Showing posts with label समर्थ रामदास स्वामी. Show all posts
Showing posts with label समर्थ रामदास स्वामी. Show all posts

Wednesday, May 23, 2018

मनाचे श्लोक - ९


मना वीट मानू नको बोलण्याचा
पुढे मागुता राम जोडेल कैचा
सुखाची घडी लोटता सूख आहे
पुढे सर्व जाईल काही न राहे II २५ II


आजकाल आपण बघतोय की निःस्वार्थ बुध्दीने कुणाच्या हिताचे कुणाला सांगायला गेलो तर प्रथम त्या उपदेशकर्त्याच्या हेतूबद्दलच शंका उपस्थित लोक करतात. ज्या माणसाला हा उपदेश केला जातो त्याचा अहंकारही उपदेश ऐकण्याच्या व त्याला आचरणात आणण्याच्या आड येतो. उपदेशकर्त्याबद्दल "हा कोण लागून गेला टिक्कोजीराव ? याला काय कळणार ? ज्याचे जळते त्यालाच कळते." आदि विचार साधकाच्याही मनात येणे स्वाभाविक आहे. अशावेळी आपल्या हिताचे पण वेळप्रसंगी कटू बोलणे करणा-या हितचिंतकाचा साधकाला वीट येऊ शकतो. 

पण समर्थ परमार्थ मार्गावरील साधकांना सावधान करताहेत. ते सांगताहेत की अशा बोलण्याचा वीट येऊन उपयोग नाही. उलट अंतर्मुख होऊन त्या बोलण्याचा साधकाने विचार करावा आणि आपले हित साधून घ्यावे. आपल्या हिताचे आपण केले तर श्रीमदभगवद्गीतेत सांगितलेल्या स्वधर्मपालनाकडे आपली वाटचाल अधिक सुकर होत जाईल आणि राम जोडला जाईल. आपणच आपल्या अविचारी वागण्याने आपले अहित करण्याचे ठरविले तर आपल्यासोबत परमेश्वर कसा बरे जोडला जाईल ? समर्थांचा "विचार" , "विवेक" या शब्दांवर फ़ार भर आहे. साधकाने विचारांची, विवेकाची कास कधीही सोडू नये याबद्दल त्यांना फ़ार कळवळा आहे.

समर्थ पुढे साधकांना सांगताहेत की बाबांनो, या भौतिक सुखांसाठी विवेकाचा त्याग करून अप्रिय पण हितकर अशा उपदेशाचा वीट मानू नका. कारण या भौतिक जगातली सुखे क्षणभंगूर आहेत. सुख आणि दुःख यांचा सतत पाठशिवणीचा खेळ या जगतामध्ये सुरू असतो. त्यामुळे आजच्या क्षुद्र सुखासाठी विचारांचा, विवेकबुध्दीचा त्याग करू नका कारण तात्पुरत्या अशा भौतिक सुखांना काही कालावधीनंतर शून्य किंमत प्राप्त होत असते. 

आपण सर्वांनी हा प्रयोग करून पाहण्यासारखा आहे. गेल्या ३ ते ५ वर्षांपूर्वी ज्या एखाद्या गोष्टीची आपल्या स्वतःला प्रकर्षाने ओढ होती आणि ती वस्तू आपल्याला प्राप्त झाली याचे आज आपल्या लेखी सुख किती आहे ? याचा ठोकताळा प्रत्येकाने मांडावा म्हणजे समर्थांच्या वाक्याचा पडताळा येईल.


देहेरक्षणाकारणे यत्न केला
परी सेवटी काळ घेवोनी गेला
करी रे मना भक्ती या राघवाची
पुढे अंतरी सोडी चिंता भवाची II २६ II



आपण सर्वच जण आपल्या देहाची किती काळजी घेत असतो. त्याचे रक्षण व्हावे म्हणून सतत प्रयत्नरत असतो. पण देह कशासाठी ? मला लाभलेला देह हा साध्य आहे की साधन आहे या विवेकाचे आपल्याला विस्मरण होत असते. आजकाल तर आपण सर्वच चार्वाकाचे इतके अनुयायी झालो आहोत की त्याच्या "खाओ, पियो, ऐश करो" या उपदेशाला आपण फ़ारच गांभीर्याने घेतलेय. "देह चांगला टिकावा म्हणून देहाचे लाड" ही समजूत दृढ झालीय. "देश, देव आणि धर्मासाठी या देहाचा पुढे उपयोग होईल म्हणून देह चांगला टिकवला पाहिजे" ही समर्थांची शिकवण तर आपण विस्मृतीतच ढकलली आहे. पण आपण देहाचे कितीही लाड करा, त्या काळापुढे आपले काहीच चालत नाही. काळा, गोरा, खुजा, उंच, देखणा, कुरूप आदि सर्व देहांना कालाधीन होऊन पंचमहाभूतांमध्येच विलीन व्हावे लागते. तर मग या देहाचा सदुपयोग होण्यासाठी याच्या रक्षणाचा विचार का होऊ नये ? 

बरं, "देहाची उत्तम जोपासना केली की माणूस चिंतामुक्त झाला" असे म्हणता येईल का ? खचितच नाही. उलट सुंदर स्त्री पुरूषांनाच त्यांचे सौंदर्य चिरकाल कसे टिकेल याची चिंता सतावत असते. काही काळाने कुठे आपल्या सौंदर्यात उणेपणा तर येणार नाही ना ? ह्या चिंतेत ते बिचारे कायम असतात आणि पुन्हा त्यासाठी अपार प्रयत्न करीत असतात. अशा सर्व लोकांना समर्थ उपदेश करताहेत की "देह कशासाठी ?" "देह साध्य की साधन ?" हा विवेक पक्का झाला की देहाच्या जोपासनेसाठी प्रयत्न जरी केला तरी श्रीरामरायावर सर्व सोपवून भवाच्या चिंतेतून मुक्त व्हा. कसाही देह असला तरी तो साधन म्हणून जनसेवेत, ईश्वरसेवेत झिजवला तर या जन्माचे सार्थक आहे. देहाचे कौतुक नाही. तो काळाचा आहे. त्याच्याकडूनच घेतलाय, त्यालाच अर्पण व्हायचाय हे लक्षात ठेवून जगात वावरा.

भवाच्या भये काय भीतोसी लंडी
घरी रे मना धीर धाकासी सांडी
रघूनायकासारिखा स्वामी शिरी
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी II २७ II


काही काही साधक या भवसागराची कायम भीती बाळगत असतात. अशा प्रसंगी मनमोकळेपणे जगणे, आपले नियत कर्म उत्कृष्टपणे पार पाडणे त्यांच्याकडून होणे दुरापास्तच. अर्जुनाची महाभारत युध्दाच्या वेळी जी अवस्था झाली तीच अवस्था. (वेपथुश्च शरीरे मे...)

अशावेळी समर्थ अगदी भगवान गोपालकृष्णांचाच अवतार धारण करून साधकांना समजावतात. याठिकाणी समजावताना समर्थांनी शिवीचाही वापर केलाय. भगवंत आपल्या लेकरांचा सदैव सांभाळ करतच असतो. कासवी जशी केवळ नजरेनेच आपल्या पिलांचे पालन पोषण करीत असते त्याप्रमाणे श्रीराम आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाहीत असा विश्वास ते साधकांना देताहेत. असा विश्वास एकदा असला म्हणजे साधकाची भीती कमी होईल, कालांतराने दूर होईल आणि साधक त्याचे नियत कर्म निःशंक मनाने आचरू शकेल असा समर्थांना विश्वास आहे.

                                                                        II जय जय रघुवीर समर्थ II

Wednesday, September 28, 2016

प्रबंध सरळी दे रे राम...

