Monday, July 27, 2026

श्रीमदभागवत चिंतन - २६ श्रीकृष्णावतार

श्रीमदभागवताचा दशम स्कंध म्हणजे श्रीमदभागवताचे हृदय समजले जाते. आपल्या सर्वांच्या लाडक्या श्रीकृष्णाचे चरित्र या स्कंधातल्या ९० अध्यायांमध्ये अतिशय विस्ताराने वर्णन केलेले आहे. इतके विस्ताराने की श्रीमदभागवत हा ग्रंथ भगवान श्रीकृष्णाचे वाङ्मयीन स्वरूप समजले जाते. श्रीमदभागवताचा दशम स्कंध श्रीगणेशाला वर्णन करताना महर्षी वेदव्यास आपले देहभान विसरले आणि भावसमाधीत गेले. त्यांच्यात प्रवेश करून प्रत्यक्ष भगवंताने हा दशम स्कंध श्रीगणेशाला कथन केला असे मानले जाते आणि म्हणून दशम स्कंध ही वेदव्यासांची वाणी नसून प्रत्यक्ष भगवंताचे कथन आहे असे म्हणतात.


भाविक श्रोतृवर्गालासुद्धा दशम स्कंध ऐकताना अगदी आपल्या हृदयापासून एक निराळाच आनंद प्राप्त होतो. जसा नंदाघरी रोज सकाळी आनंदोत्सव साजरा होत गेला तसा आपल्या घरीही असा निखळ आनंदोत्सव साजरा होत जावा अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा होत जाते. प्रत्येकाच्या हृदयात शिरून त्यात असलेले मालिन्य नष्ट करून निखळ आनंद प्राप्त करून देणारा हा दशमस्कंध. याचा आनंद आपण पुढले काही दिवस घेऊयात.


मथुरेचा राजा कंस हा एक अत्यंत दुष्ट आणि रागीट राजा होता. त्याच्या दुष्टपणाला आणि अकारण कोपाला कंटाळून त्याच्या राज्यातल्या सुजाण नागरिकांनी त्याकाळच्या अन्य राज्यांचा आश्रय घेतला होता. स्वतःची बहीण देवकीचा विवाह वसुदेवांशी झाल्यानंतर जी आकाशवाणी झाली त्यात कंसाला देवकीचा आठवा पुत्र आपल्या मृत्यूला कारणीभूत होणार असल्याचे कळले. तो संतापाने बेभान झाला आणि त्याने आपल्या बहिणीला व जावयाला तुरूंगात टाकले. देवकीच्या पोटी जन्म झालेल्या सहाही पुत्रांना त्याने अत्यंत क्रूरपणे ठार केले. सातव्या पुत्राची गर्भधारणा देवकीच्या उदरी झाल्याबरोबर तिला या पुत्राची सुद्धा काळजी वाटू लागली. आधीच्या सहा पुत्रांप्रमाणे हा सुद्धा आपल्या भावाच्या हातून जन्मतःच मारला जाणार असे तिला वाटून तिची मुद्रा म्लान झाली.


सर्वशक्तीमान भगवंतांनी आपल्या योगमायेला बोलावून आज्ञा केली की आत्त्ता देवकीच्या उदरी असलेला गर्भ आकर्षण करून गोकुळात नंदबाबांचीच एक पत्नी असलेल्या रोहिणीच्या उदरी तिने प्रस्थापित करावा आणि योगमायेने नंदबाबांची पत्नी यशोदेच्या उदरी जन्म घ्यावा. भगवंत म्हणतात आता ज्ञान आणि बळ धारण करून संपूर्ण पराक्रमाने पृथ्वीतलावर अवतार घेण्याची वेळ आलेली आहे. मी देवकीच्या उदरी तिचा आठवा पुत्र म्हणून जन्म घेणार आहे. भगवंतांनी योगमायेला अनेक आशिर्वाद दिलेत आणि भगवंताचे कार्य करायला योगमाया पृथ्वीवर आली. तिने तुरूंगात असलेल्या देवकीच्या गर्भाचे आकर्षण करून त्याला गोकुळात असलेल्या रोहिणीच्या गर्भात प्रस्थापित केले. भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे हेच ते संकर्षण. गर्भाचे आकर्षण केल्यामुळे त्यांचे नाव संकर्षण पडले. खरे तर हे भगवंताच्या सावलीसारखे राहणारे शेषावतार. गतजन्मी भगवंताच्या बंधूंचा जन्म घेऊन त्यांच्यासोबत सावलीसारखा वनवास भोगलेले लक्ष्मण. भगवंतांना सोडून राहणार नाही ही यांची प्रतिज्ञा. त्यानुसार हे या जन्मात भगवंतांचे मोठे भाऊ म्हणून जन्माला आलेत. या जन्मात हे सर्व लोकांना रमविणारे होते म्हणून यांचे नाव "राम" झाले आणि अत्यंत बलवान होते म्हणून यांचे आणखी एक नाव "बलभद्र" असेही झालेत. श्रावण पौर्णिमेला यांचा जन्म नंदपत्नी रोहिणीच्या पोटी गोकुळात झाला.


