Monday, October 31, 2022

देवाचिये द्वारी - ११४

 


नष्टासी नष्ट योजावे I वाचाळासी वाचाळ आणावे I

आपणावरी विकल्पाचे गोवे I पडोंच नेदी II


कांटीने कांटी झाडावी I झाडावी परी ते कळों नेदावी I

कळकटेपणची पदवी I असो द्यावी II


न कळता करी कार्य जें ते I ते काम तत्काळचि होते I

गचगचेत पडतां तें I चमत्कारे नव्हे II


समाजात मोठे कार्य करताना दुष्ट दुर्जन लोकांचे मन वळवून, त्यांना संपूर्ण नष्ट न करता आपल्यासोबत बाळगावे आणि दुस-या दुष्टांशी लढताना त्यांचा वापर करावा. आपल्या कार्याचा फ़ार गवगवा करू नये आणि आपण मात्र बाह्य वेषाने साधे, क्वचित गबाळे असावे म्हणजे कुणाला आपल्या महान कार्याचा फ़ार मागमूस लागू देऊ नये असे श्रीसमर्थांचे आग्रही प्रतिपादन आहे.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(कार्तिक शुद्ध सप्तमी शके १९४४ , दिनांक ३१/१०/२०२२)


Sunday, October 30, 2022

देवाचिये द्वारी - ११३

 


ज्यासी उपाधी आवरेना I तेणे उपाधी वाढवावीना I

सावचित्त करूनिया मना I समाधाने असावे II


लोक बहुत कष्टी जाला I आपणहि अत्यंत त्रासला I

वेर्थचि केला गल्बला I कायसासी II


ज्या साधकाला आपण केलेल्या कार्याची उपाधी कशी आवरावी ? हे कळत नाही त्याने उपाधी वाढवूच नये असे श्रीसमर्थांना वाटते. अशी उपाधी न आवरता येता वाढवली तर लोकही कष्ती होतील आणि साधकही त्रासून जाईल आणि मुख्य कार्य मागे पडेल.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(कार्तिक शुद्ध षष्ठी शके १९४४ , दिनांक ३०/१०/२०२२)


Saturday, October 29, 2022

देवाचिये द्वारी - ११२

 


अभ्यासे प्रगट व्हावे I नाही तरी झाकोन असावे I

प्रगट होऊन नासावे I हे बरें नव्हें II


मंद हळुहळु चालतो I चपळ कैसा आटोपतो I

अरबी फ़िरवणारा तो I कैसा असावा II


हे धकाधकीची कामें I तिक्षण बुद्धीची वर्मे I

भोळ्या भावार्थे संभ्रमे I कैसे घडे II



या जगात विशेष मोठे काम करू इच्छिणा-या साधकाने स्वतःची तशी पूर्ण तयारी करायला हवी. मोठे काम करण्यासाठी मोठा अभ्यास हवा, अनेक गुणसमुच्चय अंगी हवा, तीक्ष्ण बुद्धी हवी. सर्वसामान्य भाविकांच्या भोळ्याभाबड्या स्वभावाने हे मोठे कार्य घडणार नाही असे श्रीसमर्थांना वाटते.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(कार्तिक शुद्ध चतुर्थी / पंचमी, पांडवपंचमी  शके १९४४ , दिनांक २९/१०/२०२२)


Friday, October 28, 2022

देवाचिये द्वारी - १११

 


राखावी बहुतांची अंतरे I भाग्य येते तदनंतरे I

ऐसी हें विवेकाची उत्तरे I ऐकणार नाही II


कांही नेमकेंपण आपुलें I बहुत जनासी कळों आलें I

तेंचि मनुष्य मान्य जालें I भूमंडळी II


याकारणें अवगुण त्यागावे I उत्तम गुण समजोन घ्यावे I

तेणे मनासारिखे फ़ावें I सकळ कांही II



आपले काही वेगळेपण, नेमकेपण जगाच्या लक्षात आल्याशिवाय जग आपल्याला मान्यता देणार नाही. यासाठी सर्वसामान्य साधकांनी अवगुण टाकून देऊन सदगुण अंगी बाणवून खूप लोकांना प्रिय होण्यासाठी विवेकाने प्रयत्न केले पाहिजेत असे श्रीसमर्थांना वाटते.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(कार्तिक शुद्ध तृतीया शके १९४४ , दिनांक २८/१०/२०२२)


Thursday, October 27, 2022

देवाचिये द्वारी - ११०

 


करंट्यास आळस आवडे I यत्न कदापी नावडे I

त्याची वासना वावडे I अधर्मी सदा II


जनासी मीत्री करीना I कठीण शब्द बोले नाना I

मूर्खपणे आवरेना I कोणीयेकासी II


कोणीयेकास विश्वास नाही I कोणीयेकासीं सख्य नाही I

विद्यावैभव काहींच नाही I उगाचि ताठा  II



ग्रंथराज श्रीमददासबोधाच्या करंटलक्षण नामक समासात श्रीसमर्थांनी करंट्या मनुष्यांची लक्षणे सांगितलेली आहेत. जो विचाराने, विवेकाने आणि संयमित वागत नाही त्यात सगळी करंटेपणाची लक्षणे आपल्याला दिसून येतील.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(कार्तिक शुद्ध द्वितीया शके १९४४ , दिनांक २७/१०/२०२२)


Wednesday, October 26, 2022

देवाचिये द्वारी - १०९

 


हेत समजोन उत्तर देणे I दुस-याचे जीवीचे समजणे I

मुख्य चातुर्याची लक्षणे  I तें हें ऐसी II


जगामध्ये जगमित्र I जिव्हेपासी आहे सूत्र I

कोठेतरी सत्पात्र I शोधून काढावे II


कथा होती तेथे जावे I दुरी दीनासारखे बैसावे I

तेथील सकळ हरद्र घ्यावे I अंतर्यामी II


चतुर मनुष्यांनी दुस-या व्यक्तीचे अंतर जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे दुस-या व्यक्तीचे हेतू लक्षात येतील. जगात सर्वांशी मैत्रीने वागण्याचे सूत्र मनुष्यमात्रांच्या जिभेत आहे. गोड, मधूर, दुस-यांच्या मनाला न दुखावणारे बोलण्याने माणसे जोडली जातील .


