Showing posts with label Konkan Railway. Show all posts
Showing posts with label Konkan Railway. Show all posts

Sunday, December 10, 2023

धिटाई खाते मिठाई...

मी माझ्या मागील लेखात माझ्या नागपूर ते गणपतीपुळे प्रवासासाठी नागपूर - मुंबई विदर्भ एक्सप्रेस आणि मुंबईवरून पुढे मांडवी एक्सप्रेसच्या प्रवासाचा उल्लेख केला आणि मला त्या प्रवासाचे नियोजन आठवले.


नागपूर - मुंबई विदर्भ एक्सप्रेस नागपूरवरून (तेव्हा) संध्याकाळी 5.15 ला सुटायची आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुस-या दिवशी सकाळी 6.50 ला पोहोचायची. तर मांडवी एक्सप्रेस मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून लगेच सकाळी 7.05 ला निघायची. त्यामुळे मधला वेळ हा फ़क्त 15 मिनीटांचा होता. विदर्भ मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फ़लाट 14 किंवा 15 वर जाणार तर मांडवी एक्सप्रेस फ़लाट क्र. 12 किंवा 13 वरून सुटणार. शिवाय मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर जिने चढ उतार करण्याची गरज नसल्याने या फ़लाटावरून त्या फ़लाटावर नुसते चालत जायचे असल्याने हे 15 मिनीटांचे बफ़र मला सुरक्षित वाटत होते. शिवाय विदर्भ एक्सप्रेस मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 95 % वेळा अगदी वेळेवर जात असल्याचा डेटाही माझ्या सोबत होता. म्हणून मी ही धिटाई करण्याचा निर्णय घेतला होता.


पण समजा प्रवासाच्या नियोजित दिवशी विदर्भ एक्सप्रेस 10 मिनीटे उशीरा मुंबई हद्दीत पोहोचली असती, तर दादर स्टेशनला उतरण्याचा माझा प्लॅन बी तयार होता. विदर्भ एक्सप्रेस दादर स्टेशनला सकाळी 6.35 ला पोहोचायची तर मांडवी एक्सप्रेस दादरला सकाळी सकाळी 7.15 ला यायची. तिथे मला जवळपास 40 मिनीटांचे बफ़र होते. विदर्भ एक्सप्रेस 10 ते 15 मिनीटे उशीरा मुंबई हद्दीत आली असती तर मी दादरला उतरण्याचा निर्णय घेतला असता. दादरला मध्य रेल्वेच्या फ़लाट 6 वरून फ़लाट 5 वर जिना चढ उतार करून जावे लागले असते पण तेवढे बफ़र माझ्याकडे होते.


जर त्याहून वाईट स्थितीत विदर्भ एक्सप्रेस मुंबई हद्दीत 30 मिनीटे ते 1 तास उशीरा आली असती तर माझा प्लॅन सी तयार होता. त्या परिस्थितीत मी ठाण्यालाच उतरलो असतो. ठाण्याला विदर्भ एक्सप्रेस पहाटे 5.50 ला यायची तर मांडवी एक्सप्रेस तब्बल सकाळी 8.00 वाजता यायची. त्यामुळे विदर्भ एक तासभर उशीरा आली असती तरी चालण्यासारखे होते.


हा सगळा खटाटोप नागपूर ते रत्नागिरी हा प्रवास 20 तासात अतिजलद होण्यासाठी आणि मांडवी एक्सप्रेसच्या बहुचर्चित पॅण्ट्री कार मधले विविध पदार्थ चाखण्यासाठी होता. शिवाय कोकण रेल्वेचा प्रवास हा भरदिवसा करण्यातच खरी मजा आहे. कुतुबमिनारपेक्षा जास्त उंचीच्या 10 पिलर्सवर तोलला असलेला पानवलचा पूल, आशिया खंडातला दुस-या नंबरचा 6.5 किलोमीटर लांब असलेला करबुड्याचा बोगदा आणि कोकणचे अमर्याद असलेले सगळे निसर्गसौंदर्य बघायचे तर दिवसाच हा प्रवास व्हायला हवा हा माझा आग्रह. यासाठी विदर्भ एक्सप्रेस - मांडवी एक्सप्रेस यातल्या कमी वेळाची ही रिस्क घ्यायला मी आणि माझे कुटुंब तयार झालो होतो. मुंबई हद्दीत शिरल्याशिरल्या वेळाचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे प्लॅन ए - बी - सी निवडून ऐनवेळी सामानसुमान घेऊन पळापळ करायला आम्ही सगळेच मानसिकरित्या तयार होतो. पळापळ काही मिनीटांसाठी होईल पण हे विलक्षण अनुभव आयुष्यभरासाठी सोबत राहतील ही माझी आणि माझ्या जीवनसंगिनीची मनोधारणा होती. त्यामुळे आम्ही ही धिटाई केली आणि तशी मिठाई खाल्ली.






