Saturday, March 31, 2012

रेल्वे अर्थसंकल्पाबाबत - २



या अर्थसंकल्पाने महाराष्ट्राच्या आणि विशेषतः विदर्भाच्या झोळीत काय टाकलेय ते बघूयात आणि तदअनुषंगाने इतरही बाबींचा आता वस्तुनिष्ठ विचार करूयात.

१) कामाख्या (गौहत्ती)- लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) वातानुकूलीत एक्सप्रेस : इटारसी मार्गे धावणारी ही गाडी भुसावळ आणि थांबलीच तर नाशिककरांच्या फ़ायद्याची ठरेल असे वाटतेय. मुख्यत: आसाम, बंगाल आणि बिहार मधल्या कामकरी वर्गाला मुंबईत आणून सोडणारी आणि गावी परत नेणारी ही गाडी ठरणार.


२) वांद्रे टर्मिनस-भुज वातानुकूलीत एक्सप्रेस, वांद्रे टर्मिनस- बिकानेर एक्सप्रेस, वांद्रे टर्मिनस- गांधीधाम एक्सप्रेस : ह्या तीनही गाड्या मुंबईतल्या गुजराथी भाईंसाठी असणार हे उघड आहे. गेल्या १० वर्षांपासूनचे रेल्वे अर्थसंकल्प आणि त्यावरील प्रतिक्रिया बघितल्यावर आपल्या लक्षात येईल की दर अर्थसंकल्पानंतर "आमच्यावर फ़ार अन्याय झाला हो" म्हणून कुठलं न कुठलं राज्य दरवेळी गळा काढतंच असतं. (महाराष्ट्राच्या वाट्याला तर हा मान ब-याचदा आलाय.) पण गुजरातवर अन्याय झालाय असं होताना दिसत नाही.

याच्या कारणाचा शोध घेताना आपल्या लक्षात असे येईल की साधारणतः रेल्वे अर्थसंकल्पाच्या आखणीला डिसेंबरमध्ये सुरुवात होते. नवीन गाड्यांची तरतूदही त्याच सुमारास विचारात घेतली जाते. डिसेंबरच्या सुरूवातीलाच गुजरातमधील सर्वपक्षीय खासदार पक्षभेद विसरून एकत्र येऊन रेल्वेमंत्र्यांना भेटतात आणि आपल्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवून त्यांची तड लावतात. मध्यंतरी मध्य रेल्वेच्या उच्चाधिका-यांनी रेल्वेच्या भुसावळ आणि नागपूर विभागात येणा-या खासदारांच्या मतदारसंघांतील समस्या जाणून घेण्यासाठी व इतर चर्चेसाठी नागपूरला बैठक बोलावली होती. विदर्भातल्या खासदारांपैकी फ़क्त चंद्रपूरचे आणि बुलढाण्याचे खासदार उपस्थित होते. मग कश्या मिळणार तुम्हाला नवीन गाड्या ? कश्या अपेक्षा करणार रेल्वेकडून आपण काहीतरी भरीव मिळवण्याच्या ?

३) कोइंबतूर-बिकानेर एक्सप्रेस, दादर-तिरुनेलवेली एक्सप्रेस, हापा-मडगाव एक्सप्रेस : या तीनही गाड्या कोकण रेल्वेमार्गावरून धावणार आहेत. पण महाराष्ट्राच्या पदरात फ़ार पडेल असे वाटत नाही. कोकण रेल्वे सुरू होऊन जवळपास १५ वर्षे होत आलीत तरी कोकणी जनतेच्या पदरात फ़ार काही पडले नाही. त्या मार्गाने भरधाव निघून जाणा-या गाड्याच कोकणाला बघाव्या लागताहेत. बहुतांशी गाड्यांना रत्नागिरी आणि फ़ार झालंच तर सावंतवाडी चा थांबा दिलेला असतो. तो सुद्धा रेल्वेच्या तांत्रिक सोयींसाठी. आता गरज आहे ती कोकणी नेत्यांनी आपापसातले नगरपालिका. ग्रामपंचायती, परिषदा यावरून होणारे राडे थोडे बाजुला सारून थेट रेल्वेमंत्रालयात राडा करण्याची.

