Tuesday, February 7, 2012

विदर्भतून विदर्भ

परवा मुंबईवरून नागपूरला येताना केवळ घाईमुळे विमानाने यावे लागले. एका तासात एका पूर्ण नवीन विश्वात प्रवेश करताना सोय तर झाली पण रेल्वेप्रवास हुकल्याची खंत मनात घर करून राहिली. एका मोठ्या आनंदाला आपण, तात्पुरते का होइना, मुकलोय ही जाणीव प्रवासभर छळत राहिली.

आजपर्यंत मी अक्षरशः शेकडो वेळा नागपूर-मुंबई-नागपूर किंवा नागपूर-पुणे-नागपूर हा प्रवास केलाय पण अजूनही प्रत्येक प्रवास निराळा असतो. अगदी रखरखीत आणि तहानलेल्या उन्हाळ्याच्या दिवसांपासून ते ओल्यागच्च पावसाच्या दिवशी (गाडी निघणार की नाही याची शाश्वती नसताना आणि गाडी आल्यावर आधीपासूनच ओला बर्थ असलेल्या आणि पूर्णपणे बंद न होणा-या खिडकीतून थेंबाथेंबाने बर्थ ओला होत असतानाही) केलाय. दुस-या वर्गाच्या डब्यात जागा मिळावी म्हणून दोन दोन तास आधी स्टेशनवर जाउन जागा पकडून केलाय तसाच पहिल्या वर्गाच्या वातानुकूल केबीनमधून बाहेरच्या विश्वाशी अजिबात संबंध नसतानाही केलाय. लग्न, मुंजी, साखरपुड्यांना जाण्यासाठी केलाय तसाच दुःखद प्रसंगांमध्येही केलाय.प्रत्येक प्रवास मोठा विलोभनीय आणि विविधरंगी अनुभव देणारा असतो.


बालपणी मावशीच्या गावी दूर कोकणात जाताना मुंबईला जाण्यासाठी नागपूर-दादर गाडीचा लाडका हट्ट आम्ही वडीलांजवळ करायचो. कारण एकच, रात्री १०.१० ला सुटलेली ही गाडी सकाळी सहाच्या सुमारास भुसावळला पोहोचली, की नंतरचा, तुलनेने अपरिचित, भाग बघायला मिळावा. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ते बोगदे. विदर्भासारख्या मैदानी प्रदेशात जन्मून वाढणा-या आम्हा सर्व मुलांना कसारा घाटातल्या बोगद्यांच विलक्षण आकर्षण (आणि सुप्त भितीही) वाटत असे. त्यासाठी नागपूर ते शेगाव हा नेहमी बघितलेला भाग रात्री झोपेत गेला तरी आमची हरकत नसायची.




अर्थात रात्री प्रचंड औत्सुक्यामुळे गाडीत झोपच येत नसे व प्रत्येक स्टेशनावर गाडी थांबली की उठून, गाडीच्या गजांमधून जमेल तेव्हढं डोकं बाहेर काढत, स्टेशनांची नावं वाचण्याचे आमचे सफ़ल, असफ़ल प्रयत्न, आमच्या जन्मदात्यांच्या आरडाओरडीला कारणीभूत होत असत. म्हणूनच १९७७ मध्ये गीतांजली एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर मला खूप आनंद झाला होता. कारण त्या गाडीने नागपूर-मुंबई हा दिवसभराचा प्रवास होत असल्याने, "झोपा रे आता" असं टुमणं लावणारं कुणी नव्हतं आणि सगळाच परिसर खिडकीतून मनसोक्तपणे न्याहाळता येणार होता. पण काकांची बदली १९७८ मध्ये विदर्भातच झाली आणि गीतांजली एक्सप्रेसने जाण्याचा योग लांबणीवर पडला. तो योग १९९६ मध्ये मुंबईला नोकरीनिमित्त जाताना आला. तोपर्यंत बालपण हरवलं होतं तरी हुरूप हरवला नव्हता. त्यामुळे १९९६ मधला प्रवासही तेव्हढाच आवडला.

