Saturday, April 30, 2022

ती आई होती म्हणूनी...

इसवी सन १९५०. साधारण ४ - ५ वर्षांची मुलगी. घरचे धनकनकसंपन्न. त्याकाळचा २१ दिवसांचा टाइफाइड तिला झाला. २१ दिवस संपत आले न आले तोच टाइफाइड उलटला. पुन्हा २१ दिवस. अंगातली शक्ती क्षीण झालेली. सर्वांनी तिच्या जगण्याची आशा सोडलेली होती. त्याकाळच्या डझन, दीड डझन भाऊबहिणींमध्ये असे एखाद्याचे कमी होणे सगळ्यांनीच गृहीत धरले असायचे.

पण ४२ व्या दिवशी ह्या मुलीने पहाटे पहाटे आपल्या वडिलांना क्षीण आवाजात हाक मारून पाणी मागितले. ही जगल्याचा आनंद झाला. त्यानंतर ही मुलगी आयुष्यभर तिच्या वडिलांची लाडकी होऊन राहिली.
२००५ च्या डिसेंबरमध्ये नागपूर मुक्कामी तिला अचानक कर्करोग झाल्याचे निदान झाले. ते सुध्दा दुसर्या टप्प्यात पोहोचलेल्या. बातमी ऐकताच हादरलेली तिची मुले मुंबई, सिंगापूर वरून नागपूरला धावली. मुलांनी त्यांचे वडील अकाली गमावलेले असल्याने आपल्या आईचे आजारपण त्यांच्यावर अचानक आघात करणारे होते.
कर्करोगावरील शस्त्रक्रिया आणि त्यानंतरची गुंतागुंतीची औषधयोजना यात आशानिराशेच्या हिंदोळ्यावरचे खूप क्षण आलेत. पण तिच्या आंतरिक शक्तीनी आणि जन्मजात लढाऊ बाण्याने ती यातून सुखरूप झाली. अगदी १०० % ठणठणीत.
११ मार्च २०२२ ला तिला यकृताचा गंभीर आजार झाल्याचे निष्पन्न झाले. इस्पितळात दाखल करणे, घरी येणे हे चक्र सुरू झाले. तरीही तिचा लढाऊ स्वभाव माहिती असल्याने तिच्या मुलांना तिच्या सुखरूप परत येण्याची खात्री होती.
पण नियतीपुढे सगळे हतबल आहेत याची नियतीने पुन्हा एकदा जाणीव करून दिली. अक्षरशः हाडाची काडे आणि रक्ताचे पाणी करून आपल्या मुलांना शून्यातून निर्माण करणारी ती स्वतःच शून्यात विलीन झाली.


