Wednesday, January 31, 2018

ब्लॉग लेखनाचा माझा प्रवास.

२००६ पर्य़ंत संगणक वापराचे अगदी जरूरीपुरते शिक्षण घेतलेल्या माझ्यासारख्या एका शिक्षकाला इंटरनेट हे केवळ ऐकूनच माहिती होते. पण नागपूरला आल्यानंतर रामदेवबाबा महाविद्यालयात डॉ. खापरेंसारखा मित्र आणि या क्षेत्रातला जाणकार मार्गदर्शक लाभला आणि आमची गाडी सुसाट सुटली. सुरूवातीला ऑरकूट नंतर फ़ेसबुक या समाजमाध्यमांच्या व्दारे व्यक्त व्हायला लागलो आणि ते खूप एन्जॉयपण केल. त्याचबरोबर या माध्यमांची स्वतःची असलेली मर्यादाही कळली. काही चांगले ब्लॉग्ज वाचनात आलेत आणि आपणही व्यक्त व्हायला हे माध्यम निवडावे असे ठरवून २००८ च्या डिसेंबरमध्ये "मी एक प्रवासी पक्षी" या ब्लॉगला सुरूवात केली. हे नाव ठेवण्यामागेही एक कथा होती.

पहिली पोस्ट लिहीली आणि लगेचच ४ पोस्ट टाकल्यात. पण वाचकांचा रिस्पॉन्सच येईना. आकडेवारीत रमणारा माणूस असल्याने ब्लॉगला १०० वाचक कधी मिळतात याची आतुरतेने वाट बघत होतो. तेव्हा ऑरकुटसारख्या इतर समाजमाध्यमांवर ब्लॉगपोस्टची लिंक कशी शेअर करावी याचे ज्ञान नव्हते म्हणून मग मित्र, नातेवाईक इत्यादींना ब्लॉगची लिंक मेसेजव्दारे पाठवायला सुरूवात केली. खूप थोड्या लोकांनी ब्लॉग वाचला, ब-याच जणांनी टिंगलटवाळी केली आणि काहींनी तर माझा नंबरच ब्लॉक करून टाकला. 

२००९ पण लेखनाच्या बाबतीत तसे विशेष गेले नाही. सुरूवातीला ब-याच पोस्टस इंग्रजी भाषेतच होत्या. मराठी लेखनाचा शोध जवळपास २ वर्षांनी लागला. आणि मग आमचा वारू चौखूर उधळला. १०० वाचक मिळवायला जवळपास वर्ष लागले तर ५०० वाचकसंख्या गाठायला २ वर्षे.

२०११ मध्ये ब-यापैकी लिखाण झाले. मग नोकरीनिमित्त सांगोला (जि. सोलापूर) आणि शिरपूर (जि. धुळे) यथे वास्तव्य झाले. निमशहरी, ग्रामीण महाराष्ट्र जवळून बघता, अनुभवता आला. अनुभवसमृद्धी आली आणि मग बस आणि रेल्वे फ़ॅनिंगसाठी असलेला माझा ब्लॉग सामाजिक, वैयक्तिक जाणीवांनाही व्यक्त करू लागला. २०१२ मध्ये तब्बल २७ पोस्टस झाल्यात. दरम्यान वाचकसंख्या घातांकिय श्रेणीने (Exponentially) वाढत असल्याचे मी अनुभवत होतो. हळूहळू वाचकांचीही पसंतीची पावती मिळू लागली होती.



२०१३, २०१४ आणि २०१५ मध्ये लिखाण फ़ारसे झाले नाही तरी फ़ेसबुकसारख्या माध्यमाव्दारे ब्लॉगच्या प्रसाराची ताकद कळली होती त्यामुळे वाचकसंख्य़ा सतत वाढत होती. २०१६ त छान लिखाण झाले. अगदी ठरवून लेख लिहीलेत. २०१७ त पूर्वार्धात व्यावसायिक आयुष्यातली मरगळ लिखाणात उतरली. उत्तरार्धात पुन्हा सगळे स्थिरस्थावर झाल्यावर मग चांगले लिखाण झाले.

