Wednesday, January 31, 2024

माणदेशी कन्या

आम्हा सगळ्या बसफ़ॅन्सचे पहिले प्रेम बस आणि सगळ्या रेल्वेफ़ॅन्सचे पहिले प्रेम रेल्वे असल्याने बसेस किंवा रेल्वे आम्हाला आमच्या प्रेयसीसारख्या (ओह, आता नवीन पिढीच्या शब्दरचनेनुसार Girl Friend) वाटतात. बस किंवा रेल्वे ह्या आम्हाला निर्जीव वस्तू वाटतच नाहीत. तर त्या अगदी आपल्यासारख्याच सजीव वस्तू वाटतात. आम्ही बसफ़ॅन एखाद्या वेळेला सुंदर तरूणी शेजारून गेली तर तिच्याकडे बघू न बघू पण जर एखादी नवीन बस शेजारून गेली तर तिच्याकडे मान वेळावून वेळावून नक्कीच बघू.


आमच्यासाठी 3780 या नंबरच्या बसची धाकटी बहीण 3781 असते आणि तिची धाकटी बहीण 3782 असते. अगदी जुनी बस म्हणजे आजी किंवा पणजी असते. तिचा काळ तिने तिच्या आपल्या देखणेपणामुळे गाजवलेला असतो पण आजकाल तिच्या नातींचे राज्य असते. कदाचित एखादी छान मेण्टेन केलेली बस म्हातारपणातही देखणे दिसणा-या एखाद्या आजी / काकू सारखी आम्हाला दिसते.


एस. टी. डेपोतही आमच्यासारखे कवी मनाचे रसिक असतातच. मग ते रसिक एस. टी. कर्मचारी एखाद्या अशा नवीन बसवर "माणदेश कन्या" असे स्टीकर वगैरे लावतात आणि आम्हा बसफ़ॅन्सना "माझिया जातीचा मज मिळो कोणी" अशी अनुभूती येते.


दिनांक 28/01/2014


आमच्या फ़ॅबटेक अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगोला येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल लोणावळ्याला निघालेली होती. सांगोला डेपोने त्यांची तत्कालीन नवी कोरी बस त्या सहलीसाठी पाठवलेली होती. मग काय ! आमच्यातले बसफ़ॅन शिक्षक सुखावले. या बसचे भरपूर फ़ोटोही काढलेत. 










या सहलीनंतर ही बस सोलापूर - पणजी या प्रतिष्ठेच्या आंतरराज्य मार्गावर बरीच वर्षे धावताना दिसली. हा मार्ग ब-याच जुन्या काळापासून सांगोला डेपो चालवतो. सोलापूर - मंगळवेढा - सांगोला - शिरढोण - मिरज - सांगली - जयसिंगपूर - कोल्हापूर - सावंतवाडी - म्हापसा - पणजी असा जवळपास 450 किमीचा हा आंतरराज्य महामार्ग आहे.


- बसगाड्यांविषयी अगदी आसक्त प्रेम बाळगणारा, बसेसचा Boy Friend प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Saturday, January 27, 2024

परिवर्तन मार्क ३ बसेस.

इ. स. २००३ मध्ये जवळपास चाळीस वर्षांनंतर पहिल्यांदा बसेसच्या डिझाईनमध्ये मोठा बदल घडवल्यानंतर, दोनच वर्षात एस. टी. ने आपले डिझाईन पुन्हा थोडे बदलले. त्याबद्दलचे लेख परिवर्तन मार्क १ आणि परिवर्तन मार्क २ इथे आणि इथे.

परिवर्तन मार्क २ नंतर अवघ्या ८-९ महिन्यांमध्ये आपल्या एस. टी. ने पुन्हा आपले डिझाईन बदलले आणि परिवर्तन मार्क ३ बसेस आल्यात. या बसेसमध्ये एस. टी. ने पुन्हा आपला परंपरागत लाल + पिवळा रंग आणला होता आणि टाटा आणि लेलॅण्ड कंपनीचे मूळ काऊल्स जसेच्या तसे बसेसना द्यायला सुरूवात केली. 



परिवर्तन मार्क १ बसेसच्या खिडक्यांच्या काचांना फ़्रेम्स नव्हत्या. अशा फ़्रेम्स नसलेल्या काचांची व्ह्यायब्रेशन्स खूप होत असणार आणि त्यांचा आवाजही भरपूर होत असणार हे एस. टी. च्या लक्षात आले असावे आणि त्यांनी काचांना फ़्रेम्स द्यायला सुरूवात केली. परिवर्तन मार्क ३ बसेसच्या खिडक्यांना ॲल्युमिनियम फ़्रेम्स होत्या पण परिवर्तन मार्क २ बसेसच्या खिडक्यांच्या फ़्रेम्सप्रमाणे त्या काळ्या रंगात रंगवलेल्या नव्हत्या. परिवर्तन मार्क ३ बसेसच्या खिडक्यांच्या काचांच्या ॲल्युमिनियम फ़्रेम्स छान दिसायच्यात. आणि दणकटही वाटायच्यात.




