Tuesday, June 30, 2020

MSRTC in different liveries. Imagination - 2.


"Garib Rath" was a novel idea introduced by Lalu Prasad Yadav in his rail budget in 2005 when he was Railway Minister.
This service was aimed at providing no frills (bed rolls) comfortable air conditioned travel for Indian middle class who were ready to spend a little bit more than sleeper class to experience noiseless and dustless travel. The fares for Garib Rath trains were about 2/3 rd of that of AC three tier class.
All Garib Raths were a grand success. They had a distinct Green + Yellow livery. (Matching to LP Yadav's party, RJD, flag). Though the first Garib Rath between Amritsar and Saharsa had conventional IR (rust red) livery.
Here is an attempt to imagine MSRTC buses in different liveries. Second in the series is Garib Rath livery.
Other experiments will follow soon. Stay tuned.
Drawing credit to my daughter, Mrunmayi.

Monday, June 29, 2020

MSRTC in different liveries. Imagination - 1.


Indian Railways have started adapting LHB technology and started painting its coaches in Red + Grey livery.
Soon many trains were LHBfied and this livery was seen in almost every corner of this subcontinent.
Here is an attempt to imagine MSRTC buses in different liveries. First in the series is LHB livery.
Other experiments will follow soon. Stay tuned.
Drawing credit to my daughter, Mrunmayi.


Sunday, June 28, 2020

महाराष्ट्रीय वरणफ़ळे आणि तिबेटी थंपून

त्या डालगोना काॅफी मुळे आठवले.
साधारण ४ वर्षांपूर्वी शिरपूर मुक्कामी, एका संध्याकाळी, हा तिबेटियन थंपून चा प्रयोग करून बघितला होता. खूप सुंदर चवीचा हा पदार्थ बनला होता.
साधी गोष्ट. आपल्या आईने केलेली चविष्ट वरणफळे, वरणात न उकळता, चिनी साॅसमध्ये (रेड चिली, ग्रीन चिली, सोया आणि व्हिनेगर) उकळलीत की झाले थंपून तयार.
सुटसुटीतपणे होणारा आणि थंडीच्या रात्रीसाठी पोटाला उबदार असणारा हा शुध्द शाकाहारी पदार्थ.


मला प्रकर्षाने वाटत, बर का, की रागांच्या जशा वेळा असतात तशा पदार्थ खाण्याच्याही वेळा असतात.
ही वरणफळे दुपारच्या जेवणात चालत नाहीत असे थोडीच आहे ? भैरवी दुपारी ऐकली तर कान थोडेच फाटणार आहेत. पण जसा भैरवीचा मजा उत्तर रात्रीनंतरच्या फिकुटल्या पहाटेत, तशीच वरणफळांची मजा पावसाळी संध्याकाळीच.
बाकी वरणफळे ( ही खावीत ती आपापल्या आयांच्या हातचीच) पावसाळ्यात सरत्या संध्याकाळी किंवा चढत्या रात्री (८ ते ९ च्या मध्ये) च खावीत. बाहेर पावसाने सूर धरलेला असावा. वातावरणात सुखद गारवा नुकताच आलेला असावा आणि ताटातल्या वाफाळत्या वरणफळाचा घास तोंडात जावा. वा !.
अशावेळी साक्षात परमात्मा जरी प्रसन्न होऊन समोर उभा ठाकला आणि "वत्सा, तुला त्रिभुवन घेऊन टाक. मला ही वरणफळे दे." असे म्हणाला तरी "गोपालकाल्याप्रमाणेच वरणफळे हा सुध्दा मनुष्यमात्रांचाच विशेषाधिकार आहे. देवमंडळींनी ती खायला मनुष्यावतारात प्रकट व्हावे." असे त्याला ठणकावून सांगण्याची हिंमत वरणफळेच देऊ शकतील.
- आपला श्रीकृष्णभक्त, पण श्रीरामानुयायी अध्यात्मिक शेफ रामचंद्र तिबेटी फ्यूजने.

