अधिक व्हावी या दृष्टीने हा प्रयोग झाल्याचे कळते. पण काही कालावधीत लोको पायलट्स नी जुनी एंजिने आणि ही नवीन एंजिने यांच्या दृश्यमानतेत फ़ारसा फ़रक नसल्याचा फ़ीडबॅक दिला असावा. मग अशा प्रकारच्या एंजिनांचे उत्पादन थांबवण्यात आले. एका एंजिनाचे आयुष्य साधारण 35 वर्षे असल्याने 2013 - 2014 पासून ही एंजिने दिसणे हळूहळू बंद होत गेले. आता तर ही एंजिने फ़क्त रेल्वे संग्रहालयातच दिसू शकतील.


This is the Short Hood in normal shape 

AND


This is the Short Hood in "Jumbo" shape.


                                  This is the Short Hood in "Jumbo" shape.

28 नोव्हेंबर 2013 आम्ही सोलापूर - पुणे महामार्गावरून दौंड कडे वळून श्रीक्षेत्र सिद्धटेक येथे जात होतो. मध्येच रेल्वे फ़ाटक लागले. रेल्वेप्रेमी असल्याने मार्गातले फ़ाटक बंद असले की वैताग न वाटता ती आम्हाला फ़ोटो / व्हिडीयो वगैरेंसाठी पर्वणी वाटत असते. याहीवेळी मी गाडीखाली उतरून कॅमेरा सज्ज केला. दौंडकडून दोन डिझेल एंजिने एक BTPN रेक (इंधन तेल घेऊन येणा-या वॅगन्स) घेऊन येताना दिसलीत. जवळ आल्यानंतर पहिला धक्का बसला ती म्हणजे दोन्ही एंजिनांचे Long Hood पुढे होते. आणि आणखी जवळ आल्यानंतर पुढचा धक्का बसला तो म्हणजे दोन्ही एंजिने जम्बो प्रकाराची होती. जम्बो प्रकारचे एक एक एंजिन दिसणेच जिथे दुर्मिळ तिथे दोन दोन जंबो एंजिने एकसाथ दिसणे म्हणजे दुर्मिळातली दुर्मिळ घटना होती. 


गुंतकल शेड (दक्षिण मध्य रेल्वेची) ही दोन जम्बो एंजिने बहुधा पुण्याजवळच्या लोणी येथून इंधन घेऊन वेगात दक्षिणेकडे निघालेली होती.


संपूर्ण व्हिडीयो इथे. 


- इहलोकीच्याच नव्हे तर परलोकी नेणा-या प्रवासालाही कधीही न वैतागणारा रेल्वेफ़ॅन राम.




Thursday, January 19, 2023

कोविड चा आणखी एक बळी. : होता होता राहिलेले एक रेक शेअरींग.

साधारण ९० च्या दशकाच्या मध्यापर्यंत दरवर्षी रेल्वे बजेटमध्ये घोषणा झालेल्या ९० % गाड्या त्याचवर्षी १ जुलै ला सुरू व्हायच्यात. तशी शिस्त रेल्वे बोर्ड आणि विभागीय मंडळे पाळायचीतच. मध्यंतरीच्या काळात लालू, नितीश, ममता सारखी समाजवादी मंडळी रेल्वे मंत्री बनलीत आणि त्यांच्या भोंगळ कारभारात रेल्वेची एकंदरीतच शिस्त लयाला गेली. रेल्वे बजेटमध्ये घोषणा केलेल्या गाड्या त्या वर्षभरात कधीही सुरू होऊ लागल्यात. काहीकाही गाड्या तर पुढल्या वर्षी, त्याच्या पुढल्या वर्षी कधीही सुरू होऊ लागल्यात. काहीकाही गाड्या तर संसदेच्या पटलावर घोषणा होऊनही कधीच सुरू झालेल्या नाहीत. उदाहरणार्थ २०११ मध्ये ममता बॅनर्जी बाईंनी रेल्वे बजेटनंतर संसदेत विशेष घोषणा केलेली नागपूर - नवी दिल्ली सुपरफास्ट आज १२ वर्षानंतरही सुरू झालेली नाही. (त्यासंबंधीचा लेख इथे आणि इथे.)

