Tuesday, May 26, 2026

आठवणीतल्या एस. टी. - कोच शेअरींग करणारी बस.

एक एस. टी. प्रेमी म्हणून बसेसवर माझे नितांत प्रेम आहे, अगदी बालपणापासूनच. त्यामानाने हातात कॅमेरा आयुष्यात बराच उशीरा आला. पण आल्यानंतर माझ्या लाडक्या एस. टी. ची जी जी प्रकाशचित्रे मी काढून ठेवलेली आहेत ती इतक्या वर्षांनंतर आज एक अनमोल ठेवा बनून राहिलेली आहेत.


अशीच एक एस. टी. आपल्या भारतीय रेल्वेत रेक शेअरींग हा प्रकार प्रचलित आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस, महालक्ष्मी एक्सप्रेस, सह्याद्री एक्सप्रेस आणि सेवाग्राम एक्सप्रेस या एकमेकींचे रेक्स वापरायच्यात. तसेच गोवा एक्सप्रेस आणि दक्षिण एक्सप्रेस या सुद्धा एकमेकींचे रेक्स वापरायच्यात. तसाच बसचे कोच शेअरींगचा प्रयोग आपल्या महाराष्ट्र एस. टी. ने साधारण २००६ ते २००८ मध्ये केल्याचे स्मरते.



लातूर विभागातल्या औसा डेपोची गाडी नागपूर - चंद्रपूर - एटापल्ली मार्गावर ? आश्चर्य वाटले ना ? लातूर ते नागपूर ही रातराणी सकाळी सकाळी नागपूरला पोहोचल्यानंतर दिवसभर नागपूर बस स्थानकात पडून असायची आणि रात्री पुन्हा नागपूर ते लातूर ही रातराणी सेवा म्हणून परत जायची. तसेच लातूर ते अहेरी या रातराणी सेवेचे व्हायचे. लातूरवरून अहेरीला आलेली बस दिवसभर अहेरी बसस्थानकात नुसती पडून रहायची.


म्हणून आपल्या एस. टी. ने संसाधनांचे, कोचेसचे योग्य ते व्यवस्थापन करण्यासाठी आणि त्याद्वारे आपले उत्पन्न वाढविण्यासाठी सकाळी नागपूरला आलेल्या एस. टी. च्या या कोचला नागपूर ते एटापल्ली (पुढे अहेरी) आणि सकाळी अहेरीला आलेल्या कोचला अहेरी ते नागपूर अशी एक फ़ेरी करायला सुरूवात केली. जी चालक वाहक जोडी ही गाडी घेऊन नागपूरला / अहेरीला आलेले आहेत त्यांचा दिवसभर आराम व्हायचा आणि मधल्या या नागपूर ते एटापल्ली व अहेरी ते नागपूर ही फ़े-यांचे संचालन अहेरी डेपोच्या चालक वाहक जोडी्कडे असे.


म्हणजे लातूर ते नागपूर-- नागपूर ते एटापल्ली-- एटापल्ली ते अहेरी-- अहेरी ते लातूर आणि उलट बाजूने लातूर ते अहेरी-- अहेरी ते नागपूर-- नागपूर ते लातूर असा दोन रात्रींचा आणि एका दिवसाचा प्रवास करून त्या त्या बसेस परत आपल्या मूळ डेपोत परतत असत. संसाधनांचा महत्तम वापर होत असे.


या बसचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चिकलठाणा (छत्रपती संभाजीनगर) मध्यवर्ती कार्यशाळेने बांधलेल्या फ़ार कमी टाटा बसेसपैकी एक बस. या मार्गावर औसा डेपोची लेलॅण्ड बसपण आम्ही बघितलेली आहे. पण हे प्रकाशचित्र काढले त्यादिवशी औसा डेपोने आपली टाटा बस या मार्गावर धाडली होती.


MH - 20 / D गॅंगमधला हा आणखी एक मेंबर. आपल्या महाराष्ट्र एस. टी. त MH - 20 / D गॅंग प्रसिद्ध आहे. कारण MH - 20 / D 0001 ते MH - 20 / D 9999 पर्यंत सगळे नंबर्स फ़क्त आपल्या महाराष्ट्र एस. टी. लाच मिळालेले आहेत. असे उदाहरण कुठेही नाही. 


लातूर डेपोची निळ्या रंगाने बसेसची ग्रील रंगवण्याची टिपीकल पद्धत आणि नागपूर सुपर चंद्रपूर - एटापल्ली हा बसवरचा वैशिष्ट्यपूर्ण मार्गफ़लक. आजकाल "सुपर" हा शब्द आपल्या एस. टी. च्या शब्दकोशातून जणू नाहीसाच झालेला आहे. सगळ्या बसेस फ़क्त जलद असतात. अति जलद (सुपर) शब्द आता अतिशय दुर्मिळ झालात.


नागपूर बस स्थानक

१८ / ५ / २००८. सकाळी ८.०० वाजता. 


Sunday, May 24, 2026

जननीजनक माया लेकरू काय जाणे ?

आपल्या बालपणी आपण एखाद्या परिचितांकडे, नातेवाईकांकडे जातो. तिथे गेल्यानंतर आपल्या बालसुलभ मनाला तिथल्या एखाद्या वस्तूची, तिथे आपल्याला मिळालेल्या वागणुकीची किंवा तिथल्या एकूणच वातावरणाची खूप भुरळ पडलेली असते. तिथे पुन्हापुन्हा यावेसे वाटते. तिथून परतताना आपला पाय अगदी निघत नसतो.


काही कालावधीनंतर आपण आपल्या पालकांकडे त्याठिकाणी पुन्हा जाण्याचा प्रस्ताव मांडतो, हट्ट करतो. पण आपली पालकमंडळी आपल्याला काही ना काही कारण सांगून तो प्रस्ताव लांबणीवर टाकतात. त्या ठिकाणच्या वातावरणाची जबर मोहिनी आपल्या मनावर असल्याने आपण पुन्हा काही कालावधीनंतर तोच प्रस्ताव, हट्ट पुन्हा करतो पण आपली पालक मंडळी तो प्रस्ताव पुन्हा लांबणीवर टाकतात, क्वचितप्रसंगी धुडकावून पण लावतात. आपल्याला मनोमन दुःख होते. आपले पालक उगाचच आपल्याला त्या ठिकाणी जायला मनाई करत आहेत, आपण आता त्या ठिकाणी जाऊन मागच्या भेटीत अनुभवलेले वातावरण पुन्हा अनुभवू शकणार नाही याची दुःखद जाणीव आपल्याला अगदी बालवयातही झालेली असते. पण असे का ? याचा उलगडा आपल्याला होत नाही. 


आपले पालकही खरोखर अशा मोठ्या मनाचे आणि थोर असतात की मागील भेटीत त्या ठिकाणी गेलेले असताना त्यांच्या मनावर तिथे गेल्यामुळे काय ओरखडा उमटला आहे, तिथे त्यांचा काय अपमान झाले किंवा काय वेदना झालेल्या आहेत, ह्या बाबी ते आपल्याला कळू देत नाहीत. लहान मुलांना या गोष्टी कशाला कळायला हव्यात ? हा एक दृष्टीकोन किंवा लहान लहान मुलांना या गोष्टी सांगून त्यांच्या बालमनात तिथल्या लोकांविषयी नकारात्मक भावना आपण कशाला निर्माण करायची ? हा आणखी एक दृष्टीकोन त्यांचा असतो.


यथावकाश आपण मोठे होतो. ती घटना, तो हट्ट आणि आपल्या पालकांनी त्यावेळी दिलेला नकार अजूनही आपल्या स्मरणात असतो. त्यामागे असलेल्या कारणांचा आपण धूसर अंदाज घेऊ शकतो. पण आता आपले पालकच अस्तित्वात नसतात. आपले जीवन जगून स्वतःचे अस्तित्व अनंतात विलीन करून ते कधीचेच फ़ोटोंमध्ये जाऊन बसलेले असतात. 


आपण आता पालक झालेले असतो आणि क्वचित असाच प्रसंग आपण व आपल्या पाल्यांबाबत घडतो. अशावेळी आपली मुले आपल्याला अशा घटनेचा जाब, कारणमीमांसा विचारतात. एकेकाळी आपले पालक झाले होते तसेच आपण निरूत्तर होतो, घटना लपवून ठेवतो, त्या अपमानाची, उपेक्षेची झळ आपापल्या पाल्यांना पोहोचू देत नाही.


आणि मग आपल्याला आपले आईबाप आठवतात. त्यांची माया आठवते आणि श्रीसमर्थांची उक्तीही आठवते.


जननीजनक माया लेकरू काय जाणे

पय न धरत मुखी हाणिता वत्स नेणे


- प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर 

अधिक ज्येष्ठ शके १९४८, 

२४ / ५ / २०२६

 

Thursday, May 21, 2026

भारतीय रेल्वे, पाकिस्तान रेल्वे आणि बांगलादेश रेल्वे

आमच्या रेल्वेफ़ॅनिंग गृपवर पाकिस्तान रेल्वेचे पण व्हिडीओ आणि फ़ोटोज येत असतात. अगदी गेल्या 5 - 6 वर्षांपासून आम्हाला हे फ़ोटोज आणि व्हिडीओज बघायला मिळतात. मी आवर्जून हे व्हिडीओज पाहतो कारण भारतीय रेल्वेतल्या 80 च्या  आणि  90 च्या दशकाच्या अगदी सुरूवातीच्या रेल्वेप्रवासाचा नोस्टॅल्जिया इथे अनुभवायला मिळतो. पाकिस्तान रेल्वेच्या स्टेशनांची स्थिती, ती डिझेल इंजिने, ते कोचेस, एका गावावरून दुस-या गावाला जाताना त्यांच्या रेल्वेमार्गाची स्थिती, जेमतेम 80 ते 90 किमी प्रतितास या वेगाने धावणा-या त्यांच्या एक्सप्रेस गाड्या हे सगळं मला माझ्या बालपणात, तरूणपणात घेऊन जातं.



आपल्यापेक्षा पाकिस्तान रेल्वे किमान 30 ते 35 वर्षे मागास आहे हे पाहून आपल्या भारतवर्षाविषयी आणि इथल्या गेल्या 35 वर्षांमधल्या रेल्वेमंत्र्यांविषयी आदर वाटतो. अपवाद फ़क्त लालू आणि ममताचा. 


लालूने आणलेल्या गरीब रथ रेकची रंगसंगती पाकिस्तान रेल्वेशी तंतोतंत जुळते. इथेही या उपद्रवी माणसाने आपले लांगूलचालन कौशल्य पणाला लावले होते हे जाणवते. हा माणूस आणखी काही काळ रेल्वेमंत्रीपदावर असता तर भारतीय रेल्वेची त्याने अगदी पाकिस्तान रेल्वे करून टाकली असती.


