Showing posts with label निळाई. Show all posts
Showing posts with label निळाई. Show all posts

Wednesday, December 25, 2024

निळाई : एक दुर्मिळ अनुभव

"श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे" ही बालकवींची कविता तर सगळ्यांनाच माहिती आहे.

पण श्रावणमासात आभाळालाही एक वेगळीच निळाई लाभते हा निरीक्षणाचा आणि अनुभवाचाच विषय आहे.
आपण "आकाशी निळा" रंग म्हणतो तो फार क्वचितच आपल्याला आकाशात अनुभवायला येतो. आपल्याला आकाश दिसते ते मुख्यतः राखाडी रंगाचे. आणि चंद्रपूर सारख्या भारतातल्या कायम प्रदूषित शहरांमध्ये तर हा राखाडी रंग तर जमिन, आजुबाजुचे वातावरण आणि आकाश व्यापून दशांगुळे उरलेलाच असतो.
पण काल चक्क चंद्रपूरचे आकाश असे निळेशार दिसल्यावर मला श्रावणाचे आणि एकंदर पावसाचेच आभार मानावेसे वाटले. यापूर्वी असे निळेशार आकाश अशाच एका पावसाळ्यात म्हैसूरला बघायला मिळाले होते. असे निळेशार आकाश म्हणजे हवेतले प्रदूषण जवळजवळ शून्य.

पावसाळ्यात आकाशात कितीही घनदाट काळ्या ढगांनी गर्दी केलेली असली तरी मनसोक्त बरसून झाल्यावर काळं मळभ निघून जातं. आकाश पुन्हा आपला विशालतेचं प्रतीक असलेला निळा रंग धारण करतं. निर्व्याज, निरंकार आणि नितळ.



माणसे एकमेकांशी वागताना अशी बरसून मोकळी का होत नसावीत ? मनात एखाद्याविषयी खूप साचलेलं मळभ अशा पध्दतीने मोकळं करून पुन्हा नितळ, निरभ्र, निर्व्याज व्हायला माणसांना का जमत नसावं ? कायम एखाद्याविषयी मळभ घेऊन जगताना आपण पहिल्यांदा काळवंडले जातोय हे माणसांच्या लक्षात का येत नसावे ?
- मोकळा, मुक्त, नितळ, निरभ्र जीवन जगण्याचा कायम प्रयत्न करणारा निसर्गप्रेमी प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.