Wednesday, May 23, 2018

मनाचे श्लोक - ९


मना वीट मानू नको बोलण्याचा
पुढे मागुता राम जोडेल कैचा
सुखाची घडी लोटता सूख आहे
पुढे सर्व जाईल काही न राहे II २५ II


आजकाल आपण बघतोय की निःस्वार्थ बुध्दीने कुणाच्या हिताचे कुणाला सांगायला गेलो तर प्रथम त्या उपदेशकर्त्याच्या हेतूबद्दलच शंका उपस्थित लोक करतात. ज्या माणसाला हा उपदेश केला जातो त्याचा अहंकारही उपदेश ऐकण्याच्या व त्याला आचरणात आणण्याच्या आड येतो. उपदेशकर्त्याबद्दल "हा कोण लागून गेला टिक्कोजीराव ? याला काय कळणार ? ज्याचे जळते त्यालाच कळते." आदि विचार साधकाच्याही मनात येणे स्वाभाविक आहे. अशावेळी आपल्या हिताचे पण वेळप्रसंगी कटू बोलणे करणा-या हितचिंतकाचा साधकाला वीट येऊ शकतो. 

पण समर्थ परमार्थ मार्गावरील साधकांना सावधान करताहेत. ते सांगताहेत की अशा बोलण्याचा वीट येऊन उपयोग नाही. उलट अंतर्मुख होऊन त्या बोलण्याचा साधकाने विचार करावा आणि आपले हित साधून घ्यावे. आपल्या हिताचे आपण केले तर श्रीमदभगवद्गीतेत सांगितलेल्या स्वधर्मपालनाकडे आपली वाटचाल अधिक सुकर होत जाईल आणि राम जोडला जाईल. आपणच आपल्या अविचारी वागण्याने आपले अहित करण्याचे ठरविले तर आपल्यासोबत परमेश्वर कसा बरे जोडला जाईल ? समर्थांचा "विचार" , "विवेक" या शब्दांवर फ़ार भर आहे. साधकाने विचारांची, विवेकाची कास कधीही सोडू नये याबद्दल त्यांना फ़ार कळवळा आहे.

समर्थ पुढे साधकांना सांगताहेत की बाबांनो, या भौतिक सुखांसाठी विवेकाचा त्याग करून अप्रिय पण हितकर अशा उपदेशाचा वीट मानू नका. कारण या भौतिक जगातली सुखे क्षणभंगूर आहेत. सुख आणि दुःख यांचा सतत पाठशिवणीचा खेळ या जगतामध्ये सुरू असतो. त्यामुळे आजच्या क्षुद्र सुखासाठी विचारांचा, विवेकबुध्दीचा त्याग करू नका कारण तात्पुरत्या अशा भौतिक सुखांना काही कालावधीनंतर शून्य किंमत प्राप्त होत असते. 

आपण सर्वांनी हा प्रयोग करून पाहण्यासारखा आहे. गेल्या ३ ते ५ वर्षांपूर्वी ज्या एखाद्या गोष्टीची आपल्या स्वतःला प्रकर्षाने ओढ होती आणि ती वस्तू आपल्याला प्राप्त झाली याचे आज आपल्या लेखी सुख किती आहे ? याचा ठोकताळा प्रत्येकाने मांडावा म्हणजे समर्थांच्या वाक्याचा पडताळा येईल.


देहेरक्षणाकारणे यत्न केला
परी सेवटी काळ घेवोनी गेला
करी रे मना भक्ती या राघवाची
पुढे अंतरी सोडी चिंता भवाची II २६ II