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(कार्तिक शुद्ध प्रतिपदा / द्वितीया, बलीप्रतिपदा / भाऊबीज शके १९४४ , दिनांक २६/१०/२०२२)


Tuesday, October 25, 2022

देवाचिये द्वारी - १०८

 


ऐसा ग्रंथ जपोनी ल्याहावा I प्राणीमात्रांस उपजे हेंवा I

ऐसा पुरूष तो पहावा I म्हणती लोक II


काया बहुत कष्टवावी I उत्कट कीर्ती उरवावी I

चटक लावूनी सोडावी I कांही येक II


ग्रंथलेखन कसे करावे, समास किती सोडावा याबद्दल श्रीमददासबोधाच्या १९ व्या दशकाच्या पहिल्या समासात श्रीसमर्थांनी मार्गदर्शन केलेले आहे. इतका सुंदर ग्रंथ लिहावा की सगळ्या लोकांना त्या ग्रंथकर्त्याला भेटण्याची ओढ लागायला हवी असे श्रीसमर्थांना वाटते. समजात काही विशेष काम करू इच्छिणा-या मनुष्यमात्रांनी आपले शरीर कष्टवून आपल्या इहलोकातून प्रयाणानंतरही आपली कीर्ती कायम राहील असे कार्य करून जावे.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन अमावास्या शके १९४४ , दिनांक २५/१०/२०२२)


Monday, October 24, 2022

देवाचिये द्वारी - १०७

 


जनाचा लालची स्वभाव I आरंभीच म्हणती देव I

म्हणिजे मला काही देव I ऐसी वासना II


कष्टेवीण फ़ळ नाही I कष्टेवीण राज्य नाही I

केल्यावीण होत नाही I साध्य जनी II


मेळविती तितुके भक्षिती I ते कठीण काळी मरोन जाती I

दीर्घ सूचनेनें वर्तती I तेंचि भले II



श्रीसमर्थांनी सर्वसामान्य नाणसांना जीवनात आणि अध्यात्मात कुठेही अकर्मण्यता सांगितलेली नाही. सर्वसामान्य माणसांनी दीर्घ दृष्टीने विचार करून थोडी तरी बचत करीत जावी म्हणजे ती त्यांच्या कठीण काळात ती कामाला येईल हा स्पष्ट उपदेश आजकालचे अर्थशास्त्रज्ञ करतात तो उपदेश श्रीसमर्थांनी चारशे वर्षांपूर्वीच आपल्याला श्रीमददासबोधातून करून ठेवलेला आहे.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन कृष्ण चतुर्दशी / आश्विन अमावास्या, नरकचतुर्दशी / लक्ष्मीपूजन शके १९४४ , दिनांक २४/१०/२०२२)


Sunday, October 23, 2022

देवाचिये द्वारी - १०६

 


नाना वस्त्रे नाना भूषणें I येणें शरीर श्रृंघारणें I

विवेके विचारे राजकारणें I अंतर श्रृंघारिजे II


शरीर सुंदर सतेज I वस्त्रे भूषणें केले सज्ज I

अंतरी नस्तां चातुर्यबीज I कदापि शोभा न पर्व II


वरवर अनेक वस्त्रे, अलंकार वगैरे घालून मनुष्यमात्रांना कदापीही शोभा येणार नाही तर प्रत्येक मनुष्याने आपले अंतर विवेकाने, विचारांनी सजवून आपण स्वतःला आतून सुंदर आणि चतुर केले पाहिजे असा श्रीसमर्थांचा आग्रह आहे.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन कृष्ण त्रयोदशी, धनत्रयोदशी शके १९४४ , दिनांक २३/१०/२०२२)


Saturday, October 22, 2022

देवाचिये द्वारी - १०५

 


शुध सोने पाहोन घ्यावे I कसी लावून तावावे I

श्रवणमनने जाणावे I प्रत्ययासी II

 

जे प्रचितीस आले खरें I तेंचि घ्यावे अत्यादरें I

अनुभवेवीण जे उत्तरें I ते फ़लकटें जाणावी II

 

पिंडी नित्यानित्य विवेक I ब्रह्मांडी सारासार अनेक I

सकळ शोधूनिया येंक I सार घ्यावें II

 

 

साधकांनी अध्यात्मात काय किंवा व्यवहारात काय, प्रत्यय आल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचा स्वीकार करू नये. त्यातही नित्य काय आणि अनित्य काय याचा विचार करून वागावे अशे श्रीसमर्थांचे आग्रही प्रतिपादन आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन कृष्ण द्वादशी / त्रयोदशी, वसुबारस / धनत्रयोदशी शके १९४४ , दिनांक २२/१०/२०२२)


Friday, October 21, 2022

देवाचिये द्वारी - १०४

 


अवगुण अवघेचि सांडावे I उत्तम गुण अभ्यासावे I

प्रबंद पाठ करीत जावे I जाड अर्थ II

 

पाठ उदंडचि असावे I सर्वकाळ उजळीत जावे I

सांगितले गोष्टींचे असावे I स्मरण अंतरी II

 

