Sunday, February 14, 2021

भगवंत पाठीराखा.

 "आम्ही एव्हढं देवाचं करतो पण देव आमची दरवेळी पाठराखण करतोच असे नाही." ही तक्रार सश्रध्द मंडळी करताना दिसतात. मनमोकळी मंडळी ही तक्रार उघड करतात आणि इतर मंडळी मनातल्या मनात करतात. पण तक्रार असते हे नक्की.

खोलवर जाऊन विचार केला तर हे लक्षात येत की तुम्ही परमेश्वराचे भक्त आहात हे तुमच्या वागणुकीतून, वर्तणुकीतून सामान्य जगाच्या प्रत्ययास येते का ? की नुसते "देहके माला, तिलक और छाप" लावून आपण भगवत्भक्त म्हणून मिरवत आहोत ?
ब्रम्हचैतन्य महाराज म्हणतात , " तालमीत जाणारा आणि तालमीत न जाणारा यांच्या प्रकृतीत थोडा तरी फरक दिसायला हवा की नको ? तसे भगवत्भक्ताच्या वृत्तीत फरक पडलेला दिसायला हवा."
आपण या कसोटीला उतरतोय का ? हा प्रश्न प्रत्येक सश्रध्द माणसाने स्वतःला विचारला पाहिजे. खरच या कसोटीला आपण उतरत असू, आपल्या अकृत्रिम वागणुकीतून आपण भगवत्भक्त आहोत हे कळत असेल, आपले भगवंताशी अनुसंधान पक्के असेल तर आपली लाज भगवंताला असते.
अशा या खर्याखुर्या भगवत्भक्ताविषयी "अरे हे तर एव्हढे भगवत्भक्ति करतात तरीही यांची अवस्था अशी का ?" हा प्रश्न जगाने उपस्थित करणे म्हणजे भगवंताच्या महिमेवर लांछन असते आणि तो हे लांछन स्वतःला कधीही लावून घेत नाही. अशाप्रसंगी तो भक्ताभिमानी धाव घेतो आणि सदैव पाठीशी उभा राहून तळहाताच्या फोडासारखे जपतो हा अनुभव आहे.
हे होण्यासाठी आपण फक्त त्याच्या खर्या भक्तासारखे वागले पाहिजे. आपल्या वागणुकीवरून, वर्तणुकीवरून जग आपल्यालाच नव्हे तर आपल्या भगवंताला जोखत असते हे लक्षात घेऊन जगात वागत रहावे.
धर्मो रक्षति रक्षितः ( आपण धर्माचे रक्षण केले तर धर्म आपले रक्षण करील) सारखेच आपण भगवंताची लाज राखली तर तो आपली लाज राखेल.
भक्ताची दांभिक, कृत्रिम, वरवरची (non genuine) वागणूक भगवंताला लांछन आणणारी असते हे पक्के लक्षात ठेवावे.
- संसारात रमलेला पण गजेंद्राप्रमाणे त्या कुंजविहारीकडे दयेची याचना करणारा, एक कुंजर, राम किन्हीकर.

No comments:

Post a Comment