Saturday, June 27, 2020

स्वानुभवातून आलेले नैमित्तिक चिंतन

प्रपंच नेटका करणे म्हणजे कर्तव्यबुध्दीने करणे. त्यात लिप्त होऊन आणि तेच साध्य मानून करणे नव्हे.
प्रपंचातल्या सुखांमध्ये गुंतून जाण्याचा उपदेश करायला संत कशाला लागतात ? ती तर नैसर्गिक प्रवृत्ती आहे. पण आपले अंतिम साधन काय ? याची जाणीव करून द्यायला संतच लागतील.
सर्व संसार सोडून हिमालयात जाऊन परमेश्वर प्राप्त करून घेणे म्हणजे २७५ वर २ गडी बाद असताना पीचवर येऊन शतक झळकवण्यासारखे आहे.
पण संसारात राहून, तो नेटका करून, त्याच्यातल्या तापत्रयांना सांभाळून, अखेर त्यात लिप्त न होता, परमेश्वर प्राप्तीची साधना करणे म्हणजे ६ बाद १२० असा स्कोअर असताना बॅटींगला येऊन आपल्या टीम ला ३२५ चा विजयी आकडा गाठून देण्यासारखे आहे.
म्हणूनच नेटका प्रपंच करून परमेश्वर आराधना करणार्या संसारी जनांना आपल्या शास्त्रांमध्ये संन्यासाश्रमाचे फळ सांगितलेले आहे.
- राम किन्हीकर

Friday, June 26, 2020

खाद्यभ्रमंतीतील काही खास स्थळे.

मी एक प्रवासी पक्षी आहे आणि तो सुध्दा खादाड. प्रवासात उत्कृष्ट कुठे काय मिळत ? याचा शोध सतत सुरू असतो.
नागपूरवरून पुण्याला किंवा सांगोल्याला जाताना दरवेळी देऊळगावराजा इथल्या चैत्रबन ढाब्यावरच थांबायचो. किंबहुना जेवणाच्या वेळेत आपण देऊळगावराजालाच असलो पाहिजे या हिशेबानेच प्रवासाची आखणी दरवेळी व्हायची.
शिरपूर जि. धुळे इथे असताना बर्याच फेर्या मुंबई, पुणे, सातारा, सांगली इथे झाल्यात. दरवेळी NH 3 ने मालेगाव मार्गेच गेलो.
धुळे मालेगाव रस्त्यावर मालेगावच्या बरोबर २० किमी आधी हा "साई कार ढाबा" आहे. इथे ट्रक्सना थारा नाही.

अस्सल गावराणी तुपातली, गुळाची पुरणपोळी, खापरावर भाजलेले मांडे. अप्रतिम चव.

धाब्याचे धोरण.
इथले वातावरण इथे एकदा तरी गेल्याशिवाय कळणार नाही. अस्सल खान्देशी , अत्यंत सात्विक पदार्थ इथे असतात. दरवेळी मुंबई, पुण्याला जाता येताना इथे थांबायचेच असे नियोजन करून आम्ही निघायचो.


केवळ मनातले मांडे खाऊ नका. प्रत्यक्षच खा.


भर उन्हाळी दुपारचा ऐसपैस निवांतपणा.
एकदा शिरपूरवरून पहाटे ५ वाजता निघावे लागले. इथे साधारण पावणेसातच्या सुमारास होतो. नाश्त्यासाठी गावठी मटकीची उसळ आणि गरमागरम कांदाभजी. ती सकाळ मी विसरूच शकत नाही.
काही ध्येयधोरणे ठेऊन मराठी माणसांनी चालविलेली ही प्रतिष्ठाने. चैत्रबन आणि साई कार. प्रत्येकाने आवर्जून भेट द्यावी अशीच.
- आपला खादाडखाऊ, लांडग्याचा भाऊ रामचंद्रपंत.

Thursday, June 25, 2020

करोना आणि आपल्या सवयी

करोना नंतर जग बदलणार असे सगळी सगळी मंडळी बोलताहेत खरे....
पण मला एक प्रश्न पडलाय
कागदांचा गठ्ठा दिसला की पान उलटवण्यासाठी....
किंवा
नोटांची गड्डी दिली की मोजण्यासाठी....
विनाविलंब आपली तर्जनी किंवा मधले बोट पटकन जिभेकडे नेणारी मंडळी कोरोनाच्या भीतीने तरी सुधारणार आहेत का ?
- शाळेतही पाटी पुसण्यासाठी स्पंज आणि पाण्याची छोटी बाॅटल घेऊन जाणारा गुणी विद्यार्थी,
कुमार राम प्रकाश किन्हीकर, वर्ग १ला.

Wednesday, June 24, 2020

दूरदर्शन आणि श्वेतांबरा सिरीयलच्या आठवणी.

