Wednesday, May 23, 2018

मनाचे श्लोक - ९


मना वीट मानू नको बोलण्याचा
पुढे मागुता राम जोडेल कैचा
सुखाची घडी लोटता सूख आहे
पुढे सर्व जाईल काही न राहे II २५ II


आजकाल आपण बघतोय की निःस्वार्थ बुध्दीने कुणाच्या हिताचे कुणाला सांगायला गेलो तर प्रथम त्या उपदेशकर्त्याच्या हेतूबद्दलच शंका उपस्थित लोक करतात. ज्या माणसाला हा उपदेश केला जातो त्याचा अहंकारही उपदेश ऐकण्याच्या व त्याला आचरणात आणण्याच्या आड येतो. उपदेशकर्त्याबद्दल "हा कोण लागून गेला टिक्कोजीराव ? याला काय कळणार ? ज्याचे जळते त्यालाच कळते." आदि विचार साधकाच्याही मनात येणे स्वाभाविक आहे. अशावेळी आपल्या हिताचे पण वेळप्रसंगी कटू बोलणे करणा-या हितचिंतकाचा साधकाला वीट येऊ शकतो. 

पण समर्थ परमार्थ मार्गावरील साधकांना सावधान करताहेत. ते सांगताहेत की अशा बोलण्याचा वीट येऊन उपयोग नाही. उलट अंतर्मुख होऊन त्या बोलण्याचा साधकाने विचार करावा आणि आपले हित साधून घ्यावे. आपल्या हिताचे आपण केले तर श्रीमदभगवद्गीतेत सांगितलेल्या स्वधर्मपालनाकडे आपली वाटचाल अधिक सुकर होत जाईल आणि राम जोडला जाईल. आपणच आपल्या अविचारी वागण्याने आपले अहित करण्याचे ठरविले तर आपल्यासोबत परमेश्वर कसा बरे जोडला जाईल ? समर्थांचा "विचार" , "विवेक" या शब्दांवर फ़ार भर आहे. साधकाने विचारांची, विवेकाची कास कधीही सोडू नये याबद्दल त्यांना फ़ार कळवळा आहे.

समर्थ पुढे साधकांना सांगताहेत की बाबांनो, या भौतिक सुखांसाठी विवेकाचा त्याग करून अप्रिय पण हितकर अशा उपदेशाचा वीट मानू नका. कारण या भौतिक जगातली सुखे क्षणभंगूर आहेत. सुख आणि दुःख यांचा सतत पाठशिवणीचा खेळ या जगतामध्ये सुरू असतो. त्यामुळे आजच्या क्षुद्र सुखासाठी विचारांचा, विवेकबुध्दीचा त्याग करू नका कारण तात्पुरत्या अशा भौतिक सुखांना काही कालावधीनंतर शून्य किंमत प्राप्त होत असते. 

आपण सर्वांनी हा प्रयोग करून पाहण्यासारखा आहे. गेल्या ३ ते ५ वर्षांपूर्वी ज्या एखाद्या गोष्टीची आपल्या स्वतःला प्रकर्षाने ओढ होती आणि ती वस्तू आपल्याला प्राप्त झाली याचे आज आपल्या लेखी सुख किती आहे ? याचा ठोकताळा प्रत्येकाने मांडावा म्हणजे समर्थांच्या वाक्याचा पडताळा येईल.


देहेरक्षणाकारणे यत्न केला
परी सेवटी काळ घेवोनी गेला
करी रे मना भक्ती या राघवाची
पुढे अंतरी सोडी चिंता भवाची II २६ II



आपण सर्वच जण आपल्या देहाची किती काळजी घेत असतो. त्याचे रक्षण व्हावे म्हणून सतत प्रयत्नरत असतो. पण देह कशासाठी ? मला लाभलेला देह हा साध्य आहे की साधन आहे या विवेकाचे आपल्याला विस्मरण होत असते. आजकाल तर आपण सर्वच चार्वाकाचे इतके अनुयायी झालो आहोत की त्याच्या "खाओ, पियो, ऐश करो" या उपदेशाला आपण फ़ारच गांभीर्याने घेतलेय. "देह चांगला टिकावा म्हणून देहाचे लाड" ही समजूत दृढ झालीय. "देश, देव आणि धर्मासाठी या देहाचा पुढे उपयोग होईल म्हणून देह चांगला टिकवला पाहिजे" ही समर्थांची शिकवण तर आपण विस्मृतीतच ढकलली आहे. पण आपण देहाचे कितीही लाड करा, त्या काळापुढे आपले काहीच चालत नाही. काळा, गोरा, खुजा, उंच, देखणा, कुरूप आदि सर्व देहांना कालाधीन होऊन पंचमहाभूतांमध्येच विलीन व्हावे लागते. तर मग या देहाचा सदुपयोग होण्यासाठी याच्या रक्षणाचा विचार का होऊ नये ? 

बरं, "देहाची उत्तम जोपासना केली की माणूस चिंतामुक्त झाला" असे म्हणता येईल का ? खचितच नाही. उलट सुंदर स्त्री पुरूषांनाच त्यांचे सौंदर्य चिरकाल कसे टिकेल याची चिंता सतावत असते. काही काळाने कुठे आपल्या सौंदर्यात उणेपणा तर येणार नाही ना ? ह्या चिंतेत ते बिचारे कायम असतात आणि पुन्हा त्यासाठी अपार प्रयत्न करीत असतात. अशा सर्व लोकांना समर्थ उपदेश करताहेत की "देह कशासाठी ?" "देह साध्य की साधन ?" हा विवेक पक्का झाला की देहाच्या जोपासनेसाठी प्रयत्न जरी केला तरी श्रीरामरायावर सर्व सोपवून भवाच्या चिंतेतून मुक्त व्हा. कसाही देह असला तरी तो साधन म्हणून जनसेवेत, ईश्वरसेवेत झिजवला तर या जन्माचे सार्थक आहे. देहाचे कौतुक नाही. तो काळाचा आहे. त्याच्याकडूनच घेतलाय, त्यालाच अर्पण व्हायचाय हे लक्षात ठेवून जगात वावरा.

भवाच्या भये काय भीतोसी लंडी
घरी रे मना धीर धाकासी सांडी
रघूनायकासारिखा स्वामी शिरी
नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी II २७ II


काही काही साधक या भवसागराची कायम भीती बाळगत असतात. अशा प्रसंगी मनमोकळेपणे जगणे, आपले नियत कर्म उत्कृष्टपणे पार पाडणे त्यांच्याकडून होणे दुरापास्तच. अर्जुनाची महाभारत युध्दाच्या वेळी जी अवस्था झाली तीच अवस्था. (वेपथुश्च शरीरे मे...)

अशावेळी समर्थ अगदी भगवान गोपालकृष्णांचाच अवतार धारण करून साधकांना समजावतात. याठिकाणी समजावताना समर्थांनी शिवीचाही वापर केलाय. भगवंत आपल्या लेकरांचा सदैव सांभाळ करतच असतो. कासवी जशी केवळ नजरेनेच आपल्या पिलांचे पालन पोषण करीत असते त्याप्रमाणे श्रीराम आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करीत नाहीत असा विश्वास ते साधकांना देताहेत. असा विश्वास एकदा असला म्हणजे साधकाची भीती कमी होईल, कालांतराने दूर होईल आणि साधक त्याचे नियत कर्म निःशंक मनाने आचरू शकेल असा समर्थांना विश्वास आहे.

                                                                        II जय जय रघुवीर समर्थ II

Tuesday, May 22, 2018

श्रीतुकोबांची गाथा - ९




ते माझे सोयरे सज्जन सांगाती I  पाय आठविती विठोबाचे II
येरा मान विधी पाळणापुरते I  देवाची ती भूते म्हणोनिया II
सर्वभावे झालो वैष्णवांचा दास I करीन त्यांच्या आस उच्छिष्टाची II
तुका म्हणे जैसे आवडती हरिदास I  तैशी नाही आस आणिकांची II

संतांना खरेतर आपपर भाव नसतो. हा माझा, हा परका ही धारणा त्यांच्या ठायी अगदीच नसते. पण या ठिकाणी श्रीतुकोबा आपणा सर्वांना त्या ईश्वराच्या नादी लागण्यासाठी हा कृतक कोप करताहेत. श्रीतुकोबा म्हणताहेत की जे लोक माझ्या विठोबाचे पाय आठवतात तेच माझे नाते्वाईक आहेत. इतरांशी श्रीतुकोबांचे नाते आहे ते केवळ ती सगळी भूते देवाचीच लेकरे आहेत म्हणून. श्रीतुकोबा सर्वाभूती भगवदभाव ठेवताहेत पण विशेष ममत्व मात्र वैष्णवांबद्दलच बाळगताहेत. याठिकाणी "वैष्णव" कोण ? तर संत नरसी मेहतांनी म्हटल्याप्रमाणे "वैष्णवजन तो तेणे कहिये, जे पीड परायी जाणे रे", दुस-यांचे दुःख आत्मौपम्य वृत्तीने (स्वतःलाच दुःख झाल्याप्रमाणे) जे जाणून घेतात ते वैष्णव.