काही काही प्रवास आणि त्यातले अनुभव मनात घर करून आहेत. आता अकोला हे इतर स्टेशनांसारखं एक स्टेशन. अशाच एका हिवाळ्याच्या सुरुवातीला मुंबईवरून सुट्ट्या घालवण्यासाठी नागपूरला येत होतो. गाडीत फ़ार गर्दी नसल्यामुळे रात्री झोप छान लागली होती. विदर्भ एक्सप्रेस पहाटेच्या अंधारातच अकोल्याला पोहोचत होती. मला तृप्ततेची जाग आली. सहज दारात आलो आणि काय विलक्षण अनुभूती आली! रात्रीनंतर सुंदर प्रसन्न पहाट फ़ुटत होती. पहाटेच्या त्या गुलाबी थंडीत अंगावर शाल-स्वेटर्स लपेटून अगदी थोडेसेच कुडकुडत प्रवासी उतरत होते. प्रत्येकाकडे बघितल्यानंतर त्यांनी रात्रीची प्रसन्न झोप घेतल्याचा आभास होत होता. अंधार संपण्याची नुकतीच चाहूल लागली होती. पांस्थस्थांचे पाय देखील घराच्या ओढीने पडत होते आणि या सगळ्या प्रसन्न विश्वाइतकाच तो फ़लाटही प्रसन्न आणि आनंदी वाटत होता.

प्रत्येक दिवाळीच्या वेळी नागपूरला येताना एक वेगळंच वातावरण. दिवाळीसाठी मुंबईवरून नागपूरला येण्याच्या जल्लोषात रात्री ’विदर्भ’ पकडलेली. रिझर्वेशन, टी.टी.इ, आपला बर्थ आदि गोष्टी गर्दीमुळे दिसणेही दुरापास्त. मग मित्रांसोबतच खालीच पेपर (अशा वेळी टाइम्स ऒफ़ इंडियाचा केव्हढा आधार वाटायचा!) टाकून जमवलेली, गप्पांची, जुन्या आठवणींची आणि गाण्यांची मैफ़ल, रात्री केव्हातरी जडावलेल्या डोळ्यांनी, आहे त्याच जागेवर अस्ताव्यस्त पसरणे. अशावेळी गाडीतल्या गर्दीची, गोंधळाची, गैरसोयींची, कशाचीही आठवण व्हायची नाही. पहाटे अकोल्यापासून प्रवासी उतरायला सुरूवात झाली की मग रिकाम्या जागा मिळायला सुरूवात व्हायची. पण मग झोपण्याचा मूड नसायचा. एखाद्या आडबाजूच्या खेड्यात दिवाळीसाठी पहाटे उठलेली मुले फ़टाके फ़ोडायला सुरूवात करत असायचीत. दिवाळीतल्या दिव्यांचा आनंदी प्रकाश त्यांच्या डोळ्यात दिसत असायचा. अशावेळी त्या मुलांचे चेहरे कसेही असलेत तरीही सुंदरच दिसत असायचेत. मग त्यांनी गाडीकडे पाहून हलवलेल्या हातांसाठी आपलाही हात आपल्या जाणिवांच्या नकळत हलवला जायचा. ऒक्टॊबर, नोव्हेम्बर महिन्यातली ज्वारी/बाजरीची हिरवीगार शेते काळ्याभोर मातीत फ़ुलून आलेली दिसायचीत. विदर्भाविषयीच्या अभिमानाने जीव सुपाएव्हढा व्हायचा. केव्हा एकदा नागपूरला पोहोचून आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींमध्ये जातोय असं व्हायचं.

कराडला शिकत असताना महाराष्ट्र एक्सप्रेसने आम्ही सगळे वैदर्भिय विद्यार्थी परतायचो तेव्हा तर अधिकच गंमत. संपूर्ण सत्राचा अभ्यास, परीक्षा आदींचा ताण संपवून परत येताना आमच्यातले बहुतेक जण मलकापूर आलं तरी "बस्स! आता नागपूर आलंच आहे" असं समजून बोगीच्या दारात वाट पहात उभे रहायचे. मलकापूर ते नागपूर हे अंतर रेल्वेसाठी कागदोपत्री जरी ३५० कि.मी. असले तरी आमच्या मनात ते शून्य व्हायचं.

