ब्रह्माजींचे पुत्र दक्षप्रजापती आणि स्वायम्भुव मनु यांची कन्या प्रसूति यांचा विवाह झाला आणि त्यांना एकूण सोळा कन्यारत्ने प्राप्त झालीत. दक्षप्रजापतीने त्यातल्या तेरा कन्या धर्माला, एक अग्निला, एक पितृगणाला आणि सती नामक एक कन्या या संसाराचा संहार करणा-या आणि समस्त जीवांना जन्म मृत्यूच्या फ़े-यातून मुक्त करणा-या भगवान शंकराला दिली.
एकदा दक्षप्रजापतींनी एक यज्ञ केला. त्यात यजमान म्हणून ते स्वतः यज्ञस्थळी आल्यानंतर त्याठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व देव देवतांनी त्यांना आपापल्या आसनांवरून उठून आदराने वंदन केले.भगवान शंकर मात्र आत्मस्वरूपात मग्न असल्याने त्यांनी मात्र दक्षप्रजापतींना उठून वंदन केले जाही. ते आपल्या आसनावरच बसून राहिले. ते पाहून दक्षप्रजापतींचा क्रोध अनावर झाला. महादेव शंकरांनी से कृत्य मुद्दामच केले असा त्यांनी ग्रह करून घेतला आणि जमलेल्या सभेला उद्देशून ते महादेवांविषयी, त्यांच्या गणांविषयी वाईट साईट बोललेत. आत्मचिंतनात मग्न असल्याने महादेव शंकरांवर त्यांच्या बोलण्याचा काहीही परिणाम झाला नाही, किंबहुना त्यांनी आपल्या सासरेबुवांनी काढलेले अनुदार उदगार ऐकलेच नाहीत. ते आत्मानंदात मग्न होते.
हे बघितल्यानंतर दक्षप्रजापतींच्या रागाचा पारा अधिकच चढला. त्यांनी महादेवांना यज्ञाचे कुठलेच फ़ळ, कुठलाही हविर्भाग कधीच प्राप्त होऊ नये असा शाप दिला. वास्तविक सभेत जमलेली इतर थोर मंडळी दक्षप्रजापतींना असे न करण्याबाबत सांगत होती पण क्रोधात पूर्णपणे बुडाल्याने त्यांनी इतर जनांचे न ऐकता महादेवांना आणि त्यांच्या इतर गणांना हा शाप दिलाच.
शिवगणांमधल्या नंदिकेश्वराला हा महादेवांचा अपमान सहन झाला नाही. त्याने दक्षप्रजापती आणि त्यांना अनुमोदन देणा-या सभेतल्या इतरांना उलट शाप दिला. प्रत्यक्ष जन्म आणि मृत्यूच्या फ़े-यातून सर्व जगताला मुक्त करणा-या महादेव शंकरांचा देहापलिकड्ला विचार ज्या जनांना समजत नाही ते जन देहातच अडकून बसोत, कर्मकांडांमध्येच त्यांचा जीव सदैव अडकला राहो. महादेव शंकरांचा मुक्तीचा त्यांना लाभ न होवो असा शाप नंदिकेश्वराने दक्षप्रजापतींना आणि त्यांना साथ देणा-या सभाजनांना दिला.
यावर भृगूंनी पुन्हा महादेव शंकरांना आणि त्यांच्या समस्त गणांना सदैव पाखंड मार्गाने जाण्याचा आणि नियत कर्म न करता अशौच अपवित्र मार्गातच सदैव राहण्याचा शाप दिला. यावेळेपर्यंत महादेव आपल्या भानावर आलेले होते. झालेला प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते खिन्न झालेत आणि आपल्या गणांसह ते यज्ञस्थळ सोडून आपल्या निवासस्थानी परतलेत.
आपल्याही आयुष्यात असे काही प्रसंग येतात. कधीकधी कुणाकडून तरी त्याच्याही नकळत एखादी चूक घडलेली असते पण त्याची मनोवस्था जाणून न घेता, त्या व्यक्तीने ती चूक जाणीवपूर्वक केलेली आहे असा आपला ग्रह होतो आणि आपण त्या व्यक्तीविषयी ग्रह करून घेतो, क्वचित त्याचा अपमानही करतो. शब्दाने शब्द, मुद्याने मुद्दा वाढत जातो आणि अगदी अकारण आत्मीय संबंध दुरावतात. आपल्याबरोबर झालेल्या वादविवादांमध्ये खरेच मुद्दे किती आणि आपल्या अहंकारांमुळे आपल्याला न कळलेली सत्यस्थिती किती याचे विश्लेषण आपण जर आपल्या मनाशी केले तर आपल्याला आपल्या अनेक भांडणामधला, वादांमधला फ़ोलपणा कळून येईल. आपले मन शुद्ध होईल, निर्मळ होईल. ही कथा ऐकण्याचा, मनन करण्याचा हाच प्रसाद आहे. तो आपल्या मनाला मिळतो.