प्रबंध म्हटल्यावर आपल्याला अनेक विद्यापीठीय विद्वान आठवतात. त्यांचे शोध प्रबंध. त्यातली ती विद्वत्तापूर्ण भाषा. आणि सर्वसामान्यांचा त्यांच्याबद्दलचा "आपल्याला त्यांच्या विषयातल तर काही कळत नाही बुवा ." हा कबुलीवजा आदर. जेव्हढं क्लिष्ट, गंभीर तेव्हढं काहीतरी विद्वत्तापूर्ण अशी आपली समजूत झालेली आहे की काय न कळे. 

पण पृथ्वीतलावरचा आजवरचा सर्वात हुशार माणूस काय म्हणतोय ते पण आपण लक्षात घेतल पाहिजे. अहो आपल्याला जर तो विषय नीट समजला तर आणि तरच तो आपण दुस-याला नीट समजावून देऊ शकू ना ?



१९९४ मध्ये यू. पी. एस. सी. परीक्षेसाठी मी मराठी वाड.मय हा विषय ऑप्शन म्हणून घेतला होता. आपल्याला मराठी साहित्यात गती आहे हा माझा आत्मविश्वास वि. ल. भावे कृत "मराठी साहित्याचा इतिहास" आणि मराठी सौंदर्यशास्त्रावरची पुस्तके वाचायला घेतल्यावर पार लयाला गेला.  परिणाम असा झाला की मराठी लिटरेचर आम्हालाच नीट कळलं नाही. त्यामुळे आमचे आय. ए. एस. चे स्वप्न भंगलेच. (फ़ायदा हाच झाला की त्यानंतर पु. लं. च "मराठी वाड.मयाचा गाळीव इतिहास" वाचताना त्यातले नेमके पंचेस कुणाला आणि कुठे मारलेत ते कळून घेऊ शकलो. आणि "भिंत पिवळी पडली" हे एक सौंदर्यवाचक विधान या लेखातले टोमणे नव्याने समजलेत.)

सुदैवाने मला माझ्या पदवी, (Dr. J. G. Muley) पदव्युत्त्अर (एम. टेक.) (Dr. Y. S. Golait)  आणि आचार्य पदवी (पी. एच. डी.) (Dr. R. A. Hegde and Dr. Jigisha Vashi) शिक्षणातही जे मार्गदर्शक लाभलेत त्यांचाही आइनस्टाईनच्या या विधानावर ठाम विश्वास होता आणि आहे. त्यामुळे माझा प्रबंध, मी नक्की काय काम करतोय ? हे सोप्या भाषेत मी सगळ्यांना सांगू शकतो. पण त्याचा तोटा असा होतो की बहुतांशी मित्रमंडळी, शेजारी, नातेवाईक यांचा माझ्या संशोधनावर विश्वासच बसत नाही. "ह्या ! संशोधन इतकं सोपं कसं असेल ?" हा प्रश्न त्यांच्या चेहे-यावर मला वाचता येतो. अर्थात त्यामागचे माझे श्रम, माझे अप्लीकेशन्स माझ्या मार्गदर्शकांना माहिती आहे म्हणून बरय. त्यांना त्याविषयी शंका नाही.

आज समाजात वावरताना विद्वत्तेची झूल पांघरलेली अनेक मंडळी आपल्याला दिसतात. साधा सोपा विषय खूप कठीण करून सांगणे, वेळ भरपूर असतानाही खूप व्यस्त आहोत असे भासवणे अशा मंडळींचा सुकाळू आजकाल सर्वच क्षेत्रात वाढला आहे. सोप काहीतरी मांडणे, दुस-याला वेळ देणे या गोष्टी म्हणजे आपल्या समाजात आजकाल माणूस विद्वान नसल्याचे आणि रिकामटेकडा असल्याचे लक्षण होत चाललेय. समर्थांची उक्ती आपण खरच विसरत चाललोय.

समर्थांनी रामरायाकडे मागणे मागताना " प्रबंध सरळी दे रे राम " का मागितल असेल ? याचा खोल विचार करताना आपल्याला लक्षात येईल की समाजहितासाठी सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेत आणि शैलीत आपले प्रतिपादन आवश्यक आहे. आणि विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातही आपला शोध खरोखर सर्वसामान्यांच्या उपयोगात आणायचा असेल तर तो सोपा असणे आवश्यक आहे. खोट्या प्रतिष्ठेच्या भ्रामक कल्पनांपायी आपण हे विसरत चाललोय का ?

Thursday, March 3, 2016

मनाचे श्लोक - ८



मना सज्जना हीत माझे करावे
रघूनायका दृढ चित्ती धरावे
महाराज तो स्वामी वायूसुताचा
जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा II २२ II



प्रभू रामचंद्रांचे आयुष्य हे सर्वसामान्य मनुष्यमात्रांसाठी आदर्श जीवनाचा वस्तूपाठ आहे, आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श भ्राता, आदर्श राजा, आदर्श मित्र आदर्श पिता आणि आदर्श शत्रूही. या सगळ्या भूमिकांबाबतचा मानदंड म्हणजे प्रभू रामचंद्र. त्यामुळे आपल्या जीवनात आपले हित पहायला हवे असेल तर ह्या जीवनाचा आदर्श आपण आपल्यासमोर ठेवायला हवा आहे. या प्रसंगी प्रभू श्रीराम कसे वागले असते ? या विचाराने मार्ग आखला म्हणजे अवघ्या जीवनाचे सोने नाही का होणार ? 
 
बुद्धीमतां वरीष्ठम आणि शक्तीवंतांमध्ये सर्वश्रेष्ठ अशा प्रत्यक्ष वायुसूत हनुमंताने ज्यांना आपला स्वामी मानलय त्यांचा ध्यास आपण किंचीत मानवांनी धरायलाच हवा. त्यांच्या आदर्शांवर चालून आपण आपले जीवन व्यतीत केले तर या भवसागरातून उद्धरून जायला आपल्याला वेळ लागणार नाही.

न बोले मना राघवेवीण काही
जनी वाउगे बोलता सौख्य नाही
घडीने घडी काळ आयुष्य नेतो
देहांती तुला कोण सोडू पहातो II २३ II 



मनुष्यमात्राची स्वाभाविक वृत्ती फ़ार बहिर्मुख असते. रोजच्या संसाराचा रामरगाडा आवरताना, सावरताना आपण दिवसभर अनंत गोष्टींमध्ये चित्त गुंतवतो. आणि नंतर सवयीने त्याच गोष्टी नश्वर असल्या तरी शाश्वत मानून त्यांच्याच आराधनेत, उपासनेत आपला सर्व काळ व्यर्थ घालवतो. श्री समर्थ आपल्याला हे टाळण्याचा उपदेश करत आहेत. काळ आजवर कुणालाही चुकला नाही. त्या काळाच्या रेट्यामुळे भल्या भल्या मोठ्या विद्वान नास्तिकांनाही त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी शाश्वत काय नश्वर काय याचा विवेक होऊन ते भक्तीमार्गाकडे वळल्याचे आपण नुकतेच बघितलेले आहे. प्रत्येक क्षणी आपले इथले आयुष्य उणे होत असताना ज्या एका रघूकुळाच्या नायकामुळे, प्रभू श्रीरामांमुळे, आपल्याला शाश्वत समाधान मिळणार आहे, त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवण्याचा श्री समर्थ आपल्याला उपदेश करत आहेत.

