Wednesday, January 12, 2011

घाट

वेळ: संध्याकाळी ६.३०: स्थळ पुणे. लक्ष्मी रोड वरून रिक्षा भरधाव धावतेय. आजुबाजुला रंगीबेरंगी घोळके.

वेळ: संध्याकाळी ६.४५: स्वारगेट बसस्थानकावरून घाईगर्दीत पकडलेली पुणे-मिरज ही प्रतिष्ठीत सेवेची बस. कशीबशी मिळवलेली जागा.

वेळ: संध्याकाळी ७.१५: बसने कात्रज घाट चढायला सुरुवात केलीय."माझा कात्रज केला" ही म्हण अचानक आठवली."कात्रज करणे" म्हणजे ’मामा बनविणे’. या घाटालाच ही म्हण का प्राप्त झाली ? किंबहुना ह्याच घाटाचं नाव या म्हणीत कसे ? एक मूलभूत प्रश्न.(हो ना. कारण "माझा खंडाळा केला" किंवा "माझा कसारा केला" असं कुणीही म्हणताना दिसत नाही.). कात्रज उतरतानाच ’घाट’ या विषयावर चिंतन सुरू.

वेळ: रात्री ८.३०: बसने खंबाटकी घाट चढायला सुरुवात केलीय. त्यावेळी जाणवलेलं एक साधं पण सोपं सत्य. ’सत्य ही कायम साधीच असतात’ असं म्हणतात त्याची प्रचीती येतेय. घाट चढताना गाडी कायम पर्वतांच्या बाजुला असते तर उतरताना दरीच्या बाजुला.

जीवनाचंही तसंच आहे. रंगीबेरंगी फुलांच्या ताटव्यातून (नशिबाने पायघड्यांवरूनही) चालताना पुढे घाट पार करायचे आहेत याची जाणीव ठेवलीच पाहिजे. घाटच तर जीवनात आणि प्रवासात खरी मजा आणतात.

इतक्यात समोरून एक कर्नाटक राज्याची एस.टी. भरधाव उतरतेय. आमची बस मात्र एन्जिनचा भला मोठा आवाज करत चढतेच आहे. आमच्या ड्रायव्हरला उतरणार्या गाड्यांची असूया वाटत असेल का ?

आता थोड्या वेळाने आमचीही गाडी संपूर्ण घाट चढणार मग उतरायला सुरूवात. त्यावेळी विरूद्ध बाजुने घाट चढणा-या ड्रायव्हरांना आमची असूया वाटेल का?

वाटून उपयोग नाही. घाटाचा शेवट हे जर आपल्या जीवनाच अंतिम उद्दिष्ट मानलं तर अशी असूया वाटून उपयोग नाही. घाट चढताना सोबतीला वडीलधारा डोंगर असतो त्याप्रमाणे जीवनाचा हा घाट चढताना वडीलधार्यांचे आशीर्वाद डोंगरासारखे असतात.भलीमोठी चूक टाळली तर दरीत कोसळण्याचा अजिबात संभव नाही. अशावेळी आपल्या जीवनाची चढण सफ़लपणे चढून त्याच मस्तीत उताराकडे धावणा-या माणसांकडे असूयेने नव्हे तर आदर्श म्हणून बघायचं असतं. आपलीही गाडी प्रयत्नांचं इंधन जाळून, बुद्धीमत्तेच्या विविध गिअर्स ना वापरून, सद्सदविवेकअबुध्दीचे हॊर्न्स स्वतःच्या आणि इतरांच्याही फ़ायद्यासाठी वापरून घाट्माथ्यावर जाईल असा दुर्दम्य आशावाद बाळगायचा असतो.

घाट्माथा म्हणजे जीवनसाफल्य नव्हे . (हे न कळल्यामुळे कित्येक जण तिथेच थांबतात किंवा एकदम पायथ्याकडे झेप घेऊन गड्गडतात.) तिथून तर खरी परीक्षा सुरू होते. ऊतरताना वेग असतो, घाट चढल्याचा अनुभव असतो, मस्ती असते पण डोंगरांची साथ नसते. थोडीसुद्धा चूक गडगडायला कारणीभूत ठरू शकते. बुद्धीमत्तेचा गिअर जर न्युट्रल ला आणला गेला तर अमर्याद वेग वाढून फार नुकसान होऊ शकते. घाट (जीवनाचा किंवा रस्त्यावरचा) चढण्यापेक्षा उतरण्यातच जास्तं कौशल्य असतं. नाही का ?

(हा लेख यापूर्वी दै. तरुण भारत च्या नागपूर आवृत्तीत दि. ३१/०७/१९९३ रोजी प्रकाशित झाला आहे.)

Tuesday, January 11, 2011

काही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र. २

रविवार दि. ५/९/१९९९. वेळ दुपारी ३.०० वाजता. नागपूर रेल्वे स्टेशन.

आमची २१०६ अप नागपूर-मुंबई विदर्भ एक्सप्रेस हलली. गेले तीन दिवस मी नागपूर ला होतो. आता मुंबई ला परत चाललोय. श्रीकांत,लहान भाऊ, नेहेमीप्रमाणे स्टेशन वर सोडायला आलाय. गाडी हलली, निरोपांची देवाण घेवाण झाली.पत्र पाठव,फोन कर इ.इ.त्याच्या निरोप देण्याच्या पध्दतीवरुन मला नेहेमी माझ्या वडिलांची, दादांची आठ्वण येते. १९८९ मध्ये मी पहिल्यांदा कराड ला जाण्यासाठी घराबाहेर पडलो तेव्हा पासून माझ्या प्रत्येक प्रवासात निरोप द्यायला ते स्टेशनावर यायचेच. अगदी तसाच निरोप श्रीकांत देतो. फ़लाटावर अगदी गाडी दिसेनासी होईपर्यंत त्याचे हात हलत राहतात.

