Saturday, July 11, 2026

श्रीमदभागवत चिंतन - ११ वराह अवतार

भगवान विष्णूंचे द्वारपाल पार्षद जय आणि विजय. भगवंताच्या निकट राहून, अगदी स्वर्गात राहून तिथली सुखे उपभोगताना त्यांनी ब्रह्मकुमारांचा अपमान केला. खरेतर दुःखापेक्षा सुखी अवस्थेतच मनुष्याने आपल्या मनाला जपले पाहिजे. दुःखी मन कालांतराने सावरू शकते पण सुखी अवस्था मनाला उन्मादी स्वरूप देऊ शकते. जय आणि विजय या भगवंतांच्या पार्षदांकडून नेमका हाच अपराध घडला आणि त्याच्या परिणामी त्यांना पृथ्वीतलावर जन्म घेण्याचा आणि स्वर्गसुखांना पारखे होण्याचा शाप मिळाला. साधूंच्या अपमानामुळे तीन जन्म स्वर्गसुखापासून वंचित व्हावे लागले. ते तीन जन्म म्हणजे हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू, रावण आणि कुंभकर्ण व शिशुपाल आणि दंतवक्त्र. या तीनही जन्मात भगवंताने स्वतः अवतार घेऊन आपल्या पार्षदांना मोक्षप्राप्ती करून दिली.



हिरण्याक्ष अवतार या भूतलावर झाला आणि त्याने धुमाकूळ घालायला सुरूवात केली. पृथ्वी अगदी रसातळाला नेली. आपल्या खगोलशास्त्रीय निरीक्षणांनुसार आपल्या पृथ्वीतलावर हायड्रोजन आणि ऑक्सीजन पासून पाण्याची निर्मिती, त्यानंतर पाण्यातील विविध वनस्पती आणि प्राण्यांची निर्मिती, त्याअनुषंगाने जमिनीवर विविध जिवाणू, झाडे आणि त्यानंतर मानवी जीवनाची निर्मिती ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पृथ्वीच्या सूर्यापासून असलेल्या विशिष्ट अंतरामुळे, पृथ्वीच्या एका विशिष्ट अंशात कललेल्या आसामुळे आणि सूर्यमाला निर्माण झाल्यानंतर जे विविध वायूंचे गोळे सूर्याभोवती फ़िरता फ़िरता हळूहळू थंड होत ग्रह बनलेत त्यांच्या विशिष्ट परिवलन गतीमुळे आपल्या पृथ्वीवर मानवी जीवनासकट एकूणच जीवसृष्टीविषयी पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. तसे आपल्या या सूर्यमालेच्या इतर कुठल्याही ग्रहावर निर्माण होऊ शकत नाही. यात थोडाजरी बदल झाला तरी आपल्या पृथ्वीवरील एकूणच जीवसृष्तीच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊन जीवसृष्टी लयाला जाऊ शकते.

हिरण्याक्ष हा अत्यंत बलवान आणि तामसी वृत्तीचा असल्याने त्याने आपल्याला ज्ञात असलेल्या आकाशगंगांच्याही पलिकडे कुठेतरी असलेल्या स्वर्ग नावाच्या निराळ्या प्रतलातून आपल्या सूर्यमालेत प्रवेश करीत हा समतोल बिघडवण्याचा प्रयत्न केला असावा. आपणच निर्माण केलेली ही सृष्टी अशी कुणीतरी तामसी वृत्तीने नाश करीत असेल तर ते सृष्टीनिर्मात्याला अजिबात आवडत नाही. त्यामुळे भगवंतांनी ब्रह्माजींच्या नाकपुड्यांमधून बाहेर येत वराह अवतार धारण केला.



या जीवसृष्टीला आधार ठरणा-या पृथ्वीच्याच गतीत, अक्षाच्या अंशात परिवर्तन करू पाहणा-या आणि इतकी सुंदर निर्मिती नष्ट करू पाहणा-या हिरण्याक्ष राक्षसाशी भगवंतांनी युद्ध केले आणि आपल्या दाढांमध्ये धरून रसातळाला जात असलेली पृथ्वी पुन्हा आपल्या ठिकाणी प्रस्थापित केली. पृथ्वीवरील त्यानंतर जीवन फ़ुलवायला मदत केली.

आपल्या या सृष्टीत सगळ्या जीवांचे काही ना काही महत्व आहे. अगदी लहानतल्या लहान, क्षुद्रातल्या क्षुद्र जीवांचीही या सृष्टीत काही कर्तव्ये आहेत, निश्चित असे प्रयोजन आहे. कुठल्याही जीवाला त्याच्या बाह्य रूपावरून, तो या पृथ्वीतलावर करीत असलेल्या कार्यावरून लहान किंवा मोठे, चांगले किंवा ओंगळ संबोधण्यापूर्वी त्या जीवाचे इथले कार्य आणि तो त्याच्या कार्यामुळे इथे करीत असलेले उपकार आपण सूज्ञजनांनी स्मरून त्याचा आदर करायला हवा हे तत्व आपल्याला शिकवण्यासाठीच भगवान विष्णूंनी आज आपल्याला छोटासा, दुर्लक्षणीय आणि सामान्य वाटत असलेल्या वराहाचा अवतार इथे घेतला.

आज आपल्यापैकी प्रत्येकानेच ही पृथ्वी तिच्यावरील जीवसृष्टीसकट पुन्हा एकदा रसातळाला नेण्याकरिता हिरण्याक्ष अवतार घेण्याचा चंग बांधला आहे की काय अशी अवस्था आहे. आज आपण फ़क्त मनुष्यांचाच, त्यांच्याच सुखांचा, त्यांच्याच सोयीपुरता विचार करतो आहोत. आपल्या कुठल्या कृतीमुळे या सृष्टीला, तिच्यावर आजवर पोसल्या गेलेल्या एकूणच जीवसृष्टीला धोका पोहोचू शकेल, ही पृथ्वी पूर्णपणे नष्ट होऊ शकेल याचा अगदी थोडा विचारही आपल्याला शिवत नाही. आपल्या सगळ्यांच्या जीवनकालात तर यातले काही होणार नाही मग आजच त्याची चिंता का करायची ? आज खाओ, पिओ, ऐश करो हाच चार्वाक विचारसरणीचा विचार आपल्या सगळ्यांना व्यापून उरलेला आहे. यादृष्टीने आपण या हिरण्याक्ष राक्षसाचे आणि भगवंतांनी घेतलेल्या वराह अवताराचे चिंतन करणे व आपल्यामुळे या जीवसृष्टीचा समतोल अजिबात बिघडू नये याची जाणीवपूर्वक काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे. या कथेचे चिंतन नेमके हेच आहे.  


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥





- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" ज्येष्ठ वद्य द्वादशी शके १९४८ दिनांक  ११ / ७ / २०२६


११ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


No comments:

Post a Comment