प्रभू श्रीरामांचे जीवन सर्व भारतीयांसाठी अगदी आदर्श असे आहे. त्या आदर्शांवर आपण जगत गेलो, त्यांच्या विवेकानुसार आपण जगव्यवहाराचे आचरण केले तर आयुष्याच्या अंतकाळात मुक्ती मिळवावी असे काही उरणारच नाही. आपण आधीपासूनच या जगाच्या सर्व भौतिक गोष्टींच्या आणि बंधनांच्या पाशापासून मुक्त झालेले असू. " देहांती तुला कोण सोडू पहातो ?" या समर्थ उक्तीचा अर्थ आजच्या युगात असाही घ्यावा लागेल.


रघूनायकावीण वाया सिणावे
जनांसारिखे व्यर्थ का वोसणावे
सदा सर्वदा नाम वाचे वसो दे
अहंता मनी पापिणी ते नसो देII २४ II 

अशा त्या रघूनायकावाचून आपल्याला तारणारा कुणी असेल ही कल्पनाही आपण करू नये. आज या कलियुगात जगात विविध प्रकारच्या प्रलोभनांनी, विभ्रमांनी आणि बुद्धीभेदांनी ठाण मांडले असताना त्यांच्या कडे साक्षेपी दृष्टीने पाहून इतर कुठली गोष्ट आपल्याला मुक्तीच्या पथावर नेणार नाही याचा अगदी दृढ विश्वास बाळगावा. कलियुगात नामस्मरण हेच श्रेष्ठ प्रकारची भक्ती आहे आणि तिचा अंगीकार प्रत्येक साधकाने केला पाहिजे. 

पण अनेक संत मंडळी सांगतात त्याप्रमाणे नामस्मरण करीत असताना " मी नामस्मरण करतो आहे " ही सुद्धा भावना मनात उरू देऊ नये. करणारा आणि करवून घेणारा तो प्रभू श्रीरामच आहे ही भावना स्थिरावली की अहंतेचा वारा मनाला शिवणार नाही. मोठमोठ्या साधकांची, योग्यांची अनंत वर्षांची साधना हा अहंतेमुळे वाया गेलेली श्री समर्थांच्या लक्षात आलेली आहे त्यामुळे ते अहंतेला " पापिणी " असे संबोधतात. तिला आपल्या मनात थारा देऊ नये असा कळकळीचा उपदेश आपल्याला करतात.

II जय जय रघुवीर समर्थ II

Friday, February 5, 2016

मनाचे श्लोक - ७



मना सर्वथा सत्य सांडू नको रे

मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे

मना सत्य ते सत्य वाचे वदावे

मना मिथ्य ते मिथ्य सोडूनि द्यावे. II १९ II 



"सत्य हाच एक जीवन जगण्याचा मार्ग" हे भारतीय संस्कृतीतील अनेक दार्शनिकांनी आपल्याला आवर्जून सांगितलेले आहेत. श्री समर्थ त्यांच्यापैकीच एक. सत्य बोललो नाही, वागलो नाही तर जगात ही लबाडी कदाचित चालून जाईल, पण आपल्या आपल्या मनाला सत्य काय असत्य काय ? याची पूर्ण जा्णीव असल्याने मन मात्र कायम बोचणी लावत राहील. कितीही निर्ढावलेला मनुष्य असला तरी सत्य असत्याची बोचणी त्या व्यक्तीच्या मनाला लागतेच. मनाचे निर्ढावलेपण ती बोचणी जगासमोर येऊ न देण्याइतपतच असते. म्ह्णून श्री समर्थ आपल्या मनाच्या निरोगितेसाठी सत्य सदैव धरून राहण्याचा आग्रह करीत आहेत.

जाणीवपूर्वक बुद्धीभेद करत राहण्याच्या आजच्या युगात मिथ्य गोष्टींना पुरस्कृत न करणेही सत्य मांडण्याइतकेच महत्वाचे आहे हे आपल्या लक्षात येईल. आज हे मिथ्य मांडण्यात भली भली मंडळी जाणते, अजाणतेपणी सहभागी झालेली दिसत आहेत. त्यामुळे आपल्या मनाला योग्यायोग्य विवेक, शाश्वत काय, अशाश्वत काय ? याचे यथार्थ ज्ञान आपणच करून त्याप्रमाणे फ़क्त सत्याची कास धरायचे वळण लावायला हवे. एकदा ही जाणीव पक्की झाली की मग इतर जग कुठे चाललय ? आणि बहुसंख्य लोक कुठल्या मार्गावर आहेत ? याची फ़िकीर करण्याचे आपल्याला कारण उरत नाही. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी लिहील्याप्रमाणे

" सत्य असत्याशी, मन केले ग्वाही, मानियेले नाही, बहुमता." अशी मनाची स्थिती होते. मन खंबीर होते.


बहु हिंपुटी होइजे मायपोटी


नको रे मना यातना तेचि मोठी

निरोधे पचे कोंडिले गर्भवासी

अधोमूख रे दुःख त्या बाळकासी II २० II



श्रीशंकराचार्यांनी मनुष्यमात्राला कळवळून विचारलेय की बाबारे " पुनरपी जननम, पुनरपी मरणम " किती दिवस ? जन्म मृत्यूच्या या चक्रातून बाहेर कधीतरी पडणार आहेस की नाही ? श्री समर्थ तोच कळवळा पुन्हा व्यक्त करत आहेत. खरंतर मृत्यू म्हणजे या जीवाची तात्पुरती का होईना, सुटका. (चांगली कर्मे करून आणि ती सर्व ईश्वरार्पण करून मोक्ष मिळाला असेल तर "पुनरपी संसारा येणे नाही.") आणि पुन्हा जन्म म्हणजे या चक्रात पुन्हा अडकण्यासाठी अटक. या जन्मात सगळीच अनिश्चितता. चांगले मार्गदर्शन मिळाले नाही, आजूबाजूची परिस्थिती पोषक नसेल तर, पुन्हा कर्मे करणे आणि त्यांचे चांगले वाईट फ़ळ चिकटवून घेऊन नवीन प्रारब्धाची निर्मीती आणि ते प्रारब्ध भोगण्यासाठी नवीन जन्माची पुन्हा तयारी करणे यातच आयुष्य खर्ची पडेल. श्री समर्थ जन्माची भीषणता दाखवताना आईच्या गर्भातल्या बाळकाचे दुःख आपल्याला वर्णन करून सांगताहेत. खाली डोके आणि वर पाय या अवस्थेत चार पाच महिने पडून राहणे म्हणजे दुःखप्रद अवस्थाच ती. मराठीतले प्रख्यात कवी आणि मराठी गझलचे जनक सुरेश भट आपल्या एका गझलेमध्ये यथार्थ वर्णन करत आहेत. 

" इतकेच मला जाताना, सरणावर कळले होते.
मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते." 


आणि म्हणून आपल्या आर्तामध्ये सुद्धा परमेश्वराला " जन्म मरणाचा फ़ेरा चुकविला " असे मागणे असते.


मना वासना चूकवी येरझारा

मना कामना सांडि रे द्रव्यदारा

मना यातना थोर हे गर्भवासी

मना सज्जना भेटवी राघवासी II २१ II



आणि म्हणून श्री समर्थ आपणा सर्वांना सदैव, अखंड, अक्षय प्रभू श्रीरामांना भेटण्यासाठी या जन्म मरण्याच्या फ़े-यातून बाहेर यायला आवाहन करत आहेत. हे मना, या गर्भवासात पडून राहण्याच्या आणि त्यानंतर जन्माला येऊन पूर्वप्रारब्ध भोगण्याच्या यातना खूप झाल्यात. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी वासनांवर विजय मिळवायला हवाय. वासना म्हणजे केवळ कामवासनाच नव्हे,  तर मला हे हवे, ते नकोच अशी आग्रही भूमिका. ती सुद्धा आपण सोडून द्यायला हवीय. आपल्या संपत्तीबद्द्ल कुटुंबाबद्दल सुद्धा खूप आसक्ती बाळगू नका असे समर्थ सुचवीत आहेत.