२०१८ त सुरूवातीपासूनच थोडा कल धार्मिक लेखनाकडे झुकू लागत असल्याचे माझे माझ्याच लक्षात आले. म्हटल या वर्षी ही वाटही चोखाळून पाहुयात. म्हटल बघुयात किती नियमीत लेखन आपल्या हातून होतय ते. 

२०१८ गाठल्यागाठल्या पाऊणलाख वाचकसंख्या गाठली. सगळेच ब्लॉग्ज मी मनस्वी पद्धतीने लिहीलेत. मनात येईल ते आणि तसे सगळ्यांसमोर मांडत गेलो. सगळेच ब्लॉगपोस्टस माझ्या आवडीचेच आहेत. पण तरी त्यातले निवडक पोस्टस आपल्यासाठी पुन्हा एकदा.


२. आता आवडीचा पुरवावा सोहळा. पंढरपूरच्या एका कार्यक्रमात शौनक अभिषेकेने गायलेला अभंग ऐकणा-या गिन्याचुन्या श्रोतृवर्गात आम्ही सामील होतो. मग त्या ओळींवर चिंतन सुरू झाले आणि त्याचा परिपाक म्हणजे हा लेख.

३. माझे महाराष्ट्राचे अनुभव. पक्का वैदर्भी असलो तरी महाराष्ट्रावर माझे प्रेम आहेच.

४. एका शोधाची कथा. स्वतः संशोधन करून निष्कर्ष काढलेत.

५. माझी सगळ्यात लोकप्रिय पोस्ट. विदर्भतून विदर्भ.


वाचक मित्रांनो. असाच लोभ सतत राहू द्यात हेच मागणे. एक लक्ष वाचकसंख्या या वर्षाअखेर गाठेन असा आत्मविश्वास आहे. 

Sunday, January 28, 2018

श्रीतुकोबांची गाथा - ५




न ये जरी तुज मधुर उत्तर,  दिधला सुस्वर नाही देवे II
नाही तयाविण भुकेला विठ्ठल,  येईल तैसा बोल रामकृष्णा II
देवापाशी मागे आवडीची भक्ति,  विश्वासेशी प्रीति भावबळे II
तुका म्हणे मना सांगतो विचार  ध्ररावा निर्धार दिसें दिस. II

गोड गळा, सुस्वर गायन ही एक ईश्वरी देणगी असते. ती सगळ्यांनाच मिळते असे नाही. म्हणून भक्तांनी मनात खंती होऊ नये हे श्री तुकोबा या अभंगात सुचवताहेत. ते सांगताहेत, "बाबारे, तुला जमेल तसे त्या भगवंताचे, विठ्ठलाचे भजन कर बर." ख-या भक्तीने, भावपूर्ण रीतीने भजन केले की ते श्रोतृवृंदांच्या काळजाला भिडतेच हा तुमचा माझा अनुभव आहे. त्या ठिकाणी त्या गायकाकडे गायनकला किती आहे ? त्याला किंवा तिला स्वरांचे किती ज्ञान आहे ? हे सगळे प्रश्न अप्रस्तुत ठरतात. श्री तुकोबा म्हणताहेत की हेच भावपूर्ण गान त्या विठ्ठलालाही नक्की आवडेल. 

