Monday, June 9, 2025

नागपूर ते कराड चा एक वेगळा प्रवास

तसे पहायला गेले तर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात कराडला शिक्षण घेणारा तो नागपूरचा तरूण तसा स्थिरावला होता. जवळपास दोन वर्षे झालेली होती. तो तरूण तसा अर्धा अभियंता होतच आलेला होता. घरापासून ११०० किलोमीटर दूर राहण्याचे, २५ तासांच्या प्रवासाचे कौतुक आता ओसरले होते. ते अंतर, तो प्रवास त्याने आणि त्याच्या कुटुंबियांनी स्वीकारलेला होता. गेल्या दीड पावणेदोन वर्षात नागपूरच्या या वैदर्भिय तरूणाने कराडला आपले अर्धे घर मानले होते. तिथे तिथला मित्रपरिवार, कराडमधल्या काही कुटुंबांमध्ये अगदी घरगुती संबंध, सातारा जिल्हा विद्यार्थी परिषदेचे काम करीत असताना सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्हे अगदी गावागावांपर्यंत पिंजून काढणे हे त्याच्यातल्या गोष्टीवेल्हाळ तरूणाला आणि प्रवासी पक्षाला आवडले होते. तसा तो तिथे स्थिरावला होता.


बालपणापासून घडघड वाचन करून एखादी गोष्ट पाठ करण्याची त्या तरूणाची सवय होती. ती चांगली की वाईट हे तो आजही ठरवू शकत नाही. दोन तीनदा एखादा धडा घडघड वाचला की त्याला तो जवळपास पाठच व्हायचा आणि त्याच शब्दरचनेसह तो तसे परिक्षेत लिहू शकायचा. मनातल्या मनात वाचून एखादी गोष्ट लक्षात राहण्याची त्याची क्षमताच विकसित झालेली नव्हती. घरी अभ्यास करताना ही गोष्ट कितीही फ़ायदेशीर असली तरी हॉस्टेलला राहताना मात्र या सवयीचा त्याच्या रूम पार्टनर्सना त्यांच्या त्यांच्या अभ्यासात अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. आणि त्याच्यासकट तिथल्या सगळ्यांचेच घरचे संस्कार असे होते की "आपल्या नकळतही आपल्यामुळे दुस-या एखाद्याला त्रास होऊ नये." त्यामुळे हॉस्टेलला राहत असताना त्या तरूणाने घडघड वाचन करून कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास करण्याच्या स्वतःच्या अशा काही वेगळ्या पद्धती शोधलेल्या होत्या. त्या पद्धती एका वेगळ्याच लेखाचा विषय आहे.


मग तो तरूण दरवेळी महाविद्यालयाला अभ्यास करण्यासाठी सुट्ट्या (Preparation Leaves) मिळाल्यात की आपल्या अभ्यासाचे नियोजन करून आपली अभ्यासाची पुस्तके, नोटस वगैरे घेऊन १० - १५ दिवसांसाठी नागपूरला त्याच्या घरी रहायला आणि अभ्यासाला येत असे. घरच्या सगळ्यांची माया ओसंडून जाणारी भेट, घरचे खाणेपिणे आणि घरी आईच्या शिस्तीत अभ्यास अगदी व्यवस्थित होत असे. परिक्षेला अगदी एक दोन दिवस उरलेत की तो तरूण नागपूरवरून प्रस्थान ठेवत असे आणि कराडला हॉस्टेलला परतत असे.


