Showing posts with label Sangola. Show all posts
Showing posts with label Sangola. Show all posts

Thursday, August 6, 2026

सांगोल्यातले नागपूरकर

२०१२ च्या ऑगस्ट महिन्यात सांगोला जिल्हा सोलापूर इथे प्राध्यापकी करायला गेलो आणि सवयीनुसार आठवडाभरातच तिथल्या बसस्टॅण्डवर एक चक्कर झालीच. पश्चिम महाराष्ट्रातल्या काहीकाही डेपोंना मध्यवर्ती कार्यशाळा नागपूरने बांधलेल्या टाटा बसेस फ़ार मोठ्या प्रमाणात मिळालेल्या आहेत. सहजी नागपूर कार्यशाळेने बांधलेल्या बसेस विदर्भाच्या डेपोंच्या मागणीतच संपतात. विदर्भातल्या काही काही डेपोंच्या पूर्ततेसाठी दापोडी कार्यशाळेने किंवा चिकलठाणा (छत्रपती संभाजीनगर) कार्यशाळेने बांधलेल्या बसेस मागवाव्या लागतात पण पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगर, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यातल्या काही डेपोंना मात्र नागपूर कार्यशाळेच्या टाटा बसेस सातत्याने मिळतात. सांगोला डेपो हा त्यातलाच एक.



ही बस जुनी आहे. मी फ़ोटो काढला तेव्हा या बसचे आयुष्य साधारण १० वर्षांचे असेल. तरीही पण सांगोला आगारातल्या कार्यशाळेने किंवा सोलापूर विभागीय कार्यशाळेने या बसला जागोजागी जी डागडुजी केलेली होती त्यावरून ही बस आहे त्यापेक्षा अधिक म्हातारी भासत होती. आपल्या महाराष्ट्रात बसेसचा ताफ़ा साधारण १२ वर्षांच्या त्यांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त केला जातो. त्याप्रमाणे ही बस पुढल्या १ - २ वर्षात सेवेतून निवृत्त होणार होतीच पण एकेकाळी देखण्या असलेल्या या बसचे हे रूपडे मनावर आघात करून जात होते हे मात्र निश्चित.


MH 40 / 9709


TATA 1510 Cummins


BS II


मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूर येथे बांधलेली टाटा बस.


सो. सांगोला आगार. 


सांगोला आगार, सोलापूर विभाग


- प्रत्येक एस. टी. बसला आणि रेल्वेला मानवी रूपात बघणारा आणि त्यांच्या प्रगाढ प्रेमात असणारा, बस आणि रेल्वे फ़ॅन, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Wednesday, July 29, 2026

प्रवासी पक्षाचा एक अत्यंत सुंदर प्रवास

बरोबर १२ वर्षांपूर्वीचा प्रवास.


काही कामांनिमित्त दोन दिवस नागपूरला घालवून सांगोल्याला परत निघालो होतो.


आदल्या दिवशी प्रवासाचे नियोजन करताना ६६० किमी साठी १४ तास ४५ मिनीटांचे नियोजन केले होते. 



पण नागपूरवरून निघायलाच जवळपास अर्धा तास उशीर झाला.


खडकीला हनुमंताचे आणि कळंबला चिंतामणीचे दर्शन घेऊन निघालो तेव्हा गाडीतले दोन्ही पॅसेंजर्स (सौ. वैभवी आणि चि. मृण्मयी) गाढ झोपी गेले होते. गेले दोन दिवस नागपुरात भरपूर भेटीगाठी, भटकंती आणि अपुरी झोप झाल्याचे परिणाम.

आर्णीला गाडीत पेट्रोल भरायला थांबलो तेव्हाही गाडीतल्या प्रवाशांची झोपमोड झाली नाही. मग मुद्दाम नाश्ता, चहासाठी थांबून या दोघींची झोपमोड करण्याचे माझ्या जिवावर आले.


सोबतीला कारच्या स्टिरीओवर भीमसेनजी, मालिनीताई, अभिषेकीबुवा, राशिद खानसाहेब सकाळचे राग गायला होतेच. एकेक बडा ख्याल आणि छोटा ख्याल एकेक तास चालणारा. मग काय ? त्याच सुरांवर तरंगत नाॅनस्टाॅप निघालो. मधे उमरखेड, हदगाव, नांदेड ही गावे कधी लागलीत ? आणि कधी मागे गेलीत ? कुणालाच कळले नाही.


दुपारी साधारण २ च्या सुमारास सौ. वैभवीची झोप उघडली. 

"कुठपर्यंत आलोय ?

नाश्त्याला उमरखेडला थांबायचे ना ?"

अशी पृच्छा झाली.


"बाईसाहेब, नाश्ता विसरा. आता थेट २० किमी नंतर लातूरला जेवायलाच थांबू." माझे विजयी उत्तर.


थांबे घेतघेत गेलो की भरपूर वेळ जातो. तेच थांबे टाळून सर्वसामान्य वेगात जरी गेलो तरी भरभर अंतर कापले जाते याचा वस्तूपाठ देणारा हा प्रवास.


१४ तास ४५ मिनीटांऐवजी १४ तास ९  मिनीटांतच ६५७ किमी सुरक्षितरीत्या गाठल्याची कृतार्थता एका ड्रायव्हर लाच समजू शकेल.



