Sunday, December 31, 2017

श्री तुकोबांची गाथा - १

भारतीय इतिहासातील काळाकुट्ट अशा मध्ययुगीन पर्वात महाराष्ट्र भूमीत संतांनी प्रबोधनाचे फ़ार मोठ्ठे कार्य करून ठेवले आहे. पंधराव्या आणि सोळाव्या शतकातील एकनाथ महाराज, नामदेव महाराज, समर्थ रामदास स्वामी आणि श्री तुकाराम महाराज यांचे कार्य आजही आपल्या सगळ्या महाराष्ट्र भूमीवर उपकार कर्ते झाले आहे. 

या सगळ्या संतांच्या प्रबोधनाचे कार्य किती मोठे आहे याची जाणीव मला महाराष्ट्रात कायम वास करून आली नाही. पण उत्तरेतील समाजाची अशिक्षित, दुभंगलेली अवस्था काही वर्षांपूर्वील उत्तरेच्या प्रवासात ,तेथील समाजजीवन बघताना लक्षात आली आणि एकदम आपण मराठी माणसे या बाबतीत किती सुस्थितीत आहोत याची जाणीव झाली. गेल्या दशकात काही क्षुद्र राजकारण्यांनी ही समाजमनाची घट्ट वीण संतांना जातीपातींमध्ये विभागून थोडी उसवण्याचा केवीलवाणा प्रयत्न केलाही पण समाजाने हे विष ही पचवले.

श्री तुकोबांची गाथा मला कायमच आवडत आलेली आहे. अध्यात्माच्या रोकड्या प्रचितीसाठी आपल्या आराध्य दैवताशी इतक्या मोकळेपणाने भांडणारे तुकोबा मला कायमच जवळचे वाटत आलेय. सर्वसामान्य भाविकांसाठी मनात खूप कळवळा असलेले तुकोबा भावून जातात. त्याबद्दल बोलायचा, माझे विचार मांडायचा योग आता २०१८ मध्ये येतोय ही तो श्रींचीच इच्छा.



सदा माझे डोळा, जडो तुझी मूर्ती I
रखुमाईच्या पती सोयरिया II

गोड तुझे रूप, गोड तुझे नाम I
देई मज प्रेम सर्वकाळी II

विठो माउलिये हाचि वर देई I
संचरोने राही हृदयामाजी II

तुका म्हणे काही न मागे आणिक I
तुझे पायी सुख सर्व आहे II

प.पू. बापुराव महाराजांच्या पोथीत उल्लेख आहे "ईश्वरः सर्वभूतानाम हृद्देशे जो नर सतत पाहतसे, भगवंत तयासी दूर नसे, सांगतसे श्रीगीता." त्याची प्रचिती देणारा हा अभंग. ज्ञानोबा माऊलीने विश्वात्मक देवाला पसायदानात सकल विश्वाला "सज्जन सोयरे" मिळोत हे मागणे मागितले. श्रीतुकोबांनी तर या रखुमाबाईच्या पतीलाच, विठ्ठलालाच सोयरा मानून त्याच्या मूर्तीचे सदैव ध्यान राहो हे मागणे मागितलेय. "जे जे कृत्य प्रेमाविण, ते ते अवघे आहे शीण" हे जाणून त्याचेच प्रेम मागितलेय.