अखंड येकांत सेवावा I ग्रंथमात्र धांडोळावा I

प्रचित येईल तो घ्यावा I अर्थ मनी II

 

 साधकांनी उत्तम गुणांचा ध्यास धरून अवगुणांचा त्याग करावा. त्यासाठी त्यांचे भरपूर पाठांतर आणि ठराविक कालावधीने पाठांतराची उजळणी असावी. भरपूर वाचन झाले तरी स्वतःला जी प्रचिती आली तो त्या वाचनाचा अर्थ आणि अनुभव मनी ठसवावा असे श्रीसमर्थांना वाटते.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन कृष्ण एकादशी / द्वादशी, रमा एकादशी / वसुबारस शके १९४४ , दिनांक २१/१०/२०२२)


Thursday, October 20, 2022

देवाचिये द्वारी - १०३

 


जे आपणांस नव्हे ठावे I तें जाणतयांस पुसावे I

मनोवेगें तनें फ़िरावें I हें तों घडेना II

 

जे चर्मदृष्टीस नव्हे ठावें I तें ज्ञानदृष्टीनें पाहावें I

ब्रह्मांड विवरोन राहावें I समाधाने II

 

वाच्यांश वाचेने बोलावा I न बोलता लक्ष्यांश जाणावा I

निर्गुण अनुभवास आणावा I गुणाचेनयोगें II

 

या जगात वावरताना संसारी मनुष्याने कसे वागावे याचे विवेचन श्रीसमर्थांनी ग्रंथराज श्रीमददासबोधात ठायीठायी केलेले आढळते. आज चारशे वर्षांनंतरही यातली शिकवण आपल्या आचरणात आणण्यासारखी आहे हे या ग्रंथाचे कालातीतत्व आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन कृष्ण दशमी शके १९४४ , दिनांक २०/१०/२०२२)


Wednesday, October 19, 2022

देवाचिये द्वारी - १०२

 


येक भरे येक रितें I रितें मागुते भरतें I

भरतेंही रितें होतें I काळांतरी II

 

ऐसी हे सृष्टीची चाली I संपत्ती दुपारची साऊली I

वयेसा तरी निघोन गेली I हळु हळु II

 

बाळ तारूण्य आपलें I वृद्ध्याप्य प्रचितीस आले I

ऐसें जाणोन सार्थक केलें I पाहिजे कोणी येकें II

 

 

या अनित्य सृष्टीचे स्वरूप कायम बदलत असते. आपले शरीर, आपली संपत्ती हे सगळे दुपारच्या सावलीप्रमाणे अनित्य आणि नाशिवंत आहे. हे जाणून चिरंतन वस्तूकडे (भगवंताकडे) लक्ष लावून आपण आपल्या जीवनाचे सार्थक करून घावे असे श्रीसमर्थांना वाटते.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन कृष्ण नवमी शके १९४४ , दिनांक १९/१०/२०२२)


Tuesday, October 18, 2022

देवाचिये द्वारी - १०१

 


मुळी उदक निवळ असते I नाना वल्लींमधें जातें I

संगदोषें तैसें होतें I आंब्ल तिक्षण कडवट II

 

आत्मा आत्मपणें असतो I देहसंगे विकारतो I

साभिमाने भरी भरतो I भलतिकडे II

 

पुण्यवंता सत्संगती I पापिष्टां असत्संगती I

गति आणि अवगती I संगतीयोगें II

 

 

मूळ निर्मळ, निःसंग असलेले पाणी जसे इतर पदार्थांच्या संगतीत आले की त्या त्या पदार्थांचे गुणधर्म आपल्यात सामावून घेते आणि पाण्याचे स्वरूप तसेच बनत जाते. तसा निर्मळ, निःसंग आत्मा ज्या देहाच्या संगतीत येतो त्या देहाचे गुणधर्म त्याला चिकटतात. म्हणून आपली उन्नती करून घ्यायची असेल तर कायम सत्संगतीच धरावी असा श्रीसमर्थांचा आग्रह आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन कृष्ण अष्टमी / कराष्टमी शके १९४४ , दिनांक १८/१०/२०२२)


Monday, October 17, 2022

देवाचिये द्वारी - १००

 


ब्रह्मांडावरून पिंड I अथवा पिंडावरून ब्रह्मांड I

अधोर्ध पाहातां निवाड I कळों येतो II

 

बीज फ़ोडून आणिले मना I तेथे फ़ळ तों दिसेना I

वाढत वाढत पुढे नाना I फ़ळें येती II

 

फ़ळ फ़ोडिता बीज दिसें I बीज फ़ोडिता फ़ळ नसें I

तैसा विचार असे I पिंडब्रह्मांडी II

 

 'जे जे पिंडी ते ब्रह्मांड’ असा जरी शास्त्रार्थ असला तरी प्रत्येक पिंडात असलेले अव्यक्त ब्रह्म दिसत नाही. त्यासाठी श्रीसमर्थांनी फ़ळे आणि त्यातल्या बीजांचा दृष्टांत आपल्याला दिलेला आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन कृष्ण सप्तमी / अष्टमी शके १९४४ , दिनांक १७/१०/२०२२)


Sunday, October 16, 2022

देवाचिये द्वारी - ९९

 


थोडे बहुत समजले I पोटापुरती विद्या सिकले I

प्राणी उगाच गर्वे गेले I मी ज्ञाता म्हणोनी II

 

धन्य परमेश्वराची करणी I अनुमानेना अंतःकरणी I

उगीच अहंता पापिणी I वेढा लावी II

 

अहंता सांडून विवरणें I कित्येक देवाचे करणें I

पाहाता मनुष्याचे जिणें I थोडे आहे II

 