ह्याठिकाणी गुजरातप्रमाणेच आणखी एका ठिकाणाचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो आणि ते म्हणजे मध्य प्रदेशातले इंदूर. दर अर्थसंकल्पात इंदूरच्या वाट्याला काहीतरी विशेष येतंच येतं. यंदाही दोन डबलडेकर वातानुकूलीत गाड्यांपैकी एक त्यांच्या वाट्याला आलेली आहे. (हबीबगंज, भोपाळ- इंदूर वातानुकूलीत डबलडेकर एक्सप्रेस) यामागे तिथल्या खासदार सुमित्राताई महाजनांची कळकळ आहे हे सांगणे नलगे.

या अर्थसंकल्पातील एक निरीक्षण असे की यावेळी जवळपास ३० एक्सप्रेस गाड्या या कमी अंतरासाठी सुरू केल्या गेलेल्या आहेत. उगाचच खंडप्राय गाड्या, विचार न करता सुरू करण्यापेक्षा, स्थानिकांच्या गरजा आणि सोयीसुविधा लक्षात घेउन हे केले गेलेले आहे. यशवंतपूर (बंगलुरू)- कोचुवेली (तिरूवनंतपुरम), काकीनाडा-सिकंदराबाद, कामाख्या-तेजपूर, जबलपूर-सिंगरौली, कानपूर-अलाहाबाद वगैरे. यातल्याच सिकंदराबाद-बेलमपल्ली गाडीच मला कौतुक वाटत. बेलमपल्लीला गाडी सुरू करण्यासंबंधी कसलीच सोय नसतानाही ही गाडी आंध्र प्रदेशातल्या प्रदेशात ३०० किमी अंतरासाठी सुरू होतेय. (विदर्भातल्या खासदारांनी थोडा जोर लावला तर पुढल्या अर्थसंकल्पात ह्या गाडीचा विस्तार नागपूरपर्यंत, किमान वर्धेपर्यंत निश्चितच होउ शकतो.)

४) विशाखापट्टणम- शिर्डी, म्हैसूर-शिर्डी : शिर्डीचं सध्याच बदलत जाणारं स्वरूप पाहिलं की आणखी काही वर्षांनी शिर्डी हा आंध्रप्रदेशातला जिल्हा घोषित करण्याची मागणी झाली तर आश्चर्य वाटायला नको. ४ वर्षांपूर्वी मी शिर्डीला गेलो असताना तिथल्या दुकानांच्या, भोजनालयांच्या पाट्या पाहून मी थक्कच झालो. आपण महाराष्ट्रात आहोत की आंध्रात असा प्रश्न पडावा इतपत तेलुगूकरण तिथे झालेले आहे. (मध्यंतरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तिथे आंदोलन वगैरे केलेले ऐकले होते. त्याचा परिणाम झाला असेल अशी आशा आहे.) भारतीय रेल्वेने शिर्डी-पुणतांबे मार्गाचे निर्माण केवळ दक्षिण भारतातून शिर्डीला येणा-या भाविकांपुरतेच केलेले आहे की काय असा प्रश्न पडतो. मुंबई-शिर्डी २ गाड्या, हावडा-शिर्डी ही आठवडी गाडी आणि आत्ता उन्हाळी विशेष गाड्यांमध्ये घोषित झालेल्या निज़ामुद्दीन- शिर्डी व पंढरपूर- शिर्डी गाड्या वगळता सध्या बाकी सगळ्या गाड्या विशाखापट्टणम-शिर्डी, सिकंदराबाद-शिर्डी, काकीनाडा-शिर्डी, चेन्नई-शिर्डी, यशवंतपूर-शिर्डी अशाच आहेत. त्यात या दोन गाड्यांची भर.

५) इंदूर- यशवंतपूर आणि जयपूर-सिकंदराबाद : या दोन्हीही गाड्या सध्या निर्माणाधीन असलेल्या नरखेड-अमरावती मार्गाने जाणार आहेत. हा अट्टाहास कां ? हेच मला कळत नाही. जयपूर-सवाई माधोपूर-नागदा-उज्जैन-हबीबगंज-इटारसी-नरखेड-अमरावती-अकोला-पूर्णा-परभणी-विकाराबाद-काचीगुडा-धोन-धर्मावरम-यशवंतपूर हा लांबचा मार्ग झाला. त्यातला नरखेड-अमरावती मार्ग अजून पूर्ण झालेला नाही. या मार्गाचा बहुतांशी भाग हा एकेरी आणि विद्युतीकरण न झालेला असा आहे. इटारसी-नागपूर-बल्लारशाह-काज़िपेठ-काचीगुडा या मार्गापेक्षा प्रस्तावित मार्गात अंतर तर जास्त होईलच शिवाय वेळही जवळपास दुप्पट लागेल. राष्ट्रपतींचा मान ठेवण्यासाठी या गाड्यांना असा अडनिडा मार्ग दिला असावा. त्यानिमित्ताने या वर्षात नरखेड-अमरावती मार्गाचे काम पूर्ण झाले तर तीच एक मोठी उपलब्धी ठरेल.