आपण सर्व सांसरीक मंडळी आपापल्या संसारासाठी, त्यातल्या विविध सुखांसाठी विठू माऊलीला साकडे घालत असतो. अशावेळी आपण भगवान श्रीकृष्णाला सोडून त्याची सेना मागणा-या दुर्योधनाप्रमाणेच देवाकडे मागणे मागत असतो. (भगवंत ते आनंदाने देतो आणि स्वतःची सुटका देखील करून घेतो.) पण श्रीतुकोबा प्रत्यक्ष भगवंतालाच (तो युद्ध करणार नाहे हे माहिती असूनही) मागून घेणा-या अर्जुनाप्रमाणे विठूमाउलीलाच स्वतःच्या हृदयात संचार करण्य़ाचा वर मागून घेतात. अहो, झाला ना कैद कायमचा तो भक्ताच्या हृदयात. म्हणून त्याला ही कटकट नको असते. तुम्ही इतर काहीही मागा तो पटकन देऊन टाकतो आणि स्वतःमागचा पिच्छा सोडवतो पण श्रीतुकोबांनी त्याची पंचाईतच करून टाकली आहे. कारण श्रीतुकोबांनाही हे माहिती आहे की त्या विठ्ठलाच्या चरणांशी जे सुख आहे त्यापुढे या जगतातील सर्व सुखे कःपदार्थ आहेत आणि म्हणून आणिक काहीही न मागता हे हे शाश्वत सुख मागत आहेत.

निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम
जय तुकोबा माऊली.
                                                                                              
                                                                                                      - प्रा राम प्रकाश किन्हीकर (३११२२०१७)       


Thursday, December 28, 2017

कृतज्ञता : नववर्षाचा संकल्प

परवाच व्हॉटसऍपवर एक लेख वाचला. त्यात आपण सगळ्यांविषयी कृतज्ञ रहायला हवे असा सूर होता. मला ती कल्पना आवडली. जानेवारी २०१२ मध्ये लोकसत्तेत प्रशांत दीक्षितांचा एक लेख आला होता. त्यात प्रसन्न बुद्धीसाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी कृतज्ञता वाटण्याजोग्या ५ घटना आठवून लिहून काढायला सांगितलेल्या होत्या. 

या कृतज्ञ शब्दाचा शोध घेत आणखी मागे गेलो तर श्री. विवेकजी घळसासींची २०१० मधली रामकथा आठवली. त्यात त्यांनी वाल्मिकी रामायणाच्या सुरूवातीला नारदांनी महर्षी वाल्मिकींना विचारलेल्या प्रश्नांपासून सुरूवात केली होती. ते प्रश्न साधारणतः असे, 

"॥ को न्वस्मिन् साम्प्रतं लोके गुणवान् कश्च वीर्यवान् ? धर्मज्ञस्य कृतज्ञस्य सत्यवाक्यो दृढव्रतः ॥ 

चारित्रेण च को युक्तः सर्वभूतेषु को हितः ? विद्वान् कः कः समर्थश्च कश्चैकप्रियदर्शनः ? ॥ 

आत्मवान् को जितक्रोधो मतिमान् कोऽनसूयकः ? कस्य बिभ्यति देवाश्च जातरोषस्य संयुगे ? ॥ 

(सांप्रत या पृथ्वीलोकावर सध्या कोण गुणवान, वीर आहे ? कोण धर्मज्ञ आणि कृतज्ञ असा आहे ? सर्वभूतांचे हित करणारा आणि चारित्र्यवान असा कोण आहे ? इत्यादी..इत्यादी) आणि त्याला महर्षी वाल्मिकींनी उत्तर दिले होते की "दशरथाचा पुत्र राम".

म्हणजे धर्मज्ञ आणि कृतज्ञ असणे हे सुद्धा प्रभू रामचंद्रांच व्यवच्छेदक लक्षण होत तर. प्रभू रामचंद्रांच्या व्यक्तीमत्वाकडे आपल्याला मानवी गुणसमुच्चयाचा सर्वोत्तम आविष्कार म्हणूनच बघाव लागेल.




कृतज्ञ या शब्दाविषयी चिंतन केल तर लक्षात आल की आपण कृतज्ञ म्हणजे "केलेले उपकार स्मरणारा" एव्हढाच मर्यादित अर्थ घेतोय. त्या शब्दाची एक वेगळी छटा आपण लक्षातच घेतलेली नाहीये. कृतज्ञ शब्दाचा शब्दशः अर्थ "केलेले ज्ञात असणारा / री". ते केलेले कर्म उपकारच असायला हवे असे नाही. कुठलेही केलेले कर्म त्यात येईल. 

