Saturday, February 1, 2025

व्यक्ति तितक्या प्रकृती आणि तितक्याच प्रतिक्रिया

 

या बसकडे बघितल्यावर वेगवेगळ्या व्यक्तींची वेगवेगळ्या प्रकारची प्रतिक्रिया होईल.

आम्हा बसफॅन्सना ही बस पाहिल्यावर
"एकाच या जन्मी जणू फिरूनी नवे जन्मेन मी" ही ओळ आठवेल.

कारण ही बस महाराष्ट्र एस टी च्या मध्यवर्ती कार्यशाळा नागपूरने माईल्ड स्टील मध्ये साधी परिवर्तन बस म्हणून बांधण्याआधी पनवेलच्या अॅण्टोनी गॅरेजने बांधलेली निमआराम बस होती. निमआराम म्हणून तिच्या सेवेची वर्षे संपल्यानंतर नागपूर कार्यशाळेने तिला सध्याचे रूप दिले. एकाच जन्मात ती पुन्हा नव्याने जन्मली.
ब्युटी पार्लर मधले बारकावे जाणणार्या भगिनी वर्गाची प्रतिक्रिया
"अग बाई, तिच्या आयब्रोज *eye brows) किती छान कोरल्यात, न !"

अशी असू शकेल.

तर

विदर्भातल्या इच्चक पोट्ट्यांची प्रतिक्रिया
"अबे ते डिझेल भरल्यावर त्याच झाकण त लावत जा बे. पब्लिकचा माल हाये म्हनून सन्यान काई...ई करतेत ह्ये."
अशीही असू शकेल.
MH - 06 / S 8908
मूळ बांधणीः अॅण्टोनी बस बाॅडी बिल्डर्स, पनवेल. निमआराम बस. २ बाय २.
पुनर्बांधणीः एस. टी. ची मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूर. परिवर्तन बस. २ बाय २
अ. रिसोड आगार
रिसोड आगार, अकोला विभाग
शेगाव जलद रिसोड
मार्गेः बाळापूर - अकोला - पातूर - मालेगाव (जहांगीर) - शिरपूर (अंतरिक्ष पारसनाथ)
खरेतर बाळापूर ते पातूर हे सरळ अंतर फक्त ३० - ३५ किलोमीटर्स असताना ही बस अकोला मार्गे जवळपास ५० किलोमीटर्स लांबचा पल्ला घेऊन का जाते ? हे एक कोडेच आहे.
- एकाच वेळी बसफॅन, काकूबाई आणि इच्चक कार्ट्याच्या दृष्टीने विचार करू शकणारा सर्वसामान्य माणूस, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Thursday, January 30, 2025

भारतीय रेल्वे्मधल्या डब्यांची रंगसंगती : एक निराळा विचार

निळ्या रंगातली "राॅयल ब्लू" ही रंगछटा आपल्या नावाप्रमाणेच राजेशाही ऐश्वर्याचे प्रतिक आहे असे मला मनापासून वाटते आणि म्हणूनच भारतीय रेल्वेच्या "राजधानी" दर्जाच्या सुपर डिलक्स गाड्यांना ही राॅयल ब्लू छटा भारतीय रेल्वेने वापरायला हवी होती हे माझे प्रामाणिक मत आहे.



लाल, पिवळा यासारखे उष्ण रंग हे जोश, वेग दर्शवतात. ही लाल + पिवळी रंगसंगती भारतीय रेल्वेने शताब्दी, वंदे भारत सारख्या अतिजलद गाड्यांसाठी वापरायला हवी होती. पण रेल्वेने अगदी उलट केलेय. निळा रंग शताब्दीला ,पांढरा + निळा रंग वंदे भारत एक्सप्रेसला आणि लाल + पिवळा रंग मात्र राजधानीला दिलाय.(राजधानीच्या जुन्या ICF रेक्सना ही लाल + पिवळी / क्रीम रंगसंगती होती. आजकाल सगळ्यांनाच एकसुरी लाल + राखाडी LHB रंगसंगतीचे डबे मिळतात. खरेतर LHB कोचेसचा मूळ रंग निळा + राखाडी असाच होता. मुंबई - गोरखपूर एक्सप्रेसचे १० वर्षांपूर्वीचे LHB डबे याची साक्ष देतील. पण आता सगळे डबे एकजात एकाच रंगातले. )
मध्येच ममताबाईंनी आपल्या विक्षिप्त स्वभावासारखे विक्षिप्त रंगसंगतीतले डबे दुरांतो गाड्यांसाठी आणलेले होते. त्यात सौंदर्यदृष्टी काय होती ? हे कळणार्यांना उद्या "भिंत पिवळी पडली" हे सुध्दा एक सौंदर्यवाचक विधान आहे हे पटेल. (Ref: पु. ल. देशपांडे)
आताही महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या "डेक्कन क्वीन" एक्सप्रेससाठी खूप विचारमंथन करून, प्रवाशांची मते वगैरे मागवून(आणि त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करून) प्रवाशांची आवड जाणून घेऊन (किंवा जाणून घेतल्याचे यशस्वी नाटक करून) एका राष्ट्रीय दर्जाच्या संस्थेकडून भारतीय रेल्वेनी डेक्कन क्वीनची जी हिरवी + लाल + पिवळी रंगसंगती निश्चित केलेली आहे ती सौंदर्यदृष्ट्या किती भयाण आहे हे आपल्याला खालील फोटोवरून कळेलच.