दूरदर्शनची सह्याद्री वाहिनीही अत्रंगच आहे.
"चिमणरावां"ना प्रेक्षकांचा मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहून त्याच वेळात त्यापाठोपाठ त्यांनी "श्वेतांबरा" सुरू केली.
हे म्हणजे एखाद्या IPL मॅचमधे लाराची बॅटींग बघितल्यावर, तो आऊट होताच, लगेच दिनेश मोंगियाची बॅटींग बघण्याचे नशिबात यावे.
नाहीतर मार्क वाॅ ची सुंदर कवितेसारखी बॅटींग बघितल्यावर लगेच स्टीव्ह स्मिथची मराठी सौंदर्यशास्त्रावरच्या निबंधाइतकीच कुरूप बॅटींग बघणे नशिबात यावे.
एकदा आम्ही सगळे एकत्र जेवत असताना कन्यारत्नाने श्वेतांबराचा एक भाग बघितला आणि जेवण झाल्यावर मला प्रश्न केला,
"बाबा, ही सिरीयल पहिल्यांदा लागली तेव्हा तू कितवीत होतास ?"
"असेन सहावी सातवीत. का गं ?" अस्मादिक.
"तुला त्यावेळी ही मालिका आवडली होती ?" पुन्हा तिचा प्रश्न.
"अगं, आवडायला ती पहिल्यांदा नीट कळायला तर हवी ना."
तिचा माझ्याविषयीचा आदर दुणावला असावा. आपला बाबा हा त्याच्या बालपणी आपल्यासारखाच नाॅर्मल आणि sensible असला पाहिजे या मुद्द्यावर तिने मनातल्या मनात शिक्कामोर्तब केले असावे, नक्कीच.
- भूत, वर्तमान आणि भविष्य यापैकी कुठल्याही काळात श्वेतांबरा पचनी न पडू शकणारा नाॅर्मल गृहस्थ रामचंद्रपंतराव.

Tuesday, June 23, 2020

किती भार घालू रघूनायकाला ?

शास्त्रकार म्हणतात,
"मांजर आडवे गेल्यावर आपले काम होत नाही या विश्वासापेक्षा,
श्रीरामनाम जपामुळे माझे काम नक्की होईल हा विश्वास मोठा वाटायला लागला की आपण भक्त होण्याकडे वाटचाल सुरू झाली म्हणून समजावे."
"एकांतात असताना कदाचित आपल्याला भूत दिसेल या भीतीपेक्षा,
माझ्या साधनेच्या योगाने माझ्या सदगुरूंचे दर्शन नक्की होईल याची खात्री मोठी झाली की आपण भक्तीमार्गावर चालायला लागलोय हे पक्के समजावे."
"आपण मांजराचे, भुताचे भक्त आहोत की श्रीरामांचे, सदगुरूंचे भक्त आहोत ? हे प्रत्येकाने ज्याचे त्याचे ठरवायचे आहे."
हे विचार आज आठवण्याचे कारण म्हणजे दररोज संध्याकाळी उपासनेत श्रीसमर्थांचा
"किती भार घालू रघूनायकाला ?
मजकारणे शीण होईल त्याला."
हा श्लोक म्हणतोय खरा पण लक्षातच येत नव्हते की त्या सर्वशक्तीमान रघुनंदनाला आपण असा कुठला शीण देणारा भार वहायला लावतोय ते ?
त्या प्रश्नाचे उत्तरही आज संध्याकाळच्या श्रीरामरक्षेत मिळाले.
आत्तसज्जधनुषा विषुस्पृशा वक्षयाशुगनिषंग सङ्गिनौ।
रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रत: पथि सदैव गच्छताम ।
"प्रभू श्रीराम आणि त्यांचे भ्राता लक्ष्मण या दोघांनीही माझ्या समवेत सदैव असून माझे रक्षण करावे" ही एका भक्ताची अपेक्षा आपण रोजच प्रभू श्रीरामांकडे व्यक्त करतो. सदैव आपल्यासोबत, आपल्या रक्षणासाठी, सज्ज अवस्थेत रहाण्याचा हा एकप्रकारचा शीणच आपण प्रभूंना देतोय हे आपल्या लक्षात येतय का ?
म्हणून एक अपराधीपणाची बोचणी आपण
"किती भार घालू रघूनायकाला..."
म्हणून व्यक्त करतोय असे नाही वाटत ?
।। जय श्रीराम ।।
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

Monday, June 22, 2020

मेघवर्णम शुभांगम

गडद निळे गडद निळे
जलद भरूनी आले
शीतलतनु चपलचरण
अनिलगण निघाले.