६) अमरावती-पुणे : या गाडीचा प्रस्तावित मार्ग सुद्धा असाच लांबचा आहे.अमरावती-अकोला-पूर्णा-परभणी-लातूर रोड-लातूर-कुर्डूवाडी-दौंड-पुणे या लांबच्या मार्गापेक्षा अमरावती-पुणे ही गाडी भुसावळ-मनमाड-दौंड मार्गे सोडता आली असती. सध्या आठवड्यातून तीन दिवस धावणा-या नागपूर-पुणे गरीब रथ एक्सप्रेसला दररोज करून (आणि मार्गे कल्याण वळवून. फ़क्त २८ कि.मी. चा फ़रक पडतोय मार्गे कल्याण आणि मार्गे दौंड मध्ये. पण पुण्याबरोबरच ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई परिसरात राहणा-यांची मोठी सोय या गाडीने झाली असती.) त्याच वेळापत्रकात अमरावती-पुणे एक्सप्रेस सोडता आली असती. आठवड्यातून तीन दिवस अमरावती-पुणे, तीन दिवस नागपूर-पुणे (सध्या अस्तित्वात असलेल्या वेळापत्रकानुसार) आणि उरलेला एक दिवस सध्या असलेली बिलासपूर-पुणे असा मेळ घालता आला असता.

या लांबच्या मार्गाने अमरावतीहून पुण्यापेक्षा अमरावती-सोलापूर-अक्कलकोट-गाणगापूर-वाडी-बंगलुरू अशी गाडी अधिक सयुक्तिक ठरली असती. पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातल्या असलेल्या आणि बंगलुरूला कामाला असलेल्या असंख्य अभियंत्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे दुवा रेल्वेला घेता आले असते.

७) सिकंदराबाद-दरभंगा : प्रस्तावित मार्गानुसार ही गाडी महाराष्ट्रातून बल्लारशाह-गोंदिया मार्गाने सुळकन निसटून जाणार आहे. म्हणजे कोकण रेल्वेवर धावणा-या गाड्यांप्रमाणे या गाडीचाही महाराष्ट्राला फ़ारसा उपयोग नाही. सध्या गोंदिया ते बल्लारशाह हा मार्ग द.पू.म. रेल्वे (बिलासपूर) च्या ताब्यात आहे तर हैद्राबाद-बल्लारशाह मार्ग द.म. रेल्वे (सिकंदराबाद) च्या ताब्यात आहे. तिथले अधिकारी आणि त्यांच्या निष्ठा त्यांच्या मुख्यालयाशी निगडीत आहेत. मग त्यांनी महाराष्ट्राचा विचार का करावा ? (शिवाय मध्य रेल्वे मधल्याही सगळ्यांनाच महाराष्ट्राविषयी आस्था आहे असं थोडंच आहे ?)

८) शिर्डी-पंढरपूर : घोषणा करण्यात आलेल्या गाड्यांपैकी छोट्या अंतराच्या गाड्यांमधली ही एक गाडी. ह्या गाडीची दोन्ही बाजुंनी सुटण्याची आणि पोहोचण्याची वेळ महत्वाची ठरण्याची शक्यता आहे. सध्या धावत असलेल्या दादर-शिर्डी गाडीलाच थोड्या वेळाने शिर्डी-पंढरपूर म्हणून सोडण्याची दाट शक्यता मला वाटतेय. (उन्हाळी विशेष गाड्यांमध्ये एक गाडी अशीच प्रस्तावित आहे. उन्हाळी विशेष गाड्या ह्या एका अर्थाने नियमित गाड्या चालवण्यापूर्वीची चाचपणी करणा-याच असतात हे येथे लक्षात घ्यायला हवे.)

