Sunday, September 19, 2021

भक्ताचे मनोव्यापार आणि भगवंताची रूपे

 मनापासून प्रार्थना करून बोलावल्यानंतर भगवतीच्या आगमनाच्या दिवशीचा त्यांच्या चेहेर्यांवरचा आनंद.




प्राणप्रतिष्ठापूर्वक षोडशोपचार पूजा करून, पंचदश संस्कारांप्रीत्यर्थ ॐ कार जपून केलेल्या पूजनानंतर आणि नैवेद्य निवेदन केल्यानंतरची आई जगदंबेच्या चेहेर्यावर आलेली तृप्ती.



विसर्जनाच्या दिवशी "यांतु देवगणाः सर्वे....पुनरागमनायच" म्हणताना आपल्या घशात आवंढा आलेला असतो त्यावेळी आलेले जगज्जननीच्या चेहेर्यावरचे व्याकुळ भाव.



भक्ताच्या मनोव्यापारांशी भगवंताची अशी नाळ जुळलेली असणे हेच आपल्या सण वारांचे खरे फलित.
मग महालक्ष्म्यांच्या या तीन दिवसांमध्ये १२५ चौरस फुटांच्या, मातीच्या भिंती आणि शेणाने सारवावे लागणार्या flooring वर अत्यंत चणचणीच्या आर्थिक परिस्थितीत आपल्या आईवडीलांनी अतिशय आनंदाने साजर्या केलेल्या महालक्ष्म्या आठवतात. उपाशीपोटी फुलोरा करायचा असल्याने सकाळची शाळा करून संध्याकाळपर्यंत उपाशी राहून फुलोरा करून पहिल्या वर्षी महालक्ष्म्या मांडण्याचे कार्य सुकर करून देणारी आपली दिवंगत आत्या आठवते. दरवेळी नैवेद्य प्रसाद करताना त्या त्या गोष्टींशी जुळलेल्या आठवणी दाटतात आणि दिवंगत आजी, आजोबा, वडीलांची आठवण येते.
श्रध्दापूर्वक स्मरण फक्त श्राध्दाच्याच दिवशी करायचे असते असे कुठाय ? अशा सणावारांमधूनही ते घडते आणि मग महालक्ष्मी आपल्या आईच्या रूपात दिसू लागते, तिची बाळं हे आपलेच सवंगडी वाटू लागतात आणि माहेरवाशिणीला निरोप देताना मन जड होऊन जातं.
कन्यारत्नाच्या लग्नाला अजून अर्धे तप तरी वेळ आहे पण तोपर्यंत माहेरवाशिण कन्येची पाठवणी करण्याचा प्रसंग या उत्सवांमधूनच अनुभवायचा असतो.
ताई, पुन्हा लवकर परतून ये बाई.
- श्रुतीस्मृती पुराणोक्त पूजेइतकाच भावपूर्ण आळवणीवर विश्वास असणारा एक व्याकुळ भक्त, राम प्रकाश किन्हीकर.

No comments:

Post a Comment