तसही नागपूर चा निरोप घेणे हे एक जडच काम आहे. पण "अन्नासाठी दाहीदिशा" भटकंती अटळ आहे. आता उद्या सकाळी १०.३० ला कॊलेज. आनंद एव्हढाच आहे की पुढ्ल्याच आठवड्यात पुन्हा सुट्टी आहे आणि नागपूरला परत यायचेय.
नेहेमीप्रमाणे गाडीत बसण्यापूर्वी सर्वे झालाय.
२१०६ अप नागपूर-मुंबई विदर्भ एक्सप्रेस.
लोको नं: 20600 WAM 4, 6P combination. मध्य रेल्वे. अजनी शेड
Manufactured by: Chittaranjan Locomotive Works.

कोच नं: 9693 AB मध्य रेल्वे. त्रिस्तरीय शयनयान, एस-८,
Manufactured by: Integral Coach Factory, Madras
Shell No.: BGSCN 2827
Date: 23/02/1987
To sleep 1 to 72,
माझा बर्थ नं ४७,









२१०६ अप ची नागपूर पोझिशन : एस.एल.आर(गार्डाचा डबा व ब्रेक व्हॆन), जनरल, जनरल, टी-एस-१ (तत्काळ कोटा कोच), ए-१ (वातानुकूल द्विस्तरीय शयनयान), ए.एस.-१(वातानुकूल त्रिस्तरीय शयनयान), ए.एच.-१ (वातानुकूल प्रथम वर्ग+वातानुकूल द्विस्तरीय शयनयान),एस-१,एस-२,एस-३,एस-४,एस-५,एस-६,एस-७,एस-८,जनरल, एस.एल.आर(गार्डाचा डबा व ब्रेक व्हॆन), विशेष आरक्षित डबा (रेल्वे अधिकार्यांसाठी).(एकूण १८ डबे).


गाडी बरोबर १५.०० वाजता हललीय. माझा साईड लोअर बर्थ असल्याने मी प्रवासाचा पूर्ण आनंद घेतोय. वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर करत भुसावळ पर्यंत व्यवस्थित गाडी गेलीय. भुसावळ रात्री २१.०० वाजता. ३९१ किमी अंतर ६ तासात.सरासरी वेग ६५ किमी प्रतितास. जवळपास गीतांजली एक्स्प्रेसचाच वेग.

भुसावळ ला गाडी नेहेमीच्या १ किंवा ३ नं फ़लाटावर न घेता वळवून ४ नं वर घेतली जातेय तेव्हा माझ्या मनात पाल चुकचुकतेय.काहीतरी चुकतय हे निश्चित. कुठेतरी गडबड आहे हे नक्की.

भुसावळ ला पुन्हा गोंधळाचे वातावरण. मुंबई कडे जाण्यासाठी तीन चार गाड्या आधीच फ़लाटांवर उभ्या आहेत. मी खाली उतरून चौकशी करतोय तोच भयानक बातमी समजतेय.

कसारा घाटात आज दुपारी रस्त्यावर एक गॆस वाहून नेणारा टॆंकर उलटलाय. त्या घाटात किमी १२६ जवळ रस्ता व रेल्वे लाईन अगदी जवळ्जवळ आहेत. गॆस गळती मुळे रस्ता वाहतूक तर बन्द आहेच पण रेल्वे वाहतूक पण बन्द ठेवावी लागलीय. आता पुढे काय? या प्रश्नाचे उत्तर रेल्वेत्ल्या कुणाकडेही नाही. कदाचित सर्व जण त्या प्रश्नाच्या उकलीतच गुंतलेत.
८००२ अप हावडा-मुंबई मेल (नागपूर वरून दुपारी १६.०० वाजता निघालेली) पावणे दहा वाजता बाजुच्याच ५ नं फ़लाटावर येतेय. त्या प्रवाशांचाही थोडा गोंधळ. सामानाकडे सहप्रवाशांना लक्ष ठेवायला सांगून मी मात्र भुसावळ स्टेशनावर भटकतोय.
रात्री साडे अकरा वाजताहेत आणि अचानक बातमी येतेय की आत्ता काही गाड्या जळगाव-सुरत-वसई मार्गे तर काही गाड्या मनमाड-दौंड-पुणे मार्गे मुंबईकडे सोडण्याचा निर्णय झालाय. विदर्भ एक्सप्रेस सोडून बाकी सगळ्या गाड्यांचे बदललेले मार्ग सांगितले जातायेत. माझ्या मनात खूप इच्छा की आता गाडी लेट जाणारच आहे तर जळगाव-सुरत-वसई मार्गे तरी जावी. निदान हा नवीन भाग तरी बघून घेउ. (उद्या कॊलेज ला जॊइन करायच आहे पण आता इलाज नाही. मधून कुठून तरी किर्लोस्कर सरांना(आमचे विभाग प्रमुख) फोन करू.) (१९९९ ला मोबाईल सर्रास नव्हते. एस.टी.डी./ पी.सी.ओ. बूथ शोधणे आणि फोन करणे क्रमप्राप्त होते.)

आणि उदघोषणा जाली की इतर गाड्या जरी दुसर्या मार्गांनी वळवलेल्या असल्या तरी विदर्भ एक्सप्रेस मूळ मार्गानेच जाईल. मग काय विचारता? इतर गाड्यांमधले लोंढेच्या लोंढे विदर्भ एक्सप्रेस कडे धावलेत. मी पण जागेच्या काळजीने धावलोय. डब्यासमोर ही गर्दी! कसाबसा माझ्या सीट पर्यंत पोहोचतोय तो तिथे आधीच ४ आगांतुक येवून बसलेले. दोघांना उठवून मी बसतोय.(झोपायला जागाच नाही. बसू दिल हेच खूप झाल.) इतर गाड्या भराभर हलल्यात. आमची गाडी हलायच नाव नाही. आता सगळेच कंटाळलेत. चर्चा रंगात आल्यात. रात्री साडेबाराच्या सुमाराला गाडी हललीय. इथून अगदी नऊ तास जरी घेतलेत तरी गाडी सकाळी दहा वाजेपर्यंत मुंबईत जाइल. कॊलेजला लेट मार्क होइल इतकच.