त्याकाळी तो तरूण शिकत असलेले कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ हे संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या शैक्षणिक शिस्तबद्ध वेळापत्रकाबद्द्ल प्रसिद्ध होते. अजूनही विद्यापीठाने ही परंपरा जपलेली आहे असे ऐकिवात आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेली विषम सहामाही (Odd Semester) साधारण ऑक्टोबरमध्ये संपत असे. नोव्हेंबर महिन्यातले दोन तीन आठवडे अभ्यास करण्यासाठी सुट्ट्या (Preparation Leaves) असत आणि नोव्हेंबर महिन्याच्या तिस-या आठवड्यात तोंडी परिक्षांना (Viva Voce Examinations) सुरूवात होत असे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटल्या सोमवारी पहिल्या आणि पाचव्या सत्रांची विद्यापीठ स्तरावरील परिक्षा अनुक्रमे सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात सुरू होत असे. आणि एक दिवसाआड पेपर्स होऊन डिसेंबरच्या पहिल्या शुक्रवारी पहिल्या आणि पाचव्या सत्राची परिक्षा अनुक्रमे सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात आटोपत असे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटल्या मंगळवारी तिस-या आणि सातव्या सत्रांची विद्यापीठ स्तरावरील परिक्षा अनुक्रमे सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात सुरू होत असे. आणि एक दिवसाआड पेपर्स होऊन डिसेंबरच्या पहिल्या शनिवारी तिस-या आणि सातव्या सत्राची परिक्षा अनुक्रमे सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात आटोपत असे. ज्या क्रमाने विद्यापीठाच्या माहिती पत्रकात, सिलॅबसमध्ये विषय आहेत त्याच क्रमाने ही परिक्षा होत असे. या परिक्षांचे निकाल जानेवारीच्या पहिल्या किंवा फ़ारतर दुस-या आठवड्यात जाहीर होत असत. हे सगळे अतिशय शिस्तबद्ध असे त्यामुळे सगळ्यांना त्या यंत्रणेची त्यातल्या शिस्तीची सवय झालेली होती. त्या तरूणाचे काही मित्र त्यावेळी नागपूर विद्यापीठात अभियांत्रिकी करीत होते. त्यांच्याकडला अतिशय बेशिस्त कारभार, कुठलेही ॲकेडेमिक कॅलेंडर नाही, कधीही परिक्षा आणि कसेही निकाल लागण्याची परंपरा हे सगळे बघितल्यानंतर आपण शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत याचा त्याला खरोखर अभिमान वाटत असे. 


इकडे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेली सम सहामाही (Even Semester) साधारण एप्रिल महिन्याच्या शेवटी संपत असे. मे महिन्यातले दोन तीन आठवडे अभ्यास करण्यासाठी सुट्ट्या (Preparation Leaves) असत आणि मे महिन्याच्या तिस-या आठवड्यात तोंडी परिक्षांना (Viva Voce Examinations) सुरूवात होत असे. मे महिन्याच्या शेवटल्या सोमवारी दुस-या आणि सहाव्या सत्रांची विद्यापीठ स्तरावरील परिक्षा अनुक्रमे सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात सुरू होत असे. आणि एक दिवसाआड पेपर्स होऊन जून महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी दुस-या आणि सहाव्या सत्राची परिक्षा अनुक्रमे सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात आटोपत असे. मे महिन्याच्या शेवटल्या मंगळवारी चौथ्या आणि आठव्या सत्रांची विद्यापीठ स्तरावरील परिक्षा अनुक्रमे सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात सुरू होत असे. आणि एक दिवसाआड पेपर्स होऊन जून महिन्याच्या पहिल्या शनिवारी चौथ्या आणि आठव्या सत्राची परिक्षा अनुक्रमे सकाळच्या आणि दुपारच्या सत्रात आटोपत असे. या परिक्षांचे निकाल जुलैच्या पहिल्याच आठवड्यात जाहीर होत असत. अगदी शिस्तबद्ध कारभार.


असाच तो तरूण एप्रिलच्या शेवटल्या आठवड्यात अभ्यासाच्या सुटीत (Preparation Leaves) नागपूरला आलेला होता आणि मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कराडला परत जायला निघाला होता. नेमके त्याच वेळी एका विषयाची तोंडी परिक्षा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात असल्याचे वर्तमान त्या तरूणाला कळले होते आणि आपली अभ्यासाची सुट्टी गुंडाळून तो लगेचच परत जायला निघालेला होता. ज्या दिवशी परिक्षा आहे त्याच्या आदल्याच दिवशी नागपूरवरून निघण्याचे आणि परिक्षेच्या दिवशीच सकाळी कराडला पोहोचण्याचे नियोजन त्या तरूणाने केलेले होते. घरचा जास्तीत जास्त सहवास घेण्याच्या दृष्टीनेच त्या मनुष्यवेल्हाळ तरूणाने इतक्या ऐनवेळी पोहोचण्याचे ठरविले होते. त्याला कराडला घेऊन जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस सकाळी १० वाजून ४० मिनीटांनी नागपूरवरून निघत असे आणि तब्बल २५ तासांच्या प्रवासानंतर दुस-या दिवशी सकाळी ११ वाजून ३० मिनीटांनी कराडला पोहोचत असे. 