१ जुलैला नवीन गाड्या सुरू होत असल्याने आम्हा सर्व रेल्वेप्रेमींचे लक्ष जूनच्या शेवटल्या आठवड्यात रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या रेल्वे वेळापत्रकांवर असे. असे वेळापत्रक आल्याची बातमी आमच्या रेल्वेप्रेमी याहू मेल लिस्टवर आली रे आली की त्यादिवशी लगोलग रेल्वे स्टेशन गाठणे, ते रेल्वे वेळापत्रक हस्तगत करणे, त्याचा सखोल अभ्यास करणे (म्हणजे एखाद्या मार्गावर धावणाऱ्या जुन्या गाड्यांपैकी कुणाच्या वेळापत्रकात कुठे काही क्रान्तिकारी बदल झालाय का ? यावर्षी नव्याने येणाऱ्या गाडयांसाठी कुठली नवीन वेळ रेल्वेने ठरवलीय वगैरे वगैरे.) या सर्व अखिल भारतीय अभ्यासाला एखाद्या तज्ञ रेल्वेप्रेमीला ३ ते ४ तास पुरत असत. 


नंतर मग इंटरनेटचा प्रसार झपाट्याने झाला. वेळापत्रके ऑनलाईन उपलब्ध होऊ लागलीत. याहू मेल लिस्ट जुनी ठरून रेल्वे प्रेमींचे अड्डे व्हॉटसएप वर जमू लागलेत. अशाच एका अत्यंत विश्वासार्ह रेल्वेप्रेमींच्या व्हॉटसएप ग्रुपवर २०१९ संपता संपता  एक बातमी आली की १ एप्रिल २०२० पासून मुंबई - हावडा गीतांजली एक्सप्रेस आणि मुंबई - हावडा मेल यांचे आरक्षित तिकिटांचे बुकिंग तात्पुरते थांबवणार आहेत. रेल्वे आरक्षणे १२० दिवस आधी उघडतात मग आमच्यापैकी प्रत्येक उत्साही रेल्वेप्रेमीने १ जानेवारी २०२० रोजी १ एप्रिल २०२० ची रेल्वे आरक्षणे उघडल्या उघडल्या या बातमीची पुष्टी करण्याकरिता उगाचच मेल आणि गीतांजलीचे आरक्षण करून पाहण्याचा प्रयत्न केला. पण खरोखर या दोन गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध नव्हत्याच. काहीतरी मोठा घोळ होता हे नक्की.

शेरलॉक होम्स म्हणतो त्याप्रमाणे "When you have eliminated all which is impossible, then whatever remains, however improbable, must be the truth" या अचानकच्या बदलामागे एकच शक्यता उरत होती. ती  म्हणजे या दोन गाड्यांचे रेकी शेअरींग. मेल आणि गीतांजलीचे रेकी शेअरींग अशक्य कोटीतले का वाटतं होते याबद्दलचे विवेचन परिशिष्ट १ मध्ये केलेले आहे.



सध्याची १२८०९ डाऊन / १२८१० अप मेल (ब्रिटीश काळापासूनची १ डाऊन/ २ अप, १९९० मध्ये गाड्यांचे चार अक्षरी नंबर आल्यानंतर ८००१ डाऊन / ८००२ अप आणि नंतर सुपरफास्ट दर्जा मिळाल्यानंतर २८०९ डाऊन / २८१० अप ) मुंबईवरून रोज रात्री ९ वाजून १० मिनिटांनी निघते आणि भुसावळ - वर्धा - नागपूर - दुर्ग - बिलासपूर - टाटानगर मार्गे हावड्याला तिसऱ्या दिवशी सकाळी ६.०० वाजता पोहोचते. परतीच्या प्रवासात तीच गाडी रोज संध्याकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी हावड्यावरून निघून पुन्हा तिसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून २५ मिनिटांनी मुंबईला येते. म्हणजे या गाडीसाठी दक्षिण - पूर्व रेल्वेला ४ रेक्स कायमचे द्यावे लागणार. (उदाहरणार्थ : मुंबईवरून सोमवारी निघालेला एक रेक  बुधवारी सकाळी हावडा आणि बुधवारी संध्याकाळी तोच रेक परत निघून शुक्रवारी सकाळी मुंबई. म्हणजे सोमवारचा रेक परत शुक्रवारी वापरता येणार. म्हणजे एकूण सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे चार रेक्स लागणार. मंगळवारचा रे्क शनिवारी, बुधवारचा रविवारी तर गुरुवारचा पुढल्या सोमवारी असे त्या रेक्सचे संचालन असणार.)