मनुष्याच्या या छोट्याचा आयुष्यात मनुष्यमात्राला थोडे जरी ज्ञान झाले तरी त्याचा त्यांना गर्व होतो. परमेश्वराच्या अगाध करणीसमोर आपले कर्तुत्व अगदी थिटे आहे याचा मनुष्यमात्रांना विसर पडतो आणि अहंकाराने तो वेढल्या जातो. साधकांनी असे वागू नये असा श्रीसमर्थांचा कळकळीचा उपदेश आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन कृष्ण षष्ठी / सप्तमी शके १९४४ , दिनांक १६/१०/२०२२)


Saturday, October 15, 2022

एका गिर्यारोहणाच्या स्वप्नाचा अकाली मृत्यू

 १९८९ च्या सप्टेंबर महिन्यात कराडला महाविद्यालयीन शिक्षणासाठी जायला निघालो तोपर्यंत आम्हा वैदर्भीय मुलांच्या पाहण्यात टेकडीच्या गणपतीची टेकडी, आदास्याच्या गणपतीची टेकडी हीच ठिकाणे उंच असलेली म्हणून प्रसिद्ध असायचीत. काही काही मुले पचमढीला वगैरे जाऊन आलेली असायचीत. त्यांच्या वर्णनावरून "क्या सातपुडा पर्बत है बे ? यें उंचा, यें उंचा. हिमालय जितनाही होंगा करीब करीब." अशा फ़ोकनाड्या ऐकून आम्ही मनातल्या मनात हिमालयाएव्हढा म्हणजे साधारण सातपुडा किती मोठा असेल ? याची गणिते करीत असू. नागपूरवरून वर्धेकडे जाताना बसमधून, रेल्वेगाडीतून जाताना उजव्याबाजुला दिसणारी कान्होलीबाराची टेकडी आम्हाला पर्वतासारखी वाटे.

 तमाम वैदर्भीय जनतेप्रमाणे पुणे, मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, रत्नागिरी ही शहरे साधारण १०० ते १५० किमीच्या परिघात असावी अशी आमची तोपर्यंत समजूत होती. ही सगळी शहरे कोकणाच्या आसपास आणि सह्याद्री पर्वतात असली पाहिजे ही आमची धारणा. त्यामुळे पहिल्यांदा कराडला जाताना महाराष्ट्र एक्सप्रेसने पुणे सोडले आणि अर्ध्या तासात गाडी राजेवाडी - शिंदवणेच्या घाटांमधून, बोगद्यांमधून जायला लागली तेव्हा आम्ही सर्व वैदर्भीय विद्यार्थ्यांनी खिडकीला डोके लावून जमेल तेव्हढे बाहेर बघत त्या घाटांची, बोगद्यांची मजा घ्यायला सुरूवात केली. कराडला स्टेशनवर उतरलो तेव्हा कराड स्टेशनसमोरच पूर्वेला असलेला विशालकाय पर्वत आमची जणू नजरबंदी करून गेला. कराडमध्ये थोडे रूळल्यावर त्या पर्वताचे नाव "सदाशिवगड" आहे ही माहिती आम्हाला मिळाली. दरवेळी नागपूरला जाताना स्टेशनवर वाट बघत असताना आणि नागपूरवरून परतल्यानंतर बसची, रिक्षाची वाट बघत स्टेशनवर उभे असताना तो सदाशिवगड आमच्या नजरेत भरत असे.

 

तोवर गिर्यारोहणाविषयी आमचे ज्ञान हे साप्ताहिक लोकप्रभा, किंवा "सकाळ"च्या दिवाळी अंकांमध्ये काहीकाही गिर्यारोहकांच्या मुलाखती वाचून आलेले म्हणजे फ़क्त पुस्तकी ज्ञान होते. रॉक क्लाईंबिंग, रॅपलिंग वगैरे शब्द परिचयाचे होते पण त्याकाळी लिखाणात फ़क्त शब्दांची रेलेचेल असायची. आजसारख्या आकृत्या, छायाचित्रे त्यावेळी उपलब्ध नसत. त्यामुळे आम्हालाही हे ज्ञान फ़क्त शाब्दिक होते. त्या गिर्यारोहणात वापरली जाणारी साधनसामुग्री कशी असेल ? याचे चित्र आमच्यापैकी प्रत्येकाने आपापल्या मताने आपापल्या मनात चितारून ठेवलेले होते.

 आम्ही द्वितीय वर्ष स्थापत्य अभियांत्रिकीत असताना आमचा "सर्व्हे कॅम्प" सदाशिवगडावर गेला होता. त्या गडावर वरपर्यंत जायला स्टेशनकडून दिसणा-या बाजूच्या विरूद्ध दिशेने एक रस्ताही आहे, शिवाय पाय-याही आहेत आणि गडाच्या माथ्यावर एक शंकराचे पुरातन मंदीरही आहे हे नवनवीन शोध आम्हाला लागलेत. तत्पूर्वी आमची समजूत अशी की सह्याद्रीच्या अनेक पर्वतमाथ्यांप्रमाणे हा सदाशिवगडाचा पर्वतमाथाही आजवर कुणी चढलेला नाही. पण इथे तर वर्दळ वगैरे भरपूर होती.  फ़क्त इथे वर्दळ आहे हे आम्हाला कराड स्टेशनकडल्या बाजूने आजवर दिसू शकली नव्हती.