श्रीमती वैशाली प्रकाश किन्हीकर
जन्मः १४/०२/१९४५ मृत्यूः २७/०४/२०२२

आपली भारतीय संस्कृती ही फार उदात्त तत्वांनी आणि विचारपूर्वक विकसित झालेली आहे. पंचमहाभूतांपासून बनलेला हा देह पंचमहाभूतातच विलीन होताना पाहून स्वतःच्या मूळ स्वरूपाची जाणीव पुन्हा जागृत होते. संसाराच्या रगाड्यात या मूळ स्वरूपाच्या जाणीवेवर अहंकाराची, देहाभिमानाची जी राख जमलेली असते ती या जळजळीत वास्तवाने झटकली जाते.
भरपूर पैसे कमावले, स्वतःसाठी खूप आलिशान घरे बांधलीत तरीही
"दौलत अजमत महल खजाना,
सबही थाट रह जाएगा"
असेच होते.
आणि इतर अनेक जिवांनी वापरलेल्या ३ फूट x ४ फूट आकाराच्या अंतिम विश्रामस्थळावरच आपल्या देहाचा अंतिम पत्ता असणार हे निश्चित होत जाते तसे मन परमतत्वाच्या जवळिकेच्या जाणिवेने आश्वस्त होत जाते. महादेव शंकरांचा वास म्हणूनच स्मशानात असावा. सर्व चर आणि अचर सृष्टीचाच विलय ज्यांच्या ठायी होणार आहे असे देवांचे देव, महादेव त्या स्मशानातच वास करून आपण सगळ्या जिवांना महादेवांच्या शाश्वततेची आणि समस्त सृष्टीच्या क्षणभंगुरत्वाची जाणीव अखंड करून देत असतात.
मृत देहाला चितेवरच्या अग्नीचे चटके जाणवतही नसतील पण तिथल्या संवेदनशील मनांना ही आत्माभिमानाची, देहाच्या शाश्वत असण्याची वृथा राख झाडली गेल्याने आत्म्याचे जे स्फुल्लिंग चेतल्या जाते त्याचे चटके नक्कीच जाणवतात.
यालाच स्मशानवैराग्य म्हणत असावेत. हे स्मशानवैराग्य फार काळ टिकत नाही असेही जाणकार सांगत असतात. एकदा संसाराच्या मोहात, रोजच्या रामरगाड्यात माणूस रमला की तो हे सगळे विसरतोच. बरोबरच आहे. मनुष्यमात्रांनी हे स्मशानवैराग्य विसरायलाही हवे. त्याशिवाय जगाचे रहाटगाडगे चालणारच नाही. निवृत्त मनाची वाटचाल प्रवृत्ती कडे करायलाच हवी तरच जगात मनुष्य कार्यप्रवण राहील.
पण जगात वावरताना सतत इतर कार्यात गुंतल्यासारखे दाखवून मनात हे वैराग्याचे स्फुल्लिंग जागृत ठेवणार्या आणि इतर कशाचीही नसली तरी देहाच्या क्षणभंगुरत्वाची खात्री असणार्या आणि तसे वर्तन करणार्या व्यक्तींनाच संतत्व प्राप्त होत असावे, नाही ?
समर्थांनी तर लिहूनच ठेवलेय,
"मरणाचे स्मरण असावे
हरीभक्तीस सादर व्हावे."
- वडिलांचा आकस्मिक मृत्यूनंतर २५ वर्षांनी आईच्याही देवाघरी जाण्यामुळे या जगात खर्या अर्थाने पोरका झालेला राम.


Monday, April 11, 2022

नवम सरल सब सन छलहीना




आज श्रीरामनवमी. राष्ट्रपुरूष श्रीरामांचा जन्मदिवस. आज इथे आणि सर्वत्रच वातावरण श्रीराममय झालेले दिसत आहे.

श्रीराम कुणाला भेटतील ? गोस्वामी बाबा तुलसीदासांनी आपल्या दोन दोह्यांमध्ये याचे सुंदर वर्णन केलेले आहे.
"जिन्हके कपट दंभ नही माया, उन्हके हृदय बसहु रघुराया."
आणि
"नवम सरल सब सन छलहीना."
जो मनुष्यप्राणी सरळ साध्या स्वभावाचा आणि कपट, दंभ रहीत आहे त्याला प्रभू नक्कीच भेटतील.
"जगात वागताना थोडा वाकडेपणा, थोडा कपटीपणा आवश्यक आहेच" असे प्रतिपादन कुणी करू लागले की महाभारत युध्दापूर्वीची कथा आठवते.
भगवान श्रीकृष्णांनी आपली नारायणी सेना कौरवांना देऊन स्वतः मात्र निःशस्त्र होण्याची प्रतिज्ञा करीत पार्थाच्या रथाचे निव्वळ सारथ्य केले होते. पण प्रत्यक्ष भगवंत त्यांच्या बाजूने असल्यामुळे पांडवांचाच अंतिम विजय झाला होता.
आपल्याला आज ठरवायचे आहे. आपल्याला भगवंत स्वतः हवाय ? की त्याने निर्माण केलेली सगळी विलोभनीय माया हवी आहे ? भगवंत हवा असेल तर आपल्याला कपटरहित, दंभरहित आणि स्वभावाने सरळ व्हावे लागेल. आणि ही प्रक्रिया काही एका दिवसात होणारी नक्कीच नाही. प्रत्येकाच्या स्वभावधर्मानुसार, पात्रतेनुसार त्याला वर्षे, दोन वर्षे लागतीलही. पण त्यादृष्टीने अथक आणि जागरूक प्रयत्न केलेत तर आपण हे सहज साध्य करू शकू हा माझा आत्मानुभव आहे.
प.पू. ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात "भगवंताचा एक खास दागिना 'समाधान' म्हणून आहे. आपल्या खास भक्तांना तो हा दागिना देतो. इतरांना तो पैसा, मान, प्रतिष्ठा आदि गोष्टी देतो."
ठरवायचे मग आजच्या शुभदिनी ?
- प्रभूंचे नाम धारण केलेला हा एक साधा जीव, राम प्रकाश किन्हीकर.