हवेनकोपण मनात कायम ठेवून मृत्यू आला तर भलेभले योगी ते भोगण्यासाठी पुन्हा जन्म घेतात असा श्रीमदभगवतगीतेचा दाखला आहे. आणि जिवंतपणीच अशा सर्व वासनांचा त्याग केला तर जीवाला मुक्तीच की हो. काहीही हवय अस नाही, काहीही नकोय असही नाही. मुक्ती मुक्ती म्हणतात ती काय वेगळी असते याशिवाय ? ही अवस्था आपणा सर्वांना प्राप्त व्हावी या साठी श्री समर्थाम्ची धडपड आहे आणि म्हणून आपणा सर्वांना हे उपदेशामृत त्यांनी उपलब्ध करून दिलय.


II जय जय रघुवीर समर्थ II

Sunday, January 31, 2016

मनाचे श्लोक - ६



मरे एक त्याचा दुजा शोक वाहे
अकस्मात तो ही पुढे जात आहे
पुरेना जनी लोभ रे क्षोभ त्या ते
म्हणोनी जनी मागुता जन्म घेते  II १६ II 


ह्या पृथ्वीतलावर जो जीव जन्माला आला तो एक ना एक दिवस मरणार हे निश्चित आहे. गदिमांनी गीतरामायणात लिहील्याप्रमाने " जिवासवे जन्मे मृत्यू, जोड जन्मजात " हे अगदी खरे आहे, आपणा सर्वांच्या नित्य प्रत्ययाचे आहे. पण तरीही आपण हे सत्य कायम नाकारीत आलेलो आहोत.

किंबहुना या जन्ममृत्यूच्या फ़े-यातून कायमची सुटका होण्यासाठी प्रयत्न करणे हे या जन्माचे परमकर्तव्य आहे. श्री गजानन विजय ग्रंथात गजानन महाराजांनी परमभक्त बाळाभाऊंना उपदेश करताना " जन्मे न कोणी, मरे न कोणी, हे जाणावयालागोनी, परमार्थाचा उपाय " सांगितला. पण सर्वसामान्य संसारी पुरूष आपल्या आप्त स्वकीयांच्या मृत्यूच्या कल्पनेनेही सैरभैर होऊन जातो. ज्याच्या मृत्यूबद्दल आपण शोक करीत आहोत, त्याच्याच मार्गाने आपण आपलाही प्रवास करीत आहोत हे तो विसरूनच जातो. मृत्यूचे इतके जवळून दर्शनही त्याला ख-या अध्यात्माचा, जीवनाच्या ख-या उद्दिष्टांचा बोध करवून देण्यास असमर्थ ठरते. म्हणून मृत्यूच्या निकट दर्शनानंतर आपल्या एकंदरच इथल्या अस्तित्वाचा आणि उद्दिष्टांचा विचार करणे श्री समर्थांनी अभिप्रेत आहे. ते सोडून आपल्या उरलेल्या आयुष्यांत केवळ षडरिपुंच्या ताब्यात जात राहिलोत, क्षोभ करीत राहिलोत तर श्री शंकराचार्यांनी सांगितलेल्या " पुनरपी जननम, पुनरपी मरणम " याच चक्रात आपण भ्रमण करीत राहू. आपल्या या भ्रमंतीचा अंत होणार नाही.

मनी मानव व्यर्थ चिंता वहाते
अकस्मात होणार होऊनी जाते
घडे भोगणे सर्वही कर्मयोगे
मतीमंद ते खेद मानी वियोगे  II १७ II 


आपल्या ताब्यात नसलेल्या आणि आपण कुठल्याही प्रकारे ज्या गोष्टींवर अधिराज्य गाजवू शकत नाही अशा अनंत गोष्टी जगात असतात पण आपण त्या सर्वांसाठी खूप चिंता करीत असतो. किंबहुना आपल्यापैकी प्रत्येकाने जर स्वतःच स्वतःच्या मनाचे विश्लेषण केले तर असे लक्षात येईल की अशा निरर्थक चिंतेनेच आपल्याला व्यापले आहे. आपल्या मनाचा, बुद्धीचा क्षय होतोय तो केवळ असल्या चिंतांमुळेच. कर्माच्या सिद्धांतानुसार क्रियमाण - संचित - प्रारब्ध हा क्रम ठरलेला आहे. आणि इथे आपण प्रारब्ध भोगायलाच आलेलो आहे. ते पूर्ण भोगल्यावर जेव्हा आपल्या क्रियमाणांची वजा बाकी शून्य होईल तेव्हा आणि तेव्हाच आपल्याला या जन्ममरण चक्रातून मुक्ती मिळणार आहे. म्ह्णूनच वाईट कर्मे करायचीच नाहीत आणि चांगली कर्मेही आपल्याला चिकटून पुढल्या जन्माला कारण होऊ नयेत म्हणून " श्री कृष्णार्पणमस्तू " म्हणून त्या जगन्नायकालाच अर्पण करायची आहेत. त्यामुळे आपण ख-या आध्यात्मेकतेच्या प्रकाशात आपल्या जीवनाचा मार्ग आखत असताना मूढजनांप्रमाणे एखाद्या घटनेचा अती शोक किंवा एखाद्या वियोगाचा अती खेद मानणे सोडून दिले पाहिजेत.

मना राघवेवीण आशा नको रे
मना मानवाची नको कीर्ती तू रे
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे
तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे II १८ II 


म्हणून श्री समर्थ आपल्याला प्रभू श्रीरामचंद्रांवाचून इतर ठिकाणी आशा लावून देणे सोडून द्यायला सांगताहेत. ज्याची आस धरून राहिलो की लौकिक गोष्टींची हाव खुंटते आणि त्या परमपुरूषाचीच आस धरून आपले जीवन पैलपार व्हावेसे वाटते त्या राघवाची आशा धरायला काय हरकत आहे ? श्रीमद भागवतात म्हटल्याप्रमाणे ज्या परमात्म्याचे वर्णन सकल वेद, सकल शास्त्रे, सकल पुराणांनाही जमले नाही जो सर्व पृथ्वी, अंतरीक्ष, ब्रम्हांड व्यापूनही दशांगुळे उरलेलाच आहे त्याचे वर्णन आपल्या केवळ वाणीने कसे होईल ? तरीही केवळ त्याचीच आस धरून आपण आपल्या जीवनाचा मार्ग आखला पाहिजे.

                                                             II  जय जय रघुवीर समर्थ II 

Friday, January 22, 2016

मनाचे श्लोक - ५




मना सांग पा रावणा काय झाले
अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले
म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी
बळे लागला काळ हा पाठीलागी II १३ II 


खरेतर रावण हा केव्हढा (लौकिकदृष्ट्या) ऐश्वर्यसंपन्न विद्वान आणि पराक्रमी ! पण केवळ परस्त्रीच्या वासनेमुळे त्याने स्वतःचा विनाश ओढवून घेतला. स्वतःच्या मनाचे तर ऐकले नाहीच पण पत्नी, बंधू, प्रजाजन यांचेही न ऐकता आपल्यासोबत त्यांनाही विनाशाचे खाईत ढकलले. श्री समर्थ आपणास त्या उदाहरणावरून सावध व्हायला सांगताहेत. आज आपल्याकडे कितीही संपत्ती, सत्ता, सामर्थ्य असले तरी मन चांगले नसेल तर उद्या विनाश हा ठरलेलाच आहे. त्यामुळे मनाचा विचार करून मन शुद्ध ठेवून जगणे अतिशय महत्वाचे ठरते. 
श्री समर्थांनीच लिहून ठेवलेय की " यमाशी करूणा नाही ". कारण सर्वसत्ताधीश काळ हा कुणाकडूनही लाच घेत नाही, कुणासाठीही थांबत नाही आणि त्याचे काम सदासर्वकाळ चोख बजावत असतो. त्यामुळे आपल्या सत्तेचा, शक्तीचा, पैशांचा अहंकार काळापाशी चालत नाही. तेव्हा त्या्ची गती ओळखून सदाचरणात आयुष्य घालवावे हेच बरे.