परिवर्तन मार्क ३ बसेसचा हा प्रयोग साधारण वर्षभर चालला. मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूर ने बांधलेल्या MH - 40 / 85XX या सिरीज पासून MH - 40 / 88XX या सिरीजपर्यंत हा प्रयोग चालला. 


नंतर मात्र 2 बाय 2 आसन व्यवस्थेच्या, संपूर्ण लाल रंगातल्या परिवर्तन मार्क ४ बसेस आल्यात. परिवर्तन मार्क ४ बसेसचे हे डिझाईन मात्र पुढले १५ वर्षे चालले आणि एम. एस. बॉडीतल्या बसेस येईपर्यंत हे डिझाईन तसेच कायम राहिले.


- बसफ़ॅन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Sunday, January 21, 2024

श्रीक्षेत्र कारंजा (करंजनगरी) माहात्म्य : एक नवीन पैलू


विदर्भातले श्रीक्षेत्र कारंजा हे प्रभू दत्तात्रयांचे द्वितीयावतार श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मगाव. परम पूजनीय महाराजांनी आपले बालपण इथे व्यतित केलेले आहे. त्यांच्या जन्मस्थानी गेल्यानंतर माझी अवस्था अत्यंत भावविभोर झाली होती आणि जन्मस्थान माहात्म्य वर्णन करताना एक नवीनच पैलू माझ्या ध्यानात आला आणि तो मी आपल्या सर्वांसमोर आज मांडतो आहे.


- सदगुरूकृपेने अध्यात्ममार्गात आणि जीवनातही प्रत्येक योग्य त्या वेळी उत्तम मार्गदर्शक लाभलेला, सदगुरूकृपांकित राम


संपूर्ण व्हिडीयो इथे.

Saturday, January 13, 2024

DTC's Air Conditioned, Rear Engine, Semi Low Floor Bus

 




DTC's TATA Marcopolo, Rear Engine Air Conditioned , Semi Low Floor Bus, City Bus.

New Delhi Railway Station.

09/05/2011

#tatabus

#marcopolo

#semilowfloor

#citybus

#dtc

#newdelhi

#rearenginebus

Friday, January 12, 2024

डी टी सी, शहर बस सेवा, नागपूर शहर बस, खाजगी वाहतूक इत्यादि इत्यादि...



या प्रकाशचित्रात दिसते आहे ती आहे दिल्ली ट्रान्सपोर्ट कंपनीची नवी दिल्लीतली शहर बस. टाटा मार्कोपोलो मॉडेलची, मागे एंजिन असलेली, सेमी लो फ़्लोर शहर बस. नवी दिल्लीतल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने या बसेस डीटीसीच्या सेवेत आल्यात. नवनव्या, चकचकीत, दिव्यांगांसाठी चढ उतार करण्यासाठी विशेष सोय असलेल्या. शहर बस सेवेच्या बसेस विशेष बांधून घ्यावा लागतात ही कल्पना साधारण 1970 च्या दशकाच्या उत्तरार्धात आपल्या एस. टी. त आली. त्यापूर्वी आपली एस. टी. आपल्या बाहेरगावच्या बसताफ़्यातल्या बसेसचेच रूपांतर समोरून दुस-या रांगेतली डावीकडली एक आसनांची रांग काढत पुढच्या एका खिडकीचे रूपांतर दारात करून तिचे रूपांतर शहर बस सेवेच्या बसमध्ये करायची. 1970 च्या दशकाच्या उत्तरार्धात नागपूर शहर बस सेवेत "मधोमध मोठे दार असलेली बस" (सध्याच्या बी आर टी सेवेतल्या बसेसना असतात तितके रूंद दार पण एकच दार बसच्या मधोमध. मागे दुसरे दार नाही.) आल्याचे आठवते. पण त्या बसने प्रवाशांचे खूप अपघात होतात अशी खरीखोटी ओरड सुरू झाली आणि त्या बसेस फ़ारशा सेवेत दिसू शकल्या नाहीत.

आम्ही सोलापूर, पुणे, मुंबई इथे गेलोत की तिथल्या तिथल्या महापालिकांच्या सेवेत असलेल्या विशेष रूपाने बांधून घेतलेल्या शहर बस सेवेच्या बसेस बघायचोत आणि त्यांच्या प्रेमात पडायचोत. नागपूर शहर बस सेवेत 1983 -84 च्या आसपास ड्रायव्हर केबीनमधून उतरण्यासाठी एक आणि मागच्या बाजूला प्रवाशांना बसमध्ये चढण्यासाठी एक अशी दोन दारे असलेल्या बसेसचा ताफ़ा आल्याचे आणि त्यातून भरपूर प्रवास घडल्याचे स्मरते. MTD 9584, MTD 9585 असे त्या बसेसचे नंबर्सदेखील स्मरतात. 