१९९१ मधल्या एका विकेंडला लागून ३ सुट्ट्या आलेल्या होत्या. त्या हिवाळी शनिवारी आम्हा दोघातिघा नागपूरकर मित्रांचा सदाशिवगड सर करण्याचा मनसुबा ठरला. सकाळी लवकर आटोपून आम्ही कॉलेजपासून कॅनॉल स्टॉपवर गेलो आणि तिथून कराडकडून येणा-या कराड - वाघेरी बसने ओगलेवाडीचा थांबा, रेल्वेपूल वगैरे ओलांडून सदाशिवगडाच्या पायथ्याशी उतरलोत. पायथ्याशी असलेल्या गावातून रस्त्याने जाण्याऐवजी स्टेशनकडून दिसणारा पहाड चढून जाऊ या आत्मविश्वासाने आम्ही त्या बाजूने निघालोत. आम्हा तिघांपैकी एकालाही तोवर असे पहाड अशा अनवट वाटांनी चढण्याचा अनुभव नाही. पण तारूण्याचा जोश आणि "पाहू न बे का होते तं ? काय हुईन जास्तीत जास्त ? वर नाई चढू त उतरता त येतेच न बे." ही टिपीकल वैदर्भीय बेफ़िकीरी.

 आमची सकाळची पोटपूजा वगैरे आटोपलेली होती. दोन तीन तासात गड चढू आणि मग परतताना दुपारचे जेवण इथेच कुठेतरी उरकून संध्याकाळपर्यंत हॉस्टेलला जाऊ असा आमचा बेत आखलेला. गावाची हद्द संपली आणि शेताशेतांमधून गडाच्या पायथ्याशी आम्ही पोहोचलो. साध्या साध्या वाटांनी गड चढायला सुरूवात केली. एकमेकांची मजा घेत घेत, गप्पांमध्ये जवळपास अर्धा गड आम्ही चढून गेलो. मध्येच मागे वळून कराड स्टेशनकडे नजर टाकली. एक दोन मालगाड्यांची त्याकाळात तिथून ये जा झाली तेव्हा पहाडावरून त्या गाड्या अगदी चैत्रगौरीमध्ये मांडलेल्या देखाव्यासारख्या दिसत होत्या. कराड स्टेशनचा आणि आसपासचा संपूर्ण परिसर तिथून आम्ही मनसोक्त न्याहाळून घेतला. आजवर स्टेशनवरून हा पहाड आम्ही बघत होता आज या पहाडावरून स्टेशन कसे दिसतेय ते आम्ही वेगळ्या नजरेने बघून घेत होतो. आजवरच्या आमच्याच दृश्यमिश्रणांमध्ये आम्ही अडकलो होतो.

आणखी थोडे पुढे चढल्यावर आम्हाला एक कठीण उभी चढण लागली. आजुबाजूला असलेल्या झुडूपांना धरून एकमेकांच्या सहाय्याने ती कठीण चढण आम्ही मोठ्या कष्टाने चढलो. त्या चढणीवर असलेल्या भुशभुशीत जमिनीमुळे पाऊल टिकणे कठीण झाले होते. सारखी माती घसरत होती. प्रत्येक पाऊल टाकताना त्या मातीविषयी खूप अविश्वास जाणवत असताना आम्ही ती चढण चढलोत खरे पण एकंदर पर्वतारोहणाविषयी आम्हा तिघांचाही आत्मविश्वास डळमळीत व्हायला सुरूवात झालेली होती हे ही तितकेच खरे.

 ती चढण चढून आम्ही एका अरूंद माचीवजा जागी आलो खरे पण तिथेच थबकलोत. कारण यापुढील चढण अधिक खडी आणि अधिक भुशभुशीत मातीतली होती. जणू भुसभुशीत मातीच्या उभा कडाच आम्हाला चढायचा होता. आत्तापर्यंत असलेला तिघांचाही आत्मविश्वास एकदम शून्य झाला. हतबल होऊन आम्ही त्या माचीवरच थबकलोत. काहीच सुचेना. बरं, परत फ़िरतो म्हटलं तर आत्ताच कष्टाने चढून आलेला परतीचा मार्ग कसा आहे ? याची आम्हाला पूर्ण कल्पना होती. त्या मार्गावरून परतणे म्हणजे घसरगुंडीवरून अनिश्चित अंतर घसरणे आणि शरीराला इजा करून घेणे हे नक्की. पण पुढे जाणेही अशक्य. इतकी कठीण चढण आणि ती सुद्धा भुसभुशीत जमिनीतली ? आम्ही अशा गोष्टींचा कधी विचारही केलेला नव्हता. अशा गोष्टी कधी आजवर वाचल्याही नव्हत्या. काय बरे करावे ? या विचारात आम्ही तिघेही. सुन्न होऊन त्या माचीवर उभे. आता आपल्याला किती काळ या जागी रहावे लागेल ? याची अनिश्चितता सगळ्यांच्या मनात आलेली जाणवत होती. आपण रात्रभर इथे अडकून पडलोत तर आपले हॉस्टेलवरचे इतर मित्र आपला शोध घेत इथे येतील का ? आले तर एव्हढ्या मोठ्या पर्वतावर आपण त्यांना सापडू का ? आणि आपण सापडलोत तरी आपली सुटका करायला त्यांना एखादे हेलीकॉप्टर वगैरे आणता येईल का ? तसे सुचेल का ? आणि सुचले तरी ते परवडेल का ? वर्षाला १६५ रूपये फ़ी भरून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणारी सगळी मध्यमवर्गीय मंडळी आम्ही. आमचे खर्च आणि विचारही मर्यादितच.