जिवा कर्मयोगे जनी जन्म झाला
परी शेवटी काळमुखी निवाला
महाथोर ते मृत्यपंथेचि गेले
कितीयेक ते जन्मले आणि मेले II १४ II 


भारतीय अध्यात्म शास्त्रांनुसार अनेकानेक योनींमध्ये जन्म घेउन आपण पुन्हा मानव देहाप्रत जन्म पावत असतो. या मानवी देहातच आपणास चांगले काय ? वाईट काय ? हे ओळखून आपले कर्म निवडण्याचा विशेषाधिकार प्राप्त होत असतो. मनुष्यदेह (मानव जन्म) हा दुर्लभ मानला गेलेला आहे. हा जन्मात जर आपण आपल्या कर्मांद्वारे मुक्तीचा प्रयत्न करू शकलो नाही तर पुन्हा सगळ्या जन्माप्रत जाऊन पुढल्या मनुष्य जन्माची वाट पहाण्याशिवाय गत्यंतर नाही. आणि पुढल्या जन्मात तरी आपल्याला मुक्तीची आठवण राहील, त्या मार्गावर चालण्याची स्फ़ूर्ती होईल याची काय खात्री ? म्हणून जे काही साध्य करायचेय ते याच जन्मात. 

पण आपण याचा खोल विचार न करता Soloman Grandy सारखे केवळ जन्मतो आणि मरतो. त्या Soloman Grandy  ने काय केले ?  अमुक  on Sunday, तमुक  on Tuesday. आणि सरतेशेवटी died on Saturday and buried on Sunday. And that is the end of Soloman Grandy. तसे करू नका हे श्री समर्थ आपणास कळकळीने सांगताहेत. आणि त्याच बरोबर कितीही मोठा माणूस असला तरी मृत्यू हे अटळ सत्य आहे या जीवनाच्या क्षणभंगूरपणाची जाणीव श्री समर्थ आपणास करून देताहेत.


मना पाहता सत्य हे मृत्यभूमी
जितां बोलती सर्वही जीव मी मी
चिरंजीव हे सर्वही मानिताती
अकस्मात सांडूनिया सर्व जाती II १५ II 


या जगात मृत्यू हे अटळ सत्य आहे आणि आपला प्रवास जन्मानंतर निरंतर मृत्यूकडेच होत आहे हे सत्य एकदा डोळ्यांसमोर सतत असल्यानंतर मनुष्याचा पापाचरणाकडचा कल कमी होतो. 

दोन कथा आहेत. एक संसारी माणूस एका खूप प्रसिद्ध आणि निस्पृह अशा साधूला भेटायला त्याच्या आश्रमात गेला. त्याच्याकडे जाऊन आपल्यासाठी संसारोपयोगी काही रहस्ये शिकता आली तर बरे,  या भावनेने तो गेला. त्याच्या कुटीत प्रवेश करतो तो काय ? त्याने बघितले की त्याच्या कुटीत केवळ तुटपुंजे वाटावे आणि रोजच्या अत्यावश्यक गरजाही पु-या होऊ शकणार नाहीत इतकेच सामानसुमान होते. त्याला आश्चर्य वाटले. त्याने विचारले " बाबाजी आपले इतर साहित्य कुठाय ? " साधू म्हणाला " तुझेतरी  इतर साहित्य कुठाय ? " तो म्हणाला " अहो, मी इथे पाहुणा म्हणून आलोय ना. मग ? " त्यावर साधू हसत उत्तरला " अरे बाबा, मी सुद्धा इथे पाहुणा म्हणूनच आलोय. " या पृथ्वीतलावर वावरताना पाहुणा म्हणून आलोय याची जाणीव ठेवून वावरले की आपलेपणाच्या जाणीवेचा आपसूकच विसर पडतो आणि पापाचरणाकडचा कल आपसूकच कमी होतो.

संत एकनाथ महाराजांची कथा आहे. एक गृहस्थ त्यांच्या शांत संसाराचे रहस्य जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे आला आणि त्यांच्या खनपटीलाच बसला. महाराजांनी त्याला सांगितले " अरे, हे शांतपणाचे रहस्य वगैरे विचारण्यात वेळ घालवू नकोस. तुझी पत्रिका मी पाहिली आणि तुझा मृत्यू आजपासून बरोबर एका आठवड्याने आहे. तेव्हा आता निरवानिरव करून घे बाबा. "  तो मनुष्य घरी गेला. आता आठवडाभरात मृत्यू अटळ म्हटल्यावर त्याने शांतपणे सगळी निरवानिरव सुरू केली. सगळ्या नातेवाईकांना भेटला. आजवर काही चुका झाल्या असतील, दुःख दिले असेल तर माफ़ करा अशी क्षमायाचना केली. सगळी कर्जे चुकती केलीत. प्रेमळपणे पत्नी, मुले, सुना, नातवंडे यांचा निरोप घेतला आणि बापुडवाणेपणे मृत्यूदिनाची वाट पहात बसला. सांगितलेल्या दिवशी पुन्हा एकदा महाराजांचे दर्शन घ्यावे म्हणून तो संत एकनाथ महाराजांकडे गेला. महाराजांनी त्याला विचारले की बाबा, गेल्या आठ दिवसात किती वेळा राग द्वेष, कपट भांडणांची आठवण झाली ? तो म्हणाला महाराज " त्यांची कसली आठवण होतेय ? सतत मरण समोर दिसत असताना त्या क्षणभंगूर विकारांची संगत अजिबात नकोशी वाटली. " महाराज हसले आणि म्हणाले " अरे वेड्या. मग आम्हा संत मंडळींचेही तसेच आहे. आम्हाला नेहमी मृत्यूची आठवण असते आणि म्हणून हे क्षणभंगूर विकार नकोसे वाटतात. त्याची प्रचिती तुला यावी म्हणून हे मृत्यूचे खोटेच भाकीत मी आठवड्यापूर्वी केले. "


" मरणाचे स्मरण असावे. हरीभक्तीत सादर व्हावे. " हे श्री समर्थांनी लिहून ठेवलेय ते याच साठी.पण या सत्याचा जगरहाटीत विसर पडल्यावर आपण स्वतःला जणू काय इथे आपण कायम रहाणार आहोत असे मानतो आणि त्यादृष्टीने वागायला लागतो. पण काळाच्या सर्वशक्तीमानतेसमोर कुणाचेही चालत नाही आणि म्हणूनच त्याचे बोलावणे आल्यावर हातातली सगळी कामे टाकून जावेच लागते. इलाजच नाही.

 म्हणून या्च जीवनात उत्कर्षाचा उन्नतीचा मार्ग आपणच आपला साध्य केला पाहिजे. त्यासाठी आपले सदगुरू आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतील पण त्यावरून वाटचाल मात्र आपणच केली पाहिजे.


