Showing posts with label अभियांत्रिकी महाविद्यालय कराड. Show all posts
Showing posts with label अभियांत्रिकी महाविद्यालय कराड. Show all posts

Sunday, January 7, 2018

मौनं सर्वार्थ साधनम अर्थात माझे मौनाचे प्रयोग.

"मनुष्य हा प्रयोगशील प्राणी आहे" असे कुणीतरी म्हटले नसून मीच म्हटले आहे. "आपल्यावरून जग ओळखावे" हे ज्योतिबांचे वचन आम्ही आमच्या शालेय पाठ्यक्रमात अभ्यासलानंतर त्याचा अनुभव सतत घेणे सुरू आहे. मी स्वतः अत्यंत प्रयोगशील असल्याने मला समस्त मनुष्यमात्र प्रयोगशील असल्याचे वाटले तर नवल नाही. शालेय भौतिक आणि रसायनशास्त्रांच्या प्रयोगांपासून सुरू झालेली ही मालिका नुकतेच मिसरूड फ़ुटू लागल्यानंतर वडीलांच्या दाढीच्या डब्यातून सगळे साहित्य काढून त्याचा प्रयोग स्वतःच्या दाढीमिशांवर करण्यापासून सुरूवात झाली. (दाढी मिशा घोटून केल्याने वाढ लवकर होते असे कुणीतरी अत्रंगी मित्राने सांगितल्याचे आता ३० वर्षांनंतरही चांगलेच स्मरते)


शाळकरी वयात मिसरूड फ़ुटण्याआधीचा असा मी असामी.

कराड अभियांत्रिकी महाविद्यालयात वसतीगृहात असताना मग काय माझ्या स्वतःच्या मिशांवरील प्रयोगांना मोकळे रान मिळाले. महाविद्यालयीन स्नेहसंमेलनातील सादर होणा-या तीन अंकी नाटकादिवशी (प्रेमाच्या गावा जावे) स्वतःच्या मिशीवरचा प्रयोग फ़सल्याने आमच्या दिग्दर्शक सरांची चांगलीच बोलणी खावी लागल्याचेही स्मरते. मग ऐनवेळी सगळ्या मिशा सफ़ाचट करून नाटकाच्या वेळी कृत्रिम मिशी चिकटवावी लागली होती. ती पडेल या भीतीमुळे तोंड उघडून बोलायची चोरी झाल्याने माझे डॉयलॉग्ज सगळे पडले होते. सबब, मी प्रथमपासूनच प्रयोगशीलतेकडे झुकणारा माणूस आहे.


चार्ली चॅप्लीन मिशी

कृत्रिम मिशी पडण्याच्या भीतीने पडलेले डॉयलॉग्ज. 
(आजोबांच्या भूमिकेत आजचा आघाडीचा निर्माता दिग्दर्शक संदेश कुळकर्णी.) 

 ब-याच विचारवंतांकडून मौनाचे महत्व ऐकल्याने आपणही मौन पाळावे असे मला फ़ार वाटे. मूलतः बालपणापासूनच स्वभाव हा जास्त बडबडा आणि बहिर्मुख. थोड अंतर्मुख होऊन स्वतःच्या जीवनाविषयी गांभीर्याने वगैरे विचार करावा असे वाटण्याचे प्रसंग विरळाच. पण सध्या गेले दोन तीन आठवडे व्हॉटसऍप वरून "सकाळी किमान एकदोन तास तरी मौन पाळा. आठवडा, पंधरवाड्यात एक दिवस तरी मौन पाळले पाहिजे." अशा स्वरूपाचे निरोप दोनतीन वेळा आले. अनायासे पौष अमावास्या ही मौनी अमावास्या असल्याने त्या दिवशी मौन पाळावे का ? हा विचार मनात चमकून गेला. पण यंदा ही अमावास्या नेमकी मंगळवारी आलेली आहे. बर नोकरी म्हणावी तीच बोलण्याची. न बोललो तर पगार मिळणार नाही. मग कसले मौन पाळता ? नाही, दोनतीन वर्षांपूर्वी सांगोल्यात असताना ही अमावास्या रविवारी आली होती तेव्हा आयुष्यातले पहिले ऐच्छिक मौन पाळता आले असते. पण ते सुद्धा कुटुंबाच्या विरोधामुळे वाटाघाटी होऊन सूर्योदय ते सूर्यास्त एव्हढेच चालले होते.