आपण सर्वच जण आपल्या देहाची किती काळजी घेत असतो. त्याचे रक्षण व्हावे म्हणून सतत प्रयत्नरत असतो. पण देह कशासाठी ? मला लाभलेला देह हा साध्य आहे की साधन आहे या विवेकाचे आपल्याला विस्मरण होत असते. आजकाल तर आपण सर्वच चार्वाकाचे इतके अनुयायी झालो आहोत की त्याच्या "खाओ, पियो, ऐश करो" या उपदेशाला आपण फ़ारच गांभीर्याने घेतलेय. "देह चांगला टिकावा म्हणून देहाचे लाड" ही समजूत दृढ झालीय. "देश, देव आणि धर्मासाठी या देहाचा पुढे उपयोग होईल म्हणून देह चांगला टिकवला पाहिजे" ही समर्थांची शिकवण तर आपण विस्मृतीतच ढकलली आहे. पण आपण देहाचे कितीही लाड करा, त्या काळापुढे आपले काहीच चालत नाही. काळा, गोरा, खुजा, उंच, देखणा, कुरूप आदि सर्व देहांना कालाधीन होऊन पंचमहाभूतांमध्येच विलीन व्हावे लागते. तर मग या देहाचा सदुपयोग होण्यासाठी याच्या रक्षणाचा विचार का होऊ नये ? 

बरं, "देहाची उत्तम जोपासना केली की माणूस चिंतामुक्त झाला" असे म्हणता येईल का ? खचितच नाही. उलट सुंदर स्त्री पुरूषांनाच त्यांचे सौंदर्य चिरकाल कसे टिकेल याची चिंता सतावत असते. काही काळाने कुठे आपल्या सौंदर्यात उणेपणा तर येणार नाही ना ? ह्या चिंतेत ते बिचारे कायम असतात आणि पुन्हा त्यासाठी अपार प्रयत्न करीत असतात. अशा सर्व लोकांना समर्थ उपदेश करताहेत की "देह कशासाठी ?" "देह साध्य की साधन ?" हा विवेक पक्का झाला की देहाच्या जोपासनेसाठी प्रयत्न जरी केला तरी श्रीरामरायावर सर्व सोपवून भवाच्या चिंतेतून मुक्त व्हा. कसाही देह असला तरी तो साधन म्हणून जनसेवेत, ईश्वरसेवेत झिजवला तर या जन्माचे सार्थक आहे. देहाचे कौतुक नाही. तो काळाचा आहे. त्याच्याकडूनच घेतलाय, त्यालाच अर्पण व्हायचाय हे लक्षात ठेवून जगात वावरा.

भवाच्या भये काय भीतोसी लंडी
घरी रे मना धीर धाकासी सांडी
रघूनायकासारिखा स्वामी शिरी
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी II २७ II


काही काही साधक या भवसागराची कायम भीती बाळगत असतात. अशा प्रसंगी मनमोकळेपणे जगणे, आपले नियत कर्म उत्कृष्टपणे पार पाडणे त्यांच्याकडून होणे दुरापास्तच. अर्जुनाची महाभारत युध्दाच्या वेळी जी अवस्था झाली तीच अवस्था. (वेपथुश्च शरीरे मे...)

अशावेळी समर्थ अगदी भगवान गोपालकृष्णांचाच अवतार धारण करून साधकांना समजावतात. याठिकाणी समजावताना समर्थांनी शिवीचाही वापर केलाय. भगवंत आपल्या लेकरांचा सदैव सांभाळ करतच असतो. कासवी जशी केवळ नजरेनेच आपल्या पिलांचे पालन पोषण करीत असते त्याप्रमाणे श्रीराम आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाहीत असा विश्वास ते साधकांना देताहेत. असा विश्वास एकदा असला म्हणजे साधकाची भीती कमी होईल, कालांतराने दूर होईल आणि साधक त्याचे नियत कर्म निःशंक मनाने आचरू शकेल असा समर्थांना विश्वास आहे.