डब्यातले सगळेच आता पेंगताहेत. डब्यात सर्वत्र वेडेवाकडे होउन लोक पसरलेत. मलाही बसल्या बसल्याच डुलकी लागलीय.

सोमवार दि. ६/९/१९९९.

गाडी थांबल्यासारखी वाटतेय. बाहेर बघतोय तो मनमाड आलेल. साडेचार वाजलेत. पुन्हा खाली उतरतोय आणि एन्जिनापर्यंत पायपिट. घटनांचा कानोसा घेण्याचा प्रयत्न. कळतय की अजूनही तो टॆंकर आणि त्यातली वायुगळती आटोक्यात आलेली नाहीय. आणि विदर्भ एक्सप्रेस सुद्धा आता दौंड-पुणे मार्गेच जाईल.

तडक मी स्टेशनच्या बाहेर. एस.टी.डी./ पी.सी.ओ. बूथ शोधतोय. सगळ्या बूथ्स वर तौबा गर्दी. वाट बघता बघता गाडी सुटणार तर नाही ना हे टेन्शन. थोडा कुठे एन्जिनाचा आवाज आला तर ही आपलीच तर गाडी नाही ना असे दचकणे.
अर्ध्या तासाच्या प्रतिक्षेनंतर माझा नंबर लागतोय. पहाटे सव्वा पाच वाजता किर्लोस्कर सरांना फोन करायचा की नको हा विचार होतोय. पण नंतर इतका वेळ मिळेल न मिळेल, तसेही किर्लोस्कर लाख माणूस आहेत. त्यांना आपली निकड कळेलच हा विश्वास. फोन लावतोय आणि किर्लोस्कर सरांना झोपेतून उठवतच मी आज येणार नसल्याचा निरोप सांगतोय. थोडक्यात सगळी सिच्युएशन समजावून सांगतोय. ते म्हणताहेत की डोंट वरी. चला. एक दड्पण तर दूर झाल. आता रेल फ़ॆनिंग ला मोकळे.

धावतच फलाटावर जातोय. विदर्भ एक्सप्रेस अजूनही आहे. मनमाड-दौंड-पुणे मार्गे वळवलेल्या इतरही गाड्या उभ्या आहेत आणि आता वाट आहे ती डिझेल एन्जिनांची. मनमाड पर्यंत ज्या एन्जिनाने आणले ते आता उपयोगाचे नाही. आता येथून पुढे पुण्यापर्यंत डिझेल एन्जिन. काल मुंबईवरून निघणार्या काही गाड्याही पुणे-दौंड-मनमाड मार्गे भुसावळ कडे जाणार असल्याने या मार्गावरचा ताण वाढलाय आणि साहजिकच डिझेल एन्जिनांचा तुटवडा निर्माण झालाय.

सकाळी सहा वाजता कोल्हापूर-नागपूर महाराष्ट्र एक्सप्रेस वळून येतेय. ही गाडी मात्र वेळेवर धावतेय. इतर गाड्यांना कधी नव्हे हो ह्या गाडीचा हेवा वाटत असणार. आता हिच डिझेल एन्जिन कुणाला मिळणार? कारण वाट पाहणार्या ३,४ गाड्या आहेत. आमच्या विदर्भ एक्सप्रेस च्या आधी आलेल्या सुध्दा काही गाड्या आहेत.

पण आमच नशिब बलवत्तर आहे. ते एन्जिन सरळ विदर्भ एक्सप्रेस च्या दिशेने फ़िरून येतेय. आम्ही शंटिंग पाहून पुन्हा आमच्या डब्याकडे धाव घेतोय.



मनमाड ते पुणे:
लोको नं: 17589 WDM 2A , द.म.रेल्वे, काजीपेठ शेड Long Hood Front
Manufactured by: Diesel Locomotive Works, Varanasi


गाडी साडेसहाच्या सुमाराला हललीय. आता एकेरी मार्ग. त्यातही काल या मार्गावर वळवलेल्या गाड्या. प्रत्येक स्टेशनवर थांबाव लागत होत.पुढून येणारी गाडी आली की मग निघायच. आता सर्वांनाच भुकेची जाणिव झालेली. दरवेळी आई डबा देताना थोडा जास्तिचाच डबा देते आणि त्यावरून मग मी चिडतो."अगं, एव्हढा डबा काय करायचाय? उद्या सकाळ पर्यंत मी पोहोचणार आहेच. मग डबा वाया जातो आणि टाकून देतांना जिवावर येतं" हे माझ नेहेमीच आर्ग्युमेंट. पण भरपूर डबा देण्याचा तिचा आग्रह. यात गेल्या दोन तीन वेळांपासून माझा विजय होत होता. तिला माझ म्हणण पटल होत म्हणा किंवा वाद टाळायचा म्हणा. पण आता माझ्याजवळ खायला काहिही नव्हत. पिण्याचे पाणीही संपत आलेले.

वाटेत क्रॊसिंग साठी गाडी थांबत होती खरी पण येवला, कोपरगाव, पुणतांबा सारखी चिमुकली स्टेशन्स इतक्या प्रवाशांची गरज कशी भागवणार? तिथल्या एख्यादाच स्टॊल वर खाण्यापिण्याचे पदार्थ मिळवण्यासाठी इतकी गर्दी व्हायची की ते पदार्थ लगेच संपायचे. पाणीही मिळेना. स्टेशनवरचं पाणी मिळवण्यासाठी त्या नळाभोवती खूप गर्दी व्हायची. कधी नव्हे तो त्या बिचार्यांना एव्हढा भाव मिळत होता.

