Sunday, June 30, 2024

घर थकलेले संन्यासी, हळूहळू भिंतही खचते

घर थकलेले संन्यासी,  हळूहळू भिंतही खचते. नागपुरातल्या प्रताप नगर, रविंद्र नगर, टेलिकाॅम नगर परिसरातून रोज जाणेयेणे करताना ग्रेसच्या या ओळी मनात येतात. नागपूर म्हणजे तसे ऐसपैस अघळपघळ शहर होते. ४० - ५० वर्षांपूर्वी तत्कालीन नोकरदारांनी थोडे शहराच्या बाहेर मोकळ्या हवेत घर बांधूयात म्हणत दक्षिण, नैऋत्य नागपुरात मौजा जयताळा, मौजा भामटी, मौजा परसोडी शिवारात प्रशस्त प्लाॅटस घेतलेत. त्यावर खूप नियोजन करून सुंदर टुमदार घरे बांधलीत. त्यात आपल्या कुटुंबाचा, मुला नातवंडांचा विचार करून छान ३००० ते ५००० चौरस फुटी प्लाॅटसवर प्रशस्त वास्तू उभारल्यात. तळमजला आणि पहिला मजला.

त्या प्लाॅटसवर तेव्हाच्या मालकांनी छान छान झाडे लावलीत. जांभूळ., पेरू,आंब्यासारखी फळझाडे, पारिजातक, सदाफुली, चाफ्यासारखी फुलझाडे, मोगरा, मधुमालती, गुलमोहराचे वेल. आपण लावलेले आंब्याचे झाड आपल्या नातवाला फळे देईल, फुलझाडांची फुले रोज देवपूजेला कामाला येतील, मोकळी हवा मिळेल, मस्त जगू हे साधे सोपे, कुणालाही न दुखावणारे स्वप्न.
सुरूवातीच्या काळात मुख्य शहराबाहेर वाटणारी आणि "कुठच्याकुठे रहायला गेलात हो !" अशी पृच्छा सगळ्यांकडून होणारी ही वस्ती शहर वाढल्याने अगदी शहराचा भाग झाली. सगळ्या सोयीसुविधा इथे मुख्य शहरासारख्याच किंबहुना त्यापेक्षा वरचढ उपलब्ध होऊ लागल्यात. घरमालक सुखावलेत. तोपर्यंत ते त्यांच्या निवृत्तीच्या आसपास पोहोचले होते. मुले हाताशी आलेली होती. मुलींची लग्ने झालेली होती, ठरलेली होती. सगळं छान चित्र.
पण १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात आलेल्या संगणक क्रांतीने जग बदलून गेले मग नागपूर तरी त्याला कसे अपवाद असणार ? संगणक क्रांती नागपूरच्या आधी पुणे, हैद्राबाद, बंगलोर ला आली. होतकरू, हुशार तरूणांचे नोकरीनिमित्त फार मोठे स्थलांतर सुरू झाले. काही काहींचे तर अगदी सातासमुद्रापार अमेरिकेत स्थलांतर झाले.
सुरूवातीला "माझा मुलगा बे एरियात आहे, डाॅलर्समध्ये कमावतोय. गेल्या वर्षी आम्ही दोघेही जाऊन आलो अमेरिकेत. म्हातारा म्हातारीला मुला - सुनेने पूर्ण अमेरिका दाखवून आणली हो. अगदी लास वेगासला नेऊन कॅसिनोत कधी नव्हेतो जुगारही खेळलो." असे कौतुक झाले.
पण नंतर अमेरिकेत गेलेले, पुणे बंगलोरला गेलेले मुलगा - सून नागपूरला परतण्याची चिन्हे दिसेनात. तिथली प्रगती, तिथल्या संधी इथे नव्हत्या. नातवंडांचा जन्म जरी नागपुरात झाला असला तरी त्यांची वाढ, शाळा या सगळ्या घाईगर्दीच्या महानगरांमध्ये झाल्याने त्यांना नागपूर हे संथ शहर वाटू लागले. इथे फक्त आपले आजी - आजोबा राहतात, हे आपले शहर नाही हे त्यांच्या मनात बिंबले गेले. त्यात त्यांचाही काही दोष नव्हता. करियरला संधी, उभारी मिळणारी ठिकाणे कुणालाही आपलीशी वाटणारच. घरमालक आजी आजोबा नागपूरला अगदी एकटे पडलेत. तरूणपणी एकत्र कुटुंबात वाढावे लागल्याने राजाराणीच्या संसारासाठी आसुसलेल्या या पिढीला आता हा राजाराणीचा संसार अक्षरशः बोचू लागला. भरलेले, हसते खेळते असावे म्हणून बांधलेले घर आता फक्त झोपाळ्याच्या करकरणार्या कड्यांच्या आवाजात आणि संध्याकाळी मावळत्या