त्या तरूणाचा आजवरच्या तीनही सत्रातल्या या तोंडी परिक्षांचा (Viva Voce Examinations) अनुभव असा होता की या परिक्षांना बाह्य परिक्षक (External Examiners) म्हणून येणारी प्राध्यापक मंडळी सांगली, वारणानगर, सातारा येथल्या त्यांच्या त्यांच्या महाविद्यालयातून साधारण १०, १०:३० वाजता प्रस्थान ठेवीत असत आणि बसने कराडला साधारण १२, १२:३० पर्यंत  येऊन मग ती दुपारी १, १:३० च्या सुमारास त्या परिक्षा सुरू होत असत. प्राध्यापक मंडळींकडे स्वतःची चारचाकी असण्याच्या सुबत्त्तेचा तो काळ नव्हता हो. त्या परिक्षांना सामोरे जाणारे विद्यार्थी बिचारे सकाळी १० वाजल्यापासूनच त्या त्या (Internal Examiner) प्राध्यापकांच्या केबिनबाहेर, त्या त्या विषयाच्या प्रयोगशाळेबाहेर ताटकळत बसलेली असत. ते बाह्य परिक्षक (External Examiner) दुपारी एकदाचे येताना दिसलेत की कोलंबसाच्या जहाजावरील खलाशांना त्यांच्या समुद्री प्रवासात खूप काळानंतर जमिनीवरचे पक्षी दिसून जमीन जवळ असल्याचा जसा आनंद झाला होता तसा आनंद त्या सगळ्या ताटकळलेल्या, भुकेजलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना होत असे. तीन सत्रांचा हा अनुभव असल्याने आपल्या कथेतल्या या नायक विद्यार्थ्याने परिक्षेच्या दिवशीच सकाळी ११:३० वाजेपर्यंत कराडला पोहोचण्याचा धोका पत्करला होता. अगदी आदल्या दिवशी नागपूरवरून निघाला होता आणि ऐन परिक्षेच्या दिवशी कराडला पोहोचणार होता. गेल्या तीन सत्र परिक्षांचा अनुभव त्याच्या पाठीशी होता त्यामुळे त्याची महाराष्ट्र एक्सप्रेस अगदी दुपारी १२ वाजता कराडला पोहोचली असती तरी त्याला चालणार होते.

नागपूर स्टेशनवर त्याला गाडीवर सोडायला नेहमीप्रमाणे त्याचे आई वडील आणि त्याची लहान भावंडे आलेली होती. गाडीत चढताना गाडीच्या दाराशेजारी लावलेला रिझर्वेशन चार्ट बघण्याची त्या तरूणाची नेहेमीची सवय. त्याचा बर्थ नंबर २४ म्हणजे साईड अप्पर बर्थ होता. त्याच्या बर्थ बे मधले (बर्थस नंबर १७ ते २३) त्याचे सगळे सहप्रवासी कुणी वर्धा, कुणी बडनेरा इथून येणार होते. वय वर्षे १८ ते २५ मधल्या तरूणाईच्या उत्सुकतेने त्याने त्याच्या बर्थ बे मधल्या सहप्रवाशांची वये बघितली. नावांकडे त्याने लक्ष दिले नाही. त्याला आश्चर्याचा धक्का म्हणजे कधी नव्हे ते त्याच्या बे मध्ये सहा सहप्रवासी F 20 ते F 24 असे होते. ही सगळी मुले मुले कराडला सत्राच्या प्रारंभी जाताना किंवा सत्रावसान झाल्यावर परतताना त्या सगळ्यांचीच ही नेहमीच इच्छा असायची की आपल्याला अशी छान कंपनी मिळाली पाहिजे. पण दरवेळी त्या सगळ्यांचीच निराशा होत असे. प्रत्येकाच्या बे मध्ये  सहप्रवाशांची वये जर 20 ते 24 असलीत तर त्यांच्या मागे M असायचे. आणि F असलीत तर त्या F च्या समोर वये 56 ते 68 अशी असायची. त्यामुळे त्या सगळ्यांचीच निराशा व्हायची. यावेळी तो तरूण तसा आनंदित होता. 