९) विशाखापट्टणम- लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) : या गाडीच्या प्रस्तावित मार्गामध्ये सध्यातरी फ़क्त रायपूर असे लिहिले आहे. पण रायपूर पासून भंडारा-नागपूर-अकोला-भुसावळ मार्गे जाणार असेल तर महाराष्ट्राला उपयोग. अन्यथा जाणून बुजून रायपूर-बिलासपूर-कटनी-इटारसी मार्गे जर गाडी लांबच्या मार्गाने वळवण्यात येणार असेल (तशीच दाट शक्यता आहे) तर आपल्या हातात फ़ारसे काही लागण्याची शक्यता नाही.

१०) पोरबंदर-सिकंदराबाद : वसई, कल्याण, पुणे, सोलापूर मार्गे जाणारी ही एक चांगली गाडी.

११) वांद्रे (टर्मिनस) ते दिल्ली सराई रोहिला : मुंबईकरांना दिल्लीला जाण्याची आणखी एक सोय झाली खरी पण ही गाडी लांबचा मार्ग घेत जातेय. अहमदाबाद नंतर राजस्थानाची सहल घडवत दिल्लीला जाणारी ही गाडी. अर्थात मुंबई ते दिल्ली प्रवासी बघता ही गाडीही रिकामी राहणार नाही हे निश्चित.

१२) झांशी-मुंबई : मध्यप्रदेशाला जोडणारी ही एक चांगली गाडी आहे. फ़क्त गतवर्षी छिंदवाडा-झांशी आणि छिंदवाडा-ग्वाल्हेर या गाड्यांची झाली तशी गत या गाडीची न होवो म्हणजे मिळवली. मोठ्या गाजावाज्याने या दोन गाड्या सुरू झाल्या ख-या पण पहिल्या काही फ़े-यांनंतरच त्यांना दिल्लीपर्यंत वाढवण्याची घोषणा झाली.

१३) सिकंदराबाद-नागपूर : आठवड्यातून तीन दिवस धावणारी ही गाडी बरेच दिवस प्रवासी मंडळांकडून प्रस्तावित अशीच होती. नागपूरवरून दररोज हैद्राबाद साठी असणारी वाहतूक पाहता ह्या गाडीचे उत्तम स्वागत व्हायला हवे. पण पुन्हा ह्या गाडीची वेळ महत्वाची ठरणार हे निश्चित. २०१० च्या उन्हाळ्यात नागपूर-अमरावती एक्सप्रेसच्याच रेकला नागपूर-सिकंदराबाद-वाडी उन्हाळी विशेष म्हणून चालवण्याचा प्रयोग अत्यंत गैरसोयींच्या वेळांमुळे फ़सला होता. त्या गाडीची फ़ार जाहीरातही मध्य रेल्वेने केली नव्हती.

१४) जबलपूर-निजामुद्दीन : या गाडीचा तसा महाराष्ट्राशी थेट संबंध नाही. पण ही गाडी सुरू झाल्यामुळे ह्या गाडीशी असलेला गोंडवाना एक्सप्रेसचा संबंध संपणार आहे. सध्या बिलासपूर / भुसावळ- निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस १३ डब्यांनिशी धावत होती. रात्री बीना जंक्शनला या गाडीला जबलपूर-निजामुद्दीन गाडीचे ११ डबे लागायचेत. ते आता बंद होणार. त्यामुळे दुहेरी फ़ायदा असा की आता गोंडवाना एक्सप्रेस पूर्ण २४ डब्यांची धाऊ शकेल. त्यामुळे मधल्या स्थानकांवरून जास्त जागा उपलब्ध होउ शकतील आणि बीना जंक्शनला जबलपूरवरून येणा-या गाडीची वाट पहाण्यात वेळ वाया न जाता या गाडीला अधिक वेगवान करता येउ शकेल. (तशी चिन्हेही आहेत.)

१५) सोलापूर-यशवंतपूर एक्सप्रेस : आठवड्यातून तीन दिवस धावणारी ही गाडी लोकप्रिय व्हायला हरकत नाही. पुण्यापर्यंत वाढवायला हरकत नसावी.

१६) हैद्राबाद-अजमेर एक्सप्रेस : काजीपेठ-नागपूर-इटारसी-हबीबगंज-उज्जैन-नागदा या जवळच्या मार्गाने जाण्यापेक्षा मनमाड-इटारसी-रतलाम ह्या जवळपास ४०० किमी लांबच्या मार्गाने ही गाडी नेउन रेल्वे नक्की काय साधणार हेच कळत नाही.

