आपल्या भारतीय संस्कृतीतला एक अत्यंत महत्वाचा वारसा म्हणजे आपली पुराणे. त्यातही श्रीमदभागवत महापुराण म्हणजे सर्व भाविकांना अत्यंत प्रिय असणारे. हे नुसते पुराणच नाही तर हा इतिहास आहे. गेल्या ५००० वर्षांपासून हे महापुराण आपल्या भारतवर्षात अगदी रोज शेकडो, हजारो घरांमधून, मंदिरांमधून, मठांमधून वाचले जातेय, परिशीलन केले जातेय. असा ग्रंथ एकूणच या विश्वाच्या इतिहासात विरळा.
भाविक भक्तांना यात भगवंताच्या लीला दिसतात, इतिहास अभ्यासकांना या ग्रंथात तत्कालीन इतिहासाच्या पाऊलखुणा सापडतील, साहित्यिकांना यात संस्कृत साहित्यातली सौंदर्यस्थळे दिसतील, भाषा अभ्यासकांना या ग्रंथामधून एकाच शब्दरचनेतून अर्थाची अनेक वलये निर्माण करणारी भाषा कशी असू शकते याचे प्रत्यंतर येईल तर अध्यात्माच्या साधकांना भगवान महर्षी वेदव्यासांनी ह्या पुराणाची समाधीभाषेत रचना कशी आणि का केली ? हा प्रश्न त्यांच्या अध्यात्माला सहाय्य करेल. असा विविध अंगांनी अभ्यासण्याजोगा, मनन करण्याजोगा, समाजातल्या सर्व प्रकारच्या सुष्ट प्रवृत्तींच्या पिंडाचे पोषण करणारा हा ग्रंथ सर्वांना आवडला नसता तरच नवल.
कुठल्याही ग्रंथाची फ़लश्रृती म्हणजे आज आपण ज्याला Outcomes Based Education हा शब्द वापरतो तेच आहे. हा ग्रंथ वाचण्याने मला काय मिळेल ? या प्रश्नाचे उत्तर ही फ़लश्रृती देते. फ़रक इतकाच आहे. आज एखादा विषय सुरू होण्याआधीच आपण त्यातले Outcomes वाचतो तर श्रीमदभागवत रचिल्या गेले त्याकाळी सर्व ग्रंथांची, स्तोत्रांची फ़लश्रृती ही त्या ग्रंथाअंती, स्तोत्राअंती असे. तो ग्रंथ, ते स्तोत्र अगदी मनोभावे वाचल्यानंतर, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा, आजूबाजूच्या परिस्थितीचा अगदी विलय करून त्यात संपूर्णपणे बुडून गेल्यानंतर ग्रंथाच्या शेवटी ग्रंथकारांनी लिहीलेली फ़लश्रृती वाचकाच्या, साधकाच्या प्रत्यक्ष अनुभवाला यायची. हाच त्या ग्रंथाचा प्रसाद. आपण एखाद्या ग्रंथाला प्रासादिक ग्रंथ म्हणतो ते हे असे. ज्या ग्रंथाची फ़लश्रृती ही त्या ग्रंथ वाचकाच्या प्रत्यक्ष अनुभवाचा भाग ठरायची, त्याच्या विचारांमध्ये आणि एकूणच जीवनामध्ये प्रसा्दरूप व्हायची तो प्रासादिक ग्रंथ.
आजच्या बदलत्या युगात आपल्या Outcomes Based Education प्रथेमध्ये एखादा विषय शिकण्याआधीच आपण त्याचे Outcomes म्हणजे फ़लश्रृती बघतो आणि आपल्याला हा विषय शिकायचाय की नाही ? शिकायचाय तर का शिकायचाय ? या प्रश्नांचा मनोमन धांडोळा घेतो आणि तो विषय अभ्यासतो किंवा अभ्यासत नाही.
श्रीमदभागवताच्या अखेरच्या म्हणजे द्वादश खंडामध्ये या ग्रंथाची फ़लश्रृती सांगितलेली आहे. ती फ़लश्रृती आणि श्रीमदभागवत ग्रंथरचनेमागील घटनांच्या साखळींची पार्श्वभूमी याचा अगदी निकट संबंध आहे. आणि ती फ़लश्रृती सुरूवातीलाच आपण अभ्यासली तर हा ग्रंथ आपण का अभ्यासायचा ? याविषयी आपल्या सर्वांची मनोभूमिका पक्की होत जाईल. म्हणून श्रीमदभागवताची फ़लश्रृतीआपण यापुढील लेखात अभ्यासूयात. आणि त्यानंतर श्रीमदभागवत ग्रंथातल्या काही महत्वाच्या सौंदर्यस्थळांना आपण भे्टी देऊयात. हे कार्य पूर्णत्वास जावे अशी सर्व इष्टदेवता आणि सदगुरूंना दंडवत घालून नम्र विनंती करतो आणि आजपुरता विरमतो.
- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन"ज्येष्ठ वद्य प्रतिपदा शके १९४८ दिनांक १ / ७ / २०२६
१ जुलै २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#जुलै२०२६