Saturday, March 5, 2016

आत्मनो मुख दोषेण..... : संस्कृत सुभाषिते - ६

वाचा : संस्कृत सुभाषिते - १
          संस्कृत सुभाषिते - २
          संस्कृत सुभाषिते -३  
          संस्कृत सुभाषिते - ४
          संस्कृत सुभाषिते - ५


                                                  " आत्मनो मुख दोषेण, बध्यन्ते शुक सारिकाः
                                                     बकास्तत्र न बध्यन्ते, मौनं सर्वार्थ साधनम "


अर्थ : आपल्या मुख दोषांमुळे (गोड गळ्यामुळे) पोपटाला आणि कोकिळेला बंधनांमध्ये (पिंज-यात) रहावे लागते. (कोकिळ पक्षी हल्ली कुणी पाळत नसले तरी पूर्वी पाळत असावेत.) पण बगळा मात्र त्याच्या मौनसाधनेमुळे बंधनात अडकत नाही. तस्मात मौन हे सर्व गोष्टी साधून देणारे साधन आहे. आजच्या युगातले " येडा बनके पेडा खाना" प्रकारचे.

याच आशयाचे एक बोधचित्र सोशल मेडीयावर फ़िरत होते म्हणून या संस्कृत सुभाषिताची आठवण झाली.



पण आजकाल मात्र जोराने ओरडून विकणा-यांचे पेरूही विकले जातात आणि न ओरडता शांत बसून विकणा-यांचे (हापूस) आंबेही न विकल्या जाता पडून रहातात अशी परिस्थिती आहे. खरेच आहे ते. आजचा जमानाच मुळी जाहिरातबाजीचा आहे. जाहिरात ही पासष्ठावी कला म्हणून विकसित झालेली आहे आणि मान्यताही पावलेली आहे. आमच्या पूर्वजांचा फ़ार बोल बच्चनपणावर विश्वास नव्हता किंवा त्याकाळी एखादी गोष्ट पटवून सांगायची असेल तर वारंवार ओरडण्याची गरज नसावी. शब्दांवर विश्वास ठेवण्याचा तो काळ होता.

हा बदललेल्या काळाचा महिमा की आपणा सगळ्यांनाच कशाचे ना कशाचे बंधन अगदी मनापासून आवडायला लागले आहे ? न कळे. हो, नक्कीच आपणा सगळ्यांनाच पैसा, मान, मरातब, लौकिक इत्यादी भौतिक गोष्टींमध्ये रमायला आवडायला लागलेले आहे. म्हणून मग मुख दोष हा मुख दोष नसून जाहिरातीची कला बनते. अर्थात मूर्ख माणसांनी तोंड उघडले की त्यांच्या विद्वत्तेचे पितळ उघडे पडतेच. तो भाग अलहिदा. पण आजकाल आपण फ़ार वाचाळ झालोय हे खरे. एखाद्या दिवसभराचे मौनही आपल्याला सोसवत नाही. (बाकी, माझ्या स्वतःच्या मौनाच्या प्रयोगांवर लिहीण्यासाठी मी माझा पुढला लेख राखून ठेवतोय.)

जरा अंतर्मुख होऊन विचार केलात तर आपल्या लक्षात येईल की आपल्या आजूबाजूला अशी अनेक मंडळी असतील की जी आपला माल ओरडून विकत नाहीत पण ती मंडळी अनंत गुणांनी युक्त अशी गुणी मंडळी आहेत. त्यांचा शोध घेणे अवघड नाही. जरा नजर उघडी ठेवली आणि साक्षेपी दृष्टीने आजूबाजूला पाहिले की अशी मंडळी आपल्या दृष्टीला पडतीलच. त्यांचा मान ठेवूयात. त्यांची खरी किंमत ओळखून त्यांना आदर देवूयात.