मौनाबिनात जाण्याइतके आध्यात्मिक होण्याच्या प्रयत्नात आम्ही.

आज मात्र अगदी कडकडीत मौन पाळायचे ठरवले. हे मौन पाळणे म्हणजे एखादे वात्रट माकड पाळण्याएव्हढे कठीण असते हे माहिती नव्हते. आज रविवारी छान कटिंग वगैरे करण्याचे ठरले होते पण मौनात न्हाव्याला सूचना कशा देणार ? या विचाराने तो बेत पुढल्या रविवारवर ढकलला आणि दिवसभर घरातच काढायचे ठरवले.

मौनात असताना सोबत काही सल्ला मसलतीची वगैरे वेळ आलीच असो म्हणून अगदी डायरी आणि पेन वगैरे घेऊन जय्यत तयारीत बसलो होतो. कसच काय. यावेळेसचे माझे मौन सुपत्नी आणि सुकन्येने फ़ारच गांभीर्याने घ्यायचे ठरवले होते. मला एका शब्दानेही न विचारता घरात सगळ्या गोष्टी सुरू होत्या. रविवार म्हणजे माझा अत्यंत लाडका वार. खाण्यापिण्याची यादिवशी फ़र्माईशी चंगळ असते. आज नेमका घरी वडाभाताचा बेत होता. पण मौनात असल्याने फ़ार तारीफ़ करता आली नाही. बायकोचा गैरसमज झाला की यावेळेसचा वडाभात जमला नाही. तिनेही फ़ार आग्रह केला नाही. बोलण्यावर ताबा हवा म्हणजे जिव्हालौल्यावरही ताबा हवाच ह्या माझ्या समजूतीमुळे मी ही  जेवणाचा बेत मस्त असूनही अर्धवट उठलो. 

दुपारच्या वेळी आपले आवडते टीव्ही चॅनेल्स लावून बसावे म्हटले तर सुकन्येच्या हातात रिमोट. बोलता येईना आणि ती बघत असलेले श्रद्धा कपूर आणि वरूण धवन सारख्या मथ्थडांचे सिनेमे बघताही येईना. (एकवेळ मी तो सुजीत कुमार, विश्वजीत किंवा गेलाबाजार मनोजकुमारचा चित्रपट बघेन पण हे धवन, श्रद्धा कपूर वगैरे डोक्यात जातात.) 

रविवारी मला फ़ारसे कुणाचे फ़ोन्स येण्याइतका मी अजून व्हीआयपी झालेलो नाही पण या रविवारी मात्र कॉलेजच्या कार्ट्यांनी उच्छाद मांडला होता. बर सगळ्यांना सुपत्नीने "सर मौनात आहेत" हे सांगितले असते तरी त्यांच्यापैकी किती जणांना कळले असते याबाबत मला आणि तिलाही शंकाच होती. आज सगळीच कार्टी अगदी ठरवून फ़ोन्स करत होती की काय नकळे.

आत्ता संध्याकाळचा नित्य कार्यक्रम म्हणजे घराजवळील रविवार बाजारात जाऊन आठवड्याची भाजी खरेदी करणे. मी मौनात असल्याने सुपत्नीने एकटीने जाण्याची तयारी केली खरी पण हा कार्यक्रम म्हणजे माझ्याही आनंदाचा गाभा असल्याने मी स्वतःच तिच्यासोबत मुद्दाम गेलो. तसही दिवसभर घरात राहून वैताग आला होता. पण मग बाजारात सगळ्यांना मुकाटपणे पिशव्या घेऊन चालणारा नवरा आणि कर्तबगारीने भाजी खरेदी करणारी बायको असे दृश्य दिसत होते. पण मग विचार केला की हे दृश्य तर अगदी सर्रास सगळीकडे दिसत असते. पण तरीही सगळे भाजीवाले आपापला कामधंदा सोडून माझ्याचकडे बघत असल्याचा मला केवळ भास होत असावा.

