Showing posts with label नागपूर. Show all posts
Showing posts with label नागपूर. Show all posts

Monday, August 10, 2026

चितार ओळः नागपूरचा एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा.

आमचे बालपण इतवारीतल्या पोथी गल्लीत गेले. 


शाळाः सी.पी.ॲण्ड बेरार, महाल. 


रोजचा शाळेचा प्रवास चितार ओळीतूनच व्हायचा. त्या काळी बसने फक्त बाहेरगावी किंवा शहरात लांबच्या ठिकाणी (अभ्यंकर नगर, जयप्रकाश नगर वगैरे ठिकाणे शहराबाहेर गणली जायचीत.) जाता यायच हो. "स्कूल बस" हे लाड नव्हते हो. घराजवळ एक दीड किमी अंतरावर शाळा असली की कशाला बस ? आपली ११ नंबरची "विनोबा ट्रॅव्हल्स"च खरी आणि बरी.


आज बर्‍याच वर्षांनी गणपतीच्या मूर्तीचे advanced booking करायला चितार ओळीत गेलो. बालपण पुन्हा जगलो. एक पिढी पूर्ण बदलली. मेट्रो अगदी जवळून चाललीय पण चितार ओळ अजूनही बदलली नाही हे बघून खूप छान वाटल. सोबत असलेल्या कन्यारत्नाला माझ्या बालपणात घेऊन जाताना टिपलेली क्षणचित्रे. बालपणी कॅमेरा ही अतीव चैनीची गोष्ट होती. असता तर त्याकाळची क्षणचित्रे आणि आजच्या क्षणचित्रांमध्ये कणभरही फरक नसल्याच दाखवून देता आल असत.










Saturday, August 8, 2026

विदर्भ, न्यूयॉर्क, मुंबई आणि पुणे

 मी बघितलेय की विदर्भाच्या बाहेर पायही न ठेवलेली मंडळीच पुण्याला नाके मुरडतात.

असे म्हणतात की न्युयाॅर्कमध्ये जेवढे सिसिलीयन आहेत तेवढे खुद्द रोममध्ये नाहीत.

मुंबईत जेवढे भोजपुरी आहेत तेवढे खुद्द पाटण्यात नाहीत.

आणि

पुण्यात जेवढे वैदर्भिय आहेत तेवढे तर नागपूर आणि अमरावती मिळूनही नाहीत.

उद्या वेगळा विदर्भ झालाच तर कोथरूडला त्या राज्याचा दूरस्थ जिल्हा म्हणून समाविष्ट करावे लागेल, आहात कुठं ?

मला माझ्या नागपूरइतकेच पुण्याचेही कौतुक वाटते. तिथल्या हवेतच काहीतरी वेगळेपणा आणि freshness आहे. पुलंनी कितीही म्हटलं की पुणेकर व्हायला तुम्हाला विशेष मेहेनत करावी लागेल पण माझा अनुभव असा आहे की पुण्यात गेल्यावर पुणे शहर एखाद्याला इतकं स्वतःत सामावून घेतं की ती व्यक्ति पुणेकरच होऊन जाते. 

फक्त हिंजवडी चा उच्चार "हिंजेवाडी" असा करू नये. एकवेळ तुम्ही "अहो, ती पानपतची लढाई म्हणतात ती पुण्यात कुठशी झाली हो ?" हा प्रमाद करू शकता पण "हिंजेवाडी" हा उल्लेख म्हणजे तुम्ही "गंगा किनारेवाले आणि ग्यानगंगा एक्सप्रेसने पुण्यात उतरलेले भैय्या" असेच पुणेकर मानतात आणि ते रास्तही आहे.

- जन्माने नागपूरकर, कर्मभूमीव्दारे मुंबईकर असलेले पण पुणेकरांच्या बुध्दीमत्तेविषयी, वेगळेपणाविषयी अपार आदर असलेले, रामशास्त्री किन्हीकर.

पुणेकरांवर लिहीलेले दोन लेख खालच्या इथे आणि इथे.

Monday, July 27, 2026

प्रवास: एक अनुभव, एक चिंतन.

जानेवारी २०१३. नागपूरला ३ - ४ दिवस एका समारंभासाठी राहून सांगोला मुक्कामी परतत होतो. नागपूर - अमरावती - कारंजा लाड - मालेगाव जहांगिर - मेहेकर - सिंदखेडराजा - जालना - छत्रपती संभाजीनगर - अहिल्यानगर - करमाळा - टेंभूर्णी - पंढरपूर - सांगोला असा साधारण ८०० किमी प्रवासाचा मार्ग होता. 


