Friday, September 5, 2025

नागपूर ते नाशिक, वंदे भारत एक्सप्रेसने ?




नाशिकला तातडीने जायचं होतं. पण नियमित गाड्यांच्या स्लीपर क्लासची, ए सी क्लासची आरक्षणे मिळालीच नाही्त.


आता माझ्यातल्या रेल्वेप्रेमीचा प्लॅन वेगळाच असतो. अजनी–पुणे वंदे भारतने मनमाडपर्यंत जायचं आणि मग अमरावती–नाशिक मेमूने नाशिकला पोहोचायचं. अजनी पुणे वंदे भारतची तिकीटे उपलब्ध असतात. मनमाड ते नाशिक ही तिकीटे तर ऐनवेळी आणि करंट बुकिंग विंडोतून काढायची असतात. जनरल क्लासची.



मग हा प्लॅन जमला का ? Vlog मध्ये बघा.


आणि हो, ही माझी वंदे भारतमधली पहिलीच ट्रिप होती.

Sunday, August 31, 2025

पुरेना जनी लोभ रे क्षोभ त्याते

समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या मनाच्या श्लोकातला हा श्लोक.


"मरे एक त्याचा दुजा शोक वाहे

अकस्मात तो ही पुढे जात आहे

पुरेना जनी लोभ रे क्षोभ त्याते

म्हणोनी जनी मागुता जन्म घेते."


या जगातल्या मानवी जीवनातल्या अनित्यतेचे चिंतन आणि हे जीवन अनित्य आहे हे जाणून घेऊन या जगात कसे वागायचे हे चिंतन या श्लोकातून आलेले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. परवा महाविद्यालयातून परतताना गाडीत हे श्लोक लागले होते. त्यातल्या "पुरेना जनी लोभ रे क्षोभ त्याते" या ओळींनी माझे मन वेधून घेतले आणि चिंतन सुरू झाले.


हे जग कर्मभूमी आहे. इथे कुठलेही कर्म न करता, अकर्मण्य अवस्थेत कुणीही राहू शकत नाही. आणि सगळ्या सहेतूक, अहेतूक कर्मांचे चांगलेवाईट फ़ळ आपल्याला मिळतच असते. संतकवी दासगणू महाराजांनी श्रीगजाननविजय ग्रंथात "मागील जन्मी जे करावे, ते या जन्मी भोगावे, ते भोगण्यासाठी यावे, जन्मा हा सिद्धांत असे" हा संतश्रेष्ठ गजानन महाराजांचा उपदेश लिहून ठेवलेला आहे. त्यामुळे कर्मे आणि त्यांची फ़ळे यातून मनुष्याची सुटका नाही. आणि कर्माची फ़ळे भोगीत राहण्यासाठी वारंवार जन्म घेत राहणे यातूनही सुटका नाही. जगदगुरू शंकराचार्यांनी "पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम" या ओळींद्वारे या वारंवार जन्म घेणे आणि मृत्यू पावणे या फ़े-यातली भयानकताच विषद केलेली आहे. कारण पुढला जन्म कुठला मिळेल ? हे आपल्या हातात नाही. त्या जन्मात आपल्या देहाला भगवंताचे स्मरण, अनुसंधान राहीलच याची खात्री नाही. मग आपली साधना पूर्णत्वाला जाईपर्यंत, आपण कायमचे भगवंत चरणी सामावून जाईपर्यंत या मृत्यूलोकात जन्म मरणाचे किती फ़ेरे घ्यावे लागतील याच्यावर आपले कसलेही नियंत्रण नसणे ही अत्यंत भयावह आणि भगवत्भक्तांच्या हृदयाचा थरकाप उडवणारी अवस्था आहे.


मग यावर उपाय श्रीमदभगवतगीतेत, श्रीमदभागवतात प्रत्यक्ष भगवंताने सांगून ठेवलेला आहे. अनेक जन्मांना कारणीभूत होणारी कर्मे करणे जर आपण टाळू शकत नसू तर किमान ती कर्मे भगवंताच्या स्मरणात करू, त्याला ती कर्मफ़ळे अर्पण करून आपण श्रीमदभागवतात सांगितलेल्या "नैष्कर्म्य" अवस्थेत जाऊ. त्यासाठीचे पथ्यच श्रीसमर्थांनी या मनाच्या श्लोकात सांगितले आहे. जर आपल्याला अशा "नैष्कर्म्य" अवस्थेत जायचे असेल तर लोभ आणि क्षोभ या दोन्हीहीपासून आपल्याला दूरच रहावे लागेल. 


परम पूजनीय ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकरांचा एक दृष्टांत आहे. ते म्हणायचे, स्टेशनवर गाडी पकडायला जाताना एखाद्या गृहस्थाशी भांडण झाले म्हणून गाडी चुकली काय ? किंवा स्टेशनवर जाताना एखादा मित्र भेटला आणि त्याच्यासोबत सुखाच्या चर्चेत गाडी चुकली काय ? दोन्हींचा परिणाम एकच झाला; गाडी चुकली.


तात्पर्य आपण एकवेळ क्षोभावर मात करू शकू पण इथल्या वस्तूंच्या ममतेवर, लोभावर मात करणे कठीण आहे. मोठमोठ्या योगी पुरूषांना अखेरच्या क्षणी झालेल्या लोभामुळे त्यांच्या साधनेतले तेवढे न्यून पुरे करायला पुन्हा जन्म घ्यावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. श्रीमदभागवतात वर्णन केलेल्या जडभरताची कथा अशीच. म्हणून श्रीसमर्थ आपल्याला आधीच जागृत करत आहेत. मृत्यूच्या पथावर चालणे या जगात कुणीही चुकवू शकलेला नाही. आज एक तर उद्या आपण हे नक्की आहे. किंबहुना या जगात तेच आणि तेव्हढेच नक्की आहे. म्हणून या जगात आपल्या मनात कुणाविषयीही अपुरा क्षोभ तर नसावाच पण कुणाहीविषयी असा पूर्ण न होणारा लोभसुद्धा नसावा. "हे होऊच नये" असे म्हणणे योग्य नाही तसेच "हे झालेच पाहिजे" असेही म्हणणे योग्य नाही. जे होतेय ते त्या सृष्टीनियंत्याच्या मनाप्रमाणे होतेय हे समजावे. आपण फ़क्त साक्षीभावाने त्याकडे बघावे. त्याविषयी क्षोभ किंवा लोभ ठेऊन त्यात अडकून राहू नये. तरच ते कर्म आपल्याला चिकटणार नाही आणि कर्मांचा हा बॅलन्स बरोबर झाला की "पुनरपि संसारा येणे नाही" ही सकल जीवमात्रांची अत्त्युच्च अवस्था आपण गाठू शकू.


- प्रभातचिंतन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर भाद्रपद शुद्ध अष्टमी, ३१ / ८ / २०२५



Wednesday, August 27, 2025

बाजरीची भाकरी आणि अमूल बटर वगैरे

आत्ता एका फूड व्लाॅगरची रील बघत होतो.

उत्तर कर्नाटकात कुठेतरी तो अगदी authentic कन्नड जेवण करीत होता.
केळीच्या पानावर छान जेवण. "ग्रीन व्हेजिटेबल विथ दाल" असे वर्णन केल्यानंतर लगेच जाणवले की "अरे, ही तर आपली वैदर्भिय दाळभाजी" !
मोकळी दाळ वगैरे चटणीवर्गीय प्रकार तिथे वाढलेले होते पण त्याने "I don't know what it is" असा शेरा मारून अगदीच अरसिकतेने अक्षरशः गिळून टाकलेत. "त्या रात्री तो पोटातल्या गॅसने हैराण झाला असणार." हा एक विचार माझ्या मनात आला एव्हढंच.
कहर म्हणजे बाजरीच्या छान, मस्त फुलक्यांवर त्या हाॅटेलवाल्याने त्याला अमूल बटरचा एक छोटासाच चौकोनी तुकडा वाढला. त्या अज्ञानी माणसाने तो तुकडा बाजरीच्या त्या गरमागरम फुलक्यावर चोळला आणि तो फुलका खाल्ला.
त्याक्षणीच त्या फूड व्लाॅगरला, जुन्या संगीत नाटकांमधल्या नटांसारखे "हा, मूढा भरतकुलोत्पन्ना" असे म्हणावेसे वाटले. अरे! बाजरीच्या फुलक्यासोबत बटर ? त्यापेक्षा बासुंदीसोबत बनपाव खाल्ला असतास तर ते क्षम्य होते. बाजरीच्या गरमागरम फुलक्यावर अस्सल बेळगावी लोणी कढवून काढलेले दाणेदार, रवाळ तूप घ्यायचे असते रे. नसेल परवडत तर त्या फुलक्यावर लाकडी घाण्यातून काढलेले, मस्त शेंगदाण्याचा वास असलेले, अस्सल फल्लीतेल (शेंगदाणे तेलाला parallel वैदर्भिय शब्द) कच्चेच घ्यायचे असते रे.
बटरचा तुकडा हा पावभाजीचे टाॅपिंग म्हणून किंवा पावभाजीच्या पावाला लावून खायला ठीक आहे. बाजरीच्या फुलक्यासोबत तो खाणे हे बघणार्यालाही (लाक्षणिक अर्थाने) पचत नाही आणि खाणार्यालाही (खर्या अर्थाने) पचत नाही.
- खाण्याच्या बाबतीत सगळे कुळधर्म नीट पाळणारा, बेळगावी लोण्याइतकाच स्निग्ध आणि बेळगावी कुंद्याइतकाच गोड स्वभावाचा, रा(व)म साहेब किन्ही(हरि)हर.