रेल्वेने जबलपूर स्थानकावर एका जुन्या डब्याला उपहारगृहात बदलून ठेवलेले आहे. (हा असा प्रयोग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथेने केलेला आहे पण तिथे मात्र इतकी उठावदार संगसंगती नाही.) जबलपूर इथल्या कोचची रंगसंगती ही "राॅयल ब्लू" आणि त्यावर पिवळे / सोनेरी (Yellow Ochre) पट्टे ही किती डौलदार वाटतेय ते बघा. हीच रंगसंगती डेक्कन क्वीनसाठी किंवा इतर प्रतिष्ठित गाड्यांसाठी वापरायला हवी होती हे माझे प्रामाणिक मत आहे.

- National Institute of Design मध्ये शिकलो नाही तरी ड्राॅइंगच्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा पास केलेला आणि त्यादरम्यान रंगांची ओळख व चांगली / वाईट्ट रंगसंगती मनात पक्की केलेला सौंदर्यद्रष्ट्रा राम प्रकाश किन्हीकर. 

Saturday, January 25, 2025

भारतीय रेल्वेची "नाथाघरची उलटी खूण"

आजकाल एक्सप्रेस गाड्यांना सरसकट WAG 9 एंजिने मिळताहेत.

W - Wide Gauge (Broad Gauge)
A - AC traction
G - Goods train.
मालगाडीसाठी फिट असलेले, महत्तम वेग फक्त १०० किमी प्रतितास गाठू शकणारे हे एंजिन एक्सप्रेस गाड्यांना देऊन भारतीय रेल्वे नक्की काय साध्य करू पाहतेय कोण जाणे ? इकडे रेल्वेमार्ग १३० किमी प्रतितास वेगासाठी सिध्द करायचेत आणि एक्सप्रेस गाड्यांना असे फक्त १०० किमी प्रतितास वेग गाठू शकणारे एंजिन्स द्यायचेत यात काय मजा ?
आणि याउलट गोष्ट परवा बघायला मिळाली. मुंबई - हावडा मुख्यमार्गावर असलेले जलंब हे जंक्शन स्टेशन. इथून रेल्वेचा एक फाटा खामगावकडे जातो. जलंब ते खामगाव फक्त १२ किमी अंतर. खामगावच्या प्रवाशांना मुंबई किंवा हावड्याकडे जाण्यासाठी प्रत्येक महत्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना जोडायला खामगाव - जलंब - खामगाव अशा रेल्वे सेवा चालायच्यात.
एकेकाळी जलंब - खामगाव - जलंब अशी रेल बस सेवा चालायची. एका डब्याची आणि त्यातच ड्रायव्हर कॅब असणारी ही रेल बस साधारण ६० - ६५ प्रवाशांना वाहून नेऊ शकायची. या रेल बसचा फायदा म्हणजे खामगावला आणि जलंबला रेल्वे एंजिन काढून पुन्हा उलट्या बाजूने लावण्याचा सव्यापसव्य यात वाचत होता.



कालांतराने प्रवासी संख्येत वाढ झाली असावी. त्यामुळे रेल बस जाऊन तीन डब्यांची एक छोटीशी गाडी आली. या गाडीला सुरूवातीच्या काळात WAM 4 एंजिन लागायचे.
W - Wide Gauge (Broad Gauge)
A - AC traction
M - Mixed Traffic (Passenger as well as Goods train.)
WAM 4 एंजिनांचे आयुष्य संपल्यानंतर या गाडीला एसी आणि डीसी या दोन्हीही वीजप्रवाहावर चालू शकणारे असे कल्याण शेडचे WCAM 3 एंजिन मिळायला लागले. या प्रकारच्या एंजिनांची महत्तम वेगधारण क्षमता १०५ किमी प्रतितास होती. अर्थात अवघ्या १२ किमी प्रवासासाठी एंजिनाची महत्तम वेग धारणक्षमता १०० किमी प्रतितास असली काय ? किंवा १३० किमी प्रतितास असली काय ? काही फरक पडत नव्हता.
W - Wide Gauge (Broad Gauge)
C - DC traction
A - AC traction
M - Mixed Traffic
(Passenger as well as Goods train.)
परवा संध्याकाळी शेगाव वरून खामगावला गेलो. आमचे सदगुरू परम पूजनीय कृष्णदास माऊली आगाशे काका यांच्या समाधीस्थानाचे दर्शन घेतले. तिथून बाहेर निघतो न निघतो तोच रेल्वेगाडीचा हाॅर्न ऐकू आला. त्यांच्या समाधीस्थानालगतच हा जलंब - खामगाव रेल्वेमार्ग गेलेला आहे.
बघतो तो काय ? ही तीनच डब्यांची रेल्वे भुसावळ शेडच्या WAP 4 या एंजिनमागे अक्षरशः धडधडत येत होती.