त्यानंतर 1992-1993 मध्ये अशा ड्रायव्हर केबिनमधून दार असलेल्या विशेष बसेस पुन्हा एस. टी. ने सेवेत आणल्यात. यावेळी या बसेस रूबी कोच, मुंबई, ऑटे बॉडी पुणे आणि इरॉस नागपूर अशा खाजगी कंपन्यांनी बांधलेल्या होत्या. MH - 12 / F 3375, MH - 12 / F 3403 अशा काही बसेस नागपुरात आलेल्या आठवतात. वर्षभरातच एस. टी. च्या स्वतःच्या कार्यशाळांनी बांधलेल्या तशाच धर्तीच्या बसेस सेवेत आणल्यात. MH - 12 / F 49XX सिरीजमधल्या या बसेस ब-याच काळ शहर बस सेवेत धावत होत्या. 

नागपूरची शहर बस सेवा 2008 -09 च्या आसपास खाजगी कडे गेली. तेव्हाही नवीन बसेसचा छान ताफ़ा या खाजगी ऑपरेटर्सकडे महापालिकेने दिला होता. पण "गा. गु. च. का." या म्हणीला जागून या गाढवांनी त्या बसेसचे थोड्याच अवधीत मातेरे केले. त्या बसेस घेतल्यापासून कधी धुतल्या तरी गेल्यात की नाही अशी त्यांची आज अवस्था आहे. या खाजगी ऑपरेटर्सकडे ना धड डेपोची जागा आहे, ना धड महापलिकेकडून डेपोसाठी मिळालेल्या जागेवर छान छत वगैरे बांधून बसेसचा मेण्टेनन्स करण्याची इच्छा आहे. ना तसा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आहे आणि मुख्य म्हणजे नागपूरकरांना बससेवा देण्याची इच्छाशक्तीच यांच्यात नाही. त्यामुळे आंधळ दळतय आणि कुत्र पीठ खातय अशी अवस्था नागपूर शहर बस सेवेची सध्या आहे.

विदर्भ वेगळा झाला तर विदर्भाची V. R. S. T. C. अशा खाजगी ऑपरेटर्सकडे गेली तर काय ? या भितीनेच विदर्भ वेगळा नको असे वाटायला लागते. कारण जुन्या मध्य प्रदेशातली "लंदफ़ंद सर्व्हिस" पुन्हा V. R. S. T. C. च्या रूपाने अवतरेल अशी सार्थ भिती माझ्यासारख्या सगळ्या बसप्रेमींना वाटते. आपल्या एस. टी. त अजूनही सुधारणेला भरपूर वाव असला तरी अशा खाजगी बस सेवेपेक्षा आपली एस. टी. बरीच चांगली आहे.


- दिल्लीपासून गल्लीपर्यंत बस दिसली की आपले नागपूरच आठवणारा, आणि कुठलाही विषय कुठेही नेऊन ठेवणारा, अस्सल पाल्हाळ, गोष्टीवेल्हाळ नागपूरकर प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Sunday, January 7, 2024

DTC Old bus in Service.

2011 - 2012 मध्ये डीटीसी या एकेकाळी कुख्यात असलेल्या शहर बस सेवेत फ़ार बदल घडून येत होते. नवनव्या वातानुकुलीत, बिगर वातानुकुलीत, लो फ़्लोअर बसेसची भर त्यात पडत होती. जुन्या बसेस हळुहळु सेवेतून बाद होत होत्या.

अशाच एका जुन्या बसचे करोलबागमधून टिपलेले प्रकाशचित्र.


2011 - 2012 was the transition period for the Delhi Transport Company's city bus fleet. Older buses were still in service but newer and newer AC and Non AC TATA Marcopolo Low Floor buses were getting introduced and were competing with the old buses.
Captured in Karol Bagh.
08/05/2011
TATA

Friday, January 5, 2024

आपण सगळेच मूर्ख.

आमच्या बालपणी संस्कृत सुभाषितमाला अभ्यासताना आम्हाला खालील श्लोक अभ्यासाला होता. आमचे संस्कृत शिक्षक श्री. हरिभाऊ महावादीवार सर होते. अत्यंत व्युत्पन्न पंडित आणि तितकेच आम्हा मुलांमध्ये रमणारे. त्यामुळे पाचव्या, सहाव्या, सातव्या वर्गात अभ्यासलेली संपूर्ण सुभाषितमाला आम्हाला अजूनही तोंडपाठ आहे. अगदी "अयं निजः परो वेती...." पासून सुरू करून "...तपः सर्वम समाचरेत." पर्यंत सगळे 200 - 250 श्लोक आजही आम्हाला सलग पाठ आहेत.


त्यातलेच काही काही श्लोक मध्ये मध्ये मला आठवत असतात आज त्यातला श्लोक आठवला आणि जाणवलं की अरे, आजच्या युगात आपण सारेच मूर्ख ठरतोय की.


खादन्न गच्छामि हसन्नजल्पे

         गतन्न शोचामि कृतन्नमन्ये |

द्वाभ्यांतृतीयो न भवानि राजन

        केनास्मि मूर्खो वद कारणेन||


कवी कालिदास राजाला विचारतोय की "हे राजा, मी खाता खाता चालत नाही, पाणी पिता पिता हसत नाही, दोन व्यक्ती आपसात बोलत असताना मी मध्ये बोलत नाही मग मी कुठल्या कारणाने मूर्ख आहे ?"