आता संध्याकाळी एकदम "युरेका" क्षण आला. (मौन असल्यामुळे मी ओरडू बिरडू शकलो नाही म्हणा.) आपण आपल्या स्वतःलाच सापडल्याचा क्षण. आपण फ़ारच धडपडत असतो तसे आपल्यावाचून फ़ारसे कुणाचे काहीही अडत नसते हे शिकवणारा एक दिवस. मौनामुळे आत्मिक सामर्थ्यात वाढ होते की नाही ते मला माहिती नाही पण हे छोटे छोटे साक्षात्कार स्वतःचे स्वतःलाच होतात हे ही नसे थोडके. मध्ये मध्ये असे मौन पाळून आपण अंतर्मुख होण्याचा, आपल्या आयुष्याविषयी "उद्धरेत आत्मनात आत्मानम" चा जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा दिवस म्हणजे मौनाचा दिवस. मग हा दिवस नियमीतपणे जमेल तसा पाळण्याचा आणि त्याही पुढे जाऊन मौन सप्ताह आणि मौन महिना पाळण्याचाही प्रयत्न करण्याचा विचार पक्का झाला.




Wednesday, March 7, 2012

होळी - एका कवितेची आठवण




भासलीस तू जराशी, मला आगळी वेगळी,
कशी झाली सर्वस्वाची, ऐन भरात ही होळी ?

थोडा माझा दोष होता, थोडे तुझेही चुकले.
एका हाताने कधी कां, सांग वाजतेय टाळी ?

कधी बहरत होतो, कधी ओसंडत होतो,
चांदण्यात न्हाऊनही, कशी रिकामीच झोळी ?

तुझ्या जाण्याने गं आता, मला फ़िरून वाटते,
कां कपाळी गाळल्या, विधात्याने काही ओळी ?

जरी हरलो होतो मी, नाही तू पण जिंकली,
तुझ्या माझ्या आयुष्याची, कशी अजब ही खेळी ?

राम किन्हीकर
होळी, १९९२.

१९९२ चेच कवितांचे दिवस. असाच होळीच्या आधी मुक्तांगणसाठी (महाविद्यालयाचे भित्तीपत्रक) कविता करत होस्टेलला बसलो होतो. चित्तरंजन भट तिथे आला. माझ्या ओबडधोबड शब्दांना त्याने असे काही छंदात आणून शिस्तीत बसवले की यंव रे यंव. त्या कागदावर थोडे पोस्टरकलर वगैरे शिंपडून त्याला होळीचा ’फ़ील’ आणला आणि लागलीच मुक्तांगणला कविता लावली.

Thursday, February 9, 2012

"मी एक प्रवासी पक्षी" विषयी

कराडला अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना ज्या काही अविस्मरणीय वल्ली भेटल्या त्यातली एक वल्ली म्हणजे चित्तरंजन सुरेश भट. आम्ही पहिल्या वर्षाला असताना चित्तरंजन दुस-या वर्षाला होता. अत्यंत कुशाग्र बुद्धी पण तितकाच हळवा आणि कविमनाचा हा "सिनियर" आमचा मित्र कधी झाला ते कळलंच नाही. सुरेश भटांचा वारसा तो समर्थपणे चालवायचा. "सुरेश भट" ही काय चीज असेल! याचा अनुभव आम्ही चित्तरंजन कडे बघूनच करत असायचोत. तो सुद्धा तेव्हढाच प्रतिभावान आणि कलंदर कलावंत होता.