बरोबर ११ वर्षांपूर्वी लोणारला काढलेल्या या फोटोकडे पाहिल्यावर, बाकीबाब बोरकरांच्या या कवितेची आठवण न होते तरच नवल.
"मेघवर्णम शुभांगम" म्हणजे काय याचा अचानकच सुंदर साक्षात्कार होणारा हा क्षण.
"कुठे काय उत्कट अनुभव येईल हे सांगता न येणे" याला जीवन ऐसे नाव ही जीवन नामक रेसिपीची अस्मादिकांनी केलेली नवीन व्याख्या.
- जीवन्या, ल्यका तु कधी काय करशील याचा नेम नाही बाबा ! असे म्हणत अगदी मकरंद अनासपुरे स्टाईलमध्ये खिदळणारा राम नागपुरे.

Sunday, June 21, 2020

व-हाडी भाषा आणि मराठी चित्रपटसृष्टी

मुंबई पुणे आणि नाशिक च्या पुढे महाराष्ट्र न बघितलेल्या लेखक दिग्दर्शकांनी टी. व्ही. आणि मराठी सिनेमात वर्हाडी भाषेविषयी खूप गैरसमज करून घेतलेले (आणि पूर्ण महाराष्ट्राच्या माथी मारलेले) आहेत.
"नाळ" मधला नागराज अण्णा आणि ओम भूतकर या दोघांनीही वर्हाडी भाषा बोलण्याचा अत्यंत केविलवाणा प्रयत्न जाणवतो. सर्वत्र परफ़ेक्शनचा आग्रह धरणा-या नागराज अण्णाकडून ही चूक कशी झाली कोण जाणे ?
अस्सल नागपुरी लेखक असूनही "माझ्या नवर्याच्या बायको"त ली भैताड ओढूनताणून केलेली नागपूरकर वाटते हे मात्र अक्षम्य आहे.
नुसत "काऊन" आणि "बाप्पा" तोंडात असल म्हणजे नागपूरकर, हा एक भ्रम आहे.
"हेंबाडथुतर्या" "नसानकुकड्या" "मसन्याउदा" "चिलीमतोंड्या" "लमच्या" " बुहार्या वानाच्या" "भोकनटिकल्या" अशा जहाल शिव्या अगदी सहज लहेज्यात निघाल्या पाहिजेत, राजेहो.
- पूर्ण महाराष्ट्रभर फिरून वर्हाडी, मालवणी, अहिराणी, सातारी, कोल्हापुरी, सोलापुरी, पुणेरी आणि मराठवाडी भाषेचा अभ्यासक आणि महाराष्ट्रातील समग्र बोलीभाषा प्रेमी प्रा. राम.


Saturday, June 20, 2020

एक अंगलट आलेले साहस. एका निराळ्या फटफजितीची कहाणी.

बरोबर ३० वर्षांपूर्वींचा प्रवास.
First year engineering चा शेवटचा पेपर संपवून घरी नागपूरला येण्यासाठी कराडवरून महाराष्ट्र एक्सप्रेस पकडलेली.
फक्त १२ बर्थसचा कोटा. एकूण विद्यार्थी ७० च्या आसपास.
मित्रमंडळी आग्रह करीत होती की अरे, आपण एका बर्थवर दोघेदोघे जाऊयात. सगळेच आपले सिंगल हड्डी. जमून गेले असते
पण कराड स्टेशनला एंजिनच्या मागील जनरल + गार्डचा डबा रिकामा पाहिलेले अस्मादिक एका नवीन साहसाच्या तयारीत.