श्रीतुकोबा पुढे म्हणतायत की असे जे वैष्णव आहेत त्यांचा मी सर्व भावाने दास झालो आहे. त्यांच्या उष्ट्याची आस मला आहे. साधू संत यांच्या मुखातून जे ज्ञान येत ते त्यांच उष्टच असत आणि ते ज्ञान मनुष्यमात्राला करे मार्गदर्शन करून त्याला भवपार करत असा श्रीतुकोबांचा सिध्दांत आहे. आणि म्हणूनच श्रीतुकोबांना अशा वैष्णवांची जशी आस आहे तशी इतरांची नाही.

तुमच्या माझ्या संसारात, व्यवहारात, आचरणात आपल्याला व्यवहारात जो उपयोगी पडेल तो आपला सोयरा हे आपले धोरण असते. पण या अभंगातून श्रीतुकोबा आपल्याला आपले खरे सोयरे कोण याचे मार्गदर्शन करताहेत.

निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम

जय तुकोबा माऊली.

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर  (२२०५२०१८)  

Sunday, May 13, 2018

श्रीतुकोबांची गाथा - ८



पाहतोसी काय I आता पुढे करी पाय II
वरी ठेऊ दे मस्तक I ठेलो जोडूनि हस्तक II
वरवे करी सम I नको भंगो देऊ प्रेम II
तुका म्हणे चला I पुढती सामोरे विठ्ठला II

श्रीतुकोबांचे विठ्ठलाशी एक वेगळेच नाते आहे. या अभंगात ते सख्यत्वाच्या भावनेने त्याच्याशी संवाद साधताहेत. ज्या विठ्ठल चरणांची आस तुम्हा आम्हा सर्व वारक-यांना असते, त्याची आस श्रीतुकोबांनाही आहे पण इथे सख्यत्वाच्या भावनेने ते त्याला आज्ञाच करताहेत, की "पाहतोस काय रे विठ्ठला ? चल, आता मी आलोय ना ? मग पाय पुढे कर पाहू. "

श्रीगजाननविजय ग्रंथात संत दासगणू महाराजांनी लिहील्याप्रमाणे महाराजांचे परम भक्त असे खंडू कडताजी पाटील ह्यांचे श्री गजानन महाराजांशी अशाच प्रकारचे संभाषण होत असे. "गण्या, गज्या म्हणे वाणी, परी प्रेम उपजे अंतःकरणी" असे वर्णन संतकवी दासगणूंनी केलेले आहे. ज्याठिकाणी प्रेम आहे त्याच ठिकाणी अशा स्वरूपाचा "अरे, तुरे" चा संवाद होत असतो हे दासगणू महाराजांनी सोदाहरण पटवून दिलेले आहे. आणि श्रीतुकोबांचे काय ? त्यांच्या तर सत्कर्माच्या खात्यात अगणित सत्कर्मे होती आणि त्यांनी त्या खात्याचा चेक कधीही फ़ाडला नव्हता. (आपल्या प्रापंचिक गोष्टींसाठी आपल्या इष्ट देवताला साकडे घालून सत्कर्माचा वापर केलेला नव्हता.) अशा धनवान ग्राहकासमोर त्या बॅंकरला नम्र व्हावे लागणे स्वाभाविक आहे हो.

श्री तुकोबा तसलाच हक्क विठ्ठलावर दाखवतायत. ते विठ्ठलाला त्याच्या सांप्रत अवताराची आठवण करून देताहेत. "बा विठ्ठला, तू गेल्या अवतारात त्रिभंग अशा स्वरूपाचा श्रीकृष्ण असशील. पण या अवतारात तू आम्हा भोळ्या भाबड्या वारक-यांचा विठू आहेस. त्यामुळे कृष्णावतारात असलेले तुझे वक्र पाय आता सरळ कर. तुझ्या या चरणांवर मला मस्तक ठेवू दे. मी तुझ्यासमोर हात जोडून उभा आहे. तुझे हे आमच्याठायी असलेले प्रेम भंगू न देण्याची जबाबदारी तुझीच आहे."

श्री तुकोबा देवाला तर सख्य भावनेने आवाहन करतायत. पण आजच्या काळात परमेश्वरापासून विन्मुख होऊन, अशाश्वत अशा प्रपंचात रममाण झालेल्या तुमच्या माझ्यासारख्या प्रापंचिकालाही आवाहन करताहेत की बाबांनो या अध्यात्ममार्गाच्या बारीत पुढे चला आणि काही वेळ तरी प्रपंचाला विन्मुख होऊन विठ्ठलाला सामोरे जा. चारशे वर्षांनंतर माणसे देवळात जाऊनही प्रपंच्याच्याच गोष्टी बोलत बसतील हे श्रीतुकोबांना त्याकाळीच उमजले होते एकंदरीत.

निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम
जय तुकोबा माऊली.

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर  (१३०५२०१८)  

Tuesday, May 8, 2018

मी ओळखीले मला पूर्ण आता ?.....

स्थळ : दोसा प्लाझा नागपूर

वेळ : सायंकालीन भुकेची

आम्ही आपला ऑर्डर देऊन पुढ्यात खाद्यपदार्थ येण्याची वाट बघतोय. बाजुच्या टेबलवर दोन विशीच्या आसपास असलेल्या कन्यका आणि त्यांच्या मोठ्या बहिणीसारखी दिसण्याची पराकाष्ठा करत असलेली त्यांची आई. आमचा ऑर्डर आत देऊन वेटर त्यांच्यापुढे उभा. 

मेन्युकार्डवर डोस्यांचेच १०४ प्रकार. इतरही १०० पदार्थ. प्रत्येकाचे १० प्रकार निराळेच. या तिघींचा प्रचंड गोंधळ चाललेला. आत्ता काय खावे ? त्यांची चर्चा अलिप्त राष्ट्र चळवळींच्या चर्चेसारखी, कुठल्याही निष्कर्षाप्रत न येता, त्याच त्याच मुद्यांभोवती गोलगोल फ़िरतेय. वेटर आता खरोखर "वेट"र वाटतोय. वाट पाहून पाहून तो कंटाळतोय आणि आमचा ऑर्डर आणायच्या निमित्ताने त्या कंपूपासून तात्पुरती का होईना सुटका करून घेतोय.

आमचा ऑर्डर आलाय. आम्ही खायला सुरूवातही केलीय. पण शेजारच्या टेबलवरचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये. मुद्दाम म्हणून लक्ष असे नाही पण ही मंडळी एव्हढ्या जोराजोरात बोलतायत की त्या २० बाय २० च्या जागेतली इतरही मंडळी त्यांच्याकडेच बघताहेत. 

बर पैशांचा प्रश्न नसावा. आम्ही आमच्या महाविद्यालयीन जीवनात (घरून अगदी मोजके पैसे येत असल्यामुळे) एखाद्या वेळी असे हॉटेलमध्ये गेलो, की उर्दू पद्धतीने मेन्युकार्ड वाचायचो. उजवीकडल्या किंमती अगोदर वाचून मग डावीकडे पदार्थाचे नाव वाचायचे आणि खिशाला परवडेबल तेच मागवायचे. पण असला प्रकार इथे नव्हता.

मग माझ्या लक्षात आले. हा सगळा प्रकार त्या अतीप्रचंड मेन्युकार्डमधील सर्वोत्तम पदार्थ मागवण्यासाठी होता. मग निवडीत गोंधळ उडणारच. कारण प्रत्येक पदार्थ त्या त्या वर्गवारीत सर्वोत्तमच होता. आपल्याला नक्की काय खायचे आहे ? याची कल्पना मनात निश्चित नसल्याने असला गोंधळ उडणे स्वाभाविक होते. मग अशावेळी रॉंग नंबर लागून भलताच पदार्थ पानात येण्याची नामुष्की होण्याची शक्यताच जास्त. शेजारच्यांना हे सगळे समजावून सांगण्याची इच्छा होती पण असला चोंबडेपणा तिथल्या मॅनर्स आणि एटीकेटसना विसंगत ठरला असता म्हणून गप्प बसलो.



जीवनातही असे प्रसंग खूपदा येतात. साधी कपड्यांची खरेदीच घ्या ना. मला अमुक अमुक रंगाचा, अमुक पॅटर्नचा शर्ट, पॅण्ट (किंवा पॅण्ट शर्टचे कापड) हवा ही धारणा मनात पक्की असली की खरेदी पंधरा मिनीटात आटोपते. 