Sunday, August 24, 2025

काटा रूते कुणाला ?

चंद्रपूरला जाणा-या वातानुकूलित बसमध्ये तो शिरला तेव्झ बस सुटायला अवकाश असला तरी बहुतेक मंडळी बाहेरच्या रणरणत्या उन्हापेक्षा आतच आरामशीर बसलेली होती. वास्तविक खाजगी कंपन्यांचे पेव फुटुन त्यांच्यात स्पर्धा सुरू झाल्यानंतर संपूर्ण भरलेली बस हे दृश्य दुर्मिळ झाले होते. खाजगी गाड्यांच्या पोऱ्यांची प्रवाशी मिळवण्यासाठी काशीच्या पंड्यांशी स्पर्धा करणारी धावपळ पाहून तो कुठेतरी सुखावत होता. त्याला त्याच्या बालपणीचे दिवस आठवले. उन्हाळ्याच्या सुट्या, आजोळी जाण्याचे एक महिना आधीचा बेत, मोजक्याच एस. टी. गाड्या, ८ दिवस आधी रांगेत उभे राहून वेळप्रसंगी ३ तासाच्या प्रवासासाठी ३ तास उभे राहून मिळवलेली आरक्षणे, ती विजयी मुद्रा. सगळं आठवून त्याचं त्यालाच हसू आलं.



५, ६ रांगा टाळत तो आसनांपाशी आला. तिथे आधीच कुणीतरी बसलं होतं. त्याच्या मिशांमधून पुन्हा हसू ओघळलं. मुद्दाम आरक्षण करून उशिरा बसमध्ये चढायचं आणि आपल्या आसनावर बसलेल्या माणसांवर रुबाब दाखवत त्यांचा 'मोरू' करायचा ह्या गोष्टीत तो तरुण असताना त्याला विलक्षण आनंद व्हायचा. पण आता ? "आपलं एवढं वयोमान झालं." त्यानं विचार केला, "तरीही तश्शीच मजा अजूनही येते." यातल्या ’आपलं वयोमान झाले' या विचाराशी तो थबकला. छे ! आपण एवढे काही म्हातारे दिसत नाही काही ? हं आता केस थोडे पांढरे झाले असतील. चाळीशीही नाकावर असेल. पण एकंदर पूर्वीचा रुबाबदारपणा कायम आहे. परवा कुणीतरी बोलताना म्हणालं देखील की हा चष्मा तुम्हाला शोधून दिसतोय म्हणून. केससुद्धा आज कसे अगदी स्टाईलमध्ये.....


"तुमचा सीट नंबर काय?" अचानक त्या बसलेल्या व्यक्तीने प्रश्न विचारला आणि त्याची विचारशृंखला तुटली.


त्यानं तिच्याकडे बघितलं आणि अक्षरशः हादरून, स्वप्न बघितल्यासारखाच तो बघत राहिला. तिनंही बहुधा त्याला तेव्हाचं नीट बघितलं. ती सुद्धा त्याच्याकडे विस्कारित नेत्रांनी बघत राहिली.


"तू ?” ती जवळ जवळ किंचाळलीचं


"तू?" नेमका तोही त्याचवेळी ओरडला.


"अरे आहेस कुठं ? करतोस काय ? आज इकडे कसा ? आणि अचानक ?"


"अगं हो! हो ! पहिले मला नीट बसू तर देशील. आणि हे सगळे प्रश्न मीच तुला विचारायला हवेत." 


"छे ! छे! लेडिज फर्स्ट"


"वा ! प्रश्न विचारताना 'लेडिज फर्स्ट' म्हणे आणि उत्तरे देताना ?"


"तस्साच भांडकुदळ आहेस अजून. झालं."


एव्हाना त्या बसमधलं इस्त्रीचं वातावरण बिघडलं होतं. अनेक भुवया उंचावल्या गेल्या होत्या. पुढल्या आसनांवरच्या काही मााना १८० अंशच्या कोनांमधून वळल्या होत्या. त्यासरशी दोघंही ओशाळले. खिडकीशी ती सरकून बसली आणि तो तिच्या शेजारी.


"गाडी फक्त जांबला थांबेल" कंडक्टरने दार लावून घेता घेता पुकारा केला. बस सुरू झाली.


"कुठे जातोयसं ?"


"आवारपूरला जातोय. अगं माझ्या मोठ्या मुलाला तिथे जॉब मिळालाय ना ? त्याला भेटायला."


तिनं त्याच्याकडे पाहिलं. खरंच की ! हा एवढ्या मोठ्या पोराचा बाप झालाय. आपलीही पन्नाशी फारशी दूर नाही. केवढा काळ गेला नाही मधे !


"किती वर्षांनंतर भेटतेस गं ?" ती विचारात गढली असताना त्याने प्रश्न विचारला. तिला आश्चर्य वाटलं. हा मनकवडा वगैरे आहे की काय ? "आणि तू कुठे जातेयसं ?"


"चाल्लेय चंद्रपूरला. माझ्या मुलीसाठी स्थळ आलंय तिथलं. जरा चौकशी करून येते. ह्यांना वेळच नाही नं. अजिबात, म्हणून आपली एकटीच."


"कॉलेज सोडल्यानंतर आपण पहिल्यांदाच भेटतोय न गं ? मधे तू पत्रंही पाठवलं नाहीस. हं! सोडताना मारे आपण वचनं, शपथा घेतल्या होत्या. नंतर विसरलीस ? तशी तू काय म्हणा....." पुढलं वाक्य त्यानं अर्धवटच सोडलं होतं. ती मात्रा अस्वस्थ होऊन खिडकीबाहेर पाहू लागली होती. एव्हाना बस गावाबाहेर पडली होती.


तो सुद्धा अस्वस्थ झाला. "एवढ्या वर्षांनी बिचारीची भेट होतेय आणि आपण पुन्हा तस्सेच हट्टी."


बराच वेळ शांततेत गेला. कंडक्टर येऊन तिकीटं तपासून निघून गेला होता. दोघंही सीटवर माना टेकवून झोपल्याचा आभास निर्माण करत होते. पण मनातली खळबळ चेहेऱ्यावर दोघांनाही लपवता येत नव्हती.


कॉलेजचे दिवस. मोरपीस गालांवरून फिरून जावं तसले दिवस. अतिशय हळुवार भावनांचे तरंग मनाच्यां त्या सरोवरात नुसत्या हवेच्या झुळुकीने उठायचे दिवस कॉलेजला असताना..


"पुण्यावरून कधी आलास, बाय द वे ?" तिच्या प्रश्नाने त्याची तंद्री पुन्हा भंगली.


"अं ? अगं पुण्याला माझी फॅमिली फक्त असते. मी हल्ली मुंबईत असतो. आज सकाळीच विदर्भ एक्सप्रेसने आलो आणि लगेच स्टॅण्डवर."


"हे रे काय ? घरी नाही का यायचं ?"


घरी येऊन तरी आपली चुकामूकच झालेली बघायची नं ? आणि तुझा लग्नानंतरचा पत्ता कुठाय मायाकडे ? साधी पत्रिकापण पाठवली नाहीस ?" तो अगदी वय विसरून २०-२५ वर्षांपूर्वीच्या गोष्टींवर तावातावात भांडायच्या पावित्र्यात आला होता. तिचा हिरमुसलेला चेहेरा पाहून मात्र तो वरमला "बाय द वे, वाय करतात तुझे मिस्टर ?"


"सध्या अमरावतीला असतात. इंजीनियर आहेत. पण मी आणि मुलं नागपूरलाच असतो." 


"आणि मुलं किती ?" तो बराच ’नॉर्मल’ला आलाय हे त्याच्या आवाजावरून जाणवत होतं.


"अरे दोन्ही मुलीचं. थोरली यंदाच एम. कॉम. झाली. धाकटी मेडिकलला. अजून शिकतेय. ए ! मीच मघापासून बडबडतेय. तुझ्याविषयी सांग ना."


"माझ्याविषयी ? हं! काय सांगणार ? मधल्या इतकी वर्षांनी आपल्याला एकमेकांपासून एवढं दूर नेलं की एकमेकांच्या संगतीत जीवन घालवण्याच्या शपथा विसरून आपण एकमेकांच्याच जीवनाविषयी विचारतोय. सांगतो. सदगुणी, सुंदर बायको आहे. एकच मुलगा जाहे. दोन वर्षांपूर्वी आपल्याच कॉलेजमधून इंजीनियर झाला आणि आवारपूरला लागलाय."


"छान ! बापाचं नाव मुलानं काढलं तर ! ए, बाकी तू अजूनही गातोस वगैरे का रे?"


बराच वेळ तो गप्प होता. बहुधा शब्दांची जुळवाजुळव करत असावा. मोठा सुस्कारा सोडून, विचारांना पूर्णविराम देत तो म्हणाला "खरं सांगू? तू निघून गेल्यानंतर मैफिलीतली सतार जी अबोल झाली ती कायमचीच. मैफिल विस्कटली ती विस्कटलीच. आताशा् तंबो-याची गवसणीसुद्धा काढत नाही मी वर्षानुवर्ष. खरंच गेले ते दिन गेले. 