W - Wide Gauge (Broad Gauge)
A - AC traction
P - Passenger Train Traffic
या प्रकारचा एंजिनांची महत्तम वेग धारणक्षमता १३० किमी प्रतितास असते. त्या अर्थाने या तीन डब्यांसाठी एंजिनाची ही शक्ती खूप जास्त होती. आम्हा रेल्वेफॅन्सच्या भाषेत "The train was overpowered."
दुःख या गाडीला WAP 4 मिळाल्याचे नाहीच. या मार्गावर धावणार्या ११०३९ / ११०४० महाराष्ट्र एक्सप्रेस, १८०२९ / १८०३० शालीमार - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस या गाड्यांना WAP 4 आवश्यक असताना त्यांना सातत्याने WAG 9 देणार्या आणि या गाडीला कुठलेही एंजिन चालू शकत असताना हिला इतका जास्तीचा पाॅवर असलेले एंजिन देणार्या नियोजनशून्यतेचे दुःख आहे.
- व्यक्तिगत असो वा सार्वजनिक, काटेकोर नियोजनाबद्दल आग्रही असलेला रेल्वेफॅन, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Friday, January 24, 2025

प्राणी, पक्षीसृष्टी आणि अध्यात्मिक अनुभूती

ती प्रभातीची होती वेळा ।

प्राची प्रांत ताम्र झाला ।

पक्षी किलकिलाटाला ।

करू लागले वृक्षावर ।।
श्रीगजाननविजय ग्रंथात केलेले हे वर्णन अनुभवण्याचा प्रसंग आला तो खुद्द श्रीगजानन महाराजांच्या शेगावातच, त्यांच्याच कृपाछत्राखाली उभ्या झालेल्या संस्थानाच्या भक्तनिवासाच्या आवारात.




आजकाल ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, मोबाईल टाॅवर्स रेडिएशनचे प्रदूषण अशा अनंत कारणांमुळे पक्षी मानवी सहवासापासून दूर जायला बघतात. पण इथे जवळपास दहा हजार लोकांचा नित्य राबता असूनही असे असंख्य पक्षी निर्भयपणे वावरताना, विहरताना आणि किलकलाट करताना दिसतात. या जागेतली अध्यात्मिक स्पंदने त्या मुक्या जीवांना जाणवलीत, भावलीत आणि म्हणूनच ते इथे रमलेत.
- अध्यात्मिक स्पंदने मानवांपेक्षाही अधिक तरलपणे जाणू शकणार्या प्राणी, पक्षी सृष्टीत रमणारा एक क्षुद्र मानवप्राणी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Friday, January 17, 2025

सायंकालिन उपासनेतले तात्विक विचार

दुकानातून अगदी पारखून, खूप सुवासिक म्हणून आणलेल्या, उदबत्तीचा सुवास आपल्याला फक्त त्या फोडलेल्या पुड्यातून लावलेल्या पहिल्या उदबत्तीपुरताच येतो. त्या पुड्यातल्या नंतरच्या उदबत्त्यांचाही तसाच सुवास येत असावा. पण आपले नाक त्या वासाला सरावल्याने आपल्याला जाणवत नाही.

तशीच एखाद्या खूप चविष्ट पदार्थाची चव पहिल्या घासापुरतीच. नंतरचे घास म्हणजे केवळ उदरम भरणम.
- सायंकालीन उपासनेत अनेक तात्विक विचार सुचणारे रामबुवा वेदांती.

बेळगाव: एक अनामिक ओढ असलेले गाव

 

"जिन लाहौर नही वेख्या वो जनम्याई नई" (ज्याने लाहोर बघितले नाही तो जन्मलाच नाही) असे म्हणतात खरे. स्वातंत्र्यपूर्वकाळात जन्मलेल्या पिढीला लाहोर शहराचे असे आकर्षण होते हे नक्की.
प्रभू श्रीरामपुत्र लव याच्या नावावरून लाहोर शहराचे नाव ठेवलेले आहे हे ऐकून तर या शहराविषयी एक निराळीच आत्मीयता निर्माण झाली. श्रीरामपुत्र कुशाच्या नावावरून आपल्या उत्तर प्रदेशातले कुशीनगर आहे. लक्ष्मणाचे (उत्तरेतला उल्लेख "लखन") लखनवा उर्फ लखनऊ ही शहरेही मनात विशेष स्थान निर्माण करून आहेत.
पण मला मात्र आस आहे ती बेळगाव बघण्याची. तिथली माती, तिथली थंड आल्हाददायक हवा, तिथले लोणी, तिथला गोड कुंदा आणि त्याहून गोड स्वभावाची तिथली माणसे हे सगळे याची देही याची डोळा मला अनुभवायचे आहे.
तसे २०१२ ला सांगलीवरून गोव्याला जाताना राजू शेट्टींच्या रस्ता रोकोच्या, जाळपोळीच्या (अव) कृपेमुळे आम्हाला मिरज - चिक्कोडी - निपाणी - बेळगाव मार्गाने गोव्यात प्रवेश घ्यावा लागला होता. तेव्हा रात्री ८ च्या सुमारास प्रवासात बेळगाव लागले खरे पण गोव्यात पोहोचण्याची त्वरा असल्याने बेळगाव "घडले" मात्र नाही.
फेसबुक, यू ट्यूब वर येणार्या ज्या ज्या व्हिडीओज, रील्समध्ये बेळगाव दाखवले आहे ते सगळे मी एका अनामिक आकर्षणापायी बघतो आणि ते शहर कसे असेल याचा मनातल्या मनात आराखडा तयार करतो. त्याला मनातल्या मनात अनुभवतो.
बेळगावात जाऊन तिथल्या अत्यंत थोर विभूती, गुरूमाय श्रीकलावतीदेवी यांच्या मठातही नतमस्तक होणे, जमल्यास तिथे वास्तव्य करणे हे ही माझ्या बकेट लिस्ट मध्ये आहेच.
पुलंच्या अंतु बर्व्याने जरी नातेवाईकांना "कोहीनूर" हिर्याबद्दल सांगून ठेवले होते तसे मी माझ्या मुलीला आणि नातेवाईकांना सांगून ठेवणार आहे.
"मी गेल्यानंतर पिंडाला कावळा नाही शिवला, तर "बेळगाव, बेळगाव" म्हणा. नक्की शिवेल." इतका माझा जीव अकारणच या शहरावर आहे.
- पुलंच्या रावसाहेबांसारखाच मराठी - कानडी असा अजिबात वाद न करता बेळगाव शहरावर आपल्या एखाद्या प्रेयसीवर करावे तसे मनोमन अव्यक्त प्रेम करणारा, एक अस्सल वैदर्भिय, नागपूरकर प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
बाय द वे, पुल ज्या काॅलेजात शिकवायचे ते काॅलेज, ठळकवाडीचे त्यांचे घर आणि रावसाहेब हरिहरांचे "रिटझ" थिएटर अजूनही आहे का हो बेळगावात ?
त्ये त्येवडं सांगून सोडा की वो. काय त ते हाय काय ब्याळगावात ? (शेवटला "त" संपूर्ण उच्चारायचा हं. हलन्त नाही)