II जय  जय रघुवीर समर्थ II

Tuesday, January 12, 2016

मनाचे श्लोक - ४




सदा सर्वदा प्रीती रामी धरावी
दुःखाची स्वये सांडि जीवी करावी
देहेदुःख ते सुख मानीत जावे 
विवेकी सदा सस्वरूपी भरावे II १० II 

मनुष्यमात्राला दुःख का भोगावे लागते यावर श्री समर्थांनी आणि इतरही तत्ववेत्त्यांनी खूप विचार करून ठेवला आहे. किंबहुना संताच्या कार्याचा जन्मच हे जगतातले दुःख पाहून त्याच्या निवारण्याच्या तळमळीतून झाला आहे. मनुष्यमात्राच्या "देह म्हणजे आणि म्हणजेच मी"  या भ्रामक समजुतीशी त्यांचे सगळे दुःख जोडल्या गेले आहे. देहाला दुःख झाले की आपल्याला दुःख होते पण त्याच बरोबर देहाशी आपण आपल्याला जोडले की जास्त दुःख वाटते. अपमान झाला, उपेक्षा झाली की याच देहबुद्धीमुळे संताप येतो, दुःख वाटते. श्री ब्रम्हचैतन्य महाराज म्हणतात देह हा एकदा प्रारब्धाच्या ताब्यात आहे हे ओळखले की मग "मी म्हणजे देह नाही" ही भावना दृढ होते. आणि मग देहाशी संबंधित सुखदुःखांची आपल्याला बाधा होत नाही. आपल्या सगळ्यांचा स्वकर्तृत्वाचा अहंकार येव्हढा जबरदस्त असतो की आपणच आपल्या आयुष्य़ातले सर्वेसर्वा आहोत अशी समजूत करून आपण घेतो.

"प्रभू रामचंद्र माझे स्वामी आहेत, सर्वेसर्वा आहेत. माझ्या आयुष्यातले सगळे बरे वाईट प्रसंग केवळ त्यांच्याच इच्छेने येत आहेत" ही भावना दृढ झाली की कसले दुःख आणि कसले सुख ?  या अर्थाने श्री समर्थ आपणा सर्वांनी श्रीरामांप्रती प्रिती करायला सांगताहेत त्यामुळे देहाचे दुःख आणि सुख यात आपण फ़रक करणार नाही. श्री ब्रम्हचैतन्य महाराज छान दृष्टांत देतात. " दोन मुली भातुकलीचा खेळ करीत होत्या. एकीने पाहुण्यांसाठी श्रीखंड पुरी केली आणि दुसरीने साधासाच गुळांबा केला. एकीचा गुळांबा जसा पोट भरायला उपयुक्त नाही तसा दुसरीचा श्रीखंड पुरीचा बेतही उपयुक्त नाही " आयुष्याकडे या समदृष्टीच्या विवेकाने पाहण्याची शिकवण आपल्याला श्री समर्थ देत आहेत.

जनी सर्वसूखी असा कोण आहे
विचारे मना तूचि शोधूनि पाहे
मना त्वां चि रे पूर्वसंचित केले
तया सारिखे भोगणे प्राप्त झाले II ११ II 

या जगात सुखी माणसाचा सदराच नाही. जगात सर्वात सर्व अर्थाने सुखी असा कुणीही नाही. सर्वसुखी संतमंडळीच असतात. श्री समर्थ आपणा सर्वांना त्या समस्त सर्वसुखी माणसांच्या (संतांच्या) सौख्याचा धांडोळा घ्यायला सांगताहेत. ते सुखी आहेत कारण त्यांनी आपले सुख श्रीरामांसारख्या शाश्वत गोष्टींशी निगडीत केलेले आहे. आपण आपली सुखाची कल्पना भौतिक जगतातल्या नश्वर गोष्टींशी निगडीत केली तर शाश्वत सुख कसे मिळेल ? देहाशी संबंधित जी सुखदुःखे असतात ती आपल्या पूर्व कर्मांना अनुसरून असतात. चांगली कर्मे केली तर सुखस्वरूप चांगलेच फ़ळ प्राप्त होईल आणि वाईट कर्मांमुळे वाईट फ़ळांचा स्वीकार करावाच लागेल हा कर्माचा सिद्धांत एकदा स्वीकारला की मनाला शांती लाभेल.

मना मानसी दुःख आणू नको रे
मना सर्वथा शोक चिंता नको रे
विवेके देहेदुद्धी सोडूनि द्यावी
विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. II १२ II 

म्हणूनच श्री समर्थ आपणा सर्वांना विवेकाने विचार करून ही देहबुद्धी सोडायला सांगताहेत. "मी देह नाही" यावर दृढ विश्वास बसला की मग मनातल्या शोक, चिंता, दुःखांना पूर्णविराम मिळेल आणि मुक्ती मुक्ती म्हणजे तरी दुसरे काय ? "पुनरपी जननम पुनरपी मरणम" च्या फ़े-यातून सुटका तर आहेच पण ज्या विदेही पुरूषाला शोक चिंता उद्वेग, दुःख यांची जाणीवच नाही त्याला आयुष्यात मुक्तीच मिळाली असे म्हणावे लागेल. 

 II जय  जय रघुवीर समर्थ II

Tuesday, January 5, 2016

मनाचे श्लोक - ३



मना श्रेष्ठ धारिष्ट्य जीवी धरावे
मना बोलणे नीच सोशीत जावे
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे
मना सर्व लोकांसी रे नीववावे  II ७ II 


आपला व्यवहारातला असा अनुभव आहे की आपण सात्विकपणे वागायला गेलो की हे जग जणू आपली परीक्षाच पहायला येत असत. संत कबीराचा छान दोहा आहे.
" मुझे जो कराना था पथ पार
बिठाये उसपर भूत पिशाच्च
रचाये उसमे गहरे गर्न
और फ़िर करने आया जॉच.

त्यामुळे समर्थांच्या उपदेशानुसार सत्वगुणाच्या आश्रयाने आपण एकदा रज आणि तमोगुणांचा नाश करण्याचे ठरवल्यानंतर आपल्या निर्धाराची परीक्षा पहाणा-या गोष्टी घडू लागतात. अशा वेळी या सर्व त्या प्रभू श्रीरामचंद्राच्याच इच्छेनेच घडताहेत हे जाणून थोडा धीर साधकाने धरायला हवा. असे हे धारिष्ट्य आपण दाखवायला हवे आणि एखाद्या कुणाचे टोचून बोलणेही (अगदी विनाकारण असले) तरी दुर्लक्षित करून सोसायला हवे. श्री गजानन विजय ग्रंथात १९ व्या अध्यायात परमेश्वराकडे जाणारे विविध मार्ग, पट्टशिष्य बाळाभाऊंना समजावून सांगताना, श्री गजानन महाराज पण दुस-या कुणालाही न दुखावण्याचा, दुरूत्तरे न देण्याचा उपदेश करतात . "ही माझी परीक्षा आहे आणि प्रत्यक्ष परमेश्वर परीक्षक आहे."  हा भाव मनी असेल तर अशा घटनांचा मनावर फ़ार परिणाम आपण होऊ देणार नाही. आणि मग स्वाभाविकच एका साधकाच्या वागण्यात अकृत्रिम नम्रता येइल आणि तो सर्व जनांत प्रिय होईल. प.पू. ब्रम्हचैतन्य महाराज म्हणतात की " असे जनप्रियत्व असलेला भक्त मला फ़ार आवडतो."


देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी
मना सज्जना हेचि क्रिया धरावी
मना चंदनाचे परी त्वा झिजावे
परी अंतरी सज्जना नीववावे  II ८ II 



या जगात हा अशाश्वत देह सोडून केव्हा ना केव्हा परत जायचे आहे हे ठरलेच आहे. मग या जगात असेपर्यंत चांगलीच कर्मे का करू नयेत ? देहत्यागानंतर आपली चांगली कीर्ती मागे उरायला हवी. अशा पद्धतीची चांगली कर्मे आपल्या हातून झालीत तर हे जग सकल प्राणीमात्रांसाठी किती छान जागा होईल नाही ? श्री समर्थ आपल्या सगळ्यांना चंदनाप्रमाणे जनसेवेत झिजायचा उपदेश करताहेत. चंदन स्वतः झिजून झिजून गेले तरी ते सकल जीवांच्या सान्निध्यात आल्यावर, त्यांच्या कपाळी, अंगावर लागल्यानंतर त्या जीवाला शांत करणारा थंडावा प्रदान करीत असते. त्याप्रमाणे आपले सर्वांचे जीवन असावे असे श्री समर्थ आग्रहाने प्रतिपादन करताहेत. आपण जनसेवेत झिजलो तरी मनात याबद्द्ल गर्व नसावा उलट हे नित्यकर्तव्य समजून त्या सेवाकार्यायोगे सकल जीवांना आनंद प्रदान व्हावा असे आपले जीवन असावे असे श्री समर्थ सांगताहेत.

नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे
अती स्वार्थबुद्धी न रे पाप साचे
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे
न होता मनासारिखे दुःख मोठे  II ९ II



आज कलियुगात आपली भौतिक गोष्टींसाठी सगळी धाव हळूहळू हावेत बदलली आहे. अधिक हवे, अधिक हवे या हवेहवेपणाच्या शर्यतीत आपणा सर्वांच्या पापपुण्याच्या कल्पनाच बोथट होत जात आहेत आणि त्याची आपणा सर्वांना कल्पनाही नाही असे भीषण चित्र आहे.श्री समर्थ हे बघू शकत नाहीयेत आणि आपल्याला सावध करताहेत. आपल्या पूर्वजांचे काही तरी द्रव्य आपल्याला मिळावे अशी स्वार्थबुद्धी पापाला जन्म देते. आणि कर्माच्या सिद्धांतानुसार केलेले कर्म हे भोगावे लागणारच आहे. आपण कितीही सर्व दुनियेपासून लपून पाप कर्म केले असेल पण आपल्या अंतर्मनाला सगळे पाप पुण्य माहिती असतात. आणि म्हणूनच आपले मनच आपल्याला योग्य वेळी आपल्याही नकळत त्या कर्माची शिक्षा देत असते. जे कर्म केल्यावर आपले मन दुःखी कष्टी होते ते कर्म साहजिकच पापकर्म समजायला हवे आणि मनालाच दुःख होणारी पापकर्मे करू नयेत असे श्री समर्थ सुचवताहेत.

                                                             II जय  जय रघुवीर समर्थ II

Monday, January 4, 2016

मनाचे श्लोक - २



मना वासना दुष्ट कामा न ये रे
मना सर्वथा पापबुद्धी नको रे
मना धर्मता नीती सोडू नको हो
मना अंतरी साच वीचार राहो  II ४ II 

ह्या जगात मानवाच्या प्रकृतीधर्मानुसार त्याच्या वासना निर्माण होतात. तामस वृत्तींचे मनात प्राबल्य वाढले की वाईट वासना मनात जन्म घेतात. आता या वासना म्हणजे सदैव कामवासनाच असतात असे नव्हे तर " एखाद्याचे वाईट होऊ दे " असे वाटणे म्हणजेही दुष्ट वासनाच. या वासनांमुळे प्रत्येकाच्या मनात स्वाभाविकच असलेली नीरश्रीरविवेकबुद्धी नष्ट पावून तिथे पापबुद्धी उत्पन्न होते. श्री समर्थ आपल्याला उपदेश करताहेत की या वासना बाळगून भले होत नाही. आपल्या ईश्वरप्राप्तीच्या कार्यात या वासना सहाय्यकारी न होता उलट अडचणीच्याच ठरतात.
आपल्या अंतरात जर कुठले शाश्वत आणि काय अशाश्वत ही कल्पना स्पष्ट असेल तर नीतीधर्माचे शुद्ध आचरण आपल्याकडून होईलच. एकदा ठरले की प्रभू श्रीरामचंद्र आणि त्यांचे नाम हेच शाश्वत आणि बाकी सारे अशाश्वत की मग पापाचरणाकडे आपल्या मनाचा कल आपोआपच कमी होईल कारण पापाचरण म्हणजे काही मानवांचे स्वाभाविक आचरण नाही.

मना पापसंकल्प सोडूनी द्यावा
मना सत्यसंकल्प जीवी धरावा
मना कल्पना ते नको वीषयांची
विकारे घडे हो जनी सर्व ची ची  II ५ II 

श्री समर्थ पुढे मनाला पापसंकल्प त्यागण्याचा उपदेश करीत आहेत. एखाद्याने आपल्या मनाशी चांगला संकल्प केला तर सगळे विश्व त्याच्या सहाय्याला धावून तो संकल्प पुरा करण्यासाठी त्याची मदत करीत असते. त्यामुळे आपण सर्वांनी पापसंकल्प त्यागून सत्यसंकल्पाला आपलेसे केले पाहिजे. थोडक्यात तामसी वृत्ती त्यागून सात्विक झाले पाहिजे. (खरेतर सर्व शास्त्रे सत्व, रज आणि तम या तीनही गुणांना त्यागून त्यापलीकडे असलेल्या ईश्वरी तत्वाचा बोध करतात. " सत्वगुणे मारावे रज, तम ; मारा सत्वाने सत्व पूर्ण " हा आमच्या सदगुरूंचाही उपदेश आहे. श्रीमदभागवतात {अष्टम स्कंध, गजेन्द्रमोक्ष कथा} श्री भगवान हाच उपदेश करतात. पण पहिल्या पायरीसाठी तमोगुण त्यागून सत्वगुणाचा आश्रय घेणे भाग आहे.)

आपल्या मनात निरनिराळे विकार कसे उत्पन होतात याचा श्री समर्थांनी ४०० वर्षांपूर्वी विचार करून ठेवला आहे. निरनिराळ्या विषयांची कल्पना मनात उत्पन्न झाली की ती विकारांना जन्म देते. आणि विकारांमुळे आपले वागणे बेताल होऊन सर्व जनात आपल्यावर केव्हा ना केव्हा लज्जित होण्याची पाळी येतेच. कारण विषय हे कधीही पूर्ण न होणारे, कल्पनेसोबत विस्तारत जाणारे आणि म्हणूनच अपूर्ण आहेत. आज सायकल असली की स्कूटर हवी असते, स्कूटर असली की नॅनो असेल तर बरे असे वाटू लागते. नॅनो घेतल्यावर ए़क्स. यू. व्ही. घ्यावीशी वाटते आणि शेवटी मर्सीडीज घेतली तरी समाधान होत नाही हा तुमचा माझा अनुभव आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा २१ व्या शतकात सर्वात जास्त भयानक रोग म्हणजे मानसीक रोग असण्याचा अहवाल श्री समर्थांचे द्रष्टेपण अधोरेखीत करतो. या रोगावर औषध त्यांनी ४०० वर्षांपूर्वीच सांगून ठेवलेले आहे.

नको रे मना क्रोध हा खेदकारी
नको रे मना काम नानाविकारी
नको रे मना लोभ हा अंगिकारू
नको रे मत्सरू दंभ भारू    II ६ II 

श्री समर्थ केवळ रोगाचे वर्णन करूनच थांबत नाहीयेत तर ते रोग होऊ नयेत म्हणून काय सावधगिरी बाळगली पाहिजे यावर पण त्यांचे विवेचन आहे. क्रोध हा सर्व विकारांचा आद्य जनक आहे. " क्रोधात भवती संमोहः, संमोहात स्मृतीविभ्रमः, स्मृतीभ्रंशात बुद्धीनाशो, बुद्धीनाशात प्रणश्यती " हे श्रीमदभगवतगीतेच्या २ -या अध्यायात भगवंतांनी सांगून ठेवलेच आहे. क्रोध आवरण्याचा एकच क्षण पश्चातापाच्या अनंत क्षणांना वाचवू शकतो हे आपणास माहिती आहे आणि चांगलेच अनुभवाचे देखील आहे.

