Sunday, January 2, 2022

महाराष्ट्रातले रखडलेले रेल्वे प्रकल्प आणि सर्वसामान्य जनतेला पडलेले काही प्रश्न. - 3 (खान्देश)

महाराष्ट्रातले रखडलेले रेल्वे प्रकल्प आणि सर्वसामान्य जनतेला पडलेले काही प्रश्न. - 1 (विदर्भ)

महाराष्ट्रातले रखडलेले रेल्वे प्रकल्प आणि सर्वसामान्य जनतेला पडलेले काही प्रश्न. - 2 (मराठवाडा)


खान्देश हा अगदी पहिल्यापासून रेल्वेच्या मुख्य रेल्वे मार्गावर आहे. मुंबईवरून पूर्वेकडे आणि उत्तरेकडे जाणा-या गाड्या भुसावळ (जं) इथूनच आपापला मार्ग बदलतात. भुसावळ (जं) ला ९९ % गाड्या थांबतातच. भुसावळला रेल्वेची क्षेत्रीय प्रशिक्षण संस्थाही आहे. जळगाव वरून जळगाव - उधना - सूरत असा आणखी एक महत्वाचा मार्गही आहे पण खान्देश म्हणाल तर रेल्वेच्या बाबतीत फ़ारसा पुढारलेला म्हणता येणार नाही. गेल्या ३ - ४ वर्षात जळगाव - सूरत मार्गाचे दुहेरीकरण झालेय खरे आणि चाळीसगाव - धुळे मार्गावर पॅसेंजर ऐवजी डेमू लोकल चालायला लागली एव्हढाच फ़रक पडलाय. पण दुहेरीकरण होऊनही जळगाव - सूरत मार्गावर गाड्या फ़ारशा वाढल्या नाहीत. खान्देशाला त्याचा फ़ारसा फ़ायदा नाही तो नाहीच.



1. मागील लेखात प्रतिपादन केल्याप्रमाणे जर सोलापूर - औरंगाबाद - चाळीसगाव हा मार्ग अस्तित्वात आला तर खान्देशला तो जास्त लाभदायक ठरू शकेल.


2. मनमाड - मालेगाव - धुळे - इंदूर या मार्गाविषयी घोषणा तर झालीय पण सर्वेक्षणही गेल्या दोन वर्षात पुढे सरकलेले नाही. महाराष्ट्रातील इतर प्रकल्पांचा अनुभव लक्षात घेता हा प्रकल्प किमान २० वर्षे घेणार अशीच चिन्हे दिसत आहेत. खरेतर शिरपूर नंतर सातपुडा पर्वत रांग आणि इंदूरजवळ विंध्य पर्वत रांग हा या मार्गातला अडथळा ठरायला नको. डोगरद-यांमधून रेल्वेमार्ग बांधणीचे नवे तंत्रज्ञान आज भारतीय रेल्वेकडे आहे त्याचा पूर्ण उपयोग याठिकाणी व्हायला हवाय आणि हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हायला इथल्या लोकप्रतिनिधींनी जोर लावायला हवाय. 



3. नाशिक - डहाणू रेल्वेमार्गाविषयी सुद्धा सर्व लोकप्रतिनिधींनी दबावगट बनविणे आवश्यक आहे. पुणे - नाशिक - डहाणू हा रेल्वेमार्ग मुंबई उपनगरीय रेल्वेवरचा अतिरिक्त ताण कमी करणारा महत्वाचा दुवा ठरेल. पुणे - अहमदाबाद, पुणे - राजकोट, पुणे - दिल्ली या गाड्या कल्याण - कोपर - भिवंडी - वसई मार्ग टाळून मुंबईवरचा उपनगरीय वाहतुकीचा ताण दूर करतील.


4. जळगाव - उधना मार्गावरील दोंडाइचा पासून शहादा - खापर - देढियापाडा - राजपिपला - वडोदरा असा थेट मार्ग या आदिवासी भागाचा उद्धारकर्ता ठरू शकेल. या मार्गावर शहाद्याआधी सारंगखेड्याला तापी नदी आणि राजपिपलानंतर नर्मदा नदी ओलांडावी लागेल पण आता पूल बांधणीचे तंत्रज्ञान ब-यापैकी प्रगत झालेले आहे त्यामुळे चिंता नसावी. पण या रेल्वेमार्गामुळे महाराष्ट्रातल्या कायम उपेक्षित अशा या भागाचा विकास साधला जाऊ शकेल. जमल्यास हा मार्ग नवीनच तयार झालेल्या केवाडिया स्टेशनला सुद्धा सहज जोडता येऊ शकेल आणि सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याच्या दर्शनासाठी पूर्व भारतातून जाणा-या प्रवाशांसाठी सूरत - वडोदरा - केवाडिया हा जवळपास २०० किमी लांबीचा फ़ेरा वाचू शकेल.



ब्रिटीशांनी रेल्वेमार्ग आखताना नद्या कमीतकमी वेळा ओलांडाव्या लागाव्यात, डोंगर फ़ोडून सरळ जाण्यापेक्षा वळसा घालून जाण्यावर जास्तीत जास्त भर दिलेला होता. त्याकाळी कदाचित आजच्या इतके प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध नसेल किंवा ब्रिटीशांचा भारताच्या या सर्वांगीण विकासात तेव्हढा रस नसेल पण आज लोककल्याणकारी राज्यात तरी सर्व भौगोलिक घटकांचा आणि सर्व समाजघटकांचा विकास व्हावा ही अपेक्षा अनाठायी ठरू नये.


- महाराष्ट्राभिमानी रेल्वे प्रेमी, प्रा. राम प्रकाश किन्हीकर.

No comments:

Post a Comment