Tuesday, July 28, 2026

श्रीमदभागवत चिंतन - २८ पूतनावध

श्रीकृष्ण गोकुळात वाढतो आहे हा वृत्तांत जाणून कंसाने आपले राक्षसी दूत गोकुळात धाडले. त्यातलीच एक मायावी राक्षसी म्हणजे पूतना. तिने अत्यंत सुंदर सुस्वरूप स्त्रीचा वेष धारण केला आणि अंतरात अगदी काळकूट विष घेऊन ती गोकुळात आली आणि जन्मलेल्या नवजात शिशूंचा शोध घेऊ लागली. तिच्या बाह्य वेषामुळे गोकुळातल्या साध्यासुध्या गोपांना आणि गोपींना तिचा अजिबात संशय आला नाही. अशीच ती पूतना मायावीरूपाने नंदबाबांच्या वाड्यावर आली आणि तिच्यावर संशय नसल्याने ती सरळ अंतःपुरात घुसली.



तिथे तिने श्रीकृष्णाला स्तनपान करविण्याची इच्छा दर्शविली. तोपर्यंत सगळ्या गोकुळात नंदबाबांचा हा लोभसवाणा मुलगा इतका लोकप्रिय झालेला होता की त्याला बघण्यासाठी, त्याला स्पर्श करण्यासाठी, त्याचे लाड करण्यासाठी, त्याला स्तनपान करविण्यासाठी गोपी सदैव उत्सुक असत. त्यामुळे नंदबाबांच्या वाड्यात पूतनेला कुणी अटकाव केला नाही.


पूतनेने श्रीकृष्णाला आपल्या स्तनांशी धरले. शास्त्रकार सांगताहेत त्याक्षणी श्रीकृष्णाने आपले डोळे गच्च मिटून घेतले. त्या मायावी रूपाचे दर्शनसुद्धा भगवंताला नको असते. तिने काळकूट विष लावलेल्या आपल्या स्तनाद्वारे श्रीकृष्णाला दूध पाजण्याचा प्रयत्न केल्याबरोबर श्रीकृष्णांनी तिचे स्तन तोंडात आपल्या घेऊन जोरात आकर्षण करायला सुरूवात केली. इतक्या जोरात की ती महाशक्तीशाली पूतना राक्षसी कळवळली. "अरे, सोड, सोड"असा आकांत करू लागली पण भगवंतांनी एकदा ज्याला धरले त्याला ते कधीच सोडत नाहीत हे त्या राक्षसीला माहिती नव्हते. तिने त्या बालकाच्या तावडीतून सुटण्याचा जीवाच्या आकांताने प्रयत्न केला पण शेवटी आपले महाकाय स्वरूप प्रगट करीत ती मृत्यूमुखी पडली. गोकुळातल्या लोकांनी तिच्या रडण्या ओरडण्याचा आवाज ऐकून नंदबाबांच्या वाड्यात धाव घेतली तेव्हा तिथे मरून पडलेली विशालकाय पूतना आणि तिच्या अंगावर निर्भयपणे क्रीडा करणारे नंदबाबांचे हे बालक त्यांना दिसले. 



गोपींनी धावून जात त्या बालकाला पूतनेच्या शरीरावरून उचलले. त्याला न्हाऊ माखू घातले. मोठ्या संकटातून तो वाचला म्हणून बालरक्षा स्त्रोत्र म्हणत त्याची दृष्ट काढली. हे बालरक्षा स्तोत्र सर्व भाविकांनी आपापल्या घरी संग्रही ठेवण्यासारखे आणि आपापल्या मुलांच्या रक्षेसाठी नित्य पठण करण्याजोगे आहे.


इकडे गोपांनी तो पूतनेचा विशाल देह अक्षरशः तुकडे करून वनात नेऊन जाळला. जाळल्यानंतर तो देह जळत असताना त्यातून दिव्य सुगंध बाहेर पडत होता. एका राक्षसीच्या देहातून बाहेर निघणारा हा दिव्य सुगंध अनुभवून सगळ्या गोपांना अतिशय आश्चर्य वाटले. पण शास्त्रकार सांगताहेत की भगवंतांना दुष्ट हेतूने का होईना स्तनपान करवून पूतनेने त्यांच्या मातेचा दर्जा प्राप्त करून घेतला होता. त्यामुळे तिचा देह दिव्य झाला आणि त्यातून सुगंध बाहेर पडत तो देह नष्ट झाला.


भगवंताचा अगदी द्वेषभावनेने ध्यास घेऊन त्याला भजले तरी त्या जीवाला मुक्ती मिळाल्याची अनेक उदाहरणे श्रीमदभागवतात आहेत. मग आपण जर त्याच्यावर प्रेम करून त्याचा ध्यास घेतला तर तो आपल्यासारख्या सर्वसामान्य साधकांना का बरे भेटणार नाही ? आपला का बरे उद्धार करणार नाही ?


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥



- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध चतुर्दशी, शके १९४८ दिनांक  २८ / ७ / २०२६


२८ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 




No comments:

Post a Comment