होळीच्या वेळी परतताना ग्रीष्माची नुकतीच चाहुल लागलेली असायची. वर्धेनंतर नागपूरपर्यंतच्या प्रवासात पळसाची लाल, केशरी अशी मनमोहक रंगांची फ़ुले आमच स्वागत करीत असायचीत. का कोण जाणे हा आम्हाला ’मिलनऋतु’ वाटे. अनामिक, अज्ञात प्रियेच्या कल्पनेने मन मोहरणे, पलाशफ़ुलांच्या रंग, गंधाने तिला होळीत माखून टाकण्याच्या कल्पनेने मन शहारणे या नित्य मनोव्यापारातल्याच घटना होत्या. वर्धा ते नागपूर हे अंतर काही क्षणातच पार केल्यासारखे वाटे.


कडक वैशाखात तर विचारायलाच नको. गाडी थांबते न थांबते तोच थंड पाण्याच्या नळाच्या शोधार्थ प्लॆट्फ़ॊर्मवर धावणे, थंड पाण्याचा नळ मिळाल्यावर आणि त्यातल्या त्यात चुकून रांगेत आपलाच पहिला नंबर असला तर जग जिंकण्याचा आनंद होणे, पाण्याची पिशवी अर्धवटच भरल्यानंतर मागच्या रेटारेटीमुळे आणि गाडीच्या काळजीमुळे रांगेतून बाजुला व्हावे लागणे आणि नंतर "मिळालेले पाणी, आपण कल्पना केली होती तेव्हढे थंड नाही" हा अनुभव येणे, या सग्ळ्या गोष्टी मला वाटतं, सार्वत्रिकच आहेत. पण त्या अर्धा पेला पाण्याने जी तहान भागायची ती आज एक संपूर्ण ’बिस्लरी’ सुध्दा भागवू शकत नाही.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपवून परत जाताना मशागती पूर्ण झालेल्या काळ्याशार जमिनी पावसाची वाट बघत असतात. मुंबईत मे महिन्याच्या अखेरीसच येउन धिंगाणा घालणारा पाउस, इथे चांगला १५ जूनपर्यंत आलेला नसतो. त्या जमिनी आणि तो आभाळाकडे डोळे लावून बसलेला भूमिपुत्र पाहिला की पर्जन्यसूक्त जोरात म्हणावेसे वाटते.


पावसाळ्यात रात्रभर, छान, एक चादर पांघरण्याएव्हढीच, थंडी असावी. गाडीला गर्दी नसल्यामुळे, तुम्ही मागितल्याबरोबर, खालचा बर्थ मिळालेला असावा, रात्रभर गाडीच्या ठेक्यावर झोपेचं गाणं जमलेलं असावं आणि पहाटे प्रसन्न जाग यावी. विदर्भ शेगाव किंवा जलंब स्टेशनच्या आउटर सिग्नलची वाट पहात थांबलेली असावी. कुठे थांबलीय याचा अंदाज घेण्यासाठी आपण सहज खिडकी उघडावी तर सरत्या रात्री, अगदी आपल्या शेजारी, दिव्यांनी लुकलुकणारं ख्रिसमस ट्री दिसावं. पावसाळ्यात हे काजवे अगदी बाभळीलाही सुंदर करून टाकतात. नजर टाकावी तिथपर्यंत हे झाडांना लगडलेले दिवेच दिवे. आयुष्य सार्थकी लागलं, असं वाटायला लावणा-या अनेक क्षणांपैकी हा एक क्षण. काही वेळाने सिग्नल मिळाला की गाडी हळूच हलते आणि परमेश्वरी सृष्टीतून नागरसृष्टीत प्रवेश करते.

पण ही नागरसृष्टीही काही कमी विलोभनीय नसते. पावसाळ्याच्या दिवसात झुंजुमुंजु झाल्यावर एखाद्या छोट्या स्टेशनात गाडी तब्येतीनं थांबलेली असते. सर्वत्र ओलासर धुंद वास आणि त्यात मिसळलेल्या गाडीच्या लोखंडी वासाच एक निराळच विश्व तयार होतं. फ़लाटावरचा एखादाच पोरगा ’चॆग्रॆ्म’ ओरडून त्या शांततेवर चिमुकला ओरखडा उमटवत असतो. सर्व विश्व झोपेचं पारणं करण्याच्या बेतात असतानाच स्टेशनच्या बाहेर कुठलातरी पानवाला सिनेमाचं गाणं लावतो. अशा (अ)वेळी "गोरी है कलाईयां" सारखं तद्दन फ़िल्मी गाणंही वसंतरावांच्या चीजेइतकच आवडतं. घरी परतण्याची ओढ त्या गाण्याला विलोभनीय करते की त्या गाण्यामुळे घराची ओढ अधिक विलोभनीय होते? हे एक न उलगडणारं कोडं होऊन बसतं. मुंबईचा पाउस हा रामगोपाल वर्माच्या चित्रपटांमध्येच छान दिसतो. खरोखर मुंबईचा पाउस म्हणजे चिखल, रोगराई आणि झोपडपट्टीवासियांचे शिव्याश्राप. पण विदर्भात पाउस म्हणजे मळभ दूर होऊन सुस्नात होण्याची प्रक्रिया वाटते.