वर्षा ! आठवते तुला माझी ती शेवटली मैफिल ? ’लाख चुका असतील केल्या.....' गाण्यातून तू मधूनच उठून गेलीस. खरंच वर्षा. अगं, जीवनाच्या पहाटे एखादं सत्य, सत्य वाटलं म्हणजे ते अगदी तसंच संध्याकाळी ही वाटेल असं नाही. सुरूवातीला असंच वाटलं होतं गं. पण तुला अजूनही विसरू शकलो नाही. सुखी संसाराच्या ह्या वाटचालीत कधीकधी जुन्या आठवणींचे सल असे बोचतात. थांबून थोडं मागे पहायला लावतात आणि मग वर्षा, तुझ्या नावाचं वळण आपोआप येतचं गं" बोलताना त्याला धाप लागली होती. त्याचा आवाजही कापरा झाला होता.


"शांत हो अभि. शांत हो. अरे या सगळ्या गोष्टी आत्ता पुन्हा बोलायलाच हव्यात कां ?"


अभिजित थोडा सावरला "बघ. अजून तशीच निगरगट्ट आहेस. भावनेच्या भरात अजिबात वहात नाहीस."


बस जांबच्या स्टँडमध्ये शिरली होती. फक्त तो उत्तरला, परतताना हातात एक मोठं कागदी पुडकं होतं.


"काय आणलंस ? बघू ?"


"समोसे आहेत. तुला आवडतात नां."


आता मात्र तिला भडभडून आलं. अजूनही ह्याचं आपल्या आवडी निवडी जपणं सुरूच आहे ? नकळत ह्या विचाराने मनात आणि अश्रुंनी डोळ्यात दाटी केली होती. न संकोचता तिने ते अश्रू ओघळू दिले.


बस पुन्हा सुटली होती. समोसे संपेपर्यंत कुणीही बोलत नव्हते.


"तू कशी आहेस ?" त्यानं थोड्या काळजीनं विचारलं.


"तशी सुखीच आहे. हे चांगले आहेत म्हणजे शांत, मनमिळावू वगैरे. मुलीसुद्धा छान आहेत. तुझ्यासारखंच अगदी. ए, तू नागपूरला परत कधी येतोयस? ए, रहायलाच ये ना एक दिवस आमच्या घरी. सगळ्यांशी तुझी ओळख होऊन जाईल."


"होऊन जाईल" ला तो सातमजली हसला. तो पुण्याचा आणि ती अस्सल वऱ्हाडी. त्यामुळे कॉलेजला असतानाच तिच्या 'करून राहिले, घेऊन राहिले' अशा शब्दप्रयोगांना तो असंच सातमजली हसायचा. त्याच्य असल्या हसण्याने तिचा कावराबावरा झालेला चेहरा बघून आणखीनच त्याला हसायला यायचं.


"तसं माझं नक्की नाही गं. त्यातून चिरंजिवांनी परस्पर बल्लारपूर-मुंबई रिझर्वेशन केलं असेल तर कठीण आहे."


पुन्हा बराच वेळ दोघंही गप्प होते. वरोरा मागे पडलं होतं. भद्रावतीची लालभडक कौलारू घरं दिसायला लागली होती.


"अभि, हे सगळं लौकिक, ऐश्वर्य, हे सुख, म्हणजे खर समाधान असतं का रे ? किती वेगळ्या कल्पना होत्या नाही आपल्या; आपण कॉलेजात असताना ? खरंच आपणच बदलतो की ती सगळी गद्धेपंचवीशी असते रे?"


तो काहीच बोलला नाहीं. जीवनप्रवास एकत्रे करण्याची शपथ घेतलेले ते दोन जीव 'यथा काष्ठं च काष्ठ च" प्रमाणे कॉलेजनंतर प्रवाहातून वेगळे झाले होते. कॉलेजात असताना वर्षा म्हणजे अभिजितच्या मैफिलीचा प्राण होती आणि तो आपल्या गोड गळ्यामुळे कॉलेजच्या सगळ्या स्वप्नाळूच्या गळ्यातला ताईत. दोघांचं जोडीनं फिरणं, सिनेमाला जाणं वगैरेमुळे कॉलेजात दोघांच्याही नावाची चर्चा होतीच. वर्षासारख्या हि-याला  अभिजितसारखंच कोंदण हवं यावर सगळ्यांचं एकमत होतं. नकळत एकामागून एक दाटी केलेल्या विचारांनी तो अस्वस्थ झाला. मनाच्या बंद, पारदर्शी खिडकीवर जुन्या आठवणीचे थेंब ओधळून जात होते. तो नुसता फुलून गेला होता.


बस आता चंद्रपुरात शिरली होती.


"ए, मी पाण्याच्या टाकीजवळच्या स्टॉपवर उतरते. हा माझा पत्ता, नागपूरला आलास की नक्की ये. मी उद्याच परत जातेय.


"एक मिनीट, वर्षा, एक प्रश्न गेली पंचवीस वर्ष माझ्या मनात सलत्तोय तेवढा तू मला आज विचारू दे." त्याचा आवाज त्याच्याही नकळत कापरा झाला होता.


"त्या दिवशी तू मला विचारल्यावर मी तुला नकार का दिला? हाच न तो प्रश्न ?"


"हूं."


"अभिजित अरे त्याच प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात मी गेली पंचवीस वर्षे होती. काही क्षण काही आठवणी फार सलतात रे. मी पहिल्यापासून थोडी निष्ठुर आणि दगड मनाची. पण तू भावनेत लगेच वंहावत जायचास पण आज जाणवतंय मी वेदना भोगत असताना हा विचार तरी करू शकले की तू सुद्धा तेच भोगत असशील. तू तो विचारसुद्धा करू शकला नाहीस. हे लौकिक समाधान सगळं वरवरचं आहे रे. आत अंतर्मनातला आवाज माझ्याविरुद्धच कधी बंड करून उठतो. पण तू? तुला तो आवाज कधी जाणवलाच नाही. जीवनात सगळ्याच प्रश्नांची उत्तरे गाईडसारखी तयार मिळत नाहीत, जाऊ दे. तू फार आत्मकेंद्रित होतास आणि आहेसही. एनीवे, मी चलते."


स्टॉप आला होता. ती उतरली. तो बघत असतानाच तिने रिक्षाला हात केला "गांधी चौक चलो"


रिक्षात बसताना तिने डोळ्यांना लावलेला रुमाल आणि मागे वळून न पहता निरोपादाखल हलवलेला हात त्याच्या मनात घर करून होता.


- प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


ही कथा दै. तरूण भारत नागपूरच्या रविवारी प्रकाशित होणा-या "विविध विषय विभाग" या पुरवणीत दिनांक २७ नोव्हेंबर १९९४ रोजी प्रकाशित झालेली आहे.




Friday, July 4, 2025

आयसेनहॉवर मॅट्रिक्स आणि भेदरलेले, धांदरलेले आम्ही

आज आमच्या VNIT मधल्या प्रशिक्षणानंतर मी सध्या VNIT मध्येच काम करणार्या एका सहकर्मीकडे गेलो होतो. त्यांची सुंदर, कलात्मकरित्या सजवलेली केबिन मी बघतच राहिलो. त्यातलेच हे एक "आयसेनहाॅवर मॅट्रिक्स" माझ्या दृष्टीस पडले.

यापूर्वीही अनेकदा मी हे मॅट्रिक्स बर्याच पुस्तकांमध्ये, भाषणांमध्ये आणि बर्याच मानव विकास वर्कशाॅप्समध्ये ऐकले आणि बघितले होते.

हे कामांचे वर्गीकरण मला पटते. महत्वाच्या आणि तातडीच्या कामांना कायम प्राधान्य देऊन महत्वाच्या पण विना तातडीच्या कामांना क्रम देऊन नंतर करायचे ठरविणे.
बिन महत्वाच्या पण तातडी असलेल्या कामांना दुसर्यांकडे सोपविणे आणि बिन महत्वाचे आणि बिन तातडीचे काम सरळ टाळायचे असे हा आयसेनहाॅवर सुचवतो. कागदावर दिसायला हे मॅट्रिक्स अगदी आदर्श वाटते.
पण आमचा मुळातला स्वभावच इतका पापभिरू, भित्रा आणि धांदरट आहे की पुढ्यातली सगळीच कामे आम्हाला महत्वाची आणि तातडीची वाटतात. आता काय करायचे ? आमच्याकडून कुठल्याही कामाचे "बिन तातडीचे" किंवा "बिन महत्वाचे" असे वर्गीकरण होतच नाही. आपल्याला करावी लागणारी सगळी कामे महत्वाची आणि तातडीची असतात यावर आमचा अत्यंत दृढ म्हणावा तसा विश्वास आहे.
मग हे "आयसेनहाॅवर मॅट्रिक्स" कसे आचरणात आणायचे ? हाच सध्या आमच्यापुढला 'क्रायसिस' आहे.
- पुस्तके वाचायला आवडणारा पण त्याहूनही प्रॅक्टीकल जगायला आवडणारा एक साधा मनुक्ष, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Thursday, July 3, 2025

बॉलीवूडच्या गाण्यांमधले हिंदी, उर्दू, पंजाबी शब्द आणि आम्हा मराठी मुलांचा होणारा गोंधळ

आधीच आपल्याला ऊर्दू मिश्रित हिंदी कळत नाही. "मकसद" हे सिनेमाचे नाव वाचून मराठीत एक "अबकडई" या नावाचे नियतकालिक निघायचे तशातला हा काही प्रकार असेल असे आम्हाला वाटले होते. त्यामुळे "दीदार ए यार", "मुगल ए आजम" वगैरे नावे कळण्याचा प्रश्नच नव्हता. मुळात अशा ऊर्दू नावांचा अर्थच कळण्याची बोंब तर मग टाॅकीजमध्ये जाऊन तो सिनेमा पाहण्याची एवढी तसदी कोण घेणार ?