पण "यापेक्षा दुस-या पॅटर्न मधे नाही का हो ?", "गुलाबीत अजून थोडा फ़िक्का शेड नाही का ?", "राणी कलरमधे अजून थोडा मॅजेंटा शेडवाला दाखवा ना." (हे आणि असले प्रश्न नक्की कुणाकडून येतात ? याचा अंदाज जाणकार वाचकांना आला असेलच) असली खरेदी तासभर तरी संपत नाही हे निश्चित. एव्हढही होऊनही बाहेर पडताना मनासारखा कपडा मिळाल्याचे समाधान क्वचितच मिळते. रंग, पोत, कापड छान असेल तर किंमतीत फ़सवले गेल्याची भावना, किंमत वाजवी असेल तर "आपण नक्की कॉटनच घेतल ना ? की कॉटनसारख दिसणार सिंथेटिक मटेरीयल त्या दुकानदारान माथी मारलय ?" अशी कुठली ना कुठली रुखरूख मनात असतेच असते. दुकानातली सर्वोत्तम वस्तू सगळ्यात कमी किंमतीला आपल्याला मिळालीय हे समाधान अती अती दुर्मीळ असत.

लग्नाच्या व्यवहारातही असेच अनुभव येतात. आपण भलेही सर्वगुण संपन्न, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा नसू पण मुलगी मात्र रतीप्रमाणे सुंदर, व्यवहारचतुर, कमावती आणि नम्र स्वभावगुणांची हवी असते. उलट बाजूनेही तसेच. सध्या अविवाहित असलेल्या मुलामुलींपैकी सगळ्यात उत्तम मुलगी / मुलगा मला मिळालीच पाहिजे या १०० टक्क्याच्या अट्टाहासापायी अनेक ९९-९८-९७ टक्केवाल्यांना नकार जातो आणि मग वास्तवाची जाणीव झाली तोपर्यंत फ़ार उशीर झालेला असतो. मग ६०-६५ टक्केवाल्यामध्ये (टक्केवालीमध्ये) ही ९०-९५ टक्के गुण शोधले जातात आणि लग्नाच्या गाठी बांधल्या जातात.

मी कोण ?, माझी कौटुंबिक पार्श्वभूमी काय ?, मला नक्की कुठल्या प्रकारचा जोडीदार आयुष्यभरासाठी हवाय ? या कल्पना स्वतःच स्वतःच्या स्पष्ट नसल्या, की असे घोळ होत असतात. मग ते खाण्याच्या पदार्थात काय ? किंवा कपड्यांच्या निवडीत काय ? किंवा आयुष्याच्या जोडीदार निवडीत काय ? तत्व एकच.

जगातले सर्वोत्तम ते मला मिळाव यापेक्षा मला काय मिळाल की माझ्यासाठी सर्वोत्तम होईल ? हा थोडा स्वार्थी विचार जास्त महत्वाचा नाही का ? शेवटी कवी सांगूनच गेलेले आहेत,

"मी ओळखीले मला पूर्ण आता, कशाला मला पाहणे आरसे ?
माझ्यापुढे नित्य आत्मानुभूती, पटावे दुजे तर्क आता कसे " 



Monday, May 7, 2018

माहूर - दत्त शिखर - माहूर आणि बसफ़ॅनिंग.

माहूरला गेलो की रेणुका शिखर सोबत श्री दत्त शिखर आणि अनुसया शिखर येथेही नेहमी जाणे व्हायचेच. गेल्या दोन तीन वर्षात श्री दत्त शिखर आणि अनुसया शिखर कडे जाणा-या रस्त्याचे काम सुरू असलेले दिसल्याने तिकडे जाण्याचा विचार टाळून रेणुका शिखरावरूनच दोन्ही पीठांना नमस्कार करून येत होतो.

यावेळी मात्र रस्ता ब-यापैकी झालेला दिसला आणि आम्ही या दोन्ही ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. दत्त शिखरवर आम्ही बालपणी जायचो ती माहूर-रेणुका-अनुसया शिखर-दत्त शिखर-माहूर ही लोकल फ़ेरी दत्त शिखरला उभी दिसणे हा एक आनंदाचा गाभा असतो. आमच्या बालपणी ’टाटा’च्या राज्यात वाढलेल्या आम्हा भावंडांना लेलॅंण्डच्या गाड्यांचे आणि त्यांच्या एंजिन फ़ायरिंगच्या आवाजाचे विशेष आकर्षण असायचे.



बालपणी नेहेमी माहूर गावातून गडावर आणि दत्त व अनुसया शिखरपर्य़ंत सोडणारी ही गाडी आमची लाडकी होती. त्यावेळी या गाडीच्या सतत फ़े-या सुरू असायच्यात. एका फ़ेरीने रेणुका शिखरपर्य़ंत येऊन पुढल्या फ़ेरीपर्य़ंत तिथेले दर्शन आटोपून आम्ही पुढल्या दोन्ही ठिकाणांसाठी रवाना होत असू. गाडीपण अनुसया शिखरला भाविक चढून उतरून परतेपर्य़ंत खाली वाट बघत उभी असायची. दत्त शिखरलाही भाविकांचे दर्शन होईपर्य़ंत ड्रायव्हर काकांचा तिथे नाश्ता (बहुतेक कढी-आलुबोंडा किंवा फ़ोडणीची खिचडी) होऊन जायचा. 





या वेळेसही ही गाडी तिथे उभी दिसली आणि आमचा आनंद गगनात मावेना. गाडी थांबवून, कुटुंब गाडीतल्या वस्तू (पाण्याची बाटली वगैरे) बाहेर काढेपर्यंत, अक्षरशः बसकडे धावलो आणि वेगवेगळ्या ऍंगलने फ़ोटो काढलेत. नागपूर कार्यशाळेत बनलेल्या थोड्या लेलॅण्ड गाड्यांपैकी ही एक गाडी. नांदेड विभागाचे व्यवच्छेदक लक्षण असलेले पिवळे ग्रील घेऊन भर उन्हात चमकत उभी होती. जुनी असली तरी व्यवस्थित निगा राखलेली ही गाडी आहे ही गोष्ट तिच्याकडे पाहूनच लक्षात येत होती.




पुलंना जसा प्रश्न पडला होता की "सगळे कल्हईवाले जाकीट का घालतात ? किंवा सगळ्या पानवाल्यांकडच्या कात्र्यांची टोके मोडकीच का असतात ?" तसा मलाही प्रश्न पडलाय की महाराष्ट्र एस. टी. तल्या सगळ्या लेलॅण्ड गाड्यांचे एक इंडिकेटर फ़ुटकेच का असते ?

बालपणी पुसद - दत्तशिखर - माहूर अशी टाटाची फ़ेरी असल्याचे आणि त्यात प्रवास केल्याचेही स्मरते. 



परतताना आर्वी - लातूर या, मी कधीही न पाहिलेल्या, रूटवरची (बहुधा हंगामी गाडी असावी) गाडी दिसली. आर्वी - पुलगाव - यवतमाळ - आर्णी - महागाव - उमरखेड - हदगाव - नांदेड - औसा - हमदपूर - लातूर या मार्गावरची ही गाडी. जशा नागपूर कार्यशाळेने फ़ार थोड्या लेलॅण्ड बांधल्यात तशा औरंगाबाद कार्यशाळेने फ़ार थोड्या टाटा गाड्या बांधल्यात. त्यातलीच ही एक. या (एम. एच. २० - बी. एल. ४२XX) सिरीजच्या बहुतांशी  गाड्या विदर्भात भंडारा विभागात मिळाल्यात. आर्वी आगाराला मिळालेली ही एक दुर्मीळ गाडी. 



आणखी एक दुर्मीळ गाडी. दारव्हा - आर्णी - माहूर हा कमी पल्ल्याचा मार्ग. या मार्गावर साधी गाडी न दिसता जलद गाडी दिसणे दुर्मीळच. त्यातही या सिरीजची (एम. एच. ४० -  ८७XX) ३ बाय २ आसनी व्यवस्थेची जुनी गाडी म्हणजे दुर्मीळच. ही सिरीज माझ्या आवडत्या सिरीजपैकी एक. ८६XX आणि ८७XX सिरीजमधल्या गाड्यांची बांधणी मजबूत होती. दिसायलाही या देखण्या होत्या. 

य. दारव्हा आगाराची जुनी पण तरीही देखणी गाडी.



आणखी एक नवीनच रूट बघायला मिळाला. हा सुद्धा हंगामी असावा. गडचिरोली - पुलगाव ही पुलगाव आगाराची गाडी. मार्गे चंद्रपूर - भद्रावती - वरोरा - जांब - हिंगणघाट - वर्धा - देवळी असावी. बोर्ड नीट वाचता आला नाही. हिंगणघाट - वायगाव - देवळी असा वर्धेला बायपास करणारा सरळ रस्ता असताना वर्धेला जाणे हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे असावे.