थोडक्यात श्रीसमर्थांनी मूर्खांची लक्षणे लिहून ठेवण्याआधी कालिदासाने त्यातली काही लक्षणे आपल्या काव्यातून मांडलेली होती. आजचा विचार केला तर ब्युफ़े नामक संस्कृतीने आपल्यावर इतके आक्रमण केले आहे की त्यामुळे आपण खाताखाता चालतोय आणि मूर्ख ठरतोय हे आपल्या लक्षात येण्यापलिकडे गेलेले आहे. तसे सगळेच जुने विचार, आपलीच संस्कृती आपण माळ्यावर टाकून दिलेली आहे फ़क्त सणावारांपुरती त्यातली आपल्याला सोयीस्कर संस्कृती आपण बाहेर काढतो. घासून पुसून मिरवतो आणि आपले काम संपले की पुन्हा तिची रवानगी माळ्यावर करतो. आपल्या एकंदर समृद्ध आणि श्रीमंत संस्कृतीची ही कथा तर कालिदास तर बोलून चालून माणूसच. त्याला कोण विचारतो. आपण प्रगत झालोय, अवकाशात चाललोय, अत्यंत व्यस्त वगैरे झालोय, कालिदास तर कुठला कोण ?


सोयीचा पडतो, सोयीचा पडतो म्हणत ब्युफ़े आपण इतका स्वीकारलाय की श्राद्धाच्या जेवणाचाही आपण ब्युफ़े लावतोय ! ब्युफ़ेच्या समर्थनार्थ काही मुद्दे आणि त्याचा प्रतिवाद.


1. ब्युफ़ेमुळे आपल्याला पहिजे तेव्हढे अन्न आपले आपल्याला वाढून घेता येते आणि अपव्यय टळतो.


प्रतिवाद: जुन्या काळी पंक्तींमध्ये खूप आग्रह करकरून पदार्थ वाढले जायचेत आणि त्यामुळे काही पदार्थ वाढले असल्याच्या प्रमाणात खाता न आल्याने अन्न ताटात उरायचे आणि अपव्यय व्हायचा. हे अगदी खरे.


पण आज जर पंक्तीत भोजन केले आणि वाढप्याच्या आग्रहाला बळी न पडता त्याला आपल्याला हवे तेव्हढेच वाढायला सांगितले तरी सुद्धा अपव्यय टळू शकेल. आजकाल आग्रह करणारे जुन्यासारखे राहिले नाहीत आणि जुन्याकाळी आग्रहाला "नाही" म्हटल्यावर अपमान वाटून घेणारी माणसे राहिली नाहीत. त्यामुळे आज आपण आपल्याला हवे तेव्हढेच वाढायला पंक्तीतल्या वाढप्यांना सांगू शकतो आणि अपव्यय टाळू शकतो.


याउलट आजकाल ब्युफ़ेमध्ये लांबच लांब रांगेत उभे राहिल्यानंतर आपला नंबर त्या खाद्य काऊंटरवर लागल्यानंतर, या लांबच लांब रांगेत पुन्हा आपला नंबर कधी लागेल याची शाश्वती नसल्याने आपसूकच सगळी मंडळी जादाच पदार्थ आपल्या डिशमध्ये वाढून घेतात आणि भरमसाठ अन्न वाया जाते.


2. ब्युफ़ेमुळे पंक्तीं संपेपर्यंत ताटकळत बसावे लागत नाही. ब्युफ़े सोयीस्कर पडतो.


प्रतिवाद: आजकाल समजा 500 पाहुण्यांना आपण आपल्या समारंभाला निमंत्रित केले तर 500 पाहुण्यांचे ब्युफ़े जेवण संपेपर्यंत अडीच तास जातात हे माझे निरीक्षण आहे. या ऐवजी जर 100 - 100 पाहुण्यांच्या 5 पंक्ती केल्यात तर एका पंक्तीला अर्धा तास याप्रमाणे हिशेब धरला तर पंकीसुद्धा अडीच तासातच संपतील.


पंक्तीत जेवण्यामुळे सगळ्यांनाच जेवल्याचे खरे समाधान लाभते, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना. एका हातात तुडुंब भरलेली थाळी घेऊन इतरांच्या गर्दीतून आपली खुर्ची शोधत चालणे किंवा उभ्या उभ्या जेवणे हे ज्येष्ठ नागरिकांना त्रासदायकच जाते आणि जेवणाचा आनंद घेता येत नाही.


अगदी ताट पाटाच्या पंक्ती अपेक्षित नाहीत. आजकाल जमिनीवर मांडी घालून बसणे भल्याभल्या तरूणांना जमत नाही तर ज्येष्ठ नागरिकांची तर गोष्टच वेगळी. आपण साधारण 25 वर्षांपासून आपले भारतीय पद्धतीचे संडास सोडून सर्वत्र कमोड सिस्टीम अंगीकारली त्याचे हे दुष्परिणाम. अर्थात हा निराळ्या लेखाचा विषय आहे. आज तरूणांनाही जमिनीवर मांडी घालून बसता येत नाही हे वास्तव आहे त्यामुळे ताटा - पाटाच्या पंक्ती शक्य नाहीत पण टेबल खुर्च्यांवरच्या तर पंक्ती शक्य आहेत ना ? 500 पाहुण्यांच्या ब्युफ़ेसाठी जर जेवणाचे व्यवस्थापन सांभाळायला 20 माणसे लागत असतील तर 100 माणसांच्या 5 पंक्तींमध्ये वाढण्यासाठी 25 माणसे लागतील. पण एकंदर सर्वांना समाधान देणारे भोजन तर लाभेल.