Wednesday, April 6, 2022

Data analytics आणि उपयोजित कला

 मुळात स्थापत्य अभियंता आणि गेल्या २७ वर्षांपासून अभियांत्रिकी अध्यापन क्षेत्रात असलो तरीही गेल्या ४ - ५  वर्षातल्या बदलांची मनोमन नोंद घेत Data analytics  शिकायला सुरुवात केलीय. तशीही मला डेटा स्वरूपात माहिती जमवायला आणि त्याचे विश्लेषण करायला मनापासून आवडतेच. १९८३ पासून माझ्या स्वतःच्या प्रवासाचा डेटा मी जमवलाय . दरवर्षाअखेर त्या त्या वर्षीच्या प्रवासाच्या डेटाचे विश्लेषण मी वर्षाअखेर जवळपास पाच सहा तास खपून करीत असतोच. 



Data analytics शिकण्यापूर्वीच आजच्या युगात त्या विषयाची व्याप्ती अनुभावाला आलेली होती. आपण काय खरेदी करतो, ? कुठे खरेदी करतो ? काय खातो ? किती वेळा खातो ? ही सगळी आपल्या दृष्टीने निरुपद्रवी माहिती आजच्या जागतिकीकरणाच्या युगात अनेक कंपन्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असते आणि त्या माहितीचे विश्लेषण करून अनेक विविध उद्दिष्टे ह्या कंपन्या साध्य करीत असतात. 

पण हे शिकताना जाणवले की आज आपण हे सगळे ज्ञान आणि त्याचे उपयोजन अभियांत्रिकी क्षेत्रापुरते मर्यादित ठेवलेले आहे. १९६० च्या किंवा १९७० च्या दशकात भारतीय समाजात कला क्षेत्राला  जे स्थान उपयोजित अंगाने होते ते आता नष्ट  होत चाललेले आहे. आता Data analytics मधल्या एखाद्या गोष्टीत कला क्षेत्रातली मंडळी काही मदत करू शकतील ही दृष्टी अभियंत्यांनी तारा गमावलीच आहे पण खुद्द कलाक्षेत्रानेही त्याविषयी संपूर्ण दुर्लक्ष केलेले आहे. जणू Data analytics हा संगणक किंवा माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा विशेषाधिकार आहे आणि आपण तिथे काही लक्ष घातले तर त्या अभियंत्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण होईल अशीच भावना बाळगून कला क्षेत्र या सगळ्या बाबींपासून दूर राहिलेय. 