आज नागपूरवरून कोकणात जाणारी मंडळी हा विदर्भ एक्सप्रेस - मांडवी एक्सप्रेस हे कनेक्शन यातल्या रिस्कमुळे घ्यायला तयार होत नाहीत. यातले प्लॅन ए - प्लॅन बी - प्लॅन सी त्यांना समजावून सांगूनही त्यांची ही रिस्क घेण्याची तयारी नसते. मग त्यातली बहुतांशी मंडळी नागपूर ते पुणे हा प्रवास बसने - रेल्वेने करून पुण्यावरून रात्री निघणा-या एखाद्या बसने कोकण / गोवा गाठतात. गंतव्य गाठण्यात मजा असते पण प्रवासातच खरी मजा येते हे त्या मंडळींना पटतच नाही. त्यामुळे कोकणात एखाद्या ठिकाणी पोहोचण्याआधी प्रवासातले कोकण ही मंडळी बघतच नाहीत. दोन दिवस एखाद्या ठिकाणी गेले. तिथे रमले आणि परतले एव्हढाच यांचा अनुभव मर्यादित असतो. म्हणूनच मला क्षणात इकडून तिकडे नेणारा विमानप्रवासही तितकासा भावत नाही. अगदी आवश्यक असल्याशिवाय विमानप्रवास टाळण्याकडे माझा कल असतो.




आता नागपूरवरून कोकण रेल्वे मार्गाने थेट मडगावला जाणारी एक्सप्रेस सुरू झालेली आहे. ती गाडी पनवेलला पहाटे पोहोचते आणि कोकणातला प्रवास दिवसा करते खरी पण ती आठवड्यातून दोनच दिवस धावते. आणि पनवेलपर्यंत वेळेत येणारी ही गाडी पनवेलनंतर कोकण रेल्वेत खूप रखडते. त्यामुळे इतर दिवशी हा प्रवास करण्यासाठी, कोकणातला खरा अनुभव घेण्यासाठी थोडी धिटाई आवश्यक आहे असे माझे मत आहे. ही धिटाई नको असेल तर आदल्या दिवशी मुंबईत येऊन, हॉटेलमध्ये किंवा कुणा नातेवाईकाकडे मुक्काम ठोकून दुस-या दिवशी सकाळच्या गाड्या आरामात पकडता येईल. पण यात हॉटेलचा खर्च, नातेवाईकांना होणारी अडचण वगैरे गोष्टी येतीलच.


- प्रवासात अत्यंत धीट आणि आपल्या सहप्रवाशांना व्यवस्थित सांभाळून घेऊन कमीत कमी धोक्यात जास्तीत जास्त धाडसी व सुंदर प्रवास आखणारे, प्रवासी पक्षी प्रा, वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Saturday, December 9, 2023

कोकण रेल्वेची रो - रो सेवा.

दिनांक 19/02/2009.


नागपूर ते गणपतीपुळे मार्गे मुंबई या प्रवासात आम्ही. नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई हा प्रवास विदर्भ एक्सप्रेसने आणि पुढचा प्रवास हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई वरून लगोलग 10 मिनीटात सुटणा-या मांडवी एक्सप्रेसने. 







मांडवी एक्सप्रेस ही आम्हा रेल्वेफ़ॅन्समध्ये खादाडीसाठी जास्त ओळखली जाते. हिला आम्ही सगळे "फ़ूडी एक्सप्रेस" म्हणतो. काय आहे. मराठी शब्दांना इंग्रजीचा साज चढवला की बेटे कसे भारदस्त आणि वेगळेच वाटतात. जरा प्रतिष्ठित वगैरे वाटतात. आता हेच बघा ना. "खादाड" हा मराठी शब्द कसा थोडा अपमानास्पद वाटतो. पण त्याचा इंग्रजी पर्याय "फ़ूडी" कसा सन्मानजनक वगैरे वाटतो. प्रयोगच करायचा असेल तर एखाद्या व्यक्तीला त्याच्या / तिच्या तोंडावर फ़ूडी म्हणून बघा आणि नंतर खादाड म्हणून बघा. दोन्ही वाक्यांनंतर त्या व्यक्तीची प्रतिक्रिया किती वेगवेगळी येते ते बघा.