इकडे तुरूंगात देवकीचा सातवा गर्भ गळाल्याची बातमी कंसाला कळाली. त्याला आता सतत आठव्याची भिती वाटू लागली. सतत आठव्याचा त्याने जणू ध्यासच घेतला. सतत आठव्याचा आठव तो करू लागला. दुसरा विषयच त्याला सुचेना. नुसत्या आगमनाच्या वार्तेने तो पराक्रमी दुष्ट राजा सैरभैर झाला.


इकडे भगवंतांनी त्यांच्या पूर्ण तेजासह वसुदेवाच्या शरीरात प्रवेश केला आणि स्वतःला देवकीच्या उदरी प्रस्थापित केले. देवकीला आनंद तर झाला होता पण इतर पुत्रांचे आपल्या बंधूने जे जन्मतःच हाल केले ते पाहून तिला या बालकाची काळजी सुद्धा वाटत होती. काय गंमत आहे बघा. जो सगळ्या जगाची काळजी घेतो त्याची काळजी त्याच्या आईवडिलांनाच असते. आपणही भगवंताकडे सदैव मागणे सोडून त्याची त्याच्या आईबापासारखी काळजी केली तर आपण त्याचे मानलेले का होईना आईबाप होऊच ना ? केवळ त्याच्यावर प्रेम आहे म्हणून त्याला आळवून बघूयात का ? त्याच्याकडून अगदी कुठलीही अपेक्षा न करता. यादरम्यान आपल्याला प्राप्त होणारी सुखदुःखे ही त्याचीच देण म्हणून त्या सुखदुःखांकडे त्रयस्थतेने बघूयात. असे देवाचे मायबाप व्हायला किती आनंद मिळेल नाही ?


भगवंताच्या अवताराची वार्ता ऐकल्यानंतर साक्षात ब्रह्माजी आणि शंकरजी त्या कारागारामधल्या खोलीत आलेत आणि त्यांनी भगवंतांची स्तुती केली. विश्वनिर्मात्या ब्रह्माजींनी आणि श्रीशंकरजींनी विश्वपालक भगवान विष्णूंची केलेली ही स्तुती ही श्रीमदभागवतात मुळापासूनच वाचण्यासारखी आहे. ही स्तुती नुसती पठण किंवा श्रवण केल्याने आपल्या मनातले सगळे मालिन्य, किल्मिष नष्ट होते हा अनेक साधकांचा प्रत्यक्षानुभव आहे.  


श्रावण वद्य अष्टमीच्या मध्यरात्री भगवान श्रीकृष्णांनी आपल्या चतुर्भुज स्वरूपात संपूर्ण ऐश्वर्यासह देवकीच्या उदरातून जन्म घेतला. त्यांचे ते दिव्य रूप बघून आपल्या पोटी प्रत्यक्ष श्रीविष्णूंनी जन्म घेतलेला आहे याची जाणीव वसुदेवांना आणि देवकीला झाली. त्यांनी भगवंताची स्तुती केली आणि त्यांना सर्व जगताचे कल्याण करण्याची प्रार्थना केली. भगवंतांनी आपल्या आईवडिलांना त्यांच्या यापूर्वीच्या दोन जन्मांचे स्मरण दिले. यापूर्वीच्या दोन्हीही जन्मांमध्ये वसुदेव आणि देवकी यांनी भगवंत आपल्या उदरी यावेत अशी मनापासून कामना करून ते दोघेही अत्यंत सात्विक जीवन जगले होते. त्याचे फ़ळ म्हणून प्रत्यक्ष भगवान विष्णू आपल्या पूर्णांशाने त्यांच्या उदरी आलेले होते.



भगवंतांनी योगमायेला आदेश दिल्याप्रमाणे तिने कंसाच्या तुरूंगाच्या सर्व द्वारपालांना गाढ निद्रेत ठेवले. स्वतः योगमायेने गोकुळात नंदपत्नी यशोदेच्या पोटी जन्म घेतला पण जन्मानंतर भगवंताच्या आज्ञेप्रमाणे यशोदामातेला ग्लानीत ठेवले. आपल्याला मुलगा झालाय की मुलगी झालीय हे न समजण्याइतक्या ग्लानीत. इकडे वसुदेवांनी भगवंताच्या आज्ञेनुसार आपले बालक आणि यशोदेचे बालक यांची अदलाबदल यमुनापार गोकुळात जाऊन केली. यशोदेच्या शेजारी भगवान कृष्ण निजलेत आणि देवकी व वसुदेवाला ठेवलेल्या कोठडीत योगमायेने आकांत मांडला.



भगवंताला बघायला, त्यांचे चरणस्पर्श करून आशिर्वाद घ्यायला प्रत्यक्ष यमुना नदी सुद्धा अत्यंत व्याकूळ झाली होती. वसुदेवांच्या मथुरा ते गोकूळ या प्रवासात तिने भगवंतांना चरणस्पर्श केलाच आणि ती पावन झाली. आपल्या प्रत्येकाघरी भगवंतांच्या जन्माचा असा आनंदोत्सव दररोज पहाटे साजरा व्हावा हीच मनापासून कामना करतो आणि आज इथे विरमतो.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध द्वादशी, शके १९४८ दिनांक  २६ / ७ / २०२६


२६ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 



No comments:

Post a Comment