साधी गोष्ट आहे. एखाद्या सुपर बाजारात एखादे विशिष्ट साबण जास्त खपतेय म्हटल्यावर त्या माहितीचे विश्लेषण करून अभियंते काही निर्णय घेऊ शकतील. पण ग्राहकांच्या मनोभूमिकेचा मानसशास्त्रीय दृष्ट्या विचार करून सुपर मार्केट मध्ये शिरल्याबरोबर प्रथमदर्शनी कुठल्या वस्तू असाव्यात ? शेवटी कुठल्या वस्तू असाव्यात ? त्या सुपरमार्केटच्या कपाटामध्ये नजरेच्या पातळीवर काय असावे ? कपाटात गुडघ्याच्या पातळीवर कुठल्या वस्तू ठेवाव्यात ? या सगळ्या गोष्टीसाठी ग्राहकाच्या आणि त्यातल्या त्यात एखाद्या देशाच्या, प्रांताच्या, शहराच्या, शहरातील विभागाच्या पातळीवरील ग्राहकाच्या मनोवृत्तीचा  कला शाखेतील तज्ञाने  अभ्यास करून त्यावर मांडलेल्या मतांचे उपयोजन व्हावे. आपल्या रोजच्या जीवनाशी नुसते विज्ञान आणि तंत्रज्ञानच निगडीत नाही तर कला शास्त्रही अशा उपयोजित स्वरूपात निगडीत व्हावे. केवळ पुस्तकी अभ्यासाच्या आणि आचार्य पदवी Ph. D. मिळवण्यासाठीच्या  पातळीवर मर्यादित ना राहता अशा लोकोपयोगी कार्यात उपयुक्त व्हावे.

- विज्ञान तंत्रज्ञान शाखेचा विद्यार्थी असला तरी कलासक्त असलेला आणि उपयोजित कलाशाखेबद्दल कळकळ असलेला अभियांत्रिकी प्राध्यापक, राम प्रकाश किन्हीकर.  

Saturday, April 2, 2022

महाराष्ट्रातले रखडलेले रेल्वे प्रकल्प आणि सर्वसामान्य जनतेला पडलेले काही प्रश्न. - 4 (पश्चिम महाराष्ट्र )

 यापूर्वीचे लेखांक इथे वाचा. 


महाराष्ट्रातले रखडलेले रेल्वे प्रकल्प आणि सर्वसामान्य जनतेला पडलेले काही प्रश्न. - 1 (विदर्भ)


महाराष्ट्रातले रखडलेले रेल्वे प्रकल्प आणि सर्वसामान्य जनतेला पडलेले काही प्रश्न. - 2 (मराठवाडा)


महाराष्ट्रातले रखडलेले रेल्वे प्रकल्प आणि सर्वसामान्य जनतेला पडलेले काही प्रश्न. - 3 (खान्देश)


पश्चिम महाराष्ट्रात मी पहिल्यांदा गेलो तेव्हा सामाजिक, राजकीय,आर्थिक बाबतीत पुढारलेल्या असलेल्या पश्चिम महाराष्ट्राचे रेल्वेच्या बाबतीतले मागासलेपण मला थक्क करणारे होते. नागपूर ते कराड हा २५ तासांचा प्रवास करून आम्ही कराड स्टेशनवर उतरलो तो नसलेल्या प्लॅटफॉर्मवर. कराडच्या तत्कालीन एकमेव प्लॅटफॉर्मवर मुंबईकडे जाणारी कोयना एक्सप्रेस उभी होती आणि त्यामुळे आमच्या महाराष्ट्र एक्सप्रेसला प्लॅटफॉर्म नसलेल्या दुसऱ्या रूळांवर जागा मिळाली होती. गाडीच्या उंच पायऱ्या उतरून जमिनीवर आलोत खरे पण रेल्वे स्थानकावर रूळ ओलांडण्यासाठी पादचारी पूल नसल्याने कोयना एक्सप्रेस मुंबईकडे रवाना होईपर्यंत आम्हाला वाट पाहून मग हातांतल्या अवजड सामानांसह रूळ ओलांडून स्टेशनवर आणि नंतर आपापल्या गंतव्य स्थळी प्रवासा करावा लागला होता. विदर्भातल्या चांदूर, धामणगाव, पुलगाव या तालुक्यांपेक्षा कराड तालुक्याचा एकंदर व्याप मोठा होता तरीही स्टेशन मात्र अगदीच छोटे होते.


