Saturday, February 25, 2023

वज्र, इंद्र आणि गरीब रथ : महाराष्ट्र एस. टी. ने घ्यावयाचा बोध.

 आपली महाराष्ट्र एस टी कल्पक आणि नवनवीन प्रयोगांच्यात कमी पडते.

लालूप्रसाद यादवांनी भारतीय रेल्वेत "गरीब रथ" हा प्रयोग आणून क्रांति घडवून आणली. रेल्वेच्या एसी थ्री टायरपेक्षा कमी पण शयनयान वर्गापेक्षा जास्त भाडे घेणारी ही सेवा. जेवढ्या गरीब रथ गाड्या देशात सध्या सुरू आहेत त्या सगळ्या फायद्यात चालताहेत.
एस टी ने ही नवीन एम एस बस बांधणी करताना "गरीब रथ" बस बांधावी. 3 x 2 , नाॅन पुशबॅक, बैठक व्यवस्था (एकूण ५५ प्रवासी + १ वाहक केबिनमध्ये) असलेली एयर सस्पेंशन वातानुकूल बससेवा तालुक्याच्या गावांना जिल्ह्याच्या गावाला जोडणारी किंवा दोन आसपासच्या जिल्ह्यांना जोडणारी असावी. (फार लांब पल्ल्याची नसावी.)



तिकीट दर जलद बसपेक्षा १० % जास्त पण निम आरामपेक्षा कमी ठेवावा.
ज्या मार्गांवर खाजगीवाले लोकांना निम्न दर्जाचे समजून वातानुकूल सेवा टाकत नाहीत, त्या मार्गांवर ही सेवा तुफान चालेल. (उदाः हिंगणघाट - नागपूर, पांढरकवडा - नागपूर)
आजकाल सगळ्याच ऋतूंमध्ये वातानुकूल प्रवासाचा कल लोकांमध्ये वाढतोय. धुळीचा, बाहेरील आवाजाचा त्रास न होता शांत प्रवास हा प्रवाशांची पसंती बनलाय. अशावेळी पटकन हालचाल करून पुन्हा मार्केट कॅप्चर करणे एस. टी. ला शक्य आहे.
शेजारील तेलंगण आणि आंध्र राज्यात "वज्र" आणि "इंद्र" या ब्रँडनावाने हा वातानुकूल साध्या बसचा प्रयोग यशस्वी होताना दिसतोय. तामिळनाडूने ही साध्या वातानुकूल बसेसचा प्रयोग केलेला आहे.
आपल्या महामंडळाने बोध घ्यावा.
तुम्हाला काय वाटतय मित्रांनो ?

- बसफ़ॅन राम किन्हीकर

No comments:

Post a Comment