Wednesday, January 15, 2025

चहा: पिण्याचे एक शास्त्र असत ते

 सकाळी उठल्या उठल्या पहिला चहा.


वर्तमानपत्र आल्यानंतर वर्तमानपत्र वाचताना सोबत चहाचा कप हवाच म्हणून आणखी एक चहा.


दूधवाल्याने सकाळी दूध दिल्यानंतर "नवीन"दूधाचा आणखी एक चहा. हे एक अवघड प्रकरण आहे. भलेही दूधवाल्याने दूध आदल्या दिवशीच काढून दुस-या दिवशी सकाळी आपल्याघरी विकायला आणलेले असो. 


शेजारचे काका सकाळी सकाळी वर्तमानपत्र वाचायला घरी आल्यानंतर त्यांच्यासाठी एखादा कप चहा. सोबत आपलाही अर्धा कप.


एकेकाळी असा अगदी "चहाबाज" असलेला मी आता दिवसेंदिवस चहा न घेताही राहू शकतो. सकाळी चहा घेतला नाही तर लगोलग डोके दुखायला लागणारा मी आता चहाशिवाय दिवसेंदिवस तसाच कसा राहू शकतो ? याचे माझे मलाच आश्चर्य वाटते.

काॅफी आणि चहाची चव वेगवेगळी आहे इतकाच फरक मला या दोघांमध्ये जाणवतो. पण काॅफी पिल्यावर एक वेगळी किक बसणे किंवा काॅफी पिताना आपण काहीतरी उच्चभ्रूपणा करतोय असे मला कधीच वाटले नाही. आमच्या बालपणी नेस्कॅफे वगैरे येण्याआधी किराणा दुकानांमध्ये काॅफीच्या छोट्याछोट्या वड्या मिळायच्यात. बालपणी काॅफी प्यायलो ती त्या वड्यांचीच.

चहा / काॅफी पिल्यानंतर काही काळ झोप येत नाही हे माझ्याबाबतीत तरी १०० % असत्य आहे हे मी स्वानुभवावरून प्रतिपादन करू शकतो. कितीही कडक चहा किंवा काॅफी पिल्यानंतर पाचव्या मिनिटाला मी गाढ झोपेत असू शकतो आणि ड्रायव्हिंग दरम्यान जागे रहाण्याची निकड आलीच तर कुठलीही चहा काॅफी न घेता मी टक्क जागा राहू शकतो.

कितीही चिनीमातीच्या अगर तत्सम सुंदर पदार्थांच्या कपबशा आल्यात तरी अशा तांब्या / पितळी / कास्यांच्या पेल्यांमधून चहा / काॅफी घेण्याची मजा काही औरच आहे.




या खालोखाल मजा म्हणजे टपरीवर चहा ज्यातून देतात त्या काचेच्या पेल्यांमधून चहा / काॅफी पिण्याची.

सगळ्यात नकोसा प्रकार म्हणजे कागदी कप.

आजकाल कागदी पेल्यांचा आकार लहान होत होत केवळ पोलियो डोस इतकाच चहा मावेल असे कप आलेत. अरे चहा / काॅफी अशी गटकन पिऊन टाकण्याची चीजच नाही रे. ती आस्वाद घेत घेत, हळुहळू प्यायची चीज आहे. पहिले दोन तीन घोट तर खरी चव कळायलाच लागतात. मग आपण त्यावर आपले मत बनवू शकतो. चहा / काॅफी ही टेस्ट मॅच सारखी आरामात आस्वादली पाहिजे. छोट्याशा कागदी पेल्यातून गटकन चहा पिणे म्हणजे टी - २०. आस्वाद घेतो घेतो म्हणेपर्यंत संपलेली.

कितीही सोयीचे म्हटलेत तरी अशा कागदी कपांतून चहा / काॅफी पिणे म्हणजे केवळ "उदरभरण" होईल. चहा / काॅफी पिताना "यज्ञकर्मा" चा अनुभव हवा असल्यास या प्रकारच्या पेला वाटीला पर्याय नाही. त्यातही स्टेनलेस स्टीलचा पेला ही केवळ सोय झाली. काषाय रंगाचा, तसल्याच धातूचा पेला वाटी म्हणजेच खरी मजा.