हा रूट मात्र अगदी आमच्या बालपणापासून आम्ही बघतोय. जवळपास ४० वर्षांपासून. राजुरा - पुसद. 

राजुरा डेपोची ब-यापैकी गाडी या रूटवर असते. राजुरा - बलारपूर - चंद्रपूर - भद्रावती - वरोरा - वणी - उमरी - यवतमाळ - दारव्हा - पुसद. टिपीकल चंद्रपूर विभागाचा बोर्ड आणि चंद्रपूर विभागाची सिग्नेचर असलेली  आकाशी ग्रील आणि आकाशी बंपर. 

दिल खुश हो गया रे.

Sunday, February 11, 2018

श्रीतुकोबांची गाथा - ७


करावी ती पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काम काय असे I
कळावे त्यासी कळे अंतरीचे, कारण ते साचे साचा अंगी I
अतिशया अंती लाभ किंवा घात, फ़ळ देते चित्त बीजा ऐसे I
तुका म्हणे जेणे राहे समाधान, ऐसे ते भजन पार लावी I

श्रीतुकोबांसारख्या संतांनी परमेश्वराच्या भक्तीमधल्या अवडंबराचा कायम विरोध केला आहे. कामेष्णा, वित्तेष्णा आणि लोकेष्णा (कामाविषयी अती आवड, धनाविषयी अती आवड आणि लोकांच्या मान्यतेविषयी अती आवड हे तीन ताप म्हणून आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहेत. मनुष्यमात्राला मुक्त होण्यापासून या तीन गोष्टी अडथळा करतात अशी मान्यता आहे.) या गोष्टी टाळून साधकांनी पुढे मार्गक्रमण करावे ही श्रीतुकोबांची तळमळ आहे. म्हणून ते म्हणताहेत की आपण किती पूजा, उपासना करतो, कशी करतो याचे प्रमाण आपल्या मनातच ठेवावे. लौकिक मानासाठी तिचे प्रदर्शन करू नये. 

शास्त्रांमध्ये तर मानसपूजेचेच महत्व वर्णिलेले आहे. शरीराच्या कसल्याही अवस्थेत, कसलेही बाह्य उपचार न लागणारी साग्रसंगीत पूजा, मानसपूजेच्या माध्यमातूनच पूर्ण होत असते. पण आजकाल आम्ही कशी मानसपूजा करतो हे सुद्धा दाखवण्याची फ़ॅशन येऊ पाहतेय. त्याकाळात हा श्रीतुकोबांचा उपदेश किती आवश्यक आहे बघा.

श्रीतुकोबा साधकांना सांगताहेत की आपल्या वैयक्तिक पूजेसंबंधी, वैयक्तिक साधनेसंबंधी गोष्टी लोकांसमोर उघड करणे आवश्यक नाही याचे कारण म्हणजे ज्या परमेश्वराला ते कळायचे आहे त्याला ते कळलेले आहे. ज्याच्यासाठी आपण ही सगळी आटाआटी, हे सगळे उपचार करतो आहोत, त्याला आपल्या अंतरीचा भाव लक्षात आला आहे आणि ते कळले आहे. सच्चा भाव एक सच्च्या परमेश्वराशिवाय कोण बरे ओळखू शकणार ?

"अती सर्वत्र वर्जयेत", एखाद्या गोष्टीचा अतिरेक करू नये हे आपल्या शास्त्रांनी आपल्याला सांगून ठेवलेले आहेच. श्रीतुकोबाही आपल्याला आपल्या उपासनेसंदर्भात हेच बजावून सांगताहेत. अती, किंवा खूप हट्टाने केलेल्या उपासनेची जशी चांगली फ़ळे असतात तशीच तीव्र स्वरूपाची घातकच फ़ळे मिळू शकतात कारण आपले चित्तात जर उपासनेचे बीज लावताना त्यामध्ये अपसंकल्पांची, बीजे लावल्या गेलीत तर फ़ळही त्याच स्वरूपाचे घातक मिळेल.

म्ह्णून श्रीतुकोबा आपल्या सर्व साधक मंडळींना ही लोकेषणा सोडून कळवळ्याने उपदेश करताहेत की बाबांनो ज्या साधनेने, उपासनेने समाधानी चित्त राहील ते साधन, ती उपासना दृढ करा. तीच तुम्हाला जीवनात उद्धरून नेईल आणि पैलतीराला लावून देईल.

निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम
जय तुकोबा माऊली.

प्रा. राम प्रकाश किन्हीकर  (११०२२०१८)  

Tuesday, February 6, 2018

एका विमानप्रवासाची क्षणचित्रे. कुर्सी की पेटी, उडान संख्या........... वगैरे.

काही काही हिंदी शब्दांचा उगम कसा झाला असावा याबाबत मला जाम म्हणजे जामच कुतुहल आहे. विमानप्रवासात ऐकू येणारा "कुर्सी की पेटी" हा शब्द त्यापैकीच एक. सीट बेल्ट ला कुर्सी की "पेटी" म्हणण्याचे काय कारण ? मला कळतच नाही. हल्ली सगळ्याच भारतीय व्यक्तींची प्रकृती सुदृढतेकडे वाटचाल करू लागल्याने "कुर्सी की पेटी बांध लीजिये" ऐवजी हवाई प्रवासात "कुर्सी को पेटी" बांध लीजिये असे म्हटले तर योग्य होईल असे मला कायम वाटत आले आहे.

या वेळी मुंबईचा प्रवास जाताना विमानाने आणि येताना दुरांतो एक्सप्रेस ने करण्याचे ठरले होते. पण भारतीय रेल्वे ने ऐनवेळी मुंबईतल्या मेगाब्लॉकचे निमित्त करून आमची दुरांतो इगतपुरीवरूनच सुटणार असल्याचे "शुभ" वर्तमान आदल्या दिवशीच कळवल्याने आमचा बेत रद्द करून परतीचेही विमानाचे तिकीट काढावे लागले. जाणे अत्यावश्यक होते. एका दिवसात मुंबईला जाऊन परतण्याचा हा माझा पहिलाच अनुभव.

आतापर्यंत विमानप्रवासाला तसा मी सरावलो होतो त्यामुळे पहिल्या विमानप्रवासात आले तसे प्रश्न येण्याची शक्यता नव्हती. मग सकाळी जाऊन दुपारी परतायचय तर माझ्या तिथल्या अभ्यासाला उपयुक्त अशी एक वही हातात पुरे असा प्रस्ताव मी मांडला. अर्थातच आमच्या घरी दोन विरूद्ध एक मतांनी तो फ़ेटाळला गेला. हातात वही फ़िरवत कॉलेजकुमारासारखे जाणे हे तितकेसे चांगले दिसणार नाही हे आमच्या कन्यारत्नाचे आणि तिच्या आईसाहेबांचे म्हणणे पडले. ( तरी मी विद्यार्थी म्हणून माझ्या आचार्य पदाच्या मार्गदर्शकांनाच भेटायला निघालो होतो हा भाग वेगळा. पण आमच्या घरात कोण माझे ऐकेल तर ना ?) शेवटी भवती न भवती करता करता एक हॅवरसॅक आमच्या पाठीवर आलीच. त्यात इतर आवश्यक गोष्टी म्हणून फ़ोनची पॉवरबॅंक, एक छोटा नॅपकीन, एक औषधांचा पाऊच आदि गोष्टी आल्यातच.

वेब चेक इन आणि बोर्डिंग पास अगोदरच घेतला असल्याने साधारण एक तास आधी विमानतळावर पोहोचलो. नागपूर विमानतळावर झालेले बदल आणि प्रवाशांची वाढलेली गर्दी नजरेत भरत होती. पूर्वी तळ मजल्यावरूनच सरळ टारमॅकवर आणि नंतर शिडीने विमानात बसण्याची सोय होती आता आधुनिक एरोब्रिज आलेत त्यामुळे पहिल्या मजल्यावर जाऊन तिथल्या प्रतिक्षागृहात थांबणे वगैरे क्रमप्राप्त होते.