पण आज आपण सारासार विचार करणारी आपली बुद्धी गमावून बसलेलो आहोत. कुठल्याही गोष्टीला आपल्याच फ़ायद्यासाठी पारखून, तावून सुलाखून मग ती गोष्ट स्वीकारण्याची प्रथा आपणच कालबाह्य केलेली आहे. मग ब्युफ़े सोयीचा पडतो, सोयीचा पडतो म्हणत आपण तो स्वीकारलेला आहे. मग तो कालिदास आपल्याला "मूर्ख" का ठरवेना. त्याचं काय जातय ? इथे कुणी येतय का पंक्ती वाढायला ? हे आपले खरे दुखणे आहे.


पूर्वी माणसे माणसांना जोडून होती. आज आपण अकारण एकमेकांपासून दूर गेलोय. शिष्टपणा करायला लागलोय. कुणाच्याही घरी न कळवता अत्यंत आत्मीयतेने जाणारा माणूस असभ्य ठरायला लागलाय. "अरे, फ़ोन करून आला असतास तर बरे" असे आपल्या तोंडावर आपल्याला ऐकवण्याइतके आपण "श्रूड" आणि "स्ट्रेट्फ़ॉरवर्ड"झालेलो आहोत. ज्याला भेटायला जातोय तो काही फ़ार गहन कार्यात गुंतलेला असतो असे नाही. तो सुद्धा बर्म्युडा - बनियन वर घरच्या सोफ़्यावर तंगड्या पसरून नुसता टी. व्ही. च पहात असतो पण "अरे, फ़ोन करून आला असतास तर बरे" 


आजकाल लग्न कार्यात, घरच्या इतर समारंभांमध्ये आपल्या आप्तांकडून, मित्र सुहृदांकडून मेहेनतीच्या स्वरूपात मदत मागणे आपल्याला कमीपणाचे वाटायला लागले आहे. म्हणून मग पंक्ती कोण वाढणार ? आलेल्या पाहुण्यांकडे, त्यांच्या आदरसत्काराकडे लक्ष कोण देणार ? यासाठी घरची, जवळची विश्वासातली माणसे मिळत नाहीत. आपल्या वाढत्या समृद्धीच्या कैफ़ात आपण सगळेच जवळचे दूरचे केल्या्नंतर अशी माणसे मिळणार तरी कशी ? मग कॅटररच्या माणसांवर अवलंबून राहून त्यांना ब्युफ़ेचे कंत्राट दिले की आपण लग्नात मेकपचे थरच्या थर थापायला, वरातीत नाचायला आणि "संगीत" च्या कार्यक्रमात (हे एक नवीनच फ़ॅड पंजाबी संस्कृतीतून आपण अलिकडे स्वीकारलेय. सीमांतपूजन डाऊन मार्केट झालेय) कॅरोके लावून भसाड्या आवाजात गायला आणि कोरिओग्राफ़र बोलावून बसवलेल्या अत्यंत गचाळ नाचांवर नाचायला मोकळे. आजकाल लग्नात भटजी ठरवण्याआधी कोरिओग्राफ़र ठरवतात म्हणे. एव्हढा खर्च करूनही ऐनवेळी बेंगरूळ, पूर्णपणे को ओर्डिनेशन हरवलेला नाच निमंत्रितांना बघावा लागतो. खाल्ल्या अन्नाला (ब्युफ़ेला) स्मरायचे म्हणून कुणी तोंडावर टीका करीत नाहीत पण मनोमन आपली खिल्लीच उडवत असतात. हे आपल्यालाही माहिती असते पण त्या खिल्लीला आपल्या अंगाला लागू न देण्याइतकेही आपण निगरगट्ट झालेलो आहोत.


थोडक्यात काय ? कालिदासाला काय जातय "खाता खाता चालणारा मूर्ख" म्हणून संबोधायला ? काळाबरोबर बदलायला नको का ?


काळाबरोबर बदलता बदलता आपण इतके बदललोय की आपण कोण ? आपली मुळे कुठे रूजलेली आहेत ? चांगलं काय ? वाईट काय ? श्रेयस्कर काय ? शास्त्रीय काय ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण शोधणे सोडून दिले आहे. कारण या प्रश्नांची खरी उत्तरे आपल्याला अस्वस्थ करणारी असतील, अंतर्मुख करणारी असतील आणि आपल्याला बदलणारी असतील हे आपल्याला मनोमन ठाऊक आहे. कोण एव्हढे सव्यापसव्य करतोय ? त्यापेक्षा "Eat, Drink and Be Merry" हे चार्वाक तत्वज्ञान आपल्याला आपल्या सोयीचे वाटायला लागले आहे. 