- "मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक" या वचनावर विश्वास असलेला, लांब पल्याचा सुरक्षित ड्रायव्हर रामराव गाडीवाले. 

Wednesday, January 31, 2024

माणदेशी कन्या

आम्हा सगळ्या बसफ़ॅन्सचे पहिले प्रेम बस आणि सगळ्या रेल्वेफ़ॅन्सचे पहिले प्रेम रेल्वे असल्याने बसेस किंवा रेल्वे आम्हाला आमच्या प्रेयसीसारख्या (ओह, आता नवीन पिढीच्या शब्दरचनेनुसार Girl Friend) वाटतात. बस किंवा रेल्वे ह्या आम्हाला निर्जीव वस्तू वाटतच नाहीत. तर त्या अगदी आपल्यासारख्याच सजीव वस्तू वाटतात. आम्ही बसफ़ॅन एखाद्या वेळेला सुंदर तरूणी शेजारून गेली तर तिच्याकडे बघू न बघू पण जर एखादी नवीन बस शेजारून गेली तर तिच्याकडे मान वेळावून वेळावून नक्कीच बघू.


आमच्यासाठी 3780 या नंबरच्या बसची धाकटी बहीण 3781 असते आणि तिची धाकटी बहीण 3782 असते. अगदी जुनी बस म्हणजे आजी किंवा पणजी असते. तिचा काळ तिने तिच्या आपल्या देखणेपणामुळे गाजवलेला असतो पण आजकाल तिच्या नातींचे राज्य असते. कदाचित एखादी छान मेण्टेन केलेली बस म्हातारपणातही देखणे दिसणा-या एखाद्या आजी / काकू सारखी आम्हाला दिसते.


एस. टी. डेपोतही आमच्यासारखे कवी मनाचे रसिक असतातच. मग ते रसिक एस. टी. कर्मचारी एखाद्या अशा नवीन बसवर "माणदेश कन्या" असे स्टीकर वगैरे लावतात आणि आम्हा बसफ़ॅन्सना "माझिया जातीचा मज मिळो कोणी" अशी अनुभूती येते.


दिनांक 28/01/2014


आमच्या फ़ॅबटेक अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगोला येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल लोणावळ्याला निघालेली होती. सांगोला डेपोने त्यांची तत्कालीन नवी कोरी बस त्या सहलीसाठी पाठवलेली होती. मग काय ! आमच्यातले बसफ़ॅन शिक्षक सुखावले. या बसचे भरपूर फ़ोटोही काढलेत. 










या सहलीनंतर ही बस सोलापूर - पणजी या प्रतिष्ठेच्या आंतरराज्य मार्गावर बरीच वर्षे धावताना दिसली. हा मार्ग ब-याच जुन्या काळापासून सांगोला डेपो चालवतो. सोलापूर - मंगळवेढा - सांगोला - शिरढोण - मिरज - सांगली - जयसिंगपूर - कोल्हापूर - सावंतवाडी - म्हापसा - पणजी असा जवळपास 450 किमीचा हा आंतरराज्य महामार्ग आहे.


- बसगाड्यांविषयी अगदी आसक्त प्रेम बाळगणारा, बसेसचा Boy Friend प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Thursday, October 8, 2020

सांगोल्याचा आठवडी बाजार आणि नागर संस्कृतीतले आम्ही

 सांगोला येथे असताना दर रविवारी भरणार्या आठवडी बाजारात जाऊन भाजी आणणे हा माझ्या आनंदाचा गाभा असे. आसपासच्या गावातील शेतकर्यांनी आणलेली अतिशय ताजी रसरशीत आणि अप्रतिम चविष्ट भाजी या बाजारातच मिळायची. बाजारात एक साधा फेरफटका मारला तरी मन प्रसन्न होत असे. या रविवारच्या बाजाराची शेतकर्यांपेक्षा आम्ही गिर्हाईकंच जास्त वाट बघत असायचो.