महाराष्ट्र एक्सप्रेस हलली. निरोपांची देवाणघेवाण, हात हलविणे वगैरे सगळे पार पडले. दरवेळी कराडला जाताना दरवेळी घराच्या वियोगाचे दुःख असले तरी यावेळी सुखाची गोष्ट एव्हढीच होती की साधारण महिन्याभरात सगळ्या परिक्षा आटोपून त्याला पुन्हा नागपूरला परतायचे होते. तो तरूण त्याच्या जागेवर बसला. खिडकीची जागा, नागपूर ते वर्धा त्या ८ बर्थसच्या बे मध्ये एकट्याचाच प्रवास आणि वर्धेला चढणा-या सहप्रवाशांच्या प्रतिक्षेची हुरहुर. गाडीच्या चाकांच्या खडखडाटात त्या तरूणाला "स्वप्नातल्या कळ्यांनो" वगैरे गाणी ऐकू येऊ लागली. गाडीच्या खडखडाटात त्याने आपला सूर मिसळून माहिती होती नव्हती तेव्हढी सगळी भावगीते वगैरे गाऊन घेतली. त्याचा मूड चांगलाच लागला होता.


तासा दीड तासाच्या प्रवासानंतर वर्धा स्टेशन आले. आणि रिझर्वेशन चार्टवर लिहील्याप्रमाणे त्याच्या बे मध्ये F 20 ते F 24 अशा सहा सहप्रवाशांनी आपापल्या जागा घेतल्यात. ती सगळी मंडळी पुण्यापर्यंत जाणार हे त्यांच्या आपापसातल्या गप्पांमधून कळत होते. त्या तरूणाने मग उगाच आपल्या बॅगमधून Engineering Geology चे आपले क्रमिक पुस्तक काढले आणि पुलंच्या मधू मलुष्टेच्या स्टाईलने "इंजिनीअरींग चा कोर्स म्हणजे काय डिफ़िकल्ट असतो ! तयारी तयारी म्हणजे किती करावी लागते !" वगैरे टॅण टॅण टॅण प्रत्यक्ष शब्दांनी नसले तरी कृतीने दाखविण्याचा चंग बांधला. पुस्तकातून डोके बाहेर काढून मध्ये मध्येच खिडकीतून बाहेर बघणे अशा शिष्टपणा सुरू होता. बे मधल्या प्रवाशांच्या गप्पांचा आवाज मध्येच वाढला तर स्वतःला डिस्टर्ब होत असल्याच्या त्रासिक नजरेने बे मध्ये बघणे वगैरे त्याची लटकी नाटके सुरू होतीच. बे मधला एकच प्रवासी आता येण्याचा बाकी होता. तो प्रवासी बडनेरा इथून चढणार होता.


त्याकाळी महाराष्ट्र एक्सप्रेसला वर्धा ते बडनेरा प्रवासासाठी जवळपास २ तास लागायचेत. तशी ती गाडी बडने-याला दुपारी दीड पावणेदोनच्या सुमाराला पोहोचली. महाराष्ट्र एक्सप्रेसला पुढून येणारी महाराष्ट्र एक्सप्रेस तीन ठिकाणी क्रॉस व्हायची. आदल्या दिवशी कोल्हापूरवरून निघालेली गाडी दुस-या दिवशी दुपारी बडने-याला, त्याच दिवशी कोल्हापूरवरून निघालेली गाडी त्याच दिवशी रात्री अहिल्यानगर जवळ विळद स्टेशनला आणि दुस-या दिवशी कोल्हापूरवरून निघालेली गाडी कोल्हापूरजवळच्या हातकणंगले स्टेशनला. तशी ती महाराष्ट्र एक्सप्रेस बडने-याला उभी होती. हा तरूण रेल्वेफ़ॅन ती महाराष्ट्र एक्सप्रेस बघण्यासाठी बडने-याला खाली उतरला आणि पुरेसे रेल्वेफ़ॅनिंग करून डब्यात बसला तोच...


