Saturday, January 22, 2022

दुरितक्षय

 आपण Outcomes Based System अगदी पुराणकाळापासून आपल्या आयुष्यात आचरलेली आहे. अगदी रोज प्रातःसंध्या करताना "मम शरीरशुद्ध्यर्थम भस्मधारणम अहम करिष्ये" हा संकल्प सोडून आपण भस्मधारण करतो. भस्मधारण का करतोय हे आपण आधीच जाहीर करीत असतो.

तसाच आणखी एक संकल्प म्हणजे "मम उत्पत्त दुरितक्षयद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम प्रातःसंध्या / सायंसंध्या अहम करिष्ये." म्हणजे माझ्याकडून जे काही दुरित झाले असेल त्याचा क्षय होण्यासाठी मी ही प्रातःसंध्या / सायंसंध्या करतोय हे Objective.

याचा आणखी खोलवर विचार करीत असताना माझ्या मनात आले की आपण सगळे सर्वसामान्य संसारी माणसे असे कुठले "दुरित" निर्माण करतोय की ज्याच्या नाशासाठी आपल्याला ही प्रार्थना रोज करावी लागते?

 याचा सूक्ष्म विचार केल्यावर लक्षात आले की आपण दुसर्या कुठल्या व्यक्तीचे मन कलुषित केले आणि त्या व्यक्तीला त्यामुळे त्रास झाला तर ते दुरितच. आपल्या कानभरण्यामळे  पती- पत्नीत, भावा - भावांमध्ये, जावा - जावांमध्ये, आई- मुलांमध्ये वितुष्ट आले तर ते आपले दुरितच. आणखीही एक सूक्ष्म विचार म्हणजे आपण जर कुणाविषयी आपल्या मनातल्या मनात जरी ईर्ष्या, व्देष करीत असू तरी ते आपल्याव्दारे या विश्वात निर्माण झालेले दुरितच.

 जर हे दुरित जर सगळ्यांच्याच मनातून नष्ट होणार असेल तर आपले जग सुंदर व्हायला किती वेळ लागणार आहे ?

 ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की आपल्याकडून अजाणतेपणी जर काही चुकीची गोष्ट झाली असेल तर आपल्याला कळल्यावर आपल्याला पश्चात्ताप झाला तर आपली कर्मशुध्दी होईल. पण कळत असताना, जाणतेपणी तरी, आपण हे दुरित वाढवू नये. आपल्याच मनाचा सूक्ष्म विचार करून हे दुरित आपल्या मनात निर्माणच होऊ नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे तर आज आपल्या हातात आहे ना ?

 आपण सर्व धार्मिक म्हणवणार्यांनी जर यादृष्टीने दृढ संकल्प केला तर माऊलींचे " दुरिताचे तिमिर जावो" हे स्वप्न साकार करण्यात आपलाही सक्रिय हातभार लागेल, नाही का ?

 - केवळ मनाच्या सूक्ष्म विचारांतून चित्तशुध्दी साधता येऊ शकेल या दृढ विचारांचा

विनोबाभक्तरामोबा किन्हीकर.

No comments:

Post a Comment