तिथे अगदी महूद, औसा, माणगाव, पारोळा किंवा राजुरा बसस्टॅण्डची कळा होती. धूम्रपानाला मनाई असतानाही बाथरूममध्ये सिगरेट पिऊन सर्वत्र तो वास पसरेल याची काळजी घेणे, प्रवाशांना वाचनासाठी म्हणून मोफ़त ठेवलेल्या वर्तमानपत्रांमधली ५-५ वर्त्मानपत्रे उचलून "माझा दृष्टीकोन किती व्यापक आहे, बघा. मी सर्व मतांची वर्तमानपत्रे वाचतो." हे सहप्रवाशांना दाखवून देणे, स्वतःच्या मोबाईलमधल्य व्हॉटसऍपमध्ये आलेले व्हिडीओज जोरजोरात सर्वांना ऐकवण्याचे सामाजिन कार्य करणे असले सगळे प्रकार तिथे होतेच. फ़क्त कांबळ अंथरून काठी बाजुला आणि वाडग समोर असणारा एखादा भिकारी तिथे नव्हता. बाकी डिट्टो उपरोल्लेखित (बरेच दिवसांनी हा शब्द कामी आला) स्टॅण्डच. मोबाईल चार्जिंग पॉइंटससाठी प्रवाशांची चाललेली तगमग आणि लगबग पाहून १० वर्षांपूर्वी चेन्नई एग्मोर स्टेशनवर बघितलेल्या अशाच एका दृश्याची आठवण झाली. रात्रभर मोबाईल चार्ज न करता सकाळी सकाळी अर्धातास तर अर्धातास म्हणत विमानतळावर चार्ज करण्यात तेव्हढीच घरची वीज वाचवून विमानकंपन्यांचा वीजेचा खर्च वाढवण्याचा विचार असतो की काय ?

आता अस्मादिकही एक रिकामी जागा वगैरे बघून स्थानापन्न झालेत. बाहेर अजूनही मिट्ट काळोख असल्याने आणि आमच्यात आणि विमाने थांबण्याच्या जागेत एक काळ्या काचेचा भिंतवजा पडदा असल्याने विमानतळावर काय घडतय ते पहाण्याच्या आमच्या प्रयत्नांना म्हणावे तसे यश येत नाहीये. एक अगदीच चित्रविचित्र केस रंगवलेला "मधु मलुष्टे" उसनी बेफ़िकीरी मिरवत प्रवेश करतोय. वय १५ ते ८५ पर्यंत केस रंगवलेले पाहण्याची सवय झालीय पण हा मामला थोडा आगळावेगळा आहे हे विमानतळावर सगळ्यांच्याच लक्षात येतय. केसांवर बर्फ़ाचा शुभ्र रंग, लाल रंग, तांब्याचा रंग आणि जांभळ्यातली एक छटा घेऊन हा नटरंग उभा झाला इंदोरला जाण्या-या विमानाच्या रांगेत.

पाठोपाठ एक सुंदर खाशी नसली तरी सुबक ठेंगणी म्हणावी अशी ललना हातात कोकचा कॅन घेऊन, चेह-यावर मुळात नसलेला शिष्टपणा घेऊन, प्रवेशकर्ती झाली. माणस विमानप्रवासाला उगाचच बुजत, आपण फ़ार शिष्ट आहोत असा आविर्भाव दाखवत सामोरे जातात हे मला कळल. ही सुबक ठेंगणी आमच्याच विमानाच्या फ़लाटावर बसली त्यामुळे तिलाही मुंबईला जायचय हे कळल. आता आणखी एक सुट आणि त्याच्या अगदी मागोमाग अगदी झोपेतून उठून आल्यासारखा एक टी शर्ट आणि ट्रॅकसूट आला. विमानप्रवासासाठी मुद्दाम सूट घालून मिरवणे जेव्हढे निरर्थक तेव्हढेच ट्रॅकसूट नाहीतरी नुसतीच मोगली चड्डी (बर्म्युडा) घालून उसनी बेफ़िकीरी दाखवत फ़िरणेही तेव्हढेच निरर्थक हा विचार माझ्या मनाला चाटून गेला एव्हढच.

मघापासून अगम्य घोषणा सुरू आहेत. हिंदीकरणाच्या नादात ज्या माणसाने "फ़्लाइट नंबर अमुक अमुक" चे "ऊडान संख्या अमुक अमुक" करणा-या माणसानेच सगळ्या तामिळ गाण्यांच "कुची कुची रखमा" सारखी गाणी निर्र्थक हिंदीत भाषांतरीत केली असावीत अशी मला खात्रीच आहे.

आता उजाडू लागल्यामुळे आमच्याआधी इंदोरमार्गे दिल्लीला जाणारे इंडिगोचे विमान दिसू लागलेय. पाठोपाठ आमचेही एअर इंडियाचे एअर बस ए ३१९ जातीचे विमान फ़लाटावर लागतेय. दरम्यान एका पॅसेंजरच्या नावाची उदघोषणा इंडिगोकडून दोनतीनदा होतेय आणि आमच्या मागच्याच रांगेत असलेला एक ऍबसेंट माइंडेड तरूण धावतपळत विमानात बसण्यासाठी जातोय. सगळ्यांची तेव्हढीच करमणूक.

दरम्यान एअर इंडियाचीही विमानात बसण्यासाठी उदघोषणा होतेय. सुखद बाब अशी की सैनिक, सेवानिवृत्त सैनिक, ज्येष्ठ नागरीक यांना प्राधान्याने बसू देण्याची विनंती आणि व्यवस्था होतेय. अगदी छान बाब. यासाठीतरी एअर इंडिय़ा टिकली पाहिजे, राव.

विमानात बसताना मुद्दाम उजवीकडल्या खिडकीची जागा मागून घेतली होती. मुंबईत उतरल्यानंतर पूर्ण विमानतळाचे दर्शन उजवीकडूनच होते हा माझा अनुभव. हल्ली देशांतर्गत विमानप्रवासासाठी विमानात बसल्यानंतर पेपरमिंटस, चॉकलेटस वगैरे देणे बंद केलय हे माहिती होत. लक्षमणराव देशपांडेंच "व-हाड" आठवल. "मला अकरा मिळाले" आठवल आणि हसू आले. विमान सुटण्याची वेळ झाली आणि हवाईसुंद-यांची "कुर्सी की पेटी" बांधून दाखवण्याची, पाण्यावर विमान उतरले तर काय करायचे याची नित्य नैमित्तिक प्रात्यक्षिके सुरू झाली. इतके विमानप्रवास झालेत पण दरवेळी हा कार्यक्रम सुरू झाला की माझ्या डोळ्यांसमोरून  वर पाहिलेल्या National Geographic च्या "Air Crash Investigations" डॉक्युमेंटरीज क्षणात तरळून जातात. एखादेवेळी आपल्या सीटच्या खाली ते लाइफ़जॅकेट आहे की नाही हे पाहण्याचा मोहही होतो. पण दोन रांगांमधल्या इतक्या कमी जागेत डोक खाली जाऊन ते बघता येईल याची खात्री नाही हो.


विमानाने झेप घेतली. मी मात्र न लाजता काचेला नाक आणि कॅमेरा लावून बसलो होतो. मधल्या काळात खाण्यासाठी पदार्थ आलेत. जितपत ठीक असावेत तितपतच ठीक होते. ते आटोपून मी पुन्हा बाहेर बघायला लागलो. दुरून शहरे, जलाशये, कालवे नद्या दिसत होते. कुठे ओळखीच्या खुणा दिसतायत की काय ? ते बघत होतो. वरून बघताना सगळी शहरे अनोळखीच दिसतात. मग विमानाच्या दिशेवरून आणि आत्तापर्यंत झालेल्या वेळावरून शहरांचा अंदाज बांधणे सुरू होते. १० मिनीटांनी लागलेले बहुतेक अमरावती, अर्ध्या तासाने लागलेले बहुतेक जालना किंवा औरंगाबाद. मनात सगळे तर्क सुरू. विमान हळूहळू सुंदर सह्याद्रीच्या रांगा ओलांडू लागले. अमेरिकेत जसे सगळ्या प्रसिद्ध राष्ट्राध्यक्षांच्या प्रतिमा डोंगरात कोरून ठेवल्यात तसे असलेले डोंगर. आणि हळूहळू उतरण्याची तयारी सुरू झाली. पनवेल, वाशीचा पूल आणि घाटकोपरचा इस्टर्न एक्सप्रेसवे वगैरे ओळखीच्या खुणा दिसत मुंबईच्या विमानतळावर आम्ही उतरलो. एअर इंडियाची विमाने आता टी-३ टर्मीनलला नेतात. आजवर खूप ऐकलेल्या, खूप मित्रांच्या फ़ेसबुकवर बघितलेल्या टर्मिनलवर उतरलो आणि जाणवल की हे खरोखर आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे. खूप छान आहे. विमानतळावर उतरल्यावर टॅक्सीच केली पाहिजे या भीडेला मी आता मुरलो होतो. सरळ खाली येऊन बेस्टची बस पकडली आणि पुढल्या १५ मिनीटांत आमच्या महाविद्यालयात अभ्यासासाठी हजर.