- फक्त चहा / काॅफीतच आनंद मानणारा आणि त्याचा रास्त अभिमान बाळगणारा
"Teetotaller", प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Wednesday, January 8, 2025

चिंतनक्षण - ८

 

"साधना म्हणजे अनेक अडथळ्यांची सात्विक शर्यतच आहे." - डॉ. सुहास पेठे काका


एखाद्या मुमुक्षूने साधना करायची ठरवली आणि त्यादृष्टीने पावले टाकायला सुरूवात केली की आपल्या सगळ्यांचा अनुभव असा आहे की त्यात अनेक अडथळे येतात. त्यातल्या अडथळ्यांचा आपण अधिक सूक्ष्म विचार केला तर आपल्या लक्षात येईल की यातले जास्तीत जास्त अडथळे केवळ आपल्या विचार करण्याच्या पद्धतीमुळेच आपल्या साधनेत येत असतात. त्या अडथळ्यांना कुठलीही बाह्य परिस्थिती जबाबदार नसते.


साधनेला सुरूवात केल्यानंतर आपल्यात सात्विक गुणांची वृद्धी होऊ लागते. राजस आणि तामस गुण हळूहळू क्षीण व्हायला सुरूवात होते. आणि नेमका हाच क्षण स्वतःला सांभाळण्याचा असतो. आपल्या सात्विकतेचा सुद्धा अहंकार आपल्याला आपल्या साधनेच्या उद्दिष्टांपासून दूर नेऊ शकतो. आपण आता अध्यात्मात "बन चुके" झालोय, अध्यात्मात आपल्याला बरेच काही साध्य झालेय हा अहंकार आपल्याला हव्या त्या दिशेने प्रगती करू देत नाही हे सर्व साधकांनी कायमच लक्षात ठेवायला हवेय.


म्हणूनच साधनेला सुरूवात केल्यानंतर साधकाने स्वतःच्या मनाला विशेष रूपाने जागृत ठेवून कुठलही अहंकार आपल्या मनाला शिवू नये हा विचार ठेवला तरच त्यांच्या साधना मार्गात अडथळे येणार नाहीत आणि साधकांना त्यांचे अंतिम ध्येय गाठता येईल.



- राम सदगुरू मायबाई महाराज "चिंतनक्षणांवर चिंतन" पौष शुद्ध नवमी शके १९४६ दिनांक ८ / १ / २०२५

Tuesday, January 7, 2025

चिंतनक्षण - ७

 

"कर्तृत्वाने हरला आणि ते माणसाला कळले म्हणजे भगवंताची कृपाच झाली म्हणायचे." - डॉ. सुहास पेठे काका


मनुष्य आपल्या कर्तृत्वावर फार विश्वास ठेवतो आणि माझ्या कर्तुत्वामुळेच माझ्या जीवनातल्या सगळ्या चांगल्या घटना घडत आहेत हे मानून चालतो. पण आपल्या लक्षात येईल की मनुष्य जीवनातल्या सगळ्या चांगल्या गोष्टींचे अगदी ९९ % श्रेय जरी त्या मनुष्याच्या कर्तृत्वाला दिले तरी त्यात उरलेला १ % त्याच्यावर असलेल्या परमेश्वरी आधाराचा भाग असतो. यात कापूस आणि ठिणगीचा दृष्टांत चपखल बसतो. अगदी १०० किलो कापूस जरी असला तरी तो स्वतःहून पेट घेणार नाही. पण त्यावर एका अर्ध्या ग्राम वजनाची ठिणगी जरी पडली तरी तो धडाडून पेटेल. तसे मनुष्याच्या ढीगभर कर्तृत्वाला कणभर तरी परमेश्वर कृपा आधाराला असतेच. 


पण ज्याक्षणी अशी कर्तृत्वावान माणसे जीवनात पराभवाला सामोरे जातात तेव्हा त्यांना फार विषण्णता येते. आपले नक्की काय चुकले हेच त्यांना कळेनासे होते. आपले कर्तृत्व कुठे कमी पडले याचाच ते गांभीर्याने विचार करू लागतात. 


ज्याक्षणी अशा कर्तृत्ववान मनुष्याना आपले कर्तृत्व आणि त्याला हवी असलेली परमेश्वरी कृपेची जोड यातला दुवा लक्षात येतो त्याक्षणी ती सगळी माणसे परमेश्वरी अनुसंधानासह पुन्हा आपापले कर्तृत्व गाजवायला सिद्ध होतात आणो पुन्हा नवी झेप घेतात. नवी क्षितीजे धुंडाळण्यासाठी, नव्या आकांक्षांना साकार करण्यासाठी. 


ज्यांना फक्त आपलया कर्तृत्वावरच विश्वास ठेवायचा असतो, त्यांना मात्र नक्की काय चुकले हे काळातच नाही आणि पुढला मार्ग सापडत नाही. म्हणजे आपले कर्तृत्व सर्व काही घडवू शकत नाही हे ज्या माणसाला कळले त्याचा पुढील अभ्युदयाचा मार्ग मोकळा होतो. म्हणून अशा मनुष्यावर भगवंताची कृपाच झाली असे म्हणावे लागेल.  


- राम सदगुरू मायबाई महाराज "चिंतनक्षणांवर चिंतन" पौष शुद्ध अष्टमी  शके १९४६ दिनांक ७/ १ / २०२५

चिंतनक्षण - ६

 

"प्रपंच मोडू नये व परमार्थ सोडू नये, हा आपला मध्यम मार्ग आहे. " - डॉ. सुहास पेठे काका


गृहस्थाश्रम हा सर्व आश्रमांना आधारभूत आहे हे जर खरे असले तरी त्यातच कायम गुरफटून राहणे हा काही ईश्वरप्राप्तीचा मार्ग नव्हे. "आधी प्रपंच करावा नेटका" हे जरी समर्थांनी सांगून ठेवले असले तरी त्यानंतर "मग साधी परमार्थ विवेका" हे सुद्धा त्यांनी सांगितलेच आहे. प्रपंच हा कितीही केला तरी पुरा होत नाही, त्यात खरे समाधान मिळत नाही हे मनुष्यमात्रांच्या आज ना उद्या नक्की अनुभवायला येतेच. पण तोवर उशीर होऊन गेलेला असतो. 