त्यावेळी पुणे ते कोल्हापूर हा मार्ग दक्षिण मध्य रेल्वेच्या अखत्यारीत होता. त्या मंडळाच्या अधिकारी मंडळींना महाराष्ट्राविषयी फार आत्त्मियता असणे दुरापास्त होतेच. त्यामुळे त्या मार्गाच्या विकासाकडे संपूर्ण दुर्लक्ष होते. मला आठवतेय या मार्गावर पहिली सुपरफास्ट गाडी धावली ती  १ जुलै १९९० रोजी सुरू झालेली हजरत निझामुददीन ते गोवा जाणारी गोवा सुपर एक्सप्रेस. त्याकाळी मिरज ते लोंडा मार्गे गोव्यात जाणारा रेल्वेमार्ग हा मीटर गेज होता. त्यामुळे ही गाडी मिरजपर्यंत ब्रॉड गेजवर  जात असे. आणि नंतर मिरजेच्या स्टेशनवर गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना शेजारील प्लॅटफॉर्मवरून निघणाऱ्या मीटर गेज एक्सप्रेसमध्ये बसवून पुढला प्रवास करीत असे.




पण पुणे ते कोल्हापूर सोडले तरीही पश्चिम महाराष्ट्रातले  इतर रेल्वे मार्गही फारसे विकसित नव्हते. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि सोलापूर ही दोन स्टेशने सोडलीत तर  रेल्वे स्टेशन्सच्या बाबतीत खूप अनुशेष होता. अजूनही आहे.




इथल्या राजकारणी मंडळींचा राष्ट्रीय राजकारणात असलेला मर्यादित प्रभाव आणि एकदोन मंडळींचा प्रभाव असला तरीही रेल्वेकडे झालेले दुर्लक्ष आणि तदानुषंगाने होणाऱ्या विकासाकडे बघण्याची नसलेली दृष्टी यामुळे पश्चिम महाराष्ट्र मागे पडला. शरद पवारांसारख्या महत्वाच्या नेत्याच्या बारामतीत ९० च्या दशकात दौंड ला जोडणारी छोटी गाडीच होती. आता तिचा ब्रॉड गेजमध्ये विस्तार झालाय पण बारामती - नीरा हा प्रकल्प रखडलाय तो रखडलायचं. आताशा कुणाला त्या प्रकल्पाची आठवणही येत नाही. नीरा ते फलटण हा रेल्वेमार्ग सुरू व्हायला २०२१ उजाडावे लागले. फलटण - जरंडेश्वर - सातारा हा मार्ग कधीकाळी प्रस्तावित होता हेच आज सगळे विसरून गेलेत. ५० वर्षांपूर्वी भौगोलिक स्थितीला अनुसरून मार्गांचे नियोजन होत असे. पण आज प्रगत तंत्रज्ञानामुळे कुठल्याही भौगोलिक परिस्थितीवर मात करून आपण डोंगर दरी ओलांडून लीलया रेल्वेमार्ग बांधू शकतोय. काश्मिरात चिनाब नदीवर पूल बांधणारे आपले अभियंते फलटण ते जरंडेश्वर मध्ये असणारा सह्यगिरी ओलांडू शकणार नाहीत ? पण इथे राजकीय इच्छाशक्ती नक्कीच कमी पडतेय.