मुंबईतले माझे पी. एच. डी चे काम आटोपले. मित्रमंडळी, नातेवाईक अगदी ठाण्याला, नवी मुंबईत वगैरे राहतात. त्यांच्याकडे जाऊन परतणे शक्य नव्हते. इतरही काही उद्योग नव्हते मग पुन्हा विमानतळाचा रस्ता (पक्षी : बेस्टची बस) पकडला. तब्बल दोन तास आधी विमानतळावर येऊन बसलो. बोर्डिंग पास वगैरे आधीच घेतलेला होती आणि पाठीवर हॅवरसॅकशिवाय काहीच नव्हते. म्हटल आजवर बस आणि रेल्वे फ़ॅनिंग केलेय आता फ़्लाईट फ़ॅनिंग करूयात.

आता संध्याकाळची फ़्लाईट टी-१ वरून होती. इथून सध्या देशांतर्गत उड्डाणांपैकी गो एअर, स्पाईसजेट आणि इंडिगोची विमाने उडतात आणि उतरतात. ह्या टर्मीनलचा अवतार महाराष्ट्रातल्या कुठल्याही बसस्टॅण्डला लाजवेल असा आहे. प्रवाशांनीच केलाय. विमानकंपन्या तरी काय काय करणार ना ? मी पुन्हा वरच्या मजल्यावरच्या कॅफ़ेत गेलो. खाद्यपदार्थांच्या किंमती डोळे फ़िरवणा-या होत्या आणि दुपारच्या जेवणामुळे भूकही नव्हती. कोकचा एक कॅन घेऊन काचेजवळच्या टेबलावर बसलो. पुढले दीड तास तोच कोक पुरवून पुरवून पीत मुंबईत उतरणारी, आमच्या समोरील फ़लाटांवर लागणारी विमाने निरखून बघत होतो. एव्हढ्या वेळात एअरबस आणि बोईंग विमानांमधला फ़रक निरीक्षणाने जाणून घेतला. एअरबसमध्येही ३१९ जातीची कुठली आणि ३२० जातीची कुठली यातला फ़रक ओळखायला शिकलो.



संध्याकाळचे जसे साडेसहा वाजायला आले तसे माझ्या फ़लाटावर गेलो. तिथे बरीच गर्दी विमानाची वाट बघत. दरम्यान "गो एअर" चे मेसेजेस सुरू झाले. १५ मिनीटांत प्रत्येकाला २५ मेसेजेस आल्याने माझ्यासकट बरीच प्रवासी मंडळी वैतागली. तिथल्या काऊंटरवर असलेल्या तरूणाला विचारपूस कम खडसावणे सुरू झाले. विमानाचा मात्र पत्ताच नव्हता. हे विमान म्हणे बंगलोरवरून येत आणि लगेच नागपूरसाठी निघत. मुंबईच्या आकाशात आणि धावपट्टीवर विमांनाची गर्दी असल्याने त्या विमानाला उशीर होत होता.

शेवटी संध्याकाळी ६.५० ला उडणारे विमान रात्री ८ वाजता आले. चढण्यासाठी आडगावच्या स्टॅण्डावर एस. टी. त चढायला जेव्हढी गर्दी होते तेव्हढीच आणि तशीच गर्दी झाली. फ़क्त विमानकंपनीने उतरणा-या माणसांना पहिले उतरू दिल्याने नेहमीचे डॉयलॉग्ज "अरे, अरे अरे... उतरणा-याला उतरू दे, उतरणा-याला उतरू दे." " उतरू दे काय ? जागा मिळत नाही मग. चला हो आत. ओ, मास्तर, रिझवेशन आहे का ?" हे सगळे संवाद टाळत त्याच ष्टाईलने सगळी मंडळी विमानात चढली. हे एअरबस ए-३२० विमान होते. आत १८० जागा. अगदी अडचणीच्या. खिडकीजवळ बसणारा माणूस एकदा आत गेला की "गेलाय तर खरा, निघू शकतो की नाही कुणास ठाऊक ?" अशा अवस्थेतल्या सीटस.

पुन्हा एकदा निघण्याच्या आधीच्या कवायती सुरू झाल्यात. पुन्हा एकदा मी खिडकीपाशी आणि काचेला नाक लावून. मुंबईच्या विमानतळावरील मार्गिकांमधून वाट काढत विमान धावपट्टीवर यायला तब्बल ४० मिनीटे लागली. मुंबापुरी दिव्यांनी लुकलुकताना खूप छान दिसते. पुन्हा मग खालचे लुकलुकणारे दिवे बघून खाली कुठले शहर गाव असेल याचा अंदाज सुरू झाला. विरारची जीवदानी देवी मी नक्की ओळखली. विमानात सुरूवातीला विमान कर्मचा-यांनी खाण्यापिण्याचे पदार्थ विकायला सुरूवात केली. गगनाला भिडलेल्या किंमती पाहून त्यांना फ़ारसा प्रतिसाद नव्हताच. मग "मर्कंटाइल" या गोंडस नावाखाली पॉवर बॅंक्स, गॉगल्स इत्यांदींची विक्री त्यांनी सुरू केली. मला एकदम डेक्कन क्वीन, पुणे इंटरसिटी इत्यादी प्रवासात विकायला येणारे फ़ेरीवाले आठवलेत. इथे जमिनीपासून ३६००० फ़ुटांवर या फ़ेरीवाल्यांना मिळणा-या प्रतिष्ठेत आणि जमिनीवरच्या फ़ेरीवाल्यांना मिळणा-या प्रतिष्ठेत जमीन अस्मानाचा फ़रक असणारच ना.

नागपूर आल्यावर जाणवल की रात्री आपल नागपूरपण मुंबापुरीइतकच किंबहुना काकणभर सरसच सुंदर दिसतय.विमान कंपनीने उशीर झाल्याबद्दल व्यक्त केलेली दिलगिरी सहर्ष स्वीकारत तब्बल रात्री दहा वाजता नागपूर विमानतळावर उतरलो तेव्हा आजच्या अनुभवांच खूप गाठोड जमा झाल होत. शरीराने थकलो होतो पण मन प्रफ़ुल्लित होते.









Sunday, February 4, 2018

श्रीतुकोबांची गाथा - ६



अवघा तो शकुन, हृदयीं देवाचे चरण ॥
येथें नसतां वियोग, लाभा उणें काय मग ॥
संग हरिच्या नामाचा, शुचिर्भूत सदा वाचा ॥
तुका म्हणे हरिच्या दासां, शुभकाळ अवघ्या दिशा ॥

विसावे शतक हे विज्ञानाचे आणि एकविसावे ते तंत्रज्ञानाचे म्हणून ओळखले जाते. दररोज नवनवीन शोध लागताहेत. मनुष्य जीवनाला सुकर सोपे बनविणारे तंत्रज्ञान आज सर्वत्र परिचित आणि रूढ झालेले आहे. त्याचसोबत आज दूरदर्शन, फ़ेसबुक व्हॉटसऍप समाजमाध्यमांचा सुळसुळाट झाला आहे. या माध्यमांव्दारे विज्ञानाचा प्रचार प्रसार कितपत होतो ते ठरवणे जरी कठीण असले तरी त्यातून अंधश्रद्धेचा प्रचार आणि प्रसार भरपूर होतोय हे तरी नक्की. गेल्या ३० वर्षांपूर्वी फ़ारशा प्रचलित नसलेल्या मुहूर्त, शकून अपशकून, दिशाशास्त्र, फ़ेंगशुई, वास्तूशास्त्र, कसले कसले तांत्रिक तोडगे यांनी आज अगदी धुमाकुळ घातलाय. आणि एखादी गोष्ट वारंवार मनावर बिंबवली गेली की त्यावर समाज विश्वास ठेवतो या गोबेल्स प्रचारसुत्रानुसार आपण त्या सर्व भाकड उपायांवर विश्वासही ठेवायला लागतो.

४०० वर्षांपूर्वी श्री तुकोबा काय म्हणताहेत ते बघा. ज्याच्या हृदयात परमेश्वराचे चिंतन सतत आहे त्याला कसला शकून आणि कसला अपशकून ? त्या भक्ताला भगवंताचा वियोगच घडत नाही मग त्याला मिळणा-या लाभात काय बरे कमी होईल ? जो आपल्या आराध्य दैवतापासून विभक्त नाही तो भक्त अशीही एक व्याख्या भक्ताची केली जाते.

ज्या भक्ताची वाचा सतत हरीनामाच्या उच्चारात आहे त्याला अधिक शुचिर्भूतता, सोवळे ओवळे काय शिकवायचे ? तो सदाच शुचिर्भूत अवस्थेत आहे. सदाच सोवळा आहे. आणि म्हणूनच श्रीतुकोबा कळवळ्याने सांगताहेत की बाबांनो, ख-या भगवत्भक्ताला कुठलाही काळ हा शुभकाळच आहे. आणि सगळ्या दिशा शुभच आहेत.ते सांगताहेत की बाबांनो, भगवंताच्या भक्तीसाठी किंवा कुठल्याही चांगल्या हेतूने करण्याच्या कार्यासाठी अनुकूल मुहूर्त, दिशा इत्यादी पाहत बसू नका. चांगले कार्य करा. सगळेच शुभ आहे.