                                                                        II जय जय रघुवीर समर्थ II

Tuesday, May 22, 2018

श्रीतुकोबांची गाथा - ९




ते माझे सोयरे सज्जन सांगाती I  पाय आठविती विठोबाचे II
येरा मान विधी पाळणापुरते I  देवाची ती भूते म्हणोनिया II
सर्वभावे झालो वैष्णवांचा दास I करीन त्यांच्या आस उच्छिष्टाची II
तुका म्हणे जैसे आवडती हरिदास I  तैशी नाही आस आणिकांची II

संतांना खरेतर आपपर भाव नसतो. हा माझा, हा परका ही धारणा त्यांच्या ठायी अगदीच नसते. पण या ठिकाणी श्रीतुकोबा आपणा सर्वांना त्या ईश्वराच्या नादी लागण्यासाठी हा कृतक कोप करताहेत. श्रीतुकोबा म्हणताहेत की जे लोक माझ्या विठोबाचे पाय आठवतात तेच माझे नाते्वाईक आहेत. इतरांशी श्रीतुकोबांचे नाते आहे ते केवळ ती सगळी भूते देवाचीच लेकरे आहेत म्हणून. श्रीतुकोबा सर्वाभूती भगवदभाव ठेवताहेत पण विशेष ममत्व मात्र वैष्णवांबद्दलच बाळगताहेत. याठिकाणी "वैष्णव" कोण ? तर संत नरसी मेहतांनी म्हटल्याप्रमाणे "वैष्णवजन तो तेणे कहिये, जे पीड परायी जाणे रे", दुस-यांचे दुःख आत्मौपम्य वृत्तीने (स्वतःलाच दुःख झाल्याप्रमाणे) जे जाणून घेतात ते वैष्णव.

श्रीतुकोबा पुढे म्हणतायत की असे जे वैष्णव आहेत त्यांचा मी सर्व भावाने दास झालो आहे. त्यांच्या उष्ट्याची आस मला आहे. साधू संत यांच्या मुखातून जे ज्ञान येत ते त्यांच उष्टच असत आणि ते ज्ञान मनुष्यमात्राला करे मार्गदर्शन करून त्याला भवपार करत असा श्रीतुकोबांचा सिध्दांत आहे. आणि म्हणूनच श्रीतुकोबांना अशा वैष्णवांची जशी आस आहे तशी इतरांची नाही.

तुमच्या माझ्या संसारात, व्यवहारात, आचरणात आपल्याला व्यवहारात जो उपयोगी पडेल तो आपला सोयरा हे आपले धोरण असते. पण या अभंगातून श्रीतुकोबा आपल्याला आपले खरे सोयरे कोण याचे मार्गदर्शन करताहेत.

निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम

जय तुकोबा माऊली.

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर  (२२०५२०१८)  

Sunday, May 13, 2018

श्रीतुकोबांची गाथा - ८



पाहतोसी काय I आता पुढे करी पाय II
वरी ठेऊ दे मस्तक I ठेलो जोडूनि हस्तक II
वरवे करी सम I नको भंगो देऊ प्रेम II
तुका म्हणे चला I पुढती सामोरे विठ्ठला II

श्रीतुकोबांचे विठ्ठलाशी एक वेगळेच नाते आहे. या अभंगात ते सख्यत्वाच्या भावनेने त्याच्याशी संवाद साधताहेत. ज्या विठ्ठल चरणांची आस तुम्हा आम्हा सर्व वारक-यांना असते, त्याची आस श्रीतुकोबांनाही आहे पण इथे सख्यत्वाच्या भावनेने ते त्याला आज्ञाच करताहेत, की "पाहतोस काय रे विठ्ठला ? चल, आता मी आलोय ना ? मग पाय पुढे कर पाहू. "

