Showing posts with label श्रीतुकोबांची गाथा. Show all posts
Showing posts with label श्रीतुकोबांची गाथा. Show all posts

Friday, November 4, 2022

देवाचिये द्वारी - ११८

 


विठ्ठल सोयरा सज्जन सांगातीं I विठ्ठल हा चित्ती बैसलासे II


विठ्ठलें हे अंग व्यापिली हे काया I विठ्ठल हे छाया माझी मज II


बैसला विठ्ठल जिव्हेंचिया माथा I न वदे अन्यथा आन दुजे II


सकळ इंद्रियां मन हे प्रधान I तेंही करी ध्यान विठोबाचे II


तुका म्हणे या हो विठ्ठलासी आतां I न यें विसंबतां माझे मज II



श्रीतुकोबांना विठ्ठल परमात्म्याची इतकी ओढ लागलेली आहे की आता ते त्यांचे त्यांनाही अनावर झाले आहेत. विठ्ठलाने भेट द्यावी आणि आपल्या मनात कायमचे रहावे अशी आळवणी श्रीतुकोबा त्या विठ्ठलाला करताहेत.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(कार्तिक शुद्ध एकादशी / प्रबोधिनी एकादशी शके १९४४ , दिनांक ४/११/२०२२)


आषाढी एकादशी शके १९४४ दिनांक १० जुलै २०२२ रोजी लिहायला सुरूवात केलेले हे सदर आज श्रीसदगुरूंच्या आणि सकल संतांच्या कृपेने पूर्णत्वास जात आहे याचा मला विशेष आनंद होतो आहे. हे सदर लिहीताना प्रत्येक अभंगातून, ओवीतून मला जी अनुभूती झाली ती मी सहज सरळपणे आपल्या सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मुळात मी फ़ार विद्वान, अभ्यासक वगैरे नाहीच त्यामुळे फ़ारसे विद्वत्तापूर्ण विवेचन लिहावे हा हेतू नव्हताच. ब-याच वेळा असे जाणवले की अरे संतांनी स्वतःच इतक्या सोप्या भाषेत, सर्वांना समजेल असे दृष्टांत देऊन अध्यात्म आपल्यासाठी अत्यंत सोपा करून मांडलेला आहे त्यात आपण आपल्या विवेचनाची काय अधिक भर घालावी ?


माझ्या जीवनाला एक शिस्त लागावी, चातुर्मास हा लिखाणाचा संकल्प पूर्ण व्हावा ही त्या पांडुरंगाचीच इच्छा होती हे मी मनापासून मानतो आणि आपली तात्पुरती रजा घेतो. 


सध्या तरी नववर्षापासून एक असाच वेगळा लिखाण संकल्प घेण्याचे योजिले आहे. तर नववर्षात नवोन्मेषाने, नव्या लेखनासह भेटूच.


- आपण सर्वांचा प्रेमांकित, राम. 



Thursday, November 3, 2022

देवाचिये द्वारी - ११७

 


सकळांच्या पाया माझी विनवणी  I मस्तक चरणीं ठेवीतसे II


अहो वक्ते श्रोते सकळही जन I बरें पारखून बांधा गाठी II


फ़ोडिले भांडार धन्याचा हा माल I मी तंव हमाल भारवाही II


तुका म्हणे चाली झाली चहूं देशीं I उतरला कसीं खरा माल II

सर्व मनुष्यमात्रांनी ब-या वाईटाची पारख करून खरे अध्यात्म आपल्या आचरणात आणले पाहिजे असे श्रीतुकोबांना कळकळीने वाटते. 