भुकेने, तहानेने व्याकूळ मी दौंड ची वाट पहात होतो. दौंड स्टेशनात गाडी दुपारी दोन च्या सुमारास शिरली आणि गाडीचा वेग पुरता कमी होण्याआधीच मी फ़लाटावर उडी टाकली होती. तिथल्या निरामिष भोजनालयात जाऊन थाळीची ऒर्डेर देइपर्यंत गाडी थांबली. तौबा गर्दी पुन्हा त्या भोजनालयाकडे धावली. इतर माणसे येण्याआधी आमचे भोजन सुरुही झाले होते.
इथे एन्जिन उलट बाजूला लागले आणि गाडीचे डबे उलट क्रमाने लागलेत. ए.सी. डबे जे मुंबईच्या बाजूला असतात ते आता विरूध्द बाजुला झालेत. जवळपास तासाभराने गाडी हलली. बहुतेक सर्व प्रवाशांची पोट्पूजा आटोपली होती.















पुण्याला पोहोचायला संध्याकाळचे १६.४५ वाजताहेत. इथे पुन्हा एन्जिन बदलणार.
पुणे ते मुंबई:
लोको नं: 20147 WCG 2 मध्य रेल्वे. कल्याण शेड
डी.सी. प्रवाहाचे विद्युत एन्जिन.




पुण्याहून साडेपाच च्या सुमाराला गाडी हलली आणि खंडाळा घाटातून रात्री २१.३० ला कल्याण ला पोहोचली. इथे उतरून पुढे लोकल ने ठाण्यापर्यंत जायचय.(१९९९ मध्ये २१०६ अप विदर्भ एक्सप्रेस ला ठाणे हा थांबा नव्हता).

एकुण प्रवास: ७८३+२४०(अतिरिक्त) = १०२३ किमी

सरासरी वेग: ३३.५४ किमी प्रतितास.


आईच्या आग्रहाच महत्व पटवणारा प्रवास. आता यानंतर कधीच जादा डब्याला नाही म्हणायच नाही हा निश्चय.

Photo courtesy: www.irfca.org (Loco database)

पहिला वीकएण्ड २०११.

दि. ०८/०१/२०११.
कॊलेज संपवून मी दीड वाजता घरी आलो. लगेच थोडस खाऊन आम्ही आमच्या कारने श्री. देवईकर सरांच्या घरी शंकरनगर ला गेलो. तिथून दुपारी १४.४० ला चंद्रपूर साठी निघालो. मध्ये रिलायन्स पेट्रोल पंपात गाडीत गॆस भरून चंद्रपूर च्या दिशेने निघालो. आम्ही सर्व जण यंदा हुरडा खायला चंद्रपूरला निघालो होतो. मी सुद्धा जवळपास ५ वर्षांनंतर असा हुरडा वगैरे खायला निघालो होतो.
नागपूर ते चंद्रपूर रस्ता लहानपणापासून फ़ार परिचयाचा. आत्ता गाडी घेतल्यानंतर तर फ़ारच आवडतोय हा रस्ता.भलेही जांब ते वरोरा हा रस्ता फ़ार खराब असेल पण त्या माहेरच्या वैद्यासारखे ह्या रस्त्याचे अवगुणही द्रुष्टीआड होतात.
जांब ला पोहोचायला जवळपास एक तास दहा मिनीटे लागतात. हॊटेल अशोका मध्ये थांबल्याशिवाय हा प्रवास पूर्ण होत नसल्याप्रमाणे आम्ही तिथे थांबलो. थोडी पोटपूजा आणि चहा. १६.१९ ला चंद्रपूर साठी प्रस्थान.
जांब ते वरोरा हा रस्ता दिवाळी पेक्षाही जास्त खराब झालेला दिसतोय. तरीही संध्याकाळी १८.१५ ला आम्ही घरी आलोय. गेल्या दोन वर्षांमध्ये चंद्रपूरात वाहनांची (विशेषतः चारचाकींची) संख्या खूपच वाढल्याचे जाणवतेय. प्रदुषण तर गेल्या १० वर्षात कमालीचे वाढलेय. पडोली मध्ये आलो की धुराचे आणि धुळींचे लोट्च्या लोट गाडीवर चाल करून येताना दिसतात. हे कुठेतरी थांबायला हवे आहे.
नेहेमीप्रमाणे दादामामांकडे स्वागत आणि तिथेच रात्री गप्पा मारत मारत झोप.



डॊ. देवईकर व सौ. देवईकर


दि. ०९/०१/२०११

सकाळी लवकर उठून आम्ही आवरतोय. साधारण सव्वा दहा च्या सुमाराला आम्ही निघतोय.अंचलेश्वर मंदीर आणि महाकाली मंदीरात दर्शन घेउन आमचे बल्लारशहाच्या दिशेने प्रस्थान. हा रस्ता तर दुपदरीच पण फ़ार वर्दळीचा. वाहनांना ओव्हरटेक करण खूप कठीण. एखाद्या ट्रक च्या मागे दहा दहा, पंधरा पंधरा मिनीटे हळू हळू जाण भाग आहे.
सकाळी अकरा च्या सुमाराला आम्ही दहेली च्या शेतावर पोहोचतोय.

सोबत सचीन व सौ.सानिका सचीन. दोन गाड्या घेऊन आमचा ताफ़ा अगदी शेतात घुसला. मुलांच्या आनंदाला उधाण आलय.


मृण्मयी किन्हीकर,शर्वरी सगदेव आणि सोहम सगदेव

आमच्या सोबत सध्याचे मालक (सचीन सगदेव) आणि भावी मालक (सोहम सगदेव) दोघेही आहेत. आम्ही सर्वांनी प्रथम बोराच्या झाडाकडे मोर्चा वळवला. मनसोक्त बोरे वेचून खुल्या आणि मोकळ्या निसर्गाचा मुक्त आस्वाद घेतला.
"दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे" ची आठवण होइल असे शेत. त्यात पिकत असलेला भाजीपाला आणि फुले. मस्त हवा. आम्ही आमची फुफुसे भरून घेतलीत. मुलांच्या मस्तीला तर उधाण आले होते.