तर सांगायचा मुद्दा हा की मांडवी एक्सप्रेसमधून खाण्यापिण्याच्या पदार्थांचा आस्वाद घेत आम्ही चाललेले होतो. मांडवी एक्सप्रेसमधले पॅंट्री कारमधून आलेले पदार्थ हे खरोखर भारतातल्या काही काही राजधानी एक्सप्रेसमधल्या पॅंट्री कारमधून आलेल्या पदार्थांपेक्षा उत्तम दर्जाचे असतात. स्वच्छता आणी चव यांचे इतके गूळपीठ मी राजधानी एक्सप्रेस आणि मांडवी एक्सप्रेसखेरीज इतरत्र कुठेही बघितलेले नाही.





कोकण रेल्वेच्या कोलाड रेल्वे स्टेशनवर मांडवी एक्सप्रेस क्रॉसिंगसाठी थांबली होती. एकमार्गी रेल्वे असली की पुढून येणा-या गाडीला मार्ग देण्यासाठी थांबणे ही एक अपरिहार्य अडचण आहे. तसे त्यादिवशीही आम्ही थांबलेलो होतो. शेजारच्या ट्रॅकवर काहीतरी वेगळे होत असताना दिसले. मी आपला कॅमेरा सज्ज करीत कोचच्या दारात गेलो आणि कोकण रेल्वेने सुरू केलेला, खूप गाजावाजा झालेला रो - रो (रोल ऑन - रोल ऑफ़) सेवेचा व्हिडीयो काढण्यात आला.


1998 मध्ये कोकण रेल्वे सुरू झाल्यापासूनच तिचे विविध अभिनव उपक्रम हे माझ्या नेहेमी वाचनात असायचे. ते बघायला, अनुभवायला मिळायला हवेत ही मनोमन इच्छाही असायची. उदाहरणार्थ : "सुरक्षा धागा" हा मार्गावरील दरडी कोसळण्याची सूचना आधीच्या स्टेशन्सना देणारा प्रकल्प, मार्गावरील ट्रक्सची वाहतून रेल्वेने करून रस्ते मार्गावरील ट्रक्स कमी करणारी ही रो - रो सर्व्हिस, एकाच मार्गावरील समोरून येणा-या गाड्यांची टक्कर टाळणारी प्रणाली वगैरे. त्यातली ही रो - रो सेवा बघण्याचा आज योग आला. 


कोकण रेल्वेमार्गावरील कोलाड ते मंगळूरू या 780 किमीच्या मार्गावरील प्रत्येकी 2 - 2 ट्रक्स रेल्वेच्या एका फ़्लॅट बेड वॅगनवर आणून 50 फ़्लॅट बेड वॅगन जोडलेल्या एका मालगाडीतून साधारण 100 ट्रक्सची वाहतूक कोकण रेल्वे करत असते. कोलाडला एकदा का आपला ट्रक त्या वॅगनवर आणून तिथल्या साखळदंडांनी वॅगनला जोडला की ट्रक ड्रायव्हर्स, क्लीनर्स आराम करायला, जेवण वगैरे करायला मोकळे. शिवाय रेल्वेचा वेग हा रस्ते मार्गावरील ट्रक्सच्या वेगापेक्षा जास्त असल्याने ही वाहतूक जलद होणार, रस्तावरील हे 100 ट्रक्स कमी झाल्याने प्रदूषण कमी होणार, अपघात कमी होणार, इतर वाहनांना रस्ता मोकळा मिळणार हे फ़ायदे तर आहेतच आणि मंगळूरूला पोहोचल्यानंतर या 10 -12 तासात विश्रांती मिळालेले हे ट्रक ड्रायव्हर तिथून कर्नाटक - केरळ मधल्या आपापल्या गंतव्य स्थानी लगोलग रवाना होऊ शकणार म्हणजे वेळेची अधिक बचत.


ट्रकमालकांचाही इंधनाचा खर्च वाचतो. त्याच्या फ़क्त काही टक्के रक्कम या रो - रो वाहतूकीसाठी रेल्वेला देण्याच्या भाड्यापोटी खर्च होते. ट्रक्सच्या टायर्सची, इंजिनाच्या इतर भागांची झीज कमी होते हा वेगळा फ़ायदा. रेल्वेने कोलाड आणि मंगळूरू ला या ट्र्क्सच्या चढ उतारासाठी विशेष प्रकारचे प्लॅटफ़ॉर्म्स बांधून घेतलेले आहेत.


एक अभिनव सेवा इतक्या जवळून बघायला, अनुभवायला मिळाली हा आनंद. व्हिडीयो क्वालिटी तितकीशी उत्कृष्ट नाही. पण ब-यापैकी आहे. गोड मानून घ्यावा. (लिंक इथे आणि इथे)



- भारतीय रेल्वेच्या खूपशा गोष्टींचे कौतुक असणारा रेल्वेफ़ॅन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर. 