मला आठवतं १९८९ मध्ये आमची प्रथम सत्र परीक्षा सुरू होती आणि त्याच वेळी भारतात सार्वत्रिक निवडणुका होत होत्या. त्या निवडणुकांच्या निकालाबद्द्ल सर्वांनाच मोठ्या प्रमाणात उत्सुकता होती. (बोफ़ोर्स प्रकरणात विश्वनाथ प्रताप सिंघ बाहेर पडल्यानंतर झालेल्या या निवडणुका. धक्कादायक निकाल येतील अशी सर्वांनाच अपेक्षा होती आणि ती फ़लद्रुप झालीदेखील. मला आठवतंय विश्वनाथ प्रताप सिंघांचा शपथविधी झाला म्हणून पराग लपालीकरने ए ब्लॊकमधल्या लोकमान्य मेस मध्ये थाळीनाद करून पेढेही वाटले होते.)


त्याकाळी दूरदर्शनवरून दर तासा दोन तासांना निवडणूकविषयक विशेष वार्तापत्र सादर व्हायचे. परीक्षा सुरू होती आणि त्यातच निवडणूक निकालांचीही उत्सुकता अशा द्विधा मनस्थितीत आम्ही सारे जण होतो. (तेव्हा आम्ही सारे सी. ब्लॊक मध्ये रहायचोत)

असाच एकदा अभ्यास आटोपून (की गुंडाळून) आम्ही निवडणूक वार्तापत्र पहायला सी. ब्लॊकच्या टी. व्ही. रूममध्ये बसलेलो होतो मागे जोरदार आवाज येउ लागलेत म्हणून मागे वळून पाहिलं तर चित्तरंजनने त्याच्या परीने अभ्यास आणि निवडणुकींची उत्सुकता यावर मार्ग शोधून काढला होता. त्याने आपल्या खोलीतला अभ्यासाचा भलामोठा आणि अवजड टेबलच उचलून टी. व्ही. च्या रूममध्ये आणला होता आणि तसाच टी. व्ही. समोर अभ्यास त्याने त्या सत्रात केला. (एव्हढं करूनही त्याला क्लास कसा मिळाला? हे आम्हाला आजवर पडलेलं कोडंच आहे.)


महाविद्यालयीन जीवनात मी पण थोड्याफ़ार कविता करायचो त्यामुळे चित्तरंजनची आणि माझी मैत्री झाली. एकदा मी तिस-या वर्षात असताना माझ्या डी. ब्लॊकच्या खोलीत तो आला तेव्हा मी असाच काहीतरी शब्द जुळवत बसलो होतो. अनामिक हुरहूर, अज्ञात प्रिया, कलंदर कवी अशी काहीतरी कल्पना होती. चित्तरंजनला ती कळली आणि त्याने माझ्या पुढ्यातला कागद ओढून त्याच्या खूप सुंदर हस्ताक्षरांत एकदम लिहायला सुरूवात केली.


" मी एक प्रवासी पक्षी, क्षितीजावर भरकटलेला,
तुजला कैसे शोधावे, आसमंत धुरकटलेला,
मी निघून गेल्यावरती, म्हणतील लोक सारे,
होता तो फ़कीर वेडा, आपल्यातच गुरफ़टलेला"


आणि म्हणाला आता ही कविता पूर्ण कर आणि तुझ्या नावावर "मुक्तांगण"मध्ये (महाविद्यालयाचे भित्तीपत्रक) देउन टाक.

मी ब-याच लटपटींनंतर ती कविता पूर्ण केली.

"पूर्वक्षितीजी लाल उषेचा रंग हा कसा रसरसलेला,
मोरपंखी लेवून पालखी आसमंत हा मुसमुसलेला,
तो झडून गेल्यावरती म्हणतील लोक सारे,
होता तो फ़कीर वेडा आपल्यातच गुरफ़टलेला"


पण माझं कडवं हे त्या कवितेला लावलेल्या ठिगळासारखंच होतं ही माझी तेव्हापासूनची भावना आजतागायत आहे. त्यानंतर मी
ब-याचदा या कवितेचं वाचन खाजगी मैफ़िलीत आणि मित्रमंडळींमध्ये केलं पण दरवेळेची दाद चित्तरंजन साठीच होती हे माझ्या पुरतं ध्यानात होतं.