तसेच आजकालची १२८५९ डाऊन / १२८६० अप गीतांजली एक्सप्रेस (जुन्या काळाची ५९ डाऊन / ६० अप किंवा १९९० मध्ये चार आकडी नंबर गाड्यांना दिल्यावर २८५९ डाऊन / २८६० अप) ही मुंबईवरून दररोज सकाळी ६.०० वाजता निघते आणि मेलच्याच मार्गाने १९६२ किमी चे अंतर ३० तास ३० मिनिटांत पार पाडून दुसऱ्याच दिवशी दुपारी १२.३० ला हावड्याला पोहोचते. परतीच्या प्रवासात हीच गाडी हावड्यावरून दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी निघून दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजून २० मिनिटांनी मुंबईला येते. म्हणजे या गाडीसाठी दक्षिण - पूर्व रेल्वेला ४ रेक्स कायमचे द्यावे लागत असणार. (उदाहरणार्थ : मुंबईवरून सोमवारी निघालेला एक रेक  मंगळवारी दुपारी  हावडा. पण हावड्याला दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी पोहोचून हा रेक लगेच २ वाजून ५ मिनिटांनी परतीच्या प्रवासाला निघणे जवळपास अशक्य आणि अवांछित सुद्धा. हा रेक दक्षिण पूर्व रेल्वेच्या हावडा विभागाचा असतो. याची  प्राथमिक देखभाल  हावड्याला होत असते. दुय्यम देखभाल मुंबईतल्या वाडी बंदर यार्डात. केवळ दीड  तासात प्राथमिक देखभाल पूर्ण होऊन हा रेक परत धावणे केवळ अशक्य. म्हणून मंगळवारी पोहोचलेला हा रेक तब्बल २५ तासांच्या विश्रांती नंतर  बुधवारी दुपारीच परतीच्या प्रवासाला निघणार हे नक्की. बुधवारी दुपारी  तोच रेक परत निघून गुरुवारी रात्री  मुंबई. म्हणजे सोमवारचा रेक परत शुक्रवारीच  वापरता येणार. म्हणजे मेलच्या रेक्ससारखेच एकूण सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे चार रेक्स लागणार.)



थोडक्यात म्हणजे २०१९ ला (आणि आत्तासुद्धा) या  दोन गाड्या मिळून दक्षिण पूर्व रेल्वेला ८ डेडिकेटेड रेक्स लागत असणार. त्याऐवजी.... 

.... या दोन्हीही गाड्यांच्या धाववेळेत थोडी बचत करून यांचे रेक शेअरींग केले तर एक किंवा दोन रेक्सची  बचत होऊ शकते हा विचार २०१९ मध्ये रेल्वे बोर्डाच्या कुठल्यातरी अधिकाऱ्याच्या मनात आला आणि पुढील विचार पक्का होऊन दोन्हीही गाड्यांचे वेळापत्रक ठरेपर्यंत या दोन्हीही गाड्यांचे आरक्षण प्रलंबित ठेवण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतलेला असण्याची शक्यता होती.

विचार १.  दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी हावड्याला पोहोचलेली गीतांजली त्याच रात्री ७ वाजून ५० मिनिटांनी मेल म्हणून हावड्यासाठी सोडायची. म्हणजे सोमवारी मुंबईवरून निघालेला रेक मंगळवारी हावडा आणि परत गुरुवारी सकाळी मुंबई. म्हणजे तोच रेक गुरुवारी संध्याकाळी मेल म्हणून पाठवला तर शनिवारी सकाळी हावडा आणि तोच रेक शनिवारी दुपारी २ वाजता हावड्यावरून गीतांजली म्हणून निघून रविवारी रात्री मुंबई. म्हणजे या रचनेत या दोन्हीही गाड्या मिळून रेल्वेला ७ च रेक्स वापरावे लागणार होते.