यापूर्वीच्या लेखात प्रतिपादन केल्याप्रमाणे औरंगाबाद - अहमदनगर - पुणे हा सरळ रेल्वेमार्ग लवकरात लवकर नियोजन करून पूर्ण व्हायला हवाय. त्याचबरोबर कोल्हापूरवरून आणि सोलापूरवरून प्रत्येकी १२ - १२ डब्यांची  एक गाडी नवी दिल्ली साठी सोडून तिला पुण्यात एकत्र करून पश्चिम महाराष्ट्र संपर्क क्रान्ती एक्सप्रेस सुरू करण्याची गरज आहे. पुण्यानंतर कल्याण - वसई रोड - सुरत - वडोदरा - नागदा -कोटा मार्गे ही गाडी नवी दिल्ली गाठू शकते. सोलापूर वरून नवी दिल्लीला जाण्यासाठी सध्या कर्नाटक एक्सप्रेसचा एकमेव पर्याय आहे. पण या गाडीमुळे सोलापूरसोबत कोल्हापूर - सातारा - कराडकरांचाही खूप फायदा होईल. 



पश्चिम महाराष्ट्रात रखडलेले बारामती - नीरा , फलटण - जरंडेश्वर - सातारा, कराड - चिपळूण, कोल्हापूर - सावंतवाडी हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हायला हवेत. त्यासाठी केवळ साखर कारखाने, सहकारी दूधसंघ, ग्रामपंचायती आणि सहकारी पतपेढ्या यांच्या राजकारणापुरते मर्यादित न ठेवता इथल्या राजकारण्यांनी राष्ट्रीय स्तरावर विचार करायला हवाय. आजकाल जे तरुण पिढीचे  राजकारणी इथे उगम पावताहेत त्यांच्याकडून ही झेप घेतली जाईल अशी अपेक्षा नक्कीच ठेवता येईल.  


 - महाराष्ट्राभिमानी रेल्वे प्रेमी, प्रा. राम प्रकाश किन्हीकर.

Friday, April 1, 2022

एप्रिल फूल.

 साधारण १९७५-७६ ची गोष्ट. माझ्या थोरल्या मावशीचे यजमान पाटबंधारे विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कोकणातील गोरेगाव ता. महाड जि. कुलाबा (तत्कालीन हं. आता माणगाव तालुका झालाय. आणि कुलाबा जिल्हा आता रायगड जिल्हा झालाय.) येथे काळ नदी प्रकल्पावर कार्यरत होते. काकांचे आईवडील, भाऊ वर्धेत तर मावशीचे माहेर (माझे आजोळ) चंद्रपूरचे. शिवाय जास्तीत जास्त नातेवाईक विदर्भातच. त्यामुळे दोघांच्याही विदर्भ फेर्‍या भरपूर वेळा होत असत. 


पत्राद्वारे एकमेकांशी संपर्काचा तो काळ. एकमेकांचा आवाज ऐकणे, प्रत्यक्ष भेटणे यासाठी माणसे आसुसलेली असत. साधारण २४ मार्चच्या आसपास माझ्या मावशीचे पत्र आमच्या घरी आले. पत्रातला मजकूर साधारण असा "आम्ही मार्च महिन्याच्या शेवटल्या आठवड्यात, साधारण ३१ मार्च किंवा १ एप्रिल या तारखांना (रिझर्वेशन अजून नक्की झालेले नाही. झाल्यावर कळवतो.) मुंबईवरून कलकत्त्याला जाणार आहोत. १ डाऊन मेल ने (सध्याची 12809 Down) जाऊ. नागपूरला गाडी साधारण सकाळी ११ च्या सुमारास येईल. तरी स्टेशनवर भेटण्यास आलात तर अनायासे भेट होईल. कळावे." 


अशाच आशयाची पत्रे मावशीच्या वर्ध्याच्या दिर - भावजयांना आणि दुर्ग येथल्या माझ्या धाकट्या मावशीला गेलीत. 