Thursday, March 3, 2016

मनाचे श्लोक - ८



मना सज्जना हीत माझे करावे
रघूनायका दृढ चित्ती धरावे
महाराज तो स्वामी वायूसुताचा
जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा II २२ II



प्रभू रामचंद्रांचे आयुष्य हे सर्वसामान्य मनुष्यमात्रांसाठी आदर्श जीवनाचा वस्तूपाठ आहे, आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श भ्राता, आदर्श राजा, आदर्श मित्र आदर्श पिता आणि आदर्श शत्रूही. या सगळ्या भूमिकांबाबतचा मानदंड म्हणजे प्रभू रामचंद्र. त्यामुळे आपल्या जीवनात आपले हित पहायला हवे असेल तर ह्या जीवनाचा आदर्श आपण आपल्यासमोर ठेवायला हवा आहे. या प्रसंगी प्रभू श्रीराम कसे वागले असते ? या विचाराने मार्ग आखला म्हणजे अवघ्या जीवनाचे सोने नाही का होणार ? 
 
बुद्धीमतां वरीष्ठम आणि शक्तीवंतांमध्ये सर्वश्रेष्ठ अशा प्रत्यक्ष वायुसूत हनुमंताने ज्यांना आपला स्वामी मानलय त्यांचा ध्यास आपण किंचीत मानवांनी धरायलाच हवा. त्यांच्या आदर्शांवर चालून आपण आपले जीवन व्यतीत केले तर या भवसागरातून उद्धरून जायला आपल्याला वेळ लागणार नाही.

न बोले मना राघवेवीण काही
जनी वाउगे बोलता सौख्य नाही
घडीने घडी काळ आयुष्य नेतो
देहांती तुला कोण सोडू पहातो II २३ II 



मनुष्यमात्राची स्वाभाविक वृत्ती फ़ार बहिर्मुख असते. रोजच्या संसाराचा रामरगाडा आवरताना, सावरताना आपण दिवसभर अनंत गोष्टींमध्ये चित्त गुंतवतो. आणि नंतर सवयीने त्याच गोष्टी नश्वर असल्या तरी शाश्वत मानून त्यांच्याच आराधनेत, उपासनेत आपला सर्व काळ व्यर्थ घालवतो. श्री समर्थ आपल्याला हे टाळण्याचा उपदेश करत आहेत. काळ आजवर कुणालाही चुकला नाही. त्या काळाच्या रेट्यामुळे भल्या भल्या मोठ्या विद्वान नास्तिकांनाही त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी शाश्वत काय नश्वर काय याचा विवेक होऊन ते भक्तीमार्गाकडे वळल्याचे आपण नुकतेच बघितलेले आहे. प्रत्येक क्षणी आपले इथले आयुष्य उणे होत असताना ज्या एका रघूकुळाच्या नायकामुळे, प्रभू श्रीरामांमुळे, आपल्याला शाश्वत समाधान मिळणार आहे, त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवण्याचा श्री समर्थ आपल्याला उपदेश करत आहेत.

प्रभू श्रीरामांचे जीवन सर्व भारतीयांसाठी अगदी आदर्श असे आहे. त्या आदर्शांवर आपण जगत गेलो, त्यांच्या विवेकानुसार आपण जगव्यवहाराचे आचरण केले तर आयुष्याच्या अंतकाळात मुक्ती मिळवावी असे काही उरणारच नाही. आपण आधीपासूनच या जगाच्या सर्व भौतिक गोष्टींच्या आणि बंधनांच्या पाशापासून मुक्त झालेले असू. " देहांती तुला कोण सोडू पहातो ?" या समर्थ उक्तीचा अर्थ आजच्या युगात असाही घ्यावा लागेल.


रघूनायकावीण वाया सिणावे
जनांसारिखे व्यर्थ का वोसणावे
सदा सर्वदा नाम वाचे वसो दे
अहंता मनी पापिणी ते नसो देII २४ II 

अशा त्या रघूनायकावाचून आपल्याला तारणारा कुणी असेल ही कल्पनाही आपण करू नये. आज या कलियुगात जगात विविध प्रकारच्या प्रलोभनांनी, विभ्रमांनी आणि बुद्धीभेदांनी ठाण मांडले असताना त्यांच्या कडे साक्षेपी दृष्टीने पाहून इतर कुठली गोष्ट आपल्याला मुक्तीच्या पथावर नेणार नाही याचा अगदी दृढ विश्वास बाळगावा. कलियुगात नामस्मरण हेच श्रेष्ठ प्रकारची भक्ती आहे आणि तिचा अंगीकार प्रत्येक साधकाने केला पाहिजे. 