परम पूजनीय बापुराव महाराजांकडे दर गुरूवारी भजनाची परंपरा परम पूजनीय नाना महाराजांनी सुरू केलेली आहे आणि गेली ७० वर्षे ती त्यांच्याच कृपेने अखंड सुरू आहे. मला एकदा आमच्या सदगुरू, परम पूजनीय मायबाई महाराजांनी, गुरूवारच्या दरबारात भजन म्हणण्याची आज्ञा केली. तेव्हा मी त्यांच्याजवळ हीच खंत बोलावून दाखवली होती की मायबाई, मला सुरांच, तालाच, लयीच कसलच ज्ञान नाही. मी कसा म्हणू भजन ? त्यावेळी त्यांनीही हाच उपदेश मला केला होता. त्या म्हणाल्या की इथे तुझा स्वर कोण ऐकतय ? तुझी भक्ती किती आहे ? ते महत्वाचे. म्हण भजन. आणि त्यानंतर मोडक्यातोडक्या सुरात का होईना परम पूजनीय महाराजांकडे भजन म्हणताना मी स्वरांची लाज गुंडाळून गायला शिकलो. 

विठ्ठल हा भावाचा, हृदयातल्या ख-या भक्तीचा भुकेला आहे. त्यामुळे आपल्याला जमेल तशा स्वरात पण भक्तीने त्याचे नाम गात जावे. 

परमेश्वरापाशी काय मागायचे याचाही उपदेश श्री तुकोबा साधकांना करताहेत. "देवा, मला तुझी आवड असू दे. बस इतर काही नको. तुझ्यावर माझा विश्वास कायम ठेव. श्री तुकोबा म्हणताहेत की हा निर्धार तुम्ही दिवसेंदिवस वृद्धींगत करत न्या.

निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम
जय तुकोबा माऊली.

प्रा. राम प्रकाश किन्हीकर  (२८०१२०१८)  

Saturday, January 27, 2018

२६ जानेवारीचे बसफ़ॅनिंग.

काल २६ जानेवारीनिमित्त फ़ेसबुक ने सांगोला येथील बसफ़ॅनिंगची आठवण करून दिली आणि अचानक जाणीव झाली की मी सांगोला सोडल्यानंतर फ़ारसे बस आणि रेल्वेफ़ॅनिंग केलेलेच नाहीये. सांगोल्यात एका आड एक शनिवारी सुट्टी असायची आणि त्यादिवशी गावात काही आणायला जाताना नाहीतर चि. मृण्मयीला शाळेत सोडायला जाताना, सहजच बसस्टॅण्डवर नाहीतर रेल्वेस्टेशनवर चक्कर व्हायची. बर स्टेशनही म्हणावे ते एकदम चिमुकले. दिवसभरातून अर्धा डझन गाड्या इकडून तिकडे आणि तिकडून इकडे जायच्यात. सांगोला मुक्कामाचे ते सगळे दिवस बस आणि रेल्वे फ़ॅनिंगच्य़ा दृष्टीने खरच छान गेलेत.

२०१४ च्या प्रजासत्ताक दिनाच्या झेंडावंदनानंतर मी आणि आमच्या महाविद्यालयातील तरूण उत्साही प्राध्यापक श्री. महेश कुंभार दोघांनीही बसफ़ॅनिंगचा बेत आखला आणि सांगोला बसस्टॅण्डवर गेलोत. त्या बसफ़ॅनिंगची क्षणचित्रे.








सांगोल्यात आल्या आल्या मी काही जुन्या गाड्यांचे फ़ोटो काढायला सुरूवात केल्यानंतर माझ्या मित्रांना कळेचना की एव्हढ्य़ा जुन्या गाड्यांमध्ये काय बघण्यासारखे आहे ? पण सांगोल्यातल्या जुन्या गाड्यासुद्धा खूप देखण्या आहेत हे तुम्हीही मान्य कराल. 


सांगोला आगाराच्या प्रवेशद्वारापाशी श्रीदत्तगुरूंचे सुंदर मंदीर आहे. येथे सगळे उत्सव एस.टी. कर्मचारी आणि गावातील सगळी मंडळी मिळून उत्साहात करतात.