१७) शालीमार (हावडा)- भुज एक्सप्रेस : ही गाडीही बिलासपूर- कटनी-भोपाळ-नागदा या मार्गापेक्षा नागपूर-भुसावळ-जळगाव=नंदूरबार मार्गे गेली असती तर अंतर वाचले असते आणि विदर्भातून गुजरातेत जायला आणखी एक पर्याय उपलब्ध झाला असता.

१८) अमृतसर-नांदेड एक्सप्रेस : ह्याच दोन स्थानकांदरम्यान सचखंड एक्सप्रेस दररोज असतानाही शिख बंधूंच्या सोयीसाठी ही गाडी सुरू करण्यात आलेली आहे. ही गाडी मात्र इटारसी नंतर नागपूर-सेवाग्राम-माजरी-आदिलाबाद-मुदखेड मार्ग घेत जाणार आहे.

१९) मालदा शहर- सुरत : ही गाडी सुद्धा नागपूर-वर्धा-भुसावळ-जळगाव मार्गाने प्रस्तावित आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या कामाख्या-लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) गाडीच्याच वेळेत ही गाडी धावेल अशी आशा आहे.

ह्याव्यतिरिक्त नागपूर-वर्धा या अत्यंत वर्दळीच्या मार्गावर तिसरा मार्ग टाकण्याची घोषणा अस्तित्वात आलेली आहे. (ती कितपत अंमलात येतेय हे काळच ठरवेल. कारण गेल्या काही वर्षांमध्ये घोषणा केल्या गेलेल्या वर्धा-यतमाळ-नांदेड, धुळे-इंदूर, कराड-चिपळूण, कोल्हापूर-रत्नागिरी या प्रकल्पांबाबत आजही थंडा कारभार आहे.) महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीकोनातून ह्या सर्व तरतूदी लवकरात लवकर अंमलात आणण्याची गरज आहे. गरज आहे ती जबरदस्त राजकीय इच्छाशक्तीची. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यकर्ते ती दाखवून दिल्लीत आपला ठसा उमटवणार का ? हे पाहणे आगामी काळात आवश्यक ठरणार आहे.

Friday, March 30, 2012

रेल्वे अर्थसंकल्पाबाबत – १

यावर्षी रेल्वे अर्थसंकल्प सादर झाला खरा पण त्यानंतर अर्थसंकल्पापेक्षा ममता बॆनर्जी बाईंनी घातलेल्या थयथयाटाबाबतच जास्त चर्चा होत गेल्या आणि अर्थसंकल्पाची चर्चा मागेच पडली. मागे भा.ज.प. चे सरकार असताना "ज्या ममता, समता आणि जयललिता" घटकाची चर्चा सर्वत्र व्हायची त्यातल्याच ममता घटकाने सरकारला अक्षरशः वेठीला धरून आपल्या आततायी मागण्या हुकूमशाही पद्धतीने मान्य करून घेतल्या. आघाड्यांच्या राजकारणात घटक पक्षांचा सन्मान ठेवण हे अपेक्षित आणि अभिप्रेत असलं तरी, यावर्षाचा गोंधळ जरा गैरवाजवीच वाटला. गेल्या १०-१२ वर्षांपासून, दरवेळी नवा रेल्वेमंत्री पाहिला की "कालचा गोंधळ बरा होता" च्या चालीवर, “मागचा मंत्री बरा होता” अशी सर्वसामान्यांची धारणा झालेली आहे.

ममता बॆनर्जी बंगालच्या मुख्यमंत्री झाल्यावर सर्व रेल्वे प्रेमींनी सुटकेचा निःश्वास सोडला होता आणि समस्त बंगबंधूंचे मनोमन आभार मानले होते. पण या घटनेने त्यांना बंगालचे मुख्यंमंत्रीपद आणि रेल्वेमंत्रीपद दोन्हीही सांभाळायचे आहे हे स्पष्ट झाले. ही मात्र लोकशाहीच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. इंग्रजी भाषेत असे म्हणतात की "तुम्हाला केक जवळ पण बाळगायचाय आणि खायचा पण आहे असे होणार नाही (You cannot have the cake and eat it too)" पण ममता लहान लेकरासारखाच हट्ट धरून बसल्यात. वृत्तीने कोत्या माणसांना मोठेपण पेलत नाही हे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले.