2024 च्या माझ्या संकल्पांमध्ये "ब्युफ़ेत जेवण टाळणे" हा एक अत्यंत दृढ संकल्प सामील आहे. माझ्या ब्युफ़ेत न जेवण्याने ब्युफ़े थांबणार नाहीत आणि कोणालाही काहीही फ़रक पडणार नाही हे मला पक्के माहिती आहे पण माझ्या परीने मी या लाटेचा विरोध एव्हढाच करू शकतो, प्रवाहपतित होण्याचे नाकारू शकतो. 

कुणी सांगावं

"मै अकेलाही चला था, जानिबे मंझिल मगर, लोग मिलते गएं, कारवां बनता गया" 

असेही होऊ शकेल.


- कालिदासाने वर्णन केलेला "मूर्ख" होण्याचे नाकारलेला, समाजातल्या चुकीच्या प्रथांचा कायम विरोधक, त्यासाठी जगाच्या विरूद्ध जावे लागले तरी स्वीकारणारा, आणि आज नाही तर उद्या आपल्याला सगळ्या जगाची साथ लाभेल अशी आशा कायम बाळगणारा एक अत्यंत आशादायी नागरिक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर. 


Wednesday, January 3, 2024

मनात (आणि शरीरातही) रूतून बसलेली काही गाणी.

या रविवारी मस्तपैकी वामकुक्षी करत होतो. अचानक वा-याच्या झुळूकेबरोबर आलेल्या एका गाण्याने माझी झोप उडवली. बरे, अगदी अस्वस्थ होऊन, मनाला वगैरे भिडून जागे करण्याइतपत क्लासिक वगैरे ते गाणे नव्हते. किंबहुना तो चित्रपट लागला तेव्हा (माझ्यासकट) तेव्हाच्या तरूण पिढीने त्या चित्रपटाची त्यातला नायक नायिकेची येथेच्छ खिल्ली उडवलेली होती. त्याचे संगीतकार सोडले तर त्यातले नायक आणि नायिका नंतर फ़ारसे कुठे दिसले नाहीत. त्या चित्रपटाचे संगीतकारही नंतर त्यांच्या संगीतापेक्षा इतर उचापतींमुळे चित्रपट सृष्टीबाहेर झाले होते.


ते गाणे होते "जानम जानेजाँ" आणि चित्रपट होता "आशिकी". बरे मग या गाण्यामुळे झोप उडण्याचे कारण म्हणजे अगदी विचित्र आहे. वपुंच्या जे के मालवणकर कथेमधला जे के आपल्या कमिश्नर बॉसच्या घरी जेवताना म्हणतो ना "सर, आम्ही हा श्लोक कसा विसरू ? तो रक्तात गेला आहे आमच्या." तसेच हे गाणे आमच्या मनापेक्षा शरीरात रूतून बसलेले आहे. त्यामुळे हे गाणे आजही, कुठेही ऐकले की अंगावर अगदी निराळाच शहारा येतो. आठवण कराड येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असतानाची आहे.


कराडला आम्हा सगळ्या हॉस्टेलर्स साठी कॉलेजने कॅम्पसमध्येच मेसची व्यवस्था केली होती. सहकारी तत्वावर ही मेस चालायची. जागा, भांडी कुंडी, आवश्यक तेव्हढे फ़र्निचर कॉलेजने दिलेले होते. पण संचालनाची व्यवस्था बघायला मुलांची टीम असायची. प्रत्येक वर्षाचे दोन ऑडिटर्स आणि प्रत्येक महिन्याला बदलणारे दोन सेक्रेटरी. दररोज सकाळी सेक्रेटरीने मेसमधे जाऊन रोजची भाजी, इतर मेन्यु याबाबत आचा-याला सूचना द्यायच्या. सेक्रेटरीने एकंदर किती मुले जेवलीत, किती मुलांचा खाडा होता यावर लक्ष ठेवायचे. क्वचितप्रसंगी कराड गावात जाऊन काहीतरी गोडधोड, खारा माल आणून मेसमधे चेंज किंवा सणावारी फ़ीस्ट चे आयोजन करायचे. दररोज भाजी घेऊन गावातून टेम्पो यायचा तसाच पंधरवाड्याला किराणा घेऊन टेम्पो यायचा. त्याकडेही सेक्रेटरीला लक्ष द्यावे लागे.



महिनाअखेरीचा एकूण खर्च भागिले महिन्याभरातल्या एकूण जेवलेल्या ताटांची संख्या असा हिशेब करून प्रत्येकाने जेवलेल्या ताटांप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याचे मेसबिल बोर्डावर लावले की सेक्रेटरीची जबाबदारी संपायची. मग ते मेसबिल कॉलेजमधे असलेल्या बॅंकेत असलेल्या मेसच्या खात्यात भरावे लागे. सेक्रेटरी आणि ऑडिटर व्हायला मिळणे हा मोठाच मान होता. कुठल्याही अधिकृत शिक्षणापेक्षा प्रभावी पद्धतीने व्यवस्थापनशास्त्राचे धडे देणारे विद्यापीठ म्हणजे ती मेस आणि तिचा कारभार होता.