एस. टी. महामंडळाने कमी अंतराच्या प्रवासासाठी शटल सर्व्हिस म्हणून या ए.सी.जी.एल. गोवा येथे बांधलेल्या या मिडी बसेस "यशवंती" या ब्रॅण्डनावाने आणल्यात. सांगोला - अकलूज आणि सांगोला - पंढरपूर या मार्गांवर या देखण्या गोवेकर भगिनी. महाराष्ट्रात सावंतवाडीला पासिंग झालेल्या. (MH -07)








(MH-12 / CH ) पासिंगच्या सांगोला आगारातल्या जुन्या आणि देखण्या गाड्या.




आणखी जुन्या सिरीजमधली गाडी. पण अजूनही छान असलेली.






या गाडीची एक कथा आहे. महाराष्ट्र एस.टी. ने खाजगी कंपन्यांकडून गाड्या बांधून घेण्याचे ठरवल्यानंतर लगेचच प्रायोगिक तत्वावर बांधलेल्या बसपैकी ही एक. ऍण्टोनी गॅरेज, पनवेलने बांधलेली ही निम आराम गाडी स्वारगेट, पुणे आगारात होती. एका अपघातात सापडल्यावर दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेने तिचे पूर्ण नूतनीकरण करून तिला सांगोला आगाराला दिले. शेवटल्या फ़ोटोत दिसणारे प्रा. महेश कुंभार. 
(MH-06)  रायगड पासिंग.


ही बस बरेच वर्षे अहमदनगर - सांगोला मार्गावर असायची. सांगोला आगाराची असूनही ही नगर मुक्कामी असायची. सकाळी नगर वरून निघून दुपारी सांगोल्यात यायची आणि परत पुन्हा संध्याकाळपर्यंत नगर मुक्काम गाठायची. एक वहिवाट असलेली गाडी.





मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूर येथे बनलेल्या फ़ार थोड्या निम आराम गाड्यांपैकी या गाड्या. नंतर त्यांना दापोडी कार्यशाळेने साध्या गाड्यांमध्ये परिवर्तित केले. निम आराम गाड्या असताना सांगोला आगारात या नसाव्यात. सांगोला आगारात एकही निम आराम गाडी अजूनही नाही.



मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूरने बांधलेल्या (MH-40 / N 943X) या सिरीजच्या गाड्या बहुतांशी सोलापूर जिल्ह्यातल्या आगारांना मिळाल्यात. त्यातही पंढरपूर, सांगोला, अकलूज आगारांना जास्तच. (MH-40 / N 9436 ) ही गाडी सांगोला - स्वारगेट मार्गावर बरेच काळपर्यंत फ़िक्स होती.




चेट्टीनाड सिमेंटने प्रायोजित केलेली ही एक जुनी, देखणी गाडी.


लेलॅंण्डची ही कुर्ला नेहरूनगर आगाराची गाडी काही कारणांमुळे सांगोला आगारात बंद पडली होती. तिच्या मदतीसाठी कुर्लानेहरूनगर आगाराने (MH -20 / BL 0328)  ही गाडी २६ जानेवारीला पाठवली.


स्वारगेट - सांगोला मार्गावरची ही आणखी एक गाडी. स्वारगेट - सांगोला गाडी येताना पंढरपूरमार्गे यायची पण परत जाताना शिवणे - महूद मार्गे जायची.




सांगोला - अकलूज मार्गावरची ही वैशिष्ट्यपूर्ण गाडी. समोरील गरूड आणि खिडकीवरील डिझाईन वैशिट्यपूर्ण.





सोलापूर विभाग, सांगोला आगाराचा खूप जुन्या सिरीजचा पण तरीही सुंदर मालवाहक ट्रक. यातून बहुतेक रिट्रेडेड टायर्सची वाहतूक होत असावी.