आज आपण या समाजमाध्यमातून आपल्यावर होणा-या अंधश्रद्धेच्या मा-यातून बाहेर येण्यासाठी मोठ्या निर्धाराने श्रीतुकोबांचा हा उपदेश आचरणात आणायला हवा आहे.

निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम
जय तुकोबा माऊली.

प्रा. राम प्रकाश किन्हीकर  (०४०२२०१८)  

Wednesday, January 31, 2018

ब्लॉग लेखनाचा माझा प्रवास.

२००६ पर्य़ंत संगणक वापराचे अगदी जरूरीपुरते शिक्षण घेतलेल्या माझ्यासारख्या एका शिक्षकाला इंटरनेट हे केवळ ऐकूनच माहिती होते. पण नागपूरला आल्यानंतर रामदेवबाबा महाविद्यालयात डॉ. खापरेंसारखा मित्र आणि या क्षेत्रातला जाणकार मार्गदर्शक लाभला आणि आमची गाडी सुसाट सुटली. सुरूवातीला ऑरकूट नंतर फ़ेसबुक या समाजमाध्यमांच्या व्दारे व्यक्त व्हायला लागलो आणि ते खूप एन्जॉयपण केल. त्याचबरोबर या माध्यमांची स्वतःची असलेली मर्यादाही कळली. काही चांगले ब्लॉग्ज वाचनात आलेत आणि आपणही व्यक्त व्हायला हे माध्यम निवडावे असे ठरवून २००८ च्या डिसेंबरमध्ये "मी एक प्रवासी पक्षी" या ब्लॉगला सुरूवात केली. हे नाव ठेवण्यामागेही एक कथा होती.

पहिली पोस्ट लिहीली आणि लगेचच ४ पोस्ट टाकल्यात. पण वाचकांचा रिस्पॉन्सच येईना. आकडेवारीत रमणारा माणूस असल्याने ब्लॉगला १०० वाचक कधी मिळतात याची आतुरतेने वाट बघत होतो. तेव्हा ऑरकुटसारख्या इतर समाजमाध्यमांवर ब्लॉगपोस्टची लिंक कशी शेअर करावी याचे ज्ञान नव्हते म्हणून मग मित्र, नातेवाईक इत्यादींना ब्लॉगची लिंक मेसेजव्दारे पाठवायला सुरूवात केली. खूप थोड्या लोकांनी ब्लॉग वाचला, ब-याच जणांनी टिंगलटवाळी केली आणि काहींनी तर माझा नंबरच ब्लॉक करून टाकला. 

२००९ पण लेखनाच्या बाबतीत तसे विशेष गेले नाही. सुरूवातीला ब-याच पोस्टस इंग्रजी भाषेतच होत्या. मराठी लेखनाचा शोध जवळपास २ वर्षांनी लागला. आणि मग आमचा वारू चौखूर उधळला. १०० वाचक मिळवायला जवळपास वर्ष लागले तर ५०० वाचकसंख्या गाठायला २ वर्षे.

२०११ मध्ये ब-यापैकी लिखाण झाले. मग नोकरीनिमित्त सांगोला (जि. सोलापूर) आणि शिरपूर (जि. धुळे) यथे वास्तव्य झाले. निमशहरी, ग्रामीण महाराष्ट्र जवळून बघता, अनुभवता आला. अनुभवसमृद्धी आली आणि मग बस आणि रेल्वे फ़ॅनिंगसाठी असलेला माझा ब्लॉग सामाजिक, वैयक्तिक जाणीवांनाही व्यक्त करू लागला. २०१२ मध्ये तब्बल २७ पोस्टस झाल्यात. दरम्यान वाचकसंख्या घातांकिय श्रेणीने (Exponentially) वाढत असल्याचे मी अनुभवत होतो. हळूहळू वाचकांचीही पसंतीची पावती मिळू लागली होती.



२०१३, २०१४ आणि २०१५ मध्ये लिखाण फ़ारसे झाले नाही तरी फ़ेसबुकसारख्या माध्यमाव्दारे ब्लॉगच्या प्रसाराची ताकद कळली होती त्यामुळे वाचकसंख्य़ा सतत वाढत होती. २०१६ त छान लिखाण झाले. अगदी ठरवून लेख लिहीलेत. २०१७ त पूर्वार्धात व्यावसायिक आयुष्यातली मरगळ लिखाणात उतरली. उत्तरार्धात पुन्हा सगळे स्थिरस्थावर झाल्यावर मग चांगले लिखाण झाले.

२०१८ त सुरूवातीपासूनच थोडा कल धार्मिक लेखनाकडे झुकू लागत असल्याचे माझे माझ्याच लक्षात आले. म्हटल या वर्षी ही वाटही चोखाळून पाहुयात. म्हटल बघुयात किती नियमीत लेखन आपल्या हातून होतय ते. 

२०१८ गाठल्यागाठल्या पाऊणलाख वाचकसंख्या गाठली. सगळेच ब्लॉग्ज मी मनस्वी पद्धतीने लिहीलेत. मनात येईल ते आणि तसे सगळ्यांसमोर मांडत गेलो. सगळेच ब्लॉगपोस्टस माझ्या आवडीचेच आहेत. पण तरी त्यातले निवडक पोस्टस आपल्यासाठी पुन्हा एकदा.


२. आता आवडीचा पुरवावा सोहळा. पंढरपूरच्या एका कार्यक्रमात शौनक अभिषेकेने गायलेला अभंग ऐकणा-या गिन्याचुन्या श्रोतृवर्गात आम्ही सामील होतो. मग त्या ओळींवर चिंतन सुरू झाले आणि त्याचा परिपाक म्हणजे हा लेख.

३. माझे महाराष्ट्राचे अनुभव. पक्का वैदर्भी असलो तरी महाराष्ट्रावर माझे प्रेम आहेच.

४. एका शोधाची कथा. स्वतः संशोधन करून निष्कर्ष काढलेत.

५. माझी सगळ्यात लोकप्रिय पोस्ट. विदर्भतून विदर्भ.


वाचक मित्रांनो. असाच लोभ सतत राहू द्यात हेच मागणे. एक लक्ष वाचकसंख्या या वर्षाअखेर गाठेन असा आत्मविश्वास आहे. 

Sunday, January 28, 2018

श्रीतुकोबांची गाथा - ५




न ये जरी तुज मधुर उत्तर,  दिधला सुस्वर नाही देवे II
नाही तयाविण भुकेला विठ्ठल,  येईल तैसा बोल रामकृष्णा II
देवापाशी मागे आवडीची भक्ति,  विश्वासेशी प्रीति भावबळे II
तुका म्हणे मना सांगतो विचार  ध्ररावा निर्धार दिसें दिस. II

गोड गळा, सुस्वर गायन ही एक ईश्वरी देणगी असते. ती सगळ्यांनाच मिळते असे नाही. म्हणून भक्तांनी मनात खंती होऊ नये हे श्री तुकोबा या अभंगात सुचवताहेत. ते सांगताहेत, "बाबारे, तुला जमेल तसे त्या भगवंताचे, विठ्ठलाचे भजन कर बर." ख-या भक्तीने, भावपूर्ण रीतीने भजन केले की ते श्रोतृवृंदांच्या काळजाला भिडतेच हा तुमचा माझा अनुभव आहे. त्या ठिकाणी त्या गायकाकडे गायनकला किती आहे ? त्याला किंवा तिला स्वरांचे किती ज्ञान आहे ? हे सगळे प्रश्न अप्रस्तुत ठरतात. श्री तुकोबा म्हणताहेत की हेच भावपूर्ण गान त्या विठ्ठलालाही नक्की आवडेल. 

परम पूजनीय बापुराव महाराजांकडे दर गुरूवारी भजनाची परंपरा परम पूजनीय नाना महाराजांनी सुरू केलेली आहे आणि गेली ७० वर्षे ती त्यांच्याच कृपेने अखंड सुरू आहे. मला एकदा आमच्या सदगुरू, परम पूजनीय मायबाई महाराजांनी, गुरूवारच्या दरबारात भजन म्हणण्याची आज्ञा केली. तेव्हा मी त्यांच्याजवळ हीच खंत बोलावून दाखवली होती की मायबाई, मला सुरांच, तालाच, लयीच कसलच ज्ञान नाही. मी कसा म्हणू भजन ? त्यावेळी त्यांनीही हाच उपदेश मला केला होता. त्या म्हणाल्या की इथे तुझा स्वर कोण ऐकतय ? तुझी भक्ती किती आहे ? ते महत्वाचे. म्हण भजन. आणि त्यानंतर मोडक्यातोडक्या सुरात का होईना परम पूजनीय महाराजांकडे भजन म्हणताना मी स्वरांची लाज गुंडाळून गायला शिकलो. 