आज आपल्या कार्यालयात आपल्या हाताखालील कर्मचा-याने स्वप्रेरणेने कार्यालयासाठी एखादे चांगले कर्म केले तर ते कर्म जर माझ्या लक्षात एक अधिकारी म्हणून राहिले तर मी कृतज्ञ. भलेही ते कर्म हे त्या कर्मचा-याने त्याच्या नियत कर्माचा भाग म्हणून केले असू देत. ते त्याने एक उत्तम केले याबद्दल माझ्या मनात एक अधिकारी म्हणून नोंद घेतल्या गेली की मी कृतज्ञ. तसेच एखादा मुद्दाम आपल्या वाईटावर टपून आपले वाईट योजण्यासाठी काही कर्म करीत असेल तरीही ते कर्म मला ज्ञात असायला हवे आणि मी सावध असायला हवे. तरीही मी "कृतज्ञ" च ठरेन. नाही का ?

मग प्रभू रामचंद्रांमध्ये हे सगळे गुण समुच्चयाने होते का ? अलबत होतेच. त्याशिवाय शत्रूंविषयी पूर्ण माहिती असणारे "रणकर्कश राम" होऊ शकणार नाहीत. तसेच कृतज्ञ राम असल्याशिवाय निषादाधिपती, सुग्रीव, बिभीषण यांचे मित्र आणि शबरीचे प्रभू होऊ शकणार नाहीत.

रामकथा ऐकण्याची फ़लश्रॄती तेव्हाच होईल जेव्हा आपण प्रभूंचा एकेक गुण हळूहळू अंगी बाणवण्यासाठी प्रयत्न करू. या जन्मात सगळे गुण अंगी बाणले गेले नाहीत तरी जन्मोजन्मीच्या साधनेने प्रभू कृपा करतीलच आणि आपणही मानवी गुणसमुच्चयाच्या सर्वोत्तम आविष्काराकडे पायरी पायरीने का होईना, पोहोचूच.

चढायची मग पहिली पायरी या नवीन वर्षी ? करायची कृतज्ञ होण्याकडे सुरूवात ? 

Monday, December 25, 2017

Merry Christmas

श्री गजाननविजय ग्रंथात दासगणू महाराज म्हणतात त्याप्रमाणे "पंथ चालण्या प्रारंभ झाला, परी मुक्कामास नाही गेला, अशांचाच होतो भला, तंटा पंथाभिमानाने" अमरावतीवरून नागपूरला येण्यासाठी मोर्शी-वरूड-काटोल, गुरूकुंज मोझरी-तळेगाव-कोंढाळी आणि चांदूर रेल्वे-वर्धा असे तीन पूर्णपणे भिन्न मार्ग आहेत. ज्या लोकांनी या आपापल्या मार्गावरून चालून नागपूर गाठले त्या लोकांनाच "हे तिन्ही मार्ग एकाच मुक्कामाला पोहोचतात" याचे ज्ञान होईल. पण एखादी माणूस वर्धेपर्यंत आलाय, दुसरा काटोलला आलाय आणि तिसरा कोंढाळीला आलाय आणि एकमेकांशी फ़ोनवरून बोलून "अरे, माझाच मार्ग नागपूरला जातोय. तू चुकीच्या मार्गावर आहेस." असे सांगू लागला तर किती मूर्खपणा ?