नागपूरला येण्यासाठी सगळेच ऋतू आनंदाचे; पण त्यातही सर्वोच्च आनंद म्हणजे गणपती, गौरींसाठी येण्याचा. मला वाटतं, गणरायाच्या आगमनाआधी निसर्गातच एक खूप आनंद भरून आणि भारून राहिलेला असतो. गाडीने येत असताना पिकं चांगली गुडघ्याएव्हढी क्वचित खांद्याएव्हढी झालेली दिसतात. शेतकरी पिकांच्या आशेने आनंदात असतात. सणांच्या आणि गोडाधोडाच्या आशेने लेक्रबाक्रं आनंदून जातात आणि आपलं मन भरून येतं.


विदर्भातल्या काहीकाही फ़लाटांना मात्र वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व आहेत. शेगावचा फ़लाट धार्मिक आहे. संतश्रेष्ठ श्रीगजानन महाराजांच्या पावन पदस्पर्शानेही असेल, पण इथे उतरणा-या प्रत्येकाच्या डोळ्यात एक उत्सुकता आणि आशा असते आणि इथून चढणा-यांच्या डोळ्यांतील तृप्तता आणि धन्यता वाचता येते.



अकोल्याचा फ़लाट हा नागर संस्कृतीत जायला उत्सुक असलेल्या सुशिक्षित अनागर तरूणासारखा भासतो. तर मूर्तिजापूर म्हणजे संत गाडगेबाबांसारखाच भोळा, सरळ पण रोखठोक वाटतो. ’ज्ञानेश्वरी’, ’आझाद हिंद’ ’गीतांजली’ सारख्या सुपर एक्सप्रेस गाड्या तिथे थांबत नाहीत पण त्याचं त्याला सुखदुःख नसतं. न थांबणा-या गाड्यांविषयीची नैसर्गिक असूया इथल्या फ़लाटांमध्ये अजिबात नाही.


बडनेरा स्टेशन मात्र ख-या अमरावतीकरांसारखं आतिथ्यशील आणि अघळपघळ. कधीही "क्या बडे! उतर जा ना! जा ना कल सुबे!" अशी मैत्रीपूर्ण साद देइल असं वाटत.

चांदूरचा फ़लाट अगदी आत्ताआत्तापर्यंत चिमुकला होता. २४ डब्यांची गाडी थांबली पाहिजे म्हणून एव्हढ्यातच त्याची वाढ झालीय. मोठ्या माणसांचे मोठ्ठे बूट घालून घरातला लहान मुलगा ऐटीत मिरवतो तसा हा फ़लाट वाटतो.

धामणगावचा फ़लाट हा माझा मित्रच आहे. नोकरीनिमित्त एक वर्षासाठी तेथे असताना रोज त्याची भेट व्हायचीच. रात्री फ़लाटावरच जमवलेला आम्हा नाट्यकर्मींचा गप्पांचा फ़ड आमच्या नाट्यविषयक जाणिवा फ़ार समृध्द करून जायचा. नाटकाचा रंगमंचीय प्रयोग सादर होण्यापूर्वी त्यावर करून पाहण्याच्या निरनिराळ्या ’प्रयोगां’ची संहिता याच फ़लाटावर तयार झालेली आहे.


वर्धा स्टेशन मात्र जुन्या गांधीवाद्याप्रमाणे तत्वनिष्ठ वाटतं. ३१ जानेवारी १९४८ ला गांधीजी प्रदीर्घ मुक्कामासाठी वर्धेला येणार होते हा फ़लाटावरचा उल्लेख वाचला की मन गलबलून येतं. पण त्या फ़लाटावरचा सर्वोदयी साहित्याशेजारचा फ़िल्मी मासिकांचा स्टॊल विचित्र वाटतो. तसा फ़िल्मी मासिकांचा स्टॊल फ़लाटाला निषिध्द नाही, पण ’स्टारडस्ट’,’फ़िल्मफ़ेअर’ हे नेमके ’महर्षी अरविंदकी वचनें’ च्या मांडीला मांडी लावून बसलेली बघायला अस्वस्थ होतं खरं.