असेच एकदा 1991 सालच्या ऑगस्ट महिन्यात आम्ही दोघे (मी आणि माझा अत्यंत हुशार, बुद्धीने अती तीक्ष्ण असलेला रूम पार्टनर शशांक चिंचोळकर) असे त्या मेसचे सेक्रेटरी झालेलो होतो. सणावारांचे दिवस होते. सगळ्या मुलांना घरच्या आठवणी येत असणार हे आम्हाला माहिती होते. त्यामुळे त्या महिन्यात दर दोन तीन दिवसांनी गोडाधोडाचा, खा-या चमचमीत पदार्थांचा समावेश रोजच्या जेवणात करायचा हे आम्ही ठरविलेले होते. त्याप्रमाणेच एका रविवारी सकाळी आम्ही दोघेही कॉलेज कॅम्पसवरून कराड गावात गेलोत. जाताना शहर बसने आणि येताना (सोबत गोडधोड, खारा माल याने भरलेली जड पिशवी असल्याने) रिक्षाने यायचे असा सगळ्याच सेक्रेटरींचा आजवरचा खाक्या होता. त्यानुसार आम्ही गावातल्या राजपुरोहित भांडारकडून चांगल्या 150 कचो-या (प्रत्येकाच्या वाट्याला 2 - 2 तरी याव्यात हा हिशेबाने), गावातून चांगले 15 किलो आम्रखंड एका मोठ्या स्टीलच्या डब्यात भरून (तेव्हा आजसारखे प्लॅस्टिक बोकाळलेले नव्हते) रिक्षाने कॉलेज कॅम्प्सला परतत होतो.


रिक्षाचालक हा एक गरीब, परिस्थितीने गांजलेला वगैरे असतो हे माझे नागपूर आणि विदर्भातले मत कराडमध्ये पार धुळीला मिळाले होते. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात टगेगिरी केलेली आहे असे दाखवल्याशिवाय कराड साता-यात रिक्षाचे लायसन मिळत नसावे. एक होते मात्र इथल्या रिक्षासुद्धा छान आणि चकाचक होत्या. नागपुरातल्या रिक्षांसारख्या जराजर्जर अवस्थेतल्या नसायच्या. रिक्षात टकाराचा टेप आणि प्रवाशांच्या मागे झंकार बीटस वाजणारे मोठ्ठे स्पीकर्स, त्यावर नवनव्या सिनेमातली गाणी मोठ्या आवाजात लावलेली असा तो एकंदर जामानिमा असायचा. 


तशाच एका रिक्षातून मी आणि शशांक चिंचोळकर आमच्या मेससाठी छानछान पदार्थ घेऊन चाललेलो होतो. महाराष्ट्र हायस्कूल समोरून कराडच्या कृष्णामाई पुलासाठी उतार सुरू व्हायचा. तेव्हा जुना पूल थोडा खालच्या बाजूला होता. उतार उतरून पूल ओलांडला की सैदापूर भागाला जाण्यासाठी चढ चढून जावे लागे. मग कॅनॉलवरून डावीकडे वळलोत की संत गाडगे महाराज कॉलेज (एसजीएम) आणि मग आमचे कॉलेज.


सकाळी 11 , 11.30 ची वेळ. रस्त्यावर रविवारमुळे तुरळक वाहतूक (तशीही त्या रस्त्यावर फ़ारशी वर्दळ कधी नसायची) आमचा रिक्षाचालक तरूण, जणू कानात वारे भरलेले वासरूच. ॲक्सीलेटर पिरगाळतच त्याने महाराष्ट्र हायस्कूलचे वळण घेतलेले. रिक्षात गाणे अगदी जोरात लागलेले. हेच "जानम जानेजाँ" च. त्यातले फ़ीमेल आवाजातले "जानम जानेजाँ" झाले आणि मेल आवाजातले "जानम..." तेव्हढे झाले आणि एकदम "धाड" असा आवाज झाला म्हणजे "जानम जानेजाँ..., जानम धाड" आम्हाला थोडे कळायला लागल्याची जाणीव झाली तेव्हा कळले की समोरून येणा-या एका सायकलवाल्याला वाचवायला आमच्या रिक्षावाल्याने आमच्या रिक्षाचे हॅंडल थो...डे तिरपे केले होते पण आमच्या रिक्षाचा वेग एव्हढा होता की आम्ही रिक्षासकट सरळ उभाचे आडवे झालेले होतो आणि त्याच अवस्थेत काही अंतर घासत घासत जाऊन पुढे थांबलेलो होतो. मी उजवीकडे बसलेलो असल्याने माझ्या अंगावर श्रीखंडाचा डबा, त्यावर कचो-यांची पिशवी आणि त्यावर माझा पार्टनर शशांक. डब्ब्याचे झाकण पक्के होते म्हणून बरे. नाहीतर त्यादिवशी भर कृष्णामाईच्या काठावर मला श्रीखंडस्नान घडले असते.