संसारातली आपली सगळी कर्तव्ये सोडून परमार्थात जाणे आणि साधू बनणे  हे सुद्धा सगळ्यांच्याच आवाक्यातले नाही आणि त्याचा आपल्या शास्त्रांनी निषेध सांगितला आहे. प्रपंचात रहात असताना परमार्थ विचार जागृत ठेवणे आणि आपली कर्तव्ये पार पाडत असताना भगवंत स्मरणात राहणे हे आपल्या शास्त्रांना मंजूर आहे किंबहुना अशा प्रकारच्या प्रपंचाला आपल्या शास्त्रांनी संन्यासाचे फळ सांगितलेले आहे. 


क्रिकेटमधले उदाहरण घेऊ यात. १ बाद २०० या धावसंख्येवर येऊन शतक झळकावणे आणि ५ बाद ६० या धावसंख्येवर येऊन आपल्या संघासाठी शतक झळकावणे यात श्रेयस्कर दुसरी परिस्थिती आहे. तसेच सर्वसंग परित्याग करून हिमालयात निघून जाणे आणि संन्यास घेणे ह्यात आणि संसारातल्या तापत्रयात राहून ईश्वराचे अनुसंधान ठेवणे यातही अधिक श्रेयस्कर दुसरी परिस्थिती आहे. म्हणूनच संसारात पूर्ण गुरफटून जाणे आणि सर्वसंग परित्याग करून केवळ परमार्थाच करीत रहाणे या दोन्ही टोकाच्या मार्गांपेक्षा संसारात राहून परमेश्वराचे अनुसंधान ठेवणे हा सर्व साधकांच्या आयुष्यातला मध्यम आणि श्रेयस्कर मार्ग आहे. 


- राम सदगुरू मायबाई महाराज "चिंतनक्षणांवर चिंतन" पौष शुद्ध सप्तमी शके १९४६ दिनांक ६/ १ / २०२५

Sunday, January 5, 2025

चिंतनक्षण - ५

 



"भक्ताला परिस्थिती अनुकूल - प्रतिकूल नसते तर ती भगवंताकडे जायला फ़क्त उपयुक्त असते" - डॉ. सुहास पेठे काका


भक्ताची वृत्ती एकदा भगवंताकडे दृढपणे लागली की या जगातल्या अनुकूलतेची किंवा प्रतिकूलतेची त्याला तमा नसते. असलेल्या कसल्याही परिस्थितीचा वापर करून घेऊन भगवंताची भक्ती करायची, आहे ती परिस्थिती ही माझ्या भगवत्भक्तीत साह्यकारीच ठरणार आहे असा ख-या भक्ताचा दृष्टीकोन असतो.


याबाबत तीन संतांचे उदाहरण आहे. श्रीतुकोबांनी "बरे झाले देवा बाईल कर्कशा" अशा शब्दात आपल्या पत्नीचे वर्णन केले आणि अशी पत्नी दिली म्हणून देवा मी तुझ्याकडे लक्ष देऊ शकलो नाहीतर संसारातच गुरफ़टून गेलो असतो, तुझा विसर पडला असता असे वर्णन केले.


संत एकनाथ महाराजांना एकाने विचारले की महाराज तुमचा परमार्थ इतका चांगला, नेटका कसा झाला ? त्यांनी उत्तर दिले की माझी पत्नी अतिशय सात्विक आहे आणि माझ्या अध्यात्मसाधनेत तिची पूर्ण साथ मला आहे.


समर्थ रामदासांना हाच प्रश्न कुणीतरी विचारला असता तर त्यांनी उत्तर दिले असते की मला पत्नी नव्हतीच त्यामुळेच मी फ़क्त परमेश्वराकडे पूर्ण लक्ष देऊ शकलो.


म्हणजे परिस्थिती वेगवेगळी असली, अनुकूल - प्रतिकूल असली तरी ख-या भक्ताच्या, भगवंतप्राप्तीच्या ध्येयाआड ती येत नाही. उलट असलेल्या परिस्थितीचा आपल्या ध्येयप्राप्तीसाठी वापर कसा करून घ्यायचा हे भक्ताला माहिती असते.



- राम सदगुरू मायबाई महाराज "चिंतनक्षणांवर चिंतन" पौष शुद्ध षष्ठी शके १९४६ दिनांक ५ / १ / २०२५

Saturday, January 4, 2025

चिंतनक्षण - ४

 


"बागेत लावलेल्या रोपाची आपण काळजी घेतो तेव्हढी तरी आपल्या साधनेतल्या संकल्पाची घ्यायला हवी." - डॉ. सुहास पेठे काका


जिज्ञासू साधक काहीतरी संकल्पाने साधना सुरू करतात खरे पण काही कारणांनी तो संकल्प पूर्णत्वास जायला अडचणी निर्माण व्हायला लागतात. परम पूजनीय ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात की संकल्प छोटा असावा पण तो शाश्वताचा असावा. आपण साधक आपल्या शक्तीला न बघता फ़ार मोठे संकल्प करतो मग ते सिद्धीला कसे जातील याची काळजी आपल्याला लागून राहते.