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(कार्तिक शुद्ध दशमी शके १९४४ , दिनांक ३/११/२०२२)


Wednesday, November 2, 2022

देवाचिये द्वारी - ११६

 


आशाबद्ध वक्ता I धाक श्रोतियाच्या चित्ता II


गातो तेही नाही ठावे I तोंड वासी काही द्यावे II


झाले लोभाचे मांजर I पोट भरे दारोदार II


वाया गेले ते भजन I उभयतां लोभी मन II


बहिरें मुके एके ठायीं I तैसें झालें तयां दोहीं II


माप आणि गोणी I तुका म्हणे रिती दोन्ही II


धन आणि मानाविषयी आशाबद्ध असलेला वक्ता आणि हा आता आपल्याला  काही मागणार तर नाही या भितीने घाबरलेले श्रोते म्हणजे मुक्याने परमार्थ सांगितला आणि बहि-याने तो ऐकला असे श्रीतुकोबांचे प्रतिपादन आहे. 


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(कार्तिक शुद्ध नवमी शके १९४४ , दिनांक २/११/२०२२)


Tuesday, November 1, 2022

देवाचिये द्वारी - ११५

 


मुखी बोले ब्रह्मज्ञान I मनी धन आणि मान II


ऐसियाची करिता सेवा I काय सुख होय जीवा II


पोटासाठी संत I झाले कलीत बहुत II


विरळा ऐसा कोणी I तुका त्यासि लोटांगणी II


कलियुगात आपल्या मनात धन आणि मानाविषयी लालसा बाळगून संतत्वाचे सोंग आणणा-यांची मांदियाळी झालेली आहे हे श्रीतुकोबांनी फ़ार वर्षांपूर्वी ओळखले होते. जो कुणी विरळा मनुष्य़मात्र असा नसेल त्याला मी प्रणाम करतो असे श्रीतुकोबा म्हणताहेत. 


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(कार्तिक शुद्ध अष्टमी शके १९४४ , दिनांक १/११/२०२२)


Tuesday, May 22, 2018

श्रीतुकोबांची गाथा - ९




ते माझे सोयरे सज्जन सांगाती I  पाय आठविती विठोबाचे II
येरा मान विधी पाळणापुरते I  देवाची ती भूते म्हणोनिया II
सर्वभावे झालो वैष्णवांचा दास I करीन त्यांच्या आस उच्छिष्टाची II
तुका म्हणे जैसे आवडती हरिदास I  तैशी नाही आस आणिकांची II

संतांना खरेतर आपपर भाव नसतो. हा माझा, हा परका ही धारणा त्यांच्या ठायी अगदीच नसते. पण या ठिकाणी श्रीतुकोबा आपणा सर्वांना त्या ईश्वराच्या नादी लागण्यासाठी हा कृतक कोप करताहेत. श्रीतुकोबा म्हणताहेत की जे लोक माझ्या विठोबाचे पाय आठवतात तेच माझे नाते्वाईक आहेत. इतरांशी श्रीतुकोबांचे नाते आहे ते केवळ ती सगळी भूते देवाचीच लेकरे आहेत म्हणून. श्रीतुकोबा सर्वाभूती भगवदभाव ठेवताहेत पण विशेष ममत्व मात्र वैष्णवांबद्दलच बाळगताहेत. याठिकाणी "वैष्णव" कोण ? तर संत नरसी मेहतांनी म्हटल्याप्रमाणे "वैष्णवजन तो तेणे कहिये, जे पीड परायी जाणे रे", दुस-यांचे दुःख आत्मौपम्य वृत्तीने (स्वतःलाच दुःख झाल्याप्रमाणे) जे जाणून घेतात ते वैष्णव.

श्रीतुकोबा पुढे म्हणतायत की असे जे वैष्णव आहेत त्यांचा मी सर्व भावाने दास झालो आहे. त्यांच्या उष्ट्याची आस मला आहे. साधू संत यांच्या मुखातून जे ज्ञान येत ते त्यांच उष्टच असत आणि ते ज्ञान मनुष्यमात्राला करे मार्गदर्शन करून त्याला भवपार करत असा श्रीतुकोबांचा सिध्दांत आहे. आणि म्हणूनच श्रीतुकोबांना अशा वैष्णवांची जशी आस आहे तशी इतरांची नाही.