प्राथमिक देखभालीसाठी प्रत्येक रेक ला ७ ते ८ तास हावड्याला मिळत होते तेव्हढे पुरेसे होते. (सकाळी ६. ०० ते दुपारी २. ०० आणि दुपारी १२. ०० ते संध्याकाळी ७. ००)

विचार २. दोन्हीही गाड्यांच्या वेळापत्रकात  बदल करून (धाववेळ कमी करून) फक्त ६ रेक्स मध्ये दोन्हीही गाड्या चालवता येतील. मुंबईवरून अगदी ब्रिटीश काळापासून संध्याकाळी ७ ते ९ च्या मध्ये निघणारी मेल रात्री १०.३० च्या आसपास मुंबईवरून काढून जवळपास त्याच वेळेत हावड्याला पोहोचवता आली तर मुंबईत येणारी गीतांजली तशीच प्लॅटफॉर्मला लावून त्याच दिवशी मेल म्हणून पाठवता येईल. इकडे गीतांजलीलाही थोडी वेगवान करून मुंबईत पोहोचण्याची तिची वेळ ही संध्याकाळी ७.३० च्या आसपास करता येईल. तिकडे हावड्याला सकाळी पोहोचलेली मेल दुपारी गीतांजली आणि दुपारी पोहोचलेली गीतांजली संध्याकाळी मेल म्हणून पाठवावी लागेल. त्या वेळेस फक्त ६ रेक्समध्ये दोन्हीही गाड्या चालवता येतील.

तसेच सध्या मुंबईवरून सकाळी ६. ०० वाजता निघणारी गीतांजली थोडा  वेग वाढवून सकाळी ८. ०० च्या आसपास मुंबईवरून निघाली तरी सध्याच्याच वेळेत हावड्याला पोहोचू शकते. म्हणजे मुंबईत पहाटे येणाऱ्या मेलला  गीतांजली म्हणून रवाना करता येईल. या रचनेत फक्त ६ रेक्समध्ये दोन्हीही गाड्या चालवता येतील.

एक रेक सोमवार सकाळ गीतांजली म्हणून मुंबईवरून निघेल मंगळवार दुपारी हावड्याला पोहोचेल. मंगळवारी संध्याकाळी हावड्यावरून मेल म्हणून निघेल आणि गुरुवारी पहाटे  मुंबईत परतेल. गुरुवारी सकाळी तोच रेक पुन्हा गीतांजली म्हणून निघू शकेल. म्हणजे सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे तीन रेक  या गाडीसाठी लागतील. तसेच सोमवारी रात्री मुंबईवरून निघालेली मेल बुधवारी सकाळी हावडा आणि बुधवारी दुपारी तोच रेक गीतांजली म्हणून निघून गुरुवारी संध्याकाळी मुंबईत येईल. त्याच दिवशी रात्री तोच रेक पुन्हा मेल म्हणून रवाना होऊ शकेल. म्हणजे इथेही सोमवार, मंगळवार आणि बुधवार असे तीनच  रेक लागतील. एकूण ६ रेक्स.

पण फ़ेब्रुवारी २०२० मध्ये कोविडची गडबड सुरू झाली. मार्च २०२० मध्ये देशभर लागलेल्या लॉकडाऊनमध्ये भारतीय रेल्वेने सगळ्याच गाड्या रद्द केल्यात. काही महिन्यांनी हळूहळू एक एक रेल्वे गाड्या सुरू झाल्यात ख-या पण नंतर हा रेक शेअर शेअरींग चा विचार बारगळला असे दिसते.