तसेच ममता बॅनर्जी हा हट्टी बाईचे. अजून काही वर्षे ही बाई रेल्वेमंत्री असती तर भारतीय रेल्वेचा सगळा निधी हिने कुठलाही विधीनिषेध न बाळगता बंगालकडे वळवला असता आणि भारतीय रेल्वेची बांगलादेश रेल्वे करून टाकली असती. 


माझ्या मते गेल्या शतकात, पूर्ण बहुमतात सरकार असताना माधवराव शिंदे हे शेवटले "भारतीय" रेल्वेमंत्री ठरावेत. ज्यांनी संपूर्ण भारताचा विचार केला. 1991 नंतर 2014 पर्यंत विविध आघ्याड्यांची सरकारे आलीत आणि "भारतीय" दृष्टीकोन मागे पडला. प्रत्येक रेल्वेमंत्र्याने आपापल्या प्रांताचा विचार करून रेल्वेखाते राबवले. यात वाजपेयी सरकारमधले रामविलास पासवान आणि नितीशबाबूही अपवाद नाहीत. त्यांचे वागणे बोलणे तत्कालीन पंतप्रधानांना पटत असेलच असे नाही, कदाचित नसेलही पण त्यांच्याकडे असलेल्या खासदारांच्या संख्याबळाने त्याकाळातल्या सर्व पंतप्रधानांचे हात बांधल्या गेले होते हे सुद्धा तितकेच सत्य आहे.



वाजपेयी सरकारमध्ये राम नाईक रेल्वे राज्यमंत्री असताना त्यांनी हा भारतीयत्वाचा प्रयोग करून पाहिला. पण राज्यमंत्री म्हणून त्यांचे अधिकार मर्यादित होते. आणि आपल्याच प्रांताविषयी विचार न करता संपूर्ण भारतवर्षाचा विचार करणे ही टिपीकल मराठी माणसाचीच मक्तेदारी आहे हे ही सिद्ध झाले. मधू दंडवते, राम नाईक आणि आता पीयुष गोयल. तिघांनीही फ़क्त महाराष्ट्राचा विचार न करता संपूर्ण देशाचा विचार रेल्वेमंत्री पदावर असताना केला ह्याची नोंद काळाच्या या विशाल कॅनव्हासवर इतिहासाला घ्यावीच लागेल.


2014 नंतर मात्र "प्रथम भारतीय"ता सगळ्याच आघाड्यांवर राबवलेली दिसू लागली. ज्यांनी ज्यांनी संकुचित प्रांतवाद केला त्यांना त्यांना केंद्रिय सत्ता आणि भारतीय जनता राजकारणाबाहेर करू लागली. भारतीय रेल्वेची धोरणांची, अंमलबजावणीची गाडी वेगवान रूळांवर सुपरफ़ास्ट धावू लागली.


- भारतीय रेल्वेतले बदल जवळून अनुभवणारा, अभ्यासणारा एक रेल्वेफ़ॅन आणि प्रांतीय विचार करणा-या संकुचित रेल्वेमंत्र्यांबद्दल कमालीची चीड असलेला एक भारतीय नागरिक, प्रा, राम प्रकाश किन्हीकर.


या निमित्ताने आम्ही रेल्वेमंत्री झालोच तर काय करू ? याचे एक स्वप्नरंजन इथे आणि इथे

Wednesday, May 20, 2026

गाणी, सुरावटी आणि टाईम मशीन

काहीकाही गाणी, सुरावटी मनाला टाईम मशीन मध्ये बसवून भूतकाळात आणि भलभलत्या ठिकाणी घेऊन जातात.


आकाशवाणीवर एकेकाळी सादर होणार्‍या "सांजधारा" कार्यक्रमातली मराठी गाणी लागलीत की सी.पी. अॅण्ड बेरार शाळेतून दिवसभराचे काम आटोपून संध्याकाळी निघालेले आणि बुधवार बाजारात उद्यासाठी भाजी आणणारे माझे वडिल दिसतात. बुधवार बाजाराच्या तटबंदीतून मागच्या गल्लीतल्या नरसीकरांच्या वाड्यात जाण्यासाठी एक मोठा दरवाजा होता. तो दरवाजा ओलांडला आणि पायर्‍या उतरल्यात की नरसीकरांचा वाडा. तिथे माझी आत्या रहायची. तिच्याकडे आमचे दादा अत्यंत प्रेमाने जायचेत, एकमेकांची विचारपूस, गुजगोष्टी व्हायच्यात.


विविध भारतीवर दुपारच्या वेळेला जी गाणी लागतात त्या गाण्यांच्या लकेरी, सुरावटी जरी कानी आल्यात तरी मी माझ्या बालपणच्या इतवारीतल्या आमच्या कुहीकर वाड्यात जातो. निवांत दुपार, सकाळची शाळा आटोपून जेवण करून छोटासा राम आईच्या मांडीवर डोके ठेऊन  वामकुक्षी करतोय, जवळच्याच कुठल्या तरी घरातून या गाण्याच्या लकेरी कानावर पडताहेत.


मल्लिकार्जून मन्सूर अण्णांची मुलतानी रागातली "साहेब जमाले" कानावर पडली की आम्ही आमच्या गाडीने केलेले नागपूर ते सांगोला प्रवास आठवतात. ही बंदिश किंवा भीमसेनजींची मुलतानी मधलीच "गोकुल गाँव का छोरा, बरसाने की नार" गाडीत सुरू आहे. पहाटे पहाटे सुरू केलेल्या प्रवासाला आता जवळपास १२ तास उलटून गेलेले आहेत. बार्शी - कुर्डुवाडी रस्त्यावर चहापान आटोपून आपण टेंभूर्णीकडे जातोय. सूर्य अस्ताला जातोय आणि आता अगदी तासाभरात आपण आपल्या घरी, सांगोल्याला असणार आहोत, हीच भावना.


असे सुरावटींमध्ये हरवून भूतकाळात रमणे, हरवणे हे आजच्या दिनांकाला, वर्तमानात गाडी चालवत असताना चांगले नाही हे सुध्दा मला माहिती आहे. पण या सुरावटींमध्ये आपला जीव रमतोय, टाईम मशीन सारखे आपण भूतकाळात जातोय, आता आपल्यात नसलेल्या आपल्या जीवलगांसोबत रमतोय हे मला खूप मोलाचे वाटते.


- जीवनाशी, काळाशी, जीवलगांशी कायम कृतज्ञ असलेला, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर. 

Sunday, May 17, 2026

मध्य रेल्वेचा नागपूर विभाग: एका शोचनीय परिस्थितीचा ए्कूणच आढावा

१६/५/२०२६


चला, नागपूर ते मडगाव धावणारी हॉलिडे स्पेशल रेल्वेगाडी आजपासून नियमित झाली. 


इतकी वर्षे ही गाडी (11039 / 11040) हॉलिडे स्पेशल च्या नावाखाली प्रवाशांकडून तिकीटांसाठी जादा अधिभार घेऊन चालवल्या जात होती.  ही गाडी आता नियमित रेल्वेगाडी (11203 / 11204)  झाल्यामुळे प्रवाशांची ही लूट थांबेल.


ही गाडी आल्यापासून आपल्या लेटलतिफीसाठी आणि कूर्मगतीने चालण्यासाठी (इथे "धावणे" हा शब्दप्रयोग सुध्दा मला करवत नाही.) एकेकाळी आमच्या "महाराष्ट्र एक्सप्रेसला मिळणारी दूषणे हल्ली या गाडीकडे निर्देशित झाली आहेत. ही गाडी दोन्हीहीकडे कायम किमान ३ तास उशीरा पोहोचते. बरे, या गाडीची नागपूर आणि गोव्यालाही  पोहोचण्याची वेळ संध्याकाळची पण कायमच्या लेटलतिफीमुळे ही गाडी कायम मध्यरात्री  सिनेमाचे सेकंड शो सुटण्याच्या वेळेत पोहोचते.


आमच्या तरूणपणी सेकंड शो पाहून सायकलने परतताना आम्ही कायम आपल्या शर्टच्या खिशात त्या थिएटरच्या  डोअरकीपरने फाडून  हातात दिलेले अर्धे तिकीट आहे की नाही ? हे वारंवार चाचपून बघत असू. न जाणो परतीच्या प्रवासात वाटेत रात्री गस्तीवरच्या पोलिसांनी पकडलेच तर आपले निरपराधित्व सिध्द करायला ते तिकीट उपयोगी पडायचे याची आठवण झाली.

तसेच भारतीय रेल्वेने या गाडीच्या तिकीटावर "अपने गंतव्य स्थानपर पहुचने के बाद रातमे आप आगे की यात्रा करना चाहते है तो यह तिकीट संभालकर रखिये. यह आपकी बेगुनाही का सबूत साबीत हो सकता है." असे आवर्जून लिहावे. नागपूर आणि विदर्भातून गोव्याला जाणारी मंडळी या गाडीच्या अशा अपरात्री पोहोचण्याने ती रात्र करमाळी किंवा मडगाव स्टेशनवरच काढतात आणि गोवा ट्रीपच्या पहिल्याच घासाला खडा चावून घेतात.


या गाडीचे वेळापत्रक बनविणार्‍या रेल्वे कर्मचार्‍याने त्याच्या तरूणपणी  छकडा, रेंगी, बैलबंडी याशिवाय इतर साधनांनी प्रवासच केला नसावा अशी घनदाट शंका मला आहे. या गाडीच्या वेळापत्रकात रेल्वेच्या भाषेत भरपूर "स्लॅक टाईम" दिलेला आहे. तो वेळ वजा केला तर ही गाडी नागपूर ते मडगाव हा आपला प्रवास १९ तासात पूर्ण करू शकते. नागपूर ते कल्याण ११ तास आणि कल्याण ते मडगाव ८ तास. फक्त मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी या गाडीला चांगली वागणूक देण्याचे मनावर घेतले पाहिजे.

कुठलीही नवी गाडी सुरू करताना त्या गाडीला नवे एंजिन  नवे डबे द्यायला हवे हा नियम नसला तरी एक संकेत आहे. पण मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात हा संकेत कधीही पाळला जात नाही. विदर्भ एक्सप्रेस पहिल्यांदा सुरू झाली तेव्हाचा ब्लॉग इथे. त्यानंतर १९९१ मध्ये सुरू झालेल्या गोंडवाना एक्सप्रेस, त्यानंतरची नागपूर - पुणे एक्सप्रेस यांनाही तशीच वागणूक मिळाली होती.