रविवार आला की सकाळी ९.३० च्या सुमारास सकाळची आन्हिके आटोपून, चहा फराळ करून, मी आणि आमच्या महाविद्यालयाचा प्राचार्य असलेला, माझा मित्र, डाॅ. सतीश तानवडे, दोघेही बाजारहाटीसाठी भरपूर पिशव्या बकोटीला मारून (गाडीत टाकून) निघायचोत. गाडी बाजाराच्या पटांगणाजवळ पार्क करून दोघेही बाजारात प्रवेश करायचो.
साधारण दोन अडीच एकराच्या परिसरातल्या त्या पटांगणात हा आठवडी बाजार भरत असे. सुरूवातीलाच किराणा सामानाच्या गोण्या (गहू, तांदूळ, शेंगदाणे, साखर) भरून ठेवलेले तंबू, मग तंबूत किंवा उघड्यावर तागड्या लावून भाजी विकणारी अत्यंत प्रेमळ शेतकरी मंडळी.
या खरेदीत आम्ही दोघेही रमून जात असू. सगळ्यात शेवटच्या दुकानांमधे फळफळावळ मिळायची. खूप रास्त दरात चांगल्या प्रतीची फळे आम्ही सांगोल्यातच खाल्लीत.
बाजार संपवताना आमची पावले भल्यामोठ्या कढयांमधे तळल्या जाणार्या गाठी, गुडीशेव आणि भज्यांच्या तंबूकडे आपसूकच वळत असत. त्या तळणाचा वासच इतका खमंग असायचा की सकाळी घरी केलेला फराळ विसरत असू. त्या तंबूंसमोर आम्ही दोघेही, इतर गिर्हाइकांप्रमाणेच, उकीडवे बसून आमचा ऑर्डर देत असू. आणि तिथेच बसून कागदांमधे बांधून आलेल्या भज्यांचा फडशा पाडत असू. बहुतेक वेळा घरच्यांसाठीही ही भजी, तशाच कागदांमधे बांधून, नेत असू. अशावेळी सतीशही त्याची प्राचार्यपदाची झूल उतरवून ठेवत असे. समोरच्या भजीवाल्या मामांनाही, हा आपल्यासमोर उकीडवा बसून, गरम भज्यांवर ताव मारणारा माणूस, कुणी मोठ्ठा माणूस आहे हे माहिती व्हायचं काही कारणच नव्हतच. ते पण कधीमधी "घ्या की सायेब, अजून येक प्लेट. त्याला काय हुतय ?" असा आग्रह करीत असत.
असाच फेरफटका मारीत असताना एका शेतकर्याची दिसलेली ही बुलेट. शेतात पिकवलेली भाजी दर रविवारी बाजारात आणून टाकायला सोयीचे म्हणून गाडीला दोन्ही बाजूला रचना करून घेतलेली होती. सोबतच शेतात कीटकनाशके, तणनाशके आदींच्या फवारणीसाठीही त्याने व्यवस्था करून घेतलेली होती. त्या तरूणाचे कौतुक वाटले. त्याच्यासाठी ही बुलेट नुसतीच "शान की सवारी" नसून "काम की सवारी" ही असेल.



नवनव्या शेतीच्या तंत्रांशी जुळवून, शेतीविषयी शासनाच्या नवीन योजनांचा डोळसपणे अभ्यास करून, त्या योजनेत स्वतःसाठी काय फायदा होतोय हे जाणून घेण्याचे प्रयत्न करून, प्रगतीशी स्वतःला जोडून घेण्यार्या शेतकर्यांचे प्रमाण पश्चिम महाराष्ट्रात फार आहे. पाऊसपाणी नाही, जमिनीचा पोत हवा तेवढा चांगला नाही म्हणून रडत न बसता जिद्दीने मेहेनत करून विकासाची गंगा आपल्या घराकडे वळवणार्या या शेतकर्यांना सलाम.

- कधीकाळी शेतकरी होण्याची इच्छा असलेला पण कायम नागर संस्कृतीत असलेला राम किन्हीकर.

Tuesday, June 2, 2020

माणदेश

सांगोला वास्तव्यात खूप सुखी आणि आनंदमय जीवन होते. पंढरपूर फक्त २५ किमी. मनात आले की एखाद्या संध्याकाळी पटकन एखादी चक्कर पंढरपूरला टाकता यायची.

आणि गोंदवले ९० किमी. दोन दिवस लागून सुट्ट्या असल्या की एक दिवस प.पू. महाराजांच्या सहवासात घालविण्याची ओढ लागायची. मग काय ?

सकाळी सगळं आवरून निघून गोंदवल्याला जाणे आणि संध्याकाळपर्यंत तृप्त मनाने परतणे हा आनंदाचा गाभा असायचा.

अशाच एका भर उन्हाळी प्रवासातील हे छायाचित्र. साळमुख फाटा ते पिलीव या प्रवासातला हा हिरवागार रस्ता.




माणदेश (सातारा जिल्ह्याच्या आग्नेयेकडील, सांगली जिल्ह्याच्या ईशान्येकडील आणि सोलापूर जिल्ह्याच्या वायव्येकडील भाग) हा पूर्वीपासून "कायम दुष्काळी" म्हणून ओळखला जातो. वार्षिक पर्जन्यमान २०० ते ३०० मिमी फक्त. (नागपूर आणि विदर्भात त्याच्या पाचपट वार्षिक पाऊस पडतो. यावरून तिथली भीषणता लक्षात येईल.)

पण कमी पडलेल्या पावसात , एव्हढ्या उन्हातही ही सावलीची बेटे मन कसे प्रफुल्लित करून टाकतात, नाही ?

माणदेशातल्या माणसांचे वर्णन व्यंकटेश माडगूळकरांनी सविस्तर केलेले आहेच. दोन अडीच वर्षाच्या वास्तव्यात मला अनुभवायला मिळालेली माणदेशी माणसेही अशीच होती. विपरीत परिस्थितीचे भांडवल न करता, रडत न बसता, परिस्थितीला जिद्दीने तोंड देणारी,

वरून खडबडीत आणि रूक्ष वाटली तरी जीव लावणारी, जिवाला जीव देणारी

आणि

बनेलपणाचा आवही आणता न येणारी स्पष्ट, साधी, सरळ, प्रामाणिक.

अशा या माणदेशात राहून त्या मातीच्या, तिथल्या माणसांच्या प्रेमात न पडता राहणे अशक्यच.

"Never hate in plurals" हे वुडहाऊस सांगून गेलाय.

पण

"Never love in plurals" हे कुणीही सांगितलेले नाही. Rather कुणीच सांगू शकणारही नाही.