तसेही त्याकाळी टाॅकीजमध्ये शिरल्यानंतर तेव्हाच्या सिनेमांचा आवाज त्याकाळच्या टाॅकीजेसमध्ये एवढ्या मोठ्यांदा घुमायचा की सुरूवातीचे काही मिनिटे एकही डाॅयलाॅग ऐकू येत नसे. टाॅकीजमधल्या अंधाराला आपले डोळे आणि आवाजाला आपले कान सरावलेत की मग सिनेमा नक्की काय आहे ? हे थोडेथोडे समजू लागायचे.
याच अजाणतेपणाने एकदा घरी "आप जैसा कोई, मेरे जिंदगीमे आएँ, तो बाप बन जाएँ" असे मोठ्याने गाताना "आचरट कार्ट्या" म्हणून थोबाड रंगवून घेतल्याची आठवण अजूनही ताजी आहे. "अहो ते सिनेमावाल्यांनीच ते गाणे तसे लिहिलेय यात माझा काय दोष ?" हा माझा निरागस प्रश्न तेव्हा कुणीही ऐकलेला नव्हता.
९० च्या दशकाच्या उत्तरार्धात हिंदी सिनेमांवर पंजाबी शब्द आणि प्रथांनी आक्रमण केले. त्यामुळे आमच्यासारख्या मराठी मुलांची अधिकच पंचाईत झाली हो.
आता हेच बघा ना, "जब वी मेट" मी टाॅकीजमध्ये बघितला. घरी टी व्ही वर ही अनेकदा बघितलाय. पण अजूनही "नगाडा, नगाडा, नगाडा बजा" यानंतर ती सगळी पंजाबी मंडळी "Aqua Regia, Aqua Regia" असे केमिस्ट्रीतल्या कंपाऊंडचे नाव जोराने का ओरडतात ? हे मला न उलगडलेले कोडे आहे.
- पाचव्या सहाव्या वर्गात केमिस्ट्री शिकवणार्या सरांनी अत्युकृष्ट शिकवल्याचा परिणाम की सोन्याला विरघळवणारे कंपाऊंड "Aqua Regia" ची भुरळ पडल्याचा परिणाम की स्वतःलाच एक "Alchemist" व्हायचे होते की काय ? याचा अजूनही शोध घेत असलेला सर्वसामान्य माणूस, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Wednesday, July 2, 2025

एखादी बस दिसल्यानंतरचे विचारांचे काहूर

 विश्राम बेडेकरांच्या "रणांगण" कादंबरीतले एक पात्र कुठल्याही वेळी नुसताच विविध रेल्वेगाड्या त्या त्या वेळी कुठे असतील असा विचार करीत असे. "आता दुपारचे ४ वाजलेत. म्हणजे मुंबई मेल आता नागपुरातून निघालेली असेल, हावडा मेल रायपूर स्टेशनातून हावड्याकडे रवाना झाली असेल..." वगैरे. "रणांगण" कादंबरी आम्हाला UPSC Civil Services च्या मुख्य परीक्षेत मराठी साहित्य या विषयाच्या अभ्यासात होती. "रणांगण" सोबतच मराठी साहित्यातले सौंदर्यशास्त्र नावाचा एक अत्यंत कुरूप विषय (ज्याची पुलंनी "भिंत पिवळी पडलीः एक सौंदर्यवाचक विधान या लेखात भरपूर खिल्ली उडविली होती.), अनेक विरोधाभासी आणि विनोदी विधानांनी भरलेला वि. ल. भावे कृत मराठी वाङमयाचा इतिहास (ज्याची पुलंनी "मराठी वाङमयाचा गाळीव इतिहास" लिहून येथेच्छ टर उडविली होती.) हे ही अभ्यासाला होते. या विषयांतले आता फारसे आठवत नसले तरी याच दोन विषयांनी मुख्य परीक्षेत आमचा त्रिफळा उडवल्याचे मात्र ठळक स्मरते. चुकीचे वैकल्पिक विषय घेतल्याने देश एका चांगल्या I. A. S. अधिकार्याला मुकला हे मात्र खरंय.


"रणांगण" मधल्या त्या पात्रासारखीच काहीशी सवय मलासुध्दा आहे. प्रवासात पुढून येणारी एखादी एस. टी. दिसल्यानंतर ही आपल्या प्रस्थान स्थानावरून किती वाजता निघालेली असली पाहिजे ? याचे हिशेब माझ्या मनातल्या मनात सुरू होतात.

आता हीच बस बघा. नागपूर जलद जळगाव. उन्हाळी जादा शेड्युल.




ही बस आम्हाला नांदुर्याला दिसली तेव्हा साधारण सकाळचे १०.४५ झाले होते. आम्ही नांदुर्याच्या हनुमंताचे दर्शन घेऊन खामगावकडे परतत होतो. आता ही बस सकाळी १०.४५ ला नांदुरा म्हणजे नागपूरवरून किती वाजता निघालेली असली पाहिजे ? याचे calculations माझ्या डोक्यात लगेच सुरू झालेत. कितीही चांगला रस्ता मिळाला तरी नागपूर ते अकोला प्रवासाला कमीतकमी ५ तास, अकोला ते खामगाव या प्रवासाला कमीतकमी १ तास आणि खामगाव ते नांदुरा अर्धा तास प्रवासाला धरले तरीही ही गाडी नागपूरवरून पहाटे ४.०० ला निघालेली असली पाहिजे. म्हणजे अगदी पहाटपक्षी बसच. (लिंक इथे) नेहमी नागपूरवरून अमरावतीकडे जाणारी पहिली पहाटपक्षी बस म्हणजे पहाटे ५ ची नागपूर - इंदूर बस. ही बस त्या बसआधी एक तास ? अशा अडनिड्या वेळेला नागपूरवरून या बसला किती प्रवासी मिळत असतील ? अनेक प्रश्न मनात रूंजी घालत सुटतात. अगदी "रणांगण" च्या त्या पात्रासारखेच.

नागपूर उन्हाळी जादा जळगाव

मार्गे कोंढाळी - कारंजा (घाडगे) - तळेगाव - तिवसा - गुरूकुंज मोझरी - अमरावती - बडनेरा - मूर्तिजापूर - अकोला - बाळापूर - खामगाव - नांदुरा - मलकापूर - मुक्ताईनगर - दीपनगर - भुसावळ.

MH - 14 / LX 9813

Ashok Leyland Comet Vishwa model

BS VI

Built by Ashok Leyland, Vijaywada plant.

२ बाय २ आसनव्यवस्था. एकूण ४१ आसने.

ज. जळगाव आगार

स्थळः नांदुरा
दिनांकः १४/६/२०२५
वेळः सकाळी १०.४५ वाजता

- एक बस पाहिली की अनेक विचारांचे, calculations चे काहूर मनात येणारा बसफॅन, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Tuesday, July 1, 2025

वेगळी वाट चोखाळणारी बस

वेगळी वाट चोखाळण्याचा मक्ता फक्त मनुष्यमात्रांनीच घेतलाय की काय ? आमच्या एस. टी. बसेस सुध्दा वेगळा मार्ग चोखाळू शकतात म्हटलं.

अमरावती वरून मलकापूर ला जाण्यासाठी मूर्तिजापूर - अकोला - बाळापूर - खामगाव - नांदुरा हा राष्ट्रीय महामार्ग उपलब्ध आहे. हा महामार्ग आता खूप छान झालेला आहे. अनेक वर्षांपासून चालू असलेले या महामार्गाचे नष्टचर्य संपलेले आहे.

पण ही बस अमरावती ते मलकापूर प्रवासासाठी मात्र दर्यापूर - आकोट - शेगाव - खामगाव - नांदुरा ही जरा  वेगळी वाट चोखाळतेय. हा मार्गही छान आहे. 




अमरावती जलद मलकापूर

MH 40 / Y 5788

मध्यवर्ती कार्यशाळा, नागपूर ने बांधलेली आणि नंतर पोलादात पुनर्बांधणी केलेली बस.

TATA 1512 Cummins

BS III

बु. मलकापूर आगार (मलकापूर आगार, बुलढाणा विभाग)

कोल्हापूर विभागातही को. मलकापूर आगार आहे.

दोन दोन मलकापूर आगारांप्रमाणेच आपल्या महाराष्ट्र एस. टी. त 

व. तळेगाव (वर्धा जिल्हा)

आणि

पु. तळेगाव (पुणे जिल्हा)

अशी सारख्या नावांची आगारे आहेत.

स्थळः शेगाव

दिनांकः १२/०६/२०२५

संध्याकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी.

आजूबाजूच्या भयंकर उकाड्यामुळे एखाद्या काकूंनी आपल्या पदराने, ओढणीने स्वतःला वारा घालावा तशी ही बस रेडिएटर वरचे छोटे ग्रील उघडून स्वतःला वारा घातल्याचे दृश्य भासमान होते आहे. त्यादिवशी वातारणात खरंच खूप उकाडा होता.

- बसेस आणि रेल्वेजना मानवी रूपात कल्पणारा, एक बसप्रेमी प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर 

Monday, June 30, 2025

माझ्या लेखनप्रेरणा अर्थात मी का लिहितो?

काल आमच्या एका गटचर्चेत प्रत्येकाने काही काही सदस्यांनी  त्यांच्या त्यांच्या  लेखनाच्या प्रेरणा सांगितल्यात आणि मी सुद्धा विचारात पडलो की माझ्या लेखनप्रेरणा नक्की काय ?


