Tuesday, February 23, 2021

Be a better person than you were yesterday.

 परवा आम्ही पती पत्नी प्रवासात असताना अचानक एक जुनी आठवण पत्नीने काढली. ती गोष्ट माझ्या पूर्ण विस्मृतीत गेलेली पाहून ती आश्चर्यचकित झाली. त्या प्रसंगात म्हणे माझा कुणीतरी एका नातेवाईकाने (तिच्या माहेरच्याच) अपमान वगैरे केला होता. माझ्याविषयी गैरसमज पेरण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या आठवणीनुसार मला तेव्हा खूप राग वगैरे आला होता, त्यांच्या वागणुकीचे भरपूर वाईटही वाटले होते. आज जवळपास एका तपानंतर ती घटना मात्र मला आठवतही नव्हती.


हाच तो युरेका क्षण. स्वतःला अधिक जवळून ओळखण्याचा. नागपूरच्या कवी बोबडेंचे "ओळख पटली ज्यास स्वतःची, देव तयास मिळो न मिळो रे." हे वचन मला पक्के पटले आहे. त्यामुळे स्वतःला अधिकाधिक जाणण्याचा माझा कायम प्रयत्न असतो. यामुळे ब-याचदा माझ्या चुकाही ध्यानात येतात, बदलायला वाव मिळतो. दुसरा चुकत असेल तर "त्याचे काय चुकले ?" यापेक्षा "तो असा का वागला असेल ?" या कारणमीमांसेकडे माझे लक्ष जाते. मानवी स्वभावाच्या अपूर्णतेला स्वीकारून विविधरंगी दुनियेकडे मोकळेपणाने बघताना मौज आहे आणि हेच जीवनात कमवायचे आहे हे मला आतापर्यंतच्या अनुभवातून कळलेले आहे.


मनाला लागेल अशी एखादी वाईट घटना घडली, अपमान झाला, की ती घटना किती काळ लक्षात ठेवायची ? जितकी जास्त ती लक्षात ठेवून आपल्या मनात "आता माझी वेळ आली ना, की मी बघ कसा बदला घेतो" ही भावना आली की नुकसान आपलेच आहे हे पक्के लक्षात ठेवावे. अपमानाचा बदला घेण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहून एक दिवस संधी साधून त्या व्यक्तीचा अपमान करण्याने आपली किती चांगली वर्षे वाया गेलीत याचा ज्याचा त्याने विचार करायला हवा. घटना विसरून जावी, त्या व्यक्तीचे आपल्या जीवनात किती स्थान आहे ? त्या एखाद्या घटनेला आपल्या मोठ्ठ्या जीवनपटावर किती किंमत द्यायची ? त्या घटनेला वर्षानुवर्षे लक्षात ठेवून एखाद्या दिवशी उट्टे काढल्याने आपल्याला किती आणि कुठल्या स्वरूपाचा आनंद मिळणार ? हे ज्याचे त्याने ठरवले पाहिजे.


माझे M. Tech. च्या गुरूंनी एकदा सहज केलेला उपदेश माझ्या लक्षात आहे. ते म्हणाले, "राम, आपली स्पर्धा कायम आपल्याशीच असली पाहिजे. Daily check, whether I am a better person than I was yesterday. Even if there is some delta progress, you have won. These delta progresses daily, will make a great change in your overall persona."


मी त्यांच्याकडून M. Tech. मध्ये मिळवलेले ज्ञान कदाचित विसरलोही असेन पण हे वाक्य मात्र मी कायम लक्षात ठेवलेय आणि तसा वागण्याचा प्रयत्नही करतोय. याचेच फ़लित म्हणून माझी memory फ़क्त भूतकाळातल्या चांगल्याच स्मृतींनी भरलेली आहे. एखादी व्यक्ती जाणूनबुजून आणि विनाकारण त्रासदायक ठरत असेल तर तिला एका conviction ने जीवनातून दूर करायला शिकलोय आणि एकदा अशा दूर गेलेल्या व्यक्तीचा विचारही मनात ठेवायचा नाही हे सुद्धा हळूहळू जमत आलेय.


अचानक बालपणी शिकलेले एक संस्कृत सुभाषित आठवले.


अपमानं पुरस्कृत्य मानं कृत्वा च पृष्ठतः |

स्वकार्यमुद्धरेत् प्राज्ञः कार्यध्वंसो हि मूर्खता ||


(अपमान स्वीकारून, गर्व बाजूला ठेऊन, शहाण्या माणसाने आपल काम तडीस न्यावे. [मान अपमानाचा विचार करून] कामाचा नाश करणे हा मूर्खपणा आहे.)


शिकलो तर बालपणी. पण त्यानुसार वागण्या्चे प्रात्यक्षिक शिक्षण मात्र  जीवन नावाच्या शाळेतच मिळाले.


- सर्व कटू आणि गोड प्रसंगांना सामोरे जाणारा आणि त्याप्रमाणे वागणारा जीवनाच्या शाळेतला शहाणा विद्यार्थी, राम.

No comments:

Post a Comment