 

आज या गाडीला WAP 7 या एंजिनासारखे जरा बरे असलेले मिळाले असले तरी ते एंजिन या गाडीला संपूर्ण मडगावपर्यंत मिळाले असेल की नाही? याबद्दल मी साशंक आहे. फारफार तर  भुसावळपर्यंत हे एंजिन जोडून नंतर तिथून या गाडीला हिचे नेहमीचे WAG 9, ज्या एंजिनाची महत्तम वेगक्षमता १०० किमीप्रतितास इतकीच आहे, मिळाले असण्याची शक्यता जास्त आहे. "अहो काय करायचेय या आरामात जाणार्‍या गाडीला वेगवान एंजिने देऊन ?"  ही टिपीकल मध्य रेल्वेची मनोवृत्ती.

पण आजच्या उदघाटन प्रसंगी गडकरी साहेबांसारखा राष्ट्रीय पातळीवरचा केंद्रीय मंत्री उपस्थित असतानाही मध्य रेल्वेने आपला कद्रूपणा दाखवलाच. नेहेमीचेच जुनाट डबे या गाडीला दिलेत. कदाचित आजच्या उदघाटन प्रसंगासाठी हे डबे बर्‍याच कालावधीनंतर धुतले असतील, एव्हढेच.


बाय द वे. आता ही गाडी नियमित गाडी म्हणून सुरू झालीय. नागपूरच्या रेल्वे प्रवासी मंडळातल्या बहुतांशी अमराठी मंडळींनी ही गाडी नैनपूर - छिंदवाडा मार्गे किंवा गोंदिया - बालाघाट मार्गे जबलपूरपर्यंत वाढविण्याची मागणी पुढे रेटा बघू. नवीन गाडी सुरू झाली रे झाली की तिच्या देखभालीचा, वेळोवेळी रंगरंगोटी करण्याचा किती नसता त्रास आपल्या मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातल्या कर्मचार्‍यांना होत असतो हे तुम्हाला कळायला हवे. बिचारे दुरंतो आणि सेवाग्राम एक्सप्रेसचे रेक्स मेण्टेन करताकरताच किती मेटाकुटीला येतात! त्यात आता पुणे वंदे भारतची नवी भर पडलीय.


आणखी एक दुःखद निरीक्षण. देशभरात नवीन मार्गावर वंदे भारत गाड्या सुरू करताना सर्वत्र त्यांना नवाकोरा रेक मिळालाय. अपवाद फक्त नागपूर - पुणे वंदे भारतचा. या गाडीच्या उदघाटनाला सुध्दा हिला वर्षभर जुना असलेला दुसर्‍या कुठल्यातरी मार्गावरच्या वंदे भारतचा रेक दिला गेलेला होता. फुलांच्या माळांनी झाकला तरी रेकवरचे नंबर्स सगळी हकीकत सांगून जातात ना हो. असो. म. रे. चा आणि त्यातल्या त्यात तिच्या नागपूर विभागाचा कोळसा उगाळावा तेव्हढा काळाच.


- स्वतः रेल्वेमंत्री झाल्यानंतर ताबडतोब भुसावळ, नांदेड, नागपूर मध्य, नागपूर दपूम आणि इटारसी हे विभाग एकत्र जोडून नागपूरला "मध्यवर्ती मध्य" (C. C. "Centrally Central")  हा नवीन विभागच तयार करण्याची जबर मनिषा मनात बाळगून तसे मांडे खाणारा (इतकी वर्षे नुसते असे मांडे खाऊनच पोट भरलय राव) एक सामान्य रेल्वेफॅन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Saturday, May 16, 2026

हॉल्टिंग बस.

दुपारी उशीरा माहूरहून निघून रात्री ९ - १० वाजेपर्यंत शेगावला पोहोचेल.


शेगावमध्ये रात्रभर मुक्काम.


दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर शेगावहून निघून दुपारी १२ वाजेपर्यंत माहूरला आपल्या डेपोत परत.


कंडक्टर दादा स्वतःसाठी आणि ड्रायव्हर दादांसाठी रात्रीच्या मुक्कामात लागणारे स्वच्छ आणि थंड पाणी भरून घेताना. त्यांना तशी तजवीज करून ठेवावी लागतच असणार.


माहूर गावाच्या पायथ्याशी, अरूणावती नदीच्या पूर्व तीरावर एक रमणीय मठ आहे. तिथे हे शुध्द आणि थंड पाणी सगळ्यांसाठी उपलब्ध असते. बहुतांशी एस. टी. बसेस आणि ट्रक्ससुध्दा इथून स्वतःसाठी शुध्द आणि थंड पाण्याची तजवीज करताना दिसलेत.



MH 20 / BL 3720


Ashok Leyland Cheetah model.


Bus built by MSRTC's Central Workshop Chikalthana Chatrapati Sambhajinagar.


2 x 2 seating.


Total seats 44 + 1 conductor.


नांदे. माहूर आगार.


नांदेड विभागाची टिपीकल पिवळी ग्रील. 


आता आपल्या महाराष्ट्र एस टी बसचे अशा अॅल्युमिनियम बांधणीचे माॅडेल बनणे संपलेय. आता सगळ्या पोलादी बांधणीतल्या एम. एस. पर्‍या.


#msrtc

#mahur

#shegaon

#busfan 

Sunday, May 10, 2026

ताडोबा भटकंती, नर्मदा परिक्रमा आणि चारधाम यात्रा

प्रकाश आमटेंनी त्यांच्या वाॅलवर टाकलेला चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या मागे,  जीपमधून खाली उड्या टाकून मोबाईल घेऊन फोटो आणि व्हिडीओजसाठी धावणार्‍या अति मूर्ख माणसांचा एक व्हिडीओ बघितला. तो वाघ बिचारा या कोलाहलात घाबरून पळून गेला म्हणून. जर त्याने बिथरून त्या भेकड जमावावर हल्ला केला असता तर, सगळ्यांच्या धोतरांचे पितांबर झाले असते.


चैत्रात नर्मदेची उत्तरवाहिनी परिक्रमा केल्याचे अनेकांचे अनुभव वाचलेत, परवापासून इथल्या एका ताईंच्या परिक्रमेचा रोजचा अहवाल वाचतोय. "आज सकाळी मैय्यात अंघोळ केली, पूजा करून निघालो, सकाळी या आश्रमात हा नाश्ता, दुपारी त्या आश्रमात अमुक अमुक पदार्थांचे जेवण, माझ्या मनात आज पुरणपोळी खायचे होते तिथे नेमकी पुरणपोळीच वाढत होते, बघा मैय्या आपल्या भक्तांची इच्छा किती आणि कशी पुरवतेय ते !, संध्याकाळी अमक्यातमक्या आश्रमात आसन लावले, चहा बिस्कीटे आणि रात्री आलु पुरीचा बेत होता." वगैरे वगैरे. हे सगळे भोग तर आपण घरीही छान घेऊ शकतो की. मैय्याच्या परिक्रमेत किती अंतर्मुख झालो, किती तिचे मानसिक सान्निध्य अनुभवले, किती तिथल्या निसर्गातल्या खूप सकारात्मक विचारांशी आपण जोडले जातोय, किती त्या वातावरणाचा भाग होऊन आपण स्वतःच मैय्यारूप, शिवरूप होतोय या प्रश्नाचे उत्तर नाहीच.


त्यात तर एका ट्रॅव्हल कंपनीने ओंकारेश्वर ते ओंकारेश्वर अशी आठवडाभराची मैय्या परिक्रमा "आरामदेह एसी स्लीपर कोच"ने व राहण्याची, भोजनाची फाईव्ह स्टार व्यवस्था अशी जाहिरात वाचली...


केदारनाथच्या दर्शनरांगेत मुंबईच्या लोकलशी स्पर्धा करणारी गर्दी पाहिली आणि...


एकच विचार मनात तरळून गेला की निसर्गाचे संवर्धन व्हावे, माणसांचा निसर्गाला त्रास कमी व्हावा आणि सगळ्या सृष्टीचा दुवा घ्यावा असे सरकारला वाटत असेल तर किमान किमान किमानताडोबा जंगल सफारी चारधाम यात्रा आणि नर्मदा परिक्रमा यावर पुढली काही वर्षे संपूर्ण बंदी घालावी.


चारधाम आणि ताडोब्यातल्या ज्या मंडळींच्या उपजिवीका या पर्यटनावर अवलंबून आहेत, (परिक्रमेत तिथल्या स्थानिकांची उपजिवीका परिक्रमावासियांमुळे चालत नाही. उलट हे असे माजोरी आणि पर्यटक परिक्रमावासी तिथल्या स्थानिकांवर बोझ बनून राहतात. ते मैय्याकाठचे कायम निवासी असल्याने सात्विक रूजुतेने ते बोलत नाहीत तरी त्यांच्या सहनशक्तीचा कडेलोट आपण होऊ द्यायला नको.), त्यांना सरकारने पर्यायी उपजिवीका उपलब्ध करून द्यावी किंवा लाडक्या बहिणींसारखे अक्षरशः दरमहा चांगली रक्कम देऊन त्यांना सावरून धरावे.बस करा रे आता हा माजोरेपणा, निसर्गात ढवळाढवळ करून आनंद घेण्याचा पुण्य कमावण्याचा मूर्खपणा. Enough is really enough.


- "सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियेले नाही बहुमता" या श्रीतुकोबांच्या उक्तीशी आणि"सांभाळ ही तुझी लेकरे, पुण्य समजतील पापाला" या संत गाडगेबाबांच्या उक्तीशी प्रामाणिक असलेला सर्व संतांच्या पायीचा एक यःकश्चित कण, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


Monday, May 4, 2026

रसवंतीः एक लोप पावलेली संस्कृती (विदर्भात तरी)

लेखाच्या सुरूवातीलाच एक disclaimer देतोय की हा लेख महाराष्ट्रातल्या अनंत एस. टी. स्टॅण्डसवर असलेल्या रसवंत्यांविषयी नाही. किंवा रस्त्याच्या कडेला जे हातठेले उभे राहून रसविक्री करतात त्यांच्यावर नाही.


उन्हाळ्याची चाहूल लागली की साधारण मार्च महिन्याच्या मध्यात शहरातल्या थोड्या मोकळ्या जागांवर मांडव लागायचे. शंभर एक पान जेवून उठेल अशा विस्ताराचा मांडव. त्यातल्या एका कोपर्‍यात उसाचा रस काढणारे ते एवंगुणविशिष्ट मशिन स्थापले जायचे. त्याबाजूला एक गल्ला गोळा करणारे व ग्राहकांना हाफ ग्लास, फुल ग्लास रस  असे वेगवेगळ्या रंगातले प्लॅस्टिकचे बिल्ले देणारे टेबल टाकले जायचे. 