सूर्यासोबत अंगणातल्या झाडांच्या लांब सावल्यांमध्ये बुडून जायला लागले. मुला - नातवंडांच्या संसाराची वाढ लक्षात घेऊन बांधलेले चांगले ८०० - ८५० फुटांचे प्रशस्त स्वयंपाकघर सकाळी साध्या भातासोबत फोडणीचे वरण आणि संध्याकाळी त्याच उरलेल्या भाताला फोडणी दिलेली बघू लागली. स्वयंपाकघरातल्या ताटाळात असलेल्या ३० - ४० ताटांवर धूळ जमू लागली. सकाळ संध्याकाळ एक कुकर, दोनतीन भांडी, एक कढई आणि दोन ताटल्या एवढ्यातच भांड्यांचा संसार आटोपू लागला.
मालकांची मुलेही पुण्यात, बंगलोरला स्थाइक झालीत. ही दुसरी पिढीही आता निवृत्तीच्या आसपास आली होती. त्यांची मुलेही तिथेच रमली होती, पोटापाण्याच्या उद्योगाला लागली होती. नागपूरच्या त्यांच्या फेर्या वर्षातून सणांसाठी एकदोन वेळा किंवा ते ही जमेनासे झाले तर म्हातारा - म्हातारीला पुणे बंगलोरला बोलावून तिथेच महालक्ष्म्या गणपती हे सण साजरे होऊ लागलेत. "आमच्या घरच्या महालक्ष्म्या या वर्षी म्हैसूरला बसल्या होत्या हं" हे अभिमानाने सांगण्यातल्या सुरांत "कधीकाळी महालक्ष्म्यांसाठी लागतील म्हणून खूप फुलझाडे, केळीच्या पानांसाठी केळी नागपूरच्या घरात लावलेली होती त्यांचा या वर्षी उपयोगच झाला नाही. सगळी तशीच सुकून गेलीत." हा सूर मनातल्या मनातच खंतावू लागला.
म्हातारा - म्हातारी आजारी पडू लागलेत. हाॅस्पिटलायझेशन साठी मुले येऊ लागलीत. ती पिढी तर यांच्यापेक्षा जास्त थकलेली. "बाबा / आई, तुम्ही तिकडेच चला ना आमच्यासोबत. सगळ्यांनाच सोईचे होईल." असा व्यावहारिक मार्ग निघू लागला. म्हातारा - म्हातारी सहा महिने, वर्ष आपल्या वास्तूपासून, जीवनस्वप्नापासून दूर राहू लागलेत.
जीवनक्रमात अपरिहार्य म्हणून दोघांपैकी एक देवाघरी गेल्यावर तर राहिलेल्या एकट्यांचे जिणे अधिकच बिकट होऊ लागले. छोटीछोटी दुखणीखुपणी, अपघात अगदीच असह्य होऊ लागले. नागपुरात रूजलेले, वाढलेले हे वृक्ष आपल्या मुळांपासून तुटून दूरवर कुठेतरी रूजण्यासाठी नेल्या जाऊ लागलेत. नाईलाज असला तरी ही मंडळी मुला नातवंडांमध्ये रमू लागलीत. नागपुरातली घरे मात्र यांच्या जाण्याने यांच्यापेक्षा जास्त थकलीत.
अशा विस्तीर्ण प्लाॅटसवर आणि मोक्याच्या जागांवर बिल्डरांचे लक्ष गेले नसते तरच नवल. एवढ्या मोठ्या प्लाॅटवर फक्त २ माणसे राहतात ही बाब त्यांच्या व्यावसायिक दृष्टीकोनाला पटण्यासारखी नव्हती. अशा टुमदार घरांचे करोडोंचे व्यवहार होऊ लागलेत. त्याजागी ५ - ६ मजली लक्झरीयस फ्लॅटस बांधले जाऊ लागलेत. थकलेली घरे जमीनदोस्त झालीत. सोबतच घर मालक मालकिणींची स्वप्नेही नव्या फ्लॅटस्कीमच्या खोल पायव्यात गाडली जाऊ लागलीत. एक दीड कोटी रूपये मिळालेत तरी ते घर, त्याच्याशी निगडीत स्वप्ने, त्याचा टुमदारपणा, ऐसपैसपणा याची किंमत कितीही कोटी रूपयांमध्ये होऊ शकत नाही ही जाणीव आयुष्याच्या संध्याकाळी काळीज पोखरत राहिली.
थकलेल्या संन्यासी घराची भिंत अशीच हळूहळू खचत राहिली.
- नागपुरातल्या घरांची ही स्पंदने अचूक टिपणारा, स्वतः नागपूरबाहेर अनेक वर्षे काढूनही मनाने नागपूरकरच राहिलेला आणि माझ्या वडिलांच्या वयाच्या पिढीची स्पंदने संवेदनशीलपणाने जाणणारा, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Friday, June 28, 2024