सांगोला आगारातल्या काही अतिशय भंगार गाड्यांमधली ही एक बस. औरंगाबादच्या मध्यवर्ती कार्यशाळेने टाटाच्या बसेस बांधण्याचे ठरवल्यावर बांधण्यात आलेल्या पहिल्या काही बसेसपैकी ही एक बस. औरंगाबाद कार्यशाळेला समोरच्या काचेवरील डोम बांधणे नीट जमले नव्हते हे फ़ोटोवरून लक्षात येईलच. ही आणि सांगोला आगारातलीच हिची धाकटी बहीण (MH-20 / BL 0027) ब-याचदा रस्त्यातच बंद पडलेली दिसायची.





बंद पडलेल्या सांगोला - कुर्ला बससाठी कुर्ला नेहरूनगर आगाराने पाठवलेली बदली लेलॅण्ड बस.


महाराष्ट्राच्या तीनही मध्यवर्ती कार्यशाळांनी बांधलेल्या गाड्या एकाच फ़्रेममध्ये. दुर्मीळ योग जुळून आला होता २६ /०१/२०१४ रोजी. सांगोला आगारात. डावीकडून औरंगाबाद, नागपूर आणि दापोडी (पुणे) कार्यशाळेने बांधलेल्या परिवर्तन गाड्या.


सांगोला बसस्थानकावर फ़लाटांच्या पुढल्या बाजूस उभी असलेली सांगोला - जत ही जुनी पण छान गाडी.



आणि सांगोला - अकलूज मार्गावरची अकलूज आगाराची जुनी टाटा गाडी.



नागपुरात बनलेली आणि कधीकाळी नागपूर आगारात असलेली ही लेलॅण्ड गाडी आता आपल्या सासरी उस्मानाबाद आगारात. उस्मानाबाद - कोल्हापूर या मार्गावर नियमित धावणारी गाडी होती. लेलॅण्डच्या गाड्यांचे इंडिकेटर्स नेहेमीच कसे तुटतात ?  हे मला न सुटणारे कोडे आहे.

भरपूर वेळ बसफ़ॅनिंग करून आम्ही परतलो. 

Sunday, January 21, 2018

श्री तुकोबांची गाथा - ४

श्री तुकाराम महाराजांसारख्या संतांचे त्यांच्या आराध्य दैवताशी कायम एक प्रेमाचे भांडण चालत आलेले आहे. म्हणूनच एका अभंगात "मागणे ते एक, तुजपाशी आहे, देशी तरी पाहे, पांडुरंगा " म्हणणारे श्री तुकोबा या अभंगात काय म्हणतात ते बघुयात.


आम्ही मागो ऐसे, नाही तुजपाशी,  जरी तू भीतोसी, पांडुरंगा II
पाहे विचारूनी, आहे तुज ठावे, आम्ही धालो नावे, तुझ्या एका II
ऋद्धी सिद्धी तुझे, भव्य भांडवल, हे तो आम्हा फ़ोल, भक्तीपुढे II
तुका म्हणे जाऊ, वैकुंठा चालत, बैसोनी निवांत, सुख भोगू II

"पांडुरंग आपल्याला का बरे भेटत नाही ?" असा विचार श्री तुकोबांनी केल्यानंतर कदाचित पांडुरंगाला हा भक्त त्याची सर्व सिद्धी मागून घेईल, त्याला वैकुंठपद मिळावे यासाठी हट्ट करील अशी भीती वाटत असावी असे श्री तुकोबांना वाटले आणि त्यातून पांडुरंगापासून विभक्त नसलेल्या एका भक्ताचे हे लटके भांडण उत्पन्न झाले. 