घरी परतताना सगळ्याच गाड्या हर्षोत्फ़ुल्ल वाटतात ख-या, पण पुन्हा नागपूर सोडून नोकरीसाठी जाताना आपल्या मानसिकतेचं प्रतिबिंब गाड्यांवर पडून त्यासुध्दा उदास वाटतात. कराडला शिकायला असताना परीक्षा संपल्यावर परतताना आम्ही सगळे २४ तासांपैकी १८ तास दंगा करत परतायचो आणि कराडला परत जाताना मात्र सगळे एकजात उदास. मोठी दंगेखोर मुलेदेखील, खिडकीच्या गजांमधून उदासपणे आपल्या आईवडीलांकडे पाहत हात हलवताना बघितली की काळीज हलत असे. मग बाहेरचा कितीही सुहाना मौसम, कितीही चांगलं निसर्गदृष्य पाहण्याचा मूड नसे. परतताना एका बर्थवर अडचण सोसून दोघे-दोघे झोपून येणारे आम्ही जाताना प्रत्येकाला वेगळा बर्थ असूनही अडचण झाल्यासारखे जात असू.


बराच काळ लोटला. आम्ही अभियंते झालोत. नागपूरमधल्या न होणा-या विकासाची वाट पहात विकसित पश्चिम महाराष्ट्रात नोकरीनिमित्त गेलोत. लग्न झालं, मुलंबाळं झालीत. ज्यांच्या ओढीने एकेकाळी नागपूरला जायचो ते आजी-आजोबा देवाघरी गेलेत. दरवेळी आम्हाला स्टेशनवर सोडायला आणि घ्यायला येणारे आणि गाडी कितीही उशिरा येणार असली. तरी रात्री दोन-दोन वाजेपर्यंत तिथेच आमची वाट पहात थांबणारे आमचे वडीलही दृष्ट लागावी तसे गेलेत. आता स्टेशनावर सोडायला धाकटा भाऊ येतो. गाडीतल्या दरवाज्यातला मी त्याला दिसेनासा होईपर्यंत हात हलवीत राहतो, अगदी वडीलांसारखाच. त्या काळी ते "पोहोचल्यावर पत्र टाक रे" म्हणायचे हा "फ़ोन कर" म्हणतो. काळ बदलला.

अजूनही विदर्भ नागपूर सोडते. वर्धा, पुलगाव, धामणगाव येइपर्यंत अंधार माजलेला असतो. बडनेरा मूर्तिजापूरच्या मध्ये जेवण उरकून शेगावला मंदिराच्या दिशेने हात जोडून सर्वजण झोपण्याच्या तयारीला लागतात.

अजूनही सुट्ट्यांमध्ये नागपूरला जायचय म्हटल्यावर अंगात अमाप उत्साह संचारतो. त्या जल्लोषातच मी बॆग भरायला घेतो. फ़सफ़सून वाहणा-या माझ्या उत्साहाकडे बायको कौतुकाने आणि कधी चेष्टेनेही पाहते. मी पण मनावर घेत नाही. काळाबरोबर बदलल्या न गेलेल्या माझ्यातल्या मी ला ’विदर्भ’ मधून पुन्हा विदर्भाच्या मातीत जाण्याची ओढ लागते.

-प्रा. राम प्रकाश किन्हीकर



(हा लेख दै. तरूण भारत नागपूर मध्ये रविवार दि. १७ सप्टेंबर २००६ रोजी प्रकाशित झालेला आहे.)

20 comments:

  1. अगदी मनापासून लिहिलेला आहे हा लेख तुमचा. मी कामानिमित्त नागपूर-चंद्रपूरला अनेकदा गेले आहे आणि विदर्भ प्रवासाच्या वेगवेगळ्या आठवणी आहेत ..त्यातल्या काही जाग्या झाल्या तुमचे अनुभव आणि चिंतन वाचताना.

