Thursday, July 30, 2026

श्रीमदभागवत चिंतन - २९ भगवंतांचे नामकरण आणि यमलार्जून उद्धार

यदुवंशीयांचे आचार्य गर्ग्यमुनी वसुदेवांच्या आज्ञेवरून एकेदिवशी गोकुळात आलेत. नंदबाबांनी त्यांचे यथोचित स्वागत केले आणि त्यांची स्तुती केली. आचार्यांनी आपला गोकुळात येण्याचा हेतू नंदबाबांना सांगितला. नंदाघरी वाढत असलेल्या वसुदेवांच्या दोन्हीही पुत्रांचे नामकरण. पण जर तो नामकरण विधी मोठ्या थाटामाटात आणि वाजत गाजत केला असता तर कंसाच्या गोकुळातील दूतांनी ही बातमी नक्की कंसापर्यंत पोहोचविली असती. कंस मोठ्या अस्वस्थतेने देवकीच्या आठव्या पुत्राचा ठावठिकाणा शोधत होता. त्याला ही वार्ता कळताच त्याने गर्ग्यमुनींद्वारे नामकरण संस्कार झालेले वसुदेवांचे पुत्र सहज ओळखून त्यांना हानी पोहोचविली असती.


गर्ग्य मुनींनी आणि नंदबाबांनी संगनमताने नंदबाबांच्या वाड्यातच एका गोठ्यात जाऊन या दोन्हीही पुत्रांचे नामकरण केले. रोहिणीच्या पुत्राचे नाव रौहिणेय ठेवले. तो आपल्या आसपासच्या सवंगड्यांना आणि सोबत्यांना या जगात रमवेल अशी भविष्यवाणी करून त्याचे दुसरे नाव राम ठेवण्यात आले. तो अत्यंत बलशाली असल्याने त्याला बल असेही नामाभिधान झाले. तो सर्व लोकांमध्ये समबुद्धीने बघेल आणि लोकांमध्ये फ़ूट पडलीच तर तो त्यांचा मिलाप घडवून आणेल म्हणून त्याचे आणखी एक नाव संकर्षण सुद्धा ठेवण्यात आले.


दुस-या पुत्राबाबत गर्ग्यमुनी म्हणालेत की या पुत्राने यापूर्वींच्या जन्मात श्वेत (पांढरा), रक्त (लालवर्णी) आणि पीत (पिवळा) अशी रूपे धारण केलेली आहेत. या जन्मात हा काळा रंग याने धारण केला आहे म्हणून याचे नाव कृष्ण असे ठेवण्यात यावे. वसुदेवांचा पुत्र असल्याने लोक याला वासुदेव म्हणूनही ओळखतील. गर्ग्यमुनी पुढे म्हणाले की या पुत्राची हजार नावे आहेत. प्रत्येक नावाला न्याय देण्यासाठी हा पुत्र ते ते गुण धारण करील. हा प्रत्यक्ष नारायणाचाच अवतार आहे. हा तुमच्या सगळ्यांवर आपली कृपादृष्टी ठेवेल. याचे सान्निध्य, नामस्मरण कुठल्याहे लौकिक किंवा पारलौकिक शत्रूला तुमच्यावर विजय मिळवू देणार नाही.


अशाप्रकारे गुप्ततेत नामकरण विधी आटोपल्यानंतर गर्ग्यमुनी निघून गेलेत. इकडे गोकुळात या दोन्हीही बालकांच्या बाललीला सुरू झाल्यात. छोट्याछोट्या पाऊलांनी रांगताना ते दोघेही घरभर फ़िरत असत. त्यांच्यामागे फ़िरताना, त्यांच्या बाललीला अवलोकन करताना त्यांची जननी आणि समस्त गोपींना मनापासून आनंद होत असे. त्यांचे बोबडे बोबडे बोल ऐकण्यासाठी समस्त गोकूळ अत्यंत व्याकूळ होत असे. थोडेच दिवसांमध्ये ही बालकी मोठी झाली आणि गोकूळातल्या गोपी यांची लाडिक तक्रार घेऊन यधोदामैय्याकडे येऊ लागल्यात.