Tuesday, August 9, 2022

महाराष्ट्रातले रखडलेले रेल्वे प्रकल्प आणि सर्वसामान्य जनतेला पडलेले काही प्रश्न. - 5 (कोकण)

 यापूर्वीचे लेखांक इथे वाचा. 


महाराष्ट्रातले रखडलेले रेल्वे प्रकल्प आणि सर्वसामान्य जनतेला पडलेले काही प्रश्न. - 1 (विदर्भ)


महाराष्ट्रातले रखडलेले रेल्वे प्रकल्प आणि सर्वसामान्य जनतेला पडलेले काही प्रश्न. - 2 (मराठवाडा)





कोकणासारख्या निसर्गरम्य भागात पर्यटन आणि त्याच्यासह इत्तर बाबींचा विकास व्हावा आणि मुंबई ते मंगळुरू अंतर किमान १००० किलोमीटरने कमी व्हावे म्हणून कोकणप्रेमी रेल्वेमंत्री मधू दण्डवते यांनी कोकण रेल्वेची कल्पना मांडली आणि १९७७ ते १९८० पर्यंत जनता पक्ष सरकारच्या काळात ते रेल्वेमंत्री असताना प्रामाणिक प्रयत्नही केलेत. पण जनता पक्ष सरकार अल्पजीवी ठरले आणि हा प्रस्ताव थंड्या बस्त्यात गेला. 



१९९६ मधल्या वाजपेयी सरकारात रेल्वेमंत्री झालेल्या जॉर्ज फ़र्नांडिस यांनी मात्र हा प्रकल्प नेटाने पुढे न्यायचा ठरविला. दिवा ते रोहा मार्गे पनवेल हा मार्ग आधीपासूनच मध्ये रेल्वेकडे होता. या मार्गावर दिवा - रोहा ही पॅसेंजर गाडी आणि काही मालगाड्या यांची वाहतूक होत असे. शोले चित्रपटात दाखविलेला मालगाडीचा सीन, प्यार तो होना ही था या चित्रपटात दाखविलेला काजोल आणि अजय देवगणचा रेल्वेप्रवास हे दोन्ही पनवेल - उरण मार्गावरचे. त्याशिवाय दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे आणि इतर अनेक सिनेमात दिसलेली स्थानके ही दिवा - पनवेल मार्गावरचीच आहेत. मुंबईपासून इतक्या जवळ, शूटिंगसाठी इतके रिकामे असलेले रेल्वे स्टेशन फ़िल्लमवाल्यांना भावले नसते तरच नवल होते.



 
२६ जुलै १९९८ रोजी रोहा ते मंगळूर या ७६१ किमी रेल्वेमार्गाचे उदघाटन व लोकार्पण झाले. तोपर्यंत ८० च्या दशकात केरळातून शोरनूर मार्गे मंगळूर पर्यंत रेल्वेमार्ग येऊन पोहोचला होता आणि रोह्यापासून दासगावपर्यंत रेल्वेमार्ग आलेला होता. हजरत निझामुद्दीन ते मंगळूर मंगला एक्सप्रेस ही त्याकाळी इटारसी - नागपूर - वारंगल - विजयवाडा - इरोड - कोईंबतूर - शोरनूर - असे वळसा घालून मंगळूरपर्यंत पोहोचायची तर मुंबई - थिरूवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस ही पुणे - वाडी - गुंतकल - गुत्ती - रेणीगुंठा - इरोड - कोईंबतूर - शोरनूर असा वळसा घालायची. साधे मुंबईवरून गोव्याला रेल्वेने जायचे असेल तर पुणे - मिरज - बेळगाव - लोंडा - दूधसागर - मडगाव - वास्को द गामा असे जावे लागे. आता हा नवा मार्ग सर्वांना सोयीचा ठरणार होता. कोकण रेल्वे प्रकल्पासाठी मराठी जनांनी विशेषतः कोकणी माणसांनी खूप पाठपुरावा केला होता, खूप स्वप्ने पाहिली होती.