श्रीगजाननविजय ग्रंथात संत दासगणू महाराजांनी लिहील्याप्रमाणे महाराजांचे परम भक्त असे खंडू कडताजी पाटील ह्यांचे श्री गजानन महाराजांशी अशाच प्रकारचे संभाषण होत असे. "गण्या, गज्या म्हणे वाणी, परी प्रेम उपजे अंतःकरणी" असे वर्णन संतकवी दासगणूंनी केलेले आहे. ज्याठिकाणी प्रेम आहे त्याच ठिकाणी अशा स्वरूपाचा "अरे, तुरे" चा संवाद होत असतो हे दासगणू महाराजांनी सोदाहरण पटवून दिलेले आहे. आणि श्रीतुकोबांचे काय ? त्यांच्या तर सत्कर्माच्या खात्यात अगणित सत्कर्मे होती आणि त्यांनी त्या खात्याचा चेक कधीही फ़ाडला नव्हता. (आपल्या प्रापंचिक गोष्टींसाठी आपल्या इष्ट देवताला साकडे घालून सत्कर्माचा वापर केलेला नव्हता.) अशा धनवान ग्राहकासमोर त्या बॅंकरला नम्र व्हावे लागणे स्वाभाविक आहे हो.

श्री तुकोबा तसलाच हक्क विठ्ठलावर दाखवतायत. ते विठ्ठलाला त्याच्या सांप्रत अवताराची आठवण करून देताहेत. "बा विठ्ठला, तू गेल्या अवतारात त्रिभंग अशा स्वरूपाचा श्रीकृष्ण असशील. पण या अवतारात तू आम्हा भोळ्या भाबड्या वारक-यांचा विठू आहेस. त्यामुळे कृष्णावतारात असलेले तुझे वक्र पाय आता सरळ कर. तुझ्या या चरणांवर मला मस्तक ठेवू दे. मी तुझ्यासमोर हात जोडून उभा आहे. तुझे हे आमच्याठायी असलेले प्रेम भंगू न देण्याची जबाबदारी तुझीच आहे."

श्री तुकोबा देवाला तर सख्य भावनेने आवाहन करतायत. पण आजच्या काळात परमेश्वरापासून विन्मुख होऊन, अशाश्वत अशा प्रपंचात रममाण झालेल्या तुमच्या माझ्यासारख्या प्रापंचिकालाही आवाहन करताहेत की बाबांनो या अध्यात्ममार्गाच्या बारीत पुढे चला आणि काही वेळ तरी प्रपंचाला विन्मुख होऊन विठ्ठलाला सामोरे जा. चारशे वर्षांनंतर माणसे देवळात जाऊनही प्रपंच्याच्याच गोष्टी बोलत बसतील हे श्रीतुकोबांना त्याकाळीच उमजले होते एकंदरीत.

निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम
जय तुकोबा माऊली.

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर  (१३०५२०१८)  

Tuesday, May 8, 2018

मी ओळखीले मला पूर्ण आता ?.....

स्थळ : दोसा प्लाझा नागपूर

वेळ : सायंकालीन भुकेची

आम्ही आपला ऑर्डर देऊन पुढ्यात खाद्यपदार्थ येण्याची वाट बघतोय. बाजुच्या टेबलवर दोन विशीच्या आसपास असलेल्या कन्यका आणि त्यांच्या मोठ्या बहिणीसारखी दिसण्याची पराकाष्ठा करत असलेली त्यांची आई. आमचा ऑर्डर आत देऊन वेटर त्यांच्यापुढे उभा. 

मेन्युकार्डवर डोस्यांचेच १०४ प्रकार. इतरही १०० पदार्थ. प्रत्येकाचे १० प्रकार निराळेच. या तिघींचा प्रचंड गोंधळ चाललेला. आत्ता काय खावे ? त्यांची चर्चा अलिप्त राष्ट्र चळवळींच्या चर्चेसारखी, कुठल्याही निष्कर्षाप्रत न येता, त्याच त्याच मुद्यांभोवती गोलगोल फ़िरतेय. वेटर आता खरोखर "वेट"र वाटतोय. वाट पाहून पाहून तो कंटाळतोय आणि आमचा ऑर्डर आणायच्या निमित्ताने त्या कंपूपासून तात्पुरती का होईना सुटका करून घेतोय.