त्या यज्ञानंतर ब्रह्माजींनी दक्षप्रजापतींना अधिक उच्चपद दिले आणि त्यांचा अहंकार वाढला. त्यांनी आणखीही दोन महायज्ञांचे आयोजन केले आणि महादेवांचा जाणीवपूर्वक अपमान करण्यासाठी फ़क्त त्यांना निमंत्रण न देता आपल्या इष्ट मित्रांना, सगळ्या देवांना आणि आपल्या इतर कन्या, जावयांना यज्ञासाठी बोलाविले. त्या यज्ञांची वार्ता ऐकून महादेवपत्नी सती आपल्या आईला, वडिलांना, इतर बहिणींना भेटण्यासाठी, त्यांचे कुशलवृत्त विचारण्यासाठी उत्सुक झाली आणि यज्ञाला उपस्थित राहण्यासाठी आपल्या पतींची, महादेवांची परवानगी मागू लागली.
महादेव शंकरांनी आपल्या पत्नीची समजूत काढली. अगदी आप्त स्वकीय असले कुठली घरे जाण्यासाठी वर्ज्य करावीत यावर महादेव शंकरांचा आपल्या पत्नीला केलेला श्रीमदभागवतातील चतुर्थ स्कंधातला हा उपदेश समस्त दांपत्यांनी मुळापासून वाचण्यासारखा आणि कायम लक्षात ठेवण्यासारखा आहे. पण पतीच्या विवेक विचारपेक्षा त्याक्षणी सतीच्या मनातली आपल्या आईला, बहिणींना इतर आप्तजनांना भेटण्याची इच्छा प्रबल ठरली आणि ती आपल्या पित्याने आयोजित केलेल्या यज्ञस्थळी रवाना झाली. यावेळी अत्यंत नाईलाजाने महादेवांनी तिला परवानगी दिली.
यज्ञस्थळी आल्यानंतर महादेवपत्नी, दक्षकन्या सतीने आपल्या आईची, बहिणींची प्रेमपूर्वक भेट घेतली. इथे त्या सगळ्यांना खरोखर खूप आनंद झाला होता पण पित्याने आयोजित केलेल्या यज्ञात आपल्या पतीच्या परोक्ष त्याचा जाणीवपूर्वक अपमान करीत हे कार्य संपन्न होत असल्याचे तिच्या लक्षात आले. किंबहुना आपल्या पतीचा जाणीवपूर्वक अपमान करण्यासाठीच या कार्याचे आयोजन करण्यात आल्याचेही तिच्या लक्षात आले. आपले पती महादेवांनी वारंवार न जाण्याविषयी विनंते करूनही आपण आपल्या पित्याकडील कार्यात आलोय या गोष्टीचा तिला पश्चात्ताप झाला आणि महातेजस्वी महासतीने त्या यज्ञस्थळीच आपल्या पित्याची व महादेवांच्या अपमानात त्यांना साथ देणा-या इतरांची अत्यंत कडक शब्दात निर्भत्सना केली. आपल्या पतीच्या सर्वसंसारातल्या समस्त जीवांच्या कल्याणाच्या रूपाची प्रशंसा केली आणि त्या पश्चात्तापातच आपला देहत्याग केला.
महासतीच्या देहत्यागानंतर सर्व घटनाक्रम जाणून महादेव शंकर अतिशय क्रुद्ध झालेत. त्यांचा पार्षद असलेल्या वीरभद्राकडून त्यांनी दक्षयज्ञाचा विध्वंस आरंभला आणि आपल्या पत्नीच्या वियोगात शोकसागरात बुडून गेलेत. त्यावेळी त्यांचा क्रोध शांत करण्यासाठी ब्रह्माजींनी आणि भगवान महाविष्णूंनी त्यांची, त्यांच्या कार्याची यथार्थ स्तुती केली आणि त्यांचे तांडव थांबवले. अन्यथा महादेव आपल्या क्रोधाग्नीत ही समस्त सृष्टी विनाशाकडे नेणार होते. तसे झाले नाही.
कर्ममार्गाने विधिवत आचरण करून,व्यवस्थितपणा ठेऊन भगवंतांची आराधना करणा-यांने केवळ बाह्य रूपाने एखाद्याला जोखू नये. बाह्यरूपाने एखाद्या वेळेला शास्त्र असंमत, मलिन असलेल्या एखाद्याच्या अंतरात मात्र अत्यंत शुद्ध भावना, पावित्र्य असू शकते याचा विचार करून, त्या व्यक्तीचा विश्वकल्याणाचा, भगवंताला प्राप्त करून घेण्याचा मार्ग मार्ग निराळा असला तरी तो समजून त्याचा आदर करीत आपण परस्परसंबंध जपले पाहिजेत हाच या कथेचा अन्वयार्थ. श्रीमदभागवत हे भगवान विष्णूंच्या लीलांचे वर्णन असले तरी समस्त शिवभक्तांसाठी अतिशय पूजनीय असा हा चतुर्थ खंड आणि त्यातले हे पहिले सात अध्याय.
॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥
- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" ज्येष्ठ वद्य चतुर्दशी शके १९४८ दिनांक १३ / ७ / २०२६
१३ जुलै २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#जुलै२०२६
No comments:
Post a Comment