इतर परिसरात ग्राहकांना बसण्यासाठी प्लॅस्टिकच्या टेबल खुर्च्यांची रचना व्हायची. गल्ल्याजवळच एक मोठा टकारा टेप आणि त्याची गाणी ग्राहकांच्या कानावर नीट आदळावीत म्हणून मांडवाच्या सगळ्या कोपर्‍यात भले मोठे स्पिकर्स लावले जात. रसवंतीवर ते गाणे वाजतेय, गाजतेय म्हटल्यावर ते गाणे सुपरहिटच असले पाहिजे हा अंदाज जाणकारांना येई. "क्या करते थे साजना तुम हमसे दूर रहके" किंवा "हवा हवा ऐ हवा"  ही गाणी आम्ही प्रथम रसवंतीमधेच आपल्या कर्णरंध्रांमध्ये साठवून घेतली होती.


मार्च महिन्यात जरी अशी रसवंती स्थापन झाली तरी त्यांची खरी गिर्‍हाईकी सुरू होई ती मुलांच्या परिक्षा संपल्यानंतर. साधारण एप्रिल मध्यात. परिक्षा सुरू असेपर्यंत रसवंतीत जाऊन तिथला बर्फ घातलेला थंडगार रस प्यायला बहुतेक पालकांचा कडाडून विरोध असे. एप्रिल मध्यात परिक्षा संपून शाळांना सुट्या लागल्यात की मग मुलांना थोडे स्वातंत्र्य मिळत असे. एका वर्षाची परिक्षा संपल्यानंतर लगेच पुढचा उन्हाळाभर पुढल्या वर्गाचे क्लासेस सुरू करून विदर्भातल्या भर एप्रिलच्या उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना शाळा करावी लागण्याचा सीबीएसई नामक दळभद्रीपणा तेव्हा इथे रूजलेलाच नव्हता ही किती आनंदाची गोष्ट !


मग अशाच एखाद्या संध्याकाळी बाळगोपाळ मंडळी आपापल्या मित्रांसह किंवा वयाने थोड्या मोठ्या असलेल्या भावा (आणि/ किंवा)  बहिणींसह रसवंतीत दाखल होत असत. एखाद्या संध्याकाळी त्यांचे पालकसुध्दा तिथे त्यांच्यासोबत येत असत . दुपारी खेळल्या गेलेल्या पत्त्यांच्या डावात सत्तीलावणी किंवा नाठ्याठोम खेळात हरलेल्या भिडूवर सगळ्यांच्या रसाचा खर्च करण्याची जबाबदारी असे. बाळगोपाळांच्या मनात दुपारचा खेळ आपण जिंकून काहीतरी मोठ्ठी कामगिरी केलीय असा भाव असे. त्या विजयाचे सेलिब्रेशन असे रसवंतीवर होत असे.


मांडवात असलेली, संध्याकाळी त्याच रसवंतीवर असलेल्या एखाद्या कामगाराने जमिनीवर सुरेख सडा शिंपडून मस्त गारवा आणलेली आणि ओल्या मातीचा धुंद करणारा सुगंध येणारी रसवंती. आत साध्या ट्युबलाईटसचाच पण देखणा प्रकाश देणारी प्रकाशयोजना असे. बहुतांशी ट्यूबलाईटसना हिरवे, निळे, तांबडे पारदर्शक कागद लावून त्या त्या रंगाचा प्रकाश निर्माण केला जात असे. हे अगदी विलोभनीय दृश्यमिश्रण असे.


मग दादा / ताई कुणीतरी जाऊन रसाची आॅर्डर देऊन येत. गप्पा, गंमती करीत चेष्टामस्करी सुरू असतानाच काचेच्या ग्लासांध्ये बर्फ घातलेला थंडगार रस घेऊन तिथला एखादा कर्मचारी  येत असे. रस पिताना गप्पा बंद पडत असत पण मग कानांचे काम सुरू असे. त्या त्या वर्षातली trending गाणी कानांवर पडत असत, त्यात रूची निर्माण होत असे. घरोघरी टेप किंवा म्युझिक सिस्टीमचा अभाव असण्याचे ते दिवस होते.


रस पिऊन संपल्यावर ग्लासात खाली उरलेला गाळ कम फेस पिण्याचा प्रयत्न बाळगोपाळांकडून होत असे. मोठ्यांना त्याबद्दल क्वचित रागवावे सुध्दा लागे.


अशा प्रकारे थोड्या तृप्त बर्‍याचशा अतृप्त मनाने बाळगोपाळ मंडळी घरी परतत असत. "आपण मोठे होऊन कमवायला लागलो ना की एकदम तीन तीन ग्लास उसाचा रस एकट्यासाठीच आॅर्डर करूयात आणि मनसोक्त पिऊयात ही मनिषा अनेकांच्या मनात असे.


या रसवंत्या आता कुठेच दिसत नाही. त्या नाहीशा होताना त्यांच्याबरोबर किती मोठी संस्कृती, किती भावभावनांची वादळे लयाला गेली याची जाणीव आज फार कमी लोकांच्या मनात उरलेली आहे.


कोल्हापूर, सांगली सारख्या ऊससमृध्द भागांमध्ये ह्या रसवंत्यांची एक वेगळीच तर्‍हा मला बघायला मिळाली होती. तिथे रस असा ग्लासावर नाही तर तांब्यावर किंवा पाण्याच्या जगावर (डोलची) मिळत असे. बर्फ वेगळ्या ताटलीत आणून ठेवला जाई. ज्याला लिंबू पिळून रस प्यायचाय त्याच्यासाठी लिंबाच्या फोडी आणि मीठ वेगळे दिले जाई. विना बर्फ टाकलेला तांब्याभर रस रिचवायचा म्हणजे भल्याभल्यांच्या कोठ्याची परिक्षा असे.


आजकाल मात्र रसवंत्या ह्या केवळ एस टी स्टॅण्डसच्याच आश्रयाला उरल्यात. तिथे वेळेला पांस्थतांची क्षुधा शमत असेलही बापडी पण एखाद्या उन्हाळ्याच्या संध्याकाळी रसवंतीत जाऊन तिथला  रस पिण्याची, थोडी हुरहुर लावणारी, थोडी सुखावणारी आमच्या बालपणची संस्कृती मात्र नक्की हरवलीय.


- अजूनही कुठल्या गावात अशी उपरोल्लिखीत रसवंती संस्कृती असेल तर नक्की काॅमेंटसमध्ये कळवा. मी स्वखर्चाने तिथे येऊन माझे बालपण पुन्हा जगेन ही आस बाळगणारा, बालक वैभवीराम प्रकाश किन्हीकर

Friday, April 17, 2026

पुल ते जे के रोलिंग: आमच्या वाचनाचा एक प्रवास

आमचे घराणे नकलाकारांचे, नाट्य कलावंतांचे, कीर्तनकारांचे. त्यामुळे अगदी बालपणापासूनच नकला, नाट्य, कीर्तन यात मनसोक्त मुशाफ़िरी करायला मिळाली. चित्रपट वेड हे तर किन्हीकर घराण्यातल्या वय वर्षे १५ ते २५ वर्षे वयोगटातल्या सर्व तरूणांचे अगदी व्यवच्छेदक लक्षण (खूप दिवसांनी हा शब्द वापरायला मिळाला.) आहे. आमचे वडील, काका, आत्या इत्यादींच्या चित्रपट वेडावर एक स्वतंत्र लेख लिहावा लागेल इतके या सगळ्यांचे चित्रपट वेड गहिरे होते.


माझे वडील हे अत्यंत विचक्षण वाचक होते. बालपणापासूनच त्यांनी आम्हाला अत्यंत चांगल्या वाचनाची गोडी लावली. चांगले साहित्य म्हणजे काय आणि टुकार साहित्य म्हणजे काय ? याची त्यांनी अगदी बालपणापासूनच आम्हाला ओळख करून दिली. बरे माझे वडील शाळेत नोकरी करत असल्याने आमच्या शाळेच्या वाचनालयात आम्हाला मुक्त प्रवेश असायचा आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही अक्षरशः पोत्याने पुस्तके वाचून काढायचोत. इयत्ता ४ थी पर्यंत माझे समग्र पुल, समग्र वपु आणि समग्र द.मा. मिरासदार वाचून झालेले होते. नंतर सुहास शिरवळकर वगैरेंचा नंबर लागला. अर्थात पुल, वपु यांची तीच पुस्तके, त्याच कथा मी नंतर अनेकवेळा वाचल्यात. बालपणी न लागलेले संदर्भ नंतरच्या प्रत्येक वाचनात एक एक करून लागत गेलेत. दरवेळी वाचनात नवा आनंद मिळत गेला. आजही एका तासात मराठीतल्या एखाद्या पुस्तकाची १०० पाने वाचण्याइतका आमचा मराठी वाचनवेग दांडगा आहे. बाकी शाळेतल्या एखाद्या व्रात्य मुलासारखा वाचनाचा वेग "दांडगा" का असतो? हे मला तरी न उलगडलेले कोडे आहे.


पण आमचे इंग्रजी वाचन मात्र फ़ार मर्यादित होते. इंग्रजी फ़र्डे बोलायला किंवा अचूक लिहायला जरी काही अडचण नसली तरी इंग्रजी वाचन मात्र फ़ारसे झाले नाही. गेल्या १०-१२ वर्षांमध्ये इंग्रजी साहित्यातल्या काही अभिजात कलाकृती वाचण्याचा योग आला पण मराठीच्या मानाने आमचे इंग्रजी वाचन तसे अगदी नगण्यच.


चांगल्या इंग्रजी कलाकृतींवरचे हॉलीवुडचे सिनेमे हा तर एक आणखी अगम्य प्रकार आहे. सगळेच हिरो आणि व्हिलन सारखेच दिसत असल्याने आणि ते तोंडातल्या तोंडात इंग्रजीसदृश भाषेत काहीतरी बोलत असल्याने आम्हा तर्खडकरी इंग्रजीवर विसंबून राहणा-यांना हॉलीवुडचे सिनेमे कळायलाच कठीण. गॉडफ़ादर सारखा सार्वकालिक श्रेष्ठ सिनेमा आम्ही गॉडफ़ादर कादंबरी वाचून पूर्ण झाल्यावरच बघितला तेव्हा आम्हाला कळला. आणि त्याचसोबत एकट्या गॉडफ़ादर सिनेमाने आणि त्याचा लेखक मारियो पुझो ने किती बॉलीवुडवाल्यांना आजवर जगवले आहे हे सुद्धा कळले. बरेचसे चांगले हिंदी सिनेमेसुद्धा गॉडफ़ादर मधल्या एका किंवा अनेक दृश्यमालिकांची फ़्रेम टू फ़्रेम कॉपी करूनच मोठे झाल्याचे कळले.