बागेत रोप लावले की त्याने मूळ धरून ते मोठे होईपर्यंत त्याला सतत जपत रहावे लागते. तसे साधकांनी आपापल्या संकल्पांना तो दृढ होऊन आपल्या वृत्तीत मुरेपर्यंत, आपल्या अत्यंत सवयीचा होईपर्यंत, आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होईपर्यंत जपत राहिला पाहिजे. त्या संकल्पाला फ़ळे धरेपर्यंत (अर्थात ख-या साधकाचा त्याच्या संकल्पाला फ़ळे आलीच पाहिजेत हा अट्टाहास कधीच नसतो म्हणा) तो संकल्प सगळ्या भल्या बु-या वासनांपासून दूर, गुप्त ठेवता आला पाहिजे, त्या संकल्पाला आपल्या रोजच्या उपासनेचे जल समर्पित करायला हवेच. मधेमधे त्या संकल्पात आपल्या सदचिंतनाचे खत आणि सदगुरू विश्वासरूपी खाद्य देता यायला हवे. त्या संकल्पात विकल्पाचे तण साठायला सुरूवात झालीच तर दृढ निश्चयरूपी खुरपण्याने ते काढून टाकता यायला हवे.


एकदा संकल्पाने दृढ मुळे धरलीत तो चांगला पक्का झाला की साधक ही त्याच्या साधनेत स्थिर होतो आणि मग त्याला त्याच्या साधनेपासून दूर करणा-या शक्ती त्याच्या ध्येयापासून विचलित करू शकत नाहीत.



- राम सदगुरू मायबाई महाराज "चिंतनक्षणांवर चिंतन"
पौष शुद्ध पंचमी शके १९४६ दिनांक ४ / १ / २०२५

Friday, January 3, 2025

चिंतनक्षण - ३

 


"शरणागती ही अवस्था आहे, काही साधण्याचा मार्ग नव्हे." - डॉ. सुहास पेठे काका


एखाद्या माणसाला किंवा सत्पुरुषाला आपण शरण जातो कारण तो त्याच्या जीवनात योग्य मार्गावर मार्गक्रमण करतो आहे याची आपल्याला खात्री पटलेली असते. आणि त्याला शरण गेल्यानंतर तो सत्पुरुष आपल्यालाही योग्य त्या  मार्गाने जाण्याचे मार्गदर्शन करेल आणि त्यायोगे आपलाही उद्धार होईल याची आशा आपल्याला असते.  

 

शरणागतीत हा अगदी सात्विक असला तरी थोडा स्वार्थाचा, स्वतःसाठी काहीतरी साध्य करण्याचा मार्ग आहे. अशा प्रसंगी परम पूजनीय ब्रह्मचैतन्य महाराजामचे सत्शिष्य श्री ब्रह्मानंद महाराज यांचे उदाहरण आपण सगळ्यांनी आदर्श म्हणून ठेवण्यासारखे आहे. बुवा त्याकाळी काशीला जाऊन उच्च विद्या प्राप्त करते झाले. संस्कृतात त्यांनी प्राविण्य मिळवले. इतरही अनेक विषयात ते प्रवीण झालेत. पण जेव्हा ब्रह्मचैतन्य महाराजांना त्यांनी बघितले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की परम पूजनीय ब्रह्मचैतन्य महाराजांकडे जे सामर्थ्य, जे समाधान, जे ज्ञान आहे ते त्यांच्याजवळ नाही. त्यांच्याजवळ केवळ स्वतःच्या लौकिक विद्येचा अभिमान आहे.

 

त्यांनी ब्रह्मचैतन्य महाराजांचे  पाय घट्ट पकडले आणि म्हणाले "तुझी सगळी विद्या मी आजपासून घेतली असे म्हणा तरच हे पाय सोडीन.मला या लौकिक विद्येचा उगाचचा भार झाला आहे. तो भार तुम्ही घेतो म्हणा." परम पूजनीय महाराजांनी त्यांना तसे वचन दिले आणि मगच त्यांनी परम पूजनीय महाराजांचे पाय सोडलेत.

 

ही शरणागती अपेक्षित आहे. मी शरण आलोय. मला काहीही नकोय. मोक्ष, मुक्ती  अशी माझी काहीही मागणी नाही. मी कुणीही नाही फक्त तूच आहेस हे मला पटलेय म्हणून मी शरण आलोय. मला तुझ्या पदरात घे ही शरणागती सदगुरुंना किंवा प्रत्यक्ष पॅरमेश्वरालाही अपेक्षित असते. ती साधल्या जायला हवी. काहितरी मिळवण्यासाठी, काही अंतस्थ हेतू (कितीही सात्विक असला तरी) साधण्यासाठी शरणागती नको.

 

- राम सदगुरू मायबाई महाराज "चिंतनक्षणांवर चिंतन"

पौष शुद्ध चतुर्थी शके १९४६ दिनांक / / २०२५

Thursday, January 2, 2025

चिंतनक्षण - २

 


"नामाचे खरे महत्व समजण्यास मानवी जीवनातील अपूर्णत्वाची कल्पना येऊन ते मान्य व्हावयास हवे." - डॉ. सुहास पेठे काका


परम पूजनीय ब्रह्मचैतन्य महाराजांनी आयुष्यभर नाम याच एका साधनाचा पुरस्कार केला. कलियुगात भगवंत प्राप्तीच्या इतर (तप, यज्ञ, याग इत्यादि) साधनांनी भगवंत प्राप्ती किती दुष्कर आहे आणि कलियुगात नाम या एकाच साधनाने भगवंत कसा सहज साध्य आहे हे परम पूजनीय महाराजांनी कायम प्रतिपादन केले.