डॊ. देवईकर व सचीन सगदेव




जेवण बनवण्यात थोड्या अडचणी येणार होत्या त्यामुळे आम्ही न्याहारीवरच समाधान मानले. आणि तृप्त मनाने निघालो.
चंद्रपूरला पुन्हा पाहूणचार घेऊन दुपारी १६.४७ ला निघालो. नागपूर च्या अगदी जवळ खापरी उड्डाण पुलावर अपघातामुळे वाहतूक खोळंबा झालेला होता. जवळ्पास पाऊण तास त्यात वाया गेला. रात्री २१.३१ ला आम्ही सर्व घरी आलो. वाटेत श्री देवईकर सरांना त्यांच्या घरी सोडले.
मस्त वीकेण्ड. त्याच्या आठवणी मनात घेऊन परततोय.




Wednesday, January 5, 2011

काही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१

१३/२/१९९२.
य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची "अर्थ-अनर्थ" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा, गप्पा रंगलेल्या आहेत. मध्येच कुणीतरी मित्र आठवण करून देतो की राम्या लेका तुला उद्या सकाळी लवकर उठून नागपूर ला जायचय ना? मग पळत पळत होस्टेल गाठतोय आणि रात्री दीड च्या आसपास झोपतोय. पार्टनर ला सकाळी ६ ला उठवण्याची आठवण कम तंबी.

१४/२/१९९२.
सकाळचे ७ वाजलेत. चिंच्या (पार्टनर) गाढ झोपलाय. मी उठतोय आणि घड्याळात पाहून सरळ अंगात शर्ट पॆण्ट चढवून तयार. दात घासायला, अंघोळी बिंघोळी साठी वेळच नाहीये. एव्ह्ढेच काय तर भांग पाडायला सुद्धा वेळ नाही. सकाळी सव्वा नऊ वाजताची गोवा-दिल्ली ए़क्सप्रेस सातारा स्टेशनावरून पकडायची आहे. कराड ते सातारा कमीत कमी १ तास व सातारा ते सातारा स्टेशन अर्धा तास. हॊस्टेल वरुन कराड बस स्टॆण्ड पर्यंत १५ मिनिटे. सातारा ते नागपूर टिकीट पण काढायचेय. टेन्शन... टेन्शन..... टेन्शन.......
कराड बस स्टॆण्ड. सकाळचे सव्वा सात. नेहमी असतो तसा बस निवडत वगॆरॆ बसायला वेळ नाही. पहिली बस आलीय.



इस्लामपूर जलद पुणे.
MH-12 /F 2898.

म.का.दा. न.टा. ६१७, १९९०-९१.
TATA 1510,
चेसिस नंबर ५२४७१०,
सां. इस्लामपूर आगार. ३*२, एकूण ५५ आसने. माझा आसन क्र. १.
बस लगेच निघतेय. फ़क्त उंब्रज ला थांबून सातारा ला सकाळी साडे आठ ला पोहोचतेय. पंचावन किलोमीटर सव्वा तासात. Average speed ४४ किमी प्रतितास. Thats OK.
माझ मलाच हसायला येतय. किती घाईत निघालोय!
सातारा बस स्थानकावर रिक्शा शी हुज्जत घालत शेवटी थोड्या चढ्या भावानेच सातारा स्टेशन गाठ्तोय. नऊ वाजायला आलेत. तिकीट खिडकी वर फ़ार रांग नसावी ही माझी इच्छा.
अजिबात गर्दी नाही. कारण गाडी चक्क १ तास लेट आहे. सुट्केचा निश्वाःस टाकत तिकीट काढून प्लॆट्फ़ॊर्म वर पोहोचतोय. टुमदार छोटेसे सातारा स्टेशन.
छोटीताई (माझी मोठी मामेबहीण) च्या लग्नाला चंद्रपूर ला जायचय. सगळ्यांच आग्रहाच निमंत्रण. जायला हवच आहे. पण एकांकिका स्पर्धा होत्याच आणि त्यात एन्ट्री फ़ार आधीच गेली होती म्हणून मग ही पळापळ. नागपूर ला थेट जायला महाराष्ट्र एक्सप्रेस आहे पण ती उशीरा पोहोचेल म्हणून हा वेगळाच प्रवास.
सकाळचे साडे दहा वाजताहेत. कोरेगाव कडल्या दिशेला सिग्नल पडलाय. वळणावर दूरवर धूर दिसतोय. एंजिनाच धूड लांबच लांब गाडीला घेऊन १ नंबर प्लॆटफॊर्म वर येतय.



२७०१ डाऊन मिरज ह.निझामुद्दीन गोवा सुपर एक्सप्रेस.
(त्या वेळी मिरज ते वास्को द गामा हा मार्ग मीटर गेज होता. २७०१/२७०२ फक्त मिरज पर्यंतच जायची व मिरज पासूनच सुटायची. मिरजेच्या पुढे हीच गाडी मीटर गेज ने वास्को द गामा पर्यंत जायची. पुणे कोल्हापूर रेल्वे मार्गावर धावलेली ही पहिली सुपरफास्ट गाडी. तिच बरच कौतिक आम्हाला होत. आणि गाडी होतिच तशी कवतिक करण्यासारखी. मिरजे वरुन थेट सातारा, पुणे, दौंड, अहमदनगर,मनमाड, भुसावळ करीत दिल्ली ला जायची.)
(या गाडी च्या आकर्षणाचा आणखी एक भाग म्हणजे आमची नेहेमीची महाराष्ट्र एक्सप्रेस जाताना आणी येतानाच्या प्रवासातही मनमाड ते पुणे हा प्रवास किट्ट काळोखात करायची. त्यामुळे आमच्या नागपूर ते कराड या प्रवासात अहमदनगर, दौंड ही स्टेशन्स लागतात ही खबर आमच्या काही दोस्तांना २ वर्षांनंतर लागली. २७०१/२७०२ हा प्रवास दिवसा ढवळ्या करायची त्यामुळे हा भाग कधी नव्हे तो बघायला मिळायचा.)
एन्जिन क्र. : 17148 , WDM 2, C.R. Diesesl Shed इटारसी,
Manufactured by: Diesesl Locomotive Works, Varanasi, in May 1969.

