Sunday, February 9, 2025

काहीकाही मंडळी व्यवसाय का करतात हे कोडे

काहीकाही माणसे आपापला व्यवसाय कसा करीत असावीत ? हा प्रश्न मला पडतो. आणि ते जाणून घेतल्यानंतर ती माणसे तो व्यवसाय करीत तरी का असावीत ? हा सुध्दा प्रश्न पडतो.

मागे मी माझ्या अत्यंत आवडत्या अशा नागपूर - चंद्रपूर मार्गावर साधारण १९९२ पासून धावत असणार्या खाजगी गाड्यांविषयी एक सविस्तर लेख लिहीला होता. (लेख इथे)
साधारण १९९२ पासूनच नागपूरच्या R G Gupta यांच्या धनश्री ट्रॅव्हल्सची एक बस या मार्गावर नियमित सेवा देतेय. इतर सगळ्या ट्रॅव्हल्स आपापल्या बसेसच्या या मार्गावर किमान ४ फेर्या (दोन वेळा चंद्रपूर ते नागपूर जाऊन येणे) व्हाव्यात या अट्टाहासात असताना ही ट्रॅव्हल्स मात्र सुरू झाल्यापासून फक्त २ फेर्या करते. सकाळी ९.३० च्या सुमारास नागपूरवरून निघून १२.३० - १२.४५ वाजता चंद्रपूर गाठणे आणि तिथून दुपारी ३.४५ ला परतीचा प्रवास सुरू करून संध्याकाळी ७.०० - ७.१५ पर्यंत नागपुरात परत येणे एवढाच प्रवास ही ट्रॅव्हल्स करीत आलेली आहे. दोन्हीही कडून या वेळा Non Prime अशा वेळा आहेत. या वेळांमध्ये फारसे प्रवासी उपलब्ध नसतात, कुठल्याही मौसमात. या मार्गावरचा prime time म्हणजे सकाळी ६ ते ८ पर्यंत आणि संध्याकाळी ५ ते ८ पर्यंत.
बरे या मार्गावर यांची बसही कायम मिडी बस असते. बाकी ट्रॅव्हल्स चालवतात तसली पूर्ण लांबीची ४५ आसनी बस यांनी कधी चालवलीच नाही. कायम २५ ते ३० आसनी बस हे चालवतात.
बरे पहिल्यापासून इंदूर इथल्या कुठल्यातरी स्थानिक बस बाॅडी बिल्डरकडे बांधलेली बसच हे लोक निवडतात. बाकी ट्रॅव्हल्स आपल्या मिडी बसेस टाटा मार्कोपोलो, भारत बेन्झ सतलज वगैरे आणून चालवत असताना मात्र यांनी इंदूरशी आपली निष्ठा सोडली नाही. कुणाशीही कधीच स्पर्धा न करता आपली सेवा प्रदान करताना यांना किती नफा होत असेल ? किंबहुना काही नफा होतोय की ३० वर्षांपासून ही सेवा तोट्यातच चाललेली आहे ? असे प्रश्न मला पडतात. बरे यांच्या गाडीची ना कधी खूप जाहिरात ना यांच्या गाडीचे काही विशेष आकर्षण (USP).
मग आजच्या या स्पर्धात्मक जगात ही ट्रॅव्हल कंपनी आपला व्यवसाय कसा करतेय ? आणि मुळातच का करतेय ? या व्यवसायात गेल्या ३० - ३३ वर्षात स्वतःच्या बिझिनेस माॅडेलमध्ये यांना काही बदल आणावेसे वाटलेच नाहीत का ? हे प्रश्न मला कायम छळतायत.
नित्य बदलणार्या आजच्या जगात ही अशी न बदलणारी माणसे, कंपन्या आशादायक आहेत असे समजावे ? की ते असा व्यवसाय करीतच का असतील या विचाराने अस्वस्थ व्हावे ?
"एक साधा प्रश्न माझा
लाख येती उत्तरे
हे खरे का ते खरे ?
ते खरे का ते खरे ?"
- बसगाड्यांचा, मनुष्यप्राण्यांचा आणि बिझिनेस माॅडेल्सचा व्यासंगी अभ्यासक, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

1 comment:

  1. नवल आहे पण वरून दिसते ते सत्य आहे का? 1990 चे दशकात एक दुधाचा टँकर मालाड येथे रोज गुजरात मधून येत असे. उत्तम प्रतीचे दूध रास्त भावात विकले जात असे. काही महिन्यांनी हा टँकर राज्याच्या हद्दीवर अडवून तपसला तेव्हा उगड झाले की त्यातून गुजरात मध्ये देशी दारू नेली जायची.

    ReplyDelete