वास्तविक गेल्या १० वर्षांपासून रेल्वेची प्रवासी भाडेवाढ झालेलीच नाही. यावर्षी ती होणे ही काळाची गरज होती. आपण आपल्या दैनंदीन जीवनात सर्व प्रकारची भाववाढ सहन करतोच आहोत. (१० वर्षांपूर्वी गॆस सिलींडरचे, पेट्रोलचे दर काय होते हे जरा आठवून बघा) त्यामानाने ही दरवाढ किरकोळ होती. प्रवासी भाडेवाढीचा सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्यात फ़ार प्रभाव पडत नाही ही सर्वमान्य गोष्ट आहे.

मालभाड्यातल्या वाढीचा जो सार्वत्रिक परिणाम होतो तेव्हढा आणि तसा प्रवासी भाड्यातल्या वाढीचा होत नाही. पण सवंग लोकप्रियतेच्या मागे लागून आजवरच्या सर्वच रेल्वेमंत्र्यांनी उगाचच ही भाडेवाढ टाळली होती. दिनेश त्रिवेदींनी हा कटू पण दीर्घ मुदतीसाठी लाभकारी निर्णय घेतला असताना त्यांना एका व्यक्तीच्या मर्जीनुसार राजीनामा द्यावा लागला ही भारतीय लोकशाहीची शोकात्मिका आहे. मनमोहन सरकारचे दुबळेपण, हतबलता अधोरेखीत झाली, एव्हढच. "अजब राजा, मुकी प्रजा" या वाक्याचा समस्त भारतवर्षाने अनुभव घेतला.

रेल्वे अर्थसंकल्प म्हटला म्हणजे सर्वसामान्य जनतेचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे "यावर्षी आपल्या भागाला किती नवीन गाड्या मिळाल्या ?" हाच असतो. मग गेल्या अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या गाड्यांचं काय ? मोठ्या थाटामाटात घोषणा केल्या गेलेल्या गतवर्षीच्या कामांच्या प्रगतीचे काय ? असे प्रश्न डोकावतच नाहीत. रेल्वेमंत्र्यांनी संसदेत घोषणा करून सर्व माननीय संसद सदस्यांना दिलेले (पर्यायाने या भारतातील जनतेला) आश्वासन पाळले नसेल तर तो संसदेचा अपमान होत नाही कां ? (मा. मुलायमसिंग, मा. शरद यादव यांना कदाचित माहिती असेल. आताच नाही का त्यांनी अरविंद केजरीवाल, किरण बेदी, अण्णा हजारे यांच्याविरूद्ध संसदेत अवमान याचिका दाखल व्हावी म्हणून पोटतिडीकेने चर्चा चालवली?)

वानगीदाखल काही उदाहरणे.

१) नागपूर-मुंबई दुरांतो ही गाडी आठवड्यातून तीन दिवसांऐवजी रोज धावेल ही घोषणा २०११-१२ च्या अर्थसंकल्पात ममतांनीच केली होती. आज २०१२ या आर्थिक वर्षाचा शेवट झालाय. २०१२-१३ चा अर्थसंकल्प सादरही झाला तरी ही गाडी दररोज होणार ही घोषणा कागदावरच आहे. मध्ये एकदा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नागपूरला येऊन गेलेत. त्यांनी "ही गाडी २०१२-१३ च्या अर्थसंकल्प सादरीकरणापूर्वी जरूर दररोज धावेल. या गाडीचा दुसरा रेक आलेला आहे फ़क्त पॊवर कार्स यायच्या आहेत." असं धडधडीत खोटं आणि परिस्थिती जाणून न घेता विधान केलं होतं. (खरंतर ज्या दुरांतो गाड्या राजधानी सारख्या पूर्णपणे वातानुकूलीत असतात त्यांनाच त्यांच्या वातानुकूलन यंत्रणेसाठी पॊवर कार्स ची गरज भासते. नागपूर-मुंबई दुरांतो ही गाडी पूर्णपणे वातानुकूलीत नाही. या गाडीला काही शयनयान वर्गाचे डबेही असतात आणि या गाडीला कधीच पॊवर कार्स ची गरज नव्हती. तिकीटांचे जास्त पैसे मोजूनही प्रवासात जेवण न पुरवणारी ही भारतातली एकमात्र दुरांतो. वास्तविक दुरांतो या संकल्पनेमध्येच सर्वसमावेशक तिकीट दर अभिप्रेत आहे. पहिल्या काही प्रवासात प्रवाशांचा याबाबत प्रचंड गोंधळ उडाला होता. ज्या लोकांनी या संकल्पनेवर विश्वास ठेवून जेवणाची स्वतःची व्यवस्था केली नव्हती त्यांना ती रात्र उपाशीपोटीच काढावी लागली होती. विदर्भातला शेतकरी उपाशी असताना इथल्या लोकांनी चारीठाव जेवायचं म्हणजे काय ? हा रेल्वेचा समाजवादी दृष्टीकोन बिचा-या प्रवाशांना कसा कळणार ? खूप आरडाओरड झाल्यावर मग रेल्वेने त्यांच्या संकेतस्थळावर जाहीर केले की “या गाडीत जेवणाची व्यवस्था नाहीये बुवा.” "मग जास्त पैसे कशाचे घेता ?" हे विचारणारा कोण रे तो नतद्रष्ट ? )