अशा हतबल आणि "संपलं सगळं" या अवस्थेत काही काळ गेला. आमच्यातल्या एकाला एक युक्ती सुचली. "अबे वर जाण्यापेक्षा या माचीवरून आहे त्याच लेव्हलला आजूबाजूला सरकत सरकत जाऊ. कुठूनतरी सोपी चढण सापडेलच नं." इतर काहीही न सुचल्यामुळे आम्हाला तोच मार्ग पटला आणि आम्ही त्या अगदी अरूंद माचीवरून उत्तरेकडे (गावाच्या दिशेने) सरकायला लागलो. पायाखालची जमीन भुसभुशीतच होती पण गाव हळूहळू जवळ करतोय ही भावना प्रबळ होती. आणि जवळपास अर्धा तास असे सावधानतेने सरकत सरकत गेल्यानंतर....

...आम्हाला गडावर जाणा-या पाय-याच गवसल्यात की. वा ! आम्ही तिघांनीही सुटकेचा मोठ्ठा निःश्वास सोडला आणि भरभर पाय-या चढून गडावरच्या मंदीरात दाखल झालोत. तिथे त्या शंभू महादेवाचे दर्शन घेऊन राजमार्गाने गडाच्या पायथ्याशी आलोत. त्या माचीवरच्या अर्ध्या तासाची आठवण येऊन आम्हाला आता हसायला येत होते आणि तेव्हढेच घाबरायला पण होत होते. खरेच आपण तिथे अडकून पडलो असतो तर ? हा प्रश्न घाबरवणारा आणि हादरवणारा होता.

 परत हॉस्टेलला आल्यानंतर सगळ्या मित्रांना हा किस्सा अगदी साग्रसंगीत सांगितल्या गेला. कधीही मोठी टेकडीही न चढलेल्या या "थ्री मस्केटीयर्स"नी केलेली सदाशिवगडाची चढाई हॉस्टेलवर चर्चेचा, मनमुराद हसण्याचा आणि आमच्या साहसाला वाखाणण्याचा विषय झाला होता.

 त्यानंतर अनेक वेळा कराडला गेलो. दरवेळी स्टेशनवर उतरलोत की नजर समोरच्या सदाशिवगडाकडे जातेच. आजही आम्ही अडकून पडलो होतो ती माची अजूनही दृष्टीला पडते आणि तो अर्धा तास आठवतो. त्या माचीवरून दिसणारे स्टेशन डोळ्यासमोर येते. तारूण्याच्या उत्साहात केलेले आपले धाडस आठवून हसू येते आणि आता आपल्याला आपल्याच त्या वयाची असूया वाटते. आज मोठे झालोत, जबाबदा-या वाढल्यात आता आपण असे साहस करू शकत नाही या भावनेने आपण थोडे खंतावतोही.

 पण या सगळ्या गदारोळात तीन भावी गिर्यारोहकांच्या स्वप्नाचा अकाली मृत्यू मात्र झाला हे नक्की.

 

- साहसी गिर्यारोहक (ए. हो. इ. अ. = एकेकाळी होण्याची इच्छा असलेला) राम प्रकाश किन्हीकर.

देवाचिये द्वारी - ९८

 


दिसेल ते नासेल I आणि येईल ते जाईल I

जे असतचि असेल I तेचि सार II

 

सोहं हंसा तत्वमसि I ते ब्रह्म तू आहेसी I

विचार पाहता स्थिती ऐसी I सहजचि होते II

 

जाणतां जाणतां जाणीव जाते I आपली वृत्ती तद्रूप होते I

आत्मनिवेदन भक्ति ते I ऐसी आहे II

  

देह हा नाशिवंत आहे पण आत्मा अविनाशी आहे म्हणून देहबुद्धी (मी म्हणजे देहच ही बुद्धी) टाळून विचाराने ते अविनाशी तत्व म्हणजेच मी ही सोहम बुद्धी मनुष्यमात्रांनी बाळगली तर ती खरी आत्मनिवेदन भक्ती असे श्रीसमर्थांना वाटते.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन कृष्ण षष्ठी शके १९४४ , दिनांक १५/१०/२०२२)


Friday, October 14, 2022

सौंदर्य आणि भाषा (भाषेचे सौंदर्य नव्हे)

 त्या रामबंधू मसालेच्या जाहिरातीत सौ. माधुरी श्रीराम नेने "चकली"त ला  "च" हा "चिवडया"तला "च" सारखा करतात. ते कानाला खूप खटकते. खरेतर "चकली"त ला  "च" चा उच्चार हा "चवी" तल्या "च" सारखा करायला हवा. बालपणापासून हे असेच ऐकायची सवय झालेली असल्याने ते कानाला खटकते. बरं, हे खटकणे दुस-या कुठल्या तरी सर्वसामान्य मॉडेलकडून खपून गेले असते पण माधुरी सारख्या आमच्या तारुण्यात आमच्या दिलाची धडकन वगैरे असलेल्या सौंदर्यवतीकडून हे असले ऐकणे म्हणजे शिक्षाच आहे. या चुकीच्या उच्चारणामुळे तिच्या एकंदर व्यक्तिमत्वाबद्दलचा आदर उणावल्याची अनेक उदाहरणे वय वर्षे ४० ते ६० या तरूणांच्या गटात संपूर्ण भारतात आढळतील. 

यानिमित्ताने मला माझ्या मावसभावाचा एक किस्सा आठवला. साधारण १९९३-१९९४ मधला. तो किस्सा त्याच्याच शब्दात वाचायला मजा येईल. मी केलेले निवेदन मजा देणार नाही. मग वाचायचा हा किस्सा त्याच्याच शब्दात ?