पण अनेक संत मंडळी सांगतात त्याप्रमाणे नामस्मरण करीत असताना " मी नामस्मरण करतो आहे " ही सुद्धा भावना मनात उरू देऊ नये. करणारा आणि करवून घेणारा तो प्रभू श्रीरामच आहे ही भावना स्थिरावली की अहंतेचा वारा मनाला शिवणार नाही. मोठमोठ्या साधकांची, योग्यांची अनंत वर्षांची साधना हा अहंतेमुळे वाया गेलेली श्री समर्थांच्या लक्षात आलेली आहे त्यामुळे ते अहंतेला " पापिणी " असे संबोधतात. तिला आपल्या मनात थारा देऊ नये असा कळकळीचा उपदेश आपल्याला करतात.

II जय जय रघुवीर समर्थ II

Tuesday, March 1, 2016

कटिंग : एक करणे

बालपणी अस्मादिकांचे जावळ फ़ार उशीरा काढण्यात आले. माझ्याहून ३ वर्षांनी लहान असलेल्या धाकट्या भावाचे आणि माझे जावळ काढण्याचा विधी एकाच मांडवात करण्यात आला. आमची मुंजही एकत्रच लागली. त्याकाळच्या मध्यमवर्गीय किंवा कनिष्ठ मध्यमवर्गीय (हा शब्द १९९० नंतर जास्त चलनात आला. पूर्वी गरीब, श्रीमंत आणि मध्यमवर्गीय असे तीनच वर्ग होते.) समाजात हे प्रकार सरसकट होते. एकंदर काय, वयाच्या चांगल्या चौथ्या वर्षापर्यंत मला चांगली चुट्टी येण्याइतपत केस शिरावर बाळगावे लागलेत. 



त्याचा निषेध म्हणून की काय मी त्यानंतर बारीक केस ठेवण्याचा परिपाठ ठेवला. तो आजपर्यंत कायम आहे. कळायला लागेपर्यंत (आपली आपली मत फ़ुटून स्वतः सलूनमध्ये जायला लागेपर्यंत) सोबत आमचे दादा (वडील) असायचेत आणि सलूनवाल्याला "बारीक केस काप" अशी तंबी असायची. आमच्या लहानपणी केस वाढवणे म्हणजे " हिरोगिरी करणे " असा समज समस्त पालकांमध्ये रूजू होता की काय न कळे. " केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा. " हा संदेश मी याची देही याची डोळा काही वर्ग खोल्यांमध्ये सुविचार म्हणून लावून ठेवलेला पाहिला आहे. आमच्या वर्गात चौथ्या वर्गापर्यंत गोतमारे म्हणून एक मुलगा होता. त्याचे केस असे कानावर वगैरे येत असत. तो स्वतःला राजेश खन्ना समजायचा. त्यामुळे डोक्यावर केस वाढलेले असणे, विशेषतः कानशिलाशी केसांनी लगट करणे म्हणजे काहीतरी मोठ्ठा गुन्हा केलाय अशी समस्त पालक मंडळींची समजूत होती. 



आताशा एखाद्या " अर्णव किंवा मिहीर "  ला त्याचे स्मार्ट बाबा सलूनमध्ये नेवून त्याची हेअरस्टाईल वगैरे ठरवताना दिसले की आपल्याला ४० वर्षे उशीरा जन्माला  घातल्याबद्दल त्या विधात्याकडे तक्रार नोंदवावीशी वाटते. तात्पर्य काय की केसांचा जवळपास चकोट म्हणजे सज्जनपणाचे कमाल परिमाण असण्याच्या पीढीत आम्ही जन्म घेतला.