भल्या पहाटे ४.३० ला नागपूरवरून प्रस्थान ठेवल्याने व वाटेत चहा, नाश्ता वगैरे गोष्टींसाठी वेळ न दवडता सलग ड्रायव्हिंग केल्याने दुपारी १.०० च्या सुमारास छत्रपती संभाजीनगर ओलांडल्या गेले होते. ४५० किमी ८ तास ३० मिनीटांत. लांबचे प्रवास अंतर कापायचे तर मधले थांबे कमी आणि कमीत कमी वेळाचे घायचेत हा आमचा नेहमीचा दंडक. म्ह्णून मग सकाळी निघतानाच भरपूर चहा पिऊन, थर्मासभरून चहा आणि कागदी कप्स घेऊन, घरीच बनविलेल्या सॅंडविचेस, ब्रेड बटरसारखा कोरडा नाश्ता घेऊन (म्हणजे गाडी चालवताना ड्रायव्हरसाहेबांनाही त्या नाश्त्याचा आनंद घेता येईल असा) गाडीतच चालता चालता चहा नाश्ता उरकून सलग गाडी चालवायची असा शिरस्ता.


छत्रपती संभाजीनगर  झाल्यानंतर मात्र सगळ्यांनाच भुकेची जाणीव झाली होती. आता अहिल्यानगर साधारण ३.०० पर्यंत आणि सांगोला संध्याकाळी ७.३० पर्यंत असे हिशोब डोक्यात आकार घेऊ लागले होते. जेवण्यासाठी एक तास जरी थांबलो तरी सांगोला रात्री ८.३० पर्यंत पोहोचणार होतो. ते चालण्यासारखे होते. अहिल्यानगर सोडल्यानंतर मात्र करमाळा, जेऊर शिवाय थांबून जेवण्यासारखी ठिकाणे नव्हती. करमाळा , जेऊर यायला संध्याकाळच झाली असती. मग अहिल्यानगरच्या आधीच जेवणाचा बेत पक्का झाला.


नेवासे फ़ाटा, घोडेगाव वगैरे गेल्यानंतर हायवेलगतच एक सुंदर ढाबा दिसला. अर्थात शुद्ध शाकाहारी. अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी, सुंदर संकल्पना आणि मस्त ambience चा. 



थांबलो. झाडांच्या सावलीतच मस्त मांडी घालून, बैठक लावून निवांत जेवण केले. बेत साधासाच होता. झुणका - भाकरी, वांग्याचे मस्त भरीत आणि तोंडीलावणे म्हणून लगतच्याच शेतामधून तोडून आणून चुलीवरच भाजलेल्या मिरच्या आणि टोमॅटो. पंचेंद्रियांना तृप्त करणारा अनुभव घेतला. आणि नव्या उर्जेने उरलेला २५० किमीचा सांगोल्याकडचा मार्ग क्रमू लागलो.





पहिल्यापासून नियोजन नसले की कधीकधी अशा अनवट जागा एक वेगळाच अनुभव देऊन जातात, नाही ? या सगळ्या नवनव्या, नित्यनूतन अनुभवांचा स्वतःला शोध लागत जाणे म्हणजेच प्रवासाची खरी मजा. नुसते "क्ष" ठिकाणावरून "य" ठिकाणापर्यंत जाणे म्हणजे प्रवास नाही.


- स्वच्छंद आणि मनमौजी प्रवासी पक्षी, वैभवीवल्लभ राम.

Sunday, July 19, 2026

मुसळधार पावसाच्या काही थरारक आठवणी

सध्या, माझा आवडता ऋतू, पावसाळा सुरू आहे. रात्रभर झोपेनंतर सकाळी उठल्यावर जर सूर्य उगवल्यानंतरही अंधारलेल्या वातावरणात, पावसाची रिपरिप कानी येत असली की 


"पाऊस कधीचा पडतो

झाडांची हलती पाने

हलकेच जाग मज आली

दुःखाच्या मंद सुरांने" 

ही ग्रेसची कविता आठवते.

 

बदल असलाच तर फक्त ग्रेसच्या "दुःखाच्या मंद सुरांने" ऐवजी "सुखाच्या मंद सुरांने" ही भावना असते. खरोखर असे झोपेतून जागे होताना पाऊसाची रिमझिम कानी पडणे यासारखे सुख नाही. सर्द, गार वातावरणात कामाचाही उत्साह वाढतो हा माझा अनुभव. दिवसाची अशा प्रकारे छान सुरूवात होते.