- अस्सल वैदर्भीय असलो तरी माणदेशी आणि खान्देशी मातीवर अपार प्रेम करणारा, प्रवासी पक्षी, राम.

Wednesday, July 31, 2019

एक संवाद




सहज आम्ही आमचे सांगोल्यातले दिवस आठवीत बसलो होतो. खूप दिंड्यांचे दर्शन आषाढीच्या काळात आम्हाला व्हायचे. पंढरपूर अगदी २५ किमी, अर्धा तास. त्यामुळे कधीही सहज विठूमाउलीचे दर्शन व्हायचे. ऑनलाइन दर्शन बुकिंगमुळे तर फ़ारच छान सोय झाली असायची. पै पाहुण्यांसोबतही ब-याच वेळेला माउलीचे दर्शन झाले. सहज चर्चेत सौभाग्यवतींनी विचारले.

सौ. : काय रे. पंढरपूरला रुक्मिणी विठ्ठलापासून लांब का उभी ?

अस्मादिक : अग, ती रुसलीय ना.

सौ. : रुसायला काय झालं ?

अस्मादिक : अग तिचा नवरा भक्तासाठी अठ्ठावीस युगे वाट पहात एका विटेवर उभा आहे. आता समज, आपण कॉलेज कॅम्पसमध्ये फ़िरत असताना माझ्या एखाद्या विद्यार्थ्याने मला काही अभ्यासातला प्रश्न विचारला आणि त्याला समजावून देण्यासाठी मी तुला २८ मिनीटेच तिथे नुसते उभे रहायला सांगून त्याच्या प्रश्नात गुंतलो तर तुला रुसवा येईल की नाही ?

काय सांगू ? मुद्दा चटकन पटला.

Monday, October 27, 2014

मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा

जन्म : चंद्रपूर.

बालपणी लाडकी मावशी माणगाव जि. रायगड येथे असल्याने दरवर्षीची कोकण भ्रमंती.

पहिली ते बारावी शिक्षण : नागपूर.

इंजीनीअरींग : शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड जि. सातारा, कराडला असताना विविध वक्तृत्व स्पर्धा, यूथ फ़ेस्टीवल्स, नाट्यस्पर्धांच्या निमीत्ताने सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांमध्ये भ्रमंती, रात्री बेरात्रीचे प्रवास, लहान लहान गावांतल्या अनंत आठवणी.

नोकरी : १२ वर्षे ऐरोली, नवी मुंबई, पुढली ६ वर्षे  : नागपूर आणि आता गेली अडीच वर्षे  : सांगोला जि. सोलापूर.

काका, मावश्या, मावसभाउ इ मंडळी औरंगाबादला असल्याने १९८९ पासून मराठवाड्यात भरपूर भ्रमंती.

चंद्रपूरच्या भाजी मंडईत जाउन खरेदी करण्याच्या ओढीइतकीच, सांगोल्याच्या आठवडी बाजारातील भाजी मंडईत गर्दीत जाउन भाजी खरेदी करायला आवडते.

नागपूरला केळीबाग रोड, महाल येथे फ़ेरफ़टका मारण्याचा आनंद आणि ठाण्यात गोखले रोड, राम मारुती रोड इथे फ़िरण्याचा आनंद यात डावे उजवे करता येत नाही.

टेकडी गणपती आणि टिटवाळ्याचा सिद्धीविनायक, दोघांसमोरही उभे राहिल्यावर डोळा भरून दर्शन घेताना , डोळे भरून येण्याची सारखीच अनुभूती.

अमरावतीचा गड्ड्याचा वडा आणि ठाण्याची मामलेदाराची मिसळ दोघांच्या ही चविष्टपणात उजवे डावे करता न येणे.

शेगावला गजानन बाबांवर आपले मायबाप असण्याची जबाबदारी टाकून स्वतः मो्कळे होणे आणि गोंदवलेला ब्रम्हचैतन्य महाराजच आपल्याला मार्ग दाखवून इथपर्यंत आणताहेत ही अनुभूती यात काय फ़रक ?

मुंबई ठाण्याने मला जेव्हढ आपलस केल तेव्हढच नांदेड औरंगाबाद सोलापूरनेही केल. कोणाच्या आपलेसे करण्यामागे फ़टकळ व्यावहारिकता असेल, जीवनाचे ज्ञान चटकन प्राप्त करून देण्याची तळमळ असेल तर कोणाच्या आपलेसे करण्यामागे रांगडेपणा, रूक्षपणा, खरखरीतपणा असेल. त्या खरखरीतपणाच्या आतला ओलावा जाणवायला थोडा वेळ तर द्यावा लागेलच की नाही ?

रिला्यन्स मॉल औरंगाबाद आणि रिलायन्स ट्रेण्डस सांगली या दोन्ही ठिकाणी फ़सवले जाण्याची अनुभूती सारखीच.

वैदर्भीय अष्टविनायक यात्रेइतकच समाधान, एका उन्हाळ्यात शिरपूर जि. धुळे येथे सुरेश खानापूरकर काकांचा अभिनव प्रयोग बघण्यासाठी खास काढलेल्या यात्रेत मिळाल.

गणपतीपुळ्याला सुंदर संध्याकाळी समुद्रावर जी अनुभूती येते ती आणि कराडच्या प्रीतीसंगमावरच्या घाटांवर संध्याकाळी जी अनुभूती येते ती, यात काडीचाही फ़रक नाही.

