Showing posts with label Duronto Express. Show all posts
Showing posts with label Duronto Express. Show all posts

Friday, July 7, 2017

राजधानी, शताब्दी, जनशताब्दी, संपर्क क्रांती, गरीब रथ, दुरांतो, हमसफ़र, अंत्योदय, तेजस .............: प्रस्तावना


भारतीय रेल्वेच्या या विशाल कारभारात अनेक रेल्वे मंत्र्यांनी आपली बरी वाईट अशी छाप उमटवली. त्याच प्रयत्नात ब-याच रेल्वेमंत्र्यांनी आपापल्या स्वप्नातल्या गाड्या सुरू केल्यात. एक वेगळा ब्रॅण्ड या प्रत्येकाने तयार करण्याचा प्रयत्न केला. या लेखमालेचे शीर्षक वाचून तुम्हा सगळ्यांना त्याची कल्पना आली असेलच.





या सर्व प्रयत्नांवर एक रेल्वे अभ्यासक आणि प्रेमी म्हणून काही लिहाव अशी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. आता ती क्रमशः पूर्ण करेन. राजधानी एक्सप्रेसपासून जरी या लेखमालेला सुरूवात करत असलो तरी राजधानी एक्सप्रेस सुरू होण्यापूर्वी त्यांच्या पूर्वसुरी डिलक्स एक्सप्रेस म्हणून ज्या गाड्या सुरू झालेल्या होत्या त्यांचा उल्लेख याठिकाणी करणे अत्यावश्यक ठरेल. दिल्लीवरून पूर्व, पश्चिम, आणि दक्षिण दिशेला आरामदायक प्रवासासाठी या गाड्या सुरू झाल्या असाव्यात. त्याकाळी क्रीम आणि लालसर गुलाबी छटेतली डिलक्स एक्सप्रेस नागपूरला बालपणी पाहिल्याचे आठवते. बहुधा आत्ताची दक्षिण एक्सप्रेस असावी. नंतरच्या कालावधीत त्या गाड्यांना पूर्वा एक्सप्रेस, पश्चिम एक्सप्रेस आणि दक्षिण एक्सप्रेस अशी नामे पडलीत आणि त्या गाड्यांचा विशेष दर्जा हळूहळू समाप्त होत गेला.





आरामदायक प्रवास म्हणण्याचे कारण म्हणजे त्याकाळी रेल्वेत उच्च वर्ग (वातानुकुलीत आणि प्रथम वर्ग) सोडला तर इतर वर्गांना बाकांना कुशन्स नसायचीत. लाकडी बाकांवर बसून या खंडप्राय देशात तासातासांचे प्रवास करावे लागत. शयनयान वर्गात बाकांना कुशन्स बसवण्याला कै. मधू दंडवते रेल्वेमंत्री असताना १९७९ मध्ये सुरूवात झाली. त्यांनीच वर्गविरहीत रेल्वेची संकल्पना अंमलात आणून ४ नोव्हेंवर १९७९ ला मुंबई - हावडा गीतांजली सुपर एक्सप्रेस ही पहिली वर्गविरहीत गाडी सुरू केली. अजूनही गीतांजली एक्सप्रेसला पहिल्या वर्गाचा डबा नाही. आज मूळ समाजवाद आणि त्याच्याशी संबंधित कल्पनाच कालबाह्य झालेल्या असल्याने गीतांजली ही वर्गविरहीत गाडी वाटत नाही पण रेल्वेच्या संदर्भात मूलभूत स्तरावर विचार करून निर्णय घेणारे मंत्री म्हणून मधू दंडवतेंच नाव भारतीय इतिहासात अमर असेल. तसेच मूलभूत विचार करणारे आत्ताचे रेल्वेमंत्री आहेत. मला वाटते सिंधुदुर्गाच्या मातीतच हा गुण असावा.











या प्रत्येक ब्रॅण्ड विषयी मला वाटलेले विचार, त्यांचे प्रगतीचे टप्पे, सद्यस्थिती आणि होऊ शकत असणा-या सुधारणा याबद्दल क्रमश: इथे लिहीण्याचा प्रयत्न करेन. आपणा सर्वांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेतच.