भगवान श्रीकृष्णांनी पूतना, शकटासूर, तृणावर्त आणि आता यमलार्जून यांना दिलेली मुक्ती गोकुळातल्या गोप गोपींना मोठी आश्चर्यकारक वाटली होती. कृष्णाला सर्वजण आपल्या पुत्राप्रमाणे समजत असल्याने ही त्याचीच लीला असेल अशी शंकाही त्यांना शिवली नाही. याउलट कृष्णावर गोकुळात फ़ार संकटे येत आहेत असे वाटून त्यांनी कृष्णासाठी आणि स्वतःच्या कुटुंबियांसाठी व गोधनासाठी सुरक्षित जागेचा शोध सुरू केला आणि गोकुळाजवळच असलेल्या वृंदावनात त्यांनी आश्रय घेण्याचे ठरविले. तिथे भरपूर वृक्षसंपदा होती, जनावरांच्या चा-यासाठी छान हिरवीगार कुरणे होती आणि गोपांना तिथे शांतता जाणवली. आपल्या कुटुंबियांसह, गोधनासह सगळे गोप गोपी वृंदावनात वास्तव्य करण्यास निघाले.
वृंदावनात आल्यानंतर सर्वांना विशेष आनंद झाला. गोपांसोबत गुरे चारण्यासाठी म्हणून कृष्ण आणि बलराम वनात जाऊ लागलेत. वनात गेल्यानंतर गुरे चरायला सोडल्यानंतर गोपांसोबत त्यांचे विविध खेळ रंगू लागलेत. रमविणारा राम आणि आकर्षिणारा कृष्ण हे दोघेही सोबत असल्याने गोपबालक त्यांच्या अवतीभोवतीच आपली दिनचर्या आखत असत. गोधन चरत असताना कृष्ण सुंदर मुरली वाजवीत असे. ती मुरली वाजत असताना गाईगुरे आपापला चारा खाणे विसरत असत आणि मुग्ध होऊन तो दिव्य सूर कानात साठवून घेत असत. दुपारच्या वेळी गोप आपली बांधून आणलेली शिदोरी कृष्ण आणि बलरामदादांसोबत खात असत. कृष्ण तेव्हा सगळ्या गोपांच्या शिदोरीतला थोडा थोडा भाग सेवन करीत असे. कधी एखाद्या गोपाने नुसतेच पोहे, नुसतेच लोणचे, नुसतेच दही जेवण्यासाठी आणलेले बघून कृष्ण सगळ्या गोपांना आपापल्या शिदो-या एकत्र करण्यास सांगत असे. सगळ्यांच्या विविध प्रकारच्या शिदो-या एकत्र झाल्यानंतर जो काही विशेष पदार्थ तयार होत असे तो गोपालकाला कृष्ण स्वतः सगळ्या गोपांना आग्रहाने भरवीत असे आणि स्वतःही मोठ्या आनंदाने फ़स्त करीत असे. आजपासून पाच हजार वर्षांपूर्वी दीनदुःखितांचा कैवारी कृष्ण आपल्या सवंगड्यांकडे किती बारकाईने लक्ष देत असे आणि त्यांच्या सामाजिक समरसतेसाठी काय करीत असे हे आपण आजही अनुकरण करण्यासारखे आहे. आपल्यासोबत कार्यरत असलेल्या चमूकडे जातीने लक्ष देणे, त्यांची सुखदुःखे वाटून घेणे आणि सगळ्यांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे ही आजच्या युगात सुद्धा आचरण करण्याजोगी Leadership Skills आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे आणि आपण भगवंताचे भक्त असू तर तसे जाणीवपूर्वक प्रयत्न आपल्याकडून व्हायला हवेत.
या लीला करीत असतानाच वृंदावनात आलेल्या आणि अजगराचे रूप धारण करून गोपबालकांना इजा पोहोचवू इच्छिणा-या अघासुराचा भगवंतांनी वध केला. दुष्टबुद्धीने भगवंताला मारण्यासाठी विशालकाय बगळ्याचे रूप घेणा-या बकासुराचा वध करून त्याला मुक्ती दिली. अशाच लीला वृंदावनात करीत असताना सृष्टीकर्ता ब्रह्मदेवांना भगवंतांची परिक्षा बघण्याची इच्छा झाली. भगवंत वनात असताना थोडेसे इतर कामात गुंतलेले पाहून त्यांनी सगळ्या गोप सवंगड्यांना त्यांच्या गोधनासकट वेगळ्या लोकात नेऊन ठेवले. भगवंत परतून बघतात तो सगळे गोप आणि सगळे गोधन अचानक नाहीसे झालेले होते. त्यांनी यामागील ब्रह्माजींची शक्ती ओळखली आणि स्वतःच्या रूपातूनच सगळे गोप बालक आणि त्यांची गोधने निर्माण केलीत. आणि कुठलेही काम न अडता ती सर्व मंडळी त्यादिवशी आपापल्या घरी गेलीत. गोपांनी आपल्या बालकांना हृदयाशी घेतले, गाईंनी त्यांच्या वासरांना पाजायला सुरूवात केली. भगवंतासोबत राहून प्रत्यक्ष भगवंतच आपल्या बालकांच्या रूपाने आपल्याजवळ आलेले आहेत हे त्या कुणालाच कळले नाही. फ़क्त त्यादिवशी आणि त्यानंतर त्या सगळ्या गोपांना आणि बछड्यांना एक विशेष आनंद मिळतो आहे याची जाणीव मात्र सदैव होत होती.
ब्रह्मदेवांनी वर्षभरानंतर हे सगळे अवलोकन केले आणि त्यांना भगवंताची लीला कळली. भगवंत प्रतिसृष्टी निर्माण करू शकतात हे ब्रह्मदेवांच्या लक्षात आले आणि त्यांनी भगवंताची स्तुती केली आणि सगळी गोपबालके आणि गोधन पुन्हा पूर्ववत वृंदावनात आणून दिले. या सगळ्या गोपबालकांना आणि गोधनाला गेल्या वर्षभरात काय झाले याची खबरच नव्हती. त्यांनी वर्षभरापूर्वी कृष्णाने मारलेल्या अघासुराची कथा जणूकाय आजच घडली आहे अशा स्वरूपात आपल्या घरी सांगायला सुरूवात केली आणि सगळ्या गोपांना खूप आश्चर्य वाटले. सृष्टीपालनकर्ता भगवंत कधी गरज पडली तर प्रतिसृष्टीची निर्मिती सुद्धा करू शकतो हेच भगवंतांनी या कथेतून सर्वांना दाखवून दिले. वृंदावनात दिवसेंदिवस सर्वत्र आनंदीआनंद पसरत होता.
॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥
- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण प्रतिपदा शके १९४८ दिनांक ३० / ७ / २०२६
३० जुलै २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#जुलै२०२६