माहूरला रेणुकेला साष्टांग घालताना डोळ्यासमोर तुळजापू्र, कोल्हापूर आणि वणीच्या सप्तशृंगीच्या मूर्ती आपसूकच तरळून जातात आणि त्यांनाही साष्टांग आपोआपच घडतो. आणि हेच तुळजापूर, कोल्हापूर आणि वणीला होत.

विदर्भ, खान्देश, मराठवाड्याचा आणि कोकण माणदेश आणि मावळचा मी आहे.

जन्माने आणि वागणुकीने पक्का वैदर्भी असलो तरी मनाने पूर्ण महाराष्ट्राचा आहे.



Tuesday, May 22, 2012

सांगोला - एका नव्या स्वप्नाच्या शोधात


माझ्यासाठी आजवर कधीच पाहिलेले नवीन गाव, नव्यानेच उघडलेले अभियांत्रिकी महाविद्यालय, तिथे विभागप्रमुख म्हणून रुजू होण्यासाठी आलेली नवीनच संधी, तिथे जाण्यासाठी नव्यानेच सुरू झालेली नागपूर-कोल्हापूर एक्सप्रेस, तिचा अकोल्यानंतरचा नवीनच मार्ग. यंदाच्या उन्हाळ्यात अगदी नवीन स्वप्नांच्या शोधात हा छोटासाच प्रवास करण्याचे आम्ही ठरवले.

शनिवार, दि. १२/०५/२०१२
नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचण्याच्या अगदी १५ मिनिटे अगोदर आमची "तत्काळ" तिकीटे कन्फ़र्म झाल्याचा एस.एम.एस. आला आणि तोपर्यंत टांगणीला लागलेला जीव भांड्यात पडला. ११४०३ अप नागपूर-कोल्हापूर एक्सप्रेस फ़लाट क्र. वर आधीच उभी होती. आम्ही आमच्या डब्यापर्यंत गेलो.

मग नेहेमीप्रमाणे कुटुंबाला गाडीत बसवून गाडीच्या इतर निरीक्षणासाठी खाली उतरणे झाले.

गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात उन्हाळी विशेष म्हणून धावलेली ही गाडी जुलैपासून नियमित झालेली आहे. सध्या नागपूर ते कोल्हापूर च्या दरम्यान धावणा-या महाराष्ट्र एक्सप्रेसपेक्षा ही नागपूर ते कोल्हापूर प्रवासाला जवळपास तास कमी घेत हा प्रवास २४ तासात पूर्ण करते. अकोल्यानंतर वाशिम, हिंगोली, पूर्णा, परभणी, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी, कुर्डूवाडी, पंढरपूर, सांगोला, मिरज असा पूर्णपणे नवीनच मार्ग घेत ही गाडी जाते. अकोल्यानंतर विद्युतीकरण नसल्याने हा संपूर्ण प्रवास डिझेल एंजिनाने होणार हे उघड होत.


18976 R WDM 3A
Loco built by : Diesel Loco Works, Varanasi
Rebuilt: Diesel Loco Modernization Work, Patiala, July 2005.

गाडीच्या डब्यांची पोझिशन : गार्ड पार्सल, साधारण, साधारण, साधारण, शयनयान (एस- ते एस-), वातानुकूल त्रिस्तरीय शयनयान (बी-), वातानुकूल द्विस्तरीय शयनयान (-), साधारण, साधारण, साधारण, गार्ड पार्सल. (एकून १९ डबे)

त्यातला एस- हा विशिष्ट क्रमांकाचा डबा होता.




माझा डबा : 95103 CR, बी- कोच,
रेल्वे कोच कारखाना, कपूरथळा, ड्ब्लु जी सी सी एन ५८, नोव्हेंबर १९९५,
६२ शायिका
आमच्या शायिका ३३,३५ आणि ३८.





सहसा या त्रिस्तरीय शयनयान डब्यांना ६४ शायिका असतात पण १९९५ मध्ये या प्रकारच्या डब्यांचे नव्यानेच उत्पादन व्हायला सुरूवात झाल्यानंतर सुरूवातीच्या काही डब्यांमध्ये शायिका क्र. च्या जागेत प्रवाशांना पुरविण्यात येणा-या बेडरोल्सचे कपाट होते. नंतर रेल्वेच्या लक्षात ही चूक आली आणि बेडरोल्सचे कपाट .सी. कंपार्टमेंटच्या बाहेर (प्रवेश द्वाराजवळ) गेलेत. जुन्या कोचेसमध्ये मात्र ही वैशिष्ट्यपूर्ण रचना आहेच.


ह्या सगळ्या नोंदी सुरू असतानाच १४.५० ला फ़लाट क्र. वर १२८१० हावडा-मुंबई मेल येउन उभी झाली. भारतीय रेल्वेच्या इतिहासातली ही खूप जुनी, अगदी ब्रिटीशकालीन गाडी. गेल्या १५० वर्षात या गाडीच्या वेळापत्रकात फ़क्त काही मिनिटांचा बदल झालेला आहे. भारतीय रेल्वेतल्या महत्वपूर्ण बदलांची ही साक्षीदार गाडी. प्रथमवर्ग वातानुकूल, द्विस्तरीय वातानुकूल आणि त्रिस्तरीय वातानुकूल असा काव्यमय न्याय देणारी ही गाडी आमच्या गाडीच्या पुढेच काढणार हे उघड होतं. झालंही तसंच. १४.५९ ला ही गाडी पुढे निघाली आणि आमची गाडी १५.०० ऐवजी १५.०७ ला रवाना झाली.