परिशिष्ट १ : ४ नोव्हेंबर १९७९ रोजी सुरू झालेली गीतांजली एक्सप्रेस ही तत्कालीन रेल्वेमंत्री प्रा, मधू दंडवते यांच्या कल्पनेतून आलेल्या "वर्गविरहीत" रेल्वे गाड्यांपैकी पहिली गाडी होती. या गाडीला आजपर्यंत प्रथम वर्गाचा डबा लागलेला नाही. जरी प्रथम वर्गापेक्षा जास्त ऐशोआरामी आणि महाग तिकीट असलेले त्रिस्तरीय शयनयान आणि द्विस्तरीय शयनयान (सामान्य भाषेत थर्ड एसी आणि सेकंड एसी) हे डबे या गाडीला लागत आलेले आहेत. नावात "सेकंड" आहे ना, मग ठीक आहे असा निव्वळ समाजवादी ढोंगीपणा इथे दिसतो. पण प्रथम वर्ग विना वातानुकूल किंवा प्रथम वर्ग वातानुकूल हे डबे या गाडीच्या रेकमध्ये कधीही नसतात.

याउलट मेल ला पहिल्यापासून प्रथम वर्ग आणि आता तर वातानुकूल प्रथम वर्गाचा डबा लागत आलेला आहे. या दोन गाड्यांचे रेक शेअरींग करायचे असेल तर एक तर मेलचा प्रथम वर्ग वातानुकूल डबा काढावा लागेल किंवा गीतांजलीच्या रेकमध्ये प्रथम वर्ग वातानुकूल वर्गाचा डबा स्वीकारावा लागेल. यातला दुसरा पर्याय प्रत्यक्षात येण्याची शक्यता जास्त होती. जवळपास ४५ वर्षांनी गीतांजलीला प्रथम वर्गाची ओळख झाली असती.




- मुख्य लेखात इतर माहितीचा फ़ापटपसारा नको म्हणून आपल्या प्रतिपादनात परिशिष्टामागून परिशिष्ट जोडणारा, एक रेल्वेप्रेमी लेखक प्राध्यापक, वैभवीराम.

(संबंधित इतर लेख इथेइथे आणि  इथे .)

http://railandbusfanning-ram.blogspot.com/2013/12/blog-post.html

http://railandbusfanning-ram.blogspot.com/2021/05/blog-post_06.html

http://railandbusfanning-ram.blogspot.com/2020/10/blog-post_13.html




Sunday, January 15, 2023

नववर्ष, नवनवे संकल्प आणि गणितातला एक फ़सलेला प्रयोग.

 नववर्ष सुरू झाले की अनेक मंडळी नवनव्या उत्साहाने नवनवे संकल्प करीत असतात. बरीच मंडळी ते संकल्प मस्तपैकी तडीला नेतातही. 1989 मध्ये मी दररोज डायरी लिखाणाचा संकल्प सोडला होता. तो चांगला 12 वर्षे चालला. तसाच रोजचा खर्च लिहून ठेवण्याचा संकल्पही माझी विद्यार्थी दशा होईपर्यंत नियमित टिकवला होता. आम्ही कराड अभियांत्रिकी महाविद्यालयात हॉस्टेलला रहायचोत. वडील दर महिन्याला आपल्या पोटाला चिमटा घेऊन, आई संसारातल्या इतर गरजांमध्ये काटकसर करून पैसे पाठवायचेत. आई वडीलांनी रक्ताचे पाणी करून मिळवलेल्या पैशाचे आपण फ़क्त ट्रस्टी आहोत. त्याचा हिशेब त्यांनी कधीही मागितला नाही तरी आपल्या खर्चावर आपलेच नियंत्रण रहावे हा हेतू या खर्च लिखाणामागे होता. त्यामुळे शिक्षण पूर्ण होऊन चांगली नोकरी लागेपर्यंत हा हिशेब लिखाणाचा संकल्प टिकला.