एक चांगला गायक व्हायला एक चांगला श्रोता होणे अतिशय आवश्यक आहे असे म्हणतात तसेच एक चांगला लेखक होण्यासाठी आधी ती व्यक्ती एक चांगला वाचक असणे तितकेच महत्वाचे आहे असे मला वाटते. मला आठवतंय माझ्या बालवयातच माझे खूप दांडगे वाचन झालेले होते. अक्षरओळख झाल्यानंतर अगदी चवथ्या वर्गापर्यंतच मी समग्र पु ल देशपांडे , व पु काळे, ग दि माडगूळकर , व्यंकटेश माडगूळकर, रणजित देसाई, बाबासाहेब पुरंदरे  वाचून काढलेले होते. आमचे दादा शाळेत लिपिक होते आणि शाळेच्या वाचनालयात तिथले ग्रंथपाल आमच्या दादांचे सहकारी आणि  मित्र असल्याने वाचनालयात आम्हाला मुक्त प्रवेश होता. त्यामुळे आमच्या सेमिस्टर्स संपण्याच्या अखेरच्या दिवशी (सुट्या लागण्याच्या आदल्या दिवशी) आम्ही शेवटल्या पेपरला जाताना एक भली मोठी पिशवी सोबत घेऊन जात असू आणि पेपर संपला रे संपला की दादांना सांगून वाचनालयात घुसत असू.


अर्थात आमच्या ग्रंथपाल काकांना आमची ही पुस्तके अशी खाण्याची सवय माहिती असल्याने ते आम्हाला अडथळा करीत नसत. आम्हीही अगदी १०० च्या आसपास पुस्तके त्या मोठ्याला पिशव्यांमध्ये भरायचोत आणि अर्धी पुस्तके आम्ही तर अर्धी आमचे दादा त्यांचे ऑफिस सुटल्यावर अशा पद्धतीने घरी घेऊन जात असू.


मग काय ! सुटयांमध्ये या सगळ्या पुस्तकांचा फडशा पाडणे हे एकाच काम उरत असे. बालवयात असे भरपूर वाचनसंस्कार झालेत खरे पण आपण या लेखकांच्यासारखे  लेखक व्हावे ही महत्वाकांक्षा मात्र मनात कधीच आली नाही.


अभियांत्रिकी शिक्षण पश्चिम महाराष्ट्रात कराडला आणि त्यानंतर नोकरीनिमित्त मुंबईत जवळपास सव्वा तप राहणे झाले. सर्वांमध्ये मिळून जाण्याचा आणि मनमोकळा स्वभाव असल्याने तिथल्या तिथल्या जनजीवनात गुरफटून गेलोत, तिथल्या संस्कृतींशी समरस झालोत. विविधरंगी जीवन अनुभव घेता आलेत. प्रवास घडला, एक निराळे व्यक्तिमत्व घडले.


मग या सगळ्या अनुभवांचे मित्र सुहृदांमध्ये कथन सुरू झाले. मुळात जन्मच नकलाकार घराण्यात झालेला त्यामुळे परफॉर्मिंग आर्टस ची आवड आणि सवय बालपणापासूनच होती. त्या सर्वांना हे कथन आवडले आणि मग त्यातून हे अनुभव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून लेखन सुरू झाले.


त्यातच साधारण २००७ - २००८ च्या सुमाराला Orkut आले. त्या माध्यमाला सरावलो आणि तिथे विचार मांडणे सुरू झाले. त्यापूर्वीही दै. तरूण भारतातून लिखाण होत होते पण इलेक्ट्रॉनिक समाज माध्यमे ही नाटकांसारखी असतात, लगेच समोरून दाद मिळते तर छापील माध्यमे ही सिनेमांसारखी असतात, प्रत्यक्ष दाद अनुभवायला मिळत नाही हे सुध्दा लक्षात आले.


Orkut नंतर फेसबुक आले. स्वतःच्या अभिव्यक्तित जास्त लवचिकता मिळायला लागली. त्याच दरम्यान मला ब्लॉग या माध्यमाचा शोध लागला. ब्लॉगवर हळूहळू का होईना व्यक्त व्हायला सुरूवात केली. सुरूवातीच्या चार पाच वर्षात ब्लॉगला आलेला प्रतिसाद अगदी कमी होता. निरुत्साही. ब्लॉग लिहीणे सुरू ठेवावे की नको ? या विचाराप्रत येणारा. पण नंतर फ़ेसबुकवरून, व्हॉटसॲप वरून आपल्या ब्लॉगपोस्टस साठी वाचकवर्ग मिळू शकतो हे जाणवले. ब्लॉगच्या लिंक्स या माध्यमांवर द्यायला सुरूवात केली आणि ब्लॉग्जच्या संख्येत आणि वाचकसंख्येतही भरीव वाढ झाली. अधिकस्य अधिकम फ़लम या न्यायाने वाचकांचा उत्साह नवनवे ब्लॉगपोस्ट लिहायला उद्युक्त करीत होता तर सातत्याने लिहील्याने वाढता वाचकवर्ग लाभत होता.


त्यातही आपण लिखाण केल्यानंतर वाचकांना ते आपलाच अनुभव असल्याचे जाणवते आणि ते लिखाण त्यांना त्यांच्या जवळचे वाटते. त्यामुळे फ़ार जास्त अलंकारिक भाषेत, खूप संशोधन करून, एखाद्या विषयाची खूप मांडणी करून एखादे लिखाण मी केलेय असे झाले नाही. मनाला भावले ते सगळे "पिंडी ते ब्रह्मांडी" या न्यायाने लिहीले. त्यात कुठेही अभिनिवेश नव्हता, पेशाने शिक्षक असूनही "आपण या सर्व अज्ञ जनांना शिकवतोय" अशी भूमिका नव्हती. सरळ, स्वच्छ आणि मनमोकळे लेखन. माझ्या स्वभावासारखेच. मला आलेले अनुभव, मला दिसलेले जग, मला जाणवलेली माणसे असे साधे सरळ लिखाणाचे विषय असायचेत आणि वाचकांनाही अशाच प्रकारचे लेखन आवडते हे माझ्या लक्षात आले आणि मी लिहीत गेलो.


"मी लेखन का करतो ?" या प्रश्नाच्या उत्त्तरांमध्ये "मला स्वतःला अभिव्यक्त व्हायला आवडतं म्हणून", "लोकांच्या मनातले विचार ,इच्छा मी माझ्या अनुभवांद्वारे व्यक्त करतो आणि मला समानशील असलेले अनेक वाचक मित्र मिळतात म्हणून" या दोन उत्त्तरांचा क्रम पहिल्या दोन उत्त्तरांत येईल.


मायबाप वाचकांनी लिखाण वाचले आणि तसा प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. यानंतरही असाच प्रतिसाद मला लाभो अशी नम्र प्रार्थना.


- जूनच्या ३० दिवसात वेगवेगळ्या विषयांवर ३० लेख लिहीणारा दृढनिश्चयी लेखक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


सोमवार, ३० जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५


Sunday, June 29, 2025

लहानपण दे गा देवा...

आता आपण मोठे झाल्यावर श्रीतुकोबांचा "लहानपण दे गा देवा" हा अभंग आपल्याला आठवतो आणि लहान होऊन जगावेसे वाटते पण आपल्यापैकी किती जणांना आपल्या लहानपणी "आपल्या लहान असण्याचा" अभिमान वाटला होता, फ़ायदा जाणवला होता ? प्रामाणिकपणे सांगा. मला खात्री आहे की प्रत्येकाच्या लहानपणी प्रत्येक व्यक्तीला "मी कधी एकदा मोठा होतोय" असे झाले असते.


आमच्या बालपणापासून आमचे एकच स्वप्न होते. अशा खेळण्यातल्या कार्स चालवायच्यात. नुसत्या चालवायच्याच नाही तर आपल्या इवल्या इवल्या पायांनी जोर लावत लावत नागपूर ते चंद्रपूर असा आजोळचा प्रवास करायचा. चंद्रपूरच्या प्रवासाचे वेड तेव्हापासून. अर्थात तेव्हाच्या मध्यमवर्गीय घरांमध्ये अशी महागडी खेळणी घेऊन देण्याचे लाड मात्र कधीच झाले नाहीत. आम्ही तिघे भाऊ होतो हे एक कारण होते. अर्थात मी एकुलता एक असतो तरी असे लाड घरी झालेच नसते हे आमच्या काही एकुलत्या एक असलेल्या मित्रमंडळींच्या घरी असलेल्या वातावरणावरून आम्ही हा धडा घेऊ शकतो.






तेव्हा वाटायचे, केव्हा एकदा मोठे होतोय ? केव्हा एकदा मोठी कार घेतोय ? आणि केव्हा एकदा ती कार चालवत चंद्रपूरला, आजोळी जातोय ? अर्थात हे स्वप्न पूर्ण व्हायला ३५ वर्षे मेहनत करावी लागली. पण खरोखरीची नवी कार घेतल्यावर मात्र खरोखर पहिला बाहेरगावचा प्रवास हा चंद्रपूरचाच केला.