प्रत्यक्ष भेटायला मिळणार म्हणून मंडळी हरखलीत. स्टेशनवर जाण्याचे बेत नक्की झालेत. वर्धेला मेल सकाळी ९ च्या आसपास येत असे त्यामुळे वर्धेकरांनी चहा - नाश्ता घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. त्याकाळी रेल्वेत खानपान सेवा असली तरीही घरच्या जेवणाचा मावशी आणि काकांनाही लाभ मिळावा म्हणून आमच्या घरून जेवणाचा डबा जाणार हे ठरले. दुर्ग पर्यंत गाडी संध्याकाळी पोहोचत असे म्हणून संध्याकाळचा चहा + रात्रीचे जेवण तिथून पाठवण्याचे धाकट्या मावशीने ठरविले. 


झाले ३१ मार्च उजाडला. वर्धा, नागपूर आणि दुर्ग इथली मंडळी मोठ्या आशेने, भेटीसाठी आसूसून त्या त्या वेळी त्या त्या स्टेशन्सवर गेलीत. मावशी आणि काका नेहमी प्रथम वर्गाने प्रवास करीत म्हणून पहिल्यांदा प्रथम वर्ग आणि मग "न जाणो फर्स्ट क्लासचे रिझर्वेशन मिळाले नसेल तर..." या आशंकेने सेकंड क्लासचेही सर्व रिझर्वड डबे या मंडळींनी पालथे घातलेत. पण निराशा झाली. डबे तसेच घरी परतलेत. त्या काळी आजच्यासारख्या nuclear families नसल्याने घरी आल्यावर डबा फस्त होण्यात अडचण आली नाही पण प्रत्यक्ष भेट न झाल्याची चुटपुट प्रत्येकाच्या मनात राहिलीच. 


१ एप्रिल उजाडला. पत्रात "३१ मार्च किंवा १ एप्रिल" असा उल्लेख असल्याने नव्या आशेने सकाळी सकाळी डब्बे बनविण्याची घरात तयारी सुरू झाली. तेवढ्यात आमच्या दादांच्या (माझे वडिल) गोम लक्षात आली. ते आमच्या आईला म्हणाले, "आज डबा नको करूस. आपण नुसतेच भेटायला जाऊ. पण मला वाटतं की ते आजही येणार नाहीत." 


वर्धेची मंडळी चहा - नाश्ता घेऊन, दुर्गची मंडळी जेवण घेऊन तर आमचे आईदादा नुसतेच १ डाऊन मेलवर भेटायले गेलेत. कालसारखेच सगळे डबे पाहून, भेट न झाल्याने निराश होऊन घरी परतलेत. सगळ्यांकडे घरी दुपारच्या डाकेने "एप्रिल फूल" असे आणि एव्हढेच मोठ्या अक्षरांमध्ये लिहीलेले पोस्टकार्ड आले आणि सगळ्यांना स्वतःच्या फजितीवर हसायला आले. 


त्याकाळी नातेवाईकांना असे विविध प्रकारे एप्रिल फूल बनविण्याचे उद्योग सर्रास चालायचेत. महत्वाची वर्तमान पत्रेसुध्दा आपली हेडलाईन अशी काहीतरी सनसनाटी, अविश्वसनीय बातमी ,A. F. News या बारीक शीर्षटिपेसह, देत असत. हे A F News हा ANN वगैरेसारखा भाग असावा असे सर्वसामान्यांना वाटत असे आणि बर्‍याच लोकांना हे एप्रिल फूल आहे ही साधी शंकाही येत नसे. 


मावशीचे यजमान १९९६ मध्ये देवाघरी गेलेत. १९९७ मध्ये आमचे दादाही आम्हाला सोडून देवाघरी गेलेत. मावशीही गेल्यावर्षी वृध्दापकाळामुळे कालवश झाली. आता उरलेल्या आहेत त्या त्यांनी व्यवस्थित नियोजन करून सगळ्या नातेवाईकांच्या केलेल्या गंमतीच्या अवीट गोडीच्या आठवणी. 


- जुन्या काळच्या साधेपणाच्या ऐश्वर्यात मनाने रमलेला पण एप्रिल फूल नसलेला, राम प्रकाश किन्हीकर.