आजकाल प्रत्येक धर्मातल्या अकारण कडव्या धर्मनिष्ठांची हीच अवस्था झालीय. (मी त्यांना मुद्दाम "मूलतत्ववादी" म्हणत नाहीये. कारण त्या सर्वांना आपापल्या धर्माची मूलतत्वे समजली असती तर त्यांना सगळ्या धर्मांमधल्या मूलतत्वाचा बोध होऊन सगळे धर्म मनुष्याला शेवटी मनुष्यपणाच्या उन्नतीलाच नेतात हे कळले असते.) धर्मातल्या गोष्टींचा आपल्या मताप्रमाणे अन्वयार्थ लावायचा आणि अर्धवट ज्ञानाने परधर्मीयांचा द्वेष करायचा ही ख-या धर्मवेत्त्याची लक्षणे नव्हेत. आज आपल्या धर्माचा सण नाही म्हणून परधर्मीयांना शुभेच्छा देऊ नका असे संदेश प्रत्येक सणांच्या आधी व्हॉटसऍप नामक धुमाकुळाच्या माध्यमातून फ़िरतात आणि अर्धवट रिकामी डोकी भडकतात. 

स्वतःला क्रुसावर चढवणा-या लोकांसाठी "देवा, या लोकांना माफ़ कर. हे काय करताहेत हे यांनाच कळत नाही" अशी प्रार्थना करणारी कारूण्यमूर्ती येशू ख्रिस्त आणि आईवडीलांच्या आत्महत्येच्या पायश्चित्तानंतरही लहान लहान भावंडांचा माणूसपणाचा अधिकार ज्यांनी हिरावून घेतला, त्यांच्या बद्दलही "जो जे वांछिल तो ते लाहो" अशी विश्वात्मक देवाजवळ प्रार्थना करणारी ज्ञानोबा माउली यांच्यात फ़रक कसा करावा ? त्यांचे अनुयायी धर्माच्या बाबतीत काय गोंधळ घालताहेत त्याचा विरोध नक्की व्हावा. (धर्मप्रसारासाठी कुठलाही विधिनिषेध न बाळगणारे मिशनरीज काय आणि ज्ञानदेवांच्या "जे खळांची व्यंकटी सांडो" चा अर्थ लावून दुस-याला पहिल्यांदा "खलपुरूष" ठरवून मोकळे होणारे ठोकळे काय ? दोघेही सारखेच व्हिलन.



पण आज कारूण्यमूर्ती भगवान येशू ख्रिस्ताच्या जन्मदिनाच्या मोकळ्या मनाने एकमेकांना शुभेछा तर देऊयात. त्यांच्या मनातल्या करूणेपैकी एक लक्षांश करूणा जरी आपल्या मनात आली तरी आपण हा भवसागर तरून जाऊ हा विश्वास वाळगूयात.

शेवटी दासगणूंच्याच शब्दांचा आधार घेत माझे विवेचन थांबवतो.
"धर्म बापा ज्याचा त्यानी, प्रिय मानावा सर्वाहूनी,
परी विधर्म्याच्या ठिकाणी, अलोट प्रेम धरावे."

Sunday, December 24, 2017

"मी" मलाच भेटतो तेव्हा.....दोस्तांचे रियुनियन

डी डी एल जे मध्ये अमरीश पुरी जसा शेवटी काजोलला "जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी" म्हणतो अगदी तशीच परमिशन काल आमच्या सौभाग्यवतींकडून घेतली. निमित्त होते ते १९८८-१९८९ मध्ये ११ वी आणि १२ वी त असलेल्या आमच्या सी. पी. ऍण्ड बेरार रवीनगर शाखेच्या मुलामुलींचे संमेलन. (या सगळ्यांना मुलमुली म्हणावे का की काकाकाकूच म्हणावे या विचारात अख्खा अर्धा तास घालवल्यावर माझ्यासकट सगळ्यांच्या हृदयावर मोरपीस फ़िरवणारा हा शब्द मुद्दाम वापरला.)


आमची शाळा. सी.पी. ऍण्ड बेरार हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, रवीनगर शाखा.


आमची बॅच.


सगळ्या मुलामुलींचा पुन्हा शाळेच्या बाकांवर बसण्याचा उत्साह.


अनंता ढोले वगळता इतर सर्व व्रात्य असलेली मंडळी पुन्हा वर्गात.