आज हे हवे, उद्या त्याहून अधिक हवे ही हवे पणाची जाणीव म्हणजे काम. या कामामुळेच नाना विकार आपल्या मनात निर्माण होतात कारण हव्याहव्याश्या वाटणा-या सगळ्याच गोष्टी आपल्याला प्राप्त होतीलच असे नाही. शिवाय प्राप्त झाल्यावर असलेल्या गोष्टीपेक्षा दुसरी गोष्ट जास्त महत्वाची आणि आवश्यक वाटायला लागते आणि या वाटण्याला अंत तो नाहीच. मग जी गोष्ट माझ्याजवळ नाही ती येनेकेनेप्रकारेण माझ्याजवळ असायलाच हवी हा लोभ मनात उत्पन्न होतो. आणि मला हवी असलेली गोष्ट मला न मिळता दैववशाने दुस-या कुणाला प्राप्त झाली असेल तर त्याचा आपल्याला मत्सरही वाटतो. श्री समर्थ या सर्व विनाशकारी बाबींचा मनाला त्याग करायला सांगताहेत. या सर्व विकारांचा सारासारविवेक बुद्धीने त्याग केल्यानंतरच मनाला खरे सौख्य लाभू शकेल.

                                                             II जय  जय रघुवीर समर्थ II

Friday, January 1, 2016

मनाचे श्लोक - १

नववर्षात मनाच्या श्लोकांविषयी थोडे लिहावे अशी इच्छा झाली. सदगुरू हे कार्य करवून घेवोत ही त्यांच्या चरणी प्रार्थना. 

मनाला उद्देशून पण सर्व सामान्य जनांसाठी श्री समर्थांनी हे २०६ श्लोक रचियेले. मनाचे श्लोक हा श्री समर्थांचा एक मोठा मानसशास्त्रीय प्रयोग आहे असे मनापासून वाटले. रोज याचे पठण करून (पठणात थोडं या श्लोकांच्या अर्थावर लक्ष केंद्रीत करून) याचा अनुभव जिज्ञासूंनी घ्यावा. 

श्री. सुनील चिंचोळकर, डॉ. यशवंत पाठक यांचे या विषयावरील लिखाण वाचले. श्री. विवेकजी घळसासी, प्राचार्य राम शेवाळकर यांची प्रवचने हा तर माझ्या प्रवासातला एक मोठ्ठा दीपस्तंभ म्हणून आहेतच. त्या सर्वांच्या शुभाशिर्वादाने हे कार्य सिद्धीस जावो ही प्रार्थना. इतर लेखनाप्रमाणे काही दिवसांनी हेच लेखन व्हॉटस ऍपवर कुठल्यातरी समूहावर निनावी म्हणून वाचायला मिळेल. त्याला इलाज नाही.




गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा
नमू शारदा मूळ चत्वार वाचा
गमू पंथ आनंत या राघवाचा      II १ II 

श्री समर्थांचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम. त्याच्या पंथावर चालण्याचा उपदेश करण्याआधी श्री समर्थ सगुण आणि निर्गुणाचाही आरंभ असलेल्या गणेशाला तसेच परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी या चारी वाणींचे जे उदगम स्थान आहे त्या शारदेला वंदन करताहेत. यातल्या " आनंत" शब्दाविषयी मला खूप औत्सुक्य आहे. हा शब्द म्हणजे प्रभू श्रीरामांचे अनंतत्व वर्णन आहे की या पंथावर आपण सर्वांनी अनंतकाळ चालत राहण्याचा श्री समर्थांचा उपदेश आहे ? 



मना सज्जना भक्तीपंथेची जावे
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे
जनी निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे
जनी वंद्य ते सर्व भावे करावे.     II २ II 

श्री समर्थांनी मनाला भक्तीपंथाचा उपदेश केला आहे. श्रीमदभगवतगीतेत १२ व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला नेमके हेच पटवून देतात. सर्व साधनांमध्ये होणारे कष्ट सोसून ईश्वरप्राप्ती करवून घेण्याऐवजी भक्तीपंथाच्या साध्या मार्गाने जाऊन तीच ईश्वरप्राप्ती होऊ शकेल असे भगवंतांनी प्रतिपादन केले आहे. अर्थात भक्तीमार्ग दिसतो साधा पण आचरणात आणायला कठीण आहे. इतर कर्मकांडे पाळली नाहीत तरी मनाची खूप पथ्ये पाळावी लागतात. म्हणूनच मनाला केलेल्या पहिल्या उपदेशातच श्री समर्थ भक्तीमार्गाचे प्रतिपादन करतात. " लोकाचारे वर्तावे " " अलौकिक नोहावे, लोकांप्रती" ही श्री समर्थांचीच भूमिका असल्याने ते मनाला लोकानुकूल वागण्याचा सल्ला देतायत. 

" जनाची नाही पण मनाची तर लाज बाळग " असे आपण म्हणतो. म्हणजे सर्वप्रथम सर्व लोकांनी जनांच्या प्रतिक्रियेचा विचार केला पाहिजे हे यातून अधोरेखित होते. काही महाभाग जनलाज खुंटीवर टांगून (फ़ाट्यावर वगैरे मारून) जगतात त्यांच्या साठी आपण उपरोल्लेखित म्हण वापरतो. पण श्री समर्थ जनांचा विचार करून वागण्याची मनाला शिकवण देताहेत. उगाच उफ़राट वागून आज स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याची जी प्रथा आलेली आहे, त्या विरूद्ध हा श्री समर्थांचा उपदेश आहे.

प्रभाते मनी राम चिंतीत जावा
पुढे वैखरी राम आधी वदावा
सदाचार हा थोर सोडू नये तो
जनी तोचि तो मानवी धन्य होतो.    II ३ II 

सकाळची वेळ विशेष असते. रात्रभराच्या शांत झोपेनंतर नवीन दिवसाची सुरूवात, नवीन कार्याप्रत जबाबदारीची सुरूवात छान आणि प्रसन्न व्हावी असे सगळ्यांनाच वाटत असते. उठल्या उठल्या इतर काही गोष्टींमध्ये मन घालण्याआधी सर्वप्रथम जर आपण प्रभू श्रीरामांचे स्मरण केले तर ? वैखरीतून दिवसभर आपल्या चरितार्थासाठी अनेक गोष्टी आपण बोलणार आहोत. पूर्णपणे संसारात गुरफ़टून जाणार आहोत पण त्या सर्वांच्या आधी प्रभू श्रीरामांचे स्मरण केले तर ते आपल्या कार्यात आपल्यासह सदैव असतील. आणि भगवंत सदा सन्निध असावा यावाचून एका भक्ताची काय अधिक अपेक्षा असावी ? हे मानवी जीवन धन्य होण्यासाठी सद आचरण सोडू नये हा उपदेशही श्री समर्थ मनाला करतात आणि दिवसभर सदाचरणासाठी प्रभू श्रीरामांचे सान्निध्य पाहिजे असेल तर सकाळी इतर व्यवहार सुरू करण्यापूर्वी त्याला प्रेमाने एकदा " राम " किंवा " श्रीराम " म्हणून हाक तर मारून बघूयात.

करायची मग उद्यापासून सुरूवात ?

                                                            II जय  जय रघुवीर समर्थ II