पण गेल्या दोन तीन वर्षात आमचे कन्यारत्न वाचनाकडे वळलेले आहे हे जाणवले. तिचे वाचन मुख्यतः इंग्रजी भाषेतले. आजकालच्या युवकांप्रमाणे तिनेही जे. के. रोलिंगने लिहीलेली हॅरी पॉटर सिरीजमधली सगळी पुस्तके वाचून काढलेली आहेत. इतकेच नव्हे तर तिच्या वैयक्तिक संग्रहात हॅरी पॉटर वर बनलेल्या सिनेमांचे सगळे भागही आहेत. खूप दिवसांपासून ती आग्रह करतेय की बाबा तू हॅरी पॉटर कलेक्शन वाच. पण कधी वेळ अपुरा तर कधी इंग्रजी वाचनाचा अंगभूत कंटाळा यामुळे ते वाचन मागेच पडत गेले.


गेल्या आठवड्यात मात्र ती अगदी खनपटीलाच बसली. बाबा, वाचन नाही झाले तरी तू हॅरी पॉटरवरचे सिनेमे नक्की बघू शकतोस. ते तरी बघ. मग तिचे मन राखायचे म्हणून रोज फ़क्त अर्धा ते पाऊण तास वेगळा काढून मी हॅरी पॉटरवरचे सिनेमे बघायला लागलो. आणि काय आश्चर्य ! पहिल्याच सिनेमापासून त्या लिखाणाने, त्या दृश्य मिश्रणाने आणि त्यातल्या पात्रांनी माझ्या मनावर अक्षरशः गारूड केले. आजवर हॅरी पॉटर हे इंग्रजाळलेल्या आधुनिक तरूण पिढीचे एक काहीतरी फ़ॅड आहे असे मी समजत होतो पण त्यांना हे लिखाण इतके का आवडलेय? आणि त्यांनी ते इतके का डोक्यावर घेतलेय? याची प्रतिती आली. त्यातल्या ब-याचशा पात्रांचा मी फ़ॅन झालो. त्या परिकथेच्या जगात मी रमलो.


Expecto Patronum 🪄

मी असा हॅरी पॉटर मध्ये रमल्याचे बघितल्यानंतर लेकीच्या चेहे-यावर आपण आपल्या बाबाला योग्य ते "मार्गदर्शन" केल्याचे समाधान बघायला मिळाले. ते समाधान मला जास्त महत्वाचे वाटले.


काल अचानक कृत्रिम बुद्धीमत्ता साधनांचा उपयोग करून आपल्या स्वतःच्या फ़ोटोंना हॅरी पॉटर सिरीजमधल्या पात्रांमध्ये बदल करण्याचा "प्रॉम्प्ट" तिला गवसला. मग पहिला प्रयोग बाबावरच. बाबाला हॅरी पॉटर आणि त्याचा तो साधाभोळा मित्र रॉन विझली या रूपात तिने बदलून दाखवले. बाय द वे मला सुद्धा हॅरी पॉटर इतकाच तो रॉन विझली आणि त्याची मैत्रिण हरमॉयनी ग्रेंजर आवडते हे इथे कबूल केलेच पाहिजे. थोडक्यात रॉन विझली चे रूपांतरण राम विझली मध्ये करण्यात ती यशस्वी झाली.

Ron Weasley❎ 

Ram Weasley ✅


- लहान मुलांसारखाच अजूनही परिकथांमध्ये रमलेला, चांगले लिखाण, चांगला चित्रपट आवडणारा एक साधा मनुष्य, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


देवाचा देव बाई ठकडा...

आपण सगळ्यांनी श्रीकृष्णांच्या बाललीलांचे खूप रसभरीत वर्णन वाचलेले आहे. भगवान श्रीकृष्णांच्या गोकुळातल्या बाललीलांचे स्मरण जरी गृहस्थ स्त्री - पुरूषांनी सकाळी सकाळी केले तरी सुद्धा त्यांच्या घरात गोकुळासारखे सुख नांदते असे अनेक भागवतकार सांगतात. आणि गोकुळीचे सुख म्हणजे तरी काय ? "गोकुळीच्या सुखा, अंतपार नाही लेखा" असे. ज्या सुखाचा अंत नाही, पार नाही आणि ज्याचा कुठेही हिशेब ठेवता येत नाही असे. पण आज इथे प्रभू श्रीरामांच्या आपल्या भावंडांसोबतच्या बाललीलांचे हे चित्र बघितले आणि आपला देव हा आपल्यासारखाच आहे, आपल्याच गुणधर्माचा आहे या भावनेने मन (आणि डोळेही) भरून आलेत. कितीही अलौकिक असले तरी भगवंताला, जगन्नियंत्याला आपल्या भक्तांसाठी मानवी देह धारण करावा लागतो, भक्तांना आपलेपणा, त्याच्या आणि आपल्यामध्ये अभेद नसल्याची ग्वाही म्हणून देहधारण करून मनुष्यप्राण्याप्रमाणे लीला कराव्या लागतात.


या चित्राकडे बघितल्यानंतर श्रीराम आणि भावंडांच्या जन्मानंतरच्या उन्हाळ्यातले हे चित्र वाटते. सगळ्यांची वये साधारण एक वर्षाच्या आसपास असावीत. राजवाड्यातल्या सगळ्यांचा डोळा चुकवून मुदपाकघरातल्या आमरसाच्या पातेल्यावर सर्वांनी एकजात आक्रमण केलेले दिसतेय. सगळ्यांच्या ओठांमधून आमरस ओघळलेला दिसतोय. शेषावतार लक्ष्मणाच्या मनात आणखी काहीतरी खोडी काढण्याचे आहे हे त्याच्या मिस्कील चेह-यावर "आमरस तर खाल्ला, आता रामदादा चला खीर खाऊयात." असे खोडकर भाव आहेत. भरत तर आमरसाची दिव्य चव डोळे मिटून अनुभवतोय. त्याची ब्रम्हानंदी टाळी लावणारा तो आमरस काय दिव्य चवीचा असेल याचा आपण फ़क्त अंदाज घेऊ शकतोय. शत्रुघ्न मात्र पोटभर आमरसावर मनसोक्त ताव मारल्याने झोप अनावर होऊन तिथेच पेंगुळलाय. प्रभू श्रीराम मात्र या सगळ्या गदारोळात आपल्याकडे कोण बघत आहेत याकडे लक्ष ठेऊन आहेत. बरोबर आहे हो. जगाचे पालनकर्ते ते. त्यांना या जगाकडे सतत आणि सदैव लक्ष ठेवावेच लागणार. गोकुळासारखेच हे अयोध्येचे वैभव. त्याच मजा, त्याच खोड्या. या अवतारात अयोध्येत पुढल्या अवतारात गोकुळात. सगळे काही भक्तांसाठी. - आपल्या देवाला आपल्यासारखेच बघितले म्हणजे त्याच्याशी एक वेगळेच नाते जोडल्या जाते आणि त्याच्याशी सामिप्य वाढते, सख्यभक्तीकडे आणखी एक पाऊल पडते या भावनेचा प्रभूंचा नामधारी, वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Thursday, April 16, 2026

पटतंय का बघा.

साधारण २५ - ३० वर्षांपूर्वी, जेव्हा आजच्याइतक्या कार्स घरोघरी झालेल्या नव्हत्या किंवा खाजगी गाड्या भाड्याने घेऊन देवदर्शनाला - पर्यटनाला जाण्याची आजच्याइतकी टूम नव्हती, आम्ही माहूरला आमच्या कुलदेवीच्या दर्शनाला नागपूरवरून बसनेच जायचोत. तेव्हा नागपूरवरून माहूरसाठी थेट जायला पहाटे ३:४५ ची नागपूर - उमरखेड ही टपाल गाडी, लगेचच पहाटे ५:३० ची नागपूर - उमरखेड ही जलद गाडी, सकाळी १०:४५ ची रामटेक - माहूर ही जलद गाडी, दुपारी १:४५ वाजताची तुमसर - माहूर ही जलद बस आणि दुपारी ४:०० वाजताची नागपूर - किनवट ही जलद बस अशा मोजक्याच गाड्या होत्या.


एक संपूर्ण दिवसभर जाण्याचा प्रवास. त्यादिवशी आमच्या माहूरच्या आत्याकडे मुक्काम. दुस-या दिवशी सकाळी माहूर बस स्थानकावरून ८:०० वाजता सुटणा-या माहूर - रेणुकादेवी - दत्तशिखर - माहूर या एस. टी. ने गडावर जाऊन जगदंबेचे दर्शन आणि दत्त शिखर, अनसुया शिखर दर्शने आटोपून दुपारी याच बसने माहूर गाव गाठणे असा आमचा आणि इथे येणा-या अनेक यात्रेकरूंचा क्रम असायचा.



आता नितीन गडकरी साहेबांच्या खास लक्ष देण्यामुळे नागपूर ते माहूर हा रस्ता अत्यंत छान झालाय. पोटातले पाणीही न हलता फ़क्त ३ ते ३:१५ तासात माहूर गाठता येते. गडावर जाण्याचा रस्ता सुद्धा आता मस्त झालाय त्यामुळे आता बहुतांशी भाविक मंडळी आपापल्या खाजगी वाहनांनी इथे येतात. एस. टी. बसेसवरची अवलंबिता कमी झालेली आहे. पण त्यामुळे गडावर गाड्यांची गर्दी फ़ार होते. इतक्या गाड्या पार्किंग करायला इथे जागाच नाही. मग गाड्या दत्तशिखर मार्गावर दूर कुठेतरी लावून भाविक आपली तात्पुरती सोय करतात. इथे पार्किंगवरून झालेली भांडणे ताजीच आहेत. इथे जे विक्रेते आहेत त्यांचा आणि गाड्या घेऊन येणा-या भाविकांचा वाद हा नित्याचाच झालेला आहे.


गेल्या दोन वर्षांपासून जगदंबेचे सोप्या रितीने दर्शन घेण्यासाठी लिफ़्ट, रॅम्पचे काम गडावर सुरू झालेले आहे. त्यामुळे आधीच अरूंद असलेल्या जागेत पार्किंगसाठी आणखीनच कमी जागा उरलेली आहे. या कामांसाठी होणारी वृक्षतोड आणि दररोज वाढत्या संख्येने येणा-या वाहनांचे प्रदूषण यामुळे गडावर हळूहळू प्रदूषणाचा प्रश्न बिकट होत जाणार आहे.


हे सगळे टाळण्यासाठी, किमान कमी करण्यासाठी आपल्या एस. टी. ने पुढाकार घेणे आवश्यक आहे. आपल्या एस. टी. कडे ९ मीटर लांबीच्या आणि साधारण ३० प्रवाशांची एकावेळी वाहतूक करू शकणा-या वातानुकूल मिडी इलेक्ट्रिक बसेस आलेल्या आहेत त्यातल्या फ़क्त ६ बसेस माहूर डेपोला देऊन माहूर - रेणुकाशिखर - दत्त शिखर - अनसुया शिखर - माहूर  या मार्गावर जर दर दहा मिनीटांनी पाठवल्यात तर गडावर जाणारी ७५ % खाजगी वाहने कमी होतील. पार्किंगचा आणि प्रदूषणाचा प्रश्न सुटेल. माहूर बस स्थानकावरून सुटल्यावर रस्त्यात माहूर गावातले एक दोन थांबे घेऊन बस थेट गडावर जाऊ शकेल. 



आंध्र प्रदेश मार्ग परिवहन महामंडळ आपल्या गाड्यांनी तिरूपती ते तिरूमला या प्रवासासाठी भाविकांना एका दिवसाचा पास देत असते. त्या पासात आपण त्या दिवसभरात कितीही वेळा आणि कुठूनही तिरुपती ते तिरूमला प्रवास आंध्र प्रदेश मार्ग परिवहनच्या बसेसने करू शकतो. ती युक्ती जर इथे अवलंबिली तर भाविकांचा वारंवार तिकीट काढण्याचा त्रास वाचेल. एकदा दिवसभराचा पास घेतला की एका बसने रेणुका गड गाठणे, तिथे आपल्या पूजा अर्चनेसाठी जितका वेळ घ्यायचा तितका देऊन पुन्हा पुढच्या प्रवासाला दुस-याच बसने दत्त शिखर गाठणे. तिथली दर्शने निवांत आटोपून लगेच येणा-या पुढल्या बसने अनसुया शिखरला जाणे. तिथे वर चढून दर्शन वगैरे घेतल्यानंतर पुन्हा पुढल्या बसने माहूर गाव गाठणे हे भाविकांसाठी सुकर आणि सुखद होईल यात शंका नाही. दर दहा मिनीटांनी बसेस या मार्गावर चालणार असतील आणि दरवेळी तिकीट काढण्याचा व्याप नसेल तर या बसेस भाविकांसाठी स्वतःच्या वातानुकूल कार्स सारख्याच असतील. फ़क्त पार्किंग शोधण्याचे कष्ट नाहीत, पार्किंगसाठी अव्वाच्या सव्वा भावाने ओटी किंवा तत्सम सामान विकत घेण्याचे बंधन नाही. 


एका बसच्या या एकूण प्रवासाला साधारण ५० मिनीटे लागतील असा हिशेब धरला तरी एका तासात फ़क्त ५ बसेस वापरून ही सेवा सुरू ठेवता येईल. एखादी बस रिझर्व म्हणून ठेवावी लागेल. एखाद्या फ़ेरीला गर्दी जास्त असली तर ही बस जादा म्हणून सोडता येईल. दुपारच्या वेळी, संध्याकाळच्या वेळी जर पुरेशी वाहतूक नसेल तर या बसेस दर अर्ध्या तासाने सुद्धा सोडता येतील. तसे या बसेसचे चार्जिंगचे वेळापत्रक ठरवता येईल.


परिस्थितीवर मात करण्यासाठी कल्पना आहेत, संसाधने आहेत फ़क्त हे लक्षात घेऊन तशी उपाययोजना करू इच्छिणारे योजकस्तत्र दुर्लभः


- पिढ्यानुपिढ्या ज्यांच्या कुळावर आई जगदंबेचा वरदहस्त आहे अशा एका कुळात जन्म घेतलेला एक भगवतीचा साधक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर

माहूरवर लिहीलेले यापूर्वीचे ब्लॉग्ज

माहूर - दत्त शिखर - माहूर आणि बसफ़ॅनिंग.

दत्तशिखर माहूर बसफ़ॅनिंग (२०१८ आणि २०२०): नवे पर्व, एम. एस. सर्व

Rusted, Dusted but still Trusted.

Tuesday, April 14, 2026

नॅरोगेजचा डबा, पुल, भ्रमण मंडळ आणि मी

 २ जुलै २००९.


स्थळः म्हैसूर इथले रेल्वे संग्रहालय.


हा नॅरो गेजचा तृतीय वर्गाचा पुरातन डबा.


बसायला बाकडी.





खिडक्यांना समांतर असलेली बैठक व्यवस्था.





हे पाहून पुलंच्या 'भ्रमणमंडळा'तले संवादच आठवलेत.


"नाही,  एखादे वेळी फर्स्ट क्लास असायचा." भ्रमणमंडळातले सावध सज्जन कोचरेकर मास्तर.


"ए साल्या कोचर्‍या. तुझ्या बापानं तरी कधी फर्स्टमधे असली बाकडी बघितलीत का ? साला इडियट"  त्रिलोकेकर डाफरलेत.


यत्र तत्र सर्वत्र पुल मनात व्यापून आहेत.


- पुलकित प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Monday, March 23, 2026

पाहता पाहता स्वतःतले झालेले बदल. Change and Transition.

फ़ार फ़ार पूर्वी वर्तमानपत्रांमध्ये, मासिकांमध्ये "हे चित्र पहा आणि ते चित्र पहा" अशा आकाराची सदरे असायचीत. आज अचानक हे आठवायचे कारण म्हणजे आपल्याही आयुष्यात अशी आपलीच चित्रे, आपल्याच काहीकाही सवयी पाहता पाहता बदलत जातात पण पाहता पाहता दिसत मात्र नाहीत. त्या सवयी का आणि कशा बदलल्यात ? याचा शोध घेणे आपले आपल्यालाच अवघड जाते.


काल हातरूमालांना इस्त्री करत बसलो होतो. शनिवार - रविवार अशी लागून सुट्टी आली की त्या पंधरवाड्यात धुतल्या गेलेल्या हातरूमालांना घरच्या घरी इस्त्री करून ते पुढल्या पंधरा दिवसांसाठी नीट रचून ठेवायचे हा माझा गेल्या अनेक वर्षांचा शिरस्ता. ते इस्त्री करतानाच त्यावर थोडे यु डी कोलन शिंपडायचे म्हणजे पुढल्या पंधरा वीस दिवसभरात तो हातरूमाल वापरताना त्या मंद सुगंधाने मन उल्हसित आणि प्रसन्न राहते हा माझा अनुभव. घरच्या घरी अशी इस्त्री केल्यामुळे ते हातरूमाल इस्त्री करताना मनाला काहीतरी विधायक आणि प्रसन्न करणारे कार्य केल्याची सुखद भावना जाणवत राहते ती निराळीच.


काल लक्षात आले की माझ्याजवळ सध्या असलेले सगळे हातरूमाल एकजात पांढ-या रंगाचेच आहेत. त्यावर इतर रंगांची हलकी बॉर्डर वगैरे आहे पण रंग पांढराच. एकेकाळी माझ्याकडे निळे, तांबडे, हिरवे हातरूमाल असायचे. फ़ार फ़ार पूर्वी. मी शिकत असताना. आणि ते घेताना पण ते अगदी कॉटनचेच असावेत हा माझा अट्टाहास नसायचा. अगदी टेरीकॉट, टेरेलीनचे रूमाल पण मी वापरले असल्याचे मला स्मरले. त्या काळापासून ते आज फ़क्त कॉटनचेच आणि त्यातही तलम खादीचे आणि फ़क्त पांढ-या रंगांचेच हातरूमाल वापरण्यातला बदल माझ्यात कधी घडला ? हे माझे मलाच उमगेना.



आणखी एक बदल माझ्यात घडल्याचे मला जाणवले. पूर्वी बाहेरून घरी आलो की दिवसभर घातलेली ट्राऊझर मी त्यातल्या हातरूमालासकट खुंटीला टांगून ठेवत असे. दोन तीन दिवसांनी मग दोन तीन ट्राऊझर्स धुण्यासाठी बादलीत सर्फ़चे पाणी करून त्यात बुडवल्या जात असत. खिशातले रूमाल तसेच असत. मग ती ट्राऊझर धुताना त्यातला रूमाल बाजूला काढल्या जात असे आणि तो धुतल्या जात असे. आजकाल गेल्या पंचवीस वर्षात मात्र रोज बाहेरून आलो की पहिल्यांदा ट्राऊझरमधला हातरूमाल बाहेर काढून तो धुण्याच्या कपड्यांच्या बास्केटमध्ये टाकला जातोय. हा बदल माझ्यात कधी आणि केव्हापासून झाला ? हे सुद्धा मला आता आठवेनासे झाले आहे. 


माझे लग्न झाले तेव्हा माझ्या लक्षात आले आणि पाहून अगदी आनंद झाला होता की माझी सौभाग्यवती ही माझ्याइतकीच किंवा माझ्याहून थोडी सरसच नीटनेटकेपणा आणि टापटिपीची होती. वस्तूंचे बोळे करून इकडे तिकडे टाकून देणे, कुठल्या एका वस्तूला किंवा एखाद्या प्रक्रियेला निश्चित अशी SOP नसणे हे तिच्याबाबतीत शक्यच नव्हते. मलासुद्धा तशीच जीवनसाथी हवी होती. मग माझ्या आयुष्यात रूमालांच्या बाबतीतले हे बदल तिने घडवून आणलेत का ?


तशी शक्यता आहे. पण तिच्या मुळातच ऋजू स्वभावाला कुणावर असा अधिकार गाजवणे, हुकूमशाही करणे, दंडेलीने वागणे मान्यच नव्हते. आमच्या मुलीला पण तिने ज्या सवयी लावल्यात त्या अत्यंत गोड बोलून, समजावणीने. आणि एकदम माझ्या लक्षात आले की तिने असेच हळूवारपणे माझ्या व्यक्तीमत्वातही असे अनेक बदल हळूहळू घडवून आणले असतील. त्या हळूवारपणामुळे ते नक्की कधी झालेत हे आठवत नाहीत. पण आता हाडीमासी रूजलेत. 


"Transition is a gradual Change and Change is a sudden Transition" असे म्हणतात त्याचा असा प्रत्यय आला. चिरकाल टिकणारे बदल असे हळूवारपणे, मनापासून व्हावे लागतात.


- आपल्या जीवनसंगिनीबाबत कायम कृतज्ञ असलेला आणि पुढल्या अनेक जन्मांमध्ये (असलेच तर) हीच जीवनसंगिनी मला मिळावी अशी आर्त प्रार्थना परमेश्वराकडे करणारा एक नीट आणि व्यवस्थित (आजच्या जेन झी च्या भाषेत "Sorted") गृहस्थ, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


Tuesday, March 3, 2026

हेड ऑफ़िसची बस

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे मुख्यालय मुंबई सेंट्रल इथे आहे.


मुंबई सेंट्रल डेपोच्या गाडीला आमच्या बसफ़ॅन्समध्ये "हेड ऑफ़िसची गाडी" असे संबोधले जाते.





गणपतीपुळे निम आराम मुंबई


मार्गे रत्नागिरी - चिपळूण - महाड - माणगाव - पेण - पनवेल 


अशोक लेलॅण्ड चित्ता मॉडेल


MH 20 / D 9427


मुं. मुंबई आगार


BS II उत्सर्जन मानकांनुसार बांधलेली निम आराम बस. 