शाळेतल्या स्टेजवर तत्कालीन विद्यार्थी आज आपापल्या क्षेत्रातली दिग्गज मंडळी झालेली आहेत. शाळेला किती अभिमान वाटत असेल नाही ?


थोडी गंमत, मौजमजा. 

मी तसा उशीराच जॉइन झालो. कितीही टाळायच्या म्हटल्या तरी रोजच्या नोकरी, व्यवसाय विषयक जबाबदा-या टाळता येत नाहीत. महाविद्यालयीन कामकाज आटोपून निघायला दुपारचा दीड वाजला. तोवर मनात धाकधूक होती की ही मंडळी थांबली असतील की नाही. पण तोवर सगळी मंडळी शाळेतून निघून अनंत ढोलेच्या घरी, रवीनगरलाच थांबलेली होती.


अनंत ढोलेच्या रवीनगरमधल्या घरी सर्वांचा चाललेला अल्पोपहार आणि गप्पायज्ञ.


                        अनंत ढोलेच्या रवीनगरमधल्या घरी सर्वांचा चाललेला अल्पोपहार आणि गप्पायज्ञ.

मी जावून पोहोचलो खरा पण तिथे जमलेल्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना मला ओळखताच येईना. जवळपास २८ वर्षांनी या सगळ्यांची भेट होत होती. फ़ेसबुकवर पुष्कराज काळे, उज्ज्वल डाबे, भारती डोंगरे आदींच्या संपर्कात होतो आणि काही मंडळी २८ वर्षांनंतरही अजिबात बदलली नव्हती. त्यांचा अपवाद वगळता इतरांच्या पुन्हा ओळखी झाल्यात. अगदी २८ वर्षांच अंतर क्षणात पुसून टाकणारी घट्ट मिठी झाली.

त्यानंतर मग तासभर खाण्यात आणि गप्पांमध्ये जो मोकळेपणा मी अनुभवला तो अवर्णनीय होता, आहे आणि राहिलही. इतक दडपणाविना, अकृत्रिम, मोकळ जगण्याची माझी सवय गेल्या कित्येक वर्षात कुठे नाहीशी झाली याचा मला पत्ताच लागेना. पण काल पुन्हा जुन्या "मी" ला "मी" च नव्याने भेटलो. एकदम ताजातवाना झालो.


गवसलेला माझा मी. 

Friday, December 22, 2017

संस्कृत सुभाषिते - ९ (घर की मुर्गी ....)

"अतीपरिचयाद्वज्ञा, संतत गमनादनादरो भवती
मलये भिल्ल पुरंध्री, चंदनतरूकाष्ठमिंधनम कुरूते"

अती परिचयामुळे अनादर आणि उपेक्षा होते. (नेहेमीच्या व निकट परिचयामुळे समोरच्या माणसाला गृहीत धरले गेल्यामुळे तर असे होत नसेल ?)
नेहेमी नेहेमी गेल्याने अनादर होतो. (शाळा आणि नोकरीधंद्याच्या ठिकाणी मात्र नेहेमी जाणे आवश्यकच आहे,)
याच उदाहरण म्हणजे मलय पर्वतावरच्या (ज्या ठिकाणी खूप चंदनाची झाडे आजुबाजूला आहेत, त्यांचा निकट परिचय आहे त्याठिकाणच्या) भिल्ल महिला चंदनतरूंचा वापर सरपण, इंधन म्हणून करतात.

आपण उर्दूतला "घरकी मुर्गी दाल बराबर" वाक्प्रचार नेहेमी वापरतो पण त्याआधी कित्येक वर्षे आपल्याच संस्कृत भाषेतले हे याच अर्थाचे सुभाषित आपल्याला आठवतही नाही म्हणजे आपण संस्कृत भाषेला "घरकी मुर्गी..." चीच वागणूक देतोय. खरे ना ?