Friday, September 10, 2021

भाषेचा लहेजा, संस्कृती , सैराट आणि फ़ॅंड्री

 प्रत्येक भागातल्या भाषेचा लहेजा पूर्णपणे जाणून घेतल्याशिवाय त्या त्या भागातल्या माणसांविषयी, संस्कृतीविषयी गैरसमज करून घेऊ नयेत, हेच खरे.

१९८९ ते १९९३ कराडला होतो. तेव्हा आमच्या काॅलेजला असलेली सोलापूर - बार्शी - टेंभुर्णीची मित्रमंडळी सहज बोलताना - बोलावताना सुध्दा "ए ssss किन्हीकर, ये की लगा" अशी साद घालायची तेव्हा सुरूवातीला ही मुले त्या 'ए' नंतरच्या हेलामुळे उर्मट वाटायचीत. त्यांचा रागच यायचा.
पण २०१२ मध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्यात गेलो आणि त्या हेल काढून बोलण्यामागचा प्रेमळ भाव समजला. तिथल्या मुक्कामात आम्हीही ती बोलीभाषा आत्मसात केली.
तशी काहीशी भावना आत्ता माझी दिल्लीकरांविषयी आहे. ते हरियाणवी हेल, त्यातल्या टिपीकल शिव्या आणि बोलण्यात जाणवणारा shear arrogance. आजतरी हे वेगळं वाटतय खरं. कुणास ठाऊक पुढल्या आयुष्यात दिल्लीत, हरियाणा पंजाबात, काही महिने / वर्षे मुक्काम होईलही. मग तिथली संस्कृती, भाषा, लहेजा आदि समजून घेता येईल.
पण सांगोला - सोलापूरच्या भाषेचा एक उत्तम परिणाम असा झाला की आम्हाला सैराट सिनेमातले सगळे संवाद अगदी स्पष्ट कळले आणि त्यामुळे नागराजअण्णाच्या दिग्दर्शनातले बारकावे समजून घेता आलेत. सिनेमात दिसणारी करमाळा, जेऊर, उजनी ही स्थळे नेहमीच्या जाण्यायेण्याच्याच रस्त्यावरील. त्यामुळे सिनेमाविषयी आणखी आत्मीयता वाढली. हा सिनेमा 'आपल्या' मातीतला वाटू लागला.
बर्याच नागपूरकर किंवा वैदर्भिय मंडळींना त्या भाषेच्या लहेजा अभावी तो सिनेमा कळलाच नाही आणि म्हणून आवडला नाही.
सैराट बघितल्यानंतर दूरचित्रवाणीवर "फँड्री" पाहिला. पूर्वी हा सिनेमा दोनतीनदा कुठल्या ना कुठल्या चॅनेलवर बघायला मिळत होता पण आम्हाला त्याची महती न कळल्याने चॅनेल बदलल्या जात होते. पण नंतर बघितल्यावर मला सैराटपेक्षाही "फँड्री" जास्त आवडला. त्यातली कलात्मकता काळजाला भिडणारी आहे. दिग्दर्शक म्हणून नागराजअण्णा किती ग्रेट आहे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे "फँड्री"
आज हे आठवण्याचे कारण म्हणजे आमचा आवाज गेल्या दोनतीन दिवसांपासून टप्प्याटप्प्याने बसत चाललाय. आज श्रीगणेश मूर्ती घेऊन येताना बोलण्याचा प्रयत्न केला तर सुकन्या पटकन म्हणाली, "बाबा तुझा अगदी 'जब्या' झालाय." आवाज फुटत नसतानाही मी आणि तिची आई खो खो हसत सुटलो.
१२ गावचे पाणी पिऊन आल्याचा हा परिणाम. आपण आपलेच समृध्द होत जातो.
या १२ गावचे पाणी पाण्याच्या फुशारकीनंतर झालेल्या एका फजितीची कथा - नंतर कधीतरी.
- नागपुरातला जांबुवंत उर्फ जब्या, जितेंद्रकुमार चैत्रे.

No comments:

Post a Comment