2014 मध्ये जानेवारीत असाच एक संकल्प मी सोडला होता. तेव्हा मी सांगोला येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य विभागप्रमुख म्हणून कार्यरत होतो. ही जबाबदारी पर्यवेक्षकीय स्वरूपाची होती. महाविद्यालय आणि आमचा विभाग नवीनच अस्तित्वात आल्याने खूप कामांचे नियोजन करणे, आणि त्यांची अंमलबजावणी करणे या स्वरूपाची ही जबाबदारी होती. 2012 पासूनच डायरीची पाने नियोजन आणि त्याची अंमलबजावणी यात गुंतलेली होती. रोज आखलेली सगळीच कामे पूर्णत्वास जातात असे नाहीच. रोज आखलेल्या कामांपैकी कधी 50 % कामे, कधी 100 % कामे तर कधी 0 % सुद्धा कामे व्हायचीत. पण अशा कामांचे सगळे पुनर्नियोजन पुन्हा दुस-या दिवशी  करावेच लागते हे शहाणपण तोपर्यंत आलेले होते. त्यामुळे 0 % कामे झालीत तरी खचून न जाता पुन्हा नवी मांडणी करायची हा निर्धार होता. एकंदर मोठी मौजच होती. जबाबदारी मनापासून एंजॉय करणे सुरू होते.


1 जानेवारी 2014 पासून मी डायरीत रोज नियोजन केलेल्या कामांपैकी किती टक्के कामे झालीत याचा आढावा घ्यायला आणि रोज त्यांची टक्केवारी काढायला सुरूवात केली. सहज चाळा म्हणून एक्सेलमध्ये रोजच्या कामांची टक्केवारी लिहायला सुरूवात केली आणि त्यांची रोज बदलत जाणारी सरासरी रेषा काढायला सुरूवात केली. महिन्यातले जास्तीत जास्त दिवस आपण त्या सरासरी रेषेच्या वर काम करायचे की आपण यशस्वी झालो असा गणिती निष्कर्ष आपण काढू असा माझा प्रयोग होता.


पहिल्या दिवशी उत्साहात आपण नियोजन केलेल्यापैकी 100 % कामे करतोच हा सगळ्यांचाच अनुभव आहे. तशी ती पहिल्या दिवशी झालीही. दुस-या दिवशी काही अनाकलनीय कारणाने नियोजन केलेल्यापैकी 0 % कामे झालीत. सरासरी एकदम 50 % वर आली. मग 2 जानेवारीला सरासरीपेक्षा 1 दिवस वर आणि 1 दिवस खाली अशी कार्यक्षमता आली.


तिस-या दिवशी 80 % कामे पार पाडलीत. मग सरासरी 60 % आली. 2 दिवस सरासरीपेक्षा जास्त आणि 1 दिवस कमी. चौथ्या दिवशी 70 % कामे पार पाडलीत मग 4 दिवसांची सरासरी 62.5 % म्हणजे मग 1 जानेवारी, 3 जानेवारी आणि 4 जानेवारी असे तीन दिवस सरासरीपेक्षा जास्त काम आणि 2 जानेवारी रोजी सरासरीपेक्षा कमी काम असे चित्र झाले.

मी हा उपक्रम जानेवारी 2014 ते एप्रिल 2014 असा चार महिने चालवला. त्यातली गणितीय गंमत लक्षात आल्यानंतर मात्र हा उपक्रम थांबवला. गणितीय गंमत अशी की जितक्या जास्त कार्यक्षमतेने रोज आपण कामे करू तितकी ती सरासरी रेषाही वाढत जाते आणि काही दिवसांपूर्वी एखाद्या दिवसाची सरासरी त्या रेषेवर असेल ती काही दिवसांनी सरासरी रेषा वर गेल्याने सरासरीपेक्षा खाली जाते. 120 दिवसांनंतर 60 दिवस सरासरीपेक्षा जास्त आणि 60 दिवस सरासरीपेक्षा कमी असे चित्र निर्माण झाले. आणि नंतर हिशेब मांडल्यानंतर लक्षात आले की कितीही दिवसांनंतर 50 % दिवस सरासरी रेषेवर आणि उरलेले 50 % सरासरी रेषेखाली हेच चित्र कायम राहणार. रोज अगदी 100 % कामे केलीत तर सरासरी 100 % राहील आणि रोजच्या कामांएव्हढी सरासरी गाठली जाईल. रोज 100 % कामे करणे म्हणजे निव्वळ आदर्श व्यवस्था.