विठ्ठल हा भावाचा, हृदयातल्या ख-या भक्तीचा भुकेला आहे. त्यामुळे आपल्याला जमेल तशा स्वरात पण भक्तीने त्याचे नाम गात जावे. 

परमेश्वरापाशी काय मागायचे याचाही उपदेश श्री तुकोबा साधकांना करताहेत. "देवा, मला तुझी आवड असू दे. बस इतर काही नको. तुझ्यावर माझा विश्वास कायम ठेव. श्री तुकोबा म्हणताहेत की हा निर्धार तुम्ही दिवसेंदिवस वृद्धींगत करत न्या.

निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम
जय तुकोबा माऊली.

प्रा. राम प्रकाश किन्हीकर  (२८०१२०१८)  

Saturday, January 27, 2018

२६ जानेवारीचे बसफ़ॅनिंग.

काल २६ जानेवारीनिमित्त फ़ेसबुक ने सांगोला येथील बसफ़ॅनिंगची आठवण करून दिली आणि अचानक जाणीव झाली की मी सांगोला सोडल्यानंतर फ़ारसे बस आणि रेल्वेफ़ॅनिंग केलेलेच नाहीये. सांगोल्यात एका आड एक शनिवारी सुट्टी असायची आणि त्यादिवशी गावात काही आणायला जाताना नाहीतर चि. मृण्मयीला शाळेत सोडायला जाताना, सहजच बसस्टॅण्डवर नाहीतर रेल्वेस्टेशनवर चक्कर व्हायची. बर स्टेशनही म्हणावे ते एकदम चिमुकले. दिवसभरातून अर्धा डझन गाड्या इकडून तिकडे आणि तिकडून इकडे जायच्यात. सांगोला मुक्कामाचे ते सगळे दिवस बस आणि रेल्वे फ़ॅनिंगच्य़ा दृष्टीने खरच छान गेलेत.

२०१४ च्या प्रजासत्ताक दिनाच्या झेंडावंदनानंतर मी आणि आमच्या महाविद्यालयातील तरूण उत्साही प्राध्यापक श्री. महेश कुंभार दोघांनीही बसफ़ॅनिंगचा बेत आखला आणि सांगोला बसस्टॅण्डवर गेलोत. त्या बसफ़ॅनिंगची क्षणचित्रे.








सांगोल्यात आल्या आल्या मी काही जुन्या गाड्यांचे फ़ोटो काढायला सुरूवात केल्यानंतर माझ्या मित्रांना कळेचना की एव्हढ्य़ा जुन्या गाड्यांमध्ये काय बघण्यासारखे आहे ? पण सांगोल्यातल्या जुन्या गाड्यासुद्धा खूप देखण्या आहेत हे तुम्हीही मान्य कराल. 


सांगोला आगाराच्या प्रवेशद्वारापाशी श्रीदत्तगुरूंचे सुंदर मंदीर आहे. येथे सगळे उत्सव एस.टी. कर्मचारी आणि गावातील सगळी मंडळी मिळून उत्साहात करतात.



एस. टी. महामंडळाने कमी अंतराच्या प्रवासासाठी शटल सर्व्हिस म्हणून या ए.सी.जी.एल. गोवा येथे बांधलेल्या या मिडी बसेस "यशवंती" या ब्रॅण्डनावाने आणल्यात. सांगोला - अकलूज आणि सांगोला - पंढरपूर या मार्गांवर या देखण्या गोवेकर भगिनी. महाराष्ट्रात सावंतवाडीला पासिंग झालेल्या. (MH -07)








(MH-12 / CH ) पासिंगच्या सांगोला आगारातल्या जुन्या आणि देखण्या गाड्या.




आणखी जुन्या सिरीजमधली गाडी. पण अजूनही छान असलेली.






या गाडीची एक कथा आहे. महाराष्ट्र एस.टी. ने खाजगी कंपन्यांकडून गाड्या बांधून घेण्याचे ठरवल्यानंतर लगेचच प्रायोगिक तत्वावर बांधलेल्या बसपैकी ही एक. ऍण्टोनी गॅरेज, पनवेलने बांधलेली ही निम आराम गाडी स्वारगेट, पुणे आगारात होती. एका अपघातात सापडल्यावर दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेने तिचे पूर्ण नूतनीकरण करून तिला सांगोला आगाराला दिले. शेवटल्या फ़ोटोत दिसणारे प्रा. महेश कुंभार. 
(MH-06)  रायगड पासिंग.


ही बस बरेच वर्षे अहमदनगर - सांगोला मार्गावर असायची. सांगोला आगाराची असूनही ही नगर मुक्कामी असायची. सकाळी नगर वरून निघून दुपारी सांगोल्यात यायची आणि परत पुन्हा संध्याकाळपर्यंत नगर मुक्काम गाठायची. एक वहिवाट असलेली गाडी.





मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूर येथे बनलेल्या फ़ार थोड्या निम आराम गाड्यांपैकी या गाड्या. नंतर त्यांना दापोडी कार्यशाळेने साध्या गाड्यांमध्ये परिवर्तित केले. निम आराम गाड्या असताना सांगोला आगारात या नसाव्यात. सांगोला आगारात एकही निम आराम गाडी अजूनही नाही.



मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूरने बांधलेल्या (MH-40 / N 943X) या सिरीजच्या गाड्या बहुतांशी सोलापूर जिल्ह्यातल्या आगारांना मिळाल्यात. त्यातही पंढरपूर, सांगोला, अकलूज आगारांना जास्तच. (MH-40 / N 9436 ) ही गाडी सांगोला - स्वारगेट मार्गावर बरेच काळपर्यंत फ़िक्स होती.




चेट्टीनाड सिमेंटने प्रायोजित केलेली ही एक जुनी, देखणी गाडी.


लेलॅंण्डची ही कुर्ला नेहरूनगर आगाराची गाडी काही कारणांमुळे सांगोला आगारात बंद पडली होती. तिच्या मदतीसाठी कुर्लानेहरूनगर आगाराने (MH -20 / BL 0328)  ही गाडी २६ जानेवारीला पाठवली.


स्वारगेट - सांगोला मार्गावरची ही आणखी एक गाडी. स्वारगेट - सांगोला गाडी येताना पंढरपूरमार्गे यायची पण परत जाताना शिवणे - महूद मार्गे जायची.




सांगोला - अकलूज मार्गावरची ही वैशिष्ट्यपूर्ण गाडी. समोरील गरूड आणि खिडकीवरील डिझाईन वैशिट्यपूर्ण.





सोलापूर विभाग, सांगोला आगाराचा खूप जुन्या सिरीजचा पण तरीही सुंदर मालवाहक ट्रक. यातून बहुतेक रिट्रेडेड टायर्सची वाहतूक होत असावी.



सांगोला आगारातल्या काही अतिशय भंगार गाड्यांमधली ही एक बस. औरंगाबादच्या मध्यवर्ती कार्यशाळेने टाटाच्या बसेस बांधण्याचे ठरवल्यावर बांधण्यात आलेल्या पहिल्या काही बसेसपैकी ही एक बस. औरंगाबाद कार्यशाळेला समोरच्या काचेवरील डोम बांधणे नीट जमले नव्हते हे फ़ोटोवरून लक्षात येईलच. ही आणि सांगोला आगारातलीच हिची धाकटी बहीण (MH-20 / BL 0027) ब-याचदा रस्त्यातच बंद पडलेली दिसायची.





बंद पडलेल्या सांगोला - कुर्ला बससाठी कुर्ला नेहरूनगर आगाराने पाठवलेली बदली लेलॅण्ड बस.


महाराष्ट्राच्या तीनही मध्यवर्ती कार्यशाळांनी बांधलेल्या गाड्या एकाच फ़्रेममध्ये. दुर्मीळ योग जुळून आला होता २६ /०१/२०१४ रोजी. सांगोला आगारात. डावीकडून औरंगाबाद, नागपूर आणि दापोडी (पुणे) कार्यशाळेने बांधलेल्या परिवर्तन गाड्या.


सांगोला बसस्थानकावर फ़लाटांच्या पुढल्या बाजूस उभी असलेली सांगोला - जत ही जुनी पण छान गाडी.



आणि सांगोला - अकलूज मार्गावरची अकलूज आगाराची जुनी टाटा गाडी.



नागपुरात बनलेली आणि कधीकाळी नागपूर आगारात असलेली ही लेलॅण्ड गाडी आता आपल्या सासरी उस्मानाबाद आगारात. उस्मानाबाद - कोल्हापूर या मार्गावर नियमित धावणारी गाडी होती. लेलॅण्डच्या गाड्यांचे इंडिकेटर्स नेहेमीच कसे तुटतात ?  हे मला न सुटणारे कोडे आहे.

भरपूर वेळ बसफ़ॅनिंग करून आम्ही परतलो.