आमचा ऑर्डर आलाय. आम्ही खायला सुरूवातही केलीय. पण शेजारच्या टेबलवरचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये. मुद्दाम म्हणून लक्ष असे नाही पण ही मंडळी एव्हढ्या जोराजोरात बोलतायत की त्या २० बाय २० च्या जागेतली इतरही मंडळी त्यांच्याकडेच बघताहेत. 

बर पैशांचा प्रश्न नसावा. आम्ही आमच्या महाविद्यालयीन जीवनात (घरून अगदी मोजके पैसे येत असल्यामुळे) एखाद्या वेळी असे हॉटेलमध्ये गेलो, की उर्दू पद्धतीने मेन्युकार्ड वाचायचो. उजवीकडल्या किंमती अगोदर वाचून मग डावीकडे पदार्थाचे नाव वाचायचे आणि खिशाला परवडेबल तेच मागवायचे. पण असला प्रकार इथे नव्हता.

मग माझ्या लक्षात आले. हा सगळा प्रकार त्या अतीप्रचंड मेन्युकार्डमधील सर्वोत्तम पदार्थ मागवण्यासाठी होता. मग निवडीत गोंधळ उडणारच. कारण प्रत्येक पदार्थ त्या त्या वर्गवारीत सर्वोत्तमच होता. आपल्याला नक्की काय खायचे आहे ? याची कल्पना मनात निश्चित नसल्याने असला गोंधळ उडणे स्वाभाविक होते. मग अशावेळी रॉंग नंबर लागून भलताच पदार्थ पानात येण्याची नामुष्की होण्याची शक्यताच जास्त. शेजारच्यांना हे सगळे समजावून सांगण्याची इच्छा होती पण असला चोंबडेपणा तिथल्या मॅनर्स आणि एटीकेटसना विसंगत ठरला असता म्हणून गप्प बसलो.



जीवनातही असे प्रसंग खूपदा येतात. साधी कपड्यांची खरेदीच घ्या ना. मला अमुक अमुक रंगाचा, अमुक पॅटर्नचा शर्ट, पॅण्ट (किंवा पॅण्ट शर्टचे कापड) हवा ही धारणा मनात पक्की असली की खरेदी पंधरा मिनीटात आटोपते. 

पण "यापेक्षा दुस-या पॅटर्न मधे नाही का हो ?", "गुलाबीत अजून थोडा फ़िक्का शेड नाही का ?", "राणी कलरमधे अजून थोडा मॅजेंटा शेडवाला दाखवा ना." (हे आणि असले प्रश्न नक्की कुणाकडून येतात ? याचा अंदाज जाणकार वाचकांना आला असेलच) असली खरेदी तासभर तरी संपत नाही हे निश्चित. एव्हढही होऊनही बाहेर पडताना मनासारखा कपडा मिळाल्याचे समाधान क्वचितच मिळते. रंग, पोत, कापड छान असेल तर किंमतीत फ़सवले गेल्याची भावना, किंमत वाजवी असेल तर "आपण नक्की कॉटनच घेतल ना ? की कॉटनसारख दिसणार सिंथेटिक मटेरीयल त्या दुकानदारान माथी मारलय ?" अशी कुठली ना कुठली रुखरूख मनात असतेच असते. दुकानातली सर्वोत्तम वस्तू सगळ्यात कमी किंमतीला आपल्याला मिळालीय हे समाधान अती अती दुर्मीळ असत.

लग्नाच्या व्यवहारातही असेच अनुभव येतात. आपण भलेही सर्वगुण संपन्न, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा नसू पण मुलगी मात्र रतीप्रमाणे सुंदर, व्यवहारचतुर, कमावती आणि नम्र स्वभावगुणांची हवी असते. उलट बाजूनेही तसेच. सध्या अविवाहित असलेल्या मुलामुलींपैकी सगळ्यात उत्तम मुलगी / मुलगा मला मिळालीच पाहिजे या १०० टक्क्याच्या अट्टाहासापायी अनेक ९९-९८-९७ टक्केवाल्यांना नकार जातो आणि मग वास्तवाची जाणीव झाली तोपर्यंत फ़ार उशीर झालेला असतो. मग ६०-६५ टक्केवाल्यामध्ये (टक्केवालीमध्ये) ही ९०-९५ टक्के गुण शोधले जातात आणि लग्नाच्या गाठी बांधल्या जातात.