आमच्या बालपणी आजच्याइतके सामाजिक म्हणा, वैश्विक म्हणा एक्सपोजर आम्हाला नव्हते. आमचे विश्व आमचे आईवडील, शाळा, मित्र मैत्रिणी एव्हढ्यापुरतेच मर्यादित होते. अर्थात वडिलांनी वाचनाची आवड लावल्याने अगदी लहान वयापासून खूप मराठी साहित्य वाचले. त्या साहित्यातून बाह्य विश्वाशी आम्ही जोडले गेलेलो होतो. त्यामुळे आमच्या संकल्पना, आमच्या इच्छा आकांक्षा, आमचे हट्ट मर्यादितच असायचे. एका गावावरून दुस-या गावाला जाताना पारले ग्लुकोज बिस्कीटांचा एक अख्खा पुडा आपण एकट्याने संपविणे ही आमच्या चैनीची व्याख्या असायची. दरवेळी आई वडील आणि भावंडांसोबतच्या प्रवासात मध्ये एखाद्या थांब्यावर पारले बिस्कीटांचा पुडा आमचे दादा खरेदी करून आणत असत पण त्यातली दोन किंवा तीन बिस्कीटे वाट्याला येत असत. त्यामुळे पहिल्या एकल प्रवासात (अर्थात नागपूर ते चंद्रपूर) मी जांब बसस्थानकावर उतरून एक अख्खा बिस्कीटचा पुडा विकत घेऊन फ़स्त केला होता. सिकंदराला जग जिंकल्याच्या आनंदाइतका आनंद मला त्यावेळी झाला असल्याचे मला चांगलेच स्मरते.


आमच्या बालपणी आम्हाला "कधी एकदा कॉलेजात जाऊन शिकतोय !" असे झाले होते. आमची शाळा दररोज असायची. जावेच लागे. बहाणे वगैरे करून फ़ार तर एक दोन दिवस सुटी मिळेल, रोज रोज शाळेत जाणे, गृहपाठ करणे, मास्तरांच्या / मास्तरणींच्या छड्या खाणे, पी. टी. करणे सगळ्यांचा अगदी कंटाळा यायचा. एखादा दिवस तरी कारणाशिवाय पूर्ण ऑफ़ मिळावा असे मनापासून वाटे. पण तो मिळायचा नाही. आई दादा अगदी खनपटीला बसून शाळेत पाठवायचेच.


आमच्या मामे बहिणी, मावस बहिणी आमच्याहून सात आठ वर्षांनी मोठ्या होत्या. आम्ही शाळेत असताना त्या कॉलेजात जायच्यात. त्यांना मात्र त्यांच्या मर्जीप्रमाणे एखादे दिवशी दोनच लेक्चर्स करून परतणे, एखादे दिवशी इच्छा नसेल तर सरळ कॉलेजला दांडी मारून मित्र मैत्रिणींसोबत सिनेमाला जाणे वगैरे प्रकार करता यायचे. त्यांचे पालक त्यांना याबाबत काहीच बोलायचे नाहीत. त्यामुळे एकदा कॉलेजात गेलोत की हे सगळे न्यू नॉर्मल आहे अशी आमची भावना व्हायची आणि आपणही कॉलेजात गेल्यावर अशा मस्त सुट्या घेऊ, मनमर्जी लेक्चर्स करू अथवा बंक करू वगैरे आमच्या मनाचे बेत झालेले होते.


पण हाय रे दैवा ! आमचा प्रवेश शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात झाला आणि अधेमधे असे लेक्चर्स बंक केले तरी विचारणारे. टोकणारे कुणीही नसले तरी एक लेक्चर बंक केल्यानंतर त्यात झालेला अभ्यास भरून काढायला नंतर खूप तास स्वतःच अभ्यास करावा लागतो हे तत्व लक्षात आले आणि आम्ही सुधारलोत. कॉलेज शिक्षणाचे डोंगर आपल्याला वाटले होते तेव्हढे गवताळ, हिरवे नाहीत याची जाणीव आम्हाला प्रगल्भ करून गेली.


तसेच बाहेर खाण्याबाबत आमच्या घरी निर्बंध होते. आमचे दादा हौशी होते. महिन्यातून दोन तीन वेळा बर्डीवर जाऊन कॅफ़े वृंदावनचा दोसा, जगत ची भेळ, आनंद भंडारचे चोमचोम वगैरे मजा आम्ही सगळे कुटुंब मिळून करायचोत. पण रस्त्याशेजारच्या ठेल्यांवर समोसे खाणे, शाळेसमोर बसलेल्या एखाद्या मावशीच्या टोपल्यातले बोरकूट, उकडलेली बोरे, चूर्ण (उच्चारी चूरण) खायला मात्र आम्हाला पूर्ण मनाई होती. त्याकाळी खूप छानशी हॉटेल्स नागपुरात नव्हती आणि आम्हाला पॉकेट मनी वगैरे प्रकार मिळत नव्हता. त्यामुळे मनात इच्छा असूनही असे रस्त्यावरचे पदार्थ आम्हाला खाता आले नाहीत.


त्या दाबलेल्या भावनांचा परिपाक म्हणून कॉलेजला गेल्यावर हॉस्टेलला राहताना "आपण रोज एक प्लेट समोसा रोज संध्याकाळी खायचा बरं का" असा आमचा निर्धार होता. त्या निर्धाराचे पालन आम्ही हॉस्टेलला असताना पहिले ८ दिवस केले सुद्धा. पण नंतर नंतर त्यातले वैय्यर्थ कळले. ॲसिडीटी वाढली, भूक मंदावली, घरचा आईच्या हातचा फ़ोडणीचे वरण भात किती स्वर्गीय चवीचा असतो याची जाणीव झाली आणि त्या खाण्याला आम्ही आसूसलो. यानंतर जेव्हा जेव्हा बाहेर खाण्याचे प्रसंग आलेत तेव्हा केवळ अपरिहार्यता म्हणून आपण बाहेर खातोय ही भावना झाली आणि लहानपणी आईच्या हातचा मऊ मऊ मेतकूट भात, दूध पोळी आठवत गेले. "लहानपण दे गा देवा" ही हाक अधिक प्रबळरित्या मागितली गेली.


अर्थात काही काही दुर्दैवी बालकांचे लहानपण खूप खडतर गेले असेल आणि त्यांना आज त्या आठवणी सुद्धा नकोशा वाटत असतील. लहानपणीच अंगावर खूप मोठी कौटुंबिक जबाबदारी येऊन पडल्याने बिचा-यांच्या लहानपणी त्यांचे लहानपणच हरवले असेल आणि कधी एकदा मोठे होतोय असे त्यांना झाले असेल. मोठे होऊन आपापल्या क्षेत्रात उत्त्तम काम करून बिचा-यांनी आपल्या बालपणीच्या नकोशा जीवनावर मात सुद्धा केली असेल. त्यांच्या साठी "लहानपण दे गा देवा" हे कदाचित नसेल पण अशा अभागी जीवांना मोठ्या वयात सुद्धा त्यांच्या बालपणीसारखे जीवन जगायला मिळावे हीच प्रार्थना आपण मनापासून परमेश्वराकडे करू शकतो.


आज जाणवतय़ की मनातले बालपण जपणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे. मोठे होत असतानाही आपल्या मनातले खट्याळ मूल जपणे, कधीतरी छोट्या मुलासारखे निरागस होऊन निर्लेप जगणे, कधी कधी छोट्या मुलांसारखे आपल्या आयुष्यातले काही निर्णय स्वतः न घेता आपल्या कुटुंबियांवर (बालपणी जसा आई वडिलांवर होता तसा) विश्वास टाकून त्यांना घेऊ देणे आणि स्वतः त्याची चिकित्सा न करता अगदी लहान मुलांसारखे जगणे हे जमणे त्या त्या व्यक्तीच्या मनोवृत्तीवरच अवलंबून आहे, नाही का ? "लहानपण दे गा देवा" हे देवाकडे मागितल्यानंतर त्याने ते आपल्याला आता मोठे झाल्यावर कधी कधी दिले आहे ? हे ओळखण्याची बुद्धी मोठेपणीच आपल्याला प्राप्त होत असते, नाही का ? म्हणूनच "प्रौढत्वी निजशैशव जपणे" ही कवीकल्पना न होता प्रत्यक्ष जगण्याची संकल्पना होणे हाच जीवनविकास आहे.


- स्वतः प्रौढत्वी बालपण जपणारा, जगणारा, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


रविवार, २९/६/२०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५





 

Saturday, June 28, 2025

पहाटपक्षी बसेस

पुल म्हणतात की रात्रभर झोपून पहाटे उठून अनुभवलेल्या रेडिमेड पहाटेपेक्षा रात्रभर गाण्यांच्या, गप्पांच्या मैफिली जागवून नंतर आलेली पहाट ती जास्त सुंदर असते.


पण आमच्यासारखे "लवकर निजे, लवकर उठे" वर बालपणापासून विश्वास असलेल्या लोकांना रात्री सेकंड शो चे १२ वाजेपर्यंत जागरणच खूप वाटायचे. जागरण करायचे ते फक्त कोजागरीच्या रात्री आणि ते सुध्दा रात्री १२, १२.३० पर्यंतच. नंतर गाढ झोपेत निसूर. त्यामुळे पुलंनी वर्णन केलेली, रात्रभर जागून आलेली पहाट पहाण्याचे भाग्य जवळपास नाहीच.


पण पहाटे उठून जवळपास रोजच पुल म्हणतात तशी "रेडिमेड पहाट" बघण्याचे भाग्य अनंत वेळा मिळालेले आहे.  अगदी तशीच स्थिती महाराष्ट्र एस.टी. च्या बसेसबद्दल बघायला मिळते.


आमचा जन्म आणि बालपण महाराष्ट्रातल्या पूर्व भागातल्या शहरांमध्ये झाले. ही गावे महाराष्ट्राच्या एका टोकाला असल्याने तिथल्या बसस्टॅण्डवर रात्री येणा-या गाड्या रात्री उशीरात उशीरा १२, १२.३० पर्यंत येणार आणि सकाळी निघणा-या गाड्या पहाटे ३ , ३.३० ला सुरू होणार. रात्री ते बसस्टॅण्ड आमच्यासारखेच निवांत झोपी जाणार. भल्या पहाटे चुळबुळत जागे होणार. पहाटे पहिली बस निघत असली तरीही खरी वर्दळ सकाळी ५.३० , ६ वाजताच सुरू होणार. घरात आई, बाबा लवकर उठले तरीही घरातली इतर सगळी चिल्लीपिली सकाळी ६ वाजताच उठून आपापल्या दिवसभराच्या कामांना सुरूवात करणार तसेच हे. नागपूर म्हणा चंद्रपूर म्हणा हे असेच.