या गाडीच्या वेळापत्रकावर एक नजर टाकली असता आपल्या लक्षात येइल की धामणगाव ते बडनेरा, गंगाखेड ते परळी वैजनाथ, परळी वैजनाथ ते लातूर रोड तसेच बार्शी ते कुर्डूवाडी या स्थानकांदरम्यान गाडीला भरपूर वेळ देण्यात आलाय. अकोला ते पुढे हा एकेरी मार्ग असल्याने गाड्यांच्या क्रोसिंगसाठी जास्त वेळ समजू शकतो पण धामणगाव ते बडनेरा या गाडीला इतका जास्त वेळ देण्यात येण्याचे कारण म्हणजे दुपारी १५.४० वाजता नागपूरवरून रवाना होणारी १२१३० हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेस. आझाद हिंद धामणगाव ते बडनेरा या स्थानकांमध्ये नागपूर-कोल्हापूर एक्सप्रेसला मागे टाकत असणार. नागपूरवरून निघताना आझाद हिंद उशीराने धावत असल्याची उदघोषणा कानावर पडल्याची बातमी सौभाग्यवतींनी दिली. आज कदाचित हा ओव्हरटेक होणार नाही अशी आशा बाळगून आम्ही प्रवासाची मजा घ्यायला लागलो. (आपल्या गाडीला ओव्हरटेक म्हणजे नामुष्कीच की हो ! हरहर ! छे, छे ! असे होता कामा नये.)

बरोबर तास १० मिनिटांत ७९ किमी अंतर कापून गाडी वर्धेच्या फ़लाटाला लागली. चहावाला शोधण्यासाठी मी खाली उतरलो. दुपारी खूपच घाईघाईत आम्ही निघालो होतो. जेवण करता आलं तरी फ़ार झालं इतकं करकचून झालेलं नियोजन होतं. चहावाला काही मिळाला नाही. १६.२१ ला गाडीने फ़लाट सोडला.


पुलगाव लगेच येतं. तसं आजही ते १६.४४ ला आलंय. पुलगाव स्टेशनवर आमचे .पू. बापुराव महाराज उतरले होते. (त्यांच खातखेडा हे गाव इथून जवळच आहे म्हणून पुलगावच्या फ़लाटाशी जवळीक. देवळात शिरताना उंब-याला हात लावून नमस्कार आपण का करतो ? किंवा ती पायधूळ आपण मस्तकी का लावतो ? कारण आपल्या अगोदर तिथे अनेक -या भक्तमंडळींचे पाय लागले असतात. त्यांची चरणधूळ आपल्याही मस्तकाचे भूषण व्हावी म्हणून.) फ़लाटाला नमस्कार करण्याइतपत नम्रता अंगी अजून आलेली नाही पण मी गाडीतूनच हात जोडतो. (१६.४४--१६.५०)




धामणगावचा फ़लाट हा माझा मित्रच. तो मात्र मैत्रीची जाणीव ठेवतो आणि एक कटिंग का होइना, फ़र्मास चहा पाजतो. सगळ्यांना. धामणगाव (१७.१४--१७.२०).

बडनेरा येईपर्यंत मनात धाकधूक. कुठेही गाडीचा वेग मंदावला की ओव्हरटेकची शंका मनात चुकचुकायला लागायची. पण तशातला काही प्रकार झाला नाही. मागाहून येणारी आझाद हिंद एक्सप्रेस उशीरा धावत असल्याचा फ़ायदा आम्हाला मिळाला. नियोजित वेळेपेक्षा मिनिटे उशीरा १८.०६ वाजता आम्ही बडनेरा फ़लाटावर उभे.

बडने-यात शिरता शिरता अमरावतीकडून अमरावती-जबलपूर सुपर एक्सप्रेस येताना दिसली. नागपूरकरांकडून पळवलेली आणखी एक गाडी. डबे सगळे नवीन २०११ किंवा २०१२ मधले होते पण एंजिन तेव्हढ मालगाडीच होतं. 27365 AJNI WAG 7. कदाचित बडने-यानंतर पुढील प्रवासासाठी बदललंही असेल. बडने-यालाही थोडासाच मुक्काम करून आम्ही १८.१२ ला हललो.

मूर्तिजापूरचा थांबा हा नियोजित थांबा नव्हे पण उन्हाळ्यात प्रायोगिक तत्वावर तो दिल्या गेलेला आहे. मूर्तिजापूर (१८.५१--१८.५६)

आता अकोल्याचे वेध लागले होते. अकोल्यापर्यंत जर ही गाडी निर्विघ्न गेली की मग ओव्हरटेकचा प्रश्नच नव्हता. मग बाबा, तुमचा मार्ग वेगळा आणि आमचा मार्ग वेगळा, असं आझाद हिंदला सांगता आलं असतं. झालंही तसच. गाडी वेळेच्या १८ मिनिटे आधीच १९.२७ वाजता अकोल्याला फ़लाट क्र. वर उभी झाली. आम्ही जेवणं उरकलीत. आमच्या कंपार्टमेंटमधले सहप्रवासी वाशिमवरून बसणार होते त्यामुळे भरपूर उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेचा आम्ही पूर्ण फ़ायदा घेतला आणि अगदी आरामात जेवणं आटोपलीत.