माझा हा प्रवासविषयक लेखनाचा ब्लॊग. याला समर्पक मथळा म्हणूनही मला हीच कविता सुचली आणि म्हणून " मी एक प्रवासी पक्षी"

(होळीवर लिहिलेल्या आणखी एका कवितेत चित्तरंजनने मला शब्द नीट वृत्तामध्ये आणि गझलेच्या वृत्तीमध्ये बांधायला मदत केलेली आहे. त्याविषयी नंतर कधीतरी.)

Tuesday, August 2, 2011

ठेंगणी माणसे.



ठेंगण्या माणसांचे, ठेंगणे संसार,I
ठेंगणेच घर, ठेंगण्यांचे.II

ठेंगण्यांचा व्याप, व्याप म्हणू नये,I
इवलेसे माप, ठेंगण्यांचे.II

हरभ-याचे झाड, ठेंगण्यांना माड,I
डबकेच आड, ठेंगण्यांना.II

ठेंगण्यांचे सुख, मोहरीएवढे,I
दुःखही तेव्हढे, ठेंगण्यांचे.II

ठेंगण्यांचे विश्व, स्वतःपुरतेच,I
आभाळ ठेंगणे, ठेंगण्यांचे.II

- सुधीर शरद गोखले


(ही कविता वृत्तीने ठेंगण्या माणसांसाठी आहे. उगाच नकारात्मक प्रतिक्रियांचा पाऊस नको.)

या कवितेची थोडी पार्श्वभूमी :

कराडला वसतीगृहात रहात असताना आम्हा समानविचारी मित्र-मैत्रिणींचा एक छान ग्रुप झाला होता. त्यातच तिसर्या वर्षात आम्हां सर्वांना कवितेच्या भुताने पछाडले आणि एप्रिल १९९२ च्या ३० दिवसांमध्ये आम्हा सगळ्यांकडूनच काही छान कविता झाल्यात. त्यात विश्वास सुतार होता, राजा चौधरी होता, विजय कुळकर्णी होता, सुधीर गोखले होता, लीना भिडे (आताची लीना सोमण) होती, मी होतो. आमचे श्रोते म्हणून सतीश तानवडे, शारदा गाडगीळ (तानवडे), वैशाली जोशी (फाटक), रोहिणी कुळकर्णी (गद्रे) ही सगळी मंडळी असायचीत. (रोज नवकवींच्या नवनवीन कविता ऐकणे, त्यासुध्दा ४,५ कवींकडून, म्हणजे मनःशांतीची कसोटीच होती. तेव्हा ते जाणवले नाही, आज जाणवतेय. मला वाटतं सतीशच सुंदर गाणं रोज ऐकायला मिळणे हा त्यावरचा उतारा होता.)

रोजच सगळ्यांचाच कडून छान कविता व्हायच्यात असं मात्र नाही. कधीकधी एखादी कविता फ़सायची सुध्दा. सुधीरने त्या कवितांना बुंदी हे नाव ठेवले होते. बुंदी जशी मुद्दाम पाडतात तशी कविता ही मुद्दाम पाडली की ती बुंदी. कविता या अंतःप्रेरणेतूनच व्हायला हव्यात तरच त्या प्रथम आपल्याला भावतात आणि मग वाचकांना हे तत्व फ़ार लवकर समजले ते सुधीरमुळेच. त्याची स्वतःची एक चांगली आणि मला आवडलेली कविता.

हा ब्लॊग लिहिताना विजय कुळकर्णीची खूप आठवण येतेय. तो आज हा ब्लॊग वाचायला नाही ही जाणीव छळतेय. विज्या हा ब्लॊग तुझ्यासाठीच.