कराड ते पुणे या ६ तासांच्या प्रवासात या ४० माणसांच्या डब्ब्यात फक्त १५ - २० माणसे. मी घेतलेल्या निर्णयावर मी खुश.
रात्री १०.१५. पुणे स्टेशन. आमच्या ४० माणसांच्या डब्ब्यात २०० च्या आसपास गणसंख्येची माणसे ठेचून भरल्यासारखी कोंबल्या गेलीत. "खालून आग वर आग, आग बाजूनी" या कुसुमाग्रजांच्या ओळी आठवताहेत. फक्त "आग" शब्दाऐवजी "माणसे" शब्द टाकायला हवा.
दिलासादायक बाब एव्हढीच की मी खिडकीजवळ असल्याने गार वार्याचा आनंद घेऊ शकतोय.
रात्री ११ वाजता पुण्याहून गाडी दौंडकडे हलतेय आणि लघुशंकेची जाणीव होतेय. "गर्दी दौंडला कमी होईलच. मग जाऊन येऊ टाॅयलेटपर्यंत." ही स्वतःच्याच मनाची घातलेली समजूत.
अर्धा प्रवासी आणि अर्धा गार्ड असा डब्बा असल्याने डब्ब्यात एकाबाजूलाच आणि २ च टाॅयलेटस. सर्वसाधारण डब्ब्यांमधे ४ असतात.
रात्री साडेबाराच्या सुमारास दौंड येतय. गर्दी कमी होण्याऐवजी वाढलीय. मी बसलेल्या, पसरलेल्या लोकांच्या अंगाखांद्यांवरून टाॅयलेटपर्यंतचा प्रवास करून येतोय.
टाॅयलेटच्या आतच बसून ७ - ८ मंडळी प्रवास करतायत. त्यांना "बाहेर पडा" म्हणणेही प्रॅक्टीकल नाही कारण बाहेरच्या अवकाशात या ७ - ८ माणसांना सामावून घेईल इतकी जागाच नाही.
डब्ब्याचे दार आतून बंद. दाराबाहेर पुन्हा ५० -६० माणसे आत येण्यासाठी गर्दी करताहेत. दाराला लागून १० माणसे. दार उघडणे अशक्य.
रात्री १ च्या सुमारास गाडी दौंड सोडतेय. आता ही गर्दी मनमाडपर्यंत, पुढले २६० किमी तरी अशीच.
पुन्हा खिडकीपाशी येऊन बसलोय. अस्वस्थ. मघाचे गार वारे आता नकोसे झालेय. प्रत्येक थंडाव्यागणिक अस्वस्थता वाढतेय.
Relativity of Time चा प्रत्यय येतोय. दर १० मिनिटांनी घड्याळ पाहणे सुरू आहे. आणि दर तासातासाने मागील वेळेसारखेच लोकांच्या अक्षरशः अंगा खांद्यांवरून टाॅयलेटचा प्रवास. टाॅयलेटच्या आत बसलेल्यांना माझी अडचण कळतेय पण प्रामाणिक इच्छा असूनही त्यांच्यातला कुणीही काहीही करू शकत नाहीये.
वाढत्या अस्वस्थतेतच पहाट होतेय. "बाॅर्डर" सिनेमातल्या त्या सैनिकांनी जितकी सूर्यकिरणांची वाट पाहिली त्याहून अधिक सूर्यकिरणांची वाट पाहणे सुरू आहे. कारण मनमाड सकाळी ६ वाजता येणार.
मनमाडला आऊटर सिग्नलला ही गाडी नेहमीच थांबते. पण आज थांबल्यावर आलेला रेल्वेचा राग अपूर्व आहे. एव्हाना पोटातली अजिजी, व्याकुळता चेहेर्यावर, डोळ्यांमध्ये येत चाललीय.
शेवटी मनमाड येतेय. प्लॅटफाॅर्मवर शिरताक्षणी अर्धवट धावणार्या गाडीतून निकराची उडी आणि प्लॅटफाॅर्मवर पुढे दिसेल ते स्वच्छतागृह गाठणे.
पुढच्या प्रवासासाठी शयनयान वर्गात मित्रांसोबत बसतोय. त्यांना ही हकिकत सांगितल्यानंतर हशा आणि त्यांची बोलणी वगैरे.
दौंड ते मनमाड हा प्रवास जन्म ते मृत्यू या प्रवासापेक्षा मोठा वाटणारी ती रात्र. आजही त्या आठवणीने शहारा आणणारी.
आज सांगताना मोठी मजा येतेय पण "जावे त्या वंशा तेव्हा कळे".
अर्थात प्रत्येकावर "अशी" एखादी वेळ आयुष्यात कधी न कधी नक्की येतेच.
- जीवनाच्या विविध अंगांना भिडलेला अनुभवी प्रवासी पक्षी, प्रा. राम प्रकाश किन्हीकर.

Friday, June 19, 2020

पॅसेंजर गाड्या कथा आणि व्यथा.