अकोल्याला एंजिन उलट बाजूने लागले. आत्तापर्यंत आमचा कोच गाडीच्या मागल्या बाजुकडे होता तो आता पुढल्या बाजुला आला आणि डिझेल एंजिनाचा तो मस्त आवाज ऐकत झोपी जाण्याचे भाग्य आमच्या नशिबात येणार होते. अकोल्यावरून बरोबर २०.१२ ला गाडी हलली.

वाशिम येईपर्यंत आम्ही रेल्वेने दिलेल्या पथा-या पसरल्यात आणि झोपेची तयारी केली. वाशिमला सहप्रवासी आलेत. त्यांनाही थोडं स्थिरस्थावर व्हायला साधारण अर्धा तास लागला. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये कोकण दर्शनाला निघालेली मंडळी होती.

अकोल्यानंतरचा हा प्रदेश माझ्यासाठी नवीनच होता पण रात्र झाल्यामुळे झोपण्याशिवाय पर्याय नव्हता. अखेर हिंगोलीला झोपलो.
वाशिम (२१.३८--२१.४४)
हिंगोली (२२.२५--२२.२७)

दि. १३/०५/२०१२
सकाळी जाग आली तेव्हा गाडी लातूर स्थानकात उभी होती. पावसाची रिमझिम सुरू होती. वातावरणात आल्हाददायक गारवा होता. लातूर गावापासून स्टेशन बरंच दूर असावंस वाटलं कारण गावातल्या समृद्धीच्या खुणा स्टेशनावर दिसत नव्हत्या. (तसं बघायला गेलो तर कराड, सांगली, सातारा ही स्टेशनंही अशीच फ़सवी आहेत. पहिल्यांदा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशासाठी मी कराडला महाराष्ट्र एक्सप्रेसने गेलो होतो तेव्हा ते स्टेशन पाहून निराश झालो होतो. इथूनच परत फ़िरावं असं प्रकर्षाने वाटू लागलं होतं, गावात काही भव्यदिव्य असेल असं स्टेशनकडे पाहून वाटेचना. पण चार वर्षातल्या ह्या गावाच्या सहवासाने मला केव्हाच खिशात टाकलं होतं.). 

गाडी लातूरवरून हलली तेव्हा पहाटेचे ०५.५२ झालेले होते. ४०-४५ मिनिटे मी दारात उभा राहून मुक्त निसर्गाची मजा लुटत होतो. स्वच्छ मोकळी हवा फ़ुफ़्फ़ुसांमध्ये भरून घेत होतो. अचानक एका छोट्याश्या स्टेशनावर गाडीचा वेग मंदावला आणि गाडी थांबलीच. मी मोठ्या उत्कंठेने पुढून कुठली गाडी येतेय याची वाट बघत होतो. कुठली एक्स्प्रेस असेल ? तिचं एंजिन कुठलं असेल ? तिचे डबे कसे आणि किती असतील ? ही सगळी उत्सुकता.

फ़ार वेळ ताटकळत ठेवता समोरून मोठ्ठ्याने हॊर्न वाजवत एक दुहेरी एंजिनांची मालगाडी लातूरकडे निघून गेली. गाडीतल्या बहुतेकांची झोप चाळवल्या तरी गेली आणि -याच जणांची मोडलीसुद्धा.

ढोकी गावातून गाडी निघाली. (ढोकी ०६.४२--०६.४८)

उस्मानाबाद सकाळी ०७.१८ ला आलं. हे स्टेशनही गावापासून बरंच लांबवर आहे असं वाटलं. इथला फ़लाट बार्शीकडे चांगलाच उतरता आहे हे लक्षात आलं. ब्रेक जर बरोबर लागलेले नसतील तर गाडी आपोआप बार्शीकडे चालायला लागण्याइतपत उतार तीव्र आहे. मिनीटे थांबून ०७.२३ ला आम्ही हललो.

"उस्मानाबादनंतर नाश्ता येईल, तो करून घ्या. नंतर जवळपास मिरजपर्यंत काहीही मिळणार नाही" हा जाणकारांचा उपदेश लक्षात घेउन आम्ही नाश्ता येण्याची वाट बघत बसलो.

बार्शी फ़लाटही मोठा स्वच्छ आणि नीटनेटका वाटला. १९९२ मध्ये इथे झालेल्या पाणिनी वक्तृत्व स्पर्धेतल्या माझ्या सहभागाची आठवण झाली. आजवर मी अनुभवलेली सर्वात उत्कृष्ट वक्तृत्व स्पर्धा. त्या स्पर्धेत माझ्या व्याख्यानाचा विषयही "फ़लाटदादा, फ़लाटदादा" हाच होता. तिथलं भगवंत मंदीर आठवलं. पण गाडी लगेच हलली. बार्शी (०७.५७--०८.००)