मी कोण ?, माझी कौटुंबिक पार्श्वभूमी काय ?, मला नक्की कुठल्या प्रकारचा जोडीदार आयुष्यभरासाठी हवाय ? या कल्पना स्वतःच स्वतःच्या स्पष्ट नसल्या, की असे घोळ होत असतात. मग ते खाण्याच्या पदार्थात काय ? किंवा कपड्यांच्या निवडीत काय ? किंवा आयुष्याच्या जोडीदार निवडीत काय ? तत्व एकच.

जगातले सर्वोत्तम ते मला मिळाव यापेक्षा मला काय मिळाल की माझ्यासाठी सर्वोत्तम होईल ? हा थोडा स्वार्थी विचार जास्त महत्वाचा नाही का ? शेवटी कवी सांगूनच गेलेले आहेत,

"मी ओळखीले मला पूर्ण आता, कशाला मला पाहणे आरसे ?
माझ्यापुढे नित्य आत्मानुभूती, पटावे दुजे तर्क आता कसे " 



Monday, May 7, 2018

माहूर - दत्त शिखर - माहूर आणि बसफ़ॅनिंग.

माहूरला गेलो की रेणुका शिखर सोबत श्री दत्त शिखर आणि अनुसया शिखर येथेही नेहमी जाणे व्हायचेच. गेल्या दोन तीन वर्षात श्री दत्त शिखर आणि अनुसया शिखर कडे जाणा-या रस्त्याचे काम सुरू असलेले दिसल्याने तिकडे जाण्याचा विचार टाळून रेणुका शिखरावरूनच दोन्ही पीठांना नमस्कार करून येत होतो.

यावेळी मात्र रस्ता ब-यापैकी झालेला दिसला आणि आम्ही या दोन्ही ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. दत्त शिखरवर आम्ही बालपणी जायचो ती माहूर-रेणुका-अनुसया शिखर-दत्त शिखर-माहूर ही लोकल फ़ेरी दत्त शिखरला उभी दिसणे हा एक आनंदाचा गाभा असतो. आमच्या बालपणी ’टाटा’च्या राज्यात वाढलेल्या आम्हा भावंडांना लेलॅंण्डच्या गाड्यांचे आणि त्यांच्या एंजिन फ़ायरिंगच्या आवाजाचे विशेष आकर्षण असायचे.



बालपणी नेहेमी माहूर गावातून गडावर आणि दत्त व अनुसया शिखरपर्य़ंत सोडणारी ही गाडी आमची लाडकी होती. त्यावेळी या गाडीच्या सतत फ़े-या सुरू असायच्यात. एका फ़ेरीने रेणुका शिखरपर्य़ंत येऊन पुढल्या फ़ेरीपर्य़ंत तिथेले दर्शन आटोपून आम्ही पुढल्या दोन्ही ठिकाणांसाठी रवाना होत असू. गाडीपण अनुसया शिखरला भाविक चढून उतरून परतेपर्य़ंत खाली वाट बघत उभी असायची. दत्त शिखरलाही भाविकांचे दर्शन होईपर्य़ंत ड्रायव्हर काकांचा तिथे नाश्ता (बहुतेक कढी-आलुबोंडा किंवा फ़ोडणीची खिचडी) होऊन जायचा. 





