Monday, February 8, 2021

समृद्धी आणि बदलती संस्कृती.

घर छान कौलारू, छोटेसे, टुमदार. एकंदर सुखी.
घरमालकाकडे थोडी समृध्दी आली.
पक्के घर बांधण्याचे ठरले. घरावर मजला चढवण्याचेही ठरले.
कंत्राटदार अगदीच असंस्कृत. नव्या पिढीचा. भावनांचा ओलावा अजिबात नसलेला.
जुने घर एका दिवसात जमीनदोस्त झाले. त्याच जागेवर नव्या घराची उभारणी आणि विस्तार होऊ लागला.
मुळात घर उभारणीचे पुरेसे ज्ञानच नव्हते. (घर जमीनदोस्त करायला फारसे ज्ञान लागत नाही. आडदांड आडमुठेपणा आणि मस्तवाल वृत्ती पुरते.)
मग मजल्यावर मजले चढवताना घराच्या ढाच्यामध्येच अशी विकृती निर्माण होते. जुने घर कसे का असेना १०० - १२५ वर्षे टिकले तरी होते. हे घर तर अशा ठिसूळ बांधकामामुळे पुढल्या २५ वर्षातच स्वतःहून पडेल हे सांगायला कुणी स्थापत्य अभियंताच असायला पाहिजे असे नाही.



वैदर्भिय संस्कृतीचेही तेच झालेय. एकेकाळची उदार सर्वसमावेशक संस्कृतीचे भग्नावशेष उरलेत. आणि नवी म्हणून जी संस्कृती उदयाला येतेय ती या घरासारखीच ठिसूळ ढाच्यावर उभारलेली आहे.
एकेकाळी "उद्या घरी जेवायला आला नाहीस ना, तर तू आहे आणि मी आहे. मंग पायजो बाबू." असे प्रेमळ संवाद कानावर पडायचेत.
घरी आलेले पाहुणे जायला निघालेत की ते जाऊ नयेत म्हणून त्यांच्या सामानाची, चपलाबुटांची लपवालपवी व्हायची, पाहुण्यांची प्रवासाची आरक्षणे ऐनवेळी रद्द करण्यात यजमानांना केवढातरी आनंद व्हायचा. आणि ते सुध्दा यजमान व पाहुणे दोघांचीही सांपत्तिक परिस्थिती सामान्य असताना.
आज सर्वत्र समृध्दी असताना " या मग केव्हातरी आमचे नवीन घर बघायला." अशी निमंत्रणे कानावर पडतात
किंवा
"अहो घरी कशाला हवे सासूबाईंचे सहस्त्रचंद्रदर्शन ? एवढ्या पाहुण्यांचे कोण करत बसणार ? सुटसुटीत हाॅटेल बुक करा, तिथेच करू. खर्च होईल पण घरी धिंगाणा तर टळेल."
असे संवाद याच विदर्भाच्या कानाकोपर्यातून ऐकायला येऊ लागलेत
आणि
"मनुष्य सांपत्तिक प्रतिकूलतेने खचत असेल कदाचित पण सांपत्तिक अनुकूलतेने जमीनदोस्तच होतो" हे माझे गृहीतक पक्के होत जाते.

- विदर्भातली एकेकाळची आतिथ्यशीलता हळूहळू लयाला जाऊन तोंडदेखलेपणा, मानभावीपणा उदयाला येतोय हे बघून अस्वस्थ झालेला वैदर्भिय रामभाऊ. 

No comments:

Post a Comment