भारतीय रेल्वेवर धावणा-या पॅसेंजर दर्जाच्या ज्या गाड्या २०० किंवा त्यापेक्षा अधिक अंतर कापतात, त्यांना एक्सप्रेस दर्जाच्या गाड्यांमधे बदलण्याविषयीचे भारतीय रेल्वेचे परिपत्रक आमच्या कायप्पा समूहावर वाचले आणि मन आनंदित झाले. ही सूचना मी ३१ मे २०१२ रोजी लिहीलेल्या ब्लॉगमधे पोटतिडीकेने केलेली होती. (तो ब्लॉग इथे वाचा)
आमच्या कायप्पा समूहावर या सूचनेबाबत नकारात्मक विचारच वाचनात जास्त आलेत. "आता या गाड्यांना (थोडे थांबे कमी करून आणि थोडा वेग वाढवून) एक्सप्रेस मधे बदलतील आणि तिकीटभार एक्सप्रेसचाच द्यावा लागेल. लूट चालवलीय जनतेची" वगैरे वगैरे कॉमेंटस वाचून सखेदाश्चर्य वाटले. स्थितीस्थापकत्व ( Inertia ) हा भारतीय समाजाचा मोठ्ठा सदगुण आणि तेव्हढाच मोठ्ठा दुर्गुण आहे याची पुन्हा प्रचिती आली. कुठल्याही बदलाकडे आपण आधी साशंकतेने का पाहतो ? हा मला पडलेला मोठठा प्रश्न आहे.
खरेतर पॅसेंजर गाडी ही संकल्पना ब्रिटीशांनी एतद्देशीयांकडे बघण्याच्या त्यांच्या खास दृष्टीकोनातून आणलेली आहे. १५० वर्षांपूर्वी "इथल्या रिकामटेकड्या नेटीव्हांना कशाला हव्यात एक्सप्रेस गाड्या ? एक्सप्रेस आणि मेल गाड्या या आम्हा इंग्रज अधिका-यांची जलद वाहतूक आणि या खंडप्राय देशातले आमचे संदेशवहन त्वरेने व्हावे म्हणून आहेत." ही वसाहतवादी मानसिकता या पॅसेंजर गाड्यांच्या नियोजनामागे नसेलच असे नाही. बरे. स्वातंत्र्यानंतर ५० वर्षे झाली, आम्ही सगळेच मेल, एक्सप्रेस गाड्या सरावाने वापरायला लागलोत तरीही पॅसेंजर गाड्यांच्या उपयुक्ततेचा कुणालाही पुनर्विचार करावा वाटला नाही हे आमचेच दुर्दैव. तुकोबांच्या इतर कुठल्याही नाही पण "ठेविले अनंते..." वर आम्ही भलताच विश्वास ठेवलाय हो.
गेल्या ५ - ६ वर्षांपासून रेल्वेत पॅसेंजर गाड्यांविषयी थोडा वेगळा विचार व्हायला लागल्याचे जाणवायला लागलेय. १२५ वर्षांपासून सुरू असलेल्या काही काही गाड्या कायमच्या रद्द झाल्यात तर काहींचे उदगम आणि गंतव्य बदललेत. काहींचा मार्ग कमी केला तर काही गाड्यांच्या जागी आधुनिक डीएमयू ( Diesel Electric Multiple Units ), एमइएमयू ( Mainline Electric Multiple Units ) गाड्या आल्यात.
एकेकाळी सर्वसामान्य जनतेला या पॅसेंजर गाड्या उपयुक्त असतीलही पण २०२० मधे नागपूर ते आग्रा हा जवळपास ९०० किमी चा प्रवास २४ तास घेणा-या पॅसेंजर गाडीने एखादा गरीब माणूस करीत असेल ही समजूत चुकीची आहे. नागपूर ते टाटानगर हा ७५० किमीचा अखंड प्रवास पॅसेंजरने करणारे प्रवासी एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही नसतील. मग उगाच पुराणमतवादी मतांना कवटाळून नागपूर - आग्रा, नागपूर - टाटानगर पॅसेंजर गाड्या सुरू ठेवण्यात काय अर्थ आहे ? आणि नेमकी कुणाची सोय आहे ?
एक्सप्रेस गाड्यांच्या व्दितीय वर्गाच्या तिकीटवाढीला गेल्या १७ - १८ वर्षांपासून चाप बसलेला आहे. मग नागपूर ते मुंबई व्दितीय वर्गाचे १७० रूपयांच्या आसपासचे तिकीट घेऊन १५ तासात एखादा गरीब, गरजू मनुष्य मुंबई गाठेल की नागपूर - भुसावळ आणि भुसावळ - मुंबई अशा दोन पॅसेंजर गाड्यांचे १२० रूपयांच्या आसपासचे तिकीट काढून ४० तास प्रवास करणे स्वीकारेल ?
