Wednesday, February 23, 2022

पहाटचिंतन

 "दुसऱ्या  कुणाच्याही दुःखाने मी आनंदित होणार नाही."

आणि
"दुसऱ्या कुणाचाही सुखामुळे मी व्यथित होणार नाही."
आपापल्या जीवनात ही इतकी साधी दोन पथ्ये पाळलीत की आपली सत चित आनंदाकडे निरंतर वाटचाल सुरू होते. आणि ही वृत्तीच हळूहळू आपला स्थायीभाव बनला की आपले स्वतःचे रूपच सच्चिदानंदरूप होऊन जाते.
याचा अनुभव घ्यायचा असेल तर गेल्या काही कालावधीत स्वतःला वाईट कधी वाटले होते ? याचा आपापल्या अंतर्मनात शोध घेतला तर आपले आपल्यालाच लक्षात येईल की ७५ % पेक्षा जास्त वेळा ही वर उल्लेखलेली पथ्ये न पाळून आपणच आपल्या स्वतःला दुःखी केलेले आहे. (दुसऱ्याच्या दुःखात वरवर जरी आपल्याला आनंद वाटलेला असेल तरीही आपले अंतर्मन हे वैश्विक योजनेचा एक भाग असल्याने, आपल्याही नकळत ते दुःखी झालेले असतेच असते.)
आपले वडिल, आजोबा ही मंडळी आपल्या तुलनेत अधिक सुखी आयुष्य जगलीत कारण त्यांनी ही पथ्ये त्यांच्या जीवनात कसोशीने पाळलीत. जीवनाकडे, इतर प्राणीमात्रांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन हा आपल्यापेक्षा अधिक निकोप, निरामय असा होता. आपण आज भौतिक सुखसोयींनी अधिक समृध्द असू पण त्यापाठी धावताना आपण अकारण स्पर्धा, अकारण तळमळ मागे लावून घेतली असे नाही वाटत ?
सुख मिळण्यासाठी भौतिक साधन हा हेतू आता लयाला जाऊन भौतिक साधने अधिकाधिक मिळवण्यासाठी सुखाचा त्याग असे आपण साध्य आणि साधनाला उलटसुलट करून आपल्या स्वतःला खोड्यात अडकवून घेतलेले आहे.
माऊलींच्या "किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी" या ओवींचा अनुभव एकदातरी आपल्या आयुष्यात आपल्याला घ्यायचाय नं ? मग करायची या अभ्यासाला आणि पथ्याला आजपासूनच जाणीवपूर्वक सुरूवात ?
- "पहाटचिंतन" राम प्रकाश किन्हीकर. (२३०२२०२२_०३५८)

No comments:

Post a Comment