Tuesday, July 20, 2021

मध्य रेल्वेः नागपूर विभाग, एक गरीब बिच्चारा विभाग.

 अरे वा ! शेवटी महाराष्ट्र एक्सप्रेस मध्यप्रदेशमधल्या रीवापर्यंत वाढवण्याचा निर्णय मागे घेतला तर.

मला वाटलं होतं की या गतीने आणि गाड्या पळविण्याच्या वृत्तीने ही गाडी
२०२१ मध्ये रीवा,
२०२२ मध्ये प्रयागराज,
२०२३ मध्ये मंडुआडीह,
२०२४ मध्ये मालदा टाऊन,
२०२५ पर्यंत कामाख्या
आणि
२०२६ मध्ये आगरताळ्यापर्यंत ही गाडी नेऊनच रेल्वेवाले स्वस्थ बसताहेत की काय ?
तरी बरं, इकडे कोल्हापूरला dead end आहे म्हणून. उद्या कोल्हापूर - रत्नागिरी रेल्वे मार्ग झालाच तर ही गाडी रत्नागिरी, कणकवली, करमाळी, मडगाव, मंगलोर, शोरनूर, एर्नाकुलम, थिरूवनंतपुरम मार्गे कन्याकुमारीपर्यंत वाढवली असती.
मध्य रेल्वेचा नागपूर विभाग हा "मुकी बिचारी कुणीही हाका" असा आहे ? की यांनाच आपल्या गाड्यांचा maintenance करण्याचा कंटाळा येतो ? हे कळण्यापलिकडचे आहे.
नागपूर - कोल्हापूर दीक्षाभूमी एक्सप्रेस पार धनबादपर्यंत पळवली.
नागपूरकर चाकरमान्यांना नागपूरवरून रविवारी संध्याकाळी ६.०० वाजता निघून सोमवारी सकाळी ७.३० पर्यंत मुंबईत पोहोचवणारी, अत्यंत सोयीची, समरसता एक्सप्रेस पार हावड्यापर्यंत (ती पण चक्रधरपूर - पुरूलिया या आडमार्गाने) पळवली.
सिकंदराबाद - नागपूर एक्सप्रेस रायपूरपर्यंत पळवली.
विदर्भ आणि महाराष्ट्र एक्सप्रेस या गाड्या गोंदियाच्या तत्कालीन खासदारांच्या दबावाखाली उगाचच गोंदियापर्यंत वाढवल्या.



Computerised ticketing system च्या आजच्या काळात खरेतर गेल्या १५ वर्षांपासून आजवर किती प्रवाशांनी गोंदिया / तुमसर / भंडारा येथून थेट मुंबईपर्यंत प्रवास केलाय ह्या माहितीचे विश्लेषण काही मिनीटांत होईल आणि ९५ % प्रवासी नागपूरवरून प्रवास करताहेत हे लक्षात येईल. (कामठी ते मुंबई प्रवास करणारे प्रवासीही नागपूरचेच पकडायला हवेत कारण नागपूर - मुंबई प्रवासासाठी pooled quota waiting list लागल्यावर त्यात तिकीट घेऊन वाट बघत बसण्यापेक्षा सरळ ४० - ५० ₹ जास्त दराने उपलब्ध असलेले कामठी ते मुंबई boarding at Nagpur असे तिकीट सगळे काढतात हे उघड गुपीत आहे.)
मग विदर्भ आणि महाराष्ट्र पुन्हा नागपूरवरूनच सोडून त्या गाड्यांच्या वेळात गोंदिया - नागपूर - गोंदिया या मार्गावर सर्व अप डाऊन करणार्यांना सोयीची, सर्व स्टेशनांवर थांबणारी, झपकन वेग घेणारी, चढ उतार करायला सोयीची अशी "मेमू" (Mainline Electric Multiple Unit) लोकल सुरू करायला हवी.
मध्येच सेवाग्राम एक्सप्रेसलाही रामटेकपर्यंत वाढवण्याची एक अशीच हास्यास्पद मागणी पुढे आली होती. आतासुध्दा सेवाग्राम एक्सप्रेस नवीनच रूंदीकरण केलेल्या मार्गाने छिंदवाड्यापर्यंत वाढविण्याचीही चर्चा सुरू आहेच.
आता नागपूर दुरांतो भोपाळपर्यंत वाढवा म्हणजे सुटलात सगळे.
नागपूरच्याच सगळ्या गाड्या यांना बरोबर सापडतात ते. इतके वर्षांपासून सुरू असलेली गोंदिया - बरौनी एक्सप्रेस कधी नागपूरपर्यंत (मध्य रेल्वेची एव्हढीच allergy असेल तर तुमच्या हद्दीत असलेल्या इतवारीपर्यंत तरी ?) वाढवण्याची साधी मागणीही होत नाही.
गोंदिया - रायगड जनशताब्दी, गोंदिया - झारसुगडा पॅसेंजर कम एक्सप्रेस, उन्हाळी मौसमात सुरू होत असलेली गोंदिया - हावडा उन्हाळी विशेष या गाड्यांच्या मार्ग विस्तारावर नागपूरकरांचे कधीच लक्ष जात नाही. इथल्या प्रवासी संघटनांमध्येही सगळ्या अमराठी लोकांचे वर्चस्व असल्याने ते पण नागपूरच्या गाड्या मध्यप्रदेशात, छत्तीसगढमध्ये वाढवायला विरोध करीत नाहीत.
हैद्राबाद - तिरूपती एक्सप्रेसचा विस्तार पहिल्यांदा निजामाबाद आणि नंतर आदिलाबादपर्यंत होतो. पण आदिलाबादवरून १८० किमी दूर असलेल्या नागपूरपर्यंत होत नाही. याउलट नंदिग्राम एक्सप्रेसचा नागपूर ते नांदेड मार्ग रद्द करून ही गाडी नांदेडपर्यंतच धावते.
आता गरज आहे नागपूरच्या लोकप्रतिनिधींनी यावर ठाम भूमिका घेण्याची. नागपूरकरांनी एक गब्बर शेर खासदार म्हणून संसदेत पाठवलाय हे दाखवून देण्याची.
याबाबत चंद्रपूरचे माजी खासदार हंसराजभैय्या अहिर यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. चंद्रपूर / बल्लारशहाला रेक मेन्टेनन्स सोयी नाहीत म्हणून मुंबई - बल्लारशहा, पुणे - बल्लारशहा या गाड्या त्यांनी काजीपेठ पर्यंत वाढवायला परवानगी दिली पण या दोन्ही गाड्यांना वर्धेपर्यंत आरक्षणाचा जनरल कोटा ठेवायला त्यांनी आग्रह धरला आणि तसे करून घेतले. म्हणजे काजीपेठ - मुंबई किंवा पुणे प्रवासा इतकीच तिकीटे बल्लारशहा / चंद्रपूर / वरोरा / हिंगणघाट / वर्धा ते मुंबई किंवा पुणे या प्रवासासाठी उपलब्ध असतात आणि प्रवाशांची गैरसोय होत नाही.
पण अशी उदाहरणे विरळा आहेत.
- नागपूर विभागावर रेल्वेतर्फे होत असलेल्या घोर अन्यायाचा एक मूक दर्शक , रेल्वेफॅन राम.

No comments:

Post a Comment