त्याच्या लक्षात आले की त्याच्या बे मधला जो सहप्रवासी बडने-यावरून बसणार होता ते त्याच्या महाविद्यालयाचे प्राचार्य जी. सी. मानकर सर होते. मघाशी रिझर्वेशन चार्ट बघताना आपल्या बे मध्ये F 20 ते F 24 पाहूनच तो तरूण इतका हरखला होता की घाईघाईत सगळ्याच सहप्रवाशांची नावे वाचायला तो विसरला होता. मानकर सर त्यांच्या अमरावतीच्या घरून कराडला कामावर रूजू व्हायला निघालेले होते. गेल्या दोन वर्षात त्याचा आणि मानकर सरांचा चांगलाच परिचय झाला होता. त्या तरूणाची नाट्य मुशाफ़िरी, त्याने महाविद्यालयाकडून भाग घेतलेल्या आणि जिंकलेल्या बहुतांशी वक्तृत्व स्पर्धा, नाट्य स्पर्धा यामुळे प्राचार्य सर त्याला ओळखत होतेच. मानकर सर एक व्यक्ती म्हणून किती महान होते याचा प्रत्यय त्या तरूणाने यापूर्वीही दोन वेळा घेतला होता. (या दोन्हीही घटना पुन्हा एकेका स्वतंत्र लेखांचे विषय आहेत.)


मानकर सरांना त्या तरूणाला बघून खरोखर फ़ार आनंद झाला होता. त्या तरूणाच्या मनात मात्र सरांना बघून थोडीशी भिती वाटत होती. आणि थोड्याच वेळात त्याची ती भिती प्रत्यक्षात आली.





महाराष्ट्र एक्सप्रेसच्या स्लिप कोचेसचा विक्रम इथे


सुरूवातीच्या साध्या साध्या गप्पांनंतर मानकर सरांनी त्या तरूणाला नको तो प्रश्न विचारलाच. "कायरे, कधीपासून सुरू आहेत तोंडी परिक्षा ?" त्या तरूणाला खोटे बोलणे जमत नव्हते आणि त्याक्षणी तो वेळ मारून न्यायला जरी खोटे बोलला असता तरी ते खोटे एका दिवसात उघड झालेच असते. त्यानंतर मानकर सरांसमोर जायला त्या तरूणाला कधीही तोंड उरले नसते त्यामुळे त्याने खरे खरे सांगितले, "सर उद्याच पहिली परिक्षा आहे."


"गाढवा ! आणि तू आज जायला निघतोयस." सर इतक्या जोरात त्याच्यावर ओरडले की वर्धा ते बडनेरा प्रवासात त्याने F 20 ते F 24 या आपल्या सहप्रवाशांवर इम्प्रेशन जमवायला केलेले सगळे प्रयत्न एका वाक्यात वाहून गेलेत. त्याच्या बे मधली सगळी प्रवासी मंडळी या दोघांच्या संभाषणाकडे लक्ष देऊन बघू लागली. "अरे बावा, ही गाडी उद्या ११:३० ला पोहोचेल. तुमची परिक्षा सकाळी १०:३० वाजता सुरू होते. आपण कॉलेजात जाईतोवर तुझा नंबर येऊन तुझी परिक्षा होऊन गेली म्हणजे मग काय करशील ?" सर अजूनही सात्विक रागाने रागावतच होते.


"सर, पण आमच्या परिक्षा कधीच इतक्या लवकर सुरू होत नाहीत. माझा गेल्या ३ सेमिस्टर्सचा अनुभव आहे." त्या तरूणाने व्यावहारिक असलेले असलेले पॉलिटिकली इनकरेक्ट उत्त्तर त्याच्या प्राचार्यांना दिले.


"अरे बाबा, तरीही वेळ कधी सांगून येते का ? काळजी घेत जावी." मानकर सरांच्या प्रेमळ आणि ऋजू स्वभावाला याहून अधिक रागावता येणे शक्य नव्हते. "ठीक आहे. आता घाबरू नको. अभ्यास कर." असा सल्ला देऊन ते आपल्या वाचनात, झोपेत गुंतलेत. आता स्वतः महाविद्यालयाचे प्राचार्यच आपल्या बे मध्ये असताना तो तरूण आपल्या बे मधल्या F 20 ते F 24 या वयोगटातल्या  सहप्रवाशांशी काव्य, शास्त्र, विनोद काय म्हणजे कायच करणार होता ? त्यालाही नाईलाजाने आपल्या Engineering Geology च्या पुस्तकात तोंड खुपसावे लागले. 