"तेव्हा आम्ही नागपूर विद्यापीठ परिसरात (नागपूरच्या प्रचलित भाषेत "कॅम्पस") M. Sc. (Mathematics) ला शिकत होतो. महालातल्या नटराज सिनेमाजवळ आम्ही तेव्हा रहायचोत. दररोज सकाळी ९.१५ वाजता अयाचित मंदीरकवरून सुटणा-या अयाचित मंदीर - विद्यापीठ परिसर या शहर बसने नटराज सिनेमा या थांब्यावरून १० वाजेपर्यंत कॅम्पस ला पोहोचायचो. मी आणि माझा एक मित्र. आमचे दोघांचेही वय २२-२३. तारूण्याचे. नवनवीन स्वप्नांचे, स्वप्नाळू जीवनाचे वगैरे.


आणि आमच्या सुदैवाने एकेदिवशी एका ’सुबक ठेंगणी’ चा बसमध्ये प्रवेश झाला. म्हणजे आम्ही आमच्या नेहमीच्या "नटराज" थांब्यावरून बसमध्ये बसलो तेव्हा बसमध्ये "ती परी अस्मानीची" आधीपासूनच बसलेली होती. अयाचित मंदीरया सुरूवातीच्या थांब्यावरूनच ती बसलेली असणार हे उघड होते कारण नटराज हा दुसराच थांबा होता. शहर बस सेवेत अशी एखादी अप्रतिम सुंदर मुलगी दिसणे हे त्याकाळी (आणि आत्ताही) अप्रूपच होते. आमचा पहिला दिवस हा आनंदाचा आणि अप्रूपाचाच गेला.

दुस-या दिवशी नेहमीपेक्षा थोडे जास्तच तयार वगैरे होऊन, जरा जास्त पावडर वगैरे लावून (त्याकाळी ते डिओ, स्प्रे वगैरेंचे आजएव्हढे फ़ॅड नव्हते.) आम्ही पुन्हा आमच्या शहरबस थांब्यावर गेलोत. आज जरा जास्त उत्सुकता होती. नेहमीची बस भोसला वेद शाळेपासून येताना दिसल्यानंतर आम्हा दोघांच्याही हृदयाची धडधड एकमेकांना ऐकू जाईपर्यंत वाढली होती. एव्हढी वाट तर आम्ही आमच्या दहावीच्या निकालाचीही पाहिली नव्हती. 

बस आली आणि ती ’सुबक ठेंगणी’ बसमध्ये पुन्हा कालच्याच जागेवर बसलेली पाहून आमचे चेहेरे उजळलेत. आज तिच्यासोबत तिची एक मैत्रिण पण तिच्या बाजूला बसलेली होती. आम्ही दोघेही एक दोन रांगा सोडून त्या दोघींच्या मागील रांगांमध्ये बसलोत. त्या दोघीही बसच्या अखेरच्या थांब्यावर उतरल्यात. त्या दोघीही आपल्यासोबत "कॅम्पस" मधल्या कुठल्यातरी विद्याशाखेत विद्यार्थिनी आहेत हे कळले आणि उत्साह वाढला. त्या दिवशी दुपारी आम्ही आमचा "लंच" लवकर आटोपून "कॅम्पस" मधले विविध विभाग पायी पालथे घातलेत. ती ’सुबक ठेंगणी’ नेमक्या कुठल्या विभागात शिकते याची उत्सुकता. आमच्यासोबत शिकणा-या इतर सहाध्यायांना आम्ही आमच्या या ’सहली’ची अजिबात भनक लागू दिली नाही. उगाच कशाला आपल्याला असलेली स्पर्धा वाढवून घ्या ? हा उदात्त विचार त्यामागे, बाकी काही नाही.

मग हे रोजचेच सुरू झाले. शनिवार रविवार आम्हा दोघांनाही अजिबात करमायचे नाही. इतर दुनियेला सोमवार नकोसा वाटत असेल पण आमच्यासाठी सोमवारची सकाळ ही नवी धडधड, नवी उत्सुकता घेऊन यायची. एव्हाना त्या दोघींनाही आम्ही त्यांच्यासोबत "कॅम्पस" पर्यंत रोज असतोय हे कळले असावे. त्यांच्या आमच्याकडे बघण्याच्या नजरा सरावाच्या झाल्या होत्या. दोन आठवड्यानंतर आम्ही दोघेही घरून पंधरा मिनिटे लवकर निघून चक्क पायीपायी अयाचित मंदीरपर्यंत अर्धा किलोमीटर चालून जाऊन पहिल्या थांब्यापासून बस पकडायला लागलो होतो. आम्ही दोघांनीही ’नटराज’ ऐवजी पहिल्या थांब्यावरून बस पकडल्याची नोंद तिच्या नजरेने पहिल्याच दिवशी घेतली आणि तिने नोंद घेतल्याची नोंद आम्ही दोघांनीही घेतली. मनात नवनवीन कविता स्फ़ुरत होत्या. अचानक गझला आवडू लागल्या होत्या. आमच्या घरी आमचा आरशासमोरचा मुक्काम अचानक वाढला होता. दाढी करण्याची फ़्रिक्वेन्सी आठवड्यातून दोन ऐवजी दररोज झाली होती. दाढी झाल्यावर ब्रशला उरलेला साबणाचा फ़ेस स्नानाआधी संपूर्ण चेहे-याला फ़ासून आम्ही त्याच खर्चात फ़ेसपॅकचा आनंद आणि अनुभव घेत होतो. तिच्याशी सूत जुळले तर आपल्या घरून, तिच्या घरून कितपत विरोध, किती पाठिंबा वगैरे मिळेल या कल्पनेने आम्ही विचाराधीन होत होतो.