मलाबारी जेवण


मलाबारी (Costal Karnaka & Keralam) जेवण मला आवडतं. किंबहुना सह्याद्रीच्या पश्चिमेला असलेल्या आणि पालघर पासून थेट कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या चिंचोळ्या कोकण - मलाबार पट्टीत (शाकाहारीच हं) पाकशास्त्राचे जितके प्रयोग आणि प्रकार आहेत ते सगळे मोहवून टाकणारे आहेत. इथे मुबलक उपलब्ध असलेल्या ओल्या नारळांचा कीस तरी पदार्थांवर असतो नाहीतर त्याच नारळाच्या दुधाच्या रस्स्यात (gravy) हे पदार्थ बनतात. सोबतच कढीपत्त्याची फोडणी आणि मूळ पदार्थांची चव हरवणार नाही इतपतच घातलेले मसाले आणि तिखट. आजकाल विदर्भासकट महाराष्ट्रात सर्वत्रच तिखट आणि तेलकट म्हणजेच चविष्ट अशी समजूत दृढ होताना दिसतेय त्यांनी आवर्जून हे मलाबारी पदार्थ खाऊन बघावेत.






पु ल देशपांडे म्हणतात "आधीच मेल्या कोंबडीला भरमसाठ मसाल्यांखाली गुदमरवून मारण्यात काय हशील आहे ?" शाकाहारी असल्याने मी तसेच म्हणेन की आपण खातोय ती भाजी फुलकोबीची आहे की बटाट्याची आहे की दुधीची आहे ? हे खूप तिखट आणि मसाल्यांमुळे कळतच नसेल तर ती भाजी खायची तरी कशाला ? नुसत्या ग्रेव्हीशी पोळी खावी.
- "अन्न हे पूर्णब्रह्म" मानून अन्नाच्या चवीत फार न अडकणारा पण उत्तम पदार्थांचा मनापासूनचा प्रशंसक आणि याक्षेत्रात उगाच रूढ होऊ पाहणार्या काही रूढींचा विरोधक प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Wednesday, June 26, 2024

राजमलाईः बालपणीच्या हरवलेल्या चवीचा धांडोळा आणि त्याला मिळालेले यश.

आमच्या बालपणी तत्कालीन मध्यमवर्गीय कुटुंबातल्या शाळकरी मुलांसाठी खाऊसाठी खालीलप्रमाणे पर्याय होते.

१. पारले किस्मीचे छोटे चाॅकलेटस (मला वाटतं १० पैशांना एक असे ते मिळायचेत). ते छोटे चाॅकलेटस आणि त्यावरील लाल काळे रॅपर्स इतक्या वर्षांनंतर अजूनही तसेच आहेत.
२. १० पैशांना १० या दराने मिळणार्या, काचेच्या बरणीत भरलेल्या गोडमिट्ट गोळ्या. यांना "दुधाच्या गोळ्या" असे नाव का पडले ? हा आजतागायत मला पडलेला प्रश्न आहे. या प्युअर साखरेच्याच गोळ्या असायच्यात. त्यांचा रंग दुधासारखा असायचा म्हणून दुधाच्या गोळ्या म्हणण्याची पध्दत पडली असावी. त्यांच्या काही बहिणीही हिरवा, निळा, पिवळा, तांबडा रंग लेवून त्यांच्या आजुबाजूच्या बरण्यांमध्ये असायच्यात. पण त्या सुध्दा "दुधाच्याच गोळ्या"च. "ओ काका, ती निळी दुधाची गोळी द्या" असे आम्ही आणि आमचे टिंगेटांगे मित्र पायाच्या टाचा उंचावून दुकानाच्या काऊंटरपर्यंत कसेबसे पोहोचून त्या दुकानदार काकांना सांगत असल्याचे चित्र आत्ताही डोळ्यासमोर तरळतेय.
३. १० पैशांना ५ या दराने वगैरे मिळणार्या संत्र्याच्या फोडीच्या आकाराच्या, थोड्या भडक केशरी रंगाच्या आणि संत्र्याच्याच चवीच्या संत्रागोळ्या. या गोळ्या जास्त करून प्रवासी मंडळींमध्ये लोकप्रिय होत्या. बिस्लेरी, पाणी पाऊच वगैरेंचा शोध लागण्यापूर्वीचा तो काळ. प्रवासातली तहान या संत्रा गोळ्या चघळल्याने भागत असते. मध्येच कुठे स्थानकावर बस, रेल्वे वगैरे थांबली तर खाली उतरून आपापल्या फिरकीच्या तांब्यात, वाॅटरबॅगमध्ये नळावरचे पाणी भरून घ्यायचे किंवा तिथल्या नळाला ओंजळ लावून तसेच पाणी पिऊन घ्यायचे. स्टँडवर हे संत्रागोळीवाले भरपूर जण यायचेत.
४. ऐंशीच्या दशकात कॅडबरीच्या फाइव्ह स्टार चाॅकलेटचे दर्शन टी व्ही वरल्या जाहिरातींमुळे झाले होते खरे. पण टी व्ही वर ते माॅडेल हे चाॅकलेट त्यातले ते तार तार ओढून खाताना बघितले की घरच्या मोठ्यांच्या तोंडून "छी बाबा, काय तार तार घाणेरडे खातात !" असे निषेधात्मक उदगार दरवेळी निघायचे. आमच्या मनात "आम्हाला तुम्ही हे चाॅकलेट घेऊन तर द्या आधी. आम्ही तसे तार तार न ओढता गुपचुप तोंड मिटून खाऊन टाकू. त्याची चव तर कळू द्या आधी." असे विचार यायचेही. पण हे विचार प्रगट करण्याची आमच्यापैकी कुणाचीच प्राज्ञा, बिशाद नव्हती. हे मनातले मांडे (फाइव्ह स्टार) आम्ही मनातच खाल्लेत. तत्कालीन मध्यमवर्गीय घरे, घरातल्या स्वतःच्या आणि इतर आसपास असणार्या मुलांची संख्या आणि केवळ "मी माझा" करण्याची नसलेली वृत्ती यामुळे हे फाइव्ह स्टार चाॅकलेट मध्यमवर्गीयांसाठी न परवडणारी चैन होती.
जागतिकीकरण बरेच स्थिरावल्यानंतर बर्याच उशीरा हे फाइव्ह स्टार स्वकमाईने खाल्ले. पण तोवर कॅडबरीच्यच डेअरी मिल्क ची चव तोंडात बसलेली असल्याने फाइव्ह स्टार ची चव तितकिशी भावली नाही. लहानपणी आपल्याला हे चाॅकलेट न देऊन परिस्थितीने आपल्यावर फार मोठा अन्याय केला होता ही भावना मनात येण्यापूर्वीच विरून गेली.