या वेळेसही ही गाडी तिथे उभी दिसली आणि आमचा आनंद गगनात मावेना. गाडी थांबवून, कुटुंब गाडीतल्या वस्तू (पाण्याची बाटली वगैरे) बाहेर काढेपर्यंत, अक्षरशः बसकडे धावलो आणि वेगवेगळ्या ऍंगलने फ़ोटो काढलेत. नागपूर कार्यशाळेत बनलेल्या थोड्या लेलॅण्ड गाड्यांपैकी ही एक गाडी. नांदेड विभागाचे व्यवच्छेदक लक्षण असलेले पिवळे ग्रील घेऊन भर उन्हात चमकत उभी होती. जुनी असली तरी व्यवस्थित निगा राखलेली ही गाडी आहे ही गोष्ट तिच्याकडे पाहूनच लक्षात येत होती.




पुलंना जसा प्रश्न पडला होता की "सगळे कल्हईवाले जाकीट का घालतात ? किंवा सगळ्या पानवाल्यांकडच्या कात्र्यांची टोके मोडकीच का असतात ?" तसा मलाही प्रश्न पडलाय की महाराष्ट्र एस. टी. तल्या सगळ्या लेलॅण्ड गाड्यांचे एक इंडिकेटर फ़ुटकेच का असते ?

बालपणी पुसद - दत्तशिखर - माहूर अशी टाटाची फ़ेरी असल्याचे आणि त्यात प्रवास केल्याचेही स्मरते. 



परतताना आर्वी - लातूर या, मी कधीही न पाहिलेल्या, रूटवरची (बहुधा हंगामी गाडी असावी) गाडी दिसली. आर्वी - पुलगाव - यवतमाळ - आर्णी - महागाव - उमरखेड - हदगाव - नांदेड - औसा - हमदपूर - लातूर या मार्गावरची ही गाडी. जशा नागपूर कार्यशाळेने फ़ार थोड्या लेलॅण्ड बांधल्यात तशा औरंगाबाद कार्यशाळेने फ़ार थोड्या टाटा गाड्या बांधल्यात. त्यातलीच ही एक. या (एम. एच. २० - बी. एल. ४२XX) सिरीजच्या बहुतांशी  गाड्या विदर्भात भंडारा विभागात मिळाल्यात. आर्वी आगाराला मिळालेली ही एक दुर्मीळ गाडी. 



आणखी एक दुर्मीळ गाडी. दारव्हा - आर्णी - माहूर हा कमी पल्ल्याचा मार्ग. या मार्गावर साधी गाडी न दिसता जलद गाडी दिसणे दुर्मीळच. त्यातही या सिरीजची (एम. एच. ४० -  ८७XX) ३ बाय २ आसनी व्यवस्थेची जुनी गाडी म्हणजे दुर्मीळच. ही सिरीज माझ्या आवडत्या सिरीजपैकी एक. ८६XX आणि ८७XX सिरीजमधल्या गाड्यांची बांधणी मजबूत होती. दिसायलाही या देखण्या होत्या. 

य. दारव्हा आगाराची जुनी पण तरीही देखणी गाडी.



आणखी एक नवीनच रूट बघायला मिळाला. हा सुद्धा हंगामी असावा. गडचिरोली - पुलगाव ही पुलगाव आगाराची गाडी. मार्गे चंद्रपूर - भद्रावती - वरोरा - जांब - हिंगणघाट - वर्धा - देवळी असावी. बोर्ड नीट वाचता आला नाही. हिंगणघाट - वायगाव - देवळी असा वर्धेला बायपास करणारा सरळ रस्ता असताना वर्धेला जाणे हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे असावे.



हा रूट मात्र अगदी आमच्या बालपणापासून आम्ही बघतोय. जवळपास ४० वर्षांपासून. राजुरा - पुसद. 

राजुरा डेपोची ब-यापैकी गाडी या रूटवर असते. राजुरा - बलारपूर - चंद्रपूर - भद्रावती - वरोरा - वणी - उमरी - यवतमाळ - दारव्हा - पुसद. टिपीकल चंद्रपूर विभागाचा बोर्ड आणि चंद्रपूर विभागाची सिग्नेचर असलेली  आकाशी ग्रील आणि आकाशी बंपर. 

दिल खुश हो गया रे.