आजवर अगदी बालपणचे ३-४ सोडलेत तर चांगले ४० - ४५ पावसाळे नुसते बघितलेच नाहीत तर सजगतेने अनुभवलेले आहेत. प्रत्येक पावसाळा खूप छान. पण एकदोन भितीदायक पण अनुभव आहेत.

२६ जुलै २००५ च्या मुंबईच्या ढगफुटी पावसात (१००० + मिमी  पाऊस आणि तो सुध्दा एका दिवसात) सापडल्याचा अनुभव सव्वा तपानंतर आजही काटा आणतो. 


असाच एक चित्रमय अनुभव.


१८/०७/२०१३ : सांगोल्यावरून काॅलेजनंतर संध्याकाळी ५ वाजता आम्ही निघालोत. नागपूरला गुरूमहाराजांकडे श्रीगुरूपौर्णिमा उत्सवासाठी मी, सौ. वैभवी आणि चि. मृण्मयी आमच्या गाडीने निघालो. तत्पूर्वी गाडीने सांगोला ते नागपूर हा ७५० किमी प्रवास दोनवेळा केलेला असल्याने त्या आघाडीवर निर्धास्त होतो.


रात्री ९ वाजता लातूर गाठले. ४ तासात २२० किमी. लातूरला एक मोटेल शोधले. विश्रांती घ्यायला लागलो.


१९/०७/२०१३ : पहाटे ५ ला उठून पटकन आवरून ५.३० ला प्रस्थान ठेवले. वाटेत हायवेवरच अहमदपूरच्या एका छोट्याशा हाॅटेलमधे सकाळी ७.०० वाजता गरमागरम इडली सांबार आणि चहा घेतला. इतकी अप्रतिम इडली आणि चविष्ट सांबार अख्या दक्षिण भारताच्या प्रवासातही कुठेच चाखायला मिळाला नव्हता. आजही ती चव अगदी जिभेवर आहे.


पाऊस तसा सोबत होताच पण रिमझिम. दुपारी ११.३० च्या आसपास नांदेड जिल्हा सोडून विदर्भात प्रवेश केला तेव्हा विदर्भातल्या पावसाचे वैदर्भीय माणसासारखेच उखडेल आणि रौद्रभीषण स्वरूप दिसायला सुरूवात झाली.




"हा इदर्भाचा मानूस का नाय, सरका रायला त सरका रायते बाप्पू. आन येकडाव का याच टायक सरकल का नाय त मंग पुरती आत्तरपित्तर काढून ठ्येवते त्यो." हे वैदर्भीय माणसाचे आणि पावसाचेही स्वभाववर्णन.


वाटेत धनोडावरून जाताना श्रीक्षेत्र माहूरला जाऊन अर्ध्या तासात कुलदेवतेचे, रेणुकामायेचे, दर्शन घेऊयात ही कल्पना आली. गाडी त्यादिशेने घेतली.




वाटेत विदर्भ मराठवाड्याला विभागणार्‍या अरूणावती नदीवरील पूल लागला. इतकी दुथडी भरून वाहणारी नदी मी आजवर कधीच पाहिली नव्हती. माहूरवरून दर्शन घेऊन परतेपर्यंत तरी पुराचे पाणी पुलावर येऊ नये अशी प्रार्थना करीतच माहूरला गेलो. दर्शन घेतले. साधारण तासाभरातच त्याच रस्त्याने परतलो. सुदैवाने पूर पुलापर्यंत पोहोचला नव्हता.



त्या जोरदार मार्‍यातच, नागपूरच्या, घराच्या ओढीने सावधानतेने गाडी चालवत वर्धा गाठले. आता काय ? शेवटचा ७० - ७५ किमीचाच पल्ला. थोडे सैलावलो. पण खरी कसोटी इथेच होणार होती.


वर्धा - नागपूर रस्त्याने केळझर सोडले आणि खडकी सेलडोह परिसरात इतका पाऊस लागला की गाडीतल्या गाडीत आम्हाला एकमेकांशी ओरडून बोलावे लागत होते. गाडीवर पावसाच्या मार्‍याचा अतीप्रचंड आवाज, हमरस्त्यावर पाटासारखे, प्रचंड वेगाने इतस्ततः वाहणारे पाणी काळजाची धडकी भरवणारे होते. 