लगेचच थो्डा वेळ धावून गाडी शेंद्रीला थांबली. आडबाजुचं हे स्टेशन. सुरूवातीला समोरून येणा-या गाडीची वाट पहाण्यात काही वेळ घालवला. जवळपास अर्धा तास झाला तरी गाडी हलण्याचे चिन्ह दिसेना मग हळूहळू इतरही उतारू मंडळी गाडीखाली उतरायला लागली. कदाचित एखादी मागून येणारी गाडी ओव्हरटेक करणार असेल म्हणून वाट पाहिली पण मग ड्रायव्हर साहेबांनीच खुलासा केला की समोरच्या स्टेशनात (कुर्डूवाडीला) जागा नाही म्हणून सिग्नल नाही. मग बार्शी ते कुर्डूवाडी या ३७ किमी अंतरासाठी तास वेळ देण्यातली रेल्वेची चलाखी समजली. आता इतका उशीर होउनही गाडी कुर्डूवाडीला वेळेत पोहोचणार आणि रेल्वे आमच्या गाड्या अगदी वेळेवर धावतायत म्हणून पाठ थोपटून घेणार.

मी मात्र या संधीचा फ़ायदा घेत एंजिनाचे भरपूर फ़ोटो काढलेत. पूर्ण गाडीला एक फ़ेरफ़टकाही मारला.





शेंद्रीला जवळपास ५२ मिनीटे थांबून गाडी ०९.१४ ला निघाली. आणि ०९.३८ ला कुर्डूवाडीत फ़लाट क्र. वर दाखल झाली.

कुर्डूवाडीला मजा होती. फ़लाट क्र. वर मिरज-निजामाबाद पॆसेंजर उभी होती. थोड्याच वेळात सोलापूरकडून सोलापूर-कोल्हापूर एक्सप्रेस फ़लाट क्र. वर दाखल झाली. (आजकाल मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस आणि मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस जेव्हा सोलापूर आणि कोल्हापूरला पोहोचतात तेव्हा दिवसभर नुसतं यार्डात पडून राहण्यापेक्षा त्याच गाड्यांना अनुक्रमे सोलापूर-कोल्हापूर आणि कोल्हापूर-सोलापूर एक्सप्रेस म्हणून पाठवतात. म्हणजे महालक्ष्मी एक्सप्रेस--कोल्हापूर-सोलापूर एक्सप्रेस--सिद्धेश्वर एक्सप्रेस सिद्धेश्वर एक्सप्रेस --सोलापूर-कोल्हापूर एक्सप्रेस--महालक्ष्मी एक्सप्रेस अशा रितीने त्या मुंबईला परततात. फ़क्त सोलापूर-कोल्हापूर या दोन्ही बाजुंच्या प्रवासात त्यांचा प्रथम वर्ग वातानुकूल आणि द्विस्तरीय वातानुकूल शयनयानाचा डबा बंद ठेवतात.)

आमच्याच मार्गावर जाणारी ही गाडी कानामागून आली आणि निघाली सुद्धा. तेव्हढ्यात फ़लाट क्र. वर ११०१४ अप कोइंबतूर-लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) एक्सप्रेस गाडी आली. मध्य रेल्वेच्या लाडक्या गाड्यांपैकी ही एक गाडी. नवीन प्रकारचे एंजिन या गाडीला लागले होते.



20040, WDP 4, SWR, KJM shed.

११०१४ अप गाडीची रचना : गार्ड पार्सल, साधारण, शयनयान (एस- ते एस-१०), भोजनयान, एस-११, बी- ते बी- (वातानुकूल त्रिस्तरीय शयनयान), - (वातानुकूल द्विस्तरीय शयनयान), एच.- (वातानुकूल प्रथम वर्ग + वातानुकूल द्विस्तरीय शयनयान), साधारण, गार्ड पार्सल.

ही गाडी पण अगदी थोडाच वेळ रेंगाळली आणि रवाना झाली. एव्हाना सकाळचे दहा वाजून गेलेले होते. दौंडकडून मुंबई-पंढरपूर पॆसेंजर गाडी फ़लाट क्र. वर आली आणि आमची गाडी हलली. (१०.२९ वाजता)

कुर्डूवाडी ते पंढरपूर हा प्रदेश हिरवागार आहे. आता कुठेही थांबता गाडीने चांगला वेग घेतला. डिझेल एंजिन आपला चिरपरिचित आवाज करीत वेगाने मार्ग आक्रमू लागले. पंढरपूरच्या अगदी आधी चंद्रभागेचा पूल लागला. भर उन्हाळ्यातही नदीला पाणी भरपूर होते. नदीकडे आणि वाळवंटाकडे बघत हात जोडल्या गेलेत. किती सज्ज्न सत्पुरूषांचे आणि संतांचे पाय त्या वाळवंटाला लागले असतील, लागत असतील आणि लागतीलही.

पंढरपूर स्थानकाबाहेर बार्शी लाइट म्हणून ओळखल्या जाणा-या आणि आत्ताआत्तापर्यंत अस्तित्वात असणा-या नॆरो गेज रेल्वेचे एंजिन आणि एक डबा ठेवला आहे. पण पंढरपूर स्टेशन मला इंप्रेस करू शकले नाही. पंढरपूर (११.१७--११.२६)

सतीशला फ़ोन केलेलाच होता. आता अगदी ३० किमी वर सांगोला. सतीश स्टेशनवर घ्यायला येणार होता आणि मी नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करायला उत्सुक झालो होतो.