त्याकाळी मनमाड ते दौंड आणि पुणे ते कोल्हापूर हा रेल्वेमार्ग एकेरी असल्याने पुढून येणा-या एक्सप्रेसला, मालगाडीला एखाद्या स्टेशनवर थांबून जाऊ द्यावे लागत असे. खोळंबा व्हायचा. तसा खोळंबा होत होत त्यादिवशी त्या तरूणाची महाराष्ट्र एक्सप्रेस पुण्यानंतर जवळपास तासभर उशीरा धावायला लागली. त्या तरूणापेक्षाही प्राचार्य मानकर सरांची त्याच्या परिक्षेविषयीची अस्वस्थता  वाढीला लागली होती. पुन्हा पुन्हा ते त्या तरूणाला असे पुन्हा न करण्याबाबत आग्रहाने सांगत होते. मानकर सर सोबत असण्याचा एक फ़ायदा मात्र असा झाला की बडने-यानंतरच्या सगळ्या प्रवासात गाडीत आलेल्या चहा, नाश्ता या सगळ्यांसाठी त्या तरूणाला एक पैसाही खर्च करावा लागला नाही. मानकर सर तसे स्वभावाचे उदार होते. विद्यार्थ्यांना सन्मानाने आणि बरोबरीने वागविणारे होते.


कराडला गाडी दुपारी १२:३० ला पोहोचली. त्या तरूणापेक्षा मानकर सरांचीच घाई फ़ार चालली होती. त्यांना कराड स्टेशनवर घ्यायला महाविद्यालयाने त्यांना दिलेली मेटॅडोर (ॲम्बेसॅडर ऐवजी सरांना तेव्हा महाराष्ट्र सरकारने फ़िरायला मेटॅडोर दिलेली होती.) आलेली होतीच. तो तरूण त्यापूर्वीही स्टेशनवरून सरांसोबत सरांच्याच गाडीने महाविद्यालयात गेलेला होता. त्यामुळे हक्क असल्यासारखाच तो गाडीत जाऊन बसला. सरही गाडीत बसलेत. महाविद्यालय परिसरात शिरल्यावर सरांनी त्यांच्या ड्रायव्हरला गाडी पहिल्यांदा बॉईज हॉस्टेलला घ्यायला सांगितली. त्या तरूणाला त्याच्या सी ब्लॉकवर सोडले आणि नंतर सर त्यांच्या प्राचार्य निवासस्थानी रवाना झालेत. पूर्ण प्रवासात ते त्या तरूणाला पुन्हा असे साहस न करण्याबाबत वारंवार आग्रहाने बजावत होतेच.


आपल्या हॉस्टेलला गेल्यानंतर तो तरूण आंघोळ वगैरे करून इतर आवश्यक तयारीने महाविद्यालयात गेला. परिक्षा अजूनही सुरू व्हायचीच होती कारण त्यांच त्या विषयाचे वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून येणारे बाह्य परिक्षक अजून यायचेच होते. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे ते दुपारी आलेत आणि परिक्षा छान पार पडली हा भाग अलहिदा. पण मधल्या स्टेशनवरून खुद्द महाविद्यालयाचे प्राचार्यच सहप्रवासी असल्याने कधी नव्हे तो F 20 ते F 24 या वयोगटातल्या चांगल्या सहप्रवाशांचा सहवास लाभूनही तो तरूण आपली छाप पाडू शकला नाही हे शल्य त्याच्या मनात राहिले.


- आपल्या तरूणपणी वय वर्षे १८ ते २५ मधल्या इतर तरूणांइतकाच नैसर्गिक आणि तारूण्यसुलभ भावभावना असणारा, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर


सोमवार, ९ जून २०२५


नागपूर


#सुरपाखरू


#३०दिवसात३०


#जून२०२५





1 comment:

  1. सुंदर!
    रामभाऊ मी आपल्या पेक्षा दहा तरी वर्षांनी पुढे असीन. आपल्या अभ्यासाची एक पद्धत होती.
    मोठ्याने वाच म्हणजे लक्षात राहील हे तत्त्व पालक मंडळी वापरत.. या मागे स्वयंपाकघरातील आईला समजत असे की मुल पुस्तकात लक्ष देत आहे. एखादी गोष्ट चुकीची वाचली तर ती बरोबर केली जात असे.
    अकरावी बारावी मध्ये लक्षात आले की पुढचे शिक्षण वसती गृहात राहून होणार तेव्हा ही सवय कटाक्षाने मोडली.
    बाकी तुमच्या अभ्यास पद्धती विषयी वाचायची उत्सुकता आहे. पुढील लेखाची वाट पाहत आहे🙏

    ReplyDelete