२) २०१०-११ च्या अर्थसंकल्पानंतर आपले लाडके खासदार मुत्तेमवार साहेबांनी नागपूर-दिल्ली दुरांतोची घोषणा ममतादीदींना करायला लावली होती. खासदार महोदय एव्हाना हे विसरले असल्यास नवल नाही. २ वर्षे उलटली तरी याबाबत ना रेल्वे काही बोलतेय ना खासदार महोदय पाठपुरावा करतायत. ही दुरांतो रद्द झाल्यातच जमा आहे. नागपूर ते दिल्ली गाडी एकतर लवकर द्यायचीच ना्ही आणि दिलीच तर ती इतर विभागांनी तिला विस्तारीत सेवा करण्याच्या निमित्ताने पळवायची हा रेल्वेचा जुनाच खाक्या आहे. गोंडवाना एक्सप्रेसचे उदाहरण ताजेच आहे.

३) त्याच्यावर वरताण म्हणजे २००९-१० च्या अर्थसंकल्पात नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेसला माजरी स्थानकातून बल्लारशाह-मुंबई लिंक एक्सप्रेस जोडण्याची घोषणा संसदेत झालेली आहे. याबाबत मी स्वतः चंद्रपूरचे भा.ज.प चे खासदार श्री. हंसराज अहीर साहेब आणि श्री प्रकाश जावडेकर साहेबांना भेटून निवेदन दिले होते. श्री हंसराज अहीर साहेबांनी स्वत: याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला असता, माजरी स्थानकावर पुरेसे सायडिंग नसल्याने शंटींगसाठी अडचणी येतील असे कारण दाखवत रेल्वे प्रशासनाने या घोषणेला आजवर वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या आहेत.

आपल्यासारख्या सामान्य माणसांचं सोडाच, पण रायबरेली, अमेठी यांसारख्या हाय प्रोफ़ाईल मतदारसंघांमध्येही गेल्या काही अर्थसंकल्पातल्या घोषणा झालेल्या कामांच्या बाबतीत "अवघा आनंदीआनंद" च आहे. ग्रेस च्या कवितेच्या चालीवर "घोषणा होती विरून जाती" अशीच परिस्थिती आहे. (नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॊंग्रेसचे जे पानिपत या दोन महत्वाच्या मतदारसंघांमध्ये झाले त्याचे हे एक कारण तर नव्हे ? कॊंग्रेस ममतांना म्हणून तर घाबरत नाही ना ?)


गेल्या काही वर्षांमधल्या अर्थसंकल्पातल्या घोषणांबाबत "बोलाचीच कढी, बोलाचाच भात" ह्या उक्तीची आठवण सा-यांना येते आहे. मग दरवर्षी अमुक तमुक एक स्थानक ’जागतिक दर्जाचे ’ वगैरे बनवू ह्या घोषणाही कुणीच गांभीर्याने घेत नाहीत. रेल्वे अधिका-यांनी एखाद्या विशिष्ट मंत्र्याचे पाणी जोखलेले असल्याने ते तर आजकाल कुठलीच गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. या घोषणा मंत्रीमहोदयांनाही संसदेच्या बाहेर आठवतात की नाही कुणास ठाऊक ?