मानवी जीवन अनेक अर्थाने अपूर्ण आहे. कलियुगात आपल्याला आयुष्य अत्यंत कमी आहे. या आयुष्यात आपण तप, यज्ञ याग इत्यादि साधनांनी भगवंत प्राप्ती करायची म्हटले तर अनेक जन्म जातील. बरे पुढल्या जन्मात मागील जन्माचे स्मरण, मागील जन्माची पुण्याई सोबत असेल तर मागील जन्माची तपश्चर्या पुढे चालू ठेवता येईल पण हे होईलच याची निश्चित खात्री नाही. त्यामुळे दर जन्मी असे भगवत्प्राप्तीची अनेक अपूर्ण प्रयत्न करून शेवटी भगवत्प्राप्ती होईलच याची खात्री नाही.


पण नामस्मरण हेच एक साधन या कलियुगात आपल्याला भगवत्प्राप्ती करून देऊ शकते. नामासाठी प्रत्येक मनुष्यमात्रांनी सर्वस्व द्यायला हवे. पण हे नामस्मरणाचे खरे महत्व आपल्याला तेव्हाच उमजेल जेव्हा आपण आपल्या मर्यादा, आपले अपूर्णत्व समजून घेऊ आणि याच जन्मात स्वतःचा सर्वार्थाने उद्धार करण्यासाठी योग्य प्रयत्न (नामाचा ध्यास) करू.



- राम सदगुरू मायबाई महाराज "चिंतनक्षणांवर चिंतन" पौष शुद्ध तृतीया शके १९४६ दिनांक २ / १ / २०२५

Wednesday, January 1, 2025

चिंतनक्षण - १

 

"साधना करणे हा माणसाला मिळालेल्या मर्यादित कर्मस्वातंत्र्याचा सर्वश्रेष्ठ उपयोग होय." - डॉ. सुहास पेठे काका


मनुष्य जन्माला आलो म्हणजे आपण सगळे मागील काहीतरी प्रारब्धभोग भोगायला आलेलो आहे. मग मागील जन्मातल्या चांगल्या कर्मांमुळे या जन्मात सगळे छान छान चालू असो किंवा गेल्या जन्मांमधील काही चुकीची कर्मे भोगायला लागल्याने या जन्मात काही भोग भोगायला लागलेले असोत. मग सगळेच जीवन असे पराधीन, गत जन्माधीन आहे का ? मग मानवाचे कर्तृत्व ते काय ? परमेश्वराने मनुष्यप्राण्याला जी विचार करण्याची, आपले कर्म निवडण्याची शक्ती दिलेली आहे ती काय फ़क्त आपल्या जीवनात घडत असलेल्या गत जन्मार्जित घटना मूकपणे बघण्यासाठी ?


"मागील जन्मी जे करावे, ते या जन्मी भोगावे, आणि ते भोगण्यासाठी यावे, जन्मा हा सिद्धांत असे" असे संतकवी दासगणू श्रीगजाननविजय ग्रंथात लिहून गेलेले आहेत. या जन्मात आलेलो आहोत तर कर्मे करावीच लागणार. कर्मे न करता कुणीही मनुष्यप्राणी राहू शकत नाही. मग नवी कर्मे म्हणजे नवे संचित, नवे काहीतरी भविष्य निर्माण होणार. कर्मे चांगली असोत किंवा वाईट ती पुढल्या जन्मात भोगावीच लागणार. नव्हे ती कर्मे भोगण्यासाठी जन्म घ्यावा लागणारच.


विचारी मनुष्याला पुढला जन्म नको असतो. या जन्म मरणाच्या फ़े-यातून विचारी मनुष्याला मुक्ती हवी असते. पण प्रत्येक कर्मातून काहीतरी नवे संचित निर्माण होऊन त्यातून नवा जन्म मिळणार असेल तर नक्की काय करावे. विचारी मनुष्याला आपली कर्मे करण्याचे स्वातंत्र्य असे मर्यादित आणि अडचणीचे असते.


म्हणून मनुष्याला जे थोडे कर्मस्वातंत्र्य मिळालेले आहे त्यात त्याने जर साधना केली तर त्याला कळून येईल की सगळी कर्मे जर ईश्वरस्मरणात केलीत, नामस्मरणात केलीत, कर्तव्य बुद्धीने केलीत आणि सर्व कर्मे ईश्वराला अर्पण केलीत तर आणि तरच त्याच्या संचितात नव्या कर्मांचा आणि त्यायोगे भोगाव्या लागणा-या ब-या वाईट फ़ळांचा संचय होणार नाही. हे ज्ञान, ही समज केवळ साधनेत राहिल्याने मनुष्याला कळू शकेल. आणि एकदा कर्माचा हा सिद्धांत आणि संचितातून मोकळे होऊन मुक्तीपथावर चालण्याचा आनंद जर मनुष्यमात्रांना कळला तर तो आपली साधना निरंतर सुरूच ठेवेल. साधना करणे हा मनुष्याला मिळालेला विशेष कर्तव्याधिकार आहे.


- राम सदगुरू मायबाई महाराज "चिंतनक्षणांवर चिंतन" पौष शुद्ध द्वितीया शके १९४६ दिनांक १ / १ / २०२५