गाडी ची पोझिशन खालील प्रमाणे:
एस-४, एस-१, एस-२, एस-३, ए-१, ए-२, एफ़-१, एस-५, एस-६ ,एस-७, एस-८, जनरल, जनरल, जनरल + रेल्वे डाक सेवा, जनरल, गार्डाचा डबा व ब्रेक व्हॆन. (एकूण १६ डबे).
(त्यावेळी ही गाडी आपला रेक ७०२१/७०२२ हैद्राबाद-ह.निझामुद्दीन दक्षीण एक्सप्रेस शी शेअर करायची. त्यामुळे ए.सी. कोचेस च्या आधी चे एस-१ ते एस-४ कोचेस ह.निझामुद्दीन -विशाखापट्टणम लिंक एक्सप्रेस चे व उरलेला रेक ह.निझामुद्दीन-हैद्राबाद असा असायचा. गाडी च्या बोर्डांवरही असेच ड्युएल मार्किंग असायचे. एकाच बोर्डावर वर हैद्राबाद-ह.निझामुद्दीन किंवा ह.निझामुद्दीन -विशाखापट्टणम आणि खाली मिरज ह.निझामुद्दीन असे मार्किंग असायचे.)
मी आपला एस-२ मध्ये गेलो. गर्दी अजिबातच नव्हती. थोड्या वेळाने टी.टी.इ. आला की रिझर्वेशन चार्ज भरायचा आणि आरामात या डब्यातून प्रवास करायचा हा माझा मनसूबा होता. (तेव्हा स्लीपर हा वेगळा वर्ग नव्हता. सेकण्ड क्लास चे तिकीट घेऊन रिझर्वेशन चार्ज भरुन स्लीपर मध्ये बसता यायचे.)
कोच नं. 6712, द.म., एस-२ कोच, त्रिस्तरीय शयनयान.
Manufactured by: Rail Coach Factory, Kapoorthala,
Shell No. : WGSCN 352,
Date: September 1990.
एकूण आसने व शायिका: ७२.
त्यामानाने हा नवीन च कोच होता. महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आम्हाला १९७० च्या दशकातले जुने पुराणे कोचेस मिळायचेत.
गाडी लगेचच हलली. सातार वरून बसणारे आम्ही हाताच्या बोटांवर मोजण्याएवढेच पासिंजर होतो. गाडीतही गर्दी नाहीच.
मजेत प्रवास सुरु झाला. काल रात्री च्या एकांकिके ची धुंदी होतीच. मस्त वातावरण. ढगाळ वातावरण होते. ट्रेन प्रवासात माझी सुखाची व्याख्या अशी साधी सोपी आहे की गाडी जरा रिकामी असावी, समोर कुणी सहप्रवासी जागा अड्वून नसावा, आपल्याला साइड लोअर बर्थ मिळाला असावा, मस्त पैकी पाय पसरून बसता यावे, वाटलच तर लवंडता यावे, ड्रायव्हर जरा जोसात असावा आणि मोठी मोठी स्टेशन न घेता गाडी तुफ़ान धावावी. हा सगळा योग आज जुळून आला होता.
गाडी आदर्की वाठार च्या घाटांतून धावतेय. उशीर झाल्यामुळे जरा मेक अप करण्यासाठी वेगही आहे आणि आता पुढचा थांबा पुणे. जरी सिंगल लाईन असली तरी या गाडीला थांबवणार नाहीत हा अनुभव. उलट ह्या गाडी साठी इतर गाड्या थांबवल्याचा आमचा अनुभव. आता एक तास गाडी लेट धावतेय पण सहज हा वेळ भरून काढेल. भुसावळ स्टेशन वरून पुढे दादर-नागपूर जर मिळालीच तर ठीकच नाहीतर तिच्या मागची अहमदाबाद-हावडा तर नककी मिळेलच.
अपेक्षेप्रमाणे घोरपडी साडे बारा च्या सुमारास आलय पण इथे मात्र गाडी जरा जास्तच वेळ थांबतेय. अर्धा तास झाला तरी हलण्याची चिन्हे नाहीत. बाजुलाच पुण्याच डिझेल शेड. त्यात डिझेल इंजिनांची ये जा चाललीय पण आता पुढल्या प्रवासाचे वेध आणी काळजी लागलीय.
आता ढगाळ वातावरण जास्तच जाणवू लागलेय.पाऊस कधीही सुरू होइल ही अवस्था.थोडी चौकशी केल्यावर कळतय की काल मुंबई ला फ़ार पाऊस झालाय. गाड्या सगळ्या अडकल्यात. पुणे स्टेशन वर प्लॆट्फ़ॊर्म च रिकामा नाही. इथे वाट बघत बसण्याशिवाय पर्याय नाहीय.
पेन्ट्री कार वाल्या पोरांची वाट बघणे सुरू आहे. भुकेची जाणीव तीव्रतेने होतेय. काही तरी पोटात ढकलून पुन्हा गाडी हलण्याची वाट सगळेच बघत आहेत. सगळ्यांच्या काळजी युक्त चर्चा वगैरे वगैरे.

