Showing posts with label ऋषीपंचमी. Show all posts
Showing posts with label ऋषीपंचमी. Show all posts

Saturday, September 11, 2021

ऋषीपंचमी, ऋषींची भाजी, देवधानाचे तांदुळ. एक स्मरणरंजन

 ऋषीपंचमी आली म्हणजे महाल नगारखान्यासमोरच्या बाजारात मिळणारी ऋषींची भाजी (बैलाच्या मेहेनतीशिवाय पिकलेली / पिकवलेली भाजी) आणि देवधानाचे तांदुळ आठवतातच.

आदल्या दिवशी गणेशचतुर्थीनिमित्त मोदकांवर आडवा हात आपण मारलेला असतो. मग दुसर्या दिवशी आपली आई, आजी, मावश्या यांना ऋषीपंचमीचा उपास असतो तेव्हा साध्याशाच गंजीत रटरटून शिजलेल्या देवधानाच्या तांदुळाच्या भाताचा तो विशिष्ट सुवास घरात घमघमत असतो. मी आजवर या तांदळाला कुकरमध्ये शिजवलेले बघितलेले नाही. तो कायम गंजातच शिजवतात.
आणि भातासोबत असते ते कवडीचे दही आणि सैंधव मीठ. सोबतच ही साधीशीच उकडलेली, सैंधव मीठ, मिरच्या वगैरे घालून केलेली मिश्र भाजी. आषाढी पौर्णिमेपासून सुरू होणार्या या संपूर्ण सणावारांच्या मौसमातल्या पुरणावरणाच्या आणि तळणाच्या साग्रसंगीत स्वयंपाकांवर ही ऋषीपंचमीची भाजी म्हणजे एक उत्तम उतारा असावा. कारण आपली आई, मावश्या, बायको, मेव्हण्या, मुली, भाच्या ही मंडळी या उतार्याने पुन्हा टणटणीत होतात आणि पार कार्तिक महिन्यापर्यंतच्या सणांसाठी उत्साहाने कंबर कसतात.
ऋषीपंचमीची भाजी हा अनंत वर्षांपासून स्त्रियांचाच विशेषाधिकार आहे, बरं का ! ऋषीपंचमीचा उपवास करणारा पुरूष मी अजून बघितलेला नाही. या १०० % आरक्षणाबद्दल अजूनपर्यंत कुणीही तक्रार वगैरे केलेली नाही. पण मग त्यातून पळवाटा काढत आमच्यासारखी लबाड मंडळी त्या देवधानाच्या तांदळाचा भात, दही आणि ती उकडलेली, साधीशीच पण तरीही अत्यंत चविष्ट लागणारी मिश्र भाजी मिळावी म्हणून घरातल्या कर्त्या स्त्रियांच्या मागेमागे घुटमळून आपली जिव्हातृप्ती करून घेत असतातच.
तर वर्षभरात एकदाच येणारी ही पर्वणी म्हणजे ऋषीपंचमीची भाजी. यावर्षी ही पर्वणी चुकवू नका रे भावाबहिणींनो.
- इसवीसन २००० मध्ये ऋषी होण्याचे जवळजवळ नक्की केलेला (पण मार्च २००० मध्ये लग्ननिश्चिती झाल्यानंतर संसारी गृहस्थ झालेला) एक वेषधारी, रामप्यारे प्रकाशात्मज.