तुमच्या माझ्या संसारात, व्यवहारात, आचरणात आपल्याला व्यवहारात जो उपयोगी पडेल तो आपला सोयरा हे आपले धोरण असते. पण या अभंगातून श्रीतुकोबा आपल्याला आपले खरे सोयरे कोण याचे मार्गदर्शन करताहेत.

निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम

जय तुकोबा माऊली.

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर  (२२०५२०१८)  

Sunday, May 13, 2018

श्रीतुकोबांची गाथा - ८



पाहतोसी काय I आता पुढे करी पाय II
वरी ठेऊ दे मस्तक I ठेलो जोडूनि हस्तक II
वरवे करी सम I नको भंगो देऊ प्रेम II
तुका म्हणे चला I पुढती सामोरे विठ्ठला II

श्रीतुकोबांचे विठ्ठलाशी एक वेगळेच नाते आहे. या अभंगात ते सख्यत्वाच्या भावनेने त्याच्याशी संवाद साधताहेत. ज्या विठ्ठल चरणांची आस तुम्हा आम्हा सर्व वारक-यांना असते, त्याची आस श्रीतुकोबांनाही आहे पण इथे सख्यत्वाच्या भावनेने ते त्याला आज्ञाच करताहेत, की "पाहतोस काय रे विठ्ठला ? चल, आता मी आलोय ना ? मग पाय पुढे कर पाहू. "

श्रीगजाननविजय ग्रंथात संत दासगणू महाराजांनी लिहील्याप्रमाणे महाराजांचे परम भक्त असे खंडू कडताजी पाटील ह्यांचे श्री गजानन महाराजांशी अशाच प्रकारचे संभाषण होत असे. "गण्या, गज्या म्हणे वाणी, परी प्रेम उपजे अंतःकरणी" असे वर्णन संतकवी दासगणूंनी केलेले आहे. ज्याठिकाणी प्रेम आहे त्याच ठिकाणी अशा स्वरूपाचा "अरे, तुरे" चा संवाद होत असतो हे दासगणू महाराजांनी सोदाहरण पटवून दिलेले आहे. आणि श्रीतुकोबांचे काय ? त्यांच्या तर सत्कर्माच्या खात्यात अगणित सत्कर्मे होती आणि त्यांनी त्या खात्याचा चेक कधीही फ़ाडला नव्हता. (आपल्या प्रापंचिक गोष्टींसाठी आपल्या इष्ट देवताला साकडे घालून सत्कर्माचा वापर केलेला नव्हता.) अशा धनवान ग्राहकासमोर त्या बॅंकरला नम्र व्हावे लागणे स्वाभाविक आहे हो.

श्री तुकोबा तसलाच हक्क विठ्ठलावर दाखवतायत. ते विठ्ठलाला त्याच्या सांप्रत अवताराची आठवण करून देताहेत. "बा विठ्ठला, तू गेल्या अवतारात त्रिभंग अशा स्वरूपाचा श्रीकृष्ण असशील. पण या अवतारात तू आम्हा भोळ्या भाबड्या वारक-यांचा विठू आहेस. त्यामुळे कृष्णावतारात असलेले तुझे वक्र पाय आता सरळ कर. तुझ्या या चरणांवर मला मस्तक ठेवू दे. मी तुझ्यासमोर हात जोडून उभा आहे. तुझे हे आमच्याठायी असलेले प्रेम भंगू न देण्याची जबाबदारी तुझीच आहे."

श्री तुकोबा देवाला तर सख्य भावनेने आवाहन करतायत. पण आजच्या काळात परमेश्वरापासून विन्मुख होऊन, अशाश्वत अशा प्रपंचात रममाण झालेल्या तुमच्या माझ्यासारख्या प्रापंचिकालाही आवाहन करताहेत की बाबांनो या अध्यात्ममार्गाच्या बारीत पुढे चला आणि काही वेळ तरी प्रपंचाला विन्मुख होऊन विठ्ठलाला सामोरे जा. चारशे वर्षांनंतर माणसे देवळात जाऊनही प्रपंच्याच्याच गोष्टी बोलत बसतील हे श्रीतुकोबांना त्याकाळीच उमजले होते एकंदरीत.

निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम
जय तुकोबा माऊली.

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर  (१३०५२०१८)  

Sunday, February 11, 2018

श्रीतुकोबांची गाथा - ७


करावी ती पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काम काय असे I
कळावे त्यासी कळे अंतरीचे, कारण ते साचे साचा अंगी I
अतिशया अंती लाभ किंवा घात, फ़ळ देते चित्त बीजा ऐसे I
तुका म्हणे जेणे राहे समाधान, ऐसे ते भजन पार लावी I

श्रीतुकोबांसारख्या संतांनी परमेश्वराच्या भक्तीमधल्या अवडंबराचा कायम विरोध केला आहे. कामेष्णा, वित्तेष्णा आणि लोकेष्णा (कामाविषयी अती आवड, धनाविषयी अती आवड आणि लोकांच्या मान्यतेविषयी अती आवड हे तीन ताप म्हणून आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहेत. मनुष्यमात्राला मुक्त होण्यापासून या तीन गोष्टी अडथळा करतात अशी मान्यता आहे.) या गोष्टी टाळून साधकांनी पुढे मार्गक्रमण करावे ही श्रीतुकोबांची तळमळ आहे. म्हणून ते म्हणताहेत की आपण किती पूजा, उपासना करतो, कशी करतो याचे प्रमाण आपल्या मनातच ठेवावे. लौकिक मानासाठी तिचे प्रदर्शन करू नये. 

शास्त्रांमध्ये तर मानसपूजेचेच महत्व वर्णिलेले आहे. शरीराच्या कसल्याही अवस्थेत, कसलेही बाह्य उपचार न लागणारी साग्रसंगीत पूजा, मानसपूजेच्या माध्यमातूनच पूर्ण होत असते. पण आजकाल आम्ही कशी मानसपूजा करतो हे सुद्धा दाखवण्याची फ़ॅशन येऊ पाहतेय. त्याकाळात हा श्रीतुकोबांचा उपदेश किती आवश्यक आहे बघा.

श्रीतुकोबा साधकांना सांगताहेत की आपल्या वैयक्तिक पूजेसंबंधी, वैयक्तिक साधनेसंबंधी गोष्टी लोकांसमोर उघड करणे आवश्यक नाही याचे कारण म्हणजे ज्या परमेश्वराला ते कळायचे आहे त्याला ते कळलेले आहे. ज्याच्यासाठी आपण ही सगळी आटाआटी, हे सगळे उपचार करतो आहोत, त्याला आपल्या अंतरीचा भाव लक्षात आला आहे आणि ते कळले आहे. सच्चा भाव एक सच्च्या परमेश्वराशिवाय कोण बरे ओळखू शकणार ?

"अती सर्वत्र वर्जयेत", एखाद्या गोष्टीचा अतिरेक करू नये हे आपल्या शास्त्रांनी आपल्याला सांगून ठेवलेले आहेच. श्रीतुकोबाही आपल्याला आपल्या उपासनेसंदर्भात हेच बजावून सांगताहेत. अती, किंवा खूप हट्टाने केलेल्या उपासनेची जशी चांगली फ़ळे असतात तशीच तीव्र स्वरूपाची घातकच फ़ळे मिळू शकतात कारण आपले चित्तात जर उपासनेचे बीज लावताना त्यामध्ये अपसंकल्पांची, बीजे लावल्या गेलीत तर फ़ळही त्याच स्वरूपाचे घातक मिळेल.

म्ह्णून श्रीतुकोबा आपल्या सर्व साधक मंडळींना ही लोकेषणा सोडून कळवळ्याने उपदेश करताहेत की बाबांनो ज्या साधनेने, उपासनेने समाधानी चित्त राहील ते साधन, ती उपासना दृढ करा. तीच तुम्हाला जीवनात उद्धरून नेईल आणि पैलतीराला लावून देईल.

निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम
जय तुकोबा माऊली.

प्रा. राम प्रकाश किन्हीकर  (११०२२०१८)