Showing posts with label अर्थान्तरन्यास. Show all posts
Showing posts with label अर्थान्तरन्यास. Show all posts

Tuesday, July 11, 2017

संस्कृत सुभाषिते - ७

संस्कृत सुभाषितांमध्ये अन्योक्ति, चमत्कृति, अर्थान्तरन्यास, नीती असे अनेक प्रकार आढळतात. प्रत्येक प्रकाराचे एक छान असे वैशिष्ट्य आहे. आता अर्थान्तरन्यासाचेच उदाहरण घ्या ना. आपण सर्व आपापल्या लिखाणात, व्याख्यानांमध्ये गेला बाजार शालेय निबंधांमध्ये यातल्या एका चरणाचा वापर नक्की केलाय पण त्या चरणामागचे संपूर्ण सुभाषित जर आपल्याला कळले तर त्या सुभाषित्कर्त्याबद्दल आणि आपल्या शहाण्या पूर्वजाबद्द्ल आदर द्विगुणीतच काय पण शतगुणीत होतो.

आता हेच बघाना "अती सर्वत्र वर्ज्ययेत" या चरणाचा वापर आपण बराच केला असेल. पण त्यामागील तीन चरण आपणापैकी फ़क्त संस्कृतच्या अभ्यासकांनाच माहिती असतील.

" अतिदानाद बलिर्बद्धो ह्यतिमानात सुयोधनः
विनष्टो रावणो लौल्याद, अती सर्वत्र वर्ज्ययेत."

{अती दान केल्याने बळीराजा बांधला गेला. तरी शुक्राचार्यांनी सांगितले होते की आता बास. हा बटू वामन तुझा शत्रू आहे पण बळीराजा दान देण्याचे थांबला नाही. अती मानामुळे (अहंकारामुळे) दुर्योधनाचा नाश झाला. युधिष्ठीराप्रमाणे महाभारतकारही या ज्येष्ठ कौरवालाही त्याच्या ख-या नावानेच नेहेमी हाक मारतात. त्याचे खरे नाव सुयोधन. त्याच्या कृत्यांमुळे बिचारा "दुर्योधन" या नावास प्राप्त झाला. अती कामवासनेमुळे रावणाचा नाश झाला. तस्मात "अती सर्वत्र वर्ज्ययेत", अती करू नये अशी शिकवण या सुभाषितातून आपल्याला मिळालेली आहे. }

हे अर्थान्तरन्यासाचे एक उदाहरण. इतरही उदाहरणे म्हणजे "वचने किं दरिद्रता ?", "देवो दुर्बल घातक:" , योजकस्तत्र दुर्लभः",  "सर्वे गुणाः कांचनमाश्रयन्ते". 

या सर्व अर्थान्तरन्यासांचे संपूर्ण सुभाषित काय आहे याचा शोध लागतोय का बघा. नाहीतर इथे थोड्या प्रतीक्षेनंतर मी लिहीतोच आहे.