अखेर दुपारी अडीच वाजता गाडी हलतेय.हळू हळू पुण्यात आलीय. प्लॆट्फ़ॊर्म ५ वर गाडी घेतलीय. नॊर्मली २ नं किंवा ३ नं च्या प्लॆट्फ़ॊर्म वर ही गाडी घेतात. आज प्लॆट्फ़ॊर्म मिळाला हे ही नसे थोडके.
पुणे स्टेशन वरही चांगला तासभर मुक्काम होतोय. पण इथे आजुबाजूला खुप नवनवीन गाड्या. वेळापत्रक कोलमडल्यामुळे ज्या गाड्या नेहेमी दिसत नाहीत त्या दिसताहेत.वेळ कसा गेला कळत नाहीय.
साडेतीन ला एंजीन उलट बाजूला लावून गाडी हललीय. पुन्हा वेग. पण आता भुसावळ वरुन पुढे जायला कुठली गाडी मिळणार याची चिंता.
दौंड येइ पर्यंत संध्याकाळ चे सव्वा पाच वाजलेत. दौंड ला पुन्हा एंजीन उलट बाजूला लावण्याची कसरत सुरू झालीय आणि एवढ्या वेळात मला लागलेला शोध म्हणजे बाजूचाच एस-३ हा नवीन डबा आहे आणि तो जास्त रिकामा आहे. लगेचच त्या डब्यात मी शिफ़्ट झालोय.
कोच नं. 8399, द.पू. एस-३ कोच, त्रिस्तरीय शयनयान.
Manufactured by Rail Coach Factory, Kapoorthala,
Shell No. WGSCN 1104,
Date: September 1991
एकूण आसने व शायिका: ७२.
दौंड वरून गाडी संध्याकाळी पावणे सहा ला हललीय आता मात्र सगळा बॆकलॊग भरुन काढण्यासाठीच जणू ड्रायव्हर काकांनी जोसात हाणलीय.सगळ्यात तीव्र जाणीव होतेय ती झोपेची.माझ्या नकळत मी डुलक्या घेता घेता कधी झोपी गेलोय ते मलाच कळत नाही. नाटकाच्या तालमींची जागरण, प्रत्यक्ष नाटकाच्या दिवशी रात्री उशीरा पर्यंत झालेला प्रयोग यामुळे अपुरी झोप आता ओसंडून वाहतेय.वैदर्भिय भाषेत सांगायच तर झोप अंगाच्या बाहेर झालीय.
जाग आल्यावर जाणीव की गाडी कुठल्या तरी मोठ्या स्टेशनावर थांबलीय. हळू हळू कळतय की हे तर मनमाड स्टेशन. पूर्ण पणे जाग आलेली नसतानाही मी भराभर आवरासावर करतोय. काय करायच? कुठे जातोय? काहीच कळत नसतानाही मी प्लॆट्फ़ॊर्म वर उतरलोय आणी भराभर जिना चढून ओव्हरब्रिज वर पोहोचतोय.
तिथे पोहोचल्यावर ब्रेक जर्नी साठी टी.टी.इ. समोर तिकीट सादर केल्यावर तो सल्ला देतोय की काल मुंबईतही बराच पाऊस झाल्याने गाड्यांचा गोंधळच आहे. खूप गाड्या भुसावळ पर्यंतच आहेत. त्यामुळे तुम्ही गोवा-दिल्ली गाडीने भुसावळ पर्यंत जा तिथून तुम्हाला चांगला ऒप्शन मिळेल.मी परततोय न परततोय तोच गाडी हलतेय.थोडा धावूनच गाडी पकडावी लागतेय. तोच डबा. तोच बर्थ. आणि......
तिथे परतल्यावर लक्षात येतय की मघाशी उतरताना अर्धवट झोपेत आणि कसल्यातरी अनामिक घाईत मी माझी सूट्केस जी बर्थ ला बांधून ठेवली होती ती तशीच होती. गडबडीत ती घ्यायलाच मी विसरलो. मग हळूहळू झोप उडाली आणि विचार केला की मी नक्की काय घेऊन उतरलो होतो? लिटरली काहीच नाही. सूट्केस नाही. पाण्याची बॊटल नाही. फ़क्त चप्पल घालून मी उतरलो आणि वेड्या सारखा धावलो होतो.जर ही गाडी निघून गेल्यावर टी.टी.ई. भेटला असता तर काहीच खर नव्हत. स्वतःची एकाच वेळी खूप चीड येत होती आणि हसायलाही येत होत. असा कसा मी वागलो? कळण्याच्या पलिकडले होते. मग घड्याळाकडे लक्ष गेले. रात्रीचे सव्वा नऊ वाजले होते. झोप तर पुरती उडालेली होती. गाडी वेगात धावत होती. डिझेल एंजिन काढून आता इलेक्ट्रिक एंजिन लावलेले होते त्यामुळे आणि आता दुहेरी मार्ग होता त्यामुळेही.
रात्री साडे अकरा वाजता भुसावळ येतय. आता मात्र पूर्णपणे जागा होऊन सगळ्या वस्तुंसकट मी खाली उतरतोय.फ़लाटावर तुफ़ान गर्दी. सातारा ते भुसावळ ७२५ किमी अंतर १३ तासात. सरासरी वेग ५६ किमी प्रतितास. गाडीने बराच वेळ भरून काढलाय.
भुसावळ स्थानकात गोंधळाचे वातावरण. पुष्कळ गाड्या थांबलेल्या. बहुतांशी मुंबई कडे जायला तयार असलेल्या.हळूहळू एकेक गाडी मुंबई कडे रवाना होतेय. काही मुंबई कडून इटारसी कडे प्रस्थान करताहेत. नागपूर कडे एकही नाही. आता मात्र काळजी वाढलीय.
भुसावळ ला थोडस काहीतरी खाऊन वाट बघणे सुरू आहे. रात्री चे साडे बारा वाजताहेत.
अचानक घोषणा होतेय. २८५९ गीतांजली एक्सप्रेस तब्बल १३ तास उशीरा धावतेय. म्हणजे रात्री अडीच पर्यंत येइल. जीव भांड्यात पडलाय पण आता नवीनच काळजी.गाडीत जागा असणार का? बंगाली लोकांचा यापूर्वी चा जागा शेअर करण्याबाबतचा अनुभव फ़ार चांगला नाही. ते जागा द्यायला कमालीचे नाखुश असतात.
१५/२/१९९२

रात्री दीड ला गाडी येतेय.
२८५९ डाऊन मुंबई-हावडा गीतांजली सुपर एक्सप्रेस.
एन्जिन क्र. 21343 , C.R. भुसावळ
Manufactured by: Chittaranjan Locomotive Works