मग त्या निष्कर्षानंतर हा प्रयोग थांबवला. संशोधनातून आपण मांडलेले प्रमेय सिद्ध करण्याचा अट्टाहास नसावा कधीकधी आपला hypothesis सिद्ध झाला नाही तरी alternate hypothesis सिद्ध होतोच हे ज्ञान पी. एच. डी. पूर्वीच मिळाले. हे ही नसे थोडके.

- प्रत्येक फ़सलेल्या प्रयोगांमधून नवनवीन शिकवण घेणारा विद्यार्थी, कुमार राम प्रकाश किन्हीकर, इयत्ता बिगरी. (हे असे कायम शिकत राहिल्याने आपली गणना बिगार भरतीत होत नाही याचा आनंद मानणारा एक चांगला विद्यार्थी.)

Saturday, January 14, 2023

लुना, हेडलाईट आणि RTO ची भिती वगैरे.

आजकालच्या गाड्यांचे (मोटारसायकल, बाईक्स वगैरेही) Projector Headlamps, halogen lights वगैरे पाहिले आणि आम्हाला आमच्या तारूण्यातली Luna आठवली हो.

उण्यापुऱ्या ४८ सीसी ची ती गाडी. तिच्या दिव्याचा प्रकाश तो किती पडणार ? त्यातही High Beam आणि Low Beam प्रकाशात काही फरक असतो हे लुनाच्या बाबतीत तरी आमच्या लक्षात येत नसे. उगाचच काहीतरी प्रथा म्हणून ते High Beam / Low Beam चे बटण त्या गाडीच्या हँडलवर दिलेले आहे असे आम्हाला वाटे. ते बटणही प्रचंड तकलादू असायचे. हमखास तुटायचे. गाडी नवीन असताना पहिल्या दोन वर्षात वर्कशाॅपमधून ते बटण नवीन बसवून आणण्याचा उरक असे. (गाडी नवीन असताना पहिल्या आठवड्यात आपण उत्साहाच्या भरात चाकांचे स्पोक्स तर चकाचक पुसतोच पण कधीकधी टायरही पुसून घेतो तसेच हे.)
त्या काळी आपल्या वाहनाच्या High Beam चा रस्त्याने जाणार्या इतर वाहनांना त्रास होऊ नये म्हणून प्रत्येक स्वयंचलित वाहनांच्या हेडलाईटसचा वरचा अर्धा भाग काळ्या रंगाने रंगवला पाहिजे असा तत्कालीन RTO चा दंडक होता. सगळे ट्रक्स, बसेस, कार्स तसे हेडलाईटस झाकून असत. लुनाच्या लाईटसचा मूळचाच प्रकाश इतका पिंगट, धुवट आणि क्षीण असे की पुन्हा तो हेडलाईट अर्धा काळा रंगवणे म्हणजे एक निरर्थक कवायत वाटे. पण RTO च्या दंडाच्या भीतीने ते करावे लागे. आताशा तो नियम अस्तित्वात नसावा असे वाटते कारण आजकाल कुठलीच गाडी अशी दिसत नाही. ज्या कुणा अधिकार्याच्या लक्षात या नियमाचा फोलपणा लक्षात येऊन त्याने तो नियम मागे घेण्यासाठी हालचाल केली असेल तो खरोखरच बुध्दिमान आणि इतरांविषय सहसंवेदनाधारक वृत्तीचा असला पाहिजे. त्याला / तिला सलाम.
- रात्री रस्त्यावर दिवे असताना आपण आपल्या लुनाचा लाईट लावलाय खरा पण तो सुरू झालाय की नाही याची खात्री करायला उजवा हात त्या छोट्याशा accelarator वर आणि डावा हात लाईटसमोर धरून त्या मिणमिणत्या प्रकाशाची खात्री करणारा (आपल्याला रस्ता दिसण्यासाठी त्या लाईटचा फारसा उपयोग नसला तरी पुढून येणार्या वाहनांना आपले अस्तित्व कळले पाहिजे म्हणून तो लाईट उपयोगी आहे हे मानणारा) लुनाचालक तरूण, रामभाऊ.