2 बाय 2 आसनव्यवस्था. एकूण 45 आसने.

 

मध्यवर्ती कार्यशाळा चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर येथे बांधलेली बस. MH 20 / D सिरीज ही संपूर्ण महाराष्ट्रात अगदी आगळीवेगळी आहे कारण MH 20 / D 0001 पासून MH 20 / D 9999 पर्यंत सगळ्या गाड्या एस. टी. च्याच मालकीच्या आहेत. ही सिरीज छत्रपती संभाजीनगर च्या आर. टी. ओ. ने इतर कुठल्याही वाहनांना दिली नव्हती.


या D गॅंगच्या गाड्यांच्या दरा-यावर मी यापूर्वी इथे एक लेख लिहीलेला होता.





मुंबई विभागाच्या एस. टी. बसेसवर मराठीतल्या अतिशय सुंदर फ़ॉन्टने मुं. मुंबई किंवा विभागातल्या इतर डेपोंची नावे लिहीली जायचीत. I am simply in love with that font.


गणपतीपुळे बस पार्किंग

20/02/2009



- एस. टी. नामक प्रेयसीच्या प्रेमातच असल्याने तिची कुठलीही अदा सुंदरच वाटणारा एक आशिक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


Sunday, March 1, 2026

चला देवदर्शनाला, पर्यटनाला

पणजी गोवा पूर्णपणे पर्यटनस्थळ आहे. गणपतीपुळे सुद्धा काही मंडळींसाठी पर्यटन स्थळ असेल पण माझ्यासाठी हे एक धार्मिक स्थळ आहे. इथला गणपती लोभसवाणा आहे. अगदी पहिल्या दर्शनात आपलेसे करणारा आहे.


आपली महाराष्ट्र एस. टी. प्रवाशांना देवदर्शनासाठी आणि पर्यटनासाठी नेण्यास कायम सज्ज असते.



पणजी निम आराम गणपतीपुळे

मार्गे म्हापसा - पत्रादेवी - सावंतवाडी - कणकवली - राजापूर

MH - 12 / EF 6344

TATA 1510 Cummins, BS II bus

मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी यांनी बांधलेली निम आराम बस.

सिं. सावंतवाडी आगार.

काहीही म्हणा. या निम आराम गाड्यांची शान काही वेगळीच होती.

सावंतवाडी आगार हे मुख्यतः अशोक लेलॅण्ड गाड्यांचे म्हणून ओळखले जाते. त्यात त्यांच्या ताफ़्यात ही टाटाची सुंदरी फ़ार दुर्मिळ होती. म्हणूनच हे प्रकाशचित्र एक विशेष महत्व राखून आहे. 

गणपतीपुळे बस पार्किंग

20/02/2009


Monday, January 26, 2026

मराठी छापील मिडीया जात्यात मराठी इलेक्ट्रॉनिक मिडीया सुपात

माझ्या मागील एका लेखात मी माझ्या वृत्तपत्रीय जीवनाबद्दल लिहीलेले होते. मी दहाव्या, बाराव्या वर्गात असल्यापासूनच हे वृत्तपत्रीय लेखन करतो आहे. त्याबद्दलचा लेख इथे. हा लेख लिहूनसुद्धा आज तब्बल १० वर्षे झालीत. पण मधल्या काळाचे अवलोकन सूक्ष्म दृष्टीने केल्यास मलाच हा प्रश्न पडला की आजच्या युगात वृत्तपत्रे किंवा एकंदरच छापील मिडीया हा कालबाह्य झालाय का ? आणि याला जबाबदार घटक कोण कोण आहेत ?


आमचे घर वाचनवेडे. आमच्या वडिलांकडून आम्ही हा उदंड वाचनाचा वारसा घेतला. सकाळी सकाळी पहिल्या चहासोबत त्यांना वर्तमानपत्र वाचायला हवे असायचे. मग जो वृत्तपत्रविक्रेता सकाळी ६ ते ६.१५ च्या आसपास घरी वर्तमानपत्र आणून देईल त्याची निवड व्हायची. एखाद्या दिवशी त्याने थोडा जरी उशीर केला तरी त्याला आमच्या दादांची बोलणी ऐकून घ्यावी लागायची. माझे वडील वर्तमानपत्र संपूर्ण म्हणजे अगदी संपूर्ण वाचायचेत. आणि आम्हालाही त्यांनी तशा सवयी लावल्यात.


बरे घरी त्याकाळी रोजचा तरूण भारत तर यायचाच. सोबत दर रविवारी मुंबई रविवार सकाळ, लोकसत्ता, मटा वगैरे दैनिके सुद्धा यायचीत. अर्थात ही सगळी वृत्तपत्रे त्याकाळी फ़ार दर्जेदार लिखाण घेऊन यायचीत. अतिशय दर्जेदार साहित्यिक संपादकवर्ग या सर्व दैनिकांना लाभलेला होता. यामुळे आमचे वाचन समृद्ध होत गेले.


आम्ही यु पी एस सी चा अभ्यास करीत असताना नागपूरला बर्डीवर खुराणा बुक स्टॉलवरून दररोज संध्याकाळी जाऊन मुंबईवरून गीतांजली एक्सप्रेसने येणारा टाईम्स ऑफ़ इंडिया वाचनासाठी आणत असू. श्री खुराणाजी आम्हाला यु पी एस सी  सिव्हील सर्व्हिसेसचे अभ्यासक विद्यार्थी म्हणून ओळखत आणि आमच्यासाठी खास चेन्नईवरून द हिंदू हे वर्तमानपत्र मागवीत असत. जे एन यू छाप डाव्या विचारवंतांचा यु पी एस सी मध्ये इतका भरणा त्यावेळी होता की पटत नसून सुद्धा रोमिला थापर सारख्यांनी लिहीलेला अजिबात भारतीय नसलेला थापाडा इतिहास आम्हाला भारतीय इतिहास म्हणून अभ्यासावा लागे. द हिंदू या अतिशय हिंदूविरोधी वर्तमानपत्रातली विश्लेषणे टाचण करून ठेवावी लागत कारण यु पी एस सी पास व्हायचे असेल तर याच पद्धतीने व्हावे लागते हे आम्हाला माहिती होते. तिथे थोडेही आपले पांचजन्य चे ज्ञान पाजळले असते तर आम्हाला खड्यासारखे बाजूला केले गेले असते.


जी गत वर्तमानपत्रांची तीच मासिकांची. आमच्याकडे आमच्या बालपणापासून किशोर, अमृत, कुमार ही मासिके यायचीत. सोबतच लोकप्रभा सारखी साप्ताहिके सुद्धा यायचीत. चित्रलेखा आणि सकाळ साप्ताहिके सुद्धा आमच्याकडे दर शनिवारी आमचे दादा आणायचेत. या सर्व साप्ताहिकांचे, नियतकालिकांचे, वर्तमानपत्रांचे दिवाळी अंकही आमच्याकडे आवर्जून यायचेत. आम्हाला ह्या सर्व वाचनात एक विशिष्ट वाचनानंद मिळायचा. मन तृप्त व्हायचे, मेंदू तल्लख व्हायचा. त्याकाळी काही काही मासिके तर घरच्या कुठल्या तरी बजेटमध्ये काटछाट करून दादांना घरी आणावी लागायचीत. पण तरीही एक वाचनाचे समाधान होते.


पण एका विशिष्ट कालावधीनंतर हळूहळू ही वर्तमानपत्रे, नियतकालिके प्रचारकी थाटाची होत गेलीत. तोपर्यंत एलेक्ट्रॉनिक मिडीयाने सुद्धा आपला जम बसवला होता. बातम्या दिवसभर ताज्या आणि "सबसे तेज" कळू लागल्यात, बातम्यांसाठी वृत्तपत्रांची वाट बघणे संपले. तरीही वृत्तपत्रे आपला जम टिकवून होती कारण बातम्या जरी कळल्यात तरी त्यामागील संपादकीय दृष्टीकोन काय आहे ? हे वाचण्याची उत्सुकता असायची. नागपूर तरूण भारत ने आपला हा वाचकवर्ग आजही टिकून ठेवलाय त्याचे एकमात्र कारण हेच आहे. एखाद्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घटनेची फ़ोड कशी करायची याबाबत संपादकीय विद्वत्तेची लोकांना गरज असायची. पण २०१२ च्या आसपास फ़ेसबुक , व्हॉटस ॲप, यू ट्यूब वगैरे समाज माध्यमे वाढलीत आणि त्यावर ही विश्लेषणे अनेक दृष्टीकोनातून प्रसिद्ध होऊ लागलीत. त्यामुळे संपादकीय प्रचारकीपणा, पेड न्यूज वगैरे प्रकार जनतेच्या ध्यानात येऊ लागलेत आणि छापील माध्यमांची विश्वासार्हता धोक्यात येऊ लागली. संपादकीय मतांमागची पक्षीय लबाडी लोकांच्या ध्यानात चटकन येऊ लागली. आज सर्वच वर्तमानपत्रांचा खप कमालीचा खालावलाय. वर्षभर अगदी रद्दीच्या किंमतीत देऊन, सोबत विविध गृहपयोगी वस्तू देऊनही हा खप फ़ारसा वाढत का नाही ? याचे आत्मचिंतन जर या मराठी वृत्तपत्रांनी आणि एकंदरच छापील माध्यमांनी केले तर त्यांना आपली चूक लक्षात येईल पण आता वेळ निघून गेलेली आहे. खूप उशीर झालेला आहे.


२०१९ च्या निवडणुकांनंतच्या प्रचारकी थाटानंतर मराठी इलेक्ट्रॉनिक मिडीयाची लबाडी सुद्धा लोकांच्या लक्षात येऊ लागली. बातम्या आणि त्यांचे विश्लेषण लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या नावाखाली सर्व मराठी इलेक्ट्रॉनिक मेडीया त्यांचा आपला आपला एक नॅरेटिव्ह आपल्या मनात पसरवतोय हे लोकांना हळूहळू कळायला लागले. त्यासाठी हा मराठी इलेक्ट्रॉनिक मेडीया स्वतः मात्र भरभक्कम पैसे घेतोय हे ही लोकांना कळू लागलेय. बरोबर आहे हो. "ज्याची खावी पोळी, त्याची वाजवावी टाळी" हे त्यांना अगदी बालपणापासून माहिती आहे ना. पण या सगळ्या उपदव्यापात,आपण अव्यापारेषू व्यापार करून ज्या फ़ांदीवर बसलोय तीच तोडतोय हे त्यांच्या ध्यानात आलेच नाही.