 
या मार्गावरचा रेल्वेमार्ग हा १६० किमी प्रतितास या वेगाने प्रवास करण्याजोगा राहील अशी घोषणा झाली होती आणि त्यादृष्टीने WDP 4 या डिझेल एंजिनाच्या गाडीसह काही चाचण्याही १९९७ मध्ये केल्या गेल्याचे स्मरते. भारतातला अत्याधुनिक असा पहिला खडीविरहीत रेल्वेमार्ग (ballast less track)  हा असेल अशी घोषणाही या निमित्ताने केली गेली होती. करबुडे चा ६.५० किमी चा आशियातला दुसरा नंबरचा बोगदा, पानवलचा ९४ मी (कुतूबमिनार फ़क्त ७३ मीटर उंचीचा आहे) उंचीचा दरीवरील पूल ही सगळी या प्रकल्पाची एकमेवाद्वितीय वैशिष्ट्ये कोकणी माणसाचा ऊर अभिमानाने भरून टाकत होती.
 
पण प्रकल्प पूर्ण झाला आणि भारतीय रेल्वेचे मराठी माणसाविषयीचे "प्रेम" पुन्हा दिसू लागले. या प्रकल्पाला लागलेला खर्च वसूल करण्यासाठी या मार्गावरील प्रत्यक्ष अंतराला ४० % अधिक करून त्यावर तिकीटे आकारल्या जाऊ लागली. म्हणजे १०० किमी प्रवास अंतरासाठी १४० किमी चे भाडे भरावे लागू लागले. त्याचेही काही नाही, मराठी माणसाने आपल्या स्वप्नपूर्तीच्या आनंदात हा अधिकचा भार सहनही केला असता पण या मार्गावरच्या गाड्या तर कोकणात थांबायला हव्यात ना ? चिपळूण, रत्नागिरी आणि कणकवली ही स्थानके सोडलीत तर नेत्रावती, मत्स्यगंधा, मंगला या गाड्या कुठेच थांबेनात. कोकणी माणसाचे नाव घेऊन तटवर्ती कर्नाटक आणि केरळ इथल्या रहिवाश्यांची मुंबई गाठण्याची सोय बघितली गेली. मुंबई - मडगाव जनशताब्दी ही तरी कोकणी माणसाच्या हक्काची गाडी असायला हवी होती पण तिचेही गाणे तेच. ठाणे - पनवेल - चिपळूण - रत्नागिरी - कुडाळ - कणकवली हेच थांबे.
 
दादर - रत्नागिरी (आता दादर - सावंतवाडी) पॅसेंजर सोडली तर कोकणी माणसाच्या कैवाराची एकही गाडी या मार्गावर नव्हती. एका गाडीत किती जणांची सोय बघणार ? आता कोकण कन्या आणि मांडवी एक्सप्रेस ही तशा लेकुरवाळ्या गाड्या आहेत पण इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या अपेक्षांना त्या कशा आणि कुठवर पु-या पडणार ?



 
या ७५० किमीच्या रेल्वेमार्गावर निसर्गानेही अन्याय केलाय. कोकणातला हलका, मऊ असा जांभ्या दगड, दर पावसाळ्यात ढासळणा-या दरडी, त्यामुळे बंद होणारा रेल्वेमार्ग. बरे एकदा एकाठिकाणी दरड कोसळली की अन्य मार्गांचा वापर करण्याचे सुखही नाही कारण रोह्यानंतर या मार्गावरचे पुढचे जंक्शन आहे मडगाव. म्हणजे अगदी गोव्याकडून मुंबईकडे येणा-या गाडीला महाडजवळ गोरेगावपाशी जरी या  मार्गावर काही प्रसंग ओढवला तरी पुन्हा मागे मडगावपर्यंत नेऊन लोंडा - बेळगाव - मिरज - पुणे मार्गे मुंबईला आणावे लागेल. एव्हढे सव्यापसव्य करण्यापेक्षा ती गाडी तिथेच रद्द करणे रेल्वेला सोयीचे होते. चिपळूण - कराड, कुडाळ - कोल्हापूर असे नवे रेल्वेमार्ग बांधले जायला हवेत, नवी जंक्शन्स निर्माण व्हायला हवीत.
 
आताशा कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण व्हायला लागलेय. या दुपदरीकरणाचा वेग वाढायला हवा आणि स्थानिकांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मुख्यालयातून निर्णय घ्यायला हवेत. आंब्यांच्या मौसमात कोकणचा हापूस देशभर लवकरात लवकर पोहोचेल अशी खात्रीशीर व्यवस्था अंमलात यायला हवीय. कोकणातून महाराष्ट्राच्या इतर भागात (विशेषतः विदर्भात) जाणा-या जास्त गाड्या सुरू व्हायला हव्यात तरच इथल्या पर्यटनाला अधिक चालना मिळेल आणि कोकण रेल्वेचे खरे सुख कोकणी माणसाला प्राप्त होईल असे वाटते.

                                                           - महाराष्ट्राभिमानी रेल्वे प्रेमी, प्रा. राम प्रकाश किन्हीकर.