हे पहाटे पहाटे आळोखेपिळोखे देत जागे होणारे बसस्टॅण्डस फ़ार विलोभनीय असतात बरं का. आम्हा बसफ़ॅन्ससाठी अशी बसस्थानके म्हणजे नुकतीच सुस्नात होऊन घराबाहेर अंगणात सुरेख रांगोळी काढत असलेली सुवासिनीच. असे विलोभनीय आणि पुण्यदायक दृश्य खूप भाविकांना आवडते तसेच आम्हा बसफ़ॅन्सना असे पहाटे पहाटेचे नुकतेच उठलेले बसस्थानक बघायला आवडते. ब-याच दिवसांनी अशा बसस्थानकाला मी भेट दिली नव्हती म्हणून लॉकडाऊन काळानंतर मी चंद्रपूरच्या बसस्थानकाला मुद्दाम अशी पहाटे भेट देऊन मी त्याचे दर्शन केले होते. लिंक इथे.





मला वाटतं महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेल्या सगळ्याच बसस्थानकांना हे रात्री निवांत झोपी जाऊन पहाट अनुभवायचं सुख मिळत असेल. अगदी मुंबई - ठाण्याला सुद्धा. कराडला, सातारला, छत्रपती संभाजीनगरला, धुळ्याला, नाशिकला, जालना बसस्थानकाला मात्र हे सुख नाही. बिचारे रात्रभर जागे असतात. कराड बसस्थानकावर रात्री उशीरापर्यंत कोल्हापूर - सांगली जिल्ह्यातल्या अनेक गावांमधून मुंबईला जायला निघणा-या गाड्यांची वर्दळ असते तर पहाटे अगदी लवकर मुंबई - ठाणे - नाशिकवरून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या लहान लहान गावांपर्यंत जाणा-या गाड्यांची सुरू होते. विश्रांती अशी नाहीच.


सातारा बस स्थानक तर रात्री ९ वाजण्याच्या सुमारासच ख-या अर्थाने जागे होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मी कराडवरून पुणे / शिर्डी / नगर/ नाशिक / मुंबईला दरवेळी जाताना आणि येताना सातारा बसस्थानक दिवसाच्या प्रत्येक तासाला आणि रातीच्या बहुतांश तासाला बघितलेले आहे. दिवसा या बसस्थानकावर गाड्यांची गर्दी असते खरी पण रात्री हे बसस्थानक खरे जागृत होते असे म्हणायला हरकत नाही. दिवसा केवळ प्रवाशांची सोय म्हणून जागे असणारे हे बसस्थानक रात्री अक्षरशः जिवंत होते. एकेकाळी सातारा बसस्थानकाचे एस. टी. कॅण्टीन उत्कृष्ट चवीचे जेवण व इतर खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध होते. त्यामुळे मुंबई - पुणे - नाशिककडे जाणा-या बहुतांशी बसगाड्या सातारा स्थानकावर जेवणाची वेळ असेल अशा पद्धतीने त्यांचे वेळापत्रक आखायच्यात. सातारा स्थानकावर पोचल्यावर गाडी फ़लाटावर न लावता फ़लाटासमोरच्या अंधारात उभी करून, सगळ्या प्रवाशांना जेवणासाठी उतरवून, गाडी लॉक करून चालक आणि वाहक सातारा बसस्थानकाच्या कॅण्टीनमध्ये जेवण करताहेत हे दृश्य अनेकदा दिसायचे.


छत्रपती संभाजीनगर म्हणजे महाराष्ट्राचा मध्यबिंदूच. त्यामुळे इथे रात्रभर इकडून तिकडे आणि तिकडून इकडे जाणा-या गाड्यांची वर्दळ अपरिहार्यच. रात्रभर न झोपता हे बसस्थानक पुलंच्या रसिक माणसासारखी पहाट अनुभवत असणार हे नक्की. तसेच आमचे धुळे बसस्थानक, तसेच जालना बसस्थानक. नागपूरवरून पुण्याला एस. टी. बसने जाताना पहिला क्रू (चालक - वाहक) बदलतो तो अकोला स्थानकात आणि दुसरा क्रू बदलतो तो जालना बसस्थानकात. त्या कारणामुळे या दोन्हीही बसस्थानकात ही बस जरा जास्त वेळ थांबा घेते. त्यामुळे या दोन्हीही बसस्थानकात नागपूर - पुणे बस थोडीशी डुलकी घेते आणि लगेच सावध होऊन आपल्या सेवेला लागते असे मला कायम वाटत आलेले आहे.


नागपूरला पहाटे पहाटे निघणा-या पहाटपक्षी बसेस म्हणजे पहाटे ३.४५ ला निघणा-या नागपूर टपाल गाडी चंद्रपूर आणि त्याच्याच शेजारच्या फ़लाटावरून निघणारी नागपूर टपाल गाडी उमरखेड. त्याकाळी आजच्यासारखी छपाईच्या तंत्रज्ञानात प्रगती झालेली नव्हती. नागपूरात छापली जाणारी तरूण भारत, लोकमत, नागपूर पत्रिका, हितवाद ही दैनिके बाहेरगावच्या टपाल आवृत्त्या रात्री लवकर छापून ते गठ्ठे या बसेसने अनुक्रमे चंद्रपूर आणि वर्धा, यवतमाळ, आर्णी, माहूर, उमरखेड इथे पाठविले जायचे. इथल्या लोकांना नागपूरची दैनिके सकाळी थोडी उशीरा वाचायला मिळायची.


त्यानंतर नागपूर बसस्थानक पुन्हा सामसूम झोपी जायचे. मध्ये एकदा पंढरपूर - नागपूर, बुलढाणा - नागपूर बसेस आल्या की तेव्हढ्यापुरते जागे व्हायचे पण मुख्यतः झोपलेलेच असायचे. नागपूर बसस्थानकाला खरी जाग यायची ती पहाटे ५.३० ला निघण-या नागपूर सुपर अहेरी, नागपूर जलद पुसद, नागपूर जलद इंदूर या गाड्यांच्या वर्दळीमुळे. अहेरी आगाराची बस आदल्या दिवशी रात्रीच येऊन त्या काळच्या फ़लाट १९ समोरच्या जागेत झोपलेली असायची. पहाटे ५ वाजता त्या बसची हालचाल सुरू होऊन ती फ़लाटावर लागत असे. तसेच पुसद डेपोच्या गाडीचे. नागपूर - इंदूर ही गाडी मात्र नागपूर - २ (आताचे गणेशपेठ) आगाराची असे. ती छान धुवून पुसून नागपूर - २ आगारातून बाहेर यायची आणि फ़लाट १ वर उभी असायची. सुंदर तयार झालेली ती बस पाहून खूप छान वाटायचे.



त्याकाळी चंद्रपूरवरून निघणा-या पहाटपक्षी बसेस म्हणजे सकाळी  ५.३० ला निघणारी चंद्रपूर जलद नागपूर, सकाळी ६.०० ला निघणा-या चंद्रपूर सुपर नागपूर आणि चंद्रपूर जलद शेगाव तर त्यापाठोपाठ सकाळी ६.३० ला निघणारी चंद्रपूर जलद आर्वी. यातली आर्वी बस फ़क्त बाहेरच्या आगाराची (अर्थात आर्वी) असायची. इतर बसेस चंद्रपूर आगाराच्याच असायच्यात.  


चंद्रपूर बसस्थानकावरून पहाटे साडेपाचची बस गाठायची म्हणजे पहाटे चारला उठून सगळी आन्हिके उरकावी लागायचीत. अगदी अंघोळ वगैरे सुद्धा. कारण नागपूरला सकाळी ९.०० ला पोहोचल्यानंतर वाड्यात नळ गेलेला असायचा. मग कसली अंघोळ आणि कसली आन्हिके ? स्वयंपाकापुरते आणि दिवसभर पिण्यापुरते घडाभर पाणीसुद्धा शेजारून मागून आणावे लागायचे. 


पहाटे साधारण सव्वापाचच्या सुमारास चंद्रपूरला स्टॅण्डवर पोहोचलो की साडेपाचची नागपूर, सहाची नागपूर आणि सहाची चंद्रपूर - शेगाव या तिन्ही गाड्या चंद्रपूर डेपोच्या प्रवेशद्वाराशी थांबलेल्या असायच्यात. त्यात "नेमकी नवी गाडी आज साडेपाचची देऊ देत" म्हणून आम्ही प्रार्थना करायचो पण ९९.९९ % वेळा ही प्रार्थना फ़लद्रूप व्हायची नाही. बाहेर अजूनही अंधार असल्याने आत सगळे दिवे लावलेली साडेपाचची जलद डेपोबाहेर यायची आणि फ़लाटावर लागायची.