    ReplyDelete
  2. रामभाऊ एकदम सुंदर विलोभनिय निसर्ग सौंदर्य, आणि उत्कॄष्ट शब्दरचना. वा अस वाटत कि स्वत: या प्रवासामध्ये तुमच्या सोबत हे सर्व दॄष्य बघतोय. अप्रतिम दुसरा शब्द नाही.

    ReplyDelete
  3. लेख अप्रतिम आहे प्रवासवर्णन भावले. माझे पण घराकडे केलेले सारे प्रवास नजरेसमोरून गेले. महाराज कृपेमुळे आगगाडीची तिकिटे जाऊन बोर्डिंग पास आले आहेत पण शेंदरी आकाशातला चंद्रसूर्य निरखताना घरची आठवण कमी होत नाही. लेखबद्दल आभार !!

    ReplyDelete
  4. Very good and heart touching. You have writeen in this blog what i experienced in the journey and life. The incidence in rail journey are really heart touching and emotional. i was also in Thane for One year. and i used to came to Chalisgaon on time to time. the feeling was same as you wrote in this blog. Malkapur, Shegaon, Jalamb, Akola, Dhamangaon, Bhusawal are part of my world. Vidarbh Express, Sewagram Express and Maharashtra Exp are also part of my world. So Thanks for such wornderful article.
    Shirish J Vinchurkar. Chalisgaon.

    ReplyDelete
  5. especially falaatanche varnan far sundar ahe. :)

    ReplyDelete
  6. Ram, I see a lot of Pu La influence in the narrative. Especially the last 3 paras seem to have a great impact of Vyakti and Valli. Nothing wrong in walking in the footsteps of the literary giant...

    ReplyDelete
  7. excellent

    1999 to 2006, i would have gone from nagpur to mumbai by almost all the trains on this route and also 70% of the stations in this route i would have taken halt due to nature of my job that time.

    i remember all those sweet memories and your article made me nostalgic.

    ReplyDelete
  8. Rahasy katha an aitihasik vachnachi avd asnara me matr apl he pravas varnan agdi pahilya olipasun shevtprynt n thambta vachl. Sir, tumhi yatun kharch pravas ghadavla railway cha. Marathi lekhnatil mla kahi kalat nahi pn tumhi he pravas varnan lihilt yatun mla tumchya barobr pravas karayla nakkich avdel.

    ReplyDelete
  9. You are most welcome, Mayuresh.

    ReplyDelete
  10. apratim..Nisargache vilobhaniy varnan ani uttam shabd-rachana. I like it very much sir. sundar

    ReplyDelete
  11. एक अप्रतिम लेख, जो कितीही वेळा वाचला तरी परत परत वाचावासा वाटतो!

    - सागर टिपणीस
    ठाणे

    ReplyDelete
  12. सुंदर. मी प्रवास करत असल्यासारखे वाटले. प्रत्येक फलाट आज नव्याने भेटला.प्रत्येक सणवार आणि त्या त्या वेळीचे वातावरण घरात बसुन अनुभवले.
    "चेग्रेम" - लय भारी.

    ReplyDelete
  13. एकदम मस्त , माझं खरच या गाडीवर खूप प्रेम आहे , यात बसल्यावर ही गाडी बाकी गाड्यांपेक्षा वेगळी वाटते का बरं याच उत्तर नाही , खूप सुंदर अभ्यासात्मक लिखाण , मस्त , थँक्स , कारण माझया विदर्भ एक्सप्रेस बद्दल लिहिलंय

    ReplyDelete
  14. राम तुझा लेख आज वाचला...
    फारच आवडला..
    का मिस केल ... मी आजवर तुझे लिहिणे

    ReplyDelete
  15. Ram,farach sunder, apratim.Pu La nchi aathvan zali.Tu sarvanchyach manatlya vicharanna vat karun dilis ani pravas ghadvla.Apratim

    ReplyDelete
  16. प्रवास वर्णन आल्याबरोबर वाचले सर्व लेख अतिशय उत्तम आहेत, समाधान वाटले, फारच छान.

    ReplyDelete
  17. खूप छान सादरीकरण केल हुबेहुब सगळी स्टेशन डोळ्यासमोरून गेली वयाची चोवीस वर्ष विदर्भात गेली अमरावती नागपूर प्रवास पॅसेंजर ने पण केला

    ReplyDelete