एकदा यशोदामैय्या आपल्या दैनंदिन कामात मग्न असताना कृष्ण तिच्याकडे आला आणि दूध पिण्याचा हट्ट करू लागला. यधोदामैय्याने त्याला मांडीवर घेतले आणि हातात घेतलेले काम करीतच त्याला दूध पाजण्यास सुरूवात केली. यशोदामैय्या आपल्या दैनंदिन कामात जरा जास्तच मग्न आहे आणि तिचे माझ्याकडे लक्ष नाही हे पाहून भगवंतांनी जवळच असलेला एक लोटा लोण्याच्या घड्याला फ़ेकून मारला आणि तो घडा फ़ोडला. इतक्या मेहेनतीने काढलेले लोणी अशा प्रकारे मातीमोल केल्याचे पाहून यशोदामैय्याला कृष्णाचा राग आला आणि तिने त्याला बांधून ठेवण्याचे ठरविले. त्याला पकडण्यासाठी ती धावली तेव्हा तो जवळच असलेल्या उखळात लपून बसला. तिने हीच संधी साधली आणि त्याला उखळाला बांधण्याचे ठरविले.


श्रीमदभागवतकार वर्णन करताहेत की ज्या परमात्म्याला आजवर कुणीही काळाच्या आवाक्यात, शत्रूंच्या तडाख्यात, षडरिपूंच्या तावडीत, ब्रह्मांडात बांधू शकले नाही त्याला त्याची आई तरी कशी बांधेल ? यशोदामैय्याने कृष्णाला बांधायला जावे आणि दरवेळी ती दोरी दोन बोटे कमी पडावी असा खेळ व्हायचा. बरे, तिला जोड म्हणून दुसरी दोरी आणली तर ती सुद्धा अंती दोन बोटे कमीच पडायची. शेवटी यशोदामैया वैतागली आणि तिने कृष्णालाच "कृष्णा, बांधू दे न रे." अशी विनंती केली आणि कृष्ण बांधल्या गेला. श्रीमदभागवतकार सांगताहेत की जो ब्रह्मांडात कुणाच्याही तावडीत कधीच सापडत नाही, हजारो वर्षे तप, ध्यान करून जो अनेक योग्यांना गवसत नाही तो भगवंत भक्तीमुळे, प्रेमामुळे, अकृत्रिम प्रेमामुळे सहज वश होतो आणि भक्ताच्या हृदयात बांधल्या जातो. भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्तीमार्गाचे श्रेष्ठत्वच या घटनेवरून अधोरेखित झालेले आहे. 



भगवंत उखळाला बांधलेल्या अवस्थेतच नंदबाबांच्या अंगणात गेलेत आणि तिथे असलेल्या एका अशोकवृक्षांच्या जोडीमधून बाहेर निसटण्याची लीला करू लागलेत. त्यावेळी त्यांच्या कमरेला बांधलेले उखळ नेमके आडवे झाले आणि त्यांनी त्या वृक्षांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताच ते वृक्ष मुळापासून उन्मळून पडलेत. आणि त्यातून दिव्य शरीर धारण केलेले दोन सुंदर कुबेरपुत्र प्रगट झालेत. मागील जन्मात देवर्षि नारदांच्या शापामुळे या दोन कुबेरपुत्रांना हा वृक्षाचा जडदेह प्राप्त झाला होता पण देवर्षि नारदांनीच दिलेल्या उःशापामुळे आज भगवंताच्या हातून त्यांना या जडदेहातून मुक्ती प्राप्त होऊन पुनश्च दिव्यदेह प्राप्त झाला होता. दोघांनीही आपल्या मुक्तीदाता कृष्णाला वंदन केले, त्याची स्तुती गायली आणि ते आपल्या कुबेरलोकात रवाना झालेत.


आपण मनुष्य सुद्धा या जडदेहात आहोत. आसपासच्या अत्यंत भौतिकवादी जगात आपले जगणे, वागणे आणि आपली बुद्धीसुद्धा भौतिकवादी झालेली आहे. यातून सुटण्यासाठी आणि शाश्वत अशाश्वताचा विवेक मनात सदैव जागृत रहावा यासाठी आपल्या मनात भगवंताविषयी भक्तीचे बीज रोवले जाऊन कायमस्वरूपी तिची प्रस्थापना होणे अत्यंत आवश्यक आहे. श्रीमदभाववताचा हा बोध आहे आणि तोच या कथेचा प्रसाद आहे.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढी पौर्णिमा, व्यासपौर्णिमा, गुरूपौर्णिमा शके १९४८ दिनांक  २९ / ७ / २०२६


२९ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


No comments:

Post a Comment