मला उजव्या बाजूने थोडे खरचटले होते तर शशांकला मुका मार लागलेला होता. लगेच गर्दी जमली. गर्दीने मोठ्या उत्साहात रिक्षा सरळ केला. रिक्षाचालकाला मात्र भरपूर लागलेले होते. त्याला घेऊन पब्लिक कॉटेज हॉस्पिटलला गेले. आम्ही दोघेही दुस-या रिक्षाने हॉस्टेल मेसला परतलो. आमच्या जखमांवर मलमपट्टी, सूज उतरण्याची औषधे घेऊन आम्ही दोघेही मेसमधे जाऊन आमची कामे करू लागलोत. "अरे, मेस के लिएं, हमने अपना खून दिया है" वगैरे फ़िल्मी डॉयलॉगबाजी आमच्या मित्रमंडळीसमोर करून आम्ही आमच्या आयुष्यात मग्न झालोत.


पण आजही हे गाणे लागले की मी त्यादिवशी कृष्णामाईच्या पुलावर जातो. त्या गाण्यातले "जानम जानेजाँ" झाल्यावर मला "जानम धाड" एव्हढेच ऐकू येते. कारण ते गाणे मनात रूतलेले नाही तर त्या अपघातामुळे अक्षरशः शरीरात रूतून बसलेले आहे.

या गाण्यामुळे अंगावर शहारा येतो पण तो भलताच.


- कॉलेजमध्ये असताना शांत, शिस्तप्रिय आणि तेव्हढाच टारगट विद्यार्थी, राम प्रकाश किन्हीकर.

Tuesday, January 2, 2024

अन्कळा झाल्या कधीच्या...

कविवर्य सुरेश भटांच्या प्रत्येक गझलेत एक अत्यंत चमत्कृतीपूर्ण आणि मनाला भुरळ पाडणारी कल्पना आणि तशी शब्दरचना असते. त्यांचे रंगूनी रंगात सा-या हे गीत मी अगदी बालपणापासून ऐकतोय. खूप आधी पाठही झालेले हे गीत.


यातले "अन्कळा झाल्या कधीच्या, सोशिल्या ज्या ज्या कळा" हे वाक्यपण खूपदा कानावरून गेले आणि ब-याचदा गळ्यातूनही गेले. पण "अन्कळा" या शब्दाला मी "अन कळा" असे सुटे सुटे म्हणत होतो. "अन" या शब्दाचा अर्थ "आणि"असा घेऊन मी त्या ओळीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत असे. पण नीटसा अर्थबोध होत नसे. मग मी "असेल कवीची एखादी आगळीवेगळी कल्पना" म्हणून तो विषय मनात दाबून टाकीत असे.


असेच एकदा आम्ही पती पत्नी प्रवासात होतो. गाडीत टेपवर हेच गाणे लागलेले आणि आमच्या गप्पा रंगलेल्या. गप्पांमध्ये तिने एक आठवण मला करून दिली. फ़ार वर्षांपूर्वी तिच्या कुणीतरी काका / मामाने माझा अकारण फ़ार अपमान केला होता. तेव्हा मी सुद्धा त्या घटनेवर फ़ार संताप करून घेतला होता. पण आमच्या गप्पांमध्ये तिने आठवण करून दिल्यावरही मली ती घटना, ती व्यक्ती स्मरतही नव्हती. नेमका तेव्हाच माझ्या मनात अन्कळा झाल्या कधीच्या सोशिल्या ज्या ज्या कळा" या ओळींचा अर्थ अक्ष्ररशः प्रगट झाला. एखाद्या माणसाने इतके सोसले, इतके सोसले की त्याने काय काय सोसले हेच त्याला कळेनासे झालेले आहे हा या "अन्कळा झाल्या कधीच्या सोशिल्या ज्या ज्या कळा" चा अर्थ.


बाय द वे "अन्कळा" या शब्दाचा वापर फ़क्त सुरेश भटांनी केलाय ? की हा शब्द इतरही लेखक / कवींनी आपल्या साहित्यात वापरलाय ? याविषयी मला जाम उत्सुकता आहे.


- स्वतः स्वभावाने अत्यंत क्षमाशील आणि सतत पॉझिटिव्ह विचार करीत असल्याने विषारी विचार आणि विषारी माणसे यांना आपल्या मनात कधीही स्थान न देता सतत पुढे पुढेच जाणारा साधा मनुक्ष, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Monday, January 1, 2024

Negligence During Take - Off | टेक ऑफ़ दरम्यानचा निष्काळजीपणा |




नागपूर विमानतळावरून उडणा-या काही विमानांचा टेक ऑफ़ दरम्यानचा निष्काळजीपणा या व्हिडीयोत तांत्रिक बाबींसह व DGCA च्या नियमांसह वर्णन केलेला आहे. 


निरपराध व या प्रकाराविषयी अनभिज्ञ असलेल्या प्रवाशांच्या जिवाशी खेळ थांबावा अशी आत्यंतिक इच्छा.


संपूर्ण व्हिडीओ इथे.