गाडी ची पोझिशन खालील प्रमाणे:
गार्डाचा डबा व ब्रेक व्हॆन, एस-१, एस-२, एस-३, एस-४, एस-५, एस-६, एस-७, पेन्ट्री कार, एस-८, एस-९, एस-१०, एस-११, एस-१२, ए-१, गार्डाचा डबा व ब्रेक व्हॆन. (एकूण १६ डबे).
आणी आनंदाची बाब म्हणजे गाडी चक्क रिकामी आहे. ही गाडी काल मुंबई पर्यन्त गेलीच नाही. पावसामुळे नाशिक वरूनच परत पाठवलीय. मी तर टुणकन उडीच मारतोय. एस-२ कोच चांगला दिसतोय. मी आत शिरलो.
कोच नं. 8076, द.पू .एस-२ कोच, त्रिस्तरीय शयनयान.
Manufactured by: Integral Coach Factory,Madras
Shell No. : BGSCN 3464,
Date: 23-3-1990.
एकूण आसने व शायिका: ७२.
हा डब्बा सुद्धा नवीन, छान आहे. नवीन डब्यांमध्ये बसण्यासाठी आम्ही किती व्याकुळ असतो ते महाराष्ट्र एक्सप्रेस मधून लांबवरचा प्रवास केल्याशिवाय कळणार कसे?
खुप वेळ थांबून गाडी पहाटे ३ वाजता निघतेय. आता मस्तपैकी ताणून द्यायचा विचार पक्का झालेला.अकोला व बडनेरा हे दोनच थांबे घेऊन गाडी बरोबर सहा तासांनी सकाळी नऊ वाजता नागपुरात प्रवेशते. ३९१ किमी सहा तासात.सरासरी खूपच चांगली. ६५ कि.मी.प्रतितास.
चला पोहोचलो एकदाचे. आता नागपूर ते चंद्रपूर प्रवास म्हणजे घर आंगण.
घरी पोहोचतोय तो घराला कुलूप. मी येणार असल्याच पत्र घरी मिळालेल दिसत नाही. मी येणार नाही अस समजून घरचे सगळे कालच चंद्रपूरला गेल्याचे शेजारांकडून कळले. त्यांचा थांबण्याचा, फ़्रेश वगैरे होण्याचा आग्रह टाळून मी चंद्रपूरच्या ओढीने नागपूर बस स्थानकात.
एव्हाना सकाळ्चे ११ वाजत आलेले. किती युगांपासून आपण प्रवास करतोय ! अशी मनःस्थिती झालेली. कालचा दिवसभर आंघोळ झालेली नाही. ११०० किमी चा प्रवास झालेला आणखी १५० किमी बाकी. पण आता तोच खूप जड वाटू लागलेला.
नागपूर स्थानकात बस उभीच आहे. जरा नवीनच आहे.
नागपूर सुपर राजुरा
MH-31/8570,

म.का.ना. न.टा. ३०४, १९९०-९१.
TATA 1510,
चं. राजुरा आगार. ३*२, एकूण ५५ आसने. माझा आसन क्र. ६.
चांगली साडे अकरा वाजता बस निघालीय. मी मात्र दोन दिवसांची अपुरी झोप डोळ्यात साठ्वून जागा राहण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय.नागपूर चंद्रपूर प्रवासात झोपायच म्हणजे काय? छे! काहीतरीच! पण झोप अनिवार झालेली आहे.
जाग येतेय तेव्हा बस जांब ला थांबलीय.खाली उतरण्याची इच्छा नाहीय. पण शरीर धर्माच्या सादेला ओ देण्यासाठी उतरतोय.
बस जांब वरुन निघता निघता पुन्हा झोपेच्या आधिन झालोय.बराच वेळ झालाय, बस चा आवाज येत नाहीय.थोडा थोडा जागा झालोय आणि कळतय की बस थांबलीय.थोडी जाणिव झालीय की घोडपेठ आलय.इथून चंद्रपूर फक्त २० किमी वर. दुपारचे दीड वाजताहेत. बस चा टायर पंक्चर झालाय.त्या दुरूस्ती साठी बस खोळंबलीय.कंडक्टर ला मदत करायला खाली उतरलेली इतर माणसे थोड्या कुचेष्टेने, थोड्या सहानुभूतीने, गंमत म्हणून बघताहेत.(हा कदाचित माझा भास ही असू शकेल).मी मात्र आता या प्रवासाला जाम वैतागलोय.कधी येणार चंद्रपूर? तिथे मंगल कार्यालयात जाण्याची तयारी सुरूही झाली असेल. इतक्या ऐनवेळेवर जाऊन मी काय करणार?(अर्थात आधी जाऊनही काय असे दिवे लावणार होतो म्हणा?) इ.इ. विचारमाला मनात सुरू झालेल्या आहेत.
तासाभरानंतर बस हललीय. चंद्रपूर ला पोहोचायला दुपारचे ३.१० झालेत. १५३ किमी ३ तास चाळीस मिनीटांत.
एकूण १२६० किमी प्रवास ३२ तासात. वैताग,वैताग,वैताग. पण चंद्रपूर आलय. आता आनंदी आनंद.
माझ्या सर्व प्रवासांमध्ये माझे काही आराखडे असतात. रेल्वे प्रवास जर ६० किमी प्रतितास किंवा जास्त वेगात झाला तर सुपर फास्ट. ५० किमी प्रतितास ते ६० किमी प्रतितास - जलद. आणि त्यापेक्षा हळू असेल तर ऒर्डिनरी.
बस प्रवासात जर ५० किमी प्रतितास किंवा जास्त वेगात झाला तर सुपर फास्ट. ४५ किमी प्रतितास ते ५० किमी प्रतितास - जलद. आणि त्यापेक्षा हळू असेल तर ऒर्डिनरी.

Photo courtesy: www.irfca.org