इंग्रजीत खूप बदाबदा पावसाला "It is raining Cats and Dogs" असा वाक्प्रचार आहे पण हा पाऊस म्हणजे "It was raining Elephants and Rhinos" या वर्णनाचा होता. मार्गात आसर्‍याला थांबण्यालायक जागा नव्हती आणि गाडी एका जागी स्थिर थांबली असती याची खात्री नव्हती. पाण्याच्या प्रवाहात गाडी वाहत जाण्याची दाट शक्यता आम्हाला कुठे थांबू देत नव्हती.


हळूहळू आणि ड्रायव्हिंगचे सगळे कौशल्य पणाला लावून वर्धा ते नागपूर अंतर दोन तासात कापून घरी आलो. सुटकेचा निःश्वास सोडला. अत्यंत भीतीदायक आणि विचित्र पाऊस.



दुसर्‍या दिवशी (२०/०७/२०१३) सकाळी वर्तमानपत्र उघडले आणि सिंदीजवळ आदल्या दिवशी संध्याकाळी झालेल्या पावसाच्या मार्‍यात रेल्वेमार्गाचा भरावच वाहून गेल्याची बातमी वाचली आणि पुन्हा एकदा काळजाचा थरकाप उडाला.

काल आम्ही याच वेळेस त्याच जबरदस्त पावसाच्या पट्ट्यात सापडलो होतो. थांबलो असतो तर काय झाले असते ही कल्पनाही करवत नव्हती. गुरूमाऊलीचे, परमेश्वराचे आभार मानले.


गुरूपौर्णिमा उत्सव आटोपून परतताना मात्र एक वेगळीच मजा झाली. परतताना नागपूर - अमरावती - कारंजा (लाड) - मालेगाव (जहांगिर) - मेहेकर - देऊळगावराजा - जालना - अंबड - गेवराई - बीड - चौसाळा - मांजरसुंबा - कुंथलगिरी - येरमाळा - बार्शी - कुर्डुवाडी - पंढरपूर - सांगोला असा ८०० किमीचा मार्ग निवडला होता. एका दिवसात अंतर कापले गेले पाहिजे म्हणून नागपूरवरून पहाटे ४.३० ला च निघालो. वाटेत सतत पाऊस. सारखी आपली रिपरिप, रिपरिप. दिवसभर गाडीचे वायपर्स सुरू ठेवल्यामुळे तो आवाज संध्याकाळपर्यंत नकोसा वाटायला लागला होता. बरे, पाऊसही असा खट्याळ की वायपर्स बंद केलेत की असा वाढायचा की समोरचे दिसेनासे होईल. आणि वायपर्स सुरू केलेत की आपला रिमझिम, रिमझिम. वायपर्सची गरज नाही असे वाटणारा.


संध्याकाळी ७ च्या सुमारास जवळपास ७८० किमी अंतर कापून पंढरपूर - सांगोला रस्त्यावरील खर्डी गावी पोहोचलोत तर काय आश्चर्य ! सगळा परिसर कोरडाठाक. गेले वर्षभर इथे पाऊस नसल्यासारखा. खर्डी पासून सांगोल्यापर्यंत, २० किमीच्या पट्ट्यात,  पाण्याचा टिपुस नाही आणि गेल्या दोन तीन दिवसात पडल्याचा मागमूस नाही. 

संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस दमदार हजेरी लावत असताना हा भाग कोरडाच्या कोरडा. "पर्जन्यछायेचा प्रदेश" हे भुगोलाच्या पुस्तकात केवळ शिकलो होतो, त्यादिवशी अनुभवले.


- अनेक विद्यार्थ्यांचा गुरूजी असलो तरी सतत कसली ना कसली शिकवण देणा-या जीवनाला एक गुरू मानणारा वैभवीराम मास्तर.

Wednesday, December 16, 2020

का ग बाई रूसलीस ? तोंड फुगवून कोपर्‍यात लपलीस.




अम. चांदूर रेल्वे डेपोच्या गाड्या नागपूरला फारशा येत नाहीत.
त्यातही ही एक गाडी आलेली होती पण डेपोच्या कोपर्यात जाऊन तोंड लपवून फुरंगटून बसली होती.
गणेशपेठ, नागपूर डेपो.
१२/११/२०२०.
Rare visitor at Nagpur Bus Stand.
MH 13 / CU 7369
MG Alma built MSRTC bus.
Mild Steel body.
Chandur Railway depots bus at Nagpur depot.