कराडला अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असताना मात्र आम्हाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा फ़ायदा घेवून अस्मादिकांनी आमच्या मिश्यांवर एव्ह्ढे विविध प्रयोग केलेले होते की " माझे मिश्यांचे प्रयोग " म्हणून एखादे पुस्तक मी सहज लिहू शकतो.

आजवर मी ब-याच शहरांच्या ब-याच सलून्सचा प्रवास करून आलोय. पण आजतागायत एकदा त्या खुर्चीवर बसलो की " बारीक " एव्हढा शब्द उच्चारून सलूनवाल्याच्या हातात आपली डोई ठेवणे एव्हढाच उपचार पाळत आलोय. (बाकी हे आम्ही बोललो नाही तरी एखादा चाणाक्ष सलूनवाला समजेलच. कारण जेव्हढे केस डोईवर ठेवून समस्त जनता सलूनबाहेर पडते तेव्हढे केस डोईवर ठेवून आम्ही कापायला जातो. त्यामुळे बहुतांशी सलूनवाले केवळ भूतदया दृष्टीने आमच्या कडे बघतात. काही अती व्यापारी दृष्टीकोन असलेले सलूनवाले मात्र " आता हा लेकाचा आपल्याकडे पुढला महिना दीड महिना काही येत नाही, धंदा बुडाला " अशा असूया दृष्टीनेही बघतात, तो भाग अलहिदा.) 



कारण सलूनमध्ये जाऊन त्या कारागिराला केस कापण्याविषयी सूचना करणे, म्हणजे त्या कारागिराच्या कलेचा अपमान आहे असे मी मानत आलो आहे. (उद्या कोणी सोम्यागोम्या येवून मला स्थापत्य अभियांत्रिकी शास्त्राविषयी, शिकवायचे कसे याविषयी सांगायला लागला तर मला जेव्हढे अपमानित व्हायला होईल) तेव्हढे अपमानित मला त्या कारागिराला त्याच्या कलेविषयी मार्गदर्शन करून करायचे नसतेच. अहो, उगीच काय काहीतरी ? 

काही काही माणसांचे याबाबतीतले प्रावीण्य वाखाणण्याजोगे असते. खुर्चीत बसण्यापूर्वी आणि बसल्यानंतरही त्या कारागिराला ही मंडळी एव्हढ्या सूचना देत असतात की काही दिवसांनी यांनी शेजारीच आपले दुसरे सलून सुरू करावे असे वाटते. त्यामुळे आजवर फ़क्त " बारीक " एव्हढी सूचना देवून खुर्चीवर बसणे आणि शेवटी डोईवर आहे तेव्हढा ऐवज ठेवून घरी जाणे हे नेमस्त धोरण आम्ही निग्रहाने चालवले आहे.




पण लग्नानंतर मात्र यात थोडा बदल झालाय. आणि कन्यारत्नाला स्वतःची मते फ़ुटू लागल्यानंतर तर फ़ारच बदल अनुभवायला येतो आहे.  हल्ली कटिंग करून घरी परतल्यानंतर सुपत्नी आणि सुकन्या या दोघींच्याही प्रतिक्रियांचा अंदाज घ्यावा लागतो. कधीकधी कौतूक तर कधीकधी दोघीही (राहूल गांधीवर बरसणा-या स्मृती इराणींच्या आवेशात) माझ्यावर तुटून पडतात. एक दोन दिवस " ई........आई, बाबाने अगदी लाज आणलीय, बघ." किंवा " काय हे ? तू काय स्वतःला कॉलेजकुमार समजतोस की काय ? " वगैरे डॉयलॉगबाजी ऐकून घ्यावी लागते. 







पण सलूनवाल्याचे थोडेसे देवासारखे आहे. तो देईल ते आनंदाने स्वीकारण्यातच समजूतदारपणा असतो. चार दिवस सुखाचे , चार दुःखाचे प्रमाणे चार दिवस सोल्जर कटचे तर चार दिवस मश्रूम कटचे. नाही का ?