गंमत म्हणजे आत्ता आत्ता पर्यंत ब्रिटीशांनीच केलेले या पॅसेंजर गाड्यांचे वेळापत्रक अस्तित्वात होते. त्यामुळे देशात कुठूनही, कुठेही जायला पॅसेंजर गाड्यांच्या एकाला एक सोयीच्या वेळी होत्या. म्हणजे मुंबईवरून सकाळी मुंबई - भुसावळ पॅसेंजरने निघून संध्याकाळी भुसावळला पोहोचले की तासा दीड तासाच्या अंतराने भुसावळ - नागपूर, आणि भुसावळ - इटारसी या गाड्या मिळू शकायच्यात. इटारसी गाडीने दुस-या दिवशी पहाटेपर्यंत इटारसीला पोहोचलो की लगेच इटारसी - आग्रा पॅसेंजर तयार. त्या गाडीला पुढे आग्रा - दिल्ली पॅसेंजरची जोड असायची. म्हणजे कमी पैशात रेल्वेचा पूर्ण आनंद घेत, मजल दरमजल करीत एतद्देशीयांनी आरामात प्रवास करावा हे कृपाळू ब्रिटीश सरकारचे धोरण होते. प्रत्येक मार्गावर हीच कथा. हैद्राबाद - काझीपेठ, काझीपेठ - वर्धा, वर्धा - भुसावळ, भुसावळ - मुंबई.
एकेकाळी पॅसेंजर गाडी ही छोट्या छोट्या खेडेगावच्या लोकांना जवळच्या शहरांशी रास्त दरात जोडत होती. पण बदललेल्या भौगोलिक आणि अर्थसामजिक ( Socio-Economic ) अवकाशात हा प्रवासाचा परीघही आजकाल आकुंचन होत होत १०० ते १५० किमी अंतरावरच स्थिरावला आहे. या सा-यांचा वापर करून या १०० - १५० किमी परीघावरील कष्टकरी जनता, मजूर, विद्यार्थी यांच्यासाठी वेगवान आणि सुविधाजनक अशा डेमू, मेमू गाड्याच उपयुक्त ठरू शकतील. या गाड्यांच्या मर्यादित अंतरावरच्या धावेमुळे त्यांची एखाद्या क्षेत्रात वारंवारता वाढवून अधिकाधिक "नाहीरे" वर्गाची सोय करता येइल हा एक नवा आणि चांगला विचार पुढे येतोय तर त्याला विरोध कशाला ?
उदाहरणच द्यायचे झाले तर नागपूरजवळच्या काटोल आणि नरखेड या दोन छोट्या शहरांचे / गावांचे घेऊयात. आज सकाळी ८.०० वाजता नागपूरवरून काटोल कडे जाणारी नागपूर - इटारसी पॅसेंजर आहे आणि परतताना संध्याकाळी ७.०० च्या आसपासची इटारसी - नागपूर पॅसेंजर. काटोल नागपूर प्रवासासाठी अगदी तशाच वेळा दोन पॅसेंजरच्या आहेत. आता एक्सप्रेसचे तिकीट परवडत नाही म्हणून ज्या मजूराला, विद्यार्थ्याला पॅसेंजरने प्रवास करणे भाग आहे त्याला एखाद्या दिवशी लवकर परतायचा स्वस्त पर्याय आपण जुन्या व्यवस्थेत उपलब्ध करून देतोय का ? म्हणजे या "नाही्रे" वर्गाने कायम हालअपेष्टा सोसाव्यात आणि विनाकारण आपला वेळ दवडावा ही सक्ती आपली ही जुनी व्यवस्था करतेय, हे येतय का लक्षात ? त्याऐवजी जर नागपूर - नरखेड - नागपूर अशी मेमू सुरू झाली तर दिवसाच्या किमान ६ फ़े-या तिला मारता येईल आणि ज्या वर्गासाठी पॅसेंजर गाड्या सुरू ठेवण्याचा कंठशोष चाललाय त्यांना रोजच्या दळणवळणासाठी अधिक पर्याय उपलब्ध होतील असे माझे प्रामाणिक मत आहे.
मग रेल्वे विभागाने या दृष्टीकोनातूनच १६० वर्षांपासूनच्या आपल्या भूमिकेला छेद देत २०० + किमी अंतरापेक्षा जास्त गाड्यांचे रूपांतर एक्सप्रेस गाड्यांमधे करण्याचा निर्णय घेतला असेल आणि छोट्या अंतरासाठी जर ते डेमू, मेमू गाड्या सुरू करीत असतील तर सर्वजनसुखाय, सर्वजनहितायच ते ठरेल, नाही का ?
- पॅसेंजर ते राजधानी
आणि
जनरल क्लासची बाकडी ते प्रथम श्रेणी वातानुकुलीत केबीन असा सर्वच प्रवास केलेला प्रवासी पक्षी, राम प्रकाश किन्हीकर.
ता. क.: माझ्या कराड ते पुणे ते कोपरगाव या जनरल वर्गाच्या प्रवासाची कथा इथे वाचा.