महिना, दीड महिन्याने एका शुभदिनी आम्ही आमच्यामधले हे अंतर कमी करण्याचे ठरवले. त्यादिवशी आम्ही त्या दोघी बसमध्ये ज्या आसनांवर बसल्या होत्या त्यांच्यापासून दोन रांगा सोडून न बसता अगदी त्यांच्या अगदी मागच्या आसनावर जागा पटकावली. बसमधल्या खिडकीतून येणारा मंद वारा, त्या मंद वा-यावर उडणारे तिचे नीट निगा राखलेले केस, तिच्या ड्रेसचा, त्यांच्या रंगांचा चॉईस हे सगळेच आम्हाला आवडणारे होते. तुम्हाला सांगतो अयाचित मंदीर ते "कॅम्पस" पर्यंतचा प्रवास हा स्वर्गसुखाचा प्रवास वाटे. वाटेत बसने हळूहळू जावे, प्रवास संपूच नये असे वाटे. माझ्यापेक्षा माझ्या मित्राची घालमेल जास्त होतेय हे माझ्या लक्षात आले आणि मी खिलाडूपणे त्याला वॉकओव्हर द्यायचे ठरवले. 


आमच्या या शहर बसच्या सहप्रवासाला दोन महिने झाले असावेत. एका शुभदिनी माझ्या मित्राने "आज ’आर या पा्र’ करायचेच" हा निर्णय घेतला. आज तिला ती ’कॅम्पस’ ला

उतरली की एकदाचे विचारूच हा त्याचा निर्धार झाला. मी सुद्धा "लढ बाप्पू लढ" म्हणत त्याला सक्रिय आणि बाह्य पाठिंबा दिला होता. त्यादिवशीही आमचा प्रवास अयाचित मंदीरपासून सुरू झाला. एक गोष्ट मात्र खरी ती आपल्या मैत्रिणीशी अगदी हळू आवाजात बोलत असे. इतक्या हळू की तिचा आवाज, तिचे बोलणे अगदी मागच्या आसनांवर बसलेल्या आम्हाला अगदी कुजबुजता ऐकू येत असे. बोलणे कळत नसले तरी तेव्हा तो कुजबुजता आवाजही आम्हाला खूप भावायचा. आजही प्रवासात त्या दोघींची तशीच कुजबूज सुरू होती आणि मागल्या आसनांवरचे आम्ही दोघे आपली धडधड तिला ऐकू जाऊ नये या प्रयत्नात. तिला आज विचारायचे असल्याने "काय होईल ?" या आशंकेने माझ्या मित्राची धडधड आज तर आणखीच वाढलेली होती. 

नरसिंग सिनेमा - गांधी गेट - शुक्रवार तलाव - आग्याराम देवी - कॉटन मार्केट - शनी मंदीर - आनंद टॉकीज - बर्डी असे थांबे मागे टाकत आमची बस अलंकार टॉकीज समोरून जाऊ लागली. आणि अलंकारला लागलेले "डर" सिनेमाचे भलेमोठे पोस्टर पाहून अचानक समोरच्या आसनांवरून चित्कारवजा आवाज आला "चालते का व संगू डर पायले ? चाल न व, जाऊ न दोघीबी." हे चित्कारवजा उदगार त्या ’सुबक ठेंगणी’ चेच होते हा धक्का पचवायला आम्हा दोघांनाही जरा वेळ लागला. ही टिपीकल व-हाडी भाषा आम्हाला नवीन नव्हती आम्ही ही भाषा चांगली बोलत असू पण आत्ता तिचे सौंदर्य आणि तिची भाषा यांचा असा व्यस्त संबंध पाहून आमचा प्रचंड हिरमोड झाला. आम्ही आमच्याच मनातल्या मनात तिच्या भाषेविषयी, बोलण्याविषयी बांधलेली स्वप्ने चुराडा झाली होती. त्यादिवशी पुढल्याच थांब्यावर, शंकरनगरला आम्ही उतरलोत. "कॅम्पस" पर्यंत गेलोच नाही. तिकडून परतणा-या बसने घरी आलोत. दुस-या दिवशीपासून "कॅम्पस" च्या आमच्या नेहमीच्या बसचा नाद सोडला. मुकाट थोडे आधी निघून रवीनगरपर्यंत जाऊन तिथून "कॅम्पस" पर्यंत पायीपायी जाऊ लागलोत. आमचा अव्यक्त प्रेमाचा मोठाच भंग झाल्याची भावना पुढली दोन वर्षे आमच्यासोबत राहिली. कॅम्पसच्या इतर अनेक आठवणी आहेत पण त्यातली ठळक लक्षात राहिलेली ही एक मोठीच आठवण."

- मराठीतल्या सर्व बोलीभाषांवर सारखेच प्रेम असणारा पण तरीही अनपेक्षित जागी अनपेक्षित भाषा ऐकल्यानंतर दचकणे म्हणजे काय होत असेल ? याचा असा (पर)अनुभव असलेला मराठी प्रेमी राम प्रकाश किन्हीकर.



देवाचिये द्वारी - ९७

 


सावधान आणि चंचळ I चहूंकडे वळवळ I

येकलाचि चालवी सकळ I इंद्रियेद्वारा II

 

आत्मा नसतां देहांतरी I मग ते प्रेत सचराचरी I

देहसंगे आत्मा करी I सर्व कांही II

 

देह अनित्य आत्मा नित्य I हाचि विवेक नित्यानित्य I

अवघे सूक्ष्माचे कृत्य I जाणती ज्ञानी II

 

 

या देहाचे जे चलनवलन जो आत्मा आणि हा देह यांचे शाश्वत आणि नश्वरपणाचे नाते श्रीसमर्थांनी अनेकवेळा आपल्यासमोर मांडले आहे. आपल्या देहाचे चलनवलन असणारा आत्माच सर्वकाही आहे कारण आत्मा नसलेला देह प्रेत आहे आणि ते त्याज्य आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन कृष्ण पंचमी शके १९४४ , दिनांक १४/१०/२०२२)