५. साधारणतः १९७९ - ८० च्या सुमारास नागपुरातल्या महाल भागात असलेल्या मेसर्स गोविंद दिनकर गोखले अॅण्ड सन्स या किराणा दुकानात "राजमलाई" चे आगमन झाले. आमचे दादा खूप हौशी होते. त्यामुळे आम्ही न मागता सुध्दा आमच्याकडे "राजमलाई" आली आणि तिच्या चवीमुळे त्याकाळच्या नागपूर आणि विदर्भातल्या सगळ्या लहान मुलांच्या मनात तिने आपले सर्वोच्च आणि अढळ स्थान निर्माण केले. वर्धेजवळील दहेगाव इथे असलेल्या "केळकर गृह उद्योगा"चे उत्पादन असलेली, खव्याच्या - दुधाच्या मिश्र चवीची राजमलाई त्याकाळच्या अनेकांच्या हृदयात, मनात आणि जिभेवर जाऊन बसली. तिने आपल्या चवीचे प्रिंट त्याकाळच्या प्रत्येक लहान मुलाच्या मेंदूवर छापले. खूप उत्तम चवीचा अमीट ठसा राजमलाईने नागपूर आणि विदर्भात उमटवला.
राजमलाईचे यश पाहून केळकरांनी मधल्या काळात "काजूमलाई" पण आणली होती. पण थोरलीची सर धाकलीला कधी आलीच नाही.
केळकर गृह उद्योग विस्तारू लागला. केळकरांची बोरकूट (अजूनही नागपूरवरून मुंबईला रेल्वेन निघालो की वर्धा स्टेशन सोडल्यानंतर माझी नजर डावीकडल्या खिडकीतून दहेगावकडे झेपावत असते, दहेगाव स्टेशनला लागूनच असलेला केळकर गृह उद्योग, त्यांच्या बोरकूट वाळवणासाठीच्या विशाल टाक्या, त्यात वाळत असलेला टनभर बोरकूट पाहून मन आजही आनंदून जाते, मी बालपण पुन्हा जगतो.) विविध लोणची वगैरे अनेक उत्पादने येऊ लागलीत. मधल्या काळात आम्हीही शिक्षणासाठी, नोकरीसाठी नागपूर सोडले. राजमलाई इतरत्र कुठेच मिळाली नाही.
जवळपास एक दीड तपाने नागपुरात परतलो. राजमलाइचा अनेकवेळा शोध घेतला. बर्याचदा राजमलाई मिळाली सुध्दा. पण बालपणीची चव हरवली होती. आज केळकरांकडला त्या चवीचा फाॅर्म्युलाच हरवला होता की आमच्या जिभेवरच्या टेस्टबडसची संरचना बदलली होती हे ठरवणे अवघड झाले होते. खूप शोध घ्यायचो. दरवेळी राजमलाई मिळाली की आवर्जून घ्यायचो आणि खालल्यानंतर मूळ चवीच्या अभावाने निराश व्हायचो.
ती परिसाच्या शोधात असलेल्या माणसाची गोष्ट नाही का ? एका हातात लोखंडी कांब घेऊन जंगलातला प्रत्येक दगड त्या लोखंडाला लावत तो बघत असतो. ज्या दगडाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने झाले तो परिस. आणि तो परिस आपण आपल्याकडे जपून ठेवायचा असे तो ठरवतो. पण हजारो लाखो दगड हातातल्या लोखंडाला लावूनही लोखंड जसेच्या तसेच असलेले पाहून तो निराश होतो. तसे आम्ही या राजमलाईच्या मूळ चवीच्या शोधात निराश झालो होतो.
पण परवा मात्र कमालच झाली. आमच्या कुंडलीत काही ग्रह अचानक उच्चीचे झाले म्हणा, अचानक चांगल्या स्थानांच्या, उत्तम ग्रहांच्या लाभी महादशा सुरू झाल्या म्हणा. आम्हाला आमच्या घराजवळच्या दुकानात ही राजमलाई दिसली. थोड्या निराशेनेच खरेदी करून घरी आणली आणि एक तुकडा तोडून तोंडात टाकला आणि...
मेंदूतले ४४ वर्षांपूर्वीचे टेस्टबडस न्युराॅन्स सक्रिय झालेत. मेंदूत नोंदल्या गेलेल्या चवीने "तीच ही चव. अगदी तीच." असे व्हेरीफीकेशन दिले आणि प्रा. राम प्रकाश किन्हीकर इयत्ता चौथीतले कुमार राम प्रकाश किन्हीकर झालेत.
गेलेल्या बालपणाशी, तारूण्याशी जोडून ठेवणारे मनावर कोरून ठेवलेले हे दुवे. कितीही विसरतो म्हटलं तरी आपल्याला विसरू थोडीच देणार आहेत ? आपल्या या भूतलावरच्या अस्तित्वाबरोबरच आपल्या आतले यांचे अस्तित्व संपणार, खरंय ना ?
- या जगातल्या भरपूर लौकिक गोष्टींमध्ये न रमलेला पण काहीकाही गोष्टीत प्राचार्य राम शेवाळकरांच्या कवितेप्रमाणे "येथल्या खेळात पाची प्राण माझे गुंतलेले" या भावनेने खूप अटॅच्ड असलेला एक मनस्वी मनुष्य, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.