रेल्वे अगर कुठलाही अर्थसंकल्प सादर करीत असताना शेरो-शायरी केलीच पाहिजे असा जर कायदा असेल तर तो देशव्यापी चळवळ करून रद्द करायला लावला पाहिजे. एखाद्या पूर्वसुरीने (पक्षी : मंत्र्याने) रसिक आणि कवी मनाने, सभागृहातलं तणावपूर्ण वातावरण हलकं करण्यासाठी म्हणून, एखाद्या वेळेला अशी शेरो-शायरी केली असेलही. पण मग आपल्याला त्यातलं गम्य नसताना, दंडक म्हणून, ओढूनताणून, शेरो-शायरी करण्याचा हा अट्टाहास कां ? आणि भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरही रेल्वेमंत्र्यांच्या भाषणांमध्ये ह्या कविता जशाच्या तशा छापतात हो !


क्रमशः

Thursday, March 29, 2012

Theory of behavior in Success and Failures

As developed from my experiences in life.


Explaination:

One can not be at the peak of success all the time. Every human being follows the ups and downs in life. So while negotiating part B of the curve, everyone checks one's speed and attitude towards efforts one has taken to reach the peak. Everyone tries to make adjustments so that the downfall slows down.

I propose that do not leave your original pace of life that has helped you to achieve the peak. But proceed with same qualities and values in life and accept part B as an integral part of life. With this you may reach the trough of failure faster but with the same momentum, you can climb the next peak (part C) faster.

Never forget your virtues.

Saturday, March 10, 2012

प्रवासातली कविता आणि कवितेचा प्रवास

पावसाळी रात्रीचा प्रवास

ढगफ़िकुटले आकाश,
मस्त पावसाळी हवा
झाडांची क्षितीजरेष,
आकार घेत नवा.

रातकिड्यांचा बहर पानी,
रानी अनाम चकवा
मन बेबंद जसे,
मुक्त पाखरांचा थवा.

हा माझ्या मनाचा,
प्रवास कुठल्या गावा ?
करुणाघना परमेशा,
पायी दे रे विसावा.


प्रा. राम प्रकाश किन्हीकर
२३/०७/२००२


पार्श्वभूमी :
माझे प्रवास आणि माझ्या कविता यांचे एक अतूट नाते आहे. असाच एकदा २००२ मध्ये मुंबईवरून नागपूरला विदर्भ एक्सप्रेसने येत होतो. नेहेमीप्रमाणे नागपूरला जाताना असतो तसा अमाप उत्साह होता. जुलै महिना. पावसाचे दिवस. प्रसन्न मनोवृत्ती. मी ’विदर्भ तून विदर्भ’ या लेखात वर्णन केल्याप्रमाणे रात्री एका अनामिक स्थळी गाडी थांबली होती. बाजुच्याच झाडावर लगडलेले काजवे. ढगाळ वातावरण, कुंद हवा. या सगळ्या वातावरणाचे प्रतिबिंब या कवितेत पडले आहे. जवळच्याच छोट्या कागदावर कविता लिहून घेतली.

Wednesday, March 7, 2012

होळी - एका कवितेची आठवण

भासलीस तू जराशी, मला आगळी वेगळी,
कशी झाली सर्वस्वाची, ऐन भरात ही होळी ?

थोडा माझा दोष होता, थोडे तुझेही चुकले.
एका हाताने कधी कां, सांग वाजतेय टाळी ?

कधी बहरत होतो, कधी ओसंडत होतो,
चांदण्यात न्हाऊनही, कशी रिकामीच झोळी ?

तुझ्या जाण्याने गं आता, मला फ़िरून वाटते,
कां कपाळी गाळल्या, विधात्याने काही ओळी ?

जरी हरलो होतो मी, नाही तू पण जिंकली,
तुझ्या माझ्या आयुष्याची, कशी अजब ही खेळी ?

राम किन्हीकर
होळी, १९९२.

१९९२ चेच कवितांचे दिवस. असाच होळीच्या आधी मुक्तांगणसाठी (महाविद्यालयाचे भित्तीपत्रक) कविता करत होस्टेलला बसलो होतो. चित्तरंजन भट तिथे आला. माझ्या ओबडधोबड शब्दांना त्याने असे काही छंदात आणून शिस्तीत बसवले की यंव रे यंव. त्या कागदावर थोडे पोस्टरकलर वगैरे शिंपडून त्याला होळीचा ’फ़ील’ आणला आणि लागलीच मुक्तांगणला कविता लावली.