श्री तुकोबा म्हणतात की "बा, पांडुरंगा तू भीऊ नकोस कारण तू देऊ शकणा-या गोष्टींपैकी काही आम्हाला नकोच आहे." आपण सगळेच पांडुरंगाजवळ आपल्या सांसारिक अशाश्वत सुखाची सतत मागणी करत असतो आणि तो सुद्धा ती मोठया आनंदाने पुरवत असतो. अहो, त्रैलोक्याचा स्वामी असलेल्या, ऋद्धी आणि सिद्धी ज्याचा घरी पाणी भरताहेत अशा त्या पांडुरंगाला सर्वसामान्य भक्तांच्या सांसारिक अडचणी दूर करण्यास अशक्य असे ते काय आहे ? पण संतश्रेष्ठ तुकोबा त्याच्याकडे ह्या क्षुद्र गोष्टी मागतच नाहीयेत आणि त्याला अशक्य असे ते मागताहेत. ते भगवंताच्या नामाचे प्रेम मागताहेत. "तैसे तुज ठावे, नाही तुझे नाम, आम्हीच ते, प्रेम सुख जाणो" या अभंगातही त्यांनी हाच विचार मांडलाय. देवाचे, परमेश्वराचे नामस्मरण करण्यातली गोडी देवाला कशी ठाऊक असणार ? ती गोडी ख-या भक्तालाच. 

ऋद्धी आणि सिद्धी प्राप्त झाल्यानंतर त्यातून मिळणा-या गोष्टी या सगळ्या तात्पुरत्या अशाश्वत असतात. पण ख-या भक्तीचे ज्ञान झाले, ख-या भक्तीचे भान आले की त्या शाश्वत सुखापुढे या सगळ्या ऋद्धी आणि सिद्धी तुच्छ वाटू लागतात. खरा भक्त हा परमेश्वराकडे त्याचे प्रेम आणि भक्तीच मागत असतो. 

परम पूजनीय बापुराव महाराजांनीही त्यांच्या चरित्रात अशा क्षुद्र सिद्धींचा आणि चमत्कारांचा निषेधच केलेला आपल्याला दिसतो. "जेथे वसे द्वैत, तेथे वसे चमत्कार". ज्याठिकाणी भक्त आणि परमेश्वर वेगळा असेल तेथेच त्या भक्ताला चमत्कारांची प्रचिती घ्यावीशी वाटते आणि येते. पण एकदा भक्त आणि परमेश्वर एकमेकांमध्ये पूर्णपणे विरघळून गेलेत की एकनाथ महाराजांसारखा "तुज मज नाही भेद, केला सहज विनोद" असा अनुभव येतो आणि ज्ञानोबा माऊलींसारखा "पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे, उभाची स्वयंभू असे " आणि "क्षेमालागी जीव उतावीळ माझा पण क्षेम देऊ गेले तव मी ची मी एकली" असा थरारक अद्वैताचा अनुभव येतो. परम पूजनीय बापुराव महाराज त्यांच्या भक्तांना नेहमी सांगत " नका भुलू चमत्कारासी, रत असावे नामस्मरणासी. देवाचे मज दर्शन व्हावे, हे सुद्धा प्रलोभन नसावे " इतकी उत्कट परमेश्वराप्रती एकात्मतेची भावना साधकाला, भक्ताला साधता आली पाहिजे.

एकदा हे अद्वैत भक्ताच्या अनुभवाला आलं की त्याच्या हृदयात प्रत्यक्ष वैकुंठच अवतरल्याची प्रचिती त्याला येईल हे निश्चित. मग त्याला विठ्ठलाने विमान वगैरे पाठवून वैकुंठात बोलावून घ्यावे ही आशा तरी कशी असणार ? म्हणूनच श्री तुकोबा श्रीविठ्ठलाला ठणकावून सांगताहेत की बा विठ्ठला, तुझ्या त्या विमानाची वगैरे आम्हाला गरज नाही. आम्ही आमच्या हृदयातल्या वैकुंठरूपी सुखाचा एकाच ठायी बसून निवांत आस्वाद घेत राहू. 

केव्हढी ही नामाप्रती निष्ठा ! आणि केव्हढा हा आपल्या भक्तीच्या सामर्थ्यावरचा विश्वास !

निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम
जय तुकोबा माऊली.

प्रा. राम प्रकाश किन्हीकर  (२१०१२०१८)