Monday, May 16, 2022

मुंज एक संस्कार : आधुनिक युगाचे चिंतन

 ४० वर्षांपूर्वीचा फोटो. १४ मे १९८२.




मी आणि माझ्या धाकट्या भावाची मुंज एकत्रच लागली.
त्यावेळेच्या साधेपणात पण भरपूर नातेवाईकांच्या गोतावळ्यात.
अगदी माझ्या म्हातार्या आज्यांनी बटूचे चरणतीर्थ घेणे, सौ. आईने चुरमुर्याच्या, शेंगदाण्याच्या आणि दाळ्यांच्या गूळमिश्रित मोठमोठ्या लाडवांची भिक्षावळ घालणे, बटूच्या काशीयात्रेची लुटुपुटूची तयारी, आदल्या दिवशी रात्री दंडात बेडकी भरतात या भीतीने महिनाभर आधीपासून सावध झालेली झोप (न जाणो, आपण झोपेत पार निसूर झालो आणि घात झाला तर या भावनेने) या सगळ्या गोष्टी तत्कालीन प्रथेप्रमाणे अगदी साग्रसंगीत पार पडल्यात.
अहेरात दादांच्या दोनतीन मित्रांनी संध्येची पुस्तके दिलेली होती. (तसा आजोळहून सोन्याच्या जानव्याचाही अहेर झाला होता म्हणा.) पण आमचे मातामह संध्या देवपूजा आदिंचे अगदी कर्मठ उपासक असल्याने मुंजेच्या दिवशी सायंकाळपासूनच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देखरेखीखाली संध्यावंदन सुरू झाले.
१९८९ ला कराडला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकायला जाईपर्यंत घरी माझी सकाळ संध्याकाळ संध्या सुरू होती. कराडला हाॅस्टेलला रहायला गेल्यानंतर त्यात सुरूवातीला काही महिने खंड पडला खरा पण हाॅस्टेलला समविचारी, समान कौटुंबिक, सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमी असणारे मित्र मिळालेत. भीड बुजली. आणि काही महिन्यानंतर प्रातःसंध्या आणि रोजची उपासना, पोथ्यापुराणे पुन्हा सुरू झाले ते आजतागायत.
आजकाल मुलांच्या मौंजीबंधनांनंतर ती मुले त्यादिवशी संध्याकाळची सुध्दा संध्या करीत नाहीत, दुसर्या दिवशी सकाळी बनियनसोबत जानवेही जे धुवायला जाते ते मग कुठल्यातरी धार्मिक प्रसंगाआधी एकदिवस पुन्हा असेच घातले जाते. जानवे बदलण्याचा, परिधान करण्याचाही एक विधी आहे, त्याचे मंत्र आहेत हे सुध्दा कुणाच्या गावी नाही.
याचा खोलात जाऊन विचार केला तर आपल्या लक्षात येईल की याला कारण तो बटू नसून त्याला मार्गदर्शन करण्यास उपलब्ध नसलेली आपली पिढी आहे. मला माझ्या मातामहांचे मार्गदर्शन लाभले आणि आईवडिलांनी त्या दंडकाचे पालन होतेय की नाही यावर कडक लक्ष दिले. आज किती पालक आपल्या पाल्यांना संध्यावंदन, त्याचा संपूर्ण विधी त्यामागील वैज्ञानिकता,त्यामुळे होणारे लाभ (आजकाल outcomes based education चा जमाना आहे, बाबा.) समजावून सांगायला तयार आहेत ? रोज सूर्योदय समयाला १५ मिनीटे आणि सूर्यास्ताला १५ मिनीटे देऊन आपल्या आणि आपल्या पाल्यांकडून संध्यावंदनासारखा अत्यंत प्रासादिक विधी करवून घेण्याची किती पालकांची तयारी आहे ? त्यासाठी पालकांना आणि त्यांच्या पाल्यांना मार्गदर्शन करण्याची किती ज्ञात्या ब्रम्हवृंदांची तयारी आहे ?
आपल्याला प्राप्त झालेला हा सांस्कृतिक वारसा पुढल्या पिढीपर्यंत पोहोचवण्यात आपण अपयशी ठरतोय हे आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीये का ?
- काळानुसार जगण्याचा परीघ अगदी जरूर विस्तारत जावा पण ज्या संस्कृतीला आपण केंद्रबिंदू मानून आपला परीघ विस्तारतोय त्यातली अत्यंत चांगली मूलतत्वे आपल्या आचरणातून सोडली तर गडबड होईल अशी ठाम धारणा असलेला,
आणि
ऊंच आकाशात विहार करताना आपल्या जमिनीशी नाते घट्ट ठेवायला हवेच या मूलतत्ववादी विचारसरणीचा, किन्हीकरकुलोत्पन्न रामभाऊ प्रकाशात्मज.

No comments:

Post a Comment