काल मराठी छापील मिडीया सुपात होता आज जात्यात आहे पण आजचा मराठी इलेक्ट्रॉनिक मिडीया सुपात आहे हे त्यांच्या अजूनही लक्षात आलेले नाही. आपले निरपेक्षत्व जपले पाहिजे, आपण हा लोकशाहीचे पाचवे स्तंभ आहोत आपण लोकांच्या न्याय्य हक्कांचे रक्षण केले पाहिजे, नुसते ब्रेकिंग न्यूजच्या मागे लागून स्वतःचा नाश करून घेऊ नये हे कळायला या इलेक्ट्रॉनिक मिडीयाची सदसदविवेकबुद्धी तर जागृत हवी ना ? मराठी छापील मिडीया जात्यातून सुपात जायला आणि कालबाह्य व्हायला जवळपास तीस वर्षे लागलीत. मराठी इलेक्ट्रॉनिक मिडीया तर पुढल्या पाचच वर्षात असा जात्यातून सुपात जाईल आणि भरडला जाऊन निःशेष होईल अशी माझी खात्री आहे. 


- मराठी छापील मिडीया आणि इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा परखड विश्लेषक आणि एकेकाळी मास कम्युनिकेशनला प्रवेश घेऊन पत्रकारिता करण्याचे निश्चित केलेला एक होता होता राहिलेला पत्रकार, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


२४ जानेवारी २०२६


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६



Saturday, January 24, 2026

दक्षिण दिग्विजय : ५ सुचिंद्रम आणि मेणपुतळ्यांचे संग्रहालय

 यापूर्वीचे भाग इथे  वाचा

दक्षिण दिग्विजय : भाग १ नागपूर ते चेन्नई

दक्षिण दिग्विजय : २ (चेन्नई ते मदुराई)

दक्षिण दिग्विजय : ३ (मदुराई - रामेश्वरम - मदुराई - कन्याकुमारी.)

रेल्वेच्या एका दुर्मिळ वर्गातून प्रवास.

दक्षिण दिग्विजय : ४ कन्याकुमारी - सूर्योदय


२ / १२ / २००८

ठरविल्याप्रमाणे ते टॅक्सीवाले बंधू सकाळी ८ च्या सुमारास आमच्या हॉटेलसमोर आलेत. मस्त प्रशस्त ॲंबेसेडर टॅक्सीत बसून आमचे कन्याकुमारी दर्शन सुरू झाले. ते बंधू आम्हाला कन्याकुमारीपासून जवळपास १५ किलोमीटर असलेल्या सुचिंद्रम मंदिरात घेऊन गेलेत. दक्षिण भारतातल्या अनेक सुंदर मंदिरांसारखे एक सुंदर, स्वच्छ आणि नेटके मंदिर. मंदिरालगत मोठी पुष्करिणी होती. हनुमंताने लंका जाळून परत भारतभूमीकडे उड्डाण केल्यानंतर आपले जळालेले पुच्छ याच पुष्करिणीत विझवले अशी येथे मान्यता आहे. ज्या ठिकाणी आपण पर्यटनाला जातो तेथील मान्यता समजून घेण्यात, मान्य करण्यात शहाणपणा असतो असे मी कायम मानत आलेलो आहे. त्यामुळे हंपीत गेल्यावर हनुमंताचे जन्मगाव तिथल्याच एखाद्या पर्वतरांगांवर आहे आणि नाशिकजवळील अंजनेरी पर्वतावर पण हनुमंताचे जन्मस्थान आहे या दोन्हीही समजूती मला मान्य असतात. नक्की ठिकाण कुठले ? याच्या वादात पडून आपली प्रखर मते मांडण्यापेक्षा श्रीरामकथेने भारतवर्ष अगदी अयोध्येपासून रामटेक - नाशिक - किष्कींधा (हंपी) - सुचिंद्रम - श्रीलंका कसे बांधले गेलेले आहे, कसे भारले गेलेले आहे हे अनुभवण्यात मला धन्यता असते. या मंदिरात हनुमंताचा विशालकाय असा विग्रह आहे आणि तिथे त्याच्या पुच्छाला भाविकांकडून ज्वलनदाह शांत करण्यासाठी लोणी लावले जात असते. अर्थात तिथे प्रकाशचित्र काढण्यास मनाई असल्याने आम्ही मंदिराच्या आत प्रकाशचित्र काढू शकलो नाही पण तो विशालकाय विग्रह आणि भाविकांचे पाच हजार वर्षांपासूनचे आपल्या भगवंतावरचे प्रेम यापुढे आम्ही नतमस्तक मात्र नक्कीच झालोच.




सुचिंद्रम मंदिराबाहेर दक्षिणेतील इतर सर्व मंदिरांबाहेर असतात तशी हार फ़ुले गज-याची रेलचेल होती. स्वपत्नीसाठी गजरा घेणे झाले. लग्नाचा वाढदिवस होता. मग कन्यारत्नानेही गज-यासाठी हट्ट धरला. तिचाही हट्ट पुरवला गेला. भारतभर आणखी एक साम्य. सर्वत्रच छोट्या छोट्या मुली आपल्या केसांपेक्षा मोठा गजरा माळून त्याला आपल्या केसांपेक्षा चेहे-यावर मिरवण्यात धन्यता मानतात. अगदी बंगाल पासून गुजरात पर्यंत आणि काश्मिर पर्यंत अगदी एकच पॅटर्न. आमचे कन्यारत्न याला अपवाद नव्हते.



बरे ज्या सुचिंद्रम मंदिरात गेलो हे हनुमंताचे मंदिर नाहीच मुळी. ते आहे भगवान शंकराचे मंदिर. भगवान शंकर वर म्हणून प्राप्त व्हावेत हा हट्ट धरून भारताच्या दक्षिण टोकाला तप करीत बसलेली कन्याकुमारी. तिच्या प्रेमासाठी, तिच्यासह विवाहासाठी भगवान शंकर थेट कैलासावरून निघालेत आणि इतक्या जवळ येऊन कुठल्यातरी भक्ताच्या हाकेत, भाकेत गुंतल्यामुळे इथेच स्थायिक झालेत. कन्याकुमारीपर्यंत पोहोचलेच नाहीत. "So near yet so far" अशी अवस्था. ती आजही भारताच्या दक्षिण टोकाला त्यांच्याशी लग्न होईल याची वाट बघत कुमारी आहे. आणि हे सुचिंद्रम भक्तकामकल्पद्रुम बनून इथे आपल्या भक्तांच्या मनोकामना पुरवताहेत. किती रोमॅंटिक कल्पना ! "स्वप्नातल्या कळ्यांनो. उमलू नकाच केव्हा" ह्यातल्या रोमॅंटिसिझम ज्याला कळला त्यालाच हा सुचिंद्रम आणि कन्याकुमारीमधले फ़क्त १५ किलोमीटर अंतरावरचे अपु्रे अव्यक्त प्रेम यातला रोमॅंटिसिझम कळेल.



मनसोक्त दर्शन झाले. भारावलेल्या मनःस्थितीतच आम्ही बाहेर पडलोत. मध्ये एका "सर्वाणा भवन" मध्ये जेवण झाले. अर्थातच दक्षिणी पद्धतीचे, शुद्ध शाकाहारी. जिथे जावे तिथले तिथले स्थानिक पदार्थ खाऊन बघावेत. उगाच दक्षिण भारताच्या प्रवासाला जायचे आणि तिथे आपल्यासारखे पोळ्या आणि पिठले मिळाले नाही म्हणून परतल्यावर मित्र आणि नातेवाईकांमध्ये गळे काढायचे हे मला मान्य नाही. म्हणून "आम्ही काश्मीरला डाल लेकमध्ये पुरणपोळीचे जेवण आमच्या पर्यटकांना दिले" आणि "अहो, कन्याकुमारीला आमच्या पर्यटकांचा श्रीखंड पुरीचा बेत रंगला" अशा जाहिराती करणा-या पर्यटन संस्थेशी आमचे गोत्र जुळतच नाही. अरे लेको. श्रीखंड पुरी, पुरणपोळीच खायची असेल तर ती आपल्या घरीच खा ना. तिरूवनंतपुरमला जाऊन तिथले नारळाच्या तेलातले मलबारी पराठे आणि अमृतसरला जाऊन तिथले सुद्ध देसी घी मधले थबथबलेले अमृतसरी प्राठे खाल्लेच नाहीत तर तो तो प्रांत तुम्ही काय अनुभवला ! एखादा पदार्थ आपल्या सवयीचा नसेल पण तो तिथल्या तिथल्या हवा पाण्यासाठी उत्तम आणि उत्कृष्ट असतो. हे असे पदार्थ तिथल्या तिथल्या वातावरणात खाऊन बघितलेत तर प्रवास संपल्यानंतर पोट बिघडून आजारी पडण्याची वेळ येत नाही.


कन्याकुमारी देवीचे दर्शन आणि स्वामी विवेकानंद स्मारक शिळेवर नावेने जाऊन दर्शन हे आमच्या उद्याच्या कार्यक्रमात होते. आज ते बंधू आम्हाला तिथल्या मेणपुतळ्यांच्या संग्रहालयात घेऊन गेलेत. कन्याकुमारीत अरबी समुद्र किना-यावर पश्चिमेला असलेले हे ठिकाण (तेव्हा तरी) फ़ारसे प्रसिद्ध नव्हते. गर्दी अजिबात नव्हती. पुतळ्यांचा दर्जा आणि स्वरूपता अगदी वाखाणण्याजोगी होती. आम्ही तिथे भरपूर प्रकाशचित्रे घेतलीत. काही छान काही थोडी आगाऊसुद्धा. मजा मजा करायची हे धोरण होतेच.









सकाळी आम्ही आमच्या हॉटेलच्या खोलीतून बंगालच्या उपसागरावरून होणारा अविस्मरणीय सूर्योदय बघितला होता. संध्याकाळी तोच सूर्य अरबी समुद्रात बुडताना बघण्यासाठी आम्ही पश्चिम किना-यावर गेलोत. एकाच गावात एका समुद्रातून सूर्योदय आणि दुस-या समुद्रात सूर्यास्त बघायला मिळणे हे अगदी दुर्मिळ असते. ती दूर्मिळ पर्वणी आम्ही साधली.








आजचा दिवस अगदी अविस्मरणीय. ज्या आपल्या कुटुंबियांना आनंदी ठेवण्यासाठी मनुष्य आयुष्यभर झटत असतो, त्यांच्या चेहे-यावरचा आनंद बघणे ही एखाद्या गृहस्थासाठी सर्वोच्च समाधानाची परमावधी असते. तो आनंद, ते समाधान कुठेही विकत घेता येऊ शकत नाही आणि कितीही पैशांच्या राशी ओतल्यात ते विकत मिळत नाही. 





- सर्वोच्च समाधानी गृहस्थ, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


२३ जानेवारी २०२६ 


#सुरपाखरू 


#३०दिवसात३० 


#प्रयोग२०२६