ही साडेपाचची बस जरा लेकुरवाळ्या स्वभावाची असे. ही बस चंद्रपूरवरून निघाली की भद्रावती गावाआधी असलेल्या भद्रावतीच्या आयुध निर्माण वसाहतीत जायची. ही एकमेव बस या मार्गे जायची. मग तिथले प्रवासी घेऊन, भद्रावती शहरात असलेल्या बसस्टॅण्डवर जाणे, पुन्हा महामार्गावर परतणे, वरो-याला रेल्वे फ़ाटक ओलांडून गावात असलेल्या बसस्टॅण्डवर जाणे, पुन्हा फ़ाटक ओलांडून महामार्गावर येणे, या गदारोळात एकदा किंवा दोन्हीवेळा रेल्वेचे फ़ाटक बंद असले की खोळंबा सहन करणे या सगळ्या निवांतपणात सहाची सुपर भद्रावती आणि वरोरा थांबे न घेता पुढे निघून गेलेली असायची. जांब बसस्थानकात साडेपाचची बस शिरताना, सहाची बस वाकुल्या दाखवत निघायच्या तयारीत असायची. त्यामुळे आपण साडेपाचच्या बसमध्ये असलो की सहाच्या बसचा राग यायचा आणि सहाच्या बसमध्ये असलो की साडेपाचच्या बसची कीव यायची. 


मुंबईला नोकरी करीत असताना आम्ही नागपूर ते मुंबई हा प्रवास बहुतांशी वेळा विदर्भ एक्सप्रेसने करायचोत. तेव्हा विदर्भ ठाण्याला थांबायची नाही. आम्हाला एक तर कल्याणला किंवा दादरला उतरावे लागे. पहाटे पहाटेचीच वेळ असायची. त्या स्थानकांमध्ये अगदी सकाळी सकाळी छान तयार होऊन आपापल्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी लोकल गाडीने ऑफ़िसला / कामधंद्याला निघालेले चाकरमानी दिसायचे. सकाळी कामावर निघालेली माणसे कशीही असोत ती मला कायम प्रसन्न वाटत आलेली आहेत. ही मुंबई मला फ़ार आवडायची. सगळ्यांना काही ना काही काम देणारी आणि दिलेल्या कामावर निष्ठा ठेवणारी.


आजही मी सकाळी माझ्या महाविद्यालयात जायला निघालो की मला आपापल्या ठिकाणांवरून नागपूरला येणा-या अशा पहाटपक्षी बसेस भेटतात. यवतमाळ - नागपूर, चंद्रपूर - नागपूर, वणी - नागपूर, पांढरकवडा - नागपूर, चंद्रपूर - तिरोडा. सगळ्या. पहाटे पहाटे आपापल्या गावांवरून निघून ऑफ़िसच्या, इतर घाईच्या कामांसाठी प्रवाशांची सेवा करीत धावत असलेल्या या पहाटपक्षी बसेस पाहिल्यात की घरी लवकर उठून, आवरून घेऊन, सुस्नात होऊन आपल्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी घराबाहेर पडून मेहेनत करणा-या मुंबईच्या चाकरमान्यांची, घरधन्याची आणि घरधनीणीची आठवण येते. त्यांच्याविषयी उगाच ममत्व दाटून येतं. माणसांच्या जिद्दीला, आकांक्षांना पहाटे उठून आपल्या अगदी वेळेवर धावण्याने बळ पुरविणा-या या पहाटपक्षी बसेस. यांच्याविषयी आदर, ममता दाटून येते. या कितीही जुन्या असल्यात तरी यांच्या  कर्तव्यपालनाने या नवीनच वाटतात. (हल्ली अगदी नवीन को-या बसेस या सगळ्या मार्गांवर यायला लागल्या आहेत म्हणा. आजकाल सगळ्या बसेस MH - 14 / MH XXXX या नव्या सिरीजच्या दिसताहेत.) 



तसेही मेंदी लावलेले हात कितीही सुंदर दिसलेत, त्यावर आपले प्रियजन कितीही फ़िदा असलेत; तरी आपल्या कुटुंबासाठी पहाटे उठून जात्यावर धान्य दळून हाताला घट्टे पडलेला हात हा खुद्द त्या विधात्यालाच जास्त विलोभनीय वाटत असतो, नाही का ?



- बसेसना मानवी रूपात अनुभवणारा बसफ़ॅन प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


शनिवार, २८ जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५


Friday, June 27, 2025

पंचायत

बरोबर वर्षभरापूर्वी याच दिवशी संध्याकाळी २०२३ - २४ या शैक्षणिक वर्षाची सांगता झाली होती. सगळ्या लेखी परिक्षा, तोंडी परिक्षा संपल्या होत्या. विद्यार्थ्यांना आणि आम्हा शिक्षकांना  उन्हाळी सुट्या मिळाल्या होत्या आणि आमच्या सदैव व्यग्र, व्यस्त मेंदूला आवश्यक असलेली विश्रांती मिळालेली होती.


गेल्या दोन वर्षांपासून लेक आग्रह करत होती., "बाबा 'पंचायत' बघ 'पंचायत' बघ म्हणून" दरवेळी काही ना काही कामे असतात. निवांतपणा असा मिळतच नाही. यावेळी मात्र ती खनपटीलाच बसली होतीआणि तिचे मन राखायचे म्हणून मी सुध्दा सुट्यांच्या पहिल्या तीन दिवसात "पंचायत" या वेब सिरीजचे तीनही सीझन्स बघून काढलेत.



तसा मी ओटीटी प्लॅटफ़ॉर्मसचा फार मोठा चाहता नाही. सगळ्या ओटीटी प्लॅटफ़ॉर्मसच्याच म्हणण्यानुसार या सगळ्या प्लॅटफ़ॉर्मसची स्पर्धा एकमेकांशी नसून माणसांच्या झोपेशी आहे. आणि परमेश्वर कृपेने आजवर तरी रात्री वरणभात - ताकभात खाऊन संपला की धुतलले हात वाळेपर्यंत आम्ही निद्रादेवीच्या राज्यात शिरलेलो असतो. अगदी घनघोर निसूर. लोकांना जागे ठेऊन, डोळे तारवटून  ओटीटी वरच्या वेबसीरीज पहायला लावणार्‍या प्लॅटफ़ॉर्मसशी आमचे जमावे कसे ?


पण "पंचायत" खूप आवडली होती. तीनही सीझन्स खूप पटले, भावले होते.


यावर्षी उन्हाळी सुट्या संपता संपता पंचायत चा ४ था सीझन आला. दोन दिवसातच आम्ही बघून काढला. हा भागही खूप आवडला. 


या भागात पंचायतच्या राजकारणाच्या चित्रिकरणावर जास्त भर दिला गेलाय. आणि कुठेही अनैसर्गिक, नुसती Hero Worship न दाखवता गावातले राजकारण आणि त्याचा खराखुरा परिपाक दाखवलेला आहे. पंचायतमधल्या सत्ताधार्‍यांवर काही काही कानपिचक्या सुध्दा दिलेल्या आहेत. पुढच्या भागाची चुटपुट लावून एखाद्या ओटीटी सिरीजचा भाग संपवणे ही प्रत्येक सिरीजची व्यावसायिक गरज असते तसा शेवट इथेही केलेला आहे. शेवटावर काही काॅमेंट करून मी ही सिरीज बघणार्‍या भावी दर्शकांचा रसभंग करू इच्छित नाही. पण एव्हढेच सांगतो की पुढल्या भागात लेखक आणि दिग्दर्शकाकडून या भागासारख्याच खूप बॅलन्स्ड आणि प्रगल्भ कथेची आणि दिग्दर्शनाची अपेक्षा असेल. कुठेही आक्रस्ताळे किंवा अवास्तव न होता पंचायतीच्या पातळीवर भारतीय लोकशाहीचे खरे दर्शन यापुढल्या भागात दर्शकांना घडविण्याचे शिवधनुष्य लेखक, दिग्दर्शकाला पेलावे लागेल. यात त्यांची खरी कसोटी लागेल.


यात विशेष उल्लेखनीय गोष्ट अशी की जरी हे चारही सीझन्स साधारण तीन वर्षांच्या कालखंडात चित्रित झाले असतील तरी यात काम करणार्‍या सगळ्याच पात्रांचे बेअरींग तसूभरही हललेले नाही. जणू काय हे चारही भाग एकसाथच सलग चित्रित केले गेल्यासारखा या सर्व प्रमुख पात्रांचा अभिनय आहे. त्यात प्रधानमॅडम असोत, प्रधानजी असोत, उपप्रधानजी असोत, सचिवजी असोत, बनराकस असो किंवा रिंकी असो.


विशेष म्हणजे या अडीच तीन वर्षात सगळ्यांच्या प्रकृतीत, शरीरयष्टीतही जाणवावा असा फरक पडलेला नाही. ही एक गोष्ट जरी आपण निसर्गाची देणगी म्हणून सोडून दिली तरी चित्रिकरणादरम्यान पडलेल्या लांब गॅपनंतरही अभिनयातले एकसंध बेअरींग कायम ठेवणे हे खरोखर कौतुकास्पद आहे. 


१९७० - ८० च्या दशकातल्या सिनेमांमध्ये इंटरव्हलपूर्वीच्या सिनेमातले बेअरिंग इंटरव्हलनंतरच्या भागात कायम ठेवणे त्या काळातल्या "महानायक" वगैरे समजले जाणार्‍या सुपरस्टार्सना कधी जमले नव्हते त्यामानाने हे खरोखर स्पृहणीय आहे.


एक मात्र नक्की. पंचायत सीझन ५ आला तर तो आवर्जून बघणार्‍या पहिल्या काही मंडळींमध्ये माझा समावेश नक्की असेल.


- उत्कृष्ट कलाकृतींचा, चित्रपट, नाट्य, साहित्य, संगीत, ललित कलांचा मनापासूनचा आस्वादक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.


शुक्रवार, २७ जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५