Thursday, June 18, 2020

तेथे पाहिजे प्रचितीचे

ublic
Public
आपल्या उपनिषदांनी, पुराणांनी आपल्याला दिलेली उपासना हे प्रत्यक्ष आत्मनिवेदन भक्तीचे रूप आहे.
श्रीगणपत्यथर्वशीर्ष म्हणताना "त्वमेव केवलम कर्तासि, त्वमेव केवलम धर्तासि..." म्हणताना बाप्पा प्रत्यक्ष समोर बसलाय आणि आपण त्याच्याशी बोलतोय, त्याची स्तुती करून त्याला खूष करतोय ही भावना यायलाच हवी.
उगाच अंघोळ करताना,पूजा करून "टाकताना", इकडेतिकडे खाणाखुणा करीत, अथर्वशीर्ष म्हणणे हा संवाद म्हणजे पुढे बाप्पा बसलाय आणि त्याचे अस्तित्व अमान्य करून आपण आपल्याच व्यापात गुंतलोय अशी अवस्था आहे. तरी तो बिचारा अकारण करूणामयी असल्याने आपले हे अपमानास्पद वागणे मनावर घेत नाही आणि कृपाच करतो हे त्याचे देवत्व.
बाकी अंघोळ करताना अथर्वशीर्ष म्हणून एक कार्यक्रम "उरकून घेणारी" मंडळी स्वतःला गणपतीचा अवतार समजतात की काय ? अशी मला कायम शंका येते. स्वतःवर अभिषेक करत असताना स्वतःच अथर्वशीर्ष म्हटल्यासारखं.
तशीच भावना देवी कवच वाचताना आणि अर्गला स्तोत्र म्हणताना यायला व्हायला हवी.
किन्हीकरांची कुलदेवता म्हणजे श्रीक्षेत्र माहूरची रेणुकादेवी. मातृरूप असलेली अत्यंत प्रेमळ मूर्ती. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांमधे केवळ रेणुकेनेच कुठलेही शस्त्र धारण केलेले नाही. त्यामुळे या अवतारासमोर देवीकवच म्हणताना "आपण अगदी शाळकरी मूल आहोत. रेणुका माय आपल्याला शाळेत जायला तयार करून देतेय आणि आपल्या संरक्षणासाठी प्रेमाने, खूप मायेने आपल्या सर्वांगावर एकेक आयुध चढवून, प्रतिकारशक्ती वाढेल असे खाऊपिऊ घालून जगाच्या शाळेत पाठवतेय" अशीच भावना होते.
आणि अर्गला स्तोत्र म्हणताना तर मला "नाळ" मधला चैत्या झाल्यासारखेच वाटत असते. "आई, मी तुझ सगळ काम केल न वं, अभ्यास केला न वं, आता त मले खेळाले जाऊ दे." म्हणत तो आईशी जी लाडीगोडी करतो अगदी तशीच आईची विविध प्रकारे स्तुती करून
"रूपं देहि, जयं देहि, यशो देहि, द्विषो जहि." हे मागणे मागताना मनाची अवस्था होते.
आईला तिचे स्वतःचे सामर्थ्य माहिती आहेच आणि मूल लाडाई गोडाई करून आपले मागणे मागतेय हे ही तिला ठाऊक आहे. मुलांचे संपूर्ण हित डोळ्यांसमोर ठेऊन ती योग्य तेच करेल हा विश्वास मात्र पाहिजे.
पौराणिक आणि उपनिषदोक्त स्तोत्रे ही भावपूर्ण आहेत. त्याच भावात ती म्हटलीत तर परमेश्वराशी वेगळेच नाते पटकन जोडल्या जाईल, नाही का ?
- "देव भावाचा भुकेला" या संतवचनावर अतिशय दृढ श्रध्दा असलेला रेणुकासुत राम.