Sunday, May 12, 2024

महाराष्टीय घरातली कुलदैवते आणि त्या त्या घरची संस्कृती

 माझे एक निरीक्षण आहे. बघा तुम्हालाही तो अनुभव आलाय का ?

रेणुका देवीचे उपासक किंवा ज्यांच्याकडे माहूरची रेणुका कुलदेवता आहे त्या घरातले पुरूष शीघ्रकोपी असतात. पण आपला कोप लक्षात आल्यानंतर कोप आवरून लगेचच शांतही होतात. अत्यंत प्रेमळ असतात. दीर्घकाळ कुणाचा राग धरून बसणे व योग्यवेळ पाहून बदला घेण्याची, टोमणा मारण्याची क्षमता किंवा धीर त्यांच्यामध्ये नसतो.
या घरातल्या स्त्रियाच एकूण घराचे धोरण ठरवितात. आपल्या नवरोजींना सुरूवातीच्या काळात बिचकणार्या या स्त्रिया संसारात चांगल्या मुरल्यावर नवरोजींना चांगले ओळखून घेऊन त्यांच्या कोपकाळात अत्यंत धोरणीपणाने वागून नंतर शांततेच्या काळात युक्ती प्रयुक्तीने स्वतःचे धोरण मान्य करून घेतातच घेतात.
गणपतीची उपासना ज्यांच्याकडे आहे त्या गाणपत्य पंथातल्या घरातली पुरूष मंडळी जात्याच शांत असतात. ही मंडळी घरातल्या वादविवादात फारशी सहभागी नसतात आणि व्हावे लागले तरी अत्यंत सर्वसमावेशक भूमिका घेत समेट घडविण्याच्या मागे लागतात. या घरात शांतता असते. ही मंडळी अत्यंत विचार करून बोलणारी आणि शांत असतात.
या घरांमधल्या गृहिणींवरही पुरूषांचा प्रभाव असतोच. त्या सुध्दा शांतपणे, सर्वसमावेशकतेने कार्य करीत राहतात. कलह, वादविवाद टाळण्याचे प्रयत्न करतात.
श्रीबालाजी किंवा श्रीविष्णुंच्या दशावतारापैकी कुणीही ज्यांचे कुलदैवत आहे अशा वैष्णव घरांमधली पुरूष मंडळी अत्यंत धोरणी असतात. आपल्या मर्जीप्रमाणेच संपूर्ण घर चालले पाहिजे यावर त्यांचा फार कटाक्ष असतो. पण कधीमधी भगवान विष्णु स्वतःच्या मर्यादा मान्य करून त्या महालक्ष्मीसमोर आपली आयुधे टाकून तिची आराधना करतात तसेच या घरातली पुरूष मंडळीही एखाद्या अत्यंत महत्वाच्या प्रसंगी आपल्या गृहस्वामिनीला सूत्रे सोपवतात. ती गृहस्वामिनीही आपल्या "अहों" चा स्वभाव, त्यातले कंगोरे, खाचाखोचा माहिती असल्याने स्वतःचे कौशल्य पणाला लावून पण आपल्या नवरोजींच्याच पठडीतला, त्यांना रूचणारा निर्णय घेते आणि "अहो" अगदी खुष होऊन जातात. गृहस्वामिनीच्या कामावर आणि त्याहीपेक्षा जास्त तिच्यावर जबाबदारी सोपविण्याच्या आपल्या निर्णयावर.
ज्यांच्याकडे शंकर कुलदैवत असतात त्या घरातले पुरूष मात्र खरोखर भोळे आणि जगमित्र असतात. त्यांचा हा स्वभाव लक्षात घेऊन त्या त्या घरातल्या पार्वतीबाईंनाच अत्यंत धोरणीपणे व नेटका संसार करावा लागतो. या शैव घरातले पुरूष आपल्या दैवताप्रमाणे एकतर लवकर संतापत नाहीत आणि एकदा संतापलेत की कधीच लवकर शांत होत नाहीत. त्यांच्या संतापानंतरचा विध्वंस टाळण्यासाठी त्या घरातल्या गृहस्वामिनींना कायम दक्ष रहावे लागते.
भावांनो, वहिनींनो, बहिणींनो आणि जिजाजींनो, खरेय ना ?
- "मराठी घरातली कुलदैवते आणि त्या त्या घरांमधले पतीपत्नींचे मानसशास्त्र व तदअनुषंगिक सौहार्द" या अतिप्रचंड ग्रंथाचे सडसडीत लेखक प्रा. वैभवीराम वैशाली प्रकाश किन्हीकर.

1 comment: